सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय बारावा

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा ऑडिओ आणि विडिओ सहित

(ओव्या १ ते ७०)

(ओव्या ७१ ते १४३)

(ओव्या १४४ ते २०७)

(ओव्या २०८ ते २७४)

(ओव्या २७५ ते ३४२)

(ओव्या ३४३ ते ३९७)

(ओव्या ४७२ ते ५२७)

(ओव्या ५२८ ते ५९८)


वरील ऑडिओ मधील आवाज सौ. मनीषा भास्कर अभ्यंकर यांचा आहे, त्यांनी हे ऑडिओ टाकायची परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार


आतां हृदय हें आपुलें । चौफाळुनियां भलें ।
वरी बैसऊं पाउलें । श्रीगुरूंचीं ॥ १ ॥
आता आपले शुद्ध असलेले अंत:करण चौरंग करून त्यावर श्रीगुरूंच्या पाउलांची स्थापना करू. ॥१५-१॥

ऐक्यभावाची अंजुळी । सर्वेंद्रिय कुड्मुळी ।
भरूनियां पुष्पांजुळी । अर्घ्यु देवों ॥ २ ॥
श्रीगुरु व आपण एक आहोत, अशा ऐक्यतेच्या समजूतरूपी ओंजळीत संपूर्ण इंद्रियरूपी कमळकळ्या भरून त्या पुष्पांजुळीचे अर्घ्य श्रीगुरुचरणांवर देऊ. ॥१५-२॥

अनन्योदकें धुवट । वासना जे तन्निष्ठ ।
ते लागलेसे अबोट । चंदनाचें ॥ ३ ॥
एकनिष्ठतारूपी स्वच्छ पाण्याने स्नान घालून, श्रीगुरूंच्या विषयी असलेली वासना तेच श्रीगुरूस (अनामिका नावाचे) गंधाचे बोट लाऊ. ॥१५-३॥

प्रेमाचेनि भांगारें । निर्वाळूनि नूपरें ।
लेवऊं सुकुमारें । पदें तियें ॥ ४ ॥
श्रीगुरुविषयीचे प्रेमरूपी सोने शुद्ध करून त्याचे घागर्‍यांचे वाळे सद्गुरूच्या सुकुमार पायात घालू. ॥१५-४॥

घणावली आवडी । अव्यभिचारें चोखडी ।
तिये घालूं जोडी । आंगोळिया ॥ ५ ॥
अनन्यतेने शुद्ध झालेले सद्गुरुविषयीचे दृढ प्रेम हीच कोणी रणजोडवी, ती सद्गुरूंच्या पायांच्या अंगठ्यात घालू. ॥१५-५॥

आनंदामोदबहळ । सात्त्विकाचें मुकुळ ।
तें उमललें अष्टदळ । ठेऊं वरी ॥ ६ ॥
आनंदरूपी सुवासाने पूर्ण भरलेली अष्टसात्विक भावांची उमललेली कमळकळी हेच कोणी एक आठ पाकळ्यांचे कमळ, ते सद्गुरूंच्या पायावर वाहू. ॥१५-६॥

तेथे अहं हा धूप जाळूं । नाहं तेजें वोवाळूं ।
सामरस्यें पोटाळूं । निरंतर ॥ ७ ॥
देहादेदिकांचा अभिनिवेश घेणारी जी अहंवृत्ती हाच कोणी एक धूप, तो श्रीगुरुचरणांजवळ जाळू. या देहादिकांपकी मी कोणी नाही अशी जी उत्पन्न झालेली निरभिमान बोधवृत्ती हेच कोणी एक तेज, त्या तेजाने श्रीगुरूस ओवाळू व त्या सद्गुरुचरणांस तदाकारतेने नेहेमी आलिंगन देऊ. ॥१५-७॥

माझी तनु आणि प्राण । इया दोनी पाउवा लेऊं श्रीगुरुचरण ।
करूं भोगमोक्ष निंबलोण । पायां तयां ॥ ८ ॥
श्रीगुरूच्या दोन्ही पायात माझे शरीर व प्राण (स्थूलशरीर व लिंगशरीर) या दोन खडावा करून घालू व ऐहिक व पारत्रिक भोग व मोक्ष हे श्रीगुरुचरणांवरून उतारा म्हणून ओवाळून टाकू ॥१५-८॥

इया श्रीगुरुचरणसेवा । हों पात्र तया दैवा ।
जे सकळार्थमेळावा । पाटु बांधे ॥ ९ ॥
ज्याच्या योगाने धर्म, अर्थ, काम व मोक्ष या सर्व पुरुषार्थांच्या सिंहासनावर राज्याभिषेक होतो त्या दैवास या श्रीगुरुचरणांच्या उपासनेस आम्ही योग्य होऊ. ॥१५-९॥

ब्रह्मींचें विसवणेंवरी । उन्मेख लाहे उजरी ।
जें वाचेतें इयें करी । सुधासिंधु ॥ १० ॥
ज्या दैवाच्या योगाने ब्रह्माच्या ठिकाणी विश्रांती मिळेपर्यंत ज्ञान उत्कर्षाला पावते व जे दैव या वाचेला अमृताचा समुद्र करते ॥१५-१०॥

पूर्णचंद्राचिया कोडी । वक्तृत्वा घापें कुरोंडी ।
तैसी आणी गोडी । अक्षरांतें ॥ ११ ॥
कोट्यावधी पूर्णचंद्र वक्तृत्वावरून ओवाळून टाकावेत अशी गोडी जे दैव अक्षरांना आणते ॥१५-११॥
सूर्यें अधिष्ठिली प्राची । जगा राणीव दे प्रकाशाची ।
तैशी वाचा श्रोतयां ज्ञानाची । दिवाळी करी ॥ १२ ॥
ज्याप्रमाणे सूर्याने पूर्वदिशेचा अंगीकार केला म्हणजे ती दिशा जगाला प्रकाशाचे राज्य देते, त्याप्रमाणे (ज्या दैवाच्या योगाने) वाचा श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी करते ॥१५-१२॥
नादब्रह्म खुजें । कैवल्यही तैसें न सजे ।
ऐसा बोलु देखिजे । जेणें दैवें ॥ १३ ॥
ज्या दैवाच्या योगाने असे व्याख्यान स्फुरते की त्या व्याख्यानापुढे मोक्ष सुद्धा तसा (व्याख्यानासारखा) शोभत नाही. ॥१५-१३॥
श्रवणसुखाच्या मांडवीं । विश्व भोगी माधवीं ।
तैसी सासिन्नली बरवी । वाचावल्ली ॥ १४ ॥
श्रवणसुखाच्या मांडवामधे सर्व जगाला वसंतऋतूचा उपभोग घेता येईल अशा प्रकारे व्याख्यानरूप वेली चांगली भरास येते. ॥१५-१४॥
ठावो न पवता जयाचा । मनेंसी मुरडली वाचा ।
तो देवो होय शब्दाचा । चमत्कारु ॥ १५ ॥
ज्या देवाचा पत्ता लागत नाही म्हणून मनासह वाचा परतते असा जो देव तो त्या दैववान पुरुषाच्या शब्दाचा विषय होतो (शब्दाने त्याचे वर्णन करता येते) हे केवढे आश्चर्य आहे ? ॥१५-१५॥
जें ज्ञानासि न चोजवे । ध्यानासिही जें नागवे ।
तें अगोचर फावे । गोठीमाजीं ॥ १६ ॥
जे ज्ञानाला कळत नाही ध्यानासही सापडत नाही असे जे निर्विषय ब्रह्म ते त्याच्या बोलण्यात सापडते. ॥१५-१६॥
येवढें एक सौभग । वळघे वाचेचें आंग ।
श्रीगुरुपादपद्मपराग । लाहे जैं कां ॥ १७ ॥
गुरूंच्या चरणरूपी कमलातील सुगंध ज्यावेळी प्राप्त होतो त्यावेळी वर सांगितलेले एवढे एक चांगले भाग्य वाचेच्या ठिकाणी येते. ॥१५-१७॥
तरी बहु बोलूं काई । आजि तें आनीं ठाईं ।
मातेंवाचूनि नाहीं । ज्ञानदेवो म्हणे ॥ १८ ॥
तर या संबंधाने फार काय सांगू ? आज ते दैव माझ्याशिवाय दुसर्‍या ठिकाणी नाही असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ॥१५-१८॥
जे तान्हेनि मियां अपत्यें । आणि माझे गुरु एकलौतें ।
म्हणौनि कृपेंसि एकहातें । जालें तिये ॥ १९ ॥
कारण की मी श्रीगुरूचे तान्हे मूल आहे आणि माझे गुरु एकपुत्री आहेत. (म्हणजे मी माझ्या गुरूंना एकटाच मुलगा आहे). म्हणून मी त्या कृपेला एकटा ठिकाण झालो. ॥१५-१९॥
पाहा पां भरोवरी आघवी । मेघ चातकांसी रिचवी ।
मजलागीं गोसावी । तैसें केलें ॥ २० ॥
पहा चातक पक्ष्याकरता मेघ जसा आपल्यातील सर्व पाण्याच्या सामुग्रीची वृष्टी करतो, त्याप्रमाणे सद्गुरूंनी माझ्याकरता केले आहे. (त्यांनी आपल्या बोधाचा सर्व साठा माझ्यात ओतला.) ॥१५-२०॥
म्हणौनि रिकामें तोंड । करूं गेलें बडबड ।
कीं गीता ऐसें गोड । आतुडलें ॥ २१ ॥
म्हणून माझे रिकामे (शास्त्र वगैरे न शिकलेले) तोंड बडबड करू गेले, तर त्या बोलण्यात गीतेसारखे म्हणजे ब्रह्मरसाने भरलेले गोड शास्त्र सहज सापडले. ॥१५-२१॥
होय अदृष्ट आपैतें । तैं वाळूचि रत्‍नेंच परते ।
उजू आयुष्य तैं मारितें । लोभु करी ॥ २२ ॥
दैव जर अनुकूल झाले तर वाळूची रत्ने होतात अथवा जर आयुष्य अनुकूल असले तर जीव घ्यावयास आलेलाही प्रेम करतो. ॥१५-२२॥
आधणीं घातलिया हरळ । होती अमृताचे तांदुळ ।
जरी भुकेची राखे वेळ । श्रीजगन्नाथु ॥ २३ ॥
श्री जगन्नाथाच्या मनातून जर कोणाच्या भुकेची वेळ निभावून न्यावी असे आले तर आधणात घातलेले वाळूचे खडेही अमृताचे तांदूळ बनतात. ॥१५-२३॥
तयापरी श्रीगुरु । करिती जैं अंगीकारु ।
तैं होऊनि ठाके संसारु । मोक्षमय आघवा ॥ २४ ॥
त्याप्रमाणे श्रीगुरु जेव्हा एखाद्याचा अंगीकार करतात, तेव्हा त्याचे सर्व जीवित सुखमय होऊन रहाते. ॥१५-२४॥
पाहा पां श्रीनारायणें । तया पांडवांचें उणें ।
कीजेचि ना पुराणें । विश्ववंद्यें ? ॥ २५ ॥
असे पहा की त्या पांडवांच्या ठिकाणी कित्येक प्रकारची वैगुण्ये असताही जगास पूज्य अशी त्यांची (त्या पांडवांच्या वैगुण्यांची) पुराणे श्रीकृष्णाने करून टाकली नाहीत काय ? ॥१५-२५॥
तैसें श्रीनिवृत्तिराजें । अज्ञानपण हें माझें ।
आणिलें वोजें । ज्ञानाचिया ॥ २६ ॥
त्याप्रमाणे श्रीनिवृत्तिनाथांनी माझे अज्ञपण ज्ञानाच्या योग्यतेस आणले. ॥१५-२६॥
परी हें असो आतां । प्रेम रुळतसे बोलतां ।
कें गुरुगौरव वर्णितां । उन्मेष असे ? ॥ २७ ॥
पण आता हे गुरुकृपेचे वर्णन राहू द्या, कारण की त्या वर्णनाने गुरुविषयीचे शुद्ध प्रेम मलीन होते. श्रीगुरूचे महत्व वर्णन करणारे ज्ञान कोठे आहे ? ॥१५-२७॥
आतां तेणेंचि पसायें । तुम्हां संताचे मी पायें ।
वोळगेन अभिप्रायें । गीतेचेनि ॥ २८ ॥
आता त्याच श्रीगुरूच्या प्रसन्नतेच्या जोरावर गीतेचे हृद्गत सांगाण्याच्या साधनाने मी (ज्ञानदेव) तुम्हा संतांच्या चरणांची सेवा करीन. ॥१५-२८॥
तरी तोचि प्रस्तुतीं । चौदाविया अध्यायाच्या अंतीं ।
निर्णयो कैवल्यपती । ऐसा केला ॥ २९ ॥
तर आता तोच अभिप्राय ऐका की मोक्षाचे स्वामी जे श्रीकृष्ण परमात्मा त्यांनी चौदाव्या अध्यायाच्या शेवटी असा सिद्धांत केला ॥१५-२९॥
जें ज्ञान जयाच्या हातीं । तोचि समर्थु मुक्ति ।
जैसा शतमख संपत्ती । स्वर्गींचिये ॥ ३० ॥
की ज्याप्रमाणे शंभर यज्ञ केलेला पुरुष स्वर्गाचे ऐश्वर्य (इंद्रपद) मिळावण्य़ास समर्थ होतो, त्याप्रमाणे ज्ञान ज्याच्या हस्तगत झालेले आहे, तोच मोक्ष मिळवण्य़ास समर्थ होतो. ॥१५-३०॥
कां शत एक जन्मां । जो जन्मोनि ब्रह्मकर्मा ।
करी तोचि ब्रह्मा । आनु नोहे ॥ ३१ ॥
अथवा लागोपाठ शंभर ब्राह्मण जन्म प्राप्त होऊन त्या त्या जन्मात जो ब्रह्मकर्म करतो तोच काय तो ब्रह्मदेव होतो, दुसरा कोणी होत नाही. ॥१५-३१॥
नाना सूर्याचा प्रकाशु । लाहे जेवीं डोळसु ।
तेवीं ज्ञानेंचि सौरसु । मोक्षाचा तो ॥ ३२ ॥
अथवा ज्याप्रमाणे डोळसालाच सूर्यप्रकाशाचा लाभ घेता येतो, त्याप्रमाणे ज्ञानानेच (ज्ञानी पुरुषाला) मोक्षाची योग्यता प्राप्त होते. ॥१५-३२॥
तरी तया ज्ञानालागीं । कवणा पां योग्यता आंगीं ।
हें पाहतां जगीं । देखिला एकु ॥ ३३ ॥
तर त्या ज्ञानाकरिता कोणाच्या अंगात योग्यता आहे, याचा विचार करता, तशीयोग्यता असणारा जगात एक नजरेस पडला. ॥१५-३३॥
जें पाताळींचेंही निधान । दावील कीर अंजन ।
परी होआवे लोचन । पायाळाचे ॥ ३४ ॥
हे जमिनीत खोल पुरलेले देखील द्रव्य निश्चयेकरून दाखवतील, परंतु ते द्रव्यांजन घालण्यास पायाळूचे डोळे पाहिजेत. ॥१५-३४॥
तैसें मोक्ष देईल ज्ञान । येथें कीर नाहीं आन ।
परी तेंचि थारे ऐसें मन । शुद्ध होआवें ॥ ३५ ॥
त्याप्रमाणे ज्ञान मोक्ष देईल यात खरोखर अन्यथा नाही, पण ते ज्ञान टिकेल असे मन शुद्ध पाहिजे. ॥१५-३५॥
तरी विरक्तीवांचूनि कहीं । ज्ञानासि तगणेंचि नाहीं ।
हें विचारूनि ठाईं । ठेविलें देवें ॥ ३६ ॥
तर वैराग्यावाचून कोठेही ज्ञान टिकावयाचे नाही, हे देवाने आपल्याशी विचार करून ठेवले आहे. ॥१५-३६॥
आतां विरक्तीची कवण परी । जे येऊनि मनातें वरी ।
हेंही सर्वज्ञें श्रीहरी । देखिलें असे ॥ ३७ ॥
आता वैराग्याचा असा कोणता प्रकार आहे की जो आपण होऊन येऊन मुमुक्षूच्या मनाला माळ घालील ? हे देखील सर्व जाणणार्‍या श्रीहरीने विचार करून पाहिले आहे. ॥१५-३७॥
जे विषें रांधिली रससोये । जैं जेवणारा ठाउवी होये ।
तैं तो ताटचि सांडूनि जाये । जयापरी ॥ ३८ ॥
ज्याप्रमाणे विष घालून तयार केलेले अन्न जेव्हा जेवणारास माहीत होते तेव्हा तो जसा त्याच्यापुढे असलेले अन्न वाढलेले पात्रच टाकून निघून जातो ॥१५-३८॥
तैसी संसारा या समस्ता । जाणिजे जैं अनित्यता ।
तैं वैराग्य दवडितां । पाठी लागे ॥ ३९ ॥
त्याप्रमाणे या सर्व संसाराला अनित्यता आहे, असे ज्यावेळेला कळेल त्यावेळी वैराग्याला घालवून दिले तरी ते वैराग्य आपण होऊन साधकाच्या पाठीमागे लागेल. ॥१५-३९॥
आतां अनित्यत्व या कैसें । तेंचि वृक्षाकारमिषें ।
सांगिजत असे विश्वेशें । पंचदशीं ॥ ४० ॥
आता या संसाराला क्षणभंगुरता कशी आहे तेच वृक्षाच्या रूपकाने जगाचे स्वामी श्रीकृष्ण परमात्मा पंधराव्या अध्यायात सांगतात. ॥१५-४०॥
उपडिलें कवतिकें । झाड येरिमोहरा ठाके ।
तें वेगें जैसें सुके । तैसें हें नोहे ॥ ४१ ॥
सहज उन्मळून पडलेले झाड, शेंडा खाली व बूड वर असे पडले असता ते लवकर सुकते, त्याप्रमाणे हा संसारवृक्ष नाही. असे समज. ॥१५-४१॥
यातें एकेपरी । रूपकाचिया कुसरी ।
सारीतसे वारी । संसाराची ॥ ४२ ॥
याच एका प्रकारच्या (म्हणजे संसार हाच कोणी एक, बूड वर व शेंडा खाली असलेला वृक्ष आहे अशा) रूपकाच्या चातुर्याने (भगवान) जन्ममृत्युरूपी संसाराची येरझार संपवतात. ॥१५-४२॥
करूनि संसार वावो । स्वरूपीं अहंते ठावो ।
होआवया अध्यावो । पंधरावा हा ॥ ४३ ॥
संसाराचे मिथ्यात्व दाखवून आत्मस्वरूपाचे ठिकाणी जीवाच्या अहंतेचे ठिकाण होण्याकरता हा पंधरावा अध्याय आहे. ॥१५-४३॥
आतां हेंचि आघवें । ग्रंथगर्भींचें चांगावें ।
उपलविजेल जीवें । आकर्णिजे ॥ ४४ ॥
आता हेच ग्रंथातील सर्व चांगले सिद्धांत विस्ताराने स्पष्ट सांगण्यात येतील ते तुम्ही श्रोत्यांनी मन लावून ऐकावे. ॥१५-४४॥
तरी महानंद समुद्र । जो पूर्ण पूर्णीमा चंद्र ।
तो द्वारकेचा नरेंद्र । ऐसें म्हणे ॥ ४५ ॥
तर ब्रह्मानंदाचा समुद्र, पूर्ण पौर्णिमेचा चंद्र व द्वारकेचा राजा, जो भगवान श्रीकृष्ण परमात्मा तो असे म्हणाला. ॥१५-४५॥
अगा पैं पंडुकुमरा । येतां स्वरूपाचिया घरा ।
करीतसे आडवारा । विश्वाभासु जो ॥ ४६ ॥
अरे बाबा अर्जुना, आपण आपल्या स्वरूपाच्या घराकडे येत असतांना जे विश्वरूपी दृश्य मधे अडथळा करते ॥१५-४६॥
तो हा जगडंबरु । नोहे येथ संसारु ।
हा जाणिजे महातरु । थांवला असे ॥ ४७ ॥
ते हे विश्वरूपी दृश्य हा संसार नाही तर हा एक प्रकारचा मोठा बळावलेला वृक्ष आहे असे समज. ॥१५-४७॥
परी येरां रुखांसारिखा । हा तळीं मूळें वरी शाखा ।
तैसा नोहे म्हणौनि लेखा । नयेचि कवणा ॥ ४८ ॥
परंतु इतर सामान्य वृक्षांसारखा, खाली मुळे व वर फांद्या असलेला असा हा वृक्ष नाही. म्हणून याचा कोणाला अंत लागत नाही. ॥१५-४८॥
आगी कां कुर्‍हाडी । होय रिगावा जरी बुडीं ।
तरी हो कां भलतेवढी । वरिचील वाढी ॥ ४९ ॥
जर इतर वृक्षांप्रमाणे याच्या बुडाशी अग्नि अथवा कुर्‍हाड यांचा प्रवेश झाला असता तर वरचा विस्तार केवढा का असेना ॥१५-४९॥
जे तुटलिया मूळापाशीं । उलंडेल कां शाखांशीं ।
परी तैशी गोठी कायशी । हा सोपा नव्हे ॥ ५० ॥
तरी (इतर) वृक्ष जसा मुळाशी तुटला असता पण या संसारवृक्षाची तसली गोष्ट कोठली ? म्हणून हा सोपा नाही ॥१५-५०॥
अर्जुना हें कवतिक । सांगतां असे अलौकिक ।
जे वाढी अधोमुख । रुखा यया ॥ ५१ ॥
अर्जुना, या संसारवृक्षाचे आश्चर्य सांगावयास लागले तर लोकोत्तर आहे. कारण की या संसारवृक्षाची वाढ खाली आहे. ॥१५-५१॥
जैसा भानू उंची नेणों कें । रश्मिजाळ तळीं फांके ।
संसार हें कावरुखें । झाड तैसें ॥ ५२ ॥
ज्याप्रमाणे सूर्य किती उंच आहे हे कळत नाही, परंतु त्याचा किरणसमुदाय खाली पसरतो, तसा हा संसारवृक्ष आश्चर्यकारक आहे. ॥१५-५२॥
आणि आथी नाथी तितुकें । रुंधलें असे येणेंचि एकें ।
कल्पांतींचेनि उदकें । व्योम जैसें ॥ ५३ ॥
ज्याप्रमाणे प्रळयकाळच्या उदकाने आकाश व्यापले जाते त्याप्रमाणे जितके म्हणून आहे व नाही तेवढे या एकट्या संसारवृक्षाने अडवले (व्यापले) आहे. ॥१५-५३॥
कां रवीच्या अस्तमानीं । आंधारेनि कोंदे रजनी ।
तैसा हाचि गगनीं । मांडला असे ॥ ५४ ॥
अथवा सूर्याचा अस्त झाला म्हणजे जशी रात्र अंधाराने व्यापून जाते, त्याप्रमाणे ह्याच एका वृक्षाने आकाश व्यापले आहे. ॥१५-५४॥
यया फळ ना चुंबितां । फूल ना तुरंबितां ।
जें कांहीं पंडुसुता । तें रुखुचि हा ॥ ५५ ॥
अर्जुना या संसारवृक्षाचे फळ खाण्याकरता पाहू गेले तर याला फळ नाही व वास घेण्याकरता फूल पाहू गेले तर याला फूल नाही मग जे काही आहे ते हा वृक्षच आहे. ॥१५-५५॥
हा ऊर्ध्वमूळ आहे । परी उन्मूळिला नोहे ।
येणेंचि हा होये । शाड्वळु गा ॥ ५६ ॥
हा संसारवृक्ष वर मूळ असलेला आहे, परंतु हा उपटून पडलेला नाही. याच कारणाने अर्जुना हा संसारवृक्ष नेहेमी हिरवागार आहे. ॥१५-५६॥
आणि ऊर्ध्वमूळ ऐसें । निगदिलें कीर असे ।
परी अधींही असोसें । मूळें यया ॥ ५७ ॥
आणि हा संसारवृक्ष वर मूळ असलेला आहे असे सांगितले खरे, परंतु याला खालीही पुष्कळ मुळे आहेत. ॥१५-५७॥
प्रबळला चौमेरी । पिंपळा कां वडाचिया परी ।
जे पारंबियांमाझारीं । डहाळिया असती ॥ ५८ ॥
झपाट्याने वाढणार्‍या लव्हाळ्याच्या गवताप्रमाणे जो आहे, तसाच पिंपळाप्रमाणे अथवा वडाच्या वृक्षाप्रमाणे हा संसारवृक्ष आहे. कारण की पिंपळाप्रमाणे अथवा वडाप्रमाणे याच्या पारंब्यांमध्ये डहाळ्या आहेत. ॥१५-५८॥
तेवींचि गा धनंजया । संसारतरु यया ।
अधींचि आथी खांदिया । हेंही नाहीं ॥ ५९ ॥
त्याचप्रमाणे अर्जुना, या संसारवृक्षाला खालीच फांद्या आहेत असेही नाही ॥१५-५९॥
तरी ऊर्ध्वाहीकडे । शाखांचे मांदोडे ।
दिसताति अपाडें । सासिन्नलें ॥ ६० ॥
तर वरच्या बाजूसही (या संसारवृक्षाला) फांद्यांचे पुष्कळ समुदाय विस्तारलेले दिसतात. ॥१५-६०॥
जालें गगनचि पां वेलिये । कां वारा मांडला रुखाचेनि आयें ।
नाना अवस्थात्रयें । उदयला असे ॥ ६१ ॥
हा संसारवृक्ष म्हटला म्हणजे आकाशच जणु काय वेलाच्या रूपाने नटले आहे अथवा (संसार) वृक्षाच्या रूपाने अवस्थात्रयाने उदय केला आहे. ॥१५-६१॥
ऐसा हा एकु । विश्वाकार विटंकु ।
उदयला जाण रुखु । ऊर्ध्वमूळु ॥ ६२ ॥
असा हा एक वर मूळ असलेला विश्वाकार वृक्ष घनदाट उगवलेला आहे असे समज. ॥१५-६२॥
आतां ऊर्ध्व या कवण । येथें मूळ तें किं लक्षण ।
कां अधोमुखपण । शाखा कैसिया ॥ ६३ ॥
आता या संसारवृक्षाचा वरचा भाग काय आहे ? संसारवृक्षाचे जे मूळ आहे, त्याचे लक्षण काय आहे ? याचा खाली वाढण्याचा का स्वभाव आहे ? व याच्या फांद्या कशा आहेत ? ॥१५-६३॥
अथवा द्रुमा यया । अधीं जिया मूळिया ।
तिया कोण कैसिया । ऊर्ध्व शाखा ॥ ६४ ॥
अथवा या वृक्षाला खाली ज्या मुळ्या आहेत, त्या कोणत्या व वरच्या शाखा कोणत्या व कशा आहेत ? ॥१५-६४॥
आणि अश्वत्थु हा ऐसी । प्रसिद्धी कायसी ।
आत्मविदविलासीं । निर्णयो केला ॥ ६५ ॥
आणि याची अश्वत्थ अशी प्रसिद्धी कशाकरता आहे ? आणि आत्मज्ञानी लोकांनी या अश्वत्थाबद्दल जो काही निर्णय केला आहे ॥१५-६५॥
हें आघवेंचि बरवें । तुझिये प्रतीतीसि फावे ।
तैसेनि सांगों सोलिंवें । विन्यासें गा ॥ ६६ ॥
अर्जुना, या सर्व गोष्टी तुझ्या चांगल्या अनुभवाला येतील तशा निर्मळ खुलाशाने तुला सांगू. ॥१५-६६॥
परी ऐकें गा सुभगा । हा प्रसंगु असे तुजचि जोगा ।
कानचि करीं हो सर्वांगा । हियें आथिलिया ॥ ६७ ॥
परंतु हे भाग्यवान अर्जुना, ऐक. हे अंत:करणसंपन्न अर्जुना, तू आपल्या सर्व अंगास कानच कर. ॥१५-६७॥
ऐसें प्रेमरसें सुरफुरें । बोलिलें जंव यादववीरें ।
तंव अवधान अर्जुनाकारें । मूर्त जालें ॥ ६८ ॥
जेव्हा श्रीकृष्ण परमात्म्यांनी प्रेमरसाच्या अतिशय भराने असे भाषण केले, तेव्हा अर्जुनाच्या आकाराने अवधान प्रकट झाले, ॥१५-६८॥
देव निरूपिती तें थेंकुलें । येवढें श्रोतेपण फांकलें ।
जैसे आकाशा खेंव पसरिलें । दाही दिशीं ॥ ६९ ॥
आकाश एवढे अपरिमित असून त्यास जसे दाही दिशांनी कवटाळले आहे, त्याप्रमाणे श्रीकृष्णाचे बोलणे व्यापक असताही ते अर्जुनाच्या अवधानापुढे अगदी अल्प असे झाले, इतके अर्जुनाचे अवधान वाढले. ॥१५-६९॥
श्रीकृष्णोक्तिसागरा । हा अगस्तीचि दुसरा ।
म्हणोनि घोंटु भरों पाहे एकसरा । अवघेयाचा ॥ ७० ॥
श्रीकृष्णाच्या निरूपणरूप समुद्रास गट्ट करणारा अर्जुन हा दुसरा अगस्ति ऋषीच उत्पन्न झाला. म्हणून तो श्रीकृष्णाच्या संपूर्ण निरूपणाचा एकदम घोट घेण्यास पाहू लागला. ॥१५-७०॥

ऐसी सोय सांडूनि खवळिली । आवडी अर्जुनीं देवें देखिली ।
तेथ जालेनि सुखें केली । कुरवंडी तया ॥ ७१ ॥
श्रीकृष्णाने याप्रमाणे अर्जुनाच्या ठिकाणी श्रवणाविषयी अमर्याद आवड उत्पन्न झालेली पाहिली, तेव्हा त्यास श्रीकृष्णास जे सुख झाले त्या सुखाची त्यांनी अर्जुनावरून ओवाळणी केली. ॥१५-७१॥
श्रीभगवानुवाच
ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् ।
छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् ॥ १ ॥
श्रीकृष्ण म्हणाले, ज्याचे मूळ उर्ध्वभागी आहे, ज्याच्या शाखा खाली आहेत, जो विनाशी (अश्वत्थ = दुसर्‍या दिवसापर्यंतही न टिकणारा) आहे, तरी ज्याला अविनाशी (अव्यय) असे (सामान्य जन) म्हणतात, वेद ज्याची पाने आहेत, असा जो प्रपंचरूपी वृक्ष, त्याला जणाणारा (या वृक्षाला मूलकारण परम पुरुष असून वृक्षरूपी विस्तार ही माया आहे व त्यापासून वस्तुत: भिन्न नाही असे जाणणारा) तो खरा वेदवेत्ता अथवा ज्ञानी होय ॥१५-१॥
मग म्हणे धनंजया । तें ऊर्ध्व गा तरू यया ।
येणें रुखेंचि कां जया । ऊर्ध्वता गमे ॥ ७२ ॥
मग भगवान म्हणतात, हे अर्जुना, या संसारवृक्षाला ब्रह्म हे ऊर्ध्व (वर) आहे आणि ब्रह्माच्या ठिकाणी ऊर्ध्वपणा (खाली असलेल्या या) संसारवृक्षामुळे वाटत आहे. ॥१५-७२॥
एर्‍हवीं मध्योर्ध्व अध । हे नाहीं जेथ भेद ।
अद्वयासीं एकवद । जया ठायीं ॥ ७३ ॥
वास्तविक विचार केला तर ज्या ब्रह्माच्या ठिकाणी वरील मधला व खालचा असे भेद नाहीत, फार काय सांगावे ? ज्याच्या ठिकाणी दुसरे नाही अशाविषयी एकवाक्यता आहे. ॥१५-७३॥
जो नाइकिजतां नादु । जो असौरभ्य मकरंदु ।
जो आंगाथिला आनंदु । सुरतेविण ॥ ७४ ॥
जो कानाला विषय न होणारा नाद व नाकाने सुवास न घेता येण्यासारखा मकरंद आणि मैथुनादि साधनाशिवाय असलेला मूर्तिमंत आनंद होये. ॥१५-७४॥
जया जें आर्‍हां परौतें । जया जें पुढें मागौतें ।
दिसतेविण दिसतें । अदृश्य जें ॥ ७५ ॥
ज्याला जे अलीकडे व पलीकडे आहे, ज्याला जे पुढे व मागे आहे व पहाणार्‍यावाचून जे पहाणे आहे व स्वभावत: इंद्रियांना जे अगोचर आहे ॥१५-७५॥
उपाधीचा दुसरा । घालितां वोपसरा ।
नामरूपाचा संसारा । होय जयातें ॥ ७६ ॥
ज्या ब्रह्माच्या ठिकाणी मायोपाधीचा दुसरा संबंध कल्पिला असता नामरूपाचा व्यवहार होतो ॥१५-७६॥
ज्ञातृज्ञेयाविहीन । नुसधेंचि जें ज्ञान ।
सुखा भरलें गगन । गाळींव जें ॥ ७७ ॥
जे ब्रह्म ज्ञाता आणि ज्ञेय यावाचून केवळ ज्ञानमात्र आहे आणि जे ब्रह्म आकाशातून गाळलेले (आकाशापासून सूक्ष्म) असून जे सुखाने भरलेले आहे ॥१५-७७॥
जें कार्य ना कारण । जया दुजें ना एकपण ।
आपणयां जें जाण । आपणचि ॥ ७८ ॥
जे कोणाचे कार्य नाही व जे कोणाचे कारणही नाही, ज्याला कोणी दुसरे नाही व दुसर्‍याच्या अपेक्षेने येणारा एकपणाही त्याच्या ठिकाणी नाही, जे आपणच आपल्याला आहे असे समज. ॥१५-७८॥
ऐसें वस्तु जें साचें । तें ऊर्ध्व गा यया तरूचें ।
तेथ आर घेणें मूळाचें । तें ऐसें असे ॥ ७९ ॥
अशी जी सत्यवस्तु (ब्रह्मवस्तु), ती या संसारवृक्षाचे ऊर्ध्व आहे. तिचे ठिकाणी संसारवृक्षाच्या मुळाचे अंकूर निघाले ते असे आहे. (तो प्रकार पुढीलप्रमाणे आहे. ॥१५-७९॥
तरी माया ऐसी ख्याती । नसतीच यया आथी ।
कां वांझेची संतती । वानणें जैशी ॥ ८० ॥
तर या संसारवृक्षाच्या मुळाची माया म्हणून जी प्रसिद्धी आहे ती नसलेलीच आहे किंवा ज्याप्रमाणे वांझेच्या संततीचे वर्णन करणे हे केवळ नुसते शब्द आहेत ॥१५-८०॥
तैशी सत् ना असत् होये । जे विचाराचें नाम न साहे ।
ऐसेया परीची आहे । अनादि म्हणती ॥ ८१ ॥
त्याप्रमाणे जी माया ‘आहे’ म्हणता येणार नाही व ‘नाही’ म्हणता येत नाही (कारण ‘आहे’ म्हणावे तर विचाराने तिचा बाध होतो व नाही’ म्हणावे तर जगत्कार्यावरून ती असावी, असे तिचे अनुमान करता येते) जिला विचाराचे नाव सहन होत नाही, अशा प्रकारची ती आहे व तिला अनादि (आरंभरहित) असे म्हणतात. ॥१५-८१॥
जे नानातत्त्वांची मांदुस । जे जगदभ्राचें आकाश ।
जे आकारजाताचें दुस । घडी केलें ॥ ८२ ॥
जी माया संसारवृक्षाचे बीज आहे व जी माया प्रपंचरूप वृक्षाची जमीन आहे व जी माया विपरीतज्ञानास प्रकाशन करणारी प्रज्वलित मशाल आहे ॥१५-८२॥
जे भवद्रुमबीजिका । जे प्रपंचचित्र भूमिका ।
विपरीत ज्ञानदीपिका । सांचली जे ॥ ८३ ॥
जी माया अनेक शक्तींची पेटी आहे, जी माया जगद्रूपी ढग येण्याचे आकाश आहे, अथवा जी माया संपूर्ण विश्वाकाररूपी वस्त्राची घडी केलेली आहे. ॥१५-८३॥
ते माया वस्तूच्या ठायीं । असे जैसेनि नाहीं ।
मग वस्तुप्रभाचि पाही । प्रगट होये ॥ ८४ ॥
ती माया ब्रह्माच्या ठिकाणी जशी नाही, अशी आहे. मग वस्तूचा प्रकाशच (जगद्रूपाने) प्रगट होतो. ॥१५-८४॥
जेव्हां आपणया आली निद । करी आपणपें जेवीं मुग्ध ।
कां काजळी आणी मंद । प्रभा दीपीं ॥ ८५ ॥
जेव्हा आपल्याला झोप येते तेव्हा ती आपल्याला जशी मूढ करते, अथवा दिव्याच्या ज्योतीच्या ठिकाणी काजळी वाढली असता ती काजळी (जशी) दिव्याचा प्रकाश मंद करते. ॥१५-८५॥
स्वप्नीं प्रियापुढें तरुणांगी । निदेली चेववूनि वेगीं ।
आलिंगिलेनिवीण आलिंगी । सकामु करी ॥ ८६ ॥
स्वप्नात आपल्या नवर्‍यापुढे निजलेली तरुण स्त्री स्वप्नातच नवर्‍याला जागे करून त्याला खरे खरे आलिंगन दिल्याशिवाय स्वप्नातच आलिंगन देऊन त्याला खरोखर सकाम करते ॥१५-८६॥
तैसी स्वरूपीं जाली माया । आणी स्वरूप नेणे धनंजया ।
तेंचि रुखा यया । मूळ पहिलें ॥ ८७ ॥
त्याप्रमाणे स्वरूपाच्या ठिकाणी झलेली माया आपला आश्रय जे स्वरूप, त्याच्या ठिकाणी नेणणे (अज्ञान) आणते, तेच या संसारवृक्षाला पहिले मूळ आहे. ॥१५-८७॥
वस्तूसी आपुला जो अबोधु । तो ऊर्ध्वीं आठुळैजे कंदु ।
वेदांतीं हाचि प्रसिद्धु । बीजभावो ॥ ८८ ॥
ब्रह्मवस्तूला जे आपले अज्ञान आहे तेच या संसारवृक्षाचा, ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी बांधला गेलेला कांसा आहे आणि वेदातही यालाच बीजभाव असे प्रसिद्ध नाव आहे. ॥१५-८८॥
घन अज्ञान सुषुप्ती । तो बीजांकुरभावो म्हणती ।
येर स्वप्न हन जागृती । हा फळभावो तियेचा ॥ ८९ ॥
पूर्ण अज्ञान अशी जी निद्रावस्था, तिला वस्तूच्या अबोधरूपी बीजाची अंकुरावस्था असे म्हणतात व इतर ज्या दोन जागृति व स्वप्न अवस्था आहेत त्यास त्या सुषुप्तिरूपी अंकुराची फलावस्था आहे असे म्हणतात. ॥१५-८९॥
ऐसी यया वेदांतीं । निरूपणभाषाप्रतीती ।
परी तें असो प्रस्तुतीं । अज्ञान मूळ ॥ ९० ॥
वेदांतामधे प्रतिपादन करावयाच्या भाषेत, या संज्ञांना वरीलप्रमाणे प्रसिद्धी आहे, परंतु ते राहू दे. या सर्वास कारण अज्ञान आहे. ॥१५-९०॥
तें ऊर्ध्व आत्मा निर्मळें । अधोर्ध्व सूचिती मूळें ।
बळिया बांधोनि आळें । मायायोगाचें ॥ ९१ ॥
त्या उपाधिरहित व सर्वांचे पलीकडे असलेल्या चैतन्याचे ठिकाणी मायेचा दृढ संबंध होणे हे आळे तयार होऊन त्यातील मुळे संसारवृक्षाचा खालचा व वरचा भाग दाखवतात. ॥१५-९१॥
मग आधिलीं सदेहांतरें । उठती जियें अपारें ।
ते चौपासि घेऊनि आगारें । खोलावती ॥ ९२ ॥
मग अपार असे निरनिराळे देह खाली चोहीकडे अंकुर घेऊन खोल जातात. ॥१५-९२॥
ऐसें भवद्रुमाचें मूळ । हें ऊर्ध्वीं करी बळ ।
मग आणियांचें बेंचळ । अधीं दावी ॥ ९३ ॥
असे जे संसारवृक्षचे मूळ (माया) ते वरच्या बाजूस ब्रह्माच्या ठिकाणी बळ बांधण्यास लागले, म्हणजे मग अग्राचे जुंबाडे खाली येतात. ॥१५-९३॥
तेथ चिद्‌वृत्ति पहिलें । महत्तत्त्व उमललें ।
तें पान वाल्हेंदुल्हें । एक निघे ॥ ९४ ॥
त्या जुंबाडात, चिद्वृत्ती म्हणजे माया, त्या मायेपासून पहिल्या प्रथम महतत्व हेच काय ते एक उमलेले कोवळे लुसलुशीत पान निघते. ॥१५-९४॥
मग सत्त्वरजतमात्मकु । त्रिविध अहंकारु जो एकु ।
तो तिवणा अधोमुखु । डिरु फुटे ॥ ९५ ॥
मग त्या पानास सत्वरजतमात्मक जो तीन प्रकारचा अहंकार आहे, तोच खाली मुख असलेला असा तीन पानांचा एक शेंडा फुटतो. ॥१५-९५॥
तो बुद्धीची घेऊनि आगारी । भेदाची वृद्धि करी ।
तेथे मनाचे डाळ धरी । साजेपणें ॥ ९६ ॥
तो (त्रिगुणात्मक अहंकार) सत्वापासून उपन्न होणार्‍या बुद्धीचे शेंडे घेऊन भेदाची वृद्धी करतो, तेव्हा टवटवीत अशा मनाची डहाळी वाढावयास लागते. ॥१५-९६॥
ऐसा मूळाचिया गाढिका । विकल्परस कोंवळिका ।
चित्तचतुष्टय डाहाळिका । कोंभैजे तो ॥ ९७ ॥
याप्रमाणे मुळाच्या दृढतेबरोबर विकल्परूपी रसाच्या कोवळेपणाने भरलेल्या अशा मन, बुद्धी, चित्त, अहंकाररूपी लहान फांद्या, या त्रिगुणात्मक अहंकारात फुटतात. ॥१५-९७॥
मग आकाश वायु द्योतक । आप पृथ्वी हें पांच फोंक ।
महाभूतांचें सरोख । सरळे होती ॥ ९८ ॥
मग (तामस अहंकारापासून उत्पन्न होणार्‍या आकाश, वायु, तेज, उदक व पृथ्वी या पंचमहाभूतांचे फोक सरळ जोराने फुटतात. ॥१५-९८॥
तैसीं श्रोत्रादि तन्मात्रें । तियें अंगवसां गर्भपत्रें ।
लुळलुळितें विचित्रें । उमळती गा ॥ ९९ ॥
त्याचप्रमाणे श्रोत्रादी पंचज्ञानेंद्रिये व सूक्ष्म विषय, ती ढगाळ्यांचे शेवटास असलेली पूर्णपणे न उमललेली लुसलुशीत व एकसारखी एक नसलेली पाने व्यक्त होतात. ॥१५-९९॥
तेथ शब्दांकुर वरिपडी । श्रोत्रा वाढी देव्हडी ।
होता करित कांडीं । आकांक्षेचीं ॥ १०० ॥
तेव्हा शब्दांकुरापर्यंत श्रोत्राची मोठी वाढ होत असता श्रोत्रेंद्रिय हे विषयाविषयीच्या आशेचे कांडे तयार करते. ॥१५-१००॥
अंगत्वचेचे वेलपल्लव । स्पर्शांकुरीं घेती धांव ।
तेथ बांबळ पडे अभिनव । विकारांचें ॥ १०१ ॥
शरीरातील त्वगिंद्रियाचे वेल आणि पाने स्पर्शांकुरापर्यंत धाव घेतात. त्यावेळी नव्या नव्या विकारांची पुष्कळ वृद्धी होते. ॥१५-१०१॥
पाठीं रूपपत्र पालोवेलीं । चक्षु लांब तें कांडें घाली ।
ते वेळीं व्यामोहता भली । पाहाळीं जाय ॥ १०२ ॥
नंतर रूपाविषयीची पाने वाढली असता तेथपर्यंत चक्षु-इंद्रिय लांबलचक कांडे घालते, त्यावेळी भ्रमाचा चांगला विस्तार होतो. ॥१५-१०२॥
आणि रसाचें आंगवसें । वाढतां वेगें बहुवसें ।
जिव्हे आर्तीची असोसें । निघती बेंचें ॥ १०३ ॥
आणि रसविषयरूपी ढगळे फार वेगाने वाढले असता जिव्हेला इच्छेची अतिशय पानात पाने फुटतात. ॥१५-१०३॥
तैसेंचि कोंभैलेनि गंधें । घ्राणाची डिरी थांबुं बांधे ।
तेथ तळु घे स्वानंदें । प्रलोभाचा ॥ १०४ ॥
त्याचप्रमाणे गंधविषयरूप अंकुराची वाढ होण्यास लागली म्हणजे घ्राणेंद्रियाचा शेंडा बळ बांधण्यास लागतो, तेव्हा घ्राणेंद्रिय आनंदाने अतिशय लोभाचा तळ घेते, म्हणजे घ्राणेंद्रियास गंधाचा अतिशय लोभ सुटतो. ॥१५-१०४॥
एवं महदहंबुद्धि । मनें महाभूतसमृद्धी ।
इया संसाराचिया अवधी । सासनिजे ॥ १०५ ॥
याप्रमाणे महतत्वापासून उत्पन्न झालेला अहंकार, बुद्धि, मन व पंचमहाभूतांचा समुदाय ही सर्व संसाराची मर्यादा तयार होते. ॥१५-१०५॥
किंबहुना इहीं आठें । आंगीं हा अधिक फांटे ।
परी शिंपीचियेवढें उमटे । रुपें जेवीं ॥ १०६ ॥
फार काय सांगावे ? या आठ अंगांनी हा संसारवृक्ष अधिक वाढतो, परंतु (हा संसार किती वाढला तरी त्याचे अधिष्ठान जे ब्रह्म, त्याच्यापेक्षा अधिक वाढत नाही). जसे शिंपीवर भासणारे रूपे हे आपले अधिष्ठन जी शिंप तेवढेच भासते. ॥१५-१०६॥
कां समुद्राचेनि पैसारें । वरी तरंगता आसारे ।
तैसें ब्रह्मचि होय वृक्षाकारें । अज्ञानमूळ ॥ १०७ ॥
अथवा समुद्राच्या विस्ताराइतका त्यावर लाटपणा पसरतो, त्याप्रमाणे ब्रह्मच अज्ञानमूळ असलेल्या संसारवृक्षाच्या आकाराने तयार होते. ॥१५-१०७॥
आतां याचा हाचि विस्तारु । हाचि यया पैसारु ।
जैसा आपणपें स्वप्नीं परिवारु । येकाकिया ॥ १०८ ॥
जसा एखादा पुरुष स्वप्नात आपण एकटाच आपला सर्व परिवार होतो, त्याप्रमाणे एकाकी जे ब्रह्म त्याचा सर्व विस्तार हाच संसारवृक्ष आहे व त्याचा सर्व अवकाश हाच आहे. ॥१५-१०८॥
परी तें असो हें ऐसें । कावरें झाड उससे ।
यया महदादि आरवसें । अधोशाखा ॥ १०९ ॥
परंतु हे वरील वर्णन करणे राहू दे. अशा या तर्‍हेने हा भ्रमात्मक संसारवृक्ष वाढत असून, महत्-तत्वादिकांच्या अंकुरापासून यास खाली फांद्या उत्पन्न होतात. ॥१५-१०९॥
आणि अश्वत्थु ऐसें ययातें । म्हणती जे जाणते ।
तेंही परिस हो येथें । सांगिजैल ॥ ११० ॥
आणि ज्ञाते पुरुष याला अश्वत्थ असे म्हणतात. त्याचे कारण काय ? तेही येथे सांगण्यात येईल, ऐक. ॥१५-११०॥
तरी श्वः म्हणिजे उखा । तोंवरी एकसारिखा ।
नाहीं निर्वाहो यया रुखा । प्रपंचरूपा ॥ १११ ॥
तर श्व: म्हणजे उद्या, तोपर्यंत या प्रपंचरूप वृक्षाला एकसारखे टिकणे नाही. म्हणून याला अश्वत्थ असे म्हणतात. ॥१५-१११॥
जैसा न लोटतां क्षणु । मेघु होय नानावर्णु ।
कां विजु नसे संपूर्णु । निमेषभरी ॥ ११२ ॥
ज्याप्रमाने एक क्षण लोटला नाही तोच मेघ नाना रंगांचा होतो, अथवा वीज ही एक पूर्ण निमिषभर देखील टिकत नाही. ॥१५-११२॥
ना कांपतया पद्मदळा । वरीलिया बैसका नाहीं जळा ।
कां चित्त जैसें व्याकुळा । माणुसाचें ॥ ११३ ॥
अथवा हलणार्‍या कमळाच्या पाकळीवरील पाण्याच्या थेंबाला जशी स्थिरता नाही अथवा व्याकुळ मानसाच्या चित्ताला जशी स्थिरता नसते ॥१५-११३॥
तैसीचि ययाची स्थिती । नासत जाय क्षणक्षणाप्रती ।
म्हणौनि ययातें म्हणती । अश्वत्थु हा ॥ ११४ ॥
त्याप्रमाणेच या संसारवृक्षाची स्थिती आहे, म्हणजे हा प्रतिक्षणाला नाश पावतो, म्हणून याला ज्ञाते लोक अश्वत्थ असे म्हनतात. ॥१५-११४॥
आणि अश्वत्थु येणें नांवें । पिंपळु म्हणती स्वभावें ।
परी तो अभिप्राय नव्हे । श्रीहरीचा ॥ ११५ ॥
आणि अश्वत्थ या नावाने स्वभावत: पिंपळ असे म्हणतात, परंतु भगवंताचा तो अभिप्राय नाही. ॥१५-११५॥
एर्‍हवीं पिंपळु म्हणतां विखीं । मियां गति देखिली असे निकी ।
परी तें असो काय लौकिकीं । हेतु काज ॥ ११६ ॥
एरवी पिंपळ या अर्थाने संसाराला भगवंतांनी अश्वत्थ उपमा दिली असती तरी सुद्धा मला ती चांगली पटली असती. परंतु ते राहू द्या, आपल्याला लौकिकार्थाशी काय करायचे आहे ? (भगवंताच्या हेतूशी आपल्याला काम आहे). ॥१५-११६॥
म्हणौनि हा प्रस्तुतु । अलौकिकु परियेसा ग्रंथु ।
तरी क्षणिकत्वेंचि अश्वत्थु । बोलिजे हा ॥ ११७ ॥
म्हणूना आता (या संसारवृक्षासंबंधी) अलौकिक व्याख्यान ऐका. तर या वृक्षास क्षणभंगुरतेच्याच दृष्टीने शास्त्रात अश्वत्थ असे म्हटले जाते. ॥१५-११७॥
आणीकुही येकु थोरु । यया अव्ययत्वाचा डगरु ।
आथी परी तो भीतरु । ऐसा आहे ॥ ११८ ॥
आणखी एक याच्या अविनाशीपणाबद्दल मोठी प्रसिद्धी आहे. परंतु तो अविनाशीपणा आतून असा आहे. ॥१५-११८॥
जैसा मेघांचेनि तोंडें । सिंधु एके आंगें काढे ।
आणि नदी येरीकडे । भरितीच असती ॥ ११९ ॥
ज्याप्रमाणे मेघांच्या मुखांनी समुद्र एका बाजूने उपसला जातो व दुसर्‍या बाजूने नद्या त्यास भरीतच असतात. ॥१५-११९॥
तेथ वोहटे ना चढे । ऐसा परिपूर्णुचि आवडे ।
परी ते फुली जंव नुघडे । मेघानदींची ॥ १२० ॥
त्या योगे तो समुद्र कमी अथवा जास्त होत नाही, असा परिपूर्णच आहे, असा वाटतो, परंतु त्याचे परिपूर्णत्व, मेघाचा आणी नदीचा त्याच्याशी जोपर्यंत संयोग बिघडला नाही तोपर्यंतच असते. ॥१५-१२०॥
ऐसें या रुखाचें होणें जाणें । न तर्के होतेनि वहिलेपणें ।
म्हणौनि ययातें लोकु म्हणे । अव्ययु हा ॥ १२१ ॥
त्याप्रमाणे या संसारवृक्षाचे होणेजाणे वेगाने होत असल्यामुळे त्या होण्याजाण्याचा तर्क करता येत नाही, म्हणून लोक याला अविनाशी असे म्हणतात. ॥१५-१२१॥
एर्‍हवीं दानशीळु पुरुषु । वेंचकपणेंचि संचकु ।
तैसा व्ययेंचि हा रुखु । अव्ययो गमे ॥ १२२ ॥
एरवी जसा दान करणारा पुरुष दानधर्मात खर्च करतो असे जरी दिसले तरी तो खर्च करीत नसून त्या खर्चाच्या रूपानेच द्रव्यसंचय करतो, तसा हा संसारवृक्ष नाश पावत असताही अविनाश असा भासतो. ॥१५-१२२॥
जातां वेगें बहुवसें । न वचे कां भूमीं रुतलें असे ।
रथाचें चक्र दिसे। जियापरी ॥ १२३ ॥
अथवा रथाचे चाक अति वेगाने फिरत असतांना ते फिरत नाही तर जमिनीत रोवलेले आहे असे ज्याप्रमाणे दिसते ॥१५-१२३॥
तैसें काळातिक्रमें जे वाळे । ते भूतशाखा जेथ गळे ।
तेथ कोडीवरी उमाळे । उठती आणिक ॥ १२४ ॥
त्याप्रमाणे कालाच्या अतिशय गतीने या संसारवृक्षाची जी प्राणिरूपी फांदी वाळते व त्या योगाने गळून पडते, त्या ठिकाणी आणखी कोट्यावधी अंकूर या संसारवृक्षास फुटतात. ॥१५-१२४॥
परी येकी केधवां गेली। शाखाकोडी केधवां जाली ।
हें नेणवे जेवीं उमललीं । आषाढाभ्रें ॥ १२५ ॥
ज्याप्रमाने आषाढ महिन्यातील उत्पन्न झालेल्या ढगात एक ढग नाहीसा झाला केव्हा व त्या ठिकाणी दुसरे अनेक ढग आले केव्हा हे जसे कळत नाही, त्याप्रमाणे या संसारवृक्षाची एक फांदी केव्हा नाश पावली व त्या ठिकाणी कोट्यावधी (शरीररूपी) शाखा केव्हा उत्पन झाल्या हे कळत नाही. ॥१५-१२५॥
महाकल्पाच्या शेवटीं । उदेलिया उमळती सृष्टी ।
तैसेंचि आणिखीचें दांग उठी । सासिन्नलें ॥ १२६ ॥
उत्पन्न झालेली चतुर्दश भुवने, कल्प संपण्याचे वेळी उन्मळून पडतात व पुन्हा कल्प सुरू झाला म्हणजे भरास आलेले तितकेच जगताचे अनेक समुदाय तयार होतात. ॥१५-१२६॥
संहारवातें प्रचंडें । पडती प्रळयांतींचीं सालडें ।
तंव कल्पादीचीं जुंबाडें । पाल्हेजती ॥ १२७ ॥
संहारकारक प्रचंड वार्‍याने महाप्रलयकाळाच्या अखेरीची जीर्ण झालेली संसारवृक्षाची साल वगैरे गळून जाते न जाते तोच कल्पाच्या आरंभास सृष्टीचे समुदायचे समुदाय उत्पन्न होतात. ॥१५-१२७॥
रिगे मन्वंतर मनूपुढें । वंशावरी वंशांचे मांडे ।
जैसी इक्षुवृद्धी कांडेंनकांडें । जिंके जेवीं ॥ १२८ ॥
कांड्यामागून कांडे उत्पन्न होऊन जसा ऊस वाढत जातो, त्याप्रमाणे एका मनूच्या काळापासून दुसर्‍या मनूचा काळ येऊन एका वंशामागून दुसरा वंश असा वंशवृद्धीचा विस्तार होतो. ॥१५-१२८॥
कलियुगांतीं कोरडीं । चहुं युगांची सालें सांडी ।
तंव कृतयुगाची पेली देव्हडी । पडे पुढती ॥ १२९ ॥
कलियुगाच्या अखेरीस चार युगांची जीर्ण झालेली सालपटे वगैरे गळून पडतात न पडतात इतक्यात कृतयुगाची पहिली अशी मोठी साल उत्पन्न होण्यास लागते. ॥१५-१२९॥
वर्ततें वर्ष जाये । तें पुढिला मुळहारी होये ।
जैसा दिवसु जात कीं येत आहे । हें चोजवेना ॥ १३० ॥
चालू जे वर्ष जाते ते पुढच्या वर्षास मूळ होते. ज्याप्रमाणे दिवस जातो की येतो कळत नाही. ॥१५-१३०॥
जैशा वारियाच्या झुळकां । सांदा ठाउवा नव्हे देखा ।
तैसिया उठती पडती शाखा । नेणों किती ॥ १३१ ॥
ज्याप्रमाणे वार्‍याच्या झुळुकांमागून झुळुका वहात असल्यामुळे त्यांचा जोड कोठे आहे ते कळत नाही, त्याप्रमाणे या संसारवृक्षाच्या उत्पन्न होणार्‍या व नाश पावणार्‍या फंद्यांचा आदि व अंत न समजल्याने त्या किती आहेत हे कळत नाही. ॥१५-१३१॥
एकी देहाची डिरी तुटे । तंव देहांकुरीं बहुवी फुटे ।
ऐसेनि भवतरु हा वाटे । अव्ययो ऐसा ॥ १३२ ॥
या संसारवृक्षाचा शरीररूपी एक शेंडा गळून पडतो, तो अनेक देहरूपी अंकुर त्याला (संसारवृक्षाला) फुटतात, अशातर्‍हेने हा संसारवृक्ष अव्यय, (अविनाश) आहे असा वाटतो. ॥१५-१३२॥
जैसें वाहतें पाणी जाय वेगें । तैसेंचि आणिक मिळे मागें ।
येथ असंतचि असिजे जगें । मानिजे संत ॥ १३३ ॥
जसे वहाणारे पाणी जोराने जात असते व त्यास मागून तसेच वहाणारे पाणी मिळात असते, (त्यामुळे पहाणारास एकसारखे तेच पाणी आहे असे वाटते). त्याप्रमाणे हा संसासरवृक्ष अस्थिर असतांनाच लोक याला स्थिर असे मानतात. ॥१५-१३३॥
कां लागोनि डोळां उघडे । तंव कोडीवरी घडे मोडे ।
नेणतया तरंगु आवडे । नित्यु ऐसा ॥ १३४ ॥
अथवा डोळा मिटून उघडावा इतक्या अवकाशात लाट, कोट वेळा घडते व मोडते, परंतु त्या लाटेचे कोटीवेळा होणे-जाणे ज्यास कळत नाही, त्याला लाट नित्य (एकसारखी टिकणारी) अशी वाटते. ॥१५-१३४॥
वायसा एकें बुबुळें दोहींकडे । डोळा चाळीतां अपाडें ।
दोन्ही आथी ऐसा पडे । भ्रमु जेवीं जगा ॥ १३५ ॥
एकच बुबुळ आपल्या दोन्ही डोळ्यात असाधारणपणे कावळा फिरवीत बसल्यामुळे त्याच्या दोन्ही डोळ्यात बुबुळे आहेत असा लोकांना भ्रम पडतो ॥१५-१३५॥
पैं भिंगोरी निधिये पडली । ते गमे भूमीसी जैसी जडली ।
ऐसा वेगातिशयो भुली । हेतु होय ॥ १३६ ॥
भिंगरी जेव्हा अतिशय वेगाने फिरत असते, तेव्हा ती जमिनीला उभी चिकटली आहे असे वाटते, याप्रमाणे अतिशय वेग हा स्थिरतेच्या भ्रमाला कारण होतो. ॥१५-१३६॥
हें बहु असो झडती । आंधारें भोवंडितां कोलती ।
ते दिसे जैसी आयती । चक्राकार ॥ १३७ ॥
हे राहू दे, अंधारामधे कोलती फार लवकर फिरवली असता ती ज्याप्रमाणे अखंडचक्राच्या आकाराची दिसते. ॥१५-१३७॥
हा संसारवृक्षु तैसा । मोडतु मांडतु सहसा ।
न देखोनि लोकु पिसा । अव्ययो मानी ॥ १३८ ॥
त्याप्रमाणे हा संसारवृक्ष मोठ्या झपाट्याने नाश पावत आहे व रचला जात आहे, हे जगास न कळाल्यामुळे भ्रमिष्ट लोक याला अविनाशी असे मानतात. ॥१५-१३८॥
परि ययाचा वेगु देखे । जो हा क्षणिक ऐसा वोळखे ।
जाणे कोडिवेळां निमिखें । होत जात ॥ १३९ ॥
परंतु जो याचा वेग पहातो व हा क्षणभंगुर आहे असे समजतो आणि एका निमिषात कोट्यावधी वेळा हा उत्पन्न होतो व नाहीसा होतो असे ज्यास ज्ञान असते, ॥१५-१३९॥
नाहीं अज्ञानावांचूनि मूळ । ययाचें असिलेंपण टवाळ ।
ऐसें झाड सिनसाळ । देखिलें जेणें ॥ १४० ॥
या संसारवृक्षास अज्ञानाशिवाय दुसरे मूळ नसून याचे अस्तित्वही मिथ्या आहे, असा हा वृक्ष जीर्ण सालीचा नाशिवंत व भासमात्र आहे असे ज्याने जाणले ॥१५-१४०॥
तयातें गा पंडुसुता । मी सर्वज्ञुही म्हणें जाणता ।
पैं वाग्ब्रह्म सिद्धांता । वंद्यु तोची ॥ १४१ ॥
अर्जुना, त्याला (संसारवृक्षाचे क्षणिकत्व जाणणार्‍याला) मी जो सर्वज्ञ तोही ज्ञानी असे म्हणतो आणि वेदांच्यासिद्धांताला तोच पूज्य आहे. ॥१५-१४१॥
योगजाताचें जोडलें । तया एकासीचि उपेगा गेलें ।
किंबहुना जियालें । ज्ञानही त्याचेनी ॥ १४२ ॥
सर्वप्रकारच्या योगाच्या अभ्यासाचे मिळालेले फळ त्या एकट्याच्याच उपयोगाला गेले. फार काय सांगावे ? ज्ञान देखील त्या पुरुषाच्या योगाने जगले. ॥१५-१४२॥
हें असो बहु बोलणें । वानिजैल तो कवणें ।
जो भवरुखु जाणें । उखि ऐसा ॥ १४३ ॥
हे फार बोलणे राहू दे. जो पुरुष हा संसारवृक्ष केवळ मिथ्याभास आहे असे जाणतो, त्याचे कोणाला वर्णन करता येईल ? ॥१५-१४३॥

अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः ।
अधश्च मूलान्यनुसंततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके ॥ २ ॥
सत्वादि गुणांच्या योगाने वृद्धि पावलेल्या व शाब्दादि विषयरूपी पल्लवांनी युक्त अशा त्या वृक्षाच्या अनेक शाखा खाली व वर पसरलेल्या आहेत. कर्माच्या अधीन असणारी (कर्माला अनुसरणारी) त्याची अनेक मुळे खाली मनुष्यलोकी विस्तार पावली आहेत. ॥१५-२॥
मग ययाचि प्रपंचरूपा । अधोशाखिया पादपा ।
डाहाळिया जाती उमपा । ऊर्ध्वाही उजू ॥ १४४ ॥
मग याच खाली शाखा असलेल्या संसारवृक्षाच्या पुष्कळ फांद्या सरळ वर देखील जातात. ॥१५-१४४॥
आणि अधीं फांकली डाळें । तिये होती मूळें ।
तयाही तळीं पघळे । वेल पालवु ॥ १४५ ॥
आणि त्या संसारवृक्षाच्या खाली ज्या फांद्या विस्तारलेल्या आहेत, त्या फांद्या (पारंब्यांप्रमाणे) मूळे होतात व त्या मुळांपासून खालीही वेल व पाला फुटतो. ॥१५-१४५॥
ऐसें जें आम्हीं । म्हणितलें उपक्रमीं ।
तेंही परिसें सुगमीं । बोलीं सांगों ॥ १४६ ॥
असे जे आम्ही आरंभी (ओवी ५७ ते ६४ मधे) म्हटले होते तेही सोप्या भाषेत सांगतो. ऐक. ॥१५-१४६॥
तरी बद्धमूळ अज्ञानें । महदादिकीं सासिनें ।
वेदांचीं थोरवनें । घेऊनियां ॥ १४७ ॥
तरी अज्ञानरूपी बळकट बनलेल्या मुळाने महतत्वादिकांच्या भराने व वेदरूपी मोठी पाने फुटून हा संसारवृक्ष पुढे सांगितल्याप्रमाणे वाढतो). ॥१५-१४७॥
परी आधीं तंव स्वेदज । जारज उद्भिज अंडज ।
हे बुडौनि महाभुज । उठती चारी ॥ १४८ ॥
परंतु प्रारंभी तर स्वेदज, जारज, अंडज व उद्भिज हे बुडापासून (मुळापासून) चार मोठे फोक उत्पन्न होतात. ॥१५-१४८॥
यया एकैकाचेनि आंगवटें । चौर्‍यांशीं लक्षधा फुटे ।
ते वेळीं जीवशाखीं फांटे । सैंधचि होती ॥ १४९ ॥
या एकेक खाणीच्या मुळापासून अंकुर फुटून एकंदर चौर्‍यांशी लक्ष प्रकारचे अंकूर फुटतात. त्यावेळी जीवरूपी फांदीच्या ठिकाणी पुष्कळसे फाटे उत्पन्न होतात. ॥१५-१४९॥
प्रसवती शाखा सरळिया । नानासृष्टि डाहाळिया ।
आड फुटती माळिया । जातिचिया ॥ १५० ॥
मागे सांगितलेल्या चार खाणीरूप सरळ शाखांनी आणखी सृष्टीरूपी डहाळ्या फुटतात. आणि अनेक जातिरूपी आडव्या फांद्या ह्या संसारवृक्षाला उत्पन्न होतात. ॥१५-१५०॥
स्त्री पुरुष नपुंसकें । हे व्यक्तिभेदांचे टके ।
आंदोळती आंगिकें । विकारभारें ॥ १५१ ॥
स्त्री, पुत्र व नंपुसक हे भेदात्मक आकाराचे घोस असलेल्या कामादिक विकारांच्या भाराने एकमेकांवेर आदळतात. ॥१५-१५१॥
जैसा वर्षाकाळु गगनीं । पाल्हेजे नवघनीं ।
तैसें आकारजात अज्ञानीं । वेलीं जाय ॥ १५२ ॥
ज्याप्रमाणे वर्षाकाळ हा आकाशामधे नव्या मेघांच्या रूपाने पसरतो, त्याप्रमाणे अज्ञानच्या ठिकाणी आकारमात्राचा वेल पसरतो. ॥१५-१५२॥
मग शाखांचेनि आंगभारें । लवोनि गुंफिती परस्परें ।
गुणक्षोभाचे वारे । उदयजती ॥ १५३ ॥
मग शाखा आपल्या अंगभाराने लवून एकमेकांमधे गुंततात व गुणक्षोभाच्या उत्कर्षाचे वारे उत्पन्न होतात. ॥१५-१५३॥
तेथ तेणें अचाटें । गुणांचेनि झडझडाटें ।
तिहीं ठायीं हा फांटे । ऊर्ध्वमूळ ॥ १५४ ॥
तेव्हां गुणक्षोभरूपी भयंकर वाहणार्‍या वार्‍याच्या जोराने य़्र्ध्व (वर) मूळ आहे ज्याचे, असा हा संसारवृक्ष तीन ठिकाणी फाटतो. ॥१५-१५४॥
ऐसा रजाचिया झुळुका । झडाडितां आगळिका ।
मनुष्यजाती शाखा । थोरावती ॥ १५५ ॥
याप्रमाणे रजोगुणाचा वारा अधिक जोराने वाहू लागला असता मनुष्यजातिरूपी फांद्या जोराने वाढतात. ॥१५-१५५॥
तिया ऊर्ध्वीं ना अधीं । माझारींचि कोंदाकोंदी ।
आड फुटती खांदी । चतुर्वर्णांच्या ॥ १५६ ॥
त्या मनुष्यरूपी शाखा वरही नसतात व खालीही नसतात तर मधल्या भागातच त्यांची अतिशय गर्दी होऊन, त्या मनुष्यरूपी शाखांना ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र अशा चार वर्णांच्या आडव्या फांद्या फुटतात. ॥१५-१५६॥
तेथ विधिनिषेध सपल्लव । वेदवाक्यांचें अभिनव ।
पालव डोलती बरव । नीच नवे ॥ १५७ ॥
विधिनिषेधरूपी कोवळ्या पानांचे झुपके असलेली अशी वेदवाक्यांची डोलत असलेली पालवी त्या मनुष्य शाखांना अपूर्व शोभा आणते. ॥१५-१५७॥
अर्थु कामु पसरे । अग्रवनें घेती थारे ।
तेथ क्षणिकें पदांतरें । इहभोगाचीं ॥ १५८ ॥
तेव्हा ऐहिक भोगांची नाशवंत अशी अनेक स्थाने हेच कोणी अंकुर, ते अर्थ व काम यांच्या विस्ताराने जोराने वाढतात. ॥१५-१५८॥
तेथ प्रवृत्तीचेनि वृद्धिलोभें । खांकरेजती शुभाशुभें ।
नानाकर्मांचे खांबे । नेणों किती ॥ १५९ ॥
त्य़ावेळी संसाराची वृद्धी व्हावी या लोभाने अनेकानेक शुभाशुभ कर्मांचे सोट किती फुटतात हे कळत नाही. ॥१५-१५९॥
तेवींचि भोगक्षीणें मागिलें । पडती देहांतींचीं बुडसळें ।
तंव पुढां वाढी पेले । नवेया देहांची ॥ १६० ॥
त्याचप्रमाणे मागील जन्मात केलेल्या कर्मभोगांचा क्षय झाला की संसाररूपी वृक्षाची शुष्क काष्ठे गळून पडतात, तोच पुन्हा नव्या देहाचा विस्तार तयार होतो ॥१५-१६०॥
आणि शब्दादिक सुहावे । सहज रंगें हवावे ।
विषयपल्लव नवे । नीत्य होती ॥ १६१ ॥
आणि नैसर्गिक असलेल्या आकर्षक शोभेने सुशोभित झालेली जी शब्दादिक विषयरूप पालवी ती नेहेमीच नवीन नवीन तयार होत असते. ॥१५-१६१॥
ऐसे रजोवातें प्रचंडें । मनुष्यशाखांचे मांदोडे ।
वाढती तो एथ रुढे । मनुष्यलोकु ॥ १६२ ॥
याप्रमाणे रजोगुणाच्या प्रचंड वार्‍याने मनुष्यशाखांचे समुदाय तयार होतात. त्यास या संसारवृक्षाचे ठिकाणी मनुष्यलोक म्हणण्याचा प्रचार आहे. ॥१५-१६२॥
तैसाचि तो रजाचा वारा । नावेक धरी वोसरा ।
मग वाजों लागे घोरा । तमाचा तो ॥ १६३ ॥
त्याचप्रमाणे तो रजोगुणाचा वारा क्षणभर वहाण्याचा बंद होतो मग तमोगुणाचा भयंकर वारा वहाण्यास लागतो. ॥१५-१६३॥
तेधवां याचिया मनुष्यशाखा । नीच वासना अधीं देखा ।
पाल्हेजती डाहाळिका । कुकर्माचिया ॥ १६४ ॥
तेव्हा तमोगुणाचा वारा सुटल्यावर याच मनुष्यरूपी शाखांना खालच्या बाजूस वाईट कर्मांची नीच वासना, ह्याच कोणी फांद्या, त्या विस्ताराला पावतात असे समज. ॥१५-१६४॥
अप्रवृत्तींचे खणुवाळे । कोंभ निघती सरळे ।
घेत पान पालव डाळे । प्रमादाचीं ॥ १६५ ॥
(निषिद्ध कर्मरूपी खणु असलेले सरळ फोक हे मनुष्यरूपी शाखेला) प्रमादरूपी पाने व पाला व डहाळ्या उत्पन्न करीत फुटतात. ॥१५-१६५॥
बोलती निषेधनियमें । जिया ऋचा यजुःसामें ।
तो पाला तया घुमें । टकेयावरी ॥ १६६ ॥
यजुर्वेद व सामवेद यांच्यातील जे मंत्र निश्चयाने निषिद्ध कर्मे (अमूक आहेत असे) सांगतात ते मंत्ररूपी पल्लव त्या डहाळ्यांच्या अग्रभागावर वाजू लागतात. ॥१५-१६६॥
प्रतिपादिती अभिचार । आगम जे परमार ।
तिहीं पानीं घेती प्रसर । वासना वेली ॥ १६७ ॥
दुसर्‍याच्या नाशाकरता जारणमारण प्रतिपादन करणारी जी शास्त्रे, ही कोणी पाने त्या पानांसह वासनारूप वेल विस्तारतात. ॥१५-१६७॥
तंव तंव होतीं थोराडें । अकर्मांचीं तळबुडें ।
आणि जन्मशाखा पुढें पुढें । घेती धांव ॥ १६८ ॥
(मागील ओवीत सांगितल्याप्रमाणे जो जो वासना वेली विस्तारतात) तो तो निषिद्ध कर्मांची तळातील मुळे मोठी होतात आणि यामुळे जन्मरूपी शाखा पुढे पुढे धाव घेतात. (म्हणजे श्रेष्ठ श्रेष्ठ योनीतून नीच योनीत जन्म प्राप्त होतात). ॥१५-१६८॥
तेथ चांडाळादि निकृष्टा । दोषजातीचा थोर फांटा ।
जाळ पडे कर्मभ्रष्टां । भुलोनियां ॥ १६९ ॥
तेव्हा तमोगुणामुळे मोहित झालेल्या कर्मभ्रष्टांना चांडाळादि निकृष्ट पापयोनीरूपी मोठ्या फांद्यांचे जाळे पडते. ॥१५-१६९॥
पशु पक्षी सूकर । व्याघ्र वृश्चिक विखार ।
हे आडशाखा प्रकार । पैसु घेती ॥ १७० ॥
पशु, पक्षी, डुक्कर, वाघ, विंचू साप ह्या आड शाखांचे समुदाय विस्तार पावतात. ॥१५-१७०॥
परी ऐशा शाखा पांडवा । सर्वांगींहि नित्य नवा ।
निरयभोग यावा । फळाचा तो ॥ १७१ ॥
परंतु अर्जुना, (तमोगुणाच्या उत्कर्षात) अशा या मनुष्यशाखांना सर्व अंगांचे ठिकाणी नित्य नवी नरकभोग हीच फलाची प्राप्ती होते. ॥१५-१७१॥
आणि हिंसाविषयपुढारी । कुकर्मसंगें धुर धुरी ।
जन्मवरी आगारी । वाढतीचि असे ॥ १७२ ॥
आणि तेथे हिंसा व मैथुन ह्या गोष्टी मुख्य आहेत व वाईट कर्मांची संगती ही तेथे अग्रगण्य आहे व ते हिंसादि निषिद्ध कर्मांचे अंकूर अनेक जन्मातून वाढतच असतात. ॥१५-१७२॥
ऐसे होती तरु तृण । लोह लोष्ट पाषाण ।
इया खांदिया तेवीं जाण । फळेंही हेंची ॥ १७३ ॥
(ज्या माणसांमधे तमोगुणाचा अशा रीतीने उत्कर्ष झालेला आहे) ती माणसे अशा या प्रकारची अवस्था भोगता भोगता मग पुढे अखेरीस गवत. लोखंड, माती, दगड अशा जड योनीत जातात. येथे शाखा तरी ह्याच आणि फळे तरी हीच. ॥१५-१७३॥
अर्जुना गा अवधारीं । मनुष्यालागोनि इया परी ।
वृद्धि स्थावरांतवरी । अधोशाखांची ॥ १७४ ॥
अर्जुना, ऐक. याप्रमाणे या संसारवृक्षाच्या खालच्या शाखांची वाढ मनुष्यापासून तो स्थावरापर्यंत होते. ॥१५-१७४॥
म्हणौनि जीं मनुष्यडाळें । तियें जाणावीं अधींचि मूळें ।
जे एथूनि हा पघळे । संसारतरु ॥ १७५ ॥
म्हणून मनुष्यरूपी ज्या डहाळ्या आहेत, ह्याच खालच्या शाखांची मुळे आहेत असे समजावे. कारण की मग तेथून संसारवृक्ष विस्ताराला पावतो. ॥१५-१७५॥
एर्‍हवीं ऊर्ध्वींचें पार्था । मुद्दल मूळ पाहतां ।
अधींचिया मध्यस्था । शाखा इया ॥ १७६ ॥
एरवी अर्जुना, संसारवृक्षाचे वरच्या बाजूचे मुख्य अज्ञानरूपी मूळ जर पाहिले तर खाली वाढलेल्या शाखात मनुष्यप्राणी ह्या मध्यावर असलेल्या शाखा होत. ॥१५-१७६॥
परी तामसी सात्त्विकी । सुकृतदुष्कृतात्मकी ।
विरुढती या शाखीं । अधोर्ध्वींचिया ॥ १७७ ॥
परंतु चांगल्या व वाईट कर्मांनी भरलेल्या ज्या सत्वगुणी व तमोगुणी वरच्या व खालच्या फांद्या आहेत त्यारूपाने मनुष्यरूपी शाखाच वाढतात. ॥१५-१७७॥
आणि वेदत्रयाचिया पाना । नये अन्यत्र लागों अर्जुना ।
जे मनुष्यावांचूनि विधाना । विषय नाहीं ॥ १७८ ॥
अर्जुना तीन वेदरूपी पाने ह्या मनुष्यरूपी शाखेशिवाय दुसर्‍या ठिकाणी लागत नाहीत, कारण की तिन्ही वेदांच्या आज्ञेला मनुष्याशिवाय दुसरे कोणी पात्र नाही. ॥१५-१७८॥
म्हणौनि तनु मानुषा । इया ऊर्ध्वमूळौनि जरी शाखा ।
तरी कर्मवृद्धीसि देखा । इयेंचि मूळें ॥ १७९ ॥
म्हणून मनुष्यतनु ह्या जरी संसारवृक्षाच्या वरच्या मूळच्या दृष्टीने शाखा आहेत तरी कर्माच्या विस्ताराला याच शाखा मुळे आहेत असे समज. ॥१५-१७९॥
आणि आनीं तरी झाडीं । शाखा वाढतां मुळें गाढीं ।
मूळ गाढें तंव वाढी । पैस आथी ॥ १८० ॥
आणि इतर प्राकृत वृक्षांचेही असे आहे की त्यांच्या फांद्या जसजशा वाढतात तसतशी त्यांची मुळे जमिनीमध्ये खोल बळावलेली असतात. आणि जसजशी त्यांची मुळे जमिनीमधे खोल बळावलेली असतात, तसतसा त्या वृक्षांचा वरचा विस्तारही अधिकाधिक फैलावतो. ॥१५-१८०॥
तैसेंचि इया शरीरा । कर्म तंव देहा संसारा ।
आणि देह तंव व्यापारा । ना म्हणोंचि नये ॥ १८१ ॥
या मनुष्यशरीराच्या बाबतीतही त्याचप्रमाणे आहे. (ते असे की) जेथेपर्यंत कर्मे आहेत तेथपर्यंत देहाचे रहाणे आहे आणि जेथेपर्यंत देह आहे तो पर्यंत कर्मे करण्यास नाही म्हणताच येत नाही, ॥१५-१८१॥
म्हणौनि देहें मानुषें । इयें मुळें होती न चुके ।
ऐसें जगज्जनकें । बोलिलें तेणें ॥ १८२ ॥
म्हणून मनुष्य देह ही (या संसारवृक्षाच्या खालच्या व वरच्या शाखांची) मुळे आहेत. यात चूक नही असे त्या जगाच्या जनकाने (श्रीकृष्णाने) सांगितले. ॥१५-१८२॥
मग तमाचें तें दारुण । स्थिरावलेया वाउधाण ।
सत्त्वाची सुटे सत्राण । वाहुटळी ॥ १८३ ॥
मग ती तमाची भयंकर सुटलेली वाहुटळ शांत झाल्यावर सत्वाची वाहुटळ जोराने सुटते. ॥१५-१८३॥
तैं याचि मनुष्याकारा । मुळीं सुवासना निघती आरा ।
घेऊनि फुटती कोंबारा । सुकृतांकुरीं ॥ १८४ ॥
त्याचवेळी ह्याच मनुष्याकाररूपी मुळांस सुवासनारूपी मोड निघतात व ते मोड कोंबास येऊन (म्हणजे त्यास सद्वासना दृढ होऊन जातात), नंतर त्यास (त्या कोंबास) सत्कर्मरूपी अंकुर फुटतात. ॥१५-१८४॥
उकलतेनि उन्मेखें । प्रज्ञाकुशलतेंची तिखें ।
डिरिया निघती निमिखें । बाबळैजुनी ॥ १८५ ॥
विकासणार्‍या ज्ञानाच्या योगाने बुद्धिचातुर्याचे तीक्ष्ण अंकूर एका क्षणात विस्तारून निघतात. ॥१५-१८५॥
मतीचे सोट वांवे । घालिती स्फूर्तींचेनि थांवें ।
बुद्धि प्रकाश घे धांवे । विवेकावरी ॥ १८६ ॥
बुद्धीचे फोक स्फूर्तीच्या बळाने विस्ताराला पावतात व विवेकाच्या जोराने बुद्धि प्रकाशाला घेते. (म्हणजे बुद्धीत प्रकाश पडतो). ॥१५-१८६॥
तेथ मेधारसें सगर्भ । अस्थापत्रीं सबोंब ।
सरळ निघती कोंभ । सद्‍वृत्तीचे ॥ १८७ ॥
त्यावेळी मेधारस (धारणाशक्तिरूपी रस) ज्याच्या आत भरलेला आहे व जे आस्था (आदर) रूपी पानांनी सुशोभित आहेत असे सद्वृत्तींचे सरळ कोंब फुटतात. ॥१५-१८७॥
सदाचाराचिया सहसा । टका उठती बहुवसा ।
घुमघुमिति घोषा । वेदपद्याच्या ॥ १८८ ॥
सदाचाराचे अंकुर एकदम पुष्कळच फुटतात व ते वेद पद्यांच्या गर्जना करू लागतात. ॥१५-१८८॥
शिष्टागमविधानें । विविधयागवितानें ।
इये पानावरी पानें । पालेजती ॥१८९ ॥
श्रेष्ठ पुरुष व शास्त्रे यांनी सांगितले आचरण व नाना प्रकारच्या यज्ञांचे विस्तार हीच कोणी पानांवर पाने पसरतात. ॥१५-१८९॥
ऐशा यमदमीं घोंसाळिया । उठती तपाचिया डाहाळिया ।
देती वैराग्यशाखा कोंवळिया । वेल्हाळपणें ॥ १९० ॥
अशा यमदमांचे घोस असलेल्या तपांच्या डहाळ्या उत्पन्न होतात व त्यास वैराग्यरूपी शाखा विस्ताराने आलिंगन देतात.. ॥१५-१९०॥
विशिष्टां व्रतांचे फोक । धीराच्या अणगटी तिख ।
जन्मवेगें ऊर्ध्वमुख । उंचावती ॥ १९१ ॥
आणि जे धैर्याच्या अंकुराने तीक्ष्ण असतात असे श्रेष्ठ व्रतरूपी फोक उत्पत्तीच्या वेगाने वर टोक असलेले असे, उंच वाढतात (श्रेष्ठव्रतांच्या योगाने वरवरचे जन्म त्यास प्राप्त होतात. ॥१५-१९१॥
माजीं वेदांचा पाला दाट । तो करी सुविद्येचा झडझडाट ।
जंव वाजे अचाट । सत्त्वानिळु तो ॥ १९२ ॥
जोपर्यंत सत्वगुणाचा प्रचंड वारा सुटतो, तोपर्यंत (मनुष्यरूपी शाखेच्या) मधे असलेला वेदरूपी दाट पाला विद्यांचा (ज्ञानांचा) झडझडाट (गर्जना) करतो. ॥१५-१९२॥
तेथ धर्मडाळ बाहाळी । दिसती जन्मशाखा सरळी ।
तिया आड फुटती फळीं । स्वर्गादिकीं ॥ १९३ ॥
तेव्हा धर्मरूपी शाखेच्या विस्तारात जन्माच्या सरळ वाढलेल्या फांद्या दिसतात व त्या फांद्यांना स्वर्गादिक फळाने युक्त असे अनेक आडफाटे फुटतात. ॥१५-१९३॥
पुढां उपरति रागें लोहिवी । धर्ममोक्षाची शाखा पालवी ।
पाल्हाजत नित्य नवी । वाढतीचि असे ॥ १९४ ॥
पुढे रंगाने तांबड्या असलेल्या वैराग्यरूपी शाखेस धर्म व मोक्षरूप लुसलुशित पालवी नित्य नवीन येऊन वढतच रहाते. ॥१५-१९४॥
पैं रविचंद्रादि ग्रहवर । पितृ ऋषी विद्याधर ।
हे आडशाखा प्रकार । पैसु घेती ॥ १९५ ॥
नंतर याच धर्मरूपी शाखेला सूर्य, चंद्र वगैरे श्रेष्ठ ग्रह, पितर, ऋषि, विद्याधर हे आणखी आडव्या शाखांचे प्रकार विस्तार घेतात. (अभिप्राय असा की धर्माचरणापासून श्रद्धेनुसार हे लोक प्राप्त होतात). ॥१५-१९५॥
याहीपासून उंचवडें । गुढले फळाचेनि बुडें ।
इंद्रादिक ते मांदोडे । थोर शाखांचे ॥ १९६ ॥
ह्याही फांद्यांपेक्षा वर उंच गेलेल्या इंद्रादिक मोठ्या फांद्यांचे झुबके असून त्या फांद्यांची बुडे फळांनी झाकलेली असतात. ॥१५-१९६॥
मग तयांही उपरी डाहाळिया । तपोज्ञानीं उंचावलिया ।
मरीचि कश्यपादि इया । उपरी शाखा ॥ १९७ ॥
मग त्याही डहाळ्यांवर (इंद्रादि शाखेवर) तपाने व ज्ञानाने उंच वाढलेल्या मरीचि-कश्यापादि वरल्या शाखा आहेत. ॥१५-१९७॥
एवं माळोवाळी उत्तरोत्तरु । ऊर्ध्वशाखांचा पैसारु ।
बुडीं साना अग्रीं थोरु । फळाढ्यपणें ॥ १९८ ॥
याप्रमाणे वर असलेल्या शाखांचा शाखोपशाखी अधिक अधिक होणारा हा विस्तार या फांद्यांच्या बुडाशी लहान व शेंड्यास जास्त फळे असल्यामुळे थोर असा आहे. ॥१५-१९८॥
वरी उपरिशाखाही पाठीं । येती फळभार जे किरीटी ।
ते ब्रह्मेशांत अणगटीं । कोंभ निघती ॥ १९९ ॥
अर्जुना, शिवाय या वरच्या शाखांनंतर या संसारवृक्षाला जे फळभार येतात, ते ब्रह्मदेव आणि शंकररूपी अणकुचीदार कोंब येतात. (अभिप्राय असा की ब्रह्मदेव आणि शंकर हेच फळभार आणि कोंब आहेत). कोंबही तेच व फळही तेच). ॥१५-१९९॥
फळाचेनि वोझेपणें । ऊर्ध्वीं वोवांडें दुणें ।
जंव माघौतें बैसणें । मूळींचि होय ॥ २०० ॥
हा संसारवृक्ष, मनुष्यरूपी शाखेत वरच्या भागाला इतका लवलेला आहे की ती मनुष्यरूपी शाखा (सत्कर्मांच्या) फळांच्या भाराने, मूळ जे माया, त्याला पुन्हा येऊन टेकते. ब्रह्माच्या जवळ येते. ॥१५-२००॥
प्राकृताही तरी रुखा । जें फळें दाटलीं होय शाखा ।
ते वोवांडली देखा । बुडासि ये ॥ २०१ ॥
आणि हे पहा, इतर लौकिक वृक्षाला तरी फळांनी लगडलेली जी फांदी असते ती लवली आता पुन्हा मुळाकडे येते. ॥१५-२०१॥
तैसें जेथूनि हा आघवा । संसारतरूचा उठावा ।
तियें मूळीं टेंकती पांडवा । वाढतेनि ज्ञानें ॥ २०२ ॥
त्याप्रमाणे येथून या संसारवृक्षाचा सर्व विस्तार उत्पन्न झाला आहे, अर्जुना, त्या मुळाच्या ठिकाणी वाढणार्‍या ज्ञानाच्या योगाने मनुषरूपी शाखा येऊन टेकतात. ॥१५-२०२॥
म्हणौनि ब्रह्मेशानापरौतें । वाढणें नाहीं जीवातें ।
तेथूनि मग वरौतें । ब्रह्मचि कीं ॥ २०३ ॥
म्हणून ब्रह्मदेव आणि शंकर यांच्या पलीकडे जीवांना वाढणे नाही. मग तेथून वर केवळ ब्रह्मच आहे ॥१५-२०३॥
परी हें असो ऐसें । ब्रह्मादिक ते आंगवसें ।
ऊर्ध्वमुळासरिसें । न तुकती गा ॥ २०४ ॥
परंतु हे असू दे. याप्रमाणे अर्जुना, ब्रह्मादिक या डहाळ्या या संसारवृक्षाचे वरचे मूळ जी माया, तिच्या तुलनेला येत नाहीत. ॥१५-२०४॥
आणीकही शाखा उपरता । जिया सनकादिक नामें विख्याता ।
तिया फळीं मूळीं नाडळता । भरलिया ब्रह्मीं ॥ २०५ ॥
सनकादिक नावांनी वरच्या (निवृत्ति मार्गाच्या) प्रसिद्ध शाखा आहेत, त्या या संसारवृक्षाच्या मुळात अथवा फळात न सापडता ब्रह्मस्वरूपी भरलेल्या आहेत. ॥१५-२०५॥
ऐसी मनुष्यापासूनि जाणावी । ऊर्ध्वीं ब्रह्मादिशेष पालवी ।
शाखांची वाढी बरवी । उंचावे पैं ॥ २०६ ॥
याप्रमाणे मनुष्यापासून तो थेट वरचे जे ब्रह्मादिक, ही जी (संसारवृक्षाची) शेवटची पालवी तेथपर्यंत, या संसारवृक्षाच्या फांद्यांची वाढ चांगली उंचावते हे समज. ॥१५-२०६॥
पार्था ऊर्ध्वींचिया ब्रह्मादि । मनुष्यत्वचि होय आदि ।
म्हणौनि इयें अधीं । म्हणितलीं मूळें ॥ २०७ ॥
अर्जुना वरचे जे ब्रह्मादिक लोक आहेत त्यांना मनुष्यत्वच (मनुष्यपणा) मूळ कारण आहे, म्हणून मनुष्यत्व ही खालची मुळे आहेत असे आम्ही म्हटले. ॥१५-२०७॥

न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठा ।
अश्वत्थमेनं सुविरूढमूल मसङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा ॥ ३ ॥
परंतु (वर जसे वर्णन केले) त्याप्रमाणॆ इहलोकी याचे स्वरूप उपलब्ध होत नाही. याला अंत नाही, आदिही नाही व स्थितीही नाही, अत्यंत द्ढमूल अशा या अश्वत्थवृक्षाला बळकट अशा असंगरूपी (वैराग्यजन्यज्ञानरूपी) शस्त्राने छेदून ॥१५-३॥
एवं तुज अलौकिकु । हा अधोर्ध्वशाखु ।
सांगितला भवरुखु । ऊर्ध्वमूळु ॥ २०८ ॥
याप्रमाणे खाली आणि वर शाखा असलेला व वर मूळ असलेला हा लोकोत्तर संसारवृक्ष तुला सांगितला. ॥१५-२०८॥
आणि अधींचीं हीं मूळें । उपपत्ती परिसविली सविवळें ।
आतां परिस उन्मूळें । कैसेनि हा ॥ २०९ ॥
आणि खालची ही मुळे तुला खुलाशासह स्पष्ट दाखवली. आता हा संसारवृक्ष कशा प्रकाराने उपटला जातो ते ऐक. ॥१५-२०९॥
परी तुझ्या हन पोटीं । ऐसें गमेल किरीटी ।
जे एवढें झाड उत्पाटी । ऐसें कायि असे ? ॥ २१० ॥
परंतु अर्जुना, तुझ्या मनात कदाचित असे वाटेल की या एवढ्या झाडाला उपटील असे एवढे साधन काही आहे काय ? ॥१५-२१०॥
कें ब्रह्मयाच्या शेवटवरी । ऊर्ध्व शाखांची थोरी ।
आणि मूळ तंव निराकारीं । ऊर्ध्वीं असे ॥ २११ ॥
कोठे शेवट ब्रह्मदेवापर्यंत याच्या वरच्या शाखांचा विस्तार आणि मूळ तर (कोठे) वर निराकार ब्रह्मामधे आहे. ॥१५-२११॥
हा स्थावराही तळीं । फांकत असे अधींच्या डाळीं ।
माजीं धांवतसे दुजा मूळीं । मनुष्यरूपीं ॥ २१२ ॥
हा संसारवृक्ष खालच्या फांद्यांनी शेवटी असलेल्या वृक्षादि स्थावरापर्यंत विस्तारतो व दुसर्‍या मनुष्यरूपी मुळांनी मधे विस्तारतो. ॥१५-२१२॥
ऐसा गाढा आणि अफाटु । आतां कोण करी यया शेवटु ।
तरी झणीं हा हळुवटु । धरिसी भावो ॥ २१३ ॥
असा हा संसारवृक्ष बळकट व अमर्याद आहे, तर आता याचा शेवट (उपटून टाकणे) कोण करील ? असा क्षुद्र विचार तू कदाचित मनात आणशील तर आणू नकोस. ॥१५-२१३॥
परी हा उन्मूळावया दोषें । येथ सायासचि कायिसे ।
काय बाळा बागुल देशें । दवडावा आहे ? ॥ २१४ ॥
परंतु याला उपटून टाकण्याचा हेतु जर असेल तर याला उपटून टाकण्याच्या कामी श्रमच ते काय आहेत ? (म्हणजे श्रम नाहीतच). मुलाकरता (लेकराची भीती नाहीशी व्हावी म्हणून) बागुलबुवास खरोखर देशोधडीस लावावा लागतो काय ? ॥१५-२१४॥
गंधर्वदुर्ग कायी पाडावे । काय शशविषाण मोडावें ।
होआवें मग तोडावें । खपुष्प कीं ? ॥ २१५ ॥
ढगांच्या आकृतीत दिसणारे किल्ले पाडून टाकले पाहेत काय ? सशाचे शिंग मोडून टाकले पाहिजे काय ? आकाशाचे फूल असावे आणि मग ते तोडावे का ? ॥१५-२१५॥
तैसा संसारु हा वीरा । रुख नाहीं साचोकारा ।
मा उन्मूळणीं दरारा । कायिसा तरी ? ॥ २१६ ॥
त्याप्रमाणे अर्जुना, हा संसारवृक्ष जर खरा नाही (केवळ मिथ्याभास आहे) तर मग त्याला उपटून टाकण्याची भीती तरी कसली ? ॥१५-२१६॥
आम्हीं सांगितली जे परी । मूळडाळांची उजरी ।
ते वांझेचीं घरभरी । लेकुरें जैशीं ॥ २१७ ॥
आम्ही संसारवृक्षाच्या मुळाच्या व फांद्यांच्या उत्कर्षाचा (विस्ताराचा) जो प्रकार सांगितला तो प्रकार जसे काही वांझेची घर भरून लेकरे आहेत (असेच सांगण्याच्या प्रकारापैकीच होय). ॥१५-२१७॥
काय कीजती चेइलेपणीं । स्वप्नींचीं तिये बोलणीं ।
तैशी जाण ते काहाणी । दुबळीचि ते ॥ २१८ ॥
जागे झाल्यावर मग ती स्वप्नातील बडबड काय कामाची ? त्याप्रमाणे ह्या संसारवृक्षाची गोष्ट पोकळ आहे असे समज. ॥१५-२१८॥
वांचूनि आम्हीं निरूपिलें जैसें । ययाचे अचळ मूळ असे तैसें ।
आणि तैसाचि जरी हा असे । साचोकारा ॥ २१९ ॥
याशिवाय आम्ही ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे याचे मूळ जर दृढ असते आणि हा संसारवृक्ष जर आम्ही सांगितल्याप्रमाणेच (स्वरूपे करून) खरा असता ॥१५-२१९॥
तरी कोणाचेनि संतानें । निपजती तया उन्मूळणें ।
काय फुंकिलिया गगनें । जाइजेल गा ॥ २२० ॥
तर कोणता असा मायेचा पूत आहे की ज्याच्या सामर्थ्याने याची पाळेमुळे खणून काढण्याचे काम घडून येईल ? अर्जुना, नुसत्या फुंकण्याने हे (एवढे) आकाश उडून जाईल काय ? ॥१५-२२०॥
म्हणौनि पैं धनंजया । आम्हीं वानिलें रूप तें माया ।
कासवीचेनि तुपें राया । वोगरिलें जैसें ॥ २२१ ॥
म्हणून अर्जुना, आम्ही जे या संसारवृक्षाचे वर्णन केले ते खोटे आहे. (कसे तर) जशी राजाला कासवीच्या तुपाने मेजवानी करावी तसे. ॥१५-२२१॥
मृगजळाचीं गा तळीं । तिये दिठी दुरूनि न्याहाळीं ।
वांचूनि तेणें पाणियें साळी केळी । लाविसी काई ? ॥ २२२ ॥
बा अर्जुना मृगजळाची तळी आहेत ती दृष्टीने दुरूनच पहा, याशिवाय त्या मृगजळाच्या पाण्याने भात व केळी लावता येतील काय ? ॥१५-२२२॥
मूळ अज्ञानचि तंव लटिकें । मा तयाचें कार्य हें केतुकें ।
म्हणौनि संसाररुख सत्यकें । वावोचि गा ॥ २२३ ॥
बा अर्जुना, या संसारवृक्षाचे मूळ जे अज्ञान तेच आधी खोटे आहे, तर मग त्याचे कार्य ते केवढे ? (काय किंमतीचे असणार ?) म्हणून संसारवृक्ष खरा कोठून असणार ? तर तो मिथ्याच आहे. ॥१५-२२३॥
आणि अंतु यया नाहीं । ऐसें बोलिजे जें कांहीं ।
तेंही साचचि पाहीं । येकें परी ॥ २२४ ॥
आणि या संसारवृक्षाला अंत नाही असे जे म्हणतात तेही एक प्रकाराने खरे आहे असे समज. ॥१५-२२४॥
तरी प्रबोधि जंव नोहे । तंव निद्रे काय अंतु आहे ? ।
कीं रात्री न सरे तंव न पाहे । तया आरौतें ? ॥ २२५ ॥
तर जोपर्यंत जाग येत नाही तोपर्यंत झोपेला अंत आहे काय ? अथवा रात्र सरली नाही तोपर्यंत त्याच्या आधी उजाडत नाही. ॥१५-२२५॥
तैसा जंव पार्था । विवेकु नुधवी माथा ।
तंव अंतु नाहीं अश्वत्था । भवरूपा या ॥ २२६ ॥
त्याप्रमाणे अर्जुना, जोपर्यंत विचाराने डोके वर काढले नाही तोपर्यंत या संसाररूपी वृक्षाला अंत नाही. ॥१५-२२६॥
वाजतें वारें निवांत । जंव न राहे जेथिंचें तेथ ।
तंव तरंगतां अनंत । म्हणावीचि कीं ॥ २२७ ॥
जोपर्यंत वहाणारा वारा जागच्या जागी शांत रहात नाही, तोपर्यंत लाटपणा अनंतच म्हटला पाहिजे. ॥१५-२२७॥
म्हणौनि सूर्यु जैं हारपे । तैं मृगजळाभासु लोपे ।
कां प्रभा जाय दीपें । मालवलेनि ॥ २२८ ॥
येवढ्याकरता सूर्य जेव्हा मावळतो, तेव्हा मृगजळ भासण्याचे नाहीसे होते अथवा दिवा मालवल्याने दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो ॥१५-२२८॥
तैसें मूळ अविद्या खाये । तें ज्ञान जैं उभें होये ।
तैंचि यया अंतु आहे । एर्‍हवीं नाहीं ॥ २२९ ॥
त्याप्रमाणे संसारवृक्षास मूळ असलेल्या अविद्येला खाऊन टाकणारे (नाहीसे करणारे) ज्ञान उठाव करेल तेव्हाच या संसार-वृक्षाला शेवट आहे, एरवी नाही. ॥१५-२२९॥
तेवींचि हा अनादी । ऐसी ही आथी शाब्दी ।
तो आळु नोहे अनुरोधी । बोलातें या ॥ २३० ॥
त्याप्रमाणे हा संसारवृक्ष अनादि, (आरंभरहित) आहे असे जे म्हणतात ते म्हणणे या संसारवृक्षावर आरोप नाही तर एका दृष्टीने ते म्हणणे या संसारवृक्षाच्या अनादित्वास अनुसरून आहे. ॥१५-२३०॥
जें संसारवृक्षाच्या ठायीं । साचोकार तंव नाहीं ।
मा नाहीं तया आदि काई । कोण होईल ? ॥ २३१ ॥
कारण की संसारवृक्ष तर स्वरूपाने खरा नाही. तर मग जो (स्वरूपाने खरा) नाही त्याला कोणी आरंभ असेल काय ? ॥१५-२३१॥
जो साच जेथूनि उपजे । तयातें आदि हें साजे ।
आतां नाहींचि तो म्हणिजे । कोठूनियां ? ॥ २३२ ॥
जो खरोखर जेथून (कोठून तरी) उत्पन्न होतो त्याला आरंभ आहे हे म्हणणे शोभते. आता जो स्वरूपेकरून नाहीच, त्य़ाचा आरंभ कोठून म्हणावयाचा ? ॥१५-२३२॥
म्हणौनि जन्मे ना आहे । ऐसिया सांगों कवण माये ।
यालागीं नाहींपणेंचि होये । अनादि हा ॥ २३३ ॥
म्हणून जो उत्पन्न होत नाही व ज्याला अस्तित्व नाही, तशाला कोण आई आहे म्हणून सांगू ? (अर्थात त्याचा आरंभ काय सांगावयाचा ?) ॥१५-२३३॥
वांझेचिया लेंका । कैंची जन्मपत्रिका ।
नभीं निळी भूमिका । कें कल्पूं पां ॥ २३४ ॥
वांझेच्या मुलाला जन्मपत्रिका कोठची ? आकाशात निळी जमीन कोठे कल्पावयाची ? ॥१५-२३४॥
व्योमकुसुमांचा पांडवा । कवणें देंठु तोडावा ।
म्हणौनि नाहीं ऐसिया भवा । आदि कैंची ? ॥ २३५ ॥
अर्जुना आकाशाच्या फुलाचा देठ कोणी तोडवा ? म्हणून स्वरूपेकरून जो नाही, अशा संसाराला आरंभ कसला ? ॥१५-२३५॥
जैसें घटाचें नाहींपण । असतचि असे केलेनिवीण ।
तैसा समूळ वृक्षु जाण । अनादि हा ॥ २३६ ॥
ज्याप्रमाणे घटाचा नाहीपणा (प्रागभाव) हा कोणी उत्पन्न केल्याशिवाय आहेच आहे, त्याप्रमाणे हा संपूर्ण संसारवृक्ष अनादि आहे असे समज. ॥१५-२३६॥
अर्जुना ऐसेनि पाहीं । आद्यंतु ययासि नाहीं ।
माजीं स्थिती आभासे कांहीं । परी टवाळ ते ॥ २३७ ॥
अर्जुना याप्रमाणे पहा की या संसारवृक्षाला आदि व अंत नाही, मध्ये स्थितिकाली तो काही भासत आसतो पण ते त्याचे भासणे मिथ्या आहे. ॥१५-२३७॥
ब्रह्मगिरीहूनि न निगे । आणि समुद्रींही कीर न रिगे ।
माजीं दिसे वाउगें । मृगांबु जैसें ॥ २३८ ॥
ज्याप्रमाणे ब्रह्मगिरी पर्वतापासून निघत नाही आणि शेवटी खरोखर समुद्रासही मिळत नाही तरी मध्येच मृगजळ दिसते ॥१५-२३८॥
तैसा आद्यंती कीर नाहीं । आणि साचही नोहे कहीं ।
परी लटिकेपणाची नवाई । पडिभासे गा ॥ २३९ ॥
त्याप्रमाणे हे अर्जुना, संसारवृक्ष आरंभी व अंती खरोखर नाही आणि तो कधीही खरा नाही. परंतु खोटेपणाचे नवल असे आहे की तो नसून भासतो. ॥१५-२३९॥
नाना रंगीं गजबजे । जैसें इंद्रधनुष्य देखिजे ।
तैसा नेणतया आपजे । आहे ऐसा ॥ २४० ॥
ज्याप्रमाणे अनेक रंगांनी भरलेले इंद्रधनुष्य दिसते, त्याप्रमाणे अज्ञान्याला हा संसारवृक्ष आहे असे भासते. ॥१५-२४०॥
ऐसेनि स्थितीचिये वेळे । भुलवी अज्ञानाचे डोळे ।
लाघवी हरी मेखळे । लोकु जैसा ॥ २४१ ॥
अशा रीतीने स्थितिकाली हा संसारवृक्ष अज्ञानी मनुष्याच्या दृष्टीला चकवतो. तो कसा तर जसा बहुरूपी हा कफनी धारण करून (साधूची सोंगे आणून) लोकांना फसवतो तसा. ॥१५-२४१॥
आणि नसतीचि श्यामिका । व्योमीं दिसे तैसी दिसो कां ।
तरी दिसणेंही क्षणा एका । होय जाय ॥ २४२ ॥
आणि नसलेलाच निळेपणा आकाशात दिसतो, तसा दिसेना का ? तरी ते दिसणेही एका क्षणात होते व जाते. ॥१५-२४२॥
स्वप्नींही मानिलें लटिकें । तरी निर्वाहो कां एकसारिखें ।
तेवीं आभासु हा क्षणिकें । रिताचि गा ॥ २४३ ॥
स्वाप्नातील खोटे पदार्थ वस्तुत: नाहीत, तरी पण ते खरे आहेत असे जरी मानले तरी एकसारखे टिकतात का ? तर टिकत नाहीत. (ते जसे क्षणिक भासणारे आहेत) तशा क्षणिक भासणार्‍या पद्धतीचा हा संसारवृक्षाचा आभास आहे. ॥१५-२४३॥
देखतां आहे आवडें । घेऊं जाइजे तरी नातुडे ।
जैसा टिकु कीजे माकडें । जळामाजीं ॥ २४४ ॥
आपले पाण्यात दिसणारे प्रतिबिंब धरण्याकरता माकडाने ज्याप्रमाणे बोट घालावे, (तरी पण ते प्रतिबिंब त्यास सापडत नाही) त्याप्रमाणे हा संसारवृक्षाचा भास पाहिला असता आहे असा वाटतो आणि त्यास धरावयास गेले तर (म्हणजे विचाराने त्याचे अस्तित्व पाहू गेले तर) तो सापडत नाही. ॥१५-२४४॥
तरंगभंगु सांडीं पडे । विजूही न पुरे होडे ।
आभासासि तेणें पाडें । होणें जाणें गा ॥ २४५ ॥
बा अर्जुना, लाटांचे होणे व जाणे (ह्या संसारभासाच्या होण्या-जाण्याच्या उपमेला) कमी पडते. (विजेचा उदयास्त जरी अति त्वरित असतो तरी वीज देखील याच्या बरोबरीला येत नाही, तितक्या मानाने (त्वरेने) संसारभासाचे होणे-जाणे आहे. ॥१५-२४५॥
जैसा ग्रीष्मशेषींचा वारा । नेणिजे समोर कीं पाठीमोरा ।
तैसी स्थिती नाहीं तरुवरा । भवरूपा यया ॥ २४६ ॥
ज्याप्रमाणे ग्रीष्मांतीचा वारा हा समोरून वाहतो की पाठीमागून वहातो हे कळत नाही (त्याची स्थिती जशी एकच नसते) त्याप्रमाणे या संसाररूपी श्रेष्ठ वृक्षाला स्थितिकाली एकच अवस्था नाही, म्हणजे प्रत्येक क्षणी त्याचे स्थित्यंतर होते. (म्हणजे संसाराला स्थितीही नाही). ॥१५-२४६॥
एवं आदि ना अंतु स्थिती । ना रूप ययासि आथी ।
आतां कायसी कुंथाकुंथी । उन्मूळणी गा ॥ २४७ ॥
याप्रमाणे संसारवृक्षाला आदि, अंत व स्थिति ही नाहीत व याला रूपही नाही. आता असे जर आहे तर हे अर्जुना, याला उपटून टाकण्यात श्रम ते काय ? ॥१५-२४७॥
आपुलिया अज्ञानासाठीं । नव्हता थांवला किरीटी ।
तरी आतां आत्माज्ञानाच्या लोटीं । खांडेनि गा ॥ २४८ ॥
अर्जुना हा नसलेला वृक्ष (केवळ) आपल्या अज्ञानामुळे बळावला आहे. तर आता त्याला आत्मज्ञानरूपी दुधारी तलवारीने नाहीसा कर. ॥१५-२४८॥
वांचूणि ज्ञानेवीण ऐकें । उपाय करिसी जितुके ।
तिहीं गुंफसि अधिकें । रुखीं इये ॥ २४९ ॥
याशिवाय एका ज्ञानावाचून त्याच्या नशाकरता जितके उपाय तू करशील त्यांच्या त्या उपायांच्या योगाने तू या संसारवृक्षात अधिक अडकशील. ॥१५-२४९॥
मग किती खांदोखांदीं । यया हिंडावें ऊर्ध्वीं अधीं ।
म्हणौनि मूळचि अज्ञान छेदीं । सम्यक् ज्ञानें ॥ २५० ॥
मग या संसारवृक्षाच्या फांद्या-फांद्यांनी खाली व वर किती फिरावे ? त्या फिरण्याला अंतच नाही. म्हणून या संसारवृक्षाचे अज्ञानरूपी मूळच यथार्थज्ञानाने तोडून टाक. ॥१५-२५०॥
एर्‍हवीं दोरीचिया उरगा । डांगा मेळवितां पैं गा ।
तो शिणुचि वाउगा । केला होय ॥ २५१ ॥
सहज विचार करून पाहिले तर दोरीवर भासणार्‍या सर्पाला मारण्याकरता लांब लांब काठ्या गोळा केल्या असता त्या काठ्यांचे ओझे उगीच गोळा केल्यासारखे होते. ॥१५-२५१॥
तरावया मृगजळाची गंगा । डोणीलागीं धांवतां दांगा- ।
माजीं वोहळें बुडिजे पैं गा । साच जेवीं ॥ २५२ ॥
मृगजळाची नदी उतरून जाण्याकरता नावेसाठी (होडी) रानोमाळ धावावयास लागले तर त्याने खर्‍या ओढ्यात सापडून बुडावे, ॥१५-२५२॥
तेवीं नाथिलिया संसारा । उपाईं जाचतया वीरा ।
आपणपें लोपे वारा । विकोपीं जाय ॥ २५३ ॥
अर्जुना, त्याप्रमाणे खोट्या संसाराचा नाश करण्याच्या उपायांमधे खटपट करणाराला साधनांचे जिवापाड श्रम होऊन तो खटपट करणारा आपण स्वत: मरतो. ॥१५-२५३॥
म्हणौनि स्वप्नींचिया घाया । ओखद चेवोचि धनंजया ।
तेवीं अज्ञानमूळा यया । ज्ञानचि खड्ग ॥ २५४ ॥
म्हणून अर्जुना, स्वप्नातील भीतीला जागे होणे हेच औषध आहे, त्याप्रमाणे अज्ञानरूपी मूळ असलेल्या याला नाश करण्यास समर्थ एक ज्ञानखड्गच आहे. ॥१५-२५४॥
परी तेचि लीला परजवे । तैसें वैराग्याचें नवें ।
अभंगबळ होआवें । बुद्धीसी गा ॥ २५५ ॥
परंतु अरे तेच ज्ञानरूपी खड्ग सहज फिरवता येईल, तसे वैराग्याचे न खचणारे सामर्थ्य बुद्धीला नित्य नवे पाहिजे. ॥१५-२५५॥
उठलेनि वैराग्यें जेणें । हा त्रिवर्गु ऐसा सांडणें ।
जैसें वमुनियां सुणें । आतांचि गेलें ॥ २५६ ॥
ज्या वैराग्याचा उठाव झाला असता ह्या त्रिवर्गाचा (स्वर्ग, मृत्यु व पाताळाचा) असा त्याग होतो की जसे काही कुत्रे आताच ओकून गेले आहे. ॥१५-२५६॥
हा ठायवरी पांडवा । पदार्थजातीं आघवा ।
विटवी तो होआवा । वैराग्य लाठु ॥ २५७ ॥
अर्जुना, येथपर्यंत सर्व पदार्थमात्रसंबंधाने वीट उत्पन्न करील असे हे दांडगे वैराग्य पाहिजे. ॥१५-२५७॥
मग देहाहंतेचें दळें । सांडूनि एकेचि वेळे ।
प्रत्यक्‌बुद्धी करतळें । हातवसावें ॥ २५८ ॥
मग त्या ज्ञानखड्गावरील देहाभिमानरूपी म्यान एकदम काढून अंतर्मुख झालेल्या बुद्धिरूपी मुठीत ते धरावे ॥१५-२५८॥
निसळें विवेकसाहणें । जें ब्रह्माहमस्मिबोधें सणाणें ।
मग पुरतेनि बोधें उटणें । एकलेचि ॥ २५९ ॥
ते ज्ञानरूपी खड्ग विवेकरूपी सहाणेवर पाजळलेले असावे व ‘अहं ब्रह्मास्मि’ (मी ब्रह्म आहे’ अशा बोधाची त्यास सणसणीत (तीक्ष्ण) धार असावी व मग ते एकट्या पूर्णबोधाने घासावे. ॥१५-२५९॥
परी निश्चयाचें मुष्टिबळ । पाहावें एकदोनी वेळ ।
मग तुळावें अति चोखाळ । मननवरी ॥ २६० ॥
परंतु (मी ब्रह्म आहे अशा) निश्चयरूपी मुठीचे बळ एकदोन वेळ पहावे (आणि मी ब्रह्म आहे असा दृढ निश्चय झाला आहे असे वाटले की मग ते अति शुद्ध मननापर्यंत तोलून धरावे (म्हणजे अद्वैतबोधाचे अति शुद्ध असे चिंतन करावे. ॥१५-२६०॥
पाठीं हतियेरां आपणयां । निदिध्यासें एक जालिया ।
पुढें दुजें नुरेल घाया- । पुरतें गा ॥ २६१ ॥
नंतर (ज्ञानरूपी) हत्यार व आपण निजध्यासाने एक झाल्यावर (आपण ज्ञानरूप झाल्यावर) अर्जुना, आपल्यापुढे घाव मारण्यापुरते दुसरे (हत्यार) उरणार नाही. ॥१५-२६१॥
तें आत्मज्ञानाचें खांडें । अद्वैतप्रभेचेनि वाडें ।
नेदील उरों कवणेकडे । भववृक्षासी ॥ २६२ ॥
ती आत्मज्ञानरूपी दुधारी तलवार आपल्या अद्वैतप्रकाशाच्या आधिक्याने संसारवृक्षाला कोणीकडेही उरू देणार नाही. ॥१५-२६२॥
शरदागमींचा वारा । जैसा केरु फेडी अंबरा ।
का उदयला रवी आंधारा । घोंटु भरी ॥ २६३ ॥
शरद् ऋतूच्या आरंभीचा वारा जसा आकाशातील ढगरूपी कचरा नाहीसा करतो अथवा उगवलेला सूर्य जसा अंधाराचा घोट भरतो, ॥१५-२६३॥
नाना उपवढ होतां खेंवो । नुरे स्वप्नसंभ्रमाचा ठावो ।
स्वप्नप्रतीतिधारेचा वाहो । करील तैसें ॥ २६४ ॥
अथवा जागे होताक्षणीच स्वप्नांच्या गर्दीचा ठावठिकाणा उरत नाही. त्याप्रमाणे आत्मानुभवरूपी धारेचा प्रहार करील (म्हणजे संसारवृक्षाचा ठावठिकाणा उरू देणार नाही). ॥१५-२६४॥
तेव्हां ऊर्ध्वींचें मूळ । कां अधींचें हन शाखाजाळ ।
तें कांहींचि न दिसे मृगजळ । चांदिणां जेवीं ॥ २६५ ॥
तेव्हा या संसारवृक्षाचा वरचा भाग अथवा वरचे मूळ अथवा शाखांचा खालचा विस्तार हे जसे चांदण्यात मृगजळ दिसणार नाही तसे काही एक दिसणार नाही. ॥१५-२६५॥
ऐसेनि गा वीरनाथा । आत्मज्ञानाचिया खड्गलता ।
छेदुनिया भवाश्वत्था । ऊर्ध्वमूळातें ॥ २६६ ॥
अर्जुना, अशा रीतीने आत्मज्ञानरूपी तरवारीच्या पात्याने वर मूळ आहे असा जो संसारवृक्ष, तो छेदून (म्हणजे आत्माविचाराने त्याचा निरास करून) ॥१५-२६६॥
मग इदंतेसि वाळलें । जें मीपणेंवीण डाहारलें ।
तें रूप पाहिजे आपलें । आपणचि ॥ २६७ ॥
(वर सांगितल्याप्रमाणे आत्मविचाराने देहादि अनात्मतत्वरूप प्रपंचाचा निरास झाल्यावर) मग आपल्याहून जे भिन्न प्रतीत होते, त्यासंबंधाने इदंभाव (हे ते पणा) स्फुरतो त्याचा ज्या वस्तूच्या ठिकाणी किंचितही संबंध नसतो व (इदंच्या सापेक्ष आपल्यासंबंधाने अहंभाव (मीपणा) असतो. आत्मस्वरूप एकरस असल्याकारणाने तेथे भिन्न प्रतीती नाही, म्हणून तेथे इदं स्फुरण नाही आणि इदं स्फुरण नाही म्हणून) अहंस्फुरणही जेथे नसते असे जे अहं-इदं-वृत्तिशून्य, प्रसिद्ध असलेले आत्मस्वरूप, ते आपले स्वरूप आपणच पहावे. ॥१५-२६७॥
परी दर्पणाचेनि आधारें । एकचि करून दुसरें ।
मुख पाहाती गव्हारें । तैसें नको हो ॥ २६८ ॥
परंतु आरशाच्या आधाराने (समोर आरसा घेऊन) जसे अज्ञानी लोक एका मुखाची दोन मुखे करून (म्हणजे बिंब व प्रतिबिंब अशा तर्‍हेने) आपणच आपल्याला पहातात. तसे हे आत्मस्वरूपाला (दृश्य-द्रष्टा करून) पहाणे नको. ॥१५-२६८॥
हें पाहाणें ऐसें असे वीरा । जैसा न बोडलिया विहिरा ।
मग आपलिया उगमीं झरा । भरोनि ठाके ॥ २६९ ॥
अर्जुना, हे आपल्या आत्मस्वरूपाचे पाहणे असे आहे की विहीर उकरण्याच्या पूर्वी झरा जसा आपल्या उगमाच्या ठिकाणी (पाण्याने) भरलेला असतोच, (तो जरी दृश्य झाला नाही तरी तो आपल्या स्वरूपाने आहेच). ॥१५-२६९॥
नातरी आटलिया अंभ । निजबिंबीं प्रतिबिंब ।
निहटे कां नभीं नभ । घटाभावीं ॥ २७० ॥
अथवा पाणी आटाल्यावर प्रतिबिंब जसे आपल्या बिंबाच्या ठिकाणी मिळते, अथवा घट फुटल्यावर जसे घटाकाश महाकाशाच्या ठिकाणी मिळते, ॥१५-२७०॥
नाना इंधनांशु सरलेया । वन्हि परते जेवीं आपणपयां ।
तैसें आपेंआप धनंजया । न्याहाळणें जें गा ॥ २७१ ॥
अथवा अग्नीतील जळणारी लाकडे नि:शेष संपल्यावर अग्नि जसा मूळ स्वरूपात येऊन मिळातो, त्याचप्रमाणे अर्जुना, जे आपण आपल्याला सहज पहाणे आहे ॥१५-२७१॥
जिव्हे आपली चवी चाखणें । चक्षू निज बुबुळ देखणें ।
आहे तया ऐसें निरीक्षणें । आपुलें पैं ॥ २७२ ॥
जिभेने जशी आपलीच चव चाखावी, अथवा डोळ्याने जसे आपले बुबुळ पहावे, त्याप्रमाणे आपण आपल्याला पहाणे आहे. ॥१५-२७२॥
कां प्रभेसि प्रभा मिळे । गगन गगनावरी लोळे ।
नाना पाणी भरलें खोळे । पाणियाचिये ॥ २७३ ॥
अथवा तेज तेजात मिसळावे, अथवा आकाशाने आकाशावर लोळावे, किंवा पाणी जसे पाण्याच्याच पदरात भरावे ॥१५-२७३॥
आपणचि आपणयातें । पाहिजे जें अद्वैतें ।
तें ऐसें होय निरुतें । बोलिजतु असे ॥ २७४ ॥
आपणच आपल्याला द्वैतभावाने जे पहावयाचे ते असे (वर सांगितल्याप्रमाणे) आहे हे मी खरे सांगतो. ॥१५-२७४॥

ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः ।
तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी ॥ ४ ॥
नंतर त्या (आपल्या) रूपास पहावे, की ज्या ठिकाणी गेले असता (मुमुक्षु) पुन्हा परत येत नाहीत, ज्यापासून ही (विश्व) परंपरा वाढली, अशा त्या आद्य पुरुषास (आत्मस्वरूपास ज्ञानाच्या अंगाने) शरण जावे. ॥१५-४॥
जें पाहिजतेनवीण पाहिजे । कांहीं नेणणाचि जाणिजे ।
आद्यपुरुष कां म्हणिजे । जया ठायातें ॥ २७५ ॥
जे आत्मस्वरूप पहाणेपणा घेतल्याशिवाय पहावे, (दृश्यसापेक्ष द्रष्ट्याची कल्पना टाकून पहावे), काही न जाणणे, हेच त्याचे जाणणे होय व ज्या ठिकाणाला (ज्या आत्मस्वरूपाला) आद्य (आरंभीचा) पुरुष असे म्हणतात. ॥१५-२७५॥
तेथही उपाधीचा वोथंबा । घेऊनि श्रुति उभविती जिभा ।
मग नामरूपाचा वडंबा । करिती वायां ॥ २७६ ॥
त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी देखील माया-उपाधीचा आश्रय घेऊन वेस आत्मस्वरूपाचे वर्णन करण्यास तयार होतात आणि मग त्या ठिकाणी नामरूपाचा व्यर्थ्य गलबला करतात. ॥१५-२७६॥
पैं भवस्वर्गा उबगले । मुमुक्षु योगज्ञाना वळघले ।
पुढती न यों इया निगाले । पैजा जेथ ॥ २७७ ॥
संसार व स्वर्ग यांना कंटाळलेले व योग (अष्टांग योग) व ज्ञान यांचा आश्रय घेतलेले मुमुक्षु लोक पुन्हा स्वर्ग व संसार यांच्याकडे येणार नाही, अशा प्रतिज्ञेने ज्या आत्मस्वरूपाकडे जाण्य़ास निघाले ॥१५-२७७॥
संसाराचिया पायां पुढां । पळती वीतराग होडा ।
ओलांडोनि ब्रह्मपदाचा कर्मकडा । घालिती मागां ॥ २७८ ॥
ते वैराग्यशील पुरुष (संसार त्यांचा पाठलाग करीत असतांना) त्या संसाराच्या पायापुढे प्रतिज्ञेने पळतात व कर्माचा शेवट जे ब्रह्मपद (सत्यलोक) हाच कोणी कडा त्या कड्याचे उल्लंघन करून त्यास मागे टाकतात, ॥१५-२७८॥
अहंतादिभावां आपुलियां । झाडा देऊनि आघवेया ।
पत्र घेती ज्ञानिये जया । मूळघरासी ॥ २७९ ॥
आपल्या अहंकारादि सर्व अनात्मवृत्तींचा झाडा देऊन ज्या मूळच्या आत्मस्वरूपी घरास जाण्याकरता ज्ञानी लोक दाखला घेतात. ॥१५-२७९॥
पैं जेथुनी हे एवढी । विश्वपरंपरेची वेलांडी ।
वाढती आशा जैशी कोरडी । निदैवाची ॥ २८० ॥
ज्या वस्तूच्या अज्ञानाने, जगाचे विपरीत असलेले जबरदस्त मिथ्या ज्ञान उत्पन्न केले आणि ज्या वस्तूच्या अज्ञानाने नसलेले मीतूपण जगात प्रचारात आणले. ॥१५-२८०॥
जिये कां वस्तूचें नेणणें । आणिलें थोर जगा जाणणें ।
नाहीं तें नांदविलें जेणें । मी तूं जगीं ॥ २८१ ॥
ज्याप्रमाणे निर्दैवी पुरुषाची पोकळ आशा वाढत असते, त्याप्रमाणे ज्या स्वरूपापासून विश्वपरंपरेच्या विस्ताराची एवढी वाढ होते. ॥१५-२८१॥
पार्था तें वस्तु पहिलें । आपणपें आपुलें ।
पाहिजे जैसें हिंवलें । हिंव हिंवें ॥ २८२ ॥
अर्जुना, ती आपली पहिली वस्तु (आपले मूळ आत्मस्वरूप) आपण आपल्याच ठिकाणी पहावी. ती कशी तर जसे थंडीने थंडी व्हावी, त्याप्रमाणे (अभिप्राय असा की या हिंवाच्या (थंडीच्या दृष्टांतात त्रिपुटी जशी एक आहे असे समजणे, हेच आपण आपल्या मूळ स्वरूपाला पहाणे होय). ॥१५-२८२॥
आणीकही एक तया । वोळखण असे धनंजया ।
तरी जया कां भेटलिया । येणेंचि नाहीं ॥ २८३ ॥
अर्जुना, त्याला (आत्मवस्तूला) ओळखण्याची आणखी एक खूण आहे, ती ही की ज्याच्याशी ऐक्य झाले असता पुनर्जन्मच प्राप्त होत नाही. ॥१५-२८३॥
परी तया भेटती ऐसें । जे ज्ञानें सर्वत्र सरिसे ।
महाप्रळयांबूचे जैसें । भरलेपण ॥ २८४ ॥
परंतु महाप्रळयकाळच्या पाण्याने जसे सर्वत्र सारखे भरलेपण असते, तसे ज्ञानाने ज्यांचा आत्मभाव सर्वत्र सारखा पसरलेला असतो. असे जे पुरुष ते त्या आत्मवस्तूला भेटतात. ॥१५-२८४॥
निर्मानमोहा जितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः ।
द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत् ॥ ५ ॥
मोहमानरहित, संगरूपी दोष जिंकलेले आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्यांची नित्य स्थिती आहे असे सर्व काम पूर्णपणे निवृत्त झालेले, सुख व दु:खनामक द्वंद्वापासून मुक्त झालेले असे ज्ञानी ते अच्युत पद पावतात ॥१५-५॥
जया पुरुषांचें कां मन । सांडोनि गेलें मोह मान ।
वर्षांतीं जैसें घन । आकाशातें ॥ २८५ ॥
वर्षा ऋतूच्या शेवटी ढग आकाशाला टाकून जातात, त्याप्रमाणे ज्या पुरुषांच्या मनाला मोह व मान आपण स्वत: टाकून गेले ॥१५-२८५॥
निकवड्या निष्ठुरा । उबगिजे जेवीं सोयरा ।
तैसें नागवती विकारां । वेटाळूं जे ॥ २८६ ॥
ज्याप्रमाणे दरिद्री व निर्दय अशा पुरुषाला त्याचे नातलग कंटाळतात, त्याप्रमाणे जे पुरुष विकारांच्या तावडीत सापडत नाहीत. ॥१५-२८६॥
फळली केळी उन्मूळे । तैसी आत्मलाभें प्रबळे ।
तयाची क्रिया ढाळेंढाळें । गळती आहे ॥ २८७ ॥
ज्याप्रमाणे फळे आलेले केळीचे झाड आपोआप उपटून पडते, त्याप्रमाणे प्रबल आत्मलाभामुळे (आत्मानुभावामुळे ज्यांची प्रतिक्रिया हळू हळू (आपोआप) सुटत आहे ॥१५-२८७॥
आगी लगलिया रुखीं । देखोनि सैरा पळती पक्षी ।
तैसें सांडिलें अशेखीं । विकल्पीं जे ॥ २८८ ॥
ज्याप्रमाणे वृक्षाला आग लागली असे पाहून (त्या वृक्षावर असलेले पक्षी) जिकडे रस्ता सापडेल तिकडे पळतात, त्याप्रमाणे सर्व विकल्पांनी ज्या पुरुषास टाकले ॥१५-२८८॥
आइकें सकळ दोषतृणीं । अंकुरिजती जिये मेदिनी ।
तिये भेदबुद्धीची काहाणी । नाहीं जयातें ॥ २८९ ॥
अर्जुना, ऐक. ज्या भेदरूपी जमिनीवर सर्व प्रकारचे दोषरूपी गवत वाढते, त्या भेदबुद्धीची ज्यांच्या ठिकाणी वार्ताही नसते. ॥१५-२८९॥
सूर्योदयासरिसी । रात्री पळोनि जाय अपैसी ।
गेली देहाहंता तैसी । अविद्येसवें ॥ २९० ॥
सूर्योदयाबरोबर ज्याप्रमाणे रात्र आपोआप पळून जाते, त्याप्रमाणे ज्या पुरुषापासून अविद्येसह देहाहंता पळून गेली ॥१५-२९०॥
पैं आयुष्यहीना जीवातें । शरीर सांडी जेवीं अवचितें ।
तेवीं निदसुरें द्वैतें । सांडिले जे ॥ २९१ ॥
ज्याप्रमाणे आयुष्य नसलेल्या जीवाला शरीर एकदम टाकून देते, त्याप्रमाणे जे पुरुष अज्ञानात्मक द्वैताकडून टाकले गेलेले आहेत ॥१५-२९१॥
लोहाचें सांकडें परिसा । न जोडे अंधारु रवि जैसा ।
द्वैतबुद्धीचा तैसा । सदा दुकाळ जया ॥ २९२ ॥
ज्याप्रमाणे परिसाला लोखंडाचा दुष्काळ असतो अथवा ज्याप्रमाणे सूर्याला काळोख माहीत नाही, त्याप्रमाणे ज्या पुरुषांना द्वैतबुद्धीचा नेहेमी दुष्काळ असतो ॥१५-२९२॥
अगा सुखदुःखाकारें । द्वंद्वें देहीं जियें गोचरें ।
तियें जयां कां समोरें । होतीचिना ॥ २९३ ॥
अरे अर्जुना, सुखदु:खरूपी द्वंद्वे, जी या देहात अनुभवास येतात, ती ज्या पुरुषांच्या समोर येतच नाहीत. ॥१५-२९३॥
स्वप्नींचें राज्य कां मरण । नोहे हर्षशोकांसि कारण ।
उपवढलिया जाण । जियापरी ॥ २९४ ॥
ज्याप्रमाणे जागे झाले असता स्वप्नातील राज्यप्राप्ती अथवा मरण ही आनंदास वा दु:खास कारण होत नाहीत असे समज. ॥१५-२९४॥
तैसें सुखदुःखरूपीं । द्वंद्वीं जे पुण्यपापीं ।
न घेपिजती सर्पीं । गरुड जैसें ॥ २९५ ॥
सर्पाकडून गरुड जसा धरला जात नाही त्याप्रमाणे सुखदु:ख व पुण्यपापरूपी द्वंद्वाकडून जे वेढले जात नाहीत ॥१५-२९५॥
आणि अनात्मवर्गनीर । सांडूनि आत्मरसाचें क्षीर ।
चरताति जे सविचार । राजहंसु ॥ २९६ ॥
आणि जे ज्ञानीपुरुषरूपी राजहंस अनात्म पदार्थमात्ररूपी पाणी टाकून आत्मरसरूपी दूध सेवन करतात. ॥१५-२९६॥
जैसा वर्षोनि भूतळीं । आपला रसु अंशुमाळी ।
मागौता आणी रश्मिजाळीं । बिंबासीचि ॥ २९७ ॥
ज्याप्रमाणे सूर्य हा, आपलाच रस पृथ्वीवर वर्षून पुन्हा तोच रस आपल्या किरणसमुदायाच्या द्वारे (आकर्षून) आपल्या बिंबाच्या ठिकाणीच आणतो ॥१५-२९७॥
तैसें आत्मभ्रांतीसाठीं । वस्तु विखुरली बारावाटीं ।
ते एकवटिती ज्ञानदृष्टी । अखंड जे ॥ २९८ ॥
त्याप्रमाणे जो आत्मभाव खर्‍या स्वरूपाच्या भ्रांतिमुळे देहादी अनेक अनात्म वस्तूंच्या ठिकाणी पसरलेला आहे, तो आत्मभाव जे सत्पुरुष (पुन्हा) आपल्या ज्ञानदृष्टीच्या द्वारा नेहेमी आपल्याच ठिकाणी एकत्र पहातात. (एकत्वाने पहातात). ॥१५-२९८॥
किंबहुना आत्मयाचा । निर्धारीं विवेकु जयांचा ।
बुडाला वोघु गंगेचा । सिंधूमाजीं जैसा ॥ २९९ ॥
फार काय सांगावे ! गंगेचा ओघ जसा समुद्रात बुडतो, (म्हणजे तद्रूप होतो) तसा त्या सत्पुरुषांचा विवेक आत्म्याच्या निश्चयामधे तद्रूप होतो. ॥१५-२९९॥
पैं आघवेंचि आपुलेंपणें । नुरेचि जया अभिलाषणें ।
जैसें येथूनि पर्‍हां जाणें । आकाशा नाहीं ॥ ३०० ॥
ज्याप्रमाणे आकाश हे सर्वव्यापी असल्यामुळे) आकाशाला या ठिकाणाहून पलीकडच्या ठिकाणाला जाण्याचे कारण नाही, त्याप्रमाणे आपणच सर्व झाल्याकारणाने ज्यांना इच्छा करण्याचे कारणच रहात नाही. ॥१५-३००॥
जैसा अग्नीचा डोंगरु । नेघे कोणी बीज अंकुरु ।
तैसा मनीं जयां विकारु । उदैजेना ॥ ३०१ ॥
जसा अग्नीचा डोंगर कोणत्याही बीजाचा अंकूर घेत नाही, त्याप्रमाणे ज्यांच्या मनामधे कोणताच विकार उत्पन्न होत नही. ॥१५-३०१॥
जैसा काढिलिया मंदराचळु । राहे क्षीराब्धि निश्चळु ।
तैसा नुठी जयां सळु । कामोर्मीचा ॥ ३०२ ॥
समुद्रमंथनाचे वेळी मंदारपर्वताची रवी केली होती) ती मंदारपर्वताची रवी क्षीरसागरातून काढल्यावर तो क्षीरसागर जसा शांत राहिला, त्याप्रमाणे ज्यांच्या अंत:करणात कामरूपी लाटेची उसळी उत्पन्न होत नाही. ॥१५-३०२॥
चंद्रमा कळीं धाला । न दिसे कोणें आंगी वोसावला ।
तेवीं अपेक्षेचा अवखळा । न पडे जयां ॥ ३०३ ॥
जसा षोडश कलांनी युक्त चंद्र कोणत्याही बाजूला अपूर्ण दिसत नाही, त्याप्रमाणे कसलीही इच्छा उत्पन्न होणे हे न्यून ज्यांचे ठिकाणी नसते. ॥१५-३०३॥
हें किती बोलूं असांगडें । जेवीं परमाणु नुरे वायूपुढें ।
तैसें विषयांचें नावडे । नांवचि जयां ॥ ३०४ ॥
त्या पुरुषाची गोष्ट निरुपम आहे, तेव्हा त्या पुरुषाचे मी किती वर्णन करू ? ज्याप्रमाणे वायूच्या जोरापुढे रज:कणांचा टिकाव लागत नाही, त्याप्रमाणे ज्यांना विषयांचे नाव देखील आवडत नाही, ॥१५-३०४॥
एवं जे जे कोणी ऐसे । केले ज्ञानाग्नि हुताशें ।
ते तेथ मिळती जैसें । हेमीं हेम ॥ ३०५ ॥
याप्रमाणे आत्मज्ञान म्हणून प्रसिद्ध असलेल्या अग्नीने जे कोणी असे (वर वर्णन केल्याप्रमाणे) केलेले आहेत ते त्या आत्मस्वरूपात जसे सोन्यात सोने मिळाते त्याप्रमाणे मिळतात. ॥१५-३०५॥
तेथ म्हणिजे कवणें ठाईं । ऐसेंही पुससी कांहीं ।
तरी तें पद गा नाहीं । वेंचु जया ॥ ३०६ ॥
परंतु येथे म्हणजे कोणात्या ठिकाणी असे देखील काही तू विचारशील (तर तुला सांगतो) तर ज्या ठिकाणाला नाश नाही, ते ते ठिकाण होय. ॥१५-३०६॥
दृश्यपणें देखिजे । कां ज्ञेयत्वें जाणिजे ।
अमुकें ऐसें म्हणिजे । तें जें नव्हे ॥ ३०७ ॥
जे पहाण्याचा विषय म्हणून पाहिले जाते व जे ज्ञानाचा (जाणण्याचा) पदार्थ म्हणून समजले जाते किंवा जे काही एक विशेष प्रकारचे आहे, असा ज्याविषयी व्यवहार होतो असे जे आहे त्यापैकी जे नाही, (तेथे ते मिळतात). ॥१५-३०७॥
न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पवकः ।
यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥ ६ ॥
ते पद सूर्य प्रकाशित करीत नाहीत, चंद्र प्रकाशित करत नाही, अग्नि प्रकाशित करत नाही, ज्या ठिकाणी गेल्यावर (गेलेले लोक) परत मागे पाऊलच घेत नाहीत ते माझे अत्यंत श्रेष्ठ निजधाम होय. ॥१५-६॥
पैं दीपाचिया बंबाळीं । कां चंद्र हन जें उजळी ।
हें काय बोलों अंशुमाळी । प्रकाशी जें ॥ ३०८ ॥
परंतु दिव्याच्या दिपवून टाकणार्‍या प्रकशाने जे प्रकाशले जाते अथवा चंद्र ज्याला प्रकाशित करतो ह्यांचीच गोष्ट काय सांगावी ? (परंतु) सूर्यही ज्याचे प्रकाशन करतो ॥१५-३०८॥
तें आघवेंचि दिसणें । जयाचें कां न देखणें ।
विश्व भासतसे जेणें । लपालेनी ॥ ३०९ ॥
वरील तीन प्रकारच्या प्रकाशांनी जगातील सर्व वस्तूंचे दिसणे, म्हणजे ज्याला (आत्मस्वरूपाला) न पहाणे होय. (कारण की आत्मस्वरुपाला पाहण्य़ात इतर वस्तूंचा निरास होतो). जे आत्मस्वरूप लपले असता विश्व भासते (आत्मस्वरूपाच्या अज्ञानात विश्व भासते). ॥१५-३०९॥
जैसें शिंपीपण हारपे । तंव तंव खरें होय रुपें ।
कां दोरी लोपतां सापें । फार होइजे ॥ ३१० ॥
ज्याप्रमाणे शिंपीचे शिंप म्हणून यथार्थ ज्ञान जसजसे नाहीसे होते, तसतसे त्या शिंपीवर मिथ्या भासणारे रूप खरे आहे असे भासावयास लागते. अथवा दोरीच्या यथार्थ स्वरूपाचे अज्ञान असता सापाचा भास जास्त दृढ होतो. ॥१५-३१०॥
तैसीं चंद्रसूर्यादि थोरें । इयें तेजें जियें फारें ।
तियें जयाचेनि आधारें । प्रकाशती ॥ ३११ ॥
त्याप्रमाणे चंद्रसूर्य इत्यादिक जी ही मोठमोठाली तेजे आहेत, ती ज्या आत्मवस्तूच्या अज्ञानात प्रकाश करतात ॥१५-३१०॥
ते वस्तु कीं तेजोराशी । सर्वभूतात्मक सरिसी ।
चंद्रसूर्याच्या मानसीं । प्रकाशे जे ॥ ३१२ ॥
ती आत्मवस्तु केवळ तेजाची रास आहे. आणि ती आत्मवस्तु सर्व प्राण्यांमधे आत्मत्वे करून सारखी व्याप्त आहे व जी चंद्रसूर्याच्या मनात प्रकाशते. ॥१५-३१२॥
म्हणौनि चंद्रसूर्य कडवसां । पडती वस्तूच्या प्रकाशा ।
यालागीं तेज जें तेजसा । तें वस्तूचें आंग ॥ ३१३ ॥
म्हणून वस्तूच्या प्रकाशाच्या मानाने चंद्र, सूर्य हे अंधारात पडतात (निस्तेज होतात) याकरता तेजस्वी वस्तूंमधे जे तेज आहे ते वस्तूंचे अंग आहे. ॥१५-३१३॥
आणि जयाच्या प्रकाशीं । जग हारपे चंद्रार्केंसीं ।
सचंद्र नक्षत्रें जैसीं । दिनोदयीं ॥ ३१४ ॥
आणि ज्याप्रमाणे सूर्योदयी चंद्रासह नक्षत्रे लोपतात, त्याप्रमाणे ज्या आत्मवस्तूच्या प्रकाशात चंद्रसूर्यांसह सर्व जग लोपून जाते. ॥१५-३१४॥
नातरी प्रबोधलिये वेळे । ते स्वप्नींची डिंडीमा मावळे ।
कां नुरेचि सांजवेळे । मृगतृष्णिका ॥ ३१५ ॥
अथवा जागे झाल्यावर जसा स्वप्नातील पसारा नाहीसा होतो अथवा संध्याकाळी जसे मृगजळ रहात नाही ॥१५-३१५॥
तैसा जिये वस्तूच्या ठायीं । कोण्हीच कां आभासु नाहीं ।
तें माझें निजधाम पाहीं । पाटाचें गा ॥ ३१६ ॥
त्याप्रमाणे ज्या आत्मवस्तूच्या ठिकाणी कोणताच भास नाही, अर्जुना, ते माझे मुख्य ठिकाण आहे असे समज. ॥१५-३१६॥
पुढती जे तेथ गेले । ते न घेती माघौतीं पाउलें ।
महोदधीं कां मिनले । स्रोत जैसे ॥ ३१७ ॥
तेथे निजधामाच्या ठिकाणी जे लोक गेले ते पुन्हा मागे पाऊल घेत नाहीत. (म्हणजे पुन्हा जन्मला येत नाहीत). ते कसे तर जसे महासागरास मिळालेले नद्यांचे ओघ (जसे माघारी येत नाहीत तसे). ॥१५-३१७॥
कां लवणाची कुंजरी । सूदलिया लवणसागरीं ।
होयचि ना माघारी । परती जैसी ॥ ३१८ ॥
अथवा मिठाची हत्तीण ज्याप्रमाणे खार्‍या समुद्रात घातली असता ती जशी माघारी येतच नाही. ॥१५-३१८॥
नाना गेलिया अंतराळा । न येतीचि वन्हिज्वाळा ।
नाहीं तप्तलोहौनि जळा । निघणें जेवीं ॥ ३१९ ॥
अथवा आकाशात मिळालेल्या अग्नीच्या ज्वाळा जशा परत येत नाहीत (अथवा) ज्याप्रमाणे तापलेल्या लोखांडाकडून पाण्याला परत येणे नाही ॥१५-३१९॥
तेवीं मजसीं एकवट । जे जाले ज्ञानें चोखट ।
तयां पुनरावृत्तीची वाट । मोडली गा ॥ ३२० ॥
त्याप्रमाणे शुद्ध ज्ञानाने जे माझ्या स्वरूपी मिळाले त्यांना पुनर्जन्माचा मार्ग मोडला. (त्यांना पुनर्जन्म नाही). ॥१५-३२०॥
तेथ प्रज्ञापृथ्वीचा रावो । पार्थु म्हणे जी जी पसावो ।
परी विनंती एकी देवो । चित्त देतु ॥ ३२१ ॥
येथे देव असे बोलल्यावर बुद्धिरूपी पृथ्वीचा राजा जो अर्जुन, तो म्हणतो, महाराज (हे आपले आत्मबोध सांगणे हा) मोठा प्रसाद आहे. परंतु माझ्या एका विनंतीकडे लक्ष द्यावे. ॥१५-३२१॥
तरी देवेंसि स्वयें एक होती । मग माघौते जे न येती ।
ते देवेंसि भिन्न आथी । कीं अभिन्न जी ॥ ३२२ ॥
तर महाराज जे पुरुष देवाशी स्वत: एक होतात, (तुमच्या स्वरुपाशी ऐक्याला पावतात) व मग माघारी येत नाहीत, ते पुरुष मूळचे आपल्याशी (देवाशी) भिन्न असतात अथवा अभिन्न असतात ? ॥१५-३२२॥
जरी भिन्नचि अनादिसिद्ध । तरी न येती हें असंबद्ध ।
जे फुलां गेलें षट्पद । ते फुलेंचि होती पां ॥ ३२३ ॥
जर ते पुरुष स्वरूपेकरून मूळचे अभिन्न असतील तर ते माघारी येत नाहीत हे आपले म्हणणे विसंगत आहे. कारण की हे आपले म्हणणे खरे असेल तर मग फुलात गुंग झालेले भ्रमर खरोखर फुलेच व्हावयास पाहिजेत. ॥१५-३२३॥
पैं लक्ष्याहूनि अनारिसे । बाण लक्ष्यीं शिवोनि जैसें ।
मागुते पडती तैसे । येतीचि ते ॥ ३२४ ॥
स्वरूपाने लक्ष्याहून वेगळे असलेले बाण, लक्ष्याला शिवून (लक्ष्यरूप न होता) जसे पुन्हा वेगळे पडतात, तसे ते पुरुष देवाच्या स्वरूपाला स्पर्श करून देवाशी ऐक्याला न पावता पुन्हा माघारी येतीलच. (म्हणजे वेगळे पडतील). ॥१५-३२४॥
नातरी तूंचि ते स्वभावें । तरी कोणें कोणासि मिळावें ।
आपणयासी आपण रुपावें । शस्त्रें केवीं ? ॥ ३२५ ॥
अथवा ते पुरुष जर स्वभावत: तूच असले म्हणजे त्यांचे व तुझे स्वरूप मूळचे एकच असले) तर मग कोणी कोणाला मिळवायचे ? शस्त्राने आपण आपल्याला कसे रुपावयाचे ? ॥१५-३२५॥
म्हणौनि तुजसी अभिन्नां जीवां । तुझा संयोगवियोगु देवा ।
नये बोलों अवयवां । शरीरेंसीं ॥ ३२६ ॥
देवा, म्हणून तुझ्याशी अभिन्न जे जीव त्यांचा तुझ्याशी संयोग अथवा वियोग होतो हे म्हणता येत नाही, कसे तर जसे शरीर व शरीराचे अवयव, यांचा संयोग अथवा वियोग म्हणता येत नाही त्याप्रमाणे. ॥१५-३२६॥
आणि जे सदां वेगळें तुजसीं । तयां मिळणीं नाहीं कोणे दिवशीं ।
मा येती न येती हे कायसी । वायबुद्धि ? ॥ ३२७ ॥
आणि तुझ्याशी जे सदा अभिन्न आहेत त्यांना कोणत्याही दिवशी तुझ्यात मिळता यावयाचे नाही. मग ते तुझ्या स्वरूपाहून माघारी येतात अथवा येत नाहीत ही कसली व्यर्थ समजूत ! ॥१५-३२७॥
तरी कोण गा ते तूंतें । पावोनि न येती माघौते ।
हें विश्वतोमुखा मातें । बुझावीं जी ॥ ३२८ ॥
तरी तुला (तुझ्या स्वरुपाला) पावून माघारी येत नाहीत ते कोण ? हे सर्वबाजूला मुख असलेल्या देवा, हे मला समजावून सांगा. ॥१५-३२८॥
इये आक्षेपीं अर्जुनाच्या । तो शिरोमणि सर्वज्ञांचा ।
तोषला बोध शिष्याचा । देखोनियां ॥ ३२९ ॥
अर्जुनाने अशी शंका व्यक्त केल्यावर, तो जाणत्यांमधे श्रेष्ठ असलेला श्रीकृष्ण परमात्मा आपल्या शिष्याचा बोध पाहून संतुष्ट झाला. ॥१५-३२९॥
मग म्हणे गा महामती । मातें पावोनि न येती पुढती ।
ते भिन्नाभिन्न रिती । आहाती दोनी ॥ ३३० ॥
मग देव म्हणतात, हे विशाल बुद्धीच्या अर्जुना, माझ्या स्वरूपी ऐक्याला पावून जे पुन्हा माघारी येत नाहीत त्यांच्या मूळस्वरूपासंबंधाने ते वेगळे आहेत व वेगळे नाहीत हे दोन्हीही प्रकार संभावतात. ॥१५-३३०॥
जैं विवेकें खोलें पाहिजे । तरी मी तेचि ते सहजें ।
ना आहाचवाहाच तरी दुजे । ऐसेही गमती ॥ ३३१ ॥
जर खोल विचाराने (आत्मदृष्टीने) पाहिले तर ते पुरुष स्वभावत: मद्रूपच आहेत आणि जर वरवरच्या दृष्टीने (देहदृष्टीने) पाहिले तर ते भिन्न (माझ्याहून वेगळे) आहेत असेही वाटतात. ॥१५-३३१॥
जैसे पाणियावरी वेगळ । तळपतां दिसती कल्लोळ ।
एर्‍हवीं तरी निखिळ । पाणीचि तें ॥ ३३२ ॥
ज्याप्रमाणे लाटा उत्पन्न होत असता, त्या पाण्याहून वेगळ्या आहेत असे दिसते, पण सहज विचार करून पाहिले तर त्या लाटा केवळ पाणीच आहेत. ॥१५-३३२॥
कां सुवर्णाहुनि आनें । लेणीं गमती भिन्नें ।
मग पाहिजे तंव सोनें । आघवेंचि तें ॥ ३३३ ॥
अथवा (आकाराच्या दृष्टीने पाहिले असता) दागिने सोन्याहून भिन्न आहेत असे वाटते. मग (विचाराच्या दृष्टीने) पाहिले असता ते दागिने सर्व सोनेच आहेत. ॥१५-३३३॥
तैसें ज्ञानाचिये दिठी । मजसीं अभिन्नचि ते किरीटी ।
येर भिन्नपण तें उठी । अज्ञानास्तव ॥ ३३४ ॥
त्याप्रमाणे ज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर अर्जुना, ते पुरुष माझ्याशी अभिन्नच आहेत. दुसरे वेगळेपण उत्पन्न होते ते अज्ञानामुळे होते. ॥१५-३३४॥
आणि साचोकारेनि वस्तुविचारें । कैचें मज एकासि दुसरें ।
भिन्नाभिन्नव्यवहारें । उमसिजेल ॥ ३३५ ॥
आणि खरोखर वस्तुविचाराने (आत्मदृष्टीने) पाहिले असता, मी जो एक, त्या मला दुसरे कोठले ? की जे वेगळे आहे किंवा एक आहे असा व्यवहार होऊन तद्वारा उघड करता येईल ? ॥१५-३३५॥
आघवेंचि आकाश सूनि पोटीं । बिंबचि जैं आते खोटी ।
तैं प्रतिबिंब कें उठी । कें रश्मि शिरे ? ॥ ३३६ ॥
जर सर्वचे सर्व आकाश पोटात घालून (सूर्य) बिंबाने ब्रह्मांडगोल व्यापून टाकला तर त्या सूर्याचे प्रतिबिंब कोठे उत्पन्न होईल ? आणि त्याची किरणे कोठे शिरतील ? ॥१५-३३६॥
कां कल्पांतींचिया पाणिया । काय वोत भरिती धनंजया ? ।
म्हणौनि कैंचें अंश अविक्रिया । एका मज ॥ ३३७ ॥
अथवा कल्पांतकाळाचे जे आब्रह्मस्तंबपर्यंत उदक असते ते उदक अनेक नद्यांच्या प्रवाहाचे पाणी भरून बनले आहे काय ? एवढ्याकरता मी जो एक अविक्रीय, त्या मला अंश कोठले ? ॥१५-३३७॥
परी ओघाचेनि मेळें । पाणी उजू परी वांकुडें जालें ।
रवी दुजेपण आलें । तोयबगें ॥ ३३८ ॥
परंतु पात्राच्या संबंधाने नदीचे पाणी सरळ असता पण वाकडे झाले. पाण्याच्या संबंधाने (पाण्यात प्रतिबिंबित झाल्याने) सूर्याला दोनपणा आला (बिंबपणा व प्रतिबिंबपणा) ॥१५-३३८॥
व्योम चौफळें कीं वाटोळें । हें ऐसें कायिसयाही मिळे ।
परी घटमठीं वेंटाळें । तैसेंही आथी ॥ ३३९ ॥
हे आकाशा चौकोनी अथवा वाटोळे असे कशाने मिळणार आहे ? परंतु आकाश जेव्हा घटाकडून अथवा मठाकडून वेष्टिले जाते तेव्हा तसेही (वाटोळे किंवा चौकोनी) असते. ॥१५-३३९॥
हां गा निद्रेचेनि आधारें । काय एकलेनि जग न भरे ? ।
स्वप्नींचेनि जैं अवतरे । रायपणें ॥ ३४० ॥
अरे निद्रेच्या आधारावर उत्पन्न झालेल्या स्वप्नात जेव्हा (निजणारा) आपण राजा म्हणून प्रगट होतो तेव्हा त्याच्या एकट्याकडून (स्वप्नातील) सर्व जग भरले जात नाही काय ? ॥१५-३४०॥
कां मिनलेनि किडाळें । वानिभेदासि ये सोळें ।
तैसा स्वमाये वेंटाळें । शुद्ध जैं मी ॥ ३४१ ॥
अथवा हिणकस धातु मिसळली असता शंभर नंबरी सोने जसे निरनिराळ्या कसाला येते, त्याप्रमाणे शुद्ध जो मी, तो जेव्हा आपल्या मायेने वेटाळला जातो ॥१५-३४१॥
तैं अज्ञान एक रूढे । तेणें कोऽहंविकल्पाचें मांडे ।
मग विवरूनि कीजे फुडें । देहो मी ऐसें ॥ ३४२ ॥
तेव्हा (माझ्या ठिकाणी) एक अज्ञानाचा मुख्यत: व्यवहार होतो. त्या योगाने मी कोण, अशा संशयास आरंभ होतो आणि मग विचार करून देह मी असा निश्चय होतो. ॥१५-३४२॥

ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः ।
मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति ॥ ७ ॥
जीवलोकामधे जीवरूप पावलेला माझाच सनातन अंश प्रकृतीचे ठिकाणी स्थित अशा मनासह सहा इंद्रियांना (आपल्याजवळ) ओढून घेतो. ॥१५-७॥
ऐसें शरीराचि येवढें । जै आत्मज्ञान वेगळें पडे ।
तैं माझा अंशु आवडे । थोडेपणें ॥ ३४३ ॥
याप्रमाणे जेव्हा आपल्या स्वत:च्या विषयीचे ज्ञान, शरीर तेच आपण इतके मर्यादित होऊन व्यापक स्वरूपापासून अलग होते, त्यावेळेस त्याच्या मर्यादितपणाच्या धर्मावरून, तो माझा एक भाग आहे असे वाटते ॥१५-३४३॥
समुद्र कां वायुवशें । तरंगाकार उल्लसें ।
तो समुद्रांशु ऐसा दिसे । सानिवा जेवीं ॥ ३४४ ॥
समुद्र हा वायूच्या योगाने, लाटांच्या आकाराने प्रगट होतो, तो लाटांचा आकार जसा समुद्राचा लहानसा अंश असा दिसतो. ॥१५-३४४॥
तेवीं जडातें जीवविता । देहाहंता उपजविता ।
मी जीव गमें पंडुसुता । जीवलोकीं ॥ ३४५ ॥
त्याप्रमाणे अर्जुना, जड देहाला सचेतन करणारा आणि त्या एकदेशी देहासंबंधाने अहंकार उत्पन्न करणारा जो मी, जीवलोकात जीव असा वाटतो ॥१५-३४५॥
पैं जीवाचिया बोधा । गोचरु जो हा धांदा ।
तो जीवलोकशब्दा । अभिप्रावो ॥ ३४६ ॥
जीवाच्या ज्ञानाला जी ही घडामोड चाललेली दिसते, ती जीवलोक या शब्दाचा अर्थ होय. ॥१५-३४६॥
अगा उपजणें निमणें । हें साचचि जे कां मानणें ।
तो जीवलोकु मी म्हणे । संसारु हन ॥ ३४७ ॥
अर्जुना, शरीर उत्पन्न झाले असता, मी जन्मास आलो व ते नाहीसे झाले म्हणजे मी मेलो अशी जी खरोखरच समजूत होऊन बसलेली असते, त्या समजुतीस मी जीवलोक अथवा संसार म्हणतो ॥१५-३४७॥
एवंविध जीवलोकीं । तूं मातें ऐसा अवलोकीं ।
जैसा चंद्रु कां उदकीं । उदकातीत ॥ ३४८ ॥
अशा प्रकारच्या जीवलोकात तू मला अशा तर्‍हेने पहा की ज्याप्रमाणे चंद्र हा प्रतिबिंबरूपाने पाण्यात असून बिंबरूपाने पाण्याबाहेर आहे, त्याप्रमाणे पहा. ॥१५-३४८॥
पैं काश्मीराचा रवा । कुंकुमावरी पांडवा ।
आणिका गमे लोहिवा । तो तरी नव्हे ॥ ३४९ ॥
अर्जुना, स्फटिकाचा तुकडा केशरावर ठेवला असता पहाणाराला तो तांबड्या रंगाचा आहे असे वाटते, परंतु (वास्तविक पाहिले असता) तो तर स्फटिक (स्वरूपाने) तांबडा नाही. ॥१५-३४९॥
तैसें अनादिपण न मोडे । माझें अक्रियत्व न खंडे ।
परी कर्ता भोक्ता ऐसें आवडे । ते जाण गा भ्रांती ॥ ३५० ॥
त्याप्रमाणे जरी जीवलोकाच्या व्यापारात मी सापडलो आहे असा भासलो तरी माझा आरंभरहितपणा नाहीसा होत नाही व त्याचप्रमाणे माझा अक्रियपणा (कर्मरहितपणा) मोडत नाही. परंतु (असे असूनही) मी कर्ता, भोक्ता आहे असे जे वाटते ती भ्रांति आहे, असे समज. ॥१५-३५०॥
किंबहुना आत्मा चोखटु । होऊनि प्रकृतीसी एकवटु ।
बांधे प्रकृतिधर्माचा पाटु । आपणपयां ॥ ३५१ ॥
फार काय सांगावे ? निर्लेप जो आत्मा तो अविद्याकार्य जे शरीर, त्याच्याशी एक होऊन, शरीराचे धर्म आपल्या ठिकाणी पाहू लागतो (शरीराचे धर्म जे जन्ममरणादि, त्याचा आपल्यावर अध्यास करतो). ॥१५-३५१॥
पैं मनादि साही इंद्रियें । श्रोत्रादि प्रकृतिकार्यें ।
तियें माझीं म्हणौनि होये । व्यापारारूढ ॥ ३५२ ॥
मनासहित श्रोत्र आदिकरून जी सहा ज्ञानेंद्रिये, जी वास्तविक प्रकृतीची कार्ये करीत असतांना ती माझी आहेत म्हणून जीव व्यापार करण्यास प्रवृत्त होतो. ॥१५-३५२॥
जैसें स्वप्नीं परिव्राजें । आपणपयां आपण कुटुंब होईजे ।
मग तयाचेनि धांविजे । मोहें सैरा ॥ ३५३ ॥
ज्याप्रमाणे एखाद्या संन्याशाने स्वप्नामधे आपण आपले कुटुंब व्हावे, आणि मग त्या बायकामुलांच्या मोहाने इकडे तिकडे धावावे ॥१५-३५३॥
तैसा आपलिया विस्मृती । आत्मा आपणचि प्रकृती- ।
सारिखा गमोनि पुढती । तियेसीचि भजे ॥ ३५४ ॥
त्याप्रमाणे आत्मा आपल्या मूळ स्वरूपाला विसरून, आपणच प्रकृति (शरीर) आहोत असे समजून पुन: (विषयोपार्जनद्वारा) शरीरालाच भजतो. ॥१५-३५४॥
मनाच्या रथीं वळघे । श्रवणाचिया द्वारें निघे ।
मग शब्दाचिया रिघे । रानामाजीं ॥ ३५५ ॥
जीवात्मा मनाच्या रथावर आरूढ होऊन (मनाचा आश्रय करून) श्रवणेंद्रियांच्या द्वाराने निघतो आणि मग शब्दांच्या रानात प्रवेश करतो. ॥१५-३५५॥
तोचि प्रकृतीचा वागोरा । त्वचेचिया मोहरा ।
आणि स्पर्शाचिया घोरा । वना जाय ॥ ३५६ ॥
तोच प्रकृतीचा लगाम त्वचेकडे वळवून, मग स्पर्शविषयरूपी भयंकर रानात जातो. ॥१५-३५६॥
कोणे एके अवसरीं । रिघोनि नेत्राच्या द्वारीं ।
मग रूपाच्या डोंगरीं । सैरा हिंडे ॥ ३५७ ॥
कोणा एका वेळेला नेत्रांच्या द्वारा बाहेर पडून, रूपाच्या डोंगरावर मोकाट फिरतो. अथवा जिव्हाद्वारे बाहेर पडून रसाची दरी (पोट) भरावयास लागतो. ॥१५-३५७॥
कां रसनेचिया वाटा । निघोनि गा सुभटा ।
रसाचा दरकुटा । भरोंचि लागे ॥ ३५८ ॥
अथवा, अर्जुना जिव्हाद्वारे बाहेर पडून , रसाची दरी (=पोट) भरावयास लागतो ॥१५-३५८॥
नातरी येणेंचि घ्राणें । जैं देहांशु करी निघणें ।
मग गंधाची दारुणें । आडवें लंघी ॥ ३५९ ॥
अथवा याच नाकाच्या द्वाराने देहाचा स्वामी जो जीव, तो बाहेर निघतो व मग गंधविषयीची भयंकर राने ओलांडतो. ॥१५-३५९॥
ऐसेनि देहेंद्रियनायकें । धरूनि मन जवळिकें ।
भोगिजती शब्दादिकें । विषयभरणें ॥ ३६० ॥
अशा तर्‍हेने देह व इंद्रिये यांचा स्वामी जीव, तो मनास हाताशी धरून शब्दादिक विषयांचा समुदाय भोगतो. ॥१५-३६०॥
शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः ।
गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानिवाशयात् ॥ ८ ॥
जे (नवीन जन्मातले नवीन) शरीर पावतो आणि जे (पूर्वीच्या जन्मातले जीर्ण) शरीर टाकून देतो (त्यामधे आणि त्यामधून) तो (जीवरूपी) ईश्वर गंधाश्रयापासून (पुष्पादिकांपासून) वायु ज्याप्रमाणे गंध नेतो त्याप्रमाणे ही इंद्रिये घेऊन जातो. ॥१५-८॥
परी कर्ता भोक्ता ऐसें । हें जीवाचे तैंचि दिसे ।
जैं शरीरीं कां पैसे । एकाधिये ॥ ३६१ ॥
परंतु कर्ता, भोक्ता अशी जीवाची स्थिती तेव्हाच दिसते की जेव्हा तो जीव (कर्मानुसार) एखाद्या स्थूल देहात प्रवेश करतो. ॥१५-३६१॥
जैसा आथिला आणि विलासिया । तैंचि वोळखों ये धनंजया ।
जैं राजसेव्या ठाया । वस्तीसि ये ॥ ३६२ ॥
अर्जुना, जसा एखादा पुरुष ऐश्वर्यसंपन्न व विलासी आहे हे तेव्हाच ओळखता येते की जेव्हा तो एखाद्या अशा राजधानीच्या ठिकाणी रहावयास येतो ॥१५-३६२॥
तैसा अहंकर्तृत्वाचा वाढु । कां विषयेंद्रियांचा धुमाडु ।
हा जाणिजे तैं निवाडु । जैं देह पाविजे ॥ ३६३ ॥
त्याप्रमाणे अहंकाराचे आधिक्य अथवा विषय व इंद्रिये यांचा धुमाकूळ यांची स्पष्टता त्याच वेळेला दिसून येते की जेव्हा जीवाला (कर्मानुसार एकदा) स्थूलदेह प्राप्त होतो. ॥१५-३६३॥
अथवा शरीरातें सांडी । तर्‍ही इंद्रियांची तांडी ।
हे आपणयांसवें काढी । घेऊनि जाय ॥ ३६४ ॥
अथवा जीव जेव्हा एका शरीरास टाकतो (तेव्हा) तरी तो आपल्याबरोबरच हा इंद्रियांचा समुदाय त्या शरीरातून काढतो व आपल्याबरोबरच तो इंद्रियसमुदाय दुसर्‍या शरीरात घेऊन जातो. ॥१५-३६४॥
जैसा अपमानिला अतिथी । ने सुकृताची संपत्ति ।
कां साइखडेयाची गती । सूत्रतंतू ॥ ३६५ ॥
अपमान केलेला अतिथि ज्याप्रमाणे (अपमान करणाराची) पुण्यरूप संपत्ति घेऊन जातो अथवा दोरा तुटला असता तो (सूत्रधार) कळसूत्री बाहुल्यांची गति (हलणे चालणे) घेऊन जातो ॥१५-३६५॥
नाना मावळतेनि तपनें । नेइजेती लोकांचीं दर्शनें ।
हें असो द्रुती पवनें । नेईजे जैसी ॥ ३६६ ॥
अथवा मावळत्या सूर्याकडून (ज्याप्रमाणे) लोकांच्या दृष्ट्या नेल्या जातात, हा दृष्टांत राहू दे, वार्‍याकडून जसा सुवास नेला जातो ॥१५-३६६॥
तेवीं मनःषष्ठां ययां । इंद्रियांतें धनंजया ।
देहराजु ने देहा- । पासूनि गेला ॥ ३६७ ॥
त्याप्रमाणे अर्जुना, देहराज जो जीव तो एका देहातून बाहेर पडला असता (आपल्याबरोबर) मनासह पाच ज्ञानेंद्रिये नेतो. ॥१५-३६७॥
श्रोत्रं चक्षुः स्पर्शनं च रसनं घ्राणमेव च ।
अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते ॥ ९ ॥
श्रोत्र, चक्षु, त्वक्, जिव्हा आणि घ्राण तसे मन, यांचा अंगिकार करून (ती पुन्हा मांडून) हा (आत्मा शब्दादि) विषयांचा उपभोग घेतो. ॥१५-९॥
मग येथ अथवा स्वर्गीं । जेथ जें देह आपंगी ।
तेथ तैसेंचि पुढती पांगी । मनादिक ॥ ३६८ ॥
मग इहलोकी अथवा स्वर्गात तो जीव जेथे ज्या देहाचा आश्रय करतो, तेथे त्या देहात मनादिकांचा पुन: तसाच विस्तार करतो. ॥१५-३६८॥
जैसा मालवलिया दिवा । प्रभेसी जाय पांडवा ।
मग उजळिजे तेथ तेधवां । तैसाचि फांके ॥ ३६९ ॥
अर्जुना, जसा दिवा मालवला असता तो प्रभेसह जातो, मग लावला असता त्यावेळी लावलेल्या ठिकाणी पूर्वीप्रमाणेच प्रकाशतो. ॥१५-३६९॥
तरी ऐसैसिया राहाटी । अविवेकियांचे दिठी ।
येतुलें हें किरीटी । गमेचि गा ॥ ३७० ॥
परंतु अर्जुना, अशा या व्यवहारामधे अविचारी लोकांच्या दृष्टीला एवढे हे वाटतेच, ॥१५-३७०॥
जे आत्मा देहासि आला । आणि विषयो येणेंचि भोगिला ।
अथवा देहोनि गेला । हें साचचि मानिती ॥ ३७१ ॥
की आत्मा देहाला आला (जन्माला आला) आणि या आत्म्यानेच विषय भोगला अथवा आत्मा देहातून गेला (मेला) हे सर्व तो खरेच मानतो. ॥१५-३७१॥
एर्‍हवीं येणें आणि जाणें । कां करणें हा भोगणें ।
हें प्रकृतीचें तेणें । मानियेलें ॥ ३७२ ॥
सहज विचार करून पाहिले तर जन्माला येणे व मरणे अथवा कर्म करणे आणि (कर्माचे फळ सुखदु:ख ते) भोगणे हे धर्म प्रकृतीचे (म्हणजे देहाचे) असतांना तो अविचारी मनुष्य (ते आत्म्याचे धर्म आहेत असे) मानतो. ॥१५-३७२॥
उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं ।
विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः ॥ १० ॥
शरीर सोडून जात असतांना, (शरीर) धरून रहात असतांना, (विषयांचा) उपभोग घेत असतां अथवा (सुखादि) गुणांनी युक्त असता, याला (आत्म्याला देहाहूनवेगळा असा) अज्ञानी पाहू शकत नाहीत, ज्ञानरूपी चक्षूने युक्त असलेले पहातात. ॥१५-१०॥
यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं ।
यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः ॥ ११ ॥
त्यापैकी) यत्न करणारे योगी असतात ते याला (आत्म्याला) स्वत:मधे स्थित असा पहातात, यत्न करणारे पण ज्यांचे मन संस्कृत नाही (ज्यांना वैराग्य नाही) असे अविवेकी यत्न करून देखील (आत्म्याला) पाहू शकत नाहीत. ॥१५-११॥
परी देहाचे मोटकें उभें । आणि चेतना तेथ उपलभे ।
तिये चळवळेचेनि लोभें । आला म्हणती ॥ ३७३ ॥
परंतु लहानसा देह उत्पन्न झाला आणि त्या देहाचे ठिकाणी चेतना प्रगट झाली की त्या हालचालीच्या योगाने (आत्मा जन्मास) आला असे म्हणतात. ॥१५-३७३॥
तैसेंचि तयां संगती । इंद्रियें आपुलाल्या अर्थीं वर्तती ।
तया नांव सुभद्रापती । भोगणें जया ॥ ३७४ ॥
त्याप्रमाणे त्या चेतनेच्या (जीवाच्या) संगतीने इंद्रिये आपआपल्या विषयात व्यवहार करतात. अर्जुना, त्या व्यवहार करण्यालाच जे अविचारी लोक (जीवाचे) भोगणे असे म्हणतात ॥१५-३७४॥
पाठीं भोगक्षीण आपैसे । देह गेलिया ते न दिसे ।
तेथें गेला गेला ऐसें । बोभाती गा ॥ ३७५ ॥
नंतर भोग क्षीण झाल्यावर देह आपोआप पडला, म्हणजे ती हालचाल दिसली नाही की त्यावेळी अर्जुना आत्मा गेला गेला असे ओरडतात. ॥१५-३७५॥
पैं रुखु डोलतु देखावा । तरी वारा वाजतु मानावा ।
रुखु नसे तेथें पांडवा । नाहीं तो गा ? ॥ ३७६ ॥
झाड हलत असतांना पाहावे तरच वारा वहातो असे मानावे. अर्जुना, जेथे झाडच नाही, तेथे तो वारा नाही की काय ? ॥१५-३७६॥
कां आरिसा समोर ठेविजे । आणि आपणपें तेथ देखिजे ।
तरी तेधवांचि जालें मानिजे । काय आधीं नाहीं ? ॥ ३७७ ॥
अथवा आरसा समोर ठेवावा आणि त्यात आपल्याला (प्रबिंबाला) पाहावे, तेव्हाच आपण उत्पन्न झालो असे मानावे ? तर त्याच्या (आरसा पाहाण्याच्या) पूर्वी आपण नाही की काय ? ॥१५-३७७॥
कां परता केलिया आरिसा । लोपु जाला तया आभासा ।
तरी आपणपें नाहीं ऐसा । निश्चयो करावा ? ॥ ३७८ ॥
अथवा आरसा बाजूला केल्यावर व त्या आरशातील प्रतिबिंबाचा लोप झाल्यावर मग आपण स्वत: नाही असा निश्चय करावा की काय ? ॥१५-३७८॥
शब्द तरी आकाशाचा । परी कपाळीं पिटे मेघाचा ।
कां चंद्रीं वेगु अभ्राचा । अरोपिजे ॥ ३७९ ॥
(वास्तविक पाहिले तर) शब्द हा तर आकाशाचा गुण आहे परंतु मेघाच्या कपाळावर हाणला जातो. (म्हणजे त्य़ा शब्दाचा आरोप मेघावर केला जातो) अथवा चंद्रावर ढगांच्या वेगाचा आरोप केला जातो ॥१५-३७९॥
तैसें होइजे जाइजे देहें । तें आत्मसत्ते अविक्रिये ।
निष्टंकिती गा मोहें । आंधळे ते ॥ ३८० ॥
त्याप्रमाणे देहाने उत्पन्न व्हावे व नाश पावावे, ते (देहाचे उत्पन्न होणे व नाश पावणे) लोक, विकाररहित अशा आत्मसत्तेवर ते आंधळे (अविचारी) लोक भ्रमाने निश्चयपूर्वक आरोपित करतात. ॥१५-३८०॥
येथ आत्मा आत्मयाच्या ठायीं । देखिजे देहींचा धर्मु देहीं ।
ऐसें देखणें तें पाहीं । आन आहाती ॥ ३८१ ॥
त्या ठिकाणी (म्हणजे जन्ममरणादि विकार होत असतांना) आत्मा (जीवात्मा) आत्म्याच्या ठिकाणी पहावा म्हणजे जीवात्मा हा निर्विकार ब्रह्म आहे असे समजावे. व देहाचे धर्म (जन्ममरणादि विकार) देहाचे ठिकाणी पहावेत (म्हणजे जन्ममरणादि विकार देहाचे आहेत असे समजावे). असे पहाणारे (जाणणारे) ते वेगळेच आहेत असे समज. ॥१५-३८१॥
ज्ञानें कां जयाचे डोळे । देखोनि न राहती देहींचे खोळे ।
सूर्यरश्मी आणियाळे । ग्रीष्मीं जैसें ॥ ३८२ ॥
ज्यांची दृष्टी देहाला पाहून ज्ञानाच्या योगाने देहाच्या आकारवर थांबत नाही, तर देहाचे निरसन करून आत्म्याला स्पर्श करते. ते कसे तर ग्रीष्म ऋतूमधे सूर्याची किरणे अणकुचिदार असतात, ती मेघांच्या फळीला भेदन करून ज्याप्रमाणे बाहेर येतात, त्याप्रमाणे. ॥१५-३८२॥
तैसे विवेकाचेनि पैसें । जयांची स्फूर्ती स्वरूपीं बैसे ।
ते ज्ञानिये देखती ऐसें । आत्मयातें ॥ ३८३ ॥
तसे विवेकाच्या विस्ताराने ज्या ज्ञान्यांची बुद्धि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते, परंतु ते (आकाश खरोखर) तुटून (समुद्रात) पडले नाही असे नि:संशय ओळखता येते ॥१५-३८३॥
जैसें तारांगणीं भरलें । गगन समुद्रीं बिंबलें ।
परी तें तुटोनि नाहीं पडिलें । ऐसें निवडे ॥ ३८४ ॥
ज्याप्रमाणे नक्षत्रांनी भरल्ले आकाश समुद्रात प्रतिबिंबित होते, परंतु ते आकाश खरोखर तुटून समुद्रात पडले नाही, असे निःसंशय ओळखता येते. ॥१५-३८४॥
गगन गगनींचि आहे । हें आभासे तें वाये ।
तैसा आत्मा देखती देहें । गंवसिलाही ॥ ३८५ ॥
आकाश आकाशाच्याच ठिकाणी आहे, हे (प्रतिबिंब) भासते ते मिथ्या आहे त्याप्रमाणे ते (ज्ञानी) आत्मा देहात सापडला असताही तो देहाहून वेगळा आहे असे (म्हणजे आत्म्याच्याच ठिकाणी आत्मा आहे, तो देहात वास्तविक सापडलेला नाही) असे जाणतात. ॥१५-३८५॥
खळाळाच्या लगबगीं । फेडूनि खळाळाच्या भागीं ।
देखिजे चंद्रिका कां उगी । चंद्रीं जेवीं ॥ ३८६ ॥
खळखळ वहाणार्‍या पाण्याची चंचलता खळखळ वहाणार्‍या पाण्याच्याच ठिकाणी आहे असे समजून (आता त्या खळखळ वाहणार्‍या पाण्यात प्रतिबिंबित झालेले चांदणे जरी चंचल दिसले तरी जसे चांदणे हे चंद्राच्या ठिकाणी स्थिर आहे असे पाहावे ॥१५-३८६॥
कां नाडरचि भरे शोषें । सूर्यु तो जैसा तैसाचि असे ।
देह होतां जातां तैसें । देखती मातें ॥ ३८७ ॥
अथवा पाण्याचे डबकेच भरते व वाळते (व सूर्य जरी त्या डबक्यात प्रतिबिंबित झाला आहे तरी) तो सूर्य आपण आपल्या ठिकाणी आहे तसाच आहे, त्याप्रमाणे देह उत्पन्न होत असतांना व नाश पावत असतांना ते ज्ञानी मला तसा पाहातात. (म्हणजे देहाच्या उत्पत्तीबरोबर मी उत्पन्न होत नाही व देहाच्या नाशाबरोबर मी नाश पावत नाही, तर मी आहे तसाच आहे असे ज्ञानी लोक मला जाणतात). ॥१५-३८७॥
घटु मठु घडले । तेचि पाठीं मोडले ।
परी आकाश तें संचलें । असतचि असे ॥ ३८८ ॥
घठ व मठ हे तयार केले व नंतर ते मोडून टाकले. परंतु (घटाबरोबर त्यातील आकाश न होता व न मोडता भरलेले आहे तसेच आहे. ॥१५-३८८॥
तैसें अखंडे आत्मसत्ते । अज्ञानदृष्टि कल्पितें ।
हें देहचि होतें जातें । जाणती फुडें ॥ ३८९ ॥
त्याप्रमाणे अखंड (त्रिकालाबाधित) आत्मसत्तेवर अज्ञानदृष्टीने कल्पिलेले हे देहच उत्पन्न होतात व नाश पावतात (व आत्मा आहे तसाच आहे) हे ते ज्ञानी लोक पक्के जाणतात. ॥१५-३८९॥
चैतन्य चढे ना वोहटे । चेष्टवी ना चेष्टे ।
ऐसें आत्मज्ञानें चोखटें । जाणती ते ॥ ३९० ॥
चैतन्य वाढत नाही अथवा कमी होत नाही व ते कोणाला कर्म करावयास लावीत नाही अथवा स्वत: कर्म करीत नाही, असे ते (ज्ञानी लोक) शुद्ध आत्मज्ञानाने जाणतात. ॥१५-३९०॥
आणि ज्ञानही आपैतें होईल । प्रज्ञा परमाणुही उगाणा घेईल ।
सकळ शास्त्रांचें येईल । सर्वस्व हातां ॥ ३९१ ॥
आणि ज्ञानही आपल्या स्वाधीन होईल, बुद्धि ही सृष्टीतील परमाणूंचा देखील हिशेब देईल, व सर्व शास्त्रांचे सार हस्तगत होईल. ॥१५-३९१॥
परी ते व्युत्पत्ति ऐसी । जरी विरक्ति न रिगे मानसीं ।
तरी सर्वात्मका मजसीं । नव्हेचि भेटी ॥ ३९२ ॥
परंतु वैराग्याने मनामधे प्रवेश केला नाही तर सर्वांच्या अंतर्यामी असणारा जो मी त्या माझ्याशी अशा त्या विद्वत्तेने त्यांची भेट व्हावयाची नाही. ॥१५-३९२॥
पैं तोंड भरो कां विचारा । आणि अंतःकरणीं विषयांसि थारा ।
तरी नातुडें धनुर्धरा । त्रिशुद्धी मी ॥ ३९३ ॥
अर्जुना, कितीही विचाराने (ज्ञानाने) तोंड भरलेले असेना का ? परंतु जर अंत:करणामधे विषयांना आश्रय मिळत असेल तर मी निश्चयेकरून सापडणार नाही. ॥१५-३९३॥
हां गा वोसणतयाच्या ग्रंथीं । काई तुटती संसारगुंती ? ।
कीं परिवसिलिया पोथी । वाचिली होय ? ॥ ३९४ ॥
बाबा अर्जुना, झोपेत ग्रंथ बरळण्याने, त्या बरळणार्‍याच्या संसाराचे बंधन तुटते काय ? किंवा पोथीस स्पर्श केला असता पोथी वाचल्यासारखी होईल काय ? ॥१५-३९४॥
नाना बांधोनियां डोळे । घ्राणीं लाविजती मुक्ताफळें ।
तरी तयांचें काय कळे । मोल मान ? ॥ ३९५ ॥
अथवा डोळे बांधून जर मोती नाकास लावले तर त्या मोत्यांची किंमत अथवा पाणी (तेज) कळेल काय ? ॥१५-३९५॥
तैसा चित्तीं अहंते ठावो । आणि जिभे सकळशास्त्रांचा सरावो ।
ऐसेनि कोडी एक जन्म जावो । परी न पविजे मातें ॥ ३९६ ॥
त्याप्रमाणे चित्तामधे अभिमानाला जागा दिली आहे आणि जिव्हेला सर्व शास्त्रांचा अभ्यास झाला आहे अशा तर्‍हेने कोट्यावधी जन्म जाईनात का ? परंतु अशा पुरुषास माझ्या स्वरूपाची प्राप्ति करून घेता यावयाची नाही. ॥१५-३९६॥
जो एक मी कां समस्तीं । व्यापकु असें भूतजातीं ।
ऐक तिये व्याप्ती । रूप करूं ॥ ३९७ ॥
जो मी एक सर्व प्राण्यांमधे व्यापक आहे, त्या माझ्या व्याप्तीचे वर्णन करू, ऐक. ॥१५-३९७॥

यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम् ।
यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् ॥ १२ ॥
हे तेज आदित्याचे ठिकाणी असून अखिल जगाला प्रकाशित करते, जे चंद्राचे अथवा अग्नीचे ठिकाणी आहे ते तेज माझे आहे असे जाण. ॥१५-१२॥
तरी सूर्यासकट आघवी । हे विश्वरचना जे दावी ।
ते दीप्ति माझी जाणावी । आद्यंतीं आहे ॥ ३९८ ॥
तर सूर्यासह ही विश्वरचना जो प्रकाश दाखवतो, तो प्रकाश माझा आहे व तो प्रकाश विश्वाच्या आदिअंती आहे असे समज. ॥१५-३९८॥
जल शोषूनि गेलिया सविता । ओलांश पुरवीतसे जे माघौता ।
ते चंद्रीं पंडुसुता । ज्योत्स्ना माझी ॥ ३९९ ॥
अर्जुना, सूर्य (पृथ्वीतील सर्व) पाणी (ओलावा) शोषून गेल्यावर जो प्रकाश पुन्हा ओलावा पुरवतो तो चंद्राच्या ठिकाणी असणारा प्रकाश माझा होय. ॥१५-३९९॥
आणि दहन-पाचनसिद्धी । करीतसे जें निरवधी ।
ते हुताशीं तेजोवृद्धी । माझीचि गा ॥ ४०० ॥
आणि जे (प्रखर तेज) सतत जाळण्याची व शिजवण्याची क्रिया शेवटास नेते ते अग्नीच्या ठिकाणी असणारे प्रखार तेज माझेच आहे. ॥१५-४००॥
गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा ।
पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः ॥ १३ ॥
मी पृथ्वीमधे प्रवेश करून आपल्या सामर्थ्याने भूतांचे धारण करतो, रसात्मक चंद्र होऊन सर्व ओषधींचे मीच पोषण करतो. ॥१५-१३॥
मी रिगालों असें भूतळीं । म्हणौनि समुद्र महाजळीं ।
हे पांसूचि ढेंपुळी । विरेचिना ॥ ४०१ ॥
मी पृथ्वीच्या खाली प्रवेश केला आहे. म्हणून समुद्राच्या महाजलाने हे पृथ्वीरूपी मातीचे ढेकूळ विरघळून जातच नाही. ॥१५-४०१॥
आणी भूतेंही चराचरें । हे धरितसे जियें अपारें ।
तियें मीचि धरी धरे । रिगोनियां ॥ ४०२ ॥
आणि ही पृथ्वी ज्या असंख्य स्थवर जंगम भूतांना धारण करते, त्या सर्व भूतांना पृथ्वीत प्रवेश करून मीच धारण करतो. ॥१५-४०२॥
गगनीं मी पंडुसुता । चंद्राचेनि मिसें अमृता ।
भरला जालों चालता । सरोवरु ॥ ४०३ ॥
अर्जुना आकाशामधे चंद्राच्या रूपाने अमृताने भरलेले चालते सरोवर मी झालो. ॥१५-४०३॥
तेथूनि फांकती रश्मिकर । ते पाट पेलूनि अपार ।
सर्वौषधींचे आगर । भरित असें मी ॥ ४०४ ॥
तेथून (त्या चंद्रापासून) जी किरणे फाकतात, तेच कोणी असंख्य ओघ, त्यांना धारण करून मी सर्व औषधींचे (नवस्पतींचे) मळे भरीत आहे. ॥१५-४०४॥
ऐसेनि सस्यादिकां सकळां । करी धान्यजाती सुकाळा ।
दें अन्नद्वारां जिव्हाळा । भूतजातां ॥ ४०५ ॥
अशा तर्‍हेने (मी) सस्यादि सर्व धान्यजातींना विपुलता करतो व अन्नाच्या द्वारे सर्व प्राणिमात्रांना जीवन देतो. ॥१५-४०५॥
आणि निपजविलें अन्न । तरी तैसें कैचें दीपन ।
जेणें जिरूनि समाधान । भोगिती जीव ॥ ४०६ ॥
आणि अन्न शिजवून तयार केले असतांना, ज्याच्या योगाने अन्न पचून जीव समाधान भोगतील अशी भुकेची प्रखरता कोठून आणावयाची ? (की तशी भुकेची प्रखरता उत्पन्न करण्याकरता पोटात अग्नि लागतो) ॥१५-४०६॥।
अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः ।
प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् ॥ १४ ॥
प्राण्यांच्या देहाचा आश्रय करून असलेला प्राण व अपान यांनी युक्त असा जठराग्नी मी होऊन (शुष्क, स्निग्ध, सुपक्व व विदग्ध या) चार प्रकारचे अन्न पचवतो. ॥१५-१४॥
म्हणौनि प्राणिजातांच्या घटीं । करूनि कंदावरी आगिठी ।
दीप्ति जठरींही किरीटी । मीचि जालों ॥ ४०७ ॥
एवढ्याकरता प्राणिमात्रांच्या शरीरात नाभिस्कंधावर आगटी तयार करून, अर्जुना, पोटातील अग्नी मीच झालो. ॥१५-४०७॥
प्राणापानाच्या जोडभातीं । फुंकफुंकोनियां अहोराती ।
आटीतसें नेणों किती । उदरामाजीं ॥ ४०८ ॥
प्राण व अपानरूपी जोड भात्याने रात्रंदिवस फुंकफुंकून पोटामधे किती अन्न पचवतो हे कळत नाही. ॥१५-४०८॥
शुष्कें अथवा स्निग्धें । सुपक्वें कां विदग्धें ।
परी मीचि गा चतुर्विधें । अन्नें पचीं ॥ ४०९ ॥
कोरडी अथवा तुपट, चांगली शिजलेली अथवा करपलेली, अशी चार प्रकारची अन्ने आहेत. परंतु त्या चार प्रकारच्या अन्नांना, अर्जुना, मी एकटाच पचवतो. ॥१५-४०९॥
एवं मीचि आघवें जन । जना निरवितें मीचि जीवन ।
जीवनीं मुख्य साधन । वन्हिही मीचि ॥ ४१० ॥
याप्रमाणे सर्व प्राणी मीच आहे. प्राण्यांना जगवणारे जीवन (अन्न) मीच आहे व अन्नाच्या ठिकाणी अन्न जिरवण्याचे कामी मुख्य साधन जो जठराग्नी, तोही मीच आहे. ॥१५-४१०॥
आतां ऐसियाहीवरी काई । सांगों व्याप्तीची नवाई ।
येथ दुजें नाहींचि घेईं । सर्वत्र मी गा ॥ ४११ ॥
आता माझ्या व्याप्तीची अपूर्वता यापेक्षा अधिक काय सांगू ? अर्जुना, या विश्वात सर्व ठिकाणी माझ्याशिवाय दुसरे (कोणी) नाहीच, तर मीच सर्व ठिकाणी आहे असे समज. ॥१५-४११॥
तरी कैसेनि पां वेखें । सदा सुखियें एकें ।
एकें तियें बहुदुःखें । क्रांत भूतें ॥ ४१२ ॥
मग या विश्वात कित्येक प्राणी दिसण्यात सदा सुखी आणि कित्येक प्राणी दु:खाने व्याकूळ झालेले असे आढळतात. असे स्वरूपवैचित्र्य कशाने उत्पन्न झाले ? ॥१५-४१२॥
जैसी सगळिये पाटणीं । एकेंचि दीपें दिवेलावणी ।
जालिया कां न देखणी । उरलीं एकें ॥ ४१३ ॥
ज्याप्रमाणे संपूर्ण नगरात एकाच दिव्याने दिवे लावल्यावर काही दिवे प्रकाश न करणारे (मंद प्रकाश देणारे) असे का राहिले ? ॥१५-४१३॥
ऐसी हन उखिविखी । करित आहासि मानसीं कीं ।
तरी परिस तेही निकी । शंका फेडुं ॥ ४१४ ॥
असे तर्कवितर्क तू आपल्या मनात करीत असलास तर त्याविषयी ऐक व तू आपल्या शंकेचे चांगले निवारण करून घे. ॥१५-४१४॥
पैं आघवा मीचि असें । येथ नाहीं कीर अनारिसें ।
परी प्राणियांचिया उल्लासें । बुद्धि ऐसा ॥ ४१५ ॥
सर्वच मी आहे यात खरोखर अन्यथा नाही. परंतु ज्या प्राण्यांची अंत:करणरूप उपाधि जशी शुद्ध अथवा अशुद्ध असेल त्याप्रमाणे मी (त्यांच्या ठिकाणी) तसा व्यक्त होतो. ॥१५-४१५॥
जैसें एकचि आकाशध्वनी । वाद्यविशेषीं आनानीं ।
वाजावें पडे भिन्नीं । नादांतरीं ॥ ४१६ ॥
ज्याप्रमाणे एकच आकाशध्वनि, निरनिराळ्या अनेक नादांच्या रूपाने बाहेर पडतो. ॥१५-४१६॥
कां लोकचेष्टीं वेगळालां । जो हा एकचि भानु उदैला ।
तो आनानी परी गेला । उपयोगासी ॥ ४१७ ॥
अथवा हा जो उगवलेले सूर्य तो एकच आहे, परंतु लोकांच्या वेगवेगळ्या व्यापारामधे निरनिराळ्या उपयोगास गेला. ॥१५-४१७॥
नाना बीजधर्मानुरूप । झाडीं उपजविलें आप ।
तैसें परिणमलें स्वरूप । माझें जीवां ॥ ४१८ ॥
एकच पाणी निरनिराळ्या बीजांच्या धर्माप्रमाणे निरनिराळ्या झाडात निरनिराळ्या रसांच्या परिणामाला पावते, त्याप्रमाणे माझे एकच स्वरूप निरनिराळ्या जीवांच्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या बुद्धीप्रमाणे निरनिराळ्या परिणामाला पावले आहे. ॥१५-४१८॥
अगा नेणा आणि चतुरा । पुढां निळयांचा दुसरा ।
नेणा सर्पत्वें जाला येरा । सुखालागीं ॥ ४१९ ॥
अरे अर्जुना, अज्ञानी व ज्ञानी यांच्यापुढे असलेला दोन सरांचा (पदरांचा) नील मण्यांचा हार हा अज्ञान्याला सर्पपणाने (भीति उत्पन्न करणारा) झाला व तोच हार ज्ञान्याला (हार नीलमण्यांचा आहे असे अथार्थ समजल्यामुळे) सुख उत्पन्न करणारा झाला. ॥१५-४१९॥
हें असो स्वातीचें उदक । शुक्तीं मोतीं व्याळीं विख ।
तैसा सज्ञानांसी मी सुख । दुःख तों अज्ञानांसी ॥ ४२० ॥
हे दृष्टांत राहू देत, एकच स्वाति नक्षत्राचे पाणी ते शिंपीमधे मोती होते व सर्पात विष होते त्याप्रमाणे मी ज्ञानवानाला सुखारूप आहे व अज्ञान्याला दु:खरूप आहे. ॥१५-४२०॥
सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च ।
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेवचाहम् ॥ १५ ॥
सर्व प्राण्यांच्या हृदयामधे मी प्रवेश करून राहिलो आहे. त्यांना स्मृति, ज्ञान व विस्मृति माझ्यापासून होतात. सर्व वेदांकडून मीच जाणला जातो. मी उपनिषदांचा कर्ता (वेदांत संप्रदाय यथावत् प्रगट करणारा) आहे. वेदांना (वेदांच्या अर्थाला – ब्रह्माला) मीच जाणतो. ॥१५-१५॥
एर्‍हवीं सर्वांच्या हृदयदेशीं । मी अमुका आहें ऐसी ।
जे बुद्धि स्फुरे अहर्निशीं । ते वस्तु गा मी ॥ ४२१ ॥
अर्जुना, वास्तविक विचार करून पाहिले तर सर्वांच्या हृदयदेशात ‘मी अमका आहे’ अशी जी बुद्धि रात्रंदिवस स्फुरते, ती वस्तु मी आहे. ॥१५-४२१॥
परी संतासवें वसतां । योगज्ञानीं पैसतां ।
गुरुचरण उपासितां । वैराग्येंसीं ॥ ४२२ ॥
परंतु संतांच्या संगतीत राहिले असता आणि योग व ज्ञान यात प्रवेश केला असता (यांचा अभ्यास केला असता) आणि वैराग्याने युक्त होऊन गुरुचरणांची सेवा केली असता ॥१५-४२२॥
येणेंचि सत्कर्में । अशेषही अज्ञान विरमे ।
जयांचें अहं विश्रामे । आत्मरूपीं ॥ ४२३ ॥
याच सत्कर्माच्या योगाने, संपूर्ण अज्ञान नाहीसे होते व ज्यांचा (देहाच्या ठिकाणी असलेला) अहंकार आत्मस्वरूपी विश्रांतीला पावतो (आत्मस्वरूपी स्थिर होतो). ॥१५-४२३॥
ते आपेआप देखोनि देखीं । मियां आत्मेनि सदा सुखी ।
येथें मीवांचून अवलोकीं । आन हेतु असे ? ॥ ४२४ ॥
ते पुरुष आपले स्वरूप आपण ज्ञानाने पाहून त्यांचा आत्मा मी असल्याने माझ्या सुस्वरूपत्वाने नेहेमी आनंदात असतात. या ठिकाणी होणार्‍या आत्मदर्शनात माझ्याशिवाय दुसरे कोणी कारण आहे काय ? ॥१५-४२४॥
अगा सूर्योदयो जालिया । सूर्यें सूर्यचि पहावा धनंजया ।
तेवीं मातें मियां जाणावया । मीचि हेतु ॥ ४२५ ॥
अरे अर्जुना, सूर्योदय झाला असता कसे सूर्याने सूर्याला पहावयाचे त्याप्रमाणे मला मी जाणण्याला (माझे ज्ञान मला होण्याला) मीच कारण आहे. ॥१५-४२५॥
ना शरीरपरातें सेवितां । संसारगौरवचि ऐकतां ।
देहीं जयांची अहंता । बुडोनि ठेली ॥ ४२६ ॥
(येथपर्यंत माझ्या ज्ञानाला मीच हेतु आहे असे सांगितले व या ओवीपासून ४२९ व्या ओवीपर्यंत माझ्या अज्ञानाला मीच हेतु आहे असे सांगतात). अथवा शरीराच्या सेवेत गुंतलेल्या देहासक्त लोकांच्या संगतीत राहून संसाराचे महत्वच ऐकत असता ज्यांचा अहंकार देहाच्या ठिकाणी स्थित झाला आहे ॥१५-४२६॥
ते स्वर्गसंसारालागीं । धांवतां कर्ममार्गीं ।
दुःखाच्या सेलभागीं । विभागी होती ॥ ४२७ ॥
ते (देहाचे उपासक) स्वर्ग व संसाराकरता कर्ममार्गाने धावत असता (म्हणजे स्वर्ग व संसार यांची प्राप्ती करून घेण्याकरता कर्माचरण करीत असता) दु:खाच्या शेलक्या भागाचे वाटेकरी होतात. ॥१५-४२७॥
परी हेंही होणें अर्जुना । मजचिस्तव तया अज्ञाना ।
जैसा जागताचि हेतु स्वप्ना । निद्रेतें होय ॥ ४२८ ॥
परंतु अर्जुना, त्या अज्ञानी लोकांना हेही होणे (म्हणजे ते अज्ञानी शेलक्या दु:खाचे वाटेकरी होणे हे देखील) माझ्याचमुळे होते. (ते कसे तर) ज्याप्रमाणे जागा असलेलाच पुरुष निद्रा व स्वप्नाला कारण होतो, ॥१५-४२८॥
पैं अभ्रें दिवसु हरपला । तोहि दिवसेंचि जाणों आला ।
तेवीं मी नेणोनि विषयो देखिला । मजचिस्तव भूतीं ॥ ४२९ ॥
ढगाच्या योगाने झाकलेला गेलेला सूर्य जसा सूर्यानेच जाणण्यात आला, त्याप्रमाणे मला न जाणून प्राणिमात्रांनी माझ्यामुळे विषय पाहिला. (भोगला). ॥१५-४२९॥
एवं निद्रा कां जागणिया । प्रबोधुचि हेतु धनंजया ।
तेवीं ज्ञाना अज्ञाना जीवां यां । मीचि मूळ ॥ ४३० ॥
या व पुढील ओवीत जीवांच्या ज्ञानाला व अज्ञानाला मीच कारण आहे असे सांगतात). अर्जुना, ज्या प्रमाणे प्राण्यांच्या निद्रेला किंवा जागृत होण्याला जसा मूळचा (झोप लागण्याच्या पूर्वीचा) जागेपणा कारण आहे, त्याप्रमाणे जीवांच्या ज्ञान व अज्ञानाला मीच मूळ (कारण) आहे. ॥१५-४३०॥
जैसें सर्पत्वा कां दोरा । दोरुचि मूळ धनुर्धरा ।
तैसा ज्ञाना अज्ञानाचिया संसारा । मियांचि सिद्धु ॥ ४३१ ॥
अर्जुना ज्याप्रमाणे सर्पत्वाला दोराच्या यथार्थ ज्ञानाला) मूळ (कारण जसा) दोरच (दोराचे मूळचे स्वरूपच) आहे, त्याप्रमाणे ज्ञानाचा अथवा अज्ञानाचा व्यवहार माझ्याकडूनच सिद्ध होतो. (म्हणजे या दोन्ही व्यवहारांना माझी सत्ताच कारणीभूत आहे). ॥१५-४३१॥
म्हणौनि जैसा असें तैसया । मातें नेणोनि धनंजया ।
वेदु जाणों गेला तंव तया । जालिया शाखा ॥ ४३२ ॥
म्हणून अर्जुना, जसा मी आहे तशा मला न जाणून वेद जाणायला गेला, तो (मी वेदाकडून यथार्थ न जाणला गेल्यामुळे) त्या वेदाचे भाग झाले. ॥१५-४३२॥
तरी तिहीं शाखाभेदीं । मीचि जाणिजे त्रिशुद्धी ।
जैसा पूर्वापरा नदी । समुद्रचि ठी ॥ ४३३ ॥
तरी वेदाच्या त्या वेगवेगळ्या शाखांनी मीच एक खरोखर जाणला जातो. तो कसा तर) ज्याप्रमाणे पूर्वेकडून अथवा पश्चिमेकडून वहाणार्‍या नद्याना (एक) समुद्रच शेवटी मिळण्याचे ठिकाण होतो. ॥१५-४३३॥
आणि महासिद्धांतापासीं । श्रुति हारपतीं शब्देंसीं ।
जैसिया सगंधा आकाशीं । वातलहरी ॥ ४३४ ॥
आणि ‘एकमेवाद्वितीयं ब्रह्म’ या महासिद्धांताजवळ ज्याप्रमाणे वेद शब्दांसह नाहीसे होतात, ज्याप्रमाणे वार्‍याच्या गंधयुक्त झुळुका आकाशात नाहीशा होतात, ॥१५-४३४॥
तैसें समस्तही श्रुतिजात । ठाके लाजिले ऐसें निवांत ।
तें मीचि करीं यथावत । प्रकटोनियां ॥ ४३५ ॥
त्याप्रमाणे सर्व वेद लाजल्यासारखे निवांत रहातात. (त्यांच्या अर्थाचा बहुतेक लोप झालेला असतो). ते मी प्रगट करून यथावत करतो. ॥१५-४३५॥
पाठीं श्रुतिसकट अशेष । जग हारपे जेथ निःशेष ।
तें निजज्ञानही चोख । जाणता मीचि ॥ ४३६ ॥
नंतर वेदांसह संपूर्ण जगत् जेथे (ज्या शुद्ध आत्मज्ञानात संपूर्ण नाहीसे होते, ते शुद्ध् आत्मज्ञान जाणणारा मीच आहे. ॥१५-४३६॥
जैसें निदेलिया जागिजे । तेव्हां स्वप्नींचे कीर नाहीं दुजें ।
परी एकत्वही देखों पाविजे । आपलेंचि ॥ ४३७ ॥
ज्याप्रमाणे निजलेल्यास जागे केले म्हणजे त्यावेळीच त्यास स्वप्नात भासलेले द्वैत अजिबात नाहीसे होते, एवढेच नाही तर त्यास पूर्ववत आपल्या एकाकीपणाचे भानही होते ॥१५-४३७॥
तैसें आपलें अद्वयपण । मी जाणतसें दुजेनवीण ।
तयाही बोधाकारण । जाणता मीचि ॥ ४३८ ॥
त्याप्रमाणे माझा अद्वैतपणा मी द्वैतसंबंधाशिवाय जाणतो. (म्हणजे द्वैत काही नाही, तर मीच एक आहे असे जाणतो). व मीच एक आहे, अशा ज्ञानालाही जाणण्यास मीच कारण झालो आहे. ॥१५-४३८॥
मग आगी लागलिया कापुरा । ना काजळी ना वैश्वानरा ।
उरणें नाहीं वीरा । जयापरी ॥ ४३९ ॥
मग कापुराला अग्नी लागला असता अर्जुना, ज्याप्रमाणे काजळी (राख) अथवा अग्नि (काहीच) उरत नाही, ॥१५-४३९॥
तेवीं समूळ अविद्या खाये । तें ज्ञानही जैं बुडोनि जाये ।
तर्‍ही नाहीं कीर नोहे । आणि न साहे असणेंही ॥ ४४० ॥
त्याप्रमाणे संपूर्ण अविद्येला नाहीसे करणारे जे ज्ञान ते देखील जेव्हा नाहीसे होते, तेव्हा जे (आत्मस्वरूप) ‘नाही’ असे खरोखर नाही (मग आत्मस्वरूप आहे असे म्हणा) तर त्याला आहे हेही म्हणणे सहन होत नाही. ॥१५-४४०॥
पैं विश्व घेऊनि गेला मागेंसीं । तया चोरातें कवण कें गिंवसी ? ।
जे कोणी एकी दशा ऐसी । शुद्ध ते मी ॥ ४४१ ॥
मागासह जो विश्व घेऊन गेला, त्या चोराला कोण कोठे शोधील ? अशी जी कोणी एक शुद्धावस्था आहे, ती मी आहे. ॥१५-४४१॥
ऐसी जडाजडव्याप्ती । रूप करितां कैवल्यपती ।
ठी केली निरुपहितीं । आपुल्या रूपीं ॥ ४४२ ॥
याप्रमाणे मोक्षाच्या स्वामींनी (श्रीकृष्णांनी) चराचरातील आपल्या व्याप्तीचे वर्णन करता करता आपल्या निरुपाधिक रूपात त्या व्याख्यानाचे पर्यवसान केले. ॥१५-४४२॥
तो आघवाचि बोधु सहसा । अर्जुनीं उमटला कैसा ।
व्योमींचा चंद्रोदयो जैसा । क्षीरार्णवीं ॥ ४४३ ॥
तो सर्व बोध अर्जुनाच्या ठिकाणी एकदम कसा उमटला तर आकशातील चंद्राचा उदय जसा क्षीरसमुद्रात प्रतिबिंबित होतो, तसा. ॥१५-४४३॥
कां प्रतिभिंती चोखटे । समोरील चित्र उमटे ।
तैसा अर्जुनें आणि वैकुंठें । नांदतसे बोधु ॥ ४४४ ॥
अथवा ज्या भिंतीवर चित्र काढली आहेत, त्या भिंतीच्या समोरील भिंत जर आरशासारखी प्रतिबिंब ग्रहण करणारी अशी चकचकित असेल तर तिच्यात त्या चित्रांचे प्रतिबिंब जसे स्वच्छ उमटते त्याप्रमाणे अर्जुनामधे व श्रीकृष्णामधे एक बोध नांदत आहे. ॥१५-४४४॥
तरी बाप वस्तुस्वभावो । फावे तंव तंव गोडिये थांवो ।
म्हणौनि अनुभवियांचा रावो । अर्जुन म्हणे ॥ ४४५ ॥
तरी काय आश्चर्य आहे ! पहा की ते वस्तूचे स्वरूप जो जो अनुभावास येते तो तो त्याच्या संबंधीची गोडी अधिक बळावत जाते आणि म्हणूनच अनुभव्यांचा राजा अर्जुन म्हणाला, ॥१५-४४५॥
जी व्यापकपण बोलतां । निरुपाधिक जें आतां ।
स्वरूप प्रसंगता । बोलिले देवो ॥ ४४६ ॥
महाराज, आपल्या व्यापकपणाचे वर्णन आपण करीत असता प्रसंगानुसार, हे देवाने (आपण) आपले जे निरुपाधिक स्वरूप सांगितले. ॥१५-४४६॥
ते एक वेळ अव्यंगवाणें । कीजो कां मजकारणें ।
तेथ द्वारकेचा नाथु म्हणे । भलें केलें ॥ ४४७ ॥
तेच (निरुपाधिक स्वरूप) मला पुन्हा एक वेळ काही न्यून न ठेवता सांगा. येथे (असे अर्जुन म्हणला तेव्हा) द्वारकेचे राजे श्रीकृष्ण म्हणाले, चांगले केलेस. ॥१५-४४७॥
पैं अर्जुना आम्हांहि वाडेंकोडें । अखंडा बोलों आवडे ।
परी काय कीजे न जोडे । पुसतें ऐसें ॥ ४४८ ॥
अर्जुना, आम्हाला देखील मोठ्या कौतुकाने नेहेमी याविषयी बोलणे आवडते. परंतु काय करावे ? तसा विचारणारा मिळत नाही. ॥१५-४४८॥
आजि मनोरथांसि फळ । जोडलासि तूं केवळ ।
जे तोंड भरूनि निखळ । आलासि पुसों ॥ ४४९ ॥
आज तू एकटाच आमच्या मनोरथाला फळ मिळाला आहेस. (आमची जी निरूपाधिकस्वरूप वर्णन करण्याची इच्छा, ती सफल करणारा आज तू एकटाच भेटला आहेस). कारण की, तू मोठ्या हौसेने केवळ हेच (निरुपाधिक स्वरूपाविषयीच) विचार करण्यास आला आहेस. ॥१५-४४९॥
जें अद्वैताहीवरी भोगिजे । तें अनुभवींच तूं विरजे ।
पुसोनि मज माझें । देतासि सुख ॥ ४५० ॥
अद्वैताही पलीकडला जो जो अनुभव भोगायचा, त्या अनुभवाचा (तो अनुभव घेण्यास) तू साह्य करणारा आहेस व निरुपाधिक स्वरूपाविषयी प्रश्न) विचारून तू माझे सुख मला देत आहेस. ॥१५-४५०॥
जैसा आरिसा आलिया जवळां । दिसे आपणपें आपला डोळा ।
तैसा संवादिया तूं निर्मळा । शिरोमणी ॥ ४५१ ॥
ज्याप्रमाणे आरसा जवळ आला असता आपल्या दृष्टीने आपले स्वरूप आपल्यास दिसते, त्याप्रमाणे शुद्ध संवाद करणार्‍यांमधे तू श्रेष्ठ आहेस. ॥१५-४५१॥
तुवां नेणोनि पुसावें । मग आम्ही परिसऊं बैसावें ।
तो गा हा पाडु नव्हे । सोयरेया ॥ ४५२ ॥
तुला ही गोष्ट कळत नाही, म्हणून तू ती विचारावीस आणि मग ती गोष्ट तुला ऐकवण्याकरता आम्ही (तयार व्हावे), आवडत्या अर्जुना, त्यासारखा हा प्रकार नाही. ॥१५-४५२॥
ऐसें म्हणौनि आलिंगिलें । कृपादृष्टी अवलोकिलें ।
मग देवो काय बोलिले । अर्जुनेंसीं ॥ ४५३ ॥
असे म्हणून देवांनी अर्जुनास आलिंगन दिले व कृपादृष्टीने त्याला पाहिले व मग अर्जुनाशी देव काय बोलले ? ॥१५-४५३॥
पैं दोहीं वोठीं एक बोलणें । दोहीं चरणीं एक चालणें ।
तैसें पुसणें सांगणें । तुझें माझें ॥ ४५४ ॥
जसे दोन ओठ पण बोलणे एक, पाय दोन पण चालणे एक, त्याप्रमाणे तू पुसणारा व मी सांगणारा ह्या आपल्या दोघांचा अभिप्राय एकच आहे. ॥१५-४५४॥
एवं आम्ही तुम्ही येथें । देखावें एका अर्थातें ।
सांगतें पुसतें येथें । दोन्ही एक ॥ ४५५ ॥
याप्रमाणे प्रस्तुत श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, आम्ही व तू एकवस्तुरूप आहोत, असे तू समज. या प्रसंगी व्याख्यान करणारा उपदेशक मी व प्रश्न करणारा श्रोता तू असे तत्वत: दोघेही एकच आहोत. ॥१५-४५५॥
ऐसा बोलत देवो भुलला मोहें । अर्जुनातें आलिंगूनि ठाये ।
मग बिहाला म्हणे नोहें । आवडी हे ॥ ४५६ ॥
मग बिचकले व म्हणाले की हे ऐक्याचे प्रेम या ठिकाणी उपयोगी नाही. ॥१५-४५६॥
जाले इक्षुरसाचें ढाळ । तरी लवण देणें किडाळ ।
जे संवादसुखाचें रसाळ । नासेल थितें ॥ ४५७ ॥
कोणत्याही पदार्थाला मीठ लावले असता त्या पदार्थाला रुची येते, तरी पण उसाच्या रसाच्या बनलेल्या ढेपीला रुचिकरता मीठ लावणे वाईट आहे (कारण त्या योगाने गुळाला रुची न येता गुळाच्या असलेल्या गोडीचा नाश होईल), त्याप्रमाणे ऐक्याचे प्रेम हे चांगले आहे, परंतु संवादाच्या प्रसंगी ते चांगले नाही, कारण त्यामुळे संवादसुखाची असलेली गोडी नाहीशी होईल. ॥१५-४५७॥
आधींच आम्हां यया कांहीं । नरनारायणासी भिन्न नाहीं ।
परी आतां जिरो माझ्या ठाईं । वेगु हा माझा ॥ ४५८ ॥
आम्ही नारायण व हा अर्जुन नर असल्यामुळे आम्हा दोघांमधे मूळचाच भिन्नपणा नाही. पण ही माझी ऐक्यप्रेमाची उकळी माझ्या ठिकाणी आता नाहीशी होवो. ॥१५-४५८॥
इया बुद्धी सहसा । श्रीकृष्ण म्हणे वीरेशा ।
पैं गा तो तुवां कैसा । प्रश्नु केला ? ॥ ४५९ ॥
अशा बुद्धीने श्रीकृष्ण एकदम म्हणाले, हे वीरश्रेष्ठा अर्जुना, तो प्रश्न तू कसा केलास ? ॥१५-४५९॥
जो अर्जुन श्रीकृष्णीं विरत होता । तो परतोनि मागुता ।
प्रश्नावळीची कथा । ऐकों आला ॥ ४६० ॥
जो अर्जुन श्रीकृष्णस्वरूपात (देहबुद्धी विसरून) नाहीसा होत होता, (देवाशी ऐक्यास येत होता), तो आपण केलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे ऐकण्याकरता पुन्हा माघारी (देहबुद्धीवर) आला. ॥१५-४६०॥
तेथ सद्‍गदें बोलें । अर्जुनें जी जी म्हणितलें ।
निरुपाधिक आपुलें । रूप सांगा ॥ ४६१ ॥
यावर अर्जुन कंठ दाटून म्हणाला, महाराज आपले निरुपाधिक स्वरूप तुम्ही सांगा, असे मी म्हणालो. ॥१५-४६१॥
यया बोला तो शारङ्गी । तेंचि सांगावयालागीं ।
उपाधी दोहीं भागीं । निरूपीत असे ॥ ४६२ ॥
असे अर्जुनाने म्हटल्यावर तो शार्ङ्गधर श्रीकृष्ण तेच सांगण्याकरता उपाधि दोन प्रकारांनी सांगावयास लागला. ॥१५-४६२॥
पुसिलिया निरुपहित । उपाधि कां सांगे येथ ।
हें कोण्हाही प्रस्तुत । गमे जरी ॥ ४६३ ॥
अर्जुनाने निरुपाधिक स्वरूपासंबंधाने प्रश्न विचारला असता देव येथे उपाधि का सांगत आहेत, असे जर सध्या कोणासही वाटत असेल, ॥१५-४६३॥
तरी ताकाचें अंश फेडणें । याचि नांव लोणी काढणें ।
चोखाचिये शुद्धी तोडणें । कीडचि जेवीं ॥ ४६४ ॥
तर मंथन करून दह्यातून ताकाचा भग वेगळा करणे, यालाच कोणी लोणी काढणे असे म्हणतात, अथवा ज्याप्रमाणे शुद्ध सोने शोधण्यास अशोधित धातु निवडून त्यातून हिणकस धातु बाहेर कढावी लागते. ॥१५-४६४॥
बाबुळीचि सारावी हातें । परी पाणी तंव असे आइतें ।
अभ्रचि जावें गगन तें । सिद्धचि कीं ॥ ४६५ ॥
पाण्यावरचे गोंडाळ हाताने एका बाजूला सारावे पण पाणी जसे आयते असते, (अथवा) आकाशातील ढगच गेले की आकाश स्वत:सिद्ध आहेच ॥१५-४६५॥
वरील कोंडियाचा गुंडाळा । झाडूनि केलिया वेगळा ।
कणु घेतां विरंगोळा । असे काई ? ॥ ४६६ ॥
धान्यावरील कोंड्याचे आच्छादन झाडून दूर केले की शुद्ध धान्य घेण्यास हरकत आहे काय ? ॥१५-४६६॥
तैसा उपाधि उपहितां । शेवटु जेथ विचारितां ।
तें कोणातेंही न पुसतां । निरुपाधिक ॥ ४६७ ॥
त्याप्रमाणे विचार करावयास लागले असता अज्ञानादि उपाधि व त्या उपाधींच्या संबंधाने असणारे उपहित चैतन्य, या दोहोंचा ज्या स्वरूपी शेवट होतो, ते निरुपाधिक (शुद्ध चैतन्य) होय, हे कोणालाही न पुसता खुशाल समजावे. ॥१५-४६७॥
जैसें न सांगणेंवरी । बाळा पतीसी रूप करी ।
बोल निमालेपणें विवरी । अचर्चातें ॥ ४६८ ॥
नवीन लग्न झालेल्या लहान मुलीस वेगवेगळ्या पुरुषांचे नाव घेऊन ‘हा तुझा नवरा का’ असे विचारत असता, प्रत्येक नावास ‘नाही, नाही’ म्हणून म्हणणारी ती मुलगी, ज्या नावाच्या उच्चाराबरोबर लाजेने मुरकून गप्प बसते, त्या न बोलण्यातच ती आपला नवरा दाखवते, त्याप्रमाणे स्थूल-सूक्ष्म प्रपंच हा परमात्मा आहे काय ? असे विचारले असता ती श्रुतिवधु, तो प्रपंच परमात्मा नाही, असे सांगते व शब्दांकडून न होणार्‍या परमात्म्याचे स्वरूपलक्षण आले म्हणजे गप्प बसते व या गप्प बसण्यातच परमात्म्याच्या स्वरूपास सुचवते. ॥१५-४६८॥
पैं सांगणेया जोगें नव्हे । तेथींचें सांगणें ऐसें आहे ।
म्हणौनि उपाधि लक्ष्मीनाहे । बोलिजे आदीं ॥ ४६९ ॥
त्याप्रमाणे जे (निरुपाधिक स्वरूप) सांगण्याजोगे नाही, ते स्वरूप सांगण्याचा असा प्रकार आहे. (म्हणजे ते स्वरूप साक्षात् शब्दांनी सांगता येत नाही, म्हणून उपाधीचे वर्णन करणे हेच त्याचे सांगणे होय). म्हणून लक्ष्मीपती जे श्रीकृष्ण, ते प्रथम उपाधि सांगतात. ॥१५-४६९॥
पाडिव्याची चंद्ररेखा । निरुती दावावया शाखा ।
दाविजे तेवीं औपाधिका । बोली इया ॥ ४७० ॥
शुक्ल पक्षातील प्रतिपदेची चंद्रकोर नेमकी दाखवण्याकरता जशी झाडाची फांदी दाखवावी लागते, त्याप्रमाणे हे उपाधीचे वर्णन करणे आहे. ॥१५-४७०॥
मग तो म्हणे गा सव्यसाची । पैं इये संसारपाटणींची ।
वस्ती साविया टांची । दुपुरुषीं ॥ ४७१ ॥
मग ते श्रीकृष्ण म्हणाले, अरे अर्जुना, या संसाररूपी नगरातील वस्ती स्वभावत:च अल्प अशा दोन पुरुषांचीच आहे. ॥१५-४७१॥

द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च ।
क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते ॥ १६ ॥
या जगामधे क्षर व अक्षर असे हे दोन पुरुष आहेत. क्षर म्हणजे सर्व भूते. मायोपाधीने युक्त असे जे चैतन्य त्यास अक्षर म्हणतात. ॥१५-१६॥
जैसी आघवांचि गगनीं । नांदत दिवोरात्री दोन्ही ।
तैसे संसार राजधानीं । दोन्हीचि हे ॥ ४७२ ॥
ज्याप्रमाणे आकाशात दिवस व रात्र ही दोनच नांदतात, त्याप्रमाणे या संसाररूपी राजधानीत हे दोघेच नांदतात. ॥१५-४७२॥
आणिकही तिजा पुरुष आहे । परी तो या दोहींचें नांव न साहे ।
जो उदेला गांवेंसीं खाये । दोहींतें ययां ॥ ४७३ ॥
आणखीही एक तिसरा पुरुष आहे, परंतु तो या दोघाचे नाव सहन करत नाही व तो प्रगट झाला असता, या दोघांना त्यांच्या गावासकट खातो. ॥१५-४७३॥
परी ते तंव गोठी असो । आधीं दोन्हींची हे परियेसों ।
जें संसारग्रामा वसों । आले असती ॥ ४७४ ॥
परंतु ती (तिसर्‍या पुरुषाची) तर गोष्ट राहू दे, आधी हे जे दोन संसाररूपी गावात वस्तीला आहे आहेत त्यांच्याविषयीच तुला ऐकवतो. ॥१५-४७४॥
एक आंधळा वेडा पंगु । येर सर्वांगें पुरता चांगु ।
परी ग्रामगुणें संगु । घडला दोघां ॥ ४७५ ॥
त्या दोघांपैकी एक आंधळा (ज्ञानदृष्टिहीन) वेडा (भ्रमाने देहादिकास मी म्हणणारा व पांगळा (उपाधीतंत्र झाल्यामुळे तिच्याशिवाय काहीच करण्यास करता येत नाही असा) आहे व दुसरा सर्वांगाने पुरता चांगला आहे, परंतु दोघेही एकाच गावात रहात असल्याकारणाने उभायतांची संगती जडली आहे. ॥१५-४७५॥
तया एका नाम क्षरु । येरातें म्हणती अक्षरु ।
इहीं दोहींचि परी संसारु । कोंदला असे ॥ ४७६ ॥
त्यापैकी एकाचे नाव क्षर व दुसर्‍यास अक्षर असे म्हणतात. हे आहेत दोघेच, परंतु या दोघांनीच सर्व संसार ठेचून भरला आहे. ॥१५-४७६॥
आतां क्षरु तो कवणु । अक्षरु तो किं लक्षणु ।
हा अभिप्रायो संपूर्णु । विवंचूं गा ॥ ४७७ ॥
आता क्षर पुरुष तो कोण व अक्षरपुरुषाचे लक्षन काय आहे हा सर्व अभिप्राय अर्जुना स्पष्ट करून सांगू. ॥१५-४७७॥
तरी महदहंकारा- । लागुनियां धनुर्धरा ।
तृणांतींचा पांगोरा- । वरी पैं गा ॥ ४७८ ॥
(या ओवीपासून तो ४८६ ओवीच्या पूर्वाधाअखेर क्षर पुरुषाच्या उपाधीवचे वर्णन करतात) तर अर्जुना, महतत्व अहंकारापासून तो शेवटच्या गवताच्या टोकापर्यंत ॥१५-४७८॥
जें कांहीं सानें थोर । चालतें अथवा स्थिर ।
किंबहुना गोचर । मनबुद्धींसि जें ॥ ४७९ ॥
जे काही लहान मोठे, जंगम व स्थावर फार काय सांगावे ? जे मन व बुद्धि यांच्याकडून जाणले जाते ॥१५-४७९॥
जेतुलें पांचभौतिक घडतें । जें नामरूपा सांपडतें ।
गुणत्रयाच्या पडतें । कामठां जें ॥ ४८० ॥
जेवढे म्हणून पंचमहाभूतांनी तयार झाले आहे, नाम व रूप यामधे जे जे सापडले आहे व जे तीन गुणांच्या टांकसाळीपासून उत्पन्न होते ॥१५-४८०॥
भूताकृतीचें नाणें । घडत भांगारें जेणें ।
काळासि जूं खेळणें । जिहीं कवडां ॥ ४८१ ॥
प्राणिमात्रांचे आकाररूपी नाणे ज्या सोन्याचे बनते, अथवा काळ ज्या धनाने जुगार खेळतो ॥१५-४८१॥
जाणणेंचि विपरीतें । जें जें कांहीं जाणिजेतें ।
जें प्रतिक्षणीं निमतें । होऊनियां ॥ ४८२ ॥
विपरीत ज्ञानानेच जे जे काही काही समजले जाते अथवा जे जे प्रत्येक क्षणात उत्पन्न होऊन नाहीसे होते, ॥१५-४८२॥
अगा काढूनि भ्रांतीचे दांग । उभवी सृष्टीचें आंग ।
हें असो बहु जग । जया नाम ॥ ४८३ ॥
अरे अर्जुना, भ्रांतिरूपी जंगल कापून (त्या जंगलातील लाकडांनी) जो सृष्टीचा आकार उभारला जातो, हे फार वर्णन करणे राहू दे, ज्याला जग असे म्हनतात ॥१५-४८३॥
पैं अष्टधा भिन्न ऐसें । जें दाविलें प्रकृतिमिसें ।
जें क्षेत्रद्वारां छत्तिसें । भागी केलें ॥ ४८४ ॥
जे आठ प्रकारचे वेगळे वेगळे करून प्रकृतीच्या रूपाने मागे (अध्याय ७-४) मधे दाखवले आणि जे क्षेत्र म्हणून छत्तीस भाग करून (अध्याय १३-५, ६ मधे) वर्णन केले ॥१५-४८४॥
हें मागील सांगों किती । अगा आतांचि जें प्रस्तुतीं ।
वृक्षाकार रूपाकृती । निरूपिलें ॥ ४८५ ॥
ते मागले किती सांगू ? अरे अर्जुना, आताच या पंधराव्या अध्यायात (श्लोक १ व २ मधे) वृक्षाच्या आकाराच्या रूपकाने जे काही सांगितले ॥१५-४८५॥
तें आघवेंचि साकारें । कल्पुनी आपणपयां पुरे ।
जालें असें तदनुसारें । चैतन्यचि ॥ ४८६ ॥
ते सर्व साकार जगत् (स्थूल व सूक्ष्म देह) आपल्याला (रहाण्याला) गाव असे कल्पून त्यासारखे चैतन्य आपणच बनले. (ते गावच म्हणजे स्थूल, सूक्ष्म देहच आपण आहोत असे चैतन्य समजू लागले). ॥१५-४८६॥
जैसा कुहां आपणचि बिंबें । सिंह प्रतिबिंब पाहतां क्षोभे ।
मग क्षोभला समारंभें । घाली तेथ ॥ ४८७ ॥
ज्याप्रमाणे सिंह आडात आपणच प्रतिबिंबित होतो व त्यात पडलेले आपले प्रतिबिंब पाहून तो खवळतो आणि मग त्या आवेशाने आडात उडी घालतो ॥१५-४८७॥
कां सलिलीं असतचि असे । व्योमावरी व्योम बिंबे जैसें ।
अद्वैत होऊनि तैसें । द्वैत घेपे ॥ ४८८ ॥
अथवा पाण्यामधे मूळचे आकाश असून त्या आकाशावरच बाहेरल्या आकाशाचे प्रतिबिंब पडते, त्याप्रमाणे चैतन्य हे मूळचे अद्वैत असून द्वैताशी तादात्म्य करते. ॥१५-४८८॥
अर्जुना गा यापरी । साकार कल्पूनि पुरीं ।
आत्मा विस्मृतीचि करी । निद्रा तेथ ॥ ४८९ ॥
अरे अर्जुना, याप्रमाणे आकारवान शरीर हेच नगर कल्पून आत्मा तेथे (आपला आपल्याला) विसर, हीच झोप घेतो. ॥१५-४८९॥
पैं स्वप्नीं सेजार देखिजे । मग पहुडणें जैसें तेथ कीजे ।
तैसें पुरीं शयन देखिजे । आत्मयासी ॥ ४९० ॥
(मागील ओवीवरून कोणाला असे वाटेल की चैतन्य खरोखरीच निजते काय ? तर त्याचे समाधान या ओवीत उदाहरणाने करतात) स्वप्नात बिछाना पहावा व तेथे स्वप्नातच जसे निजावे, त्याप्रमाणे आत्म्याला साकार शरीररूपी नगरात निजणे आहे, असे समज. ॥१५-४९०॥
पाठीं तिये निद्रेचेनि भरें । मी सुखी दुःखी म्हणत घोरें ।
अहंममतेचेनि थोरें । वोसणायें सादें ॥ ४९१ ॥
नंतर त्या निद्रेच्या भराने (विसररूपी गाढ झोप लागल्यामुळे) मी सुखी, मी दु:खी असे म्हणणेरूप घोरतो व मी, या गाढ झोपेत मोठ्याने बरळतो. ॥१५-४९१॥
हा जनकु हे माता । हा मी गौर हीन पुरता ।
पुत्र वित्त कांता । माझें हें ना ॥ ४९२ ॥
हा बाप, ही आई, हा मी गोरा, व्यंग असलेला किंवा पुरता (अव्यंग), हा मुलगा, हे धन आणि ही स्त्री ही माझी नाहीत काय ? ॥१५-४९२॥
ऐसिया वेंघोनि स्वप्ना । धांवत भवस्वर्गाचिया राना ।
तया चैतन्या नाम अर्जुना । क्षर पुरुषु गा ॥ ४९३ ॥
अशा स्वप्नावर स्वार होऊन जे चैतन्य संसार व स्वर्गरूपी रानात धावते, अर्जुना, त्या चैतन्याला क्षर पुरुष असे नाव आहे. ॥१५-४९३॥
आतां ऐक क्षेत्रज्ञु येणें । नामें जयातें बोलणें ।
जग जीवु कां म्हणे । जिये दशेतें ॥ ४९४ ॥
आता अर्जुना, ऐक. क्षेत्रज्ञ या नावाने ज्याचा उल्लेख करतात अथवा ज्या अवस्थेला सर्व लोक जीव असे म्हणतात ॥१५-४९४॥
जो आपुलेनि विसरें । सर्व भूतत्वें अनुकरें ।
तो आत्मा बोलिजे क्षरें । पुरुष नामें ॥ ४९५ ॥
जो आपल्या स्वरूपाच्या विसरामुळे सर्व भूतांच्यासारखा होतो (म्हणजे ज्या ज्या शरीरादि सर्व उपाधीशी संबंध येईल त्या त्या सर्व उपाधीच माझे स्वरूप आहेत, असा अभिमान घेतो) त्या आत्म्याला क्षरपुरुष असे म्हणतात. ॥१५-४९५॥
जे तो वस्तुस्थिती पुरता । म्हणौनि आली पुरुषता ।
वरी देहपुरीं निदैजतां । पुरुषनामें ॥ ४९६ ॥
(आता क्षर चैतन्याला पुरुष का म्हणावयाचे त्याची दोन कारणे या ओवीत सांगतात). (जरी या क्षर चैतन्याने उपाधीशी तादात्म्य केले आहे तरी) तो वस्तुस्थितीने (आत्मस्वरूपाने) पूर्ण आहे, म्हणून त्याचे ठिकाणी पुरुषपणा आला आहे. शिवाय तो देहरूपी नगरात निजणारा आहे. म्हणून त्याला क्षरपुरुष हे नाव आहे. ॥१५-४९६॥
आणि क्षरपणाचा नाथिला । आळु यया ऐसेनि आला ।
जे उपाधींचि आतला । म्हणौनियां ॥ ४९७ ॥
(आता याला क्षर पुरुष का म्हणावयाचे, त्याचे कारण या ओवीपासून ५०० ओवीअखेरपर्यंत सांगतात). आणि तो (कामाने) उपाधीशी तादात्म्य करून राहिला आहे म्हणून याच्यावर क्षरपणाचा नसलेला आरोप आला. ॥१५-४९७॥
जैसी खळाळीचिया उदका- । सरसीं आंदोळे चंद्रिका ।
तैसा विकारां औपाधिका । ऐसाचि गमे ॥ ४९८ ॥
ज्याप्रमाणे खळखळ वहाणार्‍या पाण्याबरोबर त्या पाण्यात पडलेले चंद्राचे प्रतिबिंब उसळते, (खालीवर झाल्यासारखे वाटते) त्याप्रमाणे हा क्षरपुरुष उपाधीच्या विकारामुळे क्षर (नाश पावणारा) असाच वाटतो. ॥१५-४९८॥
कां खळाळु मोटका शोषे । आणि चंद्रिका तैं सरिसींच भ्रंशे ।
तैसा उपाधिनाशीं न दिसे । उपाधिकु ॥ ४९९ ॥
अथवा खळखळ वाहणारे पाणी आटते आणि त्याबरोबरच चंद्राच्या तेजाचे प्रतिबिंब नाहीसे होते. ॥१५-४९९॥
ऐसें उपाधीचेनि पाडें । क्षणिकत्व यातें जोडे ।
तेणें खोंकरपणें घडे । क्षर हें नाम ॥ ५०० ॥
याप्रमाणे याला उपाधीच्या योगाने क्षणिकत्व प्राप्त झाले आहे. उपाधीच्या त्या नाशिवंतपणामुळे यास क्षर हे नाव प्राप्त झाले आहे. ॥१५-५००॥
एवं जीवचैतन्य आघवें । हें क्षर पुरुष जाणावें ।
आतां रूप करूं बरवें । अक्षरासी ॥ ५०१ ॥
याप्रमाणे सर्व जीवचैतन्य, हे क्षरपुरुष आहे असे समजावे. आता अक्षरपुरुषाची चांगली कल्पना येईल असे वर्णन करून सांगतो ॥१५-५०१॥
तरी अक्षरु जो दुसरा । पुरुष पैं धनुर्धरा ।
तो मध्यस्थु गा गिरिवरां । मेरु जैसा ॥ ५०२ ॥
(या ओवीपासून ५२० व्या ओवीपर्यंत अक्षर पुरुषाची उपाधी सांगितली आहे). तर अर्जुना दुसरा जो अक्षर पुरुष आहे, तो यथार्थज्ञान व विपरीत ज्ञान यांच्या मध्यभागी आहे. ज्याप्रमाणे मेरुपर्वत हा मोठमोठ्या पर्वतांच्या मध्यभागी आहे ॥१५-५०२॥
जे तो पृथ्वी पाताळ स्वर्गीं । इहीं न भेदे तिहीं भागीं ।
तैसा दोहीं ज्ञानाज्ञानांगीं । पडेना जो ॥ ५०३ ॥
कारण की तो मेरु पर्वत पृथ्वी, पाताळ व स्वर्ग या तीन लोकांमुळे तीन ठिकाणी वाटला जात नाही. त्याप्रमाणे जो ज्ञान (यथार्थ ज्ञान) व अज्ञान (विपरीत ज्ञान) या दोहोंशी संबंध करीत नाही, (यथार्थ ज्ञानाने ‘मी ब्रह्म आहे असे समजत नाही’ व विपरीत ज्ञानाने ‘मी देह’ असेही समजत नाही). ॥१५-५०३॥
ना यथार्थज्ञानें एक होणें । ना अन्यथात्वें दुजें घेणें ।
ऐसें निखिळ जें नेणणें । तेंचि तें रूप ॥ ५०४ ॥
‘मी ब्रह्म’ अशा यथार्थ ज्ञानाने ब्रह्माशी एक न होणे (अथवा) विपरीत ज्ञानाने द्वैत न घेणे याप्रमाणे यथार्थ ज्ञान व विपरीत ज्ञान ही दोन्हीही जेथे नाहीत असे निव्वळ जे अज्ञान, तेच त्या अक्षरपुरुषाचे स्वरूप होय. ॥१५-५०४॥
पांसुता निःशेष जाये । ना घटभांडादि होये ।
तया मृत्पिंडा ऐसें आहे । मध्यस्थ जें ॥ ५०५ ॥
(मातीचा) धूळपणा पूर्णपणे जातो व घागर अथवा भांडे वगैरे काही होत नाही अशा त्या चिखलाच्या गोळ्यासारखे जे (अक्षर-पुरुषाचे स्वरूप) मध्यस्थ आहे ॥१५-५०५॥
पैं आटोनि गेलिया सागरु । मग तरंगु ना नीरु ।
तया ऐशी अनाकारु । जे दशा गा ॥ ५०६ ॥
समुद्र आटल्यावर मग लाट नाही अथवा पाणीही नाही, त्यासारखी जी आकाररहित अवस्था आहे, ॥१५-५०६॥
पार्था जागणें तरी बुडे । परी स्वप्नाचें कांहीं न मांडे ।
तैसिये निद्रे सांगडें । न्याहाळणें जें ॥ ५०७ ॥
अर्जुना, जगणे तर पार नाहीसे होते, परंतु स्वप्नाचा काही आरंभ होत नाही (अशी जी गाढ निद्रा) त्या गाढ निद्रेसारखे अक्षर पुरुषाचे स्वरूप समजावे. ॥१५-५०७॥
विश्व आघवेंचि मावळे । आणि आत्मबोधु तरी नुजळे ।
तिये अज्ञानदशे केवळे । अक्षरु नाम ॥ ५०८ ॥
संपूर्ण विश्वाभास नाहीसा होतो आणि आत्मबोध तर प्रकाशित होत नाही त्या केवळ अज्ञानावस्थेला अक्षर असे नाव आहे. अज्ञानाला श्रुतीत ‘अजा’ म्हटले आहे, त्याचा अर्थ जन्म नाही असा आहे. अशाचा (अज्ञानाचा) नाश कोठचा ? व कसा ? म्हणून अज्ञानघन हे अक्षर समज.॥१५-५०८॥
सर्वां कळीं सांडिलें जैसें । चंद्रपण उरे अंवसे ।
रूप जाणावें तैसें । अक्षराचें ॥ ५०९ ॥
सर्व कळांनी रहित असे चंद्राचे कलाशून्य मूळ स्वरूप, जसे अमावास्येस असते, त्य़ाप्रमाणे अक्षराचे स्वरूप आहे, असे समजावे. ॥१५-५०९॥
पैं सर्वोपाधिविनाशें । हे जीवदशा जेथ पैसे ।
फळपाकांत जैसें । झाड बीजीं ॥ ५१० ॥
फळ पिकल्यावर झाड जसे (लीन रूपाने) बीजात रहाते, त्याप्रमाणे सर्व (स्थूल, सूक्ष्म) उपाधीचा नाश झाल्यावर ही जीवदशा जेथे लीन रूपाने असते. ॥१५-५१०॥
तैसें उपाधी उपहित । थोकोनि ठाके जेथ ।
तयातें अव्यक्त । बोलती गा ॥ ५११ ॥
क्षरपुरुषाची देहादि उपाधि व त्या उपाधीचे संबंधाने असणारा क्षरपुरुष (उपहित) ही दोन्ही जेथे लीन होऊन रहातात, त्यास अर्जुना अव्यक्त असे म्हणतात. ॥१५-५११॥
घन अज्ञान सुषुप्ती । तो बीजभावो म्हणती ।
येर स्वप्न हन जागृती । फळभावो तयाचा ॥ ५१२ ॥
पूर्ण अज्ञान ज्या निद्रावस्थेंत असतें, तिला ‘बीजभाव’ असे म्हणतात, व स्वप्न व जागृती ह्यांना ‘फलभाव’ असे म्हणतात. ॥१५-५१२॥
जयासी कां बीजभावो । वेदांतीं केला ऐसा आवो ।
तो तया पुरुषा ठावो । अक्षराचा ॥ ५१३ ॥
ज्या अव्यक्ताला वेदांताने बीजभाव असे नाव दिले आहे, ते या अक्षर पुरुषाचे रहाण्याचे ठिकाण आहे. ॥१५-५१३॥
जेथूनि अन्यथाज्ञान । फांकोनि जागृति स्वप्न ।
नानाबुद्धीचें रान । रिगालें असे ॥ ५१४ ॥
जेथून (ज्या अव्यक्तापासून) विपरीत ज्ञान हे जागृति व स्वप्न या अवस्थांचा विस्तार करून, अनेक बुद्धीचे तरंगरूपी रानात शिरले आहे. ॥१५-५१४॥
जीवत्व जेथुनी किरीटी । विश्व उठतचि उठी ।
ते उभय भेदांची मिठी । अक्षरु पुरुषु ॥ ५१५ ॥
अर्जुना, ज्या अव्यक्तापासून जीवत्व ही कल्पना, विश्व या कल्पनेस उत्पन्न करीत उत्पन्न होते व या दोन्ही कल्पनांचा जेथे लय होतो, तो अक्षर पुरुष समजावा). ॥१५-५१५॥
येरु क्षर पुरुषु कां जनीं । जिहीं खेळे जागृतीं स्वप्नीं ।
तिया अवस्था जो दोन्ही । वियाला गा ॥ ५१६ ॥
दुसरा जो क्षर पुरुष आहे, तो जगात जागृति व स्वप्न या दोन अवस्थांनी खेळतो. त्या दोन अवस्था जो (अक्षरपुरुष) प्रसवला, ॥१५-५१६॥
पैं अज्ञानघनसुषुप्ती । ऐसैसी जे कां ख्याती ।
या उणी एकी प्राप्ती । ब्रह्माची जे ॥ ५१७ ॥
ज्या अवस्थेला ‘अज्ञानघन सुषुप्ति’ असे प्रसिद्ध नाव आहे, त्या अवस्थेच्या प्राप्तीलाच आम्ही ब्रह्मप्राप्ति म्हटले असते, पण हिच्यात पुढील एक उणीव आहे. नाही तर हीच ब्रह्माची प्राप्ती असे म्हटले असते. ॥१५-५१७॥
साचचि पुढती वीरा । जरी न येतां स्वप्न जागरा ।
तरी ब्रह्मभावो साचोकारा । म्हणों येता ॥ ५१८ ॥
खरोखरच अर्जुना, जर हा अक्षर पुरुष पुन: स्वप्न व जागृति अवस्थांप्रत न येता तर यालाच खरोखर ब्रह्मभाव म्हणता आले असते. ॥१५-५१८॥
परी प्रकृतिपुरुषें दोनी । अभ्रें जालीं जियें गगनीं ।
क्षेत्रक्षेत्रज्ञु स्वप्नीं । देखिला जियें ॥ ५१९ ॥
परंतु प्रकृति व पुरुष हे ढग ज्या आकाशात झाले आहेत व क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हेच कोणी स्वप्नातील पदार्थ ज्या निद्रेत दिसतात, ती निद्रा जो (अक्षरपुरुष) आहे, ॥१५-५१९॥
हें असो अधोशाखा । या संसाररूपा रुखा ।
मूळ तें रूप पुरुषा । अक्षराचें ॥ ५२० ॥
हे राहू दे, खाली शाखा असलेल्या या संसारवृक्षाला अक्षरपुरुष हेच मूळ आहे. ॥१५-५२०॥
हा पुरुषु कां म्हणिजे । जे पूर्णपणेंचि निजें ।
पैं मायापुरीं पहुडिजे । तेणेंही बोलें ॥ ५२१ ॥
याला पुरुष का म्हणावयाचे ? तर हा आपल्या स्वरूपाने पूर्णच आहे, शिवाय हा मायापुरीत निजतो, त्या कारणानेही याला पुरुष असे म्हणतात. ॥१५-५२१॥
आणि विकारांची जे वारी । ते विपरीत ज्ञानाची परी ।
नेणिजे जिये माझारीं । ते सुषुप्ती गा हा ॥ ५२२ ॥
आणि विकारांची येरझार, हा जो एक विपरीत ज्ञानाचा प्रकार आहे तो प्रकार ज्या सुषुप्ती अवस्थेमधे समजत नाही, ती सुषुप्ति हा (अक्षर पुरुष) आहे. ॥१५-५२२॥
म्हणौनि यया आपैसें । क्षरणें या नसे ।
आणिकेंही हा न नाशे । ज्ञानाउणें ॥ ५२३ ॥
म्हणून याला स्वभावत: गळणे (नाश) नाही आणि हा पुरुष ज्ञानाशिवाय दुसर्‍या कोणत्याही उपायाने नाश पावत नाही. ॥१५-५२३॥
यालागीं हा अक्षरु । ऐसा वेदांतीं डगरु ।
केला देशी थोरु । सिद्धांताच्या ॥ ५२४ ॥
एवढ्याकरता वेदांतशास्त्रामधे हा अक्षर आहे, अशा सिद्धांताची मोठी प्रसिद्धी आहे, असे दिसून येईल. ॥१५-५२४॥
ऐसें जीवकार्य कारण । जया मायासंगुचि लक्षण ।
अक्षर पुरुषु जाण । चैतन्य तें ॥ ५२५ ॥
याप्रमाणे जे चैतन्य जीवरूपी (क्षरपुरुष) कार्याचे कारक आहे व माया-उपाधीचा आश्रय करून असणे हेच ज्याचे स्वरूप आहे त्या चैतन्यास अक्षर पुरुष हे नाव आहे, असे समज. ॥१५-५२५॥
आतां अन्यथाज्ञानीं । या दोनी अवस्था जया जनीं ।
तया हरपती घनीं । अज्ञानतत्त्वीं ॥ ५२६ ॥
आता लोकांमधे अन्यथा (विपरीत) ज्ञनाच्या ज्या दोन (जागृति व स्वप्न) अवस्था आहेत, त्या गाढ अज्ञानरूप तत्वामधे (सुषुप्तीत) नाहीशा होतात. ॥१५-५२६॥
तें अज्ञान ज्ञानीं बुडालिया । ज्ञानें कीर्तिमुखत्व केलिया ।
जैसा वन्हि काष्ठ जाळूनियां । स्वयें जळे ॥ ५२७ ॥
ते अज्ञान ज्ञानात बुडून नाहीसे झाल्यावर व त्या ज्ञानाने (‘मी ब्रह्म आहे’ ह्या वृत्तिज्ञानाने) कीर्तिमुखत्व केल्यावर (म्हणजे ते ज्ञान नाहीसे झाल्यावर) ज्याप्रमाणे लाकडास लागलेला अग्नि, लाकूड जाळून शेवटी आपणही नाहीसा होतो, ॥१५-५२७॥

उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः ॥
यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः ॥ १७ ॥
या दोहोंहून वेगळा, ज्याला परमात्मा असे म्हणतात, जो त्रैलोक्यात प्रवेश करून त्यास धारण करतो व जो अव्यय व ईश आहे, असा उत्तम पुरुष आहे. ॥१५-१७॥
तैसें अज्ञान ज्ञानें नेलें । आपण वस्तु देऊनि गेलें ।
ऐसें जाणणेंनिवीण उरलें । जाणतें जें ॥ ५२८ ॥
त्याप्रमाणे अहं ब्रह्मास्मि-वृत्तिरूप ज्ञानाने अज्ञान नाहीसे झाल्यावर ते ज्ञान आत्मसाक्षात्कार देऊन आपण नाहीसे झाले. याप्रमाणे (‘मी ब्रह्म’ या वृत्ति) ज्ञानावाचून जे केवळज्ञान उरले, ॥१५-५२८॥
तें तो गा उत्तम पुरुषु । जो तृतीय कां निष्कर्षु ।
दोहींहून आणिकु । मागिला जो ॥ ५२९ ॥
अर्जुना असे वृत्तिज्ञानावाचून जे केवलज्ञान राहिले ते (केवलज्ञान) तो उत्तम पुरुष होय. जो मागील दोहोंहून (क्षर व अक्षर पुरुषांहून) वेगळा, तिसरा व शेवटचा आहे. ॥१५-५२९॥
सुषुप्तीं आणि स्वप्ना- । पासूनि बहुवें अर्जुना ।
जागणें जैसें आना । बोधाचेंचि ॥ ५३० ॥
अर्जुना, सुषुप्ति आणि स्वप्नाहून जागृति जशी पुष्कळ पटीने वेगळ्या बोधाचीच असते, ॥१५-५३०॥
कां रश्मी हन मृगजळा- । पासूनि अर्कमंडळा ।
अफाटु तेवीं वेगळा । उत्तमु गा ॥ ५३१ ॥
अथवा अर्जुना, सूर्यकिरणे व मृगजळ याहून सूर्यमंडल जसे फारच फार वेगळे आहे, त्याप्रमाणे हा उत्तमपुरुष मागील दोन पुरुषांहून वेगळा आहे. ॥१५-५३१॥
हें ना काष्ठींचा काष्ठाहुनी । अनारिसा जैसा वन्ही ।
तैसा क्षराक्षरापासुनी । आनचि तो ॥ ५३२ ॥
हे उदाहरण राहू द्या. लाकडातील सामान्य स्वरूपाचा अग्नि जसा लाकडात असून लाकडाहून भिन्न असतो, तसा तो उत्तम पुरुष क्षर व अक्षर यांच्यात असून सुद्धा क्षराक्षरपुरुषांहून भिन्न आहे. ॥१५-५३२॥
पैं ग्रासूनि आपली मर्यादा । एक करीत नदीनदां ।
उठी कल्पांतीं उदावादा । एकार्णवाचा ॥ ५३३ ॥
कल्पाच्या शेवटी सर्वत्र एक समुद्रच (जलमय) झाला असता, त्याचे पूर्णत्व आपली मर्यादा नाहीशी करून नद व नद्या ह्यांना एकत्र करीत (जसे) प्रगट होते, ॥१५-५३३॥
तैसें स्वप्न ना सुषुप्ती । ना जागराची गोठी आथी ।
जैसी गिळिली दिवोराती । प्रळयतेजें ॥ ५३४ ॥
ज्याप्रमाणे प्रळयकाळच्या तेजाने दिवस व रात्र या दोहींचा निरास करावा, त्याप्रमाणे स्वप्न, सुषुप्ति अथवा जागृति यांची गोष्टही (उत्तम पुरुषाचे ठिकाणी) नाही. ॥१५-५३४॥
मग एकपण ना दुजें । असें नाहीं हें नेणिजे ।
अनुभव निर्बुजे । बुडाला जेथें ॥ ५३५ ॥
मग ज्या ठिकाणी एकपण नाही व त्याच्या सापेक्ष असलेले द्वैतही नाही व आहे अथवा नाही हे जेथे कळत नाही व जेथे अनुभव दिपून नाहीसा झाला ॥१५-५३५॥
ऐसें आथि जें कांहीं । तें तो उत्तम पुरुषु पाहीं ।
जें परमात्मा इहीं । बोलिजे नामीं ॥ ५३६ ॥
अशा तर्‍हेने जे काही आहे, ते तो उत्तम पुरुष आहे, असे समज, आणि त्या उत्तम पुरुषाचा ‘परमात्मा’ या नावाने उल्लेख करतात. ॥१५-५३६॥
तेंही एथ न मिसळतां । बोलणें जीवत्वें पंडुसुता ।
जैसी बुडणेयाची वार्ता । थडियेचा कीजे ॥ ५३७ ॥
अर्जुना, परमात्मा म्हणून त्याविषयी (उत्तम पुरुषाविषयी) जे बोलावयाचे, तेही त्याच्याशी ऐक्याला न पावता जीवदशेत राहून बोलावयाचे. ज्याप्रमाणे बुडणार्‍याची गोष्ट (नदीच्या) काठावर उभा राहिलेला मनुष्य सांगतो ॥१५-५३७॥
तैसें विवेकाचिये कांठीं । उभें ठाकलिया किरीटी ।
परावराचिया गोठी । करणें वेदां ॥ ५३८ ॥
त्याप्रमाणे विचाराच्या हद्दीवर उभे राहून वेदांना अलीकडील व पलीकडील तीरावरच्या गोष्टी करता आल्या. (क्षराक्षरपुरुष हे अलिकडील आहेत व उत्तमपुरुष हा पलीकडील आहे. ह्या दोघांविषयीच्या गोष्टी बोलता आल्या. ॥१५-५३८॥
म्हणौनि पुरुषु क्षराक्षरु । दोन्ही देखोनि अवर ।
यातें म्हणती परु । आत्मरूप ॥ ५३९ ॥
म्हणून क्षराक्षर हे दोन्ही पुरुष अलिकडले (सोपाधिक) आहेत, असे पाहून या उत्तमपुरुषाला पलीकडचा आत्मरूप असे म्हणतात. ॥१५-५३९॥
अर्जुना ऐसिया परी । परमात्मा शब्दवरी ।
सूचिजे गा अवधारीं । पुरुषोत्तमु ॥ ५४० ॥
अर्जुना, ऐक. अशा प्रकारे परमात्मा या शब्दाने त्या उत्तमपुरुषाला सुचवतात. ॥१५-५४०॥
एर्‍हवीं न बोलणेंचि बोलणें । जेथिंचें सर्व नेणिवा जाणणें ।
कांहींच न होनि होणें । जे वस्तु गा ॥ ५४१ ॥
वास्तविक विचार करून पाहिले तर न बोलण्यानेच ज्याचे वर्णन होते, काही न जाणणे, हेच ज्याचे (उत्तम पुरुषाचे) जाणणे होय व इतर काही म्हणजे जीव, शिव व ब्रह्म) न होऊन, ज्या वस्तूचे होणे आहे. ॥१५-५४१॥
सोऽहं तेंही अस्तवलें । जेथ सांगतेंचि सांगणें जालें ।
द्रष्टत्वेंसी गेलें । दृश्य जेथ ॥ ५४२ ॥
ज्या ठिकाणी ‘मी ब्रह्म’ अशी समजूत देखील मावळली, ज्या स्वरूपी सांगणाराच सांगणे झाला व जेथे दृश्य ही कल्पना, द्रष्टा या कल्पनेसह नाहीशी झाली, ॥१५-५४२॥
आतां बिंबा आणि प्रतिबिंबा- । माजीं कैंची हें म्हणों नये प्रभा ? ।
जर्‍ही कैसेनि हे लाभा । जायेचि ना ॥ ५४३ ॥
आता सूर्याचे बिंब व त्याचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब, यांच्या दरम्यान असणारे तेज, जरी कोणात्याही उपायांनी घेता आले नाही, तरी त्यांच्या दरम्यान तेज कोठले ? असे म्हणू नये. ॥१५-५४३॥
कां घ्राणा फुला दोहीं । द्रुती असे जे माझारिलां ठायीं ।
ते न दिसे तरी नाहीं । ऐसें बोलों नये ॥ ५४४ ॥
अथवा नाक व फुले या दोहोंच्या दरम्यान जो सुवास असतो, तो जरी डोळ्यांना दिसत नाही, तरी तो नाही असे म्हणता येत नाही. ॥१५-५४४॥
तैसें द्रष्टा दृश्य हें जाये । मग कोण म्हणे काय आहे ।
हेंचि अनुभवें तेंचि पाहें । रूप तया ॥ ५४५ ॥
त्याप्रमाणे द्रष्टा (पहाणारा) दृश्य (पहाण्याचा विषय) ह्या दोन्ही कल्पना नाहीशा झाल्यावर कोणी असे म्हणेल की त्या ठिकाणी मग काय शिल्लक रहाते ? तर द्रष्टा व दृश्य ह्या कल्पना जाऊन, जी उर्वरीत स्थिती उरते ती (स्थिति) जो अनुभावाने पहातो, तेच त्याचे स्वरूप होय. ॥१५-५४५॥
जो प्रकाश्येंवीण प्रकाशु । ईशितव्येंवीण ईशु ।
आपणेंनीचि अवकाशु । वसवीत असे जो ॥ ५४६ ॥
जो प्रकाश्याशिवाय प्रकाश आहे व जो नियम्य पदार्थाशिवाय नियामक आहे व जो आपल्यानेच सर्व पोकळी भारून टाकतो ॥१५-५४६॥
जो नादें ऐकिजता नादु । स्वादें चाखिजता स्वादु ।
जो भोगिजतसे आनंदु । आनंदेंचि ॥ ५४७ ॥
जो ध्वनीकडून ऐकला जाणारा ध्वनी आहे, जी चव चवीने चाखावी व जो आनंद आनंदानेच भोगावा ॥१५-५४७॥
जो पूर्णतेचा परिणामु । पुरुषु गा पुरुषोत्तमु ।
विश्रांतीचाही विश्रामु । विराला जेथें ॥ ५४८ ॥
जे सुखाला प्राप्त झालेले सुख आहे, जे तेजाला सापडलेले तेज आहे आणि ज्या (ब्रह्मरूपी) महाशून्यामधे (आकाशादि) शून्यही नाहीसे झाले. ॥१५-५४८॥
सुखासि सुख जोडिलें । जें तेज तेजासि सांपडलें ।
शून्यही बुडालें । महाशून्यीं जिये ॥ ५४९ ॥
जो पूर्णतेचा शेवट आहे, जो पुरुष सर्वात श्रेष्ठ आहे, विश्रांतीचाही विसावा जेथे शांत झाला आहे ॥१५-५४९॥
जो विकासाहीवरी उरता । ग्रासातेंही ग्रासूनि पुरता ।
जो बहुतें पाडें बहुतां- । पासूनि बहु ॥ ५५० ॥
जो विश्वाच्या विस्ताराला व्यापून उरला आहे, जो ग्रासालाही ग्रासून पुरता आहे, (म्हणजे लयाचाही ज्याच्या ठिकाणी लय होतो) असा जो पूर्ण आहे व जो पुष्कळांपेक्षा पुष्कळ पटीने पुष्कळ आहे ॥१५-५५०॥
पैं नेणतयाप्रती । रुपेपणाची प्रतीती ।
रुपें न होनि शुक्ती । दावी जेवीं ॥ ५५१ ॥
(वर सांगितल्याप्रमाणे जर सर्वच स्वरूप चैतन्य आहे तर मग स्वरूप न भासता विश्व का भासते या शंकेचे समाधान करतात) ज्याप्रमाणे शिंप ही आपण स्वत: रूपे न होऊन आपल्या शिंपपणाचे अज्ञान ज्याच्यामधे आहे, अशा अज्ञान्याला आपल्या ठिकाणी रूपे भासवते ॥१५-५५१॥
कां नाना अलंकारदशे । सोनें न लपत लपालें असे ।
विश्व न होनियां तैसें । विश्व जो धरी ॥ ५५२ ॥
अथवा अनेक अलंकारांच्या स्थितीत (आकारात) जसे सोने न लपता झाकलेले आहे, त्याप्रमाणे जो विश्व न होऊन विश्वाला धारण करतो ॥१५-५५२॥
हें असो जलतरंगा । नाहीं सिनानेपण जेवीं गा ।
तेवीं दिसता प्रकाशु जगा । आपणचि जो ॥ ५५३ ॥
हे राहू द्या. ज्याप्रमाणे पाणी व लाटा यात भिन्नपणा नाही, (म्हणजे लाट हा काही वेगळा पदार्थ नसून त्या रूपाने भासणारे एक पाणीच आहे), त्याप्रमाणे जो उत्तम पुरुष आपण जगाला प्रतीतीस येणारा प्रकाश आहे, (म्हणजे ज्याच्या सदत्वाने जग आहे व ज्याच्या प्रकाशाने जग भासते) ॥१५-५५३॥
आपुलिया संकोचविकाशा । आपणचि रूप वीरेशा ।
हा जळीं चंद्र हन जैसा । समग्र गा ॥ ५५४ ॥
ज्याप्रमाणे पाण्यात दिसणारा संपूर्ण चंद्र हा आपल्या संकोचाविकासास आपणच कारण आहे, त्याप्रमाणे वीरा अर्जुना, जगद्भासरूपी आपला विकास व जगताचा प्रलयरूप आपला संकोच या आपल्या संकोचविकासास तो आपणच कारण आहे. ॥१५-५५४॥
तैसा विश्वपणें कांहीं होये । विश्वलोपीं कहीं न जाये ।
जैसा रात्रीं दिवसें नोहे । द्विधा रवि ॥ ५५५ ॥
ज्याप्रमाणे रात्र व दिवस यांच्या योगाने सूर्य दोन प्रकारचा होत नाही, त्याप्रमाणे विश्वपणाने हा काही होत नाही आणि विश्वाचा लोप झाला असता हा कोठेही जात नाही. ॥१५-५५५॥
तैसा कांहींचि कोणीकडे । कायिसेनिहि वेंचीं न पडे ।
जयाचें सांगडें । जयासीचि ॥ ५५६ ॥
त्याप्रमाणे कधीच कोणाकडे कशानेही हा (उत्तमपुरुष) कमी होत नाही व ज्याच्या सारखाच जो आहे ॥१५-५५६॥
यस्मात्क्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः ।
अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः ॥ १८ ॥
ज्याअर्थी मी क्षराच्या पलीकडचा आहे आणि अक्षराहून देखील उत्कृष्ठ आहे, त्याअर्थी जगामधे आणि वेदामधे ‘पुरुषोत्तम’ म्हणून प्रसिद्ध आहे. ॥१५-१८॥
जो आपणपेंचि आपणया । प्रकाशीतसे धनंजया ।
काय बहु बोलों जया । नाहीं दुजें ॥ ५५७ ॥
अर्जुना, जो आपणच आपल्याला प्रकाशतो, फार काय सांगू ? ज्याला दुसरे नाही (म्हणजे जो एकाकी आहे) ॥१५-५५७॥
तो गा मी निरुपाधिकु । क्षराक्षरोत्तमु एकु ।
म्हणौनि म्हणे वेद लोकु । पुरुषोत्तमु ॥ ५५८ ॥
क्षर व अक्षर या दोन पुरुषांहून श्रेष्ठ व उपाधिरहित असा काय तो मीच आहे, म्हणून वेद व सर्व जग मला पुरुषोत्तम म्हणतात. ॥१५-५५८॥
यो मामेवमसंमूढो जानाति पुरुषोत्तमम् ।
स सर्वविद्भजति मां सर्वभावेन भारत ॥ १९ ॥
हे भारता, जो या प्रकारे ज्ञनाने युक्त होऊन मला पुरुषोत्तमाला जाणतो, तो सर्वज्ञ होय. तो सर्व प्रकारे (मद्रूप होऊन) माझी भक्ती करतो. ॥१५-१९॥
परी हें असो ऐसिया । मज पुरुषोत्तमातें धनंजया ।
जाणे जो पाहलेया । ज्ञानमित्रें ॥ ५५९ ॥
परंतु हे राहू दे. अर्जुना, ज्ञानसूर्याचा उदय झाल्यावर (त्या ज्ञानाने) असा मी जो पुरुषोत्तम त्या मला जो जाणतो. ॥१५-५५९॥
चेइलिया आपुलें ज्ञान । जैसें नाहींचि होय स्वप्न ।
तैसें स्फुरतें त्रिभुवन । वावों जालें ॥ ५६० ॥
आपले ज्ञान (जागृतीचे ज्ञान) जागे झाले असता, जसे स्वप्न नाहीसे होते, त्याप्रमाणे हे भासणारे त्रिभुवन, ज्याला आपल्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानाच्या योगाने मिथ्या झाले आहे ॥१५-५६०॥
कां हातीं घेतलिया माळा । फिटे सर्पाभासाचा कांटाळा ।
तैसा माझेनि बोधें टवाळा । नागवे तो ॥ ५६१ ॥
अथवा हातात माळ घेतल्यावर (त्या माळेवर भासत असलेल्या सर्पाचे भय नाहीसे होते, त्याप्रमाणे माझ्या ज्ञानाने जो (पुरुष) मिथ्या जगदाभासाच्या तडाख्यात सापडत नाही ॥१५-५६१॥
लेणें सोनेंचि जो जाणें । तो लेणेंपण तें वावो म्हणे ।
तेवीं मी जाणोनि जेणें । वाळिला भेदु ॥ ५६२ ॥
दागिना हा सोनेच आहे, असे जो जाणातो, तो दागिनेपण (दागिन्याचा आकार) जसे मिथ्याभास आहे असे म्हणतो, त्याप्रमाणे ज्याने मला जाणून भेद टाकला, ॥१५-५६२॥
मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदु । मीचि एकु स्वतःसिद्धु ।
जो आपणेनसीं भेदु । नेणोनियां जाणे ॥ ५६३ ॥
मग तो आपणासह भेद न जाणून मला जाणतो व त्यामुळे मीच एक स्वभावसिद्ध सच्चिदानंद सर्वत्र आहे असे म्हणतो. ॥१५-५६३॥
तेणेंचि सर्व जाणितलें । हेंही म्हणणें थेंकुलें ।
जे तया सर्व उरलें । द्वैत नाहीं ॥ ५६४ ॥
त्यानेच सर्व जाणले, हे म्हणणे सुद्धा थोडे आहे, कारण की त्याला सर्व ब्रह्म असल्यामुळे त्याच्या ठिकाणी द्वैत उरले नाही. ॥१५-५६४॥
म्हणौनि माझिया भजना । उचितु तोचि अर्जुना ।
गगन जैसें आलिंगना । गगनाचिया ॥ ५६५ ॥
म्हणून अर्जुना, माझ्या भजनाला तोच योग्य आहे, (ते कसे तर) आकाश जसे आकाशाच्या आलिंगनास योग्य आहे ॥१५-५६५॥
क्षीरसागरा परगुणें । कीजे क्षीरसागरचिपणें ।
अमृतचि होऊनि मिळणें । अमृतीं जेवीं ॥ ५६६ ॥
क्षीरसागराला मेजवानी क्षीरसागरपणानेच करावी आणि अमृतच होऊन जसे अमृतात मिसळावे. ॥१५-५६६॥
साडेपंधरा मिसळावें । तैं साडेपंधरेंचि होआवें ।
तेवीं मी जालिया संभवे । भक्ति माझी ॥ ५६७ ॥
अस्सल सोन्याशी तद्रूप होणे असेल तर अस्सल सोनेच झाले पाहिजे, त्याप्रमाणे मद्रूप झाल्यानेच माझी भक्ती शक्य आहे. ॥१५-५६७॥
हां गा सिंधूसि आनी होती । तरी गंगा कैसेनि मिळती ? ।
म्हणौनि मी न होतां भक्ती । अन्वयो आहे ? ॥ ५६८ ॥
बाबा अर्जुना, गंगा जर समुद्राहून भिन्न असती (म्हणजे विजातीय असती) तर ती समुद्राशी तद्रूप कशी झाली असती ? (कारण तद्रूपता सजातीय पदार्थात होते). म्हणून मद्रूप न होता, माझ्या भक्तीत प्रवेश होईल काय ? ॥१५-५६८॥
ऐसियालागीं सर्व प्रकारीं । जैसा कल्लोळु अनन्यु सागरीं ।
तैसा मातें अवधारीं । भजिन्नला जो ॥ ५६९ ॥
एवढ्याकरता जशी लाट सर्व रीतींनी समुद्राशी अभिन्न असते, त्याप्रमाणे जो मला (मद्रूप होऊन) भजला, ऐक. ॥१५-५६९॥
सूर्या आणि प्रभे । एकवंकी जेणें लोभें ।
तो पाडु मानूं लाभे । भजना तया ॥ ५७० ॥
सूर्याला व प्रभेला ज्या मानाने (जशी) एकरूपता असते, ती योग्यता त्या भजनाला मानता येईल. ॥१५-५७०॥
इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मयाऽनघ ॥
एतद्बुहद्ध्वा बुद्धिमान्स्यात् कृतकृत्यश्च भारत ॥ २० ॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तम योगोनाम पंचदशोऽध्यायः ॥ १५ ॥
हे पापरहिता, याप्रमाणे हे अत्यंत गुह्य शास्त्र मी तुला सांगोतले. हे भारता, याचे ज्ञान करून घेऊन (मनुष्य) आत्मज्ञानसंपन्न आणि कृतकृत्य होतो. ॥१५-२०॥
एवं कथिलयादारभ्य । हें जें सर्व शास्त्रैकलभ्य ।
उपनिषदां सौरभ्य । कमळदळां जेवीं ॥ ५७१ ॥
या गीतारूपी उपदेशाचा पहिला अध्याय सांगण्याला सुरवात केल्यापासून अखेरपर्यंत ही जी केवळ सर्व शास्त्रांच्या अभ्यासाने प्राप्त होणारी एक वस्तु ती उपनिषद्रूपी कमलातील सुगंध आहे. ॥१५-५७१॥
हें शब्दब्रह्माचें मथितें । श्रीव्यासप्रज्ञेचेंनि हातें ।
मथुनि काढिलें आयितें । सार आम्हीं ॥ ५७२ ॥
सर्व वेदरूपी घुसळावयाच्या दह्यापासून, व्यासांच्या बुद्धिरूप रवीने घुसळून आम्ही हे अनादिसिद्ध लोणी काढले आहे. ॥१५-५७२॥
जे ज्ञानामृताची जाह्नवी । जे आनंदचंद्रींची सतरावी ।
विचारक्षीरार्णवींची नवी । लक्ष्मी जे हे ॥ ५७३ ॥
जी गीता ज्ञानरूपी अमृताची गंगा आहे, जी आनंदरूपी चंद्राची सतरावी कला आहे व जी ही विचाररूपी क्षीरसमुद्राचे मंथन करून काढलेली नवी (दुसरी) लक्ष्मी आहे ॥१५-५७३॥
म्हणौनि आपुलेनि पदें वर्णें । अर्थाचेनि जीवेंप्राणें ।
मीवांचोनि हों नेणें । आन कांहीं ॥ ५७४ ॥
म्हणून ही गीतारूप लक्ष्मी, आपल्या पदांनी, वर्णांनी व आपल्या अर्थाच्या जीवाप्राणांनी, माझ्या शिवाय दुसरे काही होणे जाणत नाही. ॥१५-५७४॥
क्षराक्षरत्वें समोर जालें । तयांचें पुरुषत्व वाळिलें ।
मग सर्वस्व मज दिधलें । पुरुषोत्तमीं ॥ ५७५ ॥
क्षरपुरुष क्षरपणाने व अक्षरपुरुष अक्षरपणाने (गीतेने आपणास वरावे म्हणून तिच्या) समोर आले, परंतु गीतेने त्यांच्या पुरुषत्वाचा त्याग केला. (म्हणजे हे खरे पुरुष नाहीत कारण हे सोपाधिक आहेत असे ठरवले). आणि तिने आपले सर्वस्व (पद, वर्ण, अर्थ वगैरे) मी जो पुरुषोत्तम, त्या मला अर्पण केले. ॥१५-५७५॥
म्हणौनि जगीं गीता । मियां आत्मेनि पतिव्रता ।
जे हे प्रस्तुत तुवां आतां । आकर्णिली ॥ ५७६ ॥
म्हणून जी ही आता या अध्यायापर्यंत गीता तू ऐकलीस, ती गीता, या जगामधे आत्मरूप जो मी, त्या माझ्याच ठिकाणी अनन्य असल्यामुळे पतिव्रता आहे. ॥१५-५७६॥
साचचि बोलाचें नव्हे हें शास्त्र । पैं संसारु जिणतें हें शस्त्र ।
आत्मा अवतरविते मंत्र । अक्षरें इयें ॥ ५७७ ॥
खरोखरच गीता हे नुसते शब्दपांडित्याचे शास्त्र नाही, तर ही गीता, संसार जिंकणारे हत्यार आहे. (फार काय सांगावे?) या गीतेची ही अक्षरे आत्म्याला प्रगट करणारे मंत्र आहेत. ॥१५-५७७॥
परी तुजपुढां सांगितलें । तें अर्जुना ऐसें जालें ।
जें गौप्यधन काढिलें । माझें आजि ॥ ५७८ ॥
परंतु अर्जुना, तुझ्यापुढे जे आम्ही गीताशास्त्र सांगितले, ते तू माझे गुप्त धन आज बाहेर काढलेस, असा प्रकार झाला. ॥१५-५७८॥
मज चैतन्यशंभूचा माथां । जो निक्षेपु होता पार्था ।
तया गौतमु जालासि आस्था- । निधी तूं गा ॥ ५७९ ॥
अर्जुना, पूर्वी शंकराच्या मस्तकात (जटेत) गुप्त असलेली गंगा (गोदावरी) बाहेर काढण्यास जसा गौतम कारणीभूत झाला, तसा) मी जो चैतन्यरूपी शंकर, त्या माझ्या मस्तकात जो गीतारूपी ठेवा होता, त्याला बाहेर काढणारा, श्रद्धेचे भांडार जो तू अर्जुन, तो तू गौतम झालास. ॥१५-५७९॥
चोखटिवा आपुलिया । पुढिला उगाणा घेयावया ।
तया दर्पणाचीचि परी धनंजया । केली आम्हां ॥ ५८० ॥
आपल्या स्वच्छपणाने पुढे असलेल्याचे आकलन करून घेण्याचे कामी, अर्जुना, तू आम्हास आरशाप्रमाणे झालास. (आरसा ज्याप्रमाणे आपल्यात समोरच्याचे प्रतिबिंब घेतो, त्याप्रमाणे अर्जुना, तू माझे आकलन केलेस). ॥१५-५८०॥
कां भरलें चंद्रतारांगणीं । नभ सिंधू आपणयामाजीं आणी ।
तैसा गीतेसीं मी अंतःकरणीं । सूदला तुवां ॥ ५८१ ॥
अथवा ज्याप्रमाणे चंद्र व तार्‍यांचे समुदाय यांनी भारलेले आकाश, समुद्र आपल्यामधे (प्रतिबिंबरूपाने) आणतो, त्याप्रमाणे गीतेसकट मला तू आपल्या अंत:करणात घातले आहेस. ॥१५-५८१॥
जे त्रिविधमळिकटा । तूं सांडिलासि सुभटा ।
म्हणौनि गीतेसीं मज वसौटा । जालासि गा ॥ ५८२ ॥
अर्जुना तुझ्या चित्तास तीन प्रकारचे मळ सोडून गेले, म्हणून तू गीतेसह माझे रहाण्याचे ठिकाण झाला आहेस. ॥१५-५८२॥
परी हें बोलों काय गीता । जे हे माझी उन्मेषलता ।
जाणे तो समस्ता । मोहा मुके ॥ ५८३ ॥
परंतु काय बोलू ? माझी ज्ञानाची वेली, जी ही गीता, हिला जो जाणील, तो संपूर्ण मोहापासून मुक्त होईल. ॥१५-५८३॥
सेविली अमृतसरिता । रोगु दवडूनि पंडुसुता ।
अमरपण उचितां । देऊनि घाली ॥ ५८४ ॥
अर्जुना, अमृताच्या नदीचे सेवन केले असता, ते सेवन, रोग नाहीसे करून, योग्य अशा अमरपणाला देऊन टाकते ॥१५-५८४॥
तैसी गीता हे जाणितलिया । काय विस्मयो मोह जावया ।
परी आत्मज्ञानें आपणापयां । मिळिजे येथ ॥ ५८५ ॥
त्याप्रमाणे ही गीता जाणली असता, मोह नाहीसा होण्याचे आश्चर्य काय आहे ? (मोह तर जाईलच) पण या गीतेच्या योगाने आत्मज्ञान होऊन आत्मस्वरूपी मिळता येते. ॥१५-५८५॥
जया आत्मज्ञानाच्या ठायीं । कर्म आपुलेया जीविता पाहीं ।
होऊनियां उतराई । लया जाय ॥ ५८६ ॥
पहा, ज्या आत्मज्ञानाच्या ठिकाणी कर्म आपल्या जीविताने मुक्त होऊन लयाला जाते ॥१५-५८६॥
हरपलें दाऊनि जैसा । मागु सरे वीरविलासा ।
ज्ञानचि कळस वळघे तैसा । कर्मप्रासादाचा ॥ ५८७ ॥
हे वीरविलासा अर्जुना, हरवलेली वस्तु दाखवून जसा माग नाहीसा होतो, त्याप्रमाणे कर्मरूपी देवळावर ज्ञानरूपी कळस चढतो. (कर्म हे ज्ञानाची प्राप्ती करून देऊन आपण संपते). ॥१५-५८७॥
म्हणौनि ज्ञानिया पुरुषा । कृत्य करूं सरलें देखा ।
ऐसा अनाथांचा सखा । बोलिला तो ॥ ५८८ ॥
म्हणून ज्ञानी पुरुषाला कर्तव्य करणे संपले असे समजा. याप्रमाणे अनाथांचे सहाय्यकर्ते (श्रीकृष्ण) बोलले. ॥१५-५८८॥
तें श्रीकृष्णवचनामृत । पार्थीं भरोनि असे वोसंडत ।
मग व्यासकृपा प्राप्त । संजयासी ॥ ५८९ ॥
ते श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेले बोधामृत अर्जुनरूपी भांडे भरून सांडत होते. मग ते बोधामृत व्यासांच्या कृपेने संजयाला प्राप्त झाले. ॥१५-५८९॥
तो धृतराष्ट्र राया । सूतसे पान करावया ।
म्हणौनि जीवितांतु तया । नोहेचि भारी ॥ ५९० ॥
नंतर त्या संजयाने ते बोधामृत धृतराष्ट्राला पिण्याकरता दिले, म्हणून धृतराष्ट्राला अंतसमय कठिण गेला नाही. (म्हणजे मरणसमयी चित्ताची गदबड उडाली नाही). ॥१५-५९०॥
एर्‍हवीं गीताश्रवण अवसरीं । आवडों लागतां अनधिकारी ।
परि सेखीं तेचि उजरी । पातला भली ॥ ५९१ ॥
वास्तविक विचार करून पाहिले तर गीता ऐकण्याच्या वेळी तो (धृतराष्ट्र) अनधिकारी आहे असे वाटावयाला लावणारा होता. परंतु शेवटी (अंतसमयी) तोच (बोधाचा) प्रकाश त्याला चांगला पावला. (म्हणजे त्याच्या चांगला उपयोगाला आला). ॥१५-५९१॥
जेव्हां द्राक्षीं दूध घातलें । तेव्हां वायां गेलें गमलें ।
परी फळपाकीं दुणावलें । देखिजे जेवीं ॥ ५९२ ॥
ज्यावेळी खत म्हणून द्राक्षाच्या वेलास दूध घातले, त्यावेळी त्याचा तात्काळ उपयोग दिसून न आल्याने ते व्यर्थ नासले असा समज होतो, परंतु त्या खताचा परिणाम होऊन ज्यावेळेस द्राक्षाचे पीक तयार होते, त्यावेळेस वाया गेल्यासारखे वाटलेले दूध, दुप्पट फायद्याचे झाले असा ज्याप्रमाणे अनुभव येतो, ॥१५-५९२॥
तैसी श्रीहरीवक्त्रींचीं अक्षरें । संजयें सांगितलीं आदरें ।
तिहीं अंधु तोही अवसरें । सुखिया जाला ॥ ५९३ ॥
त्याप्रमाणे संजयाने हरीच्या मुखातील अक्षरे धृतराष्ट्राला आदराने सांगितली, त्या अक्षरांच्या योगाने तो आंधळा धृतराष्ट्र देखील काही काळाने (मरणकाळी) सुखी झाला. ॥१५-५९३॥
तेंचि मर्‍हाटेनि विन्यासें । मियां उन्मेषें ठसेंठोंबसें ।
जी जाणें नेणें तैसें । निरोपिलें ॥ ५९४ ॥
तेच मी मराठी भाषेच्या रचनेने, ओबडधोबड ज्ञानाने, मला कळले न कळले तसे सांगितले ॥१५-५९४॥
सेवंतीये अरिसि कांहीं । आंग पाहतां विशेषु नाहीं ।
परी सौरभ्य नेलें तिहीं । भ्रमरीं जाणिजे ॥ ५९५ ॥
अरसिकांनी शेवंतीच्या झाडाकडे पाहिले, तर त्यात त्यांना काही विशेष महत्त्व दिसत नाही; परंतु त्याच झाडास आलेल्या फुलातील सुगंधावर नजर ठेऊन, जे भ्रमर यातील पराग घेऊन जातात, तेच त्यातील सार जाणतात. ॥१५-५९५॥
तैसें घडतें प्रमेय घेइजे । उणें तें मज देइजे ।
जें नेणणें हेंचि सहजें । रूप कीं बाळा ॥ ५९६ ॥
गीतेतील विषयाच्या चालू असलेल्या प्रतिपादनात योग्य असेल त्याचा (श्रोत्यांनी) अंगीकार करावा व यात जी उणीव दिसून येईल ती माझे पदरात टाकावी. बरोबरच आहे की स्वभावत: काहीच न समजणे, हेच लहान मुलाचे स्वरूप आहे. ॥१५-५९६॥
तरी नेणतें जर्‍ही होये । तर्‍हीं देखोनि बाप कीं माये ।
हर्ष केंहि न समाये । चोज करिती ॥ ५९७ ॥
परंतु मूल जरी अज्ञानी असले, तरी आई व बाप यांनी त्याला पाहिले असता त्यांचा आनंद गगनात मावत नाही आणि मग ते त्या मुलाचे कौतुक करतात. ॥१५-५९७॥
तैसें संत माहेर माझें । तुम्ही मिनलिया मी लाडैजें ।
तेंचि ग्रंथाचेनि व्याजें । जाणिजो जी ॥ ५९८ ॥
त्याप्रमाणे तुम्ही संत माझे आईबाप अहात. तुम्ही भेटाल्यावर मी लडिवाळपणा करतो. महाराज, तो लडिवाळपणा म्हणजे हा ग्रंथ होय, असे आपण समजावे. ॥१५-५९८॥
आतां विश्वात्मकु हा माझा । स्वामी श्रीनिवृत्तिराजा ।
तो अवधारू वाक्‌पूजा । ज्ञानदेवो म्हणे ॥ ५९९ ॥
आता विश्वस्वरूपी माझा गुरु जो निवृत्तिराजा, तो माझी ही शब्दांची पूजा ऐको असे ज्ञानदेव म्हणतात. ॥१५-५९९॥



शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref:satsangdhara

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *