संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

मदलसा म्हणे पुत्रा तूं मुक्त होतासी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७३५

मदलसा म्हणे पुत्रा तूं मुक्त होतासी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७३५


मदलसा म्हणे पुत्रा तूं मुक्त होतासी ।
संसारमायामोहें कारे बध्द जालासी ।
सिध्द तें विचारी पां जेणें सुखिया होसी ॥१॥
चेईतूरे तानुलिया जाई श्रीगुरु शरण ।
देहभावीं व्यापिलासी मग तुज शिकविल कवण ।
अज्ञानपण सांडूनियां तूं चुकवी जन्ममरण ।
गर्भवास वोखटारे गर्भी दु:ख दारुण ॥२॥
जागृति आणि निद्रा तुज स्वप्नीं भरु ।
सुषुप्ति वेळोवेळां तुज पडिला विसरु ।
तें जव नेणसिरे तव तुज नाहीं निर्धारु ॥३॥
देह तव नाशिवंत तूं कारे भुललासी ।
अखंड तें विचारी पां जेणें सुखिया होसी ।
दु:ख तें आठवीरे गर्भी काय भोगिसी ।
कोसलियानें घररे सदृढ पैं केलें ।
रिगुनिगु न विचारीतां तेणें सुख मानिलें ।
जाहालें बाळा तुज तैसें यातायाति भोगविलें ।
मोक्षद्वार चुकलासी सकळही कर्मे संचिलें ॥५॥
सर्पे दुर्दर धरियेलारे मुखीं तंव तेणें माशी तोंडीं धरियेली शेखीं ।
तैसा हा मायामोहो तुज कारे नुपेक्षी ।
इंद्रियें व्यापुनियां संसारी सुखि दु:खी ॥६॥
मृगरे जळ जैसें हेलावत पैं दिसे ।
तैसें हे भ्रांति माया ।
तुज नाथिली आभासें ।
उत्पत्ति प्रळय दोन्ही ये तरी तुज सरिसे ।
स्थिर होऊनि विचारी पां आणिक नाहीं बा तैसें ॥७॥
मृग पक्षी कीटकु पतंग होसी ।
आक्षेपी संचरेरे नाना योनी पावसी ।
पूर्ण ज्ञानसुख जेणें तें तूं कारे नेणसी ।
अविनाश तेंचि तूरें वायां सबळ कां करिसी ॥८॥
परब्रह्म बाप तुझा इच्छा माया हे तुझी ।
अंशरे तूं तयाचा सबळ कारे बुध्दि तुझी ।
अज्ञान तुज व्याली ते नव्हे कारे वांझी बा नव्हेचि कां वांझी ।
तेणें तूं भुललासी ऐक शिकवण माझीं ॥९॥
परतत्त्वा आणि तुज बाळा नाहीरे भिन्न ।
अनादि तूं आहेसिरे परि हें न देखें मन ।
अकर्म कर्म केलें तेणें जालें अज्ञान ।
निष्कर्म होय जेणे तें तूं करी कांरे ज्ञान ॥१०॥
पुत्र म्हणे वो माते मी अनादि कैसा ।
मी माझें जाणता वो मी अज्ञान कैसा ।
उकलु केवि होय तुज कैसा भरंवसा ।
जीवनन्मुक्त होय दृष्टि दाखवी तैसा ॥११॥
पापपुण्य दोन्ही मजसवेंचि असती ।
करणी माते थोर त्याची ते आहे चालती ।
उकलु केंवि होये होय तें सांग मजप्रती ।
बुझावि वो माझे माते ऐसी करी विनंती ॥१२॥
केली कर्मे जरि तुवां न संडिवो पाठी ।
कवणतें प्रकासील हे विपरीत गोष्टी ।
उकलु केवि होय ते सांग मजप्रती ।
जेणें मी दृढ होय ते बुध्दि देई वो लाठी ॥१३॥
अनंत कर्मे मातें घडलीं वो मज ।
तीं तंव न संडिती ऐसें ज्ञान पैं तुज ।
तरी म्या काय कीजे केविं पावणें सहज ।
दुर्घट वाट आहे कैशानि निफजेल काज ॥१४॥
उठी पुत्रा जाई बाळा तीर्थरे हिंड ।
साधु आणि संत जेथें असती बा उदंड ।
तयामाजी आत्मज्ञानी जो कां न बोले वितंड ।
तो तूं गुरु करि तो तुज बुझवील प्रंचड ॥१५॥
ज्ञानविज्ञानरे गुरु मुखे बुझसी ।
विचारुनि अनुभउ आपेंआप जाणसी ।
जेणें जालें अनंत सिध्द तें तूं कारे नेणसी ।
हरिहर ब्रह्मादिक तेहि ध्याती तयासी ॥१६॥
नव्हतां बाळा नादबिंद तैं तूंरे सहज ।
तेंथेचि तूं होतासि ऐसें ज्ञान पैं तुज ।
तेथे तूं लीन होई करी आपुलें काज ।
संसार साभिमानें घेई तेथीचें व्याज ॥१७॥
उपजतां गर्भ अंधु जया नाहीं प्रकाशु ।
पूर्वी तो योगभ्रष्ट चुकवि गर्भवासु ।
गुरुवचनी भजे पुत्रा परब्रह्मी करि वासु ।
अमृत सेवि पारे झणी होसी उदासु ॥१८॥
तुज ऐसें रत्नबाळा कवणेरे केलें ।
आणिक अनंत जीव चराचर भुतले ।
तेणेरे इच्छामात्रें क्षणामाजी रचीलें ।
तें तूंरे नेणसीच येवढें कैसे चुकविलें ॥१९॥
सांडि बाळा काम क्रोधु हा दुजेन विचारु ।
जिहीं तुज अंतरविलें त्याचा करि हा संहारु ।
गुरुचरणीं भजे पुत्रा तो तुज देईल विचारु ।
अविनाशपद पावशी मग तुज होईल निर्धारु ॥२०॥
सहज यम नेम गुरुकृपारे करी ।
आसनें प्राणायाम प्रत्यहार उदरी ।
धारणा होईल तुज मग ध्यान विचारीं ।
समाधी होई पुत्रा तूं जाण निरंतरी ॥२१॥
षडचक्रा वेगळेरे तें जाणिजे कैसे ।
अनुभवें जाणसीरे तुज सहजे प्रकाशें ।
तैसा हा ज्ञानयोगु गुरुकृपारे दिसे ।
अज्ञान निरसूनियां ज्ञान पैं समरसें ॥२२॥
अव्यक्त तिहीं लोकीचें तुजमाजिरे असे ।
त्रैलोक्य जयामाजि तैं तुज पैं दिसे ।
अविनाशपद होंसी मग अज्ञान नासे ।
तुजमाजि अमूर्तरे आपेंआप प्रकाशे ॥२३॥
अव्यक्त अगोचर मज होईल निरंतर ।
इंद्रियें स्थिर होती हे तुझे अंकुर ।
अविनाशपद होसी मग नहीं येरझार ।
अष्टमहासिध्दि जया वोळगती तुझें द्वार ॥२४॥
ऋध्दिसिध्दि मायासिध्दि यासि दिधली ।
तुर्याचिया उपरिरे ज्ञान उन्मनी देखिली ।
आशापाश सबळ माया जीवबुध्दि निमाली ।
गर्भवास चुकलारे कैसी बुध्दि स्फुरली ॥२५॥
संतोषोनि कृपादृष्टी ज्ञान पैं लाधविला ।
आत्मतत्त्व बोधु तुज प्रकाशुरे जाला ।
समरसिं सोहंसिध्दि प्रबोधु निमाला ।
निवृत्ति प्रसारेरे ज्ञानदेवो बोलिला ॥२६॥

अर्थ:-

मदालसा म्हणते हे पुत्रा तूं मूळचा ब्रह्मरूप आहेस पण या अनिर्वचनीय संसारमोहाने तुला बद्धतेची भ्रांती झाली आहे. म्हणून नित्यशुद्ध असलेल्या ब्रह्मस्वरूपाचा विचार करशील तर दुःखसंबंधरहित आनंदरूप होशील. गर्भात फार दुःख आहे. गर्भवास वाईट आहे.म्हणून श्रीगुरूला शरण हो व अज्ञानाचा नाश करून जन्ममरण चुकव. जर देहच मी आहे. असा तुझा दृढ निश्चय झाला तर तुला उपदेश कोण करील. जागृति स्वप्न व सुषुप्ती यांतच तुझा सर्वकाळ जात असल्याने तुला आत्मस्वरूपाचा विसर पडला व जोपर्यंत ते आत्मस्वरूप तूं जाणत नाही. तोपर्यंत तुझा निश्चय होणार नाही. ज्या देहाला तूं एवढा भुलला आहेस तो तर नाशवंत आहे. गर्भवासांत किती दुःख भोगलेस त्याची आठवण कर व अखंड म्हणजे सजातीय विजातीय स्वगतभेदशून्य जे ब्रह्म त्याचा निश्चय कर म्हणजे सुखी होशील. नाही तर मलमूत्र जंतूचा ज्यांत साठा आहे अशा गर्भवासात वारंवार जावे लागेल. ज्याप्रमाणे कोशकिडा आपल्या अंगाभोवती आपणास बाहेर निघण्यास रस्ता न ठेवता बळकट घर करून त्यांत सुख मानतो. तसेच तुला ही संचित कर्माचे योगाने मोक्षद्वार चुकवून जन्ममरण भोगविले. बेडूकांला सर्पाने तोंडात धरले असता सुद्धा शेवटपर्यंत तो बेडूक माशी गिळतो व शेवटी सर्पाच्या तोंडांत जातो. तसे संसारांत इंद्रियांनी विषय संपादून सुखदुःख भोगित असता हा मायारूपी मोह तुला ग्रासून टाकील. वस्तुतः नसलेल्या मृगजळांतील पाणी हलल्यासारखे दिसते. तसेच भ्रमाने नसलेली माया तुला दिसते. अंतर्मुखाने विचार केला तर उत्पत्ति प्रलय ही आत्मरूप असून, आत्म्या प्रमाणे परमार्थ सत्य दुसरी वस्तु नाही. मृग,पक्षी, कीटक, पतंग इत्यादी नानायोनीत या योनीतून त्या योनीत हिंडण्यापेक्षा ज्याच्या योगाने संपूर्ण सुख मिळते असे ज्ञान तूं कां प्राप्त करून घेत नाहीस. असले अविनाश ज्ञानस्वरूप ब्रह्म तूंच आहेस उगीच हेकडपणा का करतोस. परब्रह्म हे तुझे अधिष्ठान असून कल्पनारूपी आईपासून तुझी उत्पत्ती म्हणून तूं परमात्म्याचा अंश आहेस नसता जीवपणाचा छंद का घेतोस? ज्या अज्ञानरूपी कल्पनेपासून तुझी उत्पत्ती झाली व जिच्या योगाने तूं एवढा मोहून गेला आहेस तो वास्तव विचार केला तर वांझ आहे. हा उपदेश विसरू नको. परमात्म्याहून तूं मुळीच भिन्न नाही. पण अकर्म असा जो तूं त्याने अज्ञानामुळे कर्म केले असा जो निक्षय होतो. त्यामुळे मी अनादि बह्मरूप आहे असे पटत नाही. पुत्र म्हणतो माते मदालसे, मी अनादि बह्मरूप कसा? मी कोण आहे ? माझे काय आहे? अज्ञानरूपी कल्पनेपासून माझी उत्पत्ती कशी? जीवन्मुक्त कसा असतो हे मला स्पष्ट, ज्या तऱ्हेने समजेल, असे तुला वाटते, त्या तऱ्हेने मला सांग. तसेच पापपुण्यही मला आहेत व त्यापासून मिळणारा सुखदुःखाचा भोग मला होतो काय? याचा उलगडा कसा होईल ते मला कृपा करून सांग. अशी आईला विनंती करतो. काही लोक असे म्हणतात की कर्म स्वतः आपले फल देते म्हणून ईश्वराची आवश्यकता नाही परंतु कर्म जड आहे, म्हणून ते स्वतः फल देणे शक्य नाही. हे विपरीत वाटते तेव्हा यावरील शंकेचे पूर्ण समाधान होऊन मी निःशंक होईन अशा तऱ्हेची निक्षयात्मक बुद्धी मला दे.तसेच आई माझे हातून अनंत जन्मांत अनंत कमें झालेली असून जोपर्यंत शरीर संबंध आहे. तोपर्यंत अनंत कमें ही होणारच. म्हणून निष्कर्म होण्याचा मार्ग अत्यंत अवघड झाला आहे. तेव्हा मी काय करावे व माझे हे कार्य सहज कसे होईल याचे ज्ञान तुला आहे. ते मला सांग. मदालसा म्हणाली बाळा, ज्या ठिकाणी साधुसंत राहतात. अशा तीर्थयात्रा कराव्या व त्या संतांत उगीच शब्दपांडित्य न करता जो खरा आत्मनिष्ठ असेल अशा श्रीगुरूला शरण हो. तो तुझ्या सर्व शंकेचे समाधान करील. मग शब्दज्ञान काय किंवा अनुभवाचे ज्ञान काय हे तुला गुरूकडून यथार्थ समजेल तूं विचाराने त्याचा अनुभव घेतलास तर स्वतःलाच ब्रह्मरूपाने जाणशील हरिहर बह्मदेवादि ज्या ज्ञानाची स्तुति करितात, व ज्या ज्ञानाने पुष्कळ लोक उद्धरून गेले ते तुला समजणार नाही काय? ज्यावेळी आकाशादि प्रपंच नव्हता त्यावेळी तूं म्हणजे ब्रह्म आपल्या महिम्यामध्ये होतेच. संसाराचा अभिमान धरशील तर तूं अशा परमात्म्याला शरण होऊन आपले कार्य करण्याकरिता धर. पूर्वजन्मांत योगभ्रष्ट असल्याने जन्मल्याबरोबर त्याला परमात्म्याचे ज्ञान नसते. एवढ्याकरिता बाळा गुरूवचनावर विश्वास ठेऊन हे ज्ञानामृत पान करून ब्रह्मरूप हो.यांत आळस करू नको. तुझ्यासारखा बुद्धिमान मुलगा अनंत चेतन जीव, अचेतन सृष्टि ज्या परमात्म्याने एका क्षणांत केवळ इच्छेने उत्पन्न केली त्या परमात्म्याला जाणणे एवढी महत्वाची गोष्ट कशी चुकली. ज्यांनी तुला आत्मस्वरूप ज्ञानापासून दूर केले त्या कामक्रोधरूपी दुर्जनांचा विचार सोडून त्यांना ठार कर आणि गुरूचरणसेवेने नाशरहित ब्रह्मपदाची प्राप्ती करून घे. म्हणजे तुझा आत्मस्वरूपाविषयी निश्चय होईल. गुरूकृपा झाल्यावर यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यानधारणा ही सहज साधून निरंतर समाधी होईल. षट्चक्रावेगळे असणारे परमतत्त्व कसे जाणावे असे वाटेल पण जर तूं अनुभव घेण्याचा प्रयत्न केलास तर ते तुला सहज कळेल त्याप्रमाणे अज्ञानाचा नाश करून ज्ञानस्वरूप होणाचा ज्ञानमार्ग गुरूकृपेनेच समजेल.तिन्ही लोकांत व्याप्त असणारे, परमतत्त्व तुझ्यात आहे, त्या परमतत्त्वांत त्रैलोक्य आहे असे जाणलेस तर त्या अविनाश पदाचे ज्ञान तुला होईल व मग अज्ञानाचा नाश होऊन तुला अधिष्ठान असणारे अमूर्त परमतत्त्व स्वप्रकाशाने प्रकाशीत होईल. ही तुझी इंद्रिये परमतत्त्वाचे अंकूर होतील म्हणजे त्याची प्रवृत्ति विषयांत राहणार नाही. मग तूं नित्यमुक्त हो अष्टमहासिद्धी तुझी सेवा करण्यास तत्पर राहून अविनाश पदाला प्राप्त होशील व जन्ममरणाच्या फेऱ्यांतून सुटशील. तूर्यावस्थेच्या पलीकडे असणारी उन्मनी म्हणजे ज्ञानस्वरूप तूं झाल्यावर रिद्धिसिद्धि व माया ही सर्व तुझ्या ताब्यांत राहतील व ज्या मायेच्या योगाने आशारूपी पाश बळकट होतो. ती जीवबुद्धी नाहीसी झाली काय? माझी बुद्धी चांगली आहे आतां पुन्हा गर्भवासाचे नांव नाही. श्रीनिवृत्तीनाथांच्या प्रसादाने ज्ञानेश्वर महाराज संतोषाने म्हणतात गुरूकृपा दृष्टीने आत्मतत्त्व बोध स्पष्ट झाला व मी ज्ञानरूप झालो. एवढेच नव्हे तर त्या ब्रह्मरसात मी ब्रह्मरूप आहे. असे ज्ञान ही मावळले.असे माऊली सांगतात.


मदलसा म्हणे पुत्रा तूं मुक्त होतासी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७३५

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *