संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

जागतां नीज आलें असें हातां – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १२८

जागतां नीज आलें असें हातां – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १२८


जागतां नीज आलें असें हातां ।
मग पाईक म्हणवितां लाज वाटे ॥
नव्हे कोणाजोगा नाईकें हाणितलें ।
उणेपणें आलें पाईकपणा ॥१॥
पाईक शुध्दमति स्वामिया विवेकी ।
वेंव्हारु लोकिकीं चाळीतु असे ॥२॥
निदसुरा होता तो जागसुदा जाला ।
स्वामिये आणिला आपणापाशीं ॥३॥
पाईकपणें गेलें सन्निधान जालें ।
स्वामी एका बोलें निवांत ठेला ॥४॥
मागावें तितुकें खुंटलें ।
तेथ न मगतां आपणांते जाणीतलें ।
बापरखुमादेविवरा विठ्ठला प्रसादें ॥
पाईक परि अभेदें उरला असें ॥५॥

अर्थ:-
आपल्या यथार्थ आत्मस्वरूपाविषयी नित्य जागृति ठेवली तर आपले निज म्हणजे यथार्थ परमात्मस्वरूप आपुले हाती आले मग सेवक म्हणवून घेण्यास संकोच वाटतो. परमात्मा अमुकस्वरूपाचा आहे. तमुकस्वरूपाचा आहे. असे त्याच्याविषयी काही बोलता येत नाही. कारण तो शब्दाचा विषय नाही. अशा परमात्म्याचा मी पाईक आहे.हे म्हणणेच उणेपणाचे आहे. लौकिक भागांत शुद्धबुद्धीचा सेवक आणि विचारवंत धनी यांचा व्यवहार असाच असतो. आत्मस्वरूपांच्या विस्मृतीत जीव निजलेला होता. तो आत्मस्वरूपाच्या जागृतीत आला. म्हणजे स्वामीनी त्याला आपल्या स्वरूपाशी एकरूप केले. अर्थात् स्वामीरूप झाल्यामुळे त्याचा सेवकपणा गेला. तो स्वामी श्रीगुरूरायांनी एका बोलात निवांत करून ठेविला. आतां स्वामीजवळ मागावयाचे म्हणून सर्व खुंटले कारण न मागताच त्याच्याकडून त्याचे परमात्मस्वरूप जाणवले. परमात्मरूप धनी जे माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांच्या प्रसादानें परमात्म्याशी अभिन्न होऊनहि सेवकपणाने उरला आहे.असे माऊली सांगतात.


जागतां नीज आलें असें हातां – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १२८

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *