sant eknath maharaj

एकनाथी भागवत अध्याय 10

एकनाथी भागवत अध्याय 10

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

ॐ नमो द्‍गुरु धन्वंतरी । ज्याची दृष्टीचि निरुज करी ।
त्यावांचोनि संसारीं । भवरोगु दुरी न करवे ॥१॥
आतां सद्गुरुरूप धन्वंतर्‍याला नमस्कार करतो. कारण त्याच्या दृष्टीनेंच मनुष्य रोगमुक्त होतो. या संसारामध्ये त्याच्याशिवाय भवरोगाची बाधा दूर करणारा दुसरा कोणीही समर्थ नाही १.

ज्या भवरोगाचेनि दर्पें । फुंफात तापलीं त्रिविधतापें ।
‘मी माझे’ येणें संकल्पें । वाग्जल्पें जल्पती ॥२॥
ज्या भवरोगाच्या उन्मादाने मनुष्यें आधिभौतिक, आधिदैविक व आध्यात्मिक ह्या त्रिविध तापांनी होरपळत आहेत; ‘मी’ आणि ‘माझे’ ह्या संकल्पानें ती बडबडत असतात २.

पडिलीं द्वैताचिया दुखणा । तोंडींची चवी गेली जाणा ।
मुखा आला कडवटपणा । कटु वचना बोलतु ॥३॥
द्वैतभावनेचा विकार उद्‌भवल्यामुळे त्यांच्या तोंडाची चवच जाते आणि त्यामुळे सारे तोंड कडू कडू होते, म्हणूनच ती कडू कडू विषासारखे बोलत असतात ३.

जेथें व्याधीचेनि सन्निपातें । विवेक हाणोनियां लातें ।
उमरुडूनि धैर्य हातें । वासनावनातें हिंडती ॥४॥
व्याधीच्या सन्निपातामध्ये विवेकाला ती लाथेनें झुगारून देतात; आणि वायूच्या झटक्यांत हाताने धैर्याला ढकलून देऊन वासनारूप अरण्यामध्ये भटकत फिरूं लागतात ४.

मनोरथकर्दमीं चरफडित । संकल्पमृगजळीं बुडत ।
वेगीं निसरोनियां पडत । टेंक चढतां स्वर्गाचें ॥५॥
मनोरथरूपी चिखलात गोते खातात ; चरफडतात; संकल्पाच्या मृगजळांत बुडतात; आणि स्वर्गाच्या टेकडीवर लौकर चढावयाला लागतात, तो पाय निसरून खाली पडतात ५.

वोरबडत स्नेहाची आराटी । गोंवीत लोभाची बोरांटी ।
खिळिला प्रपंचाचिया कंठीं । मारितां नुठी तेथूनि ॥६॥
मायेची काटेरी झुडपें त्यांस ओरबडतात; लोभरूपी बोरीचे कांटे बोचतात, आणि प्रपंचाच्या गळ्याला घट्ट मिठी मारून बसतात. मग त्यांना झोडपलें तरी तेथून हालत नाहींत ६.

भवरोगभ्रमें भ्रमले कैसे । खावों नये तें खावों बैसे ।
करूं नये तें करितां दिसे । योषितांसरिसें धांवत ॥७॥
भवरोगाच्या भ्रमाने ते किती वेडे वेडे विचार करतात पहा. जें खाऊं नये ते खावयाला लागतात ; जे करूं नये ते करताना दिसतात, आणि स्त्रियांबरोबर वेड्यासारखे धावत असतात ७.

तेथ धनभयाचे शारे येत । तेणें थरथरां कांपत ।
धाकें धाकें घामेजत । दडी देत गुप्तत्वें ॥८॥
तेथें द्रव्याच्या भीतीनें अंगांत हुडहुडी भरते व ते थरथर कांपू लागतात; मनाला दचका बसून सारे अंग घामाने डबडबून जाते; अशा स्थितीत मग ते कोठे तरी गुप्त ठिकाणी तोंड चुकवून दडी देतात ८.

भोगाभिमानु चढे देहीं । तेव्हां न राहे खाटे भुईं ।
विधीचें पांघरूण टाकी पाहीं । डोळा ठायीं लागेना ॥९॥
अंगांत विलासाचा मद चढतो; तेव्हा जमिनीवर किंवा खाटेवरही त्यांना पडवत नाही; विधीचे पांघरूण फेंकून देतात. आणि कोणत्याच ठिकाणी त्यांची पापणीला पापणी लागत नाही अशी दशा होते ९.

उभें न राहवे ऐक्यवृत्ती । क्षीण झाली ज्ञानशक्ती ।
पडलीं जडत्वें लोळती । पाणी मागती विषयांचे ॥१०॥
एकाग्रवृत्तीनें क्षणभरही उभे राहवत नाही. ज्ञानशक्ति क्षीण होऊन जाते. असे लोळागोळा होऊन ते तळमळत पडतात आणि विषयरूपी पाणी मागत असतात १०.

अल्प‍अल्प देतां तें जळ । कडकडूनि झोंबती प्रबळ ।
‘आम्हांसी फार द्या गा जळ । तृषा केवळ वोळेना’ ॥११॥
बरे, हे पाणी थोडे घोंट घोंट दिले तर ते त्यांना पुरत नाही; ‘आम्हांला पोटभर पाणी द्या हो, एवढ्याने तहान भागत नाही’ ही त्यांची हाकाटी चाललेलीच असते ! ११.

कुपथ्य करितां निरंतर । तंव तो झाला जीर्णज्वर ।
क्षयो लागला जी थोर । क्षीण शरीर पडियेलें ॥१२॥
अशा प्रकारें निरंतर कुपथ्यच करीत असल्यामुळे जीर्णज्वर उत्पन्न होतो. आणि मागाहून क्षयाची भावना होऊन शरीर अगदी क्षीण होऊन जाते १२.

क्षणाक्षणां अतिक्षीणता । विकार संचरले जीविता ।
तेणें प्रबळ वाढली चिंता । सुख सर्वथा बुडालें ॥१३॥
क्षणोक्षणी भयंकर क्षीणता वाढत जाते आणि जिवाला झालेल्या विकारांमुळे मोठी काळजी उत्पन्न होऊन, सुख अगदी नाहींसें होतें १३.

नवल रोगाचा पडिपाडु । गोड परमार्थ तो जाला कडू ।
केवळ विषप्राय विषय कडू । तोचि गोडु पैं झाला ॥१४॥
रोगाचा जोर असा विलक्षण की, गोड परमार्थ तो कडू लागतो आणि विषासारखा कडू जो विषय तो गोड लागतो ! १४.

ते व्याधीचिया उफाडा । देतां सत्कथाकाढा ।
श्रवणमुखींच्या भावार्थदाढा । पाडी पुढां दांतखिळी ॥१५॥
ह्या रोगाचे निर्मुलन करण्यासाठी सत्कथेचा काढा दिला, तर श्रवणरूप तोंडांतल्या भावार्थरूप दाढा मिटून दांतखिळीच बसते (सत्कथा रुचतच नाहीत) १५.

देतां तुलसीमकरंद नसू । वरता जावों नेदी श्वासु ।
मस्तक झाडी मानी त्रासु । रोगें बहुवसु व्यापिला ॥१६॥
तुळशीचा रस आणि मध यांचे नस्य नाकांत घातले तर तो नाकानें ओढून घेत नाहीं; उलट त्याचा त्रास मानून डोके फिरवितो. अशा रीतीनें तो पूर्ण रोगग्रस्त होऊन राहातो १६.

ऐसा रोग देखोनियां गाढा । वैद्य आचार्य धडफुडा ।
कृपा पाहे जयाकडा । तो रोकडा वांचवी ॥१७॥
असा हा जबरदस्त रोग पाहून, सद्‌गुरूरूपी हुशार वै‍द्य पुढे सरसावतो आणि कृपादृष्टीने पाहूनच त्याला तत्काळ बरा करतो १७.

निधडा वैद्य तो सुबुद्धि । जीवु गेलिया मरों नेदी ।
जीवेंवीण वांचवी त्रिशुद्धि । अगाध सिद्धि तयाची ॥१८॥
तो वैद्य ( सद्गुरु ) मोठा बुद्धिमान् असल्यामुळे, रोग्याचा जीव गेला तरी त्याला मरू देत नाही; तो जिवावांचूनच त्याला जिवंत ठेवतो; अशी विलक्षण सिद्धि सद्गुरूची असते १८.

शुद्धभाग्येंकरूनि जाण । तो करी कृपाकूर्मावलोकन ।
तेंचि रोगिया अमृतपान । होय सावधान तत्काळ ॥१९॥
रोग्याचे भाग्य मोठे, म्हणून तो (गुरु) कृपाकूर्मावलोकन (कृपारूप कांसवीचे पाहणे) करतो व तेंच रोग्याला अमृतपानाप्रमाणे होऊन तो तत्काळ सावध (भ्रमरहित ) होतो १९.

एवं झालिया सावधान । रोगी आपणिया आपण ।
नित्यानित्याचें पाचन । करी सेवन साक्षेपें ॥२०॥
अशा रीतीने सावध झाल्यावर, तो रोगी नित्यानित्यविवेकरूपी पाचन अत्यंत सावधगिरीने घेऊ लागतो २०.

तेणें न फिटेचि जीर्णज्वरु । न तुटे क्षयाचा महामारु ।
हें देखोनियां वैद्यसद्‍गुरु । रसोपचारु मांडिला ॥२१॥
परंतु तेवढ्याने त्याचा जीर्णज्वर नाहीसा होत नाही किंवा क्षयांची लक्षणेही कमी होत नाहीत. म्हणून सद्‌गुरु वैद्य त्याला रसोपचार (रसायन ) सुरू करतो २१.

तेणें अक्षररस-अर्धमात्रा । देतां क्षयाचा थारा ।
मोडूनियां शरीरा । पूर्वपरंपरा अक्षय केलें ॥२२॥
त्याने रोग्याला ‘अर्धमात्रारूपी अक्षररस’ (प्रणवाची अर्धमात्रा) देतांच त्याचा क्षयरोग नाहीसा होऊन तो पूर्वीप्रमाणे ‘अक्षय’ (अविनाशी) होतो २२.

दारुण चुकवावया कुपथ्य । वैराग्य राखण ठेविलें नित्य ।
लावूनि अनुसंधानाचें पथ्य । निर्दाळिला तेथ भवरोगु ॥२३॥
रोग्याने भयंकर अपथ्य करूं नये म्हणून त्याजवर वैराग्याची राखण ठेवतो आणि अव्याहत आत्मानुसंधानाचे पथ्य लावून, त्याच्या संसाररूपी रोगाचे निर्मूलन करतो २३.

रोगी उपचारिल्यावरी । प्रबळ क्षुधा खवळे भारी ।
चित्तचिंतेच्या लाह्या करी । क्षणामाझारीं खादल्या ॥२४॥
रोगी साफ बरा झाल्यावर त्याला फार भूक लागते, म्हणून तो मानसिक चिंतेच्या लाह्या करून त्या अधाशीपणाने एका क्षणांत खाऊन टाकतो २४.

काळे गोरे चतुर्वर्णचणे । आश्रमेंसीं भाजिले फुटाणे ।
‘अहं-सोहं’ गुळेंसीं तेणें । निःशेष खाणें तत्काळ ॥२५॥
चार वर्णरूपी काळे पांढरे हरभरे चार आश्रमरूपी अग्नींत भाजून त्याचे फुटाणे करून, ते ‘अहं-सोहं’ रूपी गुळाबरोबर खाऊन फस्त करतो २५,

फळाभिलाषेंसीं आशा- । बोंडें भरलीं होतीं खसखसा ।
तींही खादलीं घसघसां । न लगतां घांसा गिळियेलीं ॥२६॥
फलाभिलाषासह आशेची खसखशीची बोंडे भरलेली होती तीही त्याने खाऊन सोडली २६.

गूळ साखरेचा पडिपाडु । खादले कर्माकर्माचे लाडू ।
खातां न म्हणे गोड कडू । लागला झोडूं स्व‍इच्छा ॥२७॥
गूळसाखरेच्या पाकाप्रमाणे कर्माकर्माचे लाडू, गोड किंवा कडू न म्हणतां, आपल्या इच्छेप्रमाणे तो झोडूं लागला २७.

‘ब्रह्माहमस्मी’ चीं गोमटीं । पक्वान्नें देखिलीं दिठीं ।
तींही खाऊनि उठाउठी । मायेपाठीं लागला ॥२८॥
‘ब्रह्माहमस्मि’ (मी ब्रह्म आहे) या चरमावृत्तीची सुंदर पक्वान्नें त्याच्या दृष्टीस पडली; ती तत्काळ खाऊन तो मायेच्या पाठी लागला २८.

ते धाकें धाकेंचि निमाली । मिथ्यात्वें नासोनि गेली ।
स्वानंदें पुष्टि आली । झाडी केली भवरोगा ॥२९॥
तेव्हा ती धाकाधाकानेंच पळून गेली आणि मिथ्यात्वानेंच नाहीशी झाली. तेव्हा स्वानंदाची पुष्टि आली व संसाररोग अगदी झडून गेला २९.

ऐसा सद्‍गुरु वैद्य गाढा । जेणें उपचारोनि केलों निधडा ।
शरण रिघावें तुजपुढां । तंव चहूंकडां तूंचि तूं ॥३०॥
अशा ज्या तूं कुशल सद्गुरु वैद्याने मला उपचार करून निरोगी केले, त्या तुला मी शरण रिघावे तर चोहीकडे मला तूंच एकटा दिसतोस ३०.

तुजवेगळें आपणियातें । देखोनि शरण यावें तूतें ।
तंव मीतूंपण हारपलें थितें । कैसेनि तूतें भजावें ॥३१॥
तुझ्याशिवाय स्वतःला वेगळे पाहून तुला शरण यावें, तर असलेले मीतूंपणच नाहीसे झाले; तेव्हां आतां तुला भजावें तरी कसे ? ३१.

ज्यांच्या सुटल्या जीवग्रंथी । झाले आत्माराम निश्चितीं ।
तेही अहेतुक भक्ति करिती । प्राप्तांची स्थिति हे जाणा ॥३२॥
ज्यांच्या जीवग्रंथी सुटून जे प्रत्यक्ष आत्माराम झाले, ते देखील तुझी निष्काम भक्ति करतात. पूर्णावस्थेस गेलेल्यांची ही स्थिति होय ३२.

गुरुभजनापरतें सुख । मोक्ष मानिती तेही मूर्ख ।
मोक्ष गुरुचरणींचा रंक । विरळा लोक हें जाणती ॥३३॥
मोक्ष हे गुरुभजनाहून मोठे सुख आहे असे मानतात तेही मूर्ख होत. कारण मोक्ष हा गुरूच्या पायांचा सेवक आहे, हे फारच थोडे लोक जाणतात ३३.

आम्हां सद्‍गुरुदृष्टीं परमारोग्य । आम्ही सद्‍गुरुकृपा सदा श्लाघ्य ।
गुरुसेवें आम्ही सभाग्य । परम योग्य गुरुस्तवनें ॥३४॥
आम्हांला सद्गुरुदृष्टीनेंच परम आरोग्य लाभते. आम्ही सद्गुरुस्तुतीनेंच जगांत नेहमीं पूज्य होतो. गुरुसेवेनेंच आम्ही भाग्यवान् आहों, आणि आमच्या अंगींची योग्यता आम्हांला गुरुस्तुतीनेच प्राप्त झालेली आहे ३४.

सद्‍गुरूचें नाममात्र । तेंचि आम्हां वेदशास्त्र ।
सकळ मंत्रांवरिष्ठ मंत्र । नाम सर्वत्र गुरूचें ॥३५॥
सद्गुरूचें केवळ नाम तेंच आम्हांला वेदशास्त्राप्रमाणे असून, सर्व ठिकाणी, सर्व मंत्रांपेक्षा सद्‌गुरूचें नामच आम्हांला श्रेष्ठ वाटते ३५.

सद्‍गुरूचें तीर्थमात्र । सकळ तीर्थां करी पवित्र ।
गुरुचरण तें आमचें क्षेत्र । वृत्ति स्वतंत्र ते आम्हां ॥३६॥
सद्गुरूचे नुसतें तीर्थ सर्व तीर्थांना पवित्र करते आणि गुरूचे पाय हे आमचे क्षेत्र (शेत ) असून, त्याची स्वतंत्र मालकी आमच्याकडे आहे ३६.

तूं पुरे पुरे म्हणसी स्तवन । परी वर्णितां तुझे उदार गुण ।
अतृप्त सर्वथा नुठी मन । तुझी आण वाहातसें ॥३७॥
‘ही स्तुति आतां पुरे झाली’ असें तूं (सद्गुरो) म्हणशील, पण खरोखर तुझी शपथ घेऊन सांगतों की, तुझे उदार गुण वर्णीत असतां माझ्या मनाची मुळी तृप्तिच होत नाही ३७.

तुझे गुण वर्णावया तत्त्वतां । मी प्रवर्तलों श्रीभागवता ।
त्वां मज लाविलें भक्तिपंथा । निजकथाकीर्तनीं ॥३८॥
खरोखर तुझे गुण वर्णन करावे म्हणूनच मी श्रीभागवतावर टीका करण्यास प्रवृत्त झालों; भक्तिपंथाला आणि आपल्या कथाकीर्तनाला तूंच मला लावलेंस ३८.

जय जय सद्‍गुरु जनार्दना । भवगजपंचानना ।
एकाकी शरण आलों जाणा । तुझ्या श्रीचरणा पावलों ॥३९॥
हे संसाररूप हत्तीचे विदारण करणाऱ्या सिंहा, सद्‌गुरु जनार्दना ! तुझा जयजयकार असो. मी तुला एकीएक शरण आलों व तुझ्या श्रीचरणांप्रत पावलों ३९.

पावलों शास्त्र श्रीभागवत । अवधारा तेथींचा मथितार्थ ।
उद्धवासी श्रीकृष्णनाथ । परम परमार्थ सांगेल ॥४०॥
श्रीभागवतशास्त्र मला गुरुकृपेनें मिळाले, त्यांतला मथितार्थ श्रवण करा. श्रीकृष्ण उद्धवाला परमार्थाचा उपदेश करील ४०.

यदुअवधूतसंवादेंसीं । लक्षणोक्त चोविसां गुरूंसी ।
परिसोनियां उद्धवासी । भावना ब्रह्मेंसीं लिगटली ॥४१॥
यदु आणि अवधूत यांच्या संवादांत आलेली चोवीस गुरूंची लक्षणे ऐकून उद्धवाची भावना ब्रह्ममय झाली ४१.

ब्रह्म सर्वगत सत्य होये । मज सबाह्य कोंदलें आहे ।
तेंचि माझें मज ठाउकें नोहे । कोण उपाये करावा ॥४२॥
ब्रह्म हे सर्व ठिकाणी व्यापक आहे, माझ्या स्वत:च्या ठायींही ते अंतर्बाह्य व्यापून आहे, परंतु हे माझे मलाच अद्याप समजत नाही. तेव्हां ह्याला आता काय उपाय करावें बरें ? ४२.

ऐसी उद्धवाची चिंता । कळों सरली कृष्णनाथा ।
तोचि उपावो सर्वथा । होय सांगता अविरोधें ॥४३॥
ही उद्धवाच्या मनांतली चिंता श्रीकृष्णाला समजली, आणि तोच उपाय अविरोधेकरून, त्याने सांगण्यास आरंभ केला ४३.

श्रीभगवानुवाच – मयोदितेष्ववहितः स्वधर्मेषु मदाश्रयः ।
वर्णाश्रमकुलाचारं अकामात्मा समाचरेत् ॥ १ ॥
[श्लोक १-] श्रीकृष्ण म्हणातात साधकाने सर्व प्रकारे मला शरण येऊन मी सांगितलेल्या आपल्या धर्मांचे सावधपणे पालन करावे निष्काम भावाने आपला वर्ण, आश्रम आणि कूळ यांचेही आचार पाळावेत. (१)

पूर्वीं वेदरूपें वर्णाश्रम । मीचि बोलिलों स्वधर्म ।
पंचरात्रादि वैष्णवधर्म । हें उपासनावर्म गुह्य माझें ॥४४॥
पूर्वी वेदरूपानें वर्णाश्रमादि स्वधर्म मीच सांगितला. नारदपंचरात्रादि ग्रंथांत सांगितलेला वैष्णव धर्म हे माझ्या उपासनेचें गुह्य वर्मही सांगितले ४४.

जो वर्ण जो आश्रम । तेणेंचि ते करावे स्वधर्म ।
आचरतां परधर्म । दुःख परम पाविजे ॥४५॥
ज्यांचा जो वर्ण आणि जो आश्रम असेल त्याने त्या वर्णाश्रमधर्माप्रमाणे वागावे. दुसऱ्याचा धर्म आचरिला असतां मोठे दुःख भोगावे लागते ४५.

उद्धवा येथ जाण । कर्ता पाहिजे सावधान ।
ते सावधानतेचें लक्षण । अतिविचक्षण जाणती ॥४६॥
उद्धवा, येथे ही गोष्ट लक्षात ठेव की, कर्ता जो आहे त्याने सावधपणाने वागले पाहिजे. या सावधानतेची लक्षणे ज्ञाते पुरुष जाणतात ४६.

कर्म चतुर्विध येथ । ‘नित्य’ आणि ‘नैमित्त’ ।
‘काम्य’ आणि ‘प्रायश्चित्त’ । जाण निश्चित विभाग ॥४७॥
येथे कर्म हे चार प्रकारचे आहे:-नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त, हे कर्माचे चार विभाग आहेत ४७.

येथ कर्म आचरती स्थिती । सावधान राखावी वृत्ती ।
आचरावयाची व्युत्पत्ती । विचित्र स्थिती सांगेन ॥४८॥
या कर्माचरणाची स्थिति म्हणजे कर्म करीत असतां वृत्ति सावध राखली पाहिजे. कर्म आचरावयाचें वर्म मी तुला अभिनव प्रकाराने सांगेन ४८.

नित्य आणि नैमित्तिक । हें कर्म जाण आवश्यक ।
सांडोनियां फलाभिलाख । विधिप्रमुख आचरावें ॥४९॥
नित्य आणि नैमित्तिक कर्म अगदी आवश्यक आहे, ते प्रत्येकाला केलेच पाहिजे. तें कर्म, फलाची अपेक्षा न धरितां, यथाविधि आचरावें ४९.

नित्यकर्म अधिक वाढे । तैं नैमित्तिकाचे अंगा चढे ।
काम्य उचंबळलें विषयचाडें । तैंचि पडे ‘निषिद्धी’ ॥५०॥
नित्यकर्म जसजसे वाढत जाते तसतसें नैमित्तिक कर्मही वाढू लागते. मग विषयप्राप्तीच्या इच्छेनें काम्य कर्म उचंबळते तेव्हां तें निषिद्धांत जाऊन पडतें ५०.

फलाभिलाषेंविण । नित्य नैमत्तिक जाण ।
करावें गा कृष्णार्पण । अर्पिती खूण जाणोनि ॥५१॥
ह्याकरितां फलाचा अभिलाष न धरितां नित्य नैमित्तिक कर्म अर्पणाची खूण जाणून कृष्णार्पण करावें ५१.

काम्य कर्म आवश्यक । त्यजावें गा निःशेख ।
जेवीं कां वमिलें वमक । परतोनि लोक न पाहती ॥५२॥
काम्य म्हणजे सकाम कर्माचा निःशेष त्याग केला पाहिजे. ज्याप्रमाणे ओकून टाकलेल्या ओकाकडे लोक ढुंकूनही पहात नाहींत ५२.

समूळीं कामनेतें दंडावें । तैंचि काम्य कर्म सांडावें ।
येर्‍हवीं काम्यत्यागु न संभवे । कामना जीवें राखतां ॥५३॥
कामनाच जेव्हां अजिबात सोडावी, तेव्हांच काम्य कर्माचा त्याग करावा. एरव्ही, मनांत कामना असतांना काम्य कर्माचा त्याग संभवत नाही ५३.

अंतरीं अनिवार कामना । बाह्य विरक्ती दावी जना ।
ते सविया विटंबना । त्यागु विचक्षणा तो नव्हे ॥५४॥
मनांत नानाप्रकारच्या कामनांचा धिंगाणा, आणि बाहेरून मात्र लोकांना विरक्ति दाखवितो, ती सर्वथैव विटंबना होय. हे चतुरा ! त्याला त्याग म्हणता येणार नाहीं ५४.

कामनेचेनि अधिक मदें । कर्में निपजती निषिद्धें ।
समूळ कामनेचेनि छेदें । सर्व निषिद्धें मावळती ॥५५॥
कामना पुष्कळ वाढल्या म्हजे निषिद्ध कर्में घडू लागतात. म्हणून कामनाच समूळ नाहींशी केली, म्हणजे निषिद्ध कर्मे घडण्याचा बिलकुल संभव नाहीं ५५.

अथवा देखतांचि निषिद्ध दिठीं । जो हरिनामें गर्जत उठी ।
निषिद्ध पळे बारा वाटीं । प्रायश्चित्तकोटी हरिनामें ॥५६॥
अथवा, डोळ्यांनी निषिद्ध कर्म पाहतांच जर हरिनामाची गर्जना करीत उठले, तर निषिद्ध कर्मे बारा वाटांनी पळून जातात. हरिनामाच्या योगानें कोटि प्रायश्चित्तांचे श्रेय मिळते ५६.

जेथ हरिनामाचे उमाळे । तेथ निषिद्ध तत्काळ जळे ।
निषिद्ध अभक्तां आदळे । भक्तांजवळें तें न ये ॥५७॥
जेथे हरिनामाचा प्रेमकल्लोळ सुरू असतो, तेथे निषिद्ध तत्काळ जळून जाते. निषिद्ध है अभक्तांच्या अंगाला येऊन आदळतें; भक्तांजवळ ते कधीच येत नाही ५७.

काम्यनिषिद्धाची कथा । भक्तांसी नातळे सर्वथा ।
भगवंतु रक्षी निजभक्तां । दोषु तत्त्वतां त्यां नाहीं ॥५८॥
काम्य-निषिद्धाचा वारा भक्तांना लागत नाही. भगवंत आपल्या भक्तांचे रक्षण करतो, तेथे त्यांना दोषाचा संपर्क कसा लागणार ? ५८.

नामें प्रायश्चित्तांच्या कोटी । हे म्यां सांगितली गुह्य गोठी ।
प्रकट न करावी सृष्टीं । गुप्त पोटीं राखावी ॥५९॥
कोटि प्रायश्चित्तें एका नामोच्चाराने घडतात, ही जी गुप्त गोष्ट मी तुला सांगितली, ती जगांत तूं कोठेही प्रगट करूं नकोस ; पोटांत ठेव ५९.

काम्यनिषिद्धाचे त्याग । तुज म्यां सांगीतले साङ्ग ।
नित्यनैमित्तविभाग । तोही विनियोग परियेसीं ॥६०॥
काम्य व निषिद्ध कर्मांचा त्याग करावा, हे मी तुला खुलासेवार रीतीने सांगितले. आता, नित्य आणि नैमित्तिकांचा कर्मविभाग, त्याचाही प्रकार ऐक ६.

मदर्पणें आवश्यक । करावें नित्यनैमित्तिक ।
तेंचि चित्ताचें शोधक । साधन मुख्य परमार्थी ॥६१॥
ईश्वरार्पणबुद्धीने नित्यनैमित्तिक कर्म अवश्य करावें. तेंच मनाला निर्मळ करणारे असून, परमार्थांचे मुख्य साधन आहे ६१.

एक म्हणती स्वधर्म निर्फळ । वर्म नेणतीच ते बरळ ।
स्वधर्में होय जन्म सफळ । परमार्थफळ स्वधर्मीं ॥६२॥
काही लोक म्हणतात. की, स्वधर्म हा निष्फळ आहे, पण त्या मूर्खांना त्याचे वर्म समजत नाही. स्वधर्माचरणाने जन्माचें साफल्य होते आणि स्वधर्माच्या योगाने परमार्थाचें फळ मिळते ६२.

किडाळ झाडावया दृष्टीं । रज देऊनि पाठींपोटीं ।
सुवर्ण घालितां पुटीं । झळकत उठी निजतेजें ॥६३॥
सोन्यांतील हिणकसपणा नाहींसा करण्यासाठी त्याच्या पत्र्यांना मागे पुढे लेप लावून आगीचे पूट दिले म्हणजे ते शुद्ध होऊन आपल्या तेजानें झळकू लागते ६३.

तैसा मज अर्पितां स्वधर्म । त्याचें सफळ होय निजकर्म ।
ऐसें नेणोनियां निजवर्म । कर्मभ्रम कर्मठां ॥६४॥
त्याप्रमाणे स्वधर्म मला अर्पण केला म्हणजे त्याचे कर्म सफळ होते. हे गुह्य वर्म कर्मठांना माहीत नसल्यामुळे, त्यांना कर्माचा भ्रम मोठा असतो ६४.

मज अर्पिती हातवटी । अवघड वाटेल जगजेठी ।
ज्यासी आवडी माझी मोठी । त्याची दृष्टी मदर्पण ॥६५॥
कर्में मदर्पण करण्याचा प्रकार अवघड वाटेल, पण ज्याला माझी मोठी आवड, त्याची दृष्टीच मदर्पण झालेली असते ६५.

कृष्णीं निश्चळ ज्याचें मन । त्याचें कर्म तितुकें कृष्णार्पण ।
त्यासी न अर्पितांही जाण । सहजें मदर्पण होतसे ॥६६॥
ज्याचे मन कृष्णाच्या ठायीं निश्चल झाले, त्याचे सर्व कर्म कृष्णार्पणच होते. त्याने जरी ते मला अर्पण केले नाही, तरी ते सहजच मला अर्पण होते ६६.

जो रथीं निश्चळ होऊनियां बैसे । तो न चळतांही चालतु दिसे ।
जाण स्वकर्म त्याचें तैसें । अनायासें मज अर्पे ॥६७॥
जो रथांत निश्चल होऊन बसलेला असतो, तो जाग्यावरून न हालताही चालल्यासारखा दिसतोच. त्याचप्रमाणे त्याचे (भक्ताचें) स्वकर्म अनायासाने मला अर्पण होते ६७.

यापरी होऊनि अकामात्मा । सुखें आचरावें स्वधर्मा ।
तेणें सांडूनि रजतमा । सत्त्वें पुरुषोत्तमा पावती ॥६८॥
ह्याप्रमाणे निष्काम होऊन सुखाने स्वधर्माचरण करावे. त्याच्या योगाने रजतमाला सांडून, सत्त्वाच्या योगानें पुरुषोत्तमाला पावतात ६८.

वर्णाश्रमसमुद्‍भवा । मूळ आश्रयो मी वोळखावा ।
कुळकर्मनिजस्वभावा । उपासावा मी एकु ॥६९॥
वर्ण आणि आश्रम यांच्या उत्पत्तीला मूळ आधार जो मी त्या मला ओळखावे. आपल्या स्वभावानुसार कुलधर्माने माझी एकट्याचीच उपासना करावी ६९.

वर्णासी आश्रयो मी प्रसिद्ध । जे जन्मले मुखबाहूरुपाद ।
आश्रमा आश्रयो मी विशद । गर्जती वेद ये अर्थीं ॥७०॥
वर्णाला मीच आश्रयभूत आहे. ‘ब्राह्मणोऽस्य मुखमासीद्‌बाहू०’ हे वचन प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे आश्रमांची उत्पत्तिही मजपासूनच असल्याचे वेद गर्जना करून सांगत आहेत ७०.

देवो देवी कुळाचार । यांचें वस्तीचें मी घर ।
एवं मी सर्वाधार । हा कर्मी विचार देखावा ॥७१॥
देव, देवी आणि कुळाचार यांच्या वस्तीचे घर मी आहे. ह्याप्रमाणे मी सर्वांचा आधार आहे, हा विचार कर्मांत पहावा ७१.

गुज परियेसीं उद्धवा । कर्माकर्माध्यक्षु मी जाणावा ।
कर्मी मीचि अभिलाषावा । क्रियेनें धरावा मी एकु ॥७२॥
उद्धवा, तुला मी गुह्य सांगतों तें ऐक, सर्व कर्मांचा अध्यक्ष मी आहे असे समजावें, व कर्म करतांना माझाच अभिलाष धरावा, आणि क्रियेनेंही माझी एकट्याचीच धारणा धरावी ७२.

एवं आदि-मध्य-अंतीं । मी अविनाशु धरितां चित्तीं ।
तीं कर्मेंचि निष्कर्में होतीं । जाण निश्चितीं उद्धवा ॥७३॥
याप्रमाणे कर्माच्या आदीं, अंती आणि मध्यभागी, अविनाश जो मी, त्या मला चित्तांत ठेविलें असतां, ती कर्मेंच निष्कर्में होतात, हे तूं उद्धवा ! अगदी निश्चित समज ७३.

अन्वीक्षेत विशुद्धात्मा देहिनां विषयात्मनाम् ।
गुणेषु तत्त्वध्यानेन सर्वारंभविपर्ययम् ॥ २ ॥
[श्लोक २] स्वधर्माचरणाने ज्याचे चित्त शुद्ध झाले आहे, त्याने विषयांमध्ये आसक्त झालेले लोक विषयांना सत्य मानून सुखासाठी जी कर्मे करतात, त्या कर्मांचा परिणाम दुःखदायक होतो, ही गोष्ट नीट ध्यानात घ्यावी. (२)

यापरी स्वधर्में जाण । ज्यांचें विशुद्ध अंतःकरण ।
ते विषयीं उदासीन । हें वोळखण तयांचे ॥७४॥
ह्याप्रमाणे, स्वधर्माच्या योगाने ज्यांचे अंतःकरण अगदी शुद्ध झालेले असते, त्यांना ओळखण्याची खूण ही की, विषयासंबंधाने ते उदासीन असतात ७४.

तयांसी विषयाची आस्था । नाहीं नाहीं गा सर्वथा ।
परी सर्वार्थविपरीतता । विषयासक्तता देखती ॥७५॥
त्यांना विषयाची आस्था बिलकुल नसते; परंतु विषयासक्त लोकांना आपल्या विषयासक्ततेमुळे सगळीच कर्में विपरीत दिसू लागतात ७५.

भरलीं मृगजळाचीं तळीं । तेणें न पिकती साळी केळी ।
तैसी विषयबुद्धी जवळी । स्वसुखफळीं फळेना ॥७६॥
मृगजळाची तळीं भरलेली असली तरी त्यांनी कांही भात व केळी पिकणार नाहीत. त्याप्रमाणे विषयलंपट बुद्धिच ज्यांच्याजवळ आहे, त्यांना आत्मसुखाची फळें कधीही मिळावयाची नाहींत ७६.

पाहें पां विषयासक्त । कर्मारंभीं संकल्प करित ।
आयुःकामार्थ क्षेमार्थ । धनधान्यार्थसमृद्धी ॥७७॥
हे पहा ! विषयासक्त असतात ते ‘आयुःकामार्थ’-आयुष्याची वृद्धि व्हावी, व मनोरथांची सिद्धि व्हावी- ‘क्षेमार्थ’-माझें निरंतर कल्याण व्हावें- ‘धनधान्यार्थ-समृद्धि’- धनधान्याची समृद्धि व्हावी- असा कर्मांच्या आरंभालाच संकल्प करीत असतात ७७.

या हेतू कर्म आरंभित । तें स्वकर्म नव्हे निश्चित ।
स्वधर्ममिषें मनोरथ । उपासित सर्वदा ॥७८॥
ह्याच हेतूनें कर्माला आरंभ करीत असल्यामुळे ते कांहीं खरें स्वकर्म होत नाही. तर स्वधर्माच्या निमित्ताने ते सदासर्वदा मनोरथाचीच उपासना करीत असतात ७८.

बैलाची कांस दुहितां । शिंपीभरी दूध न ये हाता ।
तेवीं मनोरथ उपासितां । न लभे सर्वथा ‘निजसुख’ ॥७९॥
बैलाची कास पिळू लागले तर शिंपलीभरसुद्धा दूध हाताला येत नसते; त्याप्रमाणे मनोरथाची उपासना केल्याने आत्मसुख मुळीच प्राप्त होत नाहीं ७९.

एवं कर्मचि तें कर्म नव्हे । केल्याही सिद्धी न पवे ।
तें विघ्नबाहुल्यें नाश पावे । विघ्न संभवे देवांचें ॥८०॥
अशा प्रकारचे कर्म तें कर्मच नव्हे ; व ते केल्यानें सिद्धीही होत नाही. त्यात अनेक विघ्ने येऊन ते नाश पावते. शिवाय देवांचे विघ्न येण्याचाही संभव असतो ८०.

विषयसेवनीं आहे सुख । या बुद्धीं शिणशिणोनि मूर्ख ।
पावले परम दुःखें दुःख । मुख्य याज्ञिक घालूनि ॥८१॥
विषयसेवनामध्ये सुख आहे अशा बुद्धीनें, ते मिळवून देणारे यज्ञकर्मच श्रेष्ठ आहे असे मानून मूर्ख लोक कष्ट कर करून अतोनात दुःख पावतात ८१.

वेदत्रयी जाणूनि सकळ । यज्ञकर्मी अतिकुशळ ।
वांछितां स्वर्गादिक फळ । पतन केवळ अधोमुखें ॥८२॥
सगळे तीन वेद जाणून यज्ञकर्मात अत्यंत कुशल झालेले लोक स्वर्गादि फलांची इच्छा करून खाली तोंड करून पतन पावतात ८२.

ऐसेनि विवेकें निपुणदृष्टी । जो स्वर्गु नेघे तृणासाठीं ।
वैराग्य लागे त्यापाठीं । उठाउठी घर रिघे ॥८३॥
अशा विवेकानें दृष्टि प्रगल्भ होउन जो स्वर्गाला तृणवत् मानून त्याचा स्वीकार करीत नाही, त्याच्या पाठीस वैराग्य लागते, ते त्याच्या घरांत लगबगीनें घुसतेच ८३.

तो वैराग्याचें माहेर । विश्रांतीचें विसावतें घर ।
तो नररूपें साचार । ‘विवेकु’ साकार पैं झाला ॥८४॥
तो वैराग्याचे केवळ माहेर ; विश्रांतीच्याही विसाव्याचें घर ; इतकेच नव्हे, तर विवेकच त्या पुरुषाच्या रूपाने साकार झाला म्हणून समजावें ८४.

ऐसेनि विवेकें विवेकदृष्टी । स्वर्गादि विषय मिथ्या सृष्टी ।
ते मिथ्यात्वाची गोठी । ऐक जगजेठी उद्धवा ॥८५॥
अशा विवेकाने बनलेल्या विवेकदृष्टीने पाहिले म्हणजे स्वर्गादि विषयही मिथ्यासृष्टि असल्याचे कळून येते. हे जगच्छ्रेष्ठ उद्धवा ! त्या मिथ्यात्वाचे निरूपण आतां ऐक ८५.

सुप्तस्य विषयालोको ध्यायतो वा मनोरथः ।
नानात्मकत्वाद् विफलः तथा भेदात्मधीर्गुणैः ॥ ३ ॥
[श्लोक ३] जसे झोपलेला माणूस स्वप्नामध्ये अनेक विषय पाहातो किंवा जागेपणी मनाने ज्या विषयांचे चिंतन करतो, ते सर्व इंद्रियांनी दिसणारे व अनेक असल्यामुळे खोटेच आहेत, हे समजते, तसेच इंद्रियांच्याद्वारे बाहेरील विषयांत जाणवणारी भेदबुद्धीसुद्धा खोटीच आहे. (३)

स्वप्न आणि मनोरथ । मनोमात्र-विलासित ।
ते निद्रितासी सत्य पदार्थ । मिथ्या होत जागृतीं ॥८६॥
स्वप्न आणि मनोरथ हे दोन्ही मनाचेच खेळ आहेत. निद्रिताला ते खरेच असे वाटतात; पण जागृतींत आल्यावर तेच खोटे वाटू लागतात ८६.

तैसें कामनेचेनि उल्हासें । इंद्रियांचेनि सौरसें ।
उभय भोगपिसें । नाथिलें वसे बुद्धीसी ॥८७॥
त्याप्रमाणे कामनेच्या उल्हासाने आणि इंद्रियांच्या आसक्तीने इहलोकच्या आणि परलोकच्या भोगाचे खोटेंच वेड बुद्धीने घेतलेले असते ८७

शिंपी शिंपपणें असे । धनलोभ्या रुपें भासे ।
तेवीं विषयाचेनि अभिलाषें । भेदपिसें नसतेंचि ॥८८॥
शिंपी ही शिंपीपणानेंच असते, तरी द्रव्यलोभ्याला तेंच रुपे आहे असा भास होतो; त्याप्रमाणे विषयाच्या अभिलाषानेंही नसलेलेच भेदाचें पिसें ह्याला लागते ८८.

स्वप्नीं देखिलें आत्ममरण । जागृतीं मिथ्या म्हणे आपण ।
तैसा स्वरूपीं जागा झाल्या जाण । जन्ममरण त्या नाहीं ॥८९॥
स्वनामध्ये आपणच मेल्याचे पाहातों, आणि जागे झाल्यावर ते खोटे असे आपणच म्हणतो; त्याप्रमाणे आत्मस्वरूपामध्ये जागृति झाली म्हणजे त्याला जन्ममरण दिसतच नाही ८९.

जंववरी भेदाची भेदसिद्धी । तंववरी जन्ममरण बाधी ।
भेदु मिथ्या झालिया त्रिशुद्धी । अभेदीं बाधी तें नाहीं ॥९०॥
जीव आणि शिव भेद जोपर्यंत कायम असतो, तोपर्यंत जन्ममरणाची बाधा असते. तो भेदच निश्चितपणे मिथ्या ठरला म्हणजे अद्वैतामध्ये ती बाधा नाहीं ९०.

तो भेदु कैसेनि तुटे । निजस्वरूप कैसेनि भेटे ।
ते अर्थी साधन गोमटें । ऐक चोखटें विभागें ॥९१॥
तो भेद कशाने नाहीसा होतो, स्वस्वरूपाची भेट कशानें होते, त्याला एक उत्तम साधन सांगतो ते चांगल्या प्रकारें ऐक ९१.

निवृत्तं कर्म सेवेत प्रवृत्तं मत्परस्त्यजेत् ।
जिज्ञासायां संप्रवृत्तो नाद्रियेत् कर्मचोदनाम् ॥ ४ ॥
[श्लोक ४] ईश्वरपरायण मनुष्याने नित्यनैमित्तिक कर्मांचेच आचरण करावे सकाम कर्मे कधीही करू नयेत जेव्हा तो आत्मज्ञानासाठी प्रयत्‍नशील होईल, तेव्हा तर नित्य कर्माचीही फिकीर करू नये. (४)

चित्तीं वासनांचे मळ । तेणें भेदु भासे सबळ ।
तो नाशावया चित्तमळ । कर्म निर्मळ सेवावें ॥९२॥
चित्तामध्ये वासनांचे मळ असतात, त्यामुळे हा भेद सबळ वाटतो. ते चित्तांतील मळ काढून टाकण्याकरितां निर्मळ कर्म करीत रहावें ९२.

मागां सांगीतलें निश्चित । जें कां नित्यनैमित्य ।
तेंचि कर्म गा ‘निवृत्त’ । साधकीं प्रस्तुत सेवावें ॥९३॥
पूर्वी जे नित्यनैमित्तिक कर्म म्हणून निश्चितपणे सांगितले आहे, त्यालाच ‘निवृत्त’ कर्म असे म्हणतात. तसले कर्म साधकांनी करावें ९३.

जो प्रवर्तला माझ्या भजनीं । तेणें ‘काम्य’ सांडावें निपटूनी ।
हें मागां सांगितलें विवंचूनि । कामना मनीं न धरावी ॥९४॥
जो माझ्या भजनी लागला, त्याने काम्यकर्म निखालस सोडून द्यावे. मनांत कोणतीही कामना बाळगूं नये. हे पूर्वीही विवरण करून सांगितलेच आहे ९४.

धरोनि मदर्पणाचें बळ । ‘नित्य’ आचरतां निर्मळ ।
चित्ताचे चैत्य-मळ । जाती तत्काळ नासोनि ॥९५॥
प्रत्येक कर्म मला अर्पण करण्याचे पाठबळ घेऊन निरंतर निर्मळ कर्माचे आचरण केले असतां चित्ताचे मळ तत्काळ नाश पावतात ९५.

कृषीवळु करी शेतासी । यथार्थ द्रव्य दे राजयासी ।
तो न भी ग्रामकंटकांसी । तेवीं कृष्णार्पणेंसीं होतसे ॥९६॥
शेतकरी शेत पेरतो, आणि सरकारचा योग्य धारा सरकाराला देऊन टाकतो. गांवकुटाळांना तो मुळीच भीत नाही. कृष्णार्पणानेंही तसेंच होते ९६.

जाहल्या चित्तमळक्षाळणें । नित्यविवेकु उपजे तेणें ।
इहामुत्रां लाता हाणे । अनित्य त्यजणें वैराग्यें ॥९७॥
चित्तांतील सारे मळ धुऊन गेले म्हणजे ‘नित्य’ वस्तूचा विचार मनांत उद्‌भवतो आणि इहपरलोकच्या सुखावर लाथ मारून वैराग्याने ‘अनित्याचा’ त्याग करतो ९७.

एवं वैराग्य झालिया अढळ । तेणें सत्त्व होय प्रबळ ।
तेव्हां मज जाणावया केवळ । वृत्ति निर्मळ ते काळीं ॥९८॥
अशा प्रकारे वैराग्य अढळ झाले म्हणजे त्याच्या योगाने सत्वगुण वाढतो. तेव्हांच मला जाणण्याइतकी वृत्ति निर्मळ होते ९८.

करितां माझीं चिंता । कामक्रोध नाठवती चित्ता ।
थोर लागली माझी अवस्था । न राहे सर्वथा अणुभरी ॥९९॥
माझे चिंतन करूं लागले असतां चित्ताला कामक्रोधाची आठवणही होत नाही. त्याला माझा अतिशय ध्यास लागून राहिलेला असतो. तो क्षणभरही माझ्या चिंतनावांचून राहात नाही ९९.

हो कां ऐशिये अवस्थेसी । कर्मक्रिया नावडे ज्यासी ।
तेणें संन्यासूनि सर्व कर्मांसी । ब्रह्मज्ञानासी रिघावें ॥१००॥
अशा चित्ताच्या अवस्थेत ज्याला कर्मक्रिया आवडत नाहीशी होते, त्याने सर्व कर्मांचा संन्यास करून ब्रह्मज्ञानांत शिरावें १००.

श्रवण मनन करितां । कर्मासी झालिया विगुणता ।
बाधक नव्हे माझ्या भक्तां । कर्मकिंकरता त्यां नाहीं ॥१॥
श्रवणमनन करीत असतांना कर्मांत काही वैगुण्य आले, तर ते माझ्या भक्तांना बाधक होत नाही. कारण, कर्म-किंकरता त्यांना नसते. १.

स्वधर्म केलिया फळ काये । चित्ताचा मळमात्र जाये ।
भक्तु भजनें निर्मळ आहे । बाधूं न लाहे स्वकर्म ॥२॥
स्वधर्म केल्यापासून फळ काय ? तर त्याने चित्ताचा मळ मात्र जातो. परंतु माझा भक्त हा भजनानेच निर्मळ होत असल्यामुळे स्वकर्म त्याला बाधक होत नाही २.

एवं कर्माची चोदना । मद्‍भक्तासी नाहीं जाणा ।
करितां श्रवणकीर्तना । कर्मबंधना नातळती ॥३॥
तात्पर्य, माझ्या भक्तांना कर्माची आज्ञा लागू होत नाही. कारण, ते श्रवणकीर्तन करीत असल्यामुळे कर्मबंधनांत सांपडत नाहींत ३.

ऐशिया जिज्ञासावस्थेसी । कर्मबाधा नाहीं त्यासी ।
मुख्य तात्पर्य ब्रह्मज्ञानासी । हेंचि उद्धवासी सांगतु ॥४॥
असे जे जिज्ञासावस्थेमध्ये असतात, त्यांना कर्मापासून बाधा होत नाही. मुख्य तात्पर्य ब्रह्मज्ञानसंपादनाकडे असते, हेच उद्धवाला भगवान् सांगतात ४.

यमान् अभीक्ष्णं सेवेत नियमान् मत्परः क्वचित् ।
मदभिज्ञं गुरुं शांतं उपासीत मदात्मकम् ॥ ५ ॥
[श्लोक ५] माझ्या भक्ताने अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह या यमांचे पूर्णपणे पालन करावे शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वरप्रणिधान या नियमांचे आत्मज्ञानाला अडथळा येत नसेल तर यथाशक्ति पालन करावे मला जाणणार्‍या शांतस्वरूप गुरूंजवळ जाऊन त्यांना माझेच स्वरूप समजून त्यांची सेवा करावी. (५)

होआवया वृत्तीचा उपरम । अहिंसा-सत्यादि धर्म ।
आचरावे अविश्रम । बाह्य नेम अविरोधें ॥५॥
वृत्तीचा उपरम होण्यासाठी अहिंसा, सत्य, इत्यादि धर्म बाह्य नियमाला विरोध न येईल अशा रीतीनें अविश्रांत आचरण करावेत ५.

आचरतां अहिंसा-सत्यादिकांसी । तंव तंव दशा उजळे कैसी ।
अतिप्रीति गुरुभक्तीसी । अहर्निशीं गुरु चिंती ॥६॥
अहिंसा- सत्यादिकांचे आचरण करीत असता त्याची स्थिति अशी काही उज्ज्वल होते की, गुरुभक्तीवर त्याचे अत्यंत प्रेम जडतें, तो रात्रंदिवस गुरूचेंच चिंतन करूं लागतो ६.

सद्‍गुरूवीण ब्रह्मज्ञान । सर्वथा नव्हे नव्हे जाण ।
हें उपनिषदर्थें प्रमाण । परम निर्वाण साधिलें ॥७॥
कारण, सद्गुरूशिवाय ब्रह्मज्ञान कधीच प्राप्त व्हावयाचे नाही, असे प्रमाण उपनिषद्वाक्यांनी अखेरचा निर्णय म्हणून सांगून दिले आहे ७.

डोळा देखणाचि आहे । त्यासी सूर्य नव्हतां साह्ये ।
सिद्ध पदार्थ देखों न लाहे । स्तब्ध राहे अंधारीं ॥८॥
डोळ्याला चांगले दिसत आहे, पण त्याला जर सूर्याचे साहाय्य नसेल, तर पुढे असलेला पदार्थ त्याला पहातां येणार नाही. तो अंधारांतच स्तब्ध राहील ८.

नाव तारी हे साचार । माजीं बैसले थोर थोर ।
परी तारकेंवीण परपार । समर्थ नर न पावती ॥९॥
नावच तारते ही गोष्ट खरी आहे, तिच्यांत थोरथोर लोक बसले आहेत, परंतु त्या थोर लोकांना नावाडी असल्याशिवाय काही पलीकडे जातां यावयाचें नाहीं ९.

पर्जन्यें भूमी मार्दवा आली । बीजें कणिंग असे भरली ।
परी ज्ञातेन पेरणी नाहीं केली । तंव पिकाची बोली पोंचट ॥११०॥
पावसाने जमिनीला ओल आली; आणि बियाने कणगी भरलेली असली, तरी तज्ज्ञ मनुष्यानें पेरणी केली नाही, तोपर्यंत पिकाची गोष्ट व्यर्थ आहे ११०.

रत्‍न सांपडलें अवचितें । परी खरें खोटें संषय तेथें ।
रत्‍नपारखी करी मोलातें । अतियत्‍न त्यातें मग करिती ॥११॥
अकस्मात् एखादें रत्न सापडतें पण ते खरे की खोटें असा संशय उत्पन्न होतो. तेथें रत्नपरीक्षक येऊन त्याचे मोल करतो, तेव्हा मग ते मिळविण्याविषयी लोक खटपट करतात ११.

तैसें निजस्वरूप आइतें । श्रद्धा-सद्‍गुरूचेनि हातें ।
खरें करूनियां ज्ञाते । निजसुखातें पावले ॥१२॥
त्याप्रमाणे आत्मस्वरूप हे आयतेंच हातांत असते, त्याला श्रद्धापूर्वक सद्गुरूच्या हाताने खरें करून घेउन, ज्ञाते आत्मसुखाला पात्र होतात १२.

साधावया निजज्ञान । करितां सद्‍गुरूचें सेवन ।
निवाले संत सज्जन । आनंदघन सद्‍गुरु ॥१३॥
आत्मज्ञान संपादन करण्याकरितां सद्‌गुरूची सेवा करून संत सज्जन शांत होतात. कारण सद्गुरु हा आनंदघन असतो १३.

म्हणसी साधनें केलीं अनेक । तैसें सद्‍गुरूही साधन एक ।
म्हणतां मुमुक्षु झाला मूर्ख । निजात्मसुख बुडालें ॥१४॥
पण तूं म्हणशील की, अनेक साधनें केली, त्यांतलें गुरु हें एक साधन असेल. पण असे जर मुमुक्षु म्हणेल तर तो मूर्ख होईल. त्याचे निजात्मसुख बुडून जाईल १४.

सद्‍गुरु केला तो साधन । त्याहूनि परतें साध्य आन ।
म्हणतां आली नागवण । नागवला जाण सर्वस्वें ॥१५॥
सद्गुरु केला. तो एक साधनरूप आहे; आणि साध्य त्याहून वेगळेच आहे, असे म्हटले की नागवण झाली. तो सर्वस्वी नागवला म्हणून समजावें १५.

जो चित्सुखें सदा संपन्न । चिद्रूपें ज्यासी समाधान ।
तो चिन्मात्राहोनि भिन्न । नव्हे जाण सर्वथा ॥१६॥
जो चित्सुखाने सदा संपन्न, चित्स्वरूपाने ज्याला समाधान, तो चिन्मात्राहून भिन्न केव्हांच असणार नाही. १६.

लवण सागरीं रिघालें । तेव्हांचि तें समुद्र झालें ।
दीपें वणवया आलिंगिलें । वणवाचि झालें तें तेज ॥१७॥
कारण मीठ समुद्रात पडते, तेव्हांच तें समुद्र होते; दीप वणव्याला आलिंगन देतो, तेव्हांच ते दीपतेज वणवा होऊन राहते १७.

एवं चिद्रूपाचें ज्यासी ज्ञान । तो चिद्रूपचि सत्य संपूर्ण ।
गुरु ब्रह्म अभिन्न जाण । ये अर्थीं प्रमाण उपनिषदें ॥१८॥
त्याप्रमाणे चिद्‌रूपाचें ज्याला ज्ञान होते, तो परिपूर्ण चिद्‌रूपच बनतो. त्याप्रमाणे गुरु आणि ब्रह्म भिन्न नव्हते, ह्याविषयी उपनिषदच प्रमाण आहे १८.

हो कां घृताची पुतळी । नव्हतां घृतपणावेगळी ।
घृतरूपें रूपा आली । तैसी मूर्ती झाली सद्‍गुरूची ॥१९॥
किंवा तुपाची बाहुली केली, तर ती तुपाहून भिन्न न होता, तुपाच्याच रूपाने आकाराला आलेली असते; त्याप्रमाणेच सद्गुरूची मूर्तिही (चिद्‌रूपत्वानेच साकार) झालेली असते (अर्थात् ब्रह्मरूपच असते) १९.

तो चित्सुखाचा पुतळा । कीं सच्चिदानंदाचा सोहळा ।
प्रत्यक्ष देखावया डोळां । धरी लीलाविग्रहो ॥१२०॥
केवळ चित्सुखाचा पुतळा, किंवा सच्चिदानंदाचा सोहाळा प्रत्यक्ष डोळ्यांनी पहावा म्हणून लीलेनेंच त्याने देह धारण केलेला असतो २०.

त्याची होआवया भेटी । पाहिजेति भाग्याचिया कोटी ।
हे बोलणेंवरी दिसे दिठी । तैसी गोठी ते नाहीं ॥२१॥
त्याची भेट व्हावयाला कोटि भाग्य पदरी पाहिजेत. असें बोलतां बोलतां तो दृष्टीस पडेल अशांतलीही गोष्ट नाही २१.

सद्‍गुरु जेउती वास पाहे । तेउती सुखाची सृष्टी होये ।
तो म्हणे तेथ लवलाहें । महाबोधु राहे स्वानंदें ॥२२॥
सद्गुरु जिकडे दृष्टि फेंकतो, तिकडे सुखाचीच सृष्टि उत्पन्न होते. तो म्हणेल तेथे महाबोध स्वानंदाने राहतो २२.

त्या सद्‍गुरूचे देखिल्या पाये । तहानभूक तत्काळ जाये ।
कल्पना उठोंचि न लाहे । निजसुख आहे गुरुचरणीं ॥२३॥
त्या सद्गुरूचे पाय पाहिले की, तहान-भूक तत्काळ नाहीशी होते. कल्पना तर उठूच शकत नाही. तात्पर्य, गुरूच्या चरणीं निजसुख असते २३.

त्या सद्‍गुरूचें लक्षण । सांगतां शब्दुं थोंटावे जाण ।
जो सनातन ब्रह्म पूर्ण । ऊणखूण त्या नाहीं ॥२४॥
त्या सद्गुरूचे लक्षण सांगतांना शब्दच खुंटून जातात. जो सनातन पूर्णब्रह्मच आहे, त्याला ऊणखूण कशाची ? २४.

तर्‍ही स्फुरली एकी स्फूर्ती । त्यासी सर्वार्थी दिसे शांती ।
शांतीवेगळी उपपत्ती । प्रमाण निश्चिती रिघेना ॥२५॥
तथापि एक खूण सांगण्याची स्फूर्ति होते. ती ही की, त्याच्या ठिकाणी सर्वतोपरी शांति मात्र दिसते. शांतीशिवाय दुसरे प्रमाण निश्चित असें कांहींच दिसत नाही २५.

शांति तेचि समाधान । शांति तेचि ब्रह्मज्ञान ।
शांती तेचि ब्रह्म पूर्ण । सत्य जाण उद्धवा ॥२६॥
उद्धवा ! शांति तेच समाधान होय. शांति तेच ब्रह्मज्ञान होय; आणि शांति तेच खरोखर पूर्णब्रह्म होय असें तूं निश्चित समज २६.

ऐसी सद्‍गुरूची स्थिती । ऐकोनि शिष्याच्या चित्तीं ।
वाढली अतिप्रीती । गुरुभक्तीलागोनी ॥२७॥
सद्गुरूची अशी स्थिति ऐकून शिष्याच्या मनांत गुरुभक्तीविषयी अधिक प्रेम वाढलें २७.

यालागीं गुरुगवेषणा । उसंतु घेवों नेदी अंतःकरणा ।
अष्टौ प्रहर विचक्षणा । गुरुलक्षणा लक्षितु ॥२८॥
म्हणून तो गुरूच्या शोधाला लागला. त्याचे अंतःकरण त्याला विसावा घेऊ देईना. अष्टौप्रहर गुरुलक्षणाचेच चिंतन तो करूं लागला २८.

कैं तो स्वामी देखेन ऐसा । कैं हा माझा फिटेल फांसा ।
कैं उपरमु होईल मानसा । सद्‍गुरुपिसा तो झाला ॥२९॥
त्या सर्वसमर्थाला मी केव्हां पाहीन ? हा माझा पाश केव्हां सुटेल ? मनाला शांति कधी येईल ? असा तो सद्गुरूसाठी वेडा होऊन गेला २९.

आयुष्य वेंचतें उठाउठी । अझूनि नव्हे सद्‍गुरूसी भेटी ।
झाल्या मनुष्यदेहासी तुटी । सर्वस्व शेवटीं बुडेल ॥१३०॥
हें आयुष्य बघता बघतां संपत आले, अजून मला सद्गुरूची भेट होत नाहीं; मनुष्यदेह निघून गेला म्हणजे सारेंच बुडेल ( असें त्याला वाटू लागलें ) १३०.

ऐकतां गुरूचें नांव । मनापुढें घेत धांव ।
ते गोठीसीच देत खेंव । येवढी हांव जयाची ॥३१॥
गुरूचे नुसते नांव ऐकलें तरीसुद्धा मनाच्या पुढे तो धावूं लागतो; आणि त्या वार्तेलाच मिठी मारून बसतो. इतकी त्याची आतुरता वाढते ३१.

सद्‍गुरु प्रत्यक्ष न भेटतां । मनेंचि पूजी गुरुनाथा ।
परमादरें पूजा करितां । प्रेम तत्त्वतां न संटे ॥३२॥
सद्गुरु प्रत्यक्ष भेटला नाही तर मनानेच गुरुनाथाची पूजा करतो आणि परमभक्तीने पूजा करतांना त्याला एवढे प्रेम उचंबळते की, ते हृदयांत मावत नाही ३२.

सद्‍गुरु भेटावयाकारणें । हिंडे तीर्थें तपोवनें ।
गुरु न विसंबे मनें । नित्यविधानें आचरतां ॥३३॥
सद्गुरूची भेट व्हावी म्हणून तो तीर्थे आणि तपोवनें हिंडत असतो. नित्यकर्में करीत असतांही मनांतून एक क्षणभरसुद्धा गुरूला विसंबत नाही ३३.

सद्‍गुरुप्राप्तीचिया काजा । लहानथोरांची करी पूजा ।
अत्यादरें मानी द्विजा । गुरु मज माझा भेटावा ॥३४॥
सद्गुरूची प्राप्ति व्हावी म्हणून तो लहान थोरांची पूजाच करीत सुटतो. माझा गुरु मला भेटावा म्हणून तो ब्राह्मणांचा अतिशय सत्कार करतो ३४.

अस्वलाचिया परी । गुरुनामाचा जप करी ।
गुरुवांचोनि निरंतरीं । चिंता न करी आनाची ॥३५॥
तो अस्वलासारखा ‘गुरु गुरु’ असा सारखा जपच करीत असतो. निरंतर गुरुवांचून दुसऱ्या कशाचेही तो चिंतन करीत नाही ३५.

आसनीं भोजनीं शयनीं । गुरूतें न विसंबे मनीं ।
जागृतीं आणि स्वप्नीं । निदिध्यासनीं गुरु केला ॥३६॥
बसतांना, जेवतांना, निजतांना, मनांतून गुरूला विसंबत म्हणून नाही. जागृतींत व स्वप्नांत सुद्धा त्याला गुरूचा निदिध्यास लागून राहिलेला असतो ३६.

गुरुस्मरण करितां देख । स्मरणें विसरे तहानभूक ।
विसरला देहगेहसुख । सदा संमुख परमार्था ॥३७॥
पहा ! गुरूचे नुसते स्मरण केले, तरी सुद्धा त्या स्मरणाने तहान-भूक विसरून जाते. तो घरादाराच्या सुखालाही विसरून जाऊन सदासर्वदा परमार्थाच्याच सन्मुख असतो ३७.

ऐसी सद्‍गुरूची आवडी । ज्याची आस्था चढोवढी ।
त्यासी गुरुरूपें तांतडी । भेटी रोकडी मी देतों ॥३८॥
अशी सद्गुरूची ज्याला आवड असते, ज्याची आस्था चढाओढीने वाढतच जाते, त्याला तत्काळ गुरूच्या रूपानें मीच प्रत्यक्ष भेट देतों ३८.

जंव जंव आस्था अधिक । तंव तंव भेटीची जवळिक ।
साधनांमाजीं हें साधन मुख्य । आस्थाचि एक विशेष ॥३९॥
उत्कंठा जितकी जितकी अधिक, तितकी तितकी भेटही जवळ. साधन-सामग्रीमध्ये ‘विशेष उत्कंठा’ हेच एक मुख्य साधन आहे ३९.

करितां वरिष्ठसाधनकोडी । बोधाची जोडेना कवडी ।
सद्‍गुरुभजनाची अर्ध घडी । जोडी कोडी बोधाच्या ॥१४०॥
जरी कोट्यवधि मोठमोठी साधने केली, तरी आत्मज्ञानाची कवडीसुद्धा हाती लागावयाची नाही. पण सद्गुरूच्या भजनांत अर्ध-घटका जरी खर्च केली, तरी आत्मज्ञानाची रासच्या रास पदरांत पडेल १४०.

सद्‍गुरुभजनीं लागवेगें । मोक्ष येऊनि पायां लागे ।
गुरुभक्त तोही नेघे । चरणरंगें रंगला ॥४१॥
सद्गुरूच्या भजनीं लागले की, मोक्षही येऊन पायाला लागतो. पण गुरूचा भक्त त्याचाही स्वीकार करीत नाही. कारण तो चरणसेवेतच रंगून गेलेला असतो ४१.

श्रीगुरुचरणाची गोडी । विसरली मोक्षसुखाच्या कोडी ।
गुरुभजनीं जयां अनावडी । ते संसार बांदवडीं पडियेले ॥४२॥
श्रीगुरुचरणाची गोडी अशी असते की, ती मोक्षसुखाच्या राशीचाही विसर पाडते. गुरुभजनाची ज्यांना आवड नसते तेच संसारबंधनांत पडतात ४२.

छेदावया संसारबंधन । करावें सद्‍गुरुसेवन ।
सद्‍गुरुसेवा तें माझें भजन । गुरु-आम्हां भिन्नभावो नाहीं ॥४३॥
संसाराचे बंधन तोडावयाला सद्गुरूचीच सेवा करणे अवश्य आहे. सद्‌गुरूची सेवा तेंच माझे भजन आहे. कारण गुरूमध्ये व आम्हांमध्ये भिन्नभाव नाही ४३.

गुरुभक्तांची श्रद्धा गाढी । आणि गुरुभजनाची गोडी ।
ते सांगितली आवडीं । प्रत्यक्ष उघडी करूनि ॥४४॥
ह्याप्रमाणे गुरुभक्तांची श्रद्धा किती निस्सीम असते, आणि त्यांना गुरुभजनाची किती गोडी असते, ते मी आवडीने अगदी उघड करून तुला सांगितले ४४.

सहज प्रसंगें येणें । शिष्यांचींही लक्षणें ।
सांगेन तुजकारणें । कृष्ण म्हणे उद्धवा ॥४५॥
कृष्ण म्हणतात, उद्धवा ! आता ह्या सहज प्रसंगाने ओघानुसार शिष्याची लक्षणें मी तुला सांगतों ४५.

अमान्यमत्सरो दक्षो निर्ममो दृढसौहृदः ।
असत्वरोऽर्थजिज्ञासुः अनसूयुरमोघवाक् ॥ ६ ॥
[श्लोक ६] कसलाही अभिमान धरू नये कोणाचाही मत्सर करू नये नेहमी सावध असावे ‘माझे’ पणाचा भाव सोडावा गुरू आणि माझ्याबद्दल निःसीम प्रेम ठेवावे तत्त्व समजून घेण्याची जिज्ञासा असणार्‍याने कोणत्याही प्रकारची घाई करू नये कोणाबद्दलही दोषदृष्टी ठेवू नये निरर्थक आणि असत्य भाषण यांपासून दूर राहावे. (६)

मान देखोनि सहसा । शिष्य सांकडों लागे कैसा ।
जेवीं गळीं लागला मासा । चरफडी तैसा सन्मानें ॥४६॥
गळाला लागलेला मासा जसा तळमळतो, तसा मान-सन्मान पाहिला की, सच्छिष्य संकटांत पडतो ४६.

नांवें ऐकोनि बागुलातें । बाळ सांडूं पाहे प्राणातें ।
तेवीं ऐकतांचि सन्मानातें । भयें प्राणांतें सांकडें ॥४७॥
बागुलाचे नांव ऐकल्याबरोबर मूल जसें कासावीस होते, त्याप्रमाणे सन्मान ऐकला की, भयाने प्राणांत संकट आले असें त्यास वाटते ४७.

चंडवातें जेवीं केळी । समूळ कांपे चळवळी ।
कां लहरींच्या कल्लोळीं । कांपे जळीं रविबिंब ॥४८॥
सोसाट्याच्या वाऱ्याने केळ ज्याप्रमाणे मुळासकट थरथर कापू लागते, किंवा लाटांच्या उसळ्यांनी पाण्यांतील सूर्याचे प्रतिबिंब जसे कापू लागते ४८,

सन्मानु तेणें पाडें । दृष्टीं देखोनि नावडे ।
महत्त्वें थोर सांकडें । अंगाकडे येवों नेदी ॥४९॥
त्याप्रमाणे सन्मान हा दृष्टीनेंसुद्धा त्याला पाहवत नाही. मोठेपणा हें मोठे संकट वाटते व तें तो आपल्याकडे येऊ देत नाही ४९.

आदरें घेतां सन्मान । दृढ होईल देहाभिमान ।
सांडोनि मानाभिमान । हीनदीन होऊनि असे ॥१५०॥
प्रीतीने सन्मानाचा स्वीकार केला तर देहाभिमान दृढ होईल म्हणून तो मानाभिमान सोडून हीनदीन होऊनच रहातो १५०.

समूळ नामरूप जाये । मज कोणी देखों न लाहे ।
ऐसी दशा जेणें होये । ते ते उपाये करीतसे ॥५१॥
आपलें नामरूप सारें नाहींसें व्हावे व आपणाकडे कोणी पाहूंही नये, अशी स्थिति ज्यायोगें होईल तसला उपाय तो करूं लागतो ५१.

लौकिक देखोनि उद्वेगु । देहगेहांचा उबगु ।
एकलेपणीं अतिचांगु । न धरी संगु द्वैताचा ॥५२॥
लौकिकाला पाहून तो उद्विग्न होतो, देहगेहाचा त्याला कंटाळा येतो, एकांतच त्याला चांगला वाटतो, म्हणून द्वैताची तो संगतच धरीत नाही ५२.

मज कोणीं न देखावें । मज कोणीं न वोळखावें ।
मज कोणीं न लाजावें । ऐसें जीवें वांछितु ॥५३॥
मला कोणी पाहूं नये; मला कोणी ओळखू नये; मला कोणी लाजूं नये, हीच त्याची मनापासून इच्छा असते ५३.

मान देखोनियां दिठीं । लपे देह‍उपेक्षेच्या पोटीं ।
जेवीं चोर लागलिया पाठीं । लपे संकटीं धनवंतु ॥५४॥
चोर पाठीस लागला म्हणजे द्रव्यवान् मनुष्य ज्याप्रमाणे मोठ्या संकटाने लपून बसतो, त्याप्रमाणे मान डोळ्यांनी पाहिला की, देहउपेक्षेच्या पोटांत तो लपून राहतो ५४.

मी एकु लौकिकीं आहें । ऐसें कोणा ठावें नोहे ।
ऐशी ऐशी दशा पाहे । मानु न साहे यालागीं ॥५५॥
लोकांत मी एक कोणी तरी आहे, हे कोणाला ठाऊक असूं नये, अशा प्रकारच्या स्थितीत तो राहात असतो, म्हणून त्याला मानपान खपत नाही ५५.

सांडावया अहंममता । मानु न पाहे सर्वथा ।
लौकिकीं सन्मानु घेतां । दृढ अहंता होईल ॥५६॥
मीपणा व माझेपणा सोडून द्यावा म्हणून तो मानाकडे पहात नाही. कारण, लोकांमध्ये सन्मान घेतला तर अहंता दृढ होऊन राहील असें त्याला वाटते ५६.

ज्याचें पोटीं दृढ अभिमान । ते सदा वांछिति सन्मान ।
जो सांडूं निघे अभिमान । तो मानापमान न पाहे ॥५७॥
ज्यांच्या पोटांत अभिमान बळावलेला असतो, तेच नेहमी सन्मानाची अपेक्षा करतात. तो अभिमानच जो सोडून द्यावयाला तयार होतो, तो मानापमानाकडे पहात नाही ५७.

जेणें घेतला सन्मान । त्यासी नेघवे अपमान ।
तेथ सहजें आला देहाभिमान । यालागीं सन्मान नावडे ॥५८॥
ज्याने सन्मान घेतलेला असतो, त्याला अपमान सहन होत नाही. तेव्हा तेथे सहजच देहाभिमान उत्पन्न होतो. म्हणून त्याला सन्मानच मुळी आवडत नाही ५८.

सन्मानु घ्यावया तत्त्वतां । ज्ञातेपण मिरवी ज्ञाता ।
ते संधीं वसे ममता । अर्थस्वार्थाचेनि लोभें ॥५९॥
खरोखर पाहिले तर ज्ञाता माणूस सन्मान व्हावा म्हणूनच ज्ञातेपणा मिरवीत असतो. तशा संधींत अर्थस्वार्थाच्या लोभाने ममता राहत असते ५९.

एवं नापेक्षी सन्मान । हें प्रथम शिष्याचें लक्षण ।
आतां ‘निर्मत्सरत्व’ संपूर्ण । तें सुलक्षण परियेसीं ॥१६०॥
तात्पर्य, सन्मानाची इच्छा न करणे हेच शिष्याचे ‘पहिले’ लक्षण होय. आतां ‘निर्मत्सरपणा’ म्हणजे काय, त्याचेही लक्षण सांगतों ऐक १६०.

सज्ञानामाजीं वैर । ज्ञातृत्वाचाचि मत्सर ।
तेथें देहाभिमानें केलें घर । अतिदुस्तर जीवासी ॥६१॥
ज्ञातृत्वाच्या मत्सरामुळे ज्ञात्यांमध्येही परस्परांविषयीं वैर उत्पन्न होते. तेथें देहाभिमान हा जिवाला अतिदुस्तर असें घर करून राहतो ६१.

ज्ञानाभिमानाची गोष्टी । वेंचुनी तपाचिया कोटी ।
दुजी करीत होता सृष्टी । अभिमान पोटीं ज्ञानाचा ॥६२॥
ज्ञानाभिमानाची गोष्ट काय सांगावी ? अपार तपश्चर्या खर्ची घालून (विश्वामित्र ) दुसरी सृष्टि उत्पन्न करीत होता; कारण, मनांत ज्ञानाचा अभिमान ! ६२.

ज्ञानाभिमानु दुर्वासासी । व्यर्थ शापिलें अंबरीषासीं ।
म्यां सोशिलें गर्भवासासी । ज्ञानाभिमानासी भिऊनि ॥६३॥
दुर्वासालाही ज्ञानाचाच अभिमान, म्हणून त्याने अंबरीषाला व्यर्थ शाप दिला ! आणि ज्ञानाभिमानाला भिऊन त्याच्या शापाचे दहा गर्भवास मी सहन केले ! ६३.

ज्ञानाभिमानु ब्रह्मयासी । नेलें गोपालवत्सांसी ।
मज होणें पडिलें त्या वेषांसी । ज्ञानाभिमानासी भिऊनि ॥६४॥
ब्रह्मदेवालाही ज्ञानाचा अभिमान झाला, म्हणून त्याने गोपाल व वत्से हरण केली. आणि ज्ञानाभिमानाला भिऊन मला त्यांची स्वरूपें घेऊन राहावे लागले ६४.

उद्धवा ज्ञानाभिमान । सर्वां अभिमानांमाजीं कठिण ।
वसिष्ठ विश्वामित्र जाण । ज्ञानाभिमानें भांडती ॥६५॥
उद्धवा ! साऱ्या अभिमानांत ज्ञानाभिमान मोठा कठिण आहे. वसिष्ठ आणि विश्वामित्र हे ज्ञानाभिमानानेंच भांडत होते ६५.

एवं ज्ञानाभिमानाभेण । म्यां घेतलें गोवळेपण ।
मज मूर्ख म्हणती याज्ञिक ब्राह्मण । त्यांसी ज्ञानाभिमान कर्माचा ॥६६॥
अशा ज्ञानाभिमानाच्या भयानेंच मी गवळीपणा घेतला. याज्ञिक ब्राह्मणांनी तर मला मूर्ख ठरविले. कारण, त्यांना कर्माचा व ज्ञानाचा अभिमान होता ६६.

मुख्य माझीच हे ऐशी दशा । तेथें इतरांचा पाडु कायसा ।
ज्ञानाभिमानाचा दृढ फांसा । नुगवे सहसा ज्ञात्यासी ॥६७॥
माझीच जर ही दशा ! तेथे इतरांचा पाड काय ? शानाभिमानाचा बळकट पाश ज्ञात्यांना सहसा सुटतच नाही ६७.

ज्ञानाभिमानाची जाती कैशी । उभा न ठाके मूर्खापाशीं ।
वैर लावी सज्ञानासी । समत्सरेंसीं वर्तवी ॥६८॥
ज्ञानाभिमानाची जात तरी कसली ? तो मूर्खाजवळ उभा राहत नाही. ज्ञात्याज्ञात्यांतच वैर माजवून मत्सराने वागावयाला लागतो ६८.

एवं निर्मत्सर होणें ज्यासी । तेणें सांडावें ज्ञानाभिमानासी ।
येरवीं तो ज्ञातयासी । समत्सरेंसीं नांदवी ॥६९॥
तात्पर्य, ज्याला निर्मत्सर होणे असेल त्याने ज्ञानाचा अभिमान टाकून द्यावा. नाही तर तो ज्ञात्यांना मत्सरानेच वागावयाला लावतो ६९.

ऐक मत्सराची सामग्री । देहीं देहाभिमान दृढ करी ।
तोही ज्ञातेपणाचें बळ धरी । लोभ माझारीं अर्थस्वार्थे ॥१७०॥
आता मत्सराची सामग्री ऐक. देहामध्ये देहाभिमान दृढ करतो; तोही ज्ञातेपणाचे बळ धरतो व त्यामध्ये द्रव्याच्या आशेने लोभही घुसून राहतो १७०.

इतुकी सामग्री जेथें होये । तोचि समत्सर द्वेषु वाहे ।
शुद्ध शिष्य हें न साहे । त्यागोनि जाये मत्सरु ॥७१॥
इतकी सामग्री ज्याच्यापाशी जमते तोच मत्सरासहित द्वेष वाहात असतो. शुद्ध शिष्याला हे सहन होत नाही. तो मत्सराचा त्यागच करतो ७१.

मत्सराची जाती कैशी । अवश्य वसे ज्ञात्यापाशीं ।
मत्सर थोर पंडितांशीं । यावज्जन्मेंसीं न संडिती ॥७२॥
मत्सराची जात कशी आहे पाहा ! तो हटकून ज्ञात्यापाशीच राहतो. पंडितांना मत्सर दांडगा. तो ते यावजन्म सोडीत नाहीत ! ७२.

पंडित भेटती समत्सर । लवणभंजन अतिनम्र ।
बोलती अतिमधुर । समत्सर छळणोक्तीं ॥७३॥
पंडित म्हणून जितके आढळतात तितके मत्सरीच असतात. ते वरकरणी मोठी नम्रता दाखवून अतिशय गोड बोलतात. पण त्यांचे बोलणे सारे मत्सराचें व दुसर्‍याच्या छळाचे असतें ७३.

मत्सरें पंडित येती क्रोधा । असदारोपणें करिती निंदा ।
एवढी मत्सराची बाधा । नातळे कदा सच्छिष्यु ॥७४॥
मत्सराने पंडित रागाला चढतात आणि एकमेकांवर खोडसाळपणाचे आरोप करून निंदा करतात. अशी मत्सराची बाधा सच्छिष्याला कधीही शिवत नाहीं ७४.

मत्सरु ज्ञात्यातें न सोडी । मा इतर काइसी बापुडीं ।
शिष्य द्वेषाची गोष्टी सोडी । मत्सरु तोडी सर्वस्वें ॥७५॥
ज्ञानीलोकांना सुद्धा जर मत्सर सोडीत नाही, तर मग इतर बिचारे लोक काय ? परंतु शिष्य असतो तो द्वेषाची गोष्टच सोडून देतो, आणि मत्सर तर निखालस तोडून टाकतो ७५.

मत्सर सांडूनि तत्त्वतां । शिष्यें रहावें सर्वथा ।
निर्मत्सरतेची कथा । ऐक आतां सांगेन ॥७६॥
शिष्याने खरोखर नेहमी मत्सर सोडूनच राहिले पाहिजे. त्या निर्मत्सरपणाची गोष्ट सांगतों ऐक ७६.

पुढूनि स्वार्थु नेतां । द्वेष उपजों नेदी चित्ता ।
भूतीं भगवंतु भावितां । द्वेषु सर्वथा येवों नेदी ॥७७॥
आपल्यापुढे आलेला लाभ कोणी हिरावून नेला, तरी चित्तामध्ये तो द्वेष उत्पन्न होऊ देत नाही. प्राणिमात्रामध्ये भगवंतच भरलेला आहे, अशी भावना तो धरीत असल्यामुळे द्वेष येऊच शकत नाहीं ७७.

निंदेचिया वाग्बाणीं । दारुण विंधिल्या दुर्जनीं ।
द्वेषु उपजों नेदी मनीं । हित मानीं निंदेचें ॥७८॥
दुर्जनांनी निंदेच्या वाग्बाणांनी कितीही विद्ध केले, तरी तो मनांत द्वेष उत्पन्न होऊ देत नाही. निंदेमध्ये हितच मानतो ७८.

जेणें जेणें निजनिंदा केली । तो तो मानी हित माउली ।
पापमळांची क्षाळणता झाली । शुद्ध केली माझि वृत्ति ॥७९॥
ज्याने ज्याने आपली निंदा केली असेल, तो तो आपली हितकर्ती माउलीच समजतो. तिने आपला पातकाचा मळ धुऊन काढला व माझी वृत्ति निर्मळ केली, असाच त्याचा समज असतो ७९.

ऐस‍ऐशिया विवंचना । द्वेषु आळों नेदी मना ।
निर्मत्सरता ते हे जाणा । दुसरी लक्षणा शिष्याची ॥१८०॥
अशा अशा विचारानें तो आपल्या मनाला द्वेष शिवूंच देत नाही. ‘निर्मत्सरपणा’ तो हाच, हे लक्षात ठेव. आणि हेच शिष्याचे ‘दुसरें’ लक्षण होय १८०,

यावरी जे ‘दक्षता’ । तेही तुज सांगों आतां ।
शिष्याची प्रागल्भ्यता । निजस्वार्थालागोनि ॥८१॥
ह्यानंतर तिसरे लक्षण म्हणजे ‘दक्षता’ तेही आतां तुला सांगतो. म्हणजे आपले हित साधण्याकरितां शिष्याची दक्षता किती असते अथवा असावी ते लक्षात येईल ८१.

उगवल्या सावधान-भास्करा । नाशी निद्रेतंद्रेच्या अंधारा ।
होय धारणेचा दिवसु खरा । धृतीच्या दुपारा वर्ततु ॥८२॥
सावधानता म्ह. जागरूकतारूपी सूर्य उगवला की तो निद्रेचा आणि तंद्रेचा अंधार चटसारा नाहीसा करून टाकतो आणि धारणेचा दिवस सुरू होतो, (धारणा म्हणजे गुरूक्त साधनाभ्यासाची एकसारखी धारा चालू ठेवणे ), व धृतीची दुपार होऊन बसते ८२.

त्या दिवसाचेनि लवलाहें । शमदमादि समुदायें ।
भक्तिपंथें चालताहे । मार्गीं न राहे क्षणभरी ॥८३॥
असा दिवस उगवतांच लगबगीने शमदमादि समुदाय भक्तीच्या मार्गानें चालू लागतो. वाटेत एक क्षणभरही थांबत नाहीं ८३.

तेथ उचलतां पाउलीं । निजबोधाची पव्हे ठाकिली ।
जेथ पांथिकांची निवाली । तृषा हरली तृष्णेची ॥८४॥
तेथे प्रत्येक पावलाला निजबोधाची पाणपोई घातलेली असते, तेथें मार्गस्थांचीच तृषा भागते असे नाही, तर तृषेचीही तृषा नाहीशी होते ८४.

तेथ निजग्रामींचे भेटले । सोहंसांगाती एकवटले ।
तेथूनि चुकणया मुकले । नीट लागले निजपंथी ॥८५॥
या मार्गात गांवचे गांवकरी (संत) भेटले व ते ‘सोहं’ (ब्रह्म तें मीच) या भावनेने एकत्र मिळाले, म्हणजे पुढची वाट चुकावयाची भीतीच राहात नाही. ते सरळ निजमार्गाला लागतात ८५.

ऐकें बापा विचक्षणा । आळस विलंबु नातळे मना ।
त्या नांव ‘दक्षता’ जाणा । ‘तिसरी’ लक्षणा शिष्याची ॥८६॥
हे चतुर उद्धवा ! ऐक. आळस किंवा विलंब मनाला न शिवणे ह्याचंच नांव ‘दक्षता. ‘ हेंच शिष्याचे ‘तिसरें’ लक्षण होय ८६.

जुनाट संग्रहो सवें होता । ते सर्व सांडिली ममता ।
सांडिल्याची क्षिती मागुता । न करी सर्वथा निजबोधें ॥८७॥
पूर्वीचा जुनाट संग्रह जवळ राहिला होता, त्याचीही सारी ममता तो सोडून देतो आणि आत्मज्ञानाच्या अनुभवामुळे ते सोडल्याची पुन्हा कधीं क्षितीही करीत नाही ८७.

देहीं दृढ धरावी अहंता । तेणें देहसंबंधीयांची ममता ।
देहाभिमानु नातळे चित्ता । गेली ममता न लगतां ॥८८॥
देहाच्या ठिकाणी ‘अहंता’ दृढ केली, तर देहसंबंधियांची ‘ममता’ जडते. देहाभिमानच चित्ताला शिवला नाही, तर ममता लगेच नाहीशी होते ८८.

देह नश्वरत्वें देखिला । विष्ठामूत्रांचा मोदळा ।
यालागीं अहंकारु गेला । ‘सोहं’ लागला दृढभावो ॥८९॥
देह हे मलमूत्राचे गांठोडे अथवा गोळा असून नाशवंत असलेला दिसतोच ; त्यामुळे त्याजवरील अहंबुद्धि म्हणजे अहंकार जाऊन त्या ठिकाणी ‘सोहंबुद्धि म्हणजे ब्रह्म ते मीच’ ही भावना दृढतर होऊन जाते ८९.

दृढ वाढवूनि सोहंता । तेणें सांडविली अहंममता ।
हे ‘चौथी’ गा अवस्था । जाण तत्त्वतां शिष्याची ॥१९०॥
सोहंभावना दृढतर वाढवून त्याने अहंभावना व ममत्वभावना सोडलेली असते. हाच शिष्याच्या अंगचा ‘निर्ममता’ हा ‘चौथा ‘ गुण होय १९०.

गुरु माता गुरु पिता । गुरु गणगोत तत्त्वतां ।
गुरु बंधु सुहृदता । निजस्वार्था शिष्याच्या ॥९१॥
शिष्याचे हित साधण्याचे कामी गुरु हाच माता, गुरु हाच पिता, गणगोतही खरोखर गुरुच, आणि बंधु व सुहृदही गुरुच ९१.

गुरुपरिचर्या नित्यकर्म । गुरुसेवा हाचि स्वधर्म ।
गुरु तोचि आत्माराम । सुहृदसंभ्रम सद्‍गुरूसी ॥९२॥
गुरूची सेवा हेच त्याचे नित्यकर्म ; गुरुसेवा हाच त्याचा धर्म ; गुरु तोच आत्माराम; ह्याप्रमाणे सुहृदाचा सर्व गौरव तो सद्गुरूलाच ९२.

ऐसें सद्‍गुरूसी ‘सुहृद’ पण । असावें शिष्यासीं संपूर्ण ।
हें ‘पांचवें’ गा लक्षण । सत्य जाण उद्धवा ॥९३॥
याप्रमाणे सद्गुरूच्या ठिकाणींच सर्व आप्तपणा मानावा. उद्धवा ! सच्छिष्याचे हेंच ‘पांचवें’ लक्षण होय ९३.

चंचळत्वें चळु चित्ता । येवों नेदीच सर्वथा ।
निजीं निजरूपनिश्चळता । साधी सर्वथा सर्वस्वें ॥९४॥
चित्ताला चंचलपणानें तो कधींच चकू देत नाही. सर्वोपरीनें सर्वकाल आत्म्यामध्येंच निश्चळता तो साधतो ९४.

जर्‍ही चंचळ झालें अंग । चित्त गुरुचरणीं निश्चळ चांग ।
अंगीं वाजतां लगबग । वृत्ति अभंग गुरुचरणीं ॥९५॥
अंग म्ह. शरीर जरी चंचल झाले, तरी त्याचे चित्त गुरुचरणाच्या ठिकाणी अगदी निश्चळच असते. विक्षेपाचे प्रसंग अंगावर कितीही येऊन कोसळले, तरी वृत्ति गुरुचरणाच्या ठिकाणी अढळच असते ९५.

शरीर वर्ततां व्यापारा । ज्याचे हृदयीं नाहीं त्वरा ।
गुरुचरणीं धरिला थारा । हा शिष्यु खरा परमार्थी ॥९६॥
शरीर व्यापार करीत असले तरी ज्याच्या हृदयांत गडबड म्हणून नाहीं, गुरुचरणाच्याच ठिकाणी जो थारा धरून राहतो, तोच खरा परमार्थी शिष्य होय ९६.

ज्यासी हृदयीं चंचळता । तो शिष्य नव्हे निजस्वार्था ।
ज्याचे अंतरीं ‘निश्चळता’ । तोचि परमार्था साधकु ॥९७॥
ज्याच्या हृदयांत चंचलता असते, तो स्वहित साधणारा शिष्यच नव्हे. ज्याच्या हृदयांत निश्चलता असते, तोच परमार्थाचा साधक होय ९७.

ऐसी साधूनि निश्चळता । ज्यासी निजस्वार्थीं जिज्ञासुता ।
तोचि क्षणार्धे परमार्था । पावे तत्त्वतां गुरुवाक्यें ॥९८॥
अशा प्रकारची निश्चलता साधून जो आपल्या खऱ्या हिताची इच्छा करतो, तोच गुरूपदेशाने क्षणार्धात परमार्थाला पात्र होतो ९८.

जैसा दीपु दीपें लाविला । लावितांचि तत्समान झाला ।
तैसा निश्चळास गुरु भेटला । तो तत्काळ झाला तद्‌रूप ॥९९॥
ज्याप्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा लावला असतां लावतांक्षणींच तो त्याच्यासारखाच होऊन बसतो, त्याप्रमाणे निश्चळ वृत्तीच्या साधकाला गुरु भेटला की, तो तत्काळ तद्‌रूप बनतो ९९.

एवं अंतरीं जें निश्चळपण । तें शिष्याचें श्रेष्ठ लक्षण ।
तो ‘सहावा’ गा गुण जाण । तेणें निर्दळण षड्‌विकारां ॥२००॥
तात्पर्य, अंतःकरणांतील निश्चलपण हेच शिष्याचे श्रेष्ठ लक्षण होय. आणि तोच शिष्याचा ‘सहावा’ गुण, हे लक्षात ठेव. याच्याचमुळे षड्विकारांचा नाश होतो २००.

षड्‌विकार देहावरी । शिष्यु देहबुद्धी हातीं न धरी ।
यालागीं मावळिजे विकारीं । गुरुवाक्येंकरीं वर्ततां ॥१॥
षड्विकार हे देहाला असतात. पण शिष्य देहबुद्धीला शिवतच नाही. म्हणून गुरूपदेशाप्रमाणे वागत असल्यामुळे त्याचे विकारही नाहीसे होतात १.

ऐसी साध्य करूनि ‘निश्चळता’ । साधूं रिघे जो परमार्था ।
धरोनियां अर्थजिज्ञासुता । होये भजता गुरुचरणीं ॥२॥
अशा प्रकारची निश्चळता साध्य करून अर्थजिज्ञासेनें जो परमार्थ साधावयाला तयार होतो, तोच गुरुचरणाला भजू लागतो २.

ज्यासी अर्थजिज्ञासा नाहीं । तो भजेना गुरुच्या ठायीं ।
जरी भजेल कहींबहीं । तरी स्वार्थें पाहीं विषयाच्या ॥३॥
ज्याला अर्थाची जिज्ञासाच नाही, तो गुरूच्या भजनींही लागावयाचा नाही आणि कधीं काळीं भजनी लागलाच, तर तो विषयाच्या लालचीनेंच लागावयाचा ३.

सांडोनियां विषयस्वार्था । इत्थंभूत जाणावया अर्था ।
जो भजे परमार्था । ‘जिज्ञासता’ त्या नांव ॥४॥
विषयाचा स्वार्थ सोडून, परिपूर्ण तत्त्वार्थ जाणण्यासाठींच परमार्थाच्या भजनीं लागणे त्याचे नांव ‘जिज्ञासता’ ४.

ऐशी धरोनि जिज्ञासता । चढती आवडी परमार्था ।
आराणुक नाहीं चित्ता । निजस्वार्थाचेनि लोभें ॥५॥
अशी तत्त्वजिज्ञासा धारण करून परमार्थाची आवड तो वाढवीत असतो. ह्याप्रमाणे स्वहिताच्या लोभामुळे त्याच्या चित्ताला एक क्षणभरही विश्रांति नसते ५.

अतिप्रीती परमार्था । चढती वाढती आस्था ।
हे ‘सातवी’ लक्षणता । जाण तत्त्वतां शिष्याची ॥६॥
परमार्थाविषयी अतिशय प्रेम आणि ‘चढती वाढती आस्था’ हें शिष्याचे ‘सातवें’ लक्षण होय ६.

हें सातवें लक्षण । परमार्थाचें अंगण ।
पावलें असे जाण । जिज्ञासुपणाचेनि नेटें ॥७॥
हे सातवें लक्षण जिज्ञासुपणाच्या बळावरच परमार्थाचें अंगण चढण्यास समर्थ झालें ७.

गुरु बहुतांची साउली । शिष्यवर्गांची माउली ।
तेथ असूया जेणें केली । त्याची बुडाली निजप्राप्ती ॥८॥
असो. सद्गुरु ही पुष्कळ लोकांची सावली आहे; शिष्यवर्गाची तर माउलीच आहे. त्यांच्या ठिकाणी जो असूया करील, त्याची आत्मप्राप्ति दुरावली म्हणून समजावें ८.

यालागीं गुरूचा जो जो अंकित । तो तो गुरुत्वेंचि मानित ।
असूया नाठवे मनांत । अतिविनीत सर्वांसी ॥९॥
ह्याकरितां गुरूचा जो जो अंकित म्ह. अनुग्रहित असेल त्याला त्याला तो गुरूसमानच मानतो. असूया त्याच्या चित्ताला आठवतच नाही. तो सर्वांशी अतिशय लीनपणानेच वागतो ९.

गुरुबंधु कनिष्ठ दीन । त्याच्या ठायीं उत्तम गुण ।
जाणोनि न मनीं आपण । असदारोपण तेथें करी ॥२१०॥
याच्या उलट एखादा गुरुबंधु कनिष्ठ असून गरीब असला, त्याच्यामध्ये उत्तम गुणही असले, तरी ते जाणूनबुजून मानावयाचे नाहीत, त्याच्या ठिकाणी खोटाच आरोप करावयाचा ( कुशिष्याचे लक्षण) २१०.

पुढिलांचा उत्तम गुण । त्यासी मिथ्या लावूनि दूषण ।
लटिकें म्हणे त्याचें ज्ञान । ‘असूया’ जाण त्या नांव ॥११॥
दुसऱ्याचा उत्तम गुण असेल त्याला मिथ्या दूषण लावून त्याचे ज्ञान खोटें आहे असे म्हणणे याचे नांव ‘असूया’ ११.

प्रत्यक्ष भेटल्या वर्णी गुण । नम्र होवोनि वंदी चरण ।
सवेंचि मागें करी छळण । ‘असूया’ संपूर्ण या नांव ॥१२॥
प्रत्यक्ष भेट झाली म्हणजे त्याच्या गुणांचे स्तुतिस्तोत्र गावयाचें, नम्रत्वाने पाय धरावयाचे, पण लागलीच पाठीमागे त्याची छळणा म्ह. निंदा करावयाची. ह्या साऱ्याचे नांव ‘असूया’ १२.

सच्छिष्यु ये अर्थीं निर्मळ । हो नेदी असूयेचा विटाळ ।
उत्तम-मध्यम-प्राकृतमेळ । वंदी परी छळ करूं नेणे ॥१३॥
सच्छिष्याचे वर्तन या विषयांत अगदी शुद्ध असते. तो आपल्याला असूयेचा विटाळ होऊ देत नाही. उत्तम असो, मध्यम असो की अगदी प्राकृत म्ह. साधारण असो, त्या सर्वांना तो वंदनच करतो. छल करणे त्याला माहीतच नसते १३.

गुरूनें शिकविली वस्तुसमता । तेथ निरंतर ठेवूनि चित्ता ।
समभावें वंदी समस्तां । छळूं सर्वथा तो नेणे ॥१४॥
गुरूने सर्वत्र ब्रह्मभावना धरावयाला शिकविलेले असते, त्यावर निरंतर लक्ष ठेवून तो सर्वांना समभावानेच वंदन करतो. छळ करावयाचे त्याला कधी माहीतच नसते १४.

यापरी गा उद्धवा । छळूं नेणे कोणा जीवा ।
हा ‘अनसूयु’ म्हणावा । गुण आठवा शिष्याचा ॥१५॥
याप्रमाणे हे उद्धवा ! कोणत्याही प्राण्याचा छळ करण्याचे माहीत असणे, हाच शिष्याचा ‘अनसूया’ नावाचा ‘आठवा’ गुण होय १५.

हे अष्टौमहामणिमाळी । अखंड ज्याच्या हृदयकमळीं ।
तो पावे सद्‍गुरूजवळी । नवी नव्हाळी भेटीची ॥१६॥
ही आठ महामण्यांची माळ ज्याच्या हृदयकमली निरंतर वास करते, तो सद्गुरूच्या सांनिध्याला पोचतो. त्या भेटीची अपूर्वता काय सांगावी ? १६.

यावरी नववें लक्षण । तें जाण नवविधान ।
सत्यधूत संभाषण । वाग्विलापन सांडूनि ॥१७॥
ह्यापुढे नववे लक्षण तोही नवाच प्रकार आहे. वायफळ बडबड सोडून तो सत्य व पवित्र भाषण करीत असतो १७.

सद्‍गुरूप्रति जाण । मृदु विनीत करी प्रश्न ।
सत्याचें सत्य तें गुरुवचन । मानी जाण निजभावें ॥१८॥
सद्गुरूला तो लीनतेने आणि मृदु वाणीने प्रश्न करतो आणि गुरूचे वचन हे सत्यांतलें सत्य होय असें तो भक्तिपुरःसर मानतो १८.

युक्ति वाढवून उदंड । नाना मतें अकांडतांड ।
साह्य संचरूनि पाखांड । गर्जत तोंड महावादें ॥१९॥
नाना प्रकारच्या युक्ति लढविणे, अनेक प्रकारची मते प्रतिपादन करून अकांडतांडव करणे, पाखांडांचे साहाय्य घेऊन महावादाने तोंड वाजवीत बसणे १९,

साधका बाधका युक्ती । माजीं संचरूनि छळणोक्ती ।
आपुली मिरवावी युक्ती । हें नाहीं चित्तीं शिष्याचे ॥२२०॥
साधक बाधक युक्तीच्या साहाय्याने शब्दच्छल करणे, आणि आपल्याच कोटीचा डौल मिरविणे या गोष्टी शिष्याच्या मनांतही येत नाहींत २२०.

सद्‍गुरूपुढें अतिजल्प । करणें तेंचि महापाप ।
जाणूनि सांडी वृथालाप । मिथ्या जल्प बोलेना ॥२१॥
सद्‌गुरूपुढे फाजिलपणाने बोलणें हे मोठे पाप आहे हे जाणून तो व्यर्थ बडबड सोडून देतो आणि मिथ्यावाद करीत नाही २१.

शिष्याचें बोलणें कैसें । वाचा परिपक्क अमृत जैसें ।
बोल घोळले प्रेमरसें । प्रश्न पुसे एकांतीं ॥२२॥
शिष्याचे बोलणे कसे असते ? तर जणू काय परिपक झालेल्या वाणींतील अमृतच ते. प्रेमरसात घोळलेल्या शब्दांनीं तो एकांतांत प्रश्न करीत असतो २२.

मिथ्यावादाचीं अपक्क फळें । तुरटें तिखटें तोंडाळें ।
सदेठीं झडलीं पूर्वकाळें । बोले प्रांजळें परिपक्क ॥२३॥
खोडसाळ वादाची आंबट चिंबट कच्ची फळे देठांसहित पूर्वीच झडून गेलेली असतात ; तो प्रांजळ आणि परिपक्क असेंच भाषण करतो २३.

बोलों नेणे छळ छद्म । स्पर्शों नेणें परवर्म ।
बोलीं नुपजवीं अधर्म । मनोधर्मक्षोभक ॥२४॥
कपटी व मर्मभेदक भाषण करणे त्याला माहीत नसते. दुसऱ्याच्या वर्माला तो शिवत नसतो. आणखी बोलण्यामध्ये दुसऱ्याचे मन दुखवेल किंवा अधर्म वाटेल असे कधीही बोलत नाही २४.

व्यर्थ न करी आशंका । निंदेलागीं तो मुका ।
झकवूं नेणे लोकां । बाळां मूर्खां पंडितां ॥२५॥
व्यर्थ शंका कधी घेत नाही. निंदेविषयीं तर तो मुकाच असतो. मूल असो, अडाणी असो, की पंडित असो; कोणत्याही लोकांना फसवावयाचे त्याला कळत नसते २५.

बोलों नेणे अतिकर्कश । करूं नेणे उपहास ।
बोलामाजीं न धरी आस । बोले नैराश्य वैराग्य ॥२६॥
त्याला कर्कश बोलतां येत नाही; दुसर्‍याचा उपहास करणे माहीत नाही; किंवा बोलतांना तो कशाची आशाही धरीत नाही. केवळ निरिच्छपणाने आणि वैराग्याने तो बोलत असतो २६.

बोलीं बोलूं नेणे आटू । छळणोक्तीं नव्हे शठू ।
बहु बोलतां मानी विटू । मौननिष्ठु होऊनि राहे ॥२७॥
त्याला अढीचे बोलणे माहीत नसते ; शब्दच्छलाने कुत्सितपणाही त्याला करता येत नाहीं; अधिक बोलण्याचा त्याला वीट येतो; बहुधा तो मौनव्रतच धरून राहतो २७.

वादविवाद अतिवाद । नावडे कोणाचा संवाद ।
न करी बोलाचा विनोद । लौकिक शब्द न बोले ॥२८॥
त्याला वादविवाद किंवा वितंडवाद रुचत नाहीं, उगीच कोणाशी भाषण करणेंही आवडत नाही. थट्टा-विनोदही कोणाशी तो करीत नाही; किंवा लौकिक शब्दही तो बोलत नाही २८.

वक्रोक्ति नाहीं जाण । बोलीं न बोले विंदाण ।
करूं नेणे प्रतारण । मिथ्या वचन न बोले ॥२९॥
त्याला वांकडे बोलावयाचे कधी माहीत नसते; त्याच्या भाषणांत कधी कपट नसते. कोणाशीं तो प्रतारणाही करीत नाही, आणि तो खोटेही पण कधी बोलत नाही २९.

पोटीं कार्य नाहीं करणें । हो हो म्हणवूनि झकविणें ।
हेंही नाहीं तया बोलणें । सदा पठणें हरिनाम ॥२३०॥
मनांतून तर एखाद्याचे काम करावयाचे नसते, आणि हो हो म्हणून त्याला नादाला लावून तोंडघशी पाडावयाचें, असेंही बोलणे त्याला येत नाही. तो सदासर्वदा हरिनामच पठण करीत असतो २३०.

पश्चिमद्वारीचें कवाड । सदा वारेनि करी खडखड ।
तैशी न करी बडबड । वृथा तोंड पिटीना ॥३१॥
पश्चिमेकडील दाराच्या फळ्या उघड्या ठेवल्या म्हणजे त्या जशा वाऱ्याने खटाखटा वाजत असतात, त्याप्रमाणे तो बडबड करून व्यर्थ तोंडपिटी करीत नाही ३१.

करितां शब्दब्रह्मसंवादु । युक्तिबाधें विद्वांसा क्रोधु ।
अनिवार देखोनि बाधु । न बोले शब्दु शाब्दिक ॥३२॥
शब्दब्रह्माविषयी संवाद करतांना प्रतिपक्षाने युक्ति खोडली असता क्रोध येतो. साधकाच्या मार्गात हे मोठे विघ्न आहे, हें जाणून तो शाब्दिक हुज्जत घालीत बसत नाहीं ३२.

न मिरवी शब्दज्ञान । न दाखवी आत्ममौन ।
न धरी वचनाभिमान । सदा स्मरण गुरूचें ॥३३॥
शब्दज्ञानाचा तो डौल मिरवीत नाही, किंवा मौनही दाखवीत नाहीं; तो आपल्या बोलण्याचा अभिमान बाळगीत नाही; तर निरंतर सद्‌गुरूचेंच स्मरण करीत असतो ३३.

बोलें नुपजवी उद्वेग । बोलावया न करी उद्योग ।
बोलीं नुठवी महावेग । अनुद्वेग बोलणें ॥३४॥
आपल्या शब्दानें कोणाला उद्वेग आणीत नाहीं; मुद्दाम बोलावयाची खटपट कधी करीत नाहीं; बोलण्यामध्ये कधी आवेश दाखवीत नाहीं; उद्वेग उत्पन्न न होईल असेंच तो बोलत असतो ३४.

सत्य आणि अतिमधुर । आइकतां आल्हादकर ।
सर्वांसी हितत्वें साचार । बोले सनागर हरिकथा ॥३५॥
सत्य, अत्यंत मधुर, ऐकतांना आल्हादकारक आणि सर्वांना खरोखर हितकर, अशी गोडशी हरिकथा तो सांगतो ३५.

प्रार्थूनियां सद्‍गुरूसी । बहु बोलणें नाहीं त्यासी ।
पुसणें एकाक्षरासी । निजसुखासी सेवावया ॥३६॥
सद्गुरूची प्रार्थना करतांनाही तो फारसे बोलत नाही. आत्मसुख मिळण्याचे साधन तो एकाच शब्दांत विचारतो ३६.

एवं शिष्याचीं नव लक्षणें । नवखंड पृथ्वीची आभरणें ।
निजकृपेनें नारायणे । भक्ताकारणें दीधलीं ॥३७॥
अशी ही शिष्याची नऊ लक्षणे आहेत. ही नवखंड पृथ्वीची भूषणें होत, तीं नारायणांनी कृपा करून भक्तांना दिली आहेत ३७.

हे नवरत्‍नमाळा गोमटी । जो घाली सद्‍गुरूच्या कंठीं ।
तो बैसे सायुज्याच्या पाटीं । उठाउठीं तत्काळ ॥३८॥
ह्या नवरत्नांची सुंदर माळा जो सद्गुरूच्या कंठांत घालील, तो तत्काळ हां हां म्हणतां सायुज्यसिंहासनावर बसेल ३८.

या नवरत्‍नांचें पदक ! ज्या शिष्याचे हृदयीं देख ।
तो सद्‍गुरूचा आवश्यक । विश्वासिक सर्वार्थीं ॥३९॥
ह्या नवरत्नांचे पदक ज्या शिष्याच्या हृदयावर रुळत राहील. तोच सद्गुरूचा सर्वोपरी निश्चित विश्वासू होय ३९.

या नवरत्‍नांची अभिनव गांठी । जो सद्‍गुरूसी आणी भेटी ।
तो स्वराज्याच्या मुकुटीं । झळकत उठी महामणी ॥२४०॥
ह्या नवरत्नांचा अभिनव गुच्छ जो सद्गुरूच्या भेटीला आणील, तो स्वराज्याच्या मुकुटावर महामणि होऊन झळकत राहील २४०.

उद्धवा येथें आशंका धरिसी । ‘नांदतां स्त्रीपुत्रधनधान्येंसीं ।
निर्ममता शिष्यासी । कैसेनि त्यासी उपजली’ ॥४१॥
उद्धवा ! आतां तूं येथे अशी शंका घेशील की, “बायका, मुले, धनधान्य यांसहवर्तमान नांदत असलेल्या शिष्याला अशी निर्लोभता कशी प्राप्त होते ?” ४१.

जायापत्यगृहक्षेत्र स्वजनद्रविणादिषु ।
उदासीनः समं पश्यन् सर्वेष्वर्थमिवात्मनः ॥ ७ ॥
[श्लोक ७] पत्‍नी, पुत्र, घर, जमीन, आप्तेष्ट, धन इत्यादी सर्वांमध्ये एकच आत्मा असल्यामुळे सर्वांची सुखदुःखे स्वतःसारखीच आहेत, असा सगळीकडे समभाव ठेवून तटस्थ राहावे. (७)

येविखीं सादर ऐक । शिष्य निरसावया निजदुःख ।
पावावया आत्मसुख । साधी विवेकसाधनें ॥४२॥
तर त्याविषयीही लक्ष देऊन ऐक. शिष्य हा आपले दुःख नाहीसे करण्याकरिता आणि आत्मसुख मिळविण्याकरितां विवेकाची साधने साध्य करून घेत असतो ४२.

विचारितां आत्मसुख । सर्व देहीं समान देख ।
विजातीय स्त्रीपुरुषवेख । सुखविशेख तेथ नाहीं ॥४३॥
आत्मसुखाबद्दल विचार केला, तर ते सर्वांच्या देहांत सारखेच असते. स्त्री आणि पुरुष ह्या व्यक्ति विजातीय म्हणजे भिन्न भिन्न स्वरूपाच्या असल्या तरी त्यांच्यांत सुख काही भिन्न भिन्न असत नाही ४३.

पाहें पां स्त्रीपुरुषदेहीं । आत्मा आत्मी हें तंव नाहीं ।
आत्मसुख आपुल्या ठायीं । असें पाहीं स्वतःसिद्ध ॥४४॥
असे पहा की, स्त्रीपुरुषांच्या देहांत झाले तरी आत्मा आणि आत्मी असा काही भेद नाही. आत्मसुख म्हणून जे आहे ते ज्याच्या त्याच्या ठिकाणी स्वतःसिद्धच असते ४४.

सुखाचिलागीं सर्वथा । झोंबती प्रपंचपदार्थां ।
ज्यासी गुरुवाक्य आलें हातां । अद्वैतता निजसुख ॥४५॥
सुखासाठीच सारे प्रपंचांतील पदार्थाला झोंबत असतात. पण ज्याला गुरुगम्य प्राप्त होते, त्याला अद्वैत निजात्मसुख लाभते ४५.

एकपणीं निजात्मसुख । हातां आलें नित्य निर्दोख ।
आतां द्वैत वांछी तो अतिमूर्ख । थितें सुख नासावया ॥४६॥
एकत्वाने नित्य आणि निर्दोष असें आत्मसुख हातीं आले असता, ते हातचे सुख नाहीसे करण्याकरितां जो द्वैताची इच्छा करील तो अतिमूर्ख होय ४६.

प्रपंचामाजीं असतें सुख । तरी कां त्यजिते सनकादिक ।
द्वैत तितुकें केवळ दुःख । परम सुख अद्वैतीं ॥४७॥
प्रपंचामध्येच जर सुख असते, तर सनकादिकांसारख्यांनी तो कां सोडला असता ? तर द्वैत म्हणून जितके आहे तितकें निखालस दुःखमयच आहे, आणि अद्वैतामध्येच परमसुख आहे ४७.

हेंचि साधकीं साधूनि ज्ञान । स्त्री पुत्र स्वजन धन ।
त्यांसी झाले उदासीन । अद्वैतीं मन लागलें ॥४८॥
हेच ज्ञान साधकांनी संपादन केल्यामुळे बायका मुले, आप्त, इष्ट व संपत्ति ह्यांच्याविषयी ते उदासीन बनले व अद्वैताकडेच त्यांचे मन लागले ४८.

तेथ कोणाचें गृह क्षेत्र । कोण पुसे कलत्र पुत्र ।
धनधान्यसमृद्धि विचित्र । माझें स्वतंत्र देह न म्हणे ॥४९॥
तेथे मग कोणाचे घर आणि कोणाचे शेत ? बायकामुलांना तरी कोण विचारतो ? नानाप्रकारची धनधान्याची समृद्धि असली, तरी ‘ती माझी’ व ‘ देहही माझा’ असें तो म्हणत नाही ४९.

ऐकें उद्धवा यापरी । माझे भक्त संसारी ।
उदास झाले घरदारीं । तत्त्वविचारीं लिगटोनि ॥२५०॥
उद्धवा ! ऐक. ह्याप्रमाणे माझे भक्त हे तत्त्वविचाराला लिगटल्यामुळे घरादाराला आणि संसाराला उदासीन होतात २५०.

लिगटोनियां गुरुचरणीं । केली प्रपंचाची झाडणी ।
मग अत्यादरें गुरुभजनीं । निजसुखदानी गुरुरावो ॥५१॥
ते गुरूच्या चरणांला मिठी घालून प्रपंचाची झाडणी करून टाकतात आणि आत्मसुख देणार्‍या गुरुरायाच्या भजनांत मोठ्या भक्तिभावानें तत्पर होऊन राहातात ५१.

गुरुसेवेसी अत्यादर । करितां न राहे आठौ प्रहर ।
ठेविलें गुरुचरणीं अंतर । निरंतर निजभावें ॥५२॥
तो भक्तिभावाने अष्टौप्रहर गुरुसेवाच करीत असतो. तो निरंतर भक्तिभावानें आपलें अंतःकरण गुरुचरणींच ठेवून देतो ५२.

उद्धवा येथ आशंका धरिसी । ‘जे देहावेगळें कोणे वस्तूसी ।
देखोनि पावला निजसुखासी । विदेहत्वासी अनुभवु’ ॥५३॥
उद्ध्वा ! आतां तूं अशी शंका काढशील की, ‘देहाशिवाय भिन्न अशी कोणती वस्तु पाहून त्याला आत्मसुख प्राप्त होते ? आणि विदेहपणाचा अनुभव कसा येतो ?’ ५३.

देहीं असोनि विदेहता । प्रपंचीं असोनि अद्वैतता ।
आली शिष्याचिया हातां । तेही कथा परियेसीं ॥५४॥
तर देहांत असून विदेहता आणि प्रपंचांत असून अद्वैतता शिष्याच्या हाताला कशी चढते, तीही गोष्ट ऐक ५४.

विलक्षणः स्थूलसूक्ष्माद् देहादात्मेक्षिता स्वदृक् ।
यथाग्निर्दारुणो दाह्याद् दाहकोऽन्यः प्रकाशकः ॥ ८ ॥
[श्लोक ८] आत्मा सयंप्रकाशी, सर्वाचा साक्षी आणि स्थूल व सूक्ष्म या दोन्ही देहांपासून तो पूर्णपणे वेगळा आहे ज्याप्रमाणे जळणार्‍या लाकडापासून जाळणारा व प्रकाश देणारा अग्नी वेगळाच असतो. (८)

स्थूलसूक्ष्मदेहांहून । आत्मा तो सर्वदा भिन्न ।
तेणें वेगळेपणें जाण । करी वर्तन प्रपंचीं ॥५५॥
आत्मा हा स्थूल व सूक्ष्म देहाहुन सदासर्वदा भिन्न आहे. अशा वेगळेपणानेच तो सर्वकाल प्रपंचामध्ये वर्तन करीत असतो ५५.

जीव उभय देहीं वर्ततां । प्राणियांसी देहातीतता ।
स्फुरत असे सर्वथा । तोचि तत्त्वतां नेणती ॥५६॥
या दोन्ही देहांमध्ये जीव वागत असतांही त्या जीवांना देहातीतपणा स्फुरतच असतो. पण हें त्यांना समजत नाही ५६.

म्हणे ‘माझा डोळा दुखों लागला’ । परी न म्हणे ‘ मीचि दुखों आला’ ।
माझा पावोचि मोडला’ । परी ‘ मी मोडला ‘ हें न म्हणे ॥५७॥
तो ‘माझा डोळा दुखू लागला’ असे म्हणतो, पण ‘मीच दुखू लागलों’ असे म्हणत नाही. ‘माझा पायच मोडला’ असे म्हणतो, पण ‘मीच मोडलों’ असे म्हणत नाही ५७.

यापरी देहीं वर्ततां । प्रत्यक्ष सांगे देहातीतता ।
हे आपुली आपणां अवस्था । न कळे भ्रांता देहभ्रमें ॥५८॥
याप्रमाणे देहांत वागत असतांही मी देहाहून भिन्न आहे, असे प्रत्यक्ष सांगत असतो. परंतु भ्रांत मनुष्यांना भ्रमामुळें आपली देहातीत अवस्था कळत नाही ५८.

द्रष्टा दृश्य नव्हे सर्वथा । तें जड तो चेतविता ।
एवं आत्म्यासी विलक्षणता । जाण तत्त्वतां या हेतू ॥५९॥
द्रष्टा म्ह. पाहाणारा हा दृश्य म्ह. दिसणारी वस्तु कधीच होणार नाही. पाहण्याची वस्तु म्ह. दृश्य हे जड असते आणि पाहणारा म्ह. द्रष्टा हा त्या दृश्याला चेतविणारा म्ह. जाणणारा असतो. या हेतूनेंच आत्मा हा देहाहून विलक्षण म्ह. विपरीत लक्षणाचा आहे ५९.

विलक्षणता दों प्रकारेंसीं । एक ते जाण द्रष्टेपणेंसी ।
दुसरी ते स्वप्रकाशेंसी । देहद्वयासी विलक्षण ॥२६०॥
आत्म्याला दोन प्रकारांनी वैलक्षण्य प्राप्त झाले आहे. एक तर द्रष्टेपणानें म्हणजे पाहणारा हा दृष्टीनें, आणि दुसरें स्वप्रकाशकत्वानें-स्वसंवेद्यत्वानें. म्हणूनच तो दोन्ही देहाहून अगदी विलक्षण म्ह. भिन्न आहे २६०.

द्रष्टा दृश्याहूनि भिन्न । तरी ‘तो म्हणसी झाला मन’ ।
तें चार्वाकमत जाण । मनपण त्या नाहीं ॥६१॥
दृश्याहुन दृष्टा भिन्न आहे. तर मग तो मन होईल असें म्हणशील, तर ते चार्वाकाचे मत होय. आत्म्याला मन म्हणता येणार नाही ६१.

अकरा इंद्रियांमाजीं जाण । मन तेंही एक करण ।
करणत्वें त्या जडपण । आत्मा नव्हे जाण या हेतू ॥६२॥
कारण, अकरा इंद्रियांमध्ये मनालाही एक इंद्रिय असेंच मानलेले आहे. ते इंद्रिय असल्यामुळे जड होय. ह्याच कारणाने मन कांही आत्मा नव्हे ६२.

प्रपंचीं मनाची दक्षता । तें मनपणेंचि नव्हे तत्त्वतां ।
जेवीं प्राणेंवीण नृपनाथा । न दिसे सर्वथा निजभाग्य ॥६३॥
प्रपंचामध्ये मनाची दक्षता दिसून येते, पण ती खरोखर काही मनाची नव्हे. ज्याप्रमाणे प्राणाशिवाय राजालाही कधी आपलं वैभव दृष्टीस पडावयाचें नाहीं ६३.

शस्त्राचेनि एकें घायें । छेदिले लोहार्गळसमुदाये ।
तें शस्त्राचें सामर्थ्य नोहे । बळ पाहें शूराचें ॥६४॥
शस्त्राच्या एका घावानें लोखंडाच्या चिळखताचे तुकडे तुकडे उडविले; तर ते काही शस्त्राचे सामर्थ्य नव्हे, तर तें शूराचे बळ होय ६५.

लोहाचा लोहगोळ । अग्निसंगें झाला इंगळ ।
धडधडां निघती ज्वाळ । तें नव्हे बळ लोहाचें ॥६५॥
लोखंडाचा मोठा गोळा आहे तो आगीत टाकला, तर तो तप्त होऊन धडाधड ज्वाळा निघू लागतात. पण ते काही लोखंडाचे सामर्थ्य नव्हे १५.

त्या लोखंडाऐसें जड मन । त्यासी चित्प्रभा प्रकाशून ।
प्रकृतीमाजीं प्रवर्तन । करवी जाण श्रेष्ठत्वें ॥६६॥
त्या लोखंडासारखेच मन हें जड आहे. त्याला ज्ञानप्रभाच प्रकाशित करून, त्याला श्रेष्ठत्व देऊन प्रकृतीमध्ये प्रवर्तन करविते १६.

पाव्यामाजीं रागज्ञान । केल्या अतिमधुर गायन ।
तो पाव्याचा नव्हे गुण । कळा जाण गात्याची ॥६७॥
मुरलीमधून मधुर मधुर गायन केलें किंवा नानाप्रकारचे राग काढून दाखविले, तर तो कांही त्या मुरलीचा गुण नव्हे, ते त्या गाणाऱ्याचे कौशल्य आहे ६७.

तैसा मनाचा जो व्यापार । तो जाण पां परतंत्र ।
नव्हे याचा तो स्वतंत्र । जड विचार मनाचा ॥६८॥
त्याप्रमाणे मनाचा व्यापार परतंत्रच आहे असें तूं समज. त्याचा तो व्यापार कहीं स्वतंत्र नसतो. कारण मन हे जडच आहे ६८.

सूर्याचेनि किरणसंगें । सूर्यकांतीं अग्नि निघे ।
तैसें आत्म्याचेनि प्रकाशयोगें । मन सवेगें वर्तत ॥६९॥
सूर्याचे किरण लागले म्हणजे सूर्यकांतांतून अग्नि निघतो, त्याप्रमाणे आत्म्याच्या प्रकाशाने मन मोठ्या वेगाने वागत असते ६९.

मन जडत्वें जड जाण । आत्मा स्वप्रकाशें प्रकाशघन ।
मन तें आत्म्याआधीन । आत्मा स्वाधीन आत्मत्वें ॥२७०॥
मन हें जडत्वामुळेंच जड आहे; आणि आत्मा स्वप्रकाशानें प्रकाशघन आहे. म्हणून मन में आत्म्याच्या आधीन आहे आणि आत्मा हा आत्मत्वानेच स्वाधीन आहे. २७०.

प्रत्यक्ष म्हणे ‘माझें मन’ । परी ‘मीचि मन’ न म्हणे जाण ।
यालागीं मनाहूनि आत्मा भिन्न । वेगळेपणें साक्षित्वें ॥७१ ॥
‘माझे मन’ असे प्रत्यक्ष म्हणत असतो. पण ‘मीच मन’ असे काही म्हणत नाही. म्हणून मनापासून आत्मा हा भिन्नच आहे. तो वेगळेपणाने म्हणजे साक्षिरूपाने असतो ७१.

देहद्वयाहूनि भिन्न । दृढ साधूनि आत्मज्ञान ।
देहात्मबुद्धीचें छेदन । केलें जाण शिष्याचें ॥७२॥
दोन्ही देहांहून भिन्न अशा दृष्टीने आत्मज्ञान दृढ साध्य करून, शिष्याच्या देहबुद्धीचे छेदन केलेले असतें ७२.

यालागीं देहात्मवादी । जे सत्य मनिती उपाधी ।
ते मिथ्या केली त्रिशुद्धी । शुद्ध बुद्धि ते नव्हे ॥७३॥
म्हणून देहात्मवादी लोक जे उपाधि सत्य आहे असे मानतात, ती खरोखर मिथ्या करून सोडतात. अर्थातच ही शुद्ध बुद्धि नव्हे ७३.

मनावेगळा साधिला पाहा हो । तो तुं म्हणसी पितामहो ।
तो देवांमध्यें श्रेष्ठ देवो । हाही संदेहो न धरावा ॥७४॥
आता तूं म्हणशील की, मनाहून वेगळा असलेला तो आत्मा ब्रह्मदेव असेल. कारण तो सर्व देवांत श्रेष्ठ असा आहे. पण हाही संशय तूं मनांत धरूं नको ७४.

हो का कल्पाचिये आदी । ब्रह्मयासी मौढ्य होतें आधीं ।
करूं न शके सृजनविधी । जड बुद्धि तयाची ॥७५॥
कल्पाच्या आरंभी त्या ब्रह्मदेवाला मूढपणाच होता. तो सृष्टीची उत्पत्ति करूं शकला नाही. कारण त्याची बुद्धि जड होती ७५.

त्यासी करूनि सावधान । म्यांचि प्रकाशिलें निजज्ञान ।
तेव्हां तो झाला ज्ञानसंपन्न । सृष्टिसृजन करावया ॥७६॥
त्याला सावध करून मीच आत्मज्ञान दिले. तेव्हा तो ज्ञानसंपन्न होऊन सृष्टीची उत्पत्ति करूं लागला ७६.

नाभिकमळीं जन्मलें केवळ । ब्रह्मा माझे पोटींचें बाळ ।
माझ्या दोंदावरी खेळे खेळ । आत्मा केवळ तो नव्हे ॥७७॥
केवळ नाभिकमळांत जन्मलेला ब्रह्मदेव में माझ्या पोटचे बाळ आहे. ते माझ्या पोटावरच खेळ खेळते. तो शुद्ध आत्मा नव्हे ७७.

जितुका देवांचा समुदावो । तितुका प्रकाश्यचि पाहा हो ।
मी प्रकाशकु अनादि देवो । स्वप्रकाशस्वभावो आत्मा तो मी ॥७८॥
देवांचा जितका समुदाय आहे, तितका माझ्यापासूनच प्रकाश मिळविणारा आहे, सर्वप्रकाशक आणि अनादि देव तो मी; स्वयंप्रकाश-स्वभावी आत्मा तो मीच होय ७८.

देहद्वय आणि मन । त्यांहूनि आत्मा विलक्षण ।
हिरण्यगर्भाहूनि जाण । विलक्षणपण आत्म्याचें ॥७९॥
दोन देह आणि मन यांच्याहून आत्मा आदी भिन्न आहे. हिरण्यगर्भ म्हणजे ब्रह्मांडाचा सूक्ष्म देह त्याहूनही आत्मा अगदी भितन्न आहे ७९.

हिरण्यगर्भचि परमात्मा । हेंही न घडे गा भक्तोत्तमा ।
मी हिरण्यगर्भाचाही आत्मा । माझी महिमा त्या कैंची ॥२८०॥
हे भक्तोत्तमा उद्धवा ! हिरण्यगर्भ हाच परमात्मा असेंही नाही. कारण, हिरण्यगर्भाचाही आत्मा मी आहे. तेव्हां त्याला माझी महिमा कुठून येईल ? २८०.

एवं हिरण्यगर्भ‍उपासना । ते साधनारूपेंचि सेवना ।
परी केवळ आत्मपणा । न ये जाणा मायिकत्वें ॥८१॥
तात्पर्य, हिरण्यगर्भाची उपासना करणे ती एक साधनरूप समजूनच करावी; पण ती मायिक असल्यामुळे तिला खऱ्या आत्म्याचे स्वरूप यावयाचें नाहीं ८१.

तेचि विलक्षणता । आणोनियां दृष्टांता ।
साधीतसें तत्त्वतां । भक्तांच्या हाता चढे जेणें ॥८२॥
तीच विलक्षणता ज्यायोगें भक्तांच्या हाती लागेल अशा रीतीने दृष्टांत वगैरे देऊन व्यक्त करतों ८२.

अग्नि काष्ठामाजीं वसे । परी तो काष्ठचि होऊनि नसे ।
मथिल्या काष्ठीं प्रकट दिसे । जाळी उल्हासें काष्ठातें ॥८३॥
अग्नि हा लाकडामध्येच राहतो, पण तो काही लाकूड होऊन राहत नाही. लाकडावर लाकडे घांसावीत तेव्हा तो प्रकट होतो. आणि लागलाच त्या लाकडांना जाळून टाकतो ! ८३.

तैसा आत्मा देहीं असे । तो देहोचि होऊनि नसे ।
ब्रह्मज्ञानें जेव्हां प्रकाशे । जाळी अनायासें देहभाव ॥८४॥
त्याप्रमाणे आत्माही देहांतच असतो; पण तो देहच होऊन राहात नाहीं; तो जेव्हां ब्रह्मज्ञानाने प्रकाशतो, तेव्हां तो अनायासेंच देहभाव जाळून टाकतो ८४.

असोनि एके ठायीं जाण । दाह्याहूनि दाहक भिन्न ।
तैसें प्रकाश्याहूनि जाण । भिन्नपण स्वप्रकाशा ॥८५॥
एकाच ठिकाणी असून दाह्य पदार्थांहून दाहक भिन्न असतो; त्याप्रमाणे प्रकाशित केलेल्या वस्तूहून स्वप्रकाश हा भिन्नच असतो ८५.

अग्निदृष्टांतें निश्चित । आत्मयाचें निजतत्त्व ।
नित्यत्व आणि विभुत्व । असे साधित निजबोधें ॥८६॥
अग्नीच्या दृष्टांतावरून आल्याचे खरे स्वरूप नित्यत्व आणि विभुत्व निजात्मबोधाने सिद्ध होते ८६.

काष्ठाचेनि योगें अग्नीसी । जन्मनिरोधु नामरूपांसी ।
पावे तेवीं आत्मयासी । विकारता तैसी देहयोगें ॥८७॥
काष्ठाच्या योगानेंच अग्नीला जन्म, नाश, नाम व रूप ही प्राप्त होतात; त्याप्रमाणेच आत्म्यालाही देहाच्या योगानेंच विकारभास प्राप्त होतो ८७.

निरोधोत्पत्त्यणुबृहन् नानात्वं तत्कृतान् गुणान् ।
अन्तः प्रविष्ट आधत्त एवं देहगुणान् परः ॥ ९ ॥
[श्लोक ९] जसा लाकडाशी संबंधित असून त्याहून वेगळा असलेला अग्नी लाकडाच्या आकारानुसार लहानमोठा, पेटणाराविझणारा असा लाकडाचे गुण स्वतः घेताना दिसतो, त्याचप्रमाणे आत्मासुद्धा देहात असल्यामुळे वेगळा असूनही देहाचे गुण धारण करतो. (९)

नाना काष्ठांच्या संयोगीं । काष्ठांचे गुण अग्नीच्या अंगीं ।
आले दिसती प्रत्यक्ष जगीं । अग्नि ते संगीं अलिप्त ॥८८॥
अनेक प्रकारची काष्ठें एकत्र झाल्याच्या योगाने काष्ठांचे गुण अग्नीच्या अंगांत आलेले जगामध्ये प्रत्यक्ष दिसतात; तरी अग्नि त्यांच्यापासून अलिप्तच असतो ८८.

काष्ठमथनें अग्नि प्रकटला । त्या नांव म्हणती ‘उपजला’ ।
काष्ठाकारीं आकारला । लहान थोर झाला तद्योगें ॥८९॥
लाकडावर लाकूड घासले असतां अग्नि बाहेर पडतो; त्याला अग्नि ‘उत्पन्न झाला’ असे म्हणतात. त्याचप्रमाणे लाकडाच्या आकाराप्रमाणे तो लहानथोरही झालेला दिसतो ८९.

अग्नि काष्ठविकारवशें । त्रिकोण वर्तुळ वक्र आभासे ।
काष्ठाचेनि निःशेष नाशें । ‘नाशला’ ऐसें मानिती ॥२९०॥
अग्नि हा लाकडांच्या आकाराप्रमाणे तिकोनी, वाटोळा, वांकट्शा आहे असाही भास होतो. आणि त्यांतील लाकडे पार जळून खाक झाली, म्हणजे विस्तव ‘नाहीसा झाला’ असे म्हणतात २९.

तैसा अज नित्य अव्ययो । त्यासी आकार-विकार जन्म-लयो ।
हा देहादिसंबंधस्वभावो । मिथ्या पहा हो मानिती ॥९१॥
त्याप्रमाणे अजन्मा, शाश्वत व अव्यय अमा जो आत्मा, त्याला देहाचेच आकार, विकार, जन्म, नाश इत्यादि स्वभावसंधि मिथ्याच लावतात ! ९१.

जें साधिलें अग्निदृष्टांतें । तें उद्धवासी न मनेल चित्तें ।
यालागीं निरूपण मागुतें । श्रीअनंतें मांडिलें ॥९२॥
अग्नीच्या दृष्टांतानें जे समजावून दिले, तें उद्धवाच्या मनाला कदाचित् पटणार नाही म्हणून श्रीकृष्णांनी तेच निरूपण सांगण्यास आरंभ केला ९२.

उद्धवा तूं ऐसें म्हणसी । ‘मूळीं सिद्धसंयोगु अग्निकाष्ठासी ।
तो काष्ठधर्मु लागला अग्नीसी । हें आम्हांसी मानलें ॥९३॥
ते म्हणाले, ” उद्धवा ! ह्यावर तूं असें म्हणशील की, अग्नीचा आणि काष्ठांचा संयोग ही मूळचीच सिद्ध गोष्ट आहे, तेव्हां लाकडाचा धर्म अग्नीला लागतो, ही गोष्ट मला मान्य आहे ९३.

आत्मा नित्यसिद्धु अविकारी स्वांगें । जो गगनासी नातळे अंगें ।
त्यासी देहसंगु केवीं लागे । मग तद्योगें विकारी ॥९४॥
परंतु आत्मा हा मूळचाच नित्यसिद्ध आणि अविकारी असा आहे. तो स्वतः गगनाला सुद्धा स्पर्श करीत नाही. मग त्याला देहाचा संग कसा लागेल ? आणि त्याच्या योगाने तो विकारयुक्त कसा होईल ? ९४.

आत्म्यासी देहसंगु घडे । हें बोलणेंचि तंव कुडें ।
ऐसें न घडतेंही जरी घडे । तरी तो सांपडे देहबुद्धीं ॥९५॥
आत्म्याला देहाचा संग घडतो, हे बोलणेंच मुळी खोटें आहे. हे कधीं न घडणारेही जर घडेल तर तो देहबुद्धीत सांपडेल ९५,

जो देहबुद्धीमाजीं आला । तो केवळ देहधारी झाला ।
पुढें केवीं जाय त्यागु केला ।’ ऐसा उपजला संदेहो ॥९६॥
आणि जो देहबुद्धीत सांपडला, तो शुद्ध देहधारीच झाला. मग त्याजकडून देहबुद्धीचा त्याग कसा घडणार ? असा संशय उत्पन्न होतो” ९६.

कृष्ण म्हणे उद्धवासी । ऐसी शंका झणें धरिसी ।
मन घालोनि मनाचे मानसीं । या अर्थासी परियेसीं ॥९७॥
श्रीकृष्ण उद्ध्वाला म्हणाले, “अशी शंका कदाचित् तूं घेशील, ह्याकरितां तूं मनाच्याही मनांत मन घालून त्याचा विचार ऐक ९७.

हें शब्दचातुर्यासाठीं । हाता न ये गा जगजेठी ।
हे माझ्या गुप्ताचीही गुप्त गोठी । तुजसाठीं बोलतों ॥९८॥
हे जगच्छ्रेष्ठ भक्ता ! ही गोष्ट केवळ शब्दचातुर्याने हाताला चढण्यासारखी नाही. ही माझी गुप्तांतली गुप्त गोष्ट आहे. ती केवळ तुला म्हणूनच सांगतों ९८.

योऽसौ गुणैर्विरचितो देहोऽयं पुरुषस्य हि ।
संसारस्तन्निबंधोऽयं पुंसो विद्याच्छिदात्मनः ॥ १० ॥
[श्लोक १०. ] हे मनुष्याचे शरीर त्रिगुणांचेच बनलेले आहे या गुणांमध्ये ‘मी माझे’ पणा असल्यामुळे माणसाच्या मागे संसार लागला आहे त्याचा नाश आत्मज्ञानानेच होतो. (१०)

ऐकें पुरुष जो पुरुषोत्तम । ज्या आधीन मायागुणग्राम ।
ज्यासी ‘ईश्वर’ ऐसा नामधर्म । शास्त्रानुक्रम बोलती ॥९९॥
उद्धवा ऐक. पुरुषोत्तम म्हणून जो पुरुष आहे, मायेचे सर्व गुण ज्याच्या आधीन आहेत, ‘ईश्वर’ असे ज्याला शास्त्रांनी अन्वर्थक नाव दिले आहे. ९९.

त्या ईश्वराची जे माया । ज्या उपजविलें नाना कार्या ।
जीव संसारी करावया । भ्रमु वायां वाढविला ॥३००॥
त्या ईश्वराची जी माया, जिला, जीवाला संसारांत पाडावे आणि व्यर्थ भ्रम वाढवावा इत्यादि अनेक कार्याकरितां निर्माण केली आहे ३००;

तेथें चैतन्य जें प्रतिबिंबले । तेंचि ‘जीव’ पणें वाच्य झालें ।
जेवीं थिल्लरीं चंद्रबिंब बुडालें । दिसे नाथिलें मूर्खासी ॥१॥
त्या मायेमध्ये जे चैतन्य प्रतिबिंबित झाले आहे, त्यालाच ‘जीव’ असे म्हणतात. मूर्खाला ज्याप्रमाणे डबक्यांत चंद्रबिंब बुडालें असें खोटेंच दिसते, (तसेंच हे आहे) १.

त्या थिल्लरासी नातळत । चंद्रमा असे गगनीं अलिप्त ।
तैसा आत्मा अविद्यातीत । अविद्या नातळत प्रतिबिंबाला ॥२॥
पण चंद्र हा त्या डबक्याला न शिवतां आकाशामध्ये अलिप्तच असतो. त्याप्रमाणे आत्माही अविद्येपासून निराळाच आहे. प्रतिबिंबाला सुद्धा अविद्या शिवत नाही, मग बिंबाला कुठली ? २.

‘अहमिति’ प्रथमाध्यासें । सूक्ष्म लिंगदेह मायावशें ।
नाना अनर्थकारी कैसें । वासनासौरसें उपजलें ॥३॥
‘अहं’ ह्या प्रथमाध्यासाने वासनेच्या आसक्तीने उत्पन्न झालेले सूक्ष्म असे जे लिंगशरीर, ते मायेला वश होऊन अनेक अनर्थ उत्पन्न करतें ! ३.

जरी लिंगदेह झालें सबळ । विषयभोगा दृढ मूळ ।
तरी भोगु नव्हे स्थूळ । सूक्ष्म भूतगोळ स्थूळावला ॥४॥
लिंगदेह बलवान् झाला म्हणजे तोच विषयभोगाचे दृढ मूळ होतो. पण लिंगदेह काही स्थूल भोग घेऊ शकत नाही. सूक्ष्मभूतसमूहच स्थूल भूताकार होतो ४.

स्थूळापासोनि स्थूळ देहो । पांचभौतिक घडला पहा हो ।
एवं उभयदेह अभिप्रावो । झाला निर्वाहो या रीतीं ॥५॥
त्यानंतर पंचमहाभूतांपासून स्थूलदेह उत्पन्न होतो. अशा प्रकारे दोन्ही देह नावारूपाला येतात ५.

ऐसा उभय देहीं वर्ततां । दृढ लागली देहात्मता ।
तेणें वाढली अहंममता । मी कोण हें तत्त्वतां विसरला ॥६॥
अशा या दोन्ही देहांत वागतांना जीवाला देहबुद्धि दृढतर होऊन राहते. त्यामुळे अहंममता वाढते, आणि खरोखर मी कोण हें तो विसरूनच जातो ६.

न कळे निजसुखाची गोडी । पडला विषयांचिये वोढी ।
पापपुण्यांचिया जोडी कोडी । पडिली बेडी सुबुद्धा ॥७॥
आत्मसुखाची गोडी कळत नाही, त्यामुळे विषयांची चटक लागून राहते. पापपुण्याच्या राशी जोडतो; सुबुद्ध असताही अशा रीतीनें पायांत बेडी पडते ७.

देहाध्यासें देहधर्म । सत्य मानी वर्णाश्रम ।
मग आचरों लागे कर्म । फळसंभ्रम वांछूनि ॥८॥
देह हाच मी अशी भावना दृढ झाल्याने देहाचे धर्म म्हणजे स्थूल, कृश इत्यादि व त्यास लागून असणारे वर्णाश्रमाचे धर्म खरे मानूं लागतो. आणि मग फळाच्या वैभवाची इच्छा धरून कर्माचरण करूं लागतो ८.

राजा चक्रवर्ती निजमंदिरीं । निजेला सुमनशेजेवरी ।
तो स्वप्नीं होऊनि भिकारी । अंत्यजाघरीं अन्न मागे ॥९॥
एखादा सार्वभौम राजा आपल्या मंदिरांत पुष्पशय्येवर निजलेला असतो, तोच स्वप्नामध्ये भिकारी होऊन एखाद्या अंत्यजाच्या घरी अन्न मागावयाला जातो ९.

तेथ कुटका एकु यावया हाता । नीचासी म्हणे राजा रे तूं तत्त्वतां ।
परी मी राजा हें नाठवे चित्ता । स्वप्नीं भिक्षुकता दृढ झाली ॥३१०॥
तेथे एखादा तुकडा हातावर पडावा म्हणून तो त्या नीचाला म्हणतो, ‘अरे ! तूं खरोखर राजा आहेस, पण आपण स्वतः राजा आहे ह्याची त्याच्या मनाला आठवणही होत नाही. स्वप्नामध्ये आपण भिकारी आहों, हेच त्याच्या मनांत बिंबलेले असते ३१०.

तैसी विसरोनि निजात्मता । फळें मागे देवां देवतां ।
मी देवांचा देवो तत्त्वतां । हें त्यासी सर्वथा नाठवे ॥११॥
त्याप्रमाणेच आपली निजात्मता विसरून जाऊन तो देवांना आणि देवतांना फळे मागू लागतो. पण खरोखर देवांचाही देव आपण आहे हे त्याला मुळीच आठवत नाही ! ११.

त्या स्वप्नाचेनि अतिअध्यासें । राजा वोसणावे ‘मी भिकारी’ ऐसें ।
ऐकोनि सेवकां येत हांसें । राजा स्वप्नवशें जल्पतु ॥१२॥
त्या स्वप्नाच्या अध्यासामुळे तो राजा ‘मी भिकारी’ असे ओरडत असतो. ते ऐकून जवळच्या सेवकांना हंसें येते; आणि ते म्हणतात राजेसाहेब स्वप्नांत बडबडत आहेत ! १२.

येथ गाढ मूळ अवस्थाघोरें । सर्वांग गडबडी निदसुरें ।
नागवें उघडें न स्मरे । निद्राभरें घोरत ॥१३॥
त्याला गाढ व बेशुद्ध अवस्थेनें घेरलेले असते. झोपेच्या भरांत सारे अंग गडबडा लोळत असते. ते नागवें आहे का उघडे आहे, याचीही त्याला शुद्धि नसते. झोपेमध्ये तो घोरत असतो १३.

त्यासी थापटी पुरोहितु । जागा होतां होय विस्मितु ।
मग नागवेपणा आच्छादितु । सांगों लाजतु भिक्षुकता ॥१४॥
त्याला पुरोहित येऊन थापटतो, तेव्हां विस्मय पावून जागा होतो, व नागवेपणा झाकण्याकरितां अंगावर वस्त्र घेतो; आपण स्वप्नांत भिकारी झालो होतो, हे सांगावयाची त्याला लाज वाटू लागते १४.

तेवीं अविद्या निद्रा उद्‍भटा । जल्पे मी देही मी करंटा ।
मी संपन्नु मी ज्ञाता मोठा । देहात्मनिष्ठा बडबडी ॥१५॥
त्याप्रमाणे अविद्यारूप निद्रेच्या तंद्रीने घेरलें म्हणजे मी देहधारी, मी कपाळकरंटा, मी श्रीमंत, मी ज्ञाता, मी मोठा असें तो देहात्मभावानें बडबडत असतो १५.

तेणें निदसुरपणाचे लाहें । कर्माकर्मांचे पसरी पाये ।
हिताहित कोण पाहे । देहमोहें मोहितु ॥१६॥
त्या झोपाळूपणांत तो कर्माकर्मरूप पाय पसरतो. देहाच्या मोहाने भूल पडली असल्यामुळे हिताहित तरी पहाणार कोण ? १६.

तो गाढमूढ अवस्थेआंतु । होता दीर्घसंकल्पें लोळतु ।
लोभें अतिजल्पें जल्पतु । वोसणतु ‘मी माझें’ ॥१७॥
तो तसाच गाढ मूढ अवस्थेमध्ये दीर्घसंकल्पाने लोळत असतो. आणि लोभाने पाहिजे ती बडबड करतो, व ‘मी आणि माझे’ असे ओरडत असतो १७.

तेथें दैवयोगें गडबडितु । अवचटें गुरुचरणीं आदळतु ।
निकटता देखोनि कृपावंतु । थापटितु निजबोधें ॥१८॥
अशा रीतीने गडबड लोळत असतां अकस्मात दैवयोगानें गुरूच्या पायांवर जाऊन आदळतो. तेव्हां जवळ आलेला पाहून श्रीगुरु कृपावंत होऊन त्याला निजबोधाने थापटतात १८.

‘ब्रह्माहमस्मि’ ऐसी वाणी । एक वेळ पडली कानीं ।
अविद्या निद्रा गेली पळोनी । तो तत्क्षणीं जागिन्नला ॥१९॥
‘ब्रह्माहमस्मि’ (मी ब्रह्म आहे) अशी वाणी एक वेळ कानावर पडली की, तत्काळ अविद्यारूप निद्रा पळून जाऊन तो लागलाच जागा होतो १९.

जागतांचि होय विस्मित । ‘मी देह’ म्हणतां लाजत ।
देहकर्म देखे निंदित । कर्मातीत ब्रह्म मी ॥३२०॥
जागा होतांच तो विस्मित होतो आणि ‘मी देह’ म्हणतांना लाजू लागतो, व देहकर्माची निंदा करतो. आणि कर्मातीत जें ब्रह्म तें मीच असें म्हणतो ३२०.

होआवया संसारबंधन । यासी अविद्याचि गा कारण ।
तिसी छेदावया जाण । खड्‍ग तीक्ष्ण ब्रह्मविद्या ॥२१॥
संसारबंधन पाठीस लागावयाला अविद्या हीच एक कारण आहे. तिला छेदावयाला ब्रह्मविद्या हेच तीक्ष्ण खड्ग आहे, असें तूं समज २१.

अविद्या निरसी ब्रह्मज्ञान । ते अवश्य ब्रह्माहोनि भिन्न ।
मोडलें म्हणसी अद्वैतपण । तें नव्हे जाण सिद्धांतीं ॥२२॥
ब्रह्मज्ञान में अविद्येचे निरसन करते, त्याअर्थी ती ब्रह्माहून अवश्य भिन्न असली पाहिजे; आणि ती भिन्न म्हटली की, अद्वैतपण मोडले असें म्हणशील तर सिद्धांतामध्ये हे टिकणारे नाही २२.

प्रपंचु अज्ञानें लाठा । ज्ञान‍अज्ञानाच्या सत्त्ववाटा ।
फेडिजे कांटेन कांटा । मग खटपटा निमाल्या ॥२३॥
अज्ञानामुळेंच प्रपंच वाढला आहे. त्यांत ज्ञानाच्या आणि अज्ञानाच्या सूक्ष्म वाटा आहेत; काट्याने काटा काढून टाकला म्हणजे सारी यातायात संपली २३.

अविद्या जीवबंधनी । ब्रह्मविद्या बंधच्छेदनी ।
या समूळ तुजलागुनी । सांगितल्या दोनी सविस्तर ॥२४॥
अविद्या ही जीवाला बंधन घालणारी आणि महाविद्या ही बंधाचे छेदन करणारी आहे. त्या दोन्ही तुला सविस्तर सांगून दिल्या २४.

तेचि ब्रह्मविद्या जाणा । कैसेनि प्राप्त होय आपणा ।
ते पूर्वपीठ विवंचना । सावधमना परियेसीं ॥२५॥
आता तीच ब्रह्मविद्या आपल्याला कशी प्राप्त होईल, याबद्दलची पूर्वपीठ विवंचना सांगतों ती लक्ष देऊन ऐक २५.

तस्माज्जिज्ञासयाऽऽत्मानं आत्मस्थं केवलं परम् ।
सङ्गम्य निरसेदेतद् वस्तुबुद्धिं यथाक्रमम् ॥ ११ ॥
[श्लोक ११] म्हणूण विवेकाने देहामध्ये असणार्‍या केवलस्वरूप परमात्म्याला नीट जाणून, स्थूलसूक्ष्म देहांविषयीची सत्यबुद्धी सोडून द्यावी. (११)

उद्धवा याचिलागीं नित्य । जिज्ञासें बैसवावें चित्त ।
तिसी विवेक उपजवित । सत्यासत्यविभागें ॥२६॥
उद्धवा ! याचकरितां जिज्ञासूनें चित्ताला नेहमी स्थिर ठेवावे, म्हणजे सत्यासत्यविभागाने विवेक उत्पन्न होतो २६.

तेथ असत्य तितकी ‘अविद्या’ । जिचेनि जीवासी परम बाधा ।
तिच्या समूळ करावया छेदा । ‘सद्विद्या’ साधावी ॥२७॥
त्यांत असत्य असेल तितकी ‘अविद्या’ होय. तिच्या योगेंकरून जीवाला अतिशय पीडा होते. तिला समूळ खणून काढण्यासाठी ‘सद्विद्या’ संपादन करावी २७.

सद्विद्या साधिलिया पाहीं । केवळ वस्तु ते दूरी नाहीं ।
असे आपुल्याचि ठायीं । येचि देहीं कूटस्थ ॥२८॥
सद्विद्या साध्य केली की, सद्वस्तु (परब्रह्म) दूर नाही. आपल्याच ठिकाणी, याच देहांत कूटस्थ होऊन आहे २८.

कार्यकारणसंघात । यामाजीं वस्तु असे व्याप्त ।
व्यापूनियां अलिप्त । नित्यमुक्त स्वभावें ॥२९॥
शरीर-इंद्रियांच्या समुदायांत ब्रह्म हें व्यापलेले असते ; पण तें व्यापलेलें असूनही अलिप्त आणि स्वभावधर्माप्रमाणे नित्यमुक्तच राहातें २९.

करूनि सद्विद्यासाधन । धरूनि आत्मानुसंधान ।
देहद्वयाचें निरसन । साधकें जाण साधावें ॥३३०॥
सद्विद्येचे साधन करून, आत्मानुसंधान धरून साधकानें दोन्ही देहांचे निरसन साध्य करून घ्यावें ३३०.

स्थूल नश्वरत्वे मिथ्या झालें । सूक्ष्म वासनामय कल्पिलें ।
ते कल्पनेसी मिथ्यात्व आलें । ब्रह्म उरलें निर्विकल्प ॥३१॥
स्थूल देह हा नश्वर असल्यामुळे मिथ्याच झाला; आणि सूक्ष्म देह वासनामय कल्पित आहे ; त्या कल्पनेलाही मिथ्यात्व येते. त्यामुळे बाकी राहातें तें निर्विकल्प ब्रह्मच राहते ३१.

जैशा गगनीं नाना मेघपंक्ती । निजबळें त्या वर्षती ।
त्याचि शारदियेचे अंतीं । हरपोनि जाती आकाशीं ॥३२॥
ज्याप्रमाणें आकाशात प्रचंड मेघपंक्ति भरून येऊन आपल्याच सामर्थ्याने पर्जन्यवृष्टि करतात; पण त्याच शरद्‌ऋतूच्या अखेरीस आकाशांतच लुप्त होतात ३२.

तैसी देहीं देहात्मबुद्धी । दृढ केली होती त्रिशुद्धी ।
तेचि विवेकाचिया प्रबोधीं । नास्तिकसिद्धी पावली ॥३३॥
त्याप्रमाणे देहामध्येच जी आत्मबुद्धि दृढ केलेली होती, तीच विवेकाचा उदय होतांच नाहीशी होऊन जाते ३३.

देह-असद्‍भावाची पदवी । ब्रह्मविद्येच्या सद्‍भावीं ।
खद्योततेजाची दिवी । सूर्ये देखावी कैसेनि ॥३४॥
काजव्याच्या उजेडाची ज्योत सूर्याला पहावयाला कशी मिळणार ? त्याप्रमाणे ब्रह्मविद्येचा उदय झाल्यावर देहाचे सत्यस्व कसे टिकणार ? ३४.

दोर भासला होता विखार । त्याचा करितां निजनिर्धार ।
हारपोनियां सर्पाकार । उरे दोर निजरूपें ॥३५॥
दोराच्या ठिकाणी सापाचा भास झाला होता, त्याची जेव्हा शहानिशा झाली, तेव्हां सापाचा आकार जाऊन दोर तो दोराच्या स्वरूपानेच शिल्लक राहिला ३५.

पाहतां विवेकाचेनि निवाडें । दोराचें सर्पत्व जेवीं उडे ।
तेवीं ब्रह्मसद्‍भावीं रोकडें । देह नातुडे सत्यत्वें ॥३६॥
विवेकानें ठरविले असता ज्याप्रमाणे दोराचे सर्पपण उडून जाते, त्याप्रमाणे ब्रह्माच्या सत्यत्वापुढे देहाचे सत्यत्व उरत नाही ३६.

‘नरदेह आश्रयून । ब्रह्मविद्या वाढली जाण ।
तें आपुलें जन्मस्थान । देहनिर्दळण केवीं करी’ ॥३७॥
नरदेहाचा आश्रय करून ब्रह्मविद्या वाढलेली असते. तेव्हा तिचे जन्मस्थान जो देह, त्याचेच निर्मूलन ती कशी करील ? ३७.

उद्धवा तूं ऐस‍ऐसी । आशंका झणीं धरिसी ।
ते अग्निउत्पत्तिदृष्टांतेंसीं । तुजपाशीं सांगेन ॥३८॥
उद्धवा, अशा प्रकारची शंकाही कदाचित घेशील; तर अग्नीच्या उत्पत्तीच्या दृष्टांताने तिचे समाधान तुला सांगतों, ऐक ३८.

आचार्योऽरणिराद्यः स्यादन्तेवास्युत्तरारणिः ।
तत्संधानं प्रवचनं विद्यासंधिः सुखावहः ॥ १२ ॥
[श्लोक १२] (यज्ञासाठी अग्नी उंबराच्या लाकडांपासून घुसळून काढतात त्यात खाली लाकूड असते त्याला ‘अधरअरणी’ म्हणतात वरच्याला ‘उत्तरअरणी’ म्हणतात आणि मधल्या उभ्या रवीसारख्या लाकडाला ‘मंथनकाष्ठ’ म्हणतात हे घुसळले असता अग्नी उत्पन्न होतो येथे हे रूपक केले आहे) ज्ञानरूप अग्नी उत्पन्न होणार्‍या क्रियेत आचार्य खालचे लाकूड आहेत, आणि शिष्य वरचे आचार्यांचे प्रवचन हे मंथनकाष्ठ होय त्यापसून आत्मज्ञानरूपी अग्नी निर्माण होतो तो परमानंद देणारा आहे. (१२)

दों काष्ठांचिया घसणीं । अग्नि काढिला मंथोनि ।
तो काष्ठें काष्ठ जाळूनी । अग्नि अग्निपणीं प्रज्वळला ॥३९॥
दोन लाकडे एकमेकांवर घासून त्या घर्षणाने अग्नि उत्पन्न केला, तर तो त्या लाकडांनाच जाळून अग्नीच्या रूपाने प्रज्वलित होतो ३९;

तैसी ब्रह्मविद्या जाण । गुरुशिष्यसंवादमंथन ।
त्या मंथनाचें निरूपण । सावधान परियेसीं ॥३४०॥
त्याप्रमाणे ब्रह्मविद्या ही गुरुशिष्याच्या संवादरूप मंथनाने (घर्षणानें ) उत्पन्न होते. त्या मंथनाचे निरूपण लक्ष देऊन ऐक ३४०.

येथ आचार्य आद्य अरणी । शिष्य तो झाला उत्तरारणी ।
उपदेश तो मंथास्थानीं । संवादमंथनीं मंथावे ॥४१॥
त्यांत गुरु हा ‘आद्य अरणि’ म्हणजे अग्नि उत्पन्न करण्याचे खालचे काष्ठ ; आणि शिष्य हा ‘उत्तरारणि’ म्हणजे वरचे काष्ठ होय; उपदेश हा ‘मंथा ‘ म्हणजे घुसळण्याची रवी होय. आणि गुरुशिष्यांचा संवाद ही मंथनक्रिया होय. ह्याप्रमाणे मंथन करावें ४१.

ये मंथनी जरी आळसु केला । तरी ज्ञानाग्नीचा आविर्भाव गेला ।
आपणिया आपण वंचला । थित्या मुकला साधना ॥४२॥
ह्या मंथनांत म्हणजे संवादांत जर आळस केला, तर ज्ञानाग्नि काही उत्पन्न होणार नाही. आपणच आपल्याला फसविल्यासारखे होऊन असलेल्या साधनावर पाणी पडते ४२.

धरितां आळसाची मागी । येव्हडा अनर्थु वाजे अंगीं ।
आठही प्रहर शिणताति योगी । या योगालागीं साधावया ॥४३॥
आळसाचा मार्ग पत्करला की, एवढा अनर्थ अंगावर कोसळतो. या योगाला साध्य करण्याकरितां आठही प्रहर योगी कष्ट करीत असतात ४३.

निजस्वार्थालागीं सावधान । गुरुवचनाचें अनुसंधान ।
अविश्रम करितां मंथन । ब्रह्मज्ञान तैं प्रकटे ॥४४॥
आपल्या हितासाठी जागृति ठेवून गुरुवचनावर विश्वास धरून एकसारखें मंथन (मनन) करीत रहावे, तेव्हांच ब्रह्मज्ञान प्रगट होते ४४.

प्रकटलें ब्रह्मज्ञान । उरों नेदी देहाचें भान ।
दृश्य द्रष्टा दर्शन । करी प्राशन तात्काळ ॥४५॥
तें ब्रह्मज्ञान एकदां प्रगट झाले की, देहाचे भान उरूंच देत नाही. दृश्य, द्रष्टा आणि दर्शन में सारें तत्काळ ग्रासूनच टाकतें ४५.

कार्य कर्म आणि कर्ता । ज्ञान ज्ञेय आणि ज्ञाता ।
हें उरों नेदी सर्वथा । निजात्मता निजबोधें ॥४६॥
आत्मज्ञानाने आत्मस्वरूप लाधलें कीं, कार्य-कर्म-कर्ता किंवा ज्ञान-ज्ञेय-ज्ञाता ही मुळीच राहत नाहीत ४६.

निजबोधें संसार-दुःख । निरसूनि दिधलें निजसुख ।
निजात्मसुखीं निःशेख । मायागुण देख नासिले ॥४७॥
आत्मज्ञानाने संसारदुःख लयास जाऊन आत्मसुखाचा लाभ होतो; आणि आत्मसुखामध्ये मायेच्या गुणदोषांचा चट सारा नाश होऊन जातो ४७.

वैशारदी सातिविशुद्धबुद्धिः nbsp; धुनोति मायां गुणसंप्रसूताम् ।
गुणांश्च सन्दह्य यदात्ममेतत् nbsp; स्वयं च शाम्यत्यसमिद् यथाग्निः ॥ १३ ॥
[श्लोक १३] बुद्धीमान शिष्यांची ती अत्यंत शुद्ध झालेली बुद्धी गुणांपासून उत्पन्न झालेल्या विषयरूप मायेचे भस्म करून टाकते जेव्हा जग उत्पन्न करणारे गुण भस्म होतात, तेव्हा इंधनाला जाळून स्वतः शांत होणार्‍या अग्नीप्रमाणे ती बुद्धीसुद्धा नाहीशी होते. (१३)

नाशावया निजमायागुण । शिष्य विशारद बुद्धिनिपुण ।
दैवी संपदेचें अधिष्ठान । सद्‍गुणीं संपन्न सर्वदा ॥४८॥
आत्ममायेचे गुण निरसन करण्याकरितां शिष्य चतुर आणि बुद्धिमान् व दैवी संपत्तीचा आश्रय करून निरंतर सद्गुणसंपन्न असावा लागतो ४८.

ऐसा मुमुक्षु अधिकारवंतु । त्यासी शाब्दपरनिष्णातु ।
गुरूंनीं माथां ठेविला हातु । निजबोधु प्राप्तु तत्काळें ॥४९॥
अशा प्रकारच्या अधिकारी मुमुक्षुच्या मस्तकावर शास्त्रपारंगत व स्वानुभवसंपन्न अशा गुरूंनी वरदहस्त ठेवला असता त्याला तत्काळ निजबोध प्राप्त होतो ४९.

निजबोधीं बैसतां दृष्टी । गुणकार्य रिघे गुणांच्या पोटीं ।
तेव्हां गुणुचि गुणातें आटी । तमातें घोंटी मध्यमु ॥३५०॥
त्या निजबोधांत दृष्टि स्थिर झाली म्हणजे गुणांचे कार्य गुणांच्याच पोटांत शिरतें. तेव्हां गुणच गुणाला गिळून टाकतात. तमाला रजोगुण प्राशन करतो ३५०.

तम खाऊन रजोगुण । अत्यंत उन्मत्त झाला जाण ।
त्याचें देखोनि उन्मत्तपण । सत्त्वें सत्त्वगुण खवळला ॥५१॥
सम खाउन रजोगुण अत्यंत उन्मत्त झाला की, त्याचा तो उन्मत्तपणा पाहून सत्त्वपणाने सत्त्वगुणही खवळतो ५१.

जेव्हां खवळला सत्त्वगुण । त्यासी न साहे दुजेपण ।
रजोगुणांचें प्राशन । केलें जाण तत्काळ ॥५२॥
सत्त्वगुण खवळला, की त्याला दुजेंपण सहन होत नाही. म्हणून तो तत्काळ रजोगुणाला गिळून टाकतो ५२.

केवळ सत्त्वाचा स्वभावो । तेणें निजसुखाचा अनुभवो ।
क्षणक्षणां नीच नवा पहावो । अतिनवलावो अनुभवीं ॥५३॥
शुद्धसत्त्वाचा स्वभावच असा आहे की, त्याने आत्मसुखाचा अनुभव येतो. त्या अनुभवाचे कसे आश्चर्य पहा ! की तो निरंतर नित्य नवाच वाटतो ५३.

तेणें सुखानुभवें देखा । रजतमाच्या बीजकणिका ।
ज्या सृष्टिसृजनीं उन्मुखा । त्याही निःशेखा जाळिल्या ॥५४॥
आणखी असे पहा की, त्या सुखानुभवाने सृष्टि उत्पन्न करण्यास साहाय्यभूत असणाऱ्या ज्या रजतमाच्या बीजाच्या कण्या शिल्लक राहिलेल्या असतात, त्यांचीही राखरांगोळी होऊन जाते ५४.

तेव्हां गुण प्रसवती माया । शोधित सत्त्वें आणिली लया ।
ते सत्त्ववृत्ति एकलिया । अद्वैततया उरलीसे ॥५५॥
तेव्हां गुणांना उत्पन्न करणारी मायाही त्या शुद्ध सत्वांत लय पावते. आणि ती सत्त्ववृत्ति एकटेपणाने अद्वैतरूपानेच शिल्लक राहाते ५५.

तेव्हां ‘ब्रह्माहमस्मि’ लक्षण । तेंही हों लागलें क्षीण ।
सोहंहंसाची बोळवण । ते संधी जाण होतसे ॥५६॥
तेव्हा ‘ब्रह्माहमस्मि’ – म्हणजे ब्रह्म तें मीच-ही भावनाही हळूहळू क्षीण होऊ लागते. आणि त्याच वेळी ‘सोहंहंसा’ चीही बोळवण होते ५६.

तेथ देहींचें गेलें देहपण । जन्ममरणा आलें मरण ।
विश्वाचें न दिसे भान । आनंदघन कोंदला ॥५७॥
त्यावेळी देहाचा देहपणाच नाहींसा होतो आणि जन्ममरणालाच मरण येते. विश्वाचे भान नाहीसे होते व जिकडे तिकडे घनानंद भरून राहतो ५७.

तेणें सुखस्वरूप झाली दृष्टी । आनंदमय झाली सृष्टी ।
परमानंदें चढली पुष्टी । स्वानंदे मिठी घातली ॥५८॥
तेव्हां सारी दृष्टि सुखमयच होऊन जाते, आणि सारी सृष्टिही आनंदमय होते. आत्मानंदाने मिठी घातल्यामुळे परमानंदच माजून राहतो ५८.

त्या सुखाची मर्यादा । काइसेनिही नव्हे कदा ।
जेथ मौन पडिलें वेदां । वृत्ति तत्पदा पावली ॥५९॥
त्या सुखाची बरोबरी कधी कशानेंच व्हावयाची नाही. वेदांनाही जेथे मौन पडते, अशा तत्पदाला वृत्ति पोंचते ५९.

द्वैत सर्वथा नाहीं पुढें । यालागीं वृत्तीची वाढी मोडे ।
तेव्हा तेही सुखस्वरूपीं बुडे । पुढें वाढे तें नाहीं ॥३६०॥
पुढे द्वैत म्हणून उरतच नाहीं; त्यामुळे वृत्तीची वाढ खुंटते. ती सुखस्वरूपांत बुडून गेल्यामुळे पुढे तिची वाढीमोडी राहात नाही ३६०.

जैसा निरिंधन अग्नी । जाय निजतेजीं मिळूनी ।
तैशी वृत्ति अद्वैतपणीं । मिळे मिळणीं सुखरूपीं ॥६१॥
लाकडांवांचून अग्नि जसा आपल्या मूळच्या तेजांत मिळून जातो, त्याप्रमाणे वृत्तिही अद्वैतपणाने सुखस्वरूपांतच मिळून एकरूप होते ६१.

गंगा सागर मीनली । ते समुद्रचि होऊनि ठेली ।
कां लवणजळां भेटी झाली । मिठी पडली जळत्वें ॥६२॥
गंगा समुद्राला मिळाली म्हणजे समुद्रच होऊन राहते, किंवा पाण्याची आणि मिठाची भेट झाली म्हणजे ते सारे पाणीस्वरूपच होते ६२.

दीपीं दीपु एकवटला । मिळणीं एकुचि होऊनि ठेला ।
तैसा वृत्तीचा लयो झाला । निर्व्यंग पावला निजसुख ॥६३॥
एक दिवा दुसऱ्या दिव्यांत मिळतांच दोन्ही एकरूप होतात, त्याप्रमाणे वृत्तीचा लय झाला म्हणजे निर्व्यंग अशा आत्मसुखाची प्राप्ति होते ६३.

तेव्हां आत्मा एक अद्वैत । तेंही म्हणणें नाहीं तेथ ।
एवं द्वैताद्वैतातीत । नित्य निश्चित निजात्मा ॥६४॥
तेव्हां आत्मा हा एक अद्वैत आहे, हेही म्हणणे त्या वेळी शिल्लक राहात नाही. अर्थात् आत्मा हा द्वैताद्वैताहून भिन्न, नित्य आणि सत्यस्वरूप असा आहे ६४.

तो ज्ञानस्वरूप स्वप्रकाश । अविकारी अविनाश ।
अकर्ता अभोक्ता उदास । निर्विशेष निजरूप ॥६५॥
तो ज्ञानस्वरूप, स्वयंप्रकाश, अविकारी, अविनाशी, अकर्ता, अभोक्ता, उदास आणि निर्विशेष असा निजात्मरूप आहे ६५.

तो अदेही अगोत्र । अचक्षु अश्रोत्र ।
अमनस्क अमंत्र । सर्व मंत्र-मंत्रार्थ जो ॥६६॥
त्याला देह नाही, त्याला कुल नाही, त्याला डोळे नाहींत, त्याला कान नाहींत, त्याला मन नाहीं, तो सर्व मंत्र व मंत्रार्थस्वरूप आहे ६६.

जो अज आद्य अप्रमेय । अतर्क्य अलक्ष्य अव्यय ।
नामरूपादि अभाव्य । भावना भाव ते शून्य ॥६७॥
तो अजन्मा, आद्य, अप्रमेय, अतर्क्य, अलक्ष्य, अव्यय, नामरूपादिकांनी आकलन न होणारा भावाभावशून्य असा आहे ६७.

जो भोग्य भोग नव्हे भोक्ता । जो कार्य कर्म नव्हे कर्ता ।
कर्ता अकर्ता या वार्ता । जेथ सर्वथा निमाल्या ॥६८॥
जो भोग्य, भोक्ता व भोगही नव्हे; जो कार्य, कर्ता व कर्मही नव्हे; कर्ता आणि अकर्ता ह्या गोष्टीच जेथे नाहीशा झाल्या ६८;

जो अविनाशी अभंग । जो शुद्ध बुद्ध असंग ।
देहद्वयाचा संग । ज्याचें अंग स्पर्शेना ॥६९॥
तो अविनाशी, अभंग, शुद्ध, बुद्ध, असंग, देहद्व्ययाचा स्पर्शसुद्धा त्याला नाही ६९,

आत्म्यावेगळें तें अनित्य । हा पूर्वनिश्चय होतां सत्य ।
आतां बुडाले नित्यानित्य । सबराभरित निजात्मा ॥३७०॥
आत्म्याशिवाय सारे अनित्य होय, हा पूर्वीचा निश्चय घट्ट झाला असतां, नित्य आणि अनित्य दोन्ही बुडून जाऊन अंतर्बाह्य आत्मस्वरूपच शिल्लक राहातें ३७०.

नेणपण निमालें सर्वथा । बुडाली जाणपणाची अवस्था ।
गुणगुणीगुणातीतता । हेही तत्त्वतां तेथ नाहीं ॥७१॥
अजाणपण सर्व नाहीसें झालें आणि जाणतेपणाची स्थितिहि राहात नाही. गुण, गुणी आणि गुणातीतपणा हेही खरोखर त्या अवस्थेत नाहींसे होतें ७१.

उद्धवा परमात्मा तो तत्त्वतां । हा माझा निश्चयो सर्वथा ।
तोचि उपनिषदर्थे अर्थितां । निजात्मता प्रतिपाद्य ॥७२॥
उद्धवा ! खरोखर परमात्मा तो तोच, असा माझा सर्वतोपरी निश्चय आहे. उपनिषदर्थानें व्यक्त केलेला व आत्मत्वाने प्रतिपादन केलेला तोच ७२.

येथ पावलियाहि वृत्ति । होय संसारनिवृत्ति ।
हाचि वेदांतीं सिद्धांतीं । निश्चयो निश्चितीं केला असे ॥७३॥
अशा स्थितीला वृत्ति जाऊन पोंचली की, संसाराची निवृत्ति होते. वेदांतानें व सिद्धांताने हाच शेवटचा निश्चय केलेला आहे ७३.

येथूनि कार्य-कर्मकर्तव्यता । निःशेष खुंटली सर्वथा ।
निजीं निजरूप निजात्मता । जाण तत्त्वतां पावल्या ॥७४॥
निजात्मरूपाची खरोखर प्राप्ति झाल्यानंतर कार्य, कर्म, कर्तव्य हे सारें निखालस खुंटून जाते ७४.

हे अद्वैतश्रुतिसुरवाडें । सद्‍गुरुकृपा-उजियेडें ।
वृत्ति निजात्मपदा चढे । भाग्य केव्हडें पाहें पां ॥७५॥
अद्वैतप्रतिपादक श्रुतिवाक्याच्या मननाने आणि गुरुकृपेच्या प्रकाशाने वृत्ति निजात्मपदाला पोचते. हे केवढे भाग्य पहा बरें ७५.

मी वंद्य देवादिदेवां । त्या माझाही निजज्ञानठेवा ।
परम कृपेनें उद्धवा । तुज म्यां आघवा दीधला ॥७६॥
उद्धवा ! मी देवादिदेवांनासुद्धा वंद्य आहे. त्या माझ्या ज्ञानाचा सारा ठेवा तुला मी परमकृपेने दिला आहे ७६.

तुज होआवया निवृत्ती । हाचि अर्थु नानासंमतीं ।
सांगितला परम प्रीतीं । जाण निश्चितीं उद्धवा ॥७७॥
उद्धवा ! तुला खरोखर निवृत्ति प्राप्त व्हावी म्हणून तोच विषय तुला अनेक श्रुतींचे आधार घेऊन परमप्रीतीने सांगितला ७७.

आतां देहादिक जे असंत । अतिनिंद्यत्वें कुत्सित ।
तेथ आतळों नेदीं चित्त । होई अलिप्त परमार्थीं ॥७८॥
आतां देह आदिकरून जें जें मिथ्या, अत्यंत निंद्य, तिरस्कार्य, त्या ठिकाणी तूं आपलें चित्त शिवूं देऊं नकोस. तूं त्यापासून अलिप्त होत्साता परमार्थी हो ७८.

हे तुज झाली अलभ्य प्राप्ती । परी यत्‍न करावा अतिनिगुतीं ।
येथ मतांतरें छळूं येती । तेही उपपत्ती परियेसीं ॥७९॥
हा तुला अलभ्य लाभ प्राप्त झालेला आहे ; पण त्याच्याविषयीं तूं झटून यत्न केला पाहिजेस. द्यांत मत-मतांतरें तुला छळावयास येतील, त्यांचाही विचार ऐक ७९.

अथैषां कर्मकर्तॄणां भोक्तॄणां सुखदुःखयोः ।
नानात्वमथ नित्यत्वं लोककालागमात्मनाम् ॥ १४ ॥
[श्लोक १४] जर तुला असे वाटते की, कर्म करणारे व त्या कर्मांची सुखदुःखादी फळे भोगणारे जीव अनेक आहेत, तसेच कर्मांचे फलस्वरूप लोक, कर्मांच्या उपभोगाची वेळ, ती कर्मे सांगणारी शास्त्रे, कर्मांपासून मिळणारे शरीर, हे सर्व नित्य आहे, (१४)

नाना फळें अभिलाषिते । कर्माचे जे कर्मकर्ते ।
सुखदुःखांचे जे भोक्ते । अनेकत्वें येथें अनंत ॥३८०॥
अनेकप्रकारची फळांची इच्छा करून अनेक कर्मे करणारे आणि त्यास अनुसरून सुखदुःख भोगणारे जीव अनंत आहेत ३८०.

म्हणती जे मानिती एकात्मता । तरी एकाचेनि सुखें सुख समस्तां ।
कां एकाचेनि पापें पापता । न घडे सर्वथा सकळांसी ॥८१॥
ते असे म्हणतात कीं, कोणी सारे जीव एकरूपच आहेत असे मानतात ते खरे नव्हे; कारण, तसे असते तर एकाच्या सुखाने साऱ्यांनाच सुख झालें असतें किंवा एकाच्या पापानें सारेच पातकी झाले असते. पण तसें कांहीं सर्वांना घडत नाहीं ८१.

ऐसें कर्मवादियांचें मत । जीव नित्य आणि अनंत ।
मुख्य ईश्वरचि नाहीं म्हणत । कर्तें येथ निजकर्म ॥८२॥
कर्मवाद्यांचे मत असें आहे की, जीव नित्य आणि अनंत आहेत ; मुख्य ईश्वर म्हणून नाहींच ; आपले कर्म हेंच कर्ते होय ८२.

मीपणें जें स्फुरे स्फुरण । ते प्रतिशरीरीं जीव भिन्न ।
त्यांच्या स्वरूपाचें प्रमाण । कर्ता भोक्ता जाण म्हणताति ॥८३॥
मीपणानें मनांत जी अहंभावना उत्पन्न होते, ती प्रत्येक शरीरांत भिन्न असते ; म्हणून जीवही भिन्न भिन्न आहेत, कर्तेपण आणि भोक्तेपण हे त्यांच्या स्वरूपाचे प्रमाण आहे ८३,

ऐकें विवंचना सावचित्त । लोक काळ श्रुति जीवित ।
अनेकत्वें अनित्य । हें वेदांतमत पैं माझें ॥८४॥
ह्यावरचा विचार लक्ष देऊन ऐक, लोक, काळ, श्रुति आणि जीवित ही अनेक असल्यामुळे अनित्य होत, हेच माझे वेदांतिक मत आहे ८४.

उद्धवा कर्मवाद्यांचे ऐसें मत । सत्य मानील तुझें चित्त ।
तरी बुडवील निजस्वार्थ । अंगीं अनर्थ वाजेल ॥८५॥
उद्धवा ! कर्मवाद्यांचे मत तुझे मन कदाचित् खरें मानील, तर स्वार्थावर पाणी पडून अंगावर मोठा अनर्थ येऊन गुदरेल ८५.

तोचि अनर्थ म्हणसी कैसा । तरी कर्मवाद्यांचा भावो ऐसा ।
हा पूर्वपक्षाचा ठसा । अभिप्रावो ऐसा परियेसीं ॥८६॥
तो अनर्थ कोणता असें म्हणशील तर ऐक. कर्मवाद्यांचा हा भाव म्हणजे पूर्वपक्षच आहे ८६.

परमात्मा निर्विकाररूप । एक न मानिती सर्वस्वरूप ।
संन्यासु ऐकतां म्हणती पाप । मतजल्प मतवाद्यां ॥८७॥
परमात्मा निर्विकारस्वरूप असून सर्वस्वरूप एक आहे हें त्यांना मान्य नाही. ‘संन्यास’ हा शब्द ऐकतांच तें मोठें पातक आहे, असें ते म्हणतात ! अशी मताभिमान्यांच्या मतांची बडबड चालू असते ! ८७.

त्यागसंन्यास जे करिती । त्यांतें अनधिकारी म्हणती ।
कर्म मुख्यत्वें मानिती । वैराग्य निंदिती निजमतें ॥८८॥
त्याग किंवा संन्यास करणारास ते अनधिकारी म्हणतात. ते कर्मालाच मुख्य समजतात, आणि आपल्या मते वैराग्याची निंदा करतात ८८.

कर्म करोनि भोगिजे सुख । तें कर्म त्यजिती निःशेख ।
निष्कर्मासी कैंचें सुख । परम दुःख तो त्यागु ॥८९॥
त्यांचे म्हणणे कर्म करावें आणि सुख भोगावें; तें कर्मच चट सारे जे टाकून देतात, त्या निष्कर्म्यांना सुख ते कशाचें ? त्याग हा साऱ्या दुःखाचे मूळ आहे ८९.

वैराग्य न घडावया कारण । चौं प्रकारीं बोलती जाण ।
तेंही सांगेन मी लक्षण । सावधान परियेसीं ॥३९०॥
वैराग्य हें मुळीं घडतच नाही. ह्याला ते चार कारणे पुढे करतात. त्याचेही स्वरूप मी सांगतो. लक्ष देऊन ऐक ३९०.

म्हणती अनित्य असते कांहीं । तरी वैराग्य घडतें ते ठायीं ।
येथ अनित्यचि नाहीं । वैराग्यें कायीं त्यजावें ॥९१॥
ते म्हणतात की, अनित्य म्हणजे अशाश्वत असे जर कांही असते, तर त्यांत वैराग्य करतां आलें असतें; पण येथे मुळीं अनित्य असें कांहीं नाहींच ; तेव्हां वैराग्याने सोडावयाचे ते काय ? ९१.

वैराग्य होये चौं प्रकारीं । मीमांसक नित्य मानिती चारी ।
निजमताचा गर्व भारी । चार्‍ही खरीं नित्यत्वें ॥९२॥
मीमांसकांचे असें मत आहे की, वैराग्य हे चार प्रकारांनी होते. ते चार गोष्टी नित्य मानतात. नित्यत्वामुळे चार्‍ही गोष्टी खऱ्या आहेत, असा त्यांना आपल्या मताचा मोठा गर्व आहे ९२.

कर्मप्रकाशक वेद मूळ । तो आगम नित्य मानी अढळ ।
जीव नित्यचि म्हणे सकळ । भोगकाळ तोही नित्य ॥९३॥
कर्मप्रकाशक वेद ; तो वेद नित्य आणि अढळ आहे असे ते मानतात ; जीव सारे नित्यच आहेत; तसेंच भोग व कालही नित्यच असे त्यांचे म्हणणें ९३.

स्वर्गादि लोक भोगस्थान । वेदु बोलिला आपण ।
मिथ्या नव्हे वेदवचन । चार्‍ही प्रमाण नित्यत्वें ॥९४॥
स्वर्गादि लोक हे भोग भोगण्याचे स्थान असलेलें वेदाने स्वतःच सांगितले आहे, तेव्हां तें वेदवाक्य काही खोटे नव्हे. ह्यावरून ही चारीहीं नित्य आहेत हे सिद्ध आहे (इत्यादि ) ९४.

उद्धवा यापरी पाहीं । म्हणती अनित्य येथ नाही ।
वैराग्यें करावें कायी । मिथ्या पाहीं वैरागी ॥९५॥
उद्धवा ! पहा ; ह्याप्रमाणे येथे अनित्य असे कांहीच नाही, तेव्हां वैराग्याचे येथे काय काम ? तात्पर्य, वैरागी लोक मिथ्या होत ९५,

हो कां भोग्य जरी नश्वर होतें । अथवा मायिक कांहीं असतें ।
तरी वैराग्य संभवतें । तें तंव येथें असेना ॥९६॥
अहो ! भोगण्याच्या वस्तु जर नश्वर असत्या, किंवा मायिक असे जर कांही असते तर वैराग्य संभवले असते; तसे तर येथे कांहीच नाहीं (असें त्यांचे मत ) ९६. तसेंच

मन्यसे सर्वभावानां संस्था ह्यौत्पत्तिकी यथा ।
तत्तदाकृतिभेदेन जायते भिद्यते च धीः ॥ १५ ॥
[ श्लोक १५] त्याचप्रमाणे सर्व पदार्थ प्रवाहरूपाने नित्य असून सत्य आहे, व त्या त्या आकारानुसार ज्ञान उत्पन्न होऊन नष्ट होते, (१५)

जीवाच्या भोग्यपदार्था । स्रक-चंदनादि-वनिता ।
त्यांसी प्रवाहरूपें नित्यता । म्हणती तत्त्वतां स्वमतें ॥९७॥
जीवाचे भोग्य पदार्थ म्हणजे गंध, पुष्प, स्त्री इत्यादि, ही प्रवाहरूपाने नित्य आहेत, असें आपल्या मतानुसार ते म्हणत असतात ९७.

आत्मा आहे जग नाहीं । हें घडलेंचि नाहीं कांहीं ।
जळेंवीण समुद्र पाहीं । उरला नाहीं सर्वथा ॥९८॥
आत्मा आहे आणि जग नाही, असें तर कधीच घडणें नाहीं; कारण जळाशिवाय समुद्र म्हणून राहणेंच शक्य नाही ९८.

सृष्टि प्रवाहरूपें नित्य । पितृपुत्रत्वें अखंड वाहत ।
कर्मास्तव यातायात । सृष्टि अनित्य हें न घडे ॥९९॥
सृष्टि ही सारखी सुरूच असल्यामुळें तीही नित्यच आहे. पितापुत्राच्या रूपाने ती अखंड चालूच आहे; कर्मामुळेंच ही सारी यातायात आहे; सृष्टि अनित्य हे कधींच व्हावयाचें नाहीं ९९;

नित्यासी ईश्वर कर्ता । हेंही न घडे गा तत्त्वतां ।
नित्याचा कोण नव्हे कर्ता । ईश्वरु सर्वथा येथ नाहीं ॥४००॥
मग ॐ नित्यच आहे त्याला ईश्वर म्हणून एक कर्ता असणें शक्यच नाहीं; नित्याचा कर्ता कोणीच नाहीं, म्हणूनच येथे ईश्वर म्हणून कोणी नाहींच ४००.

वेदांती स्वरूपभूत । आत्मा ज्ञानस्वरूप म्हणत ।
हेंही न घडे गा येथ । ऐसें स्वमत बोलती ॥१॥
वेदांती लोक स्वरूपभूत आत्मा ज्ञानस्वरूप आहे असे म्हणतात, हेही येथे घडत नाही, असे आपलें मत ते प्रतिपादन करीत असतात ! १.

घटपटाकार पाहातां । ज्ञानासी त्रिक्षणावस्था ।
आत्मा ज्ञानस्वरूप म्हणतां । लाज सर्वथा त्यां न ये ॥२॥
घटपट इत्यादि आकार पाहात असतां ज्ञानाला त्रिक्षणावस्था म्ह. क्षणभंगुरत्व असल्याचे दिसून येते असे असतां आत्मा हा ज्ञानस्वरूप आहे असे म्हणतांना त्यांना लाजही कशी वाटत नाही ? २.

एवं वेदांत्याच्या ठायीं । आत्मनिश्चयो दृढ नाहीं ।
‘मोक्ष’ म्हणती जो कांहीं । तोही पाहीं मिथ्याचि ॥३॥
मिळून काय की, वेदांत्यांमध्ये सुद्धा आत्मस्वरूपाचा ठाम असा निश्चय एकही नाहीं; मोक्ष म्हणून जो काय म्हणतात तोही मिथ्याच ! ३.

इंद्रियसुखेंवीण सुख । मोक्ष म्हणती ते अविवेक ।
इंद्रियद्वारा जीवांसी हरिख । भोगितांही मूर्ख न मानिती ॥४॥
इंद्रियजन्य सुखाशिवाय मोक्षसुख म्हणून निराळे आहे असे म्हणतात, तोही अविचारच ; कारण इंद्रियांच्या द्वारें जीवांना प्रत्यक्ष सुख मिळत असून हे मूर्ख लोक ते मानीत नाहीत ! ४ ;

देहेंवीण विदेही । सुख भोगिजे कोणें कांहीं ।
अद्वैतवादी जल्पती कांहीं । तें सत्य नाहीं सर्वथा ॥५॥
देहाशिवाय, विदेहपणानें कोण कधीं सुख भोगते ? अद्वैतवादी काही तरी बडबड करतात, ती खरी नव्हे ५;

जीवासी जेणें सुखप्राप्ती । ते इंद्रियेंचि नाहीं म्हणती ।
डोळे फोडूनि देखणे होती । तैसी वदंती वेदांत्यां ॥६॥
जीवाला ज्याने सुखाची प्राप्ति व्हावयाची, ती इंद्रियेच ते मिथ्या म्हणतात ! डोळे फोडून डोळस व्हावें, तशांतील ही वेदांत्यांची बडबड आहे ! ६;

येथ ईश्वरुचि नाहीं फुडा । मा तो फळ देईल हा बोल कुडा ।
अद्वैतवादी मूर्ख गाढा । नागवी मूढां वैराग्यें ॥७॥
येथे मुळी ईश्वरच जर नाही, तर तो फळ देईल हे म्हणणे खोटे ठरलेच, अद्वैतवादी हे महामूर्ख असतात, ते वैराग्याच्या निमित्ताने मूर्खाना खड्यांत घालतात ! ७.

गांव ठावो ना पदवी । तो मिथ्या ईश्वरु धरोनि जीवीं ।
कर्मफळीं नैराश्य करवी । अथवा सांडवी कर्मातें ॥८॥
ज्याला गांव नाही, ठाव नाही आणि सत्ताही नाही, अशा खोट्याच ईश्वराची मनांत कल्पना बाळगून कर्मफळाचा किंवा कर्माचा त्याग करवितात ! ८.

नरदेहीं ज्ञान उपजलें । तेणें देहचि नाशिलें ।
फळें वृक्षमूल छेदिलें । कोणीं देखिलें कोठेंही ॥९॥
नरदेहांत ज्ञान उत्पन्न झाले, आणि त्याने देहाचाच नाश करून टाकला ! फळाने वृक्षाचे मूळच तोडून टाकलेले कोणी कोठे पाहिले आहे ? ९.

ज्ञानाचे परिपाकदशें । म्हणती अवघा संसारुचि नाशे ।
सृष्टि प्रवाहरूपें नित्य असे । नित्य नासे कैसेनि ॥४१०॥
ज्ञानाची परिपक्कता झाली म्हणजे सारा संसारच नाश पावतो असें (वेदांती) म्हणतात; पण सृष्टि ही प्रवाहाच्या रूपाने नित्यच आहे; तेव्हां नित्याचा नाश तो कसा काय होतो ? ४१०.

मनुष्याचे हृदयींचें ज्ञान । तेणें संसाराचें निर्दळण ।
तरी खद्योततेजें जाळिले जाण । ग्रहगण शशी सूर्य ॥११॥
मनुष्याच्या हृदयातील ज्ञानाने जर संसाराचा नाश होत असेल, तर काजव्याच्या तेजानेंही चंद्र, सूर्य आणि नवग्रह जळून जातील ! ११.

एवं करूं जातां निवृत्ति । केले कष्ट ते मिथ्या होती ।
इंद्रियेंवीण सुखप्राप्ति । नव्हे निश्चितीं जीवासी ॥१२॥
तात्पर्य, निवृत्तीचा स्वीकार करावयास गेलें तर केलेले कष्ट फुकट जातात; कारण, इंद्रियांशिवाय जीवाला कधीच सुखप्राप्ति व्हावयाची नाही १२;

यालागीं निवृत्ति ते वृथा कष्ट । सर्वांसी प्रवृत्तिच अतिश्रेष्ठ ।
कर्में करोनियां उद्‍भट । फळें वरिष्ठ भोगावीं ॥१३॥
म्हणून निवृत्ति म्हणजे व्यर्थ कष्ट मात्र आहेत; सर्वांना प्रवृत्ति हीच अत्यंत श्रेष्ठ आहे; सपाटून कर्मे करावी आणि त्याची उत्तमोत्तम फळे खुशाल भोगावीत १३;

संसार म्हणती मायिक । ते जाणावे केवळ मूर्ख ।
संसारवेगळें सुख । नाहीं देख जीवासी ॥१४॥
संसार हा केवळ मायिक आहे, असे म्हणतात ते शुद्ध मूर्ख होत; जीवाला संसारावांचून दुसरे सुखच नाही १४;

मनुष्याधिकारें सुखप्राप्ति । यालागीं देव मनुष्यत्व वांछिती ।
वेदांती मनुष्यत्व निंदिती । केवीं ते युक्ती मानावी ॥१५॥
म्हणूनच देवही मनुष्य होण्याची इच्छा करतात; आणि वेदांती मनुष्य देहाची निंदा करतात; तेव्हां त्यांची युक्ति कशी मान्य करावी ? १५.

वेदें अधिकारु बोलिला । तो वेदुचि इंहीं वेडा केला ।
यांचे लागला जो बोला । तो नागवला सर्वस्वें ॥१६॥
वेदाने अधिकार सांगितलेला आहे, तो वेदच यांनी वेडा करून सोडला. तात्पर्य, यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवील त्याचा सर्वस्वी नाश मात्र व्हावयाचा ! १६.

वेदाचें वेदवचन । सर्वार्थीं तें प्रमाण ।
मिथ्या म्हणतो तें वेदवचन । थोर सज्ञान हे झाले ॥१७॥
वेदवचन म्हणतात तें सर्वोपरी प्रमाण असते, त्या वेदवचनालाच हे मिथ्या म्हणतात ! तेव्हां हेच मोठे ज्ञाते झाले की नाही ? ७.

ऐशी मीमांसकांची वदंती । नानापरींच्या चाळिती युक्ती ।
आपुलें मत स्थापिती । तें मिथ्या निश्चितीं उद्धवा ॥१८॥
(भगवान् म्हणतात) मीमांसकांचे भाषण असें असतें. ते नानाप्रकारच्या कोट्यांवर कोट्या लढवून आपले मत स्थापन करतात, पण उद्धवा ! तें निखालस खोटें आहे १८.

लापनिका ऐसें मिथ्या त्यांचें मत । अंगीकरूनि प्रस्तुत ।
प्रपंच‍अनर्थता दावित । दृढ स्थापित वैराग्य ॥१९॥
पूर्वमीमांसावाद्यांचे शब्दपांडित्यच गृहीत धरून प्रपंचांत कसे अनर्थ आहेत हे दाखवीत (भगवान् ) वैराग्याची सप्रमाण सिद्धता करीत आहेत १९.

एवमप्यङ्ग सर्वेषां देहिनां देहयोगतः ।
कालावयवतः संति भावा जन्मादयोऽसकृत् ॥ १६ ॥
[श्लोक १६] तर हे उद्धवा ! सर्वच मनुष्यांना देह व काळाचे विभाग यांच्यामुळे प्राप्त होणार्‍या जन्मादिक अवस्था नित्य मानाव्या लागतील व त्यांना मोक्ष कधीच मिळणार नाही. (१६)

म्हणें आइकें बापा उद्धवा । हा मिथ्या मतवादु आघवा ।
म्हणसी कैसेनि जाणावा । विवेक करावा मतांचा ॥४२०॥
श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा ! बाबा ऐक. हा सारा मतवाद मिथ्या आहे. पण तो कळावा कसा असे म्हणशील, तर त्या मतांचा विचार करावा म्हणजे झाले ४२०.

निवृत्ति ते केवळ कष्ट । म्हणती प्रवृत्ति अतिश्रेष्ठ ।
प्रवृत्तीमाजीं परम कष्ट । मरण अरिष्ट अनिवार ॥२१॥
निवृत्ति हे निवळ कष्ट आहेत म्हणून प्रवृत्ति हीच अत्यंत श्रेष्ठ असे म्हणतात. परंतु प्रवृत्तिमध्येही अतिशय कष्ट असून मरणाचे अरिष्ट तर अनिवार्यच आहे २१.

धरोनियां जन्ममूळ । अखंड लागलासे काळ ।
लवनिमिष पळपळ । काळ वेळ साधित ॥२२॥
जन्ममूळास धरून काळ हा अखंड पाठीस लागलेला असतो. लव, निमिष, पळपळ धरून काळ हा वेळ साधीत असतो २२.

जैसें संवचोराचें साजणें । तैसें काळाचें जोगवणें ।
वेळ आल्या जीवेंप्राणें । नाहीं राखणें सर्वस्वें ॥२३॥
बरोबर असणाऱ्या चोराची मैत्री, त्याप्रमाणे काळाची पोसणूक आहे. वेळ आली की जीवप्राण सारे लुटून घेतो; काहीएक शिल्लक ठेवीत नाहीं २३.

काळु न म्हणे हाट घाट । न म्हणे अवसी पहांट ।
न म्हणे देश विदेश वाट । नाशी उद्‍भट निजतेजें ॥२४॥
काळ हा बाजार म्हणत नाही किंवा नदीचा घाट म्हणत नाही. अवशी किंवा पहाटे याचा विचार मनात आणीत नाही; देश किंवा परदेश म्हणत नाही. आपल्या प्रभावाने सर्वांना सरसकट स्वाहा करून सोडतो २४.

करितां प्रवृत्तीचे कष्ट । अवचितां मृत्यूचा चपेट ।
अंगीं वाजे जी उद्‍भट । अहा कटकट ते काळीं ॥२५॥
प्रवृत्तीचे कष्ट काढता काढतां एकदम मृत्यूचा असा तडाका येऊन बसतो की, हायहाय ! नको तो प्रसंग ! २५.

जीवीं वासनेच्या थोर हांवा । म्हणे गेलों मेलों धांवा पावा ।
कोण निवारी मृत्युप्रभावा । उपावो तेव्हां चालेना ॥२६॥
जीवामध्ये वासनेची हांव दांडगी असते म्हणून ‘गेलों ! मेलों ! धावा ! धावा ! या ! या !’ असे तो म्हणतो. पण मृत्यूच्या तडाक्याचे निवारण कोण करणार ? त्या वेळी कोणाचाच उपाय चालत नाही २६.

काळु मारोनि नोसंडी । यातना भोगवी गाढी ।
सवेंचि गर्भवासीं पाडी । जेथ दुःखकोडी अनिवार ॥२७॥
काळ नुसते मारूनच सोडीत नाही, तर आणखी नानाप्रकारच्या यातना भोगावयास लावतो, आणि ज्यांत अनिवार दुःखें असतात अशा गर्भवासांत तो घालतो २७.

मातेच्या जठरकुहरीं । विष्ठामूत्रांच्या दाथरीं ।
अधोमुख नवमासवरी । उकडी भारी जठराग्नी ॥२८॥
मातेच्या उदररूपी गुहेत, मलमूत्राच्या कोथळीत, खाली तोंड करून नऊ महिनेपर्यंत जठराग्नि त्याला अगदी शिजवीत असतो, २८.

विष्ठालेपु चहूंकडे । नाकी तोंडीं कृमी किडे ।
गर्भवासींचे कष्ट गाढे । कोणापुढें सांगेल ॥२९॥
त्या वेळी चारही बाजूंनी मलमूत्राचा लेप लागलेला असतो. नाकातोंडांत किडे शिरत असतात. याप्रमाणे गर्भवासांतील अत्यंत कष्ट कोणापाशी सांगणार ? २९.

कट्वम्ललवणमेळें । गर्भवतीचे पुरती डोहळे ।
त्वचेवीण गर्भांग पोळे । तेणें दुःखें लोळे अतिदुःखी ॥४३०॥
नंतर गरोदर स्त्रियेला डोहळे लागतात; तेव्हां ती कडू, आंबट, खारट पदार्थ खाते; त्या वेळी गर्भाच्या अंगावर पुरती कातडीही नसल्यामुळे, त्याने त्याचे सारे अंग भाजून त्या दुःखाने अतिशय विव्हळ होऊन लोळत असतो ४३.

ते गर्भोदरींची व्यथा । नेणती माता आणि पिता ।
तेथ नाहीं कोणी सोडविता । जीवींची व्यथा जीव जाणे ॥३१॥
त्या गर्भाला पोटात काय काय यातना भोगाव्या लागतात हे आईबापांना कळत नाही. त्यांतून सोडविणारा तेथे कोणीच नसतो. त्या जीवाची व्यथा जीवालाच माहीत ! ३१.

ज्या ठायाची करूं नये गोठी । प्रकट दावूं नये दिठी ।
ते योनिद्वारें अतिसंकटीं । जन्म शेवटीं जीवासी ॥३२॥
ज्या ठिकाणची गोष्ट सुद्धा कोणी तोंडातून काढीत नाही, जें ठिकाण प्रत्यक्ष कोणी डोळ्यांना दाखवीत सुद्धा नाही, तशा त्या योनिद्वारांतून मोठ्या संकटाने शेवटी जीवाचा जन्म होतो ! ३२.

जे नित्य मूत्राची न्हाणी । कीं नविया नरकाची खाणी ।
जे रजस्वलारुधिराची श्रेणी । जन्म तेथोनी पावती ॥३३॥
जी नित्य मूत्राची मोरी; किंवा नव्या नरकाची खाण ; आणि रजस्वलेच्या रुधिराची डोणी; तेथून प्राणी जन्मास येतो ३३.

अपवित्र विटाळशीचें रुधिर । तें गोठोनि झालें जी शरीर ।
निंद्यद्वारें जन्मोनि नर । आम्ही पवित्र म्हणविती ॥३४॥
विटाळशीचे घाणेरें रक्त गोठून जाऊन हे शरीर बनलेले असते; आणि निंद्य द्वारांतून पुरुषाचे जन्म होते; असे असून ते आपणाला ‘पवित्र’ म्हणवितात ! ३४.

गर्भवासाहूनि गाढें । दुःख कोण आहे पुढें ।
मतवादी बोले तें कुडें । सुख नातुडे प्रवृत्तीं ॥३५॥
गर्भवासाहून अधिक दुःख दुसरे कोणते आहे ? मताभिमानी बोलतात ते खोटें आहे. प्रवृत्तींत मुळीच सुख नाही ३५.

एके जन्में जन्म न सरे । एकें मरणें मरण नोसरे ।
कोटि कोटि जन्मांचे फेरे । काळ योनिद्वारें करवितु ॥३६॥
एका जन्माने जन्मही सरत नाही, आणि एका मरणाने मरणही नाहीसे होत नाही. काळ हा योनीच्या द्वारानें कोटि कोटि जन्माचे फेरे करवितो ३६.

पुढतीं जन्म पुढतीं मरण । अनिवार लागलें जाण ।
प्रवृत्तीमाजीं सुख कोण । दुःख दारुण भोगवी ॥३७॥
पुन्हा जन्म आणि पुन्हा मृत्यु, हे सारखें लागलेलंच आहे. अशा प्रवृत्तीमध्ये सुख ते काय असणार ? भयंकर दुःख मात्र भोगावे लागते ३७.

जन्ममरणांमाजिले संधी । आणिकही थोर दुःख बाधी ।
त्या दुःखाची दुःखसिद्धी । ऐक त्रिशुद्धी सांगेन ॥३८॥
जन्ममरणाच्या मधल्या संधीत तर मोठमोठी दुःखें पीडा देतात. त्या दुःखांचा दुःख देण्याचा प्रकारही आता सांगतों ३८.

धाडीभेणें पळतां थोर । आडवे नागवती चोर ।
तैसें जन्ममरणांचें अंतर । षड्‌विकार राखती ॥३९॥
चोरांचा हल्ला येईल या भीतीने त्वरेने पळू लागावें, तो मध्येच चोर येऊन लुटून नेतात; त्याप्रमाणे जन्ममरणाचे अंतर षड्विकार भरून काढतात ३९.

षड्‌विकारांच्या पतिव्रता । षडूर्मी लागल्या जीविता ।
एवं प्रवृत्तीमाजीं परम व्यथा । सुख सर्वथा असेना ॥४४०॥
षड्विकारांच्या पतिव्रता स्त्रिया म्हणजे षडूर्मी जीवाला जळूप्रमाणे चिकटतात. मिळून प्रवृत्तीमध्ये अतिशय दुःखच आहे, सुख मुळीच नाही ४४०.

कर्मवादियांच्या मतां । जीवु स्वतंत्र कर्मकर्ता ।
म्हणती ते मिथ्या वार्ता । परतंत्रता प्रत्यक्ष ॥४१॥
आतां कर्मवाद्यांच्या मताने जीव हा स्वतंत्र कर्मकर्ता आहे; पण हे त्यांचे म्हणणे मिथ्या आहे. कारण त्याला परतंत्रता असलेली प्रत्यक्ष दृष्टीस पडते ४१.

तत्रापि कर्मणां कर्तुरस्वातन्त्र्यं च लक्ष्यते ।
भोक्तुश्च दुःखसुखयोः कोन्वर्थो विवशं भजेत् ॥ १७ ॥
[श्लोक १७] शिवाय या जगात कर्म करणारा व त्यांची सुखदुःखे भोगणारा मनुष्यप्राणी संपूर्णपणे परतंत्र आहे अशा पराधीन प्राण्याला कोणता विषय सुख देऊ शकेल ? (१७)

जीवासी असती स्वतंत्रता । तरी तो दुःखभोग न भोगिता ।
सदा सुखीचि असता । पापें न करिता अळुमाळु ॥४२॥
जीवाला स्वतंत्रता असती, तर तो दुःखभोग कधींच भोगता ना. सदासर्वकाल सुखीच असता. दुःखाचें मूळ असें जें पाप, तें तो करता ना ४२.

जीवु बापुडें सदा दीन । कर्में करूनि कर्माधीन ।
कर्मफळदाता तो भिन्न । सुखदुःखें जाण तो भोगवी ॥४३॥
जीव विचारा नेहमींच दीन, बापुडवाणा; कर्मे करून कर्माधीन असणारा, त्याला कर्माचे फळ देणारा निराळाच असतो, तोच त्याला सुखदुःखें भोगवितो, हे लक्षात ठेव ४३.

यालागीं ईश्वराची सत्ता । तो करमफळाचा दाता ।
जीवु सुखदुःखांचा भोक्ता । स्वतंत्रता त्या नाहीं ॥४४॥
याकरितां ईश्वराची सत्ता हीच श्रेष्ठ आहे. तोच कर्मफळाचा दाता आहे, आणि जीव हा सुखदुःखाचा भोक्ता आहे. त्याला स्वतंत्रता नाही ४४.

ऐसें लक्षितां लक्षण । जीवु तितका पराधीन ।
पराधीनपणें जाण । भोगी दारुण सुखदुःख ॥४५॥
हें लक्षण पाहिले म्हणजे जीव तितका पराधीन आहे, ही गोष्ट लक्षात येते, आणि त्या पराधीनपणामुळेच तो भयंकर सुखदुःख भोगतो ४५.

मजलागीं दुःख होआवें । ऐसें कोणी भावीना जीवें ।
न वांछितां दुःख पावे । येणें न संभवे स्वतंत्रता ॥४६॥
मला दुःख व्हावे अशी मनापासून कोणीच इच्छा करीत नाही; पण दुःख हें इच्छा न करताही प्राप्त होते. यावरूनही त्याला स्वतंत्रता संभवत नाही ४६.

श्रुतिस्मृतींतें विचारितां । जीवासी नाहीं स्वतंत्रता ।
पराधीनपणें वर्ततां । भोगी अप्रार्थितां सुखदुःख ॥४७॥
श्रुतिस्मृतींचा विचार केला तरी सुद्धा जीवाला स्वतंत्रता नाही असेंच सिद्ध होते. तो पराधीनपणे वागत असल्यामुळे त्याला न मागतां सुखदुःख भोगावे लागतें ! ४७.

वादी परिहार करिती । साङ्ग कर्म जे नेणती ।
ते ते जीव दुःखी होती । सुख पावती कर्मज्ञ ॥४८॥
यावर प्रतिवादी असे उत्तर देतील की, ज्यांना ज्यांना यथासांग कर्म करणे कळत नाही, ते ते जीव दुःखी होतात. आणि जे कर्म जाणणारे असतात ते सुख पावतात ४८.

जे सदाचार श्रोत्री । जे याज्ञिक अग्निहोत्री ।
जे उभयलोकव्यापारी । साङ्ग करी कर्मातें ॥४९॥
जे सदाचारसंपन्न श्रोत्रिय असतात, किंवा जे याज्ञिक व अग्निहोत्री असतात, ते इहपरलोकासाठी यथासांग कर्म करतात ४९.

जे अविकळ अव्यंग । कर्में करूनियां साङ्ग ।
उभय लोकीं सुखभोग । कर्मयोग भोगिती ॥४५०॥
ज्यांची इंद्रिये तरतरीत आहेत, कोठे काही न्यून नाही, ते यथासांग कर्मे करून दोन्ही लोकांतील सुखांचा कर्मयोगाच्या द्वारे उपभोग घेतात ४५०.

कर्मीं ज्याची योग्यता । तो सुखभोगाचा भोक्ता ।
हेंहि न घडे गा सर्वथा । ऐक आतां सांगेन ॥५१॥
परंतु (भगवान् म्हणतात) कर्मातही ज्याची योग्यता उत्तम असते, त्याला सुखाचा उपभोग नेहमी घ्यावयाला मिळतोच असेंही होत नाही. त्याचाही प्रकार आता सांगतों, ऐक ५१.

न देहिनां सुखं किञ्चिद् विद्यते विदुषामपि ।
तथा च दुःखं मूढानां वृथाहङ्करणं परम् ॥ १८ ॥
[श्लोक १८] या जगात असे दिसते की, उत्तम कर्म करू जाणणार्‍यांनाही सुख मिळत नाही आणि कर्म न जाणणार्‍या मूर्खांनाही दुःख भोगावे लागत नाही अशा स्थितीत कर्मामुळे सुख मिळवण्याचा अहंकार व्यर्थ आहे. (१८)

कर्माचे जे तत्त्वतां ज्ञाते । तेही दुःखी देखों येथें ।
सुखी देखिजे मूर्खातें । जे कर्मातें नातळती ॥५२॥
जे कर्माचे खरोखर ज्ञाते असतात तेही येथे दुःखी असलेले दृष्टीस पडतात; आणि जे कर्माला शिवतसुद्धा नाहीत, ते मूर्ख लोकही सुखी असल्याचे दिसतात ५२.

चुकोनि यज्ञपुरुषा अच्युतातें । अग्निहोत्री करिती यागातें ।
तें स्वकर्मचि त्यांचें त्यांतें । विपरीतार्थें फळतसे ॥५३॥
यज्ञपुरुष जो अच्युत, त्याला सोडून अग्निहोत्री यज्ञ करतात; ते त्यांचे स्वकर्मच त्यांना विपरीतार्थाने फळतें ५३.

अग्नि तो तंव स्वरूप माझें । श्रुतिमंत्र ते तंव माझीं बीजें ।
आणि होमद्रव्य जें जें । तेंही माझें स्वरूप ॥५४॥
अग्नि तर माझेच स्वरूप आहे; आणि श्रुतिमंत्र तर सारी माझींच बीजे आहेत. होमद्रव्य म्हणून जे आहे तेही माझेच स्वरूप होय ५४.

ऐशिया मज सर्वगतातें । नास्तिक्य देवोनि निजचित्तें ।
अनीश्वरवादी करिती यागातें । तोचि त्यांतें बद्धक ॥५५॥
अशा मला सर्वव्यापकाला आपल्या मनाने नास्तिकपणा देऊन अनीश्वरवादी लोक यज्ञ करतात. तोच त्यांना बद्धक होतो ५५.

स्रुक स्रुवा आणि प्रणीतापात्र । मांडूं शिकले कर्मतंत्र ।
मज निजात्मयाचें चुकलें सूत्र । तेणेंचि अपवित्र तो यागु ॥५६॥
स्रुक्, स्रुवा, प्रणीतापात्र इत्यादि सामग्रीने कर्मतंत्र उत्तम मांडायला शिकलेले असतात; परंतु माझे आत्मारामाचे खरे सूत्र चुकल्यामुळेच तो याग अपवित्र होतो ५६.

सकळ हें सर्वमुखीं । मज अर्पितसे यज्ञपुरुखीं ।
हें न मनिजे याज्ञिकीं । बुद्धी अल्प कीं सकाम ॥५७॥
वस्तुतः हे सारे विश्वतोमुखी जो मी, त्या मज यज्ञपुरुषालाच अर्पण होत असते. पण याज्ञिक लोक ते मान्य करीत नाहीत. कारण त्यांची बुद्धि कोती असून ते सकाम असतात ५७.

मज न अर्पितां जें सुकृत । तेंचि जाण दुःख दुरित ।
विषा नांव अमृत म्हणत । तैसें सुकृत सकाम ॥५८॥
मला अर्पण न करतां जें पुण्य संपादन करणे तेंच पातक व तेंच दुःख होय. विषाला अमृत म्हणावे त्याप्रमाणेच सकामाचे पुण्य असते ५८.

मातें न पवतां जो स्वर्ग । तो जाणावा उपसर्ग ।
तेथींचा भोग तो महारोग । मूढ उद्योग याज्ञिकां ॥५९॥
मला न पोचता स्वर्ग मिळविणे तो शुद्ध उपसर्गच जाणावा. आणि त्यापासून मिळणारा जो भोग तो मोठा रोग समजावा. असा याज्ञिकांचा उद्योग केवळ मूढपणाचा असतो ५९

कर्मीं कर्म विगुण होत । तेथ स्मरावा मी अच्युत ।
नामें न्यून तें संपूर्ण होत । हें सामर्थ्य नामाचें ॥४६०॥
कर्म करतांना जर त्यांत कांहीं न्यून पडले, तर तेथें माझें श्रीकृष्णाचे स्मरण करावें ; म्हणजे त्या नामानेच त्यांतील न्यून ते पूर्ण होते. इतके माझ्या नामाचे सामर्थ्य आहे ४६०.

तो मी अंगें आपण । याज्ञिकां मागों गेलों अन्न ।
मज नेदितीच ते ब्राह्मण । कर्मठपण तें कर्माचें ॥६१॥
तो मी स्वतः जातिनिशी याज्ञिकांकडे अन्न मागावयाला गेलों, तर त्या ब्राह्मणांनी मला ते दिले नाही. हेच ते कर्माचें कर्मठपण होय ६१.

मज यज्ञपुरुषातें सांडून । करिती इंद्रादिकांचे भजन ।
ते इंद्रादिक मज‍अधीन । कर्मवैगुण्य हें त्यांसी ॥६२॥
ते मला यज्ञपुरुषाला सोडून इंद्रादि देवांचे भजन करतात ! पण ते इंद्रादि देव माझ्याच आधीन असतात, हे त्यांना कळत नाही. हेच त्या कर्मांतील वैगुण्य होय ६२.

जे कर्म न करिती कृष्णार्पण । त्यांचें मळिण प्राक्तन ।
तेणें इहलोकीं दरिद्रता जाण । पडे विघ्न परलोकीं ॥६३॥
जे कोणी आपले कर्म कृष्णार्पण करीत नाहीत, त्यांचे दैवच फुटके म्हणून समजावे. तशा करण्याने इहलोकी दारिद्यांत कुचमावें लागते, आणि परलोकालाही विघ्न येते ६३.

चुकवूनियां निजमुख । सर्वांगीं खिरीसाकरेचा देख ।
लेपु देतां न वचे भूक । अधिक दुःख तेणें होय ॥६४॥
आपले तोंड सोडून साऱ्या अंगाला खिरीचा आणि साखरेचा लेप दिला, तर त्याने भूक तर निवत नाहींच, पण उलट अतिशय दुःख मात्र होते ६४.

तैसें मज चुकवूनि यज्ञपति । जे यागातें आचरती ।
बाळविधवे गर्भप्राप्ती । तैशीं फळें येती त्या यागा ॥६५॥
तद्वत मला यज्ञपतीला चुकवून जे यज्ञयाग करतात, त्या यज्ञाला, बालविधवेला गर्भप्राप्ति झाल्याप्रमाणे फळे येतात ! ६५.

कर्मउद्देशें द्रव्य मागतां । यज्ञफळ ने द्रव्यदाता ।
याज्ञिक तो राहे रिता । मी कर्ता हा अभिमानु ॥६६॥
मी यज्ञ करणार आहे म्हणून दुसऱ्यापाशी द्रव्य मागितले, तर त्या यज्ञाचे फळ तो द्रव्य देणारा घेऊन जातो; आणि यज्ञ करणारा कोरडाच्या कोरडाच राहातो. मी कर्ता हा अभिमान मात्र उरावर बसतो ६६.

जैसा चाटू खिरीआंतु । चाटुवेंचि खिरी वाढिजेतु ।
चाटू खरकटल्या सांडितु । भोक्ते भोगितु परमान्न ॥६७॥
खिरीमधील पळीने लोकांना खीर वाढीत असतात. ती खिरीनें खरकटली तर तिला ठेवून देतात. पण खीर खाणारे लोक ती खाऊन पार होतात ६७.

सरस ऊंस घालिजे घाणा । रस पिळूनि भरे भाणा ।
रिता चोपटीं करकरी घाणा । ते गती जाणा याज्ञिकां ॥६८॥
उत्तम ऊंस घाण्यांत घातला, तर तो घाणा त्या उसांतील रस पिळून मांदण भरतो, आणि आपण रिकामी चिपाडें चघळून करकरत असतो. तीच दशा याज्ञिकांची होते ६८.

तैसे याज्ञिक यज्ञ आचरत । द्रव्यदात्यासी तें फल होत ।
पशुहिंसा याज्ञिकां प्राप्त । दोषी होत अभिमानें ॥६९॥
याज्ञिकही तसेच यज्ञ करतात, त्याचे फळ द्रव्य देणाराला मिळते. यज्ञात पशुहिंसा करावी लागते तो दोष मात्र कर्तृत्वाभिमानामुळे याज्ञिकांच्या पदरी पडतो ! ६९.

एवं कर्मकुशळ याज्ञिक । यापरी ते भोगिती दुःख ।
कर्म नेणती जे मूर्ख । ते परम सुख भोगिती ॥४७०॥
तात्पर्य कर्मामध्ये निष्णात असलेले याज्ञिक अशा प्रकारचे दुःख भोगतात ; पण ज्या मूर्खांना कर्मच माहीत नसते, ते परमसुखाचा उपभोग घेतात ४७०.

नेणती कर्माच्या घडामोडी । परी माझी श्रद्धा पोटीं गाढी ।
तेणें उल्लंघोनि दुःखकोडी । निजात्मगोडी भोगिती ॥७१॥
कर्माचा खटाटोप माहीत नसतो, पण त्यांच्या मनात माझ्याविषयीं श्रद्धा मात्र निस्सीम असते. त्यामुळे ते कोट्यवधि दुःखांतून पार पडून आत्मसुखाच्या गोडीचा उपभोग घेतात ७१.

कर्मीं कर्मादरु नेणत । माझ्या ठायीं श्रद्धायुक्त ।
भाळे भोळे माझे भक्त । सुख अनंत पावले ॥७२॥
त्यांना कर्मामध्ये कसा आदर ठेवावा हे कळत नाही, परंतु माझ्या ठिकाणी श्रद्धा मात्र असते; असे माझे साळेभोळे भक्त अत्यंत सुख पावतात ७२.

काय कर्म केलें गोपाळीं । जे अखंड मजसवें गोकुळीं ।
भोगिली निजसुखनव्हाळी । करोनि होळी कर्मांची ॥७३॥
जे निरंतर गोकुळामध्ये माझ्याबरोबर होते, त्या गोपाळांनी कोणते कर्म केले होते ? पण त्यांनी कर्माची होळी करून नित्य नव्या आत्मसुखाचा उपभोग घेतला ना ! ७३.

पाहतां गोपिकांचें कर्म । कर्ममार्गीं निंद्य धर्म ।
पावल्या माझें परम धाम । जीवीं पुरुषोत्तम आवडला ॥७४॥
कर्ममार्गानुसार गोपींच्या कर्माचा विचार केला तर, त्यांचा धर्म निंद्यच होता; पण त्यांच्या जीवाला पुरुषोत्तमाची आवड लागल्यामुळे त्याही माझ्या परमधामाला पोचल्या ७४.

खग-मृग-गो-सर्पादि समस्त । माझे निजपदीं झाले प्राप्त ।
याज्ञिकां कर्माभिमान बहुत । दुःख भोगित निजकर्में ॥७५॥
इतकेच नव्हे, तर गोकुळांतील पशु, पक्षी, गाई व सर्प वगैरे सुद्धा सारे माझ्या पदाला येऊन पोचले. पण याज्ञिक लोकांना कर्माभिमानाचा अतिशय ताठा असल्यामुळे ते आपल्याच कर्माने दुःख भोगीत राहिले ७५.

केवळ कर्मठ कर्मजड । आम्ही सर्वज्ञ ज्ञाते दृढ ।
हा अभिमान धरिती मूढ । दुःख वाड तयांसी ॥७६॥
जे केवळ कर्मठ असतात ते, कर्माच्या योगानेच जडबुद्धि होऊन, सर्वज्ञ काय ते आम्हीच असा मूर्खपणाचाच दृढ अभिमान धरून बसतात, म्हणूनच त्यांना असह्य दुःख भोगावे लागते ७६.

दीपीं पतंगा मरण देख । तो उडी घालितां मानी सुख ।
तैसें कर्मठां कर्म केवळ दुःख । मानिती सुख अभिमानें ॥७७॥
दीपासून पतंगाला खरोखर मरण येते, पण त्याच्यावर झेप घालतांना त्याला सुख वाटते. त्याप्रमाणे कर्मठांना कर्म हें केवळ दुःखाला कारण होते, पण ते केवळ अभिमानानेंच त्यांत सुख आहे असे मानतात ! ७७.

अभिमानेंचि सर्वथा । नसती जीवासी म्हणे स्वतंत्रता ।
तेंही न घडे विचारितां । ऐक आतां सांगेन ॥७८॥
खरोखर अभिमानानेच ते लोक जीवाला नसती स्वतंत्रता मानतात; विचार केला असता ती त्यांना खरोखर नसते. त्याचेंच विवरण आतां सांगतों, ऐक ७८.

यदि प्राप्तिं विघातं च जानन्ति सुखदुःखयोः ।
तेऽप्यद्धा न विदुर्योगं मृत्युर्न प्रभवेद् यथा ॥ १९ ॥
[श्लोक १९] जरी सुखदुःखांची प्राप्ती आणि नाश कसा होतो, हे एखाद्याने जाणले, तरीसुद्धा मृत्यू केव्हा येईल व तो कसा टाळावा, हे तर खात्रीने कोणालाही माहीत नाही. (१९)

दुःख निरसूनि सुखप्राप्ती । यालागीं कर्मे आचरती ।
कर्मवादी ज्ञाते म्हणविती । तेही नेणती दुःखनाशु ॥७९॥
दुःखाचे निरसन होऊन सुखाची प्राप्ति व्हावी, म्हणून कर्माचे आचरण करतात. कर्मवादी आपल्याला मोठे ज्ञाते म्हणवितात, पण दुःखाचा नाश खरोखर कसा करावा हे त्यांना कळत नाही ७९.

कर्में करितां नाशु नोहे । ऐसें दुःख कोण आहे ।
पुसशील तरी पाहें । यथान्वयें सांगेन ॥४८०॥
कर्में करूनही ज्या दुःखाचा नाश होत नाही, असें दुःख तरी कोणते ? असे विचारशील तर तेंही यथानुक्रमाने सांगतों ऐक ४८०.

मरणांवरतें दुःख चढे । ऐसें दुःख तंव नाहीं पुढें ।
तें निवारूं नेणती बापुडे । अति बळ गाढें मृत्युचें ॥८१॥
मरणापरतें अधिक असे कोणतेच दुःख नाहीं; तेंच कसे निवारण करावे हे त्या बिचाऱ्यांना कळत नाही ! एवढा मृत्यूचा तडाखा जबरदस्त आहे ८१.

आंतु घालितां हातु पोळे । तेणें उन्हवणेंन घर न जळे ।
तैसा कर्में मृत्यु न टळे । प्रबळबळें अनिवार ॥८२॥
आंत हात घातला तर तो पोळतो, अशा कढत पाण्याने काही घर जळत नाही; तद्वत् मृत्यु हा प्रबळ बळानेही अनिवार्य असल्यामुळे तो काही कर्मानें टळत नाही ८२.

मारिता मृत्यु जेणें मारिजे । तो उपावो कर्मठीं नेणिजे ।
कर्मांमाजी जेणें असिजे । अचुक पाविजे तेणें मृत्यु ॥८३॥
सर्वास मारक असा जो मृत्यु तो ज्याने मरून जाईल असा उपाय कर्मठांना कळत नाही. जे कर्मामध्ये राहतात त्यांना अचूक मृत्यु येतोच ८३.

अंतीं येईल मरणदुःख । जंव जीजे तंव भोगिजेल सुख ।
हें बोलेणे बोलती मूर्ख । जितां सुख त्यां कैंचें ॥८४॥
मरणाचे दुःख हे शेवटी यावयाचे आहे, याकरितां जिवंत आहों तेथपर्यंत सुख भोगून घ्यावे, असे बोलणे मूर्ख लोक बोलतात; पण त्यांना जिवंतपणांत तरी सुख कशाचें ? ८४.

कोऽन्वर्थः सुखयत्येनं कामो वा मृत्युरन्तिके ।
आघातं नीयमानस्य वध्यस्येव न तुष्टिदः ॥ २० ॥
[श्लोक २०] वधस्थानाकडे नेल्या जाणार्‍या माणसाला ज्याप्रमाणे कोणतीही भोगसामग्री संतुष्ट करू शकत नाही, त्याचप्रमाणे मृत्यू जवळ असणार्‍या माणसाला कोणता पदार्थ किंवा कामना सुखी करू शकेल ? (२०)

जितांही सुखाची वार्ता । कर्मठां नाहीं सर्वथा ।
तेही सांगेन मी कथा । ऐक आतां उद्धवा ॥८५॥
उद्धवा ! कर्मठ लोकांना जिवंतपणीही सुखाचा लेश मिळत नाही; हीच गोष्ट आतां तुला मी सांगतों, ऐक ८५.

विखे रांधिलें मिष्टान्न । तें गोड न म्हणती सज्ञान ।
पुढें देखोनियां मरण । निःशेष तें अन्न सांडिती ॥८६॥
विष घालून मिष्टान्न तयार केले, तर सज्ञान लोक तें गोड आहे असे म्हणणार नाहीत. त्यांत पुढे आपले मरण आहे हे लक्षात आणून ते सर्व अन्न फेंकून देतील ८६.

आगी लागलिये घरीं । क्षण न राहिजे चतुरीं ।
मरण नादळतां उरी । सांडूनि दूरी पळताति ॥८७॥
आग लागलेल्या घरामध्ये शहाणा मनुष्य एक क्षणभर सुद्धा राहाणार नाही. मरण येऊन छातीवर आदळले नाही, तोंच तें घर सोडून लांब पळून जातील ८७.

धाडी आल्या निजद्वारीं । गोड न लगे साखरखिरी ।
तैसा मृत्यु जाणितलिया शरीरीं । विषयाकारीं सुख कैंचें ॥८८॥
आपल्या दरवाजावर दरवडा आला असतां साखरेची खीर खातांना गोड लागणार नाही. त्याप्रमाणे शरीराला मृत्यु आहे हे समजल्यानंतर विषयामध्ये सुख कसे वाटणार ? ८८.

दाढीसी लागलिया आगी । तो शृंगारु न मनी मुखालागीं ।
तैसा नीच नवा मृत्यु अंगीं । विषयसंगीं सुख कैंचें ॥८९॥
एखाद्याच्या दाढीला आग लागली, तर तो आपल्या तोंडाला मोठी शोभा चढली असे जसें मानीत नाही, तसे आपल्या शरीरांत नित्य नवा मृत्यु दिसत असतां विषयाच्या संगतीत सुख कसें वाटेल ! ८९.

उठिल्या मरणान्त व्यथा । जन धन अन्न आणि कांता ।
सुख नेदितीच सर्वथा । झालीं वृथा समूळ ॥४९०॥
मरणकाळची व्यथा सुरू झाली, की जन, धन, अन्न आणि स्त्री सुख देऊ शकत नाहीत. ती सारी व्यर्थ होऊन जातात ४९०.

अंतकाळीं स्त्री धन । झालीं दुःखासीच कारण ।
त्यांसी सांडूनि न निघती प्राण । तळमळी जाण प्राणांतीं ॥९१॥
अंतकाळी कनक आणि कांता ही दुःखाला मात्र कारणभूत होतात. कारण वासनेमुळे त्यांना सोडून प्राण जाता जात नाही. त्यामुळे तो फार तळमळत असतो ९१.

जैसा सुळीं द्यावया जो नेइजे । त्यासी नाना समारंभु कीजे ।
मुखीं घालिती पंचखाजें । तेणें तो नव्हिजे सुखिया कीं ॥९२॥
ज्याप्रमाणे एखाद्याला सुळी द्यावयाला घेऊन जातांना नानाप्रकारचे समारंभ करतात, त्याच्या तोंडांत पंचपक्वान्नें घालतात, पण त्यामुळे त्याला काही सुख वाटत नाहीं ९२.

तैसें संमुख असतां मरण । विषयसुखें सुखावे कोण ।
विषय त्यागिती सज्ञान । मूर्खासी जाण आसक्ती ॥९३॥
तद्वत् डोळ्यांसमोर मरण दिसत असतां, विषयसुखांत आनंद कोणाला वाटेल ? म्हणून सुज्ञ असतात ते विषयांचा त्याग करतात, आणि मूर्ख लोकच त्यांवर आसक्त होऊन राहतात हे लक्षात ठेव ९३.

देहदुःखाची अर्धघडी । नाशी विषयसुखाची कोडी ।
विषयालागीं शिणती वेडीं । अविनाश गोडी निर्विषयीं ॥९४॥
देहाला अर्ध घटकाही दुःख झाले, तर कोव्यवधि विषयसुखें असली तरी ती व्यर्थ होतात. म्हणून विषयसुखाकरितां जे धडपडतात ते वेडे होत. अविनाश गोडी निर्विषयांतच आहे ९४.

एवं या लोकांच्या ठायीं । सुख सर्वथैव नाहीं ।
लोकांतरीं म्हणती कांही । न घडे तेंही उद्धवा ॥९५॥
तात्पर्य, या लोकांमध्ये सुख असें मुळीच नाही. आता कोणी परलोकांत सुख आहे असे म्हणतात, पण उद्धवा ! तेथे सुद्धा सुख मिळत नाही. कसें तें ऐक ९५.

श्रुतं च दृष्टवद् दुष्टं स्पर्धासूयात्ययव्ययैः ।
बह्वन्तरायकामत्वात् कृषिवच्चापि निष्फलम् ॥ २१ ॥
[श्लोक २१] या लोकाप्रमाणेच परलोकसुद्धा सदोषच आहे तेथे सुद्धा स्पर्धा, असूया, पुण्य क्षीण होणे आणि नाश पावणे, हे सर्व आहेच जशी पुष्कळ कष्टांनी केलेली शेती अतिवृष्टी, अनावृष्टी, यांसारख्या संकटांनी नष्ट होते, त्याचप्रमाणे परलोकासाठी केलेल्या प्रयत्‍नांना विघ्ने येतात व ते प्रयत्‍नही विफल होतात. (२१)

जैसा देखिला हा लोक । तैसाचि श्रुत स्वर्गादिक ।
अनादि दोषयुक्त देख । सदोष मूर्ख वांछिती ॥९६॥
इहलोक जसा प्रत्यक्ष दृष्टीस पडतो, तसेच स्वर्गादि लोकही असल्याचे आपण ऐकतों ; पण तेही पहिल्यापासून दोषयुक्तच आहेत. मूर्ख लोक तसल्या दोषयुक्त लोकांचीही इच्छा करतात. ९६.

स्वर्गीं म्हणसी दोष कोण । ऐक तयांचें लक्षण ।
स्पर्धा असूया नाश जाण । तप क्षीण दिविभोगें ॥९७॥
आतां स्वर्गात दोष कोणता, असें तूं म्हणशील. तर त्याचेही लक्षण ऐक. तेथेही स्पर्धा, मत्सर व नाश असतात. शिवाय तेथें भोगाच्या योगानें तपही क्षीण होत असते ९७.

तपसंपत्ति समान पाही । स्पर्धा मांडी त्याच्या ठायीं ।
मज समान भोगु पाही । तैं सुख नाहीं मानसीं ॥९८॥
आपल्याच बरोबरीचे दुसऱ्याचे तप असलेले पाहिले, की त्याच्याबरोबर तो स्पर्धा करूं लागतो. आपल्यासारखेच सुख दुसरा भोगू लागलेला दिसतांच मनाला सुख वाटत नाही ९८.

आपणाहोनि अधिक पदीं । त्यासी दोष आरोपोनि निंदी ।
तेथही ऐसी विषमबुद्धी । सुख त्रिशुद्धी तेथें कैंचें ॥९९॥
आपल्यापेक्षा उच्च पदावर कोणी आलेला पाहिला, की त्याच्यावर काहीतरी दोषारोप करून त्याची निंदा करतात ! तेथेही जर असा विषम भाव उत्पन्न होतो तर तेथें तरी खरोखर सुख कसे होणार ? ९९.

यालागीं स्वर्गभोगें जें सुख । सकळां सारिखें नाहीं देख ।
तपानुसारें न्यूनाधिक । भोगिती लोक निजकर्में ॥५००॥
म्हणून स्वर्ग प्राप्त होऊनही जे सुख होते, तेही सर्वांना सारखे नसते. लोक आपापल्या कर्माप्रमाणे आणि तपाप्रमाणे कमीजास्त सुख भोगीत असतात ५००.

एक उर्वशी भोगूं लागला । एक काळी विद्रूप पावला ।
भोगें तपक्षयो झाला । नाशु आला अनिवार ॥१॥
एक उर्वशी भोगू लागतो, तो दुसऱ्याला काळी आणि विद्रूप हिडींबाच प्राप्त होते. तात्पर्य, भोगाच्या योगें तपाचा क्षय होऊन अनिवार नाश मात्र होतो १.

जंव जंव स्वर्गभोग भोगिती । तंव तंव तपाची क्षीणशक्ती ।
तपक्षयें क्षया जाती । नाशु पावती स्वर्गस्थ ॥२॥
जों जो स्वर्गाचे भोग भोगतात, तों तों तपाची शक्ति क्षीण होत जाते ; असे ते स्वर्गस्थ लोक तपाच्या क्षयाने नाश पावतात २.

स्वर्गप्राप्तीचिये विधी । कर्में करितां विघ्न बाधी ।
तेणें नव्हे स्वर्गसिद्धी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥३॥
उद्धवा ! स्वर्गप्राप्तीसाठी विधिपूर्वक कर्में करूं लागले असतां विघ्नांची बाधा होते. त्यामुळे खरोखर स्वर्गप्राप्ति होत नाहींच ३.

जें गर्भींच सटवलें । त्याचें बारसे न वचे केलें ।
तेवीं कर्मींचि विघ्न उद्‍भवलें । पावणें ठेलें स्वर्गाचें ॥४॥
गर्भात असतांनाच जें मूल सटावते, त्याचे काही बारसे केले जात नाही. त्याप्रमाणेच कर्मामध्ये विघ्न उत्पन्न झाले, म्हणजे स्वर्गाला जावयाचे आटोपलेंच ४.

म्हणसी विघ्न करी कोण । कर्म करितां होय विगुण ।
तें कर्मचि कर्मासि जाण । विघ्न दारुण उपजवी ॥५॥
आतां कर्मामध्ये विघ्न करतें कोण, असें म्हणशील तर, कर्म करतांनाच तें दोषयुक्त होत असते. तें कर्मच त्या कर्माला भयंकर विघ्न उत्पन्न करते ५.

कर्मचि कर्मासी साधक । कर्मचि कर्मासी बाधक ।
कर्मचि कर्मासी मोचक । हें नेणोनि लोक गुंतले ॥६॥
कर्म हेंच कर्माला साधक आहे; कर्म हेंच कर्माला बाधक आहे. आणि कर्मच कर्मापासून मुक्त करणारे आहे. पण हे न समजल्यामुळे त्यांत गुंतून पडतात ६.

काम्य कर्मी विघ्न विचित्र । देश काळ मंत्र तंत्र ।
द्रव्य दक्षिणा विधि पात्र । शुद्धि सर्वत्र पाहिजे ॥७॥
काम्य कर्मामध्ये विलक्षण विघ्ने असतात. त्यांत देश, काल, मंत्र, तंत्र, द्रव्य, दक्षिणा, विधि व पात्रे, सर्व काही शुद्ध असावें लागते ७.

जैसे क्षयरोगाचे रोगियासी । अल्प कुपथ्य बाधी त्यासी ।
तैसे जाण काम्य कर्मासी । अल्पदोषी सविघ्न ॥८॥
ज्याप्रमाणे क्षयरोगाच्या रोग्याला थोडेसें जरी कुपथ्य झाले तरी ते बाधक होते, त्याप्रमाणे कामनिक कर्माला यत्किंचित् दोषानेंही विघ्न उत्पन्न होते ८.

प्रचंड दुधाचें भांडें । माजीं थेंबु एकु कांजी पडे ।
तेणें दहीं दूध ना तूप जोडे । करी खवडे दुधाचे ॥९॥
दुधाचे मोठे थोरले भांडे भरलेले असले, पण त्यांत जर एक कांजीचा थेंब पडला, तरी त्यापासून दहीं, दूध किंवा तूप काहींच प्राप्त होत नाही. साऱ्या दुधाचे चोथापाणी होऊन जाते ९.

तैसें काम्य कर्म जाण । अल्पही होतां विगुण ।
फळ नव्हे परी दारुण । तें कर्मचि विघ्न उपजवी ॥५१०॥
त्याप्रमाणे कामनिक कर्म अल्प दोषाने युक्त झाले तरी त्यापासून फळ मिळत नाही. इतकेच नव्हे, तर तें कर्मच भयंकर विघ्न उत्पन्न करतें ५.

कष्टोनियां बारा मासीं । जैसा कृषीवळु करी कृषी ।
त्याच्या फलाआड विघ्नें कैशीं । केल्या कष्टासी नाशक ॥११॥
बारा महिने खपून शेतकरी जसा शेती करतो, पण त्याच्या पिकाच्या आड अनेक विघ्नें येऊन त्याने केलेले श्रम कसे फुकट जातात ! ११.

भूमि शुद्ध शुद्ध बीज । काळीं पर्जन्य कर्ता निरुज ।
उपकरण सामग्रीसमाज । पहिलें हें वोज पाहिजे ॥१२॥
त्याला आधीं जमीन चांगली पाहिजे ; नंतर बी चांगळे मिळाले पाहिजे ; यथाकाळी पर्जन्य पडला पाहिजे; त्या शेतावर कीड वगैरे पडता कामा नये; तसेंच त्या कामाला लागणारी आउतेही उत्तम पाहिजेत ; आरंभी या सर्व गोष्टी चांगल्या जुळल्या पाहिजेत १२.

पेरणी झालियापाठीं । देखणें राखणें कूपकांटी ।
सोंकरावें आवशीं पाहाटीं । आळसु पोटीं सांडूनी ॥१३॥
पेरणी झाल्यानंतरही कूप कांटी करून त्यावर देखरेख करावयाची असते व आळस सोडून अवशी पहाटे राखण करावी लागते १३.

पीक येतयेतां कणशीं । आभाळें हिंसळा पडे त्यासी ।
कां कान्ही पडे पिकासी । घाली शेतासी निंदणें ॥१४॥
पीक अगदी पोटरीला आल्यावर सुद्धा आभाळ येऊन त्याच्यावर चिकटा पडतो, नाही तर कणसें एखाद्या रोगाने काळी होतात, उनाड गवत उगवतें १४.

गर्वाचा तांबारा पडे । कां अहंतेचा रोग पडे ।
कीं अधर्माची आळी वाढे । पीक बुडें तेणेंही ॥१५॥
त्याप्रमाणे कर्मावर गर्वाची तांब चढते, किंवा अहंतेचा रोग जडतो. किंवा अधर्माची कीड पडून त्यानेही त्या कर्माचे पीक साफ बुडून जातें १५.

सबळ सोंकरणें न घडी । तरी आशेतृष्णेच्या भोरडी ।
कीजे पिकाची ओरबडी । दाणा बुडीं उरेना ॥१६॥
व्हावी तशी त्या पिकाची राखण झाली नाही तर, आशातृष्णारूप भोरड्या (पांखरें ) पिकावर बसून त्याचा फडशा पाडतात, आणि तळावर एक दाणाही राहात नाहीं १६.

दंभाची घांटी पडिल्या ठायीं । घांटा दिसे परी दाणा नाहीं ।
कामक्रोधांच्या उंदरीं पाहीं । मूळाच्या ठायीं करांडिलें ॥१७॥
त्यावर दंभाची धाड पडली मग काय बोलणेच नाही. घांटा म्ह. शेंग दिसते मात्र, पण तिच्यात दाणा असेल तर शपथ ! कामक्रोधरूपी उंदरांनी तर ते पीक मुळांतच करंडून टाकलेले असते ७.

आल्या विकल्पाची धाडी । शेतामाजीं नुरे काडी ।
कुवासना टोळांची पडे उडी । समूळ सशेंडी खुराट ॥१८॥
विकल्पाची धाड आली म्हणजे तर त्या शेतामध्ये काडी सुद्धा उरत नाही आणि दुर्वासनेच्या टोळांची टोळधाड आली म्हणजे तर शेंड्यापासून बुडख्यापर्यंत सारे खुंटारेच होऊन जातात ! १८.

एवं कृषीवळाचे परी । सकामासी विघ्नें भारी ।
फळ अंतरलें दूरी । विघ्नसागरीं बुडाले ॥१९॥
अशी शेतकऱ्याप्रमाणे कामनिक कर्माला अतिशय विघ्नें असतात. फळ मिळावयाचे लांबच राहून यज्ञकर्ते विघ्नांच्या समुद्रात गडप होऊन जातात १९.

स्वर्ग एकु याज्ञिक बहुत । यागीं देव विघ्नें करित ।
मुख्य इंद्रचि विघ्ना प्रवर्तत । स्वर्ग राखत निजभोग ॥५२०॥
स्वर्ग सारा एक; आणि यज्ञ करणारे होतात पुष्कळ. त्या यज्ञांत देव विघ्न करीत असतात. आधी मुख्य इंद्रच आपल्याला सुख भोगावयाला स्वर्ग असावा म्हणून विघ्न करावयाला उद्युक्त होतो ५२०.

एकी वेश्या एकी राती । येथ सकाम बहुत येती ।
ते जैसे कलहो करिती । तैशी गती याज्ञिकां ॥२१॥
वेश्या असते एक; आणि रात्रही असते एकच ; भोगाच्या इच्छेने लोक येतात ते मात्र अनेक असतात. त्यामुळे ते आपापसांत तंटे करूं लागतात. अशीच गत याज्ञिकांची होते २१.

कां शुनि जैसी ऋतुस्त्नात । तिसी भोगूं येती श्वान बहुत ।
परस्परें गुरगुरित । तैसा स्वर्ग भोगत सकाम ॥२२॥
किंवा कुत्री वाफेला आली म्हणजे तिचा उपभोग घेण्यासाठी जसे अनेक कुत्रे जमा होतात आणि एकमेकांत गुरगुरूं लागतात, त्याप्रमाणेच स्वर्गाचा अभिलाष करणाऱ्या सकामांची गति होते २२.

तेथ ज्यासी भोग घडे । भोगूं जातां अडकोनि पडे ।
भंडिमा होये जगापुढें । सज्ञान तोंडें थुंकिती ॥२३॥
त्या कुत्रीचा ज्याला भोग मिळतो, तो भोग घेतांनाच अडकून पडतो. आणि जगामध्ये भंडवडा होऊन सुज्ञ लोक तोंडावर थुकतात ! २३.

जिचें भोगूं जाय सुख । अडकल्या ते होय विमुख ।
मैथुनद्वारें गुंतल्या देख । थुंकिती लोक मुखामुखीं ॥२४॥
जिचे सुख भोगायला जातो, ती इंद्रिय अडकून पडल्याने विमुख होते. मैथुनद्वारांतच अडकून पडल्यामुळे येणारे जाणारे लोक छी धू करीत असतात २४.

तैशी याज्ञिकां स्वर्गप्राप्ती । भोगें होय तपच्युति ।
स्वर्गभोगीं गुंतली आसक्ती । विमुख पडती इहलोकीं ॥२५॥
त्याप्रमाणेच यज्ञ करणारांची स्वर्गप्राप्ति आहे. त्या स्वर्गाच्या भोगाने तपाचा क्षय होतो. स्वर्गभोगावर आसक्ति लागून राहिल्यामुळे ते पुन्हा इहलोकाला अधोमुख होऊन येतात २५.

एवं कृषीवळाचिया परी । स्वर्गप्राप्तीसी विघ्नें भारी ।
केले कष्ट वृथा करी । भोगु कैशापरी घडेल ॥२६॥
तात्पर्य, शेतकर्‍याप्रमाणे स्वर्गप्राप्तीमध्येही अनेक वघ्नें असतात. ती केलेले कष्ट वृथा करून टाकतात; मग भोग तरी कसे मिळणार ? २६.

एक म्हणती कर्मकुशळ । आम्ही कर्म हो नेदूं विकळ ।
अच्छिद्र साधूनि सकळ । स्वर्गसुखफळ भोगूं ॥२७॥
आपल्याला मोठे कर्मकुशल म्हणविणारे कोणी असे म्हणतात की, आम्ही कर्मामध्ये कांहीं व्यंग म्हणून होऊंच देणार नाही; आम्ही सारे निर्व्यंग करून स्वर्गलोकाचे फळ भोगू २७.

उद्धवा ऐसेंही न घडे । तें मी सांगेन तुज पुढें ।
पंचश्लोकीं फाडोवाडें । विशद निवाडें परियेसीं ॥२८॥
पण उद्धवा, तसेंही त्यांच्या हातून होत नसते. ते कसें तेच पुढे तुला मी पांच श्लोकांनी विशद करून सांगतों ऐक २८.

अन्तरायैरविहितो यदि धर्मः स्वनुष्ठितः ।
तेनापि निर्जितं स्थानं यथा गच्छति तच्छृणु ॥ २२ ॥
[श्लोक २२] जर कोणतेही विघ्न निर्माण न होता चांगल्या तर्‍हेने यज्ञ इत्यादींचे अनुष्ठान पूर्ण झाले, तर त्यामुळे परलोकाची प्राप्ती कशी होते ते ऐक. (२२)

जेणें अंतराय न पवती । ऐशीं अच्छिद्र कर्में नव्हतीं ।
जरी झालीं दैवगतीं । तरी स्थान प्राप्ती ते नश्वर ॥२९॥
ज्यांत विघ्न मुळीच उद्‌भवणार नाही, अशी निर्विन कमैं होतच नाहीत. तशांतही दैवयोगाने झालीच, तरी त्यापासून होणारी स्थानप्राप्ति नश्वर असते २९.

कर्में ज्या स्थानाप्रति जाये । तेथ गेलिया जें जें लाहे ।
तें तें सांगेन मी पाहें । सावध होयें उद्धवा ॥५३०॥
कर्माने ज्या पदाला पोंचतात, आणि तेथे गेल्यावर जें जें त्यांना प्राप्त होते, तें तें उद्धवा तुला सांगतो. लक्ष देऊन ऐक ३०.

इष्ट्वेह देवता यज्ञैः स्वर्लोकं याति याज्ञिकः ।
भुञ्जीत देववत् तत्र भोगान् दिव्यान् निजार्जितान् ॥ २३ ॥
[श्लोक २३] यज्ञ करणारा पुरूष यज्ञांचे द्वारा देवतांची आराधना करून स्वर्गात जातो आणि तेथे आपल्या पुण्यकर्माच्या द्वारा प्राप्त केलेले दिव्य भोग देवतांप्रमाणे भोगतो. (२३)

पावोनि कर्मभूमि उत्तम । वर्णवरिष्ठ ब्राह्मणजन्म ।
ज्योतिष्टोमादिक करिती कर्म । नित्य काम्य अग्निहोत्र ॥३१॥
उत्तम अशी कर्मभूमि प्राप्त झाली असतां व श्रेष्ठवर्ण अशा ब्राह्मणकुळांत जन्म झाला असतां सदासर्वदा कामनिक ज्योतिष्टोमादि यज्ञ किंवा अग्निहोत्र करतात ३१.

त्रयीविद्या जाणती सकळ । कर्मकलापीं अतिकुशळ ।
ऐसे सज्ञान मूर्ख केवळ । स्वर्गफळ वांछिती ॥३२॥
यच्चयावत् तीन वेद जाणतात ; साऱ्या कर्मामध्ये मोठे कुशल असतात; पण असे ते ज्ञानी असूनही केवळ मूर्ख होत ; कारण, ते नश्वर स्वर्गफळाची इच्छा करतात ३२.

जेणें पुण्यें मी न जोडें । तें पुण्य म्हणतां वाचा रडे ।
याज्ञिक विषयासक्त गाढे । स्वर्गभोगाकडे धांविन्नले ॥३३॥
ज्या पुण्याच्या योगानें मी प्राप्त होत नाही, ते ‘पुण्य’ असे म्हणतांना वाचा रडते ! यज्ञकर्ते हे विषयासक्तीमध्ये गढलेले असतात, म्हणूनच ते स्वर्गातील भोगाकडे धाव घेतात ३३.

यजूनि इंद्रादि देवासी । जेणें अंतर पडे मजसी ।
त्या पावले स्वर्गलोकासी । दिव्य भोगांसी भोगावया ॥३४॥
इंद्रादिदेवांसाठी यज्ञ करून, ज्यांच्यामुळे मी दुरावतों असे दिव्य भोग भोगण्यासाठी स्वर्गलोकाला जातात ! ३४.

बहुतीं चघळिलें जुनें हाड । तें श्वान स्वलाळा करी गोड ।
तैसें याज्ञिकां स्वर्गकोड । स्वपुण्यें गोड करिताति ॥३५॥
पुष्कळांनी चघळून टाकलेले जुनें हाड असते तेच कुत्रे आपल्या जिभेनें चाटून आपल्या लाळेने गोड करून घेते, त्याप्रमाणेच यज्ञकर्त्यांना स्वर्गाची इच्छा असते, ती ते आपल्या पुण्यानें गोड करून घेतात ३५.

कां स्मशानबळींचें अन्न । कलहें श्वानशेष खाय श्वान ।
तैसाचि स्वर्गभोग जाण । शेष भाजन बहुतांचे ॥३६॥
किंवा श्मशानांत बळीचे दिलेले अन्न असते, त्यासाठी भांडून भांडून कुत्री एकमेकांचे उष्टें खात असतात. त्याप्रमाणेच स्वर्गातील भोग हेही बहुतांचे उष्टें खाद्यच आहे ३६.

गांठीचें वेंचून शुद्ध सुकृत । उच्छिष्ट भोग विकत घेत ।
याज्ञिक पवित्र म्हणवित । मोलें सेवित बहुशेष ॥३७॥
आपल्या संग्रही असलेले शुद्ध पुण्य खर्च करून उष्टे भोग विकत घेतात आणि यज्ञकर्ते आपल्याला मोठे पवित्र म्हणवितात. आणि मोल देऊन कैकांचे उच्छिष्ट चाटीत बसतात ! ३७.

केवळ वायसाचें मांस । तेंही श्वानमुखींचे शेष ।
मोलें न मिळेचि बहुवस । तैसी रसकस याज्ञिकां ॥३८॥
आधींच निव्वळ कावळ्याचे मांस ; त्यांतही कुत्र्यांचे मुखींचें शेष ; तें सुद्धा विकत घ्यावयास गेलें तर फारसें मिळावयाचे नाही. स्वर्गभोगाची याज्ञिकांची स्थिति अशी असते ३८.

स्वर्ग उच्छिष्ट बहुतांचें । त्यासी मोल वेंचे अतिकष्टांचें ।
तेंही न मिळेचि धणीचें । भय पतनाचें अहर्निशीं ॥३९॥
स्वर्ग हा पुष्कळ लोकांचा उष्टा आहे. असे असतां त्याला अत्यंत कष्टाचे मोल द्यावे लागते; पण तो सुद्धा पोटभर मिळतो असेंही नाही. कारण त्याला रात्रंदिवस पतनाचे भय असतेच ! ३९.

स्वर्गभोग भोगिती देव । तेही म्हणताति आम्ही निर्दैव ।
याज्ञिकांठायीं थोर हांव । दिव्य वैभवभोगार्थ ॥५४०॥
देव हे स्वर्गाचे भोग भोगतात, पण ते सुद्धा आपण दुर्दैवी आहो असेंच म्हणत असतात. पण त्याच स्वर्गातील वैभवाच्या भोगासाठी याज्ञिकांना केवढी प्रचंड हांव असते ! ५४०.

एवं झालिया स्वर्गप्राप्ती । तेथ जे जे भोग भोगती ।
ते मी सांगेन तुजप्रती । ऐक निश्चितीं उद्धवा ॥४१॥
अशा प्रकारे स्वर्गाची प्राप्ति झाली असतां तेथे जे जे भोग भोगावयाला सापडतात ते उद्धवा तुला मी सांगतो. नीट लक्ष देऊन श्रवण कर ४१.

स्वर्गीं समान भोगु समस्तां । नाही जाण गा सर्वथा ।
ज्यासी जैसी पुण्य‍अवस्था । तैशी प्राप्तता तयासी ॥४२॥
अरे ! स्वर्गात सुद्धा साऱ्यांनाच काही सारखे भोग भोगावयाला मिळत नाहीत. तर ज्याची जशी पुण्याई असते त्या पुण्याईप्रमाणेच त्याला भोग मिळत असतात १२.

स्वपुण्योपचिते शुभ्रे विमान उपगीयते ।
गन्धर्वैर्विहरन् मध्ये देवीनां हृद्यवेषधृक् ॥ २४ ॥
[श्लोक २४] त्याच्या पुण्यानुसार त्याला एक तेजस्वी विमान मिळते आणि तो त्यातून अप्सरांच्याबरोबर मनोहर वेष घेऊन विहार करतो तेव्हा गंधर्व त्याच्या गुणांचे गायन करतात. (२४)

आपुले पुण्याचेनि मोलें । चंद्रप्रभ विमान आलें ।
त्यामाजीं आरूढले । भोगूं लागले दिव्य भोगु ॥४३॥
आपल्या पुण्याईचें मोल देऊन मिळालेले चंद्रप्रभेसारखे शुभ्र विमान येते, त्यांत बसून ते दिव्य भोग भोगू लागतात ४३.

तेथें दिव्य देहाची प्राप्ती । मनोहर वेषातें धरिती ।
अतिमधुर गंधर्व गाती । स्वेच्छा क्रिडती स्त्रियांसीं ॥४४॥
तेथें दिव्य देह प्राप्त होतो, तेव्हां ते वेषही मोठा मनोहर करतात. अत्यंत मधुर असें गायन गंधर्व करीत असतात. आणि अशा आनंदांत मोठ्या मौजेनें स्त्रियांशी क्रीडा करतात ४४.

त्या स्वर्गींच्या स्वर्गांगना । देखतां भुली पडिली मना ।
त्यांचेनि छंदें जाणा । नाना स्थानां क्रीडतु ॥४५॥
त्या स्वर्गातील अप्सरा पाहिल्या म्हणजे मनाला भुरळ पडते; आणि मग त्यांच्याच नादानें ते अनेक स्थानांमध्ये क्रीडा करीत असतात ४५.

स्त्रीभिः कामगयानेन किङ्किनीजालमालिना ।
क्रीडन् न वेदात्मपातं सुराक्रीडेषु निर्वृतः ॥ २५ ॥
[श्लोक २५] त्याच्या इच्छेनुसार जाणार्‍या व घंटांच्या माळा लावलेल्या विमानातून तो देवतांच्या विहारस्थळांमध्ये अप्सरांसह आनंदाने क्रीडा करीत असता आपण लवकरच येथून खाली भूतलावर पडू, याचे त्याला भानही राहात नाही. (२५)

त्या स्त्रियांसमवेत आपण । विमानीं करोनि आरोहण ।
स्वेच्छागामी गमन । शोभे विमान तें कैसें ॥४६॥
त्या स्त्रियांसहवर्तमान आपण विमानांत बसून तो पाहिजे तिकडे जात असतो. ते विमान किती व कसे शोभिवंत असते तेही ऐक ४६.

घंटाघंटिका-जाळमाळा । क्षुद्रघंटिका रत्‍नमेखळा ।
किंकिणी लाविलिया सकळा । विमानलीळा विचित्र ॥४७॥
त्याला अनेक लहान मोठ्या घंटा लावलेल्या असून, त्याला रत्नखचित मेखळा गुंडाळलेली असते. सारेच विमान घुंगुरूंनी वेढलेले असते व त्याची गतिही मोठी विचित्र असते ४७.

इच्छिल्या ठाया ने विमाना । चैत्रवना कां नंदनवना ।
भोगावया स्वर्गांगना । आसक्त जाणा झालासे ॥४८॥
ते विमान तो गंधर्वांच्या वनामध्ये किंवा नंदनवनामध्ये आपल्यास पाहिजे त्या ठिकाणी घेऊन जातो व तेथे स्वर्गांगनांचा उपभोग घेण्यांत आसक्त होऊन पडतो ४८.

वनीं सुमनांचे संभार । पराग उधळत सुंदर ।
कोकिळांचे मधुर स्वर । झणत्कार भ्रमरांचे ॥४९॥
त्या वनामध्ये पुष्पांचे ताटवे लागून राहिलेले असतात आणि त्यांचे सुंदर पराग चहूंकडे उधळत असतात. कोकिळांचे मधुर स्वर व भ्रमरांचे गुंजारव यांनी ती जागा घुमत असते ४९.

मंद सुगंध सुशीतळ । झळकतसे मलयानिळ ।
स्वर्गांगनांसी गदारोळ । कामसुकाळ सकामां ॥५५०॥
मंद सुगंध आणि शीतल असा मलयपर्वतावरचा वायु वाहत असतो, आणि स्वर्गांगनांशी हसणें खिदळणे चालून कामुकाच्या विलासाचा सुकाळ होऊन राहतो ५५०.

आगी कापुरा होतां भेटी । एकवेळे भडका उठी ।
तैसें पुण्य वेंचलें उठाउठी । भोगासाठीं सकामां ॥५१॥
अग्नीची आणि कापराची भेट झाली की, एकदम जसा आगीचा भडका उठतो, त्याप्रमाणे त्या कामुकाचे पुण्य भोग भोगतां भोगतां एकदम संपून जातें ५१.

मज पतन होईल येथ । भोग जातील समस्त ।
हेंही नाठवी त्याचें चित्त । कामासक्त झालासे ॥५२॥
परंतु माझे येथून पतन होईल, हे सारे भोग नाहींसे होतील, हे सुद्धा त्याच्या मनाला आठवत नाही, इतका तो कामासक्त होऊन जातो ५२.

दीपासी देतां आलिंगन । पतंगा नाठवे निजमरण ।
तैसें नाठवे आत्मपतन । भोगी मन विगुंतलें ॥५३॥
दिव्यावर झेप घालतांना पतंगाला आपल्या मरणाची स्मृति नसते, त्याप्रमाणे त्यालाही आपल्या पतनाची आठवण होत नाही. इतकें भोगामध्ये मन गुंतलेले असते ५३.

तावत् प्रमोदते स्वर्गे यावत् पुण्यं समाप्यते ।
क्षीणपुण्यः पतत्यर्वाग् अनिच्छन् कालचालितः ॥ २६ ॥
[श्लोक २६] जोपर्यंत त्याचे पुण्य शिल्लक असते, तोपर्यंत तो स्वर्गामध्ये मौजमजा करतो पुण्य संपताच, त्याची इच्छा नसतांनाही कालगतीनुसार तो खाली पडतो. (२६)

जंव असे पुण्यसंपत्ती । तंव स्वर्गभोग भोगिती ।
क्षीण झाल्या पुण्यशक्ती । पतन पावती तत्काळ ॥५४॥
पुण्याची संपत्ति जोपर्यंत असते, तोपर्यंत ते स्वर्गाचे भोग भोगतात. आणि ती पुण्याची शक्ति क्षीण झाली म्हणजे तत्काल पतन पावतात ५४.

जंववरी गांठीं असे धन । तंववरी वेश्येचें सौजन्य ।
निःशेष वेंचल्या धन । मुख परतोन पाहेना ॥५५॥
जोपर्यंत गांठीला द्रव्य असते, तोपर्यंत वेश्येचा चांगुलपणा. द्रव्य सारे खर्चुन पार झाले की, ती पुन्हा त्याचे तोंडही पहात नाही ५५.

तैशीच स्वर्गीची वस्ती । निजपुण्यें भोग भोगिती ।
पुण्यक्षयें क्षया जाती । पतन पावती अनिच्छा ॥५६॥
त्याप्रमाणे स्वर्गाची वस्ती समजावी. आपल्या पुण्यानें भोग भोगतात; पण पुण्याचा क्षय झाला म्हणजे क्षयाला जातात ; आणि इच्छा नसली तरी पतन पावतात ५६.

कष्ट करूनियां याज्ञिकीं । स्वर्गु साधिला होआवया सुखी ।
ते झालेचि परम दुःखी । पतन अधोमुखीं पावले ॥५७॥
सुखी होण्यासाठी मोठे कष्ट करून याज्ञिक स्वर्ग मिळवितात. ते शेवटीं अतिशय दुःखी होऊन खाली तोंड करून पतन पावतात ५७.

उडालें स्वर्गभोगांचे सुख । आलें गर्भवासाचें दुःख ।
जळो सकामाचें सुख । ठकले याज्ञिक सुखलोभें ॥५८॥
स्वर्गातले सारे सुख अस्तास जाऊन गर्भवास मात्र कपाळी येतो. तसल्या त्या कामुकांच्या सुखाला आग का लागेना ! सुखाच्या आशेनें यज्ञ करणारे लोक फुकट फशी पडतात ५८.

उद्धवा जे म्हणती स्वर्गसुख । ते या रीतीं पावले दुःख ।
स्वर्गसुख मानिती मूर्ख । नव्हे निर्दोख तो मार्गु ॥५९॥
उद्धवा ! अशा रीतीने ‘स्वर्गसुख’ म्हणून जे म्हणतात, ते या रीतीने दुःख पावतात. मूर्ख लोकच स्वर्गाला सुख मानतात; पण तो मार्ग काही निर्दोष नव्हे ५९.

विधियुक्त आचरतां याज्ञिक । पुढती पावले थोर दुःख ।
तरी अविधीनें होईल सुख । झणीं देख म्हणशील ॥५६०॥
याज्ञिकांनी विधियुक्त कर्म केले, तरी सुद्धा त्यांना महादुःख प्राप्त होते. मग अविधीएं कर्म केले असतां सुख होईल असें तूं मुळीच समजू नको ५६०.

येथ कर्ममार्गींची प्रवृत्ती । दों प्रकारें असे वर्तती ।
एकी विधिरूपें आचरती । दुजी स्थिती अविधीनें ॥६१॥
तर येथें कर्ममार्गाची प्रवृत्ति दोन प्रकारची असते. एकीत विधीप्रमाणे आचरण होते, आणि दुसरीमध्ये अविधीने होते ६१.

आतां सांगितली तुजप्रती । ते वेदोक्त विधानस्थिती ।
जे विधीनें स्वर्गप्राप्ती । हे प्रवृत्ती उत्कट ॥६२॥
आतां जी तुला मी सांगितली, ती वेदविधानोक्त स्थिति होय. विधियुक्त कर्माचरणाने स्वगांची प्राप्ति होते, ती प्रवृत्ति प्रशस्त होय ६२.

पुण्यक्षयें स्वर्गपतन । तेंही सांगीतलें कथन ।
आतां अविधीं जें आचरण । तेंही लक्षण परियेसीं ॥६३॥
पुण्याच्या क्षयानें स्वर्गातून पतन कसे घडते तेही तुला कथन केले. आतां अविधीचे आचरण कसे असते त्याचेही लक्षण ऐक ६३.

वेद‍उल्लंघनें कुमती । कुश्चित जनांचे संगती ।
अप्रवृत्तीची प्रवृत्ती । अधर्मस्थिती अवधारीं ॥६४॥
ते दुर्मति लोक वेदविधींचे उल्लंघन करून कुत्सित लोकांच्या संगतीने अप्रवृत्तीची प्रवृत्ति करून कसा अधर्म करून सोडतात, त्याविषयी सांगतो ऐक ६४.

यद् यद् धर्मरतः सङ्गाद् असतां वाजितेन्द्रियः ।
कामात्मा कृपणो लुब्धः स्त्रैणो भूतविहिंसकः ॥ २७ ॥
[श्लोक २७] जर एखादा मनुष्य दुष्टांच्या संगतीत सापडून अधर्माने वागू लागला, किंवा आपल्या इंद्रियांच्या अधीन होऊन स्वच्छंदपणे वागू लागला, कंजूषपणे वागू लागला, लोभी झाला, स्त्रीलंपट झाला किंवा प्राण्यांना त्रास देऊ लागला (२७)

सहज प्राणी कामासक्त । प्राप्तकामें अतिलुब्ध होत ।
काम न पवतां दीनचित्त । स्वभावो नित्य जीवांचा ॥६५॥
जीव स्वभावतःच कामासक्त असतात, त्यामुळे त्यांस इच्छिलेले विषय प्राप्त झाले की ते त्यावर अतिशय लंपट होऊन राहतात. आणि इच्छित वस्तु प्राप्त झाली नाही तर मन व्याकुळ होऊन जातें; हा प्राणिमात्रांचा नेहमींचाच स्वभाव होय ६५.

ऐशिया स्वभावनिष्ठासी । जरी संग होय असंत पुरुषेंसीं ।
तरी रति वाढे अधर्मासी । अकर्मासी प्रवर्ते ॥६६॥
अशा स्वभावाच्या मनुष्याला जर दुष्ट पुरुषाचा सहवास घडला, तर त्याची अधर्मावरच श्रद्धा बसते, आणि तो अकर्माला प्रवृत्त होतो ६६.

चंचलत्वें मर्कट मन । त्यासी असत्संग-मदिरापान ।
कामवृश्चिकें दंशिलें जाण । तेव्हां वर्तन यद्वातद्वा ॥६७॥
चंचलपणाने मन हें माकडासारखेच आहे. त्यानें दुष्टसंगतिरूप मदिरापान केले, त्यावर कामरूपी वृश्चिक चावला, तर तो अद्वातद्वा वागू लागतो यांत आश्चर्य काय ? ६७.

पिशाहातें धेंडेवाळी । दीधल्या तो सर्वत्र जाळी ।
तेवीं असत्संगें करी होळी । स्वधर्म समूळीं जाळिती ॥६८॥
वेड्याच्या हातांत कोलती दिली तर तो सरसहा जाळीतच सुटावयाचा. त्याप्रमाणे तेही दुष्टांच्या संगतीने होळी पेटवून आपला धर्म समूळ भस्म करून टाकतात ६८.

बाळकाहातीं दीधलें शस्त्र । खोंचितां न म्हणे आप पर ।
छेदी आपुलेंचि शरीर । हितविचार तें नेणे ॥६९॥
अगदी लहान मुलाच्या हातांत शस्त्र दिले, तर ते खुपसतांना आपले किंवा दुसर्‍याचे अंग हें तो पहात नाही. तो आपले शरीरसुद्धा कापून घेतो. आपल्या हिताचा विचार त्याला कळत नाही ! ६९.

जेवीं जानी अवतरे देव्हारा । तिच्या तोंडा नाहीं वाढावारा ।
कां बहुरूप्याच्या दिगंबरा । नाहीं थारा वैराग्या ॥५७०॥
ज्याप्रमाणे अंगांत देव येतो म्हणून ढोंग करणाऱ्या मुरळीच्या तोंडाला धरबंद नसतो, किंवा बहुरूप्याच्या संन्यासांत जसे काडीमात्र वैराग्य असत नाही ५७०,

तैसा असत्संगें खरा । घाली दंभाचा पसारा ।
नाहीं विवेकाचा थारा । कामशास्त्रा प्रवर्ते ॥७१॥
त्याप्रमाणे तोही दुःसंगतीनेच ढोंग माजवितो; त्यामुळे त्यांत विवेकाला थारा असत नाही; आणि तो कामशास्त्राच्याच मागे लागतो ७१.

कामशास्त्रें अतिसकाम । कामास्तव योजी अधर्म ।
अधर्मास्तव अकर्म । निंद्य धर्म आचरे ॥७२॥
कामशास्त्राच्या नादामुळे त्याची वासना वाढते; आणि त्या वासनेमुळे अधर्माची योजना करतो; आणि अधर्मामुळे अकर्म आरंभून निंद्य कर्माचे आचरण करतो ७२.

निंद्य धर्माचा संयोग । यासी मुद्दल लुब्धभोग ।
लुब्धभोगामाजीं चांग । अधर्म साङ्ग सविस्तर ॥७३॥
निंद्य कर्माची प्रवृत्ति होण्याला भोगाची लालूच ही मूळ आहे. आणि भोगाच्या लालचीमध्येच अधर्माचा यथास्थित फैलाव होतो ७३.

अधर्म वाढतां उभारा । परद्रव्य आणि परदारा ।
याचिलागीं शरीरा । उपायद्वारा कष्टवी ॥७४॥
अधर्माची वाढ वाढली की परद्रव्य आणि परस्त्री ह्यांसाठी नानाप्रकारच्या युक्ति प्रयुक्ति लढविण्याच्या कामी शरीराला झिजवतो ७४.

अंगनेलागीं अति दीन । स्त्रीध्यानें होय स्त्रैण ।
स्त्री साधावया जाण । भूतहनन आरंभी ॥७५॥
स्त्रीसाठी अगदी काकुळतीला येतो. स्त्रीच्या ध्यासाने स्त्रैण बनतो. आणि ती स्त्री मिळविण्याकरितां प्राण्याची हिंसा करण्यासही सुरवात करतो ७५.

पशूनविधिनाऽऽलभ्य प्रेतभूतगणान् यजन् ।
नरकानवशो जन्तुर्गत्वा यात्युल्बणं तमः ॥ २८ ॥
[श्लोक २८] आणि शास्त्रविधानाच्या विरूद्ध पशूंचा बळी देऊन भूतप्रेतांची उपासना करू लागला, तर त्याला त्याच्या इच्छेविरूद्ध घोर अंधकारमय नरकात जावे लागते. (२८)

विधि म्हणे तें न करावें । वेदु बोले तें नाइकावें ।
स्मृतिशास्त्र नावडे जीवें । कर्म करावें स्वेच्छा ॥७६॥
विधि सांगत असेल ते करावयाचें नाहीं; वेद काय म्हणतो ते ऐकावयाचें नाहीं; स्मृतिशास्त्र मनाला पटावयाचे नाही, आणि स्वेच्छेनेंच कर्म करावयाचें ! ७६.

जारण मारण उच्चाटन । स्तंभन मोहन वशीकरण ।
असाध्य साधूनि अंजन । करी लावगण स्त्रियांसी ॥७७॥
जारण, मारण, उच्चाटन, स्तंभन, मोहन, वशीकरण इत्यादि प्रयोग करून असाध्य असलेलेही अंजन साध्य करून स्त्रियांस पाठीमागे लावावयाचें ! ७७.

लोण राई आणि बिबवे । मधुरसीं कालवी आघवे ।
शाबरी मंत्राचेनि वैभवें । होम करूं धांवे तामस ॥७८॥
लोण, मोहरी, बिब्बे हे सारे मधांत कालवून तामसीपुरुष शाबरी मंत्राच्या प्रभावाने होम करावयाला धावतो ७८.

कर्म करावया अभिचार । मेष जंबूक वानर ।
सरड बेडूक मत्स्य मगर । गीध घार होमिती ॥७९॥
जारणमारणादि कर्म करण्याकरितां बकरी, कोल्ही, वानर, सरडे, बेडूक, मासे, मगर, गिधाड व घारी ह्यांचा सुद्धा होम करतात ! ७९.

नग्न भैरव वेताळ । झोटिंग पिशाच कंकाळ ।
मारको मेसको मैराळ । भूतें प्रबळ उपासी ॥५८०॥
नग्न भैरव, वेताळ, झोटिंग, पिशाच, कंकाळ, मारको, मेसको, मैराळ इत्यादि प्रबळ भूतांची उपासना करतात ५८०.

काळी चिडी टोंकण घारी । काग बक उलूक मारी ।
आवंतूनि काळी मांजरी । शाबरमंत्री होमिती ॥८१॥
काळी चिमणी, मालढोक, घारी, कावळे, बगळे, घुबडे मारून, काळ्या मांजरीला समारंभाने आणून शाबरी मंत्रांनी होम करतात ८१.

वाहत्या घाण्याचें तेल चोरी । प्रदोषसंधीं न्हाये शनिवारीं ।
शाकिनी डाकिनी मध्यरात्रीं । होमामाझारीं चेतवी ॥८२॥
वाहत्या घाण्यांतलें तेल चोरून आणतात व शनिवारी प्रदोषाच्या वेळी न्हातात ; आणि मध्यरात्री होमामध्ये डाकिनी व शाकिनी जागृत करतात ८२.

मद्याचे घट पूर्ण भरी । मातंगीची पूजा करी ।
रुधिर घाली प्रेतयात्रीं । मोहनीमंत्रीं मंत्रूनी ॥८३॥
दारूचा घडा पूर्ण भरून ठेवतात ; मांगिणीची पूजा करतात ; आणि मोहिनी मंत्राचा जप करून प्रेताच्या कवटीमध्ये रक्त भरून ठेवतात ! ८३.

घेती हळदीची उटी । सेंदूर लाविती ललाटीं ।
काम साधावया हटीं । अंजन कष्टी साधिती ॥८४॥
साऱ्या अंगाला हळद फांसतात; कपाळाला शेंदूर माखतात; आणि कामेच्छा पूर्ण होण्यासाठी हट्टाने महाप्रयास सोसून अंजन साध्य करतात ८४.

होमपात्रें करावया तांतडी । समूळ अश्वत्थातें तोडी ।
फळित पुष्पित ओषधी उपडी । आसनाबुडीं घालावया ॥८५॥
होमपात्रें सत्वर तयार करण्यासाठी मुळासहवर्तमान पिंपळ तोडतात; आणि आसनाखाली घालण्यासाठी फळे आलेल्या व फुले आलेल्या वनस्पति उपटतात ! ८५.

बीज जपावया मंत्राचें । वोलें कातडें प्रेताचें ।
आणवी मृग‍अस्वलांचें । भय पापाचें मानीना ॥८६॥
मंत्रबीजाचा जप करण्याकरितां मृग-अस्वलांच्या प्रेताचे ओलें कातडे आणवितात. पातकाचे भय मानीत नाहीत ८६.

खेचर भूचर जळचर । जीव पीडिती अपार ।
घेऊनि ब्राह्मणाचें रुधिर । अभिचार आचरती ॥८७॥
अशा प्रकारें पशु, पक्षी व जलचरें इत्यादि जीवांना मनस्वी पीडा देतात ; इतकेच नव्हे, तर ब्राह्मणाचे रक्त घेऊन सुद्धा जारण-मारणाची क्रिया करतात ! ८७.

गायीब्राह्मणांसी जाण । पीडा करिती दारुण ।
क्षेत्रवित्तदाराहरण । स्वार्थें प्राण घेताति ॥८८॥
गाई ब्राह्मणांना अतिशय त्रास देतात ; इतकेच नव्हे, तर वतनवाडी, संपत्ति व स्त्रीहरण करण्याकरितां स्वार्थाने त्यांचा प्राण सुद्धा घेतात ! ८८.

देवालयींचें देवलेश । कां शिवालयींचे शिवशेष ।
घेतां न करिती आळस । वासना असोस अधर्मीं ॥८९॥
देवालयांतील देवापुढे जमलेले, किंवा शिवालयांत शिवापुढे ठेवलेले द्रव्य अथवा पदार्थ घेण्याकरितां आळस करीत नाहीत ! इतकी त्यांची अधर्मांतील वासना अचाट असते ८९.

एवं कर्म करितां ऐसें । तेणें अकर्म कर्मवशें ।
अंधतमीं तो प्रवेशे । जेवीं कां अवसे चंद्रमा ॥५९०॥
तात्पर्य, अशा रीतीने कर्म करतांना त्या अकर्माच्या योगाने चंद्र जसा अमावास्येला गर्द अंधारांत बुडून जातो, त्याप्रमाणे तोही नरकांत शिरतो ५९०.

अकर्म जाण अतुर्बळी । जीवाचें निजज्ञान छळी ।
अतिमूढ करूनि ते काळीं । निरयकल्लोळीं घालित ॥९१॥
कारण, अकर्म हे मोठे प्रबळ आहे; तें जीवाच्या ज्ञानाचा नाश करते आणि त्या वेळी त्याला अत्यंत मूढ बनवून नरकाच्या खळाळांत घालतें ९१.

ते नरकींची नवल कथा । कोटि वर्षें तळीं जातां ।
ठाव न लगे गा सर्वथा । केवीं वरुता येईल ॥९२॥
त्या नरकाची स्थिति मोठी विलक्षण आहे. कोट्यवधि वर्षे तळाला जात असले तरी त्याचा थांग म्हणून लागला नाही. मग वरता येणार कसा ? ९२.

त्यातें ‘अंधतम’ म्हणती । जें देखतां अंध होय वृत्ती ।
निघतां निर्गमु विसरती । नरकीं वसती मूढत्वें ॥९३॥
त्यालाच ‘अंधतम’ नरक म्हणतात. तो पाहिल्याबरोबर वृत्ति अंधच होऊन जाते. आणि मूढपणाने बाहेर येण्याचा मार्गच विसरून जाऊन नरकांतच लोळत राहतात ९३.

जंव होय कर्मभोगान्त । तंव नरक भोगी आकल्पान्त ।
मग स्थावरत्व पावत । वृक्ष होत कां पाषाण ॥९४॥
अशाप्रकारें कर्मभोगाचा अंत होईपर्यंत आकल्प नरकच भोगीत राहतो ! आणि मग त्याला स्थावर अवस्था प्राप्त होते. अर्थात तो वृक्ष किंवा पाषाण होतो ९४.

ऐशी अवस्था गाढमूढ । केवळ जाड्य झालें जड ।
स्वप्नीं सुख नेणती गोड । दुःख दुर्वाड भोगिती ॥९५॥
अशी त्याची गाढमूढ अवस्था होते. केवळ जाड्यच जड होतें. गोड सुख स्वप्नांत सुद्धा दृष्टीस पडत नाहीं. दुःसह दुःखच भोगीत तो राहतो ९५.

एवं अधर्मवृत्तीं वर्ततां । सुखलेश न लभे सर्वथा ।
दुःख अनिवार भोगितां । निर्गमता त्यां नाहीं ॥९६॥
तात्पर्य, अधर्मप्रवृत्तीनें वागले असतां सुखाचा लेशही प्राप्त होत नाही. अनिवार दुःख भोगीत असतां त्याची सुटका म्हणून होतच नाही ९६.

कर्माणि दुःखोदर्काणि कुर्वन् देहेन तैः पुनः ।
देहमाभजते तत्र किं सुखं मर्त्यधर्मिणः ॥ २९ ॥
[श्लोक २९] सकाम कर्माचे फळ दुःखच आहे जो जीव शरीरामध्ये अहंताममता धरून तशी कर्मे करतो, त्यांची फळे भोगण्यासाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो मर्त्य जीवाला अशा स्थितीत काय सुख मिळणार ? (२९)

ऐकें बापा उद्धवा । मरणधर्मात्मका जीवा ।
सुख न भेटे त्याच्या भावा । दुःखप्रभवामाजीं वासु ॥९७॥
उद्धवा ! बाबा ऐक. जीव हा मरणधर्माला पात्र आहे. त्याच्या वांट्याला सुख म्हणून कधी येतच नाही. दुःखद स्थितींतच त्याचे नेहमी वास्तव्य असतें ९७.

नरदेहा येवोनि केवळ । क्रूर कर्में करिती प्रबळ ।
ज्यांसी उत्तरोत्तर दुःखफळ । यातना सबळ भोगवी ॥९८॥
नरदेहाला येऊन मोठमोठी निर्दयपणाचीं कृत्यें करतात, त्यामुळे त्यांना उत्तरोत्तर दुःखाचींच फळे येऊन जीवाला ती मोठ्या यातना भोगावयास लावतात ९८.

मरमरों दुःख भोगी दारुण । उपजोनि कर्में करी हीन ।
दुःखावर्तीं पडे जाण । आपणिया आपण घातक ॥९९॥
मरे मरेतों भयंकर दुःख भोगतात ; आणि जन्मास आले म्हणजे पुन्हा तसलीच नीच कृत्ये करतात ; त्यामुळे दुःखाच्या भोवऱ्यांत सांपडून ते आपले आपणच घातक होतात ९९.

जे संतचरणीं विमुख । त्यांसी स्वप्नींहि नाहीं सुख ।
क्रूर कर्में करी कामुक । चढतें दुःख सकामा ॥६००॥
जे संतचरणांना विमुख होतात, त्यांना स्वप्नांतही सुख मिळावयाचे नाही. कामुक लोक हे क्रूर कर्मेंच करीत असल्यामुळे त्यांचे दुःख वाढतच असते. ६००.

एवं प्रवृत्तीमाजीं असतां । सकाम कर्में आचरतां ।
सविधि कर्में करितां । दुःख सर्वथा अनिवार ॥१॥
तात्पर्य, प्रवृत्तीमध्ये असून कामनिक कर्में केली असता, ती कर्में विधिपूर्वक किंवा अविधिपूर्वक करो, त्याला सदासर्वदा अनिवार असें दुःखच भोगावे लागते . १

सविधि काम्यें स्वर्गपतन । अविधि काम्यें नरक दारुण ।
एवं प्रवृतीमाजीं जाण । सुख कोण सकामा ॥२॥
कामनिक कर्में विधिपूर्वक केली तर स्वर्गातून पतन होते; तींच कर्में अविधीनें केली तर भयंकर नरक प्राप्त होतो. मिळून ह्या प्रवृत्तीमध्ये सकाम मनुष्याला सुख ते कोणते ? २.

म्हणशी लोकपाळांच्या ठायीं । नित्य सुख असेल पाहीं ।
त्यांसी जन्ममरण नाहीं । अमरत्व आम्हींही साधावें ॥३॥
आता हूं म्हणशील की, दिक्पालांच्या ठिकाणी नित्य सुख असेल, त्यांना काही जन्म मरण नाही; त्यांच्यासारखे आपणही अमरत्व संपादन करावें म्हणजे झाले ३.

लोकपाळांचे नित्य लोक । लोकपाळही नित्य देख ।
तेथें असेल नित्य सुख । ऐसें मूर्ख कल्पिती ॥४॥
कारण दिक्पाळांचे लोक नित्य म्हणजे शाश्वतचे आहेत ; लोकपाळ आहेत तेही शाश्वतचेच आहेत ; तेव्हां तेथील सुखही शाश्वतचेंच असेल. पण अशी कल्पना करतात ते लोक मूर्ख होत ४.

लोकानां लोकपालानां मद् भयं कल्पजीविनाम् ।
ब्रह्मणोऽपि भयं मत्तो द्विपरार्धपरायुषः ॥ ३० ॥
[श्लोक ३०] एक कल्पपर्यंत आयुष्य असणार्‍या लोक व लोकपाल यांना माझे भय आहे दोन परार्ध आयुष्य असणार्‍या ब्रह्मदेवालासुद्धा माझ्यापासून भय आहे. (३०)

लोकपाळामाजीं अमरेंद्र । मरुद्‍गणांचा राजा इंद्र ।
ज्यासी मानिती सूर्यचंद्र । वरुण कुबेर यमादि ॥५॥
लोकपाळांमध्ये अमरेंद्र म्हणजे इंद्र हाच श्रेष्ठ होय; तोच मरुद्‌गणांचा राजा ; त्याला सूर्य, चंद्र, वरुण, कुबेर, यम आदिकरून सर्व मान देतात ५.

ज्या अमरावती सिंहासन । ऐरावताचें आरोहण ।
उच्चैःश्रवा अश्व जाण । पुढें आपण खोलणिये ॥६॥
त्याला अमरावती नगरींत सिंहासन ; ऐरावतावर बसण्याचा मान ; उच्चैःश्रवा नांवाचा अश्व ज्याच्यापुढे आपण होऊन कोतवाल घोडा झालेला ६.

ज्यासी उर्वशी भोगपत्‍नी । रंभामुख्य विलासिनी ।
जेथ तिलोत्तमा नाचणी । चिंतामणी लोळती ॥७॥
उर्वशीसारखी ज्याला भोगपत्नी ; रंभाप्रमुख विलासिनी; तिलोत्तमा नृत्य करणारी; आणि चिंतामणि पायाकडे लोळणारे ७.

अष्टमासिद्धींचीं भांडारें । रत्‍नजडित धवळारें ।
मर्गजाचे डोल्हारे । सुवर्णसूत्रें लाविले ॥८॥
अष्टसिद्धींची भांडारे जेथे भरलेली; रत्नखचित जेथील वाडे; मर्गजाचे झोंपाळे करून ते सुवर्णाच्या साखळदंडाने बांधलेले ८ ;

वैदूर्याचे शाहाडे । कामधेनूंचे वाडे ।
कल्पद्रुमांचे मांदोडे । चहूंकडे शोभती ॥९॥
वैडूर्याचे मोठे वृक्ष ; कामधेनूंचीं खिल्लारें ; आणि कल्पवृक्षांचे जेथें जुंबाडे अथवा मंडप चहूंकडे शोभतात ९ ;

लोकपाळ आज्ञेचे । सुरसेना सैन्य ज्याचें ।
एवढें ऐश्वर्य जयाचें । राज्य स्वर्गीचें भोगित ॥६१०॥
लोकपाळ ज्याच्यापुढे हात जोडून उभे असतात ; देवांची सेना हेच ज्याचे चतुरंग सैन्य; एवढे ज्याचे ऐश्वर्य ; आणि जो स्वर्गाच्या राज्याचा उपभोग घेतो ६१०.

त्यासी माझी काळशक्ती । ब्रह्मयाचे दिनांतीं ।
चौदा इंद्र क्षया जाती । येरांची गति कायशी ॥१॥
त्यालासुद्धा ब्रह्मदेवाचा दिवस पुरा झाला की, माझ्या काळाची शक्ति ग्रासून टाकते. असे एक दोन नव्हेत, तर चौदा इंद्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसांत क्षयाला जातात ! मग इतरांची काय कथा ? ११.

ब्रह्मायु म्हणती समता । जो द्विपरार्ध आयुष्यवंता ।
जंव न पवे माझी काळसत्ता । तंव श्लाघ्यता आयुष्याची ॥१२॥
ब्रह्मदेवाचे आयुष्य सर्वात मोठे म्हणतात. त्याला दोन पराध वर्षे आयुष्य आहे. पण माझ्या काळाची नजर पोंचली नाही, तोपर्यंत त्याच्या आयुष्याचा बडेजाव १२.

ज्यासी अग्रपूजेची मान्यता । जो लोकलोकपाळांचा कर्ता ।
त्या ब्रह्मयासी माझी काळसत्ता । ग्रासी सर्वथा सलोकें ॥१३॥
अग्रपूजेच्या मानाची ज्याची योग्यता, जो लोकांच्या लोकपाळांचाही कर्ता, त्या ब्रह्मदेवाला सुद्धा माझ्या काळाची सत्ता त्याच्या लोकासहवर्तमान ग्रासून टाकते १३.

मी काळात्मा दंडधरु । शास्ता नियंता ईश्वरु ।
अंतर्यामी सर्वेश्वरु । अतिदुर्धरु व्यापकु ॥१४॥
मी दंड धारण करणारा काळाचाही आत्मा; शास्ता, नियंता, ईश्वर; अंतर्यामी राहणारा सर्वेश्वर , अत्यंत दुर्धर व सर्वव्यापक आहे १४.

माझा काळक्षोभ दारुण । त्यातें आवरूं शके कोण ।
धर्म‍अर्थकामें जाण । निवारण त्या नव्हे ॥१५॥
माझा काळक्षोभ मोठा भयंकर आहे. त्याला कोण आवरू शकणार ? धर्मानें अर्थानें, किंवा कामानें त्याचे निवारण होणे शक्य नाही १५.

प्रळयकर्त्या महाकाळासी । माझी काळसत्ता ग्रासी ।
माझें महाभय सर्वांसी । लोकपाळांसी सुख कैंचें ॥१६॥
त्या प्रळयकर्त्या महाकाळालाही माझी काळसत्ता ग्रासून टाकते. माझें महाभय सर्वांनाच लागलेले आहे. मग लोकपाळांना सुख कोठचें ? १६.

लवनिमेष-पळपळें । माझेनि भयें सूर्य चळे ।
माझेनि भयें प्राण खेळे । वायु चळे माझेनि भेणें ॥१७॥
माझ्याच भयाने सूर्य हा लव-निमेष-पळ-विपळाला पुढे पुढे सरत असतो. माझ्याच भयाने प्राण खेळत असतो; माझ्याच भयाने वारा वाहतो १७.

माझे आज्ञेवरी अग्नि जाण । वसवीतसे जठरस्थान ।
मद्‍भयें नव्हे अधिक न्यून । पचवी अन्न चतुर्विध ॥१८॥
माझ्याच भयानें अग्नि हा पोटामध्ये जठराग्नीच्या रूपानें राहून माझ्याच भयानें कमजास्ती न होतां चतुर्विध अन्नें पचवून टाकतो १८.

यथाकाळीं पर्जन्यधारीं । इंद्र वर्षे मद्‍भयेंकरीं ।
मृत्यु स्वकाळें प्रळय करी । भय भारी त्या माझें ॥१९॥
माझ्याच भयाने इंद्र हा वेळच्या वेळी पर्जन्यधारांची वृष्टि करतो. मृत्युही आपल्या वेळेला प्रळय करून सोडतो. कारण त्यालाही माझें भय फार आहे १९.

माझेनि भयेंकरीं देखा । समुद्र नोलांडी निजरेखा ।
माझिया भयाची थोर शंका । तिंही लोकां कांपवी ॥६२०॥
माझ्याच भयानें समुद्र आपली मर्यादा उल्लंघन करीत नाही. माझ्या भयाच्या मोठ्या शंकेने तिन्ही लोक थरथर कांपत असतात ६२०.

तिंही लोकांचा शास्ता । ईश्वर तो मी नियंता ।
येणें कर्मजडाची वार्ता । अनीश्वरता छेदिली ॥२१॥
तिन्ही लोकांचा शास्ता व नियंता ईश्वर तो मी. इतकें सांगून जडबुद्धि कर्मठांचे कर्मठपण आणि अनीश्वरवादीत्व भगवंतानें छेदून टाकलें २१.

प्रवृत्तीसी अनर्थता । मागां दाविली तत्त्वतां ।
वैराग्य स्थापिलें सदृढता । निवृत्ति सर्वथा अतिश्रेष्ठ ॥२२॥
प्रवृत्तीमध्ये किती अनर्थ आहे, हे मागें दाखविले आहे. तसेंच वैराग्य स्थापन करून निवृत्ति हीच सर्वात श्रेष्ठ आहे असे सांगितले २२.

आपुल्या ऐश्वर्याच्या आविष्कारें । साधूनि ईश्वरत्व केलें खरें ।
मीमांसकमत-निराकारें । निरूपण पुढारें चालवी ॥२३॥
ऐश्वर्याचा आविष्कार करून आपलें ईश्वरत्व खरे करून दाखविलें. आता मीमांसकांच्या मताचा निरास करण्यासाठी तेंच निरूपण पुढें चालवीत आहे २३.

मीमांसकमतवार्ता । बोलिले जीवासी अनेकता ।
तोचि कर्ता आणि भोक्ता । हेचि सर्वथा निराकारी ॥२४॥
मीमांसकांचे मत असे कीं, ते जीवांना अनेकता आहे, जीवच कर्ता असून भोक्ताही तोच आहे, इत्यादि. ह्याचेच आतां पूर्णपणे निरसन करतात २४.

गुणाः सृजन्ति कर्माणि गुणोऽनुसृजते गुणान् ।
जीवस्तु गुणसंयुक्तो भुङ्‍क्ते कर्मफलान्यसौ ॥ ३१ ॥
[श्लोक ३१] सत्व, रज आणि तम हे तीन गुण इंद्रियांना त्यांचे कर्म करण्यासाठी प्रवृत्त करतात आणि इंद्रिय कर्मे करतात. जीव अज्ञानाने इंद्रियांनी केलेल्या कर्मांशी संबंध जोडून कर्मांची फळे भोगू लागतो; (३१)

कृष्ण म्हणे उद्धवातें । एकादश इंद्रियें समस्तें ।
करिती नानाविध कर्मांतें । आत्मा तो येथें सर्वसाक्षी ॥२५॥
श्रीकृष्ण उद्ध्वाला म्हणाले. ही सारी अकरा इंद्रियें अनेक प्रकारची भिन्न भिन्न कर्में करतात. आणि आत्मा आहे तो सर्वसाक्षित्वानेंच असतो २५.

दीपु उजळलिया घरीं । लोक वर्तती व्यापारीं ।
तो नेमी ना निवारी । तैशापरी जीवु येथें ॥२६॥
घरांत दिवा लावला म्हणजे लोक आपआपल्या कामाला लागतात. तो कोणाला लागाही म्हणत नाही आणि लागूं नकाही म्हणत नाही. त्याचप्रमाणें येथे जीव आहे २६.

जीवु प्रेरोनि इंद्रियांतें । म्हणाल करवितसे कर्मांतें ।
जेवीं कुर्‍हाडी घेऊनि हातें । छेदी वृक्षातें कृषीवळु ॥२७॥
आता तुम्ही म्हणाल शेतकरी हातांत कुर्‍हाड घेऊन झाड तोडतो, त्याप्रमाणे जीव हा इंद्रियांना प्रेरणा करून कर्मे करवितो २७.

ऐशी इंद्रियांची प्रेरकता । जीवासी न घडे सर्वथा ।
ते न घडायाची ऐक कथा । तुज तत्त्वतं सांगेन ॥२८॥
तर त्याला इंद्रियांची प्रेरकता मुळींच संभवत नाही. त्याचे खरे कारण आतां तुला सांगतों ऐक २८.

इंद्रियां कर्मीं प्रेरण । करिते सत्त्वादिक गुण ।
जीवु उभयसाक्षी जाण । कर्मकारण त्या नाहीं ॥२९॥
सत्त्वादिक गुण हेच इंद्रियांना प्रेरणा करणारे आहेत. जीव हा उभयतांचा (गुण व इंद्रिये यांचा) साक्षी आहे. त्याला कर्माचें प्रेरकत्व नाही २९.

अंगें नातळतां आपण । चुंबक संनिधिमात्रें कारण ।
अचेतन लोहा करी चळण । तैसा जाण जीव येथें ॥६३०॥
आपण स्वतः स्पर्शही न करतां केवळ जवळ राहूनच लोहचुंबक हा अचेतन लोखंडाला हालवितो, त्याप्रमाणेच जीव हा येथे आहे ६३०.

कां उगवल्या दिवाकर । सुष्टुदुष्टु लोकव्यापार ।
तो सूर्यासी नातळे कर्मभार । साक्षी साचार कर्मांचा ॥३१॥
किंवा सूर्य उगवला की लोक बरेवाईट उद्योग करूं लागतात, पण त्या उद्योगाचें प्रेरकत्व सूर्याकडे नसते. तो कर्माचा साक्षी मात्र असतो ३१.

तैसी जीवासी कर्तव्यता । सत्य नाहीं गा सर्वथा ।
दिसे जें कांहीं आपाततां । ते आध्यासिकता मिथ्यात्वें ॥३२॥
त्याप्रमाणेच जीवाला खरोखर कर्तव्यता नसते. वरवर झालेले जें कांही दिसतें ते केवळ मिथ्या म्ह. भ्रामक होय ३२.

कवळें अध्यासिला डोळा । तो चंद्रमा देखे पिंवळा ।
तेवीं आत्मा कर्ता भासे स्थूळा । केवळ निश्चळा नेणती ॥३३॥
काविळीने ज्याचा डोळा व्यापलेला असतो. त्याला चद्रही पिवळाच दिसतो; त्याप्रमाणे जे मंदबुद्धि आहेत त्यांनाच आत्मा हा कर्ता असा भास होतो. तो अगदी निश्चळ असल्याचे त्यांना कळत नाही ३३.

सवेग चालतां आभाळें । बाळें म्हणती चंद्रमा पळे ।
तेवीं आत्मा कर्ता मानिती स्थूळें । उपाधिमेळें अध्यासु ॥३४॥
सपाट्याने ढग चाललेले पाहिले म्हणजे मुलें म्हणतात की, ‘चंद्रच पळतो आहे.’ त्याप्रमाणे मंदबुद्धि असतात तेच आत्मा हा कर्ता असें मानतात. हा उपाधीच्या योगाने त्यांना भ्रम होतो. ३४.

देह मी कर्म माझें । हें आत्मेनि स्वप्नीं नेणिजे ।
मृगजळीं बुडाले राजे । सत्य मानिजे तैसें हें ॥३५॥
देह हा मी, आणि कर्म हें माझें, हें आत्म्याला स्वप्नांतसुद्धा माहीत नसते. मृगजळांत राजे बुडाले हे सत्य मानण्यापैकींच हेंही आहे ३५.

एवं आत्म्यासी कर्तव्यता । सत्य नाहीं गा सर्वथा ।
त्यासी म्हणताती फळभोक्ता । तेही वार्ता मिथ्यात्वें ॥३६॥
तात्पर्य, आत्म्याला कोणतीही ‘कर्तव्यता’ नाही, हीच गोष्ट खरी आहे. आतां तो फळाचा ‘भोक्ता’ आहे असे म्हणतात तीही गोष्ट मिथ्याच समज ३६.

स्वप्नीं जोडिल्या सहस्र गायी । जागृतीं त्यांचें दुभतें नाहीं ।
आत्मा भोक्ता तैसा पाहीं । उपाधीच्या ठायीं मिथ्यारूपें ॥३७॥
स्वप्नात हजार गाई पैदा केल्या तर जागे झाल्यावर काही त्यांचे दुभते मिळत नाही, त्याप्रमाणेच उपाधीच्या ठिकाणी आत्मा हाही तसाच मिथ्या भोक्ता आहे ३७.

डबकीं प्रतिबिंबला रवी । तो जै तेथील कर्दम सेवी ।
तैं भोक्ता आत्मा देहगांवी । सत्य मानवीं मानावा ॥३८॥
डबक्यांत प्रतिबिंबलेला सूर्य जर त्यांतील चिखल सेवन करील तरच आत्मा हाही देहरूप गांवांतील भोक्ता आहे, असें मनुष्यांनी सत्य मानावे ३८.

मृगजळामाजिलेनि मत्स्यें । बिंबला चंद्र गिळिजे आवेशें ।
तैसा आत्मा देहाभिनिवेशें । भोगविशेषें भोगिता ॥३९॥
प्रतिबिंबित झालेला चंद्र झपाट्याने मृगजळांतील माशांनी गिळू लागावा, त्याप्रमाणेच आत्मा हाही देहाच्या अभिनिवेशाने भोग भोगणारा आहे असें हवें तर समजावें ३९.

एवं आत्मा जो भोक्ता । ते सोपाधिक वार्ता ।
उपाधि मिथ्या गा तत्त्वतां । आत्मा भोक्ता कैसेनि ॥६४०॥
तात्पर्य, आत्मा जो भोक्ता म्हणतात ती गोष्ट उपाधीची होय. आणि उपाधि ही तर मिथ्या आहे, मग आत्मा हा भोक्ता कसा होणार ? ६४०.

आत्मा अकर्ता अभोक्ता । सदृढ साधिलें तत्त्वतां ।
जीवासी बोलिली अनेकता । ते मिथ्या आतां साधितु ॥४१॥
यावरून खरोखर आत्मा हा भोक्ताही नव्हे आणि कर्ताही नव्हे, ही गोष्ट उत्तम रीतीने सिद्ध झाली. आता जीवाला जी अनेकता आहे असे म्हणतात, तीही मिथ्याच आहे असें आता सिद्ध करतात ४१ .

यावत् स्याद् गुणवैषम्यं तावन्नानात्वमात्मनः ।
नानात्वमात्मनो यावत् पारतंत्र्यं तदैव हि ॥ ३२ ॥
[श्लोक ३२] जोपर्यंत शरीर इत्यादींमध्ये ‘मी माझे’ पणाचा अभिमान आहे, तोपर्यंत आत्म्याच्या अनेकत्त्वाचा भ्रम नाहीसा होत नाही जोपर्यंत हा अज्ञानमूलक भ्रम नाहीसा होत नाही, तोपर्यंत तो जीव परतंत्रच राहाणार. (३२)

सत्व-रज-तमांचा । अंतरीं धुमाडू गुणकर्मांचा ।
तंव जीवासी अनेकत्वाचा । आभासु साचा मानला ॥४२॥
अंतःकरणामध्ये जोपर्यंत सत्त्वरजतमाचा व त्यांच्या गुणकर्मांचा धुमाकूळ माजलेला आहे, तोपर्यंत जीवाला अनेकत्वाचा भ्रमही खराच वाटतो ४२.

अहंकारादि देहपर्यंत । जंव जीवासी मीपण भासत ।
तंव नानात्व मानी सत्य । तें मिथ्या निश्चित उद्धवा ॥४३॥
अहंकारापासून तो देहापर्यंत, जीवाला जोपर्यंत ‘मीपणा’ भासतो आहे, तोपर्यंत जीव अनेकत्वच खरे मानतो. पण उद्धवा, ते खरोखर मिथ्याच आहे ४३.

जैसें आपुलेंचि मुख । आरिसा करी आपणासन्मुख ।
तैसें अविद्यायोगें मायिक । द्वैत देख दाखवी ॥४४॥
ज्याप्रमाणे आपलेंच तोंड भआरसा हा आपल्यापुढे आणून दाखवितो, (व दोन व्यक्ति भासवितो,) त्याप्रमाणेच माया क्ही अविद्येच्या योगाने द्वैत दाखवून देते ४४.

आरिशामाजीं आपुला । जो द्वैतप्रभावो स्वयें देखिला ।
तेणें आपण नाहीं द्विधा झाला । मिथ्या भासला आभासु ॥४५॥
आरशामध्ये आपल्याला जो दुसरेपणा दिसतो त्यायोगें आपण काही द्विधा होत नाहीं; तो भास मिथ्याच भासतो ४५.

तो आभास झालिया समोर । त्रिगुण गुणांचे विकार ।
एकचि दावी नानाकार । दिसे साचार गुणक्षोभें ॥४६॥
तोच भास समोर उभा राहिला म्हणजे त्रिगुणांचे विकार एक असतांनाच अनेक दिसू लागतात. आणि ते गुणांच्या क्षोभानें खरे असे भासतात ४६.

जैसें आपुलेंचि मुख केवळ । शस्त्र आदर्श आणि जळ ।
लांब निश्चळ चंचळ । करी प्रबळ विकारी ॥४७॥
ज्याप्रमाणे आपले एकच तोंड लखलखीत तरतरीत, तसेंच आरशांत व पाण्यांत पाहिले असतां, ते लांबट, निश्चळ व चंचल असें त्या उपाधीमुळे भासते ४७.

एवं त्रिप्रकार कार्यविशेखें । मुखचि देखिजे निजमुखें ।
तैसें तें नानात्व लटिकें । गुणक्षोभकें भासतु ॥४८॥
तात्पर्य, तीन प्रकारच्या कार्यविशेषत्वामुळें आपलेंच तोंड आपल्याला तीन प्रकारांनी दृष्टिगोचर होते (पण ते खोटें आहे); त्याप्रमाणे गुणक्षोभामुळे भासणारे नानात्व खोटें आहे ४८.

सूत्रचि विणिलें पटाकारीं । पटावरी तंतूंच्या हारी ।
दिसती तेवीं चराचरीं । नानाकारीं एकुचि ॥४९॥
वस्त्राकारामध्ये सारें सूतच विणलेलें असतें, आणि वस्त्रावर त्या सुताच्या आडव्या-उभ्या ओळी दिसत असतात, त्याप्रमाणे चराचरांतही अनेकाकारानें एकच वस्तु भरलेली आहे ४९.

साकरेचा केला ऊंसु । परी कठिण आंत बाकसु ।
मधील पिळून घ्यावा रसु । हा त्रिगुण दोषु त्या नाहीं ॥६५०॥
साखरेचा ऊंस केला, तर वरील कठीण साल व आंतील चिपाडे टाकून मधील रस पिळून घ्यावा अशा प्रकारचा त्रिगुण दोष त्यांत नसतो ६५०;

तैसा परमात्मा श्रीहरी । अद्वितीय एकु चराचरीं ।
त्यासी अनेकत्वाची परी । सत्त्वादि करी गुणक्षोभु ॥५१॥
त्याप्रमाणे परमात्मा श्रीहरि हा चराचरामध्ये एक अद्वितीय भरून राहिलेला आहे; सत्त्वादिगुणांच्या क्षोभामुळेच त्याच्यामध्ये अनेकत्व असल्याचे भासते ५१.

जैसा बहुरूपी आपुल्या ठायीं । नाना सोंगें धरी देहीं ।
तितुकीं रूपें त्यासी नाहीं । एकला पाही अद्वैत ॥५२॥
ज्याप्रमाणे बहुरूपी आपल्या एकाच देहाने अनेक सोंगे घेतो, पण तितके काही त्याचे देह नसतात, तो एकीएक अद्वैतच असतो ५२,

तैसा सच्चिदानंद श्रीहरी । आत्मा एक चराचरीं ।
नांदताहे नानाकारीं । द्वैतामाझारीं अद्वैत ॥५३॥
त्याप्रमाणे सञ्चिदानंद श्रीहरि हा आत्मरूपाने चराचरामध्ये एकच असून अनेक रूपांनी भासतो. हेच द्वैतामध्ये अद्वैत होय ५३.

‘अद्वैत’ साधिलें जीवासी । सत्य मानिलें आम्हांसी ।
परी एक आशंका ऐसी । निजमानसीं वर्तत ॥५४॥
[यावर आशंका ] “जीव हा अद्वैतरूपी आहे, हे आमच्या मनाला पटले, पण तेथे एक शंका मनांत उत्पन्न होते ५४.

तूंचि म्हणसी ‘जीव परतंत्र’ । आतां अद्वैतपणें ‘स्वतंत्र’ ।
बोलसी बोलणें विचित्र । केवीं साचार मानावें ॥५५॥
तूंच म्हणतोस की जीव हा ‘परतंत्र’ आहे, आणि आतां म्हणतोस की, अद्वैत असल्यामुळे ‘स्वतंत्र’ आहे, हे बोलणे परस्परांशी विरुद्ध आहे; ते खरें कसें मानावें ? ५५.

अद्वैतपण संपादिसी । माझें भय लोकपाळां म्हणसी ।
हें न मने गा आम्हांसी । अद्वैतासी भय कैंचें’ ॥५६॥
अद्वैतपण प्रतिपादन करतोस आणि माझें लोकपाळांनाही भय आहे असे म्हणतोस, हे काही आम्हांला पटत नाहीं; कारण, अद्वैताला भय कशाचे ?” ५६.

ऐशिया रीतीं उद्धवा । झाल्या संदेहासी रिघावा ।
तो तूं आतळों नेदीं जीवा । ऐक बरवा निर्धारु ॥५७॥
उद्धवा ! अशा रीतीचा संशय जर तुझ्या मनांत आला असेल तर तो मात्र तुझ्या मनाला शिवू देऊ नकोस. त्यांतील खरे मर्म आता ऐक ५७.

जीवासी उपाधीसी तादात्म्यता । तंव तंव आभासे नानात्मता ।
नानात्वीं परतंत्रता । ईश्वरसत्ता नियामक ॥५८॥
जीव हा उपाधीशी जो जो तादात्म्य पावतो, तो तों अनेकत्वाचा भास होऊ लागतो; आणि अनेकत्वाचा भास होऊ लागला की, तेथे परतंत्रता आलीच. तेथे मग ईश्वरसत्ता नियामक होते ५८.

अमित मीनलिया दळ । सेनापतीवीण विकळ ।
आंबा पिकलिया रसाळ । राखण सबळ त्यापासीं ॥५९॥
असंख्य सेना जमा झाली तरी एका सेनापतीशिवाय व्यर्थ होते; रसाळ आंबा पिकला तरी त्याच्यापाशी राखण ही चांगलीच पाहिजे ५९,

तैसी जीवासी जंव अनेकता । तंव सृष्टीसी कर्ता हर्ता नियंता ।
जाण ईश्वरचि सर्वथा । परतंत्रता ते जीवासी ॥६६०॥
त्याप्रमाणे जीवाला जोपर्यंत अनेकता भासते, तोपर्यंत सृष्टीला उत्पत्तिकर्ता, संहारकर्ता व नियंता सर्वथैव ईश्वर असतोच आणि जीवाला परतंत्रता असतेच ६६०.

अनेकत्वें परतंत्रता । यालागीं ईश्वर नियंता ।
ऐसी देखोनि ईश्वरसत्ता । भय समस्तां जीवांसी ॥६१॥
अनेकपणामुळे परतंत्रता प्राप्त होते; म्हणूनच ईश्वर हा नियंता असतो. अशी ईश्वराची सत्ता पाहिली की साऱ्या जीवांना भय वाटतें. ६१.

माझे ईश्वरी सत्तेचे भयें । देखोनि अंतकुही भीताहे ।
इंद्रादिकांचा पाडु काये । भय वाहे विधाता ॥६२॥
माझ्या ईश्वरी सत्तेच्या भीतीने यमसुद्धा थरथरा कांपतो. मग इंद्रादिकांची कथा काय ? ब्रह्मदेवसुद्धा माझा धाक वाहतो ६२.

माझी अत्यंत प्रळयींची सत्ता । वाजे हरिहरांचे माथां ।
अनेकत्वाचा संहर्ता । मीचि सर्वथा निजकाळु ॥६३॥
माझी आत्यंतिक प्रळयाची सत्ता हरिहरांच्या मस्तकावरही आदळते ! अनेकत्वाचा संहार करणारा खरोखर महाकाळ तो मीच आहे ६३,

यालागीं अनेकत्व जंव आहे । तंववरी दुस्तर काळभये ।
जेव्हां अनेकत्व नाहीं होये । तेव्हां काळू काये नाशील ॥६४॥
म्हणून अनेकत्व जोपर्यंत आहे, तोपर्यंत काळाचे भयही दुस्तर आहे. आणि हें अनेकत्व जेव्हां नाहीसे होते, तेव्हां मग काळ तरी नाश कशाचा करणार ? ६४.

एवं अनेकत्वाचे माथां । ईश्वरभयाची काळसत्ता ।
अनेकत्वें परतंत्रता । जाण सर्वथा उद्धवा ॥६५॥
तात्पर्य, अनेकत्वाच्या माथ्यावरच ईश्वरभयाची काळसत्ता आहे. उद्धवा, त्या अनेकत्वानेच सर्वथैव जीवाला परतंत्रता आहे, समजलास ? ६५.

तें अनेकत्व जैं जाये । तैं काळ नाहीं मा कैंचें भये ।
पर नसतां परतंत्र न होये । एकत्वीं आहे स्वानंद ॥६६॥
अनेकत्व जेव्हां नाहीसे होते, तेव्हां काळच नाहीसा होतो. मग भय ते कशाचें ? परच नसला म्हणजे परतंत्रही होत नाही. एकत्वामध्येच स्वानंद असतो ६६.

जेथ द्वैताचा मळु नुठी । ऐक्य देखे सकळ सृष्टीं ।
तेव्हां स्वानंदाचिया कोटी । भोगी उठाउठी निजबोधें ॥६७॥
द्वैताचा मळच जेव्हां उठत नाही, तेव्हां सारी सृष्टि ऐक्यरूपानेच त्याला दिसू लागते; तेव्हां आत्मज्ञानेकरून हां हां म्हणतां स्वानंदाच्या कोटीच्या कोटी उपभोगावयास मिळतात ६७.

ज्या सुखाची मर्यादा । देशें काळें न करवे कदा ।
त्या सुखाची सुखसंपदा । भोगिती सदा अद्वैतें ॥६८॥
ज्या सुखाची मर्यादा देशानें किंवा कालानें कधीच करता येत नाही, त्या सुखाची संपत्ति निरंतर अद्वैतानें भोगावयास सांपडते ६८.

निजात्मेज्ञानें अलोलिक । दुजेनवीण अद्वैतसुख ।
तें सांडूनि कर्मवादी परम मूर्ख । नाना लोक वांछिती ॥६९॥
निजात्मज्ञानाने अलौकिक आणि दुजेपणा नसलेलें अद्वैत सुख सोडून देऊन परममूर्ख कर्मवादी अनेक प्रकारच्या लोकांची इच्छा करतात ६९.

मागां कर्मवादी कर्मठ । बोलिले प्रवृत्ति अतिश्रेष्ठ ।
कर्में करूनियां उद्‍भट । भोग वरिष्ठ भोगावे ॥६७०॥
मागें कर्मवादी किंवा कर्मठ हे लोकप्रवृत्तिच अत्यंत श्रेष्ठ आहे, ह्याकरितां कर्में करूनच उत्तमोत्तम भोग भोगावेत, असे म्हणाले होते ६७०.

तेंचि निरसोनि आतां । पुढारीं चालविली कथा ।
उद्धवासी अद्वैतता । दृढ सर्वथा सांगत ॥७१॥
त्याचेंच ह्यांत खंडण करून उद्धवाच्या मनांत अद्वैत भावना दृढतर ठसण्याकरितां भगवान् तेंच निरूपण पुढे सांगत आहेत ७१.

यावदस्यास्वतंत्रत्वं तावदीश्वरतो भयम् ।
य एतत् समुपासीरंस्ते मुह्यन्ति शुचार्पिताः ॥ ३३ ॥
[श्लोक ३३ ] जोपर्यंत जीवाला पारतंत्र्य जाणवते, तोपर्यंत ईश्वराचे वाटणारे भय कायमच असते जो अशा प्रकारे गुणांच्या विळख्यात सापडून राहातो, त्याला शोक आणि मोह होतच राहातात. (३३)

गुणवैषम्य ज्याचे ठायीं । ते नर भोगासक्त पाहीं ।
यागादि कर्में करूनि देहीं । भोगस्थान तिहीं ठाकिलें ॥७२॥
ज्यांच्या ठिकाणी गुणवैषम्य असते, तेच लोक भोगांविषयी आसक्त असतात असे समज. तेच देहानें यागादिक कर्में करून भोगाचे स्थानही मिळवितात ७२.

जे जे ठाकूनि गेले लोक । तेथूनि याज्ञिकां पतनधाक ।
तंव दुःखी देखे लोकनायक । अनित्य लोक देखोनि ॥७३॥
परंतु ज्या ज्या लोकाला ते जाऊन पोचतात, तिकडून तिकडून त्या याज्ञिकांना पतन होण्याचा धाक असतोच. तेव्हां तो लोकही अशाश्वतच आहे हे मनांत येऊन त्या लोकाचा अधिपतिही दुःखांतच असलेला दृष्टीस पडतो ७३.

पदच्युती लोकच्युती । भोगकर्मे भोगच्युती ।
केले कष्ट वृथा जाती । दुःखी होती निजपतनें ॥७४॥
तें पदही जाते; तो लोकही जातो; भोगकर्मानें भोगही नाहीसे होतात. आणि केलेले कष्ट व्यर्थ जाऊन अधःपतनानें दुःखी होतात ७४.

घायाळा कीजे तरटमार । तैसें ओतप्रोत दुःख फार ।
भंवे जन्ममरणव्यवहार । भोगी अघोर गर्भवास ॥७५॥
जखमी झालेल्या मनुष्याला चाबकाने मारले असता जसें असह्य दुःख होते, त्याप्रमाणे त्याला जन्ममरणाच्या फेऱ्यांत गिरक्या खातांना अतिशय दुःख होते व तो अघोर गर्भवास भोगतो ७५.

राहाटमाळेचे करे । पुढती रिता पुढतीं भरे ।
तैसा अविश्रम फिरे । गर्भद्वारें मरणांतीं ॥७६॥
रहाटगाडग्याचे पोहरे एकदा रिकामे होतात, एकदा भरतात. त्याप्रमाणे हाही जन्मापासून मरणापर्यंत अविश्रम फिरतच राहतो ७६.

विंचें खादिल्या दुःखितासी । दाढीसी आग लागे त्यासी ।
तेवीं भोगक्षयें पतितासीं । गर्भवासीं पीडा होय ॥७७॥
विंचू चावून तळमळत असलेल्याच्या दाढीला आणखी आग लागावी, त्याप्रमाणे भोगक्षयाने पतन पावलेल्याला आणखी गर्भाचीही पीडा होते ७७.

लोकांची अनित्यता नेणती । यालागीं परमदुःखी होती ।
कष्टांचें फळ दुःखप्राप्ती । संसारावर्ती अडकले ॥७८॥
स्वर्गादि लोकांची अनित्यता कळत नाही, म्हणूनच त्यांना अतिशय दुःख भोगावें लागते. संसाराच्या भोवऱ्यांत अडकल्यामुळे दुःखप्राप्ति हेच त्यांच्या कष्टाचे फळ त्यांना मिळते ७८.

केवळ लोक भोग अनित्य । हेंही न घडे गा येथ ।
भोगलोक होत सत्य । तरी अनित्य म्हणावे ॥७९॥
ज्या लोकांत भोग भोगावयास मिळतात, ते लोक व भोग अनित्य म्हणावे तर तसे म्हणणेही योग्य नाहीं; कारण भोगलोक जर खरे असते, तर त्यांना ‘अनित्य’ असे म्हटले असते ७९.

जेवीं दोरीं सर्पाभास । तेवीं लोक चतुर्दश ।
केवळ मायामय विलास । सुखलेश तेथ कैंचा ॥६८०॥
दोरामध्ये जसा सर्पाचा भास होतो, त्याप्रमाणेच हे चौदा लोक आहेत. तो सारा मायेचाच विलास असल्यामुळे, सुखाचा लेश तरी तेथे कशाचा ? ६८०.

केवळ जें कां मायिक । सत्यामाजीं कैंचें भोगसुख ।
कर्मठ ते केवळ मूर्ख । विषय मायिक वांछिती ॥८१॥
केवळ जे मायिक, तेथें भोगसुख कोठचें ? कर्मठ लोक शुद्ध मूर्ख असतात, म्हणूनच मायिक विषयांची ते इच्छा करतात ८१.

भरलें मृगजळाचें तळें । तेणें जैं पिकती साळीकेळें ।
तैं विषयभोगीं सुख फळें । हें न कळे भ्रांतासी ॥८२॥
मृगजळाचे तळे भरल्याने जर भात आणि केळी पिकतीं, तर विषयभोगापासून सुख प्राप्त झाले असते. पण हे भ्रांतांना कळत नाही ८२.

जग दुमदुमित भरलें दिसे । तें तूं मायिक म्हणसी कैसें ।
हेंचि कळे अनायासें । तुज मी तैसें सांगेन ॥८३॥
जग तर सारें गजबजलेलें दिसत आहे, त्याला मायिक कसें म्हणावें ? असें तूं म्हणशील, तर तेच तुला सहज रीतीने कळेल असें आतां सांगतों ऐक ८३.

काल आत्माऽऽगमो लोकः स्वभावो धर्म एव च ।
इति मां बहुधा प्राहुर्गुणव्यतिकरे सति ॥ ३४ ॥
[श्लोक ३४ ] प्रिय उद्ववा ! जेव्हा मायेच्या गुणांमध्ये क्षोभ होतो तेव्हा काल, आत्मा, वेद, लोक, स्वभाव आणि धर्म अशा अनेक रूपांनी व नावांनी मीच एकटा ओळखला जातो. (३४)

केवळ मायामय कल्पित । संसार तो अज्ञानजनित ।
एकातें अनेक म्हणत । चित्तें दुश्चित्त हो‍उनी ॥८४॥
संसार हा निखालस मायामय असून काल्पनिक आहे. कारण, तो अज्ञानापासूनच उत्पन्न झालेला आहे. चित्तांत विकल्प आल्यामुळेच तो एकाला अनेक असे म्हणतो ८४.

कनकबीजसेवनें जैसें । शहाणें माणूस होय पिसें ।
मग त्यासी नसतेंचि आभासे । ससे मासे गो सर्प ॥८५॥
धोतऱ्याचे बीं खाल्ले म्हणजे शहाणे मनुष्यही जसें वेडे बनून जाते, आणि मग त्याला नसलेले ससे, मासे, गाई व सर्प इत्यादिकांचा भास होऊ लागतो ८५,

तैसें मायावशें अतिभ्रांता । नसतें अनेकत्व भासे चित्ता ।
नभीं गंधर्वनगर पाहतां । दिसे शोभिता पुरदुर्गु ॥८६॥
त्याप्रमाणे मायेच्या पाशांत गुंतून अत्यंत भ्रम झाला, म्हणजे नसलेले अनेकत्वच चित्ताला भासू लागते. आकाशांतील ढगांकडे पाहिले म्हणजे शोभिवंत नगरे आणि किल्ले दिसू लागतात ८६.

कां अंधारीं दोरु दिसे डोळां । म्हणे सर्प दंड कीं सुमनमाळा ।
नाना एकावळी मुक्ताफळां । कोणी अबळा विसरली ॥८७॥
किंवा अंधारांत डोळ्यांना दोर दिसला तर तो म्हणतो की, हा काय सर्प आहे ? का काठी पडली आहे ? का फुलाची माळ आहे ? किंवा कोणी स्त्री मोत्यांचा हार विसरून गेली आहे ? ८७.

तेवीं निजात्मा मी पुरुषोत्तम । त्या मज नानारूपें नानाकर्म ।
काळु आत्मा आगम । स्वभावधर्म मज म्हणती ॥८८॥
त्याप्रमाणे मी निजात्मा पुरुषोत्तम सर्वत्र असता, त्या मला नाना प्रकारची रूपें, नामें व कर्में कल्पून, मला काळ, आत्मा, वेद, स्वभाव, धर्म, इत्यादि म्हणतात ८८.

‘काळु’ म्हणती प्रकृतिक्षोभकु । ‘आत्मा’ म्हणती प्रकृतिनियामकु ।
‘वेद’ म्हणती कर्मबोधकु । अदृष्टद्योतकु ‘धर्म’ म्हणती ॥८९॥
प्रकृतीला क्षोभ करणारा म्हणून मला ‘काळ’ म्हणतात. प्रकृतीचा नियामक म्हणून मला ‘आत्मा’ असे म्हणतात. कर्माचा बोधक म्हणून ‘वेद’ असें म्हणतात, आणि अदृष्टाचा द्योतक म्हणून ‘धर्म’ असे म्हणतात ८९.

अदृष्ट दृष्ट करूनि भोगविजे । यालागीं ‘धर्म तो म्हणिजे ।
आतां ‘स्वभावो’ जेणें बोलिजे । तेंही सहजें परियेसीं ॥६९०॥
अदृष्टाला दृष्ट करून त्याचा भोग देतो म्हणून त्याला ‘धर्म’ असे म्हणतात. आतां ‘स्वभाव’ ज्यावरून म्हणतात त्याचे कारणही सहजी ऐकून ठेव ६९०.

आत्मा भोक्ता हा ‘स्वभावो’ । जेणें परिणामें देवाधिदेवो ।
इत्यादिका हेतु पहा हो । मजचि ‘स्वभावो’ म्हणताति ॥९१॥
आत्मा भोक्ता हाच ‘स्वभाव’ होय. ज्या परिणामाने देवाधिदेव आत्मा, भोक्ता, स्वभाव, इत्यादिकांचे कारण होतो, त्या परिणामाला स्वभाव असें म्हणतात ९९.

अदृष्टाचें फळ नाना लोक । ‘लोक’ म्हणावया हेतु हे देख ।
एवं मज एकातें अनेक । मिथ्या मूर्ख मानिती ॥९२॥
अनेक प्रकारचे लोक प्राप्त होणे हे अदृष्टाचे फळ आहे. मला ‘लोक’ म्हणण्याचे कारणही हेच आहे. तात्पर्य, मला एकालाच मूर्ख लोक अनेक असें व्यर्थ मानतात ९२.

नानारंगांचिया वृत्ती । चित्र लिहिलें यथानिगुती ।
तेंही नानाकारें दिसे भिंतीं । सर्वव्यक्तिद्योतक ॥९३॥
अनेक रंगांच्या झांकीने भिंतीवर यथातथ्य चित्र काढलेले असते, त्यामुळे भिंत नानारूपात्मक दिसते, पण ती एकरूपच असते ९३,

तैसे नानाकार नाना धर्म । नाना नामें नाना कर्म ।
तें मी अवघा आत्माराम । सर्वोत्तम सर्वथा ॥९४॥
त्याप्रमाणे नानाप्रकारची रूपें व नाना प्रकारचे धर्म, नाना प्रकारची नामें व नाना प्रकारचे कर्म, ही सारी सर्वदा मी सर्वोत्तम आत्मारामच आहे ९४.

मजवेगळा रिता कांहीं । अणुभरी ठाव उरला नाहीं ।
मी सर्वात्मा सर्व देहीं । सर्वगत पाहीं सर्वदा ॥९५॥
माझ्याशिवाय रिकामी अशी अणुभरसुद्धा जागा नाही. साऱ्या देहांमध्ये सदासर्वदा मी सर्वांतरात्मा व्यापून राहिलेला आहे ९५.

जैसे सागरामाजीं तरंग । तैसें मजमाजीं दिसे जग ।
जग नव्हे तें मीचि चांग । सुख अव्यंग मजमाजीं ॥९६॥
समुद्रामध्ये जशा लाटा दिसतात, त्याप्रमाणे माझ्यामध्ये हे सारे जग दिसते; पण हे जग नव्हे, तर मीच स्वतः आहे; आणि अव्यंग सुख माझ्याच ठिकाणी आहे ९६.

मी शुद्ध-बुद्ध-मुक्तस्वभाव । त्या मज नानात्वें ठेविती नांव ।
उद्धवा ज्यासी जैसा भाव । तैसा मी देव तयासी ॥९७॥
मी ‘शुद्ध-बुद्धामुक्त-स्वभाव’ आहे. त्या मला नानाप्रकारची नांवे ठेवतात. उद्‌धवा ! ज्याचा जसा भाव असतो, तसाच त्याला मी देव होतों ९७.

नास्तिक्य वसे ज्याचे ठायीं । त्यासी मी सर्वथा कोठें नाहीं ।
आस्तिक्यवंतालागीं पाहीं । मी सर्वांठायीं तिष्ठतु ॥९८॥
ज्याच्यामध्ये नास्तिकपणा असतो, त्याला मी कधीच कोठेही नसतों ; आणि ज्याच्या मनांत आस्तिक्यबुद्धि असते, त्याच्यासाठी मी सर्व ठिकाणी उभा असतों ९८.

भावार्थे जो मज जेथें पाहे । त्यासी मी तेव्हांचि तेथें आहें ।
मज पावावया उपाये । बहुत पाहें न लगती ॥९९॥
भक्तिभावाने जो मला जेथे पाहतो, त्याला मी तेथेच असतो. हें पहा ! माझी प्राप्ति होण्याला फारसे प्रयास नको आहेत ९९.

मी सर्वात्मा सर्वमत एकु । ऐसा जयाचा भाव निष्टंकु ।
तोचि पढियंता मज एकु । ज्ञानतिलकु तो माझा ॥७००॥
मी सर्वात्मा, सर्वव्यापक असा एकच आहे, असा ज्याचा निश्चयात्मक भाव असतो, तोच एक माझा आवडता भक्त आणि तोच माझा ज्ञानाचा तिलक होय ७००.

तो आत्मा मी त्याचें देह । मी ध्याता तो माझें ध्येय ।
मी ज्ञाता तो शुद्ध ज्ञेय । ऐसा पढिये तो आम्हां ॥१॥
तो आत्मा आणि मी त्याचा देह ; मी ध्याता आणि तो माझे ध्येय; मी ज्ञाता आणि तो शुद्ध ज्ञेय; इतका तो आम्हांला आवडता असतो १.

उद्धवा हे एकात्मताभक्ती । सज्ञान ज्ञातें येणें भजती ।
तयां मज अभेदप्रीती । तुवांही या रीती भजावें ॥२॥
उद्धवा ! ‘एकात्मभक्ति’ ती हीच. ज्ञानसंपन्न ज्ञाते ह्याच भक्तीने माझें भजन करतात. त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये अभेद प्रीति असते. ह्याकरितां तूंही ह्याच रीतीने भजन कर २.

परमात्मा एक नित्य शुद्ध । त्यासी मायामय संसारबंध ।
मिथ्या जाण देहसंबंध । हा ‘निजात्मबोध’ पैं माझा ॥३॥
परमात्मा एक, नित्य व शुद्ध आहे; त्याला मायामय संसारबंध नाही; आणि देहसंबंधही मिथ्या आहे हे लक्षात ठेव. हाच माझा खरा ‘आत्मबोध’ होय ३.

हा मिथ्यासंबंध पडे जीवासी । आत्मज्ञानें मुक्ति त्यासी ।
हें मागें बोलिलों तुजपाशीं । तेंचि मतनिरासीं दृढ केलें ॥४॥
मिथ्यासंबंधच जीवाला पडतो व नडतो; तेव्हां आत्मज्ञानाने त्याची मुक्ति होते. हे तुझ्याजवळ पूर्वी बोललोंच आहे. तीच गोष्ट अन्यमताचा निरास करून दृढ केली ४.

धरोनि श्लोक चौदावा । अंतीं श्लोक चौतिसावा ।
मीमांसकमताचा आघवा । निरासु बरवा येणें केला ॥५॥
चौदावा श्लोक धरून चौतिसाच्या श्लोकापर्यंत मीमांसकांच्या मताचे सविस्तर खंडण केलें ५.

एवं निरसोनि मतांतर । अद्वैत स्थापिलें दृढतर ।
हेंचि निजज्ञान साचार । चराचरवरिष्ठ ॥६॥
ह्याप्रमाणे विरुद्ध मताचें निरसन करून अद्वैताची दृढतर स्थापना केली. हेच चराचरांत श्रेष्ठ असें खरें आत्मज्ञान होय ६.

अद्वैतज्ञान शुद्ध चोख । ऐकोनि उद्धवा जाहलें सुख ।
हृदयीं दाटला जी हरिख । पाहे श्रीमुख कृष्णाचें ॥७॥
असें हें शुद्ध व पवित्र अद्वैत ज्ञान श्रवण करून उद्धवाला मोठा आनंद झाला. आणि अंतःकरणांत हर्ष दाटून येऊन, त्याने श्रीकृष्णाच्या मुखाकडे पाहिले ७.

चालिलें सात्त्विकाचें भरितें । चित्त विसरलें चिंतनातें ।
अश्रु लोटले जी तेथें । आप‍आपणियातें विसरला ॥८॥
त्याच्या प्रेमाला भरते आले; त्याचे चित्त चिंतनालाच विसरलें ; त्या वेळी त्याच्या नेत्रांतून प्रेमाच वाहू लागले. त्यामुळे आपण आपल्याला तो विसरून गेला ! ८.

उद्धवासी नावेक । पडोनि ठेलें जी टक ।
सावध होऊनियां देख । कृष्णसंमुख तो झाला ॥९॥
उद्धवाला क्षणभर बेभान अवस्था प्राप्त झाली. तितक्यांत सावध होऊन तो श्रीकृष्णाच्या समोर स्थित झाला ९.

अद्वैतभजनें जे भजते । ते भक्त कृष्णासी आवडते ।
तें केवीं प्राप्त होय मातें । यालागीं हरितें पुसतु ॥७१०॥
अद्वैतभजनाने जे भजतात, तेच भक्त कृष्णाला आवडतात, तेव्हां असें अद्वैतभजन मला कसें प्राप्त होईल ? म्हणून तो श्रीकृष्णाला विचारूं लागला ७१०.

श्रीउद्धव उवाच – गुणेषु वर्तमानोऽपि देहजेष्वनपावृतः ।
गुणैर्न बध्यते देही बध्यते वा कथं विभो ॥ ३५ ॥
[श्लोक ३५] उद्धव म्हणाला भगवन ! हा अलिप्त आत्मा देह, इंद्रिय इत्यादी गुणांमध्ये, तसेच देहाने केलेली कर्मे व त्यांची फळे यांमध्ये राहात असूनही त्यांपासून मुक्त कसा राहातो ? किंवा वरील गुणांनी बद्ध कसा होतो ? (३५)

उद्धव म्हणे कृष्णनाथा । आत्मा देहामाजीं असतां ।
बंधन पावे जी तत्त्वतां । कीं सर्वथा पावेना ॥११॥
उद्धव म्हणाला, हे कृष्णनाथा ! आत्मा हा देहामध्ये असतांना खरोखर बंधन पावतो, का मुळींच पावत नाही ? ११.

गुण असतां मुक्ति घडे । कीं गुण गेलिया मुक्ति जोडे ।
हेंचि सांगावें मज पुढें । अतिनिवाडें निश्चित ॥१२॥
गुण असतांना मुक्ति मिळते, कां गुण गेल्यावर मुक्ति मिळते ? हेच मला निश्चित आणि मोकळ्या मनाने सांगावें १२.

गुण असतां मुक्ति घडे । हें सर्वथा बोलणें कुडें ।
ज्वर असतां आरोग्य न घडे । वृक्ष न वाढे भिरुंडेंसीं ॥१३॥
गुण असतांनाच मुक्ति घडेल हे बोलणे अगदींच असंबद्ध आहे. कारण ज्वर असतांना काही कधी आरोग्य घडणे शक्य नाही, किंवा कीड लागल्यावर काहीं झाड वाढावयाचें नाहीं १३.

बाहीं बांधोनि पाषाण । समुद्रामाजीं तरे कोण ।
तैसें देहीं असतां त्रिगुण । मुक्तपण कैसेनि ॥१४॥
दंडाला दगड बांधून समुद्रात पोहणार कोण ? त्याप्रमाणे देहांत तीन गुण नांदत असतांना मुक्तपणा कसा येणार ? १४.

गुण जे रजतमादिक । त्यांचें कार्य देह देख ।
गुणासारिखीं आवश्यक । कर्मे अनेक आचरे ॥१५॥
रजतमादिक जे गुण आहेत, त्याचे कार्य देह आहे. म्हणून तो हटकून गुणासारखींच अनेक कर्मे करतो १५.

कर्माचें फळ सुखदुःख । भोगणें पडे गा अचुक ।
गुणांसी मुक्ति न घडे देख । हें ज्ञाते लोक म्हणताति ॥१६॥
म्हणून त्या कर्माचे फळ सुखदुःख तें अचुक भोगणें भाग पडते. आणि गुणांना तर मुक्ति प्राप्त व्हावयाची नाहीं असें ज्ञाते लोक म्हणतात १६.

गुण गेलिया मुक्ती । हेंही न घडे गा श्रीपती ।
येहीविषयीं विनंती । कृपामूर्ती अवधारीं ॥१७॥
श्रीकृष्णा ! गुण गेल्यावर मुक्ति मिळेल म्हणावे तर तसेंही घडणे शक्य नाही. हे करुणानिधे ! त्याविषयीही विनंती करतो ती ऐकावी १७.

गुणांचें कार्य देहेंद्रियें । ते गुण जाऊनि देह राहे ।
भूमीविण वृक्ष होये । हें अबद्ध पाहें बोलणें ॥१८॥
देहाची इंद्रिये हें गुणांचे कार्य आहे; ते गुण गेल्यावर देह राहतो म्हणणे म्हणजे भूमीशिवायच वृक्ष होतो, असे म्हणण्यासारखे ते बोलणे अगदी विसंगत आहे १८.

कारण जाऊनि कार्य राहे । हें बोलणें घडे काये ।
गुण जातां देहोचि जाये । मुक्त वर्तताहे कैसेनि ॥१९॥
कारण जाऊन कार्य मात्र राहिले, असें कधीं म्हणता येईल काय ? गुण गेले, की त्यांच्याबरोबर देहच जाणार. मग मुक्त वागणार तरी कसा ? १९.

एवं गुण असतां नसतां । मुक्ति न घडे गा सर्वथा ।
येचिविषयीं कृष्णनाथा । तुज मी तत्त्वतां पुसतु ॥७२०॥
तात्पर्य, गुण हे असले तरी किंवा नसले तरी मुक्ति म्हणून कधीच घडावयाची नाही, असे मला वाटते. म्हणून हे कृष्णनाथा ! ह्याचाच खरा विचार मी तुला विचारतों ७२०.

आणिक एक जगन्नाथा । तुज मी विनंती करीन आतां ।
गुण आत्म्यासी एकत्रता । न घडे सर्वथा निश्चित ॥२१॥
हे जगन्नाथा ! पुन्हा मी आपल्याला अशी एक विनंती करतों की, गुण आणि आत्मा हे खरोखर कधी एकत्र रहावयाचे नाहींत २१.

भरलें मृगजळाचें तळें । चंद्रमा बिंबेना तेणें जळें ।
तेवीं आत्मा गुणांसी नाकळे । स्वभावें नातळे गुणांतें ॥२२॥
मृगजळाचे तळे भरलेले असले तरी त्या जळांत कांहीं चंद्रबिंब प्रतिबिंबित होणार नाही, त्याप्रमाणे आत्मा कधीं गुणांनी बद्ध होणार नाही. कारण, गुणांना स्पर्शही न करणे हा त्याचा स्वभावधर्मच आहे २२.

गुण ते अज्ञानाची राती । आत्मा स्वप्रकाश गभस्ती ।
त्यासमोर ते कैंचे येती । मग बाधिती आत्म्यातें ॥२३॥
गुण म्हणजे अज्ञानाची रात्र आणि आत्मा हा स्वयंप्रकाश असा सूर्य आहे. त्याच्या समोर ते येणार तरी कसे ? आणि त्याला बाधणार तरी कसे ? २३.

अंधार सूर्यातें गिळी । काउळा कैलास आतळी ।
बागुल हनुमंतातें सळी । मशक गिळी गजातें ॥२४॥
अंधार जर सूर्याला गिळील, कावळा जर कैलासाला जाईल, बागुलबावा जर मारुतीला जर्जर करील, किंवा मुरकूट जर हत्तीला खाऊन टाकील २४,

माशी-पांखें गगन उडे । सगळा मेरु थिल्लरीं बुडे ।
मृगजळीं जैं तारूं पडे । तैं आत्मा सांपडे गुणांत ॥२५॥
माशीच्या पंखांनी जर आकाश उडून जाईल, मेरु जर सगळा डबक्यांत बुडून जाईल, किंवा मृगजळांत जर तारूं बुडेल, तरच आत्मा गुणांत बद्ध होईल २५.

जेवीं आकाश नातुडे जाळीं । तेवीं आत्मा नाकळे गुणमेळीं ।
मा सुखदुःखांची नवाळी । गुणकल्लोळीं कां भोगी ॥२६॥
आकाश ज्याप्रमाणे जाळ्यांत सांपडत नाही, त्याप्रमाणे आत्माही गुणसमुदायांत सांपडत नाही. मग सुखदुःखाचा अनुभव गुणांच्या धामधुमीत कसा भोगील ? २६.

यापरी न घडे गा बद्धता । मा मुक्ताची कायसी कथा ।
कैसेनि बद्धमुक्तव्यवस्था । घडे कृष्णनाथा तें सांग ॥२७॥
अशा प्रकारे विचार केला असतां, आत्म्याला मुळी बंधन घडतच नाही. मग मुक्तीची गोष्ट उगीच कशाला बोलावी ? तेव्हा हे श्रीकृष्णनाथा बद्ध-मुक्त-अवस्था कोणास असते ते सांगावें २७.

येथ बद्धासी काय कारण । आणि मुक्ताची कोण खूण ।
एवं बद्धमुक्तलक्षण । मज संपूर्ण सांगावें ॥२८॥
सारांश, येथे बंधन घडण्याला कारण काय ? आणि मुक्ताचे लक्षण तरी कोणते ? मिळून बद्धाचे आणि मुक्ताचे सविस्तर लक्षण मला निवेदन करावें २८.

कथं वर्तेत विहरेत् कैर्वा ज्ञायेत लक्षणैः ।
किं भुञ्जीतोत विसृजेच्छयीतासीत याति वा ॥ ३६ ॥
[श्लोक ३६] बद्ध किंवा मुक्त पुरूष कसा असतो ? कसा वागतो ? तो कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो ? काय खातो ? मलत्याग इत्यादी कसे करतो ? झोपतो कसा, बसतो कसा आणि चालतो कसा ? (३६)

आतां बद्धमुक्तांची स्थिती । मज सांगावी श्रीपती ।
कोणें लक्षणें जाणिजेती । दोघे कळती कैसेनि ॥२९॥
हे श्रीपति ! आतां मला बद्धाची आणि मुक्ताची स्थिति सांगावी. ते दोघे कोणत्या लक्षणांनी आणि कसे ओळखता येतील ? २९.

पावोनियां विदेहावस्था । देहीं कैसेनि वर्तता ।
वश करूनि गुणातीतता । गुणीं क्रीडता कैसेनि ॥७३०॥
तसेंच विदेहस्थिति प्राप्त झाल्यानंतर ते देहामध्ये कसे वागतात ? गुणातीतता आपल्या अंगी घेऊन ते गुणामध्ये कसें वर्तन करतात ? ७३०.

पावोनियां मुक्तदशा । देहीं भोग भोगी कैसा ।
त्यासी त्यागाचा कोण ठसा । हृषीकेशा सांगिजे ॥३१॥
मुक्तदशा प्राप्त झाल्यानंतर देहाने भोग तरी भोगतात कसे ? त्यांच्या त्यागाचा ठसा तरी काय असतो ? श्रीकृष्णा ! तोही सांगावा ३१.

त्याचे निद्रेचें कोण लक्षण । कोण बैसका कोण आसन ।
वस्तु जाणोनि संपूर्ण । गमनागमन त्या कैसें ॥३२॥
त्यांच्या निद्रेचे लक्षण काय ? बैठक कशी ? आसन कसे ? पूर्ण परब्रह्म जाणल्यानंतर त्यांचे जाणे येणें तरी कसे काय असते ? ३२.

ऐशीं मुक्तांची लक्षणें । त्याहोनि बद्धांची विलक्षणें ।
कृपा करोनि नारायणें । मजकारणें सांगिजे ॥३३॥
अशी जी काय मुक्तांची लक्षणे असतील ती, आणि बद्धांची त्याहून विचित्र असणारी, कृपा करून देवांनी मला सांगावीत ३३.

एतदच्युत मे ब्रूहि प्रश्नं प्रश्नविदां वर ।
नित्यबद्धो नित्यमुक्त एक एवेति मे भ्रमः ॥ ३७ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
एकादशस्कन्धे भगवद्-उद्धवसंवादे दशमोऽध्यायः ॥ १० ॥
[श्लोक ३७] हे अच्युता ! प्रश्नाचे मर्म जाणणार्‍यांमध्ये आपण श्रेष्ठ आहात एकच आत्मा अनादी गुणांच्या संबंधामुळे नित्यमुक्तही आहे या गोष्टीमुळे मला संशय उत्पन्न झाला आहे तरी आपण माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्यावे. (३७)

या प्रश्नोत्तरांची उत्कंठा । थोर वर्ततसे वैकुंठा ।
प्रश्नवेत्त्यांमाजीं श्रेष्ठा । अतिवरिष्ठा गोविंदा ॥३४॥
हे सर्वश्रेष्ठा वैकुंठाधिपते गोविंदा ! ह्या प्रश्नांच्या उत्तरांची मला अतिशय उत्कंठा लागून राहिलेली आहे. आपण प्रश्नाचे समर्पक उत्तर देण्यामध्ये श्रेष्ठ आहां ३४.

अनादि असे गुणसंबंधु । तेणें आत्मा झाला नित्यबद्धु ।
नित्यमुक्त हा शब्दु । असंबद्धु सर्वथा ॥३५॥
हा गुणांचा संबंध अनादि कालापासून चालत आलेला आहे. आणि त्यामुळे आत्मा हा ‘नित्यबद्ध’ झालेला आहे. म्हणून ‘नित्यमुक्त’ हा शब्दच मुळी असंबद्ध दिसतो ३५,

जरी आत्म्यासी नित्यमुक्तता । तरी बोलोंचि नये बद्धता ।
एकुचि बद्धमुक्त म्हणतां । भ्रम अच्युता वाटत ॥३६॥
आत्म्याला जर नित्यमुक्तता असेल तर बंधनाचें नांवही काढावयाला नको. बद्ध आणि मुक्त एकालाच म्हणावें, तर श्रीकृष्णा ! मला भ्रम वाटतो ३६.

आत्मा एकचि तत्त्वतां । त्यासी बद्धता आणि मुक्तता ।
एकासीच दोनी अवस्था । कृष्णनाथा कैसेनि ॥३७॥
श्रीकृष्णा ! आत्मा तर खरोखर एकच आहे. त्या एकालाच बंधन आणि मुक्ति ह्या दोन्ही अवस्था कशा बरे असतील ? ३७.

तो धाला तोचि भुकेला । जागता तोचि निजेला ।
जो जिता तोचि मेला । सत्यत्व या बोला कैसेनि ॥३८॥
जो तृप्त झाला तोच भुकेला; जो जागा तोच निजलेला; जो जिवंत तोच मेलेला; हे बोलणे खरे कसें मानावें ? ३८.

काळें तेंचि धवळें । देखणें तेंचि आंधळें ।
अर्धें तेंचि सगळें । कुहिर्‍या केळें केवीं होती ॥३९॥
काळें तेंच पांढरें; डोळस तेच आंधळे; अर्धे तेच सगळे; कसे म्हणता येईल ? कुहिरीच्या वेलीला केळी कशी होतील ? ३९.

लोण तेंचि अलवणी । कोरडें तें पाणी ।
अतिशीतळ तो दारुण अग्नि । मुकें पुराणीं बोलिगडें ॥७४०॥
खारट तेच आळणी; कोरडें तेच पाणी; थंडगार तोच भयंकर अग्नि, मुके तेच बोलघेवढे असें कसें म्हणता येईल ? ७४०.

लुगडें नागीवपणें लाजाळु । अन्न भुकेलेपणें भुकाळू ।
मुक्तीसी मुक्तीचा दुकाळू । कापूरा परिमळू मिळेना ॥४१॥
लुगडेंच नग्न म्हणून लाजाळू; अन्नच भूक लागल्याने भुकालू; मुक्तीलाच मुक्तीचा दुकाळ; कापराला सुगंधच मिळेना (असें कसें म्हणता येईल ?) ४१.

तैसे संत तेचि असंत । अद्वैत तेंचि होय द्वैत ।
तेव्हां हित तेंचि अनहित । दिसे प्रस्तुत आम्हांसी ॥४२॥
त्याप्रमाणे संत तेच असंत; अद्वैत तेंच द्वैत; त्याचप्रमाणे हित तेंच अनहित, असें आतां आम्हांस वाटू लागले आहे ४२.

आत्मा नित्यमुक्त-शुद्ध-बुद्ध । ऐसा तुवांचि मज केला बोध ।
तो गुणसंगें म्हणसी बद्ध । भ्रमु अगाध येणें मज ॥४३॥
आत्मा हा नित्यमुक्त असून तो शुद्ध व बुद्ध म्ह. ज्ञानस्वरूप आहे, असा आपणच मला बोध केला ; आणि तोच गुणांच्या संगतीने बद्ध होतो असे म्हणता. ह्यामुळे मी तर मोठ्या बुचकळ्यात पडलों आहे ४३.

एकासचि बद्धमुक्तता । कैसेनि घडे कृष्णनाथा ।
कृपाळुवा जी अनंता । हें मज तत्त्वतां सांगावें ॥४४॥
देवा ! एकालाच बंधन आणि मुक्ति एकाच वेळी घडेल तरी कशी ? हे अनंता ! आपण कृपाळू आहां. तेव्हां ह्यांतील खरे काय ते मला सांगावं ४४.

म्हणीसी मुक्तीसी आगंतुकता । तेणें मोक्षासि आली अनित्यता ।
बद्ध आगंतुक म्हणतां । त्यासी सादिता येऊं पाहे ॥४५॥
आपण मुक्ति ही आगांतुक आहे असे म्हणाल, तर मोक्षाला अनित्यत्व आले; तसेंच बंधनाला आगांतुक म्हटले तर त्याला आदि आहे असें होतें ४५.

पूर्वी बद्धचि नव्हता । येथूनि उपजला आतां ।
ऐशी सादिता बोलतां । होइल शास्त्रार्था विरुद्ध ॥४६॥
पूर्वी बंध हा नव्हताच तो आजपासून उत्पन्न झाला; असा त्याला आदिपणा सांगितला, तर ते शास्त्रार्थाच्या विरुद्ध होईल ४६.

श्रुतिस्मृतिशास्त्रसिद्ध । अनादि मुक्ती अनादि बद्ध ।
आत्मा एक अवस्था द्विविध । त्याही विरुद्ध परस्परें ॥४७॥
मुक्ति ही अनादि बंधही अनादिच असल्याबद्दल श्रुतीवरून, स्मृतीवरून व शास्त्रावरूनही सिद्ध आहे. आणि आत्मा तर एकच असून त्याला या दोन अवस्था ! आणि त्याही परस्पर विरुद्ध ! हे बोलणे किती विलक्षण आहे ? ४७.

उठिली बद्धता मुक्तीतें छळी । खवळली मुक्ती बद्धता गिळी ।
ऐशी विरुद्धता आत्म्याजवळीं । केवीं वनमाळी राहताति ॥४८॥
बद्धता बळावली तर ती मुक्तीला छळील, आणि मुक्ति खवळली तर ती बंधनाला गिळून टाकील. अशा या परस्पर विरोधी स्थिति हे देवा ! आत्म्याजवळ राहतात तरी कशा ? ४८.

जैं सांजवेळे भेटे पाहांट । तै विद्या अविद्या होय एकवट ।
सूर्य अंधाराची बांधे मोट । तैं आत्म्यानिकट अवस्था ॥४९॥
जर संध्याकाळी पहाट होईल, तरच विद्या आणि अविद्या एक होईल, सूर्य जर अंधाराची मोट बांधील तर ह्या अवस्था आत्म्याजवळ राहतील ! ४९.

हिंगासी कापुराचा वासु जोडे । तैं अविद्या विद्येमाजीं पडे ।
ससा सिंहावरी जैं चढे । तैं आत्म्यापुढें अवस्था ॥७५०॥
हिंगाला जर कापराचा वास येईल, तर अविद्या विद्येमध्ये पडेल; ससा जर सिंहावर चाल करून जाईल, तरच या अवस्था आत्म्यापुढे येतील ७५०.

उद्धव म्हणे कृष्णनाथा । या जैं कळल्या दोनी अवस्था ।
तैंचि मुक्ति आली हाता । मज सर्वथा मानलें ॥५१॥
उद्धव म्हणाला, हे कृष्णनाथा ! ह्या दोन अवस्था कसल्या, हे समजले की त्याच वेळी मुक्तिही हाताला आली, असें मी निःसंशय समजतों ५१.

मग म्हणे श्रीअनंता । विशद सांगाव्या अवस्था ।
म्हणोनि चरणीं ठेविला माथा । मोक्षदाता तूं मज ॥५२॥
पुन्हा तो म्हणाला, हे देवा, तूंच मोक्षाचा दाता आहेस, ह्याकरितां त्या अवस्था मला स्पष्ट करून सांगाव्या. असें म्हणून त्याने चरणावर मस्तक ठेवले ५२.

सखोल उद्धवाचा प्रश्न । ऐकोनि सुखावला नारायण ।
माझा उद्धवु जाहला सज्ञान । हरिखें जगज्जीवन डोलतु ॥५३॥
उद्धवाचा हा मार्मिक प्रश्न ऐकून नारायणाला फार संतोष झाला. आता माझा उद्धव ज्ञानी झाला, असे त्यांच्या मनांत येऊन ते जगज्जीवन आनंदाने डोलू लागले. ५३.

परमार्थी अवस्था गाढी । देखोनि प्रश्नाची अतिगोडी ।
उद्धवासी ओंवाळावया आवडीं । जीव कुरवंडी करूं पाहे ॥५४॥
परमार्थाबद्दल त्याची अत्यंत तळमळ पाहून आणि प्रश्नाचे महत्त्व लक्षात आणून प्रेमाने उद्धवावरून ते काया कुरवंडी करण्याच्या बेतांत आले ५४.

नुल्लंघी भक्ताचें उत्तर । फोडिलें गुह्य ज्ञानभांडार ।
भक्तकृपा जी अपार । हरि साचार तुष्टला ॥५५॥
भगवान् भक्तांचे वचन कधी उल्लंघन करीत नाही. त्यासाठी त्यांनी आपल्या गुह्य ज्ञानाचे भांडार खुलें केलें. खरोखर परमेश्वर प्रसन्न झाला, की तो भक्तावर अपरंपार कृपाच करतो ५५.

उद्धवाचा प्रश्न गहन । कृपा द्रवला जगज्जीवन ।
एका विनवी जनार्दन । आनंदघन वोळला ॥५६॥
उद्धवाचा प्रश्न खोल असल्यामुळे जगजीवन कृष्ण कृपेनें द्रवला, एका जनार्दन विनयाने कळवितो की, तो आनंदाचा मेघच भरून आला ५६.

त्या आनंदाचा महापूरु । शिष्यसरितेसी येईल थोरु ।
तेणें चिद्‍गंगासागरु । शिष्य सत्वरु ठाकील ॥५७॥
त्याच्या दृष्टीने आतां शिष्यरूप नदीला आनंदाचा मोठा पूर येईल. तेणेकरून शिष्य ज्ञानगंगेच्या समुद्राला जाऊन मिळेल ५७.

टाकोनियां संसारआस्था । जो लागला भक्तिपंथा ।
तोचि अधिकारी भागवता । परमार्था ग्राहकु ॥५८॥
संसाराची आस्था सोडून देऊन जो भक्तिमार्गाला लागला, तोच या भागवताचा अधिकारी होय. आणि तोच परमार्थाचा खरा ग्राहक ५८.

ज्याचे पोटीं संसारचिंता । तो कथा ऐकतांचि दुश्चिता ।
चित्त चिंती ज्या ज्या अर्था । तो सर्वथा तेथें असे ॥५९॥
आणि ज्याच्या पोटांत संसाराचीच चिंता आहे, त्याच्या मनांत ही कथा ऐकतांच विपरीत भावना उत्पन्न होईल. कारण, चित्त ज्या वस्तूचे चिंतन करते, तद्‌रूपच ते होत असते ५९.

चित्त जंव नाहीं सुचित । तंव न कळे श्रीभागवत ।
गुरुवांचूनि श्रीभागवतार्थ । नव्हे प्राप्त प्राण्यासी ॥७६०॥
चित्त जोपर्यंत सावध व स्थिर नाही, तोपर्यंत भागवत समजावयाचे नाही. तसेंच श्रीगुरूवांचून भागवताचा अर्थ प्राण्यांना मुळीच कळावयाचा नाही ७६०.

जो संसारापासोनि विरक्त । गुरुचरणीं अतिअनुरक्त ।
त्यासी फावला एक परमार्थ । फळे भागवत तयासी ॥६१॥
संसारापासून जो विरक्त होईल, गुरुचरणीं जो अत्यंत अनुरक्त असेल, त्यालाच फक्त परमार्थ प्राप्त होईल; आणि त्यालाच भागवत फलद्रूप होईल ६१.

देखतां कृष्णाचें श्रीमुख । उद्धवा नीच नवें समाधिसुख ।
तरी श्रवणाची श्रद्धा अधिक । आवडी देख अनिवार ॥६२॥
श्रीकृष्णाचे मुख पाहूनच उद्धवाला नित्यनवें समाधिसुख प्राप्त होत असे, तरी आणखी श्रवणाची त्याला श्रद्धा होतीच, इतकी त्याची आवड थोर ६२.

जो श्रुतिप्रतिपाद्य चिद्घन । त्या श्रीकृष्णाचें गुह्य ज्ञान ।
पुढतपुढतीं होआवया श्रवण । करी प्रश्न अतियोग्य ॥६३॥
वेदांनी प्रतिपादन केलेला ज्ञानस्वरूप परमात्मा जो श्रीकृष्ण, त्याचे गुह्यज्ञान पुनःपुन्हा ऐकावयाला मिळावे म्हणून त्याने अत्यंत योग्य असा प्रश्न केला ६३.

विद्याअविद्येचा निरासु । श्रीकृष्ण सांगेल परेशु ।
पुढील अध्याय अतिसुरसु । श्रोतां अवकाशु मज द्यावा ॥६४॥
म्हणून श्रीकृष्ण परमात्मा आतां विद्येचा व अविद्येचा निरास सांगेल. तो पुढचा अध्याय अत्यंत सुरस आहे. याकरितां श्रोत्यांनीही माझ्याकडे लक्ष द्यावें. ६४.

तो कृष्ण‍उद्धवसंवादु । पुढिले कथेचा अतिविनोदु ।
एका जनार्दनीं महाबोधु । परमानंदु प्रकटेल ॥७६५॥
त्या श्रीकृष्णाच्या आणि उद्धवाच्या संवादांतील पुढील कथा फार मनोल्हादक आहे. यास्तव एका जनादर्नामध्येही महाज्ञान व परमानंद प्रगट होईल ६५.

इति श्रीमद्‍भागवते महापुराणे एकादशस्कन्धे श्रीकृष्णोद्धसंवादे
एकाकारटीकायां परमहंससंहितायां दशमोऽध्यायः ॥१०॥
याप्रमाणे श्रीमद्‌भागवत एकादश स्कंधांतील एकनाथकृत टीकेचा दहावा अध्याय समाप्त झाला॥१०॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ मूळश्लोक ॥३७॥ ओव्या ॥७६५॥
ॐ तत्सत्-श्रीकृष्णार्पणमस्तु.


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 

ref:satsangdhara 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *