संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

साखरेचा ऊंस जरी होय पुढती – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७८८

साखरेचा ऊंस जरी होय पुढती – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७८८


साखरेचा ऊंस जरी होय पुढती ।
मथितां घृतीं काय क्षीर निवडे ॥१॥
माघारे जीवन जरी वाहे सरिता ।
तरिच जन्मां येती हरिचे दास ॥२॥
विविधा मति भक्ति जे करिती ।
ते अंती नव्हती संसार बापा ॥३॥
कापुराचे मसि जरी लिहिजे लिखित ।
जरि छाये पडे हात प्रकृतीचे ॥४॥
पवना पाठीं पांगुळें लागती ।
तैं जन्मा येति हरिचे दास ॥५॥
संत वैष्णव हरिदासा जे नर निंदिती ।
आणि नमनिती ते वरपडे होती प्रेम किंकर ॥६॥
निवृत्तिदास म्हणे विव्हळी जे भजती ।
ते जन्मा न येती भाक माझी ॥७॥

अर्थ:-

साखरेपासून पुन्हां उस कधी निर्माण होईल काय? तूप घुसळून त्याच्यापासून लोणीपरत निघेल कां? नदीचा ओघ परत डोंगरातील उगमांकडे वळेल का? या गोष्टी जशा अशक्य आहेत.तसे हरिदासांना पुन्हा जन्मास येणे अशक्य आहे. विविध प्रकारची जे श्रीहरिचे भक्ति करतात ते पुन्हा संसारपाशांत अडकणार नाही.कापुराच्या शाईने कधी कुणास लिहीता येईल का? सूर्योदयाबरोबर आपल्या छायेवर आपला हात पडेल का? वाऱ्यांच्या पाठीमागे पांगळे धांवतील का? या गोष्टी जशा अशक्य तसेच हरिचे दास पुन्हा जन्मास येणे अशक्य.संत वैष्णव हरिचे दास जे संत, त्यांची निंदा करणारे ते वैषयीक लौकिक प्रेमाचे दास असतात. जे श्रीहरिला आर्ततेने भजतात ते पुन्हा जन्मास येत नाहीत. अशी माझी श्रीनिवृत्तीच्यादास माऊलींची शपथपूर्वक वाणी आहे.


साखरेचा ऊंस जरी होय पुढती – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७८८

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *