संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

घरदार वोखटें त्यजूं म्हणसी तरी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४६२

घरदार वोखटें त्यजूं म्हणसी तरी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४६२


घरदार वोखटें त्यजूं म्हणसी तरी
शरीरा येवढें जाड ।
मायबाप वोखटी त्यजूं म्हणसी तरी
अहंकार अविद्येचें कोड ॥
बंधु सखे त्यजूं म्हणसी तरी
काम क्रोध मद मत्सर अवघड ।
बहिणी पाठीच्या त्यजूं म्हणसी आशा
तृष्णा माया अवघड रया ॥१॥
त्यजिलें तें काय कासया म्हणिजे
सांग पा मजपांशीं ऐसें ।
जया भेणें तूं जासी वनांतरा
तें तंव तुजचि सरिसें रया ॥२॥
स्त्रीं वोखटी त्यजूं म्हणसी तरी
कल्पने येवढी भोगती ।
पुत्र अपत्य त्यजूं म्हणसी
तरी इंद्रियांसि नाहीं निवृत्ति ।
सकळ गणगोत त्यजूं म्हणसी
तरी हे अष्टधा प्रकृति ।
आवघेंचि त्यजूं पाहे म्हणसी तरी
मना नाहीं निज शांति रया ॥३॥
अवघींचि तुज जवळी दुमदुमित असतां
वरीवरी मुंडिसी कां करिसी विटंबना ।
सहज संतोषें असोनि तैसा जैसा
परि तो सदगुरु पाविजे खुणा ।
आपुले आश्रमीं स्वधर्मीं असतां
सर्वत्र एकुचि जाणा ।
बापरखुमादेविवरुविठ्ठलु इतुकिया
साठीं नेईल वैकुंठभुवना ॥४॥

अर्थ:-
घरदाराचा त्याग करुन जर वनात जायचे झाले तरी शरिराचे जड ओझे तुला वाहावे लागेल. मायबाप वाईट म्हणुन टाकु गेलास तरी अहंकार व अविद्येचे कोड तुला आहे. बहिंण भाऊ त्यागले तरी काम क्रोध मद मत्सर टाकणे अवघड आहे. पाठची बहिण सोडायची म्हंटली तर आशा तृष्णा व माया बंंड करतात. येवढा सारा पकिवार टाकलास तो काय हे मला सांग. व ज्याला भिऊन तु वनात जात आहेस ते तर तुझ्या सतत सोबत आहेत. बायको टाकलीस तरी कल्पनारुपी बायको तुझ्या सतत जवळ आहे. पुत्र, अपत्य टाकु गेलास तर ती इंद्रिय पासुन तुला निवृत्ती नाही. सगळे गणगोत टाकलेस तरी अष्टमा प्रकृती सोबत आहेत.व सर्वच सोडु पाहिलेस तर मनांत शांती नाही.मग येवढे सगळे बरोबर असताना वरवर दंडण मुंडण का करतोस? तु जसा आहेस तसा रहा ही सद् गुरुनी सांगितलेली खुण आहे. तु ज्या वर्णाश्रमात आहेस, जो तुझा स्वधर्म आहे त्या प्रमाणे त्यांच्याशी एकरुप होऊन रहा. तु फक्त येवढेच केसेस तर माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल तुला वैकुंठात नेतील असे माऊली सांगतात.


घरदार वोखटें त्यजूं म्हणसी तरी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४६२

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *