संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

बहुशास्त्र जल्पणे वेद त्रिकांडपणें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ९२९

बहुशास्त्र जल्पणे वेद त्रिकांडपणें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ९२९


बहुशास्त्र जल्पणे वेद त्रिकांडपणें ।
बोलती लक्षण त्रिविधमुक्तीं ॥१॥
नानामतें उत्छुंखळे म्हणोनी जासी विकळें ययापरी ॥२॥
म्हणोनी तया वाटा जाऊं नको अव्हाटा ।
या संकल्पा फुकटा येवों नेदी ॥३॥
परतोनियां पाहीं करी आठवण ।
तूं आहेसी कोण विचारी पां ॥४॥
विचारूनी निरूते संतसंगे पंथें ।
जन्ममृत्यू तूंतें न बाधी कांहीं ॥५॥
म्हणोनी यम नियम प्राणायाम प्रत्याहार आटणी ।
वाउगाचि बांधोनि सिणसी का पां ॥६॥
ऐसें गंधधर्वपर की मृगजळाचें नीर ।
येथींचा विचार क्लेशी क्षीदक्षीण न करीं बापा ॥७॥
मतें या भ्रामकें वेश्याचेनी सुखें ।
पालट एके सोंगें जाली ॥८॥
क्षीरनिरा निवाड याचेनि नव्हे काही ।
निजगुरू पाही तो विरळा असे ॥९॥
म्हणोनी याच्या चरणी घालोनियां मिठी ।
निजपदी बैसवी शेवटीं तुज ॥१०॥
आता सांडी मांडी न करी निश्चय एक धरी ।
तूं आत्मा निर्विकारी सदोदित ॥११॥
म्हणोनि तूं सर्वगत सर्वसाक्षी सुखरूप ।
तेथें पंचभूती नातळेचि ॥१२॥
आतां न करी तूं अनुमान ज्ञान ना विज्ञान ।
स्वयें सिद्धी आपण होऊनी राहे ॥१३॥
हेचि पुढता पुढती सांगों तुज किती ।
श्रुती नेती नेती मौनावल्या ॥१४॥
निवत्तीदास म्हणे अनुभवी तो जाणे ।
येरां लाजिरवाणे टकमक ॥१५॥

अर्थ:-

कर्म,उपासना व ज्ञान यांचे प्रतिपादन करणारा जो वेद व शास्त्रे यांनी मोठ्या अट्टहासाने मुक्ती तीन प्रकारची आहे. असे सांगितले आहे. असे कोणी बरळतात. म्हणून उत्च्छंखल होऊन त्या नाना मतांच्या मागनि वेड्यासारखा जाशील या आडमागनि जाण्याचा तुमच्या मनांत संकल्प सुद्धा येऊ देऊ नको.जर अंतर्मुख दृष्टी करून तुझे स्वरूप काय, तूं कोण आहेस, याचा विचार कर.असा नीट विचार करून संतांच्या संगतीने जर वागशील तर जन्ममृत्यूची बाधा तुला होणार नाही. म्हणून यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार वगैरे अष्टांग योगाची साधने करून, प्राणाला कोडून धरून, तूं आपणाला का शीण करून घेतोस. हे जगत गंधर्वनगर अथवा मृगजळाच्या पाण्याप्रमाणे मानून, या लोकांच्या दुःखाने विनाकारण क्षीण होऊ नको. वेश्येच्या सुखाप्रमाणे भ्रामक सुख उत्पत्र करणाऱ्या या मतांनी पुष्कळाची फसगत झाली. याच्या योगाने दुधपाण्याचा म्हणजे चांगल्या वाईटाचा निवाडा होणार नाही. आत्मसुखाचा बोध करणारा गुरू विरळाच असतो. म्हणून अशा गुरूच्या पायी मिठी मार म्हणजे ते तला निजस्वरूपांवर बसवतील. विधि निषेधाचा विचार न करता तूं एक निश्चय कर तूं निर्विकार नित्य आत्मरूप आहेस. आत्मरूप तूं असल्यामुळे तूंच सर्वव्यापी, सर्वसाक्षी व सुखरूप असून पंचमहाभूताहून वेगळा आहेस.अशी तुझी खात्री होईल. आता तूं ज्ञानरूपी किंवा नाहीस याबद्दल अनुमान करीत बसू नकोस. तू स्वयंसिद्ध आत्माच अशा जाणीवेने राहा. या गोष्टी पुन्हा पुन्हा किती सांगाव्या या ब्रह्माचे वर्णन श्रुतींनाही करता आले नाही.त्यानीही ‘नेति नेति’ असे म्हणून मौन धारण केले, या गोष्टी अनुभवी पुरूषालाच कळतील लज्जायमान होऊन आश्चर्यान टकमक पाहातच राहातील. असे निवृत्तिदास माऊली सांगतात.


बहुशास्त्र जल्पणे वेद त्रिकांडपणें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ९२९

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *