संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

अंध पंगु दॄढ जालों मायापडळभ्रांती – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३७६

अंध पंगु दॄढ जालों मायापडळभ्रांती – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३७६


अंध पंगु दॄढ जालों मायापडळभ्रांती ।
कर चरण विव्हळ गेले तंव भेटलें निवृत्ती ।
ज्ञान मज उपदेशिलें नेलें अज्ञानक्षिती ।
वृक्ष एक तेथें होता त्या तळीं बैसविलें रीती ॥१॥
धर्म जागो निवृत्तीचा हरिनामें उत्सावो ।
कर्म धर्म लोपले माझें फ़िटला संदेहो ।
धर्म अर्थ काम पूर्ण दान मान समूह ।
नेघे मी इंद्रियवृत्ति रामकृष्णनामीं टाहो ॥२॥
कल्पना मावळली कल्पवृक्षाचे तळवटीं ।
चिंता हें हरपली माझी नित्य अमृताची वाटी ।
मन हें निमग्न झालें नित्य वसे वैकुंठी ।
तापत्रयें ताप गेलें नाना दोषाचे थाटी ॥३॥
अनंत हें मायामय लोपल्या जिवाचिया साठी ।
हरपल्या योनीमाळा चिंतामणीकसवटी ।
सिध्दि बुध्दि समरसल्या जीवशिव एकदाटी ।
आत्माराम मन जालें एकतत्त्व शेवटीं ॥४॥
आत्माराम निर्गमलें वेदशास्त्रगुह्य ज्ञानें ।
वासनेचि मोहजाळी ते विराली नाना स्थाने ।
फुटलें नाना घट तुटलीं नाना बंधनें ।
सुटल्या जीवग्रंथी ऐसें केलें त्या गुरुज्ञानें ॥५॥
मा मोक्ष हे ठेले मागें मुक्तिमार्ग निमला ।
वृत्ति हे बुडाली माझी निवृत्ति गळाळा पाजीला ।
सत्रावी वोळली बाळा आत्माराम दाता जाला ॥६॥
बुध्दि बोध संवगडे साजीव करचरण ।
नयनीं नयन जाले चक्षु मी समाधान ।
दिव्य देह अमृत कळा दशदिशा परिधान ।
सर्व हें ब्रह्म फ़ळद फ़ळलें विज्ञान ॥७॥
निवृत्ति गुरु माझा अंधपण फ़ेडिलें ॥
सर्वत्र दृष्टी जाली परतत्त्वीं राहिलों ।
निरसली माया मोहो श्रीराम अंजन लेईलों ।
ज्ञानदेवो ज्ञानगंगे निवृत्तिनें बुडविलों ॥८॥

अर्थ:-

माझ्या बुद्धिरूपी डोळ्यावर मायेचा पडळ आल्यामुळे मी आंधळा म्हणजे आत्मज्ञानशून्य झालो. परमार्थप्राप्तीचा मार्ग चालण्यास मी पांगळा झालो. हातापायाची शक्ति गेली अशा स्थितीत दयाळू श्रीगुरूनिवृत्तीराय भेटले.त्यांनीआत्मज्ञानाचा उपदेश करून अज्ञानाचा नाश करून परमात्मरूपी वृक्षा खाली बसविले.अशा श्रीगुरूंचा जयजयकार असो हरिनामाच्या गजरांत माझा सर्व कर्म धर्माचा लोप होऊन आत्मस्वरूपाविषयी संदेह नाहीसा झाला. धर्म, अर्थ, काम, मोक्ष, हे पुरूषार्थरूपी दान मला प्राप्त झाले. ह्यामुळे मी इंद्रिय विषयांच्या नादी न लागता फक्त हरिच्या नामाचा टाहो फोडीत राहीन.कल्पवृक्षाप्रमाणे भक्ताच्या इच्छा पूर्ण करणारा जो परमात्मा त्याने माझ्या सर्व कल्पना नाहीशा केल्या. तसेच चिंता नाहीशी झाली. कारण हरिनामरूपी अमृताची वाटी तोंडास लावली आहे. मन हरिनामांत रंगून गेले. त्यामुळे नित्य वैकुंठ जो परमात्मा तेथे वास झाला आणि अनंत दोषांचे समुदाय व अध्यात्मादि तीन तापही नाहीसे झाले.माझ्या अध्यात्मदृष्टीने मायामय जगतांच्या राशी नाहीशा झाल्या.अनेक योनींचा फेरा चुकला. चिंतामणी जो आत्मा तो माहित झाला व त्यात रिद्धिसिद्धि लय पावल्या जीवशिवाचे ऐक्य झाले. आणि अद्वितीय तत्त्व जो आत्माराम तद्रुपच मन झाले. वेदशास्त्रांच्या गुह्यज्ञानाने शुद्ध आत्मस्वरूप अनुभवास आले. त्यामुळे अनेक विषय वासना, अनेक जन्माची बंधने शुद्ध सच्चिदानंद आत्मा आणि अनात्मा अंतःकरण यांचे ऐक्य समजून अनेक जन्म मारलेली जी गाठ, श्रीगुरूपासून प्राप्त झालेल्या ज्ञानाने सुटली. कल्पित बंधासंबंधी आत्मस्वरूपावर आरोपित मोक्ष किंवा मुक्ति हा व्यवहारही संपला प्रवृत्ति नष्ट झाली. सतरावी आत्मानंदाची कळा प्राप्त करून देण्यास श्रीगुरू दाता भेटला बुद्धि आणि आत्मबोध यांची मैत्री जमली. हातपाय सजीव झाले. आत्मस्वरूपाविषयी आंधळा होतो. त्या मला डोळे आले. सर्व दश दिशा आनंदरूप झाल्या श्रीगुरूंनी फलद्रुप ब्रह्मज्ञानाचा उपदेश केल्यामुळे हे सर्व ब्रह्म झाले. माझ्या श्रीगुरू निवृत्तिरायांनी माझे आंधळेपणा नाहीसा केल्यामुळे एक परमतत्त्वांच्या ठिकाणी दृष्टि राहिली.डोळ्यांत श्रीरामरूपी अंजन घातल्यामुळे माझा मायामोह नष्ट झाला. श्रीगुरूनिवृत्तिरायांनी मला ज्ञानगंगेतच बुडवून टाकिले असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


अंध पंगु दॄढ जालों मायापडळभ्रांती – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३७६

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *