संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

पूर्वजन्मीं पाप केलें तें हें बहु विस्तारिलें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३७५

पूर्वजन्मीं पाप केलें तें हें बहु विस्तारिलें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३७५


पूर्वजन्मीं पाप केलें तें हें बहु विस्तारिलें ।
विषयसुख नाशिवंत सेवितां तिमिर कोंदलें ।
चौर्‍यांशी लक्ष योनी फ़िरतां दु:ख भोगिलें ।
ज्ञान दृष्टि हारपली दोन्ही नेत्र आंधळे ॥१॥
धर्म जागो सदैवांचा जे बा परउपकारी ।
आंधळ्या दृष्टि देतो त्यांचे नाम मी उच्चारीं ॥२॥
संसार दु:खमूळ चहुंकडे इंगळ ।
विश्रांति नाहीं कोठें रात्रंदिवस तळमळ ।
कामक्रोधलोभशुनीं पाठीं लागलीं वोढाळ ।
कवणा शरण जाऊं आतां दृष्टि देईल निर्मळ ॥३॥
मातापिता बंधु बहिणी कोणी न पवती निर्वाणीं ।
इष्टमित्रसज्जनसखें हे तों सुखाची मांडणी ।
एकला मी दु:ख भोगीं कुंभपाक जाचणी ।
तेथें कोणी सोडविना एका सदगुरुवाचुनी ॥४॥
साधुसंत मायबाप तिहीं दिलें कृपादान ।
पंढरीये यात्रे नेलें घडलें चंद्रभागे स्नान ।
पुंडलिकें वैद्यराजें पूर्वी साधिलें साधन ।
वैकुंठीचें मूळपीठ डोळां घातले तें अंजन ॥५॥
कृष्णांजन एकवेळा डोळां घालितां अढळ ।
तिमिरदु:ख गेलें तुटलें भ्रांतिपडळ ।
श्रीगुरु निवृत्तिराजें मार्ग दाविला सोज्वळ ।
बापरखुमा-देविवरुविठ्ठल
दिनाचा दयाळ ॥६॥

अर्थ:-

मी मागच्या जन्मामध्ये पापाचरण केले, त्यामुळे हा जन्ममरणाचा विस्तार झाला जन्माला आल्यानंतर नाशिवंत विषय सुख भोगण्यामुळे ते पाप अधिकच वाढत गेले. त्यामुळे अंधकाराने डोळे कोंदुन गेले. व चौऱ्यांशी लक्ष योनीत फिरता फिरता दुःख भोगावे लागले. आणि आत्मज्ञानाची दृष्टि नसल्यामुळे दोन्ही नेत्र आंधळ्या सारखे झाले. परमभाग्यवान जे निवृत्तिराय ते अत्यंत परोपकारी असून आत्मज्ञानशून्य पुरुषाला आत्मज्ञान दृष्टि देणारे आहे. म्हणून मी त्यांच्या नावांचा वारंवार जप करतो. त्यांच्या ठिकाणी सहज असलेला आत्मज्ञानाचा धर्म माझे ठिकाणी जागृत होवो. संसार हा दुःखमूळ असून त्रिविध तापाचे इंगळ त्यांच्या भोवती पसरले आहे. त्यामुळे जीवांना क्षणमात्र कोठेही विश्रांती नसल्यामुळे रात्रंदिवस तळमळ लागलेली असते काम क्रोध लोभरुपी ओढाळ कुत्री पाठीस लागलेली असल्यामुळे अशा स्थितीतून सुटण्यांकरिता मी कुणाला शरण जाऊ? कि ज्यामुळे ते मला आत्मस्वरुपाविषयी निर्मळ दृष्टि देतील. वास्तविक विचार केला तर आई बाप बहिणी हे अंतःकाळाच्या वेळेला उपयोगी पडत नाही. इष्ट मित्र सोयरे धायरे हे आपले येथे जोपर्यंतच आपला सुखाचा व्यवहार चाललेला आहे. तोपर्यंतच जमतात मी मात्र संसारिक दुःख( जन्ममरणाचे दुःख) एकटाच भोगीत असून कुंभपाकादि नरकाच्या जाचणीत मला एकट्याला दुःख भोगावे लागते. त्या दुःखातून सोडवणारा जर कोणी असेल तर ते एक श्रीगुरुच आहेत. माझे भाग्य धन्य आहे. कारण मायबाप जे साधुसंत त्यांनी मला कृपादान करुन पंढरीच्या यात्रेला नेले त्याठिकाणी चंद्रभागेचे स्नान घडले. पुंडलिक वैद्याने अज्ञानरुपी अंधत्व जाण्याकरिता पूर्वीचे औषध तयार करुन ठेवले होते. ते वैकुंठीचे मूळपीठ भगवान पांडुरंगरुपी अंजन मी डोळ्यांत घातले. ते कृष्णांजनरुपी अंजन मी डोळ्यांत घातल्याबरोबर अज्ञानरुपी दुःखबीज जाऊन संसारभ्रांतीच्या पडळातून मुक्त झालो. दीनजनांचा दयाळू असलेले माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल यांच्या प्राप्तीचा सोज्वळ मार्गश्रीगुरुनिवृत्तिरांयांनी मला दाखविला. असे माऊली सांगतात.


पूर्वजन्मीं पाप केलें तें हें बहु विस्तारिलें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३७५

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *