संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

ज्ञान हेंचि गाय दुध दुहिलें भरणा दोही – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १६४

ज्ञान हेंचि गाय दुध दुहिलें भरणा दोही – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १६४


ज्ञान हेंचि गाय दुध दुहिलें भरणा दोही
तया जना हातु नाहीं ।
ठेविलें अग्निवरी अग्नि नाहीं भीतरी ।
तापलें पडिभरी साय आली ॥१॥
गौळणी चतुरे झडकरी ।
जाय मथुरे विकरा करी ॥२॥
दहियामहियाविण घातलें विरजण ।
मांडिले घुसळण रवियेवीण ।
करिती मंथन वरी आलें जीवन ।
एकलें आणून काढूं पाहे ॥३॥
आलें गिर्‍हाईक । न विकी तूप ताक ।
नेणती विवेक । गोरसाचा ॥
दहियामहियाच्या करुनी घागरी ।
लटकी उंबरा उबरी । काय करुं ॥४॥
ज्ञान हे घागरी । वाईयेली शिरीं ।
गोरसभीतरीं दाखवितो ।
एके हातें सावरी । झाकी तया वरी ।
चोखटिव करी । गोरसाची ॥५॥
तंव मार्गी जातां । एकी पुसे गौळणी ।
पारि बैसले दानीं किं । नाहीं वो ।
त्यासी नेदीं मी दान । जाईन मी आपण ।
प्रत्यक्षा प्रमाण । काय करुं ॥६॥
ऐसी पाराजवळी गेली । तंव शब्दें वोळखिली ।
जावों दे गा वहिली । उसिरु जाला ॥
या निर्वाणींच्या बोला । सुखिया संतोषला ।
निरोप दिधला । गौळणीसी ॥७॥
ऐसी पावली मथुरा । क्षण न लगे विकरा करा ।
सवेंचि एकसरा । उफ़खा झाला ॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलु ग्राहिक मानसीं गोरसु ज्ञानेंसि ।
मिळोनि गेला ॥८॥

अर्थ:-

परमात्म्याचे श्रुतिसिद्ध यथार्थ ज्ञान हीच गाय तिच्यापासून दूध निघणार ते ब्रह्मसुखच आतां त्या दूधाचे परिणाम दह्यादिक त्याची विक्री करणारी गौळण त्याची गिहाईक इत्यादि प्रकार ब्रह्मस्वरुपावस्थानस्थितिमध्ये कसे संभवेल? संभवणारच नाही. कसे संभवणार नाही ते पहा. कारण त्या ब्रह्मानंदाशिवाय दुसरे काही ही नाहीच. त्याला हात नाहीत. ते अग्नीवर तापत ठेवले अशी कल्पना केली तर चुलीत अग्नी नाही. आणि अग्नी नसलेले दूध तापवून साय पुष्कळ आली आहे. त्याची विक्री करण्याकरिता एक चतुर गवळण मथुरेत गेली. दही ताकांवाचून त्या दूधांत विरजन घालून रविवाचून घुसळले. व ती मंथन करु लागली मंथन करीत असता एक परमात्माच प्रतितीला आला. तरी ती लोणी समजून काढून पाहू लागली. असल्या गोरसाचा विवेक न जाणणारी गिऱ्हाईक आली. तर ती गौळण तूप, ताकादिकांची विक्री करीत नाही. मूळचेच ताक दही वगैरे सर्वच मिथ्या आहे. तेव्हां याची उभारणी काय करावी. गौळणीने ज्ञानाची घागर डोक्यावर घेतली असली तरी त्यातला गोरस ज्ञानयोग्य अधिकाऱ्याला दाखवून अज्ञानाकरता झाकून टाकते. अशा रितीने गोरसाची अवस्था करते. इतक्यांत मार्गात दुसऱ्या एका गौळणीने तिला विचारले की. ‘बाजारांतील पारावर म्हणजे मुख्य ठिकाणावर तूही विक्री करण्याकरिता बसतेस की नाही. हिने उत्तर केले की, अनधिकाऱ्यांना मी हे देणार नाही. पाहिजे तर मी आपले परत जाईन. असे सांगून ती पाराजवळ गेली. इतक्यांत तिला शब्दांवरुन देवांने ओळखिले. तेव्हा ती देवाला म्हणते. मला घरी लवकर जाऊ दे. फार उशीर झाला. या तिच्या निःसंदेह निर्वाणीच्या भाषणाने देव संतुष्ट झाला. व तिला जाण्यास परवानगी दिली. अशा देवांच्या मधुर भाषणाने तिला फार आनंद झाला. तिला विक्रीची तर जरुरच नव्हती म्हणून ती तशीच आनंदात परत घरी आली तो भगवंताचा वियोग झाला त्यामुळे तिला फार त्रास झाला. या ज्ञानाच्या दुधाचे खरे गिऱ्हाईक म्हणजे माझे पिता व रखुमादेवीचे पती जो श्री विठ्ठल, तो श्रीविठ्ठलरुप गोरस ज्यांच्या मनांत ज्ञानाच्या योगाने मिळून गेला आहे. तो धन्य होय. असे माऊली सांगतात.


ज्ञान हेंचि गाय दुध दुहिलें भरणा दोही – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १६४

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *