संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

परियेसी गव्हारा सादर – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५१४

परियेसी गव्हारा सादर – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५१४


परियेसी गव्हारा सादर ।
कर्मे निर्वश झाले सगर ।
भिल्लें विंधिले शारंगधर ।
झाला पुरंदर सहस्त्र नयन ॥१॥
कर्मे मन्मथ झालासे राख ।
कर्मे चंद्रासि घडला दोष ।
कर्मे भार वाहती कुर्मशेष ।
कर्मे खरमुख ब्रह्मा देखा ॥२॥
कर्मे वासुकी लंके दिवटा ।
कर्मे हनुमंता उदरीं कांसोटा ।
कर्मे शुकदेव गर्भी कष्टा ।
पाताळवाटा बळी गेला ॥३॥
कर्मे दशरथ वियोगें मेला ।
कर्मे श्रीराम वनवासा गेला ।
कर्मे रावण क्षयो पावला ।
वियोग घडला सीतादेवी ॥४॥
कर्मे दुर्योधनादि रणीं नासले ।
कर्मे पांडव महापंथें गेले ।
कर्मे सिंधुजळ शोषिलें ।
नहुष जाला सर्प देखा ॥५॥
कर्मातें शंभु मानी आपण ।
किती पळसि कर्माभेण ।
बापरखुमादेविवरविठ्ठला शरण ।
केलीं कर्मे निवारी नारायण ॥६॥

अर्थ:-

हे मुढजीवा कर्माचा बोध घे. प्रारब्ध गती कशी असते ते कळेल. कर्मामुळे सगरराजाचे साठ हजार पुत्र गेले व तो निर्वंश झाला. कर्मामुळेच भिल्लाने श्रीकृष्णाला बाण मारिला. कर्मामुळे इंद्रला गुरुपत्नीगमनाचा दोष घडला व अंगाला भगे पडले. कर्मामुळे शंकराने मदनाला जाळला, चंद्राला शाप मिळाला व शेष व कुर्माना पृथ्वीचा भार वाहवा लागला तसेच ब्रह्म्याला गाढवाचे मुख प्राप्त झाले. कर्मामुळे वासुकीला रावणाकडे दिवटा व्हावे लागले, मारुतीला ब्रह्मचर्याची कासोटी नेसावी लागली, शुकदेवाला गर्भवास सहन करावा लागला व बळीला पाताळात जाऊन पडावे लागले. कर्मामुळे दशरथाला पुत्रवियोग भोगावा लागला, रामाला वनवासात जावे लागले, रावणाला राज्याचा त्याग करावा लागला व सितेला रामाचा वियोग प्राप्त झाला. दुर्योधनप्रभुतीना रणात मरावे लागले, पांडवांना महापंथ चालावा लागला, अगस्तीला समुद्र प्यावा लागला व इंद्रपदावर पोहचलेल्या नहुशराजाला सर्प योनीत जावे लागले. त्या कर्माला महादेव भितात, अशा त्या कर्मापासुन तु कुठे पळुन जाऊ शकतोस? या वर उपाय म्हणजे, माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांना शरण गेले तर नारायण कर्म व कर्मफलांचे निवारण करतो असे माऊली सांगतात.


परियेसी गव्हारा सादर – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५१४

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *