संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

द्वैताद्वैत विरहित गौळणी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १४५

द्वैताद्वैत विरहित गौळणी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १४५


द्वैताद्वैत विरहित गौळणी ॥
अमृत दुडिया भारोनियां सांजवनींगे माये ॥
अभिन्नव करुनि श्रृंगारु माथाम गोरसाचा भारु ।
अजि निघाल्या विकरा करुं मथुरे हाटा ॥
प्रेम उचंबळलें चित्तीं हांसे चाले हंसगति ।
पुढें सखिया खेळती जिवीं जिवलगा ॥
दृष्टीं फ़िटला संदेहो लागे कांबळीचा सोवो ।
तंव माझरी कृष्णदेवो स्वरुपीं दिसे ॥१॥
नवलावगे नवलावगे देखियेला ॥२॥
दृष्टीं देखिला लोचनीं लाजिलीये विरोनि ।
मागति खुंटलिसे मनीं पांगुळलें ॥
सरलें नेत्रांचे देखणे श्रुतिश्रवण ऐकणें ।
चित्त चोरियलें कान्होनें चैतन्यींवो ॥
निमिषें खुणाविलें सहजें तव घडलें सहज ।
बिंबीं बिंबतसे निज हे जीव हाचि जाला ॥
आतां नाहीं मज जरी हा तंव बाहेरु भीतरी ।
अवघीं अंतरलीं दुरी गेलें मनुष्यपण ॥३॥
याचिये वो भेटी पडीली संसारासी तुटी ।
शब्द मावळला गोष्टी तो मी काय सांगों ॥
ऐसा कैसा हा दानी करुं नेदितां बोहणी ।
सुखासाठीं सांवजणी केलें रुपातीत ॥
आजि करुनी विकरा रिघु नुपुरे जाव्या घरां ।
नुरे कल्पनेसी थारा । सरले लिंग देह ॥
मी तंव वेंधलिये यासी सवेंचि जालिये
तत्वमसि गुज लपवावें मानसीं तुम्ही सखीयांनो ॥४॥
याचिया लागल्या अभ्यासें गेलें मीपणाचें पिसें ।
केलें आपलिया ऐसें इंद्रियासहित ॥
पूर्ण चैतन्य भोगीलें हें तंव दुजें निमालें ।
देहीं अखंडित ठेलें होतें जैसें तैसें ॥
आलिंगुनिया अंतरीं रिगु नुपुरे बाहेरी ।
निर्विकाराच्या शेजारी प्रेम दुणावत ॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलेसी भेटी ।
आजि संसारा संसटी घेऊनि गेला ॥५॥

अर्थ:-
भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाने आणि त्याच्या कृपेने ज्या गौळणीच्या ठिकाणचा द्वैताद्वैतभाव नष्ट होऊन.अद्वैत आत्मानंदात निमग्न आहेत, त्यांनी अमृतरुपी परमात्माच संध्याकाळी डेयांत भरुन सकाळचे प्रहरी उत्तम शृंगार करून तो गोरसाचा भार डोक्यावर घेऊन मथुरेच्या बाजारांत विकण्याकरिता निघाल्या त्या कृष्णदर्शनाचे प्रेम चित्तामध्ये उचंबळून आल्यामुळे हंसत हंसगतीने चालल्या असता त्यांच्या जिवलग मैत्रिणी पुढे खेळत होत्या. त्यांच्या दृष्टिचा संशय कांबळे धारण करणाऱ्या श्रीकृष्णाची सवय लागल्यामुळे फिटला होता. अशा त्या आनंदाने चालल्या असता वाटेतच त्यांना कृष्ण दर्शन झाले. पुन्हा कृष्णदर्शन झाल्याचे त्यांना फार नवल वाटले.कृष्णाला डोळ्यांनी पाहिल्याबरोबर लाजून त्या त्याचे स्वरुपात विरुन गेल्या मन लय पावून त्यांची गति खुंटली तसेच डोळ्यांचे पाहाणे व कानांचे ऐकणे बंद झाले. कारण त्यांचे चित्तच कृष्णाने चोरुन घेतले. उगीच त्यांनी खूण केल्या बरोबर जीव परमात्मरूप झाला. गोपी अंतरबाह्य कृष्णरुप झाल्यामुळे त्यांचे गणगोत सर्व दूर झाले. कारण त्यांचा मनुष्यपणाच नाहीसा झाला. श्रीकृष्णांच्या भेटीनी संसार खुंटला शब्द मावळला. मग मी कोणत्या गोष्टी सांगू कारण हा कृपादानी असल्यामुळे काही व्यवहार करु न देता परमात्मसौख्याचे लाभाकरिता त्यांना रुपातीत केले. त्यामुळे घरी जावयाला म्हणजे प्रपंचाकडे पहावयाला त्यांचा लिंग देह उरला नाही, अशी स्थिति प्राप्त झालेली एक दुसरीस सांगते बाई ‘तत्वमसि’ या महावाक्याने होणारी स्थिती माझी तर होऊन गेली. पण मैत्रिणीनो हे गुज तुम्ही मनात लपवून ठेवा. या अभ्यासाला लागल्याने माझे मीपणाचे पिसे नाहीसे होऊन इंद्रियां सह वर्तमान परिपूर्ण चैतन्यानंद मी भोगित आहे. द्वैतभ्रम सर्व नष्ट झाला. आणि अद्वैत परमात्मरुप झाले. निर्विकार परमात्म्याला अलिंगन देऊन त्याच स्वरूपांच्या बिछान्यां वर आनंद दुणावत आहे. असे माझे पिता व रखुमाईचे पती जे श्रीविठ्ठल यांची भेटी झाली संसारासकट मला तारुन, आपले स्वरुपाच्या ठिकाणी घेऊन गेला. असे माऊली सांगतात.


द्वैताद्वैत विरहित गौळणी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १४५

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *