सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय बारावा

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला

॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥

॥ अर्थात् श्रीमद् भगवद्‌गीतेवरील मराठी टीका ॥

॥ अथ प्रथमोऽध्यायः – अध्याय पहिला ॥

॥ अर्जुनविषादयोगः ॥

(ओवी १ ते ८४ ध्वनीमुद्रण )

(ओवी  ८५ ते १८४ ध्वनीमुद्रण )

(ओवी १८५ ते २७५ ध्वनीमुद्रण )

वरील ऑडिओ मधील आवाज सौ. मनीषा भास्कर अभ्यंकर यांचा आहे, त्यांनी हे ऑडिओ टाकायची परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार


ॐ नमो जी आद्या । वेद प्रतिपाद्या ।जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥ १ ॥
ॐकार हाच परमात्मा आहे असे कल्पून ज्ञानदेवांनी मंगल केले आहे.) हे सर्वांचे मूळ असणार्‍या व वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असाणार्‍या ॐकारा, तुला नमस्कार असो. व स्वत: स्वत:ला जाणण्यास योग्य असणार्‍या आणि सर्वव्यापी अशा आत्मरूपी ॐकारा तुझा जयजयकार असो. ॥१-१॥
 
देवा तूंचि गणेशु ।सकलार्थमतिप्रकाशु ।म्हणे निवृत्तिदासु । अवधारिजो जी ॥ २ ॥
वरील विशेषणांनी युक्त अशा) देवा, सर्वांच्या बुद्धीचा प्रकाश जो गणेश तो तूच आहेस. निवृत्तिनाथांचे शिष्य (ज्ञानेश्वर महाराज) म्हणतात, महाराज ऐका. ॥१-२॥
 
हें शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ति सुवेष ।जेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ॥ ३ ॥
संपूर्ण वेद हीच त्या (त्या गणपतीची) उत्तम सजवलेली मूर्ती आहे, आणि तिच्या ठिकाणी निर्दोष वर्णरूपी सौंदर्य खुलून राहिले आहे. ॥१-३॥
 
स्मृति तेचि अवयव । देखा आंगीक भाव ।तेथ लावण्याची ठेव । अर्थशोभा ॥ ४ ॥
आता (त्या गणपतीच्या) शरीराची ठेवण पहा. (मन्वादिकांच्या स्मृति हेच त्याचे अवयव होत. त्या स्मृतीतील अर्थसौंदर्याने (ते अवयव म्हणजे लावण्याची केवळ खाणच बनले आहेत. ॥१-४॥
 
अष्टादश पुराणें । तींचि मणिभूषणें ।पदपद्धति खेवणें । प्रमेयरत्‍नांचीं ॥ ५ ॥
अठरा पुराणे हेच (त्याच्या) अंगवरील रत्नखचित अलंकार आहेत. त्यात प्रतिपादलेली तत्वे हीच रत्ने व छंदोबद्ध शब्द हीच त्यांची कोंदणे होत. ॥१-५॥
 
पदबंध नागर । तेंचि रंगाथिलेअंबर ।जेथ साहित्य वाणें सपूर ।उजाळाचें ॥ ६ ॥
उत्तम प्रकारची शब्दरचना हेच त्या गणपतीच्या अंगावरील रंगवलेले वस्त्र आहे आणि त्या शब्दरचनेतील अलंकार हे त्या वस्त्राचे चकचकित तलम तंतु आहेत. ॥१-६॥
 
देखा काव्य नाटका । जे निर्धारितां सकौतुका ।त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनि ॥ ७ ॥
पहा, कौतुकाने काव्य-नाटकांविषयी विचार केला असता ती काव्य-नाटके त्या गणपतीच्या पायातील लहान घागर्‍या असून त्या अर्थरूप आवाजाने रुणझुणत असतात. ॥१-७॥
 
नाना प्रमेयांची परी । निपुणपणें पाहतां कुसरी ।दिसती उचित पदें माझारीं । रत्‍नें भलीं ॥ ८ ॥
कारण त्यात प्रतिपादलेली अनेक प्रकारची तत्वे व त्यातील कुशलता यांचा बारकाईने विचार केला असता यामधेही निवडक वेच्यांची काही चांगली रत्ने आढळतात. ॥१-८॥
 
तेथ व्यासादिकांच्या मतीं । तेचि मेखळा मिरवती ।चोखाळपणें झळकती । पल्लवसडका ॥ ९ ॥
येथे व्यासादिकांच्या बुद्धी हाच कोणी (त्या गणपतीच्या) कमरेला बांधलेला शेला शोभत आहे व त्याच्या पदराच्या दशा निर्दोषपणे झळकत आहेत. ॥१-९॥
 
देखा षड्दर्शनें म्हणिपती । तेची भुजांची आकृति ।म्हणौनि विसंवादे धरिती । आयुधें हातीं ॥ १० ॥
पहा, सहा शास्त्रे म्हणून जी म्हणतात तेच गणपतीचे सहा हात आहेत आणि म्हणून भिन्न भिन्न मते हीच त्याच्या हातातील शस्त्रे आहेत. ॥१-१०॥
 
तरी तर्कु तोचि फरशु । नीतिभेदु अंकुशु ।वेदांतु तो महारसु । मोदकु मिरवे ॥ ११ ॥
तरी कणादशास्त्ररूपी हातामधे अनुमानरूपी परशु आहे. गौतमीय न्यायदर्शनरूपी हातात प्रमाण-प्रमेयादि षोडष पदार्थांचे तत्वभेदरूपी अंकुश आहे. व्यासकृत वेदांतसूत्ररूपी हातात ब्रह्मरसाने भरलेला ब्र्ह्मज्ञानरूपी मोदक शोभत आहे. ॥१-११॥
 
एके हातीं दंतु । जो स्वभावता खंडितु ।तो बौद्धमतसंकेतु । वार्तिकांचा ॥ १२ ॥
बौद्धमताचे निदर्शन करणार्‍या बौद्धवार्तिकांनी प्रतिपादलेले बौद्धमत हाच कोणी स्वभावत: खंडित झालेला दात तो पातंजलदर्शनरूपी एका हातात धरला आहे. ॥१-१२॥
 
मग सहजें सत्कारवादु । तो पद्मकरु वरदु ।धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु । अभयहस्तु ॥ १३ ॥
मग (बौद्धांच्या शून्यवादाचे खंडन झाल्यावर) सहजच येणारा निरीश्वर सांख्यांचा सत्कार्यवाद हा त्या गणपतीचा वर देणारा कमलासारखा हात होय. ॥१-१३॥
 
देखा विवेकवंतु सुविमळु । तोचि शुंडादंडु सरळु ।जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा ॥ १४ ॥
पहा. त्या गणपतीच्या ठिकाणी सोलीव ब्रह्मसुखाचा निरतिशय आनंद हीच सरळ, अति निर्मळ व बरेवाईटाची निवड करण्यात समर्थ अशी लांब सोंड आहे ॥१-१४॥
 
तरी संवादु तोचि दशनु । जो समता शुभ्रवर्णु ।देवो उन्मेषसूक्ष्मेक्षणु । विघ्नराजु ॥ १५ ॥
तर प्रश्नोत्ताररूप चर्चा हाच दात असून त्या चर्चेतील पक्षरहितपणा हा त्या दाताचा पांढरा रंग आहे. ज्ञानरूप बारीक डोळे असलेला विघ्नांचा नियामक असा हा देव आहे. ॥१-१५॥
 
मज अवगमलिया दोनी । मिमांसा श्रवणस्थानीं ।बोधमदामृत मुनी । अली सेविती ॥ १६ ॥
(ज्ञानदेव म्हणतात) पूर्वमीमांसा व उत्तर मीमांसा ही शास्त्रे हीच त्या गणपतीच्या दोन्ही कानांच्या ठिकाणी मला वाटतात व बोध हेच मदरूपी अमृत असून मुनि हे भ्रमर त्याचे सेवन करतात. ॥१-१६॥
 
प्रमेयप्रवाल सुप्रभ । द्वैताद्वैत तेचि निकुंभ ।सरिसेपणें एकवटत इभ- । मस्तकावरी ॥ १७ ॥
वर संगितलेल्या श्रुति-स्मृति वगैरेत प्रतिपादलेली तत्वे हीच त्या गणपतीच्या अंगावर तेजदार पोवळी होत व द्वैत आणि अद्वैत मते हीच त्या गजवदनाच्या मस्तकावरील गंडस्थळे असून ती तुल्यबलाने तेथे एकत्र राहिलेली आहेत. ॥१-१७॥
 
उपरि दशोपनिषदें । जियें उदारें ज्ञानमकरंदे ।तियें कुसुमें मुगुटीं सुगंधें । शोभती भलीं ॥ १८ ॥
ज्ञानरूपी मध देण्यात उदार असलेली ईशावास्यादि दशोपनिषद्रूप सुगंधी फुले गंडस्थळावर असलेल्या मुकुटाच्या ठिकाणी चांगली शोभतात ॥१-१८॥
 
अकार चरण युगल । उकार उदर विशाल ।मकार महामंडल । मस्तकाकारें ॥ १९ ॥
ॐकाराची प्रथम अकारमात्रा हे त्या गणपतीचे दोन पाय असून, दुसरी उकारमात्रा हे त्याचे मोठे पोट आहे आणि तिसरी मकारमात्रा हाच त्याच्या मोठ्या व वाटोळ्या मस्तकाचा आकार आहे. ॥१-१९॥
 
हे तीन्ही एकवटले । तेथ शब्दब्रह्म कवळलें ।तें मियां श्रीगुरुकृपा नमिलें । आदिबीज ॥ २० ॥
ह्या तिन्ही मात्रा एकत्र झाल्या म्हणजे संपूर्ण वेद कवटाळला जातो. त्या मूळ बीजरूपी गणेशाला मी गुरुकृपेमुळे नमस्कार करतो. ॥१-२०॥
 
आतां अभिनव वाग्विलासिनी । ते चातुर्यार्थकलाकामिनी ।ते शारदा विश्वमोहिनी । नमिली मियां ॥ २१ ॥
आता जी वाणीची अपूर्व क्रीडा करणारी असून, चातुर्य, वागर्थ व कला यांची देवता आहे. व जिने सर्व जग मोहून टाकले आहे, त्या सरस्वतीला मी वंदन करतो. ॥१-२१॥
 
मज हृदयीं सद्‌गुरु । जेणें तारिलों हा संसारपूरु ।म्हणौनि विशेषें अत्यादरु । विवेकावरी ॥ २२ ॥
ज्या सद्गुरूंनी मला या संसारपुरातून तारले ते माझ्या हृदयात आहेत. म्हणून माझे विवेकावर फार प्रेम आहे. ॥१-२२॥
 
जैसें डोळ्यां अंजन भेटे । ते वेळीं दृष्टीसी फांटा फुटे ।मग वास पाहिजे तेथ । प्रगटे महानिधी ॥ २३ ॥
ज्याप्रमाणे डोळ्यात अंजन घातले की दृष्टी फाकते व मग (भूमिगत) द्रव्याचा सहज सुगावा लागून द्रव्याचा मोठा खजिना दृष्टीला दिसू लागतो. ॥१-२३॥
 
कां चिंतामणी जालियां हातीं । सदा विजयवृत्ति मनोरथीं ।तैसा मी पूर्णकाम श्रीनिवृत्ति । ज्ञानदेवो म्हणे ॥ २४ ॥
किंवा ज्याप्रमाणे चिंतामणी हस्तगत झाल्यावर मनोरथ नेहेमी विजयी होतात, त्याप्रमाणे माझे सर्व मनोरथ श्री निवृत्तिनाथांच्यामुळे पूर्ण झाले आहेत. असे ज्ञानदेव म्हणतात. ॥१-२४॥
 
म्हणोनि जाणतेनें गुरु भजिजे । तेणें कृतकार्य होईजे ।जैसें मुळसिंचनें सहजें । शाखापल्लव संतोषती ॥ २५ ॥
एवढ्यासाठी अहो ज्ञातेपुरुष हो, गुरुभजन करावे व त्यायोगे कृतकृत्य व्हावे. ज्याप्रमाणे झाडाच्या मुळांना पाणी घातले असता अनायासे फांद्या व पाने यांना टवटवी येते ॥१-२५॥
 
कां तीर्थें जियें त्रिभुवनीं । तियें घडती समुद्रावगाहनीं ।ना तरी अमृतरसास्वादनीं । रस सकळ ॥ २६ ॥
अथवा समुद्रस्नानाने त्रैलोक्यात जेवढी तीर्थे आहेत तेवढी घडतात, किंवा अमृतरसाच्या सेवनाने सर्व रसांचे सेवन घडते, ॥१-२६॥
 
तैसा पुढतपुढती तोचि । मियां अभिवंदिला श्रीगुरुचि ।जो अभिलषित मनोरुचि । पुरविता तो ॥ २७ ॥
त्याप्रमाणे (श्रीगुरूंना वंदन केले म्हणजे सर्वांनाच वंदन केल्यासारखे होत असल्यामुळे) मी त्याच श्रीगुरूंना पूज्यता बुद्धीने वारंवार वंदन केले. (कारण की) तो इच्छिलेल्या मनाच्या आवडी पुरवणारा आहे. ॥१-२७॥
 
आतां अवधारा कथा गहन । जे सकळां कौतुकां जन्मस्थान ।कीं अभिनव उद्यान । विवेकतरूचें ॥ २८ ॥
(श्रीगुरूंना वंदन केल्यानंतर) आता (ज्यात गीता निर्माण झाली अशा महाभारताची) खोल विचारांनी भरलेली कथा. तिचे माहात्म्य ऐका. ही कथा सर्व चमत्कारांची खाण आहे. किंवा विचाररूपी वृक्षांचा बगिचा आहे. ॥१-२८॥
 
ना तरी सर्व सुखाचि आदि । जे प्रमेयमहानिधि ।नाना नवरससुधाब्धि । परिपुर्ण हे ॥ २९ ॥
अथवा ही सर्व सुखांचे उगमस्थान आहे. अनेक सिद्धांतांचा साठा आहे, किंवा शृंगारादी नवरसरूपी अमृताने भरलेला समुद्र आहे. ॥१-२९॥
 
कीं परमधाम प्रकट । सर्व विद्यांचे मूळपीठ ।शास्त्रजाता वसौट । अशेषांचें ॥ ३० ॥
किंवा ही कथा प्रत्यक्ष मोक्ष असून सर्व विद्यांचे मूलस्थान आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण शास्त्रांमधे ही श्रेष्ठ आहे. ॥१-३०॥
 
ना तरी सकळ धर्मांचें माहेर । सज्जनांचे जिव्हार ।लावण्यरत्‍न भांडार । शारदेचें ॥ ३१ ॥
किंवा ही (कथा) सर्व धर्मांचे माहेरघर आहे, सज्जनांचा जिव्हाळा आहे, सरस्वतीच्या सौंदर्यरूप रत्नांचा जामदारखाना आहे. ॥१-३१॥
 
नाना कथारूपें भारती । प्रकटली असे त्रिजगतीं ।आविष्करोनि महामतीं । व्यासाचिये ॥ ३२ ॥
अथवा व्यासांच्या विशाल बुद्धिमध्ये स्फुरूण पावून सरस्वती या कथेच्या रूपाने त्रिजगतात प्रगट झाली आहे. ॥१-३२॥
 
म्हणौनि हा काव्यांरावो । ग्रंथ गुरुवतीचा ठावो ।एथूनि रसां झाला आवो । रसाळपणाचा ॥ ३३ ॥
म्हणून हा महाभारत ग्रंथ सर्व काव्यग्रंथाचा राजा आहे. या ग्रंथाच्या ठिकाणी मोठेपणाची कमाल झाली आहे व येथूनच रसांना रसाळपणाचा डौल आला आहे. ॥१-३३॥
 
तेवींचि आइका आणिक एक । एथूनि शब्दश्री सच्छास्त्रिक ।आणि महाबोधीं कोंवळीक । दुणावली ॥ ३४ ॥
त्याचप्रमाणे याची आणखी एक महती ऐका. यापासूनच शब्दांच्या संपत्तीला निर्दोष शास्त्रीयता आली आहे. त्यामुळे ब्रह्मज्ञानाची मृदुता वाढली आहे. ॥१-३४॥
 
एथ चातुर्य शहाणें झालें । प्रमेय रुचीस आलें ।आणि सौभाग्य पोखलें । सुखाचें एथ ॥ ३५॥
येथे (या महाभारतग्रंथात) चतुरता शहाणी झाली, तत्वांना गोडी आली व सुखाचे ऐश्वर्य येथे पुष्ट झाले. ॥१-३५॥
 
माधुर्यीं मधुरता । शृंगारीं सुरेखता ।रूढपण उचितां । दिसे भलें ॥ ३६ ॥
गोडीचा गोडपणा, श्रृंगाराचा सुरेखपणा व योग्य वस्तूंना आलेला रूढपणा यापासूनच दिसू लागला. ॥१-३६॥
 
एथ कळाविदपण कळा । पुण्यासि प्रतापु आगळा ।म्हणौनि जनमेजयाचे अवलीळा । दोष हरले ॥ ३७ ॥
येथून कलांना कुशलता प्राप्त झाली, पुण्याला विशेष तेज चढले व म्हणूनच (महाभारताच्या पठणाने) जनमेजयाचे दोष हरले. ॥१-३७॥
 
आणि पाहतां नावेक । रंगीं सुरंगतेची आगळीक ।गुणां सगुणपणाचें बिक । बहुवस एथ ॥ ३८ ॥
आणि क्षणभर विचार केला तर असे दिसून येते की रंगांमधे सुरंगतेची वाढ झाली आहे. (आनंदाला विशेष मनोहरता आली आहे). त्यामुळे सद्गुणांना चांगुलपणाचे विशेष सामर्थ्य प्राप्त झाले आहे. ॥१-३८॥
 
भानुचेनि तेजें धवळलें । जैसे त्रैलोक्य दिसे उजळिलें ।तैसें व्यासमति कवळिलें । मिरवे विश्व ॥ ३९ ॥
सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेले त्रैलोक्य ज्याप्रमाणे उज्वल दिसते त्याप्रमाणे व्यासांच्या बुद्धीने व्यापलेले विश्व शोभते. ॥१-३९॥
 
कां सुक्षेत्रीं बीज घातलें । तें आपुलियापरी विस्तारलें ।तैसें भारतीं सुरवाडलें । अर्थजात ॥ ४० ॥
किंवा उत्तम जमिनीत बी पेरले असता त्याचा जसा हवा तसा विस्तार होतो, त्याप्रमाणे भारतामधे चार पुरुषार्थ हवे तेवढे प्रफुल्लित झाले आहेत. ॥१-४०॥
 
ना तरी नगरांतरीं वसिजे । तरी नागराचि होईजे ।तैसें व्यासोक्तितेजें । धवळत सकळ ॥ ४१ ॥
अथवा शहरात राहिल्याने मनुष्य जसा चाणाक्ष होतो त्याप्रमाणे व्यासांच्या वाणीतील तेजाने सर्व गोष्टी उज्वल (स्पष्ट) झाल्या आहेत. ॥१-४१॥
 
कीं प्रथमवयसाकाळीं । लावण्याची नव्हाळी ।प्रगटे जैसी आगळी । अंगनाअंगीं ॥ ४२ ॥
किंवा तारुण्यावस्थेत स्त्रियांच्या ठिकाणी ज्याप्रमाणे सौंदर्याचा बहर अधिक उठावदार दिसतो ॥१-४२॥
 
ना तरी उद्यानीं माधवी घडे । तेथ वनशोभेची खाणी उघडे ।आदिलापासौनि अपाडें । जियापरी ॥ ४३ ॥
किंवा बगिच्यात वसंत ऋतूने प्रवेश केला असता तेथील सर्व झाडांच्या सौंदर्याची पूर्वीपेक्षा ज्याप्रमाणे असाधारण अशी खाण उघडते ॥१-४३॥
 
नानाघनीभूत सुवर्ण । जैसें न्याहाळितां साधारण ।मग अलंकारीं बरवेपण । निवाडु दावी ॥ ४४ ॥
अथवा सोन्याची लगड पाहिली असता ते सोने साधारण दिसते (डोळ्यात भरत नाही) पण त्याच लगडीचे दागिने बनवल्यावर तेच सोने आपले निराळेच सौंदर्य दाखवते ॥१-४४॥
 
तैसें व्यासोक्ति अळंकारिलें । आवडे तें बरवेपण पातलें ।तें जाणोनि काय आश्रयिलें । इतिहासीं ॥ ४५ ॥
त्याप्रमाणे व्यासांच्या बोलण्याने अलंकृत झाले असता हवा तसा चांगलेपणा येतो, हे समजूनच की काय पूर्वीच्या कथानकांनी भारताचा आश्रय घेतला. ॥१-४५॥
 
नाना पुरतिये प्रतिष्ठेलागीं । सानीव धरूनि आंगीं ।पुराणें आख्यानरूपें जगीं । भारता आलीं ॥ ४६ ॥
अथवा जगामधे पूर्ण मोठेपणा प्राप्त व्हावा म्हणून स्वत:च्या ठिकाणी लहानपणा घेऊन पुराणांनी आख्यानरूपाने भारतात प्रवेश केला. ॥१-४६॥
 
म्हणौनि महाभारतीं नाहीं । तें नोहेचि लोकीं तिहीं ।येणें कारणें म्हणिपे पाहीं । व्यासोच्छिष्ट जगत्रय ॥ ४७ ॥
एवढ्याकरता महाभारतामधे जे नाही ते त्रैलोक्यातही नाही. या कारणामुळे संपूर्ण त्रैलोक्य व्यासांचे उष्टे आहे असे म्हटले जाते. (म्हणजे व्यासांच्या नंतर झालेल्या कवींनी आपल्या सर्व कल्पना व्यासांपासून उसन्या घेतल्या आहेत.) ॥१-४७॥
 
ऐसी जगीं सुरस कथा । जें जन्मभूमि परमार्था ।मुनि सांगे नृपनाथा । जनमेजया ॥ ४८ ॥
अशी जगात सुरस म्हणून प्रसिद्ध असलेली व ब्रह्मज्ञानाला जन्म देणारी ही भारतीय कथा राजश्रेष्ठ जनमेजय राजाला वैशंपायन ऋषींनी सांगितली. ॥१-४८॥
 
जें अद्वितीय उत्तम । पवित्रैक निरुपम ।परम मंगलधाम । अवधारिजो ॥ ४९ ॥
ऐका हे महाभारत अद्वितीय, उत्तम, अतिपवित्र, निरुपम आणि श्रेष्ठ असे कल्याणाचे ठिकाण आहे. ॥१-४९॥
 
आतां भारतकमळपरागु । गीताख्यु प्रसंगु ।जो संवादला श्रीरंगु । अर्जुनेंसीं ॥ ५० ॥
जो श्रीकृष्णाने अर्जुनाला संवादरूपाने उपदेशिला, तो गीता नावाचा प्रसंग भारतामध्ये कमलातील परागाप्रमाणे आहे. ॥१-५०॥
 
ना तरी शदब्रह्माब्धि । मथियला व्यासबुद्धि ।निवडिलें निरवधि । नवनीत हें ॥ ५१ ॥
अथवा व्यासांनी आपल्या बुद्धीने वेदरूपी समुद्राचे मंथन करून हे भारतरूपी अमर्याद लोणी काढले. ॥१-५१॥
 
मग ज्ञानाग्निसंपर्कें । कडसिलेंनि विवेकें ।पद आलें परिपाकें । आमोदासी ॥ ५२ ॥
मग ते (भारतरूप) लोणी ज्ञानरूपी अग्नीच्या संसर्गाने विचारपूर्वक कढवले. त्यामुळे त्याचा परिपाक होऊन त्याला साजूकपणा आला. (त्याचे गीतारूपी साजूक तूप बनले.) ॥१-५२॥
 
जें अपेक्षिजे विरक्तीं । सदा अनुभविजे संतीं ।सोहंभावें पारंगतीं । रमिजे जेथ ॥ ५३ ॥
वैराग्यशील लोक ज्या (गीतारूपी तुपाची) इच्छा करतात, संत जे नेहेमी अनुभवतात व पार पावलेले ज्ञानी ‘तेच मी आहे’ (म्हणजे सोऽहंभावाने) जेथे रममाण होतात ॥१-५३॥
 
जें आकर्णिजें भक्तीं । जें आदिवंद्य त्रिजगतीं ।तें भीष्मपर्वीं संगती । म्हणितली कथा ॥ ५४ ॥
भक्तांनी जिचे श्रवण करावे, जी तिन्ही लोकात प्रथम नमस्कार करण्यास योग्य आहे ती गीता भीष्मपर्वात प्रसंगानुरोधाने सांगितली आहे. ॥१-५४॥
 
जें भगवद्गीता म्हणिजे । जें ब्रह्मेशांनीं प्रशंसिजे ।जें सनकादिकीं सेविजे । आदरेंसीं ॥ ५५ ॥
जिला भगवद्गीता असे म्हणतात, ब्रह्मदेव व शंकर जिची प्रशंसा करतात, व जिचे सनकादिक आदराने सेवन करतात, ॥१-५५॥
 
जैसें शारदीचिये चंद्रकळे । माजि अमृतकण कोंवळे ।ते वेंचिती मनें मवाळें । चकोरतलगें ॥ ५६ ॥
ज्याप्रमाणे शरद ऋतूच्या चंद्रकिरणातील अमृताचे कोमल कण चकोराची पिले मृदु मनाने वेचतात, ॥१-५६॥
 
तियापरी श्रोतां । अनुभवावी हे कथा ।अतिहळुवारपण चित्ता । आणूनियां ॥ ५७ ॥
त्याप्रमाणे चित्त अगदी हलके करून (वासनांचा जडपणा टाकून) मग श्रोत्यांनी ही कथा अनुभवावी. ॥१-५७॥
 
हें शब्देंवीण संवादिजे । इंद्रियां नेणतां भोगिजे ।बोलाआधि झोंबिजे । प्रमेयासी ॥ ५८ ॥
हिची चर्चा शब्दावाचून करावी. (मनातल्या मनात हिचा विचार करावा.) इंद्रियांना पत्ता लागू न देता हिचा उपभोग घ्यावा व हिच्यात प्रतिपादक शब्दांच्या अगोदर त्यात सांगितलेल्या सिद्धांतांचे आकलन करावे. ॥१-५८॥
 
जैसे भ्रमर परागु नेती । परी कमळदळें नेणती ।तैसी परी आहे सेविती । ग्रंथीं इये ॥ ५९ ॥
कमलातील पराग भुंगे घेऊन जातात, परंतु कमळाच्या पाकळ्यांना त्याची खबरही नसते त्याप्रमाणेच या ग्रंथातील तत्वांचे सेवन करावे. ॥१-५९॥
 
कां आपुला ठावो न सांडितां । आलिंगिजे चंद्रु प्रकटतां ।हा अनुरागु भोगितां । कुमुदिनी जाणे ॥ ६० ॥
किंवा चंद्र दिसू लागताच चंद्रविकासी कमलिनी प्रफुल्लित होऊन आपली जागा न सोडताच त्याला आलिंगन देते, हे प्रेमसौख्य कसे भोगावे ते एक तिलाच ठाऊक असते. ॥१-६०॥
 
ऐसेनि गंभीरपणें । स्थिरावलोनि अंतःकरणें ।आथिला तोचि जाणें । मानूं इये ॥ ६१ ॥
त्याचप्रमाणे गंभीर व शांत अंत:करणाने जो संपन्न आहे तोच या गीतेचे रहस्य जाणतो. ॥१-६१॥
 
अहो अर्जुनाचिये पांती । जे परिसणया योग्य होती ।तिहीं कृपा करूनि संतीं । अवधान द्यावें ॥ ६२ ॥
अहो अर्जुनाच्या पंक्तीला बसून ऐकण्याची ज्यांची योग्यता असेल त्या संतांनी कृपा करून इकडे लक्ष द्यावे. ॥१-६२॥
 
हें सलगी म्यां म्हणितलें । चरणां लागोनि विनविलें ।प्रभू सखोल हृदय आपुलें । म्हणौनियां ॥ ६३ ॥
(ज्ञानदेव म्हणतात) अहो महाराज, आपले अंत:करण गंभीर आहे. म्हणून हे (वरील ओवीतील) विधान मी लडिवाळपणे केले. ही वास्तविक आपल्या पायांजवळ विनंती आहे. ॥१-६३॥
 
जैसा स्वभावो मायबापांचा । अपत्य बोले जरी बोबडी वाचा ।तरी अधिकचि तयाचा । संतोष आथी ॥ ६४ ॥
लहान मूल जरी बोबड्या शब्दांनी बोलले तरी त्याचा अधिकच संतोष मानायचा हा ज्याप्रमाणे आईबापांचा स्वभावच असतो ॥१-६४॥
 
तैसा तुम्हीं मी अंगिकारिला । सज्जनीं आपुला म्हणितला ।तरी उणें सहजें उपसाहला । प्रार्थूं कायी ॥ ६५ ॥
त्याप्रमाणे तुमच्याकडून माझा अंगिकार झाला आहे व सज्जनांनी मला आपले म्हणून म्हटले आहे, तेव्हा अर्थातच माझे जे काय उणे असेल ते सहन करून घ्यालच. त्याबद्दल आपली प्रार्थना कशाला करू ? ॥१-६५॥
 
परी अपराधु तो आणिक आहे । जे मी गीतार्थु कवळुं पाहें ।तें अवधारा विनवूं लाहें । म्हणौनियां ॥ ६६ ॥
परंतु खरा अपराध तो वेगळाच आहे. तो हा की मी गीतेचा अर्थ आकलन करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून ऐका अशी मी तुमची विनंती करत आहे. ॥१-६६॥
 
हें अनावर न विचारितां । वायांचि धिंवसा उपनला चित्ता ।येर्‍हवीं भानुतेजीं काय खद्योता । शोभा आथी ॥ ६७ ॥
हे गीतार्थाचे काम न झेपणारे आहे, याचा विचार न करता उगाच हे साहस करण्याचे मनात आणले. वास्तविक पाहिले तर सूर्यप्रकाशात काजव्याची काय शोभा आहे ? ॥१-६७॥
 
कीं टिटिभू चांचुवरी । माप सूये सागरीं ।मी नेणतु त्यापरी । प्रवर्तें येथ ॥ ६८ ॥
किंवा टिटवीने समुद्र आटावण्यासाठी ज्याप्रमाणे आपल्या चोचीने पाणी उपसण्याचा प्रयत्न केला, त्याप्रमाणे मी अल्पज्ञ हे गीतार्थ सांगण्याच्या कामी प्रवृत्त झालो आहे.॥१-६८॥
 
आइका आकाश गिंवसावें । तरी आणीक त्याहूनि थोर होआवें ।म्हणौनि अपाडू हें आघवें । निर्धारितां ॥ ६९ ॥
हे पाहा आकाशाला कवळायचे झाल्यास आकाशाहून मोठे व्हावयास पाहिजे आणि म्हणूनच विचार केला असता हे गीतार्थ सांगणे माझ्या योग्यतेबाहेरचे आहे. ॥१-६९॥
 
या गीतार्थाची थोरी । स्वयें शंभू विवरी ।जेथ भवानी प्रश्नु करी । चमत्कारौनि ॥ ७० ॥
या गीतार्थाची महती एवढी आहे की स्वत: शंकर आपल्या मनाशीच त्याचा विचार करत असता देवी पार्वतीने ‘आपण एकसारखा विचार कशाचा करता’ असा त्यांना मोठ्या आश्चर्याने प्रश्न केला. ॥१-७०॥
 
तेथ हरु म्हणे नेणिजे । देवी जैसें कां स्वरूप तुझें ।तैसें हें नित्य नूतन देखिजे । गीतातत्व ॥ ७१ ॥
त्यावर शंकर म्हणाले, “हे देवी, ज्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा अंत लागत नाही त्याप्रमाणे गीतेचाही अंत लागत नाही. हे गीतातत्व पहावयास जावे तेव्हा नवीनच आहे असे दिसते. ॥१-७१॥
 
हा वेदार्थ सागरु । जया निद्रिताचा घोरु ।तो स्वयें सर्वेश्वरु । प्रत्यक्ष अनुवादला ॥ ७२ ॥
वेदार्थरूपी समुद्र हा योगनिद्रेत असलेल्या सर्वश्वराचे घोरणे आहे, त्या परमात्म्याने स्वत: प्रत्यक्ष जागेपणी गीता अर्जुनाला सांगितली. ॥१-७२॥
 
ऐसे जें अगाध । जेथ वेडावती वेद ।तेथ अल्प मी मतिमंद । काई होये ॥ ७३ ॥
असे हे गीतार्थाचे काम गहन आहे. या कामी वेदांचीही मती कुंठित होते आणि मी तर पडलो मंदमती. तेव्हा तेथे माझा पाड कसा लगणार ? ॥१-७३॥
 
हें अपार कैसेनि कवळावें । महातेज कवणें धवळावें ।गगन मुठीं सुवावें । मशकें केवीं ? ॥ ७४ ॥
या अमर्याद गीतार्थाचे आकलन कसे होणार ? सूर्याला कोणी उजळावे ? चिलटासारख्या क्षुद्र प्राण्यास हे आकाश आपल्या मुठीत कसे धरून ठेवता यावे ? ॥१-७४॥
 
परी एथ असे एकु आधारु । तेणेंचि बोले मी सधरु ।जे सानुकूळ श्रीगुरु । ज्ञानदेवो म्हणे ॥ ७५ ॥
असे आहे तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या कामी मला एक आधार आहे. ज्या अर्थी या कामी श्रीगुरु निवृत्तिराय यांची अनुकूलता आहे त्याअर्थी त्यांच्या आधारावर धीर धरून मी बोलतो. गीतार्थ सांगण्याचा यत्न करतो. ॥१-७५॥
 
येर्‍हवीं तरी मी मुर्खु । जरी जाहला अविवेकु ।तरी संतकृपादीपकु । सोज्वळु असे ॥ ७६ ॥
एरवी मी तर बोलून चालून मूर्ख आहे. व माझ्या हातून हा अविचार होत आहे. तरी संतकृपेचा दिवा माझ्यापुढे सारखा लखलखीत तेवत आहे. ॥१-७६॥
 
लोहाचें कनक होये । हें सामर्थ्य परिसींच आहे ।कीं मृतही जीवित लाहे । अमृतसिद्धि ॥ ७७ ॥
लोखंडाचे सोने होते खरे, परंतु तसे करण्याचे सामर्थ्य केवळ परीसामध्येच आहे. किंवा मेलेल्यासही परत जीवित लाभते पण तो प्रताप केवळ अमृताचा आहे. ॥१-७७॥
 
जरी प्रकटे सिद्धसरस्वती । तरी मुकयाहि आथी भारती ।एथ वस्तुसामर्थ्यशक्ति । नवल कयी ॥ ७८ ॥
जर प्रत्यक्ष सरस्वती प्रगट होईल तर मुक्याला वाचा फुटेल. ही केवळ वस्तुसामर्थ्याची शक्ति आहे, यात आश्चर्य ते काय ?॥१-७८॥
 
जयातें कामधेनु माये । तयासी अप्राप्य कांहीं आहे ।म्हणौनि मी प्रवर्तों लाहें । ग्रंथीं इये ॥ ७९ ॥
कामधेनु ही ज्याची आई आहे त्याला न मिळण्यासारखे काय आहे ? आणि म्हणूनच मी या ग्रंथाला हात घातला आहे. ॥१-७९॥
 
तरी न्यून ते पुरतें । अधिक तें सरतें ।करूनि घेयावें हें तुमतें । विनवितु असे ॥ ८० ॥
तरी उणे असेल ते पुरते व अधिक असेल ते मान्य करून घ्यावे अशी माझी आपणास विनंती आहे. ॥१-८०॥
 
आतां देईजो अवधान । तुम्हीं बोलविल्या मी बोलेन ।जैसे चेष्टे सूत्राधीन । दारुयंत्र ॥ ८१ ॥
आता आपण लक्ष द्यावे. आपण मला बोलवीत अहात) म्हणून मी बोलतो. (गीतेचे व्याख्यान करतो.) ज्याप्रमाणे लाकडी कळसूत्री बाहुली सूत्रधाराची दोरी जशी नाचवेल तशी नाचते ॥१-८१॥
 
तैसा मी अनुग्रहीतु । साधूंचा निरूपितु ।ते आपुलियापरी अलंकारितु । भलतयापरी ॥ ८२ ॥
त्याप्रमाणे मी आपल्या कृपेतील असून साधूंचा केवळ निरोप्या आहे. (ते सांगतील ते काम करणारा आहे.). आता त्यांनी मला वाटेल तसे नटवावे. ॥१-८२॥
 
तंव श्रीगुरु म्हणती राहीं । हे तुज बोलावें नलगे कांहीं ।आतां ग्रंथा चित्त देईं । झडकरी वेगां ॥ ८३ ॥
श्रीगुरु म्हणाले थांब. हे तू आम्हाला सांगावे असे नाही. आता तू चटकन ग्रंथार्थाकडे लक्ष दे. (लवकर ग्रंथ सांगण्यास आरंभ कर,) ॥१-८३॥
 
या बोला निवृत्तिदासु । पावूनि परम उल्हासु ।म्हणे परियसा मना अवकाशु । देऊनियां ॥ ८४ ॥
श्रीगुरूंच्या भाषणावर निवृत्तिनाथांचे शिष्य अतिशय आनंदित होऊन म्हणाले ते मी सांगतो. मोकळ्या मनाने ऐका. ॥१-८४॥
 
तरी पुत्रस्नेहें मोहितु । धृतराष्ट्र असे पुसतु ।म्हणे संजया सांगे मातु । कुरुक्षेत्रींची ॥ ८५ ॥
तर मुलांच्या ममतेने वेडा झालेला धृतराष्ट्र संजयास प्रश्न करू लागला. तो म्हणाला, संजया, कुरुक्षेत्रीची हकिकत काय आहे ती मला सांग. ॥१-८५॥
 
जें धर्मालय म्हणिजे । तेथ पांडव आणि माझे ।गेले असती व्याजें । जुंझाचेनि ॥ ८६ ॥
ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे घर म्हणतात तेथे पांडव आणि आणि माझे पुत्र लढाईच्या निमित्ताने गेलेले आहेत. ॥१-८६॥
 
तरी तेचि येतुला अवसरीं । काय किजत असे येरयेरीं ।ते झडकरी कथन करी । मजप्रती ॥ ८७ ॥
तरी ते एकमेक एवढा वेळ काय करीत आहेत ते मला लौकर सांग ॥१-८७॥
 
तिये वेळीं तो संजय बोले । म्हणे पांडव सैन्य उचललें ।जैसें महाप्रळयीं पसरलें । कृतांतमुख ॥ ८८ ॥
त्यावेळी तो संजय म्हणाला की पांडवसैन्याने उठाव केला तेव्हा ज्याप्रमाणे महाप्रळयाचे वेळी काळ आपले तोंड पसरतो त्याप्रमाणे ते दिसले. ॥१-८८॥
 
तैसें तें घनदाट । उठावलें एकवाट ।जैसें उसळलें काळकूट । धरी कवण ॥ ८९ ॥
अशा प्रकारे त्या घनदाट सैन्याने एकदम उठाव केला (तेव्हा त्याला कोण आवरणार ?) जसे काळकूट एकदा उसळले म्हणजे त्याचे शमन करण्याला कोण समर्थ आहे ? ॥१-८९॥
 
नातरी वडवानळु सादुकला । प्रळयवातें पोखला ।सागरु शोषूनि उधवला । अंबरासी ॥ ९० ॥
अथवा वडवानल (समुद्राच्या पोटातील अग्नी) एकदा पेटला तशात त्याला वार्‍याने हात दिला म्हणजे तो जसा सागराचे शोषण करून आकाशापर्यंत भडकतो ॥१-९०॥
 
तैसें दळ दुर्धर । नानाव्यूहीं परीकर ।अवगमलें भयासुर । तिये काळीं ॥ ९१ ॥
त्याप्रमाणे न आटोपणारे ते सैन्य अनेक व्यूह रचून सज्ज झालेले असल्यामुळे त्यावेळी फारच भयंकर भासले. ॥१-९१॥
 
तें देखोनियां दुर्योधनें । अव्हेरिलें कवणें मानें ।जैसे न गणिजे पंचाननें । गजघटांतें ॥ ९२ ॥
ज्याप्रमाणे हत्तीच्या कळपांना सिंह मुळीच मोजत नाही त्याप्रमाणे ते सैन्य पाहून दुर्योधनाने त्याची मुळीच पर्वा केली नाही. ॥१-९२॥
 
मग द्रोणापासीं आला । तयांतें म्हणे हा देखिला ।कैसा दळभारू उचलला । पांडवांचा ॥ ९३ ॥
नंतर दुर्योधनाजवळ येऊन त्यांना म्हणाला पांडवांचे हे सैन्य कसे उसळले आहे पहा. ॥१-९३॥
 
गिरिदुर्ग जैसे चालते । तैसे विविध व्यूह सभंवते ।रचिले आथी बुद्धिमंतें । द्रुपदकुमरें ॥ ९४ ॥
हुशार अशा द्रुपदपुत्र धृष्ट्यद्युम्नाने सैन्याचे हे नानाप्रकारचे व्यूह सभोवार रचलेले आहेत. जसे काय डोंगरी किल्लेच. ॥१-९४॥
 
जो हा तुम्हीं शिक्षापिला । विद्या देऊनि कुरुठा केला ।तेणें हा सैन्यसिंहु पाखरिला । देख देख ॥ ९५ ॥
ज्याला तुम्ही शिक्षण देऊन शहाणे केलेत त्याने (धृष्टद्युम्नाने) हा सैन्यसिंह कसा उभा केला आहे ते पहा तर खर. ॥१-९५॥
 
आणिकही असाधारण । जे शस्त्रास्त्रीं प्रवीण ।क्षात्रधर्मीं निपुण । वीर आहाती ॥ ९६ ॥
आणखीही जे शस्त्रास्त्रात प्रवीण व क्षात्रधर्मात निपुण आहेत असे असामान्य योद्धे आहेत. ॥१-९६॥
 
जे बळें प्रौढी पौरुषें । भीमार्जुनांसारिखे ।ते सांगेन कौतुकें । प्रसंगेची ॥ ९७ ॥
जे शक्तीने, मोठेपणाने व पराक्रमाने भीम व अर्जुन यांच्यासारखे आहेत त्यांची नावे प्रसंग आला आहे म्हणून कौतुकाने सांगतो. ॥१-९७॥
 
एथ युयुधानु सुभटु । आला असे विराटु ।महारथी श्रेष्ठु । द्रुपद वीरु ॥ ९८ ॥
येथे लढवय्या सात्यकी, विराट, महारथी श्रेष्ठ आणि शूर असा द्रुपद हे आले आहेत. ॥१-९८॥
 
चेकितान धृष्टकेतु । काशिराज वीर विक्रांतु ।उत्तमौजानृपनाथु । शैब्य देख ॥ ९९ ॥
चेकितान, धृष्टकेतु, पराक्रमी असा काशिराजा. नृपश्रेष्ठ उत्तमौजा आणि राजा शैब्य हे पहा. ॥१-९९॥
 
हा कुंतिभोज पाहें । एथ युधामन्यु आला आहे ।आणि पुरुजितादि राय हे । सकळ देख ॥ १०० ॥
हा कुंतिभोज पहा. येथे हा युधामन्यु आला आहे. आणखी पुरुजित वगैरे राजे आलेले आहेत, ते पहा ॥१-१००॥

 

हा सुभद्राहृदयनंदनु । जो अपरु नवार्जुनु ।तो अभिमन्यु म्हणे दुर्योधनु । देखें द्रोणा ॥ १०१ ॥
दुर्योधन म्हणाला, अहो द्रोणाचार्य, सुभद्रेच्या अंत:करणाला आनंद देणारा व प्रतिअर्जुनच असा तिचा मुलगा अभिमन्यु हा पहा. ॥१-१०१॥
 
आणीकही द्रौपदीकुमर । हे सकळही महारथी वीर ।मिती नेणिजे परी अपार । मीनले असती ॥ १०२ ॥
आणखीही द्रौपदीचे पुत्र हे सर्व महारथी वीर आहेत. त्यांची मोजदाद करता येणार नाही. पण असे अपरिमित महारथी वीर या ठिकाणी जमले आहेत. ॥१-१०२॥
 
आतां आमुच्या दळीं नायक । जे रूढवीर सैनिक ।ते प्रसंगें आइक । सांगिजती ॥ १०३ ॥
आता आमच्या सैन्यामधे प्रमुख प्रमुख असे जे महायोद्धे आहेत ते प्रसंगाच्या ओघानेच सांगतो ऐका. ॥१-१०३॥
 
उद्देशें एक दोनी । जायिजती बोलोनी ।तुम्ही आदिकरूनी । मुख्य जे जें ॥ १०४ ॥
तुम्ही आदिकरून जे मुख्य मुख्य वीर आहेत त्यांची नावे केवळ दिग्दर्शनार्थ (आपल्या माहिती करता) सांगतो. ॥१-१०४॥
 
हा भीष्म गंगानंदनु । जो प्रतापतेजस्वी भानु ।रिपुगजपंचाननु । कर्णवीरु ॥ १०५ ॥
प्रतापाने केवळ तेजस्वी सूर्यच असा हा गंगेचा पुत्र भीष्म आहे आणि शत्रुरूपी हत्तीला सिंहासारखा असणारा हा वीर कर्ण आहे. ॥१-१०५॥
 
या एकेकाचेनी मनोव्यापारें । हें विश्व होय संहरे ।हा कृपाचार्यु न पुरे । एकलाचि ॥ १०६ ॥
या एकेकट्याच्या केवळ संकल्पाने या जगाची उत्पत्ती व संहार होऊ शकतात. फार कशाला ? हा एकटाच कृपाचार्य यांना पुरे नाही का ? ॥१-१०६॥
 
एथ विकर्ण वीरु आहे । हा अश्वत्थामा पैल पाहें ।याचा आडदरु सदां वाहे । कृतांतु मनीं ॥ १०७ ॥
येथे विकर्ण वीर आहे. तो पलिकडे अश्वत्थामा पहा. याची धास्ती प्रत्यक्ष यमही मनात नेहेमी बाळगीत असतो. ॥१-१०७॥
 
समितिंजयो सौमदत्ती । ऐसे आणीकही बहुत आहाती ।जयांचिया बळा मिती । धाताही नेणें ॥ १०८ ॥
समितिंजय आणि सौमदत्ति असे आणखीही पुष्कळ आहेत. त्यांच्या सामर्थ्याची मर्यादा ब्रह्मदेवालाही समजत नाही. ॥१-१०८॥
 
जे शास्त्रविद्यापारंगत । मंत्रावतार मूर्त ।हो कां जें अस्त्रजात । एथूनि रूढ ॥ १०९ ॥
ते शस्त्रविद्येत तरबेज आहेत, अस्त्रांच्या मंत्रविद्येचे मूर्तिमंत अवतार आहेत. फार काय सांगावे ? जेवढी म्हणून अस्त्रे आहेत, तेवढी सर्व यांच्यापासूनच प्रचारात आली आहेत. ॥१-१०९॥
 
हे अप्रतिमल्ल जगीं । पुरता प्रतापु अंगीं ।परी सर्व प्राणें मजलागीं । आरायिले असती ॥ ११० ॥
हे या जगात अद्वितीय योद्धे आहेत. यांच्या अंगात पुरेपूर शौर्य आहे. एवढे असूनही हे सर्व वीर अगदी जिवावर उदार होऊन माझ्या बाजूला मिळाले आहेत. ॥१-११०॥
 
पतिव्रतेचें हृदय जैसें । पतिवांचूनि न स्पर्शे ।मी सर्वस्व या तैसें । सुभटांसी ॥ १११ ॥
ज्याप्रमाणे पतिव्रतेचे मन पतीवाचून इतराला स्पर्श करीत नाही त्याप्रमाणे या चांगल्या योद्ध्यांना मीच काय ते सर्वस्व आहे. ॥१-१११॥
 
आमुचिया काजाचेनि पाडें । देखती आपुलें जीवित थोकडें ।ऐसे निरवधि चोखडें । स्वामिभक्त ॥ ११२ ॥
आमच्या कार्यापुढे यांना आपले जीवित अगदी तुच्छ वाटते. असे हे निस्सीम व उत्तम स्वामिभक्त आहेत. ॥१-११२॥
 
झुंजती कुळकणी जाणती । कळे किर्तीसी जिती ।हे बहु असो क्षात्रनीति । एथोनियां ॥ ११३ ॥
हे युद्धकुशल असून युद्धकौशल्याने कीर्तीस जिंकणारे आहेत. फार काय सांगावे ? क्षात्रधर्म मूळ यांच्यापासूनच उत्पन्न झाला आहे. ॥१-११३॥
 
ऐसे सर्वांपरि पुरते । वीर दळीं आमुते ।आतं काय गणूं यांतें । अपार हे ॥ ११४ ॥
याप्रमाणे सर्व अंगांनी परिपूर्ण असे वीर आमच्या सैन्यात आहेत. आता यांची काय गणती करू ? हे अपार आहेत. ॥१-११४॥
 
वरी क्षत्रियांमाजी श्रेष्ठु । जो जगजेठी जगीं सुभटु ।तया दळवैपणाचा पाटु । भीष्मासि पैं ॥ ११५ ॥
आणखी क्षत्रियांमधे श्रेष्ठ व या जगात नाणावलेले योद्धे असे जे भीष्माचार्य, त्यांना या सेनेच्या अधिपत्याचा अधिकार दिलेला आहे. ॥१-११५॥
 
आतां याचेनि बळें गवसलें । हे दुर्ग जैसे पन्नासिलें ।येणें पाडें थेकुलें । लोकत्रय ॥ ११६ ॥
आता यांनी आपल्या सामर्थ्याने आवरून या सैन्याची अशी काही रचना केली आहे की जसे काय किल्लेच बांधले आहेत. याच्यापुढे त्रिभुवनही क:पदार्थ आहे. ॥१-११६॥
 
आधींच समुद्र पाहीं । तेथ दुवाडपण कवणा नाहीं ।मग वडवानळु तैसे याही । विरजा जैसा ॥ ११७ ॥
आधी असे पहा, समुद्र हा कोणाला दुस्तर नाही ? तशात ज्याप्रमाणे वडवानल साह्यकारी व्हावा, ॥१-११७॥
 
ना तरीं प्रळयवन्ही महावातु । या दोघां जैसा सांधातु ।तैसा हा गंगासुतु । सेनापति ॥ ११८ ॥
किंवा प्रलयकाळचा अग्नि व प्रचंड वारा या दोहोंचा ज्याप्रमाणे मिलाफ व्हावा, त्याप्रमाणे या गंगेच्या पुत्राच्या सेनापतित्वाची जोड या पराक्रमी सैन्याला मिळाली आहे. ॥१-११८॥
 
आतां येणेंसि कवण भिडे । हें पांडवसैन्य कीर थोकडें ।परि वरचिलेनि पाडें । दिसत असे ॥ ११९ ॥
आता या सैन्याबरोबर कोण झगडेल ? वर सांगितलेल्या आमच्या या सैन्याच्या मानाने हे पांडवांचे सैन्य खरोखरच अपुरे दिसत आहे. ॥१-११९॥
 
वरी भीमसेनु बेथु । तो जाहला असे सेनानाथु ।ऐसें बोलोनियां मातु । सांडिली तेणें ॥ १२० ॥
आणि त्यात भीमसेन (अगोदरच) आडदांड आणि तो त्यांच्या सैन्याचा अधिपती झाला आहे (मग काय?) असे बोलून त्याने ती गोष्ट सोडून दिली. ॥१-१२०॥
 
मग पुनरपि काय बोले । सकळ सैनिकांतें म्हणितलें ।आतां दळभार आपुलाले । सरसे करा ॥ १२१ ॥
मग दुर्योधन सर्व सेनापतींना असे म्हणाला की आपापले सैन्यसमुदाय सज्ज करा. ॥१-१२१॥
 
जया जिया अक्षौहिणी । तेणें तिया आरणी ।वरगण कवणकवणी । महारथीया ॥ १२२ ॥
ज्यांच्या ज्या अक्षौहिणी आल्या असतील त्यांनी त्या अक्षौहिणी युद्धभूमीवर कोणकोणत्या महारथ्याकडे द्यायच्या आहेत त्या द्याव्या. ॥१-१२२॥
 
तेणें तिया आवरिजे । भीष्मातळीं राहिजे ।द्रोणातें म्हणे पाहिजे । तुम्ही सकळ ॥ १२३ ॥
त्या महारथ्याने त्या अक्षौहिणीला आपल्या हुकमतीत ठेवावे. आणि भीष्मांच्या आज्ञेत रहावे. (नंतर) दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणाला, तुम्ही सर्वांवर देखरेख ठेवावी. ॥१-१२३॥
 
हाचि एकु रक्षावा । मी तैसा हा देखावा ।येणें दळभारु आघवा । साचु आमुचा ॥ १२४ ॥
या भीष्मांचेच फक्त संरक्षण करावे. यांना माझ्याप्रमाणेच मानावे. यांच्या योगानेच आमचा हा सर्व सेनाभार खरा समर्थ आहे. (आमच्या सेनेची मदार यांच्यावरच आहे.) ॥१-१२४॥
 
या राजयाचिया बोला । सेनापति संतोषला ।मग तेणें केला । सिंहनादु ॥ १२५ ॥
राजाच्या या भाषणाने सेनापती भीष्मांना संतोष झाला. मग त्याने सिंहासारखी गर्जना केली. ॥।१-१२५॥
 
तो गाजत असे अद्भुतु । दोन्ही सैन्याआंतु ।प्रतिध्वनि न समातु । उपजत असे ॥ १२६ ॥
ती गर्जना दोन्ही सैन्यात विलक्षण तर्‍हेने दुमदुमत राहिली. तिचा प्रतिध्वनीही आकाशात न मावता पुन्हा पुन्हा उठू लागला. ॥१-१२६॥
 
तयाचि तुलगासवें । वीरवृत्तीचेनि थावें ।दिव्य शंख भीष्मदेवें । आस्फुरिला ॥ १२७ ॥
तो प्रतिध्वनी उठत असताच वीरवृत्तीच्या बलाने स्फुरण येऊन भीष्मांनी आपला शंख वाजवला. ॥१ -१२७॥
 
ते दोन्ही नाद मीनले । तेथ त्रैलोक्य बधिरीभूत जाहलें ।जैसें आकाश कां पडिलें । तुटोनिया ॥ १२८ ॥
ते दोन्ही आवाज मिळाले तेव्हा त्रैलोक्याच्या कानठळ्या बसल्या. त्यावेळी जणू काय आकाशच तुटून पडते की काय असे वाटले. ॥१-१२८॥
 
घडघडीत अंबर । उचंबळत सागर ।क्षोभलें चराचर । कांपत असे ॥ १२९ ॥
त्यामुळे आकाश घडाडले, सागर उसळला, आणि स्थावर व जंगम थरथर कापू लागले. ॥१-१२९॥
 
तेणें महाघोषगजरें । दुमदुमिताती गिरिकंदरें ।तव दळामाजीं रणतुरें । आस्फुरिलीं ॥ १३० ॥
त्या मोठ्या आवाजाच्या नादाने डोंगरातील दर्‍या दणाणून राहिल्या. इतक्यात त्या सैन्यात रणावाद्ये वाजू लागली. ॥१-१३०॥
 
उदंड सैंघ वाजतें । भयानखें खाखातें ।महाप्रळयो जेथें । धाकडांसी ॥ १३१ ॥
नाना प्रकारची रणवाद्ये जिकडे तिकडे इतकी भयंकर व कर्कश वाजू लागली मी मी म्हणणारांनाही तो महाप्रलय वाटला. ॥१-१३१॥
 
भेरी निशाण मांदळ । शंख काहळ भोंगळ ।आणि भयासुर रणकोल्हाळ । सुभटांचे ॥ १३२ ॥
नौबत, डंके, ढोल, शंख, मोठ्या झांजा व कर्णे आणि महायोद्ध्यांच्या भयंकर गर्जना (या सर्वांची एकच गर्दी झाली.) ॥१-१३२॥
 
आवेशें भुजा त्राहाटिती । विसणेले हांका देती ।जेथ महामद भद्रजाती । आवरती ना ॥ १३३ ॥
ते योद्धे आवेशाने दंड ठोकू लागले, कोणी चिडून एकमेकांना युद्धासाठी हाका मारू लागेले आणि त्या ठिकाणी मदोन्मत्त हत्ती आवरेनासे झाले. ॥१-१३३॥
 
तेथ भेडांची कवण मातु । कांचया केर फिटतु ।जेणें दचकला कृतांतु । आंग नेघे ॥ १३४ ॥
तेथे अशा स्थितीत भित्र्यांची तर गोष्टच कशाला पाहिजे ? कच्चे लोक तर कस्पटासमान उडून गेलेच, पण प्रत्यक्ष यमास सुद्धा धाक पडला. तो गर्भगळित होऊन पायच धरीना. ॥१-१३४॥
 
एकां उभयाचि प्राण गेले । चांगांचे दांत बैसले ।बिरुदाचे दादुले । हिंवताती ॥ १३५ ॥
त्यापैकी कित्येकांचे तर उभ्याउभ्याच प्राण गेले. जे धैर्यवान होते, त्यांची दांतखिळी बसली आणि मी मी म्हणाणारे नामांकित वीर थरथर कापू लागले. ॥१-१३५॥
 
ऐसा अद्भुत तूरबंबाळु । ऐकोनि ब्रह्मा व्याकुळु ।देव म्हणती प्रळयकाळु । वोढवला आजी ॥ १३६ ॥
असा वाद्यांचा मोठा विलक्षण आवाज ऐकून ब्रह्मदेव व्याकुळ झाला व आज प्रलयकाल येऊन ठेपला असे देव म्हणू लागले. ॥१-१३६॥
 
ऐसी स्वर्गीं मातु । देखोनि तो आकांतु ।तव पांडवदळाआंतु । वर्तलें कायी ॥ १३७ ॥
तो आकांत पाहून स्वर्गात अशी गोष्ट झाली. इतक्यात इकडे पांडवांच्या सैन्यात काय झाले ॥१-१३७॥
 
हो कां निजसार विजयाचें । कीं तें भांडार महातेजाचें ।जेथ गरुडाचिये जावळियेचे । कांतले चार्‍ही ॥ १३८ ॥
जो रथ विजयाचा गाभा, किंवा महातेजाचे भांडारच होता, ज्याला वेगात गरुडाची बरोबरी करणारे चार घोडे जुंपले होते ॥१-१३८॥
 
कीं पाखांचा मेरु जैसा । रहंवरु मिरवतसे तैसा ।तेजें कोंदाटलिया दिशा । जयाचेनि ॥ १३९ ॥
व ज्याच्या तेजाने सर्व दिशा भरून गेल्या होत्या व जो दिव्य असा शोभत होता, जणु काय पंख असलेला मेरु पर्वतच. ॥१-१३९॥
 
जेथ अश्ववाहकु आपण । वैकुंठींचा राणा जाण ।तया रथाचे गुण । काय वर्णूं ॥ १४० ॥
ज्या रथावर सारथ्याचे काम करणारा प्रत्यक्ष वैकुंठाचा राजा श्रीकृष्ण आहे, त्या रथाचे गुण काय वर्णन करावेत ? ॥१-१४०॥
 
ध्वजस्तंभावरी वानरु । तो मुर्तिमंत शंकरु ।सारथी शारङ्गधरु । अर्जुनेसीं ॥ १४१ ॥
रथावर लावलेल्या निशाणाच्या खांबावर शंकराचा अवतार असलेला प्रत्यक्ष वानर मारुती होता व शारंगधर श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचा सारथी होता. ॥१-१४१॥
 
देखा नवल तया प्रभूचें । अद्भुत प्रेम भक्ताचें ।
जें सारथ्यपण पार्थाचें । करितु असे ॥ १४२ ॥
पहा त्या प्रभूचे नवल ! त्याचे भक्ताविषयीचे प्रेम विलक्षण आहे. कारण ( तो सर्वशक्तिमान परमेश्वर, पण) अर्जुनाच्या सारथ्याचेही काम करत होता. ॥१-१४२॥
 
पाइकु पाठींसी घातला । आपण पुढां राहिला ।तेणें पाञ्चजन्यु आस्फुरिला । अवलीळाचि ॥ १४३ ॥
आपल्या दासाला पाठीशी घालून तो स्वत: युद्धाच्या तोंडावर राहिला. त्या श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा शंख लीलेनेच वाजवला ॥१-१४३॥
 
परि तो महाघोषु थोरु । गर्जतु असे गंहिरु ।जैसा उदेला लोपी दिनकरु । नक्षत्रांतें ॥ १४४ ॥
परंतु त्याचा तो भयंकर आवाज गंभीरपणे घुमत राहिला. ज्याप्रमाणे उगवलेला सूर्य नक्षत्रांना लोपवून टाकतो, ॥१-१४४॥
 
तैसें तुरबंबाळु भंवते । कौरवदळीं गाजत होते ।ते हारपोनि नेणों केउते । गेले तेथ ॥ १४५ ॥
त्याप्रमाणे कौरवांच्या सैन्यात जिकडे तिकडे दुमदुमणारा जो वाद्यांचा कल्लोळ तो त्या शंखाच्या महानादाने कोणीकडे लोपून गेला ते काही कळेना. ॥१-४५॥
 
तैसाचि देखे येरे । निनादें अति गहिरे ।देवदत्त धनुर्धरें । आस्फुरिला ॥ १४६ ॥
त्याप्रमाणे पहा, नंतर त्या अर्जुनाने अतिगंभीर आवाजात आपला देवदत्त नावाचा शंख वाजवला. ॥१-१४६॥
 
ते दोन्ही शब्द अचाट । मिनले एकवट ।तेथ ब्रह्मकटाह शतकूट । हों पाहत असे ॥ १४७ ॥
ते दोन्ही अचाट आवाज जेव्हा एकत्र मिळाले तेव्हा हे सर्व ब्रह्मांड शतचूर्ण होते की काय असे वाटू लागले. ॥१-१४७॥
 
तंव भीमसेनु विसणैला । जैसा महाकाळु खवळला ।तेणें पौण्ड्र आस्फुरिला । महाशंखु ॥ १४८ ॥
इतक्यात खवळलेल्या यमाप्रमाणे आवेश चढलेल्या भीमाने आपला पौंड्र नावाचा मोठा शंख वाजवला. ॥१-१४८॥
 
तो महाप्रलयजलधरु । जैसा घडघडिला गहिंरु ।तंव अनंतविजयो युधिष्ठिरु । आस्फुरित असे ॥ १४९ ॥
त्याचा आवाज कल्पांताच्या वेळच्या मेघगर्जनेप्रमाणे अतिगंभीर असा मोठा झाला. इतक्यात धर्मराजाने अनंतविजय नावाचा शंख वाजवला. ॥१-१४९॥
 
नकुळें सुघोषु । सहदेवें मणिपुष्पकु ।जेणें नादें अंतकु । गजबजला ठाके ॥ १५० ॥
नकुलाने सुघोष व सहदेवाने मणिपुष्पक या नावाचे शंख वाजवले. त्या आवजाने कालही गडबडून गेला. ॥१-१५०॥
 
तेथ भूपति होते अनेक । द्रुपद द्रौपदेयादिक ।हा काशीपति देख । महाबाहु ॥ १५१ ॥
त्या युद्धभूमीवर द्रुपद, द्रौपदीचे पुत्र. इत्यादी अनेक राजे होते. हा वीर्यशाली काशीराजा पहा. ॥१-१५१॥
 
तेथ अर्जुनाचा सुतु । सात्यकि अपराजितु ।धृष्टद्युम्नु नृपनाथु । शिखंडी हन ॥ १५२ ॥
तेथे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यु, अजिंक्य सात्यकी, राजश्रेष्ठ धृष्टद्युम्न व शिखंडी ॥१-१५२॥
 
विराटादि नृपवर । जे सैनिक मुख्य वीर ।तिहीं नानाशंख निरंतर । आस्फुरिले ॥ १५३ ॥
विराटादिक मोठे मोठे राजे, जे महत्वाचे शूर सैनिक होते, त्यांनी सर्वांनी निरनिराळे शंख एकसारखे वाजवण्यास आरंभ केला. ॥१-१५३॥
 
तेणें महाघोषनिर्घातें । शेष कूर्म अवचितें ।गजबजोनि भूभारातें । सांडूं पाहती ॥ १५४ ॥
त्या मोठ्या घोषाच्या दणाक्याने शेष व कूर्म हे एकदम गोंधळून गेले आणि आपण धरलेले पृथ्वीचे ओझे टाकून देण्याच्या बेतात आले. ॥१-१५४॥
 
तेथ तिन्ही लोक डळमळित । मेरु मांदार आंदोळित ।
समुद्रजळ उसळत । कैलासवेरी ॥ १५५ ॥
त्य़ामुळे तिन्ही लोक डळमळू लागले. मेरु व मंदार पर्वत मागेपुढे झोके खाऊ लागले. व समुद्राच्या लाटा कैलासापर्यंत उसळल्या. ॥१-१५५॥
 
पृथ्वीतळ उलथों पहात । आकाश असे आसुडत ।तेथ सडा होत । नक्षत्रांचा ॥ १५६ ॥
जमीन उलथते की काय व आकाशाला हिसके बसू लागल्यामुळे नक्षत्रांचा सडाच पडतो की काय असे वाटू लागले. ॥१-१५६॥
 
सृष्टी गेली रे गेली । देवां मोकळवादी जाहली ।ऐशी एक टाळी पिटली । सत्यलोकीं ॥ १५७ ॥
सृष्टी चालली रे चालली, देवांना निराधार स्थिती आली, अशी ब्रह्मलोकात एकच ओरड झाली. ॥१-१५७॥
 
दिहाचि दिन थोकला । जैसा प्रलयकाळ मांडला ।तैसा हाहाकारु जाहला । तिन्हीं लोकीं ॥ १५८ ॥
दिवसाच सूर्य थांबला व प्रलयकाळ सुरू व्हावा त्याप्रमाणे तिन्ही लोकात हाहाकार उडाला. ॥१-१५८॥
 
तें देखोनि आदिपुरुषु विस्मितु । म्हणे झणें होय पां अंतु ।मग लोपिला अद्भुतु । संभ्रमु तो ॥ १५९ ॥
ते पाहून परमात्मा विस्मित झाला व मनात म्हणाला, न जाणो, सृष्टीचा अंत होईल. (तो चुकवावा म्हणून) मग त्याने विलक्षण गोंधळ एकदम शांत केला. ॥१-१५९॥
 
म्हणौनि विश्व सांवरलें । एर्‍हवीं युगांत होतें वोडवलें ।जैं महाशंख आस्फुरिले । कृष्णादिकीं ॥ १६० ॥
त्यामुळे जग सावरले. नाहीतर ज्यावेळी कृष्णादिकांनी आपले दिव्य शंख वाजवले त्यावेळीच युगांत होण्याची वेळ आली होती. ॥१-१६०॥
 
तो घोष तरी उपसंहरला । परि पडिसाद होता राहिला ।तेणें दळभार विध्वंसिला । कौरवांचा ॥ १६१ ॥
तो घोष तर शांत झाला. पण त्याचा प्रतिध्वनी जो शिल्ल्क राहिला होता त्यामुळेच सर्व कौरवांच्या सैन्याची दाणादाण उडाली. ॥१-१६१॥
 
जैसा गजघटाआंतु । सिंह लीला विदारितु ।तैसा हृदयातें भेदितु । कौरवांचिया ॥ १६२ ॥
हत्तींच्या कळपाची सिंह लीलेनेच जशी फाकाफाक करतो, तशी कौरवांची अंत:करणे त्या प्रतिध्वनीने भेदून टाकली. ॥१-१६२॥
 
तो गाजत जंव आइकती । तंव उभेचि हिये घालिती ।एकमेकांतें म्हणती । सावध रे सावध ॥ १६३ ॥
तो प्रतिध्वनी दुमदुमत असतांना जेव्हा त्यांच्या कानावर आला तेव्हा उभेपणीच त्यांच्या काळाजाने ठाव सोडला. त्यातले त्यात ते एकमेकांना ‘अरे सावध रे सावध’ म्हणू लागले; ॥१-१६३॥
 
तेथ बळें प्रौढीपुरतें । महारथी वीर होते ।तिहीं पुनरपि दळातें । आवरिलें ॥ १६४ ॥
त्या सैन्यात पराक्रमाने व मोठेपणाने जे पुरे शूर महारथी होते त्यांनी पुन्हा सैन्याला आवरले. ॥१-१६४॥
 
मग सरिसेपणें उठावले । दुणवटोनि उचलले ।तया दंडीं क्षोभलें । लोकत्रय ॥ १६५ ॥
मग ते लढण्याच्या तयारीने सिद्ध झालेले व दुप्पट जोराने उसळले. त्या सैन्याच्या उसळण्याने तिन्ही लोक त्रस्त झाले. ॥१-१६५॥
 
तेथ बाणवरी धर्नुधर । वर्षताती निरंतर ।जैसे प्रळयांत जलधर । अनिवार कां ॥ १६६ ॥
त्यावेळी प्रलयकाली मेघ ज्याप्रमाणे अनिवार वर्षाव करतात, त्याप्रमाणे धनुष्य धारण करणारे योद्धे बाणांचा एकसारखा वर्षाव करू लागले. ॥१-१६६॥
 
ते देखलिया अर्जुनें । संतोष घेऊनि मनें ।मग संभ्रमें दिठी सेने । घालीतसे ॥ १६७ ॥
अर्जुनाने ते पाहून मनात संतोष मानला आणि मग उत्सुकतेने सैन्याकडे नजर फेकली. ॥१-१६७॥
 
तंव संग्रामीं सज्ज जाहले । सकळ कौरव देखिले ।तंव लीलाधनुष्य उचललें । पंडुकुमरें ॥ १६८ ॥
तेव्हा युद्धाला तयार असलेले सर्व कौरव त्याने पाहिले. मग पांडुपुत्र अर्जुनाने लीलेनेच धनुष्य उचलून घेतले. ॥१-१६८॥
 
ते वेळीं अर्जुन म्हणतसे देवा । आतां झडकरी रथु पेलावा ।नेऊनि मध्यें घालावा । दोहीं दळां ॥ १६९ ॥
त्यावेळी अर्जुन म्हणाला, देवा आता चटकन रथ हाकावा व तो तो दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा करावा. ॥१-१६९॥
 
जंव मी नावेक । हे सकळ वीर सैनिक ।न्याहाळीन अशेख । झुंजते ते ॥ १७० ॥
जोपर्यंत हे सर्व झुंजण्याकरता आलेले शूर सैनिक मी क्षणभर पुरते न्याहाळून पाहीन (तोपर्यंत रथ उभा कर). ॥१-१७०॥
 
येथ आले असती आघवें । परी कवणेंसीं म्यां झुंजावें ।हे रणीं लागे पहावें । म्हणौनियां ॥ १७१ ॥
येथे सर्व आले आहेत. पण मी रणात कोणाबरोबर लढावे, याचा विचार करणे जरुर आहे. (म्हणून मी पहातो). ॥१-१७१॥
 
बहुतकरूनि कौरव । हे आतुर दुःस्वभाव ।वांटिवेवीण हांव । बांधिती झुंजीं ॥ १७२ ॥
फार करून हे कौरव उतावीळ व दुष्ट बुद्धीचे असून पुरुषार्थावाचून युद्धाची हाव धरतात. ॥१-१७२
 
झुंजाची आवडी धरिती । परी संग्रामीं धीर नव्हती ।हें सांगोनि रायाप्रती । काय संजयो म्हणे ॥ १७३ ॥
ते लढाईची हौस तर बाळगतात पण युद्धात टिकाव धरत नाहीत. इतके सांगून संजय धृतराष्ट्र राजाला पुढे काय म्हणाला ॥१-१७३॥
 
आइका अर्जुन इतुकें बोलिला । तंव श्रीकृष्णें रथु पेलिला ।दोही सैन्यांमाजीं केला । उभा तेणें ॥ १७४ ॥
ऐका. अर्जुन एवढे बोलला. इतक्यात श्रीकृष्णाने रथ हाकला व त्याने तो दोन्ही सैन्यांमधे उभा केला. ॥१-१७४॥
 
जेथ भीष्मद्रोणादिक । जवळिकेचि सन्मुख ।पृथिवीपति आणिक । बहुत आहाती ॥१७५ ॥
ज्या ठिकाणी भीष्म, द्रोण आदिकरून आप्तसंबंधी व आणखी पुष्कळ राजे पुढे उभे होते ॥१-१७५॥
 
तेथ स्थिर करूनियां रथु । अर्जुन असे पाहातु ।तो दळभार समस्तु । संभ्रमेंसीं ॥ १७६ ॥
त्या ठिकाणी रथ थांबवून अर्जुन तो सर्व सैन्यसमुदाय उत्सुकतेने पाहू लागला. ॥१-१७६॥
 
मग देवा म्हणे देख देख । हे गुरुगोत्र अशेख ।तंव कृष्णमनीं नावेक । विस्मो जाहला ॥ ७७ ॥
मग म्हणाला, देवा पहा, पहा. हे सगळे भाऊबंद व गुरु आहेत. तेव्हा ते ऐकून श्रीकृष्णाच्या मनाला अचंबा वाटला. ॥१-१७७॥
 
तो आपणयां आपण म्हणे । एथ कायी कवण जाणे ।हें मनीं धरलें येणें । परि कांहीं आश्चर्य असे ॥ १७८ ॥
तो श्रीकृष्ण आपल्या मनाशीच म्हणाला, ह्याने ह्या वेळी हे काय मनात आणले आहे कुणास ठाऊक ? पण काहीतरी विलक्षणच असावे. ॥१-१७८॥
 
ऐसी पुढील से घेतु । तो सहजें जाणें हृदयस्थु ।परि उगा असे निवांतु । तिये वेळीं ॥ १७९ ॥
याप्रमाणे पुढचे त्याने अनुमान बांधले. तो सर्वांच्या हृदयात रहाणारा असल्यामुळे त्याने ते सहज जाणले. परंतु त्यावेळी तो काही न बोलता स्तब्ध राहिला. ॥१-१७९॥
 
तंव तेथ पार्थु सकळ । पितृ पितामह केवळ ।गुरु बंधु मातुळ । देखता जाहला ॥ १८० ॥
तो तेथे केवळ आपले चुलते, आजे, गुरु, भाऊ, मामा यासर्वांसच अर्जुनाने पाहिले. ॥१-१८०॥
 
इष्ट मित्र आपुले । कुमरजन देखिले ।हे सकळ असती आले । तयांमाजी ॥ १८१ ॥
आपले इष्टमित्र, मुलेबाळे हे सर्व त्या सैन्यात आले आहेत असे त्याने पाहिले. ॥१-१८१॥
 
सुहृज्जन सासरे । आणीकही सखे सोइरे ।कुमर पौत्र धर्नुर्धरें । देखिले तेथ ॥ १८२ ॥
जिवलग मित्र, सासरे, आणखी सगेसोयरे, पुत्र, नातु, असे अर्जुनाने तेथे पाहिले. ॥१-१८२॥
 
जयां उपकार होते केले । कीं आपदीं जे रक्षिले ।हे असो वडील धाकुले । आदिकरूनि ॥ १८३ ॥
ज्यांच्यावर त्याने उपकार केले होते किंवा संकटकाळी ज्यांचे रक्षण केले होते, फार काय लहानमोठे आदिकरून – ॥१-१८३॥
 
ऐसें गोत्रचि दोहीं दळीं । उदित जालें असे कळीं ।हे अर्जुनें तिये वेळीं । अवलोकिलें ॥ १८४ ॥
असे हे सर्व कूळच दोन्ही सैन्यात लढाईस तयार झालेले आहे हे त्यावेळी अर्जुनाने पाहिले. ॥१-१८४॥
 
तेथ मनीं गजबज जाहली । आणि आपैसी कृपा आली ।तेणें अपमानें निघाली । वीरवृत्ति ॥ १८५ ॥
त्याप्रसंगी अर्जुनाच्या मनात गडबड उडाली आणि (त्यामुळे त्याच्या मनात) सहजच करुणा उत्पन्न झाली. त्या अपमानामुळे अर्जुनाच्या अंगातील वीरवृत्ती निघून गेली. ॥१-१८५॥
 
जिया उत्तम कुळींचिया होती । आणि गुणलावण्य आथी ।तिया आणिकीतें न साहती । सुतेजपणें ॥ १८६ ॥
ज्या स्त्रिया उच्च कुळातल्या असून गुण व रूप यांनी संपन्न असतात त्यांना आपल्या अंगच्या पाणिदारपणामुळे दुसर्‍या स्त्रीचे (सवतीचे) वर्चस्व सहन होत नाही. ॥१-१८६॥
 
नविये आवडीचेनि भरें । कामुक निजवनिता विसरे ।मग पाडेंवीण अनुसरे । भ्रमला जैसा ॥ १८७ ॥
नवीन स्त्रीच्या (जारिणीच्या) आवडीच्या भरात कामासक्त पुरुष आपल्या बायकोला विसरतो आणि मग वेडावल्यासारखा (तिची) योग्यता न पहाता तिच्या नादी लागतो ॥१-१८७॥
 
कीं तपोबळें ऋद्धी । पातलिया भ्रंशे बुद्धी ।मग तया विरक्तता सिद्धी । आठवेना ॥ १८८ ॥
किंवा तपोबलाने ऋद्धी (ऐश्वर्य) प्राप्त झाली असता (वैराग्यशाली पुरुषाची) बुद्धी भ्रम पावते आणी मग त्याला वैराग्यसिद्धीची आठवण रहात नाही ॥१-१८८॥
 
तैसें अर्जुना तेथ जाहलें । असतें पुरुषत्व गेलें ।जे अंतःकरण दिधलें । कारुण्यासी ॥ १८९ ॥
त्याप्रमाणे अर्जुनाची त्यावेळी स्थिती झाली. त्याची असलेली वीरवृत्ती गेली. कारण त्याने आपले अंत:करण करुणेला वाहिले. ॥१-१८९॥
 
देखा मंत्रज्ञु बरळु जाय । मग तेथ कां जैसा संचारु होय ।तैसा तो धनुर्धर महामोहें । आकळिला ॥ १९० ॥
पहा, मांत्रिक चाचरला (मंत्रोच्चारात चुकला) असता जशी त्याला बाधा होते तसा तो धनुर्धारी अर्जुन मोठ्या मोहाने व्यापला गेला. ॥१-१९०॥
 
म्हणौनि असतां धीरु गेला । हृदया द्रावो आला ।जैसा चंद्रकळीं शिवतला । सोमकांतु ॥ १९१ ॥
म्हणून त्याच्या अंगी असलेले धैर्य खचले आणि त्याचे हृदय करुणेने पाझरले. ज्याप्रमाणे चंद्रकिरणांचा वर्षाव झाल्यामुळे चंद्रकांतमणी पाझरू लागतो ॥१-१९१॥
 
तयापरी पार्थु । अतिस्नेहें मोहितु ।मग सखेद असे बोलतु । श्रीअच्युतेसीं ॥ १९२ ॥
त्याप्रमाणे पार्थ महाकरुणेने मोहून गेला. आणि मग खेदयुक्त होऊन कृष्णाबरोबर बोलू लागला ॥१-१९२॥
 
तो म्हणे अवधारी देवा । म्यां पाहिला हा मेळावा ।तंव गोत्र वर्गु आघवा । देखिला एथ ॥ १९३ ॥
तो म्हणाला देवा, ऐका. मी हा सर्व जमाव पाहिला. इथे तर सर्व आप्तसंबंधीच दिसतात. ॥१-१९३॥
 
हें संग्रामीं उदित । जहाले असती कीर समस्त ।पण आपणपेयां उचित । केवीं होय ॥ १९४ ॥
हे सर्व लढाईत उन्मत्त झाले आहेत, हे खरे. पण ते (त्यांच्याशी लढणे) आपल्याला योग्य कसे होईल ? ॥१-१९४॥
 
येणें नांवेचि नेणों कायी । मज आपणपें सर्वथा नाहीं ।
मन बुद्धि ठायीं । स्थिर नोहे ॥ १९५ ॥
या नातलगांशी युद्ध करायच्या विचाराने मला कसेसेच होत आहे. माझे मला मुळीच भान राहिले नाही. ते नाहीसे झाले आहे. माझे मन व बुद्धी सुद्धा स्थिर नाही. ॥१-१९५॥
 
देखे देह कांपत । तोंड असे कोरडें होत ।विकळता उपजत । गात्रांसीही ॥ १९६ ॥
पहा, माझा देह कापत आहे, तोंडाला कोरड पडली आहे आणि सगळ्या गात्रांना शिथिलता आली आहे. ॥१-१९६॥
 
सर्वांगा कांटाळा आला । अति संतापु उपनला ।तेथ बेंबळ हातु गेला । गांडिवाचा ॥ १९७ ॥
सर्वांगावर काटा उभा राहिला आहे. माझ्या मनात अतिशय यातना होत आहेत. आणि गांडीव धनुष्य धरायचा हात लुळा पडला आहे. ॥१-१९७॥
 
तें न धरतचि निष्टलें । परि नेणेंचि हातोनि पडिलें ।ऐसें हृदय असे व्यापिलें । मोहें येणें ॥ १९८ ॥
ते धरले न जाता निसटले, परंतु हातातून केव्हा गळून पडले याची मलाच दाद नाही. या मोहाने माझे हृदय असे घेरले आहे. ॥१-१९८॥
 
जें वज्रापासोनि कठिण । दुर्धर अतिदारुण ।तयाहून असाधारण । हें स्नेह नवल ॥ १९९ ॥
(हे अर्जुनाचे अंत:करण) व्रज्राहूनही कठिण, दुसर्‍यास दाद न देणारे अति खंबीर आहे; पण या करुणेची कडी त्याच्याही वर आहे. ही मोठी नवलाची गोष्ट आहे. ॥१-१९९॥
 
जेणें संग्रामीं हरु जिंतिला । निवातकवचांचा ठावो फेडिला ।तो अर्जुन मोहें कवळिला । क्षणामाजीं ॥ २०० ॥
ज्याने युद्धात शंकरास जिंकले, व निवात-कवच नावाच्या राक्षसांना बेपत्ता केले त्या अर्जुनाला एका क्षणात मोहाने घेरले. ॥१-२००॥
जैसा भ्रमर भेदी कोडें । भलतैसें काष्ठ कोरडें ।परि कळिकेमाजी सांपडे । कोंवळिये ॥ २०१ ॥
ज्याप्रमाणे वाटेल त्या प्रकारचे कोरडे लाकूड भुंगा पोखरून टाकतो, परंतु कोवळ्या कळीमध्ये मात्र अडकून पडतो ॥१-२०१॥
 
तेथ उत्तीर्ण होईल प्राणें । परि तें कमळदळ चिरूं नेणें ।तैसें कठिण कोवळेपणें । स्नेह देखा ॥ २०२ ॥
तेथे तो प्राणासही मुकेल, पण त्या कमळाच्या पाकळ्या फाडण्याचा विचार त्याच्या मनासही शिवत नाही. त्याप्रमाणे पहा, हा स्नेह (करुणा) जात्या कोवळा खरा पण महा कठिण आहे. ॥१-२०२॥
 
हे आदिपुरुषाची माया । ब्रह्मेयाही नयेचि आया ।म्हणौनि भुलविला ऐकें राया । संजयो म्हणे ॥ २०३ ॥
संजय म्हणाला, राजा, ऐक. हा स्नेह म्हणजे परमात्म्याची माया आहे. ही ब्रह्मदेवालाही आकळत नाही. म्हणून त्याने अर्जुनाला भुरळ पाडली. ॥१-२०३॥
 
अवधारी मग तो अर्जुनु । देखोनि सकळ स्वजनु ।विसरला अभिमानु । संग्रामींचा ॥ २०४ ॥
असो, राजा ऐक. मग तो अर्जुन (युद्धाला आलेले) सर्व आपलेच लोक आहेत असे पाहून लढाईचा अभिमान (ईर्षा) विसरून गेला. ॥१-२०४॥
 
कैसी नेणों सदयता । उपनली तेथें चित्ता ।मग म्हणे कृष्णा आतां । नसिजे एथ ॥ २०५ ॥
तेथे त्याच्या चित्तात सदयता कोठून उत्पन्न झाली कोण जाणे !मग तो म्हणाला कृष्णा, आपण आता येथे राहू नये हे बरे. ॥१-२०५॥
 
माझें अतिशय मन व्याकुळ । होतसे वाचा बरळ ।जे वधावे हे सकळ । येणें नांवें ॥ २०६ ॥
ह्या सर्वांना मारावयाचे हे मनात येताच त्याने माझे मन अतिशय व्याकूळ होत आहे आणि तोंड हवे ते बरळू लागते.॥१-२०६॥
 
या कौरवां जरी वधावें । तरी युधिष्ठीरादिकां कां न वधावें ।हे येरयेर आघवे । गोत्रज आमुचे ॥ २०७ ॥
या कौरवांना मारणे जर योग्य आहे तर धर्मराजादिकांना मारण्याला काय हरकत आहे ? कारण की हे सर्व आम्ही एकमेकांचे नातलगच आहोत. ॥१-२०७॥
म्हणोनि जळो हें झुंज । प्रत्यया न ये मज ।
एणें काय काज । महापापें ॥ २०८ ॥
याकरता, आग लागो या युद्धाला ! मला हे पसंत नाही. या महापापाची आपणास गरज काय आहे ॥१-२०८॥
 
देवा बहुतापरी पाहतां । एथ वोखटे होईल झुंजतां ।वर कांहीं चुकवितां । लाभु आथी ॥ २०९ ॥
देवा, अनेक दृष्टींनी विचार केला असता (असे वाटते की) या वेळी युद्ध केले तर (त्याचा परिणाम) वाईट होईल पण ते जर टाळले तर काही लाभ (कल्याण) होईल. ॥१-२०९॥
 
तया विजयवृत्ती कांहीं । मज सर्वथा काज नाहीं ।एथ राज्य तरी कायी । हे पाहुनियां ॥ २१० ॥
या विजयाच्या इच्छेशी मला काहीच कर्तव्य नाही. अशा रीतीने राज्य मिळाले तरी आपल्याला काय करायचे आहे ? ॥१-२१०॥
 
या सकळांतें वधावें । मग हे भोग भोगावे ।ते जळोत आघवे । पार्थु म्हणे ॥ २११ ॥
अर्जुन म्हणाला, या सर्वांना मारून जे भोग भोगायचे त्या सगळ्यांना आग लागो. ॥१-२११॥
 
तेणें सुखेंविण होईल । तें भलतैसें साहिजेल ।वरी जीवितही वेंचिजेल । याचिलागीं ॥ २१२ ॥
त्या भोगापांसून मिळणार्‍या सुखाच्या अभावी जो प्रसंग येऊन पडेल तो वाटेल तसा बिकट असला तरीही सहन करता येईल. इतकेच काय यांच्याकरता आमचे प्राण खर्ची पडले तरी चालेल. ॥१-२१२॥
 
परी यांसी घातु कीजे । मग आपण राज्यसुख भोगिजे ।हें स्वप्नींही मन माझें । करूं न शके ॥ २१३ ॥
पण यांचे प्राण घ्यावे आणि मग आपण राज्य भोगावे ही गोष्ट माझे मन स्वप्नात देखील सहन करू शकणार नाही. ॥१-२१३॥
 
तरी आम्हीं कां जन्मावें । कवणलागीं जियावें ।जरी वडिलां यां चिंतावें । विरुद्ध मनें ॥ २१४ ॥
जर या वडील माणसांचे अहित मनाने चिंतायचे तर आम्ही जन्माला येऊनही काय उपयोग ? व आम्ही जगावे तरी कोणासाठी ? ॥१-२१४॥
 
पुत्रातें इच्छी कुळ । तयाचें कायि हेंचि फळ ।जे निर्दळिजे केवळ । गोत्र आपुलें ॥ २१५ ॥
कुळातील लोक पुत्राची इच्छा करतात, त्याचे काय हेच फल आहे की त्याने आपल्या आप्तेष्टांचा केवळ वधच करावा. ॥१-२१५॥
 
हें मनींचि केविं धरिजे । आपण वज्राचेया होईजे ।वरी घडे तरी कीजे । भलें इयां ॥ २१६ ॥
हे (मी आपल्या कुळाचा नाश राज्य मिळवण्याकरता करीन असे) आपण मनात तरी कसे आणावे ? वज्रासारखे कठोर शब्द आपण कसे उच्चारावे ? उलटपक्षी झाल्यास आपण त्यांचे हितच करावे. ॥१-२१६॥
 
आम्हीं जें जें जोडावें । तें समस्तीं इहीं भोगावें ।हें जीवितही उपकारावें । काजीं यांच्या ॥ २१७ ॥
आम्ही जे जे मिळवावे ते ते या सर्वांनी (वास्तविक) भोगायचे आहे. यांच्या कामाकरता आम्ही आपले प्राणही खर्चावयाचे आहेत. ॥१-२१७॥
 
आम्ही दिगंतीचे भूपाळ । विभांडूनि सकळ ।मग संतोषविजे कुळ । आपुलें जें ॥ २१८ ॥
आम्ही देशोदेशीचे सर्व राजे युद्धात जिंकून जे आपले कुळ ते तोषवावे. ॥१-२१८॥
 
तेचि हे समस्त । परी कैसें कर्म विपरीत ।जे जाहले असती उद्यत । झुंजावया ॥ २१९ ॥
तेच हे आमचे सर्व कुळ पण कर्म कसे विपरीत आहे पहा, ते सर्व आपापसात लढावयास तयार झाले आहेत. ॥१-२१९॥
 
अंतौरिया कुमरें । सांडोनियां भांडारें ।शस्त्राग्रीं जिव्हारें । आरोपुनी ॥ २२० ॥
बायका, मुले, आपले खाजिने, ही सर्व सोडून व तलवारीच्या धारेवर आपले प्राण ठेऊन जे लढाईस तयार झाले आहेत ॥१-२२०॥
 
ऐसियांतें कैसेनि मारूं ? । कवणावरी शस्त्र धरूं ? ।निजहृदया करूं । घातु केवीं ? ॥ २२१ ॥
अशांना मी मारू तरी कसा ? मी कोणावर शस्त्र धरू ? (हे कौरव म्हणजे आम्हीच, तेव्हा यांना मारणे म्हणजे आपलाच घात करणे होय. या दृष्टीने अर्जुन म्हणतो मी) आपला काळजाचा घात कसा करू ? ॥१-२२१॥
 
हें नेणसी तूं कवण । परी पैल भीष्म द्रोण ।जयांचे उपकार असाधारण । आम्हां बहुत ॥ २२२ ॥
हे कोण आहेत, तू जाणत नाहीस का ? ज्यांचे आमच्यावर असामान्य उपकार आहेत असे भीष्म व द्रोण, ते पलीकडे आहेत पहा. ॥१-२२२॥
 
एथ शालक सासरे मातुळ । आणि बंधु कीं हे सकळ ।पुत्र नातू केवळ । इष्टही असती ॥ २२३ ॥
येथे या सैन्यात मेहुणे, सासरे, मामे आणि हे इतर सर्व बंधु, पुत्र, नातू आणि केवळ इष्टही आहेत. ॥१-२२३॥
 
अवधारी अति जवळिकेचे । हे सकळही सोयरे आमुचे ।म्हणौनि दोष आथी वाचे । बोलितांचि ॥ २२४ ॥
ऐक, अतिशय जवळचे असे हे आमचे सर्व सोयरे आहेत. आणि म्हणूनच (यांना मारावे असे) वाणीने नुसते बोलणे सुद्धा पाप आहे. ॥१-२२४॥
 
हे वरी भलतें करितु । आतांचि येथें मारितु ।परि आपण मनें घातु । न चिंतावा ॥ २२५ ॥
उलटपक्षी हे वाटेल ते करोत, आताच पाहिजे तर आम्हास येथे मारोत, पण आम्ही यांच्या घाताची गोष्ट मनातही आणणे बरोबर नाही. ॥१-२२५॥
 
त्रैलोक्यींचें अनकळित । जरी राज्य होईल प्राप्त ।तरी हें अनुचित । नाचरें मी ॥ २२६ ॥
त्रैलोक्याचे समग्र राज्य जरी मिळणार असले तरी हे अयोग्य काम मी करणार नाही. ॥१-२२६॥
 
जरी आजि एथ ऐसें कीजे । तरी कवणाच्या मनीं उरिजे ? ।सांगे मुख केवीं पाहिजे । तुझें कृष्णा ? ॥ २२७ ॥
जर आज आम्ही येथे असे (यांच्याशी लढाई करून यांना ठार मारले) युद्धे केले तर मग आमच्या विषयी कोणाच्या मनात आदर राहील ? आणि मग कृष्णा, सांग तुझे मुख आम्हाला कसे दिसेल ? (तू आम्हाला अंतरशील). ॥१-२२७॥
 
जरी वधु करोनि गोत्रजांचा । तरी वसौटा होऊनि दोषांचा ।मज जोडिलासि तुं हातींचा । दूरी होसी ॥ २२८ ॥
जर मी गोत्रजांचा वध केला, तर सर्व दोषांचे मी वसतीस्थान होईन. आणि मग ज्या तुझी जोड मला लाभली आहे तो तू आमच्या हातचा जाशील. ॥१-२२८॥
 
कुळहरणीं पातकें । तिये आंगीं जडती अशेखें ।तये वेळीं तुं कवणें कें । देखावासी ? ॥ २२९ ॥
कुळाच्या घाताने घडणारी सर्व पातके जेव्हा अंगी जडतील, तेव्हा तुला कोणी कोठे पहावे ? ॥१-२२९॥
 
जैसा उद्यानामाजीं अनळु । संचारला देखोनि प्रबळु ।मग क्षणभरी कोकिळु । स्थिरु नोहे ॥ २३० ॥
ज्याप्रमाणे बगीच्याला भयंकर आग लागलेली पाहून कोकिळ तेथे क्षणभरही थांबत नाही. ॥१-२३०॥
 
का सकर्दम सरोवरु । अवलोकूनि चकोरु ।न सेवितु अव्हेरु । करूनि निघे ॥ २३१ ॥
चिखलाने भरलेले सरोवर पाहून (कमलपत्रावर वसून चंद्रामृत सेवन करणारा) चकोर त्यात न रहाता त्याचा त्याग करून तेथून निघून जातो, ॥१-२३१॥
 
तयापरी तुं देवा । मज झकवूं न येसीं मावा ।जरी पुण्याचा वोलावा । नाशिजैल ॥ २३२ ॥
त्याप्रमाणे हे देवा, जर (माझ्या ठिकाणचा) पुण्याचा ओलावा नाहीसा झाला तर तू आपल्या मायेने मला चकवून माझे कडे येणार नाहीस. ॥१-२३२॥
 
म्हणोनि मी हें न करीं । इये संग्रामीं शस्त्र न धरीं ।हें किडाळ बहुतीं परी । दिसतसे ॥ २३३ ॥
म्हणून मी युद्ध हे करणार नाही. या लढाईमधे हत्यार धरणार नाही. कारण हे युद्ध पुष्कळ प्रकारांनी निंद्य दिसत आहे. ॥१-२३३॥
 
तुजसीं अंतराय होईल । मग सांगे आमुचें काय उरेल ? ।तेणें दुःखें हियें फुटेल । तुजवीण कृष्णा ॥ २३४ ॥
तुझ्याशी ताटातूट होईल, तर मग कृष्णा, तुझ्यावाचून त्या दु:खाने (वियोगाने) आमचे हृदय दुभंग होईल. ॥१-२३४॥
 
म्हणौनि कौरव हे वधिजती । मग आम्ही भोग भोगिजती ।हे असो मात अघडती । अर्जुन म्हणे ॥ २३५ ॥
एवढ्याकरता कौरव मारले जावेत आणि आम्ही राज्यभोग भोगावेत हे राहू दे. ही गोष्ट घडणे अशक्य आहे असे अर्जुन म्हणाला. ॥१-२३५॥
 
हे अभिमानमदें भुललें । जरी पां संग्रामा आले ।तर्‍ही आम्हीं हित आपुलें । जाणावें लागे ॥ २३६ ॥
हे कौरव अभिमानाच्या मस्तीने बहकून जरी लढण्याकरता आले आहेत तरी पण आम्ही आपले हित कशात आहे ते पाहिले पाहिजे. ॥१-२३६॥
 
हें ऐसें कैसें करावें ? । जे आपुले आपण मारावे ? ।
जाणत जाणतांचि सेवावें । काळकूट ? ॥ २३७ ॥
आपलेच आप्तसंबंधी आपण मारावे, हे असे भलतेच कसे करावे ? जाणून बुजून हे कालकूट विष कसे घ्यावे ? ॥१-२३७॥
 
हां जी मार्गीं चालतां । पुढां सिंहु जाहला आवचिता ।तो तंव चुकवितां । लाभु आथी ॥ २३८ ॥
अहो महाराज, रस्त्याने चालले असता अकस्मात सिंह आडवा आला तर त्याला चुकवून जाण्यातच आपले हित आहे. ॥१-२३८॥
 
असता प्रकाशु सांडावा । मग अंधकूप आश्रावा ।तरी तेथ कवणु देवा । लाभु सांगे ? ॥ २३९ ॥
असलेला उजेड टाकून अंधकूपाचा आश्रय केला तर देवा, त्यात काय हित आहे ? सांग बरे ? ॥१-२३९॥
 
कां समोर अग्नि देखोनी । जरी न वचिजे वोसंडोनी ।तरी क्षणा एका कवळूनी । जाळूं सके ॥ २४० ॥
किंवा समोर अग्नि पाहून त्याला चुकवून जर आपण पलीकडे गेलो नाही तर तो एका क्षणात आपणास घेरून जाळून टाकील. ॥१-२४०॥
 
तैसे दोष हे मूर्त । अंगी वाजों असती पहात ।हें जाणतांही केवीं एथ । प्रवर्तावें ? ॥ २४१ ॥
त्याचप्रमाणे हे मूर्तिमंत दोष आमच्या अंगावर आदळू पहात आहेत. हे समजत असताही, या कामी कसे प्रवृत्त व्हावे ? ॥१-२४१॥
 
ऐसें पार्थु तिये अवसरीं । म्हणे देवा अवधारीं ।या कल्मषाची थोरी । सांगेन तुज ॥ २४२ ॥
त्यावेळी इतके बोलून पार्थ म्हणाला देवा, ऐक. मी तुला या पापाचा भयंकरपणा सांगतो. ॥१-२४२॥
 
जैसें काष्ठें काष्ठ मथिजे । तेथ वन्हि एक उपजे ।तेणें काष्ठजात जाळिजे । प्रज्वळलेनि ॥ २४३ ॥
ज्याप्रमाणे लाकडाने लाकूड घासले असता तेथे अग्नि उत्पन्न होतो आणि तो भडकला म्हणजे सर्व लाकडांना जाळून टाकतो, ॥१-२४३॥
 
तैसा गोत्रींचीं परस्परें । जरी वधु घडे मत्सरें ।तरी तेणें महादोषें घोरें । कुळचि नाशे ॥ २४४ ॥
त्याप्रमाणे कुळामधे मत्सराने एकमेकांनी एकमेकांचा वध केला तर त्या महाभयंकर दोषाने कूळच नाशाला पावते. ॥१-२४४॥
 
म्हणौनि येणें पापें । वंशजधर्मु लोपे ।मग अधर्मुचि आरोपे । कुळामाजीं ॥ २४५ ॥
म्हणून या पापाने वंशपरंपरागत आलेल्या धर्माचा लोप होईल, आणि मग कुळामधे अधर्मच माजेल. ॥१-२४५॥
 
एथ सारासार विचारावें । कवणें काय आचरावें ।आणि विधिनिषेध आघवे । पारुषती ॥ २४६ ॥
तेथे सारासार विचार, कोणी कशाचे आचरण करावे व विधिनिषेध (कर्तव्य काय व अकर्तव्य काय) या सगळ्या गोष्टी बंद पडतात. ॥१-२४६॥
 
असता दीपु दवडिजे । मग अंधकारीं राहाटिजे ।तरी उजूचि कां अडळिजे । जयापरी ॥ २४७ ॥
जवळ असलेला दिवा मालवून मग अंधारात वावरू लागले तर ज्याप्रमाणे सरळ चालले असता अडखळण्याचा प्रसंग येतो, ॥१-२४७॥
 
तैसा कुळीं कुळक्षयो होय । तये वेळीं तो आद्यधर्मु जाय ।मग आन कांहीं आहे । पापावांचुनी ? ॥ २४८ ॥
त्याप्रमाणे ज्यावेळी कुलक्षय होतो त्यावेळी कुळात पहिल्यापासून चालत आलेल्या धर्माचा लोप होतो. मग तेथे पापावाचून दुसरे काय असणार ? ॥१-२४८॥
 
जैं यमनियम ठाकती । तेथ इंद्रिये सैरा राहाटती ।म्हणौनि व्यभिचार घडती । कुळस्त्रियांसी ॥ २४९ ॥
ज्यावेळी इंद्रिये व मन यांचा निग्रह थांबतो, त्यावेळी इंद्रिये स्वैर सुटतात आणि मग सहजच कुलीन स्त्रियांच्या हातून व्यभिचार घडतो. ॥१-२४९॥
 
उत्तम अधमीं संचरती । ऐसे वर्णावर्ण मिसळती ।तेथ समूळ उपडती । जातिधर्म ॥ २५० ॥
उच्च वर्णाच्या स्त्रिया नीच वर्णाच्या लोकांशी रत होतात व अशा रीतीने वर्ण एकमेकात मिसळतात. (वर्णसंकर होतो) व त्यामुळॆ जातिधर्म मुळापासून उखडले जातात. ॥२५०॥
 
जैसी चोहटाचिये बळी । पाविजे सैरा काउळीं ।तैसीं महापापें कुळीं । संचरती ॥ २५१ ॥
ज्याप्रमाणे चव्हाट्यावर ठेवलेल्या बळीवर चारी बाजूंनी कावळे येऊन पडतात, त्याप्रमाणे मोठी पापे कुळात शिरतात. ॥१-२५१॥
 
मग कुळा तया अशेखा । आणि कुळघातकां ।येरयेरां नरका । जाणें आथी ॥ २५२ ॥
मग त्या संपूर्ण कुळाला व कुळघातक्याला दोघांनाही नरकाला जावे लागते. ॥१-२५२॥
 
देखें वंशवृद्धि समस्त । यापरी होय पतित ।मग वोवांडिती स्वर्गस्थ । पूर्वपुरुष ॥ २५३ ॥
पहा, ह्याप्रमाणे वंशात वाढलेली प्रजा अधोगतीला जाते आणि मग त्यांचे स्वर्गातील पूर्वज फिरून परत येतात. ॥१-२५३॥
 
जेथ नित्यादि क्रिया ठाके । आणि नैमित्तिक क्रिया पारुखे ।तेथ कवणा तिळोदकें । कवण अर्पी ? ॥ २५४ ॥
ज्यावेळी रोज करायची धार्मिक कृत्ये बंद पडतात त्यावेळी कोण कोणाला तिलोदक देणार ? ॥१-२५४॥
 
तरी पितर काय करिती ? । कैसेनि स्वर्गीं वसती ? ।म्हणौनि तेही येती । कुळापासीं ॥ २५५ ॥
असे झाल्यावर पितर काय करणार ? स्वर्गात कसे रहाणार ? म्हणून ते देखील आपल्या कुळापाशी नरकात येतात. ॥१-२५५॥
 
जैसा नखाग्रीं व्याळु लागे । तो शिखांत व्यापी वेगें ।तेवीं आब्रह्म कुळ अवघें । आप्लविजे ॥ २५६ ॥
ज्याप्रमाणे नखाच्या टोकाला साप चावला म्हणजे त्याचे विष शेंडीपर्यंत हांहां म्हणता पसरते त्याप्रमाणे थेट ब्रह्मदेवापासूनचे पुढील सर्व कुळ अशा पातकाने बुडून जाते ॥१-२५६॥
 
देवा अवधारी आणीक एक । एथ घडे महापातक ।जे संगदोषें हा लौकिक । भ्रंशु पावे ॥ २५७ ॥
देवा, ऐका. येथे आणखी एक महापातक होते. ते हे की त्या पतितांच्या संसर्गदोषाने लोकांचे आचारविचार चळतात (भ्रष्ट होतात). ॥१-२५७॥
 
जैसा घरीं आपुला । वानिवसें अग्नि लागला ।तो आणिकांहीं प्रज्वळिला । जाळूनि घाली ॥ २५८ ॥
ज्याप्रमाणे आपल्या घराला अकस्मात अग्नी लागला म्हणजे तो भडकलेला अग्नी दुसर्‍या घरांनाही जाळून टाकतो ॥१-२५८॥
 
तैसिया तया कुळसंगती । जे जे लोक वर्तती ।तेही बाधा पावती । निमित्तें येणें ॥ २५९ ॥
त्याप्रमाणे त्या कुळाच्या संसर्गाने जे जे लोक वागतात, ते ते ह्या संसर्गरूप कारणाने दोषी होतात. ॥१-२५९॥
 
तैसें नाना दोषें सकळ । अर्जुन म्हणे तें कुळ ।मग महाघोर केवळ । निरय भोगी ॥ २६० ॥
तसे अर्जुन म्हणतो की अनेक दोषांमुळे मग त्या सर्व कुळाला भयंकर नरक भोगावा लागतो. ॥१-२६०॥
 
पडिलिया तिये ठायीं । मग कल्पांतींही उकलु नाहीं ।येसणें पतन कुळक्षयीं । अर्जुन म्हणे ॥ २६१ ॥
त्या ठिकाणी पडल्यावर कल्पांती देखील त्याची सुटका होत नाही. एवढी कुलक्षयामुळे अधोगती होते. ॥१-२६१॥
 
देवा हें विविध कानीं ऐकिजे । परी अझुनिवरी त्रासु नुपजे ।हृदय वज्राचें हें काय कीजे । अवधारीं पां ॥ २६२ ॥
देवा, ऐक. ही नानाप्रकारची (दोषांविषयीची) बोलणी कानाने ऐकतोस पण अजूनपर्यंत तुला शिसारी येत नाही. तू आपले हृदय वज्रासारखे कठोर का केले आहेस ? ॥१-२६२॥
 
अपेक्षिजे राज्यसुख । जयालागीं तें तंव क्षणिक ।ऐसे जाणतांही दोख । अव्हेरू ना ? ॥ २६३ ॥
ज्या शरीराकरता राज्यसुखाची इच्छा करावयाची, ते शरीर तर क्षणभंगुर आहे. असे कळत असताही अशा ह्या घडणार्‍या महापातकांचा त्याग करू नये काय ? ॥१-२६३॥
 
जे हे वडिल सकळ आपुले । वधावया दिठी सूदले ।सांग पां काय थेंकुलें । घडलें आम्हां ? ॥ २६४ ॥
हे जे सर्व वाडवडील जमले आहेत त्यांस मारून टाकावे अशा बुद्धीने त्याजकडे पाहिले ही काय लहानसहान गोष्ट (पातक) आमच्या हातून घडली का ? तूच सांग. ॥१-२६४॥
 
आतां यावरी जें जियावें । तयापासूनि हें बरवें ।जे शस्त्र सांडुनि साहावे । बाण यांचे ॥ २६५ ॥
आता इतक्यावरही जगण्यापेक्षा आपण शस्त्रे टाकून देऊन यांचे बाण सहन करावे हे चांगले. ॥१-२६५॥
 
तयावरी होय जितुकें । तें मरणही वरी निकें ।परी येणें कल्मषें । चाड नाहीं ॥ २६६ ॥
असे केल्याने जितके दु:ख भोगावे लागेल (तितके सहन करावे, इतकेच काय, पण अशा करण्याने) मृत्यूही जरी प्राप्त झाला तथापि तो अधिक चांगला. परंतु असे हे पातक करण्याची आपल्याला इच्छा नाही. ॥१-२६६॥
 
ऐसें देखून सकळ । अर्जुनें आपुलें कुळ ।मग म्हणे राज्य तें केवळ । निरयभोगु ॥ २६७ ॥
याप्रमाणे अर्जुनाने आपले सर्व कूळ पाहून म्हटले की (यांचा नाश करून मिळवलेले राज्य म्हणजे केवळ नरकभोग आहे. ॥१-२६७॥
 
ऐसे तिये अवसरी । अर्जुन बोलिला समरीं ।संजयो म्हणे अवधारीं । धृतराष्ट्रातें ॥ २६८ ॥
संजय धृतराष्ट्राला म्हणाला, ऐक. असे त्यावेळी अर्जुन समरांगणावर बोलला. ॥१-२६८॥
 
मग अत्यंत उद्वेगला । न धरत गहींवरु आला ।तेथ उडी घातली खालां । रथौनियां ॥ २६९ ॥
मग अर्जुन अत्यंत खिन्न झाला. व त्याला गहिवर आला. मग त्याने रथावरून खाली उडी घातली. ॥१-२६९॥
 
जैसा राजकुमरु पदच्युतु । सर्वथा होय उपहतु ।कां रवि राहुग्रस्तु । प्रभाहीनु ॥ २७० ॥
ज्याप्रमाणे अधिकारावरून दूर झालेला राजपुत्र सर्व प्रकारांनी निस्तेज होतो किंवा जसा राहूने ग्रासलेला सूर्य तेजोरहित होतो ॥१-२७०॥
 
नातरी महासिद्धिसंभ्रमें । जिंतिला तापसु भ्रमें ।मग आकळूनि कामें । दीनु कीजे ॥ २७१ ॥
अथवा महासिद्धींच्या योगाने पछाडलेला तपस्वी भुलतो आणि मग कामनेच्या तडाख्यात पडून दीन होतो ॥१-२७१॥
 
तैसा तो धर्नुधरु । अत्यंत दुःखें जर्जरु ।दिसे जेथ रहंवरु । त्यजिला तेणें ॥ २७२ ॥
त्याप्रमाणे त्याने जेव्हा रथाचा त्याग केला तेव्हा तो अर्जुन दु:खाने पीडलेला दिसला. ॥१-२७२॥
 
मग धनुष्य बाण सांडिले । न धरत अश्रुपात आले ।ऐसें ऐक राया वर्तलें । संजयो म्हणे ॥ २७३ ॥
मग त्याने धनुष्यबाण टाकून दिले व त्याच्या डोळ्यांना अनिवार पाणी आले. संजय म्हणाला, राजा ऐक. तेथे अशी गोष्ट घडली. ॥१-२७३॥
 
आतां यापरी तो वैकुंठनाथु । देखोनि सखेद पार्थु ।कवणेपरी परमार्थु । निरूपील ॥ २७४ ॥
आता यावर तो वैकुंठपती कृष्ण अर्जुनाला खिन्न झालेला पाहून कोणत्या प्रकारे परमार्थाचा उपदेश करील ॥१-२७४॥
 
ते सविस्तर पुढारी कथा । अति सकौतुक ऐकतां ।ज्ञानदेव म्हणे आतां । निवृत्तिदासु ॥ २७५ ॥
ती आता पुढे येणारी सविस्तर कथा ऐकण्यास फार कौतुककारक आहे. असे निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. ॥२७५॥

इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां प्रथमोऽध्यायः ॥

28 thoughts on “सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला”

  1. संत साहित्य वाचन करती असताण खूप छान वाटते पण मला एक गोष्ट समजली नाही ती म्हणजे संत साहित्य या aap वर येशू चे बायबल ची जाहिरात का येते ती पण खूप वेळा
    अश्या जाहिराती येऊ नये त्यासाठी ज्या काय उपाय योजना असतील त्या कराव्यात पण हे येशु किंवा इतर धर्माच्या पुस्तका च्या जाहिरात येऊ नये

    रामकृष्ण हरी
    माऊली माऊली माऊली

  2. Shravan padalkar

    राम कृष्ण हरी छान अर्थ दिलाय व थोडक्यात आहे

  3. Prakash Khairnar

    थोडक्यात व समजण्याजोगे आहे. अती सुंदर विवेचन. माउली.

  4. हृषीकेश बाहेकर

    खुप छान खूप दिवसांपासून याच्या शोधात होतो शेवटी काल सापडलं धन्यवाद जय जय रामकृष्ण हरी ????

  5. आपले फार मोठे आभार! आपल्या संपुर्ण टिमला अनेकानेक धन्यवाद|||????????

  6. &anaoSvarI saaqa- KraoKr ekdma sarL AaiNa saaoPyaa BaaYaot Aaho. sava- saaQaarna maanasaalaa samaJanaarI Aaho.

    jaya jaya ram ÌYNa hrI.
    jaya jaya ram ÌYNa hrI.

  7. खूप खूप आभार. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.

  8. Kharach atyant uttam aahe. amha sarva bhaktansathi hi ratnapeti khuli kelyabaddal khup khup dhanyavad ?

  9. Nilesh Raghunath Raut

    सुंदर शब्दांत विवरण केले आहे.
    पांडुरंग हरी वासुदेव हरी

  10. धन्यवाद!
    महाराज,अतिशय सुंदर विवेचन केले आहे आपण!
    सद्गुरु आपणास आशिर्वाद देवो! त्या चरणी
    विनम्र प्रार्थना

  11. Nandkumar Rajguru

    या मध्ये भगवद गीता मधील श्लोक आणि त्यांचा अर्थ दिला नाही…

  12. धन्यवाद!
    महाराज,अतिशय सुंदर विवेचन केले आहे आपण!
    या मध्ये भगवद गीता मधील श्लोक आणि त्यांचा अर्थ दिला असता तर अधिक ज्ञानप्राप्ती झाली असती

    शक्य असल्यास प्रयत्न व्हावा ही विनंती

    अमोल कावळे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *