संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

सभा समस्त साधु संतांची – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३६९

सभा समस्त साधु संतांची – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३६९


सभा समस्त साधु संतांची ।
महामुनी विरक्ताची ।
पंडितपाठकज्ञानियांची ।
समस्तासी विनवणी ॥१॥
या पहिलिया पाहार्‍यांत ।
डौरकार सांगेल मात ।
समस्त रिझाल तुम्हीं संत ।
ऐका निवांत तुम्ही सर्व ॥२॥
आतां परिसा पांच नाच ।
पांच नादाचे पांच भेद ।
पहिला नाद चटपट चटपट ।
दुसरा नाद खटपट खटपट ।
पांचवा तळमळ तळमळ ॥३॥
पहिला नाद चटपट चटपट ।
शिखासूत्र त्यजुनी सपाट ।
विरजा होमिला दृष्ट ।
परि अपुट तैसाची ॥४॥
वाया केली तडातोडी ।
वृथा त्यजिली सूत्रूशेंडी ।
परि विषय वासना न सोडी ।
उपाधि गाढी श्रीपादा ॥५॥
संन्यास घेऊनी कांचा ।
जिव्हांशिश्न वेधलें लांचा ।
विटंबु केला बापुडे कायेचा ।
चटपट मनींचें मनीं वसे
गा दादेनो ॥६॥
खटपट खटपट । शास्त्रप्रज्ञा अलोट ।
बांधोनी व्युत्पत्तीची मोट ।
सैरा सुनाट धांवती ॥७॥
वादतर्का लागी धावे ।
भरला विषयाचे नांवे ।
वरिवरि वृंदावन दिसे बरवें ।
परी अंतरीं कडुवट गा दादेनो ॥८॥
लटपट लटपट ।
मेळवूनि शिष्यांचा थाट ।
अद्वैत ज्ञानाचा बोभाट ।
भरला हाट जिविकेसी ॥९॥
गुरु लोभी धनमानें ।
शिष्य लोभी अति दीन ।
दोघांसी लटपट लागली पुर्ण ।
कोणी कोणासी आवरेना ॥१०॥
ब्रह्मज्ञान जाहलें वोस ।
पाहिले दु:खाचे दिवस ।
अंतीं जाले कासावीस ।
कामपाश समंध गा दादेनो ॥११॥
आतां फटफट फटफट ।
या नादाची गोठ नीट ।
वोळागोनी ओटपीठ ।
उर्ध्व पाठ भेदिती ॥१२॥
मन पवन समरसोनी ॥
ब्रह्मरंध्रीं लीन होउनी ॥
हा अभिमान वाहोनी ।
जालेपणी फूंजती ॥१३॥
तें वोखटें गा डौरकारा ।
करोनि देहाचा मातेरा ।
भरुं पाहाती सुषुम्ना द्वारा ।
परि असाध्य खरा तो मार्गु ॥१४॥
ऐसी जालिया ब्रह्मप्राप्ती ।
शिणतोच अहोरात्रीं ।
अति विरोध भगवद्वक्ति ।
यालागीं बोलती फटफट हा दादेनो ॥१५॥
आतां तळमळ तळमळ ।
धरणीं पारणी हळहळ ।
तीर्थयात्रे लागीं चळपळ ।
घेतलें बळ तपाचें ॥१६॥
जपध्यान मंत्रावळी ।
नाना दैवतें आराधिलीं ।
शेखीं काळें नरडी चेंपिलि ।
दु:खें तळमळी या हेतु ॥१७॥
ऐसे भेद नादाचे ।
मनीं धरा विवेकाचे ।
ज्ञानदेव बोले निवृत्तिचें ।
बोला वाचें हरिनाम गा दादेनो ॥१८॥

अर्थ:-

पहाटेच्या वेळी डौरी लोक हातांत डौर नावांचे वाद्य घेऊन, मुखाने उपदेशाचे शब्द म्हणत येतात. या दृष्टांताप्रमाणे साधुसंत, महानुभाव, विरक्त, पंडित, पाठक ज्ञानी वगैरे मंडळी ज्या सभेत बसली आहेत. अशा सभेत येऊन डौरी सर्व मंडळींना विनंतीकरून म्हणतो. महाराज दिवसाच्या या पहिल्या प्रहरांत म्हणजे पहाटे मी अशी एक गोष्ट सांगतो की ज्या योगांने तुम्हाला संतोष होईल ती तुम्ही सर्वजण निवांत पणे ऐका. जगांतील लोक निरनिराळ्या नादांत गुंग आहेत. त्यापैकी पाच मुख्य नाद आहेत. ते येणेप्रमाणेः- पहिला चटपट, दुसरा खटपट, तिसरा लटपट, चौथा फटफट व पांचवा तळमळ तळमळ. या नादाचे स्पष्टीकरण पुढील चरणांतून करतात चटपट या नांदाने वैराग्य नसलेल्या माणसाने संन्यास घेतल्यास होणाऱ्या स्थितीचे वर्णन केले आहे. एखाद्याने ईश्वर प्राप्तीकरिता संन्यास घेतला, शिखा व यज्ञोपवित टाकून विरजा होम करून संन्यासी झाला. पण संन्याशाला आवश्यक ती अंतःकरणशुद्धी झाली नाही आणि हा पूर्विप्रमाणेच आहे. निष्कारण शिखा सूत्राची तोडातोडी मात्र केली. विषयवासनांचा त्याग करावयास पाहिजे होता तो तर केला नाही व विषय वासना तर परमेश्वरप्राप्तीतील मोठी अडचण होय. जिव्हा व शिश्न यांच्या भोग्य पदार्थाचा लोभ तर कायमच आहे. मग संन्यास कशाला केला? केवळ आपल्या शरीराची ही विटंबना केलीस. अंतःकरणांत विषय प्राप्त न झाल्याची चटपट आहे. ती आहेच. आता दुसरा नाद खटपट खटपट आहे. यानें केवळ शास्त्रीय शब्दज्ञान्याची स्थिती कशी असते. याचे वर्णन करतात. ज्यांनी शास्त्रांचा अभ्यास करून ‘अयं घटः अयंपटः वगैरे पुष्कळ खटपट केली व त्या योगाने पैसा मिळवून दारिद्र्य ही दूर करून कुत्र्यासारखा स्वैर धांवतो. वादांत तर्कशुद्ध बोलून प्रतीपक्ष मत खंडणास नेहमी तयार आहे. पण अंतःकरणातील विषयाची आवडमात्र कायम आहे. मग त्या शास्त्र शिकण्याचा काय उपयोग? कडू वृंदावन वरून कितीही जरी चांगले दिसले तरी आंत ते जसे कडु असतेच त्याप्रमाणे या शब्दज्ञान्याची स्थिती असते. डौरकाराचा तिसरा नाद लटपट असा आहे. या शब्दाने भोंदू गुरूंचे वर्णन केले आहे. काही लोक लटपट करून आपल्या भोवती शिष्य जमवून आम्ही ब्रह्मज्ञान प्राप्त करून देणारे गुरू आहोत असा बोभाटा करून आपल्या भोवताली जमविलेल्या बाजाराच्या योगाने उपजीविकेची सोय मात्र करतात. गुरू धनप्राप्तीचा लोभ धरून शिष्यांपासून धन काढण्याची व शिष्य गुरूला काही न देता दीनत्व दाखवून त्यांच्या घरी राहण्याची अशी दोघांची ही आपआपल्या परीने लटपट सुरू असते.व अशा रितीने त्यांच्यात चढाओढ होऊन ते एकमेकांना आवरेनासे होतात. शेवटी त्यांचे ते उसने आणलेले ब्रह्मज्ञान नाहीसे होते त्या दोघांनाही दुःखाचे दिवस येतात व शेवटी कामपाशरुप संबंध लागून त्यांचा जीव कासावीस होतो. आतां डौरकाराच्या चवथ्या फटफट नादानें योगाभ्यासी लोकांची हकिकत सांगतात. योगाभ्यासी लोक प्राणायामाच्या योगाने मनावर ताबा चालवून औटपीठ नावांच्या महाकारण स्थानाचा आश्रय करून प्राणाला मस्तकांत नेऊन ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी स्थीर करतांत आणि आपण पूर्ण योगी झालो अशा गर्वाने फुगून जातात. हे मला डौरकारालाही बरे वाटत नाही. अशा रितीने देह कष्ट सोसून सुषुम्नेच्या मार्गाने ब्रह्मरंध्री प्राणवायु स्थीर करून परमात्मप्राप्ती करून घेणे हा खरोखर असाध्य मार्ग आहे. अशारितीने भगवत्प्राप्तीला विरोधी व अहोरात्र खटपट करून तरी या मार्गाने भगवत्प्राप्ती कोणाला झाली आहे ? व ती न झाल्यामुळे तिला फटफजिती दर्शक फटफट हा नाद डौरकाराने वापरला आहे. आतां पाचवां नाद तळमळ तळमळ” याने तिर्थयात्रा व्रते वैकल्ये करूनही चित्ताला शांती नाही. अशा लोकांच्या स्थितीचे वर्णन करतात. एक दिवस उपवास व दुसरे दिवशी पारणे या व्रताला धरणे पारणे म्हणतात. असे धरणे पारणे जीवाला हळ हळ लावूनहि केले. घाईने तिर्थयात्रा केल्या तपाचें बलही संपादन केले. जप केला, तप केले, ध्यान केले मंत्रबलाची पारायणे झाली. निरनिराळ्या देवतांचे आराधन केले पण शेवटी काळाने नरडी दाबावयाची ती दाबलीच व इतके उपाय करणाऱ्या जीवांना दुःखाने तळमळावयास लाविले. अशा रीतीने आत्यंतिक सुखप्राप्ती करिता नाना तहेचे उपाय नादांच्या रूपकाने तुम्हाला सांगितले. त्याचा नीट विचार करून मनांत धरा व तोंडाने हरिनामाचा उच्चार करा असे निवृत्तीनाथांचे शिष्य माऊली ज्ञानदेव सांगतात.


सभा समस्त साधु संतांची – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३६९

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *