संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

येऊनि वर्‍हाडिणी बैसल्या टेकी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २१५

येऊनि वर्‍हाडिणी बैसल्या टेकी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २१५


येऊनि वर्‍हाडिणी बैसल्या टेकी ।
कोण तो नोवरा नाहीं वोळखी ॥१॥
मी कवणाची मज सांगा कोण्ही ।
वर्‍हाड आलिया वर्‍हाडणी ॥२॥
कवळ ते वरमाय कवण तो वरबाप ।
कवण तो नोवरा कवण तो मंडप ॥३॥
वर्‍हाड नव्हे स्वप्नगे माये ।
बापरखमादेविवराचे वेगी धरावे पाये ॥४॥

अर्थ:-

माऊली ज्ञानेश्वर महाराज या अभंगामध्ये लग्न व लग्नाकरिता जमलेले वऱ्हाड असे रुपक सांगतात. याठिकाणी वऱ्हाडीणी कोण आहेत याचा प्रथम विचार करणे अवश्य असल्यामुळे याठिकाणी बुद्धिवादात्म्यापत्र असलेला चिदाभासरूपी जीवदशा ह्याच कोणी वऱ्हाडणी आहेत व त्या ऴऱ्हाडणी योग याग तप दान व तीर्थादि साधनांत अभिमानाने नवरा कोण हे पाहण्याची खटपट करता करता मेटाकुटीस आल्या. कारण मूळ नवरा कोण याची त्यांना ओळख पटली नाही. यद्यपि हे वऱ्हाड व वऱ्हाडणी लग्नाला आल्या आहेत याचा अर्थ भगवत्प्राप्ती करताच भगवंताने मनुष्ययोनी निर्माण केली ‘निजात्म प्राप्तीलांगोनी । देवे केली मनुष्ययोनी’ परंतु माऊलीने म्हटल्या प्रमाणे ‘जे प्राणीया कामी भरू । देहाचिवरी आदरू च । म्हणोनी पडिला विसरू आत्मबोधाचा ॥अशी त्यांची स्थिती झाली असताना त्यातील एकीच्या पूर्वपुण्याईने असा विचार उत्पन्न झाला की मी कोणाची आहे किंवा कोणाच्या लग्ना करिता आलेली आहे. असे मला कोणीतरी सांगा. बरे या वऱ्हाडामध्ये वरमाय कोण आहे ? याचे उत्तर बुद्धिरूपी वरमाय आहे. कारण आत्मबोध रूपी नवरा हा बुद्धिनिष्ठ असल्यामुळे बुद्धितच उत्पन्न होत असल्यामुळे ती वरमाय आहे. तसेच बोध हा आत्मस्वरूपविषयक असल्यामुळे आत्मा हा वरबाप होय. व बोधरूपी हाच नवरा आहे. व तो बोध या मनुष्यदेहांतच होत असल्यामुळे नरदेह हाच कोणी मंडप आहे.परमात्मदृष्टीने विचार केला तर आत्मभिन्न हे वहाड वगैरे काही एक नाही तर स्वप्नाप्रमाणे सर्व मिथ्या आहे. याचकरिता माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्याचे पाय लवकर धरा. असे माऊली सांगतात.


येऊनि वर्‍हाडिणी बैसल्या टेकी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २१५

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *