संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

बाहिजु भीतरी भीतरलेपणा ऊरी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५७१

बाहिजु भीतरी भीतरलेपणा ऊरी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५७१


बाहिजु भीतरी भीतरलेपणा ऊरी ।
ऊरी ऊरैल साचारी जेणें निवविजे ॥
तेथचिया सारा मुसें मुसल्या आकारा ।
सोय सांडु नको येरझारा चुकतील ॥१॥
सहज भक्तिसुख पावसील ।
जाणु असतां काम नेणु होतासी ।
मागिली ये तुटी साठीं ।
लाभु ये खेपेचा मनुष्यपणाचेनि
मापें घेइजेसु रया ॥२॥
येकवटु वटवटाच्या पोटीं ।
बिजीं बिजा आंतवटु आपण पैं ।
तिहीं रजीं रजु सरे
सरोनियां जें उरे ।
तैसें एकसरां धुरें तूं अनुसरे पां ॥३॥
रविरश्मीचिया तेजा कवण
बैसविलिया वोजा ।
कैशा सांगताति गुजा सामवलेपणें ॥
जळीं तरंगु तैसा परमात्मा परमानंदु ।
ऐसा सांडूनि गोविंदु झणें
विलया जासी ॥४॥
जळें जळ पियींजे तेथें
काय उरे दुजें ।
ओघें ओघुचि गिळिजे बाप
सागरा पोटीं ॥
सिंधु नेणे अव्हांटा नदीचिया वाटा
तैसा करीलरे हरि सांठा
तुज आपणामाजी ॥५॥
तेथे जगचि परतलें जग
जगपणा मुकलें ।
मोहो अभावीं उरलें उरतां ठायीं ॥
तेथें सिंधुचि अवघा
अवघेपणें नये मागा ।
यापरी लागवेगी हरि पावसी रया ॥६॥
ऐसे सुखाचे सोहळे माजी
सुख प्रेमवोळे ।
कवण सुख बोले सुख
सुकाळे मातलें तें ॥
तेथें मीतूं सरे सेखीं
भक्त तोही नुरे ।
शिवीं शिव विरे मोहरे
जालया रया ॥७॥
अमृतीं अमृता गोडी बोल
बोलतां बोबडी ।
पुण्य मनोधर्मी गुढी
उभारिली जेणें ॥
अमरवोघाचेनि वोघे
आफ़ाविजे जिवलगें ।
बापरखुमादेविवरा
विठ्ठलांसंगें सांपडलें ॥८॥

अर्थ:-
परमात्मा सर्व पदार्थाच्या आत बाहेर भरुन उरला आहे. सर्व द्वैताचा त्याग होऊन त्याला ते अद्वैतच सत्यत्वाने उरी उरेल आहे. त्या परमात्म ज्ञानानेच सर्व दुःखे निवृत्त होऊन मन शांत होईल त्या ब्रह्मतत्त्वांतून मन काढू नको. परमात्म्याच्या ठिकाणी जर मन ठेवले तर मुशीत ओतलेला रस जसा मुशीच्या आकारांचा होतो. त्याप्रमाणे ब्रह्म चिंतन करणारे मन ब्रह्मरुप होईल. मन जर ब्रह्मरुप झाले तर आपोआपच जन्ममरणांच्या येरझारा चुकतील. अशा सहज ब्रह्मरुप अवस्थाने भक्तिने. तुला परमानंद प्राप्त होईल, असे तुला ठाऊक असता तू नेणता का होतोस? मागील अनंत जन्मांत या विचाराचा लाभ तुला झाला नाही. तो लाभ या खेपेच्या मनुष्यपणाच्या मापाने पदरात पाडून घे. एकरस वटवृक्षाच्या पोटात जसे वटबीज आणि वटबीजाच्या आंत जसा वटवृक्ष असतो. त्याप्रमाणे वाढलेल्या एवढ्या जगरुपी विस्तारांत तू आपणाला साठव म्हणजे आत्मत्त्वाने पहा. सत्व, रज, तम हे गुण विचाराने लय पावले असता त्यांचे अधिष्ठान जे परमतत्त्व हे उरते. त्या परमतत्त्वासच मुख्य साध्य करुन त्यालाच अनुसर. सूर्याचे किरणामध्ये व्यवस्थित रितीने तेज कोणी बसविले आहे. वगैरे तत्त्वज्ञानविषयक युक्ती आहेत.त्या परमात्म तत्त्वाच्या व्याप्ती विषयी श्रीगुरु सांगतात. जळावरील तरंगाचा भेद ज्याप्रमाण वस्तुतः नसून दिसतो. त्याप्रमाणे परमानंद जो परमात्मा त्याच्याठिकाणी मिथ्या भेद नसताही दिसतो. तो निश्चयाने टाकून दे. म्हणजे परमानंद स्वरुप होईल. परमानंदस्वरुपस्थिती झाल्यावर जरी हा भास दिसला तरी त्यांत परमात्म स्वरुपाशिवाय दुसरे काही नाही. जळाने जल प्याले असता, वोघाने वोघ गिळला असता, सागराच्या पोटात नदी शिरत असता समद्र त्याला आड वाट करीत नाही. त्याप्रमाणे परमात्मा श्रीहरि तुला आपल्या पोटांत साठवून घेईल. त्यास्वरुपाच्या ठिकाणी जग परतून लयाला जाईल. त्याप्रमाणे मोहादिकही उरणार नाही. त्याठिकाणी तो परमात्मसिंधुच सर्व प्रकाराने असतो. या प्रमाणे तू परमात्मस्वरुपाच्या ठिकाणी ऐक्य होण्याच्या उपायाची गर्दी केलीस तर तू हरिरुपासी ऐक्य पावशील. अशा सुखाच्या सोहळ्यांत तुझ्या ठिकाणीही प्रेमसुख वाढेल. त्या सर्व व्याप्त असलेल्या सुखाच्या सुखांत त्या सुख म्हणण्याला मीतूपण उरले आहे कोठे, भक्तभावही नाहीसा झाला. शिव जो सर्वत्र व्याप्त ईश्वर त्याच्याकडे मोहरे’ म्हणजे विचाराची दृष्टी गेली असता, तो ईश्वरही ‘ शिवी’ म्हणजे परमात्मस्वरुपात विरुन जातो. अमृताच्या ठिकाणची गोडी वर्णन करु लागले असता, ते बोलच बोबडे होतात. अशा प्रकारचे अनंत जन्मांच्या ठिकाणचे संपादन केलेले मनांत असलेले. पुण्य संस्काराने त्या पुण्याची गुढी ज्याने उभारली त्याला ते अमर स्वरुपाच्या ओघामध्ये ऐक्य करुन देण्याचे ऐश्वर्य जिवलग, जे माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांची अनन्य भावाने भक्ति केली असता सापडेल असे माऊली सांगतात.


बाहिजु भीतरी भीतरलेपणा ऊरी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५७१

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *