दासबोध दशक विसावा

दासबोध दशक सोळावा

दासबोध दशक सोळावा विडिओ सहित



॥ श्रीमत् दासबोध ॥
॥ दशक सोळावा : सप्ततिन्वय

समास पहिला : वाल्मीकि स्तवननिरूपण
॥ श्रीराम ॥

धन्य धन्य तो वाल्मीक । ऋषीमाजी पुण्यश्लोक ।
जयाचेन हा त्रिलोक्य । पावनजाला ॥ १ ॥
ज्याच्या योगे त्रैलोक्य पावन झाले असे ते ऋर्षीमध्ये पुण्यश्लोक गणले गेलेले वाल्मीकी खरोखरच धन्य धन्य आहेत. (१)

भविष्य आणी शतकोटी । हें तों नाहीं देखिलें दृष्टीं ।
धांडोळितां सकळ सृष्टि । श्रुत नव्हे ॥ २ ॥
भविष्यकाळी घडणारे आणि ते सुद्धा शतकोटी संख्यायुक्त रामायण ज्यांनी आधीच लिहिले त्यांच्याबद्दल काय म्हणावे ? सर्व सृष्टी धुंडाळली तरी अशी गोष्ट कुठेही ऐकण्यात किंवा पाहण्यात येत नाही. (२)

भविष्याचें येक वचन । कदाचित जालें प्रमाण ।
तरी आश्चिर्य मानिती जन । भूमंडळीचे ॥ ३ ॥
या जगात भविष्यात घडणाऱ्या गोष्टीसंबंधी एखादे वचन जरी खरे ठरले, तरी लोकांना आश्चर्य वाटते. (३)

नसतां रघुनाथावतार । नाहीं पाहिला शास्त्राधार ।
रामकथेचा विस्तार । विस्तारिला जेणें ॥ ४ ॥
ज्या वेळी रघुनाथाचा अवतारही झालेला नव्हता, अशा वेळी कुठलाही शास्त्राधार पाहिलेला नसता, वाल्मीकीने रामकथेचा इतका अफाट विस्तार केला. (४)

ऐसा जयाचा वाग्विळास । ऐकोनी संतोषला महेश ।
मग विभागिलें त्रयलोक्यास । शतकोटी रामायेण ॥ ५ ॥
असा त्यांचा तो वाग्विलास पाहून महेश अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी ते शतकोटी रामायण त्रैलोक्यासाठी तीन भागांत विभागले. (५)

ज्याचें कवित्व शंकरें पाहिलें । इतरां न वचे अनुमानलें ।
रामौपासकांसी जालें । परम समाधान ॥ ६ ॥
वाल्मीकींच्या कवित्वाची थोरवी फक्त शंकरच जाणू शकले. इतरांना त्याचे अनुमानही करता येणे शक्य नाही. त्यांच्या काव्यामुळे रामउपासकांना मात्र परम समाधान झाले. (६)

ऋषी होते थोर थोर । बहुतीं केला कवित्वविचार ।
परी वाल्मीकासारिखा कवेश्वर । न भूतो न भविष्यति ॥ ७ ॥
कित्येक थोर थोर ऋषी होऊन गेले. त्यातील अनेकांनी काव्यरचनाही केली. पण वाल्मीकींच्या सारखा कवीश्वर पूर्वी कधी झाला नाही आणि भविष्यकाळातही कोणी होणार नाही. (७)

पूर्वीं केली दृष्ट कर्में । परी पावन जाला रामनामें ।
नाम जपतां दृढ नेमें । पुण्यें सीमा सांडिली ॥ ८ ॥
पूर्वी त्यांनी खूप दुष्ट कर्मे केली, पण रामनामाने ते पावन झाले. दृढ नेमाने त्यांनी अखंड नाम जपल्यामुळे त्यांच्या पुण्याने सीमा ओलांडली. (८)

उफराटे नाम म्हणतां वाचें । पर्वत फुटले पापाचे ।
ध्वज उभारले पुण्याचे । ब्रह्मांडावरुते ॥ ९ ॥
त्यांनी उलट्या रामनामाचा मुखाने इतका जप केला की त्यांचे पूर्वीचे पर्वतासारखे प्रचंड पाप नष्ट झाले आणि ब्रह्मांडामध्ये त्यांच्या पुण्याचे ध्वज फडकत राहिले. (९)

वाल्मीकें जेथें तप केलें । तें वन पुण्यपावन जालें ।
शुष्क काष्ठीं अंकुर फुटले । तपोबळें जयाच्या ॥ १० ॥
ज्या वनात वाल्मीकींनी तप केले, ते वन पुण्याने पावन झाले. एवढेच नव्हे, तर त्यांच्या तपोबलाने शुष्क काष्ठालाही अंकुर फुटले. (१०)

पूर्वी होता वाल्हाकोळी । जीवघातकी भूमंडळीं ।
तोचि वंदिजे सकळीं । विबुधीं आणि ऋषेश्वरीं ॥ ११ ॥
पूर्वी ते वाल्या कोळी म्हणून ओळखले जात. सर्व जगात ते जीवघातकी म्हणून ज्ञात होते. तेच पुढे रामनामामुळे इतके थोर झाले की सगळे देव, विद्वान आणि ऋषीश्वर त्यांना वंदन करू लागले. (११)

उपरती आणि अनुताप । तेथें कैंचें उरेल पाप ।
देह्यांततपें पुण्यरूप । दुसरा जन्म जाला ॥ १२ ॥
ज्याला उपरती आणि पश्चात्ताप झाला असेल त्याचे पाप कसे शिल्लक राहील ? वाल्मीकींनी देहात असणारा जो देही अंतरात्मा, मीपण, त्याचा नाश होईपर्यंत केलेल्या तपामुळे त्यांचा जणू पुण्यरूपाने दुसरा जन्मच झाला. (१२)

अनुतापें आसन घातलें । देह्यांचें वारुळ जालें ।
तेंचि नाम पुढें पडिलें । वाल्मीक ऐसें ॥ १३ ॥
कृतकर्माचा अत्यंत पश्चात्ताप झाल्याने त्यांनी उलट्या रामनामाचा जप करण्यासाठी जे आसन घातले, ते देहावर वारूळ वाढले तरी त्यांना कळले नाही. त्यामुळेच वाल्मीकी हे नाव त्यांना पडले. (१३)

वारुळास वाल्मीक बोलिजे । म्हणोनि वाल्मीक नाम साजे ।
जयाच्या तीव्र तपें झिजे । हृदय तापसाचें ॥ १४ ॥
वारुळालाच वाल्मीक म्हणतात, म्हणूनच त्यांना वाल्मीकी हे नाव शोभून दिसले. त्यांची तपस्या पाहून तपस्वी लोकांच्या हृदयाचाही थरकाप होतो. (१४)

जो तापसांमाजीं श्रेष्ठ । जो कवेश्वरांमधें वरिष्ठ ।
जयाचें बोलणें पष्ट । निश्चयाचें ॥ १५ ॥
वाल्मीकी हे तपस्वांच्यामध्ये श्रेष्ठ, कवीश्वरांमध्ये वरिष्ठ असून त्यांचे बोलणे स्वानुभवाचे असल्याने निश्चयात्मक आणि स्पष्ट असते. (१५)

जो निष्ठावंतांचें मंडण । रघुनाथभक्तांचें भूषण ।
ज्याची धारणा असाधारण । साधकां सदृढ करी ॥ १६ ॥
वाल्मीकी हे त्यांच्या दृढ निष्ठेमुळे निष्ठावंतांमध्ये ते अलंकाराप्रमाणे शोभतात. रघुनाथभक्तांना ते भूषणास्पद वाटतात आणि त्यांची असाधारण धारणा साधकांना त्यांची धारणा सुदृढ करण्यास प्रेरणा देते. (१६)

धन्य वाल्मीक ऋषेश्वर । समर्थाचा कवेश्वर ।
तयासी माझा नमस्कार । साष्टांगभावें ॥ १७ ॥
ऋषीश्वर वाल्मीकी, जे श्रीराम समर्थांचे कवीश्वर आहेत, ते खरोखर धन्य आहेत. रामदास म्हणतात की, त्यांना माझा साष्टांग- भावे नमस्कार असो. (१७)

वाल्मीक ऋषी बोलिला नसता । तरी आम्हांसी कैंची रामकथा ।
म्हणोनियां समर्था । काय म्हणोनी वर्णावें ॥ १८ ॥
वाल्मीकी ऋषींनी जर रामायणरचना केली नसती, तर आम्हांला रामकथा कशी प्राप्त झाली असती ? म्हणून त्यांचे वर्णन कसे करावे हेच कळत नाही. (१८)

रघुनथकीर्ति प्रगट केली । तेणें तयची महिमा वाढली ।
भक्त मंडळी सुखी जाली । श्रवणमात्रें ॥ १९ ॥
रघुनाथकीर्ती रामायणरूपाने प्रगट केल्याने वाल्मीकींचा महिमाही वाढला. त्या रामायणाच्या केवळ श्रवणानेही भक्तमंडळी सुखी झाली. (१९)

आपुला काळ सार्थक केला । रघुनाथकीर्तिमधें बुडाला ।
भूमंडळीं उधरिला । बहुत लोक ॥ २० ॥
रघुनाथकीर्तीमध्ये, भक्तिरसात डुंबत राहून वाल्मीकींनी आपल्या जीवनातील काळ सार्थकी तर लावलाच, पण या पृथ्वीतलावरील अनेक लोकांचाही त्यांनी उद्धार केला. (२०)

रघुनाथ भक्त थोर थोर । महिमा जयांचा अपार ।
त्या समस्तांचा किंकर । रामदास म्हणे ॥ २१ ॥
जे थोर थोर रघुनाथभक्त होऊन गेले, त्या अपार महिमा असलेल्या समस्त रघुनाथभक्तांचा मी किंकर आहे, असे रामदास म्हणतात. (२१)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
वाल्मीकस्तवननिरूपणनाम समास पहिला ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘वाल्मीकिस्तवननाम’ समास पहिला समाप्त.


समास दुसरा : सूर्यस्तवननिरूपण
॥ श्रीराम ॥

धन्य धन्य हा सूर्यवौंश । सकळ वौंशामधें विशेष ।
मार्तंडमंडळाचा प्रकाश । फांकला भूमंडळीं ॥ १ ॥
श्री समर्थ म्हणतात की, जगात अनेक वंश आहेत, पण त्या सर्वांमध्ये सूर्यवंश हा विशेष असल्याने तो खरोखरच धन्य धन्य आहे. सर्व पृथ्वीतलावर सूर्यमंडलाचा प्रकाश पसरलेला आहे. (१)

सोमाआंगीं आहे लांछन । पक्षा येका होय क्षीण ।
रविकिर्ण फांकता आपण । कळाहीन होये ॥ २ ॥
चंद्रबिंबावर कलंक असतो, शिवाय तो एका पंधरवड्यात क्षीण होत जातो. सूर्याच्या किरणांचा प्रकाश सर्वत्र फाकला की, तो कळाहीन, निस्तेज होतो. (२)

याकारणें सूर्यापुढें । दुसरी साम्यता न घडे ।
जयाच्या प्रकाशें उजेडे । प्राणीमात्रासी ॥ ३ ॥
म्हणून ज्याच्या प्रकाशामुळे सर्व प्राणिमात्रांना उजेड प्राप्त होतो, त्या सूर्याची बरोबरी दुसरा कोणीही करू शकत नाही. (३)

नाना धर्म नाना कर्में । उत्तमें मध्यमें अधमें ।
सुगमें दुर्गमें नित्य नेमें । सृष्टीमधें चालती ॥ ४ ॥
उत्तम, मध्यम, अधम, तसेच सुगम आणि दुर्गम असे नाना धर्म, नाना कर्मे सूर्यामुळेच या सृष्टीमध्ये नित्यनेमाने चालू असतात. (४)

वेदशास्त्रें आणी पुराणें । मंत्र यंत्र नाना साधनें ।
संध्या स्नान पूजाविधानें । सूर्येंविण बापुडीं ॥ ५ ॥
वेद, शास्त्रे, पुराणे, नाना मंत्र, नाना यंत्रे, नाना साधने तसेच स्नान, संध्या, पूजाविधी सर्व सूर्यावरच अवलंबून असतात. सूर्याशिवाय ती बापुडी चालूच शकत नाहीत. (५)

नाना योग ना मतें । पाहों जातां असंख्यातें ।
जाती आपुलाल्या पंथें । सूर्यौदय जालियां ॥ ६ ॥
नाना योग, नाना मते पाहू गेल्यास ती असंख्य आहेत. पण सूर्योदय झाल्यावरच सर्व कार्यान्वित होतात. (६)

प्रपंचिक अथवा परमार्थिक । कार्य करणें कोणीयेक ।
दिवसेंविण निरार्थक । सार्थक नव्हे ॥ ७ ॥
प्रापंचिक असो अथवा पारमार्थिक असो, कुठल्याही प्रकारचे कार्य करायचे असले तरी ते दिवसाच करावे लागते. तरच ते उत्तम प्रकारे सिद्धीस जाते. अन्यथा ते निरर्थक ठरते. (७)

सूर्याचें अधिष्ठान डोळे । डोळे नसतां सर्व आंधळे ।
याकारणें कांहींच न चले । सूर्येंविण ॥ ८ ॥
सूर्याचे अधिष्ठान प्रत्येक प्राणिमात्राच्या डोळ्यात असते. डोळे नसतील तर सर्व आंधळेच म्हणावे लागतील. म्हणून सूर्याशिवाय काहीच चालत नाही. (८)

म्हणाल अंध कवित्वें करिती । तरी हेहि सुर्याचीच गती ।
थंड जालियां आपुली मती । मग मतिप्रकाश कैंचा ॥ ९ ॥
तुम्ही एखादे वेळी असे म्हणाल की. अंध व्यक्तीसुद्धा कवित्व करू शकतात, पण हेसुद्धा सूर्यामुळेच घडते. आपली बुद्धी जर गारठली, तर बुद्धीचा प्रकाश कसा पडेल ? (९)

उष्ण प्रकाश तो सूर्याचा । शीत प्रकाश तो चंद्राचा ।
उष्णत्व नस्तां देह्याचा । घात होये ॥ १० ॥
सूर्याचा प्रकाश उष्ण असतो. चंद्राचा प्रकाश शीत, थंड असतो. देहाच्या ठिकाणी उष्णता नसेल तर देह टिकू शकणार नाही. त्याचा नाश होईल. (१०)

याकारणें सूर्येंविण । सहसा न चले कारण ।
श्रोते तुम्ही विचक्षण । शोधून पाहा ॥ ११ ॥
म्हणून सूर्याशिवाय सहसा काहीच कार्य होत नाही. श्रोते हो, तुम्ही चतुर आहात. तरी विचार करून पहा. (११)

हरिहरांच्या अवतरमूर्ती । शिवशक्तीच्या अनंत वेक्ती ।
यापूर्वीं होता गभस्ती । आतां हि आहे ॥ १२ ॥
हरिहरांच्या अवतारमूर्ती, तसेच शिवशक्तियुक्त अनंत व्यक्ती यांची उत्पत्ती होण्यापूर्वीही सूर्य होता आणि आताही तो आहेच. . (१२)

जितुके संसारासि आले । तितुके सूर्याखालें वर्तले ।
अंती देहे त्यागून गेले । प्रभाकरादेखतां ॥ १३ ॥
जितके प्राणी या संसारात जन्मास येतात ते सर्व सूर्यामुळे व सूर्यप्रकाशात वावरतात आणि अंती देहत्यागही सूर्यादेखतच करतात. (१३)

चंद्र ऐलीकडे जाला । क्षीरसागरीं मधून काढिला ।
चौदा रत्नांमधें आला । बंधु लक्षुमीचा ॥ १४ ॥
चंद्राची उत्पत्ती अलीकडील आहे. क्षीरसागराचे मंथन करून जी चौदा रत्ने प्रगट झाली, त्यात हा लक्ष्मीचा भाऊ प्रगट झाला. (१४)

विश्वचक्षु हा भास्कर । ऐसें जाणती लाहानथोर ।
याकारणें दिवाकर । श्रेष्ठांहून श्रेष्ठ ॥ १५ ॥
भास्कर हा सर्व जगाचा नेत्र आहे, हे सर्व लोक जाणतात. म्हणूनच सूर्य हा श्रेष्ठाहूनही श्रेष्ठ आहे. (१५)

अपार नभमार्ग क्रमणें । ऐसेंचि प्रत्यहीं येणें जाणें ।
या लोकोपकाराकारणें । आज्ञा समर्थाची ॥ १६ ॥
सूर्य रोज अपार अशा आकाशमार्गाने मार्गक्रमण करतो. रोजच्या रोज त्याचे असे येणे-जाणे चालू असते. या लोकोपकाराविषयी त्यास भगवंताची आज्ञा झालेली आहे. (१६)

दिवस नस्तां अंधकार । सर्वांसी नकळे सारासार ।
दिवसेंविण तश्कर । कां दिवाभीत पक्षी ॥ १७ ॥
दिवस उगवला नाही, तर सर्वत्र अंधार पसरेल, मग लोकांना सारासार कळणार नाही. दिवस नसेल तर चोर आणि घुबड यांना बरे वाटते. (१७)

सूर्यापुढें आणिक दुसरें । कोण आणावें सामोरें ।
तेजोरासी निर्धारें । उपमेरहित ॥ १८ ॥
सूर्यापुढे त्याची बरोबर करील, असे दुसरे कोणास आणावे ? सूर्यच खरोखर तेजोराशीच असल्याने त्याला कुणाची उपमाच देता येत नाही. (१८)

ऐसा हा सविता सकळांचा । पूर्वज होय रघुनाथाचा ।
अगाध महिमा मानवी वाचा । काये म्हणोनि वर्णावी ॥ १९ ॥
असा हा सूर्य सगळ्यांचाच आहे आणि रघुनाथाचा तर तो पूर्वजच आहे. त्याचा अगाध महिमा मानवी वाचेने कसा वर्णन करता येईल ? (१९)

रघुनाथवौंश पूर्वापर । येकाहूनि येक थोर ।
मज मतिमंदास हा विचार । काये कळे ॥ २० ॥
सूर्यवंश, रघुनाथाचा वंश हा खूप पुरातन असून त्यात एकाहून एक थोर पुरुष होऊन गेले आहेत. रामदास म्हणतात की, मी तर मतिमंद आहे. त्यांची थोरवी मला कशी कळेल ? (२०)

रघुनाथाचा समुदाव । तेथें गुंतला अंतर्भाव ।
म्हणोनी वर्णितां महत्व । वाग्दुर्बळ मी ॥ २१ ॥
ज्या ठिकाणी रघुनाथाच्या भक्तांचा समुदाय असतो, तेथे माझे अंतरंग गुंतलेले असते. म्हणून त्यांचे महत्त्व मला मुखदुर्बलाला कसे वर्णन करता येईल ? (२१)

सकळ दोषाचा परिहार । करितां सूर्यास नमस्कार ।
स्फूर्ति वाढे निरंतर । सूर्यदर्शन घेतां ॥ २२ ॥
सूर्यास नमस्कार केल्याने सर्व दोषांचा परिहार होतो आणि सूर्यदर्शन घेतल्याने निरंतर स्फूर्ती वाढते. (२२)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सूर्यस्तवननिरूपणनाम समास दुसरा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘सूर्यस्तवननाम’ समास दुसरा समाप्त.


समास तिसरा : पृथ्वीस्तवननिरूपण
॥ श्रीराम ॥

धन्य धन्य हे वसुमती । इचा महिमा सांगों किती ।
प्राणीमात्र तितुके राहाती । तिच्या आधारें ॥ १ ॥
ही पृथ्वी खरोखरच धन्य धन्य आहे. तिचा महिमा किती वर्णन करावा ? जितके म्हणून प्राणिमात्र आहेत ते पृथ्वीच्या आधारानेच राहतात. (१)

अंतरिक्ष राहाती जीव । तोहि पृथ्वीचा स्वभाव ।
देहे जड नस्तां जीव । कैसे तगती ॥ २ ॥
आकाशात राहणारे जीव, यांनाही पृथ्वीचाच आधार असतो, म्हणजे त्यांचे देह पृथ्वीतत्वाचेच असतात. जड पृथ्वीतत्वाचे देह नसतील, तर जीव तगून कसे राहतील ? (२)

जाळिती पोळिती कुदळिती । नांगरिती उकरिती खाणती ।
मळ मूत्र तिजवरी करिती । आणी वमन ॥ ३ ॥
पृथ्वीला लोक जाळतात, पोळतात, कुदळीने खणतात, नांगरतात, उकरतात, खणून काढतात. तिच्यावर मलमूत्र करतात, ओकतात, (३)

नासकें कुजकें जर्जर । पृथ्वीविण कैंची थार ।
देह्यांतकाळीं शरीर । तिजवरी पडे ॥ ४ ॥
नासके, कुजके, जीर्ण पदार्थ यांना पृथ्वीशिवाय थारा कुठे आहे ? देहान्तसमयी शरीर पृथ्वीवरच पडत असते. (४)

बरें वाईट सकळ कांहीं । पृथ्वीविण थार नाहीं ।
नाना धातु द्रव्य तें हि । भूमीचे पोटीं ॥ ५ ॥
बरे वाईट जे काही सर्व आहे, त्याला पृथ्वीशिवाय थारा नाही. नाना धातू, द्रव्य आदी सर्व पृथ्वीच्या पोटातच असतात. (५)

येकास येक संव्हारिती । प्राणी भूमीवरी असती ।
भूमी सांडून जाती । कोणीकडे ॥ ६ ॥
प्राणी एक दुसऱ्याचा संहार करतात. पण दोघेही पृथ्वीवरच उभे असतात. भूमी सोडून ते जाणार तरी कुठे ? (६)

गड कोठ पुरें पट्टणें । नाना देश कळती अटणें ।
देव दानव मानव राहाणें । पृथ्वीवरी ॥ ७ ॥
गड, किल्ले, पूरे, नगरे तसेच नाना देश जे आहेत ते पर्यटनाने कळून येतात. देव, दानव, मानव आदी सर्व पृथ्वीवरच राहात असतात. (७)

नाना रत्नें हिरे परीस । नाना धातु द्रव्यांश ।
गुप्त प्रगट कराव्यास । पृथ्वीविण नाहीं ॥ ८ ॥
नाना रत्ने, हिरे, परीस, तसेच नाना धातू आणि द्रव्यांश यांना गुप्त अथवा प्रकट व्हावयास पृथ्वीशिवाय वावच नाही. (८)

मेरुमांदार हिमाचळ । नाना अष्टकुळाचळ ।
नाना पक्षी मछ व्याळ । भूमंडळीं ॥ ९ ॥
मेरू, मांदार, हिमालय तसेच नील, निषध, विंध्य, माल्यवान, मलय, गंधमादन, हेमकूट हे अष्ट कुलपर्वत, नाना पक्षी, मासे, सर्प इत्यादी सर्व पृथ्वीच्याच आधारे राहतात. (९)

नाना समुद्रापैलीकडे । भोंवतें आवर्णोदका कडें ।
असंभाव्य तुटले कडे । भूमंडळाचे ॥ १० ॥
नाना समुद्रांच्या पलीकडे पृथ्वीच्या भोवती जे आवर्णोदकाचे कडे आहे आणि जे पृथ्वीचे मोठमोठे असंभाव्य तुटके कडे आहेत, (१०)

त्यामधें गुप्त विवरें । लाहानथोरें अपारें ।
तेथें निबिड अंधकारें । वस्ती कीजे ॥ ११ ॥
त्यामध्ये लहान-थोर अशी अपार गुप्त विवरे आहेत. त्यात निबिड अंधार भरून राहिलेला आहे. (११)

आवर्णोदक तें अपार । त्याचा कोण जाणे पार ।
उदंड दाटले जळचर । असंभाव्य मोठे ॥ १२ ॥
त्या अपार आवर्णोदकाचा पार कोण जाणू शकेल ? त्यात असंभाव्य असे मोठमोठे जलचर उदंड दाटलेले आहेत. (१२)

त्या जीवनास आधार पवन । निबिड दाट आणी घन ।
फुटों शकेना जीवन । कोणेकडे ॥ १३ ॥
त्या जीवनाला वायू हा आधार असून तो वायू निबिड, घनदाट आहे म्हणून ते पाणी कोणीकडेही फुटून वाहून जाऊ शकत नाही. (१३)

त्या प्रभंजनासी आधार । कठिणपणें अहंकार ।
ऐसा त्या भूगोळाचा पार । कोण जाणे ॥ १४॥
त्या प्रभंजनाला वायूला अज्ञानरूपी काठिण्याने अहंकाराचा आधार असतो. अशा त्या भूगोलाचा पार कोण बरे जाणू शकेल ? (१४)

नाना पदार्थांच्या खाणी । धातुरत्नांच्या दाटणी ।
कल्पतरु चिंतामणी । अमृतकुंडें ॥ १५ ॥
पृथ्वीवरच नाना पदार्थांच्या खाणी आहेत, तसेच नाना धातू, रत्ने यांच्या खाणींचीही दाटी झालेली आहे. कल्पतरू, अमृतकुंडे, चिंतामणी ही पृथ्वीवरच आहेत. (१५)

नाना दीपें नाना खंडें । वसती उद्वसें उदंडें ।
तेथें नाना जीवनाचीं बंडें । वेगळालीं ॥ १६ ॥
या पृथ्वीवर नाना बेटे आहेत, नाना खंडे आहेत, तसेच उदंड ओसाड प्रदेशही आहेत आणि जेथे नाना प्रकारच्या प्राण्यांचे वेगवेगळे समुदाय आहेत, अशी स्थानेही आहेत. (१६)

मेरुभोंवते कडे कापले । असंभाव्य कडोसें पडिलें ।
निबिड तरु लागले । नाना जिनसी ॥ १७ ॥
मेरूभोवती कापलेले कडे आहेत. त्यांतून असंभाव्य कवडसे, अथवा डोंगरांच्या पडलेल्या छायाकृती आहेत. त्यात नाना प्रकारचे निबिड वृक्ष उगवलेले आहेत. (१७)

त्यासन्निध लोकालोक । जेथें सूर्याचें फिरे चाक ।
चंद्रादि द्रोणाद्रि मैनाक । माहां गिरी ॥ १८ ॥
त्याच्याजवळ लोकालोक पर्वत असन तेथे सर्याचे चक्र फिरत असते. याशिवाय चंद्राद्री, द्रोणाद्री, मैनाक व इतरही मोठमोठे पर्वत या पृथ्वीवरच आहेत. (१८)

नाना देशीं पाषाणभेद । नाना जिनसी मृत्तिकाभेद ।
नाना विभूति छंद बंद । नाना खाणी ॥ १९ ॥
या पृथ्वीवर नाना देश आहेत. त्यांत अनेक प्रकारचे पाषाणांचे, मृत्तिकांचे, नाना जिनसांचे भेद आढळून येतात. तसेच नाना विभूती, नाना छंद, नाना बंध आणि नाना खाणी आढळतात. (१९)

बहुरत्न हे वसुंदरा । ऐसा पदार्थ कैचा दुसरा ।
अफट पडिलें सैरावैरा । जिकडे तिकडे ॥ २० ॥
म्हणूनच ‘बहुरत्ना वसुंधरा’ असे म्हटले जाते. या पृथ्वीसारखा अफाट आणि जिकडे-तिकडे सैरावैरा पसरलेला दुसरा पदार्थ कुठला असणार आहे ? (२०)

अवघी पृथ्वी फिरोन पाहे । ऐसा प्राणी कोण आहे ।
दुजी तुळणा न साहे । धरणीविषीं ॥२१ ॥
सर्व पृथ्वी हिंडून पाहू शकेल असा प्राणी कोण असणार आहे ? या धरणीशी तुलना करता येईल असा पदार्थच नाही. (२१)

नाना वल्ली नाना पिकें । देसोदेसी अनेकें ।
पाहों जातां सारिख्या सारिखें । येक हि नाहीं ॥ २२ ॥
देशोदेशी अनेक प्रकारच्या वेली, नाना प्रकारची अन्नधान्ये आहेत, पण आश्चर्य म्हणजे एकासारखे दुसरे एकही नाही. (२२)

स्वर्ग मृत्यु आणिपाताळें । अपूर्व रचिलीं तीन ताळें।
पाताळलोकीं माहां व्याळें । वस्ती कीजे ॥ २३ ॥
भगवंतांनी स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ अशा ह्या तीन अपूर्व लोकांची रचना केली आहे. पाताळात मोठमोठ्या सर्वांनी वस्ती केली आहे. (२३)

नान वल्ली बीजांची खाणी । ते हे विशाळ धरणी ।
अभिनव कर्त्याची करणी । होऊन गेली ॥ २४ ॥
ही पृथ्वी म्हणजे अति विशाल अशी नाना वल्लींची आणि बीजांची खाणच आहे. ही अंतरात्म्याची मोठी अपूर्व अशी करणी होऊन गेली आहे. (२४)

गड कोठ नाना नगरें । पुरें पट्टणें मनोहरें ।
सकळां ठाईं जगदेश्वरें । वस्ती कीजे ॥ २५ ॥
गड, कोट, नाना नगरे, पुरे, पट्टणे सर्व मनोहर असून त्या सर्वांच्या ठायी जगदीश्वराने वस्ती केलेली आहे. (२५)

माहां बळी होऊन गेले । पृथ्वीवरी चौताळले ।
सामर्थ्यें निराळे राहिले । हें तों घडेना ॥ २६ ॥
या पृथ्वीवरच अनेक बलवान पुरुष होऊन गेले. त्यांनी येथेच मोठा पराक्रम गाजवला. पण आपल्या सामर्थ्याच्या बळावर ते पृथ्वीपासून वेगळे राहिले, असे तर घडू शकत नाही. (२६)

असंभाव्य हे जगती। जीव कितीयेक जाती ।
नाना अवतारपंगती । भूमंडळावरी ॥ २७ ॥
ही पृथ्वी खरोखरच असंभाव्य आहे. कित्येक जातीचे जीव, भगवंताच्या अनेक प्रकारच्या अवतारांच्या पंक्ती या भूमंडळावरच झाल्या. (२७)

सध्यां रोकडे प्रमाण । कांहीं करावा नलगे अनुमान ।
नाना प्रकारीचें जीवन । पृथ्वीचेनि आधारें ॥ २८ ॥
सध्या म्हणजे आजकालही या गोष्टीची रोकडी प्रचीती येत असते. येथे अनुमान, कल्पना करावी लागत नाही. या पृथ्वीच्या आधारानेच नाना प्रकारचे जीव जीवन जगतात. (२८)

कित्तेक भूमी माझी म्हणती । सेवटीं आपणचि मरोन जाती ।
कित्तेक काळ होतां जगती । जैसी तैसी ॥ २९ ॥
कित्येक लोक जमीन माझी असे म्हणतात आणि शेवटी आपणच मरून जातात. पण कित्येक काळ लोटला तरी ही पृथ्वी जशीच्या तशीच असते. (२९)

ऐसा पृथ्वीचा महिमा । दुसरी काये द्यावी उपमा ।
ब्रह्मादिकापासुनी आम्हां । आश्रयोचि आहे ॥ ३० ॥
असा या पृथ्वीचा महिमा आहे. तिला दुसऱ्या कशाचीही उपमा देता येत नाही. अगदी ब्रह्मादिकांपासून आपणा सर्वांचा आधार पृथ्वीच आहे. (३०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
पृथ्वीस्तवननिरूपणनाम समास तिसरा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘पृथ्वीस्तवननाम’ समास तिसरा समाप्त.


समास चौथा : आपनिरूपण
॥ श्रीराम ॥

आतां सकळांचे ज्नमस्थान । सकळ जीवांचे जीवन ।
जयास आपोनारायेण । ऐसें बोलिजे ॥ १ ॥
आता सर्व प्राणिमात्रांचे जे जन्मस्थान आहे. सर्व जीवांचे जे जीवन आहे व ज्याला आपोनारायण म्हणतात त्यासंबंधी बोलू या. (१)

पृथ्वीस आधार आवर्णोदक । सप्तसिंधूचें सिंधोदक ।
नाना मेघीचें मेघोदक । भूमंडळीं चालिलें ॥ २ ॥
पृथ्वीला आवर्णोदकाचा आधार आहे. सप्तसागरांचे पाणी आणि नाना मेघांनी वृष्टी केलेले मेघोदक म्हणजे पावसाचे पाणी या भूमंडळावरच वाहात आहे. (२)

नाना नद्या नाना देसीं । वाहात मिळाल्या सागरासी ।
लाहानथोर पुण्यरासी । अगाध महिमे ॥ ३ ॥
नाना देशांतून नाना नद्या वाहतात आणि शेवटी समुद्रास जाऊन मिळतात. त्यांचा महिमा कमी-अधिक असतो, पण काहींचा महिमा मात्र अगाध असतो. (३)

नद्या पर्वतींहून कोंसळल्या । नाना सांकडीमधें रिचविल्या ।
धबाबां खळाळां चालिल्या । असंभाव्य ॥ ४ ॥
पर्वतातून उगम पावून त्या कोसळत असतात. काही कडे-कपारीत अडकतात, तर काही धबाधब धबधब्याच्या रूपाने असंभाव्य खळखळाट करीत वाहत जातात. (४)

कूप बावी सरोवरें । उदंड तळीं थोरथोरें ।
निर्मळें उचंबळती नीरें । नाना देसीं ॥ ५ ॥
याशिवाय नाना देशांत कूप, वापी, सरोवरे, मोठमोठे तलाव यांतून निर्मल स्वच्छ पाणी उचंबळत असते. (५)

गायेमुखें पाट जाती । नाना कालवे वाहती ।
नाना झया झिरपती । झरती नीरें ॥ ६ ॥
गायमुखातून, पाटातून, कालव्यांतून असे अनेक प्रकारे पाणी वाहात असते, तसेच नाना ठिकाणी झऱ्यांतून आणि झरीतून पाणी झिरपत असते. (६)

डुरें विहीरें पाझर । पर्वत फुटोन वाहे नीर ।
ऐसे उदकाचे प्रकर । भूमंडळीं ॥ ७ ॥
डहुरे, विहिरी, पाझर तसेच पर्वतातील भेगांतून पाणी वाहात असते. असे या पृथ्वीवर पाण्याचे नाना प्रकार आहेत. (७)

जितुके गिरी तितुक्या धारा । कोंसळती भयंकरा ।
पाभळ वाहाळा अपारा । उकळ्या सांडिती ॥ ८ ॥
जितके पर्वत आहेत, तितक्यावरून पाण्याच्या भयंकर धारा कोसळत असतात. अपार पाभळ (झरे), ओहोळ आणि फवारे वाहात असतात. (८)

भूमंडळीचें जळ आघवें। किती म्हणोनी सांगावें ।
नाना कारंजीं आणावें । बांधोनी पाणी ॥ ९ ॥
याप्रमाणे सर्व पृथ्वीवरील जलाचे वर्णन कुठवर म्हणून करावे ? पाण्याला बांध घालून नाना कारंज्यांतून पाणी सोडतात. (९)

डोहो डवंके खबाडीं टांकीं । नाना गिरिकंदरीं अनेकीं ।
नाना जळें नाना लोकीं । वेगळालीं ॥ १० ॥
डोह, डबकी, लहान आणि मोठी टाकी याप्रमाणे नाना गिरिकंदरातून अनेक प्रकारे अनेक प्रकारचे पाणी आढळून येते. (१०)

तीर्थें येकाहून येक । माहां पवित्र पुण्यदायक ।
अगाध महिमा शास्त्रकारक । बोलोनि गेले ॥ ११ ॥
एकापेक्षा एक श्रेष्ठ अशी महापवित्र आणि पुण्यदायक तीर्थे आहेत. त्यांचा अगाध महिमा शास्त्रकारांनी वर्णन केलेला आहे. (११)

नाना तीर्थांची पुण्योदकें । नाना स्थळोस्थळीं सीतळोदकें ।
तैसींच नाना उष्णोदकें । ठाईं ठाईं ॥ १२ ॥
अनेक तीर्थांचे पाणी पुण्यदायक आहे. शिवाय नाना ठिकाणी थंड पाण्याचे, तर कित्येक ठिकाणी उष्णोदकाचे झरे आहेत. (१२)

नाना वल्लीमधें जीवन । नाना फळीं फुलीं जीवन ।
नाना कंदीं मुळीं जीवन । गुणकारकें ॥ १३ ॥
नाना प्रकारच्या वेली, फळे, फुले, नाना कंद आणि मुळे यांमध्ये पाणीच भरून राहिलेले आहे. काहीचे पाणी अत्यंत गुणकारक असते. (१३)

क्षीरोदकें सिंधोदकें । विषोदकें पीयूषोदकें ।
नाना स्थळांतरीं उदकें । नाना गुणाचीं ॥ १४ ॥
खारे पाणी, समुद्राचे पाणी, विषारी पाणी, अमृतासारखे मधुर पाणी, निरनिराळ्या ठिकाणचे निरनिराळे गुण असणारे पाणी, (१४)

नाना युक्षदंडाचे रस । नाना फळांचे नाना रस ।
नाना प्रकारीचे गोरस। मद पारा गुळत्र ॥ १५ ॥
नाना प्रकारच्या उसाचे रस, नाना प्रकारच्या फळांचे नाना रस, नाना प्रकारचे दूध, मादक रस, याशिवाय पारा, काकवी, याप्रकारचे रस असतात. (१५)

नाना मुक्तफळांचें पाणी । नाना रत्नी तळपें पाणी ।
नाना शस्त्रामधें पाणी । नाना गुणाचें ॥ १६ ॥
नाना प्रकारच्या मोत्यांचे पाणी, नाना रत्नांच्या ठिकाणी तळपणारे पाणी, तसेच नाना शस्त्रांच्या ठिकाणी असणारे नाना गुणांचे पाणी, (१६)

शुक्लीत श्रोणीत लाळ मूत्र स्वेद । नाना उदकाचे नाना भेद ।
विवरोन पाहातां विशद । होत जातें ॥ १७ ॥
वीर्य, रक्त, लाळ, मूत्र, घाम याप्रमाणे उदकाचे नाना भेद आहेत. त्यांचे विवरण करून पाहिले असता ते भेद स्पष्टपणे कळून येतात. (१७)

उदकाचे देह केवळ । उदकाचेंचि भूमंडळ ।
चंद्रमंडळ सूर्यमंडळ । उदकाकरितां ॥ १८ ॥
सर्व प्राण्यांचे देह उदकाचेच असतात, भूमंडळही उदकाचेच आहे आणि उदकाच्या योगेच चंद्रमंडळ आणि सूर्यमंडळ ही झाली आहेत. (१८)

क्षारसिंधु क्षीरसिंधु । सुरासिंधु आज्यसिंधु ।
दधिसिंधु युक्षरससिंधु । शुद्ध सिंधु उदकाचा ॥ १९ ॥
खारा समुद्र, दुधाचा समुद्र, दारूचा समुद्र, तुपाचा समुद्र, दह्याचा समुद्र, उसाच्या रसाचा समुद्र आणि शुद्ध पाण्याचा समुद्र असे सात समुद्र आहेत. (१९)

ऐसें उदक विस्तारलें । मुळापासून सेवटा आलें ।
मधेहि ठाईं ठाईं उमटलें । ठाईं ठाईं गुप्त ॥ २० ॥
याप्रमाणे सर्वत्र त्या पाण्याचाच विस्तार मुळापासून शेवटपर्यंत झालेला आहे. ते मध्येच कुठे कुठे प्रकट दिसून येते, तर कुठेकुठे ते गुप्तही असते. (२०)

जे जे बीजीं मिश्रीत जालें । तो तो स्वाद घेऊन उठिलें ।
उसामधें गोडीस आलें । परम सुंदर ॥ २१ ॥
ज्या बीजात उदक मिश्रित होते, त्या बीजाचा स्वाद घेऊन ते अंकरते. उसामध्ये ते परम सुंदर अशा गोडीला प्राप्त होते. (२१)

उदकाचें बांधा हें शरीर । उदक चि पाहिजे तदनंतर ।
उदकचि उत्पत्तिविस्तार । किती म्हणोनी सांगावा ॥ २२ ॥
आपले हे शरीर पाण्यामुळेच उत्पन्न होते. पण नंतरही शरीरास पाणी आवश्यक असते. पाण्यापासून कुठल्या गोष्टी उत्पन्न होतात. ते विस्तारपूर्वक सांगणे शक्यच नाही. (२२)

उदक तारक उदक मारक । उदक नाना सौख्यदायेक ।
पाहातं उदकाचा विवेक । अलोलिक आहे ॥ २३ ॥
उदक तारकही आहे आणि मारकही आहे. नाना प्रकारे उदक हे सुख देणारे आहे. याप्रमाणे उदकासंबंधी विचार करू लागले की ते अलौकिक आहे, हे समजून येते. (२३)

भूमंडळीं धांवे नीर । नाना ध्वनी त्या सुंदर ।
धबाबां धबाबां थोर । रिचवती धारा ॥ २४ ॥
भूमंडलावर जे पाणी धावते, त्याचा नाना प्रकारे सुंदर आवाज ऐकू येतो. कधी कधी पाण्याच्या मोठमोठ्या धारा धबाबा आवाज करीत धबधब्याच्या रूपाने कोसळतात, (२४)

ठाईं ठाईं डोहो तुंबती । विशाळ तळीं डबाबिती ।
चबाबिती थबाबिती । कालवे पाट ॥ २५ ॥
ठिकठिकाणी पाण्याचे डोह तुडूंब भरलेले असतात, तर काही ठिकाणी विशाल तलाव पाण्याने भरलेले असतात. काही ठिकाणी पाण्याचे कालवे आणि पाट थबथबलेले आढळतात. (२५)

येकी पालथ्या गंगा वाहाती । उदकें सन्निधचि असती ।
खळाळां झरे वाहाती । भूमीचे पोटीं ॥ २६ ॥
एखादी नदी जमिनीखालून गुप्त वाहात असते. (उदाहरणार्थ त्यांचे पाणी जमिनीच्या खाली, पण जवळच असते. ) काही स्थळी भूगर्भातून खळाळा झरे वाहात असतात. (२६)

भूगर्भीं डोहो भरलें । कोण्ही देखिले ना ऐकिले ।
ठाईं ठाईं झोवीरे जाले । विदुल्यतांचे ॥ २७ ॥
कोणी कधी पाहिलेले नाहीत किंवा ऐकलेलेही नाहीत असे पाण्याचे मोठे डोह भूगर्भात असतात, तर कित्येक ठिकाणी वीज पडून निर्माण झालेले झरे आढळून येतात. (२७)

पृथ्वीतळीं पाणी भरलें । पृथ्वीमधें पाणी खेळे ।
पृथ्वी प्रग्टलें । उदंड पाणी ॥ २८ ॥
अशा प्रकारे पृथ्वीच्या खाली पाणी भरलेले आहे. पृथ्वीमध्ये सर्वत्र पाणी खेळत असते आणि पृथ्वीतलावरही उदंड पाणी प्रगटलेले दिसून येते. (२८)

स्वर्गमृत्यपाताळीं । येक नदी तीन ताळीं ।
मेघोदक अंतराळीं । वृष्टी करी ॥ २९ ॥
स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ अशा तीनही लोकांत एकच नदी गंगा वाहत असते आणि अंतराळातून मेघांच्या द्वारेही वृष्टी होतच असते. (२९)

पृथ्वीचें मूळ जीवन । जीवनाचें मूळ दहन ।
दहनाचें मूळ पवन । थोराहून थोर ॥ ३० ॥
पृथ्वीचे मूळच पाण्यात आहे. त्या पाण्याचे मूळ अग्नीत आहे. त्या अग्नीचे मूळ वायूत आहे. तोच थोराहून थोर म्हणजेच सर्वश्रेष्ठ आहे. (३०)

त्याहून थोर परमेश्वर । महद्‍भूतांचा विचार ।
त्याहून थोर परात्पर । परब्रह्म जाणावें ॥ ३१ ॥
त्या वायूहून थोर परमेश्वर आहे. हा परमेश्वर म्हणजे महत् भूत अर्थात अंतरात्मा होय. त्याच्याह्न श्रेष्ठ परात्पर परब्रह्म आहे, हे जाणून घ्यावे. (३१)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
आपनिरूपणनाम समास चौथा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘आपनिरूपणनाम’ समास चौथा समाप्त


समास पाचवा : अग्निनिरूपण
॥ श्रीराम ॥

धन्य धन्य हा वैश्वानरु । होये रघुनाथाचा श्वशुरु ।
विश्वव्यापक विश्वंभरु । पिता जानकीचा ॥ १ ॥
हा अग्नी खरोखर धन्य धन्य आहे. तो रघुनाथाचा सासरा आहे. तो विश्वव्यापक असून विश्वाचे भरण-पोषणही तोच करतो. तोच जानकीचाही पिता आहे. (१)

ज्याच्या मुखें भगवंत भोक्ता । जो ऋषीचा फळदाता ।
तमहिमरोगहर्ता । भर्ता विश्वजनाचा ॥ २ ॥
अग्नीच्या मुखानेच भगवंत सर्व यज्ञीय सामग्रीचा भोग घेतात. अग्नीच ऋषींना तपस्येचे फल देणारा आहे. अग्नीच अंधार, थंडी आणि रोग यांचे हरण करून जगातील सर्व लोकांचे पोषण करतो. (२)

नाना वर्ण नाना भेद । जीवमात्रास अभेद ।
अभेद आणी परम शुध । ब्रम्हादिकासी ॥ ३ ॥
जीवमात्रांत अनेक वर्ण आणि अनेक भेद असतात. पण अग्नी मात्र सर्वांशी समत्वाने वागतो. तो ब्रह्मादी देवांसह सर्वांस भिन्न आणि परम शुद्ध असाच असतो. (३)

अग्नीकरितां सृष्टी चाले । अग्नीकरितां लोक धाले ।
अग्नीकरितां सकळ ज्याले । लाहानथोर ॥ ४ ॥
अग्नी आहे म्हणून सृष्टी चालते. अग्नीमुळे लोकांना संतोष होतो. अग्नीमुळेच सर्व लहान-थोर जगतात. (४)

अग्नीनें आळलें भूमंडळ । लोकांस राहव्या जालें स्थळ ।
दीप दीपिका नाना ज्वाळ । जेथें तेथें ॥ ५ ॥
अग्नीने पाणी शोषून भूमंडळ घट्ट केले आणि त्यामुळेच लोकांना राहाण्यासाठी स्थळ निर्माण झाले. अग्नीमुळेच नाना प्रकारचे दीप, दीपिका आणि नाना ज्वाळा जेथे तेथे दिसतात. (५)

पोटामधें जठराग्नी । तेणें क्षुधा लागे जनीं ।
अग्नीकरितां भोजनीं । रुची येते ॥ ६ ॥
पोयत जठराग्नी असतो म्हणून लोकांना भूक लागते आणि त्या अग्नीमुळेच भोजनातही रुची येते. (६)

अग्नी सर्वांगीं व्यापक । उष्णें राहे कूणी येक ।
उष्ण नस्तां सकळ लोक । मरोन जाती ॥ ७ ॥
अग्नी सर्वांगास व्यापून असतो म्हणून आपल्या शरीरात उष्णता असते. तशी उष्णता राहिली नाही, तर सर्व लोक मरून जातील. (७)

आधीं अग्नी मंद होतो । पुढें प्राणी तो नासतो ।
ऐसा हा अनुभव येतो । प्राणीमात्रासी ॥ ८ ॥
माणूस मरायच्या आधी त्याच्या शरीरातील अग्नी मंद होतो आणि नंतर प्राणी मरतो. हा अनुभव सर्व प्राणिमात्रांना येत असतो. (८)

असतां अग्नीचें बळ । शत्रु जिंके तात्काळ ।
अग्नी आहे तावत्काळ । जिणें आहे ॥ ९ ॥
अग्नीचे बळ जोपर्यंत असते, तोपर्यंत शत्रूला तात्काळ जिंकता येते. जोपर्यंत अग्नी असतो तोपर्यंत प्राणी जगतो. (९)

नाना रस निर्माण जाले । अग्नीकरितां निपजले ।
माहांरोगी आरोग्य जाले । निमिषमात्रें ॥ १० ॥
अग्नीमुळेच नाना रस उत्पन्न होतात. त्यामुळे महारोगीसुद्धा निमिषमात्रात म्हणजे अगदी अल्पकाळात आरोग्यसंपन्न होतात. (१०)

सूर्य सकळांहून विशेष । सूर्याउपरी अग्नीप्रवेश ।
रात्रभागीं लोक अग्नीस । साहें करिती ॥ ११ ॥
सूर्य सर्वांहन श्रेष्ठ आहे, पण त्याहूनही अग्नीचा प्रकाश श्रेष्ठ आहे. रात्री सर्व लोकास अग्नीच साह्यभूत किंवा मदतकर्ता होतो. (११)

अंत्यजगृहींचा अग्नी आणिला । त्यास दोष नाहीं बोलिला ।
सकळां गृहीं पवित्र जाला । वैश्वानरु ॥ १२ ॥
अंत्यजाच्या घरातला अग्नी आणला, तरी त्यामुळे दोष लागत नाही असे शास्त्र सांगते. कारण अग्नी हा सर्वांच्या गृहीचा पवित्रच असतो. (१२)

अग्नीहोत्र नाना याग । अग्नीकरितां होती सांग ।
अग्नी त्रुप्त होतां मग । सुप्रसन्न होतो ॥ १३ ॥
अग्निहोत्र, नाना प्रकारचे यज्ञयाग अग्नीमुळेच यथासांग पार पडतात. अग्नी याप्रकारे तृप्त झाला की सुप्रसन्न होतो. (१३)

देव दानव मानव । अग्नीकरितां चाले सर्व ।
सकळ जनासी उपाव । अग्नी आहे ॥ १४ ॥
देव, मानव, दानव यांचे सर्व व्यवहार अग्नीमुळेच चालतात. सर्व लोकांचे कल्याण अग्नीमुळेच होते. (१४)

लग्नें करिती थोर थोर । नाना दारूचा प्रकार ।
भूमंडळीं यात्रा थोर । दारूनें शोभती ॥ १५ ॥
थोरामोठ्यांच्या लग्नसमारंभात शोभेच्या दारूचे नानाप्रकार करतात. या जगात मोठमोठ्या यात्रा भरतात. त्या वेळीही दारूनेच त्यांना शोभा येते. (१५)

नाना लोक रोगी होती । उष्ण औशधें सेविती ।
तेणे लोक आरोग्य होती । वन्हीकरितां ॥ १६ ॥
अनेक लोकांना अनेक प्रकारचे रोग होतात तेव्हा उष्ण औषधे सेवन करून अग्नीच्या साहाय्यानेच लोक आरोग्यसंपन्न होतात. (१६)

ब्रह्मणास तनुमनु । सूर्यदेव हुताशनु ।
येतद्विषईं अनुमानु । कांहींच नाहीं ॥ १७ ॥
ब्राह्मणाचे तर तन मन आदी सर्वस्व म्हणजे सूर्य आणि अग्नी हेच होत. याविषयी अनुमान करण्याची आवश्यकताच नाही. (१७)

लोकामध्यें जठरानळु । सागरीं आहे वडवनाळु ।
भूगोळाबाहेर आवर्णानळु । शिवनेत्रीं विदुल्यता ॥ १८ ॥
लोकात जठराग्नी असतो. सागरात वडवाग्नी आहे. भूगोलाच्या बाहेर आवर्णानळ आहे, तर शंकराच्या डोळ्यांत वीजरूपी अग्नी आहे. (१८)

कुपीपासून अग्नी होतो । उंचदर्पणीं अग्नी निघतो ।
काष्ठमंथनी प्रगटतो । चकमकेनें ॥ १९ ॥
काचेच्या भिंगापासून अग्नी निर्माण होतो. तसाच तो उंच आरशातूनही प्रकट होतो. लाकडाच्या घर्षणाने आणि चकमकीच्या योगेही अग्नी प्रकट होतो. (१९)

अग्नी सकळां ठाईं आहे । कठीण घिसणीं प्रगट होये ।
आग्यासर्पें दग्ध होये । गिरिकंदरें ॥ २० ॥
सर्व प्राणिमात्रांच्या ठायी अग्नी आहे. कठीण घर्षणाने तो प्रगट होतो. आग्या सर्पामुळे (मुखातून ज्वाला काढणाऱ्या सर्पामुळे) गिरिकंदरात आग लागून ती दग्ध होतात. (२०)

अग्नीकरितां नाना उपाये । अग्नीकरितां नाना अपाय ।
विवेकेंविण सकल होये । निरार्थक ॥ २१ ॥
अग्नीमुळेच नाना उपाय होतात किंवा नाना अपायही होऊ शकतात, म्हणून विवेकाची आवश्यकता आहे. विवेकाशिवाय सर्व निरर्थक ठरते. (२१)

भूमंडळीं लाहानथोर । सकळांस वन्हीचा आधार ।
अग्निमुखें परमेश्वर । संतुष्ट होये ॥ २२ ॥
या पृथ्वीतलावर सर्व लहान-थोरांना अग्रीचाच आधार असतो. अग्निमुखानेच परमेश्वर संतुष्ट होतो. (२२)

ऐसा अग्नीचा महिमा । बोलिजे तितुकी उणी उपमा ।
उत्तरोत्तर अगाध महिमा । अग्नीपुरुषाचा ॥ २३ ॥
असा हा अग्नीचा महिमा कितीही वर्णन केला तरी अपुराच होईल. त्याला द्यायला योग्य उपमाच नाही. अग्निपुरुषाचा महिमा हा उत्तरोत्तर जास्त अगाधच होणार आहे. (२३)

जीत असतां सुखी करी । मेल्यां प्रेत भस्म करी ।
सर्वभक्षकु त्याची थोरी । काये म्हणोनी सांगावी ॥ २४ ॥
मनुष्य जिवंत असताना अग्नी त्याला सुख देतो आणि मेल्यावर तो प्रेताला भस्म करतो. अग्नी सर्वभक्षक आहे. त्याची थोरवी काय वर्णावी ? (२४)

सकळ सृष्टीचा संव्हार । प्रळय करी वैश्वानर ।
वैश्वानरें पदार्थमात्र । कांहींच उरेना ॥ २५ ॥
तो सर्व सृष्टीचा संहार करतो, सर्वांचा प्रलय करतो. पदार्थमात्रांपैकी काहीच शिल्लक उरत नाही. (२५)

नाना होम उदंड करिती । घरोघरीं वैशदेव चालती ।
नाना क्षेत्रीं दीप जळती । देवापासीं ॥ २६ ॥
लोक नाना प्रकारचे होम करतात. घरोघरी वैश्वदेव चालतात. निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये देवापाशी दीप जळत असतात. (२६)

दीपाराधनें निलांजनें । देव वोवाळिजे जनें ।
खरें खोटें निवडणें । दिव्य होतां ॥ २७ ॥
दीपाराधना, नीरांजने इत्यादी अनेक प्रकारे देवाला लोक ओवाळतात. अग्निदिव्य करून लोक खयाखोट्याची निवड परीक्षा करतात. (२७)

अष्टधा प्रकुर्ती लोक तिन्ही । सकळ व्यापून राहिला वन्ही ।
अगाध महिमा वदनीं । किती म्हणोनी बोलावा ॥ २८ ॥
अष्टधा प्रकृती आणि तीनही लोक यांना व्यापन अग्नी राहतो, अशा त्या अग्नीचा महिमा मुखाने किती म्हणून वर्णन करावा. (२८)

च्यारी श्रृंगें त्रिपदीं जात । दोनी शिरें सप्त हात ।
ऐसा बोलिला शास्त्रार्थ । प्रचितीविण ॥ २९ ॥
अग्नीला चार शिंगे, तीन पाय, दोन शिरे आणि सात हात आहेत, असा शास्त्रार्थ आहे. अग्नीची चार शंगे धर्म, अर्थ, काम, मोक्ष. तीन पाय-कर्म, उपासना, ज्ञान दोन शिरे-प्रवृत्ती आणि निवृत्ती सात हात-भूः आदी ७ व्याहृती हे प्रचीतीशिवाय थोडेच सांगितले जाते ? (२९)

ऐसा वन्ही उष्णमूर्ती । तो मी बोलिलों येथामती ।
न्यून्यपूर्ण क्षमा श्रोतीं । केलें पाहिजे ॥ ३० ॥
अशा या उष्णमूर्ती अग्नीचे वर्णन मी यथामती केले आहे. यात अधिक-उणे झाले असेल, तर श्रोत्यांनी क्षमा केली पाहिजे. (३०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
अग्निनिरूपणनाम समास पांचवा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘अग्निनिरूपणनाम’ समास पाचवा समाप्त.


समास सहावा : वायुस्तवन
॥ श्रीराम ॥

धन्य धन्य हा वायुदेव । याचा विचित्र स्वभाव ।
वायोकरितां सकळ जीव । वर्तती जनीं ॥ १ ॥
हा वायुदेव खरोखरच धन्य धन्य आहे. याचा स्वभाव जरा विचित्र आहे. या वायमळेच या जगात सर्व जीव जगत असतात. (१)

वायोकरितां श्वासोश्वास । नाना विद्यांचा अभ्यास ।
वायोकरितां शरीरास । चळण घडे ॥ २ ॥
वायूमुळेच जीवांना श्वासोच्छ्वास करता येतो. नाना विद्यांचा अभ्यास करता येतो. वायमुळेच शरीरास चलनवलन घडते. (२)

चळण वळण प्रासारण । निरोधन आणी आकोचन ।
प्राण अपान व्यान उदान । समान वायु ॥ ३ ॥
चलन, वलन, प्रसारण, निरोध आणि आकुंचन हे सर्व वायूमुळे होते. शरीरात प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे पाच मुख्य प्राण आहेत. यांच्या रूपाने वायूच माणसाच्या शरीरात वावरतो. (३)

नाग कूर्म कर्कश वायो । देवदत्त धनंजयो।
ऐसे हे वायोचे स्वभावो । उदंड असती ॥ ४ ॥
नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय हे पाच उपप्राण आहेत. अशा रीतीने वायूचे स्वभाव उदंड आहेत. (४)

वायो ब्रह्मांडीं प्रगटला । ब्रह्मांडदेवतांस पुरवला ।
तेथुनी पिंडी प्रगटला । नाना गुणें ॥ ५ ॥
प्रथम वायू ब्रह्मांडात प्रगटला. तेथे ब्रह्मादी अनेक देवता त्याने निर्माण केल्या. नंतर तो अनेक प्रकारांनी पिंडात प्रगटला. (५)

स्वर्गलोकीं सकळ देव । तैसेचि पुरुषार्थी दानव ।
मृत्यलोकींचे मानव । विख्यात राजे ॥ ६ ॥
स्वर्गलोकातील सर्व देव, तसेच पुरुषार्थी असे दानव, मृत्युलोकातील मानव आणि इतर प्रख्यात राजे, (६)

नरदेहीं नाना भेदे । अनंत भेदाचीं श्वापदें ।
वनचरें जळचरें आनंदें । क्रीडा करिती॥ ७॥
नरदेहातील अनेक भेद, अनंत भेदाची श्वापदे, वनचर, जलचर प्राणी वगैरे या वायूमुळेच आनंदात क्रीडा करीत असतात. (७)

त्या समस्तांमधें वायु खेळे । खेचरकुळ अवघें चळे ।
उठती वन्हीचे उबाळे । वायोकरितां ॥ ८॥
या सर्वांमध्ये वायू खेळत असतो. सर्व पक्ष्यांचे समुदायही वायूमुळेच उडतात. हालचाल करतात. आगीचे लोळही वायूमुळेच उठतात. (८)

वायो मेघाचें भरण भरी। सवेंच पिटून परतें सारी ।
वायो ऐसा कारबरी । दुसरा नाहीं ॥ ९ ॥
वायूच मेघांना आकाशात भरतो. नंतर स्वत:च त्यांना झोडपून दूर सारतो. वायूसारखा कारभारी दुसरा कुणी नाही. (९)

परी ते आत्मयाची सत्ता । वर्ते शरीरीं तत्वता ।
परी व्यापकपणें या समर्था । तुळणा नाहीं ॥ १० ॥
शरीरातील वायू हा अंतरात्म्याच्या सत्तेत, त्याच्या इच्छेनुसार वागत असतो. पण बाहेरील वायू व्यापक आणि स्वतंत्र असल्याने त्याच्या सामर्थ्याला मर्यादाच नसते. (१०)

गिरीहून दाट फौजा । मेघ उठिले लोककाजा ।
गर्जगर्जों तडक विजा । वायोबळें ॥ ११ ॥
पर्वताच्या शिखरांवाचून मेघांच्या दाट फौजा लोकांच्या कल्याणासाठी वायूच एकत्रित करतो. वायूच्या बळानेच मेघ गर्जना करू लागतात, विजा तडकू लागतात. (११)

चंद्रसूर्य नक्षत्रमाळा । ग्रहमंडळें मेघमाळा ।
यें ब्रह्मांडीं नाना कळा । वायोकरितां ॥ १२ ॥
या ब्रह्मांडातील चंद्र, सूर्य, नक्षत्रमाला, ग्रहमंडले आणि मेघमाला इत्यादी नाना कळा वायूमुळेच होतात. (१२)

येकवटलें तें निवडेना । कालवलें तें वेगळें होयेना ।
तैसें हे बेंचाड नाना । केवी कळे ॥ १३ ॥
वायूमुळेच पंचमहाभूते एकवटतात. ती वेगळी निवडून काढता येत नाहीत. त्यांचे मिश्रण झालेले असते ते वेगळे होऊ शकत नाही. याप्रमाणे हा सगळा गुंता झालेला असतो. तो कसा कळणार ? (१३)

वायो सुटे सरारां । असंभाव्य पडतीगारा ।
तैसे जीव हे नीरा- । सरिसे पडती ॥ १४ ॥
मोठा सोसाट्याचा वारा सुटला की, असंभाव्य गारा पडू लागतात. तसेच त्या पाण्याबरोबर अनेक जीवही पडतात. (१४)

वायुरूपें कमळकळा । तोचि आधार जळा ।
तया जळाच्या आधारें भूगोळा । शेषें धरिलें ॥१५ ॥
कमळाला जसा देठाचा आधार असतो, तसा जल, भूगोल आणि शेष इत्यादींना वायूचा आधार असतो. (१५)

शेषास पवनाचा आहार । आहारें फुगे शरीर ।
तरी मग घेतला भार । भूमंडळाचा ॥१६॥
वायू हा शेषाचा आहार आहे. त्या वायूने शेषाचे शरीर फुगते आणि मग तो भूमंडळाचा भार सहन करू शकतो. (१६)

माहांकूर्माचें शरीर भलें । नेणों ब्रह्मांड पालथें घातलें ।
येवढें शरीर तें राहिलें । वायोचेनी ॥ १७॥
महाकर्माचे शरीर भलेमोठे असते. त्याच्याकडे पाहिले की ब्रह्मांडच जणू पालथे घातले आहे की काय असे वाटते. ते एवढे प्रचंड शरीर वायूमुळेच राहते. (१७)

वाराहें आपुलें दंतीं । पृथ्वी धरिली होती ।
तयाची येवढी शक्ती । वायुबळें ॥ १८ ॥
वराहाने आपल्या दाढांवर पृथ्वी धारण केली होती. त्याला वायूच्या बळानेच एवढी शक्ती लाभली होती. (१८)

ब्रह्म विष्णु महेश्वर । चौथा आपण जगदेश्वर ।
वायोस्वरूप विचार । विवेकी जाणती ॥ १९ ॥
ब्रह्मा, विष्णु, महेश्वर आणि चौथा स्वतः जगदीश्वर हे सर्व वायुस्वरूपच असतात. हा विचार विवेकी जाणतात. (१९)

तेतिस कोटी सुरवर । अठ्यासी सहस्र ऋषेश्वर ।
सिध योगी भारेंभार । वायोकरितां ॥ २० ॥
तेहतीस कोटी देव, अठ्याऐंशी हजार ऋषीश्वर, सिद्ध आणि भारंभार योगी हे सर्व वायुरूपच असतात. (२०)

नव कोटी कात्यायणी । छेपन कोटी च्यामुंडिणी ।
औट कोटी भूतखाणी । वायोरूपें ॥ २१॥
नवकोटी कात्यायनी, छप्पन्न कोटी चामुंडा आणि साडेतीन कोटी भूतयोनी ही सर्व वायुरूपच असतात. (२१)

भूतें देवतें नाना शक्ती । वायोरूप त्यांच्या वेक्ती ।
नाना जीव नेणो किती । भूमंडळीं ॥ २२ ॥
भूते, दैवते, नाना शक्ती यांचे देह वायुरूपच असतात. या भूमंडळावर असेच किती वायुस्वरूप जीव आहेत. ते कोण जाणणार ? (२२)

पिंडीं ब्रह्मांडीं पुरवला । बाहेर कंचुकास गेला ।
सकळां ठाईं पुरवला । समर्थ वायु ॥ २३ ॥
पिंड, ब्रह्मांडाला पुरून वाय बाहेरून आवरण करण्यास गेला आहे . असा हा वायू समर्थ असून सर्वांठायी पुरून उरला आहे. (२३)

ऐसा हा समर्थ पवन । हनुमंत जयाचा नंदन ।
रघुनाथस्मरणीं तनमन । हनुमंताचें ॥ २४ ॥
अशा या समर्थ वायूचा पुत्र हनुमान आहे. त्या हनुमंताचे तनमन रघुनाथाच्या स्मरणात लागलेले आहे. (२४)

हनुमंत वायोचा प्रसीध । पित्यापुत्रांस नाहीं भेद ।
म्हणोनि दोघेहि अभेद । पुरुषार्थविषीं ॥ २५ ॥
हनुमंत हा वायूचा प्रसिद्ध पुत्र असून पितापुत्रात भेद नाही. म्हणून पुरुषार्थाच्या बाबतीत दोघेही समान आहेत. (२५)

हनुमंतास बोलिजे प्राणनाथ । येणें गुणें हा समर्थ ।
प्राणेंविण सकळ वेर्थ । होत जातें ॥ २६ ॥
हनुमंताला प्राणनाथ म्हणतात. यावरून त्याचे सामर्थ्य किती आहे हे कळून येते. एक प्राण नसेल तर सर्व व्यर्थच जाते. (२६)

मागें मृत्य आला हनुमंता । तेव्हां वायो रोधला होता ।
सकळ देवांस आवस्ता । प्राणांत मांडलें ॥ २७ ॥
पूर्वी सूर्यबिंब ग्रासण्यास गेला असता हनुमानाला इंद्राचे वज्र लागून मूर्छा आली, तेव्हा हनुमंताचा मृत्यूच ओढवला असता, पण वायूने सर्वांच्या प्राणांचा निरोध केला आणि त्यामुळे सर्व देवांची प्राणान्त अवस्था झाली. (२७)

देव सकळ मिळोन । केलें वायुचें स्तवन ।
वायो प्रसन्न होऊन । मोकळें केलें ॥ २८ ॥
तेव्हा सर्व देवांनी मिळून वायूचे स्तवन केले. वायने प्रसन्न होऊन सर्वांना मोकळे केले. (२८)

म्हणोनि प्रतपी थोर । हनुमंत ईश्वरी अवतार ।
यचा पुरुषार्थ सुरवर । पाहातचि राहिले ॥ २९ ॥
(तेव्हा सर्व देवांनी हनुमंतास अनेक वर दिले) म्हणून असा हा थोर प्रतापी हनुमान म्हणजे ईश्वरी अवतारच आहे. सर्व देव थक्क होऊन याचा पुरुषार्थ पाहातच राहिले. (२९)

देव कारागृहीं होते । हनुमंतें देखिलें अवचितें ।
संव्हार करूनी लंकेभोंवतें । विटंबून पाडिलें ॥ ३० ॥
देव रावणाच्या कारागृहात होते, हे हनुमंताने पाहिल्यावर त्याने अकस्मात अनेक राक्षसांचा संहार करून त्यांची विटंबना करून त्यांना लंकेभोवती फेकून दिले. (३०)

उसिणें घेतलें देवांचें । मूळ शोधिलें राक्षसांचें ।
मोठें कौतुक पुछ्यकेताचें । आश्चर्य वाटे ॥ ३१ ॥
रावणाने देवांना दिलेल्या कष्टाचे हनुमंताने उट्टे काढले. त्याने राक्षसांची पाळेमुळे खणून काढली. या पुच्छकेतूच्या पराक्रमाचे मोठे आश्चर्य आणि कौतुक वाटते. (३१)

रावण होता सिंह्यासनावरी । तेथें जाऊन ठोंसरे मारी ।
लंकेमधें निरोध करी । उदक कैचें ॥ ३२ ॥
रावण सिंहासनावर बसला असता तेथे जाऊन हनुमंताने त्यास ठोसे मारले. लंकेमध्ये त्याने निरोध केला. त्यामुळे तेथे उदक मिळेनासे झाले. (३२)

देवास आधार वाटला । मोठा पुरुषार्थ देखिला ।
मनामधें रघुनाथाला । करुणा करिती ॥ ३३ ॥
त्याचा तो मोठा पराक्रम पाहून देवांना आधार वाटला. त्यांनी मनामध्ये रघुनाथाला करुणेने आळविले. (३३)

दैत्य आवघे संव्हारिले । देव तत्काळ सोडिले ।
प्राणीमात्र सुखी जाले । त्रयलोक्यवासी ॥ ३४ ॥
तेव्हा त्यांनी सर्व दैत्यांचा संहार केला. देवांना तात्काळ कैदेतून सोडविले आणि त्रैलोक्यातील सर्व प्राणिमात्रांना सुखी केले. (३४)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
वायोस्तवननिरूपणनाम समास सहावा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘वायोस्तवनिरूपणनाम’ समास सहावा समाप्त.


समास सातवा : महद्‍भूतनिरूपण
॥ श्रीराम ॥

पृथ्वीचें मूळ जीवन । जीवनाचें मूळ अग्न ।
अग्नीचें मूळ पवन । मागां निरोपिलें ॥ १ ॥
पृथ्वीचे मूळ जीवन म्हणजे पाणी हे आहे. पाण्याचे मूळ अग्नी हे आहे. अग्नीचे मूळ वायू हे आहे. याचे निरूपण पूर्वी केले आहे. (१)

आतां ऐका पवनाचें मूळ । तो हा अंतरात्माचि केवळ ।
अत्यंतचि चंचळ । सकळांमधें ॥ २ ॥
आता वायूचे मूळ जो अंतरात्मा त्याचे निरूपण ऐका. हा अंतरात्मा सर्वांमध्ये व्याप्त असून अत्यंतच चंचळ आहे. (२)

तो येतो जातो दिसेना । स्थिर होऊन बैसेना ।
ज्याचें रूप अनुमानेना । वेदश्रुतीसी ॥ ३ ॥
तो येतो-जातो. पण दिसत नाही. जराही स्थिर होऊन बसत नाही. वेद आणि श्रुतीही त्याच्या रूपासंबंधी अनुमान करू शकत नाहीत. (३)

मुळीं मुळींचें स्फुर्ण । तेंचि अंतरात्म्याचें लक्षण ।
जगदेश्वरापासून त्रिगुण । पुढें जालें ॥ ४ ॥
मूळ परब्रह्माच्या ठिकाणी जे आद्य स्फुरण तेच अंतरात्म्याचे लक्षण आहे. यालाच जगदीश्वर म्हणतात. त्याच्यापासूनच पुढे त्रिगुण प्रकट झाले. (४)

त्रिगुणापासून जालीं भूतें। पावलीं पष्ट दशेतें ।
त्या भूतांचें स्वरूप तें । विवेकें वोळखावें ॥ ५ ॥
त्रिगुणापासूनच पुढे पंचमहाभूते स्पष्ट दशेला आली. विवेकाने त्या पंचमहाभूतांचे स्वरूप जाणून घ्यावे. (५)

त्यामधें मुख्य आकाश । चौ भूतांमधें विशेष ।
याच्या प्रकाशें प्रकाश । सकळ कांहीं ॥ ६ ॥
त्या पंचमहाभूतांमध्ये आकाश हे इतर चार महाभूतांपेक्षा विशेष महत्त्वपूर्ण आहे. याच्या प्रकाशामुळेच सर्व काही प्रकाशित होते. (६)

येक विष्णु महद्‍भूत । ऐसा भूतांचा संकेत ।
परंतु याची प्रचीत । पाहिली पाहिजे ॥ ७ ॥
‘एक विष्णू महद्भूत’ असे म्हटले जाते. परंतु विवेकाने याची प्रचीती घेतली पाहिजे. (७)

विस्तारें बोलिलीं भूतें । त्या भूतामधें व्यापक तें ।
विवरोन पाहातां येतें । प्रत्ययासी ॥ ८ ॥
सर्व भूतांचे विस्ताराने वर्णन केले आहे. त्या भूतामध्ये सर्वांत ते व्यापक आहे. याचा प्रत्यय आपणांस विवरणाने येतो. (८)

आत्मयाच्या चपळपणापुढें । वायो तें किती बापुडें ।
आत्म्याचें चपळपण रोकडें । समजोन पाहावें ॥ ९ ॥
अंतरात्मा हा इतका चपळ आहे की वायूही त्याच्या चंचळपणापुढे कमी पडतो. आत्म्याच्या चंचळपणाची रोकडी प्रचीती नीट समजून घ्यावी. (९)

आत्म्यावेगळें काम चालेना । आत्मा दिसेना ना आडळेना ।
गुप्तरूपें विचार नाना । पाहोन सोडी ॥ १० ॥
आत्म्याशिवाय कुठलेही काम होऊ शकत नाही. तो अत्यंत सूक्ष्म असल्याने दिसत नाही, आढळत नाही. पण तोच गुप्तरूपाने नाना प्रकारे विचार करून निश्चय करतो. (१०)

पिंड ब्रह्मांड व्यापून धरिलें । नाना शरीरीं विळासलें ।
विवेकी जनासी भासलें । जगदांतरी ॥ ११ ॥
अंतरात्मा पिंड-ब्रह्मांडास आत-बाहेर व्यापून असतो. नाना शरीरांत तोच विलसत असतो. विवेकी पुरुषांना जगदांतरी त्याचा प्रत्यय येतो. (११)

आत्म्याविण देहे चालती । हें तों न घडे कल्पांतीं ।
अष्टधा प्रकृर्तीच्या वेक्ती । रूपासी आल्या ॥ १२ ॥
अंतरात्म्याशिवाय देह चालू शकेल असे कल्पांतीही घडू शकत नाही. अष्टधा प्रकृतीतील घटक जे पंचमहाभूते आणि त्रिगुण ते आत्म्यामुळे व्यक्त दशेस आले. (१२)

मूळापासून सेवटवरी । सकळ कांहीं आत्माच करी ।
आत्म्यापैलीकडे निर्विकारी । परब्रह्म तें ॥ १३ ॥
मुळापासून शेवटापर्यंत सर्व काही अंतरात्माच करतो. निर्विकारी परब्रह्म हे आत्म्याच्या पलीकडील आहे. (१३)

आत्मा शरीरीं वर्ततो । इंद्रियेंग्राम चेष्टवितो ।
नाना सुखदुःखें भोगितो । देह्यात्मयोगें ॥ १४ ॥
आत्मा हा शरीराच्या ठिकाणी राहातो. सर्व इंद्रियसमूहाला तोच चेतवितो तसेच देह आणि अंतरात्मा यांच्या संयोगाने नाना सुख- दुःखे भोगतो. (१४)

सप्तकंचुक हें ब्रह्मांड । त्यामधें सप्तकंचुक पिंड ।
त्या पिंडामधें आत्मा जाड । विवेकें वोळखा ॥ १५ ॥
हे ब्रह्मांड सात आवरणांनी युक्त असून त्यातच सप्त आवरणांनी युक्त पिंड असतो. त्या पिंडामध्ये जो श्रेष्ठ असा आत्मा असतो, तो विवेकाने जाणून घ्यावा. (१५)

शब्द ऐकोन समजतो । समजोन प्रत्योत्तर देतो ।
कठीण मृद सीतोष्ण जाणतो । त्वचेमधें ॥ १६ ॥
तोच शब्द ऐकून त्याचा अर्थ समजून घेतो आणि प्रत्युत्तरही देतो. त्वचेच्या योगे तो कठीण, मद, तसेच शीत आणि उष्ण हेही जाणतो. (१६)

नेत्रीं भरोनी पदार्थ पाहाणें । नाना पदार्थ परीक्षणें ।
उंच नीच समजणें । मनामधें ॥ १७॥
नेत्रामध्ये भरून राहून नाना पदार्थ पाहतो, त्यांची परीक्षा करतो आणि मनामध्ये त्यातील श्रेष्ठ, कनिष्ठही समजतो. (१७)

क्रूरदृष्टी सौम्यदृष्टी । कपटदृष्टी कृपादृष्टी ।
नाना प्रकारींच्या दृष्टी । भेद जाणे॥ १८ ॥
क्रूर दृष्टी, सौम्य दृष्टी, कपट दृष्टी, कृपा दृष्टी नाना प्रकारच्या दृष्टींमधील भेदही तो जाणतो. (१८)

जिव्हेमधें नाना स्वाद । निवडून जाणे भेदाभेद ।
जें जें जाणें तें तें विशद । करुनी बोले ॥ १९॥
जिभेमध्ये राहून तो नाना स्वादामधील भेद-अभेद जाणू शकतो आणि जे जे जाणतो ते स्पष्ट करून सांगही शकतो. बोलू शकतो. (१९)

उत्तम अन्नाचे परिमळ । नाना सुगंध परिमळ ।
नाना फळांचे परिमळ । घ्राणैंद्रियें जाणे ॥ २० ॥
घ्राणेंद्रियाच्या योगाने तो उत्तम अन्नाचा सुंदर वास, नाना प्रकारचे सुगंध, नाना फळांचे, फुलांचे गंध वगैरे जाणतो. (२०)

जिव्हेनें स्वाद घेणें बोलणें । पाणीईइंद्रियें घेणें देणें ।
पादैंद्रियें येणें जाणें । सर्वकाळ ॥२१ ॥
जिभेने स्वाद घेणे आणि बोलणे, हाताने पदार्थ देणे आणि घेणे, आणि पायांनी येणे-जाणे वगैरे सर्व क्रिया सर्वकाळ अंतरात्माच करीत असतो. (२१)

शिस्नैंद्रियें सुरतभोग । गुदैंद्रियें मळोत्सर्ग ।
मनेंकरूनी सकळ सांग । कल्पून पाहे ॥ २२॥
जननेंद्रियांनी कामभोग, गदइंद्रियाने मलोत्सर्ग करणे, मनाने सर्व प्रकारच्या कल्पना करणे, (२२)

ऐसें व्यापार परोपरी । त्रिभुवनीं येकलाचि करी ।
त्याची वर्णावया थोरी । दुसरा नाहीं ॥ २३ ॥
असे परोपरीचे व्यापार त्रिभुवनात तो एकटाच करीत असतो. त्याची थोरवी वर्णन करायला त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाहीच. (२३)

त्याविण दुसरा कैचा । जे महिमा सांगावा तयाचा ।
व्याप आटोप आत्मयाचा । न भूतो न भविष्यति ॥ २४ ॥
त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाहीच, तर त्याची थोरवी कशी वर्णावी ? अंतरात्म्याचा व्याप आणि त्याची कार्यशक्ती ही पूर्वी कधी झालेली नाही व पुढेही कधी होणार नाही, अशी विलक्षण आहे. (२४)

चौदा विद्या चौसष्टी कळा । धूर्तपणाच्या नाना कळा ।
वेद शास्त्र पुराण जिव्हाळा । तेणेंविण कैचा ॥ २५ ॥
चौदा विद्या, चौसष्ट कला, शिवाय धूर्तपणाच्या नाना कळा, तसेच वेद, शास्त्रे, पुराणे यांचे रहस्य हे सर्व अंतरात्म्यामुळेच जाणणे शक्य आहे. त्याच्याशिवाय काहीही शक्य नाही. (२५)

येहलोकींचा आचार । परलोकीं सारासारविचार ।
उभय लोकींचा निर्धार । आत्माच करी ॥ २६ ॥
इहलोकातील आचार, परलोकासंबंधी सारासारविचार, याप्रमाणे उभय लोकांसंबंधी निर्धार अंतरात्माच करतो. (२६)

नाना मतें नाना भेद । नाना संवाद वेवाद ।
नाना निश्चय भेदाभेद । आत्माच करी ॥ २७ ॥
नाना मते, नाना भेद, नाना संवाद आणि नाना विवाद, नाना निश्चय आणि भेदाभेद सर्व अंतरात्माच करतो. (२७)

मुख्यतत्व विस्तारलें । तेणें तयास रूप आणिलें ।
येणेंकरितां सार्थक जालें । सकळ कांहीं ॥ २८ ॥
मुख्य तत्त्वाचा विस्तार होऊन या सृष्टीच्या व्यापास रूप प्राप्त झाले. या अंतरात्म्यामुळे सर्व काही सार्थक झाले आहे. (२८)

लिहिणें वाचणें पाठांतर करणें । पुसणें सांगणें अर्थ करणें ।
गाणें बाजवणें नाचणें । आत्म्याचकरितां ॥ २९ ॥
लिहिणे, वाचणे, पाठांतर करणे, विचारणे, सांगणे, अर्थ करणे, गाणे, वाद्य वाजवणे, नाचणे हे सर्व काही अंतरात्म्याकरताच असते. (२९)

नाना सुखें आनंदतो । नाना दुःखें कष्टी होतो ।
देहे धरितो आणी सोडितो । नानाप्रकारें ॥ ३० ॥
अंतरात्माच नाना सुखांनी आनंदित होतो. नाना दुःखांनी कष्टी होतो. नाना प्रकारचे देह धरतो आणि देह सोडतो. (३०)

येकलाचि नाना देहे धरी । येकलाचि नटे परोपरी ।
नट नाट्यकळा कुसरी । त्याविण नाहीं ॥ ३१ ॥
अंतरात्मा एकाच नाना देह धारण करतो. एकटाच नाना प्रकारे नटतो. नट नाट्यकला कौशल्य अंतरात्म्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. (३१)

येकलाचि जाला बहुरूपी । बहुरूपी बहुसाक्षपी ।
बहुरूपें बहुप्रतापी । आणी लंडी ॥ ३२ ॥
तो एकटाच बहुरूपी होतो आणि बहुरूप्याप्रमाणे नाना सोंगे घेतो. तो बहुरूपी असून मोठा उद्योगी आहे. अनेक रूपे धारण करतो. कधी तो अत्यंत प्रतापी बनतो, तर कधी भित्र्याचे सोंग घेतो. (३२)

येकलाचि विस्तारला कैसा । पाहे बहुविध तमासा ।
दंपत्येंविण कैसा । विस्तारला ॥ ३३ ॥
तो एकटच असून त्याचा इतका अफाट विस्तार झालाच कसा हे एक आश्चर्यच आहे. दांपत्य नसून अंतरात्म्याचा एवढा विस्तार कसा काय झाला ? (३३)

स्त्रियांस पाहिजे पुरुष । पुरुषासी पाहिजे स्त्रीवेष ।
ऐसा आवडीचा संतोष । परस्परें ॥ ३४ ॥
स्त्रीला पुरुष हवासा वाटतो. पुरुषाला स्त्री हवी असते. याप्रमाणे परस्परांना परस्परांच्या आवडीमुळे संतोष वाटतो. (३४)

स्थूळाचें मूळ तें लिंग । लिंगामधें हें प्रसंग ।
येणें प्रकारें जग । प्रत्यक्ष चाले ॥ ३५ ॥
स्थूल देहाचे मूळ सूक्ष्म देहात आहे. सूक्ष्म देहातील वासनेमुळे स्त्रीपुरुष हा भेद निर्माण होतो. याप्रमाणे जगात प्रत्यक्ष व्यवहार चालतो. (३५)

पुरुषांचा जीव स्त्रियांची जीवी । ऐसी होते उठाठेवी ।
परी या सूक्ष्माची गोवी । समजली पाहिजे ॥ ३६ ॥
पुरुषांचा जीव आणि स्त्रियांची जीवी असे मुळात नाही, पण अज्ञानी लोक उगीचच अशी उठाठेव करतात. परंतु सूक्ष्म देहातील हा वासनेचा गुंता मात्र विवेकाने जाणून घेतला पाहिजे. (३६)

स्थूळांकरितां वाटे भेद । सूक्षमीं आवघेंचि अभेद ।
ऐसें बोलणें निरुध । प्रत्यया आलें ॥ ३७ ॥
स्थूल देहामध्ये हा भेद दिसतो खरा, पण सूक्ष्माच्या ठिकाणी अभेदच असतो. असे हे निश्चयात्मक असून अनुभवास येणारे आहे. (३७)

बायकोनें बायकोस भोगिलें । ऐसें नाहीं कीं घडलें ।
बायकोस अंतरी लागलें । ध्यान पुरुषाचें ॥३८ ॥
स्त्रीने स्त्रीचा उपभोग घेतला असे कधी घडत नाही. स्त्रीच्या अंतरी पुरुषाचेच ध्यान लागलेले असते. (३८)

स्त्रीसी पुरुष पुरुषास वधु । ऐसा आहे हा समंधु ।
याकारणें सूक्ष्म संवादु । सुक्ष्मीं च आहे ॥ ३९ ॥
स्त्रीस पुरुष हवा असतो आणि पुरुषास वधू म्हणजे स्त्री हवी असते असा हा संबंध असतो. म्हणून या सूक्ष्म संवादाचे मूळ सूक्ष्म देहातच म्हणजे वासनेतच आहे. (३९)

पुरुषैछेमधें प्रकृती । प्रकृतीमधें पुरुषवेक्ती ।
प्रकृतीपुरुष बोलती । येणें न्यायें ॥ ४० ॥
पुरुषाच्या ठिकाणी जी इच्छा ती म्हणजे प्रकृती आणि प्रकृतीमध्ये जी जाणीव तो पुरुष होय. या न्यायानेच लोक पुरुष-प्रकृती किंवा प्रकृति-पुरुष असे म्हणतात. (४०)

पिंडावरून ब्रह्मांड पाहावें । प्रचीतीनें प्रचीतीस घ्यावें ।
उमजेना तरी उमजावें । विवराविवरों ॥ ४१ ॥
याप्रमाणे पिंडावरून ब्रह्मांडाचा विचार करावा. पिंडातील अनुभवाने ब्रह्मांडातील अनुभव जाणावा. जर हे उमजत नसेल तर वारंवार विवरण करून समजून घ्यावे. (४१)

द्वैतैछा होते मुळीं । तरी ते आली भूमंडळीं ।
भूमंडळीं आणी मुळीं । रुजु पाहावें ॥ ४२ ॥
मूळमायेतच द्वैताची इच्छा झाली. तेच द्वैत पुढे दृश्य सृष्टीत आले. दृश्य सृष्टीतील द्वैत आणि मूळमायेतील द्वैत यांचा मेळ घालून पाहावा. (४२)

येथें मोठा जाला साक्षेप । फिटला श्रोतयांचा आक्षेप ।
जे प्रकृतीपुरुषाचें रूप । निवडोन गेलें ॥ ४३ ॥
याप्रमाणे प्रकृति-पुरुषाचे रूप येथे स्पष्ट करून सांगितले आहे. त्यामुळे श्रोत्यांच्या आक्षेपाचे समाधान झाले आहे. हे फारच मोठे कार्य साधले गेले आहे, असे श्रीसमर्थ म्हणतात. (४३)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
महद्‍भूतनिरूपणनाम समास सातवा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘महद्भूतनिरूपणनाम ‘ समास सातवा समाप्त.


समास आठवा : आत्मारामनिरूपण
॥ श्रीराम ॥

नमूं गणपती मंगळमूर्ती । जयाचेनि मतिस्फूर्ती ।
लोक भजनी स्तवन करिती । आत्मयाचें ॥ १ ॥
आता मंगलमूर्ती जो गणपती त्याला वंदन करू या. त्याच्यामुळे बुद्धीमध्ये स्फूर्ती उत्पन्न होते आणि लोक आत्म्याचे स्तवन व भजन करतात. (१)

नमूं वैखरी वागेश्वरी । अभ्यांतरीं प्रकाश करी ।
नाना भरोवरी विवरी । नाना विद्या ॥ २ ॥
नंतर वाणीरूपी वागीश्वरीला नमन करू या. तिच्या कृपेनेच अंतरात प्रकाश पडतो. तिच्यामुळेच नाना विद्या, नाना प्रकारे विवरण करून स्पष्ट केल्या जातात. (२)

सकळ जनांमधें नाम । रामनाम उत्तमोत्तम ।
श्रम जाउनी विश्राम । चंद्रमौळी पावला ॥ ३ ॥
सर्व लोकांत रामनाम हे सर्व नामांत उत्तमोत्तम आहे. रामनामाच्या प्रभावाने चंद्रमौळी शंकरांचा शीण नाहीसा होऊन त्यांना विश्राम प्राप्त झाला. (३)

नामाचा महिमा थोर । रूप कैसें उत्तरोत्तर ।
परात्पर परमेश्वर । त्रयलोक्यधर्ता ॥ ४ ॥
नामाचा महिमा थोर आहे. नामाच्या योगे परमेश्वराच्या सगुण रूपाचे म्हणजे त्रैलोक्याच्या धर्त्याचे रूप प्रगट होते आणि उत्तरोत्तर प्रगती होऊन निर्गुण, निराकार जो परात्पर त्याच्या स्वरूपाशी तादात्म्य होते. (४)

आत्माराम चहुंकडे । लोक वावडे जिकडे तिकडे ।
देहे पडे मृत्य घडे । आत्मयाविण ॥ ५ ॥
आत्माराम हा अंतर्यामी रूपाने सगळीकडे व्यापून आहे. त्याच्या योगाने लोक जिकडे-तिकडे वावरत असतात. आत्मा देह सोडून गेला की, आत्म्याशिवाय देहाचा मृत्यू घडून येतो. (५)

जीवात्मा शिवात्मा परमात्मा । जगदात्मा विश्वात्मा गुप्तात्मा ।
आत्मा अंतरत्मा सूक्ष्मात्मा । देवदानवमानवीं ॥ ६ ॥
देव, दानव व मानव आत्म्याला अनेक नावांनी ओळखतात. जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, जगदात्मा, विश्वात्मा, गुप्तात्मा, आत्मा, अंतरात्मा, सूक्ष्मात्मा ही त्याचीच नावे आहेत. (६)

सकळ मार्ग चालती बोलती । अवतारपंगतीची गती ।
आत्म्याकरितां होत जाती । ब्रह्मादिक ॥ ७ ॥
अंतरात्म्यामुळेच जगातील सर्व मार्ग चालतात, बोलतात, नाना अवतारांची मालिका, त्यांचे कार्य आत्म्यामुळेच घडून येते. ब्रह्मादिक देव आत्म्यामुळेच येतात आणि जातात. (७)

नादरूप जोतीरूप । साक्षरूप सत्तारूप ।
चैतन्यरूप सस्वरूप । द्रष्टारूप जाणिजे ॥ ८ ॥
त्या आत्म्यालाच नादरूप, ज्योतीरूप, साक्षरूप, सत्तारूप, चैतन्यरूप, स्वस्वरूप, द्रष्यरूप म्हणून जाणतात. (८)

नरोत्तमु विरोत्तमु । पुरुषोत्तमु रघोत्तमु ।
सर्वोत्तमु उत्तमोत्तमु । त्रयलोक्यवासी ॥ ९ ॥
त्यालाच नरोत्तम, वीरोत्तम, पुरुषोत्तम, रघूत्तम, सर्वोत्तम, उत्तमोत्तम, त्रैलोक्यवासी असेही म्हणतात. (९)

नाना खतपट आणी चटपट । नाना लटपट आणि झटपट ।
आत्मा नसतां सर्व सपाट । चहुंकडे ॥ १० ॥
जगातील नाना खटपटी. चटपटी. लटपटी आणि झटपटी, सर्व घटना, अंतरात्म्याच्या योगेच चालतात. आत्मा नसेल तर चहकडे उजाड होऊन जाईल. (१०)

आत्म्याविण वेडें कुडें । अत्म्याविण मडें बापुडें ।
आत्म्याविण थडें रोकडें । शरीराचें ॥ ११ ॥
आत्म्याविना सर्व वेडेवाकडेच होते. शरीर मढे बनते. आत्म्याशिवाय शरीराचे थंडगार शव बनते. ही अनुभवाची गोष्ट आहे. (११)

आत्मज्ञानी समजे मनीं । पाहे जनी आत्मयालागुनी ।
भुवनी अथवा त्रिभुवनीं । अत्म्याविणें वोस ॥ १२ ॥
आत्मज्ञानी असतो तो हे सर्व जाणतो. लोकांकडे पाहताना तो त्यांच्या आत्मस्वरूपाकडेच पाहात असतो. घरात अथवा त्रिभुवनात आत्म्याशिवाय सर्व ओसच आहे (१२)

परम सुंदर आणि चतुर । जाणे सकळ सारासार ।
आत्म्याविण अंधकार । उभय लोकीं ॥ १३ ॥
अंतरात्मा हा परम सुंदर आणि चतुर असून सर्व सारासार विवेक तो जाणतो. आत्म्याशिवाय इहलोकी आणि परलोकी सगळा अंधारच पसरतो. (१३)

सर्वांगीं सिध सावध । नाना भेद नाना वेध ।
नाना खेद आणी आनंद । तेणेंचिकरितां ॥ १४ ॥
अंतरात्मा सर्वांगांनी परिपूर्ण असून सिद्ध आणि सावध असतो. त्याच्यामुळेच नाना भेद, नाना वेध, नाना खेद आणि नाना प्रकारचे आनंद यांचा अनुभव येतो. (१४)

रंक अथवा ब्रह्मादिक । येकचि चालवी अनेक ।
पाहावा नित्यानित्यविवेक । कोण्हियेकें ॥ १५ ॥
रंक असो वा ब्रह्मादी देव असोत, एक अंतरात्माच या सर्वांना चालवतो. म्हणून मनुष्याने नित्यानित्यविवेक करावा. (१५)

ज्याचे घरी पद्मिणी नारी । आत्मा तंवरी आवडी धरी ।
आत्मा गेलियां शरीरीं । तेज कैचें ॥ १६ ॥
एखाद्याची स्त्री अत्यंत सुंदर असली तरी तिच्यात आत्मा असतो तोवर माणूस तिच्यावर प्रेम करतो. तिच्या शरीरातून आत्मा निघून गेला, तर तेथे तेज कसे राहील ? (१६)

आत्मा दिसेना ना भासेना । बाह्याकारें अनुमानेना ।
नाना मनाच्या कल्पना । आत्मयाचेनी ॥ १७ ॥
आत्मा दिसत नाही, अथवा भासतही नाही. बहिर्मुख वृत्तीने त्याचे अनुमानही करता येत नाही. मनात येणाऱ्या नाना कल्पनाही आत्म्यामुळेच येत असतात. (१७)

आत्मा शरीरीं वास्तव्य करी । अवघें ब्रह्मांड विवरी भरी ।
वासना भावना परोपरीं । किती म्हणोनी सांगाव्या ॥ १८ ॥
आत्मा शरीरात वास्तव्य करतो आणि तेथे तो साऱ्या ब्रह्मांडाचा विचार करतो. ब्रह्मांड भरूनही राहतो. त्याचप्रमाणे त्याच्यामुळेच मनात अनेक प्रकारच्या वासना, भावना उत्पन्न होतात. त्या किती म्हणून सांगाव्यात. (१८)

मनाच्या अनंत वृत्ती । अनंत कल्पना धरिती ।
अनंत प्राणी सांगो किती । अंतर त्यांचें ॥ १९ ॥
मनाच्या अनंत वृत्ती असतात, मनात अनंत कल्पना उत्पन्न होतात. जगात अनंत प्राणी आहेत. त्यांचे अंतरंग कसे सांगता येईल ? (१९)

अनंत राजकारणें धरणें । कुबुधी सुबुधी विवरणें ।
कळों नेदणें चुकावणें । प्राणीमात्रासी ॥ २० ॥
मनुष्य अनंत राजकारणे करतो, धरतो, सोडतो; कुबुद्धी आणि सुबुद्धी यांचे विवरण करतो, आपले अंतरंग कुणास कळू देतो, कुणास कळू देत नाही. कोणास तो चुकवतो. याप्रमाणे प्राणिमात्र अंतरात्म्याच्या साहाय्याने अनेक गोष्टी करीत असतात. (२०)

येकास येक जपती टपती । येकास येक खपती लपती ।
शत्रुपणाची स्थिती गती । चहुंकडे ॥ २१ ॥
कुणी कुणाला जपत असतात, तर कुणी कुणाला मारायला टपलेले असतात. कुणी कुणाला खपवतात, तर कुणी लपून राहतात. अशा प्रकारची शत्रुत्वाची भावना चहूकडे दिसून येते. (२१)

पृथ्वीमधें परोपरीं । येकास येक सिंतरी ।
कित्तेक भक्त परोपरीं । परोपकार करिती ॥ २२ ॥
या पृथ्वीतलावर कुणी कणाला फसवीत असतो, तर कित्येक भक्त असे असतात की, ते नाना प्रकारे परोपकार करीत असतात. (२२)

येक आत्मा अनंत भेद । देहेपरत्वें घेती स्वाद ।
आत्मा ठाईंचा अभेद । भेद हि धरी ॥ २३ ॥
एकच आत्मा असून देहापरत्वे नाना भेद उत्पन्न होतात आणि निरनिराळ्या प्रकारचे फलभोग भोगावे लागतात. आत्मा खरे तर आपल्यापरीने अभेदच आहे. पण तो भेद करतो आहे असे वाटते. (२३)

पुरुषास स्त्री पाहिजे । स्त्रीस पुरुष पाहिजे ।
नवरीस नवरी पाहिजे । हें तों घडेना ॥ २४ ॥
पुरुषाला स्त्री पाहिजे असते. स्त्रीला पुरुष हवा असतो. नवरीला नवरीच पाहिजे असे तर घडतच नाही. (२४)

पुरुषाचा जीव स्त्रीयांची जीवी । ऐसी नाहीं उठाठेवी ।
विषयसुखाची गोवी । तेथें भेद आहे ॥ २५ ॥
पण पुरुषांचा तो जीव आणि स्त्रियांची जीवी असा भेद तर करताच येत नाही. विषयसुखाच्या बाबतीत मात्र भेद असतो. (२५)

ज्या प्राण्यास जो आहार । तेथेंचि होती तत्पर ।
पशूचे आहारीं नर । अनादरें वर्तती ॥ २६ ॥
ज्या प्राण्याचा जो आहार असतो, तेथे तो तत्पर असतो. पशूच्या आहाराबद्दल माणसे अनादराने वागतात. (२६)

आहारभेद देहेभेद । गुप्त प्रगट उदंड भेद ।
तैसाचि जाणावा आनंद । वेगळाला ॥ २७ ॥
आहारभेद, देहाचे निरनिराळे भेद, यांशिवाय काही प्रगट, काही गुप्त असे उदंड भेद असतात. त्याप्रमाणे प्रत्येकाचा आनंदही वेगवेगळ्या प्रकारचा असतो. (२७)

सिंधु भूगर्भींचीं नीरें । त्या नीरामधील शरीरें ।
आवर्णोदकाचीं जळचरें । अत्यंत मोठी ॥ २८ ॥
समुद्रातील पाणी, भूगर्भातील पाणी या पाण्यामध्येही प्राणी असतात. आवर्णोदकातील जलचर प्राणी तर अत्यंत मोठे असतात. (२८)

सूक्ष्म दृष्टीं आणितां मना । शरीराचा अंत लागेना ।
मा तो अंतरात्मा अनुमाना । कैसा येतो ॥ २९ ॥
सूक्ष्म दृष्टीने जरी मनाशी विचार केला तर आपल्या स्वत:च्या शरीराचाही अंत आपल्याला लागत नाही. मग अत्यंत सूक्ष्म असा जो अंतरात्मा त्याचे अनुमान कसे करता येईल ? (२९)

देह्यात्मयोग शोधून पाहिला । तेणें कांहीं अनुमानला ।
स्थूळसूक्ष्माचा गलबला । गथागोवी ॥ ३० ॥
देह आणि आत्मा यांच्या संयोगासंबंधी शोध घेण्याचा प्रयत्न केला, तर अंतरात्म्यासंबंधी काहीसे अनुमान करता येते. पण देह स्थूल आणि आत्मा सुक्ष्म त्यामळे या स्थूलसूक्ष्माच्या गुंतागुंतीमुळे मोठा गोंधळ उडतो. (३०)

गथागोवी उगवाव्याकारणें । केलीं नाना निरूपणें ।
अंतरात्मा कृपाळुपणें । बहुतां मुखें बोलिला ॥ ३१ ॥
हा गुंता उलगडावा म्हणूनच अनेकांनी अनेक प्रकारे निरूपणे केली आहेत. वास्तविक अंतरात्माच कृपाळपणे अनेकांच्या मुखांतुन बोलला आहे असे श्रीसमर्थ सांगतात. (३१)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
आत्मारामनिरूपणनाम समास आठवा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘आत्मारामनिरूपणनाम ‘ समास आठवा समाप्त.


समास नववा : नाना उपासनानिरूपण
॥ श्रीराम ॥

पृथ्वीमधें लोक नाना । त्यास नाना उपासना ।
भावार्थें प्रवर्तले भजना । ठाईं ठाईं ॥ १ ॥
येथे प्रारंभी श्रोता प्रश्न करीत आहे. तो म्हणतो की, पृथ्वीमध्ये अनेक लोक आहेत. त्यांच्या नाना प्रकारच्या उपासना आहेत. जागोजागी लोक भावार्थाने भजन करीत असतात. (१)

अपुल्या देवास भजती । नाना स्तुती स्तवनें करिती ।
जे जे निर्गुण म्हणिती । उपासनेसी ॥ २ ॥
आपल्या आवडीच्या देवाला ते भजतात. त्याची नाना प्रकारे स्तुती-स्तवने करतात. प्रत्येक जण आपल्या उपासनेला निर्गुण म्हणतो. (२)

याचा कैसा आहे भाव । मज सांगिजे अभिप्राव ।
अरे हा स्तुतीचा स्वभाव । ऐसा आहे ॥ ३ ॥
यात काय भाव आहे ? याबद्दल आपले मत काय आहे ते मला सांगावे. यावर वक्ता म्हणतो की, अरे, आपापल्या देवाची स्तुती करावी असा माणसाचा स्वभावच असतो (३)

निर्गुण म्हणिजे बहुगुण । बहुगुणी अंतरात्मा जाण ।
सकळ त्याचे अंश हें प्रमाण । प्रचित पाहा ॥ ४ ॥
निर्गुण असे म्हणणे मायेमुळेच शक्य होते आणि ती माया बहुगुणी असल्याने निर्गुणच बहुगुणी आहे, असे म्हटले जाते. वास्तविक चंचळ अंतरात्माच बहुगुणी आहे. सर्व देव हे त्याचेच अंश आहेत, हे अनुभवाने जाणून घ्यावे (४)

सकळ जनासी मानावें तें । येका अंतरात्म्यास पावतें ।
अधिकारपरत्वें तें । मान्य कीजे ॥ ५ ॥
सर्व लोकांना जे मान्य होते. ते अंतरात्म्याला पावते. आपल्या अधिकारानुरूप सर्वांचा अंतरात्मा एकच आहे की नाही हे पटेल. (५)

श्रोता म्हणे हा अनुमान । मुळीं घालावें जीवन ।
तें पावे पानोपान । हे सध्या प्रचिती ॥ ६ ॥
यावर श्रोता म्हणतो की, ही कल्पना आहे. झाडाच्या मुळांना पाणी घालावे लागते, तेव्हा ते पानोपानी पोहोचते. ही रोकडी प्रचीती आहे. (६)

वक्ता म्हणे तुळसीवरी । उदक घालावें पात्रभरी ।
परी न थिरे निमिषभरी । भूमीस भेदे ॥ ७ ॥
यावर वक्ता म्हणतो की, तुळसीच्या रोपाला भांडंभर पाणी घातले तरी ते वर पानावर राहात नाही, ते एका क्षणात जमिनीला भेदून मुळाकडेच जाते. (७)

थोरा वृक्षास कैसें करावें । सेंड्या पात्र कैसें न्यावें ।
याचा अभिप्राव देवें । मज निरोपावा ॥ ८ ॥
तेव्हा श्रोता म्हणाला की, तुळशीचे ठीक आहे, पण मोठ्या वृक्षाच्या बाबतीत काय करावे ? त्याच्या शेंड्यापर्यंत पात्र कसे न्यावे ? याचा अभिप्राय स्वामींनी मला स्पष्ट करून सांगावा. (८)

प्रजन्याचें उदक पडतें । तें तों मुळाकडे येतें ।
हात चि पावेना तेथें । काये करिती ॥ ९ ॥
पावसाचे पाणी मोठ्या वृक्षावर पडते, पण तेही मुळाकडेच जाते. पात्राने पाणी घालायला हात पुरत नसेल तर काय करावे ? (९)

सकळास मूळ सांपडे । ऐसें पुण्य कैचें घडे ।
साधुजनाचें पवाडे । विवेकीं मन ॥ १० ॥
सगळ्यांनाच मूळ सापडेल इतके त्यांचे पुण्य कोठे असते ? साधुसंतांचे विवेकी मन मात्र मुळापर्यंत म्हणजे अंतरात्म्यापर्यंत जाऊन पोहोचते. (१०)

तथापी वृक्षांचेनि पडिपाडें । जीवन घालितां कोठें पडे ।
ये गोष्टीचें सांकडें । कांहींच नाहीं ॥ ११ ॥
तथापि वृक्षाच्या दृष्टांतावरून झाडाला कोठेही पाणी घातले तरी ते कोठे जाते हे लक्षात येईल. म्हणन काहीच अडचण राहाणार नाही. (११)

मागील आशंकेचें निर्शन । होतां जालें समाधान ।
आतां गुणास निर्गुण । कैसें म्हणती ॥ १२ ॥
मागे जी शंका विचारली होती, तिचे निरसन झाल्याने श्रोत्यास समाधान झाले. आता गुणाला निर्गुण कसे म्हणतात, ही शंका राहिली. (१२)

चंचळपणें विकारलें । सगुण ऐसें बोलिलें ।
येर तें निर्गुण उरलें । गुणातीत ॥ १३ ॥
जे चंचळपणे विकार पावते, त्याला सगुण म्हणतात. याखेरीज जे गुणातीत उरते ते निर्गुण होय. (१३)

वक्ता म्हणे हा विचार । शोधून पाहावें सारासार ।
अंतरीं राहातां निर्धार । नांव नाहीं ॥ १४ ॥
वक्ता म्हणतो, हा विचार कळण्यासाठी सारासारविवेकाने सार काय हे शोधून काढावे व त्यासंबंधी स्वानुभवाने निर्धार, निश्चय झाला की ‘निर्गुण’ हे नावही मग उरत नाही. (१४)

विवेकेंचि तो मुख्य राजा । आणि सेवकाचें नांव राजा ।
याचा विचार समजा । वेवाद खोटा ॥ १५ ॥
एक खराच राजा असतो आणि एका सेवकाचे नाव राजा असते. विवेकानेच खरा कोण हे जाणून घ्यावे. तेथे वादविवाद करणे योग्य नाही. (१५)

कल्पांतप्रळईं जें उरलें । तें निर्गुण ऐसें बोलिलें ।
येर तें अवघेंचि जालें । मायेमधें ॥ १६ ॥
प्रलयकाळी कल्पान्त झाल्यावरही जे शिल्लक उरते, त्यास ‘निर्गण’ म्हणावे. याखेरीज जे जे काही सर्व उत्पन्न होते, ते मायेमध्येच येते. (१६)

सेना शाहार बाजार । नाना यात्रा लाहानथोर ।
शब्द उठती अपार । कैसे निवडावे ॥ १७ ॥
सैन्यामध्ये, शहरामध्ये, बाजारामध्ये तसेच लहानमोठ्या यात्रांमध्ये अपार शब्द उठतात, त्यांची निवड कशी करावी ? (१७)

काळामधें प्रज्यन्यकाळ । मध्यरात्रीं होतां निवळ ।
नाना जीव बोलती सकळ । कैसे निवडावे ॥ १८ ॥
पर्जन्यकाळात दिवसभर पाऊस कोसळून मध्यरात्रीं जरा निवळला की, नाना जीव सर्व एकदमच आवाज करू लागतात. त्यांची निवड कशी करावी ? (१८)

नाना देश भाषा मतें । भूमंडळीं असंख्यातें ।
बहु ऋषी बहु मतें । कैसीं निवडावीं ॥ १९ ॥
पृथ्वीतलावर नाना देश आहेत. त्यांत अनेक प्रकारच्या भाषा आहेत. त्यांत असंख्य मते आहेत. शिवाय अनेक ऋषी असून त्यांचीही वेगवेगळी अनेक मते आहेत. त्यांत निवड कशी करावी ? (१९)

वृष्टी होतां च अंकुर । सृष्टीवरी निघती अपार ।
नाना तरु लाहानथोर । कैसे निवडावे ॥ २० ॥
पाऊस पडला की पृथ्वीवर नाना बीजे अंकुरतात. या सृष्टीमध्ये नाना प्रकारचे अपार तरू, लहान-थोर वृक्ष निर्माण होतात. त्यातून निवड कशी करावी ? (२०)

खेचरें भूचरें जळचरें । नाना प्रकारींचीं शरीरें ।
नान रंग चित्रविचित्रें । कैसी निवडावीं ॥ २१ ॥
आकाशात संचार करणारे, पृथ्वीवर विचरण करणारे आणि जलात विहार करणारे प्राणी, पक्षी अशी नाना प्रकारची शरीरे आहेत. ती चित्रविचित्र नाना रंगांचीही असतात. त्यांतून निवड कशी करावी ? (२१)

कैसें दृश्य आकारलें । नानापरीं विकारलें ।
उदंडचि पैसावलें । कैसें निवडावें ॥ २२ ॥
हे दृश्य विश्व याप्रकारे आकारास येऊन त्यात नाना प्रकारचे विकार उत्पन्न होऊन त्याचा अफाट विस्तार झाला आहे. यात निवड कशी करावी ? (२२)

पोकळीमधें गंधर्वनगरें । नाना रंग लाहनथोरें ।
बहु वेक्ति बहु प्रकारें । कैसीं निवडावीं ॥ २३ ॥
आकाशाच्या पोकळीत नाना गंधर्व नगरे दिसतात. ती लहान-थोर नाना रंगाची असतात. त्यामध्ये नाना प्रकारच्या आकृती दिसतात. त्यांमध्ये निवड करणे अशक्यच असते. (२३)

दिवसरजनीचे प्रकार । चांदिणें आणी अंधकार ।
विचार आणी अविचार । कैसा निवडावा ॥ २४ ॥
दिवस आणि रात्र, चांदणे आणि अंधकार, विचार आणि अविचार यांत निवड कशी करायची ? (२४)

विसर आणी आठवण । नेमस्त आणी बाष्कळपण ।
प्रचित आणी अनुमान । येणें रितीं ॥ २५ ॥
विस्मरण आणि स्मरण, शिस्त आणि गैरशिस्त, प्रचीती आणि अनुमान यांतही निवड करणे याप्रमाणेच कठीण आहे. (२५)

न्याय आणी अन्याय । होय आणी न होये ।
विवेकेंविण काये । उमजों जाणे ॥ २६ ॥
न्याय आणि अन्याय, होय अथवा नाही याचा निवाडा विवेकाशिवाय होऊच शकत नाही. (२६)

कार्यकर्ता आणी निकामी । शूर आणी कुकर्मी ।
धर्मी आणी अधर्मी । कळला पाहिजे ॥ २७ ॥
कोण कार्यकर्ता आहे आणि कोण निकामी आहे, कोण शूर आहे आणि कोण वाईट कर्मे करणारा आहे, कोण धार्मिक आहे आणि कोण अधर्मी आहे हे कळलेच पाहिजे. (२७)

धनाढ्य आणि दिवाळखोर । साव आणि तश्कर ।
खरें खोटें हा विचार । कळला पाहिजे ॥ २८ ॥
धनाढ्य कोण आहे आणि दिवाळखोर कोण आहे, सज्जन कोण आहे आणि चोर कोण आहे, काय खरे आणि काय खोटे आहे, हा विचार कळलाच पाहिजे. (२८)

वरिष्ठ आणि कनिष्ठ । भ्रष्ट आणी अंतरनिष्ठ ।
सारासार विचार पष्ट । कळला पाहिजे ॥ २९ ॥
वरिष्ठ कोण आहे आणि कनिष्ठ कोण आहे, भ्रष्ट कोण आहे आणि अंतरनिष्ठ कोण आहे, हे सारासारविवेकाने स्पष्टपणे जाणून घेतले पाहिजे. (२९)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
नाना उपासनानिरूपणनाम समास नववा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘नाना उपासनानिरूपणनाम ‘ समास नववा समाप्त.


समास दहावा : गुणभूतनिरूपण
॥ श्रीराम ॥

पंचभूतें चाले जग । पंचभूतांची लगबग ।
पंचभूतें गेलियां मग । काये आहे ॥ १ ॥
येथे श्रोता वक्त्यास प्रश्न करीत आहे की, पंचभूतांनी जग चालते. जगात सर्वत्र पंचमहाभूतांचीच लगबग (कार्य) चाललेली दिसून येते. ती पंचमहाभूते लय पावली की मग काय उरते ? (१)

श्रोता वक्तयास बोले । भूतांचे महिमे वाढविले ।
आणि त्रिगुण कोठें गेले । सांगा स्वामी ॥ २ ॥
श्रोता वक्त्याला प्रश्न करतो की, स्वामी, सारासारविवेकात पंचमहाभूतांचे फारच महत्त्व वाढविलेले दिसते आणि मग त्रिगुण कोठे गेले, हे आपण कृपा करून सांगावे. (२)

अंतरात्मा पांचवे भूत । त्रिगुण त्याचें अंगभूत ।
सावध करूनियां चित्त । बरें पाहें ॥ ३ ॥
त्यावर स्वामी सांगतात की, अंतरात्मा हे पाचवे भूत जाणावे. त्रिगुणांचा अंतर्भाव त्यातच होतो. हे चित्त सावध करून नीट विचार करून पाहिले असता कळेल. (३)

भूत म्हणिजे जितुकें जालें । त्रिगुण जाल्यांत आले ।
इतुकेन मूळ खंडलें । आशंकेचें ॥ ४ ॥
भूत ह्याचा अर्थच जितके झाले ते भूतच होय. त्रिगुणही झालेल्यातच जमा आहेत. इतके सांगितल्याने आशंकेचे मूळच नाहीसे झाले आहे. (४)

भूतांवेगळें कांहीं नाहीं । भूतजात हें सर्व हि ।
येकावेगळें येक कांहीं । घडेचिना ॥ ५ ॥
भूतावेगळे या दृश्य सृष्टीत दुसरे काहीही नाही. हे सर्व पांचभौतिकच आहे. एकाशिवाय दुसऱ्या एकापासून काही घडूच शकत नाही. (५)

आत्म्याचेनी जाला पवन । पवनाचेन प्रगटे अग्न ।
अग्नीपासून जीवन । ऐसें बोलती ॥ ६ ॥
अंतरात्म्यापासून वायू झाला. वायूपासून अग्नी झाला. अग्नीपासून पाणी झाले असे सांगतात. (६)

जीवन आवघें डबाबिलें । तें रविमंडळें आळलें ।
वन्हीवायोचेन जालें । भूमंडळ ॥ ७ ॥
जिकडे-तिकडे अवघे पाणीच डबडबून भरून राहिले होते. ते सूर्यामुळे आळले आणि अग्नी आणि वायू यांच्या साहाय्याने भूमंडळ म्हणजे पृथ्वी निर्माण झाली. (७)

वन्ही वायो रवी नस्तां । तरी होते उदंड सीतळता ।
ते सीतळतेमधें उष्णता । येणें न्यायें ॥ ८ ॥
अग्नी, वायू आणि सूर्य नसते तर उदंड शीतलताच झाली असती. त्यांच्यामुळेच शीतलतेमध्ये उष्णत निर्माण झाली. (८)

आवघें वर्मासी वर्म केलें । तरीच येवढें फांपावलें ।
देहेमात्र तितुकें जालें । वर्माकरितां ॥ ९ ॥
एका भुताच्या वर्माने दुसऱ्या भुताच्या वर्मावर मात केली. सर्व काही अशाच प्रकारे एवढे विस्तारले आहे. या पंचमहाभूतांच्या समन्वयामुळेच देहमात्र तितुके झाले आहेत. (९)

आवघें सीतळचि असतें । तरी प्राणीमात्र मरोनी जातें ।
आवघ्या उष्णेंचि करपते । सकळ कांहीं ॥ १० ॥
सर्वत्र शीतलताच असती, तर प्राणिमात्र मरून गेले असते. केवळ उष्णताच असती, तरी सर्व काही करपून गेले असते. (१०)

भूमंडळ आळोन गोठलें । तें रविकिर्णें वाळोन गेलें ।
मग सहज चि देवें रचिलें । उपायासी ॥ ११ ॥
भूमंडल आळून गोठले. ते रविकिरणांनी वाळले. तेव्हा सहजच देवाने उपाय केला. (११)

म्हणोनी केला प्रज्यन्यकाळ । थंड जालें भूमंडळ ।
पुढेंउष्ण कांहीं सीतळ । सीतकाळ जाणावा ॥ १२ ॥
त्यांनी पर्जन्यकाळ उत्पन्न केला. त्यामुळे भूमंडल थंड झाले. पुढे उष्णकाळ, पुढे काही शीतल असा शीतकाळ केला, हे जाणून घ्यावे. (१२)

सीतकाळें कष्टले लोक । कर्पोन गेलें वृक्षादिक ।
म्हणोन पुढें कौतुक । उष्णकाळाचें ॥ १३ ॥
शीतकाळाने लोकांना कष्ट झाले. वृक्षादिक थंडीने वाळून गेले. म्हणून पुढे देवाने उष्णकाळाचे कौतुक निर्माण केले. (१३)

त्याहिमधें प्रातःकाळ । माध्यानकाळ सायंकाळ ।
सीतकाळ उष्णकाळ । निर्माण केले ॥ १४ ॥
त्यातही प्रात:काळ, मध्याह्नकाळ, सायंकाळ तसेच शीतकाळ, उष्णकाळ वगैरे निर्माण केले. (१४)

ऐसें येकामागें येक केलें । विलेनें नेमस्त लाविलें ।
येणेंकरितां जगले । प्राणीमात्र ॥ १५ ॥
असे एकामागोमाग एक निर्माण केले आणि क्रमाने त्यांना नेमस्त केले. त्यामुळेच प्राणिमात्र जगले. (१५)

नाना रसें रोग कठिण । म्हणोनी औषधी केल्या निर्माण ।
परंतु सृष्टीचें विवरण । कळलें पाहिजे ॥ १६॥
अन्नातील नाना रसांनी कठीण रोग झाले, म्हणून औषधी निर्माण केल्या. याप्रमाणे सृष्टीची रचना जाणून घेतली पाहिजे. (१६)

देहेमूळ रक्त रेत । त्या आपाचे होती दात ।
ऐसीच भूमंडळीं प्रचित । नाना रत्नांची ॥ १७ ॥
देहाचे मूळ रक्त आणि रेत हे आहे. ते द्रवरूप आहे. पण त्या आपापासूनच देहात कठीण असे दात निर्माण होतात. हे पिंडात जसे होते, तसेच ब्रह्मांडात नाना रत्नांची (कठीण पदार्थांची) उत्पत्ती होते, ही प्रचीती जाणून घ्यावी. (१७)

सकळांसी मूळ जीवन बांधा । जीवनें चाले सकळ धंदा ।
जीवनेंविण हरिगोविंदा । प्राणी कैचे ॥ १८ ॥
सर्वांचे मूळ जीवन म्हणजे पाणी आहे. त्याच्या योगानेच सर्व धंदा, जीवननिर्वाह, व्यवहार चालतो. जीवन नसेल तर मग ‘हरिगोविंदा’ असेच म्हणावे लागले असते. प्राणी जगलेच नसते. (१८)

जीवनाचें मुक्ताफळ । शुक्रासारिखें सुढाळ ।
हिरे माणिके इंद्रनीळ । ते जळें जाले ॥ १९ ॥
पाण्याचेच मोती होतात. ते शुक्राच्या चांदणीसारखे तेजस्वी असतात. हिरे, माणके, इंद्रनील वगैरे रत्नेही जलामुळेच होतात. (१९)

महिमा कोणाचा सांगावा । जाला कर्दमुचि आघवा ।
वेगळवेगळु निवडावा । कोण्या प्रकारें ॥ २० ॥
. पंचमहाभूतांचेच सर्व मिश्रण झालेले आहे. त्यामुळे त्यांपैकी कोणाचा महिमा वर्णन करावा ? त्यांना वेगवेगळे निवडावे तरी कोणत्या प्रकारे ? (२०)

परंतु बोलिलें कांहींयेक । मनास कळावया विवेक ।
जनामधें तार्किक लोक । समजती आघवें ॥ २१ ॥
परंतु समजण्यासाठी, मनाला विवेक करण्यास सोपे जावे म्हणून काही एक बोललो. लोकात जे तार्किक असतील, ते सर्व काही समजतील. (२१)

आवघें समजलें हें घडेना । शास्त्रांशास्त्रांसीं पडेना ।
अनुमानें निश्चय होयेना । कांहींयेक ॥ २२ ॥
सर्व काही समजले असे होतच नाही. शास्त्राशास्त्रांत मतैक्यच होत नाही. आणि अनुमान करू लागले तरी काही एक निश्चय होत नाही. (२२)

अगाध गुण भगवंताचे । शेष वर्णूं न शके वाचें ।
वेदविधी तेहि काचे । देवेंविण ॥ २३ ॥
भगवंताचे गुण अगाध आहेत. शेषही त्यांचे वर्णन करू शकत नाही. देवाशिवाय म्हणजे अंतरात्म्याशिवाय वेदविधीही कमी पडतात. (२३)

आत्माराम सकळां पाळी । आवघें त्रयलोक्य सांभाळी ।
तया येकेंविण धुळी । होये सर्वत्रांची ॥ २४ ॥
आत्मारामच सर्वांना पाळतो. अवघ्या त्रैलोक्याला सांभाळतो. तो एकटा नसेल, तर सर्वांची धूळधाण होते. (२४)

जेथें आत्माराम नाहीं । तेथें उरों न शके कांहीं ।
त्रयलोकीचे प्राणी सर्व हि । प्रेतरूपी ॥ २५ ॥
जेथे आत्माराम नसेल, तेथे काहीही उरूच शकत नाही. त्याच्याशिवाय त्रैलोक्यातील सर्व प्राणी प्रेतरूपच जाणावेत. (२५)

आत्मा नस्तां येती मरणें । आत्म्याविण कैचें जिणें ।
बरा विवेक समजणें । अंतर्यामीं ॥ २६ ॥
अंतरात्मा देहातून निघून गेला की देह मरतो. अंतरात्म्याशिवाय जगणे शक्यच नसते. ही गोष्ट अंतर्यामी विवेकाने जाणून घ्यावी. (२६)

समजणें जें विवेकाचें । तेंहि आत्म्याविण कैचें ।
कोणीयेकें जगदीशाचें । भजन करावें ॥ २७ ॥
विवेकाने समजून घेणे हे सुद्धा अंतरात्म्याशिवाय कसे शक्य आहे ? म्हणून माणसाने जगदीशाचे भजन करावे. (२७)

उपासना प्रगट जाली । तरी हे विचारणा कळली ।
याकारणें पाहिजे केली । विचारणा देवाची ॥ २८ ॥
ज्याच्या अंतर्यामी उपासनेची आवड निर्माण होते, त्यालाच हे सर्व विचार कळतात. म्हणूनच अंतरात्म्यासंबंधी विचारणा केली पाहिजे. (२८)

उपासनेचा मोठा आश्रयो । उपासनेविण निराश्रयो ।
उदंड केलें तरी तो जयो । प्राप्त नाहीं ॥ २९ ॥
साधकाला उपासनेचा मोठा आधार असतो. उपासनेशिवाय सर्व निराश्रय म्हणून व्यर्थ जाते. अंतरात्म्याच्या ज्ञानाशिवाय इतर यज्ञयागादी उदंड खटपटी केल्या, तरी त्या फुकट होत. त्यांनी जय प्राप्त होणार नाही. संसाररूपी शत्रूला जिंकता येणार नाही. उपासनेने देवाची कृपा प्राप्त होते आणि कृपेनेच कार्यभाग साधतो म्हणून उपासना केलीच पाहिजे. (२९)

समर्थाची नाहीं पाठी । तयास भलताच कुटी ।
याकारणें उठाउठी । भजन करावें ॥ ३० ॥
समर्थांचा पाठिंबा आश्रय नसेल, तर कुणीही येऊन आपल्याला कुटून काढील, म्हणून उठता-बसता सतत देवाचे भजन करावे. (३०)

भजन साधन अभ्यास। येणें पाविजे परलोकास ।
दास म्हणे हा विश्वास । धरिला पाहिजे ॥ ३१ ॥
भजन, साधन आणि अभ्यास या तीनही गोष्टींमुळे परमार्थ साधला जातो. रामदास म्हणतात की, यावर माणसाने विश्वास ठेवला पाहिजे. (३१)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
गुणभूतनिरूपणनाम समास दहावा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘गुणभूतनिरूपणनाम ‘ समास दहावा समाप्त.

॥ दशक सोळावा समाप्त ॥


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: satsangdhara

दासबोध दशक सोळावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *