संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

शून्याचा उदभव सांगतों या बोला – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८८१

शून्याचा उदभव सांगतों या बोला – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८८१


शून्याचा उदभव सांगतों या बोला ।
औटापिठीं वहिला सूक्ष्म मार्ग ॥१॥
मनपुराचे वरी द्वादश आंगुळें ।
तयावरी गेले अव्हाटेने ॥२॥
आतां तया सदनीं उफराटें मार्गे ।
वळंघिता सवेग पश्चिम पंथीं ॥३॥
पश्चिमपंथीं नाडी घोष वाहे जीचा ।
तेथुन ध्वनीचा विस्तार गा ॥४॥
ध्वनीचेंही वरी शुध्द तेज असे ।
चंद्रमा प्रकाशे तेच ठायीं ॥५॥
चंद्राचे वरी एक निराळाच मध्य ।
स्त्रियेचें निजबोधें निजरुप ॥६॥
निखिल जें तेज ज्याचेनी अमृत ।
जीववी देहींत देह दैव ॥७॥
औटापिठातळीं सर्व तें दीसे ।
सूर्य हा प्रकाशे तेच ठायीं ॥८॥
ज्ञानदेव म्हणे मज त्रिकुटाची गोडी ।
धरितां आवडी ब्रह्म लाभे ॥९॥

अर्थ:-

योग्यांना ध्यान करित असता जो निलबिंदु दिसतो त्याला शुन्य म्हणतात. त्या शून्याची उत्पत्ति कशी होईल. याचा मार्ग दाखवितात. महाकारण स्थानात औटपीठ म्हणुन एक स्थान आहे. तेथे चित्ताची स्थिरता झाली म्हणजे हे शुन्य दिसेल असे असल्यामुळे त्याला औटपीठीचा मार्ग सांगतात. औटपीठा कडे जाण्याला, चांगला सूक्ष्म मार्ग आहे. तो असा, प्रत्येक जीवाच्या देहांत मन हेच कोणी एक शहर त्याच्यापुढे बारा बोटापर्यंत चांगला मार्ग आहे. त्याच्यापुढे थोडे आड रस्त्याने जावे लागते. पुढे त्या ठिकाणाहून उलट मार्गाने येऊन वळण घेऊन पश्चिमेच्या मार्गाने जावे. तेथे एक प्रकारचा आवाज ऐकू येतो व तेथून ध्वनीला सुरवात होते. या ध्वनी स्थानाच्याही वर शुद्ध तेज आहे.तेथे चंद्रप्रकाश दिसतो. त्या चंद्राच्याही वर तेजोमय आत्मरूप दिसते. त्याठिकाणच्या अमृत स्थानाने देहधारी जीवंत राहतात. या औटपीठा तच तो नीलबिंदु दिसतो.सूर्योदयानंतर जसा प्रकाश पडतो तसा तो प्रकाशमय आहे. महाकारणाचे जे दुसरे स्थान त्रिकूट त्याची मला आवड आहे. त्या आवडीच्या योगाने पुढे ब्रह्मप्राप्ती होते. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


शून्याचा उदभव सांगतों या बोला – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८८१

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *