संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

देवा तुज चुकलों गा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७२३

देवा तुज चुकलों गा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७२३


देवा तुज चुकलों गा ।
तेणें दृष्टि आलें
पडळ विषयग्रंथीं गुंतलोसे ।
तेणें होतसे विव्हळ ।
अंध मंद दृष्टि झाली ।
गिळूं पाहे हा काळ ।
अवचितें दैवयोगें ।
निवृत्ति भेटला कृपाळ ॥१॥
धर्म जागो निवृत्तिचा ।
तेणें फ़ेडिलें पडळ ।
ज्ञानाचा निजबोधु ।
विज्ञानरुप सकळ ॥२॥
तिहीं लोकीं विश्वरुप ।
दिव्य दृष्टी दिधली ।
द्वैत हें हरपलें
अद्वैतपणें माउली ।
उपदेशु निजब्रह्म ।
ज्ञानांजन साउली ।
चिद्रूप दीप पाहे ।
तेथें तनुमनु निवाली ॥३॥
दान हेंचि आम्हा गोड ।
देहीं दृष्टी मुराली ।
देह हें हरपलें ।
विदेह वृत्ति स्फ़ुरली ।
विज्ञान हें प्रगटलें ।
ज्ञेय ज्ञाता निमाली ।
दृश्य तें तदाकार ।
ममता तेथें बुडाली ॥४॥
प्रपंचु हा नाहीं जाणा ।
एकाकार वृत्ति जाली ।
मी माझे हारपलें ।
विषयांधया बोली ।
उपरती सदगुरु बोधु ।
तेथें प्रकृति संचली ।
धर्ममार्गे शुध्द पंथ हातीं
काठी दिधली ॥५॥
वेद मार्गे मुनी गेले त्याच
मार्गे चालिलों ।
न कळेचि विषयअंध म्हणोनी
उघड बोलिलों ।
चालतां धनुर्धरा ।
तरंगाकारी हरलों ।
ज्ञानदेवो निवृत्तिचा ।
द्वैत निसरलों ॥६॥

अर्थ:-

हे देवा मी आपल्या यथार्थ आत्मस्वरुपाला चुकलो म्हणून अज्ञानामुळे माझे डोळ्यावर पडळ येऊन विषयाच्या गुंतड्यात अटकून अतिशय दुःख भोगणारा असा होऊन विवळत आहे. दृष्टि आंधळी झाली असल्यामुळे देहच मी आहे अशी समज आहे. त्यामुळे काळ माझा ग्रास करीत आहे. या भयाने भयभीत असता प्रारब्ध योगाने सहज अत्यंत दयाधन श्रीगुरू निवृत्तीराय यांची गाठ पडली. त्यांचा स्वाभाविक धर्म जीवांना आत्मस्वरूपाविषयी जागे करण्याचा असल्यामुळे त्या श्रीगुरू निवृत्तिरायांच्या स्वाभाविक धमनि माझे डोळ्यावरील अज्ञानाचे पडळ फेडून ज्ञानाच्या योगाने आत्मज्ञानाचा बोध त्यांनी दिल्यामुळे सर्व त्रैलोक्य ज्ञानरूप दिसु लागले. त्यांनी आत्मज्ञानाची दिव्य दृष्टि दिल्यामुळे तिन्ही लोक परमात्मरूप होऊन द्वैत नाहीसे झाले. अद्वैत स्वरूप जे सद्गुरू निवृत्तिराय माऊली यांनी निजात्मब्रह्मबोध हेच कोणी एक ज्ञानांजन घालून मला त्या सावलीत शांत केले. त्या चैतन्यरूप दीपाने पाहिले असता त्या बोधाचे ठिकाणी तन आणि मन ही शांत झाली. हे श्रीगुरूंनी केलेले दान आम्हाला फार गोड होऊन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी माझी दृष्टि मुराली. त्यामुळे देहदृष्टि नष्ट होऊन विदेहदृष्टि स्फुरण पावली. आत्मबोध प्रत्यक्ष होऊन ज्ञेय ज्ञानादि द्वैत नष्ट होऊन गेले. सर्व दृश्य परमात्मरूप होऊन तत्संबंधी माया नाहीशी झाली. आतां माझा निश्चय असा झाला आहे की प्रपंच हा मुळीच न झाल्यामुळे एक परमात्मरूपच वृत्ति झाली. विषयांधदशेत मी आणि माझे असा जो व्यवहार होत होता तो सर्व नष्ट होऊन गेला. विषयाविषयी निवृत्ति झाल्यामुळे सद्गुरूंनी जो बोध केला. त्याच ठिकाणी प्रकृति किंवा प्रकृतीकार्य प्रपंच लय पावले. धर्माच्या मार्गाने शुद्ध पंथ चालवण्याकरिता हातात भक्तिची काठी दिली. कारण वेदांनी प्रतिपादन केलेल्या मार्गाने ऋषीमुनी वगैरे गेले त्याच मार्गान मी चाललो आहे. विषयांधाना हे कळत नाही. म्हणून मी आपला अनुभव स्पष्ट सांगितला. याकरता प्रपंच मार्गात चालला असता धर्माचा आश्रय करा. तसा आश्रय मी केला म्हणून विषयरूपी तरंगाकडून मी सुटलो. श्रीगुरूनिवृत्तीरायांचा शिष्य जो मी त्यांच्या कृपेने सर्व द्वैताचा निरास झाला. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


देवा तुज चुकलों गा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७२३

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *