दासबोध दशक विसावा

दासबोध दशक चवदावा

दासबोध दशक चवदावा विडिओ सहित



॥ श्रीमत् दासबोध ॥
॥ दशक चवदावा : अखंडध्यान

समास पहिला : निस्पृहलक्षणनाम
॥ श्रीराम ॥

ऐका स्पृहाची सिकवण । युक्ति बुद्धि शाहाणपण ।
जेणें राहे समाधान । निरंतर ॥ १ ॥
श्रीसमर्थ म्हणतात की, नि:स्पृहाची शिकवण आता ऐका. त्याच्या ठिकाणी युक्ती, बुद्धी, शहाणपण या गोष्टी असणे आवश्यक आहे. त्यायोगेच निरंतर समाधान राहते. (१)

सोपा मंत्र परी नेमस्त । साधें वोषध गुणवंत ।
साधें बोलणें सप्रचित । तैसें माझें ॥ २ ॥
मंत्र सोपा आहे, पण प्रतीती देणारा आहे. औषध साधे असावे, पण ते गुण देणारे असावे. तसे माझे बोलणे साधे असले, तरी प्रचीतीचे आहे. (२)

तत्काळचि अवगुण जाती । उत्तम गुणाची होये प्राप्ती ।
शब्दवोषध तीव्र श्रोतीं । साक्षपें सेवावें ॥ ३ ॥
याने अवगुण तत्काळ जातात आणि उत्तम गुणांची प्राप्ती होते. म्हणून हे तीव्र शब्दरूप औषध श्रोत्यांनी आग्रहाने सेवावे (३)

निस्पृहता धरूं नये । धरिली तरी सोडूं नये ।
सोडिली तरी हिंडों नये । वोळखीमधें ॥ ४ ॥
आधी नि:स्पृहता धरू नये आणि एकदा धरली तर सोडू नये. समजा यदाकदाचित सोडली तर निदान ओळखीच्या लोकांमध्ये हिंडू नये. (४)

कांता दृष्टी राखों नये । मनास गोडी चाखऊं नये ।
धारिष्ट चळतां दाखऊं नये । मुख आपुलें ॥ ५ ॥
स्त्रियांकडे दृष्टी जाऊ देऊ नये. मनास विषयाची गोडी चाखवू नये. समजा धारिष्ट चळले, तर तेथून सरळ निघून जावे. कुणाला आपले तोंड दाखवू नये. (५)

येकेस्थळीं राहों नये । कानकोंडें साहों नये ।
द्रव्य दारा पाहों नये । आळकेपणें ॥ ६ ॥
एका स्थळी जास्त दिवस राहू नये. लोकांचे मिंधेपण सहन करू नये. हावरटपणाने द्रव्य आणि स्त्रिया यांच्याकडे पाहू नये. (६)

आचारभ्रष्ट होऊं नये । दिल्यां द्रव्य घेऊं नये ।
उणा शब्द येऊं नये । आपणावरी ॥ ७ ॥
आचारभ्रष्ट होऊ नये. कुणी द्रव्य देऊ लागले तरी घेऊ नये. आपल्यावर उणा शब्द येऊ देऊ नये. (७)

भिक्षेविषीं लाजों नये । बहुत भिक्षा घेऊं नये ।
पुसतांहि देऊं नये । वोळखी आपली ॥ ८ ॥
भिक्षा मागण्यास लाज नये. जरुरीपेक्षा जास्त भिक्षा घेऊ नये. कुणी विचारले तरी आपली ओळख देऊ नये. (८)

धड मळिन नेसों नये । गोड अन्न खाऊं नये ।
दुराग्रह करूं नये । प्रसंगें वर्तावें ॥ ९ ॥
धड व स्वच्छ वस्त्र नेसावे. गोड अन्न खाऊ नये. कुठल्याही बाबतीत दुराग्रह धरू नये. प्रसंग पाहून यथायोग्य वर्तन करावे. (९)

भोगीं मन असों नये । देहदुःखें त्रासों नये ।
पुढें आशा धरूं नये । जीवित्वाची ॥ १० ॥
भोगाच्या ठिकाणी मन आसक्त असू नये. देहदुःख प्राप्त झाले असता त्रासू नये. पुढे जीवित्वाची आशा धरू नये. (१०)

विरक्ती गळों देऊं नये । धारिष्ट चळों देऊं नये ।
ज्ञान मळिण होऊं नये । विवेकबळें ॥ ११ ॥
विरक्ती कधी कमी होऊ देऊ नये. धारिष्ट कधी सोडू नये. विवेकाच्या बळावर ज्ञान कधी मलिन होऊ देऊ नये. (११)

करुणाकीर्तन सोडूं नये । अंतर्ध्यान मोडूं नये ॥
प्रेमतंतु तोडूं नये । सगुणमूर्तीचा ॥ १२ ॥
कीर्तन करून देवाला आळवणे कधी सोडू नये. अंतर्यामी भगवंताचे ध्यान केल्याशिवाय कधी राहू नये. सगुण मूर्तीच्या ठिकाणी जडलेला प्रेमाचा धागा कधी तोडू नये. (१२)

पोटीं चिंता धरूं नये । कष्टें खेद मानूं नये ।
समैं धीर सांडूं नये । कांहीं केल्या ॥ १३ ॥
पोटात कुठलीही चिंता करू नये. कष्ट झाले तरी खेद मानू नये. कुठलाही कठीण प्रसंग ओढवल्यावरही काही झाले तरी धीर सोडू नये. (१३)

अपमानितां सिणों नये । निखंदितां कष्टों नये ।
धिःकारितां झुरों नये । कांहीं केल्या ॥ १४ ॥
कुणी अपमान केला तर शीण मानू नये. कुणी निंदा केली तरी कष्टी होऊ नये. कुणी धिक्कार केला तरी मनातल्या मनात झुरू नये. (१४)

लोकलाज धरूं नये । लाजवितां लाजों नये ।
खिजवितां खिजों नये । विरक्त पुरुषें ॥ १५ ॥
लोकांची लाज धरू नये. त्यांनी मुद्दाम लाजवण्याचा प्रयत्न केला तरी लाजू नये. खिजवायचा, चिडविण्याचा प्रयत्न केला तरी विरक्त पुरुषाने चिडू नये. (१५)

शुद्ध मार्ग सोडूं नये । दुर्जनासीं तंडों नये ।
समंध पडों देऊं नये । चांडाळासी ॥ १६ ॥
शुद्ध आचरणाचा मार्ग सोडू नये. दुर्जन माणसाशी वादविवाद, भांडण करू नये. नीच माणसाशी शक्यतो संबंधच येऊ देऊ नये. (१६)

तपीळपण धरूं नये । भांडवितां भांडों नये ।
उडवितां उडऊं नये । निजस्थिती आपुली ॥ १७ ॥
तापटपणा करू नये. कुणी मुद्दाम भांडण लावून देण्याचा प्रयत्न केला तरी आपण भांडू नये. आपली निजस्थिती उडवून देण्याचा कुणी प्रयत्न केला तरी ती उडवून देऊ नये. (१७)

हांसवितां हासों नये । बोलवितां बोलों नये ।
चालवितां चालों नये । क्षणक्ष्णा ॥ १८ ॥
कुणी हसविण्याचा प्रयत्न केला, तर उगीचच्या उगीच आपण हसू नये. मुद्दाम कुणी बोलते करण्याचा प्रयत्न केला तरी बोलू नये. क्षणोक्षणी लोक चालवतील तसे चालू नये. (१८)

येक वेष धरूं नये । येक साज करूं नये ।
येकदेसी होऊं नये । भ्रमण करावें ॥ १९ ॥
नेहमी एकच वेष करू नये. वागण्याची एकच ठेवण असू नये. एकदेशी राहू नये. नित्य भ्रमण करीत असावे. (१९)

सलगी पडों देऊं नये । प्रतिग्रह घेऊं नये ।
सभेमध्यें बैसों नये । सर्वकाळ ॥ २० ॥
कुणाशीही सलगी करू नये. दान कधी घेऊ नये. सदासर्वकाळ लोकसमुदायात बसू नये. (२०)

नेम आंगीं लाऊं नये । भरवसा कोणास देऊं नये ।
अंगीकार करूं नये । नेमस्तपणाचा ॥ २१ ॥
कुठलाही नेम अंगी लावून घेऊ नये. कुणाला जामीन राहू नये. नियमितपणाच्या बंदिस्त राहू नये. (२१)

नित्यनेम सांडूं नये । अभ्यास बुडों देऊं नये ।
परतंत्र होऊं नये । कांहीं केल्यां ॥ २२ ॥
आपला नित्यनेम कधी सोडू नये. रोजच्या रोज अभ्यास करावा. त्यात चूक होऊ देऊ नये. काहीही झाले तरी परतंत्र होऊ नये. (२२)

स्वतंत्रता मोडूं नये । निरापेक्षा तोडूं नये ।
परापेक्षा होऊं नये । क्षणक्ष्णा ॥ २३ ॥
आपली स्वतंत्रता जतन करावी. नेहमी निरपेक्ष असावे. आणि क्षणाक्षणाला दुसरा मदत करील, ही अपेक्षा कधी करू नये. (२३)

वैभव दृष्टीं पाहों नये । उपाधीसुखें राहों नये ।
येकांत मोडूं देऊं नये । स्वरूपस्थितीचा ॥ २४ ॥
आपल्या दृष्टीने लोकांचे ऐश्वर्य कधी पाहू नये. उपाधीचे कधी सुख मानून एकाच स्थळी राहू नये. आपल्या निजस्थितीच्या एकांताचा कधी भंग होऊ देऊ (२४)

अनर्गळता करूं नये । लोकलाज धरूं नये ।
कोठेंतरी होऊं नये । आसक्त कदां ॥ २५ ॥
कधीही उच्छंखलता, स्वेच्छाचार करू नये. लोकांची भीड, लाज बाळगू नये. कधीही, कोठेही आसक्त होऊ नये. (२५)

परंपरा तोडूं नये । उआपाधी मोडूं देऊं नये ।
ज्ञानमार्गे सोडूं नये । कदाकाळीं ॥ २६ ॥
परंपरेचे रक्षण करावे. उपासनेची उपाधी कधी सोडू नये आणि कधीही ज्ञानमार्गाचा त्याग करू नये. (२६)

कर्ममार्ग सांडूं नये । वैराग्य मोडूं देऊं नये ।
साधन भजन खंडूं नये । कदाकाळीं ॥ २७ ॥
कर्ममार्गाचे यथासांग आचरण करावे. आपले वैराग्य नेहमी जतन करावे. साधनात आणि भजनात कधीही खंड पडू देऊ नये. (२७)

अतिवाद करूं नये । अनित्य पोटीं धऊं नये ।
रागें भरीं भरों नये । भलतीकडे ॥२८॥
अतिवाद करू नये. अन्याय पोटी धरू नये. रागाच्या भरीला पडून भलतीकडे वाहात जाऊ नये. (२८)

न मनी त्यास सांगों नये। कंटाळवाणें बोलों नये ।
बहुसाल असो नये । येकें स्थळीं ॥ २९ ॥
जो आपले ऐकत नसेल, त्याला सांगायला जाऊ नये. लोकांना कंटाळवाणे वाटेल असे बोलू नये. एकाच स्थळी अनेक वर्षे राहू नये. (२९)

कांहीं उपाधी करूं नये । केली तरी धरूं नये ।
धरिली तरी सांपडों नये । उपाधीमध्यें॥ ३० ॥
काही उपाधी करू नये. केली, तरी तिलाच धरून राहू नये. समजा धरली तरी त्या उपाधीतच कायम गुंतून राहू नये. (३०)

थोरपणें असो नये । महत्त्व धरून बैसों नये ।
कांहीं मान इछूं नये । कोठेंतरी ॥ ३१ ॥
आपण कुणी थोर व्यक्ती आहोत अशी भावना मनात बाळगू नये. आपलेच महत्त्व धरून बसू नये. कुठेही कोणाकडूनही मानाची इच्छा करू नये. (३१)

साधेपण सोडूं नये । सानेपण मोडूं नये ।
बळात्कारें जोडूं नये । अभिमान आंगीं ॥ ३२ ॥
आपला साधेपणा सोडू नये. लहानपणा मोडू नये. आणि बळेच अंगी अभिमान येऊ देऊ नये. (३२)

अधिकारेवीण सांगों नये । दाटून उपदेश देऊं नये ।
कानकोंडा करूं नये । परमार्थ कदा ॥ ३३ ॥
आपला अधिकार असल्याशिवाय कुणाला काही सांगायला जाऊ नये. एखाद्याला त्याची इच्छा नसता उपदेश देऊ नये. मिंधेपणाने कधी परमार्थ करू नये. (३३)

कठीण वैराग्य सोडूं नये । कठीण अभ्यास सांडूं नये ।
कठिणता धरूं नये । कोणेकेविशैं ॥ ३४ ॥
प्रखर वैराग्य असावे. कठीण वाटला तरी अभ्यास कधी सोडू नये. कोणाशीही कठोरपणे वागू नये. (३४)

कठीण शब्द बोलों नये । कठीण आज्ञा करूं नये ।
कठीण धीरत्व सोडूं नये । कांहीं केल्यां ॥ ३५॥
कुणाला कठोर शब्द बोलू नये. पालन करण्यास अवघड अशी आज्ञा कुणाला करू नये. कुठल्याही प्रसंगी आपले कठीण धैर्य सोडू नये. (३५)

आपण आसक्त होऊं नये । केल्यावीण सांगों नये ।
बहुसाल मागों नये । शिष्यवर्गांसी ॥ ३६ ॥
आपण कुठेही आसक्त होऊ नये. आपण स्वतः केल्याशिवाय एखादी गोष्ट दुसऱ्या कुणाला करण्यास सांगू नये. आपल्या शिष्यवर्गाकडून कधीही काही मागू नये. (३६)

उत्धट शब्द बोलों नये । इंद्रियेंस्मरण करूं नये ।
शाक्तमार्गें भरों नये । मुक्तपणें भरीं ॥ ३७ ॥
कधीही उद्धट शब्द बोलू नये. इंद्रियांनी विषयांचे स्मरण करू नये. मुक्तपणाचा अभिमान धरून स्वेच्छाचाराचे वर्तन कधी करू नये. (३७)

नीच कृतीं लाजों नये । वैभव होतां माजों नये ।
क्रोधें भरीं भरों नये । जाणपणें ॥ ३८ ॥
हलके काम करायला लाजू नये. वैभव प्राप्त झाले असता माजू नये. विचाराने वागावे आणि क्रोधाच्या अधीन कधी होऊ नये. (३८)

थोरपणें चुकों नये । न्याये नीति सांडूं नये ।
अप्रमाण वर्तों नये । कांहीं केल्या ॥ ३९ ॥
आपल्याला कोण विचारणार आहे, या मोठेपणाच्या आढ्यतेने चुकीचे आचरण करू नये. न्यायनीती यांचा कधी त्याग करू नये. कुठल्याही परिस्थितीत अयोग्य वर्तन करू नये. (३९)

कळल्यावीण बोलों नये । अनुमानें निश्चये करूं नये ।
सांगतां दुःख धरूं नये । मूर्खपणें ॥ ४० ॥
एखादा विषय स्वत:ला नीट कळल्याशिवाय त्यासंबंधी बोलू नये. केवळ कल्पनेने एखाद्या गोष्टीसंबंधी निश्चयपूर्वक विधान करू नये. आपल्याला कुणी काही चांगले सांगू लागले, तर ते नीट ऐकून घ्यावे. मूर्खपणाने दुःख मानू नये. (४०)

सावधपण सोडुं नये । व्यापकपण सांडुं नये ।
कदा सुख मानूं नये । निसुगपणाचें ॥ ४१ ॥
सावधपण कधी सांडू नये. मनाचे व्यापकपण कधी सांड नये. आळसाचे कधी सुख मानू नये. (४१)

विकल्प पोटीं धरूं नये । स्वार्थआज्ञा करूं नये ।
केली तरी टाकूं नये । आपणास पुढें ॥ ४२ ॥
कुणाविषयीही मनात विकल्प येऊ देऊ नये. आपला स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्याला आज्ञा करू नये. समजा, अपरिहार्य परिस्थितीत आज्ञा केली, तर तिने सर्वांचेच काम साधेल असे पाहावे. (४२)

प्रसंगेंवीण बोलों नये । अन्वयेंवीण गाऊं नये ।
विचारेंवीण जाऊं नये । अविचारपंथें ॥ ४३॥
प्रसंग पडल्याशिवाय उगीच बोलू नये. आग्रहाशिवाय गाऊ नये. विचार न करता अयोग्य मार्गाने जाऊ नये. (४३)

परोपकार सांडूं नये । परपीडा करूंनये ।
विकल्प पडों देऊं नये । कोणीयेकासी ॥ ४४ ॥
परोपकार केल्याखेरीज राहू नये. परपीडा कधी करू नये. लोकांच्यात वितुष्ट निर्माण होईल असे काही करू नये. (४४)

नेणपण सोडूं नये । महंतपण सांडूं नये ।
द्रव्यासाठीं हिंडों नये । कीर्तन करीत ॥ ४५ ॥
आपल्याला सर्व कळते असे कधी मानू नये, पण महंतपणाला बाधा येऊ देऊ नये. द्रव्यासाठी गावोगाव कीर्तन करीत हिंडू नये. (४५)

संशयात्मक बोलों नये । बहुत निश्चये करूं नये ।
निर्वाहेंवीण धरूं नये । ग्रंथ हातीं ॥ ४६ ॥
संशयात्मक कधी बोल नये. उगीचच अनेक निश्चय करू नयेत. समजावून सांगण्याचे सामर्थ्य असल्याशिवाय लोकांपुढे ग्रंथ वाचू नये. (४६)

जाणपणें पुसों नये । अहंभाव दिसों नये ।
सांगेन ऐसें म्हणों नये । कोणीयेकासी ॥ ४७ ॥
परीक्षा पाहण्यासाठी कुणाला काही विचारू नये. आपल्या मोठेपणाचे प्रदर्शन करू नये. कुणाला काही सांगेन असे खोटे आश्वासन देऊ नये. (४७)

ज्ञानगर्व धरूं नये । सहसा छळणा करूं नये ।
कोठें वाद घालुं नये । कोणीयेकासी ॥ ४८ ॥
ज्ञानाचा गर्व धरू नये. सहसा कुणाची टवाळी करू नये. कुठेही उगीच कोणाशी वाद घालीत बसू नये. (४८)

स्वार्थबुद्धी जडों नये । कारबारीं पडों नये ।
कार्यकर्ते होऊं नये । राजद्वारीं ॥ ४९ ॥
स्वार्थ-बुद्धी जडू देऊ नये. राजद्वारी कार्यकर्ते होऊन कुठल्याही कारभारात पडू नये. (४९)

कोणास भर्वसा देऊं नये । जड भिक्षा मागों नये ।
भिक्षेसाथीं सांगों नये । परंपरा आपुली ॥५० ॥
कोणाला उगीच आश्वासने देऊ नये.जड भिक्षा कधी मागू नये आणि मिळावी यासाठी आपली गुरुपरंपरा कधी सांगू नये. (५०)

सोइरिकींत पडों नये । मध्यावर्ति घडों नये ।
प्रपंचाची जडों नये । उपाधी आंगीं ॥ ५१ ॥
कुठेही सोयरिकीत पडू नये. मध्यस्थी कधी करू नये. प्रपंचाची उपाधी कधी अंगी जडू देऊ नये. (५१)

प्रपंचप्रस्तीं जाऊं नये । बाष्कळ अन्न खाऊं नये ।
पाहुण्यासरिसें घेऊं नये । आमंत्रणें कदां ॥ ५२ ॥
प्रपंचाचे जेथे प्रस्थ असेल, तेथे जाऊ नये. अपवित्र अन्न खाऊ नये. पाहुण्याबरोबर कोणाची आमंत्रणे घेऊ नयेत. (५२)

श्राध पक्ष सटी सामासें । शांती फळशोबन बारसें ।
भोग राहात बहुवसें । नवस व्रतें उद्यापनें ॥ ५३ ॥
श्राद्ध, पक्ष, सटी, सहामास, शांती, फळशोभन, बारसे, भोग, राहाण, नवस, व्रते, उद्यापने, (५३)

तेथें निस्पृहें जाऊं नये । त्याचें अन्न खाऊं नये ।
येळिलवाणें करूं नये । आपणासी ॥ ५४ ॥
जेथे याप्रमाणे संस्कार सुरू असतील, तेथे नि:स्पृहाने कधी जाऊ नये आणि त्या माणसाचे अन्नही कधी खाऊ नये. स्वत:ला त्याने अशुद्ध, संस्काररहित, अपवित्र करून घेऊ नये. (५४)

लग्नमुहुर्तीं जाऊं नये । पोटासाठीं गाऊं नये ।
मोलें कीर्तन करूं नये । कोठेंतरी ॥ ५५ ॥
कुणाच्याही घरी लग्नमुहूर्ताच्या वेळी जाऊ नये. पोटसाठी कधी गाऊ नये. कोठेही बिदागी ठरवून कधी कीर्तन करू नये. (५५)

आपली भिक्षा सोडूं नये । वारें अन्न खाऊं नये ।
निस्पृहासि घडों नये । मोलयात्रा ॥ ५६ ॥
आपले भिक्षा मागणे कधी सोडू नये. वार लावून तेथील अन्न खाऊ नये. दुसऱ्याच्या पैशाने होणारी यात्रा निःस्पृहाने कधी करू नये. (५६)

मोलें सुकृत करूं नये । मोलपुजारी होऊं नये ।
दिल्हा तरी घेऊं नये । इनाम निस्पृहें ॥ ५७ ॥
दक्षिणा ठरवून कधी पुण्यकर्म करू नये. कधी पगारी पुजारी बनू नये. दुसऱ्याने इनाम देऊ केले तरी नि:स्पृहाने ते घेऊ नये. (५७)

कोठें मठ करूं नये । केला तरी तो धरूं नये ।
मठपती होऊन बैसों नये । निस्पृह पुरुषें ॥ ५८ ॥
निःस्पृहाने कोठेही मठ करू नये. केला तरी तो धरून राहू नये. नि:स्पृह पुरुषाने कधीही मठपती होऊन बसू नये (५८)

निस्पृहें अवघेंचि करावें । परी आपण तेथें न सांपडावें ।
परस्परें उभारावें । भक्तिमार्गासी ॥ ५९ ॥
नि:स्पृहाने सर्व काही करावे, पण आपण त्यात गुंतू नये. परस्पर दुसऱ्याकडून भक्तिमार्गाचा प्रचार करावा. तो वाढवावा. (५९)

प्रेत्नेंविण राहों नये । आळस दृष्टी आणूं नये ।
देह अस्तां पाहों नये । वियोग उपासनेचा ॥ ६० ॥
त्याने प्रयत्न केल्याशिवाय कधी राहू नये. कधी आळस दृष्टीपुढे आणू नये. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत त्याने उपासनेला कधी सोडू नये. (६०)

उपाधीमध्यें पडों नये । उपाधी आंगीं जडों नये ।
भजनमार्ग मोडूं नये । निसंगळपणें ॥ ६१ ॥
त्याने कधी उपाधीमध्ये पड़ नये. उपाधी मध्ये गुंतू नये. आणि अव्यवस्थितपणामुळे भजनमार्ग सोडू नये. (६१)

बहु उपाधी करूं नये । उपाधीविण कामा नये ।
सगुणभक्ति सोडूं नये । विभक्ति खोटी ॥ ६२ ॥
फार उपाधी करू नये. पण उपाधीच करायची नाही असेही होऊ देऊ नये. त्याने सगुणभक्ती कधी सोडू नये. भगवंताशी द्वैत अथवा वेगळेपणा नसावा. तसा असणे योग्य नव्हे. (६२)

बहुसाल धांवों नये । बहुसाल साहों नये ।
बहुत कष्ट करूं नये । असुदें खोटें ॥ ६३ ॥
अनेक वर्षे धावाधाव करू नये. एकाच ठिकाणी अनेक वर्षे राहू नये. फार कष्ट करू नयेत, पण आयतेपणाही करू नये. तो योग्य नव्हे. (६३)

बहुसाल बोलों नये । अबोलणें कामा नये ।
बहुत अन्न खाऊं नये । उपवास खोटा ॥ ६४ ॥
अखंड बोलत राहू नये किंवा अगदी अबोलही राहू नये. फार अन्न खाऊ नये आणि अन्नावीण राहणे हेही योग्य नव्हे. (६४)

बहुसाल निजों नये । बहुत निद्रा मोडुं नये ।
बहुत नेम धरूं नये । बाश्कळ खोटें ॥ ६५ ॥
फार वेळ झोपू नये. आणि निद्रा न घेताही राहू नये. फार नेम धरू नयेत, पण नेमरहित राहाणेही अयोग्य होय. (६५)

बहु जनीं असों नये । बहु आरण्य सेऊं नये ।
बहु देह पाळूं नये । आत्महत्या खोटी ॥ ६६ ॥
सारखेच लोकांत मिसळू नये किंवा सतत अरण्यवासही करू नये. देहाचे फार लाड करू नयेत आणि आत्महत्याही करू नये. (६६)

बहु संग धरूं नये । संतसंग सांडुं नये ।
कर्मठपण कामा नये । अनाचार खोटा ॥ ६७ ॥
कुणाशीही अति संग करू नये. पण संतसंग मात्र कधी सोडू नये. फार कर्मठपणाही नसावा. पण अनाचार खोटा हेही ध्यानात ठेवावे. (६७)

बहु लोकिक सांडुं नये । लोकाधेन होऊं नये ।
बहु प्रीती कामा नये । निष्ठुरता खोटी ॥ ६८ ॥
फार लोकाचार सोडू नये, पण लोकांच्या आधीन होऊनही राहू नये. कुणावरही फार प्रेम करू नये, पण निष्ठुरतेने वागणेही अयोग्यच होय. (६८)

बहु संशये धरूं नये । मुक्तमार्ग कामा नये ।
बहु साधनीं पडों नये । साधनेंवीण खोटें ॥ ६९ ॥
फार संशय धरू नये आणि स्वेच्छाचारही करू नये. अनेकानेक साधनांच्या मागे लागू नये. पण साधनेशिवाय राहणेही योग्य नाही. (६९)

बहु विषये भोगूं नये । विषयत्याग करितां नये ।
देहलोभ धरूं नये । बहु त्रास खोटा ॥ ७० ॥
फार विषय भोगू नये, पण साधनोपयोगी विषयाचा त्याग करू नये. तसेच शरीरनिर्वाहासाठी आवश्यक अशा विषयांचा त्याग करणेही योग्य नव्हे. देहलोभ धरू नये, पण उगीचच देहाला त्रास सोसायला लावणेही अयोग्य होय. (७०)

वेगळा अनुभव घेऊं नये । अनुभवेंवीण कामा नये ।
आत्मस्थिती बोलों नये । स्तब्धता खोटी ॥ ७१ ॥
वेगळेपणाने अनुभव घेऊ नये, पण अनुभवाशिवायही राहता कामा नये. आत्मस्थिती कुणाला सांगू नये हे खरे, पण म्हणून तिच्यासंबंधी सर्वस्वी मौन पाळणे हेही अयोग्य होय. (७१)

मन उरों देऊं नये । मनेंवीण कामा नये ।
अलक्ष वस्तु लक्षा नये । लक्षेंवीण खोटें ॥ ७२ ॥
मनाला शिल्लक उरू देऊ नये, उन्मनी प्राप्त करावी हे खरे, पण मनाशिवाय कार्य होऊ शकत नाही म्हणून वश केलेले मन असायलाच हवे. तसेच अलक्ष वस्तू जे परब्रह्म ते लक्षात येत नाही, पण म्हणून तिच्या अनुसंधानाशिवाय राहाणे हे अयोग्य होय. (७२)

मनबुद्धिअगोचर । बुद्धीवीण अंधकार ।
जाणीवेचा पडो विसर । नेणीव खोटी ॥ ७३ ॥
परब्रह्मवस्तू मनबुद्धी अगोचर आहे हे खरे असले तरी बुद्धीशिवाय तिचे ज्ञान होऊ शकत नाही. बुद्धी नसेल तर अज्ञानरूपी अंधकार दूर होणार नाही. जाणिवेचा विसर पडणे, स्वात्मानुभवासाठी आवश्यक आहे हे खरे, पण नेणीव म्हणजेच अज्ञानास योग्य मानता येत नाही. (७३)

ज्ञातेपण धरूं नये । ज्ञानेंवीण कामा नये ।
अतर्क्य वस्तु तर्का न ये । तर्केंवीण खोटें ॥ ७४ ॥
ज्ञातेपणाचा अभिमान धरू नये हे बरोबर आहे पण म्हणून ज्ञानाशिवाय राहणेही उपयोगी नाही. परब्रह्म वस्तू अतळ आहे. तिच्यासंबंधी तर्क करता येत नाही हे खरे असले, तरी तर्कच न करणे हे अयोग्य आहे. (७४)

दृश्यस्मरण काम नये । विस्मरण पडों नये ।
कांहीं चर्चा करूं नये । केलियावीण न चले ॥ ७५ ॥
दृश्य वस्तूचे स्मरण असणे उपयुक्त नाही, पण म्हणून विस्मरणाचा अंगीकार करणे योग्य नाही. कारण नसताना चर्चा करू नये. जेव्हा आवश्यक असेल, तेव्हा चर्चा केल्याशिवाय चालू शकत नाही. (७५)

जगीं भेद कामा नये । वर्णसंकर करूं नये ।
आपला धर्म उडऊं नये । अभिमान खोटा ॥ ७६ ॥
जगात भेद मानू नये, हे जरी खरे असले, तरी वर्णसंकर कधी करू नये. आपला धर्म कधी सोडू नये, पण त्याचा अभिमान बाळगणे हे अयोग्य होय.(७६)

आशाबद्धत बोलों नये । विवेकेंवीण चालों नये ।
समाधान हालों नये । कांहीं केल्यां ॥ ७७ ॥
मनात कसली तरी आशा ठेवून बोलू नये. विवेकाशिवाय वर्तन करू नये. काहीही झाले तरी आपले समाधान भंग होऊ देऊ नये. (७७)

अबद्ध पोथी लेहों नये । पोथीवीण कामा नये ।
अबद्ध वाचूं नये । वाचिल्यावीण खोटें ॥ ७८ ॥
विषयांची संगती नसलेली विस्कळित पोथी लिहू नये. पण पोथीशिवाय राहू नये. अशुद्ध वाचू नये, पण काहीच न वाचता राहणेही योग्य नव्हे. (७८)

निस्पृहें वगत्रुत्व सांडूं नये । आशंका घेतां भांडों नये ।
श्रोतयांचा मानूं नये । वीट कदा ॥ ७९ ॥
नि:स्पृहाने कधी वक्तृत्व सोडू नये, पण श्रोत्यांनी शंका घेतली तर त्यांच्याशी भांडू नये. कधीही श्रोत्यांचा कंटाळा मानू नये. (७९)

हें सिकवण धरितां चित्तीं । सकळ सुखें वोळगती ।
आंगीं बाणें महंती । अकस्मात ॥ ८० ॥
ही शिकवण जर चित्तात दृढ धरली आणि त्याप्रमाणे वागले तर सर्व सखे प्राप्त होतात. आणि अकस्मात महंताचे उत्तम गुण आपल्या ठिकाणी प्रकट होऊ लागतात. (८०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
निस्पृहलक्षणनाम समास पहिला ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘निस्पृहलक्षणनाम’ समास पहिला समाप्त.


समास दुसरा : भिक्षानिरूपण
॥ श्रीराम ॥

ब्राह्मणाची मुख्य दीक्षा । मागितली पाहिजे भिक्षा ।
वोंभवति या पक्षा । रक्षिलें पाहिजे ॥ १ ॥
श्रीसमर्थ म्हणतात की, ब्राह्मणांच्या जीवनपद्धतीचे मुख्य लक्षण त्यांनी भिक्षा मागितली पाहिजे हे आहे. ‘ओम भवति भिक्षां देहि’ या ब्रीदाचे त्यांनी रक्षण केले पाहिजे. (१)

भिक्षा मागोन जो जेविला । तो निराहारी बोलिला ।
प्रतिग्रहावेगळा जाला । भिक्षा मागतां ॥ २ ॥
जो ब्राह्मण भिक्षा मागून जेवतो, तो निराहारी मानला जातो. भिक्षा मागण्यामुळे तो दानांत येणाऱ्या दोषापासून अलिस होतो. (२)

संतासंत जे जन । तेथें कोरान्न मागोन करी भोजन ।
तेनें केलें अमृतप्राशन । प्रतिदिनीं ॥ ३ ॥
जो संत आणि असंत लोकांच्या जवळ कोरान्न मागून भोजन करतो, त्याने रोजच्या रोज अमृतप्राशनच केले आहे, असे मानावे. (३)

॥ श्लोक ॥ भिक्षाहारी निराहारी । भिक्षा नैव प्रतिग्रहः ।
असंतो वापि संतो वा । सोमपानं दिने दिने ॥
अर्थ-भिक्षा मागून पोट भरणारा माणूस निराहारी असतो. भिक्षा घेणे म्हणजे दान घेणे नव्हे. भिक्षा घालणारे लोक सज्जन असोत किंवा दुर्जन असोत, त्यांनी घातलेल्या भिक्षेने पोट भरणे म्हणजे रोज सोमपान करणेच होय. (१)

ऐसा भिक्षेचा महिमा । भिक्षा माने सर्वोत्तमा ।
ईश्वराचा अगाध महिमा । तोहि भिक्षा मागे ॥ ४ ॥
भिक्षेचा असा महिमा आहे. ईश्वरालाही भिक्षा मागणे मान्य आहे. ईश्वराचा महिमा अगाध असून तोही भिक्षा मागतो. (४)

दत्त गोरक्ष आदिकरुनी । सिद्ध भिक्षा मागती जनीं ।
निस्पृहता भिक्षेपासुनी । प्रगट होये ॥ ५ ॥
दत्त, गोरक्ष आदी सिद्धही लोकांत भिक्षा मागतात. भिक्षेमुळे भिक्षा मागणाराची नि:स्पृहताच प्रगट होत असते. (५)

वार लाऊन बैसला । तरी तो पराधेन जाला ।
तैसीच नित्यावळीला । स्वतंत्रता कैंची ॥ ६ ॥
जो वार लावून जेवतो तो पराधीन होतो. त्याप्रमाणे जो नित्य एखाद्याच्या घरी नेमाने जेवतो, त्याला स्वतंत्रता कुठली ? (६)

आठां दिवसां धान्य मेळविलें । तरी तें कंटाळवाणें जालें ।
प्राणी येकायेकीं चेवलें । नित्यनूतनतेपासुनी ॥ ७ ॥
आठ दिवसांनी एकदाच धान्य मिळवले तर ते कंटाळवाणे होते. नित्य नूतनतेच्या लाभापासून त्या व्यक्ती वंचित होतात. (७)

नित्य नूतन हिंडावें । उदंड देशाटण करावें ।
तरीच भिक्षा मागतां बरवें । श्लाघ्यवाणें ॥ ८ ॥
नित्य नूतन ठिकाणी हिंडावे, उदंड देशाटन करावे, तरच भिक्षा मागणे हे प्रशंसनीय ठरते. (८)

अखंड भिक्षेच अभ्यास । तयास वाटेना परदेश।
जिकडे तिकडे स्वदेश । भुवनत्रैं ॥ ९ ॥
जो नेहमीच भिक्षा मागून जेवतो, त्याला कुठलाही देश परका वाटत नाही. त्रिभुवनात तो कोठेही गेला तरी जिकडे-तिकडे त्याला स्वदेशच वाटतो. (९)

भिक्षां मागतां किरकों नये । भिक्षा मागतां लाजो नये ।
भिक्षा मागतां भागों नये । परिभ्रमण करावें ॥ १० ॥
भिक्षा मागताना कुरकुर करू नये. भिक्षा मागताना लाजू नये. भिक्षा मागताना थकून जाऊ नये. भिक्षा मागणाराने परिभ्रमण करावे. (१०)

भिक्षा आणि चमत्कार । च्चाकाटती लहानथोर ।
कीर्ति वर्णी निरंतर । भगवंताची ॥ ११ ॥
एखादा माणूस भिक्षा मागतो आणि चमत्कार करतो, हे ऐकल्यावर किंवा पाहिल्यावर लहान-थोर माणसे आश्चर्यचकित होतात. तो भगवंतांची कीर्ती निरंतर वर्णन करीत असतो. (म्हणूनच चमत्कार घडतात.) (११)

भिक्षा म्हणिजे कामधेनु । सदा फळ नव्हे सामान्यु ।
भिक्षेस करी जो अमान्यु । तो करंटा जोगी ॥ १२ ॥
भिक्षा म्हणजे सदा फळ देणारी कामधेनूच होय. तिला सामान्य मानू नये. जो भिक्षेला अमान्य करतो, तो योगी असला तरी भाग्यहीन जाणावा. (१२)

भिक्षेनें वोळखी होती । भिक्षेनें भरम चुकती ।
सामान्य भिक्षा मान्य करिती । सकळ प्राणी ॥ १३ ॥
भिक्षेने नवीन ओळखी होतात. भ्रम नाहीसे होतात. सर्व प्राणी सामान्यपणे भिक्षा मान्य करतात. (१३)

भिक्षा म्हणिजे निर्भये स्थिति । भिक्षेनें प्रगटे महंती ।
स्वतंत्रता ईश्वरप्राप्ती । भिक्षागुणें ॥ १४ ॥
भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती होय. भिक्षेने महंती प्रकट होते. भिक्षेच्या योगे स्वतंत्रता कायम राहून ईश्वरप्राप्तीसुद्धा होते. (१४)

भिक्षेस नाहीं आडथळा । भिक्षाहारी तो मोकळा ।
भिक्षेकरितां सार्थक वेअळा । काळ जातो ॥ १५ ॥
भिक्षा मागण्यात काहीही अडथळा नाही. भिक्षाहारी हा उपाधीपासून मोकळा असतो. भिक्षेकरिता जो वेळ लागतो, तेवढा काळ सार्थकी लागतो. (१५)

भिक्षा म्हणिजे अमरवल्ली । जिकडे तिकडे लगवली ।
अवकाळीं फळदायेनी जाली । निर्ल्लजासी ॥ १६ ॥
भिक्षा म्हणजे जिकडे-तिकडे फळाफुलांनी लगडलेली जणू अमर वेल आहे. जे निर्लज्ज लोक असतात, त्यांना त्यांच्या वाईट दिवसांत ती फलदायिनी ठरते. (१६)

पृथ्वीमधें देश नाना । फिरतां उपवासी मरेना ।
कोणे येके ठाईं जना । जड नव्हे ॥ १७ ॥
पृथ्वीमध्ये इतके अनेक प्रकारचे देश आहेत की, त्या देशांतून फिरणारा भिक्षेकरी उपाशी मरत नाही. कारण तो कोठेही एका जागी राहात नसल्याने (नित्य नवीन ठिकाणच्या) लोकांना तो जड वाटत नाही. (१७)

गोरज्य वाणिज्य कृषी । त्याहून प्रतिष्ठा भिक्षेसी ।
विसंभों नये झोळीसी । कदाकाळीं ॥ १८ ॥
दूधदुभत्याचा व्यवसाय, व्यापारधंदा अथवा शेती याहूनही भिक्षेला प्रतिष्ठा आहे. म्हणून कधीही झोळीला बाजूला करू नये. (१८)

भिक्षेऐसें नाहीं वैराग्य । वैराग्यापरतें नाहीं भाग्य ।
वैराग्य नस्तां अभाग्य । येकदेसी ॥ १९ ॥
भिक्षा मागणे हे वैराग्याचे लक्षण आहे आणि वैराग्यासारखे भाग्य दुसरे नाही. वैराग्य जर नसेल तर तो माणूस एकदेशी आणि भाग्यहीन समजावा. (१९)

कांहीं भिक्षा आहे म्हणावें । अल्पसंतोषी असावें ।
बहुत आणितां घ्यावें । मुष्टी येक ॥ २० ॥
‘काही भिक्षा आहे का’ असे कुणाच्याही दारापुढे म्हणावे आणि जी भिक्षा मिळेल त्यात अल्पसंतोषी असावे. भिक्षा घालणाराने अधिक देऊ केल्यास फक्त एक मूठभर भिक्षा घ्यावी. (२०)

सुखरूप भिक्षा मागणें । ऐसी निस्पृहतेचीं लक्षणें ।
मृद वागविळास करणें । परम सौख्यकारी ॥ २१ ॥
भिक्षा मागताना ती प्रसन्नपणे मागावी, हे नि:स्पृहाचे लक्षण आहे. सर्वांशी अत्यंत गोड, मद् शब्दांत बोलावे, म्हणजे ऐकणारालाही परम सुख मिळते. (२१)

ऐसी भिक्षेची स्थिती । अल्प बोलिलें येथामती ।
भिक्षा वांचवी विपत्ती । होणार काळीं ॥ २२ ॥
अशी ही भिक्षेची स्थिती येथे यथामती थोडीशी सांगितली आहे. पुढे येणाऱ्या संकटातून भिक्षा माणसाला वाचवते. (२२)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
भिक्षानिरूपणनाम समास दुसरा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘भिक्षानिरूपणनाम’ समास दुसरा समाप्त.


समास तिसरा : कवित्वकला निरूपण
॥ श्रीराम ॥

कवित्व शब्दसुमनमाळा । अर्थ परिमळ आगळा ।
तेणें संतषट्पदकुळा । आनंद होये ॥ १ ॥
श्रीसमर्थ म्हणतात की, कवित्व म्हणजे शब्दरूपी फुलांची माळ असून, त्याचा अर्थ म्हणजे त्या फुलांचा आगळा-वेगळा सुगंध होय. त्याच्या योगे संतरूपी भुंग्यांच्या कुळाला आनंद होतो. (१)

ऐसी माळा अंतःकरणीं । गुंफुन पूजा रामचरणीं ।
वोंकारतंत अखंडपणीं । खंडूं च नये ॥ २ ॥
अशी शब्दरूपी सुमनांची माळ अंत:करणात गुंफून ती रामचरणी अर्पण करावी. मात्र त्यातील ओंकाररूपी तंतू अखंड राहील, तो तुटणार नाही, याची काळजी घ्यावी. (२)

परोपकाराकारणें । कवित्व अगत्य करणें ।
तया कवित्वाचीं लक्षणें । बोलिजेती ॥ ३ ॥
परोपकारासाठी कवित्व अगत्याने करावे. असे परोपकारी कवित्व कसे असते, त्याची लक्षणे आता सांगितली जातील. (३)

जेणें घडे भगवद्भकक्ती । जेणें घडे विरक्ती ।
ऐसिया कत्वाची युक्ती । आधीं वाढवावी ॥ ४ ॥
ज्यायोगे भगवद्भक्ती घडेल, विरक्ती घडेल अशा कवित्वाची निर्मिती व्हावी म्हणून जे उपाय करणे जरूर आहेत, ते आधी करावेत. (४) क्रियेशिवायच्या शब्दज्ञानाला सज्जन लोक महत्त्व देत नाहीत. म्हणून आधी अनुतापाने देवाला प्रसन्न करून घ्यावे. (५)

क्रियेवीण शब्दज्ञान । तया न मानिती सज्जन ।
म्हणौनी देव प्रसन्न । अनुतापें करावा ॥ ५ ॥
देवाच्या प्रसन्नतेने, त्याच्या कृपेने जे जे बोलणे बोलले जाते, ते अत्यंत प्रशंसनीय असते. त्याला प्रासादिक नाव आहे. (६)

देवाचेन प्रसन्नपणें । जें जें घडे बोलणें ।
तें तें अत्यंत श्लाघ्यवाणें । या नाव प्रासादिक ॥ ६ ॥
धीट पाठ आणि प्रासादिक असे काव्याचे तीन प्रकार अनेकजण सांगतात. या तीन प्रकारांबद्दल येथे विचार सांगितला जाईल, (७)

धीट पाठ प्रसादिक । ऐसें बोलती अनेक ।
तरी हा त्रिविध विवेक । बोलिजेल ॥ ७ ॥
धीट म्हणजे जे जे आपल्या मनात आले, त्यावर बळेच धीटपणे जे कवित्व रचले जाते, त्याला धीट हे नाव दिले जाते. (८)

धीट म्हणिजे धीटपणें केलें । जें जें आपुल्या मनास आलें ।
बळेंचि कवित्व रचिलें । या नाव धीट बोलिजे ॥ ८ ॥
पाठ म्हणजे पाठांतर अनेक ग्रंथांचा अभ्यास केल्यावर त्याच्या धर्तीवर आपणही काव्य रचले त्यास पाठ म्हणतात. (९)

पाठ म्हणिजे पाठांतर । बहुत पाहिलें ग्रंथांतर ।
तयासरिखा उतार । आपणचि केला ॥ ९ ॥
जे जे दृष्टीस पडले, त्यावर जे शीघ्र कवित्व केले जाते व ज्यांत भक्ती नसते, त्याला धीटपाठ असे नाव आहे. (१०)

सीघ्रचि कवित्व जोडिलें । दृष्टि पडिलें तें चि वर्णिलें ।
भक्तिवांचून जें केलें । त्या नाव धीटपाठ ॥ १० ॥
कामिक, रसिक, शृंगारिक, वीर, हास्य या रसांनी युक्त, ज्यांत काही आश्चर्यजनक गोष्टी, विनोद, प्रास्ताविक वगैरे असते, त्याला धीटपाठ म्हणतात. (११)

कामिक रसिक श्रृंघारिक । वीर हास्य प्रस्ताविक ।
कौतुक विनोद अनेक । या नाव धीटपाठ ॥ ११ ॥
मन ज्या वेळी कामवासनेने भरून कामाकार होते, त्या वेळी कवी जे काव्य रचतो, ते कामाकारच असते. त्यास धीटपाठ म्हणतात. पण अशा काव्याने भवसागरातून मुक्तता होणार नाही. (१२)

मन जालें कामाकार । तैसेचि निघती उद्गार ।
धीटपाठें परपार । पाविजेत नाहीं ॥ १२ ॥
पोटातील भुकेची आग शांत करण्यासाठी मनुष्याची स्तुती करण्याकरता जी विद्वत्ता प्रकट केली जाते, त्या काव्यास धीटपाठ म्हणतात. (१३)

व्हावया उदरशांती । करणें लागे नरस्तुती ।
तेथें केली जे वित्पत्ति । त्या नाव धीटपाठ ॥ १३ ॥
कवित्व धीटपाठ नसावे किंवा ते ओढूनताणून केलेले नसावे. तसेच ते उद्धट किंवा पाखंड मताने युक्त नसावे. (१४)

कवित्व नसावें धीटपाठ । कवित्व नसावें खटपट ।
कवित्व नसावें उद्धट । पाषांडमत ॥ १४ ॥
कवित्व वादंग माजविणारे नसावे अथवा ते रसभंग करणारे नसावे. तसेच ते रंगभंग करणारे अथवा दृष्टांतहीनही नसावे. (१५)

कवित्व नसावें वादांग । कवित्व नसावें रसभंग ।
कवित्व नसावें रंगभंग । दृष्टांतहीन ॥ १५ ॥
कवित्व पाल्हाळिक किंवा बाष्कळही नसावे. तसेच कोणा कुटील माणसाला लक्षुन केलेलेही नसावे. (१६)

कवित्व नसावें पाल्हाळ । कवित्व नसावें बाष्कळ ।
कवित्व नसावें कुटीळ । लक्षुनियां ॥ १६ ॥
हीन दर्जाचे कवित्व नसावे. त्यात पुनरावृत्ती नसावी. आणि छंद, वृत्ते वगैरेच्या नियमांचा भंगही केलेला नसावा. निर्दोष काव्य असावे. (१७)

हीन कवित्व नसावें । बोलिलेंचि न बोलावें ।
छंदभंग न करावें । मुद्राहीन ॥ १७ ॥
व्युत्पत्तिहीन, तर्कहीन, कलाहीन, शब्दहीन अथवा ज्यात भक्तिज्ञानवैराग्याचे वर्णन नाही असे कवित्व नसावे. (१८)

वित्पत्तिहीन तर्कहीन । कळाहीन शब्दहीन ।
भक्तिज्ञानवैराग्यहीन । कवित्व नसावें ॥ १८ ॥
भक्तिहीन असलेले कवित्व म्हणजे अडाणी माणसाचे मत असे समजावे. भक्तीची आवड नसताना केलेले वक्तृत्व कंटाळवाणे होते. (१९)

भक्तिहीन जें कवित्व । तेंचि जाणावें ठोंबें मत ।
आवडीहीन जें वगत्रृत्व । कंटाळवाणें ॥ १९ ॥
भक्तीशिवाय केलेले काव्य म्हणजे विनोद किंवा करमणूक होय. भगवंताविषयी प्रेम नसेल, तर भगवंताशी संवाद कसा घडेल (२०)

भक्तिविण जो अनुवाद । तोचि जाणावा विनोद ।
प्रीतीविण संवाद । घडे केवी ॥ २० ॥
असो. धीटपाठ या प्रकाराचे कवित्व हे अशा प्रकारचे असते. मिथ्या असलेल्या अहंकाराला लागलेले ते एक प्रकारचे वेडच असते. आता प्रासादिक कवित्व कसे असते ते सांगितले जाईल. (२१)

असो धीट पाठ तें ऐसें । नाथिलें अहंतेचें पिसें ।
आतां प्रसादिक तें कैसें । सांगिजेल ॥ २१ ॥
वैभव, स्त्री आणि सोने हे ज्याला वमनाप्रमाणे त्याज्य वाटते आणि ज्याच्या अंतरी सर्वोत्तमाचे ध्यान लागलेले असते, (२२)

वैभव कांता कांचन । जयास वाटे हें वमन ।
अंतरीं लागलें ध्यान । सर्वोत्तमाचें ॥ २२ ॥
ज्याला घडोघडी भगवंताच्या ठिकाणी आवड उत्पन्न होत असते आणि त्यामुळे ज्याला भगवद्भजनात चढती-वाढती गोडी लागते. (२३)

जयास घडीनें घडी । लागे भगवंतीं आवडी ।
चढती वाढती गोडी । भगद्भसजनाची ॥ २३ ॥
जो भगवद्भजनाशिवाय एक क्षणही जाऊ देत नाही आणि ज्याचे अंत:करण सर्वकाळ भक्तीत रंगलेले असते (२४)

जो भगवद्भीजनेंवीण । जाऊं नेदी येक क्षण ।
सर्वकाळ अंतःकरण । भक्तिरंगें रंगलें ॥ २४ ॥
ज्याच्या अंत:करणात निरंतर भगवंत अचळ आणि निवांत वास करून राहिलेला असतो, तो सहज स्वभावाने जे जे बोलतो, ते ते ब्रह्मनिरूपणच असते. (२५)

जया अंतरी भगवंत । अचळ राहिला निवांत ।
तो स्वभावें जें बोलत । तें ब्रह्मनिरूपण ॥ २५ ॥
त्याच्या अंतरी गोविंद राहिला असल्याने त्याला भक्तीचा छंद लागलेला असतो, त्यामुळे भक्तीशिवाय दुसरा विषयच त्याच्या बोलण्यात येत नाही (२६)

अंतरी बैसला गोविंद । तेणें लागला भक्तिछंद ।
भक्तीविण अनुवाद । आणीक नाहीं ॥ २६ ॥
मनात भक्तीची अत्यंत आवड असल्याने त्याची वाणी त्याप्रमाणेच भक्तीविषयी बोलते. तो अत्यंत प्रेमाने, करुणेने भगवंताला आळवीत कीर्तन करून प्रेमभराने नाचतो. (२७)

आवडी लागली अंतरीं । तैसीच वदे वैखरी ।
भावें करुणाकीर्तन करी । प्रेमभरें नाचतु ॥ २७ ॥
भगवंताच्या ठिकाणी मन जडलेले असल्याने त्याला देहभान उरत नाही. त्यामुळे शंका आणि लोकलाज त्याच्यापासून दूर पळून जातात. (२८)

भगवंतीं लागलें मन । तेणें नाठवे देहभान ।
शंका लज्या पळोन । दुरी ठेली ॥ २८ ॥
तो प्रेमरंगात रंगून जातो, भक्तीच्या मदाने उन्मत्त होतो, त्या वेळी असे वाटते की, अहंभावाला जण तो पायदळी तुडवीत आहे . (२९)

तो प्रेमरंगें रंगला । तो भक्तिमदें मातला ।
तेणें अहंभाव घातला । पायांतळीं ॥ २९ ॥
जो प्रेमाने उन्मत्त होऊन नाचत, गात असतो त्याला लोक दिसतील तरी कसे? त्याच्या दृष्टीत त्रैलोक्यनायक भगवंतच भरून राहिलेला असतो. (३०)

गात नाचत निशंक । तयास कैचे दिसती लोक ।
दृष्टीं त्रैलोक्यनायेक । वसोन ठेला ॥ ३० ॥
असा जो भगवंताच्या ठिकाणी रंगून गेलेला असतो, त्याला दुसरे काहीही नको असते. आपल्या स्वत:च्या इच्छेनुसार तो भगवंताच्या रूपाचे, अनेक प्रकारच्या कीर्तीचे, प्रतापाचे वर्णन करू लागतो. (३१)

ऐसा भगवंतीं रंगला । आणीक कांहीं नलगे त्याला ।
स्वैछा वर्णूं लागला । ध्यान कीर्ती प्रताप ॥ ३१ ॥
तो भगवंताची अनेक प्रकारची ध्याने, अनेक प्रकारच्या मूर्ती, भगवंताचे विविध पराक्रम आणि अपार कीर्ती यांचे वर्णन करू लागतो. त्यापुढे नरस्तुती करणे त्याला कस्पटासारखे अत्यंत तुच्छ वाटते. (३२)

नाना ध्यानें नाना मूर्ती । नाना प्रताप नाना कीर्ती ।
तयापुढें नरस्तुती । त्रुणतुल्य वाटे ॥ ३२ ॥
असा जो या संसारात विरक्त असा भगवद्भक्त असतो, त्याला साधुलोक मुक्त समजतात. (३३)

असो ऐसा भगवद्भेक्त । जो ये संसारीं विरक्त ।
तयास मानिती मुक्त । साधुजन ॥ ३३ ॥
त्याच्या भक्तीमुळे जे कौतुकास्पद काव्य होते त्याला प्रासादिक कवित्व म्हणतात. त्यातून सहजपणे विवेक प्रगट होत असतो. (३४)

त्याचे भक्तीचें कौतुक । तयानव प्रसादिक ।
सहज बोलतां विवेक । प्रगट होय ॥ ३४ ॥
आता कवित्वाच्या लक्षणाचे पुन्हा निरूपण करू या. त्यायोगे श्रोत्यांचे अंत:करण नक्कीच निवेल. (३५)

ऐका कवित्वलक्षण । केलेंच करूं निरूपण ।
जेणे निवे अंतःकर्ण । श्रोतयांचें ॥ ३५ ॥
आता कवित्वाच्या लक्षणाचे पुन्हा निरूपण करू या. त्यायोगे श्रोत्यांचे अंत:करण नक्कीच निवेल. (३५)

कवित्व असावें निर्मळ । कवित्व असावें सरळ ।
कवित्व असावें प्रांजळ । अन्वयाचें ॥ ३६
कवित्व निर्मळ असावे. सरळ, सोपे आणि प्रांजळ अनुभवाने युक्त असावे. (३६)

कवित्व असावें भक्तिबळें । कवित्व असावें अर्थागळें ।
कवित्व असावें वेगळें । अहंतेसी ॥ ३७ ॥
भक्तीच्या बळावर ते कवित्व निर्माण झालेले असावे. ते अर्थगंभीर असावे आणि अहंभावरहित असावे. (३७)

कवित्व असावें कीर्तिवाड । कवित्व असावें रम्य गोड ।
कवित्व असावें जाड । प्रतापविषीं ॥ ३८ ॥
त्या कवित्वात भगवंताची महान कीर्ती वर्णिलेली असावी. ते रम्य, गोड व भगवंताच्या प्रतापाच्या वर्णनाने भरलेले उत्कृष्ट असे असावे. (३८)

कवित्व असावें सोपें । कवित्व असावें अल्परूपें ।
कवित्व असावें सुल्लपें । चरणबंद ॥ ३९ ॥
कवित्व सोपे, छोटेसे, सुलभ आणि चरणांची नियमबद्ध रचना असलेले असावे. (३९)

मृदु मंजुळ कोमळ । भव्य अद्भुचत विशाळ ।
गौल्य माधुर्य रसाळ । भक्तिरसें ॥ ४० ॥
कवित्व भक्तिरसाने भरलेले आणि म्हणून मृदू, मंजूळ, कोमल, तसेच भव्य, अद्भुत, विशाल, व्यवस्थित रचना असलेले, माधुर्ययुक्त आणि रसाळ असावे. (४०)

अक्षरबंद पदबंद । नाना चातुर्य प्रबंद ।
नाना कौशल्यता छंदबंद । धाटी मुद्रा अनेक ॥ ४१ ॥
उत्तम कवित्वात पुढील अनेक गोष्टी असाव्यात. अक्षरबंध, पद-बंध म्हणजे चित्रकाव्य, चतुराईने रचना केलेले नाना प्रबंध, कुशलतेने रचलेले छंद, बंध, नाना धाटी, नाना मुद्रा असाव्यात. (४१)

नाना युक्ती नाना बुद्धी । नाना कळा नाना सिद्धी ।
नाना अन्वये साधी । नाना कवित्व ॥ ४२ ॥
त्यात नाना युक्ती, नाना बुद्धी, नाना कला, नाना सिद्धी, नाना अन्वय साधणारे अनेक प्रकारचे कवित्व असावे. (४२)

नाना साहित्य दृष्टांत । नाना तर्क धात मात ।
नाना संमती सिद्धांत । पूर्वपक्षेंसीं ॥ ४३ ॥
त्यांत अनेक प्रकारचे साहित्यिक दृष्टांत, नाना तर्क, त्यांची स्थापना आणि त्यांचे खंडण, तसेच पूर्वपक्षासह नाना संमती आणि नाना सिद्धांतांचे निरूपण असावे. (४३)

नाना गती नाना वित्पत्ती । नाना मती नाना स्फुर्ति ।
नाना धारणा नाना धृती । या नाव कवित्व ॥ ४४ ॥
नाना मती, नाना व्युत्पत्ती, नाना मती, नाना स्फूर्ती, नाना धारणा, नाना धृती ज्यात असतात, त्याला कवित्व म्हणावे. (४४)

शंका आशंका प्रत्योत्तरें । नाना काव्यें शास्त्राधारें ।
तुटे संशये निर्धारें । दिर्धारितां ॥ ४५ ॥
त्यांत शंका, आशंका, प्रत्युत्तरे, शास्त्राधार देण्यासाठी दुसरी नाना काव्ये असावीत. त्यामुळे अध्यात्माविषयी निर्धार होऊन त्यायोगे सर्व संशय नष्ट होतात. (४५)

नाना प्रसंग नाना विचार । नाना योग नाना विवर ।
नाना तत्वचर्चासार । या नाव कवित्व ॥ ४६ ॥
ज्यात नाना प्रसंग, नाना विचार, नाना योग, नाना विषयांचे विवरण, नाना तत्त्वांच्या चर्चा आणि त्यांचे सार वर्णिलेले असते, त्याला कवित्व म्हणतात. (४६)

नाना साधनें पुरश्चरणें । नाना तपें तीर्थाटणें ।
नाना संदेह फेडणें । या नाव कवित्व ॥ ४७ ॥
ज्यांत नाना साधने, नाना पुरश्चरणे, नाना प्रकारची तपे आणि तीर्थाटणे यांचे वर्णन असून, नाना प्रकारचे संदेह फेडले जातात, त्याला कवित्व म्हणतात. (४७)

जेणें अनुताप उपजें । जेणें लोकिक लाजे ।
जेणें ज्ञान उमजे । या नाव कवित्व ॥ ४८ ॥
वरील प्रकारच्या कवित्वामुळे काय लाभ होतो, ते येथून पुढे सांगितले आहे. ज्याने पश्चात्ताप उत्पन्न होतो, लौकिक सुखाच्या आसक्तीची लाज वाटते आणि ज्ञान होते, त्यास कवित्व म्हणावे. (४८)

जेणें ज्ञान हें प्रबळे । जेणें वृत्ती हे मावळें ।
जेणें भक्तिमार्ग कळे । या नाव कवित्व ॥ ४९ ॥
ज्याच्या योगे ज्ञान सुदृढ होते, वृत्ती मावळते आणि भक्तिमार्गाचे ज्ञान होते, त्यास कवित्व म्हणावे. (४९)

जेणें सद्बुवद्धि तुटे । जेणें भवसिंधु आटे ।
जेणें भगवंत प्रगटे । या नाव कवित्व ॥ ५० ॥
ज्याच्या योगे देहबुद्धी नष्ट होते, भवसागर आटून जातो आणि भगवंत प्रगट होतो, त्यास कवित्व म्हणावे. (५०)

जेणें सद्बुतद्धि लागे । जेणें पाषांड भंगे ।
जेणें विवेक जागे । या नाव कवित्व ॥ ५१ ॥
ज्याच्या योगे सद्बुद्धी उत्पन्न होते, पाखंड नाहीसे होते आणि विवेक जागृत होतो, त्यास कवित्व म्हणतात. (५१)

जेणें सद्वस्तु भासे । जेणें भास हा निरसे ।
जेणें भिन्नत्व नासे । या नाव कवित्व ॥ ५२ ॥
ज्याच्या योगे सद्वस्तूचा साक्षात अनुभव येतो, मायेचा आभास मावळतो आणि द्वैताचा नाश होतो, त्यास कवित्व म्हणावे. (५२)

जेणें होये समाधान । जेणें तुटे संसारबंधन ।
जया मानिती सज्जन । तया नाव कवित्व ॥ ५३ ॥
ज्याच्या योगे संसारबंधन तुटून शाश्वत समाधान प्राप्त होते, ज्याला सज्जन मानतात, ते कवित्व होय. (५३)

ऐसें कवित्वलक्षण । सांगतां तें असाधारण ।
परंतु कांहींयेक निरूपण । बुझावया केलें ॥ ५४ ॥
कवित्वलक्षण खरे म्हणजे असाधारण आहे, पण ते कळावे, यासाठी त्याचे थोडेफार निरूपण येथे केले आहे. (५४)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
कवित्वकला निरूपण समास तिसरा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘कवित्वकळानिरूपणनाम’ समास तिसरा समाप्त.


समास चौथा : कीर्तन लक्षण
॥ श्रीराम ॥

कलयुगीं कीर्तन करावें । केवळ कोमळ कुशळ गावें ।
कठीण कर्कश कुर्टें सांडावें । येकीकडे ॥ १ ॥
या समासात श्रीसमर्थांनी ‘ज्ञ’ सोडून बाकीच्या ३५ व्यंजनांची आद्याक्षरे क्रमाने योजन ओव्या केल्या आहेत. काही ठिकाणी पर्याय योजले आहेत. ड. साठी न, ञ साठी य, ण साठी न, ष साठी ख, ळ साठी ल) श्रीसमर्थ म्हणतात की, कलियुगात कीर्तन जरूर करावे, पण केवळ कोमल आणि कुशलतेने गावे. कठोर, कर्कश आणि किरट्या आवाजात गाऊ नये. (१)

खटखट खुंटून टाकावी । खळखळ खळांसीं न करावी ।
खरें खोटें खवळों नेदावी । वृत्ति आपुली ॥ २ ॥
भांडणतंट सोडून द्यावा. दुष्टाशी खळखळ म्हणजे विरोध करू नये. खऱ्याखोट्याने वृत्ती खवळू देऊ नये. (२)

गर्वगाणें गाऊं नये । गातां गातां गळों नये ।
गोप्य गुज गर्जों नये । गुण गावे ॥ ३ ॥
अभिमानाने गाऊ नये. गातागाता थकून गाणे अर्धवट सोडू नये. दुसऱ्याचे गुप्त रहस्य चारचौघामध्ये मोठमोठ्याने गर्जून सांगू नये. दुसऱ्याचे गुणच वर्णावेत. (३)

घष्टणी घिसणी घस्मरपणें । घसर घसरूं घसा खाणें ।
घुमघुमों चि घुमणें । योग्य नव्हे ॥ ४ ॥
घासाघासी, घिसघीस, घसघस, घसा खाकरणे, ओरडणे, या गोष्टी कीर्तनात करू नयेत. तसेच अंगात आल्याप्रमाणे उगीच घुमू नये. (४)

नाना नामे भगवंताचीं । नाना ध्यानें सगुणाचीं ।
नाना कीर्तनें कीर्तीचीं । अद्भुसत करावीं ॥ ५ ॥
भगवंताची नाना नामे, सगुणाच्या नाना रूपांची ध्यानयोग्य वर्णने, भगवंताची कीर्ती यांचे अद्भुत असे वर्णन कीर्तनात करावे. (५)

चकचक चुकावेना । चाट चावट चळावेना ।
चरचर चुरचुर लागेना । ऐसें करावें ॥ ६ ॥
कीर्तनात चुका करू नयेत. लबाड आणि चावट लोकांना चेकाळू देऊ नये. कुणाचे अंत:करण दुखावेल असे चरचरीत अथवा चुरचुरीत कीर्तनात बोलू नये. (६)

छळछळ छळणा करूं नये । छळितां छळितां छळों नयें ।
छळणें छळणा करूं नये । कोणीयेकाची ॥ ७ ॥
कोणासही फसवू नये. उगीच कुणाचा छळ करू नये. आपल्याला कुणी छळले तरी आपण कुणाला छळू नये. (७)

जि जि जि जि म्हणावेना । जो जो जागे तो तो पावना ।
जपजपों जनींजनार्दना । संतुष्ट करावें ॥ ८ ॥
कुणाची हांजीहांजी करू नये. जो जो जागृत होतो तो तो पावन होतो. म्हणून निरंतर जप करून जनताजनार्दनाला संतुष्ट करावे. (८)

झिरपे झरे पझरे जळ । झळके दुरुनी झळाळ ।
झडझडां झळकती सकळ । प्राणी तेथें ॥ ९ ॥
झिरपे आणि झरे यांतून पाणी पाझरत असते. झयांतून झुळझुळ पाणी वाहताना ते दुरून चकाकताना दिसते. ते पाहून ते पाणी पिण्यासाठी सर्व प्राणी झडझडून तेथे येतात. (९)

या या या या म्हणावें नलगे । या या या या उपाव नलगे ।
या या या या कांहीं च नलगे । सुबुद्धासी ॥ १० ॥
त्या प्राण्यांना या, या असे बोलवावे लागत नाही किंवा ते यावेत म्हणून काही उपायही करावा लागत नाही. त्यांना तहान लागली की ते स्वत:च येतात. त्याप्रमाणे जो शहाणा माणूस असेल त्याला कीर्तन ऐकण्यासाठी आमंत्रण करावे लागत नाही. भक्तिज्ञानाच्या ओढीने तो स्वत:हून तेथे येतो. (१०)

टक टक टक टक करूं नये । टाळाटाळी टिकों नये ।
टम टम टम टम लाऊं नये । कंटाळवाणी ॥ ११ ॥
सारखी कटकट करू नये. कीर्तन करण्याची यळाटाळ करू नये, पण कंटाळवाणी बडबडही करू नये. (११)

ठस ठोंबस ठाकावेना । ठक ठक ठक करावेना ।
ठाकें ठमकें ठसावेना । मूर्तिध्यान ॥ १२ ॥
अडाणी आणि मंदमती माणसाची संगत करू नये. उगीच अर्थहीन कटकट करू नये. बाहेरून ठमठमाट दाखविल्याने अंतरंगात मूर्तीचे ध्यान ठसणार नाही.(१२)

डळमळ डळमळ डकों नये । डगमग डगमग कामा नये ।
डंडळ डंडळ चुकों नये । हेंकाडपणें ॥ १३ ॥
मनात अनिश्चितता, अस्वस्थता नसावी. कुठल्याही परिस्थितीत मनोधैर्य ढळता कामा नये. धांदरटपणाने वेड्यासारखे वागून चुका करू नयेत. (१३)

ढिसाळ ढाला ढळती कुंचे । ढोबळा ढसकण डुले नाचे ।
ढळेचिना ढिगढिगांचे । कंटाळवाणे ॥ १४ ॥
काही माणसे ढिसाळपणानेचक्या आणि पंखेढाळतात. काही गलेलठ्ठ माणसे भाताच्या गोळ्यासारखी जागच्या जागी हलतात, डुलतात, तर काही कंटाळवाणेपणाने ढिगासारखी बसकण घालून जराही न हलता बसून राहतात. (१४)

नाना नेटक नागर । नाना नम्र गुणागर ।
नाना नेमक मधुर । नेमस्त गाणें ॥ १५ ॥
कीर्तनकार नीटनेटका, सुसंस्कृत, चतुर असावा. तो नम्र आणि सद्गुणसंपन्न असावा. त्याचे वागणे नेमस्त असावे आणि गाणे मधुर, सुरेल, लयबद्ध असावे. (१५)

ताळ तुंबरे तानमानें । ताळबद्ध तंतगाणें ।
तूर्त तार्किक तनें मनें । तल्लिन होती ॥ १६ ॥
गाण्याच्या जोडीला टाळ, तंबोरे, तानमान आणि तंतुवाद्ये साथीला असावीत. जे जाणकार, तर्कनिष्ठ लोक असतात ते यामुळे शरीराने आणि मनाने तत्काळ तल्लीन होतात. (१६)

थर्थरां थरकती रोमांच । थै थै थै स्वरें उंच।
थिरथिर थिरावे नाच । प्रेमळ भक्तांचा ॥ १७
प्रेमळ भक्तांनी ते ऐकले की त्यांच्या शरीरावर थरथरून रोमांच उभे राहातात. ते उच्च स्वराने नामसंकीर्तन करीत धुंद होऊन थयथय थयथय नाचू लागतात. ते त्यात इतके रंगतात की त्यांचा नाच लवकर थांबूच शकत नाही. (१७)

दक्षदाक्षण्य दाटलें । बंदें प्रबंदें कोंदाटलें ।
दमदम दुमदुमों लागलें । जगदंतर ॥ १८ ॥
कीर्तन- कौशल्याला भरती येते. त्यातील छंद, प्रबंध इत्यादी साहित्याने श्रोते भारावून जातात आणि कीर्तनाच्या घोषाने सर्व जग आणि लोकांचे अंतरंग दुमदूमन जाते. (१८)

धूर्त तूर्त धावोन आला । धिंगबुद्धीनें धिंग जाला ।
धाकें धाकें धोकला । रंग अवघा ॥ १९ ॥
कीर्तन असे रंगात आले असता एखादा दांडगट माणूस मध्येच येऊन कीर्तनात शिरून दांडगाई करू लागतो. त्यामुळे कीर्तनाच्या जमलेल्या रंगाचा बेरंग होणार की काय, असा धाक लोकांना वाटू लागतो. (१९)

नाना नाटक नेटकें । नाना मानें तुकें कौतुकें ।
नाना नेमक अनेकें । विद्यापात्रें ॥ २० ॥
पण कीर्तनातील आख्यानाचाच तो भाग होता, ते एक नाटक होते, हे कळल्यावर लोक नाचे कौशल्य वाखाणू लागतात. (२०)

पाप पळोन गेलें दुरी । पुण्य पुष्कळ प्रगटे वरी ।
परतरतो परे अंतरीं । चटक लागे ॥ २१ ॥
असे भावपूर्ण रसाळ कीर्तन असेल तेथून पाप दूर पळून जाते. पुष्कळ पुण्य प्रगट होते. लोकांना कीर्तन अत्यंत आवडल्याने त्यांना कीर्तनाची चटक लागते आणि ते परत परत ऐकावे असे वाटून ते परत कीर्तनास येऊ लागतात. (२१)

फुकट फाकट फटवणें नाहीं । फटकळ फुगडी पिंगा नाहीं ।
फिकें फसकट फोल नाहीं । भकाध्या निंदा ॥ २२ ॥
अशा कीर्तनात उगीच फुकटफाकट कुणाला फसविणे नसते, फुटकळ फुगडी, पिंगा इत्यादी धांगडधिंगा नाही किंवा उगीच कुणाची फुसकी, व्यर्थ, फिकी कयळकी अथवा निंदाही नसते. (२२)

बरें बरें बरें म्हणती । बाबा बाबा उदंड करिती ।
बळें बळेंचि बळाविती । कथेलागीं ॥ २३ ॥
अशा कीर्तनाला लोक ‘बरे’ म्हणून वाखाणतात. कीर्तनकाराला ‘बाबा, बाबा’ म्हणून त्याचा मानसन्मान करतात आणि कथा करण्यासाठी अत्यंत आग्रहाने त्याला बोलावतात. (२३)

भला भला भला लोकीं । भक्तिभावें भव्य अनेकीं ।
भूषण भाविक लोकीं । परोपकारें ॥ २४ ॥
लोकांत त्याचा ‘भला, भला’ म्हणून नावलौकिक होतो. भक्तिभावामुळे अनेक लोकांत तो भव्य म्हणून उठून दिसतो. त्याच्या परोपकारी वृत्तीमुळे भाविक लोकांना तो भूषणास्पद वाटतो. (२४)

मानेल तरी मानावें मनें । मत्त न व्हावें ममतेनें ।
मी मी मी मी बहुत जनें । म्हणिजेत आहे ॥ २५ ॥
हे मी जे म्हणतो, ते तुमच्या मनाला पटले तर तुम्ही मानावे. आसक्तीने उन्मत्त होऊ नये. अनेक लोक मी मी असा मीपणाचा अहंकार धरतात. (२५)

येकें टोकत येकांपासीं । येऊं येऊं येती झडेसीं ।
या या या या असे तयासी । म्हणावें नलगे ॥ २६ ॥
काही कीर्तनकार लोकांना ‘मी तुमच्याकडे कीर्तनास येतो’ असे म्हणून बळजबरीने मागे लागतात. ‘आमच्याकडे या’ असे त्यांना म्हणावेच लागत नाही. (२६)

राग रंग रसाळ सुरंगें । अंतर संगित रागें ।
रत्नपरीक्षा रत्नामागें । धांवती लोक ॥ २७ ॥
रत्नाची पारख करणारे लोक ज्याप्रमाणे रत्नाचा सुगावा लागला की, त्यामागे धावतात, त्याप्रमाणे रागदारीसह होणारे रसाळ, भक्तिरसात रंगलेले असे सुश्राव्य कीर्तन जेथे होते, तेथे जाणकार लोक आपणहून धावत येतात. (२७)

लवलवां लवती लोचन । लकलकां लकलें मन।
लपलपों लपती जन । आवडीनें ॥ २८ ॥
असे कीर्तन ऐकताना लोकांचे डोळे अश्रृंनी भरून येतात, त्यांचे मन चकित होते आणि अत्यंत आवडीने आणि घाईगर्दीने ते कीर्तन ऐकण्यास येतात. (२८)

वचनें वाउगीं वदेना । वावरेविवरे वसेना ।
वगत्रुत्वें निववी जना । विनित हौनी॥ २९॥
उत्तम कीर्तनकार कीर्तनात वावगा शब्द बोलत नाही, त्याच्या अंत:करणात वाकडे-तिकडे काहीही नसते. अत्यंत नम्र होऊन तो आपल्या वक्तृत्वाने लोकांचे अंतःकरण निववितो. (२९)

सारासार समस्तांला । सिकऊं सिकऊं जनाला।
साहित संगित सज्जनाला । बरें वाटे ॥ ३० ॥
जगातील सर्व लोकांना सारासारविवेक करायला शिकवावे, अशी त्याची इच्छा असते. सज्जन माणसाला साहित्य आणि संगीत चांगले वाटते. (३०)

खरेंखोटें खरें वाटलें । खर्खर खुर्खुर खुंटलें ।
खोटें खोटेपणें गेलें। खोटें म्हणोनियां ॥३१ ॥
जगामध्ये खरेखोटे एकमेकांत मिसळलेले असते. त्यातील खरे कळले, म्हणजे सर्व खरखर, संघर्ष नष्ट होतो. खोटेहेखोटेच असते म्हणून खोटेपणाने ते नाहीसे होते. (३१)

शाहाणे शोधितां शोधेना । शास्त्रार्थ श्रृती बोधेना ।
शुक शारिकाशमेना । शब्द तयाचा ॥ ३२ ॥
खरे काय याचा शोध घेऊ लागले, तर शहाण्यांनाही ते उमगत नाही. श्रुती आणि शास्त्रेही त्याचा बोध करून देऊ शकत नाहीत, पण पोपट आणि साळंकी यांच्याप्रमाणे ते आपले शब्दज्ञान मिरवतच राहातात. (३२)

हरुषें हरुषें हासिला । हाहाहोहोनें भुलला ।
हित होईना तयाला । परत्रीचें ॥ ३३ ॥
अति हर्ष झाल्याने जो कीर्तनात हसतो, श्रोत्यांनी हो, हो, हो, हो केल्याने जो भुलतो, त्याचे व श्रोत्यांचे परलोकांत कल्याण होत नाही. (३३)

लक्षावें लक्षितां अलक्षीं । लक्षिलें लोचनातें लक्षी ।
लंगलें लयेतें अलक्षी । विहिंगममार्गें ॥ ३४॥
अलक्ष असे जे परमात्मस्वरूप त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करावा. डोळ्यांचा डोळा व्हावे. विहंगम मार्गाने म्हणजे पक्ष्याप्रमाणे त्वरेने अलक्षी लय लावावा. (३४)

क्षेत्र क्षेत्रज्ञ क्षोभतो । क्षमा क्षमून क्ष्मवितो ।
क्ष्मणें क्षोभणें क्षेत्रज्ञ तो । सर्वां ठाईं ॥ ३५ ॥
शरीरात जो अंतरात्मा असतो, तो एखादे वेळी क्षोभतो, तर एखादे वेळी क्षमाशील होऊन सर्वांना शांतवतो. याप्रमाणे कधी क्षोभणारा, कधी क्षमा करणारा असा अंतरात्मा सर्वांच्याच हृदयात राहात असतो. (३५)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
कीर्तन लक्षण निरूपण समास चौथा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘कीर्तनलक्षणनाम’ समास चौथा समाप्त.


समास पाचवा : हरिकथा लक्षण
॥ श्रीराम ॥

मागां हरिकथेचें लक्षण । श्रोतीं केला होता प्रस्न ।
सावध होऊन विचक्षण । परिसोन आतां ॥ १ ॥
श्रीसमर्थ म्हणतात की, मागे हरिकथेचे लक्षण काय असा प्रश्न श्रोत्यांनी केला होता, तरी जाणत्यांनी सावध होऊन त्याचे उत्तर आता ऐकावे. (१)

हरिकथा कैसी करावी । रंगें कैसी भरावी ।
जेणें पाविजे पदवी । रघुनाथकृपेची ॥ २ ॥
हरिकथा कशा प्रकारे करावी, तिच्यात रंग कसा भरावा की, ज्यायोगे रघुनाथाच्या कृपेस पात्र होता येते, ते आता ऐका. (२)

सोनें आणि परिमळे । युक्षदंडा लागती फळें ।
गौल्य माधुर्य रसाळें । तरी ते अपूर्वता ॥ ३ ॥
सोन्याला सुगंध आला आणि उसाला गोड, मधुर, रसाळ फळे लागली तर जी अपूर्वता ठरेल, (३)

तैसा हरिदास आणि विरक्त । ज्ञाता आणि प्रेमळ भक्त ।
वित्पन्न आणि वादरहित । तरी हेहि अपूर्वता ॥ ४ ॥
त्याप्रमाणे, हरिदास असून, विरक्त, ज्ञानी असून प्रेमळ भक्त, आणि व्युत्पन्न असून जर ती व्यक्ती वादरहित असेल, तर तीही अपूर्वताच होय. (४)

रागज्ञानी ताळज्ञानी । सकळकळा ब्रह्मज्ञानी ।
निराभिमानें वर्ते जनीं । तरी हेहि अपूर्वता ॥ ५ ॥
रागाचे, तालाचे उत्तम ज्ञान असणारा, सर्व कलांचे उत्तम ज्ञान असून, जो ब्रह्मज्ञानी असूनही, लोकांच्यात अत्यंत निरभिमानाने वागतो, तो कीर्तनकार अपूर्वच म्हणावा. (५)

मछर नाहीं जयासी । जो अत्यंत प्रिये सज्जनासी ।
चतुरांग जाणें मानसीं । अंतरनिष्ठ ॥ ६ ॥
ज्याच्या मनात जराही मत्सर नाही, जो सज्जनांना अत्यंत प्रिय आहे, जो चतुरस्र असून अंतर्यामी ब्रह्मनिष्ठ आहे, असा कीर्तनकार उत्तम होय. (६)

जयंत्यादिकें नाना पर्वें । तीर्थें क्षेत्रें जें अपूर्वें ।
जेथें वसिजे देवाधिदेवें । सामर्थ्यरूपें ॥ ७ ॥
जयंती, पुण्यतिथी इत्यादी पर्वकाळांत तसेच अपूर्व अशा तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी सामर्थ्यरूपाने देवाधिदेवाचे अस्तित्व असते. (७)

तया तिर्थातें जे न मानिती । शब्दज्ञानें मिथ्या म्हणती ।
तया पामरां श्रीपती । जोडेल कैंचा ॥ ८ ॥
जे अशा तीर्थांना मानीत नाहीत, शब्दज्ञानाने मिथ्या म्हणतात, अशा पामरांना भगवंतांची प्राप्ती कशी होईल? (८)

निर्गुण नेलें संदेहानें । सगुण नेलें ब्रह्मज्ञानें ।
दोहिकडे अभिमानें । वोस केलें ॥ ९ ॥
निर्गुणाचे अनुभवजन्य नि:संदेह ज्ञान नाही, केवळ शाब्दिक ब्रह्मज्ञानामुळे सगुणावर श्रद्धा नाही, याप्रमाणे अभिमानामुळे ना निर्गुणाची प्राप्ती ना सगुणाची प्राप्ती, अशी स्थिती होऊन दोन्ही दृष्ट्या ते वाया जातात. (९)

पुढें असतां सगुणमूर्ती । निर्गुणकथा जे करिती ।
प्रतिपादून उछेदिती । तेचि पढतमूर्ख ॥ १० ॥
जे कीर्तनकार सगुण मूर्ती पुढे असताना कथेत निर्गुणाचे प्रतिपादन करून सगुणाचे खंडण करतात, ते पढतमूर्ख जाणावेत. (१०)

ऐसी न कीजे हरिकथा । अंतर पडे उभये पंथा ।
परिस लक्षणें आतां । हरिकथेचीं ॥ ११ ॥
म्हणून अशा प्रकारे हरिकथा करू नये. कारण सगुणनिर्गुण यांपैकी कुठलेच त्यायोगे साध्य होत नाही. आता उत्तम हरिकथेची लक्षणे श्रोत्यांनी ऐकावीत. (११)

सगुणमूर्तीपुढें भावें । करुणाकीर्तन करावें ।
नानाध्यानें वर्णावें । प्रतापकीर्तीतें । १२ ॥
सगुण मूर्तीपुढे भक्तिभावाने करूणरसप्रधान भावपूर्ण कीर्तन करावें. कीर्तनात भगवंताच्या विविध रूपांच्या ध्यानाचे, त्याच्या प्रतापाचे, कीर्तीचे वर्णन करावे. (१२)

ऐसें गातां स्वभावें । रसाळ कथा वोढवे ।
सर्वांतरीं हेलावे । प्रेमसुख ॥ १३ ॥
अशा प्रकारे भगवंताचे गुणवर्णन केल्याने स्वाभाविकच कथेत अधिकाधिक रस उत्पन्न होऊन सर्व श्रोत्यांच्या अंत:करणात भगवंतांसंबंधी प्रेमसुख उचंबळून येते. (१३)

कथा रचायाची खूण । सगुणीं नाणावें निर्गुण ।
न बोलावे दोष गुण । पुढिलांचे कदा ॥ १४ ॥
उत्तम कथा करावयाची असेल, तर सगुणांच्या कथेत मध्येच निर्गुणाचे प्रतिपादन करू नये. तसेच पुढे बसलेल्या श्रोत्यांच्या गुणदोषांचे वर्णन करू नये. (१४)

देवाचें वर्णावें वैभाव । नाना प्रकारें महत्त्व ।
सगुणीं ठेउनियां भाव । हरिकथा करावी ॥ १५ ॥
सगुणाच्या ठिकाणी भाव ठेवून देवाच्या वैभवाचे व माहात्म्याचे नाना प्रकारे वर्णन हरिकथेत करावे. (१५)

लाज सांडून जनाची । आस्था सांडून धनाची ।
नीच नवी कीर्तनाची । आवडी धरावी ॥ १६ ॥
लोकांची लाज, भीड न धरता आणि द्रव्याची अपेक्षा न करता कीर्तनाची नित्य नवी आवड धरावी. नित्य नवीन आख्याने रंगवावीत. (१६)

नम्र होऊन राजांगणीं । निःशंक जावें लोटांगणी ।
करताळिका नृत्य वाणीं । नामघोषें गर्जावें ॥ १७ ॥
नम्रतेने देवळातील सभामंडपात नि:शंकपणे देवापुढे लोटांगण घालावे. हातांनी टाळी वाजवत आणि मुखाने नामघोष करीत नाचावे. (१७)

येकांची कीर्ति येकापुढें । वर्णितां साहित्य न पडे ।
म्हणोनियां निवाडे । जेथील तेथें ॥ १८ ॥
ज्या देवापुढे कीर्तन करायचे असेल, त्याच देवाचे चरित्र, कीर्ती यांचे वर्णन कीर्तनात करावे. तेथे दुसऱ्या देवाची कीर्ती गाऊ नये. जे जेथे योग्य असेल, त्याचीच निवड करावी (१८)

मूर्ती नस्तां सगुण । श्रवणीं बैसले साधुजन ।
तरी अद्वैतनिरूपण । अवश्य करावें ॥ १९ ॥
समजा, जर कीर्तन करताना समोर सगुण मूर्ती नसेल आणि श्रवणास अधिकारी श्रोते असे साधुसज्जन बसलेले असतील, तर अद्वैताचे निरूपण अवश्य करावे. (१९)

नाहीं मूर्ती नाहीं सज्जन । श्रवणीं बैसले भाविक जन ।
तरी करावें कीर्तन । प्रस्ताविक वैराग्य ॥ २० ॥
समोर सगुण मूर्ती नसेल, अधिकारी साधुसज्जन श्रोते नसतील आणि सर्वसाधारण भाविक लोक श्रवणासाठी बसलेले असतील, तर परमार्थाची प्रस्तावनाच जणू असे जे वैराग्य त्याचे महत्त्व कीर्तनात वर्णन करावे. (२०)

श्रुंघारिक नवरसिक । यामधें सांडावें येक ।
स्त्रियादिकांचें कौतुक । वर्णुं नये कीं ॥ २१ ॥
समजा, कीर्तनात नवरसांचे वर्णन करावे लागले, तरी त्यातील शृंगार रसाच्या वर्णनात स्त्रियांच्या सौंदर्याचे, हावभावांचे कौतुकाने वर्णन करू नये. (२१)

लावण्य स्त्रियांचें वर्णितां । विकार बाधिजे तत्वता ।
धारिष्टापासून श्रोता । चळे तत्काळ ॥ २२ ॥
स्त्रियांच्या लावण्याचे वर्णन केल्याने श्रोत्यांच्या मनात कामविकार निर्माण होतो. त्यामुळे तत्काळ ते आपल्या धैर्यापासून चळतात. (२२)

म्हणऊन तें तजावें । जें बाधक साधकां स्वभावें ।
घेतां अंतरीं ठसावें । ध्यान स्त्रियांचें ॥ २३ ॥
म्हणून ते गाळावे ज्यायोगे स्त्रियांचे ध्यान श्रोत्यांच्या मनी ठसेल असे, साधकांना जे अत्यंत बाधक आहे, असे वर्णन कीर्तनकाराने करू नये. (२३)

लावण्य स्त्रियांचें ध्यान । कामाकार जालें मन ।
कैचें आठवेल ध्यान । ईश्वराचें ॥ २४ ॥
स्त्रियांच्या लावण्याचे ध्यान लागून जर श्रोता-वक्ता याचे मनांत कामविकार उत्पन्न झाला, तर त्यांना ईश्वराचे ध्यान करणे कसे शक्य होईल? (२४)

स्त्री वर्णितां सुखावला । लावण्याचे भरीं भरला ।
तो स्वयें जाणावा चेवला । ईश्वरापासुनी ॥ २५ ॥
जो कीर्तनकार स्त्रियांचे वर्णन करताना सुखावतो, त्यांच्या लावण्याच्या भरीस पडतो, तो स्वत:ही ईश्वरापासून दुरावला आहे, असे जाणावे. (२५)

हरिकथेसी भावबळें । गेला रंग तो तुंबळे ।
निमिष्य येक जरी आकळे । ध्यानीं परमात्मा ॥ २६ ॥
हरिकथा करीत असता वक्ता जर एक क्षणभर जरी परमात्म्याच्या ध्यानात मग्न झाला, तरी हरिकथेच्या पूर्वी ओसरलेला रंग भावभक्तीच्या बळाने उचंबळून येतो. (२६)

ध्यानीं गुंतलें मन । कैचें आठवेल जन ।
निशंक निर्ल्लज कीर्तन । करितां रंग माजे ॥ २७ ॥
परमात्म्याच्या ध्यानात मन गुंग झाल्याने समोर लोक बसलेले आहेत, हे स्मरणसुद्धा त्याला राहात नाही. आणि प्रेमामुळे तो निःशंक निर्लज्ज होऊन कीर्तन करू लागला, की रंग भरतो. (२७)

रागज्ञान ताळज्ञान । स्वरज्ञानेंसीं वित्पन्न ।
अर्थान्वयाचें कीर्तन । करूं जाणे ॥ २८ ॥
एखाद्या कीर्तनकाराला उत्तम रागज्ञान असते, तालज्ञान असते, स्वरज्ञान असते, तो विद्वानही असतो आणि अन्वय, अर्थ यांचा समन्वय करून तो उत्तम कीर्तन करतो. (२८)

छपन्न भाषा नाना कळा । कंठमाधुर्य कोकिळा ।
परी तो भक्तिमार्ग वेगळा । भक्त जाणती ॥ २९ ॥
जगात अनेक भाषा आहेत. एखाद्या कीर्तनकाराला अनेक भाषा येत असतात. त्याच्या अंगी नाना कळा असतात. कोकिळेसारखे कंठमाधुर्यही त्याच्याजवळ असते, पण भक्तिमार्ग हा यापेक्षा वेगळाच आहे. जे भक्त असतात, तेच त्यास जाणू शकतात. (२९)

भक्तांस देवाचें ध्यान । देवावांचून नेणें अन्न ।
कळावंतांचें जें मन । तें कळाकार जालें ॥ ३० ॥
भक्ताला फक्त देवाचेच ध्यान असते. देवावाचून अन्य तो काहीही जाणत नाही अथवा देवाशिवाय इतर काही म्हणजे अन्नही त्याला आठवत नाही. जो कलाकार असतो, त्याचे मन कलाकार होते. (३०)

श्रीहरिवीण जे कळा । तेचि जाणावी अवकळा ।
देवास सांडून वेगळा । प्रत्यक्ष पडिला ॥ ३१ ॥
भगवंतावाचून जी कळा ती कळा नसून अवकळा असते. एखादा कलाकार कलेमुळे देवाला विसरून वेगळा पडतो, हे प्रत्यक्ष दिसून येते. (३१)

सर्पीं वेढिलें चंदनासी । निधानाआड विवसी ।
नाना कळा देवासी । आड तैस्या ॥ ३२ ॥
चंदनाला सर्पाने वेढावे किंवा पुरलेल्या द्रव्याच्या लाभाच्या आड पिशाच्च अथवा हडळ येते, तशा देवाच्या प्राप्तीच्या आड कधी कधी अनेक कला येतात. (३२)

सांडून देव सर्वज्ञ । नादामध्यें व्हावें मग्न ।
तें प्रत्यक्ष विघ्न । आडवें आलें ॥ ३३ ॥
सर्वज्ञ देवाला सोडून नादामध्ये जर मन मग्न झाले, तर ते भगवत्प्राप्तीच्या आड आलेले प्रत्यक्ष विघ्नच समजावे. (३३)

येक मन गुंतलें स्वरीं । कोणें चिंतावा श्रीहरी ।
बळेंचि धरुनियां चोरीं । शुश्रृषा घेतली ॥ ३४ ॥
माणसाला मन तर एकच आहे. ते जर स्वरातच गुंतून पडले, तर श्रीहरींचे ध्यान कोणी करावे? एखाद्या चोराने एखाद्या माणसाला बळेच धरून न्यावे आणि त्याच्याकडून सेवा करून घ्यावी, तसेच ते घडते. (३४)

करितां देवाचें दर्शन । आडवें आलें रागज्ञान ।
तेणें धरुनियां मन । स्वरामागें नेलें ॥ ३५ ॥
कीर्तनकार देवदर्शन घडावे म्हणून कीर्तन करू लागतो, पण त्याचे रागज्ञान त्यात विघ्नाप्रमाणे आडवे येते. ते रागज्ञान त्याच्या मनाला पकडून धरून स्वरामागे घेऊन जाते. (३५)

भेटों जातां राजद्वारीं । बळेंचि धरिला बेगारी ।
कळावंतां तैसी परी । कळेनें केली ॥ ३६ ॥
राजाला भेटावे म्हणून राजद्वारी जाणाऱ्या माणसाला राजाच्या सेवकांनी पकडून वेठबिगारीला लावावे, त्याप्रमाणे कलेच्या योगाने कलावंताची स्थिती होते. (३६)

मन ठेऊन ईश्वरीं । जो कोणी हरिकथा करी ।
तोचि ये संसारीं । धन्य जाणा ॥ ३७ ॥
जो कोणी ईश्वराच्या ठिकाणी मन ठेवून हरिकथा करतो, तो या जगात धन्य जाणावा. (३७)

जयास हरिकथेची गोडी । उठे नीच नवी आवडी ।
तयास जोडली जोडी । सर्वोत्तमाची ॥ ३८ ॥
ज्याला हरिकथेची आवड असून,हरिकथेत नित्य नवी गोडी वाटते, त्याने सर्वोत्तमास आपलेसे केले आहे असे जाणावे. (३८)

हरिकथा मांडली जेथें । सर्व सांडून धावे तेथें ।
आलस्य निद्रा दवडून स्वार्थें । हरिकथेसि सादर ॥ ३९ ॥
जेथे कुठे हरिकथा होत असेल, तेथे आळस, निद्रा आणि स्वार्थ इत्यादी सोडून जो धाव घेतो आणि अत्यंत आदराने कथा ऐकतो, (३९)

हरिभक्तांचिये घरीं । नीच कृत्य अंगिकारी ।
साहेभूत सर्वांपरीं । साक्षपें होये ॥ ४० ॥
तसेच हरिभक्ताच्या घरी कोणतेही हलके काम देखील मनापासून करतो आणि सर्व प्रकारे जाणीवपूर्वक त्यास साहाय्यभूत होतो, (४०)

या नावाचा हरिदास । जयासि नामीं विश्वास ।
येथून हा समास । संपूर्ण जाला ॥ ४१ ॥
आणि ज्याचा नामावर दृढ विश्वास असतो त्याला हरिदास असे म्हणतात. श्रीसमर्थ असे म्हणतात की, येथे हा समास पूर्ण झाला. (४१).

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
हरिकथालक्षणनिरूपण समास पांचवा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘हरिकथालक्षणनाम’ समास पाचवा समाप्त.


समास सहावा : चातुर्य लक्षण
॥ श्रीराम ॥

रूप लावण्य अभ्यासितां न ये । सहजगुणास न चले उपाये ।
कांहीं तरी धरावी सोये । अगांतुक गुणाची ॥ १ ॥
श्रीसमर्थ म्हणतात की, आपले रूप आणि लावण्य हे गुण अभ्यासाने साध्य होत नाहीत. कारण ते जन्मजात असतात. तेथे काही उपाय चालत नाही. म्हणून आगंतुक गुण प्राप्त करण्यासाठी जरूर प्रयत्न करावेत. (१)

काळें माणुस गोरें होयेना । वनाळास येत्ना चालेना ।
मुक्यास वाचा फुटेना । हा सहजगुण ॥ २ ॥
काळा माणूस गोरा होऊ शकत नाही. जन्मखुणा, व्रण इ. काढता येत नाही. मुक्या माणसाला बोलता येत नाही, कारण तो त्याचा सहज गुण आहे. (२)

आंधळें डोळस होयेना । बधिर तें ऐकेना ।
पांगुळ पाये घेइना । हा सहजगुण ॥ ३ ॥
आंधळा माणूस डोळस होऊ शकत नाही. बधिर माणूस ऐकू शकत नाही. पांगळा माणूस चालू शकत नाही. हा त्याचा सहज गुण आहे. (३)

कुरूपतेचीं लक्षणें । किती म्हणोनि सांगणें ।
रूप लावण्य याकारणें । पालटेना ॥ ४ ॥
याप्रमाणे कुरूपतेची किती तरी लक्षणे सांगता येतील. पण मूळ जे रूप आणि लावण्य असते, त्यात बदल होऊ शकत नाही. (४)

अवगुण सोडितां जाती । उत्तम गुण अभासितां येती ।
कुविद्या सांडून सिकती । शाहाणे विद्या ॥ ५ ॥
पण अवगुण सोडता येतात, उत्तम गुण अभ्यासाने प्राप्त करता येतात. शहाणे लोक असतात ते कुविद्येचा त्याग करून सद्विद्या शिकतात. (५)

मूर्खपण सांडितां जातें । शाहाणपण सिकतां येतें ।
कारबार करितां उमजतें । सकळ कांहीं ॥ ६ ॥
मूर्खपणाचा त्याग केला तर ते जाते. शिकल्याने शहाणपण येऊ शकते. कारभार, उद्योगधंदा करू लागल्यावर त्यांतील सर्व काही बारकावे कळू लागतात. (६)

मान्यता आवडे जीवीं । तरी कां उपेक्षा करावी ।
चातुर्येंविण उंच पदवी । कदापी नाहीं ॥ ७ ॥
माणसाला मोठेपणा मनापासून आवडतो, मग त्याची उपेक्षा का करावी? चातुर्याशिवाय श्रेष्ठ पदवी कधीही प्राप्त होत नाही. (७)

ऐसी प्रचीत येते मना । तरी कां स्वहित कराना ।
सन्मार्गें चालतां जनां । सज्जना माने ॥ ८ ॥
मनाला अशी प्रचीती येत असते, मग आपले हित का साधून घेत नाही. सन्मार्गाने चालले असता लोकांत आणि सज्जनात मान्यता मिळते. (८)

देहे नेटकें श्रुंघारिलें । परी चातुर्येंविण नासलें ।
गुणेंविण साजिरें केलें । बष्कळ जैसें ॥ ९ ॥
देहाला बाहेरून नीटनेटके शृंगारले, तरी अंगी चातुर्य नसेल तर ते व्यर्थ ठरते. बाष्कळ माणसाच्या अंगी गुण नसताना त्याला सजवावे, तसे हे आहे. (९)

अंतर्कळा श्रृंघारावी । नानापरी उमजवावी ।
संपदा मेळऊन भोगावी । सावकास ॥ १० ॥
म्हणून माणसाने आपले अंतरंग उत्तम गुणांनी युक्त करावे. नाना प्रकारचे ज्ञान प्राप्त करावे आणि संपत्ती मिळवून सावकाश तिचा उपभोग घ्यावा. (१०)

प्रेत्न करीना सिकेना । शरीर तेंहि कष्टविना ।
उत्तम गुण घेईना । सदाकोपी ॥ ११ ॥
जो काहीही प्रयत्न करत नाही, काही शिकत नाही, शरीरास काहीही कष्ट पडू देत नाही आणि उत्तम गुणही घेत नाही, तो सदा चिडचिडत असतो. (११)

आपण दुसयास करावें । तें उसिणें सवेंचि घ्यावें ।
जना कष्टवितां कष्टावें । लागेल बहु ॥ १२ ॥
आपण दुसऱ्याशी जसे वागतो, तशीच त्याची प्रतिक्रिया आपल्याला प्राप्त होते. आपण जर लोकांना त्रास दिला तर आपल्यालाही खूप त्रास सोसावा लागेल. (१२)

न्यायें वर्तेल तो शहाणा । अन्याइ तो दैन्यवाणा ।
नाना चातुर्याच्या खुणा । चतुर जाणे ॥ १३ ॥
जो न्यायाने वागतो, तोच शहाणा होय. जो अन्यायाने वागतो, तो दैन्यवाणा असतो. जो चतुर असतो, तोच चातुर्याच्या नाना खुणा जाणतो. (१३)

जें बहुतांस मानलें । तें बहुतीं मान्य केलें ।
येर तें वेर्थचि गेलें । जगनिंद्य ॥ १४ ॥
जी गोष्ट अनेकांना मान्य असते, ती सर्वमान्य ठरते. याउलट जे अनेकांना मान्य नाही, ते व्यर्थ होते. निंद्य ठरते. (१४)

लोक आपणासि वोळावे । किंवा आवघेच कोंसळावे ।
आपणास समाधान फावे । ऐसें करावें ॥ १५ ॥
लोक आपणावर प्रसन्न होवोत अथवा आपल्याविरुद्ध जावोत, ज्यायोगे आपणाला समाधान वाटेल तेच करावे. (१५)

समाधानें समाधान वाढे । मित्रिनें मित्रि जोडे ।
मोडितां क्षणमात्रें मोडे । बरेपण ॥ १६ ॥
समाधानाने समाधान वाढते. मैत्रीने मैत्री वाढते. पण चांगुलपणा नष्ट व्हायला एक क्षणही पुरेसा होतो. (१६)

अहो कांहो अरे काअंरे । जनीं ऐकिजेतें किं ते ।
कळत असतांच कां रे । निकामीपन ॥ १७ ॥
आपण ‘अहो’ असे सन्मानाने संबोधले तर ‘का हो’ असे आपल्याला संबोधले जाते. आपण ‘अरे’ म्हटले तर ‘का रे’ असे प्रत्युत्तर मिळते, असे हे लोकांत ऐकू येते, दिसते. तरी कळत असून, आपण अयोग्य वर्तन का बरे करावे ? (१७)

चातुर्यें श्रुंघारे अंतर । वस्त्रें श्रुंघारे शरीर ।
दोहिमधें कोण थोर । बरें पाहा ॥ १८ ॥
एखादा चातुर्याने अंतरंग सजवतो, दुसरा कुणी उत्तम वस्त्रे धारण करून शरीर शंगारतो. या दोघांमध्ये थोर कुणास म्हणावे, हे विचार करून पहा बरे! (१८)

बाह्याकार श्रुंगारिलें । तेणें लोकांच्या हातासि काये आलें ।
चातुर्यें बहुतांसी रक्षिलें । नाना प्रकारें ॥ १९ ॥
बाहेरून शरीरास शृंगारले त्यामुळे लोकांचा काय फायदा झाला? चातुर्याने अनेकांचे नाना प्रकारे रक्षण करता येते. (१९)

बरें खावें बरें जेवावें । बरें ल्यावें बरें नेसावें ।
समस्तीं बरें म्हणावें । ऐसी वासना ॥ २० ॥
चांगले खावे, चांगले जेवावे, उत्तम वस्त्र ल्यावे. उत्तम वस्त्र नेसावे. सर्व लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे, अशी वासना-इच्छा सर्वांनाच असते. (२०)

तनें मनें झिजावें । तेणें भले म्हणोन घ्यावें ।
उगें चि कल्पितां सिणावें । लागेल पुढें ॥ २१ ॥
शरीराने, मनाने जो लोकांसाठी झिजतो, कष्ट करतो, त्याला लोक भले म्हणतात. उगीच काहीच न करता जो बसून कल्पना करीत राहातो, त्याला पुढे शिणावे लागते. (२१)

लोकीं कार्यभाग आडे । तो कार्यभाग जेथें घडे ।
लोक सहजचि वोढे । कामासाठीं ॥ २२ ॥
लोकांचे एखादे काम अडलेले असते, ते ज्याच्यामुळे पूर्ण होते, त्याच्याकडे आपापल्या कामासाठी लोक सहजच आकर्षित होतात. (२२)

म्हणोन दुरयास सुखी करावें । तेणें आपण सुखी व्हावें ।
दुसयास कष्टवितां कष्टावें । लागेल स्वयें ॥ २३ ॥
म्हणून दुसऱ्याला सुखी करावे आणि त्यायोगे आपणही सुखी व्हावे. आपण जर दुसऱ्याला कष्ट दिले, तर पुढे आपल्यालाही कष्ट सोसावे लागतात. (२३)

हें तों प्रगटचि आहे । पाहिल्याविण कामा नये ।
समजणें हा उपाये । प्राणीमात्रासी ॥ २४ ॥
नीट जाणून घेतल्याशिवाय कुठलेही काम नीट होत नाही, ही गोष्ट प्रगटच आहे. म्हणून कुठलीही गोष्ट समजून घेणे हाच सर्व प्राणिमात्रासाठी उपाय आहे. (२४)

समजले आणि वर्तले । तेचि भाग्यपुरुष जाले ।
यावेगळे उरले । तें करंटे पुरुष ॥ २५ ॥
जे कोणी कुठल्याही विषयाची नीट माहिती करून घेऊन त्याप्रमाणे वागतात, ते पुरुष भाग्यवान होत. याशिवाय जे इतर असे करीत नाहीत, ते करंटे भाग्यहीन जाणावेत. (२५)

जितुका व्याप तितुकें वैभव । वैभवासारिखा हावभाव ।
समजले पाहिजे उपाव । प्रगटचि आहे ॥ २६ ॥
जितका व्याप आपण वाढवू, त्याप्रमाणे वैभव प्राप्त होते. जसे वैभव प्राप्त होईल, तसे त्याचे बोलणे-वागणे असते. म्हणून नीट समजून वागणे हाच यासाठी उपाय आहे. (२६)

आळसें कार्येभाग नासतो । साक्षेप होत होत होतो ।
दिसते गोष्टी कळेना तो । शाहाणा कैसा ॥ २७ ॥
कुठल्याही गोष्टीत आळस केला तरी कार्य होत नाही. सतत प्रयत्न करीत राहिले की कार्य सिद्धीस जाते. ही गोष्ट प्रत्यक्ष दिसत असता ज्याला कळत नाही, त्याला शहाणे कसे म्हणावे? (२७)

मित्रि करितां होतें कृत्य । वैर करितां होतो मृत्यु ।
बोलिलें हें सत्य किं असत्य । वोळखावें ॥ २८ ॥
कुणाशीही मैत्री केली की आपले काम होते. याउलट कुणाशी वैर केले तर मृत्यू ओढवतो. मी जे सांगतो ते खरे की खोटे हे श्रोत्यांनी ओळखावे. (२८)

आपणास शाहाणें करूं नेणें । आपलें हित आपण नेणें ।
जनीं मैत्रि राखों नेणे । वैर करी ॥ २९ ॥
जो स्वत:ला शहाणा करू शकत नाही; ज्याला आपले स्वत:चे हित कशात आहे हे कळत नाही, लोकांशी मैत्री कशी करावी हेही कळत नाही आणि जो लोकांशी वैर करतो, (२९)

ऐसे प्रकारीचे जन । त्यास म्हणावें अज्ञान ।
तयापासीं समाधान । कोण पावे ॥ ३० ॥
असा जो कोणी असतो, त्याला अज्ञानी म्हणावे. त्याच्यापाशी समाधान कोणाळा लाभेल? (३०)

आपण येकायेकी येकला । सृष्टींत भांडत चालिला ।
बहुतांमध्यें येकल्याला । येश कैचें ॥ ३१ ॥
असा जो अगदी एकटा पडून सर्वांशी भांडत राहतो, त्याला चारचौघांत यश कसे मिळणार? (३१)

बहुतांचे मुखी उरावें । बहुतांचे अंतरीं भरावें ।
उत्तम गुणीं विवरावें । प्राणीमात्रासी ॥ ३२ ॥
म्हणून अनेकांना मदत करून नाव कमवावे. अनेकांच्या अंत:करणात स्थान मिळवावे. उत्तम गुणांच्या योगे प्राणिमात्रांस विवेकी करावे. (३२)

शाहाणे करावे जन । पतित करावे पावन ।
सृष्टिमधें भगवद्भकजन । वाढवावें ॥ ३३ ॥
लोकांना शहाणे करावे. पतित असतील त्यांना पावन करून घ्यावे. जगात भगवद्भजन वाढवावे, असे श्रीसमर्थ सांगतात. (३३)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
चातुर्येलक्षणनिरूपण समास सहावा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘चातुर्येलक्षणनाम’ समास सहावा समाप्त.


समास सातवा : युगधर्म निरूपण
॥ श्रीराम ॥

नाना वेश नाना आश्रम । सर्वांचें मूळ गृहस्थाश्रम ।
जेथें पावती विश्राम । त्रैलोक्यवासी ॥ १ ॥
श्रीसमर्थ म्हणतात की, या जगात नाना वेष आणि नाना आश्रम आहेत. पण सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम आहे. सर्व त्रैलोक्यांतील लोकांना गृहस्थाच्या घरीच विश्राम प्राप्त होतो. (१)

देव ऋषी मुनी योगी । नाना तापसी वीतरागी ।
पितृआदिकरून विभागी । अतीत अभ्यागत ॥ २ ॥
देव, ऋषी, मुनी, योगी, अनेक तपस्वी लोक, तसेच वैराग्यसंपन्न लोक, तसेच पितर आणि अतिथी-अभ्यागत आदी सर्व गृहस्थाघरच्या अन्नाचे अधिकारी असतात. (२)

गृहस्थाश्रमीं निर्माण जाले । आपला आश्रम टाकून गेले ।
परंतु गृहस्थागृहीं हिंडों लागले । कीर्तिरूपें ॥ ३ ॥
हेसर्वगृहस्थाश्रमातच जन्मले. त्यांनी नंतर गृहस्थाश्रमाचा त्याग केला आणि साधन करून कीर्ती मिळवली; परंतु भिक्षेसाठी त्यांना गृहस्थांच्या घरीच हिंडावे लागते. (३)

याकारणें गृहस्थाश्रम । सकळामधें उत्तमोत्तम ।
परंतु पाहिजे स्वधर्म । आणी भूतदया ॥ ४ ॥
म्हणून सर्व आश्रमांत गृहस्थाश्रम हा उत्तमोत्तम होय. परंतु गृहस्थाच्या ठिकाणी स्वधर्मनिष्ठा आणि भूतदया मात्र असणे आवश्यक आहे. (४)

जेथें शडकर्में चालती । विध्योक्त क्रिया आचरती ।
वाग्माधुर्यें बोलती । प्राणीमात्रासी ॥ ५ ॥
गृहस्थाश्रमातच षट्कर्मे (अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान आणि प्रतिग्रह)

सर्वप्रकारें नेमक । शास्त्रोक्त करणें कांहींयेक ।
त्याहिमध्यें अलोलिक । तो हा भक्तिमार्ग ॥ ६ ॥
चालतात. गृहस्थ विधियुक्त क्रियेचे आचरण करतात आणि प्राणिमात्रांशी मधुर वाणीने बोलतात. सर्व प्रकारे शास्त्रोक्त कर्मांचे नियमितपणे आचरण करावे. त्यांतही भक्तिमार्ग हा अलौकिक आहे. (६)

पुरश्चरणी कायाक्लेसी । दृढव्रती परम सायासी ।
जगदीशावेगळें जयासी । थोर नाहीं ॥ ७ ॥
जो पुरश्चरणे करतो, शरीरास कष्ट देण्यास तयार असतो, दृढव्रती आणि खूप प्रयत्नशील असतो, पण ज्याला एका जगदीशाशिवाय दुसरे काही श्रेष्ठ वाटत नाही, (९)

काया वाचा जीवें प्राणें । कष्टे भगवंताकारणें ।
मनें घेतलें धरणें । भजनमार्गीं ॥ ८ ॥
जो शरीराने, वाणीने. जीवाने आणि प्राणाने भगवंतासाठी कष्ट सोसतो, ज्याच्या मनाने भक्तिमार्गात जणू काही धरणेच धरलेले असते, (८)

ऐसा भगवंताचा भक्त । विशेष अंतरीं विरक्त ।
संसार सांडून झाला मुक्त । देवाकारणें ॥ ९ ॥
असा जो भगवतांचा भक्त असतो आणि जो अंतरात विशेष विरक्त असतो, तो संसार सोडून भगवंतासाठी मुक्त होतो. अंत:करणापासून वैराग्य उत्पन्न होणे हे महद्भाग्य जाणावे. आसक्तीएवढे अभाग्य दुसरे नाही. (१०)

अंतरापासून वैराग्य । तेंचि जाणावें महद्भा्ग्य ।
लोलंगतेयेवढें अभाग्य । आणीक नाहीं ॥ १० ॥
असे वैराग्य प्राप्त झाल्यानेच अनेक राजे राज्य सोडून भगवत्प्राप्तीकरिता हिंडले आणि भगवतप्राप्ती करून घेऊन या जगात कीर्तिरूपाने पावन झाले. (११)

राजे राज्य सांडून गेले । भगवंताकारणें हिंडलें ।
कीर्तिरूपें पावन जाले । भूमंडळीं ॥ ११ ॥
असा जो योगेश्वर असतो, ज्याला अंतर्यामी स्वरूपानुभव आलेला असतो, तो सर्व प्राणिमात्रांचे अंत:करण जाणू शकतो. त्याच्याकडे लोक आकर्षित होतात. (१२)

ऐसा जो कां योगेश्वर । अंतरीं प्रत्ययाचा विचार ।
उकलूं जाणे अंतर । प्राणीमात्रांचें । १२ ॥
असा जो अनासक्त आणि त्याहूनही विशेष म्हणजे आत्मज्ञानी असतो, त्याच्या केवळ दर्शनानेही लोकांना समाधान होते. (१३)

ऐसी वृत्ति उदासीन । त्याहिवरी विशेष आत्मज्ञान ।
दर्शनमात्रें समाधान । पावती लोक ॥ १३ ॥
तो अनेक लोकांवर उपकार करतो, त्यांच्या उपयोगी पडतो, म्हणून लोक त्याच्यामागे धावतात. पण तो लोकांच्या वाट्यासच येत नाही. त्याचे हृदय अखंड भगवद्रूप झालेले असते. (१४)

बहुतांसी करी उपाये । तो जनाच्या वाट्या न ये ।
अखंड जयाचे हृदये । भगवद्रूसप ॥ १४ ॥
लोकांना बाह्यतः तो आपल्यासारखाच दुश्चित्त आहे, असे वाटते. पण तो नेहमी सावधान असतो आणि त्याचे चित्त अखंड परमेश्वराच्या ठिकाणी जडलेले असते. (१५)

जनास दिसे हा दुश्चित । परी तो आहे सावचित ।
अखंड जयाचें चित्त । परमेश्वरीं ॥ १५ ॥
तो निरंतर उपास्य देवतेच्या मूर्तीच्या ध्यानात अथवा आत्मानुसंधानात नाहीतर श्रवणमननात दंग असतो. (१६)

उपासनामूर्तिध्यानीं । अथवा आत्मानुसंधानीं ।
नाहिं तरी श्रवणमननीं । निरंतर ॥ १६ ॥
पूर्वजांच्या अपरंपार पुण्याचा संग्रह गाठी असेल, तरच लोकांची अशा भगवद्भक्ताशी गाठ पडू शकते. (१७)

पूर्वजांच्या पुण्यकोटी । संग्रह असिल्या गांठीं ।
तरीच ऐसीयाची भेटी । होये जनासी ॥ १७ ॥
अनुभवाशिवायचे ज्ञान ते खरे नसून काल्पनिक असते. त्यायोगे प्राणिमात्रांचा उद्धार कसा होणार? (१८)

प्रचीतिविण जें ज्ञान । तो आवघाचि अनुमान ।
तेथें कैंचें परत्रसाधन । प्राणीयासी ॥ १८ ॥
म्हणून परमार्थात प्रचीतीला, अनुभवाला महत्त्व आहे. अनुभवाशिवायचे ज्ञान उपयोगी पडत नाही. त्याने उपायाऐवजी अपायच होतो, हे शहाणे लोक जाणतात. (१९)

याकारणें मुख्य प्रत्यये । प्रचीतिविण काम नये ।
उपायासारिखा अपाये । शाहाणे जाणती ॥ १९ ॥
एखादा वेडा अज्ञानी माणूस घर सोडून निघून जातो आणि कष्ट करून करून मरून जातो. प्रपंच आणि परमार्थ तसेच इहलोक आणि परलोक या दोन्हींना तो अंतरतो. (२०)

वेडें संसार सांडून गेलें । तरी तें कष्टकष्टोंचि मेलें ।
दोहिकडे अंतरलें । इहलोक परत्र ॥ २० ॥
रागारागाने निघून गेला आणि भांडता भांडताच मरून गेला. त्याच्यामुळे अनेक लोक दु:खी-कष्टी झाले आणि तो स्वत:ही कष्टी झाला. (२१)

रागें रागें निघोन गेला । तरी तो भांडभांडोंचि मेला ।
बहुत लोक कष्टी केला । आपणहि कष्टी ॥ २१ ॥
एखादा असा घर सोडून निघून जातो, पण तो अज्ञानीच असतो. काही लोक त्याच्या संगतीला लागतात. पण गुरुशिष्य दोघेही अज्ञानामुळे समसमानच असतात. (२२)

निघोन गेला परी अज्ञान । त्याचे संगती लागले जन ।
गुरु शिष्य दोघे समान । अज्ञानरूपें ॥ २२ ॥
एखादा आशाळभूत आणि दुराचारी माणूस घर सोडून देशांतराला गेला तरी, तेथेही लोकांत तो अनाचारच करतो. (२३)

आशावादी अनाचारी । निघोनि गेला देशांतरीं ।
तरी तो अनाचारचि करी । जनामध्यें ॥ २३ ॥
घरी अन्नावाचून कष्टी होतात आणि घर सोडून निघून जातात. त्याने चोरी केली अथवा त्याच्यावर चोरीचा आरोप आला तर लोक त्याला जेथे जाईल तेथे चोप देतात. (२४)

गृहीं पोटेविण कष्टती । कष्टी होऊन निघोन जाती ।
त्यास ठाईं ठाईं मारिती । चोरी भरतां ॥ २४ ॥
जो नित्यानित्यविवेकाने संसार मिथ्या आहे हे जाणून ज्ञानप्राप्तीसाठी निघून जातो, तो ज्ञान प्राप्त करून स्वतः पावन होतो व इतर लोकांनाही पावन करतो. (२५)

संसार मिथ्या ऐसा कळला । ज्ञान समजोन निघोन गेला ।
तेणें जन पावन केला । आपणाऐसा ॥ २५ ॥
संगतीनेच एखादा तरतो, तर संगतीनेच एखादा बुडतो. म्हणून नीट विचारपूर्वक सत्संगतीच करावी. (२६)

येके संगतीनें तरती । येके संगतीनें बुडती ।
याकारणें सत्संगती । बरी पाहावी ॥ २६ ॥
जेथे विवेकाच्या कसोटीस साधू उतरत नाही, तेथे त्याच्याकडून दीक्षा कशी प्राप्त होणार? अज्ञानाने उगीच घरोघरी भिक्षा मागितली तरी ती कोठेच मिळत नाही. (२७)

जेथें नाहीं विवेकपरीक्षा । तेथें कैंची असेल दीक्षा ।
घरोघरीं मागतां भिक्षा । कोठेंहि मिळेना ॥ २७ ॥
जो दुसऱ्याचे अंतरंग जाणतो, वेळप्रसंग जाणतो अशा (चतुर)

जो दुसयाचें अंतर जाणे । देश काळ प्रसंग जाणे ।
तया पुरुषा काय उणें । भूमंडळीं ॥ २८ ॥
पुरुषाला या भूमंडळावर काहीही उणे पडत नाही. (२८)

नीच प्राणी गुरुत्व पावला । तेथें आचारचि बुडाला ।
वेदशास्त्रब्राह्मणाला । कोण पुसे ॥ २९ ॥
नीच माणसाला गुरुत्व प्राप्त झाले तर आचारच नष्ट होतो. मग वेद, शास्त्र, ब्राह्मण यांना कोण विचारतो. (२९)

ब्रह्मज्ञानाचा विचारू । त्याचा ब्राह्मणासीच अधिकारू ।
वर्णानां ब्रह्मणो गुरुः । ऐसें वचन ॥ ३० ॥
फक्त ब्राह्मणांनाच ब्रह्मज्ञानाचा अधिकार आहे. ‘वर्णानां ब्राह्मणो गुरुः’ असे शास्त्रवचन आहे.(३०)

ब्राह्मण बुद्धिपासून चेवले । आचारापासून भ्रष्टले ।
गुरुत्व सांडून जाले । शिष्य शिष्यांचे ॥ ३१ ॥
पण ब्राह्मण आता बुद्धिभ्रष्ट झाले आहेत. त्यांची बुद्धी असून नसल्यासारखी झाली आहे. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी शुद्ध आचारही राहिलेला नाही. स्वतःचे श्रेष्ठत्व सोडून ते शिष्यांचेही शिष्य झाले आहेत. (३१)

कित्येक दावलमलकास जाती। कित्येक पीरास भजती ।
कित्येक तुरुक होती । आपले इछेनें ॥ ३२ ॥
कित्येक जण दावलमलकाकडे जातात. कित्येकजण पीराला भजतात, तर कित्येकजण आपल्या इच्छेने तुर्क होतात. (३२)

ऐसा कलयुगींचा आचार । कोठें राहिला विचार ।
पुढें पुढें वर्णसंकर । होणार आहे ॥ ३३ ॥
कलियुगातील आचार हा असा आहे. विचार कुठे शिल्लकच राहिलेला नाही. पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. (३३)

गुरुत्व आले नीचयाती । कांहींयेक वाढली महंती ।
शुद्र आचार बुडविती । ब्रह्मणाचा ॥ ३४ ॥
आध्यात्मिक गुरुत्व हलक्या जातीच्या लोकांकडे गेल्याने ते स्वत:चा मोठेपणा थोडा फार वाढवतात. शूद्र स्वत:च अनाचारी असल्याने त्यांच्या अनुयायांत ब्राह्मणांच्या आचाराचे महत्त्व राहत नाही. (३४)

हें ब्रह्मणास कळेना । त्याची वृत्तिच वळेना ।
मिथ्या अभिमान गळेना । मूर्खपणाचा ॥ ३५ ॥
पण आपला अध:पात होत आहे, हे ब्राह्मणाला कळत नाही. त्याच्या वृत्तीत बदल होत नाही. त्याचा मूर्खपणाचा अभिमान नाहीसा होत नाही. (३५)

राज्य नेलें म्लेंचिं क्षेत्रीं । गुरुत्व नेलें कुपात्रीं ।
आपण अरत्रीं ना परत्रीं । कांहींच नाहीं ॥ ३६ ॥
म्लेंच्छांनी, क्षत्रियांनी राज्य नेले. अपात्र व्यक्तींनी त्यांचे गुरुत्व नेले. धड ना इहलोक धड ना परलोक, काहीच नाही, अशी त्यांची स्थिती झाली आहे. (३६)

ब्रह्मणास ग्रामणीनें बुडविलें। विष्णूनें श्रीवत्स मिरविलें ।
त्याच विष्णूनें श्रापिलें । फरशरामें ॥ ३७ ॥
ब्राह्मणांना अनाचाराने, बुडविले आहे. ब्राह्मणांचे पदचिह्न श्रीवत्स ज्या श्रीविष्णूने आपल्या वक्षःस्थलावर मिरविले, त्या विष्णूनेच परशुरामरूपाने त्यांना शाप दिला. (३७)

आम्हीहि तेचि ब्रह्मण । दुःखें बोलिलें हें वचन ।
वडिल गेले ग्रामणी करून । आम्हां भोवतें ॥ ३८ ॥
आम्हीही तेच ब्राह्मण आहोत, म्हणून मोठ्या दुःखाने आम्ही हे वचन बोलत आहोत. वडील माणसे अनाचार करून गेली, त्याचे परिणाम आम्हांला भोवत आहेत. (३८)

अतांचे ब्रह्मणीं काये केलें । अन्न मिळेना ऐसें जालें ।
तुम्हा बहुतांचे प्रचितीस आलें । किंवा नाहीं ॥ ३९ ॥
आत्ताचे ब्राह्मण तरी काय करीत आहेत? त्यांना खायला अन्न मिळत नाही, असे झाले आहे. तुमच्यापैकी अनेकांच्या हे अनुभवास आले की नाही ? (३९)

बरें वडिलांस काये म्हणावें । ब्रह्मणाचें अदृष्ट जाणावें ।
प्रसंगें बोलिलें स्वभावें । क्ष्मा केलें पाहिजे ॥ ४०॥
पण वडील माणसांना काय म्हणावे? त्यांना कसा दोष द्यावा? ब्राह्मणांचे अदृष्ट म्हणून असे झाले असे समजावे. प्रसंगामुळे स्वाभाविकच बोलले गेले, तरी श्रोत्यांनी क्षमा केली पाहिजे. (४०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
युगधर्म निरूपण समास सातवा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘युगधर्मनिरूपणनाम’ समास सातवा समाप्त.


समास आठवा : अखंड ध्यान निरूपण
॥ श्रीराम ॥

बरें ऐसा प्रसंग जाला । जाला तो होऊन गेला।
आतां तरी ब्राह्मणीं आपणाला । शाहाणे करावें ॥ १ ॥
श्रीसमर्थ म्हणतात की, ब्राह्मणांच्यावर असा प्रसंग आला तर आला तो येऊन गेला. झाले गेले होऊन गेले, म्हणून समजून ब्राह्मणांनी आता तरी स्वत:ला शहाणे करावे. (१)

देव पुजावा विमळहस्तीं । तेणें भाग्य पाविजे समस्तीं ।
मूर्ख अभक्त वेस्तीं । दरिद्र भोगिजे ॥ २ ॥
देवाची पूजा निर्मल हाताने करावी. त्यायोगे पूजा करणाराला सर्व प्रकारचे भाग्य लाभते. मुर्ख, गैरशिस्त, अभक्त असा उपासक दारिद्रय भोगतो. (२)

आधीं देवासवोळखावें । मग अनन्यभावें भजावें ।
अखंड ध्यानचि धरावें । सर्वोत्तमाचें ॥ ३ ॥
प्रथम देवाला ओळखावे आणि मग अनन्यभावाने त्याला भजावे. त्या सर्वोत्तमाचे अखंड ध्यान धरावे. (३)

सर्वांमधें जो उत्तम । तया नाव सर्वोत्तम ।
आत्मानात्मविवेकवर्म । ठाईं पाडावें ॥ ४ ॥
सर्वांमध्ये जो उत्तम त्याला सर्वोत्तम म्हणतात. आत्मानात्मविवेकाने हे वर्म जाणन घ्यावे. (४)

जाणजाणों देह रक्षी । आत्मा द्रष्टा अंतरसाक्षी ।
पदार्थमात्रास परीक्षी । जाणपणें ॥ ५ ॥
जाणीवरूपाने जो देहाचे रक्षण करतो, जो द्रष्टा, अंतरसाक्षी आहे, तो आत्माच जाणीवरूपाने पदार्थमात्राची परीक्षा करीत असतो. (५)

तो सकळ देहामधें वर्ततो। इंद्रियेंग्राम चेष्टवितो ।
प्रचितीनें प्रत्यये येतो । प्राणीमात्रीं ॥ ६ ॥
सर्वांच्या देहामध्ये तोच राहतो आणि सर्व इंद्रियांना चेतना देऊन त्यांच्याकडून कामे करून घेतो. हे सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी अनुभवास येते. (६)

प्राणीमात्रीं जगदांतरें । म्हणोनि राखावीं अंतरें ।
दाता भोक्ता परस्परें । सकळ कांहीं ॥ ७ ॥
जगताचा जो अंतर्यामी तोच सर्व प्राणिमात्रांत आहे. म्हणून सर्वांची अंत:करणे राजी राखावीत. तोच परस्परांचा दाता, भोक्ता, इत्यादी सर्व काही आहे. (७)

देव वर्ततो जगदांतरी । तोचि आपुलें अंतरीं ।
त्रैलोकींचे प्राणीमात्रीं । बरें पाहा ॥ ८ ॥
जो देव सर्व जगाच्या अंतर्यामी आहे, तोच आपल्याही अंतरात आहे व तोच त्रैलोक्यातील प्राणिमात्रांच्याही अंतर्यामी आहे, हे नीट जाणून घ्यावे. (८)

मुळीं पाहाणार तो येकला । सकळां ठाईं विभागला ।
देहप्रकृतीनें जाला । भिन्न भिन्न ॥ ९ ॥
मूळ पाहाणारा म्हणजेच द्रष्टा सर्वांच्या ठायी तो एकच आहे, पण देहप्रकृतीमुळे सर्वांच्या ठिकाणी वेगवेगळा झाला आहे.

भिन्न भासें देहाकारें । प्रस्तुता येकचि अंतरें ।
बोलणें चालणें निर्धारें । त्यासीच घडे ॥ १० ॥
देहाच्या आकारामुळे भिन्न भासतो, परंतु वस्तुतः अंत:करणातील जाणीवरूपाने तो एकच आहे. त्याच्या योगेच बोलणे, चालणे इत्यादी सर्व क्रिया होत असतात. (१०)

आपुले पारिखे सकळ लोक । पक्षी स्वापद पश्वादिक ।
किडा मुंगी देहधारक । सकळ प्राणी ॥ ११ ॥
आपले आणि परके सर्व लोक, पक्षी, श्वापदे, पशू आदी, तसेच किडा, मुंगी इत्यादी सर्व देहधारक प्राणी, (११)

खेचर भूचर वनचर । नाना प्रकारें जळचर ।
चत्वार खाणी विस्तार । किती म्हणोन सांगावा ॥ १२॥
आकाशात विचरण करणारे, भूचर, वनचर नाना प्रकारचे जलचर, चत्वार खाणी इत्यादी विस्तार किती म्हणून वर्णन करावा? (१२)

समस्त जाणीवेनें वर्तती । रोकडी पाहवी प्रचिती ।
त्याची आपुली संगती । अखंड आहे ॥ १३॥
सर्वजण जाणिवेनेच वागत असतात, याची प्रत्यक्ष प्रचीती घ्यावी. त्यांची व आपली संगती अखंड आहे. (१३)

जगदांतरें वोळला धणी । किती येकवटील प्राणी ।
परी ते वोळायाची करणी । आपणापासीं ॥ १४ ॥
सर्व जगाचा अंतरात्मा हाच जगाचा मालक आहे. त्याला जर प्रसन्न करून घेतले, तर सर्व प्राणी आपल्याजवळ एकत्र येतील. पण त्याला प्रसन्न करून घेण्याची कृती आपल्यापाशीच आहे. (१४)

हें आपणाकडेंच येतें । राजी राखिजे समस्तें ।
देहासि बरें करावें तें । आत्मयास पावे ॥ १५ ॥
जगदात्मा प्रसन्न होईल असे करणे आपल्याच हातात आहे. सर्व प्राणिमात्रांना प्रसन्न राखावे. देहाला बरे केले की, ते त्या देहधारकाच्या आत्म्यास पावते. (१५)

दुर्जन प्राणी त्यांतील देव । त्याचा लाताड स्वभाव ।
रागास आला जरी राव । तरी तंडों नये कीं ॥ १६ ॥
दुर्जन प्राणी असतो, त्याच्याही अंतरात देव असतो, पण त्याचा स्वभाव लाथाड असतो. दुर्जनामुळे अंतरात्म्यास जरी राग आला, तरी भांडण करू नये. (१६)

प्रसंगीं सांडीच करणें । पुढें विवेकें विवरणें ।
विवेक सज्जनचि होणें । सकळ लोकीं ॥ १७ ॥
प्रसंगी सोडून द्यावे आणि विवेकाने विवरण करून सर्व लोकांत आपण सज्जनाप्रमाणेच वागावे. (१७)

आत्मत्वीं दिसतो भेद । हा अवघाचि देहसमंध ।
येका जीवनें नाना स्वाद । औषधीभेदें ॥ १८ ॥
या देहाच्या संबंधामुळेच आत्म्याच्या ठिकाणी भेद दिसतो. पाणी एकच असते. पण औषधींच्या भेदाने ते नाना चवींचे होते. (१८)

गरळ आणि अमृत जालें । परी आपपण नाहीं गेलें ।
साक्षत्वें आत्मयास पाहिलें । पाहिजे तैसें ॥ १९ ॥
जलच विष होते व अमृतही होते, पण त्याचे आपपण म्हणजे जलत्व जात नाही. हे जसे, तसेच साक्षित्वाने आत्म्यास सर्व ठिकाणी पाहिले पाहिजे. (१९)

अंतरिनिष्ठ जो पुरुष । तो अंतरनिष्ठेनें विशेष ।
जगामधें जो जगदीश । तो तयास वोळखे ॥ २० ॥
अंतरनिष्ठ जो पुरुष असतो, तो विशेष अंतरनिष्ठेच्या योगाने जगात जो जगदीश आहे, त्याला ओळखतो. (२०)

नयनेंचि पाहावा नयेन । मनें शोधावें मन ।
तैसाचि हा भगवान । सकळां घटीं ॥ २१ ॥
डोळ्याने डोळा पाहावा, मनानेच मनाचा शोध घ्यावा, त्याचप्रमाणे आपल्या अंतरात्म्याच्या योगे सर्वांच्या ठिकाणी असलेल्या अंतरात्म्यास ओळखावे. (२१)

तेणेंविण कार्यभाग आडे । सकळ कांहीं तेणेंचि घडे ।
प्राणी विवेकें पडावे । तेणेंचि योगें ॥ २२ ॥
त्या अंतरात्म्यावाचून कुठलेही कार्य होऊ शकत नाही. सर्व काही त्याच्यामुळेच घडते. त्याच्यामुळेच प्राणी विवेक करू शकतो. (२२)

जागृतीस व्यापार घडतो । समंध तयासीच पडतो ।
स्वप्नामधें घडे जो तो । येणेंचि न्यायें ॥ २३ ॥
जागृतीत जो व्यवहार होतो, तोही अंतरात्म्याच्या संबंधानेच होतो. स्वप्नातही जे काही घडते, तेही अंतरात्म्याच्या योगेच घडते. (२३)

अखंड ध्यानाचें लक्षण । अखंड देवाचें स्मरण ।
याचें कळतां विवरण । सहजचि घडे ॥ २४ ॥
आता जे विवरण सांगितले, ते नीट कळले म्हणजे मग सहजच अखंड देवाचे स्मरण होते आणि अखंड ध्यानाचे हेच लक्षण आहे. (२४)

सहज सांडून सायास । हाचि कोणीयेक दोष ।
आत्मा सांडून अनात्म्यास । ध्यानीं धरिती ॥ २५ ॥
सहज सोडून उगीच सायास करणे हाच मोठा दोष आहे. आत्म्यास सोडून लोक अनात्म्याचे ध्यान धरतात. (२५)

परी तें धरितांहि धरेना । ध्यानीं येती वेक्ति ना ।
उगेंचि कष्टती मना । कासाविस करूनी ॥ २६ ॥
पण प्रयत्न करूनही ते साध्य होत नाही. ध्यानात नाना व्यक्ती येतात. लोक मनाला कासावीस करून उगीचच कष्टी होतात. (२६)

मूर्तिध्यान करिता। सायासें । तेथें येकाचें येकचि दिसे ।
भासों नये तेंचि भासे । विलक्षण ॥ २७ ॥
मोठ्या प्रयत्नाने मूर्तीचे ध्यान करू लागावे, तर एकाऐवजी दुसरे भलतेच दिसते. जे भासू नये असे विलक्षण दुसरेच भासू लागते. (२७)

ध्यान देवाचें करावें । किंवा देवाल्याचें करावें ।
हेंचि बरें विवरावें । आपले ठाईं ॥ २८ ॥
आपण ध्यान देवाचे करायचे की देवालयाचे याचा प्रत्येकाने स्वत:शीच विचार करून पाहावा. (२८)

देह देउळ आत्मा देव । कोठें धरूं पाहातां भाव ।
देव वोळखोन जीव । तेथेंचि लावावा ॥ २९ ॥
देह हे देऊळ आहे आणि आत्मा हा देव आहे, म्हणून हे ओळखून भावभक्तीने त्या देवाच्या ठिकाणीच जीव लावावा. (२९)

अंतरनिष्ठा ध्यान ऐसें । दंडकध्यान अनारिसें ।
प्रत्ययेविण सकळ पिसें । अनुमानध्यान ॥ ३० ॥
अंतर्निष्ठ ध्यान हे अशा प्रकारचे असते. दंडक ध्यान म्हणजे रूढ पद्धतीनुसार केलेले ध्यान वेगळेच असते. अनुभवाशिवायचे ध्यान त्यास अनुमानावर आधारलेले ध्यान म्हणून अनुमान ध्यान म्हटले असून, तो शुद्ध वेडेपणा होय. (३०)

अनुमानें अनुमान वाढे । ध्यान धरितां सवेंचि मोडे ।
उगेचि कष्टती बापुडे । स्थूळध्यानें ॥ ३१ ॥
कल्पनेने कल्पना वाढत जाते आणि ध्यान धरलेले असते, ते मोडते. स्थूल ध्यानाच्या योगे लोक बापडे उगीचच कष्टी होतात. (३१)

देवास देहधारी कल्पिती । तेथें नाना विकल्प उठती ।
भोगणें त्यागणें विपत्ति । देहयोगें ॥ ३२ ॥
देवाला देहधारी समजतात. त्यामुळे तेथे नाना विकल्प उठतात. देहाच्या योगे भोगणे, त्यागणे, विपत्ती हे सर्वच येते. (३२)

ऐसें मनी आठवतें । विचारितां भलतेंचि होतें ।
दिसों नये तें दिसतें । नाना स्वप्नीं ॥ ३३ ॥
अशा तहेने मनात विचार सुरू होतात. त्यामुळे भलतेच होते. अनेक प्रकारची स्वप्ने पडून जे दिसू नये ते दिसते. (३३)

दिसतें तें सांगतां न ये । बळें भावर्थ धरितां नये ।
साधक कासाविस होये । अंतर्यामीं ॥ ३४ ॥
जे दिसते ते कुणाला सांगता येत नाही. बळजबरीने भाव टिकू शकत नाही. त्यामुळे साधक अंतर्यामी कासावीस होतो. (३४)

सांगोपांग घडे ध्यान । त्यास साक्ष आपुलें मन ।
मनामध्यें विकल्पदर्शन । होऊंच नये ॥ ३५ ॥
सांगोपांग ध्यान घडते की नाही, याला आपले मन साक्षी असते, म्हणून आपल्याला मनोमनी ते कळते. मनात कुठलाही विकल्प उठताच कामा नये. (३५)

फुटक मन येकवटिलें । तेणें तुटक ध्यान केलें ।
तेथें कोण सार्थक जालें । पाहाना कां ॥ ३६ ॥
इतरत्र वावरत असलेले मन एकाग्र करण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तुटके म्हणजे खंडित ध्यान केले, तर तेथे कोणते सार्थक झाले? जरा विचार करून पहा ना! (३६)

अखंड ध्यानें न घडे हित । तरी तो जाणावा पतित ।
हाचि अर्थ सावचित । बरा पाहावा ॥ ३७ ॥
अखंड ध्यान धरूनही जर हित होत नसेल, तर तो मनुष्य पतित जाणावा. पण असे होणे शक्य नाही, म्हणून नीट विचार करून पाहावा. (३७)

ध्यान धरितें तें कोण । ध्यानीं आठवतें तें कोण ।
दोनीमधें अनन्य लक्षण । असिलें पाहिजे ॥ ३८ ॥
ध्यान धरणारा कोण असतो? जे ध्यानात आठवते तो कोण? या दोघांमध्ये एकात्मभाव असला पाहिजे.(३८)

अनन्य सहजचि आहे । साधक शोधून न पाहे ।
ज्ञानी तो विवरोन राहे । समाधानें ॥ ३९ ॥
खरे तर अनन्य हे स्वाभाविकच आहे. पण साधक शोधूनच पाहात नाही. ज्ञानी असतो तो विवरून स्वानुभवाने जाणतो आणि म्हणून समाधान पावतो. (३९)

ऐसीं हे प्रत्ययाची कामें । प्रत्ययेंविण बाधिजे भ्रमें ।
लोकदंडकसंभ्रमें । चालती प्राणी ॥ ४० ॥
अशा या सर्व अनुभवाच्या गोष्टी आहेत. अनुभव नसेल, तर भ्रम उत्पन्न होतो. लोकरूढीला धरून लोक भ्रमाने वागतात. (४०)

दंडकध्यानाचें लक्षण । धरून बैसलें अवलक्षण ।
प्रमाण आअणि अप्रमाण । बाजारी नेणती ॥ ४१ ॥
रूढ पद्धतीनुसार ध्यानाचे लक्षण मनात धरून बसतात. हेच अवलक्षण होय. प्रमाण काय, अप्रमाण काय, हे अध्यात्माचा बाजार मांडणारे लोक जाणत नाहीत. (४१)

मिथ्या समाचार उठविती । बाउग्याच बोंबा घालिती ।
मनांस आणितां अंतीं । आवघेंचि मिथ्या ॥ ४२ ॥
असे बाजारी लोक खोट्याच अफवा उठवतात, उगीचच शिव्या देतात, पण नीट विचार केल्यावर हे सर्व खोटे आहे, हे कळून येते. (४२)

कोणीयेक ध्यानस्त बैसला । कोणीयेक सिकवी त्याला ।
मुकुट काढूनि माळ घाला । म्हणिजे बरें ॥ ४३ ॥
कोणी एक साधक ध्यानाला बसला. त्याला दुसरा कोणी एक शिकवू लागला. ‘मुकूट काढून माळ घाल म्हणजे बरे’ असे तो म्हणाला. (४३)

मनाचेथें काये दुष्काळ । जे आखुड कल्पिती माळ ।
सांगते ऐकते केवळ । मूर्ख जाणावे ॥ ४४ ॥
सर्व मनानेच कल्पायचे, मग तेथे कुठल्या गोष्टीची कमतरता आहे? म्हणून त्याने कल्पना केली की माळ आखूड आहे, म्हणून मुकूट काढून ती घालावी. याप्रमाणे सांगणारा आणि ऐकणारा दोघेही मूर्खच जाणावेत. (४४)

प्रत्यक्ष कष्ट करावे न लगती । दोरे फुलें गुंफावी न लगती ।
कल्पनेची माळ थिटी करिती । काये निमित्य ॥ ४५ ॥
ध्यानात प्रत्यक्ष कष्ट करावे लागत नाहीत. दोऱ्यात फुले गुंफावी लागत नाहीत आणि तरी कल्पनेतील माळ ही आखूड करतात, ती कोणत्या कारणाने? (४५)

बुधीविण प्राणी सकळ । ते ते अवघेचि बाष्कळ ।
तया मुर्खासीं खळखळ । कोणें करावी ॥ ४६ ॥
बुद्धीशिवाय जे प्राणी ते अवघे निर्बुद्धच समजावेत. त्या मूर्खाशी वादविवाद कोणी करावा? (४६)

जेणें जैसा परमार्थ केला । तैसाच पृथ्वीवरी दंडक चालिला ।
साता पांचाचा बळावला । साभिमान ॥ ४७ ॥
त्याने जसा परमार्थ केलेला असतो, तशी रूढी पडते. पाच-सात अनुयायी मिळून अट्टहासाने पंथ पुढे रेटला जातो. किंवा अशा पंथात सात म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, शोक, भय व अज्ञान; आणि पाच म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध या पाच विषयांची गडबडच अहंकाराने बळावते. (४७)

प्रत्ययेंविण साभिमान । रोगी मारिले झांकून ।
तेथें अवघाची अनुमान । ज्ञान कैंचें ॥ ४८ ॥
अनुभवाशिवाय अभिमान करणे म्हणजे रोगी झाकून त्याला मारण्यासारखे आहे. सर्वच अनुमान असेल तेथे ज्ञान कसे असणार? (४८)

सर्व साभिमान सांडावा । प्रत्ययें विवेक मांडावा ।
माया पूर्वपक्ष खंडावा । विवेकबळें ॥ ४९ ॥
सर्व अभिमान सोडून द्यावा. अनुभवाने विवेक प्रतिपादावा. मायेच्या पूर्वपक्षाचे विवेकाच्या बळाने खंडण करावे आणि परमात्मप्राप्ती करून घ्यावी. (४९)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
अखंडध्याननिरूपणनाम समास आठवा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘अखंडध्याननिरूपणनाम’ समास आठवा समाप्त.


समास नववा : शाश्वत निरूपण
॥ श्रीराम ॥

पिंडाचें पाहिलें कौतुक । शोधिला आत्मानात्मा विवेक ।
पिंड अनात्मा आत्मा येक । सकळ कर्ता ॥ १ ॥
श्रीसमर्थ सांगतात की, आपण पिंडाचे कौतुक पाहिले नंतर आत्मानात्मविवेकाने त्याचा शोध घेतला आणि या निर्णयापर्यंत पोहोचलो की, पिंड हा अनात्मा आहे. आत्मा हा एकच असून, तोच सर्वांचा कर्ता आहे. (१)

आत्म्यास अनन्यता बोलिली । ते विवेकें प्रत्यया आली ।
आतां पाहिजे समजली । ब्रह्मांडरचना ॥ २ ॥
आत्मा हेच आपले स्वरूप आहे. अशा प्रकारे आत्म्याची अनन्यता विवेकाने आपल्या अनुभवास आली. आता ब्रह्मांडाची रचना समजून घेणे आवश्यक आहे. (२)

आत्मानात्माविवेक पिंडी । सारासारविचार ब्रह्मांडी।
विवरविवरों हे गोडी । घेतली पाहिजे ॥ ३ ॥
पिंडाची रचना आत्मानात्मविवेकाने जाणून घ्यावी आणि ब्रह्मांडाची रचना सारासारविवेकाने जाणावी. त्याचे सतत विवरण करून गोडी उत्पन्न होईल, असा प्रयत्न केला पाहिजे. (३)

पिंड कार्य ब्रह्मांड कारण । याचें करावें विवरण ।
हेंचि पुढें निरूपण । बोलिलें असे ॥ ४ ॥
पिंड हे कार्य आहे आणि ब्रह्मांड हे कारण आहे. याचे विवरण पुढील निरूपणात केले आहे. (४)

असार म्हणिजे नासिवंत । सार म्हणिजे तें शाश्वत ।
जयास होईल कल्पांत । तें सार नव्हे ॥ ५ ॥
असार म्हणजे नाशिवंत आणि सार म्हणजे जे शाश्वत असते ते. ज्यास कल्पांत होतो ते सार नव्हे. (१५)

पृथ्वी जळापासून जाली । पुढें ते जळीं मिळाली ।
जळाची उत्पत्ति वाढली । तेजापासुनी ॥ ६ ॥
पृथ्वी जलापासून झाली आणि पुढे ती जलात विरघळून गेली. जलाची उत्पत्ती तेजापासून झाली. (६)

ते जळ तेजें शोषिलें । महत्तेजें आटोन गेलें ।
पुढें तेजचि उरलें । सावकाश ॥ ७ ॥
ते जल तेजाने शोषले, महत्तेजाने ते आटूनच गेले आणि केवळ तेजच उरले.

तेज जालें वायोपासुनी । वायो झडपी तयालागुनी ।
तेज जाउनी दाटणी । वायोचीच जाली ॥ ८ ॥
तेज वायूपासून झाले. त्याला वायू झडपून, विझवून टाकतो. तेज जाऊन सर्वत्र वायूचीच दाटी झाली.(८)

वायो गगनापासुनी जाला । मागुतां तेथेंचि विराला ।
ऐसा हा कल्पांत बोलिला । वेदांतशास्त्रीं ॥ ९ ॥
वायू गगनापासून झाला आणि शेवटी तेथेच लय पावला. अशा प्रकारे कल्पांताचे वर्णन वेदांतशास्त्रात केले आहे. (९)

गुणमाया मूळमाया । परब्रह्मीं पावती लया ।
तें परब्रह्म विवराया । विवेक पाहिजे ॥ १०
गुणमाया आणि मूळ माया परब्रह्माच्या ठायी लय पावतात. या परब्रह्माचे विवरण करण्यासाठी विवेक पाहिजे. (१०)

सर्व उपाधींचा सेवट । तेथें नाहीं दृश्य खटपट ।
निर्गुण ब्रह्म घनदाट । सकळां ठाईं ॥ ११ ॥
सर्व उपाधींचा शेवट जेथे होतो, जेथे दृश्याचा काहीच मागमूस नसतो. फक्त सर्व ठायी निर्गुण ब्रह्म ओतप्रोत भरून राहिलेले असते. (११)

उदंड कल्पांत जाला । तरी नाश नाहीं तयाला ।
मायात्यागें शाश्वताला । वोळखावें ॥ १२ ॥
फार मोठा प्रलय जरी झाला तरी परब्रह्म नाश पावत नाही, म्हणून विवेकाने मायेचा त्याग करून शाश्वत ब्रह्मास अनुभवाने जाणावे. (१२)

देव अंतरात्मा सगुण । सगुणें पाविजे निर्गुण ।
निर्गुणज्ञानें विज्ञान । होत असे ॥ १३ ॥
अंतरात्माच सगुण देव होय. त्याच्या योगाने निर्गुणाची प्राप्ती करून घ्यावी. निर्गुणाच्या ध्यानाने तद्रूप असल्याचा साधकाला अनुभव येऊ लागतो. त्यालाच विज्ञान म्हणतात. (१३)

कल्पनेतीत जें निर्मळ । तेथें नाहीं मायामळ ।
मिथ्यत्वें दृश्य सकळ । होत जातें ॥ १४ ॥
परब्रह्म हे कल्पनातीत असून निर्मळ असते. त्याच्या ठिकाणी मायारूपी मळ नसतो. स्वात्मानुभव आला की, सर्व दृश्य हे मिथ्या आहे हे कळते, म्हणजेच ते असून नसल्यासारखे होते. (१४)

जें होते आणि सवेंचि जातें । तें तें प्रत्ययास येतें ।
जेथें होणें जाणें नाहीं तें । विवेकें वोळखावे ॥ १५ ॥
जे जे उत्पन्न होते, ते ते सहज नाश पावते, हे तर प्रत्यक्ष अनुभवास येते. म्हणून विवेकाने ज्याला उत्पन्न होणे आणि नाश पावणे नाही ते शाश्वत ब्रह्म जाणून घ्यावे. (१५)

येक ज्ञान येक अज्ञान । येक जाणावें विपरीत ज्ञान ।
हे त्रिपुटी होये क्षीण । तेंचि विज्ञान ॥ १६ ॥
एक ज्ञान (म्हणजे ‘अहं ब्रह्मास्मि’) दुसरे अज्ञान म्हणजे आपले खरे स्वरूप न जाणणे, आणि तिसरे विपरीत ज्ञान म्हणजे मी देहच आहे असे समजणे, ही त्रिपुटी जेव्हा नाहीशी होते, तेव्हा साधकाला स्वस्वरूपानुभव येऊन जीवब्रह्मैक्य होते, तेच विज्ञान होय. (१६)

वेदांत सिधांत धादांत । याची पाहावी प्रचित ।
निर्विकार सदोदित । जेथें तेथें ॥ १७ ॥
वेदान्त- शास्त्रप्रचीती, सिद्धान्त (गुरुप्रचीती) व धादान्त म्हणजे आत्मप्रचीती यांचा साक्षात अनुभव घ्यावा. निर्विकार परब्रह्म हे जेथल्या तेथे जसेच्या तसे असते हे जाणून घ्यावे. (१७)

तें ज्ञानदृष्टीनें पाहावें । पाहोन अनन्य राहावें
मुख्य आत्मनिवेदन जाणावें । याचें नांव ॥ १८ ॥
ज्ञानदृष्टीने त्याचा साक्षात अनुभव घ्यावा आणि त्याच्याशी एकरूप होऊन राहावे. याचेच नाव मुख्य आत्मनिवेदन होय. (१८)

दृश्यास दिसते दृश्य । मनास भासतो भास ।
दृश्यभासातीत अविनाश । परब्रह्म तें ॥ १९ ॥
दृश्याला दृश्य दिसते, मनाला भास भासतो. दृश्य आणि भास यांच्या पलीकडे असते, ते अविनाशी परब्रह्म जाणावे. (१९)

पाहों जातां दुरीच्या दुरी । परब्रह्म सबाहेअंतरीं ।
अंतचि नाहीं अनंत सरी । कोणास द्यावी ॥ २० ॥
परब्रह्माला चर्मचक्षूने पाहू गेले, तर ते दिसू शकत नाही. पण वास्तविक परब्रह्म सर्व दृश्य जगताच्या अंतर्बाह्य ओतप्रोत भरलेले आहे. त्याला अंतच नाही. त्या अनंताची बरोबरी कोण करू शकणार बरे? (२०)

चंचळ तें स्थिरावेना । निश्चळ तें कदापी चळेना ।
आभाळ येतें जातें गगना । चळण नाहीं ॥ २१ ॥
जे चंचळ असते ते कधी स्थिर राहू शकत नाही. जे निश्चळ असते ते कधीही चळत नाही. गगनात आभाळ म्हणजे ढग येतात आणि जातात, पण गगन चळत नाही. ते निश्चळ जसेच्या तसेच असते. (२१)

जें विकारें वाढें मोडे । तेथें शाश्वतता कैंची घडे ।
कल्पांत होताच विघडे । सकळ कांहीं ॥ २२ ॥
जे विकार पावते, वाढते आणि मोडते ते शाश्वत कसे बरे असू शकेल? कल्पांत होतो तेव्हा सर्व पंचभौतिक सृष्टी नाश पावते. (२२)

जे अंतरींच भ्रमलें । मायासंभ्रमें संभ्रमलें ।
तयास हें कैसें उकले । आव्हाट चक्र ॥ २३ ॥
ज्याच्या अंत:करणात मायेच्या योगाने भ्रम उत्पन्न झालेला असतो, अशा संभ्रमित लोकांना या अफाट चक्राचा उलगडा कसा होणार? (२३)

भिडेनें वेव्हार निवडेना । भिडेनें सिधांत कळेना ।
भिडेनें देव आकळेना । आंतर्यामीं ॥ २४ ॥
अशा संभ्रमित माणसाला व्यवहार कसा करावा हेही कळत नाही. त्याला सिद्धान्तही कळत नाही आणि अंतर्यामीच असलेल्या देवाचाही शोध लागत नाही. (२४)

वैद्याची प्रचित येईना । आणी भीडहि उलंघेना ।
तरी मग रोगी वांचेना । ऐसें जाणावें ॥ २५ ॥
वैद्याच्या औषधाचा गुणही येत नाही आणि त्याची भीडही मोडता येत नाही, अशी जेव्हा स्थिती होते, तेव्हा रोगी आता जगणार नाही, असे जाणावे. (२५)

जेणें राजा वोळखिला । तो राव म्हणेना भलत्याला ।
जेणें देव वोळखिला । तो देवरूपी ॥ २६ ॥
जो राजाला नीट ओळखत असतो, तो भलत्या माणसाला राजा म्हणत नाही. ज्याने देव ओळखलेला असतो, तो स्वतः देवरूपच होतो. (२६)

जयास माईकाची भीड । तें काये बोलेल द्वाड ।
विचार पाहातां उघड । सकळ कांहीं ॥ २७ ॥
ज्याला मायिकाची भीड पडते तो अर्धवट ज्ञानी देवाबद्दल काय सांगणार? त्याने जर सारासारविवेक केला तर त्याला सर्व काही स्पष्टपणे कळून येईल. (२७)

भीड मायेऐलिकडे । परब्रह्म तें पैलीकडे ।
पैलीकडे ऐलीकडे । सदोदित ॥ २८ ॥
अज्ञान हे मायेच्या अलीकडे असते आणि परब्रह्म मायेच्या पलीकडे असते. माया सदोदित अलीकडे आणि परब्रह्म पलीकडेच असते. (२८)

लटिक्याची भीड धरणें । भ्रमें भलतेंचि करणें ।
ऐसी नव्हेंतीलक्षणें । विवेकाचीं ॥ २९ ॥
जी माया मिथ्या आहे, तिची भीड धरून भ्रमाने भलतेच करणे हे विवेकाचे लक्षण नव्हे. (२९)

खोटें आवघेंचि सांडावें । खरें प्रत्ययें वोळखावें ।
मायात्यागें समजावें । परब्रह्म ॥ ३० ॥
जे खोटे आहे, त्या सर्वांचा त्याग करावा आणि अनुभवाने खरे ओळखावे. मायेचा त्याग करून परब्रह्म जाणून घ्यावे. (३०)

तें मायेचें जें लक्षण । तेंचि पुढें निरूपण ।
सुचितपणें विवरण । केलें पाहिजे ॥ ३१ ॥
त्या मायेच्या लक्षणाचे वर्णन पढील समासात केले आहे. त्याचे शांत चित्ताने मनन केले पाहिजे. (३१)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
शाश्वतनिरूपणनाम समास नववा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘शाश्वतनिरूपणनाम’ समास नववा समाप्त.


समास दहावा : मायानिरूपण
॥ श्रीराम ॥

माया दिसे परी नासे । वस्तु न दिसे परी न नासे ।
माया सत्य वाटे परी मिथ्या असे । निरंतर ॥ १ ॥
श्रीसमर्थ सांगतात की, माया दिसते पण ती नाश पावते. परब्रह्म वस्तू दिसत नाही, पण ती नाशही पावत नाही. माया सत्य वाटते खरी, पण ती निरंतर मिथ्याच असते. (१)

करंटा पडोनि उताणा । करी नानापरी कल्पना ।
परी तें कांहींच घडेना । तैसी माया ॥ २ ॥
एखादा भाग्यहीन माणूस काहीच उद्योग न करता उताणा पडून राहून नाना मनोराज्ये करीत असतो, तशीच माया जाणावी. (२)

द्रव्यदारेचें स्वप्नवैभव । नाना विळासें हावभाव ।
क्षणीक वाटे परी भाव । तैसी माया ॥ ३ ॥
स्वप्नांत द्रव्य आणि स्त्री यांचे कितीही वैभव आणि हावभाव, नाना विलास आदी दिसतात आणि क्षणभर म्हणजे स्वप्न असेपर्यंत ते खरेही वाटतात. पण ते वास्तविक मिथ्या असतात, तशीच माया जाणावी. (३)

गगनीं गंधर्वनगरें । दिसताती नाना प्रकारें ।
नाना रूपें नाना विकारें । तैसी माया ॥ ४ ॥
आकाशात नाना प्रकारची, नाना रूपे, नाना विकारांनी युक्त अशी गंधर्वनगरे दिसतात, पण तो आभास असतो आणि क्षणभंगुर असतो. तशीच माया जाणावी. (४)

लक्षुमी रायेविनोदाची । बोलतां वाटे साची ।
मिथ्या प्रचित तेथीची । तैसी माया ॥ ५ ॥
बहुरूप्याची लक्ष्मी जेव्हा तो बोलत असतो तेव्हा खरी वाटते, पण त्याची ती लक्ष्मी म्हणजेच वैभव जसे मिथ्या असते, तशीच माया मिथ्या जाणावी. (५)

दसयाचे सुवर्णाचे लाटे । लोक म्हणती परी ते कांटे ।
परी सर्वत्र राहाटे । तैसी माया ॥ ६ ॥
दसऱ्याचे सोने त्या वेळी लोक जरी मान्य करतात, तरी वास्तविक ते काटे असतात. पण तरी खरे मानून लोकव्यवहार चालतो, तशी माया होय. (६)

मेल्याचा मोहोछाव करणें । सतीचें वैभव वाढविणें ।
मसणीं जाउनी रुदन करणें । तैसी माया ॥ ७ ॥
मेलेल्या माणसानिमित्त महोत्सव करणे, सतीचे वैभव वाढविणे आणि स्मशानात जाऊन रडणे, त्याप्रमाणे माया जाणावी. (७)

राखेसी म्हणती लक्षुमी । दुसरी भरदोरी लक्षुमी ।
तिसरी नाममात्र लक्षुमी । तैसी माया ॥ ८ ॥
ठेवलेल्या स्त्रीला लक्ष्मी म्हणतात. तसेच भारदोरीला (म्हणजे गर्भपात थांबविणारी मंत्रित दोरी) ही दुसरी लक्ष्मी म्हणतात, तिसरी कुणी स्त्री नावाची लक्ष्मी असते, तशी माया होय. (८)

मुळीं बाळविधवा नारी । तिचें नांव जन्मसावित्री ।
कुबेर हिंडे घरोघरी । तैसी माया ॥ ९ ॥
मुळात जी स्त्री बालविधवा आहे पण तिचे नाव मात्र जन्मसावित्री असावे आणि ज्याचे नाव कुबेर आहे पण त्याने दारोदारी भिक्षा मागत हिंडावे,तशी माया जाणावी. (९)

दशावतारांतील कृष्णा । उपजे जीर्ण वस्त्रांची तृष्णा ।
नदी नामें पीयुष्णा । तैसी माया ॥ १० ॥
दशावतारी नाटकात कृष्णाचे काम करणारा नाटकात द्रौपदीला वस्त्रे पुरवितो आणि खेळ संपल्यावर कुणी आपल्याला जुनेपाने वस्त्र तरी द्यावे, अशी आशा करीत असतो. किंवा थोडेसे पाणी असणान्या नदीचे नाव मात्र ‘पीयुष्णा’ म्हणजे ‘अमृताची नदी’ असावे, तशी माया असते. (१०)

बहुरूपांतील रामदेवराव । ग्रामस्तांपुढे दाखवी हावभाव ।
कां माहांराज म्हणोनि लाघव । तैसी माया ॥ ११ ॥
बहुरूप्याच्या खेळात एखादा रामदेवराव म्हणजे श्रीमंत राजाचे सोंग आणून लोकांपुढे त्याप्रमाणे हावभाव करतो. पण नंतर लोकांकडे महाराज म्हणून पै-पैसा मागतो. त्याच्यासारखीच माया आहे. (११)

देव्हारां असे अन्नपूर्णा । आणी गृहीं अन्नचि मिळेना ।
नामें सरस्वती सिकेना । शुभावळु ॥ १२ ॥
देव्हाऱ्यात अन्नपूर्णा आहे आणि घरात खायला अन्न मिळत नाही. एखाद्या स्त्रीचे नाव सरस्वती आहे, पण ती शिकत नाही, आणि गोक्या थापते, (१२)

सुण्यास व्याघ्र नाम ठेविलें । पुत्रास इंद्रनामें पाचारिलें ।
कुरूप परी आळविलें । सुंदरा ऐसें ॥ १३ ॥
कुत्र्याला वाघ्या नाव ठेवावे, पुत्राला इंद्र नाव ठेवावे आणि कुरूप स्त्रीला सुंदरा म्हणून आळवावे, (१३)

मूर्ख नामें सकळकळा । राशभी नामें कोकिळा ।
नातरी डोळसेचा डोळा । फुटला जैसा ॥ १४ ॥
एखाद्या मूर्खाला सकलकलाविद्यासंपन्न म्हणावे. एखादीचा आवाज गाढवीसारखा असता तिला कोकिळा म्हणावे, डोळा फुटलेल्या माणसाला डोळस म्हणावे, (१४)

मातांगीचें नाम तुळसी । चर्मिकीचें नाम कासी ।
बोलती अतिशूद्रिणीसी । भागीरथी ऐसें ॥ १५ ॥
मांगिणीचे नाव तुळशी असावे, चांभारणीचे नाव काशी असावे आणि अतिशूद्र स्त्रीला भागीरथी म्हणावे, (१५)

साउली आणी अंधकार । येक होतां तेथीचा विचार ।
उगाचि दिसे भासमात्र । तैसी माया ॥ १६ ॥
सावली आणि अंधार एक झाल्यावर जशी स्थिती होते आणि अंधुक प्रकाशामुळे उगाच भास मात्र होतात, तशी माया असते. (१६)

श्रवण बोटें संधी करतळ । रविरश्में दिसती इंगळ ।
रम्य आरक्तकल्होळ । तैसी माया ॥ १७ ॥
आपले कान, बोटे, सांधे आणि तळहात हे सूर्यप्रकाशात इंगळासारखे म्हणजे लाल लाल अति रम्य दिसतात, तशी माया भासमय जाणावी. (१७)

भगवें वस्त्र देखतां मनाला । वाटे अग्नचि लागला ।
विवंचितां प्रत्ये आला । तैसी माया ॥ १८ ॥
भगवे वस्त्र पाहिल्यावर मनाला आग लागल्यासारखे वाटते. पण विचार केल्यावर प्रत्यय येतो, तशी माया आहे. (१८)

जळीं चरणकरांगुळें । आखुड लांबें जिरकोळें ।
विपरीत काणें दिसती जळें । तैसी माया ॥ १९ ॥
पाण्यात हातपाय ठेवले की बोटे आखूड, लांब, बारीक दिसतात. पाण्यामुळे ती विपरीत वाकडी-तिकडी दिसतात, तशी माया जाणावी. (१९)

भोवंडीनें पृथ्वी कलथली । कामिणीनें पिवळी जाली ।
सन्यपातस्थां अनुभवली । तैसी माया ॥ २० ॥
भोवळ येणाऱ्या माणसाला पृथ्वी कलंडलेली दिसते. काविळीने ती पिवळी दिसते. सन्निपात झालेल्या माणसाला ती वेगळीच अनुभवास येते, तशी माया जाणावी. (२०)

कोणीयेक पदार्थविकार । उगाचि दिसे भासमात्र ।
अनन्याचा अन्य प्रकार । तैसी माया ॥ २१ ॥
एखादा पदार्थ विकारामुळे उगीचच वेगळाच भासतो. असते एक आणि दिसते मात्र भलतेच. तशी माया जाणावी. (२१)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
मायानिरूपणनाम समास दहावा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘मायानिरूपणनाम’ समास दहावा समाप्त.

॥ दशक चवदावा समाप्त ॥


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: satsangdhara

दासबोध दशक चवदावा – dasbodh 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *