ग्रामगीता अध्याय

ग्रामगीता अध्याय चवदावा

ग्रामगीता अध्याय चवदावा

॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥

एक श्रोता महाभाविक । म्हणे गांवहि केलें ठीक । तरी देवाने मारली मेख । ती निघूं शकेना ॥१॥
प्रत्यक्ष शहर जरी झालें । तरी देवापुढे ताब न चाले । तेथे खेडें शहरापरी केलें । तरी काय होतें ? ॥२॥
देवीदेवतांचा कोप झाला । कॉलरापटकीचा झटका आला । म्हणजे सुधारूंच न शके कोणाला । बाप वैद्याचा ॥३॥
म्हणोनि देवता राहती प्रसन्न । ऐसें करावें पूजन । गांव असो की शहर संपन्न । सुखी त्याविण न राहे ॥४॥
मित्रा ! ऐक याचें उत्तर । देवदेवता किंवा परमेश्वर । हे कृपेचेचि अवतार । कोपचि नाही त्याठायीं ॥५॥
कोप करिती ते दुष्टावरि । त्यांतहि उध्दार भावचि अंतरीं । तेथे निरपराध्यांस छळती जरि । तरि त्या देव न म्हणावें ॥६॥
सर्व लोक लेकरें त्याचीं । छळणा कां करील कोणाची ? कृति आपुलीच आपणा जाची । शत्रु आपणचि आपुले ॥७॥
चहूबाजूंनी केली घाण । त्यांत जंतु झाले निर्माण । त्यांतूनि रोगांच्या सांथी भिन्न भिन्न । वाढ घेती ॥८॥
नाही नेमाचा आचार । शुध्द नाही आहारविहार । अशुध्द हवापाणी, संहार । करिती जनांचा ॥९॥
कांही केव्हा कुठेहि खाणें । कधी झोपणें कधी जागणें । सप्तहि धातु कोपती याने । रोगरूपाने फळा येती ॥१०॥
’ हाटेलीं खाणें मसणा जाणें ’ । ऐसें बोलती शहाणे । त्यावरि नाना तिखट व्यसनें । आग्यावेताळासारिखीं ॥११॥
कशास कांही नियम नुरला । कोण रोगी कोठे थुंकला । कोठे जेवला संसर्गी आला । गोंधळ झाला सर्वत्र ॥१२॥
त्याने रोगप्रचार झाला । लागट रोग वाढतचि गेला । बळी घेतलें हजारो लोकांला । वाढोनि सांथ ॥१३॥
मग कोणी म्हणे कोपली देवी । कोणी मांत्रिकांसि बोलावी । बाहेरभितरचें समजोनि गांवीं । काढती आरत्या अंधारीं ॥१४॥
कोणी करणी कौटाळ म्हणती । कोणी पिशाच्चास भारती । औषधेंहि न देतां रोगी मारती । मूर्खपणाने ॥१५॥
भगत मांत्रिक अरबाडी जाणते । घुमारे बघती भाविक कोणते । पोटासाठी नाना मतें । फैलाविती लोकांमाजी ॥१६॥
करविती नवस सायास थोर । देवीपूजेचा जोरसोर । रेडे बकरे कोंबडे पामर । कापिताति अज्ञानें ॥१७॥
देवानेचि केले जीव । त्यास कैची मारण्याची हाव ? मधले दलाल करिती ठेव । आपुली हौस पुरवावया ॥१८॥
संतें देवास केलें प्रसन्न । तेव्हा बळी दिले कोण ? चोखोबा, श्रीचक्रधर, रामकृष्ण । म्हणती ’ प्रसन्न देव भावें ’ ॥१९॥
देवासि पाहिजे बलिदान । तो पशु आपुला भ्रम अभिमान । गांवचें गेल्याविण अज्ञान । सुखी जीवन न होई ॥२०॥
गांव असो अथवा शहर । तेथील बिघडले आचारविचार । म्हणोनीच रोगराईने बेजांर । जाहले सारे जन लोक ॥२१॥
गांव व्हावया निरोगी सुंदर । सुधारावें लागेल एकेक घर । आणि त्याहूनहि घरांत राहणार । करावा लागेल आदर्श ॥२२॥
व्यक्ति व्हाया आदर्श सम्यक । पाहिजे दिनचर्याच सात्विक । सारें जीवन निरोगी सुरेख । तरीच होईल गांवाचें ॥२३॥
नियमीं बांधला एकेक दिन । त्यानेच सुधरे जीवन संपूर्ण । गांवहि होय आरोग्यसंपन्न । सारे प्रसन्न देवीदेव ॥२४॥
नियमांचा मुख्य आधार । मजबूत पाहिजे निर्धार । त्यावरीच उत्कर्षाची मदार । ऐहिक आणि आध्यात्मिक ॥२५॥
नाहीतरि मानवाने नियम केले । सर्व जीवन सुरळीत चाले । परि एकदा दुर्लक्ष झाले । की चुकतचि जातें ॥२६॥
एकदा रात्रभरि जागला । मग सकाळीं उठणेंच कशाला ? आळसांत सर्व दिवस गेला । नियम मोडोनि ॥२७॥
त्यास धाक नाही काळजी नाही । घरचे लोक बोललेच नाही । हा उठला दुसरे दिवशींहि । दहा वाजतां दिवसाचे ॥२८॥
कांही दिवस अलक्ष झालें । उशीरां उठणें अंगवळणीं पडलें । मग बदलेना, कांही केले । उपचार जरी ॥२९॥
ऐसें कासया घडूं द्यावें । रोज सकाळींच उठावें । न उठतां घरच्यांनी जागवावें । झोपणारासि निश्चयें ॥३०॥
कांही म्हणती उशीरां उठणें । हें तों भाग्यवंताचें लक्षणें । त्यास काय आहे उणें । पोट भराया धनवंता ? ॥३१॥
ऐसें समजोनि आळशी केला । अरे ! हा भाग्यवान कसला ? निजण्यावरि भाग्यवान ठरला । तरि बीमार महाभागी कां नव्हे ? ॥३२॥
तो तर निजलाचि राहतो । झोपूनचि खातों-पितों ॥ काय अधिक भाग्यवान म्हणवितो ? सांगा सांगा ॥३३॥
भाग्यवंताची उलटी व्याख्या । करणें शोभतें का शहाण्यासारख्या । अरे ! सकाळीं उठणारासचि सख्या । भाग्यवंत म्हणावें ॥३४॥
श्रमांतूनचि उपजे भाग्यसंपत्ति । निजणारे तिची हानि करिती । इतरां श्रम अधिक पडती । उत्साह घटे आपलाहि ॥३५॥
झोपी गेला घरचा धनी । सुर्य चालला डोक्यावरोनि । उन्ह पडले तरी निजूनि । कड फेरितो झोपेचा ॥३६॥
नोकरचाकर आळस करिती । म्हणती घरधनीच झोपती । मग आपणचि कैशा रीतीं । काम करावें जावोनि ? ॥३७॥
ऐसा सारा अंधार पडे । वाजती श्वानांचे चौघडे । मूलबाळ रडेओरडे । झोप काढिती आयाबाया ॥३८॥
घरदार कोठूनि पवित्र ? जागल्यावरीहि आळसलें गात्र । अव्यवस्था माजे सर्वत्र । बध्दकोष्ठता वाढ घे ॥३९॥
यांतूनचि वाढती सर्व रोग । वैद्य डॉक्टरांचा लागला भोग । तिकडे बिघडत गेले उद्योग । शिरलें दुर्भाग्य त्या घरीं ॥४०॥
प्रात:काळची आरोग्यदायी हवा । सदासर्वदा मानवते जीवा । प्रसन्नता देई ऋतु तेधवा । सर्व प्राणीमात्रासि ॥४१॥
सर्व वनेंरानें जागीं होतीं । पुष्पें सारी विकास पावतीं । पशुपक्षीहि नेहमी उठती । प्रात:काळीं ॥४२॥
पहाटे दोहतां गाय-म्हैस । त्यांत अधिकचि सार-अंश । पहाटवारा चढवी रक्तास । लाली रोगप्रतिकारक ॥४३॥
म्हणोनि प्रात:काळीं उठावें । ब्राह्ममुहूर्ता डोळयांनी बघावें । उठतांच प्रात:स्मरण करावें । आसनस्थानीं ॥४४॥
प्रात:स्मरण म्हणजे नवीन स्फूर्ति । उगवल्या दिवशीं व्हाया प्रगति । उत्तम कार्य घडावें पूर्ण गतीं । म्हणोनि प्रार्थना देवाची ॥४५॥
त्यावेळीं जो संकल्प करतो । वाईट न घडो ऐसें चिंतितो । तो सुसंस्कारें वाढत जातो । उन्नतिमार्गे वेगाने ॥४६॥
म्हणोनि प्रात:स्मरण करावें । नैसर्गिक उत्साहभरें भरावें । मग प्रातर्विधी आटोपावे । नित्यनेम हा अमोलिक ॥४७॥
पहाटेस शौचमुखमार्जन । त्याने वायुदोषांचें होय शमन । शरीरीं नवा जोम निर्माण । होय निर्मळपण लाभोनि ॥४८॥
सकाळीं करावें उष:पान । त्याने अंतरींद्रियांचें शांतवन । नंतर करावें शीतजलस्नान । अति प्रसन्न चित्त राहे ॥४९॥
शीतजलस्नानाचें महिमान थोर । तेणें त्वचाशक्ति जागे सुंदर । शरीर राहे सदा तरतर । उत्साहाने ॥५०॥
मेंदूचा भाग थंड राहिला । तरीच बुध्दीचा उत्कर्ष झाला । ऐसा थोरांना अनुभव आला । कितीतरी ॥५१॥
उष्ण पाण्याने स्नान करणें । म्हणजे बीमारचि तो समजणें । ऐसी संवय नेहमी लावणें । हानिकारक देहासि ॥५२॥
स्नानोत्तर अरुणोदयापूर्वी । सामुदायिक ध्यान-उपासना करावी । प्रार्थनामंदिर अथवा पडवी । ध्यानास्तव पहावी निर्मळ ॥५३॥
अरुणोदयाची सुवर्णप्रभा । दिसे लावण्याची शोभा । निसर्ग वाढवी शांति प्रतिभा । अलभ्यलाभा पावती योगी ॥५४॥
जन म्हणती योग्यांनी ध्यान करावें । आपण कासया उठावें स्मरावें ? हें म्हणणें कदापि नोहे बरवें । कोणाचेंहि ॥५५॥
योगी आपली समाधि घरी । साधक सन्मार्गाचा योग करी । जीवन-उज्ज्वलतेचा योग संसारीं । प्रात:काळीं साधतसे ॥५६॥
ध्यानापरीच सहल प्रात:काळची । जरूर करावी संवय रोजचि । त्याने देह मन राहे निर्मल शुचि । प्राणवायुस्पर्शाने ॥५७॥
कोणी धावती कोणी चालती । कोणी आसनें सूर्यनमस्कार घालती । कोणी गाती चिंतन करिती । हें दृश्य दिसो प्रभातीं ॥५८॥
कांही पठण-पाठण करावें । शरीरमनासि वळण लावावें । आयुष्य सुंदर होतें आघवें । ऐशा क्रमें ॥५९॥
घरीं असो वा आश्रमी । प्रवासीं असो वा तीर्थधामीं । प्रात:काळीं नित्यनियमीं । अभ्यासक्रम उरकवावा ॥६०॥
घरा-आश्रमाची करावी सफाई । स्वच्छता मार्गी ठायीं ठायीं । गायीम्हशींचे गोठे सर्वहि । आरशासारखे करावे ॥६१॥
गडीमाणसांनी सहाय्य द्यावें । परि प्रत्येकाने काम करावें । आईबाई मिळोनि उरकवावे । कामधंदे चटचट ॥६२॥
कोणीहि बघे अरुणोदयीं । सडासंमार्जन रांगोळी रई । आंतबाहेर गलिच्छता नाही । कामें झालीं सकळांचीं ॥६३॥
ऐसें ज्या गांवीं झालें । समजावें लक्ष्मीचें मन मोहिलें । आरोग्याचें राज्य आलें । तया गांवीं ॥६४॥
तेथे उदंड आयुष्य वाढतें । जेथे प्रात:काळीं स्वच्छता होते । कोणीहि न दिसे झोपला जेथे । प्राणीमात्र ॥६५॥
म्हणोनि ऐसे नियम करावे । चुकलियाहि चुकों न द्यावे । पुन:पुन्हा सावरावें । वर्तन आपुलें ॥६६॥
ऐसा अभ्यास जडल्यावरी । आरोग्य भाग्य नांदे संसारीं । औषधांची गरजचि नुरे शरीरीं । वाढे अभ्यंतरीं नवें तेज ॥६७॥
पूर्वी प्रात:काळीं माध्यान्हा । आणि सायंकाळीं जाणा । होती त्रिकाळ संध्याप्रार्थना । संस्कारास्तव लाविली ॥६८॥
तें सर्वकाळचि उचित । म्हणोनि प्रातर्ध्यान नियमित । आणि सायंप्रार्थनाहि नेमस्त । करीत जावी सर्वांनी ॥६९॥
निद्रेचिया आदिअंतीं । दिवस-रात्रीच्या संधीप्रति । आणि भोजनसमयीं संकल्प होती । ते बनती दृढ संस्कार ॥७०॥
जनींभोजनीं हरि आळवणें । गीतापाठादि उच्चारणें । सात्विक भाव हृदयीं भरणें । शुध्द करी जीवनासि ॥७१॥
श्रोतयांनी प्रश्न केला । भोजनीं आळवावें भगवंताला । याचें फळ सांगा आम्हांला । काय कैसे ? ॥७२॥
भोजन म्हणजे आहार घेणें । तेथे कशाला देवाचें गाणें ? हास्यविनोद कां न करणें । उल्हासास्तव ? ॥७३॥
ऐका याचेंहि उत्तर । भोजन म्हणजे पिंडसंस्कार । यज्ञहि यासि म्हणती थोर । वैश्वानर अग्निमाजी ॥७४॥
भोजनाचे वेळीं प्रसन्न । केलिया विचार शुभचिंतन । तैसेचि भिनती निर्मळ गुण । अन्नासवें ॥७५॥
पवित्र धूप सुगंध सात्विक । तेणें वातावरण रोगनाशक । रांगोळया आदि प्रसन्नकारक । स्वच्छ असावी जागा तरी ॥७६॥
स्वच्छतेविणा जें भोजन । समजावें तें मलीनपण । अग्नि वाढाया हातपाय धुवोन । पुसोनि भोजन करावें ॥७७॥
कांही करावें भोजनापूर्वी काम । जेणें मिळे सकळांसि आराम । कार्य होतसे सुगम । सर्व जनां मिळोनि ॥७८॥
कोणी आसने, पाट टाकावे । कोणी वाढावे, पाणी ठेवावें । कोणी उदबत्ती, धूप लावावे । सुगंधासाठी ॥७९॥
प्रथम बसोनि पाठ म्हणावा । गंभीर सुरें रंग भरावा । वाढणें संपता शांतिमंत्र गावा । गांभीर्याने ॥८०॥
मग करावें ब्रह्मार्पण । आदराने करावें अन्नसेवन । भोजनींहि श्लोक, मधुरवचन । उल्हासाने बोलावें ॥८१॥
भोजनापूर्वी आचमन । त्याचा उद्देश अग्निदीपन । चित्राहूति जलआवर्तन । समर्पण हाचि भाव त्याचा ॥८२॥
ईश्वरें उपजविलें अन्न । तें अन्न ईश्वरी कृपादान । ज्यावरि सर्वांचें असे जीवन । त्याचें ऋण आठवावें ॥८३॥
त्याचीं लेकरें जीवजन । त्यांना आधी लाभावें अन्न । यासाठी विश्वदेवाचें संतर्पण । यज्ञमय भोजन या भावें ॥८४॥
भोजन म्हणजे भूमातेचा प्रसाद । समजोनि सुखें घ्यावा आस्वाद । ज्यांत शेतकर्‍यांचे कष्ट विशद । तें अन्न सेवावें सेवेस्तव ॥८५॥
ऐशा सदभावें आदरें सेवावें । उत्तम श्लोक भोजनीं गावे । वेडेंवाकुडें न बोलावें । क्रोधा न यावें भोजनसमयीं ॥८६॥
हास्यविनोद जरी असला । तरी अश्लीलता न यावी प्रसंगाला । उच्छिष्ट कण न पाहिजे टाकला । भोजनप्रसंगीं ॥८७॥
राजस तामस सात्विक । भोजनाचे प्रकार अनेक । त्यांत आपली शक्ति पाहूनि सम्यक । पचेल तैसें करावें ॥८८॥
कोणी सज्जन म्हणती भले । पचनासाठी सर्वचि खाद्य निर्मिलें । परंतु पचनाचें तारतम्य पाहिलें । पाहिजे जुळवोनि ॥८९॥
कोणी खाद्य रोग करी । कोणी खाद्य भोग भरी । कोणी खाद्य वाईट संस्कारी । करितें प्राण्या ॥९०॥
कांही जीव चुनखडीहि खाती । कांही मांसकिडे भक्षिती । परंतु त्यांची स्वभाव-प्रकृति । त्याचि परी राहे ॥९१॥
मानवाने काय खावें । म्हणजे मानवपणेंचि शोभावें । हेंचि येथे पाहावें । लागतें  सज्जनांसि ॥९२॥
शुध्द सात्विक अन्न घेतलें । त्याने सात्विक विचार प्रवर्तले । तामस राजस खाद्य सेविलें । तैसें झालें आचरण ॥९३॥
मद्यमांसाहार करिती कोणी । विकारबुध्दि वाढे मनमानी । भलतेचि रोग जाती लागोनि । सांसर्गिक आदि ॥९४॥
हें तों निश्चितचि आहे । खाद्यें रसरक्त उत्पन्न होय । रक्तापासूनि मांस मेद वीर्य । नि:संशय होती शरीरीं ॥९५॥
जैसे ज्याचे रक्तरसगुण । तैसे विचार होती स्फुरण । क्रूर-शूर मंद-बुध्दिमान । रक्तमिश्रणें दिसताति ॥९६॥
कांही आनुवंशिक गुण येती । रक्तरेताचिया मिश्रस्थितीं । कांही खाण्यापिण्याचेहि होती । संस्कार अंगीं ॥९७॥
कांही संगतीने वळण लागे । भूमिपात्रें कांही परिणाम जागे । कांही प्रयत्नशीलतेचे धागे । वळविती जीवा ॥९८॥
हें सर्व जरी खरें असलें । तरी मुख्य अंग खाद्यपेयचि झालें । कारण त्यानेच बनलें-घटलें । रक्तमांस जीवांचें ॥९९॥
उत्तम रक्ताचें असावें शरीर । तरि अन्नहि उत्तमचि खावें सुंदर । बाष्कळ खातां मेंदू-इंद्रियांवर । बाष्कळताचि येईल ॥१००॥
मग विषय-वासना नावरे । लागेल बहिरंगाचें वारें । झगडती जैसीं जनावरें । तैसे अनावर मानवहि ॥१०१॥
ज्यासि क्रूरकर्मचि करणें आहे । त्याने तेंचि खावें नि:संशय । तैसेचि भोगावेत अपाय । झालिया अंगीं ॥१०२॥
ज्यासि मनुष्यपण लाभावें । ऐसें वाटे जीवेंभावें । त्याने सात्विक अन्नचि सेवावें । सर्वतोपरीं ॥१०३॥
एकाने ऐसा प्रश्न केला । सात्विक अन्न कुठलें गरीबाला ? त्याने काय करावें बोला । जीवनासाठी ? ॥१०४॥
मित्रहो ! सात्विक अन्नचि सहज मिळतें । जें श्रमाने शेतींत पिकतें । भाजीभाकरी भातपोळी लाभते । अल्प प्रयासें ॥१०५॥
सूर्यकिरणांनी तयार झालीं । कंद भाज्याफळें बागेंत पिकलीं । सत्वांशयुक्त सर्व तीं भलीं । आरोग्यदायी ॥१०६॥
साधें सहज ताजें पावन । तेंचि असे सात्विक अन्न । नाना विकृतींचें मिष्टान्न । तें सात्विक नव्हे ॥१०७॥
कळणाकोंडाहि सात्विक । ज्या सत्त्वें तगती गरीब लोक । सात्विक म्हणजे शरीरपोषक । आरोग्यदायी सुसंस्कारी ॥१०८॥
तळलें विटलें खाऊं नये । आंबट खारट सेवूं नये । तैसें अति गोडहि जेवूं नये । भोजनीं कोणी ॥१०९॥
मिष्टान्न नेहमीं सेवूं नये । तंळण मसाले खाऊं नये । मिरचीवरि सोकावूं नये । सर्वांनीच ॥११०॥
स्वच्छ असावें सात्विक अन्न । ताजें रुचिकर आणि रसपूर्ण । पालेभाजी फळभाजी विभिन्न । स्वाद संपन्न मुळांतचि ॥१११॥
उगीच आटवून आटवून रबडी खाणें । वाटून वाटून पुरणपोळी करणें । तळून तळून भजेपुर्‍या जेवणें । उन्मत्तांचें भोजन हें ॥११२॥
चाळून गाळून केला रवा । पिसून किसून भरला खवा । खातांना जीभ करी वाहवा ! पोट जाई कामांतूनि ॥११३॥
कांहींनी खाण्याचीच वाढविली कला । भात खाती टोपला-टोपला । वरोनि चिंचपाणी पेला पेला । भातावरि घेती ॥११४॥
कांही लाडूपेढे खूपचि खाती । रबडी हलवा तंडोनि घेती । पैसे ठरवोनि माप लाविती । खावयाचें ॥११५॥
मग त्याने पचन होईना । सारा शरीराचा होय धिंगाणा । नाना रोग जडती, यातना । द्यावयासि ॥११६॥
कोणी स्वादासाठी भोजन करिती । नको असलें तरी पोटांत कोंबती । मग बिमारी घेऊन उठती । कॉलरा, अपचन, संग्रहणी ॥११७॥
कांहींना होते उदर-कुंदी । चाले अपानांतून दुर्गधी । लोक हसती ’ खाणेंपिणें स्वच्छंदी । कां करतो ’ म्हणोनिया ॥११८॥
प्रकृतीच्या विरुध्द आहार । नाही काळवेळाचा सुमार । आंबट तेलकट आदि विषम मिश्र । ऐसा आहार विषारी ॥११९॥
कांही लोक ऐसेंचि खाती । प्रकृति बिघडलिया औषध घेती । गरीबास कुठली इतकी संपत्ति ? वैद्य होती घरोघरीं ॥१२०॥
डॉक्टर म्हणती पथ्यचि नाही । तेणें रोगाचें मूळ तैसेंचि राही । रोगी पाहती तेंच नित्यहि । मृत्यूची घाई झाल्यापरी ॥१२१॥
पहिलें खावोनि मस्त व्हावें । मग औषधि घेवोनि पचवावें । ऐसे उपद्रव कासयासि करावे । उन्मत्तपणें ? ॥१२२॥
उगीच आहे ऐसें खाणें । पचविण्यासाठी चूर्ण घेणें । अन्नरसाची नासाडी करणें । कशासाठी ? ॥१२३॥
आंत वाढत जातां विकृति । धन्वंतरीहि काय करिती ? नष्ट करोनि औषधें, संपत्ति । मुखी माती पडतसे ॥१२४॥
परंतु लोक आग्रहीं पडती । हितचिंतक म्हणवोनि खाया देती । ते समजावे घातक श्रोतीं । ठेवावी निश्चिती आहाराची ॥१२५॥
नियमित सात्विक अन्नचि खावें । साधें ताजें, भाजीपाले बरवे । दूधदही आपुल्यापरी सेवावें । भोजना करावें औषधचि ॥१२६॥
सर्व भोजनीं उत्तम भोजन । ज्यांत गोघृतदुग्धतक्रपान । समजावें अमृताचें सेवन । शरीरासाठी ॥१२७॥
गोदूध नित्य सेवन करितां । कायाकल्पदि होय तत्त्वता । शक्ति चपलता बुध्दिमत्ता । आरोग्य हातां नित्य राही ॥१२८॥
निरोगी आयुष्य लाभेल बहुत । अल्पमृत्यु अथवा रोगांची सांथ । हे पाऊल न ठेवितील गांवात । तुकडया म्हणे ॥१२९॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव संमत । व्यक्ति-आचारें ग्रामारोग्य वर्णित । चौदावा अध्याय संपूर्ण ॥१३०॥

॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥


कृषी क्रांती 

ग्रामगीता अध्याय चवदावा ग्रामगीता अध्याय चवदावा ग्रामगीता अध्याय चवदावा ग्रामगीता अध्याय चवदावा ग्रामगीता अध्याय चवदावा ग्रामगीता अध्याय चवदावा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *