ग्रामगीता अध्याय

ग्रामगीता अध्याय चौतिसावा

ग्रामगीता अध्याय चौतिसावा

॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥

जीव ईश्वराचा अंश । तो जितुका करी आपुला विकास । तितुका उच्च अवतारपदास । याच लोकीं जातसे ॥१॥
करितां सेवाप्रयत्न थोर । जीव होई देवावतार । आपण आपुला करी उध्दार । शांति देई जगासहि ॥२॥
सोडूनि दुबळा निराशावाद । साधावा सत्य अवतार-बोध । म्हणोनि केलें असे विशद । अवतारतत्त्व हें सारें ॥३॥
लोक करूं लागतील सत्कार्य । तरि गांवीं नांदेल सर्व ऐश्वर्य । त्यासाठी वाढविलें पाहिजे मनोधैर्य । सर्व लोकीं ॥४॥
परि श्रोते बोलती त्यावरि वाचें । अहो ! भाग्यचि हीन आमुचें । म्हणोनि आमुच्याने कोणचें । सत्कार्य नोहे ॥५॥
मनांत असतें कांही करावें । परि वेळचि जरा ना फावे । सांगा यास काय करावें । आम्हीं तरी ? ॥६॥
मित्रहो ! ज्याची जयासि आवड । त्यासाठी त्या मिळे सवड । कोणी नये इच्छेआड । प्रयत्न करितां ॥७॥
गरजेपोटीं जन्मे युक्ति । प्रसंग आणितां वाढे शक्ति । प्रयत्न पेरतां फळें येती । आवडी ऐसीं ॥८॥
श्रोते म्हणती कितीहि प्रयत्न केले । तरि काय सर्वचि राजे झाले ? यास पाहिजे भाग्य उघडलें । आम्हां वाटे ॥९॥
इच्छेंत जरी राज्य जडलें । तरी रोजचेंचि कार्य नडलें । तेथे उदंड मनांत आलें । तरी काय होतें ? ॥१०॥
इच्छेप्रमाणें सर्वांस घडतें । तरि काय भिकारी बनावें वाटतें ? इच्छा करणारे कितीतरी येथे । फिरती बेकार सडकेने ॥११॥
कोणास सहजमार्गी चालतां । धनाचा हांडा सापडे आइता । त्यांना बघा इच्छा न करितां । मिळालें धन ॥१२॥
कोणी दरिद्रयाच्या घरीं जन्मले । मेंढयाबकर्‍या चारूं लागले । अचानकचि भाग्य उघडलें । गेले दत्तक राजवाडीं ॥१३॥
ऐसें कोण्या उपायें होतें । हेंचि विचारावें वाटे आपणातें । प्रयत्न केल्यानेच फळ येतें । हें तों येथे शोभेना ॥१४॥
गांवीं आमुच्या एक सज्जन । अति कुशल प्रयत्नवान । नाना कलांनी निपुण । परि पोटाचेंहि भागेना ॥१५॥
सांगा याहूनि काय करावें ? इच्छेने फल कैसें पावे ? कोण्या परीने योजावें । कार्य आम्हीं आपुलें ? ॥१६॥
मित्रहो ! तुमचें सर्व म्हणणें । ऐकलें मीं जीवेंप्राणें । म्हणोनीच आपल्या परीने । देतों उत्तर तुम्हांसि ॥१७॥
भाग्याचा हा प्रारब्धवाद । उन्नतीचा करी विरोध । गांवोगांवच्या जीवनासि बाध । आणला याने ॥१८॥
ही दुबळी निराशा घालवून । केलाच पाहिजे प्रयत्न । तरीच भाग्य येईल जाण । उदया आपुलें ॥१९॥
एरव्ही हें भाग्य कोणी देईना । प्रयत्नाशिवाय भोग येईना । त्यासि प्रयत्नचि प्रधान जाणा । लागे केव्हाचा तरी ॥२०॥
कांही संस्कार असती पूर्वीचे । कांही प्रयत्न या जन्मींचे । मिळोनि येई फळ भाग्याचें । उदया लोकीं ॥२१॥
संत गुलाबराव बालान्ध । त्यांच्या जिव्हाग्रीं शास्त्रवेद । हें पूर्व जन्मींचें संचितचि सिध्द । नव्हे प्रारब्ध फुकाचें ॥२२॥
कांही पूर्वसंस्कारगति । कांही करणी कांही संगति । कांही संकल्प इच्छाशक्ति । योग्य काळीं येती भाग्यफळें ॥२३॥
पाहणार्‍यास अचानक दिसती । याचें भाग्य उघडलें म्हणती । धनवैभव लाभतां ठरविती । भाग्यवंत लोकीं ॥२४॥
येथे एक प्रश्न उठतो । भाग्यवंत कोण असतो ? ऐका त्याचेंहि सांगतों । उत्तर आता ॥२५॥
असेल कोणी धनवंत । परि तो नव्हे भाग्यवंत । भाग्य असे सुखसंतोषांत । अवडंबरांत तें नाही ॥२६॥
भाग्यवंत त्यासचि म्हणावें । ज्याने ईश्वरास समर्पण व्हावें । अनन्यगतीने राहावें । शरण देवासि ॥२७॥
आणि सत्कार्यी असावें तत्पर । सर्व सोडोनि दुर्व्यवहार । सहजकर्म मिळे पोटभाकर । त्यांतचि सुखें नांदावें ॥२८॥
आपणासीच सुख व्हावें । आणि दुसरे ते ओसरून जावे । ऐसें कधी न मानी जीवें । तोचि भाग्यवंत म्हणावा ॥२९॥
कांही चोरी करोनि भाग्यवंत होती । सर्व लोक तुच्छ भावें हसती । म्हणती भाग्यवंताची गति । त्वरित पडेल दृष्टीला ॥३०॥
मग पाप आणोनि पाडी संकटा । धनभाग्य जातें भलतिया वाटां । पुन्हा राहतो करंटा । कैसा भाग्यवान म्हणावा ? ॥३१॥
कुणाचें भाग्य रात्रींतून येतें । जुगारीं कधी द्रव्य लाभतें । दुसर्‍या दिनीं पुन्हा धांव घेतें । दरिद्रपण त्याच वाटें ॥३२॥
हा आहे पापाचा आविष्कार । नव्हे नव्हे हे भाग्य थोर । भाग्य तेंचि निरंतर । लोक कीर्ति गाती मागेहि ॥३३॥
भाग्यवंत धनाने नव्हे । भाग्य सत्तेसीहि न म्हणावें । भाग्य सत्कार्यानेच पावे । जीवालागी ॥३४॥
भाग्यवंत श्रीमंत न होय । ऐसे माझें म्हणणें नोहे । परि उत्तम व्यवहारी धनिक राहे । तोचि खरा भाग्यवंत ॥३५॥
एकाची श्रीमंती दुसर्‍या भूषवी । एकाची श्रीमंती रक्तचि शोषवी । त्यास कैसी द्यावी पदवी । भाग्यवंताची ? ॥३६॥
माती धरितां सोनें होतें । चालत्या काळीं भाग्यचि तें । परि अहंकारें व्यसनें मुकले सेवेतें । झाली शेवटीं दुर्दशा ॥३७॥
म्हणोनि म्हणतों प्रयत्न करा । आपापलें जीवन सुधारा । भाग्यहीन म्हणण्याचा प्रसंग सारा । टाळा मागे ॥३८॥
भाग्यकरितां संकल्प करावे । दृढनिश्चया वाढवीत जावें । तैसेचि प्रयत्न करीत राहावें । आळस सांडोनि ॥३९॥
जेवढा करावा उच्च विचार । तेवढाचि उच्च ठेवावा व्यवहार । त्यानेंच पावतें भाग्य थोर । सकळ योजना साधतां ॥४०॥
केल्यानेच भाग्य फळतें । केल्यानेच स्वर्गसुख मिळतें । केल्यानेच सर्वकांही होतें । मानवाचें ॥४१॥
माणूस बसतां भाग्य झोपतें । चालतां पुढेचि घेई झेप तें । प्रयत्नांचेंचि रूपांतर होतें । भाग्यामाजीं निश्चयाने ॥४२॥
ऐसें बोलले ऋषिजन । संत कवीश्वर अवतार महान । धर्मग्रंथ हेंचि प्रमाण । बोलले लोकीं ॥४३॥
ज्याचें अचानक भाग्य उघडले । त्याचें सुकृत साचत आलें । म्हणोनीच एकाएकी लाभलें । भूषण तया ॥४४॥
जरि त्याने केलेंचि नसतें । तरि तें आज कैसें लाभतें ? देवाने द्वैतभाव केला येथे । ऐसें म्हणणें शोभेना ॥४५॥
एकाएकीच भाग्य लाभतें । म्हणोनि धुंडाळाल कोठे कोणतें । तरि आहे हेंहि जातें । मनुष्यपण हातचें ॥४६॥
तुम्ही म्हणाल मग काय करावें ? आपणहि आता प्रयत्नशील व्हावें । प्रबल इच्छेसि वाढवावें । सदभाग्याच्या ॥४७॥
काळ असेल प्रतिकूल । तरि हळू पडेल पाऊल । परि सत्कार्य वाया न जाईल । केलें तें तें ॥४८॥
तीव्र इच्छेने कार्य केलें । तें आज जरी नाही फळलें । तरी अचानकचि भाग्य उघडलें । वाटेल ऐसें फळ येतां ॥४९॥
श्रोते साशंक झाले हृदयीं । प्रयत्न इच्छिलें फळ देई । ऐसें कथिलें जें जें कांही । म्हणती अजुनीहि पटेना ॥५०॥
प्रयत्नें साधती सर्व उपाय । ऐसा केला जरी निश्चय । तरी कां उपाय करितां अपाय । अनुभवा येती ? ॥५१॥
सर्वचि जगण्याचे करिती प्रयत्न । कोणास वाटे घडावें मरण । येथे पूर्वी तरी केलें साधन । मरणाचें कोणी ? ॥५२॥
लोक जगण्याचाचि प्रयत्न करिती । वैद्य डॉक्टर बोलाविती । तरी कय होते त्यांची स्थिति ? प्राण जाती कितीकांचे ॥५३॥
कोणी बिमार राहे वर्षोगणती । काय बिचार्‍याची फजीती । नाही करणाराची संगति । अंतकाळीं हाल त्याचे ॥५४॥
त्याने काय बिमार पडावें इच्छिलें । म्हणोनि देवाने तसें केलें ? यांत काय प्रयत्न नाही झाले । त्याच्या हातें स्वहिताचे ? ॥५५॥
तैसेचि कोणी मरण इच्छिती । परि मृत्यु नये वर्षोगणती । सांगा यांत मानवी इच्छेला किती । मान्यता आहे ? ॥५६॥
आम्ही म्हणतों सूत्रधार हरि । त्याच्या हातीं दैवाची दोरी । मानव बाहुलीं कळसूत्री । इच्छाप्रयत्न फोल त्यांचे ॥५७॥
मित्रांनो ! सुंदर तुमचे प्रश्न । यांत मज न वाटे विचित्रपण । हें तों आहे सहज अज्ञान  । रुजलें लोकीं ॥५८॥
सुखासाठी करिती धडपड । दु:खीं देव घालिती आड । मूळ न शोधितां बोलती बोजड । सिध्दान्तवाक्यें ॥५९॥
आम्ही पाषाण फेकला वरि । तो चुकोनि पडला मस्तकावरि । येथे गुरुत्वाकर्षण काय करी । आपुल्याकडोनि ? ॥६०॥
वाफ्यांत मिरची-ऊस लाविले । तिखट-गोड फळ नशिबीं आलें । येथे पाण्याने काय केलें ? दिलें फळ जैसें तैसें ॥६१॥
देवभक्ति ऐसी सर्वत्र । परि ती स्वयें न चालवी सूत्र । कर्में फळती पवित्रापवित्र । आपुलींच आपणा ॥६२॥
देवाचेंच हें असतें करणें । तरि लोक कां निर्मिता केविलवाणे ? कशासि लाविता अल्पकाळीं मरणें । जीवप्राण्यासि ? ॥६३॥
हें तों आहे आपुल्याच आधीन । जन्मा येणें आणि मरण । यांत शंका घेण्याचें कारण । मुळीच नाही ॥६४॥
आपणचि इच्छा करितों । म्हणोनिया जन्माला येतों । यांत कोणी कशाला पाठवितो । दुनियेवरी ? ॥६५॥
तैसेंचि आहे मरणाचें । आम्हीं कारण व्हावें बिघडविण्याचें । जेव्हा असह्य होय भोगणें साचें । तेव्हा म्हणावे ’ वाचवा ’ ॥६६॥
चोर चोरीसाठी गेला । आधी विचार नाही केला । संकटीं सापडतां म्हणे ’ बोला । कैसें केलें देवाने ? ’ ॥६७॥
कितीकांचें दुखवावें मन । हिरावूनिया आणावें धन । मग भोग येतां दैवावरून । बोल द्यावा देवासि ॥६८॥
माणसाला मरावें ऐसें न वाटे । परि मरणाऐसें केलें ओखटें । पुढे आसक्तीने म्हणे ’ मोठें । देवा ! संकट ओढवलें ’ ॥६९॥
मरणाऐसें करावें आचरण । सोडोनिया तारतम्यज्ञान । मग भोग येतां म्हणावें  ’ नको मरण ’ । कैसें कोण मानील ? ॥७०॥
हें म्हणणें कांही इच्छा नोहे । इच्छेसाठी मार्ग आहे । तो वेळेवरीच करतां नये । त्यासि पाहिजे अभ्यास ॥७१॥
जन्मणेंहि इच्छेने होतें । परि त्यासि गर्भधारणा लागते । अंतरीचें प्रगट करावया तेथे । वेळ लागे तैसाच ॥७२॥
अग्नि देवोनि लोखंड तापवावें । आणि लगेच म्हणे थंड व्हावें । ऐसें कैसें घडेल स्वभावें । एकाएकी ? ॥७३॥
जीव कर्म करितां स्वतंत्र । त्याचा भोग  भोगतां परतंत्र । केलें त्याचें फळ येणार । इच्छेचाचि परिपाक तो ॥७४॥
सर्वासचि वाटे कधी न मरावें । सर्वांसचि वाटे राजे व्हावे । परि इच्छा क्रियामार्गे न धावे । अचूकतेने तीव्रपणें ॥७५॥
तेणें भोगावा लागे नको तो भोग । जो पूर्वी घडला कार्य भाग । इच्छेनि व्यसनी होतां झाला क्षयरोग । जगणें मग साधेना ॥७६॥
म्हणोनि सांगतों जें जें होतें । तें इच्छाबळेंच प्रत्यया  येतें । यासि कर्महि पाहिजे इच्छेपुरतें । तरीच साधतें कार्य पुढे ॥७७॥
एक इच्छा असते चंचल । तींत होतो नेहमी बदल । एक इच्छा असे निश्चल । जी कर्म करोनीच प्रकट होय ॥७८॥
कधी इच्छा इच्छेने प्रकट नोहे । ती कर्मानेच दिसों पाहे । नाही म्हणोनिया काय होय ? प्रत्यक्ष दिसे कार्यावरि ॥७९॥
बादशहा ’ मी गरीब ’ बोलला । तरी ओळखती लोकचि त्याला । तो लपल्याने न जाय लपाला । ढगाआड सूर्य जैसा ॥८०॥
तैसी इच्छा परिपाकासि आली । आतां वृत्ति फळासि भ्याली । मग ऐनवेळीं दुजी इच्छा केली । न टळे फळ मृत्यूचें ॥८१॥
कित्येकांची प्रमाणें दिसती । मृत्यु आपणचि प्रकट करिती । दिवस क्षण वेळा सांगती । येणार्‍या फळाची ॥८२॥
त्यांची आसक्ति देहांतूनि सुटली । म्हणोनि स्थिति प्रकट झाली । कित्येकांनी दुसर्‍यांचींहि कथिलीं । परिपक्व फळें ॥८३॥
विचारी पुरुष जे जाणते । फळ भोगाया होती सज्ज ते । आधीच वृत्ति अविचारपंथें । जाऊं न देती ॥८४॥
अविचारी ते कुमार्गे जाती । फळ भोगतां तळमळती । अति होतां भलतीच घेती । विकृति मनीं वेडयाऐसी ॥८५॥
आसक्तिकांची विकृति वाढली । देहबध्द वृत्ति भांबावली । दु:ख न सोसूनि धांव घाली । इच्छा त्याची मृत्यूकडे ॥८६॥
मागील कुकर्म असह्य झालें । म्हणोनि जीव द्याया धावले । आतां मृत्यु येईल तरीच भलें । वाटे तयांसि ॥८७॥
खरोखर मरणें एक स्वप्न । शरीरपरिवर्तनाचें विरामस्थान । परि केलेल्या पापपुण्याचें निवारण । तेणें नव्हे ॥८८॥
जैसा कपडा अंगींचा बदलावा । नवीन अंगावरि ओढोनि घ्यावा । तैसाचि जीव मरणीं समजावा । शरीर बदली इच्छेने ॥८९॥
कधी ती इच्छा प्रकट ना कळे । प्रकट इच्छा त्वरित ना फळे । येथेचि विचारीहि गोंधळे । निवाडा करितां ॥९०॥
इच्छेने घेतलें तलम वस्त्र । मग तें टिको म्हणे वर्ष सहस्त्र । ऐशा इच्छा होवोत मिश्र । परि भोगणें लागे आधीचें ॥९१॥
एकदा इच्छेने बसल्या घोडयावरि । चाबुक मारतां हौस पुरी । मग घाबरोनि म्हणे ’ देवा ! आवरी । सत्वरि आता ’ ॥९२॥
एकदा हातूनि गेला बाण । मग इच्छेऐसा नये परतून । पहिलें इच्छाकर्म गतिमान । भोगावेंचि लागे ॥९३॥
नुसती इच्छा उपयोगी नाही । ती संस्कार बनूनि कर्मपण घेई । नवी इच्छाहि याच क्रमें येई । फळासि पुढे ॥९४॥
मन बुध्दि चित्त अहंकार । पांचवें अंत:करण आधार । यांत दृढ होय इच्छासंस्कार । चाले व्यवहार त्यायोगें ॥९५॥
यांचे पालटतील संस्कार । तरीच सुखाचा होय व्यापार । एरव्ही इच्छा क्षणभंगुर । उपयोगी नये तत्काळ ॥९६॥
इच्छासंस्कार कर्तव्यसंस्कार । यांचा संग्रह पूर्वापार । तेंचि संचित असे थोर । पापपुण्यरूप ॥९७॥
त्यांतून जें भोगायासि आलें । तेंचि प्रारब्ध बोललें । तें भोगणें प्राप्तचि झालें  । न चुके सहजीं ॥९८॥
तें भोगतां केली नवी धडपड । इच्छा आणि यत्न प्रचंड । तें क्रियमाण देई संचिता जोड । लाभेल पुढे फळ त्याचें ॥९९॥
ऐसें चाललें रहाटचक्र । या नांव जीवनाचा व्यापार । जन्ममरण, सुखदु:ख, व्यवहार । खेळ इच्छा-प्रयत्नाचा ॥१००॥
हें जाणोनि प्रयत्नासि लागा । याविण भाग्याचा भ्रम वाउगा । संत उपदेश देती जगा । क्रियमाण सुधारा म्हणोनि ॥१०१॥
क्रियेवीण मार्गचि नाही । कर्तव्य नरा देवपद देई । तुकडया म्हणे बना निश्चयी । प्रयत्नवादी ॥१०२॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । प्रारब्ध-विचार कथिला येथ । चौतिसावा अध्याय संपूर्ण ॥१०३॥

॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥


कृषी क्रांती 

ग्रामगीता अध्याय चौतिसावा ग्रामगीता अध्याय चौतिसावा ग्रामगीता अध्याय चौतिसावा ग्रामगीता अध्याय चौतिसावा

ref:transliteral 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *