संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

चालतां लवडसवडी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १६५

चालतां लवडसवडी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १६५


चालतां लवडसवडी । बाहुली मुरडली ।
माथां गोरसाची दुरडी । जाय मथुरे हाटा ॥
सवेंची विचारी जिवीं । महियाते सादावीं ।
तंव तो अवचिती पालवी । नंदनंदनु ॥
पाहेपां सुखाचेनि मिसें ।
झणी करी अनारिसे । तेव्हां उरलें तें कैसें ।
माझें मनुष्यपण ॥
विनवी सखीयातें आदरें । तुह्मीं गुह्याचीं भंडारे ।
अघटित घडिलीं या शरीरें । प्रगटीत न करा साजणी वो ॥१॥
काय करणें वो काय करणें वो ।
देखोनी सांवळा तनु । लुब्धला माझा मनु ।
लागलेंसें ध्यानु । द्वैत निवडे ना ।
डोळा भरुनिया बाळा देखे श्रीरंगु सांवळा ।
वेध वेधल्वा सकळां । गोपी गोविंदा सवे ॥
ठेला प्रपंचु माघारा । भावो भिनला दुसरा ।
पडिला मागिल विसरा । कैचें आपुलेंपण ॥
सहज करिता गोष्टी । पाहातां पडिली मिठी ।
जाली जन्में साठी । सखियेसाजणी वो ॥२॥
ऐसें सोसितां सोसणी । सखी झाली विरहिणी ।
आतां मथुरा भुवनीं । मज गमेल कैसें ॥
सरलें सांजणें विकणें । निवांत राहिलें बोलणें ।
पूर्ण गोरसा भरणें । माथा त्यजूनिया ॥
जाली अकुळाचें कुळ । तनु जाते बरळ
फ़िटलें भ्रांतीपडळ ।
दोन्ही एक जालीं ॥
बापरखुमादेविवरीं । अवस्था लाऊनि पुरी ।
भावें भोगूनी श्रीहरी ।
मन मुक्त साजणी वो ॥३॥

अर्थ:-

एक गौळण गोरसाची भांडी दूरडीत घेऊन मथुरेच्या बाजारांत धांदलीने जात असता एकाएकी बाहुली मुरडली तो श्रीकृष्ण केव्हां भेटेल असा विचार करीत असता तो तिच्या मनांतला विचार श्रीकृष्णाने जाणून तिच्यापुढे स्वतः श्रीकृष्ण प्रगट होऊन तिला खूण करुन बजावू लागले. सुखप्राप्तीच्या निमित्त इच्छेने संसाराकडे मन जाऊ देशील? असे बोलल्याबरोबर माझे मनुष्यपण कसे उरेल? ही माझी कृष्णसबंधाने झालेली स्थिति तुम्ही गुप्त ठेवाल अशी माझी खात्री असल्यामुळे माझ्या शरीराची कृष्णमय झालेली स्थिती तुम्ही गुप्त ठेवा. काय करावे वो ! ती कृष्णांची सांवळी तनु बघितल्याबरोबर माझे मन लुब्ध होऊन गेले. काय करावे सखे? त्याचे ध्यान लागून गेले. कृष्णाशिवाय डोळ्यांना द्वैत दिसेनासे झाले. तो बालक सांवळ्या रंगाचा श्रीकृष्ण बधितल्याबरोबर मीच काय सर्व गोपीनां वेध लागून गेला. प्रपंच आठवेनासा झाला. दुसरा भाव नाहीसा झाला. मागील प्रापंचिक गोष्टीचा विसर पडला. तेथे आपलेपणा ठेवा कोठे. सहज त्या कृष्णाची गोष्ट बोलता बोलता एकदम दर्शन होऊन जन्माचे सार्थक झाले.अशी ती गौळण श्रीकृष्ण परमसौख्याचा उपभोग घेत असतांना भगवान एकाएकी गुप्त झाले. त्यामुळे ती विरहिणी होऊन म्हणते. आज मला मथुरेत करमेल कसे? दही दूध विकणे वगैरे सर्व व्यवहार संपले. बोलणे थांबले. माझ्यावरची पाटी टाकून पूर्ण गोरस जो परमात्मा त्याने मी परिपूर्ण झाले. माझे कुळ नष्ट झाले आतां शरीर व्यवहार अव्यवस्थित झाला. कारण देहाभिमानाची भ्रांती गेली त्या श्रीकृष्णाचे व माझे ऐक्य झाले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीकृष्ण परमात्मा त्याने माझ्या भावाचा भोग घेऊन व मला परमात्मरुप करुन श्रीहरिने मनाला संसारांतून काढून मुक्त केले. असे माऊली सांगतात


चालतां लवडसवडी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १६५

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *