संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

सर्वजीव तूं जालासी आपण तरी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३६६

सर्वजीव तूं जालासी आपण तरी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३६६


सर्वजीव तूं जालासी आपण तरी
निरय आपदा भोगिताहे कवण ।
परमात्मया तुमचें अविनाश स्वरुप
तरी येवढें कां कष्ट साधन ।
तूं अंतरीं परब्रह्म सांवळें म्हणोनि
जगत्रय व्यापिलें या ध्यानें ।
म्हणोनी तुमचा पुत्र जालों स्वामिया
जगाअधीन कां केलें माझें जिणें रया ॥१॥
तूं बाप म्हणतां मी लाजिलों
माघारा ठेलों ।
एकीकडे काळ एकीकडे संसार
मध्येंची वाटे ठेलों ।
ऐसिया संनिधी तुज जवळा येवों
पाहें तंव तुझीया देवपणा भ्यालों ॥२॥
नांदबिंदापासाव शरीर जन्मलें असाध्य
करुनी वरी साक्ष देऊनी मदामांसामाजी वाढविलें ।
कर्मदेह वेचुनी सत्य सुकृतालागी उपजविलें ।
तरी हें दैन्य दारिद्र कां भोगविलें ।
तुझीया बापपणा बोलु लागला तरी
मज पुत्रसें वायां म्हणितलें रया ॥३॥
आयुष्याची गणना करुनिया प्रमाण वरी
मनुष्यदेह ऐसें नाम ठेविलें ।
तें आयुष्य कां स्वामी तुम्हीं दोंठायी वाटिलें ।
अर्ध रात्रीचे अर्ध दिवसाचे निरय सत्त्व वेचिलें ।
पैल समर्थाचे बाळक रंके गांजिलें ।
त्याचें थोरपण तें काय जालें रया ॥४॥
बांधोनी जन्म आम्हांकडे भोगविसी आपणया
मायबाप म्हणविसी ।
विश्व प्रसवला या जागासी तरी आधारु
आहे ऐसे अनुवादसी ।
जगत्रजीव तव शिव हे तो
नये माझिया मनासी ।
पैल कीटकिये भृंगिये तैसी जाले
तैसें कां न करिसी आह्मासीरे ॥५॥
अल्प दोषासाठीं आह्मांतें दंडिसी
येवढें कैचे मंत्रसाधन जे भक्ति
करुनि निरसूं तयासी ।
तुज देखतां काळ शरीर फाडफाडुं
भक्षिताहे कवण कां सांडिली ऐसी ।
जठर सीणसीण फुटतील देवा
वायां कष्टविसिल आम्हांसिरे ॥६॥
दर्पणीं पाहातां येकचि दिसे तेथें
अनुसारिखें कांहीं न दिसे ।
रविबिंब उगवलिया किरणीं प्रकाश
आस्तु जालियावरी कांहीं न दिसे
तैसे गुरुशिष्य संवाद सोहं बोध
ऐक्य जालें अभ्यासें ।
याहूनि जाणसी तें करि वेळोवेळां आतां
सांगो मी तें कैसें रया ॥७॥
यमें जाचितां कांहीं नुरे यालागीं
मुनि सेविती वनवास ।
खवणीक फणीक लुंचनीक वसैत
भटभराडे धाकें करिती आरामसंन्यास ।
योग साधावया वनवास सेविती
करिती पवनअभ्यास ।
इंद्रियें दंडून परतोनि गृहस्थान न पवतीच
खडु पान रसु रया ॥८॥
जळींचा तरंगु जळीं निमाला
तो अनुठाया वेगळा नाहीं गेला ।
तैसा तुजमाजी दातारा मध्यें
कां हा प्रपंच वाढविला ।
तूं देव आम्हीं प्राकृत मनुष्यें हा
आगमु कां गमला ।
मज पाहतां हें अवघेंचि लटिकें जैसें
असेल तैसें सांग पां उगला ॥९॥
लवण पाणीयांसी कीं पाणी लवणासीं
ऐक्य जालियाविण निवडेना गुणास ।
लोहो लागलें परिसीं तें उठिलें
कनकेंसी बापरखुमादेविवरा
विठठला परियेसी ।
आजिपासून ये तरी तुझीच आण
पुढती न घाली न निघे
गर्भवासीं रया ॥१०॥

अर्थ:-

हे श्रीहरि जर सर्व जीव तुम्हीच झाला आहात तर नरकादि दुःखे कोण भोगतो? हे श्रीहरि, जीवरूप बनलेले तुमचे स्वरूप जर अविनाश आहे तर जीवाला तुमचे प्राप्ती करता येवढे साधनाचे कष्ट कां ? हे परब्रहा सांवळ्या श्रीकृष्णा तू सर्वांच्या अंतरात राहून जगत्रय व्यापले आहेस. म्हणून तुमच्या रूपाने मी तुमचा अंश म्हणजे पुत्र झालो असे असतां माझे जीवित पराधीन का केले ? यामुळे तू माझा बाप आहेस असे म्हणतांना लाज वाटून मी आपल्या स्वरूपाहून भित्र झालो, त्यामुळे एकीकडे काळ आणि दुसरीकडे संसार या दोन्हीच्या कचाट्यात अटकून पडलो. अशा स्थितीत तुमच्याकडे येण्याची इच्छा करितो.तो तुमचा मोठा देवपणा म्हणजे ऐश्वर्य पाहून भ्यालो. नादबिंदुपासून शरीर जन्मले. त्या शरीरा कडून भगवत्प्राप्ती वेदशास्त्राच्या साक्षीने असाध्य करून मद मांसामध्ये वाढविले. कमनि प्राप्त झालेले शरीर कष्ट सोसून सत्य सुकृत करण्यांकरिता उत्पन्न केले हे खरे पण दैन्य द्रारिद्र त्यांचे कडून कां भोगविलें? या कारणाने तुमच्या बापपणाला व माझ्या पुत्रपणालाही दोष लागला नाही काय? आयुष्याची शंभर वर्षाची निश्चित गणना करून हा शंभर वर्षे जगणारा मनुष्य देह आहे असे नांव ठेवले असे असूनही त्या आयुष्यात अर्धरात्र आणि अर्धदिवस अशी वाटणी का केली? व शुद्धसत्त्वरूपी जीवाचा नाश का केलास? दुसरे असे की आपल्या सारख्या समर्थाचे बालक यत्किंचित दीन देहाने गांजून टाकावे. मग तुमचे थोरपण कुणीकडे गेले? आम्हाला देहामध्ये बांधून कष्ट भोगवितोस आणि आमचा मायबाप तूं म्हणवितोस. आमचाच काय तर सगळ्यां जगाला प्रसवून त्यास सर्व जगाचा आधार आपणच आहो असे सांगतोस ज्या ज्या ठिकाणी जीवत्व आहे. त्या त्या ठिकाणी शिव आहे. म्हणजे परमात्मा आहे. हे माझ्या मनाला पटत नाही. ज्याप्रमाणे किटकी ध्यानाने भुंगरूप होते. त्याप्रमाणे आम्हां जीवाला परमात्मरूप कां करून टाकीत नाहीस? एक स्वरूपानुसंधान चुकले तर या दोषाकरिता आम्हास एवढी मोठी शिक्षा करतोस बरे यातून सुटण्याला असे काय मंत्र तंत्र भक्ति हे साधन आहे की त्याचे आराधन करून त्या दोषांचा नाश करून टाकतील. तुझ्या स्वरूपाचा विचार केला तर काय तुझे अविनाश स्वरूप, तुझे आम्ही पुत्र असतांना काळांनी आमची शरीरे तुझ्या समक्ष फाडून खावी तरी तुला आमची दया कां येत नाही. वारंवार मातेच्या उदरांत जन्म घेऊन जीवाने दुःख भोगावे असा व्यर्थ शीण आम्हालां कां देतोस?ववास्तविक विचार केला तर दर्पणांत आपुले रूप पाहता ते एकच दिसते त्याचे सारखे तेथे दुसरे कोणी नाही म्हणजे दुसरे दिसले तरी त्याला स्वतंत्र सत्ता नाही. सूर्य उगवला म्हणजे त्याची किरणे प्रकाशतात, आणि अस्त झाला म्हणजे ती दिसत नाहीत. त्याप्रमाणे गुरूशिष्याच्या संवादापासून सोहंबोधाच्या अभ्यासाने जीव ब्रह्मैक्य होते अशी स्थिती आहे. याहून काय निराळे तुला ठाऊक असेल ते तूं कर वारंवार मी किती सांगावे. यमाच्या तडाक्यांत कांही उरत नाही. याकरिता मुनी वनवास सेवन करितात. कोणी फिरतात. कोणी कफनी घालतात. कोणी हाताने केस उपटतात. कोणी भटकत फिरतात कोणी यमाच्या भयाने शास्त्रोक्त संन्यास करितात. योगसिद्धी करिता कोणी वनांत जाऊन प्राणायामाचा अभ्यास करितात.कोणी इंद्रियाचे दंडन करून त्यांना विषयापासून परतवितात. इतके करूनही भृगस्थान म्हणजे परमात्मपद प्राप्त होत नाही.व परमानंदाच्या रसांतही त्याला खंड पडतो म्हणजे त्यांना परमानंद प्राप्त होत नाही. (वास्तविक विचार केला तर अविद्येकडून परमात्म्याच्या ठिकाणी जीवभाव उत्पन्न होतो व विद्येचा उदय झाला परमात्म स्वरूपाच्या ठिकाणीच लय पावतो) जसा जळावर उत्पन्न झालेला तरंग जलाच्याच ठिकाणी लय पावतो. त्याप्रमाणे हे नारायणा, तुझ्या स्वरूपामध्ये तरंगाप्रमाणे आम्ही असून मध्ये हा प्रपंचाचा विस्तार का वाढविलास? म्हणजे तूं देव आम्ही मनुष्य असा भेद का विस्तारिलास. मला तर असे वाटते की हे सर्व खोटे आहे. यातील खरा प्रकार काय आहे. ते सांग पाहू. मीठ पाण्यात किंवा पाणी मिठांत पडून ऐक्य झाल्यानंतर त्याचे वेगळे गुण उरत नाहीत. लोखंडाला परिस लागल्याबरोबर त्याचे सुवर्ण होते. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठला, आजपासून मला पुन्हा गर्भवासात घालू नका. व मीही गर्भवास घेणार नाही अशी तुझी शपथ वाहून सांगतो असे माऊली सांगतात.


सर्वजीव तूं जालासी आपण तरी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३६६

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *