संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

जळधराच्या धारीं सिंधुजळ जयापरी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १६१

जळधराच्या धारीं सिंधुजळ जयापरी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १६१


जळधराच्या धारीं सिंधुजळ जयापरी ।
पुरोनिया उरे महावरीरे गोवळा ॥
तेजें शोकलें काई आणावया गेलें ।
तैसी नवल तुझी कुसरीरे गोवळा ॥१॥
चाळा लाउनि गोवितोसी दाउनियां लपसी ।
लपोनि केउता जासी तैसी माव न करी
आम्हासिरे गोंवळा ॥२॥
वायु काय वोखट चांग विचारुनी वाजे ।
तयाविण कवण ठावो असे ॥
तो आपुलि चाडा करि कोडिवरी येरझारा ।
सेखीं गगनीं सामावला दिसेरे गोंवळा ॥३॥
आकाश तेंचि अवकाश तुजमाजि हें
विश्व कीं तूं विश्वीं अससी ।
बापरखुमादेवीवरा विठ्ठला न बोले ।
तुझें वर्म बोलतां निकरा झणे जासीरे गोंवळा ॥४॥

अर्थ:-

श्रीकृष्णपरमात्मा निर्गुण स्वरुपाने सर्व जगांत व्याप्त असून सगुणरुप घेऊन जगतांत कशी क्रीडा करतो हे या अभंगामध्ये वर्णन करतात. सूर्य आपल्या किरणांनी समुद्राचे पाणी शोषण करुन मेघाच्या रुपाने त्याचा पुन्हा वर्षाव करतो. ही स्थिति मनांत घेऊन मेघ त्यापासून जलाचा वर्षाव होतो. त्यांना प्रत्यक्ष किंवा परंपरेने सिंधुजळ ज्याप्रमाणे आश्रय असतो. त्या मेघांला आवश्यक तितके पाणी पुरवून पुन्हा आपण पृथ्वीवर जसा असावा तसा असतोच. सूर्यतेजाने शोषण केलेले पाणी आणण्याकरिता समुद्र जातो काय? त्याच्या ठिकाणी ते आपोआपच येऊन मिळतेच त्याप्रमाणे. तुझ्या स्वरुपाच्या ठिकाणी कितीही जगत व्यवहार झाला तरी त्याला आश्रय तूंच आणि शेवटी जगत च तुझ्याच स्वरुपांच्या ठिकाणी जाऊन मिळणार. याप्रमाणे तुझे हे कलाकौशल्य कांही विलक्षणच आहे. प्रपंचाचा चांगलेपणा दाखवून त्यांत जीवाला गुंतवून आपण लपतोस. जरी अज्ञानी जीवाला आपले स्वरुप लपविलेस तरी तुझी व्याप्ती सर्व ठिकाणी असल्यामुळे तूं कोठे जाशील परंतु आम्हांला मात्र असा मोह घालू नको. असे पहा की वारा जेव्हां जोराने वाहतो. त्यावेळेला हा भाग चांगला, हा भाग वाईट असा विचार करुन वाहतो का? त्याचे जोराने वाहणे हे विशेषरुप नाहीसे झाले तरी. त्याचा वायुरुपाने सर्वत्र वास आहेच. वायु नाही असे कोणते ठिकाण आहे सांगा? याप्रमाणे त्या वायुचे रुप सर्वत्र व्याप्त असूनही तो आपल्या इच्छेने कोट्यावधी येरझार करतो. येरझार संपल्यावर शेवटी आपले कारण जे आकाश त्यांत लय पावतो. त्या आकाशाला आश्रय देणारा जो तूं त्या तुझ्यामध्ये विश्व आहे. व विश्वांत तूं आहेस असा माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठला हे काय बोलावे लागते? कारण तुमच्या निर्गुण सगुण स्वरुपाचे मुख्य वर्म हेच आहे.तुझे हे वर्म बोलिलो म्हणजे तूं कदाचित निकरा म्हणजे चिडला जाशील. असे माऊली सांगतात


जळधराच्या धारीं सिंधुजळ जयापरी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १६१

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *