संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

जाणों गेल्यें तंव जाणणें राहिलें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६७१

जाणों गेल्यें तंव जाणणें राहिलें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६७१


जाणों गेल्यें तंव जाणणें राहिलें ।
पाहो गेलिये तंव तेंचि जालेंगे माये ।
इंद्रियांसहित चित्त ठकलेंचि ठेलें ।
मी माझें विसरलें स्वयें भाव ॥१॥
ऐकोनि देखोनि मन होय आंधळे ।
परतोनि मावळे नाहीं तेथें ॥२॥
अविद्या निरसली माया तुटली ।
त्रिगुण साउली तेथें रुप कैचें ।
चांग विचारीलें विवेकें उगवलें ।
ज्ञान हारपलें तयामाजी ॥३॥
मुकियाचे परी आनंदु भीतरी ।
अमृत जिव्हारीं गोड लागे ।
बापरखुमादेविवरु विठ्ठलु जाणे ।
संत ये खुणें संतोषलें ॥४॥

अर्थ:-
मी परब्रह्माला जाणून घेण्याकरिता गेलें तो माझे ठिकाणचा जाणणेपणाच नाहीसा झाला. याचा अर्थ अज्ञानाची निवृत्ति झाल्यानंतर तत्सापेक्ष ज्ञानही उरले नाही. मी परमात्मरुप झाले. इंद्रियांसह वर्तमान चित्त नाहीसे होऊन मी माझा असा देहभावच विसरुन गेले. आतां माझी स्थिती कशी झाली म्हणाल तर कानांनी ऐकणे, डोळ्यानी पाहाणे. वगैरे इंद्रियाच्या क्रिया करण्यांविषयी मन आंधळे झाले. पुन्हा विचार करुन पाहावे तो ही सर्व तेथें नाहीसीच होतात. कारण मूळ अविद्या नाहीसी झाली म्हणजे मोह नाहीसा होतो. अविद्याच नाही मग त्याठिकाणी रुप कशाचे? हे परमात्म स्वरुप चांगला विचार करुन पाहिले. तेव्हां तें आपोआप अंतःकरणांत उत्पन्न झाले. आणि माझ्या ठिकाणी ज्ञान आहे. असे मी समजत होते. ते ज्ञानही परमात्मरुप झाले. मुक्याचा आनंद ज्याप्रमाणे त्याला बोलता येत नाही. त्याप्रमाणे. आत्मानंदाचे अमृत अंतःकरणांतच गोड वाटते. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते माझ्या हृदयातील ही सर्व स्थिती जाणतात व ह्याच खुणेने संत संतुष्ट होतात. असे माऊली सांगतात.


जाणों गेल्यें तंव जाणणें राहिलें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६७१

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *