संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

दीपप्रकाश दीपीं सामावला कळिके – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २७९

दीपप्रकाश दीपीं सामावला कळिके – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २७९


दीपप्रकाश दीपीं सामावला कळिके
सामावाली ज्योति ।
ज्योति सामावोनि बिंब हारपलें
तैसी जाली सहज स्थिति ।
संचित प्रारब्ध दग्ध पटन्यायें हे
दृश्यभ्रांति देहो जावो अथवा राहो
फ़िटला संदेहो मृतिकेचि कायासि खंति ॥१॥
रुप पाहोनिया दर्पण ठेलें शेखीं
अभास दृष्टि राहिला ।
न पाहतां मुख जाणें तो आपण
तैसा अनुभव जाला रया ॥२॥
या प्रपंचाचे कवच सांडुनि बाहेरि ।
अविद्या दृश्य संहारी ।
पदीं पद ग्रासुनि ठेलें जें
बुडोनि राहिलें अंतरी ।
चैतन्याचें मुसें हेलावत दिसे
जेवि तरंगुसागरीं ।
कूर्माचिये परि आंगचि आवरि तो
स्थिर जाला चंद्र करि रया ॥३॥
तेथें जाणणें निमालें बोलणें खुंटलें
जेवि जीवनीं जीवन मिळाले ।
दश दिशा भरुनि दाटलें किं
सुख सुखासि भेटो आले ।
ज्ञानदेव म्हणे आम्हा जितांचि मरणें ।
कीं कोटी विकल्प जिणें ऐसें
निवृत्तीनें केलें रया ॥४॥

अर्थ:-

दीपाचा प्रकाश जसा दीपांत सामावतो किंवा दीपज्योती कळिकेत सामावते. प्रतिबिंबाचा बिंबात लोप झाल्यावर ज्या प्रमाणे बिंब हा धर्म लय पावतो त्या प्रमाणे माझी स्थिति झाली आहे. संचितातून भोगास निघालेला प्रारब्धरूप पट जळून गेला तरी तो आकाराने जसाचा तसा दिसतो. त्यातील सत्व मात्र जळून जाते.त्याप्रमाणे प्रारब्ध शिल्लक राहिल्यामुळे भ्रांतिरूप दृश्याची प्रतिती येते. (दृश्यांतर्गत) स्वतःचा देह जावो अथवा राहो. त्या देहरूप मृतिकेच्या नाशाची खंती करावी काय.रूप पाहून आरसा बाजुला केला तर काही वेळ प्रतिबिंब पाहिल्याचा आभास जसा डोळ्यांत राहतो. त्याप्रमाणे प्रारब्ध असेपर्यंत हा दृश्य भाग दिसणारच वस्तुतः आरशांत मुख नसतांना आरशाशी दृष्टीचा संबंध होऊन आरशाच्या पासून ती दृष्टी परत फिरून आपल्या मुखालाच पाहते. तसाच माझे स्वरूपाविषयी मला अनुभव झाला. प्रपंचाचे कवच टाकल्यामुळे अविद्या कार्य दृश्याचा नाश होतो. आणि आत्मपद ब्रह्मपदाशी एकरूप होते. यानंतर दिसणारे दृश्य ते समुद्रावरील तरंगाच्या हेलकाव्या प्रमाणे दिसत आहे. कासव ज्याप्रमाणे स्वेच्छेने आपले अवयव आवरतो. त्याप्रमाणे सर्व वासनांना आवरून बोधरूपी चंद्रकिरणाने तो स्थिर होतो. अशा स्वरूपाच्या ठिकाणी ज्ञानाची गोष्टच नाहीशी झाली.अर्थात बोलणेही संपले ही स्थिति पाण्यांत पाणी मिळून एकरूप होते तशी झाली. आतां ते स्वरूप परिछिन्न भाव टाकून दशदिशेला व्यापले असे म्हणावे. किंवा आत्मसुख परमात्मसुखाला भेटावयास आले असे म्हणावे. अशी स्थिति झाली असतां. आम्हाला जीवंत असतांनाच शरीरभावाने मरण प्राप्त झाले आणि आत्मस्वरूपाच्या दृष्टिने अनंत कल्पकोटी जीवित प्राप्त झाले. अशी स्थिति श्रीगुरूनिवृत्तिरायांनी केली असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


दीपप्रकाश दीपीं सामावला कळिके – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २७९

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *