संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

पृथ:कारे कर्म आचरितां – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७८२

पृथ:कारे कर्म आचरितां – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७८२


पृथ:कारे कर्म आचरितां ।
विधि जिज्ञाशीं काय सत्ता ।
अष्टादश पुराणें नानामतें आचरतां ।
परि तयासी विधि विवेक न कळे तत्त्वता ।
कर्म कळा जयाची वाचा उच्चारिता ।
ऐशी नाना द्वंद्वें उपाधिकें जल्पती
परि एकही नेणे तेथींची वार्ता रया ॥१॥
ऐशी भ्रांती साम्य बोलती सकळे ।
परि नकळे नकळे पूर्ण सत्ता रया ॥२॥
निजब्रह्म बुध्दि नेणसी ।
गव्हारा वाउगा का शिणशी ।
या साठीं भ्रमुनिया बरळशी ।
पहिलें नव्हे तुजसंकल्पें करिशी ।
नाना गोष्ठी रया ॥३॥
आतां अथातो धर्मजिज्ञासा ब्रह्म जिज्ञासिक वचन ।
हें तंव वेदीचें प्रमाण ।
तरी वेदे जें वदवितें नकळे वेद कळा लय लक्ष धारण ।
पूजा समाधीचेनि यज्ञ यागादिके कर्मे ।
जपतप अनुष्ठान नाना उपासना मंत्रयंत्रादि साधनें ।
धांडोळितां परि ते एकही न घडे ब्रह्म जिज्ञासिक वचन ।
येणें सुखासाठीं बापा होशी पै हिंपुष्टी
स्वानंद जीवन सुख आहे अन रया ॥४॥
नाना अर्थवाद उपाधि शब्दज्ञानें तेणें ।
केविं शुध्द होती याचीं मनें ।
नाना मुद्रा संकल्पाचिया वाढविंता तेणें ।
केंवि पाविजे ब्रह्मस्त्रानें ।
मी ब्रह्म ऐसें शब्दें वाखाणु जाशी तरी तेणे ।
ब्रह्म ऐसें केंवि होणें ।
ब्रह्माहमस्मि बोध वाचे उच्चारितां हेहीं अहंकाराचें लेणें ।
आतां परतें सकळही वाव जाणोनिया कांही आपलें स्वहित करणे ।
बापरखुमादेवीवर विठ्ठल चिंतिता निजसुखाशीं येऊं नेदी उणें ॥५॥

अर्थ:-

विधिनिषेध जाणुन निरनिराळ्या तऱ्हेचे कर्म का आचरण करता. १८ पुराणे निरनिराळ्या शास्त्रकारांची मते यांनी सांगितल्याप्रमाणे वागत असता तुम्हाला विधि निषेध खरोखर कळतच नाहीत, ज्याचे कर्म कौशल्य वाणीने उच्चारित असतात व ज्याच्या ठिकाणी उपाधिने अनेक प्रकारे द्वैतभान झाल्याची बडबड करतात. पण त्या ब्रह्मस्वरूपाची वार्ताही त्यांना ठाऊक नसते. ही भ्रांती आहे. साम्यतेने सर्वजण बोलतात. पण त्या ब्रह्माची पूर्ण सत्ता त्यांना कळत नाही.मी ब्रह्मच आहे, ही गोष्ट तुला कळत नाही, मग वेड्या विनाकारण कर्माचा शीण कशाला करतोस. म्हणून सांगतो तुझ्या मूळ स्वरूपाला कोणतेही कर्म करण्याची आवश्यकता नाही. भ्रमाने बरळून तूं आपल्या इच्छेनेच नाना कमें करितोस.आत “अथातो धर्मजिज्ञासा” व “अथातो ब्रह्मजिज्ञासा” ही वचने वेदाला प्रमाण आहेत.तरी पण वेदांत लय,लक्षण, धारण, पूजा, समाधि, यज्ञ, याग, जप, तप, उपासना मंत्र, तंत्र वगैरे सुखाकरिता अनेक साधनें धांडोळिली तरी त्यातील एकही ब्रह्म जाणावे अशी सांगणारी नव्हेत ज्या सुखाकरता तूं कष्टी होतोस ते सुख याहून भिन्न आहे. कर्माची स्तुती करणारी अर्थवाद वाक्ये अनेक आहेत.त्या वाक्यांच्या योगाने जीवांची मने शुद्ध कशी होतील? निरनिराळ्या शब्दांच्या संकल्पांनी अगर खुणांनी ते ब्रह्मज्ञान कसे प्राप्त होईल? मी ब्रह्म आहे. असे नुसते बोलण्याने तू ब्रह्म कसा होशील? मी ब्रह्म आहे असे वाचेने उच्चारणे ही गोष्ट देखील अहंकाराची ठरेल. आता या गोष्टी व्यर्थ आहेत. म्हणून सोडून दे जर तुला सुखाची इच्छा असल तर तूं माझे पिता व रखुमाईचे पती श्री पांडुरंगांचे चिंतन करीत जा. म्हणजे ते तुझ्या सुखांत कमीपणा येऊ देणार नाही. असे माऊली सांगतात.


पृथ:कारे कर्म आचरितां – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७८२

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *