ग्रामगीता अध्याय

ग्रामगीता अध्याय तिसावा

ग्रामगीता अध्याय तिसावा

॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥

एक श्रोता करी प्रश्न । भजनीं देवाचें गुणगान । त्यासि बनवितां प्रचाराचें साधन । पावित्र्य मग कैसें उरे ? ॥१॥
भजनासि हें ऐसें वळण । देवोनि चुकवितां आपण । साध्या गोष्टीहि शिकविता त्यांतून । हें तों न पटे धार्मिकां ॥२॥
याचें ऐकावें उत्तर । धर्म म्हणजे धारणा सुंदर । त्यांत सर्वचि अंगांचा विचार । जीवनाच्या ॥३॥
कलीयुगीं भजन कीर्तनभक्ति । यामाजीं बोलिली विशेष शक्ति । ती नव्हे एकांगी संतउक्ति । केवळ मुक्ति मिळवाया ॥४॥
आमुचें संपूर्णचि जीवन । सुधारूं शके कीर्तनभजन । वेदशास्त्रस्मृति संपूर्ण । याच काजा जन्मल्या ॥५॥
समाजरचना गांवरचना । विवाहादि संस्कार राज्ययोजना । औषधि, शेती, कलादि नाना । वेदस्मृतींत वर्णिल्या ॥६॥
पुरातन संस्कृत वेदकाळ । त्यांतूनि जन्मला पुराणकाळ । पुढे प्राकृतजना कळावया सरळ । संत-भजनें अवतरलीं ॥७॥
साधुसंतीं लिहिलें नामभजन । भावभक्ति हृदयीं धरून । बोध कळावया जनतेलागून । सहजासहजीं सर्वचि ॥८॥
कांही वेदान्तरूपकें कथिलीं । कांही वैराग्यभावें बोलिलीं । कांही सलगीचीं भजनें केलीं । साधुसंतीं विनोदें ॥९॥
कांही रचिलें भजन-भारूड । बहुरूपी, गोंधळी, जोहार, गारूड । पाईक, मातंग, गांवगुंड । रूपकें समाज-जीवनाचीं ॥१०॥
कांही केलें लीला-लाघव । गौळणी, गोपाळ, देवीदेव । समाजसुधारणेचा गौरव । वर्णिला कांही ॥११॥
जैसा प्रसंग आला सामोरी । तैसींच भजनें केलीं बहुपरी । हें कळावया वर्म अपुरी । बुध्दि झाली लोकांची ॥१२॥
वाईट भावना नाशावया । लोकीं कर्तव्यशीलता यावया । समाज सुस्थितींत नांदावया । भजनें केलीं संतांनी ॥१३॥
सौरी विराण्याहि गाऊनि । लोकांवरि पाडिली मोहिनी । बिघडल्या जना आपुलेंसें करोनि । जागृत केलें समाजा ॥१४॥
गाऊनि नाचूनि नाना रीतीं । भावभक्ति भरोनि गीतीं । त्यांतूनि केली जनजागृति । शहाणें केलें संतांनी ॥१५॥
संत तुकाराम, नामदेव । शेखमहंमद, ज्ञानदेव । चैतन्य प्रभु, नानकदेव । जना, मीरा, मुक्ताबाई ॥१६॥
कबीर, तुलसीदास, रामानंद । सूरदास, दादू, ब्रह्मानंद । नरसी, देवनाथ, परमानंद । संत झाले असंख्य ॥१७॥
ऐसे कितीतरी संत झाले । ज्यांनी अभंग-भजनादि कथिले । कित्येक जन उध्दरोनि गेले । नामभजनें तयांच्या ॥१८॥
ज्यांची ऐकतां भजन-वाणी । जाय गगनमंडळ भेदोनि । झाले, आहेत, होतील अजूनि । संत-सज्जन यापरी ॥१९॥
म्हणोनि बोलिले सकळ लोकां । ’ भजन-मार्ग सोडूं नका ’ । परि भजनीं तारतम्य शिका । म्हणायाचें हेंचि असे ॥२०॥
राम झाले कृष्ण झाले । संत, पुढारी, सर्वचि झाले । परि आज काय पाहिजे केलें । हेंचि कथिलें तयांनी ॥२१॥
जगाची नित्य बदलती गति । आज कोणती उद्या कोणती । कोणते बोल कोणाप्रति । सांगावे कधी कळावें हें ॥२२॥
मुडदा स्मशानीं चालला । तेथे काय करावें शृंगाररसाला ? पाहिजे वैराग्यभाव वाढविला । भजनमार्गे ॥२३॥
भजनी लग्नकार्यासि बोलाविला । त्याने स्मशानींचा रस वर्णिला । लोक म्हणतील काढा याला । काय बरळतो या स्थानीं ? ॥२४॥
तैसेंचि देवुळीं केलें भजन । गायिलें स्त्रीसौंदर्य शृंगारपूर्ण । जन पाहतील हसून । वेडयापरी समजोनिया ॥२५॥
रणांगणीं भजनी नेला । वीरांस म्हणे सोडा शत्रूला । काय करितां मिथ्या गलबला । ऐसें बोलिल्या कोण ऐके ? ॥२६॥
हें सर्व जयाने जाणावें । तेणेंचि भजनभाव वर्णावे । शहाणे करूनि सोडावे । भोळेजन सर्व ॥२७॥
समाज झाला रूढिबध्द । तेथे सांगावे सिध्दांत शुध्द । समाजकार्याहि करावें विशद । वेळ पडेल त्यापरी ॥२८॥
प्रसंग पाहोनि उपदेशावें । सत्य तत्त्व तें न सोडावें । सत्यचि गोड करोनि सांगावें । वेळकाळादि पाहोनि ॥२९॥
ऐसेंचि समजोनि संतजनें । केले ग्रंथ गीतें भजनें । तैसेंचि आज पाहिजे नव्याने । वर्णिलें सारें ॥३०॥
सर्व पंथांचा समन्वय । सर्व जातींचा मेळ होय । ऐशाचि भजनांनी लागेल सोय । आमुच्या गांवाची ॥३१॥
हें जरी मागे संतांनी कथिलें । परि आज पाहिजे पुढे वर्णिलें । वर्णन करणारेच भ्रमांत पडले । मग ते मेले जनलोक ॥३२॥
कोणी ब्रह्मज्ञानाचीं भजनें गाती । अर्थाविणेच वाचती म्हणती । उगीच दंभ अंगीं आणती । आपण ज्ञानी म्हणोनिया ॥३३॥
घेऊनि संतांचें पाठांतर । आपणचि बनती महात्मा सुंदर । निभवाया पोटाचा व्यवहार । आयुष्यभरी ॥३४॥
कोणी गौळणींत रंगोनि नाचती । वेष धरोनि दंढार करिती । अर्थ सोडोनि मजा मारिती । विषयांधभावें ॥३५॥
ऐसी ऐकतां कृष्णलीला । जनमनीं भाव वेगळा झाला । वाटे हा तमाशाचि बनविला । देवादिकांचा ॥३६॥
कोणी रागरागिणी गाती । शब्द तोडोनि अर्थाची माती । पाहिजे तसे बनवोनि घेती । शब्द भजनाचे ॥३७॥
कोणी पाठांतर खूप करिती । ताल-बेताल करोनि गाती । चीड येते ऐकतां चित्तीं । अर्थ अनर्थ सगळाचि ॥३८॥
कांही गाती अति सुंदर । ताल कुशल आलाप मधुर । तेथे अर्थाचा नसे अंकुर । भजनभाव जागेना ॥३९॥
कोणी भजन करावया आधी । गांजा-तंबाकूची पाहती संधि । चहाप्रसादाविण न होई गर्दी । भजनकर्‍यांची ॥४०॥
कांही म्हणती आमुचें भजन वेगळें । तें तुम्हांसि कैसें कळे ? त्यासि पाहिजे गुरुदेव-हस्तकमळें । डोक्यावरि ॥४१॥
कांही सांप्रदायिक भजनी असती । ते आपुलीच शेखी मिरविती । माळ-तंदुरीसाठी भांडती । शत्रु जैसे जन्मांतरीचे ॥४२॥
कांही खंजरीसाठी रागें भरती । कांही स्पर्धेने पुढे येती । परि समाधान नाही चित्तीं । तिळभरी कोणाचिया ॥४३॥
कांही म्हणती दुसर्‍या संताचें । भजन नका बोलूं मंडपीं आमुचे । आमुचें भजन संप्रदायाचें । आमुच्याच साठी ॥४४॥
मित्रहो ! आता ऐसें करणें । सोडोनि द्यावें जीवेंप्राणें । कोणत्याहि संतांचीं सदवचनें । म्हणावीं प्रेम धरोनि ॥४५॥
ज्या भजनाचा अर्थ न कळे । तें भजन न म्हणावें आपुल्या बळें । ज्याने समाजांत परिणाम सगळे । व्यर्थ होती ॥४६॥
भजनें करावी गांव-जागृति । हृदयजागृति कार्यजागृति । सर्वांनी लागावें सत्कर्माप्रति । ऐसें लोकां सांगावें ॥४७॥
भजन म्हणणाराचि आळसी । काय सांगेल जनतेसि ? करोनि घेईल आपुली हसी । ऐसें कोणा न करावें ॥४८॥
जें जें करावें तें समजोनि । पाऊल न टाकावें विचारावांचोनि । विचारचि नेतो मोक्षभुवनीं । ऐसी साक्ष थोरांची ॥४९॥
विचाराविण देवभक्ति केली । तेथेहि दिसे फजीती झाली । लोक म्हणती लोभें फैलाविली । देवपूजा दांभिकाने ॥५०॥
रात्रभरि केलें भजन । पडला खाटलीं बिमार होऊन । मग कोठलें नामस्मरण । ’ अरे बापा ’ ओरडतो ॥५१॥
अभ्यासावांचूनि उपास केला । दोनदिवसां पित्तवात उमळला । मग सहा महिने खातचि गेला । दवापाणी मोसंबी ॥५२॥
ऐसें कासयासि करावें ? तारतम्य सोडोनि द्यावें । मग तो भोग भोगीत राहावें । आयुष्यभरि ? ॥५३॥
मनुष्याने बुध्दि वापरावी । अनुभवियाची सल्ला घ्यावी । अति सर्वत्रचि वर्जावी । अभ्यासें करावी आत्मोन्नति ॥५४॥
समाजीं जेणें हानि घडे । तें सुधारावयाचे पोवाडे । वाजवावे संतांचे चौघडे । विचाराने गर्जोनि ॥५५॥
त्यांचेहि करूं अनंत प्रकार । रुचिभेदाचा जाणूनि व्यवहार । परि मूळचे सिध्दान्त थोर । सोडूं नेदूं कोणासि ॥५६॥
आधुनिक बसवूं चाली । जेणें लक्ष वेधेल आसुच्या बोलीं । परि दाखवूं संतांनी केली । तेचि वाणी या काळीं ॥५७॥
भजनांचे असोत अनंत प्रकार । मागचे पुढचे कांही विचार । परि संतांचें काव्य अति थोर । उमटोनि निघे बाहेरी ॥५८॥
परि संतांचीं भजनें दुकान थोर । तेथे अमोलिक वस्तु अपार । त्यांतूनि निवडोनि सारासार । देऊं पात्र पाहोनि ॥५९॥
संतभजनीं देवभक्तीच नाही । जीवनाचे सर्व दृष्टान्तहि । प्रसंगीं शिव्या देवोनीहि । समजाविलें त्यांनी ॥६०॥
मीराबाईचीं प्रेमभजनें । सूरदासाचीं लीलाकवनें । तैसींच गोस्वामींचीं जीवनदर्शनें । उपदेशगाणें कबीराचें ॥६१॥
तें सर्वचि प्रिय देवा । जेणें घडे जीवांची सेवा । हें जाणोनि समाज जागवावा । भजनप्रकारें या काळीं ॥६२॥
कांहींनी राममंत्र सांगितला । त्यांतूनि समाज जागविला । कांहींनी  दत्तमंत्र शिकविला । लोक केले सेवाभावी ॥६३॥
कृष्णरंगीं रंगली मीरा । राज्यवैभव वाटे कचरा । छंद लागला घराघरां । तिच्या प्रभावें भक्तीचा ॥६४॥
चैतन्याची गर्जतां वाणी । अनिष्ट रूढया गेल्या पळोनि । पावन झाली श्रीकृष्ण-भजनीं । बंगालभूमि त्याकाळीं ॥६५॥
कबीर, नानकदेवादिकांनी । भजनें केलीं विदेशीं फिरूनि । विवेकानंद-रामतीर्थांनी ।  केलें प्रभावित जग जैसें ॥६६॥
ऐसे अनेक मार्गी झाले । परि ते आज अपुरेच पडले । देशापुरतेहि नाही व्यापले । समाजा सुमार्गी लावाया ॥६७॥
त्यांची पडली आज उणी । मानव राहिले मागासल्यापणीं । याची कराया भरपाई अजूनि । प्रचारक पाहिजे सेवाभावी ॥६८॥
तोचि उत्तम प्रचारक । ओळखे वेळप्रसंग सम्यक । मार्ग सांगतो लायक । लोकां हांक देवोनिया ॥६९॥
म्हणे आमुचें कांही नव्हे । संतीं कथिलें जैसें बरवें । तेंचि विशद करोनि सांगावें । हाचि धर्म भजनियांचा ॥७०॥
भजनासनीं भजनी बैसला । जनलोकांच्या दृष्टीस आला । पाहती लोक सदभावें त्याला । गंभीर दिसला पाहिजे तो ॥७१॥
साधी राहणी सात्विक लेणीं । विनम्र हावभाव-निशाणी । शुध्द बोल प्रेमळ वाणी । पाहिजे भजनी लोकांची ॥७२॥
कपाळावरि आठया पडल्या । वेडयावाकडया बाहुल्या फिरल्या । हेकडें तोंड मुद्रा फाकल्या । ऐसें कधी न व्हावें ॥७३॥
मनांत असावा नितांत आदर । वृत्तींत असावा भाविक गहिवर । रोमांच उठावेत अंगावर । भजनियाच्या ॥७४॥
असावी कोमल रसाळ वाणी । उच्चारितां जावी हृदय भेदोनि । जागृत व्हावे ऐकतांच प्राणी । लागावे ध्यानीं सुजनांच्या ॥७५॥
भजनें म्हणावीं सरळ सात्विक । गोड आवाज ओजस्वी रसिक । तालबध्द मधुर नि:शंक । अर्थपूर्ण निर्भयपणें ॥७६॥
ऐशाचि पावन प्रचारासाठी । संतीं केली आटाआटी । जना कळावी ओठाओठीं । भाषा त्यांची म्हणोनि ॥७७॥
आमुचा देशचि भाविकभक्त । त्याचा विश्वास भजनासक्त । देवधर्म म्हणतांचि चढतें रक्त । अंगीं त्याच्या ॥७८॥
हिरण्यकश्यपूसि नामाची चीड । परि नारदाचिया भजनीं ओढ । ऐसेंच आहे भजनाचें गूढ । नागहि होई शांत तेथे ॥७९॥
म्हणोनि भजनाचें महत्त्व । भाषणासि येतें गौणत्व ।  हें समजोनि संतांनी तत्त्व । भजन केलें प्रेमाने ॥८०॥
भाषणांत भरलें समाजकारण । धर्मकारण राजकारण । लोककारण विज्ञानकारण । रुक्ष वाटे तें सर्वां ॥८१॥
लोक समजती भजनाची भावना । अर्थ सांगतां सुगंध सुवर्णा । चमत्कारें बदलावा जमाना । तैसें होतें भजनाने ॥८२॥
भजनाची वाजली खंजरी । थाप पडली मृदंगावरि । झाली जनता वेडीबावरी । ऐकावया भजनासि ॥८३॥
लोक पाहती चातकावाणी । कधी निघेल दुसरी वाणी । ऐसा समाज जातां मोहूनि । गांव होई जागृत ॥८४॥
आपुल्या गांवीं व्हावें भजन । जेणें जागृत होती वृध्द-तरुण । स्त्रियामुली सकळ सज्जन । कार्य करिती ग्रामाचें ॥८५॥
प्रत्येकाच्या तोंडीं गीतें । ’ आपुलें गांवचि सुधारूं पुरतें । हेंचि सांगितलें भगवंतें । ग्रंथामाजीं ’ म्हणती सारे ॥८६॥
गुराखी ढोरकी शेत-मजूर । दुकानदार शिंपी सुतार लोहार । दळणीं कांडणीं घरोघर । गाती भजनें उल्हासें ॥८७॥
म्हणती ’ या रे सगळयांनो ! या । एकेक काम हातीं घ्या । गांवची सुधारणा करूंया । आपुल्यापरीं ’ ॥८८॥
हेचि स्फूर्ति जागवाया संतीं । केली भजनमालिकेची प्रगति । समाधान लाभावया लोकांप्रति । सेवागुणें सुसंस्कारें ॥८९॥
आज सेवेची नोकरी झाली । भजनावरीच जिंदगी चालविली । याने साधनांची किंमतचि उडाली । जाहला तो पोटधर्म ॥९०॥
वीणा चिपळया झाल्या भिकारी । पोटास्तव फिरती दारोदारीं । त्या मागची संत-तपस्या सारी । लुप्त झाली वाटे जणूं ॥९१॥
यासि फिरूनि दुरुस्त करावें । सुसंस्कारें लोक भरावे । घरोघरीं रोपटें पेरावें । सेवावृत्तीचें ॥९२॥
एक सेवक सेवेसि लागला । हजारो लोकांसि मार्ग दिसला । मानवजातीचा पांग फेडला । ऐसें व्हावें निश्चयें ॥९३॥
हनुमंत जेव्हा भावनेने चेतला । राममंत्र घेवोनि निघाला । कार्य सिध्दचि करोनि आला । उल्हासें श्रीरामाचें ॥९४॥
तैसेंचि आपण आज करावें । भजनादि साधनां सुधारावें । गांवोगांवींच्या लोकीं भरावें । बंधुप्रेम त्याद्वारें ॥९५॥
सर्वांभूतीं प्रेमभाव । यांतूनचि सेवेचा उदभव । चारित्र्याचा वाढे गौरव । संस्कार होतां भजनांचे ॥९६॥
भजनांची चालतां परंपरा । जना मिळे सत्प्रवृत्तींचा झरा । लोकशिक्षणाचा यापरी दुसरा । उपाय नाही सात्विक ॥९७॥
म्हणोनि विनवितों गांवकर्‍यांनो ! तरुण मुलांनो ! वृध्दजनांनो ! सगळेचि प्रेमळ गीतें म्हणो । करा ऐसा प्रचार ॥९८॥
वाणी रंगूं द्या हरिनामाची । चटक लागूं द्या सत्कर्मांची । चीड येऊं द्या दुर्व्यसनांची । सर्व जना या द्वारें ॥९९॥
जतन करा गांवसंस्कृति । होऊं द्या भजनें जनजागृति । जनता-विद्यापीठ हें निश्चिती । तुकडया म्हणे ॥१००॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव संमत । भजनसाधना ग्रामहितार्थ । तिसावा अध्याय संपूर्ण ॥१०१॥

॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥


कृषी क्रांती 

ग्रामगीता अध्याय तिसावा ग्रामगीता अध्याय तिसावा ग्रामगीता अध्याय तिसावा ग्रामगीता अध्याय तिसावा अभंग abhang 

ref:transliteral

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *