संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

उपदेश अगोचर उपदेशी अगोचर – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७३१

उपदेश अगोचर उपदेशी अगोचर – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७३१


उपदेश अगोचर उपदेशी अगोचर मदलसा पुत्रालागीं रहीवासु ।
ध्यानरुप येक करी सर्वाघटीं महेशु ।
जातिधर्म लोपि बा न करी तूं आळसू ।
उठि जाय योगपंथें जेथें वैकुंठ निवासु ॥१॥
जे जो जे जो नित्य हरि जनीं वनीं जो अहे ।
त्याचें तूं ध्यान करी नित्य तेथेंची राहें ।
परतोनी येवों नको प्रपंच न पाहे ।
जठराग्नीं पचों नको वेगीं तूं योगिया होय ॥२॥
जपतप वाचे एक अखंड श्रीराम उच्चार ।
नित्य धर्म संताचारे हाचि करीरे विचार ।
संगदोष बोधिती तुज म्हणोनि होई खेचर ।
अतळों नको द्वैतबुध्दि सदा अद्वैत निरंतर ॥३॥
एक लक्ष एक पक्ष एक तत्त्व ह्रदयीं ।
एक ध्यान एक मन याचे लागे तू सोयी ।
एक हरि हाचि खरा एक नेम तूं राही ।
अणिक जपों नको देवोदेवीं काहीबाहीं ॥४॥
देव तो वैकुंठींचा निरालंबीरे आहे ।
निराळा सर्व जीवां म्हणोनी ध्यातु आहे ।
जीव हा शिव करी ऐसे करुनियां राहे ।
रामनाम मंत्र ध्वनि कळिकाळ वास न पाहे ॥५॥
कोहं हे उपजतां टाकिलें तुवां सोहं ।
गर्भी होतासि सावध आतां म्हणतासि हूंहूं ।
अहंकार जपों नको मन मुंडि संमोहे ।
एकट मन करि रामनामीं धरी भाव ॥६॥
शांति करी जीवशिवी सर्व क्षरलासे हरि ।
क्षमा दया बहिणीं तुझ्या माया सांडी भीतरीं ।
बंधु पिता सखि जेंणें टाकि तूं दुरिच्या दुरी ।
मत्सर हा घेवों नको मद टाकी तूं दुरिच्या दुरी ।
मत्सर हा घेवों नकों मद टाकी हा बाहेरी ॥७॥
हरिरुप निखळ आहे योगी जाणती यासि ।
अंतर तें दुरांतर हें तूं जप मानसीं ।
कर्म हें ब्रह्म जाण ऐसा होई समरसीं ।
तत्काळ होशी योगी संदेह नाहीं त्यासी ॥८॥
सत्त्व रज तमीं गुंफ़ो नको एकतत्त्वीं आहे भाव ।
नानातत्त्वीं धरिसी व्यर्थ मग तुज न पवे देव ।
मी माझे वाहों नको व्यर्थ करिशी उपाव ।
शिणलासि येतां जातां हा तुज नाहीं आठव ॥९॥
शरीर हें नव्हें तुझें तरुण बाळरे वृध्द ।
जंववरी सावध आहे तंववरी करी प्रबोध ।
एकनामीं विष्णुचेरे जाणती तेचि सिध्द ॥१०॥
नि:शंक मार्ग चाली आडकाठी नाहीं तेथें ।
विहंगमी चाड धरी पिपीलिका नेघे हीत ।
अजप तेथें जपे सदापूर्ण अनंत ।
न धरी विकल्प कांही उध्दरसि त्त्वरित ॥११॥
कामना चित्तवृत्ति अनुग्रह हे उपदेश ।
ग्रहभूतपिशाचरे याचा नव्हे तुज त्रास ।
कळिकाळ पडेल तेथे पावसि परमपरेश ।
झणें हे पावसी शरीर न करी न करी आळस ॥१२॥
अंतीं अंत ऊर्ध्व अध दश दिशां नांदे एक ।
हरिविण न दिसे कांहीं संत जाणती विवेक ।
निरलसी त्यांची माया हरि भरला दिसे एक ।
नयनीं दृष्टि चोख जैसा अमृता चा मयंक ॥१३॥
योगिया तूंचि जाण योगयाग तयें हरि ।
न भजे हरिविण उगा नसे क्षणभरी ।
रामकृष्ण वाचे सदां नित्य जपे निरंतरी ।
हरि ध्यान ऐसें आहे पुत्रा हेंचि तूं स्वीकारी ॥१४॥
लोपतील मन संग संग भंग सांगडी ।
अवचिती पडेल कव जन्ममरणाची उडी न गिळे आयुष्य तुज
मनुष्य जन्मअर्ध घडी उठिचि उठोनिया जाय तूं तांतडी ॥१५॥
विवेक करि बाळा पुराणप्रसिध्द पाहे ।
वेदशास्त्रें बोलिले हरि हें पाहोनि उगा राहे ।
योगिये विसावले तेथें दिव्यचक्षू करुनि पाहे ।
सत्रावी हे संजीवनी उलट करी लवलाहे ॥१६॥
मातृका भेदुनियां षटचक्रे टाकी वेगी ।
तेथें तूं गुंफ़ो नको चाल विहंगममार्गी ।
अनंत सिध्द गेले ऋषीमुनीच्या संगीं ।
नारदादि अवधुत ते प्रपंची नि:संगीं ॥१७॥
हनुमंत कपिराज भीष्मादिक उत्तम ।
परिक्षित प्रल्हाद ते पैं जाले आत्मराम ।
ध्रुव आणि अंबऋषी पावले वैकुंठ धाम ।
यांचा तूं संग करी होईकारे नि:काम ॥१८॥
मदलसा म्हणे पुत्रा ऐसा आहे उपदेश ।
भाव गर्भीचारे तुज विचरे पृथ्वी नि:शेष ।
सरता होई संतामाजी चित्तीं ध्याई ह्रषीकेश ।
परब्रह्म तूंचि होसी ऐसें बोलियेले व्यास ॥१९॥
शुक्रादिक पुत्र ज्याचे तो साक्षात नारायण ।
अवतरले मनुष्यवेषें तारियेले अवघे जन ।
ऐसाचि होई तूरे विसरे मीतूं पण ।
उठी जाये उर्ध्व पंथे करिल कृपा हरि आपण ॥२०॥
नाम हें अमृतसिंधु ह्रदयीं जपे सदाकाळ ।
नाहीं तुज रोगराई तुज देखोनी पळेल काळ ।
हरिसि जो विनटला तयां नाहीं काळ वेळ ।
नामधारकाचें तीर्थ वंदी तीर्थकल्लोळ ॥२१॥
पुत्र म्हणो अवो माते गुरु तूंची जालीसी ।
नसवे क्षणभरी जपतप मानसीं ।
हरि हा श्रेष्ठ राणा तूंची तारक जीवासी ।
भवार्णवीं तारियेले म्यां दृढ धरिलें मानसीं ॥२२॥
खेचर बुध्दि केली खेळिनलों चौर्‍याशीं ।
खुंटल्या जन्मयोनी पावलों मोक्षसुखासी ।
खेचराखेचर माये मी तुझा वो उपदेशी ।
गुरुगम्यउपदेशिलें शिष्य निवाला मानसीं ॥२३॥

अर्थ:-

मदालसा आपल्या मुलाला निर्गुण अशा परमात्म्याचा उपदेश करते की बाह्य जाति धर्मादि उपाधिचा त्याग करून सर्वत्र एकच वास्तव्य करणारा परमात्मा आहे. असे ध्यान करण्यात आळस करू नको. परमात्म दर्शनाकरिता योगमार्गाचा आश्रय कर सर्वत्र व्याप्त नित्य अशा श्रीहरीचे ध्यान कर व तूंही तेथे वैकुंठ विश्रांती घे. जो नित्य श्रीहरि जनावनांमध्ये आहे त्याचे तूं ध्यान कर. गर्भवासांत ढकलणाऱ्या प्रपंचांत पुन्हां येऊ नको. व योगी हो. ज्यांनी अखंड श्रीरामाचे उच्चारण करणे होय व हाच संतांचा नित्यधर्म आहे. व तेच तूं कर, संबंधात किती दुःख आहे. हे जाणून एकांतांत बसून द्वैतबुद्धीवर न येता नेहमी अद्वैत स्थितीत राहा. ब्रह्म लक्ष्य आहे. अद्वैत हा एक पक्ष आहे व परमात्मा हे एकच तत्त्व आहे. व त्याचे हृदयांत ध्यान कर तेथेच मन ठेव हरि हाच सत्य असून हाच नियम कर. याशिवाय दुसऱ्या देव देवतेची कांही जप पुजा करू नको. देव वैकुंठात दूर असून माझ्याहून भिन्न आहे. असे भ्रमाने वाटते. म्हणून ध्यान करतो. पण जीव शीव म्हणजे ब्रह्मरूप आहे असे ज्ञान करून घेण्याकरिता रामनाम मंत्राचा ध्वनी कर व त्यायोगाने काळाच्या तडाख्यात तूं सापडणार नाहीस. गर्भात असतांना तुला तो परमात्मा मी आहे. असे ज्ञान होते पण जन्मल्याबरोबर ते ज्ञान टाकून मी कोण आहे. असा भ्रम झाला. म्हणून आता रडत आहेस. म्हणून मोह टाकून अहंकार व मन यांचा नाश कर व मन एकाग्र करून रामनामाच्या ठिकाणी भाव धर. भाऊ बाप यांच्याबद्दल ममत्व वाटण्याला कारण असणारी माया अंतःकरणांतून टाकून दे. क्षमा, दया या बहिणी आहेत. त्यांचा सांभाळ कर मद, मत्सर, दूर टाक. व ज्या परमात्म्यापासून जीव शीवादि हे सर्व जगत झाले. तनिष्ठ हो. अंतःकरणच द्वैत उत्पन्न करते.हे लक्षात ठेव. योगी हे सर्व शुद्ध आहे. असे जाणतात.कर्मसुद्धा ब्रह्मरूप आहे. असे समत्व आल्यावर तूं ताबडतोब योगी होशील. यांत शंका नाही. सत्त्वादिक गुणांत न पडता एक परमात्म तत्त्वातच राहा निरनिराळ्या ठिकाणी भक्ति ठेवलीस तर परमात्मप्राप्ती न होता फुकट श्रम मात्र होतील. तसेच हा मी व हे माझे असा अभिमान धरू नकोस.अरे इतर उपाय सापडलास याची तुला आठवण नाही. तारूण्य वृद्धावस्थेत जाणार म्हणून शरीराचा भरवंसा न धरता इंद्रिय कार्यक्षम आहेत. तोपर्यंतच ज्ञानमार्ग धर अरे जे विष्णु या नावांचा नामि परमात्मा एकच आहे. असे जे जाणतात. ते मुक्त होतात.ह्या मार्गाचे खुशाल अनुकरण कर. यांत आडकाठी नाही. मात्र त्यामध्ये ध्येय निश्चित कर.उगीच देहाच्या नश्वरतेमुळे पिपीलिकेचे जसे निश्चित हित होत नाही. त्याप्रमाणे निश्चित होण्याची शाश्वती नसल्यामुळे तूं विहंगममार्गाची इच्छा धारण करून, वाणीला विषय न होणारा व सर्वत्र व्याप्त अशा परमात्म्याचे विकल्परहित बुद्धिने चिंतन कर म्हणजे तुझा उद्धार होईल. हा उपदेश तुझ्या ठसला तर कल्पनाग्रह भूतपिशाच्च यांचा त्रास न होता कळिकाळ लांब पळून जाईल. व परमेश्वराला प्राप्त होशील. त्यामुळे शरीर प्राप्त होणार नाही. म्हणून तूं नामस्मरणाविषयी आळस करू नको. संतांनी मायेचा निरास केल्याने आतबाहेर वर खाली दाहिदिशेत एकच परमात्मा भरला आहे. असा संतांचा विवेक असतो. अमृताच्या समुद्राप्रमाणे त्यांची दृष्टि शुद्ध ब्रह्मरूप झालेली असते. वाचेने नामस्मरण अंतःकरणांत सर्वत्र सर्वकाळ त्याचाच जप योग, याग, तप सर्व हरिरूप असून परमात्मचिंतनाशिवाय ज्याचा एक क्षणही जात नाही. तोच योगी आहे अस समज. व तसेच आचरण कर. वृद्धपणांत इंद्रिय दुर्बल, नालायक होऊन बुद्धिभ्रंश होतो. मरणाची वेळ आली म्हणजे मिळविलेले ऐश्वर्य ही उपयोगी पडत नाही. आणि मागितले तरी अर्धी घटकाही आयुष्य जास्त मिळणार नाही. म्हणून ताबडतोब उठ, व श्रीगुरूला शरण जा. पुराणांत प्रसिद्ध असलेला, वेदशास्त्रांनी सांगितलेला आत्मानात्म विवेक कर. व ज्या ठिकाणी योगी विश्रांती घेतात ते ठिकाण समाधीच्या योगांने वृत्ति अंतर्मुख करून आणि सत्रावी जीवनकला हेच कोणी एक अमृताचे सरोवर आहे. ते उलट करून स्वाधीन करून घे व परमात्मरूप होऊन त्याचठिकाणी राहा. मातृकासह षट्चक्राचे पलीकडे जा, ध्येयाकडे नजर ठेव. त्यांत त्याचठिकाणी आनंद मानू नको. आणि विहंगम मार्गानी चाल. संसार सोडून नारदादि अवधूतज्ञानी ऋषिच्या सहाय्याने परमपदाला प्राप्त झाले प्रपंच टाकून कपिराज मारूति, ज्ञानसंपन्न भीष्म, परिक्षिती, प्रल्हाद, ध्रुव अंबऋषी वगैरे जे ज्ञानसंपन्न होऊन मोक्षाला गेले अशा सारख्यांची संगती कर आणि निष्काम ब्रह्मरूप हो. मदालसा म्हणते, पुत्रा ! गर्भात जे तुला ज्ञान होते तोच तूं आहेस. भगवंताचे अंतःकरणांत ध्यान करून पृथ्वीवर सर्व तीर्थे क्षेत्रे पहा व संतांमध्ये सरता हो. हाच उपदेश भगवान व्यासही सांगतात. त्यांचे चिरंजीव शुकाचार्य हे भगवत् अवतार असून मनुष्यदेह धारण करून त्यांनी लोकोद्धार केला. तेंव्हा तूंही मीतूंपणाची द्वैतबुद्धि टाकून ज्ञानमार्गाने जा. मग हरि स्वतः तुझ्यावर कृपा करील. हरिनामाचा जप सर्वकाळ कर नामस्मरण हा अमृताचा समुद्र आहे. म्हणून त्याचा हृदयांमध्ये जप कर त्या योगाने तुला रोगराई न होता, मृत्यूही लांब पळून जाईल. अरे हरिरूप जो झाला त्याला मृत्यु कोठला? या नामस्मरण करणाऱ्याच्या पादरजकणांनी तीर्थे पवित्र होतात. मुलगा म्हणतो माझे श्रीगुरू दुसरे कोण? तूंच आहेस. मी क्षणभरसुद्धा नामस्मरणावांचून राहात नाही. हरि हा श्रेष्ठ तर खरा. पण अज्ञानी जीवांचा उद्धार करणारी तूंच आहेस. संसार सागरांतून मला वर काढणारी तूंच आहेस.असे मी निश्चित मनामध्ये धारण केले आहे. चौयांशी लक्षयोनि हिंडता हिंडता आज तुझ्या उपदेशाने परमात्मबुद्धि होऊन जन्ममरणांतीत झालो. आणि मोक्षसुखाला प्राप्त झालो. गुरूने शिष्यास करावयाच्या या तुझ्या उपदेशाने मी क्षराक्षरातीत होऊन समाधान पावलो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


उपदेश अगोचर उपदेशी अगोचर – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७३१

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *