संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

त्रिपदा चतुष्पदा गायत्रीस्मरण – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३८८

त्रिपदा चतुष्पदा गायत्रीस्मरण – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३८८


त्रिपदा चतुष्पदा गायत्रीस्मरण ।
त्याचे विस्मरण हरिप्रेमें ॥१॥
निवृत्ति सांगे हरीनामगंगें ।
जालासि सर्वागें गंगोदक ॥२॥
पाणिपाद चित्तवृत्ति हे बुडाली ।
देहीं गेहा गेली प्रीति सदा ॥३॥
चक्षुद्वयतेज हरिरुपीं बिंबे ।
पृथ्वीतळ अंभ हरि दिसे ॥४॥
सुलज्ज निर्लज्ज मेघवर्णशाम ।
सांवळा सप्रेम गुणग्राह्य ॥५॥
थोडेनि आतुडें सडेनि पदार्थें ।
येतु असे अर्थे ह्रदयामाजी ॥६॥
नाम मंत्र रुप इतुकेन संकेत ।
देतुसे अर्थ दीनाचा दाता ॥७॥
बापरखुमादेवीवरुविनत सोपारा ।
मरणाच्या येरझारा दुर केल्या ॥८॥

अर्थ:-

विकल्पाने त्रिपदा किंवा चतुष्पदा गायत्रीमंत्राची उपासना श्रीहरिचे ज्ञान करून देते. त्याश्रीहरिच्या प्रेमामध्ये मी रंगून गेल्यामुळे मला गायत्री मंत्राच्या उपासनेचे विस्मरण होऊन गेले. कारण असा सिद्धांत आहे की साध्य सिद्ध झाल्यावर साधनाची आवश्यकताच राहात नाही. निवृत्तीरायांनी मला हरिनाम गंगेचे महत्व सांगितले मात्र तो मी सर्वांगाने गंगोदकच झालो. त्यामुळे इंद्रिये किंवा देंह या सर्वांचा लय देंही जो परमात्मा त्यांत झाल्यामुळे त्याचे ठिकाणी नित्य प्रीति राहिली. चक्षुद्वयांत दिसणारे तेज, पृथ्वीचा आश्रय जे उदक ते सर्व हरिरूपच दिसू लागले. सुलज्ज म्हणजे सगुण, निर्लज्ज म्हणजे निर्गुण सर्व गुणांचा ग्रहण कर्ता जो श्रीकृष्ण परमात्मा तो सर्व पदार्थाचा त्याग करून अगदी मोकळा झाला असता थोडक्यातच स्वस्वरूपाने हृदयांत प्रगट होतो. या सर्वांचे मुख्य वर्म नाममंत्र हे आहे. एवढ्या संकेताने दीनांचा दाता जो श्रीगुरूनिवृत्तिराय तो सर्वाना नाममंत्राचे दान देत आहे. त्यांनी माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांच्या ठिकाणी नम्र होण्याचा सोपा मार्ग दाखवून देऊन सर्वांच्या जन्ममरणाच्या येरझारा नाहीशा केल्या.


त्रिपदा चतुष्पदा गायत्रीस्मरण – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३८८

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *