sant eknath maharaj

एकनाथी भागवत अध्याय 6

एकनाथी भागवत अध्याय 6 – आरंभ

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
ॐ नमो श्रीजनार्दना । भावार्थें नमितां चरणा ।
जनेंसहित मीपणा । नाहींच जाणा स्वयें केलें ॥१॥
हे ओंकाररूप श्रीजनार्दना ! तुला नमस्कार असो. भक्तिभावानें तुझ्या चरणाला नमस्कार केला असतां, जनासहवर्तमान मीपण आपोआपच नाहीसे होते १.

लिंगदेहाचें मर्दन । तेंचि जनाचें अर्दन ।
यालागीं नामें जनार्दन । प्रगट जाण प्रसिद्धी ॥२॥
लिंगदेहाचे मर्दन म्हणजेच जनाचे अर्दन (नाश) होय. म्हणूनच ‘जनार्दन’ ह्या नांवानें तुझी प्रसिद्धि आहे २.

तुझी ऐशीच करणी । कर्म कर्ता नुरवूनि ।
सुखें नांदविसी जनीं । समाधानीं जनार्दना ॥३॥
हे जनार्दना ! तुझी करणीही तशीच आहे. कर्म किंवा कर्तेपणा उरूं न देतां भक्तांना जनामध्यें सुखसमाधानानें तूं नांदवितोस ३.

सुखेंचि तुझें नाम घेतां । घातु करिसी जीविता ।
जीवु घेऊनि तत्वतां । होसी सर्वथा कृपाळू ॥४॥
आनंदानें तुझें नांव घेतले असतां तूं जीवपणाच हरण करतोस. आणि खरोखर जीव घेऊनही निरंतर कृपाळू असतोस ४.

तुझे नामाचें प्रबळ बळ । माथा नुधविती कळिकाळ ।
चारी मुक्ति केवळ । होती निश्चळ निजदासी ॥५॥
तुझ्या नामाची शक्ति अचाट आहे. तिच्यापुढे कळिकाळसुद्धा डोके वर काढीत नाही; आणि चारही मुक्ति निखालस दासी होऊन राहतात ५.

नामें एवढें ढसाळ देणें । त्या तुझें स्वरूप कवण जाणे ।
सांडूनि जाणणें नेणणें । निवांत राहाणें तत्वतां ॥६॥
नामाचीच देणगी एवढी ढसाळ ! त्या तुझें प्रत्यक्ष स्वरूप कोणाला कळणार ? ह्याकरता जाणणे आणि नेणणें ही दोन्ही सोडून खरोखर निवांत म्ह. स्वस्थ बसावें तेंच बरे ६.

तुझा स्तुतिवादु करणें । तंव परतलीं श्रुति पुराणें ।
तेथ माझें आरुष बोलणें । कोठें कोणें सारावें ॥७॥
तुझें स्तुतिस्तोत्र गावें, तर श्रुतिशास्त्रांनीसुद्धा हात टेकले आहेत; त्यांच्यापुढे माझे वेडेवांकडे बोलणे कोणाला कसें आवडणार ? ७.

तुझा स्तुतिवादु तें मौन । तुझा कळवळा तें कीर्तन ।
कांहीं न करणें तें अनुसंधान । साचार जाण श्रीकृष्णा ॥८॥
ह्याकरतां हे कृष्णरूप जनार्दना ! मौन धरणे हेच तुझें स्तुतिस्तवन, तुझा कळवळा तेंच कीर्तन आणि कांहीं न करणे हेच तुझें खरें अनुसंधान होय ८.

ऐशियाही तुझे ठायीं । अचाट हांव उठिली पाहीं ।
तेचि अर्थीं चित्त देई । कृपानिर्वाही गुरुराया ॥९॥
असें आहे तरीसुद्धा, तुझ्याविषयी मला अतिशय हांव सुटलेली आहे. तरी गुरुराजा ! कृपा करून त्याच्याकडे लक्ष द्यावें ९.

खद्योत प्रकाशूं पाहे चांदा । मशक गरुडासी घे खांदां ।
तैसा मी एकादशस्कंधा । मूर्ख नुसधा टीकार्थी ॥१०॥
काजव्यानें चंद्राला प्रकाशमान् करावयाचा विचार करावा, किंवा माशीनें गरुडाला खांद्यावर घेण्याचे मनांत आणावे, त्याप्रमाणें मी केवळ मूर्ख असून एकादश स्कंधावर टीका करण्याची हांव धरली आहे १०.

येचि विषयीं गुरुनाथा । कृपा करावी सर्वथा ।
ग्रंथरचना ग्रंथार्था । सार्थकता करावी ॥११॥
परंतु हे गुरुनाथा ! त्याविषयीं आतां पूर्णपणे कृपा करावी. आणि ग्रंथरचनेमध्यें यथार्थ अर्थ साधून माझ्या हेतूची सार्थकता करावी ११.

ऐशी विनवणी ऐकतां । कृपापद्मकरु ठेविला माथां ।
तंव उद्योत्कार जाहला ग्रंथा । यथार्थता निजदीपें ॥१२॥
अशी विनंति ऐकतांच श्रीगुरूनें कृपेचा वरदहस्त मस्तकावर ठेवला. तोच यथार्थतेच्या दीपानें ग्रंथावर प्रकाश पडला १२.

नवल कृपेची करणी । अर्थचिंतामणीची खाणी ।
उघडली तत्क्षणीं । पदार्थश्रेणी कविमुद्रा ॥१३॥
कृपेची करणी अगाध आहे. कारण ती होतांच अर्थचिंतामणीची खाणच उघडली; आणि ती न कवीचे गुण आणि हवे तें साहित्य बाहेर पडू लागले १३.

लेतां सिद्ध अलंकारा । कवण सांकडें लेणारा ।
ताल राखतां खांबसूत्रा । लेपाच्या करा प्रयास काय ॥१४॥
आयते तयार केलेले अलंकार घालतांना घालणाराला संकट ते कसले ? कळसूत्री बाहुलीकडून ताल धरविला तर त्या बाहुलीच्या हातांना कष्ट ते कसले ? १४.

बापाचीं पक्वान्नें घेउनी । बाळ घाली बापाचे वदनीं ।
तेणें साचचि तो संतोषोनी । होय मनीं सुखाचा ॥१५॥
बापाच्याच पानांतील पक्वान्नें घेऊन मूल बापाच्या तोंडात घालते, पण त्यामुळें बापाला खरोखरच संतोष होऊन मनास आल्हाद वाटतो १५.

तैशीच हेही कथा । तूंचि ग्रंथु तूंचि कविता ।
तेथें कोणीं घ्यावी अहंता । ‘मी कर्ता’ म्हणौनी ॥१६॥
तशीच ही गोष्ट आहे. ग्रंथही तूंच, आणि करविताही तूंच. तेव्हां तेथें ‘मी कर्ता’ म्हणून अहंता तरी कोणी घ्यावी ? १६.

गुरूनें सांडविली ‘अहंता’ । शेखीं राहों नेदीच ‘सोहंता’ ।
तेथ मी एकु कवि-कर्ता । हेंही सर्वथा न सरे पैं ॥१७॥
गुरूनें ‘अहंता’ तर काढून टाकलीच, पण अखेरीस ‘सोहंता’ हीही शिल्लक ठेवली नाही. म्हणून मी एक कवि किंवा कर्ता आहे, ही भावनाहीं राहिली नाहीं १७.

सूचितां अहंकाराचा झाडा । सूचनाचि होय त्याचा जोडा ।
जो आपणियातें म्हणवी वेडा । तोचि गाढा अतिचतुर ॥१८॥
लौकिक अहंकार सोडीत असतां दुसरा एक (शिवोऽहं) हा अहंकार पाठीस लागतो. ह्याकरतां जो आपणास वेडा म्हणवितो, तोच मोठा चतुर म्ह. ज्ञाता होय १८.

तैशीच हेही होईल वार्ता । यालागीं श्रीगुरुनाथा ।
चरणीं ठेविला माथा । कर्ता करविता तूंचि तूं ॥१९॥
ही गोष्ट (म्ह. मी ग्रंथकर्ता म्हणणेची) सुद्धा तशीच होईल. ह्याकरतां श्रीगुरुनाथा ! मी आपल्या चरणावर मस्तक ठेवून कर्ता करविता एक तूंच आहेस असे म्हणतो १९.

मागील ग्रंथसंगती । पंचमाध्यायाचे अंतीं ।
नारद वसुदेवाप्रती । बोलिला उपपत्ति ते ऐशी ॥२०॥
हा परमात्मा श्रीहरी । लीलाविग्रहें देहधारी ।
अवतरला तुमचे घरीं । भाग्यें करी नटनाट्य ॥२१॥
असो. पूर्वीच्या कथेचा संबंध म्हणजे पांचव्या अध्यायाच्या शेवटी नारदानें वसुदेवाला असें रहस्य सांगितले की, श्रीहरि हा साक्षात् परमात्मा असून तो ‘लीलादेह’ धारण करून तुमच्या घरी अवतरला आहे. तुमच्या घरी राहून तो अनेक अद्‌भुत लीला करीत आहे हे तुमचे मोठे भाग्य होय २०-२१.

हा ईशाचाही निजईशु । वैकुंठींचा निजवासु ।
परमात्मा परेशु । जगदीशु श्रीकृष्णु ॥२२॥
हा श्रीकृष्ण म्हणजे ईश्वराचाही ईश्वर असून वैकुंठाचा अधिपति आहे. हा साक्षात् परमात्मा परेश व जगदीश आहे २२.

तेंचि नारदवचनप्रमाण । प्रार्थावया श्रीकृष्ण ।
मिळवोनियां देवगण । द्वारकेसी जाण स्वयें आले ॥२३॥
तेच नारदाचे भाषण प्रमाणभूत मानून श्रीकृष्णाची प्रार्थना करण्यासाठी सारे देव एकत्र होऊन स्वतः द्वारकेस आले २३.

श्रीशुक उवाच –
अथ ब्रह्मात्मजैः देवैः प्रजेशैरावृतोऽभ्यगात् ।
भवश्च भूतभव्येशो ययौ भूतगणैर्वृतः ॥ १ ॥
इन्द्रो मरुद्‌भिर्भगवान् आदित्या वसवोऽश्विनौ ।
ऋभवोऽङ्‌गिरसो रुद्रा विश्वे साध्याश्च देवताः ॥ २ ॥
गन्धर्वाप्सरसो नागाः सिद्धचारणगुह्यकाः ।
ऋषयः पितरश्चैव सविद्याधरकिन्नराः ॥ ३ ॥
द्वारकामुपसञ्जग्मुः सर्वे कृष्णदिदृक्षवः ।
वपुषा येन भगवान्नरलोकमनोरमः ।
यशो वितेने लोकेषु सर्वलोकमलापहम् ॥ ४ ॥
[श्लोक १-४]-श्रीशुक म्हणतात – एकदा द्वारकेत आपले पुत्र सनक इत्यादी, देव आणि प्रजापतींसह ब्रह्मदेव, भूतगणांसह सर्वेश्वर महादेव, मरूद्गणांसह देवराज इंद्र, बारा आदित्य, आठ वसू, अश्विनीकुमार, ऋभू, अंगिरस, अकरा रूद्र, विश्वेदेव, साध्यगण, गंधर्व, अप्सरा, नाग, सिद्ध, चारण, गुह्यक, ऋषी, पितर, विद्याधर, किन्नर इत्यादी देवगण, मनुष्यासारखा मनोहर वेष धारण करून ज्यांनी आपल्या श्रीविग्रहाने तिन्ही लोकांमध्ये सर्व लोकांचे पापताप नाहीसे करणारी कीर्ती पसरविली, त्या श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी आले. (१-४)

शुक म्हणे परीक्षिती । पहावया श्रीकृष्णमूर्ती ।
सुरवर द्वारकेसी येती । विचित्र स्तुति तिंहीं केली ॥२४॥
शुकाचार्य म्हणाले, हे परीक्षिति राजा ! श्रीकृष्णाची मूर्ति पाहण्याकरता स्वर्गस्थ सर्व देव द्वारकेस आले, आणि त्यांनी विचित्र स्तुति केली २४.

श्रीकृष्णमूर्तीचें कवतिक । पहावया देव सकळिक ।
चतुर्मुख पंचमुख । वेगें षण्मुख पातले ॥२५॥
श्रीकृष्णमूर्तीचे कौतुक पाहण्यासाठी चतुर्मुख ब्रह्मदेव, पंचमुख शंकर व षण्मुख कार्तिकस्वामी आले २५.

करावयास प्रजाउत्पत्ती । पूर्वीं नेमिला प्रजापती ।
तोही आला द्वारकेप्रती । कृष्णमूर्ती पहावया ॥२६॥
पूर्वी प्रजेची उत्पत्ति करण्याकरतां प्रजापतीला नेमलें होतें. तोही कृष्णाची मूर्ति पाहण्याकरतां द्वारकेला आला २६.

सनकादिक आत्माराम । अवाप्तसकळकाम ।
तेही होऊनि आले सकाम । मेघश्याम पहावया ॥२७॥
आत्मस्वरूपांतच रममाण असून ज्यांचे सकळ काम परिपूर्ण झाले आहेत असे निष्काम भक्त सनकादिकही सकाम होऊन घनश्याम सांवळा पाहावयास आले २७.

भूतनायक रुद्रगण । आले अकराही जण ।
पहावया श्रीकृष्ण । भूतगणसमवेत ॥२८॥
सर्वभूतनायक जे रुद्र, ते अकराही जण भूतगणासहवर्तमान श्रीकृष्णाला पाहावयास आले २८.

पहावया श्रीकृष्णरावो । घेऊनि गणांचा समुदावो ।
द्वारके आला महादेवो । भूतभविष्यांचा पहा हो त्रिकाळज्ञाता ॥२९॥
पहा ! भूतभविष्यांचा त्रिकाळ ज्ञाता जो महादेव तोसुद्धा आपल्या सर्व गणांचा समुदाय घेऊन श्रीकृष्णाला पाहाण्यासाठी द्वारकेला आला २९.

श्रीकृष्णदर्शनाची उत्कंठा । थोर लागली नीलकंठा ।
धांवतां मोकळ्या सुटल्या जटा । कृष्णवरिष्ठा पहावया ॥३०॥
श्रीकृष्णास पाहाण्याची शंकराला इतकी उत्कंठा लागली होती की, त्या महात्म्याला पाहाण्यासाठी धावत धावत येतांना त्याच्या जटासुद्धा मोकळ्या सुटल्या ! ३०.

एकुणपन्नास मरुग्दण । तेणेंसीं इंद्र आला आपण ।
पहावया श्रीकृष्ण । स्वयें जाण सादर ॥३१॥
एकुणपन्नास मरुद्गणांसहवमान स्वतः इंद्र मोठ्या भक्तिभावानें श्रीकृष्ण पाहावयास आला ३१.

सांडोनियां रविमंडळ । बारा आदित्यांचा मेळा ।
पहावया कृष्णसोहळा । तृषित डोळां होऊनि आले ॥३२॥
सूर्यमंडळ सोडून बारा आदित्यांचा मेळा कृष्णाचा सोहळा पाहाण्यासाठी अगदी तृषित होऊन आला ३२.

सूर्य अधिष्ठिला डोळां । देखे पदार्थां सकळां ।
कृष्ण न देखतां आंधळा । सूर्यो पावला अंधत्व ॥३३॥
सूर्याची डोळ्यांमध्यें स्थापना केलेली आहे, म्हणून ते सारे पदार्थ पाहतात. पण कृष्णदर्शन न झाल्यामुळें सूर्य आंधळा होऊन गेला होता ३३.

पाहतां श्रीकृष्णाचें मुखकमळ । फिटलें सूर्याचें पटळ ।
मग देखणा झाला केवळ । सर्वांगें सकळ स्वयें रवि ॥३४॥
श्रीकृष्णाचे मुखकमल पाहतांच सूर्याच्या डोळ्यावरचे पटल निघून गेले. मग सूर्य स्वतः सर्वांगानें देखणा झाला ३४.

तिन्ही अग्नी तेजाळे । परी ते धूमें झांकोळले ।
कृष्ण देखतांच उजळले । निर्धूम जाहले निजतेजें ॥३५॥
तिन्ही अग्नि (गार्हपत्य, दक्षिण व आहवनीय हें) जात्या तेजःपुंज खरे, पण धुरानें झांकून गेले होते. त्यांनी कृष्णाला पाहातांच त्यांच्यावरचा धूर जाऊन ते मूळच्या तेजानें उजळले ३५.

आठां वसूंचा मेळा । पाहों आला कृष्णलीला ।
म्हणे मदनाचा पुतळा । तंव तो खेळे लील कृष्णांकीं ॥३६॥
आठ वसूंचा मेळाही कृष्णलीला पाहण्याकरतां आला होता. त्यानें श्रीकृष्ण पाहतांच ‘हा केवळ मदनाचा पुतळा आहे’ असे म्हटले पण तो मदन श्रीकृष्णाच्या मांडीवर लीलेनें खेळतांना त्यांच्या दृष्टीस पडला ! ३६.

अश्विनीकुमार धन्वंतरी । तेही भवरोगें पीडिले भारी ।
कृष्णदर्शनामृतकरीं । निरुज क्षणावरी ते जाहले ॥३७॥
अश्विनीकुमार स्वतः धन्वंतरी होते, पण ते भवरोगानें अतिशय त्रस्त झाले होते; कृष्णदर्शनामृताच्या योगें तेही एका क्षणांत रोगमुक्त झाले ३७.

ऋषभदेव अंगिरस । रुद्र मीनले असमसाहस ।
विश्वे-साध्यदेव बहुवस । देवीं आकाश दाटलें ॥३८॥
ऋषभदेव, आंगिरस व असाधारण धैर्याचे रुद्रही आले. विश्वेदेव, साध्यदेव, इत्यादि अनेक देवांनी आकाश अगदी भरून गेले होते ३८.

आमुची गायनकळा मोठी । होतें गंधर्वांच्या पोटीं ।
ते कृष्णवेणुगीतासाठीं । जाहली शेवटीं न सरती ॥३९॥
आमची गायनकला मोठी, अशी गंधर्वांच्या मनांत घमेंड होती, पण ती कृष्णाच्या मुरलीचे गायन ऐकतांच जिरून गेली ३९.

यालागीं दर्शनाची आस । क्षणक्षणां पाहती वास ।
त्यांसी गायनकळा सावकाश । दिधली सुरस कृपामात्रें ॥४०॥
त्यांना दर्शनाविषयी अत्यंत उत्कंठा लागून ते क्षणोक्षणी वाट पाहात होते. श्रीकृष्णानें त्यांना सावकाश कृपादृष्टीनेंच सुरस अशी गायनकला दिली ४०.

अप्सरा म्हणती आम्ही नाचणी । तंव काळियाच्या फणारंगणीं ।
एकेचि तालें लाजवूनी । तत्क्षणीं सांडिल्या ॥४१॥
अप्सरा म्हणत होत्या, ‘आम्हीच काय त्या नृत्य करणाऱ्या,’ पण काळिया सर्पाच्या फणांच्या पृष्ठभागावर नाचतांना एकाच तालानें त्यांना तत्काल लज्जित करून सोडले ४१.

त्या दीनवदना कामिनी । आल्या दर्शनालागोनी ।
नाचों शिकविल्या नाचणी । रासरंगणीं भृकुटिमात्रें ॥४२॥
त्या अप्सरा हिरमुसली तोंडे करून दर्शनासाठी आलेल्या होत्या त्या नृत्यांगनांनाहीं रासक्रीडेमध्यें केवळ नेत्रसंकेतानेंच नृत्यामध्यें तरबेज करून सोडले होते ४२.

पहावया श्रीरंग । आले पाताळींचे पन्नग ।
सिद्ध चारण अनेग । विद्याधर साङ्ग समुदायें ॥४३॥
श्रीकृष्णाला पाहाण्यासाठी पाताळांतील नागही आले होते. इतकेच नव्हे, तर अनेक सिद्ध, चारण, विद्याधरांचे सर्व समुदायही आले होते ४३.

कश्यपादि ऋषीश्वर । अर्यमादि पितर ।
गुह्यक आणि किन्नर । आले अपार स्वगणेंसीं ॥४४॥
काश्यपादि मोठमोठे ऋषि, अर्यमादि पितर आणि गुह्यक व किन्नरही आपआपल्या गणासहवर्तमान आलेले होते ४४.

एवं विमानांचिया पंक्तीं । दाटलिया द्वारकेप्रती ।
पहावया कृष्णमूर्ती । आले सुरपती स्वानंदें ॥४५॥
अशा विमानांच्या झुंडीच्या झुंडी द्वारकेमध्यें खेटून राहिल्या होत्या. इतके मोठमोठे देव कृष्णाची मूर्ति पाहाण्यासाठी आनंदानें आलेले होते ४५.

जेणें शरीरें श्रीहरी । नाना चरित्रांतें करी ।
यश विस्तारिलें संसारीं । दुराचारी तरावया ॥४६॥
श्रीकृष्णांनी ज्या अवतारशरीरानें अनेक प्रकारची चरित्रे करून दुराचारी लोकांना संसारांतून तरण्यासाठी यश विस्तारून ठेवले ४६,

ऐकतां श्रीकृष्णकीर्ती । चतुर्विध प्रायश्चितांची गती ।
खुंटली जी निश्चितीं । श्रवणार्थीं सादर जाहलिया ॥४७॥
जी श्रीकृष्णकीर्ति लक्षपूर्वक ऐकल्याच्या योगानें खरोखर चतुर्विध प्रायश्चित्तांची गतीच खुंटून जाते ४७,

भावें घेतलिया श्रीकृष्णनाम । सकळ पातकां करी भस्म ।
देवीं देखिला पुरुषोत्तम । विश्रामधाम जगाचें ॥४८॥
भक्तिभावानें ज्याचे नाव घेतले असतां सर्व पातकांचे भस्म होते, तो श्रीकृष्णरूपी पुरुषोत्तम, सर्व जगाच्या विश्रांतीचे स्थान, देवांनी पाहिला ४८.

ठाणठकारें अतिउत्तम । सुरनरांमाजी मनोरम ।
डोळ्यां जाहला विश्राम । मेघश्याम देखोनी ॥४९॥
ज्याच्या शरीराची रेखल्यासरखी ठेवण; सुरनरांमध्येंही अत्यंत मनोरम दिसणारा; तो घनश्याम पाहून त्यांच्या डोळ्यांना समाधान झाले ४९.

मुकुटकुंडलें मेखला । कांसे कसिला सोनसळा ।
कंठीं रुळे वनमाळा । घनसांवळा शोभतु ॥५०॥
मुकुटकुंडलें व मेखळा घातलेली; कांसेला जरतारी पीतांबर कसलेला; आणि गळ्यामध्यें वनमाला असल्यामुळें तो घननीळ अतिशयच शोभत होता ५०.

लावण्यगुणनिधान । अवतारमाळे मुख्य रत्‍न ।
देवीं देखिला श्रीकृष्ण । निवासस्थान द्वारका ॥५१॥
लावण्याचे आणि गुणांचे केवळ भांडारच आणि अवतारमालेतील मुख्य रत्नच असा तो श्रीकृष्ण, आणि त्याचे राहण्याचे स्थान जी द्वारका, ती साऱ्या देवांनी पाहिली ५१.

तस्यां विभ्राजमानायां समृद्धायां महर्द्धिभिः ।
व्यचक्षतावितृप्ताक्षाः कृष्णमद्‌भुतदर्शनम् ॥ ५ ॥
[श्लोक ५]-सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने समृद्ध असलेल्या त्या देदीप्यमान द्वारकापुरीत दिव्य तेजाने तळपणार्‍या श्रीकृष्णांचे त्यांनी दर्शन घेतले त्यांना कितीही पाहिले, तरी त्यांचे नेत्र तृप्त होत नव्हते. (५)

कृष्णें अधिष्ठिली पुरी । कनककळसांचिया हारी ।
रत्‍नें जडिलीं नाना कुसरीं । तेज अंबरीं न समाये ॥५२॥
कृष्णांनी जी नगरी वसविली होती, तिची शोभा काय सांगावी ? तींत सोन्याच्या कळसांच्या तर काय रांगाच्या रांगा लागून राहिल्या होत्या. आणखी त्यांना मोठ्या कौशल्यानें अनेक प्रकारची रत्नें जडविलेली होती. त्यांचे तेज आकाशांतही मावत नव्हते ५२.

जे द्वारकेभीतरीं । कामधेनु घरोघरीं ।
कल्पद्रुमांचिया हारी । खेळणीं द्वारीं चिंतामणींचीं ॥५३॥
ज्या द्वारकेमध्यें कामधेनु अगदी घरोघर होत्या; कल्पवृक्षांच्या तर रांगाच्या रांगा लागून राहिल्या होत्या; आणि द्वारावर चिंतामणीची खेळणी लटकत होती ५३.

द्वारकाजननिवासियांसी । घरीं नवरत्‍नां चिया राशी ।
ऋद्धिसिद्धि करूनि दासी । हृषीकेशी नांदतु ॥५४॥
द्वारकेमध्यें राहाणाऱ्या लोकांच्या घरांत नवरत्नांचे ढीगच्या ढीग पडले होते; आणि तेथे श्रीकृष्णच नांदत असल्यामुळें ऋद्धिसिद्धीही दासी होऊन राहिल्या होत्या ५४.

कृष्णरूपाचिया लालसे । डोळ्यां तेणें लाविलें पिसें ।
आवडी जाहले मोरपिसें । अतिडोळसें हरि‍अंगीं ॥५५॥
कृष्णरूपाच्या लालसेनें तर डोळ्यांना वेडच लावून सोडले; तेव्हां ते मोठ्या आवडीनें श्रीहरीच्या अंगावर बसून मोरांच्या पिसांच्या रूपानें पाहूं लागले ५५.

कैसी बरवेपणाची शोभा । पाहतां नयनीं निघती जिभा ।
रसाळपणें तो वालभा । उपनिषद्‌गाभा साकारला ॥५६॥
कृष्णाच्या सौंदर्याची शोभा काय सांगावी ? ती चाखण्यासाठी डोळ्यांना जिभाच निघाल्या. उपनिषदांत वर्णन केलेले तत्त्व जें परब्रह्म, तेच साकार स्वरूपाला आले असल्यानें तें स्साळपणामध्यें तर केवळ अपूर्वच होते ५६.

कृष्ण पहावया आवडी । होताहे देवांसी वरपडी ।
डोळ्यां थोर लागली गोडी । अर्ध घडी न विसंबती ॥५७॥
कृष्णाला पाहाण्याच्या आवडीनें देव उड्यांवर उड्या घेऊ लागले. डोळ्यांना तर इतकी गोडी लागून राहिली की, ते अर्धक्षणही विसंबेनात ५७.

कृष्णरूपाचें कवतुक । पाहतां नयनां लागली भूक ।
अंतरीं निबिड दाटलें सुख । तरी अधिकाधिक भुकेले ॥५८॥
कृष्णस्वरूपाचे कौतुक पाहतांना डोळ्यांना अधिकाधिक भूक लागत चालली. त्यांच्यांत सुख तुडुंब भरून गेले होते, तरीसुद्धा ते अधिकाधिकच भुकेले झाले ५८.

अवलोकितां श्रीकृष्णासी । दृष्टीसी दाटणी होतसे कैशी ।
मुंडपघसणी न्याहारासी । हृषीकेशी पहावया ॥५९॥
श्रीकृष्णाला अवलोकन करतांना पाहाणारामध्यें इतकी गर्दी उसळत असे की, पाहाण्याच्या घाईत त्यांची शिरस्त्राणे एकमेकांवर आदळत ५९.

मागें पुढें श्रीकृष्णासी । देखणेनि वेढिलें चौंपाशीं ।
भाग्य उपजलें डोळ्यांसी । पूर्णपुरुषासी देखती ॥६०॥
श्रीकृष्णाला पाहणारांनी मागे, पुढे व चारी बाजूंनी अगदी गराडा घातला होता. साऱ्या डोळ्यांचे भाग्यच उदयास आले होते. कारण, ते पूर्ण पुरुषाला पाहात होते ६०.

श्रीकृष्ण घनमेघ सांवळा । निजात्मभावें पाहतां डोळां ।
सहजें श्यामता आली बुबुळा । कृष्णकळा ठसावली ॥६१॥
श्रीकृष्ण हा गर्द मेघासारखा श्यामवर्ण होता. त्याच्याकडे निजात्मबुद्धीनें पाहतांच डोळ्यांतील बुबुळांनाहीं सहज कालिमा आली व त्यांत कृष्णकला ठसावली ६१.

जो न कळेचि वेदविवंचना । योगियांच्या न ये ध्याना ।
त्या प्रत्यक्ष देखोनि कृष्णा । भाग्यगणना अपूर्व ॥६२॥
जो वेदांच्याही विचारांना कळत नाहीं, जो योग्यांच्या ध्यानात येत नाही, त्या कृष्णाला जे प्रत्यक्ष पाहात होते त्यांचे भाग्य अपूर्वच म्हटले पाहिजे ६२.

ऐसा देखोनियां श्रीहरी । देव सुमनांच्या शतधारीं ।
बहु वरुषले पै अंबरीं । राहोनि वरी विमानीं ॥६३॥
अशा श्रीहरीला पाहातांच देवांनी वर विमानांत राहून आकाशांतून त्याच्यावर पर्जन्यधारांप्रमाणें पुष्पवृष्टि केली ६३.

स्वर्गोद्यानोपगैर्माल्यैः छादयन्तो युदूत्तमम् ।
गीर्भिश्चित्रपदार्थाभिः तुष्टुवुर्जगदीश्वरम् ॥ ६ ॥
[श्लोक ६]-स्वर्गातील उद्यानातील फुलांचा त्यांनी यदुश्रेष्ठ जगदीश्वरावर वर्षाव केला आणि सुंदर शब्दार्थांनी युक्त अशा वाणीने ते त्यांची स्तुती करू लागले. (६)

मांदार पारिजात संतान । कल्पद्रुम हरिचंदन ।
ऐशिया वृक्षांचीं सुमनें जाण । कृष्णावरी संपूर्ण वरुषले ॥६४॥
मांदार, पारिजात, कल्पवृक्ष, हरिचंदन इत्यादि स्वर्गीय वृक्षांची सुगंधित पुष्पें सर्वांनी श्रीकृष्णावर उधळली ६४.

श्रीकृष्णासी चहूंकडां । दिव्य सुमनांचा जाहला सडा ।
समस्त देवीं सन्मुख पुढां । केला पैं गाढा जयजयकारु ॥६५॥
श्रीकृष्णाच्या चारही बाजूंनी उत्तमोत्तम पुष्पांचा केवळ सडा होऊन गेला. नंतर सारे देव अगदी समोर जाऊन त्यांनी जयजयकारानें दाही दिशा दणाणून सोडल्या ६५,

सार्थ पदबंधरचना । नाना गद्यपद्यविवंचना ।
स्तवूं आदरिलें यदुनंदना । अमरसेना मिळोनी ॥६६॥
अनेक प्रकारची रसभरित पदें, प्रबंध, नाना प्रकारची गद्यपद्य रचना इत्यादि कवनांनी देवसमुदायानें श्रीकृष्णाचे स्तवन सुरू केले ६६.

श्रीदेवा ऊचुः ।
नताः स्म ते नाथ पदारविन्दं
बुद्धीन्द्रियप्राणमनोवचोभिः ।
यच्चिन्त्यतेऽन्तहृदि भावयुक्तैः
मुमुक्षुभिः कर्ममयोरुपाशात् ॥ ७ ॥
[श्लोक ७]-देव म्हणाले “हे स्वामी ! कर्मांच्या मोठ्या बंधनातून सुटण्याची इच्छा करणारे मुमुक्षू भक्तिभावाने आपल्या हृदयात ज्यांचे चिंतन करीत असतात, त्या आपल्या चरणकमलांना आम्ही बुद्धी, इंद्रिये, प्राण, मन आणि वाणीने आज प्रत्यक्ष नमस्कार करीत आहोत.” (७)

विवेकयुक्त प्राणधारणा । मनसा वाचा कर्मणा ।
नमस्कारु तुझिया चरणां । सच्चिद्धना श्रीकृष्णा ॥६७॥
देव म्हणाले हे सच्चिद्घना ! श्रीकृष्णा ! कायावाचामनेंकरून विवेकयुक्त प्राणधारणेनें तुझ्या चरणाला नमस्कार असो ६७.

इंद्रियउ परमालागीं जाणा । सांडूनि विषयवासना ।
दश इंद्रियीं लागलों चरणां । नमन श्रीकृष्णा निजभावें ॥६८॥
इंद्रिये शांत व्हावीत म्हणून विषयवासना सोडून दाही इंद्रियांना तुझ्याकडेच लावून, श्रीकृष्णा ! भक्तिभावानें तुला नमस्कार करीत आहों ६८.

विषयीं होऊनियां उदास । सांडोनि संसाराची आस ।
चरण चिंतिती तापस । कर्मपाश छेदावया ॥६९॥
विषयांत उदास होऊन, संसाराची आशा सोडून देऊन, कर्मपाश तोडण्याकरतां तपस्वी लोक तुझ्या चरणाचे चिंतन करतात ६९;

ऐसे मुक्तीचिया वासना । मुमुक्षु चिंतिती चरणां ।
त्यांसी अर्धक्षण न येसी ध्याना । दृढ भावना करितांही ॥७०॥
मुक्तीच्या आशेनें मुमुक्षु लोक तुझ्या चरणाचे ध्यान करतात, पण त्यांनी कितीही दृढ भावना धरली तरी, एक अर्धक्षणही त्यांच्या ध्यानांत तूं येत नाहींस ७०.

ते प्रत्यक्ष तुझे चरण । आम्हांसी झालें जी दरुषण ।
देव आपुल्या भाग्या आपण । अतिस्तवन करिताति ॥७१॥
त्या तुझ्या प्रत्यक्ष चरणाचे दर्शन आज आम्हांस झाले. अशा प्रकारे देव आपल्या भाग्याचे आपणच वर्णन करूं लागले ७१.

देखूनि सगुण स्वरूपासी । एवढी श्लाघ्यता कां म्हणसी ।
जें आलें आकारासी । तें निश्चियेंसी मायिक ॥७२॥
” ह्या सगुण स्वरूपाला पाहून एवढी स्तुति कां करता ? कारण जें आकाराला आले ते खरोखर मायिक असते ७२.

जैसे तुम्ही शरीरधारी । तैसाच मीही एकु शरीरी ।
त्या माझेनि दर्शनेंकरीं । तुम्ही कैशापरी तराल ॥७३॥
तुम्ही जसे शरीरधारी, तसाच मीही एक शरीरधारी, त्या माझ्या दर्शनानें तुम्ही कसे तराल ?” असें तूं म्हणशील ७३,

ऐसें न म्हणावें जी अनंता । तूं मायेचा नियंता ।
हेंही कळलें असे तत्वतां । समूळ कथा परियेसीं ॥७४॥
तर अनंता ! असें मात्र आपण म्हणूं नये. कारण तूं खरोखर मायेचा नियंता आहेस हेही पण आम्हांला कळले आहे. ती समूळ कथाच ऐकावी ७४.

त्वं मायया त्रिगुणयाऽऽत्मनि दुर्विभाव्यं
व्यक्तं सृजस्यवसि लुम्पसि तद्‌गुणस्थः ।
नैतैर्भवानजित कर्मभिरज्यते वै
यत्स्वे सुखेऽव्यवहितेऽभिरतोऽनवद्यः ॥ ८ ॥
[श्लोक ८]-हे अजित ! आपण मायेच्या गुणांमध्ये राहून या अचिंत्य नामरूपात्मक प्रपंचाची त्रिगुणमय मायेने व्यक्तरूपात आपल्यातच उत्पत्ती, पालन आणि संहार करता पण या कर्मांनी आपण लिप्त होत नाही कारण सर्व दोषांपासून आपण मुक्त आहात आणि कोणत्याही प्रकारचे आवरण नसलेल्या आपल्या अखंड स्वरूपभूत परमानंदामध्ये निमग्न असता. (८)

झोंप लागल्या झोंप न दिसे पाहीं । जागें जाहल्या दिसतचि नाहीं ।
तैसी माया अतर्क्य देहीं । न पडे ठायीं सुरनरां ॥७५॥
झोप लागल्यावर झोंप दिसत नाहीं; जागे झाल्यावर तर ती मुळीच दिसत नाही. त्याप्रमाणें देहामध्यें माया ही अतर्क्य आहे. ती सुरनरांनासुद्धा माहीत होत नाहीं ७५.

मूळींच तुझी अतर्क्य माया । तिसी गुणक्षोभु जाहला साह्या ।
ते ब्रह्मादिकां न येचि आया । देवराया श्रीकृष्णा ॥७६॥
देवाधिदेवा ! श्रीकृष्णा ! तुझी माया आधींच अतर्क्य त्यांत गुणांचा क्षोभ हा तिच्या साहाय्याला मिळाला; म्हणून ती ब्रह्मदेवादिकांच्याही आटोक्यात येत नाहीं ७६.

तूं धरोनि दैवीमायेसी । ब्रह्मादिकांतें सृजिसी ।
प्रतिपाळोनि संहारिसी । तूं त्या कर्मासी अलिप्त ॥७७॥
तूंच दैवी मायेला धरून ब्रह्मादिकांना उत्पन्न करतोस, प्रतिपाळ करतोस व तूंच त्यांचा संहार करतोस. पण त्या कर्मापासून तूं अलिप्तच राहतोस ७७.

स्वप्नीं स्वयें सृष्टि सृजिली । प्रतिपाळूनि संहारिली ।
ते क्रिया कर्त्यासी नाहीं लागली । तेवीं सृष्टि केली त्वां अलिप्तत्वें ॥<७८॥
स्वप्नामध्यें एकाद्यानें सृष्टि उत्पन्न केली, तिचा प्रतिपाळ करून संहारही केला, तर ती क्रिया कांहीं कर्त्याला लागू होत नाही. त्याप्रमाणें तूंही अलिप्त राहूनच सृष्टि केली आहेस ७८.

मृगजळाची भरणी । सूर्य करी निजकिरणीं ।
शोषूनि ने अस्तमानीं । अलिप्तपणीं तैसा तूं ॥७९॥
सूर्य आपल्याच किरणांनी मृगजळ भरतो, आणि अस्तमानाच्या वेळी तें शोषण करून घेऊन जातो, त्याप्रमाणेच तूंही सर्व करून अलिप्त आहेस ७९.

समूळ धर्माची वाढी मोडे । अधर्माची शीग चढे ।
तैं तुज अवतार धरणें घडे । आमुचें सांकडें फेडावया ॥८०॥
धर्माची वाढ समूळ खुंटून जाते, अधर्माचा अगदी कळस होतो, तेव्हां आमचे संकट निवारण करण्याकरतां तुला अवतार धारण करावा लागतो ८०.

करोनि अधर्माचा घातु । धर्म वाढविशी यथस्थितु ।
देवांसी निजपदीं स्थापितु । कर्मातीतु तूं श्रीकृष्णु ॥८१॥
अधर्माचा नाश करून धर्माची पूर्णपणे वृद्धि करतोस; आणि देवांना आपआपल्या पदावर स्थापन करतोस, तरी श्रीकृष्णा, तूं कर्मातीतच आहेस ८१.

तुज अखंडदंडायमान । आत्मसुखाचें अनुसंधान ।
तें आम्हांसी नाहीं अर्ध क्षण । दीनवदन यालागीं ॥८२॥
आत्मसुखाचें अनुसंधान तुला अखंडदंडायमान असते, ते आम्हांला एक क्षणभरसुद्धा नसते. म्हणून आम्ही अगदीं दीनवदन असतों ८२.

ज्यासी आत्मसुख निरंतर । तो देहधारी परी अवतार ।
त्याचे चरण पवित्रकर । गंगासागर आदि तीर्थांसी ॥८३॥
ज्याला आत्मसुख निरंतर असते, तो देहधारी असला तरी अवतारी पुरुषच होय. त्याचे पाय गंगासागरादि तीर्थांनासुद्धा पवित्र करणारे असतात ८३.

तो जरी वर्ते गुणांआंतु । तरी तो जाणावा गुणातीतु ।
त्याचा चरणरेणु करी घातु । त्रैलोक्यांतु महापापां ॥८४॥
तो जरी गुणांमध्यें वावरत असला, तरी तो गुणातीतच समजावा. त्याच्या चरणाचा एक रजःकणसुद्धा त्रैलोक्यांतील महापातकांचा नाश करून सोडील ८४.

ऐशी तुझ्या दासांची कथा । त्या तुझे चरण वंदूं माथा ।
असो चरणांची हे कथा । कीर्ति ऐकतां निजलाभु ॥८५॥
ही तर तुझ्या दासांची कथा ! मग आम्ही तर त्या तुझेच प्रत्यक्ष चरण शिरसावंद्य करीत आहोत. ही झाली तुझ्या चरणांची कथा. तुझी कीर्ति श्रवण करण्यानेही पण तसाच आत्मलाभ होतो ८५.

चरण देखती ते भाग्याचे । त्यांचें महिमान न वर्णवे वाचे ।
पवित्रपण तुझिये कीर्तीचें । परिस साचें स्वामिया ॥८६॥
तुझ्या चरणाचे दर्शन घेतील ते भाग्याचेच होत; त्यांचा महिमा वाणीला वर्णन करतां यावयाचा नाही. हे स्वामी ! तुझ्या कीर्तीचे पवित्रपणही तसेच आहे, कसे ते सांगतों ऐक ८६.

अग्निशिखा समसमानीं । इंधन घलितां वाढे अग्नी ।
आशा वाढे देहाभिमानीं । श्रवणकीर्तनीं ते त्यागवी ॥८७॥
अग्नीच्या ज्वाळा सारख्या निघत असल्या आणि त्यातच आणखी लाकडे नेऊन घातली, तर ती आग अधिकच भडकते, त्याप्रमाणें देहाभिमानाच्या योगें आशा वाढत असते, ती आशा तुझ्या श्रवणकीर्तनानें सुटून जाते ८७.

शुद्धिर्नृणां न तु तथेड्य दुराशयानां
विद्याश्रुताध्ययनदानतपःक्रियाभिः ।
सत्त्वात्मनामृषभ ते यशसि प्रवृद्ध
सच्छ्रद्धया श्रवणसम्भृतया यथा स्यात् ॥ ९ ॥
[श्लोक ९]-हे स्तुती करण्यायोग्य परमात्मन ! ज्या लोकांची चित्तवृत्ती रागद्वेषादिकांनी कलुषित झालेली असते, ते उपासना, वेदाध्ययन, दान, तपश्चर्या, यज्ञइत्यादी कर्मांनी तशी शुद्ध होत नाही, जशी शुद्धान्तःकरण मनुष्यांची आपल्या कीर्तीच्या श्रवणाने वाढलेल्या श्रेष्ठ श्रद्धेने होते. (९)

कृष्णस्तवनें स्तविता तरे । श्रवणद्वारें ऐकता उद्धरे ।
यालागीं स्तव्य तूंचि निर्धारे । स्तवनद्वारें तारकु ॥८८॥
कृष्णाचे स्तवन केले असतां, स्तवन करणारा तरून जातो, तें स्तवन कानांनी ऐकणाऱ्याचाही उद्धार होतो. याकरतां स्तवनद्वारे तारण्याला समर्थ असा तूंच एक स्तव्य म्हणजे स्तवन करण्यास योग्य आहेस ८८.

एवं तुझे कीर्तीचें श्रवण । तेंचि परम शुद्धीसी कारण ।
यावेगळें जें साधन । तें केवळ जाण प्रयास ॥८९॥
म्हणून तुझ्या कीर्तीचे श्रवण, तेंच एक अत्यंत शुद्धीला कारण आहे. ह्याशिवाय जें अन्य साधन ते केवळ कष्ट होत ८९.

ऐकें गा सुरवरिष्ठा । तुझिया श्रवणाची उत्कंठा ।
अंतरीं पापाचा मळकटा । धुवोनि चोखटा करी वृत्ती ॥९०॥
हे देवाधिदेवा ! ऐक. तुझ्या केवळ श्रवणाची उत्कंठाच अंतःकरणांतील पातकांची खळमळ धुऊन काढून वृत्ति निर्मळ करते ९०.

तुझ्या श्रवणीं होऊनि उदास । तपें तपतां तापस ।
नाना साधनीं कर्कश । जाहल्या निरस मती त्यांच्या ॥९१॥
गुणानुवादश्रवणाला विन्मुख होऊन जे तपस्वी तप करूं लागले, त्यांच्या नाना प्रकारच्या साधनांनी त्यांच्या बुद्धि निरस व कर्कश अशा होऊन गेल्या ९१.

‘मंत्रविद्याग्रहण’ । विकळ उच्चारितां वर्ण ।
शुद्धी नव्हे परी दारुण । पातक पूर्ण अंगीं वाजे ॥९२॥
मंत्रविद्या ग्रहण केली, पण मंत्र म्हणतांना अक्षर अशुद्ध पडले असतां पुण्य तर लागतच नाही, पण भयंकर पातक मात्र आंगाला जडतें ९२.

करितां ‘शास्त्रश्रवण’ । चौगुणां गर्व चढे पूर्ण ।
तो ज्ञातेपणाचा अभिमान । न निघे जाण चतुर्मुखा ॥९३॥
‘शास्त्र’ श्रवण केले असतां चौपट गर्व मात्र चढतो, आणि तो ज्ञातेपणाचा अभिमान ब्रह्मदेवालासुद्धा निघत नाहीं ९३.

करितां ‘वेदाध्ययन’ । विस्वर गेलिया उच्चारण ।
शुद्धी नव्हेचि परी मरण । अवश्य जाण वृत्रासुराऐसें ॥९४॥
‘वेदाध्ययन’ करूं लागले असता त्यांतील एकादा स्वरोचारही चुकला, तर शुद्ध होण्याचे एकाच बाजूस राहून वृत्रासुराप्रमाणे. हटकून मरण मात्र यावयाचें ! ९४.

‘दान’ देतां नृग बहुवस । कृपीं जाला कृकलास ।
प्राप्ती दूरी परी नाश । असमसाहस रोकडा ॥९५॥
‘दान’ देणारा नहुषही विहिरीमध्यें सरडा होऊन पडला. दानानें लाभ होण्याचे लांबच राहून नुकसान मात्र पुष्कळ झाले ९५.

‘तप’ करितां ऋष्यशृंगारासी । तो वश जाहला वेश्यांसी ।
श्रद्धा श्रवणाचिया ऐशी । शुद्धी आणिकांसी पैं नाहीं ॥९६॥
ऋष्यशृंग ‘तप’ करूं लागला, तो वेश्यांनाच वश झाला. ह्यावरून श्रद्धापूर्वक तुझी कीर्ति श्रवण करण्याइतकी शुद्धि दुसऱ्या कशातच नाहीं ९६.

‘कर्म’ करावें यथानिगुती । तंव त्या कर्माची गहन गती ।
प्राचीनबर्ह्याची कर्मस्थिती । नारदोक्तीं सांडविली ॥९७॥
बरें, यथाशास्त्र कर्मच करून राहावे, तर कर्ममार्ग फारच कठीण आहे. ‘प्राचीनबहीं’ राजाची कर्मासक्ति नारदांनी उपदेश करून सोडविली ९७.

कर्मीं आचमन करावें । तेथ माषामात्र जळ घ्यावें ।
न्यूनाधिकत्वासवें । दोष पावे सुरापानसम ॥९८॥
कर्माचरण करतांना आचमन करावे तर उडीद बुडेल इतकेंच पाणी घेतले पाहिजे. त्यांत जरा का थोडे कमीजास्ती झाले तर त्यापासून सुरापान केल्यासारखा दोष लागतो ९८.

एवं दुष्टहृद्यव ज्यासी । तपादिक साधनें त्यासी ।
शुद्धि नव्हे हृषीकेशी । श्रवणें कीर्तीसी नायकतां ॥९९॥
तात्पर्य, ज्याचे हृदय दुष्ट म्हणजे अत्यंत मलिन आहे, त्याला श्रीकृष्णाच्या कीर्तीचे श्रवण केल्याशिवाय तपादिक साधनांनी कधीही शुद्धि व्हावयाची नाहीं ९९.

श्रवणें परीक्षिती तरला । श्रवणें क्रौंच उद्धरिला ।
मकरोदरीं श्रवण पावला । सिद्ध जाहला मत्स्येंद्र ॥१००॥
परीक्षिति राजा श्रवणानेंच तरून गेला. श्रवणानेंच क्रौंच उद्धरून गेला. मत्स्याच्या उदरामध्यें श्रीकृष्णाची कीर्ति श्रवण करावयास मिळाली, म्हणून मत्स्येंद्रनाथही सिद्ध पुरुष झाला १००.

तुझें श्रवण दोपरी । एक तें चित्तशुद्धी करी ।
दुसरें जीवब्रह्मऐ क्य करी । दोंहीपरी उद्धारु ॥१॥
तुझी कीर्ति श्रवण करण्यापासून दोन गोष्टी साधतात. एक तर त्यापासून चित्ताची शुद्धि होते; आणि दुसरे, त्याच्यापासून जीवब्रह्माचे ऐक्य साधते. असा दोन्ही प्रकारे उद्धारच होतो १.

प्रत्यक्ष पाहतां वाराणसी । श्रवणीं तारक ब्रह्म उपदेशी ।
मुक्तिक्षेत्र जाहली काशी । श्रवणें जीवासी उद्धारु ॥२॥
प्रत्यक्ष काशीमध्येंही असेंच. तिकडे श्रवणांत तारक ब्रह्माचा उपदेश होतो. म्हणून काशी ही मुक्तिक्षेत्र होऊन राहिली आहे. तेथें श्रवणानेंच जीवाचा उद्धार होतो २.

तूं अवाप्तसकळकाम । निष्कामाचें निजधाम ।
ऐशिया तुज करणें कर्म । भक्तभ्रम छेदावया ॥३॥
तूं तर सदा सर्वकाळ पूर्णकामच आहेस. निष्कामांचे निजधाम तूं आहेस. अशा तुलासुद्धा कर्म करावे लागते, तें भक्तांचा भ्रम नाहींसा करण्याकरता ३.

नाना चरित्रांची करणी । करिता झालासी चक्रपाणी ।
मोक्षमार्गाची निजश्रेणी । दिधली रचूनि जनासी ॥४॥
हे श्रीकृष्णा ! त्यासाठीच तूं अनेक प्रकारची अनेक चरित्रे करून दाखविलींस, आणि लोकांना मोक्षमार्गाचा जिना करून ठेवलास. ४.

चित्तशुद्धीसी कारण । प्रेमयुक्त कीर्तिश्रवण ।
येथ सच्छ्रद्धाचि प्रमाण । अकारण साधनें ॥५॥
तुझी कीर्ति भक्तिभावानें श्रवण करणे, हेच चित्तशुद्धीला कारण आहे. तेथें सात्त्विक श्रद्धा हीच एक प्रमाण आहे. इतर साधनें व्यर्थ होत ५.

अपेक्षा जें जें साधन साधिलें । तें तें अपेक्षेनेंचि फोल केलें ।
निरपेक्षाचें हृदय भलें । वेगीं गेलें परमार्थीं ॥६॥
मनांत इच्छा धरून जें जें कांहीं साधन करावें, तें तें त्या इच्छेनेंच व्यर्थ होतें. जो निरिच्छ असतो, त्याचेच अंतःकरण चोख असते; तसलें अंतःकरणच हां हां म्हणतां परमार्थात शिरतें ६.

हृदयाचे सखोल आळा । स्वधर्मबीजें अंकुरला ।
श्रद्धेचा वेल उगवला । कोंभ निघाला तरितरितु ॥७॥
हृदयाच्या खोल आळ्यांत स्वधर्माच्या बीजाचा अंकुर फुटलेला असतो, त्यांतच श्रद्धेचा वेल उगवून त्याचा कोंभ कसा अगदी तरतरीत बाहेर पडतो ७.

सच्छ्रवणप्रबळजळें । रुतलीं वैराग्यदृढमूळें ।
वेगीं गेलीं निजबळें । श्रद्धामेळें चिदाकाशीं ॥८॥
सच्छूवणाच्या जोरदार पाण्यानें वैराग्याची मुळें खोल जाऊन ती बळकट होतात. त्यांना श्रद्धेची पुष्टि मिळाली की ती वेगानें चिदाकाशांत चढतात ८.

ते चिदाकाशींचा चंद्रमा । स्वप्रकाश तूं पुरुषोत्तमा ।
साधक शिणती मेघश्यामा । तुझी प्रतिमा पहावया ॥९॥
आणि हे पुरुषोत्तमा ! त्या चिदाकाशांतील स्वप्रकाशचंद्रमा तूं आहेस. हे मेघश्यामा ! तुझी मूर्ति पाहाण्यासाठी साधकांना कितीतरी प्रयास पडतात ९.

त्यां तुझे श्रीचरण । प्रत्यक्ष जाहलें दर्शन ।
घालोनियां लोटांगण । चरणस्तवन करिताती ॥११०॥
त्या तुझ्या श्रीचरणाचें आज प्रत्यक्ष दर्शन झाले. असें म्हणून त्यास लोटांगण घालून सर्व देव त्या चरणांचें स्तवन करूं लागले ११०.

स्यान्नस्तवाङ्‌घ्रिरशुभाशयधूमकेतुः
क्षेमाय यो मुनिभिरार्द्रहृदोह्यमानः ।
यः सात्वतैः समविभूतय आत्मवद्‌भिः
व्यूहेऽर्चितः सवनशः स्वरतिक्रमाय ॥ १० ॥
यश्चिन्त्यते प्रयतपाणिभिरध्वराग्नौ
त्रय्या निरुक्तविधिनेश हविर्गृहीत्वा ।
अध्यात्मयोग उत योगिभिरात्ममायां
जिज्ञासुभिः परमभागवतैः परीष्टः ॥ ११ ॥
[श्लोक १०-११]- मोक्षप्राप्तीसाठी मननशील मुमुक्षू ज्यांना आपल्या प्रेमाने द्रवलेल्या हृदयात ठेवतात, पांचरात्रविधीचे उपासक आपल्यासारख्या ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी ज्यांची उपासना करतात, वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरूद्ध या चतुर्व्यूहाच्या ठिकाणी जितेंद्रिय भक्त स्वर्गलोकाच्या पलीकडील भगवद्धामाच्या प्राप्तीसाठी त्रिकाळ ज्यांची पूजा करतात, याज्ञिक लोक तिन्ही वेदांनी सांगितलेल्या विधीने आपल्या पवित्र हातामध्ये हविर्द्रव्य घेऊन ज्यांचे चिंतन करतात, तुमचेच स्वरूप असलेल्या मायेचे स्वरूप जाणून घेऊ इच्छिणारे योगीजन हृदयाच्या आत ज्यांचे ध्यान करतात आणि श्रेष्ठ भक्तजनांना जे परम इष्ट वाटतात, तेच आपले चरण हे प्रभो ! आमच्या सर्व अशुभ वासना, भस्म करण्यासाठी अग्निस्वरूप होवोत. (१०-११)

आमुच्या अशुभाशयाचा घातु । करिता चरणधूमकेतु ।
तुझाचि जी विख्यातु । त्रैलोक्यांतु श्रीकृष्णा ॥११॥
हे श्रीकृष्णा ! आमच्या सर्व पातकांचा नाश करण्याला साऱ्या त्रिभुवनांत तुझा एक चरणरूपी धूमकेतूच समर्थ आहे ११.

पापइंिधनाचा मेळु । तेथ तुझा चरण वडवानळु ।
लागतां तो अतितेजाळु । तिळेंतिळु जाळितु ॥१२॥
पातकरूपी लाकडांच्या राशीला तुझा चरणरूप वडवानल लागला की, तो आपल्या देदीप्यमान तेजानें त्याचे तिळातिळाएवढे तुकडे करून सर्व जाळून फस्त करतो १२.

ऐसा पापियांतें कांपविता । प्रेमळांतें अभयदाता ।
तुझा चरण जी अनंता । हृदयीं सर्वथा वाहताति ॥१३॥
हे अनंता ! असा पाप्यांना कांपविणारा व प्रेमळांना अभय देणारा तुझा पाय भक्त सदा सर्वदा अंतःकरणांत वाहतात १३.

तेंचि हृदय जी कैसें । वोळलें भक्तिप्रेमरसें ।
तेथ तुझे चरण सावकाशें । अतिउल्हासें वाहताति ॥१४॥
तें अंतःकरण करें असते, तर भक्तिप्रेमरसानें अगदी ओथंबलेले; त्यांत तुझे चरण, अत्यंत उल्हासानें आणि यथेच्छ धारण करून बसतात १४.

करितां चरणाचें ध्यान । जे विसरले भूकतहान ।
त्यांसी द्यावया अभयदान । चरणध्वजु जाण पैं तुझा ॥१५॥
चरणाचे ध्यान करतांना जे भूक व तहानही विसरून जातात, त्यांना अभयदान देणारा एक तुझा चरणध्वजच आहे १५.

तोचि चरण सात्वतीं । पावावया समविभूती ।
पूजिला जी श्रीपती । चतुर्मूती व्यूहरूपें ॥१६॥
हे श्रीकृष्णा ! त्याच तुझ्या चरणाचे भगवदैश्वर्य पावण्यासाठी, चतुयूंह मूर्तीच्या रूपानें भक्तांनी पूजन केलें १६.

‘वासुदेव’ ‘संकर्षण’ । ‘अनिरुद्ध’ आणि ‘प्रद्युम्न’ ।
हाचि चतुर्व्यूह जाण । पूजास्थान भक्तांचें ॥१७॥
वासुदेव, संकर्षण, अनिरुद्ध आणि प्रद्युम्न ह्या स्वरूपाला ‘चतुयूँह ‘ म्हणतात आणि हेच भक्तांचे पूजास्थान होय १७.

भिन्न भिन्न चारी व्यक्ती । चहूं रूपीं एक मूर्ती ।
ऐसें जाणोनि पूजिजे भक्तीं । ‘व्यूहस्थिति’ त्या नांव ॥१८॥
ह्या चार व्यक्ति जरी भिन्न भिन्न दिसतात, तरी त्या चारही स्वरूपांमध्यें मूर्ति एकच आहे, हीच गोष्ट लक्षात आणून भक्तांनी त्यांची पूजा करणे, ह्याचंच नाव ‘व्यूहस्थिति’ होय १८.

‘सात्वत’ म्हणिपती ते भक्त । भगवत्पदऐरश्वर्यातें वांछित ।
चतुर्व्यूहरूपें पूजित । ऐश्वर्यीं चित्त ठेवूनी ॥१९॥
‘सात्वत’ म्हणविणारे जे भक्त असतात, ते भगवत्पदाच्या ऐश्वर्याची इच्छा करतात. ते या ऐश्वर्यावरच लक्ष ठेवून ह्या चतुर्दूहरूपानें पूजा करतात १९.

जन्ममरणप्रवाहस्थिती । नासावया एक भक्तीं ।
पूजा कीजे चतुर्मुर्ती । आत्मवंती सज्ञानीं ॥१२०॥
जन्ममरणाच्या प्रवाहाची स्थिति चुकवावयाची असेल तर आत्मस्वरूप ओळखणाऱ्या ज्ञात्यांनी ह्या चतुर्मूर्तीचीच एकनिष्ठ भक्तीनें पूजा करावी १२०.

त्रिषवण* त्रिकाळ । पूजा करितां अविकळ । [*तीन सवने]
भजोनि जिंतिला कळिकाळ । जन्ममूळ छेदावया ॥२१॥
जन्ममूळच्छेदन करण्याकरतां जे त्रिकाळ *यज्ञ व एकनिष्ठ भक्तीनें त्रिकाळ पूजा करून भजन करतात, त्यांनी कलिकालाला जिंकले २१.
[[ * ‘त्रिसवन’ म्हणजे सोमरस गाळून देवांस अर्पण करण्याचे मंत्र म्हणण्याचे प्रकार, प्रातःसवन, मध्यंदिनसवन व तृतीयसवन असे तीन आहेत, त्यांचे स्वरूप पुढे लिहिल्याप्रमाणेः-“प्रातःपठेन्नित्यमुरःस्थितेन, स्वरेण शार्दलरुतोपमेन । मध्यंदिनं कंठगतेन चैव, चक्राहसंकूजितसन्निभेन ॥ तारं तु विद्यात् सवनं तृतीय, शिरोगतं तच्च सदा प्रयोज्यम् । मयूरहंसान्यभृतस्वराणां, तुल्येन नादेन शिरःस्थितेन ॥”-(पाणिनीय शिक्षा) ]]

आणिकही भक्तजन । तुझें करिताति भजन ।
यज्ञद्वारा होमहवन । विधि विधान वेदोक्त ॥२२॥
ह्याशिवाय दुसरेही तुझे भक्त विधिविधानयुक्त व वेदोक्त यज्ञद्वारा होमहवन करून तुझे भजन करतात २२.

दीक्षाग्रहणीं अतिसादर । यज्ञद्वारा भजनतत्पर ।
क्रियेपासोनि नेमिले कर । हस्तव्यापार न करिती ॥२३॥
दीक्षा ग्रहण करण्यामध्यें अत्यंत आस्था; यज्ञद्वारा भजन करण्यांत तत्पर; हाताला क्रियेचे नियम लावून दिलेले; इतर हस्तव्यापार मुळीच न करणारे २३;

तेथ वेदत्रयीची विधानकळा । बाहेर त्रिगुणांची त्रिमेखळा ।
आंत यज्ञपुरुष आव्हानिला । चैतन्यतेजाळा सर्वात्मा ॥२४॥
तीन वेदात्मक विधि हेच ज्यांना प्रमाण; बाहेर त्रिगुणाची मेखला घेतलेली; अंतर्यामी सर्वात्मा-चैतन्याच्या तेजानें देदीप्यमान असणारा यज्ञपुरुष आवाहन केलेला २४;

तेथ ओंकार वषट्कार । लक्षणोक्त मंत्रउळच्चार ।
द्रव्यें अर्पिती अपार । अतिपवित्र अवदानीं ॥२५॥
तेथे ओंकार, -वषट्कार इत्यादि लक्षणांनी युक्त मंत्रोच्चार करून अतिपवित्र अवदानांनी अपार इच्थे अर्पण करतात २५.

आणिक एक योगयुक्त । योगधारणा तूतें भजत ।
प्राणापानांची समता देत । आसनस्थ होऊनियां ॥२६॥
आणखी कोणी तुझे भक्त योगयुक्त असतात, ते योगधारणेनें तुझें भजन करतात. ते आसनावर स्थिर होऊन प्राणापानांची समता करतात २६.

वज्रासनीं दृढ बंध । भेदोनि षट्चक्रांचे भेद ।
कुंडलिनीचा स्कंध । अतिसुबद्ध थापटिला ॥२७॥
वज्रासनानें दृढ बंध साधून, षट्चक्रांचे भेदन करून, कुंडलिनीचा सुबद्ध स्कंध थापटतात २७.

ते खवळली महाशक्ती । वेगें चालिली ऊर्ध्वगती ।
पवन प्राशूनि ग्रासिती । योगस्थिती गगनातें ॥२८॥
त्यायोगें ती महच्छक्ति खवळून मोठ्या झपाट्यानें ऊर्ध्वगतीनें जाऊ लागते आणि वायु भक्षण करून योगस्थितीनें गगनाचा ग्रास घेते २८.

शोषूनि सहस्त्रदळाचे पाट । आटपीठ आणि गोल्हाट ।
क्रमोनियां श्रीहाट । आली अतिउद्‌भट ब्रह्मस्थाना ॥२९॥
सहस्रदळाचे पाट शोषण करून औटपीठ, गोल्हाट, आणि श्रीहाट वगैरे स्थानें आक्रमण करून मोठ्या वेगानें ती ब्रह्मस्थानाला जाऊन भिडते २९.

तेथ परमानंदाचा भोग । शिवशक्तींचा संयोग ।
यापरी अभ्यासोनि योग । हा भजनमार्ग योग्यांचा ॥१३०॥
तेथें परमानंदाचा भोग आणि शिव-शक्तींचा संयोग होतो. ह्याप्रमाणें योगाचा अभ्यास करणे हा योग्यांचा भजनमार्ग होय १३०.

तुझी जाणावया माया । एक भजों लागले तुझिया पाया ।
सर्वथा अतर्क्य तुझी माया । देवराया श्रीकृष्णा ॥३१॥
कोणी तुझी माया जाणावी म्हणून तुझ्याच पायांचे भजन करूं लागतात; परंतु हे श्रीकृष्णा ! देवाधिदेवा ! तुझी माया सर्वथा अतळ आहे ३१.

माया न लक्षेचि लक्षितां । तोचि मायामोह जाहला चित्ता ।
मग ते सिद्धीलागीं तत्वतां । चरण भगवंता पूजिती ॥३२॥
माया पाहूं गेलें तर ती दिसत नाही; इतकेच नव्हे, तर तोच मायेचा चित्ताला मोह पडतो; आणि ते मग खरोखर सिद्धीसाठींच भगवंताच्या चरणाची पूजा करतात ३२.

आणिकही एक पक्ष । तुज भजावया मुमुक्ष ।
जाले गा अतिदक्ष । अध्यात्मपक्षनिजयोगें ॥३३॥
आणखी एक पक्ष आहे तो ‘मुमुक्षु’ लोकांचा होय. हे अध्यात्मामध्यें अतिदक्ष असतात ३३.

आत्ममायेचा नाशु । करावया जिज्ञासु ।
निजात्मबोधें सावकाशु । अतिउल्हासु पूजेचा ॥३४॥
आत्ममायेचा नाश करण्यासाठी जिज्ञासूंना आपल्या आत्मज्ञानाच्या योगेंकरून मनामध्यें पूजेचा अत्यंत उल्हास असतो ३४.

विवेकाचिया भावना । नित्यानित्याची विवंचना ।
करूनि आणितां अनुसंधाना । सर्वत्र जाणा तूंचि तूं ॥३५॥
त्याच्या मनांत निरंतर विवेकाचीच भावना असल्यामुळे, नित्य काय व अनित्य काय ह्याचा ऊहापोह करून त्यांनी निर्णय ठरविला म्हणजे जिकडे तिकडे तूंच तूं भरलेला असल्याचे त्यांच्या निदर्शनास येते ३५.

जें अनित्यपणें वाळिलें । मायिकत्वें मिथ्या जाहलें ।
मग चिन्मात्रैक उरलें । निर्वाळिलें निजरूप ॥३६॥
अनित्यपणामुळें जे टाकलें, ते मायिक असल्यामुळें मिथ्या होऊन गेले. मग चिन्मात्र असें शुद्ध निजात्मरूपच शिल्लक राहते ३६.

एवं पाहतां चहूंकडे । तुझेंचि स्वरूप जिकडे तिकडे ।
मग पूजिती वाडेंकोडें । निजसुरवाडें सर्वत्र ॥३७॥
अशा प्रकारे चहूंकडे पाहूं लागले असतां जिकडे तिकडे तुझेंच स्वरूप दिसू लागते. मग ते आपल्या आवडीनेंच जिकडे तिकडे तुझीच साक्षेपानें पूजा करतात ३७.

जें जें देखती जे जे ठायीं । तें तें तुजवांचूनि आन नाहीं ।
ऐसा सर्वत्र चरण पाहीं । ठायींचा ठायीं पूजिला ॥३८॥
ज्या ज्या ठिकाणी जें जें पाहातात, ते ते तुझ्याशिवाय दुसरे नसतेच. अशा रीतीनें तुझाच चरण बसल्या ठिकाणीच पूजला जातो ३८.

पर्युंष्टया तव विभो वनमालयेयं
संस्पार्धिनी भगवती प्रतिपत्‍नीवच्छ्रीः ।
यः सुप्रणीतममुयाहणमाददन्नो
भूयात्सदाङ्‌घ्रिरशुभाशयधूमकेतुः ॥ १२ ॥
[श्लोक १२]-हे प्रभो ! ही भगवती लक्ष्मी आपल्या वक्षःस्थळावरील कोमेजलेल्याही वनमालेचा सवतीप्रमाणे मत्सर करीत असते तरीसुद्धा तिची पर्वा न करता भक्तांनी या माळेने केलेल्या पूजेचा जे स्वीकार करतात, ते आपले चरण नेहमी आमच्या विषयवासनांना जाळण्यासाठी अग्निस्वरूप होवोत ! (१२)

ऐसे सर्वत्र तूतें पूजिती । भक्त पढियंते होती ।
त्यांची पूजा तेही अतिप्रीतीं । स्वयें श्रीपती मानिसी ॥३९॥
अशा प्रकारे सर्वत्र तुझीच पूजा करणारे भक्त असतात ते तुझे अत्यंत आवडते होतात. आणि त्यांची ती पूजाही हे श्रीपति ! तूं स्वतः अत्यंत प्रेमानें मान्य करतोस ३९.

रानींची रानवट वनमाळा । भक्तीं आणूनि घातली गळां ।
रमा सांडोनि उताविळा । स्वयें भाळला माळेसी ॥१४०॥
रानांतील रानवट फुलांची माळा आणून भक्तांनी ती तुझ्या गळ्यांत घातली, तेव्हां उतावळा होऊन तूं लक्ष्मीला सोडून तिलाच भाळलास ! १४०.

भक्तीं अर्पिली आवडीं । म्हणौनि तियेची अधिक गोडी ।
शिळी जाहली तरी न काढी । अर्धघडी गळांची ॥४१॥
ती (वनमाला) भक्तांनी आवडीनें अर्पण केलेली होती, म्हणून तिची गोडी अधिक. ती शिळी झाली तरीसुद्धा तिला अर्ध घटकाही तूं गळ्यांतून काढीत नाहीस ४१.

भक्तीं भावार्थें अर्पिली । देवें सर्वांगीं धरिली ।
यालागीं सुकों विसरली । टवटवीत सर्वदा ॥४२॥
ती भकांनी भावार्थानें अर्पण केली आणि भगवंतांनी सर्वांगावर ती धारण केली, म्हणून सुकण्याचे विसरून जाऊन ती सदा टवटवीतच राहूं लागली ४२.

तिचा आस्वादितां गंधु । भावें भुलला मुकुंदु ।
श्रियेसी उपजला क्रोधु । सवतीसंबंधु मांडिला ॥४३॥
तिचा सुगंध घेतांच श्रीकृष्ण भक्तीनें भुलून गेला, म्हणून लक्ष्मीला राग येऊन तिनें तिच्याशी सवतीमत्सर सुरू केला ४३.

मज न येतां आधीं । भक्तीं अर्पिली नेणों कधीं ।
मी तरुण सांडोनि त्रिशुद्धी । ते वृद्ध खांदीं वाहातसे ॥४४॥
मी प्रभूजवळ येण्यापूर्वी भक्तांनी ही कधी अर्पण केली समजत नाही. मी खरोखर तरुण; असे असतां मला सोडून ह्या थेरडीलाच खांद्यावर घेऊन बसतो ! ४४.

देव नेणे भोगाची खूण । ती वृद्ध मी तरुण ।
परी तिशींच भुलला निर्गुण । गुणागुण हा नेणे ॥४५॥
देवाला भोगाची खूण समजत नाही. ती म्हातारी, मी तरुण; पण हा तिच्याशीच भुलून पडला आहे ! हें ठीकच आहे. कारण, हा बोलून चालूनच जर निर्गुण, तर त्याला गुणावगुण कळणार कसे ! ४५.

मज चरण सेवा एकादे वेळां । हे सर्वकाळ पडली गळां ।
मजहूनि स्नेह आगळा । नेला वनमाळा सर्वथा ॥४६॥
मला चरणाची सेवा; आणि तीसुद्धा कधी काळी. आणि ही सदासर्वदा गळ्यांतच पडलेली ! ह्या वनमाळेनें खरोखर माझ्यापेक्षाही प्रेमांत वर ताण केली ४६.

मातें डावलूनि वेगीं । हे बैसली दोहीं अंगीं ।
इसीं बोलतो श्रीशार्ङ्गीं । मजचिलागीं त्यागील ॥४७॥
मला एकदम बाजूस ढकलून देऊन ही दोहीं अंगांवर बसली आहे. आणि श्रीकृष्ण हिच्याशी नेहमी बोलत बसतो. मी काही बोलावयाला जाईन तर मलाच टाकून देईल ४७.

मज दीधली चरणांची सेवा । इचा मत्सरु किती सहावा ।
आपाद आवरिलें यादवा । माझी सेवा हरितली ॥४८॥
मला पाय रगडावयाला लावले आहे, तेव्हां आतां हिचा मत्सर तरी मी किती सहन करावा ? हिनें श्रीकृष्णाला पायांपर्यंत. वेष्टून टाकलें, आणि माझी सेवा हिरावून घेतली ४८.

मी कुळात्मजा क्षीराब्धीची । हे रानट रानींची ।
खांदीं बैसली देवाची । भीड भक्तांची म्हणवूनि ॥४९॥
मी किती केले तरी क्षीरसागराची कुलवंत कन्या आहे, आणि ही रानांतली रानटी आहे; पण भक्तांची भीड, म्हणून ती देवाच्या खांद्यावर बसली हो ! ४९.

हे भक्तिबळें बैसली खांदीं । कंहीं नुतरेचि त्रिशुद्धी ।
रमा वनमाळेतें वंदी । द्वेषबुद्धी सांडोनी ॥१५०॥
ही भक्तीच्या जोरावर खांद्यावर बसलेली आहे; ती कधी खाली म्हणून उतरायची नाही, असे म्हणून लक्ष्मीसुद्धा द्वेषबुद्धि सोडून त्या वनमालेलाच नमस्कार करू लागली १५०.

ऐशी भक्तांची पूजा । तुज आवडे गरुडध्वजा ।
सुप्रणीत भावो वोजा । चरणीं तुझ्या अर्पिल्या ॥५१॥
हे श्रीकृष्णा ! अशी तुला भक्तांची पूजा आवडते, म्हणून नम्रभावानें सर्व भक्तिभावना तुझ्या चरणी अर्पण केल्या आहेत ५१.

तो चरणधूमकेतु तुझा । आमुच्या पापांतें नाशू वोजा ।
पुनः पुनः गरुडध्वजा । पापसमाजा निर्दळू ॥५२॥
असा तो तुझा चरणरूप धूमकेतु आमच्या पातकांचा नाश करो. हे श्रीकृष्णा ! पुन्हा पुन्हा पातकांच्या राशी जमल्या तर त्यांचाही नाश करो ५२.

करितां चरणांचें वर्णन । न धाये देवांचें मन ।
पुढपुढतीं चरणस्तवन । ध्वजलक्षण वर्णिती ॥५३॥
ह्याप्रमाणें श्रीकृष्णाच्या चरणाचे देवांनी वर्णन केले तरी त्यांचे मन तृप्त होईना. म्हणून पुन्हा पुन्हा त्या चरणांचे स्तवन करीत होत्साते त्याच्यावरील ध्वजचिन्हाचे ते वर्णन करूं लागले ५३.

केतुस्त्रिविक्रमयुतस्त्रिपतत्पताको
यस्ते भयाभयकरोऽसुरदेवचम्वोः ।
स्वर्गाय साधुषु खलेष्वितराय भूमन्
पादः पुनातु भगवन् भजतामघं नः ॥ १३ ॥
[श्लोक १३]-हे भगवन अनंता ! वामन अवतारामध्ये बलीच्या बंधनासाठी ज्याने तीन पावले टाकली होती, जो सत्यलोकावरील विजयध्वजच वाटत होता, ब्रह्मदेवांनी जो धुतला तेव्हा त्यातून कोसळणार्‍या गंगेच्या तीन धारा तीन पताकांसारख्या वाटत होत्या, ज्याला पाहून असुरांची सेना भयभीत आणि देवसेना निर्भय झाली होती, जो देवांना स्वर्ग देणारा आणि असुरांना पाताळात नेणारा होता, तो आपला चरण आम्हा भजन करणार्‍यांचे सगळे पाप धुऊन टाको ! (१३)

बलिबंधनीं अनंता । त्रिविक्रमचरणु वाढतां ।
सत्यलोकाही वरुता । दिसे झळकता श्रीचरणु ॥५४॥
हे अनंता ! बलिबंधनाच्या वेळी वामनानें आपला चरण वाढविला, त्या वेळी तुझा चरण सत्यलोकाच्याही वरती झळकत असलेला दिसत होता ५४.

चरणु वाढला सर्वांवरी । तो ‘केतु’ बोलिजे कवीश्वरीं ।
पताका झळकत कवणेपरी । सुरसरी निजगंगा ॥५५॥
सर्वांच्या वर जो चरण वाढला, त्यालाच ज्ञाते लोक ‘केतु’ असे म्हणतात. त्या वेळी तुझेच आत्मस्वरूप जी गंगा, देवनदी, तीच पताकारूपानें झळकू लागली ५५,

बलिबंधनीं आवेश । चरण उचलिला दुराश ।
नखें भेदला आवरणकोश । जळ बहुवस चालिलें ॥५६॥
बलिबंधनाच्या वेळी मोठ्या आवेशानें चरण उचलल्यामुळें त्याच्या नखांनी आवरणकोश फुटून जाऊन अपरंपार पाणी वाहूं लागले ५६.

चरणस्पर्शें भगवंता । जाहली जीवनासी पवित्रता ।
ब्रह्मा कमंडलीं धरितां । शिवें माथां वाहिली ॥५७॥
हे भगवंता ! त्या वेळी आपल्या चरणस्पर्शानेंच त्या जळाला पवित्रता आली, म्हणून ते जल ब्रह्मदेवानें कमंडलूत धरले, आणि शंकरानें मस्तकावर घेतले ५७.

चरणध्वजीं पताका ते गंगा । त्रिवाहिनी त्रिपथगा ।
चरणशोभा श्रीरंगा । नयनभृंगा उल्हासु ॥५८॥
चरणांतील ध्वजांमध्यें पताका तीच गंगा होय. त्रिवाहिनीही तीच आणि त्रिपथगाही तीच. अशी ती श्रीकृष्णाची चरणशोभा पाहण्याला नयनरूप मुंगांना अत्यंत उल्हास होतो ५८.

केतु झळकलिया पाठीं । आसुरी सेनेसी भय उठी ।
दैवी संपत्तीचे पोटीं । अत्यंत उठी आल्हादु ॥५९॥
केतु म्हणजे ध्वज झळकूं लागल्याबरोबर आसुरी सेनेच्या पोटांत धडकी भरते व दैवी संपत्तीच्या पोटांत आनंदाच्या उकळ्या फुटू लागतात ५९.

आणिक चरणाची कथा । देवांसी स्वर्गसुखदाता ।
तोच चरणु अधर्मवंतां । होय तत्वतां नरकहेतु ॥१६०॥
ह्या चरणांची आणखी एक अशी गोष्ट आहे की, ते देवांना स्वर्गसुख देणारे आहेत, आणि तेच चरण अधार्मिकांना नरकांत टाकणारे आहेत १६०.

एक तरले चरण पूजितां । एक तरले चरण ध्यातां ।
चरण उपेक्षिती सर्वथा । अधःपाता ते जाती ॥६१॥
कोणी चरणांची पूजा करून तरून गेले, कोणी चरणांचे ध्यान करून तरले, पण जे ह्या चरणांची निखालस उपेक्षा करतात ते मात्र अधःपाताला जातात ६१.

चरण वंदिती कां निंदिती । ते निजपदाप्रती जाती ।
सर्वथा जे उपेक्षिती । अधोगती तयांसी ॥६२॥
चरगांना वंदन करणारे व निंदा करणारेही निजपदाला पोचतात. पण सर्वथैव त्यांची जे उपेक्षाच करतात, त्यांना मात्र अधोगति प्राप्त होते ६२.

चरण वंदितां तरली शिळा । निंदितां उद्धरिलें शिशुपाळा ।
जे उपेक्षिती चरणकमळा । तयां खळां रौरव ॥६३॥
चरणांना वंदन करून शिळा तरली आणि निंदा करणा-या शिशुपालाचा तूं उद्धार केलास, परंतु चरणकमळांची ज्यांनी उपेक्षाच केली. त्या दुष्टांना रोखनरकांतच जावे लागते ६३.

ऐकें स्वामिया व्यापका । ऐसा तुझा चरण निका ।
आमुच्या सकळ पातकां । क्षणार्थें देखा उद्धारु ॥६४॥
हे सर्वव्यापी सर्वेश्वरा ! ऐक, असा तुझा चरण उत्तम आहे, म्हणून तो आमच्या सर्व पातकांचा क्षणार्धात उद्धार करील ६४.

जेथ पापाचा जाहला उद्धारु । तेथ सहजचि खुंटला दुराचारु ।
ऐसा तरावया संसारु । चरण साचारु पैं तुझा ॥६५॥
पापाचाच जेव्हां उद्धार होतो, तेव्हां सहजच दुराचार खुंटून जातो. असा तुझा चरण हा संसारांतील खरा खरा तारक आहे ६५.

नस्योतगाव इव यस्य वशे भवन्ति
ब्रह्मादयस्तनुभृतो मिथुरर्द्यमानाः ।
कालस्य ते प्रकृतिपूरुषयोः परस्य
शं नस्तनोतु चरणः पुरुषोत्तमस्य ॥ १४ ॥
[श्लोक १४ ] आपापसात भांडून कष्टी होणारे ब्रह्मदेव इत्यादी शरीरधारी, वेसण घातलेले बैल मालकाच्या ताब्यात असावेत, त्याप्रमाणे ज्याच्या अधीन आहेत, जो कालस्वरूप व प्रकृतिपुरूषांच्या पलीकडे असणार्‍या आपला पुरूषोत्तमाचा चरण आहे, तो आमचे कल्याण करो ! (१४)

निजसुखातें विस्तारिता । तुझा चरण जी अच्युता ।
काळादिकर्माचा शास्ता । आत्मा नियंता देवाचा ॥६६॥
हे अच्युता ! तुझा चरण आत्मसुखाचा विस्तार करणारा असून कालकर्मादिकांचा शास्ता आहे. तसाच देवांचा आत्मा व नियंता आहे ६६.

तूं काळाचा निजनियंता । काळासी अकाळें न करवे सत्ता ।
देवांसी अधिकारीं स्थापिता । देवनियंता तूं कृष्णा ॥६७॥
काळाचा खरा नियंता तूंच; म्हणूनच त्याला अकाली सत्ता करता येत नाही. देवांना अधिकारावर स्थापन करणारा तूंच असल्यामुळे, हे श्रीकृष्णा ! देवांचा नियंताही तूंच आहेस. ६७.

कर्मस्वामी तूं कृष्णनाथा । इंद्रियक्रिया समस्ता ।
कोणा न करवे अन्यथा । कर्मनियंता श्रीकृष्णा ॥६८॥
हे कृष्णनाथा ! कर्माचा स्वामीही तूंच. कारण तुझ्याशिवाय इंद्रियांच्या कोणत्याच क्रिया कोणाला करता येणार नाहीत. म्हणून हे श्रीकृष्णा ! कर्माचा नियंताही तूंच आहेस ६८.

ब्रह्मादि शरीरधारी । तुज आधीन गा श्रीहरी ।
जैसे नाथिले बैल नांगरीं । कृषीवळू धरी स्वामित्वें ॥६९॥
हे श्रीहरी ! ब्रह्मदेवादिक शरीरधारी सारे देव तुझ्याच आधीन आहेत. ज्याप्रमाणें वेसण घातलेले बैल शेतकरी नांगराला जुंपून धनीपणानें पाहिजे तसे वळवितो ६९,

तेथ जो राहे मागें पुढें । तो झोडिजे आसुडें ।
तुझे आज्ञेवरी रोकडे । वर्तती गाढे कळिकाळादिक ॥१७०॥
किंवा त्यांत जो मागेपुढे राहतो त्याला चाबकानें झोडतो, त्याप्रमाणें तुझ्याच आज्ञेनुसार तंतोतंत कळिकाळादिक वागत असतात १७०.

संसारलक्षण शेतासी । अधिकारीं जुंपोनि सर्वांसी ।
निजकर्में क्षेत्रासी । तूं वाहविसी निजाज्ञा ॥७१॥
संसाररूपी शेतांत तूंच सर्वांना अधिकारावर जुंपून आत्मकर्मानेंच तूं आपल्या आज्ञेनें ह्या क्षेत्राची मेहनत मशागत करवितोस ७१.

रोंवोनि अहंकाराची मेढी । महत्तत्वांचें खळें झाडी ।
त्रिगुणदोरें बापुडीं । बांधिशी कडोविकडी जीवपशूंतें ॥७२॥
अहंकाराची मेढ रोवून, महत्तत्त्वांचे खळे झाडून काढून तीन गुणांच्या दोन्यांनी विचान्या जीवरूप पशूना करकरावून आवळून ठेवतोस ७२.

उदोअस्तांचेनि झणत्कारें । देतां निजकर्मांचे फेरे ।
जो खांदा चुकवोनि वोसरे । तोचि मारें मारिजे ॥७३॥
उजाडल्यापासून मावळेपर्यंत सारखे कर कर कर कर करीत आपआपल्या कर्माचे फेरे घालीत असतां, जो खांदा चुकवून आंग काढू लागेल, त्यालाच तूं मार देस ७३.

हा बोल जरी म्हणसी वायां । ‘सृष्टिकर्त्री धरिती माया ।
मजसी संबंध नाहीं यया ‘ । देवराया हें न म्हणें ॥७४॥
‘हे बोलणे व्यर्थ आहे, सृष्टीला करणारी आणि भरणारी माया आहे, त्याचा संबंध माझ्याशी काही नाही.’ असें जर म्हणशील, तर हे देवाधिदेवा ! असे मात्र मणूं नकोस ७५.

मायेसी तूं अधिष्ठान । यालागीं तूं परम कारण ।
तुझिये मांडीवरी जाण । क्रीडास्थान प्रकृतिपुरुषां ॥७५॥
कारण, मायेला आश्रय तूंच आहेस. म्हणून ‘परम कारण’ तूंच. तुझ्याच मांडीवर प्रकृति आणि पुरुष ही खेळतात ७५.

तूं मायेहूनि अपारु । प्रकृतिपुरुषांहूनि परु ।
काळाचा काळ तूं दुर्धरु । सर्वसंहारुकर्ता तूं ॥७६॥
तूं मायेहून श्रेष्ठ आहेस; प्रकृतिपुरुषांहून भिन्न आहेस; तूं काळाचा दुर्धर काळ, व सर्व संहाराचा कर्ता तूंच आहेस ७६.

आमुच्या निजसुखा उत्तमा । तुझा चरणविस्तार मेघश्यामा ।
हेंचि मागों पुरुषोत्तमा । कृपा आम्हांवरी कीजे ॥७७॥
हे मेघश्यामा ! आमच्या उत्तम निजसुखाला तुझा चरणविस्तारच कारणीभूत आहे. म्हणून हे पुरुषोत्तमा ! आमच्यावर कृपा करावी, एवढेच मागणे मागतों ७७.

अस्यासि हेतुरुदयस्थितिसंयमानाम्
अव्यक्तजीवमहतामपि कालमाहुः ।
सोऽयं त्रिणाभिरखिलापचये प्रवृत्तः
कालो गभीररय उत्तमपूरुषस्त्वम् ॥ १५ ॥
[ श्लोक १५]-हे प्रभो ! या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय यांचे आपण परम कारण आहात कारण शास्त्रे म्हणतात की, आपण प्रकृती, पुरूष आणि महत्तत्त्व यांचेसुद्धा नियंत्रण करणारे काल आहात तोच हा हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या तीन रूपांनी युक्त असणार्‍या संवत्सराच्या रूपाने सर्वांना विनाशाकडे घेऊन जाणारा आहे तो अतिशय वेगवान काळ म्हणजे आपण पुरूषोत्तम आहात. (१५)

जगाची उत्पत्ति स्थिति । तुजचिपासोनि श्रीपति ।
सकळ संहरिता अंतीं । तूंचि निश्चितीं महाकाळु ॥७८॥
हे श्रीपति ! जगाची उत्पत्ति आणि स्थिति तुझ्यापासूनच होते. आणि शेवटी सर्वांचा संहार करणारा महाकाळ निश्चयानें तूंच आहेस ७८.

क्षोभलिया तामसी शक्ती । सृष्टीचा प्रळय करी अंतीं ।
तेथें बीजरूपीं अव्यक्तीं । जीव राहती सूक्ष्मत्वें ॥७९॥
तामसशक्तीचा क्षोभ झाला म्हणजे ती शेवटीं सर्व सृष्टीचा प्रळय करून टाकते, तेव्हां सर्व जीव सूक्ष्मरूपानें बीजरूप अव्यक्तामध्यें राहतात ७९.

मग उत्पत्तीचे काळवेळे । तींच बीजें विरूढती सकळें ।
पाल्हेजती स्थितिकाळें । पुष्पफळें सफळित ॥१८०॥
नंतर पुन्हा उत्पत्तीचा काल आला म्हणजे तीच सारी बीजें उगवतात, आणि स्थितिकाली त्यांस पालवी फुटून पुष्पफळांनी फलद्रूप होतात १८०.

‘ हे गुणक्षोभाची अवस्था । तेथ मी नव्हें प्रळयकर्ता ‘ ।
ऐसें म्हणसी जरी कृष्णनाथा । तरी हे कथा परियेसीं ॥८१॥
‘हा तर गुणक्षोभाचा परिणाम माहे, तेव्हां मी काही प्रलयकर्ता नव्हे,’ असे जर कृष्णनाथा ! आपण म्हणत असाल, तर ही गोष्ट ऐका ८१.

तुझा साचार जाहलिया भावो । माया महत्तत्व आणि जीवो ।
नासोनियां दास पाहा हो । निजपदीं निर्वाहो भोगिती ॥८२॥
तुझ्या स्वरूपाचे खरें खरें ज्ञान झाले, तर माया, महत्तत्त्व आणि जीव या सर्वांचाच नाश होऊन भक्त असतात ते निजपदाचास्वरूपाचा-आनंद भोगतात ८२.

त्या तुज सकळ संहारितां । कोण दुर्घटता कृष्णनाथा ।
कारणेंसी प्रळयकर्ता । तूंचि सर्वथा महाकाळु ॥८३॥
हे कृष्णनाथा ! त्या तुला सर्वांचा संहार करणे काय कठीण आहे ? म्हणून कारणासहवर्तमाल प्रळयकर्ता ‘महाकाळ’खरोखर तूंच आहेस ८३.

कळों नेदिसी संसारस्थिती । अतिसूक्ष्म काळगती ।
नाश करिसी अंतीं । निजप्रकृतिविकार ॥८४॥
तूं संसाराची स्थिति कडू देत नाहीस. काळाची गति तर अत्यंत एखम करून ठेविली आहेस. अखेर आपल्या प्रकृतीच्या विकारांचा नाशही तूंच करतोस ८४.

प्रळयासी प्रमाण मूळ । लव निमेष घटिका पळ ।
अहोरात्र त्रिकाळ । ‘त्रिनाभी’ केवळ जो म्हणिये ॥८५॥
प्रळयाचे मूळ प्रमाण महणजे लव, निमेष, घटिका, पळ, अहोरात्र, त्रिकाळ, ज्याला केवळ ‘विनाभी’ असे म्हणतात ८५,

ऐसिये गंभीर गतीसीं । मायामहत्तत्व नाशिसी ।
तो तूं ‘महाकाळ’ होसी । हृषीकेशी श्रीकृष्णा ॥८६॥
अशा प्रचंड गतिसहबसमान मायामहत्तत्त्व हूं नाशून टाकतोस. म्हणून हे श्रीकृष्णा ! हे हृषीकेशी ! असा हूँ ‘ महाकाळ ‘ आहेस ८६.

त्वत्तः पुमान् समधिगम्य यया स्यवीर्यं
धत्ते महान्तमिव गर्भममोघवीर्यः ।
सोऽयं तयानुगत आत्मन आण्डकोशं
हैमं ससर्ज बहिरावरणैरुपेतम् ॥ १६ ॥
[श्लोक १६] हा पुरूष आपल्याकडे शक्ती प्राप्त करून घेऊन अमोघवीर्य बनतो आणि नंतर मायेमध्ये विश्वाच्या गर्भरूप महत्तत्त्वाची स्थापना करतो यानंतर तेच महत्तत्त्व त्रिगुणमय मायेच्या साह्याने पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, अहंकार आणि मनरूपी सात आवरणे असलेल्या सोनेरी ब्रह्मांडाची रचना करते. (१६)

पुढतीं सृष्टीचा सृजिता । तूंचि होशी गा अनंता ।
ते उत्पत्तीची अवस्था । मूळकर्ता तूंचि तूं ॥८७॥
हे अनंता ! पुढे सृष्टीचा निर्माण करणाराही तूंच होतोस. आणखी, त्या उत्पत्तीचे पालन करणार मूळ काही तूंच ८७.

तुझी लाहोनि वीर्यशक्ती । होये पुरुषासी पुरुषत्वप्राप्ती ।
तेणें अंगीकारूनि प्रकृती । केलें उत्पत्ती गर्भाधान ॥८८॥
तुझी वीर्यशक्ति घेऊन पुरुषाला पुरुषत्व येते; म्हणूनच तो प्रकृतीचा अंगीकार करून तींत गर्भाधान करतो ८८.

तेचि ते वेळीं प्रकृती । महत्तत्वीं होय गर्भवती ।
पंचतत्वेंसी गर्भीं धरिती । हिरण्यवर्ण अंडातें ॥८९॥
त्याच वेळी ती प्रकृति महत्तरवामध्यें गरोदर होऊन पंचतत्त्वांसहवर्तमान गर्भामध्यें हिरण्यवर्णाचें अंड धारण करते ८९.

तें अमोघ वीर्य प्रबळ । गर्भीं विश्वाकार बाळ ।
धरिती जाहली वेल्हाळ । ब्रह्मांड सकळ अंडामाजीं ॥१९०॥
ते वीर्य अमोघ आणि प्रबळ असल्यामुळें ही प्रिया विश्वाकाराचे बाळ धारण करते; आणि त्या अंडामध्यें सारें ब्रह्मांड असते १९०.

जैसें गर्भासी उल्ब जाण । तैसें अंडासी बहिरावरण ।
सप्तधा नेमस्त प्रमाण । तूं निर्माण करविता ॥९१॥
गर्भाला जसे गर्भवेष्टण असावे, त्याप्रमाणें या अंडाला सात प्रकारचे बहिरावरण असते. त्याचे नियमित प्रमाण बसविणारा तूंच ९१.

पृथ्वी जल अनल अनिल । नभ आणि अहंकार स्थूळ ।
सातवें तें अतिसबळ । जाण केवळ क्रियासूत्र ॥९२॥
पृथ्वी, जळ, अग्नि, वायु, आकाश, स्थूल अहंकार आणि अत्यंत प्रबळ असें ‘क्रियासूत्र’ तें सातवें ९२.

त्या गर्भासी जतनेवरी । तूंचि आंतु आणि बाहेरी ।
रिघालासी सूत्रधारी । खांबसूत्र जैसा कां ॥९३॥
कळसूत्राच्या बाहुल्यांत जसा सूत्रधार असावा, त्याप्रमाणें त्या गर्भाची जतन करण्याला आंत बाहेर तूंच असतोस ९३.

ऐसें जग जाहलें दोघांपासूनी । परी तिसरें न देखों कोणी ।
अवघी सृष्टी दोघाजणीं । दुमदुमुनी भरलीसे ॥९४॥
असें जग हे दोघांपासूनच झालेले आहे. तिसरे कोणीच कोठे दिसत नाही. सारी सृष्टि दोन वस्तूंनीच भरून दुमदुमलेली दिसते ९४.

वाती लावूनि पाहतां । तिसरें न लगेचि हाता ।
दुसरी प्रकृती निर्धारितां । तेही सर्वथा टवाळ ॥९५॥
दिवा लावून पाहिले तरी तिसरे काहीच हाताला लागत नाही. बरें; प्रकृति एक दुसरी आहे म्हणावें, तर ते खोटें ९५.

ऐसा दुजेनवीण एकला । एकलाचि विश्व जाहला ।
आकळीत कौशल्यकळा । मल्लमर्दना श्रीकृष्णा ॥९६॥
असा दुसरेपणाशिवाय एकी एकटाच विश्व होऊन राहिलेला आहेस. हे मलमर्दना श्रीकृष्णा ! कौशल्याची चतुराई तुझी तूं प्रकट करीत आहेस ९६.

एवं एकलेपणें तूं कर्ता । त्यालागीं लेपु न लगे सर्वथा ।
कर्म करूनि तूं अकर्ता । तेचि कथा परियेसीं ॥९७॥
अशा प्रकारे तूं एकटाच कर्ता असल्यामुळें तूं कशानेही लिप्त होत नाहीस. आतां कर्म करूनही तूं अकर्ता कसा असतोस, तेही ऐक ९७.

तत्तस्थूषश्च जगतश्च भवानधीशो
यन्माययोत्थगुणविक्रिययोपनीतान् ।
अर्थाञ्जुषन्नपि हृषीकपते न लिप्तो
येऽन्ये स्वतः परिहृतादपि बिभ्यति स्म ॥ १७ ॥
[श्लोक १७]-म्हणून, हे हृषीकेशा ! आपण सर्व चराचर जगाचे अधीश्वर आहात; याच कारणास्तव मायेच्या गुणांच्या विषमतेमुळे निर्माण होणार्‍या निरनिराळ्या पदार्थांचा उपभोग घेत असतानाही आपण त्याने लिप्त होत नाही आपल्या व्यतिरिक्त इतर, स्वतः त्यांचा त्याग करूनसुद्धा त्या विषयांना भीत असतात. (१७)

चरें आणि अचरें । जंगमें आणि स्थावरें ।
या जगाचा स्वामी तूं निर्धारें । केलें खरें गतश्लोकीं ॥९८॥
चर आणि अचर, स्थावर आणि जंगम अशा सर्व जगाचा खरोखर धनी तूंच आहेस, हे मागच्या लोकांत सिद्ध करून दाखविले ९८.

तेंचि स्वामित्व कैसें घडे । हें जरी पुससी धडफुडें ।
तरी तेहीविखीं रोकडें । वचन गाढें अवधारीं ॥९९॥
आतां तो धनीपणा कसा येतो, हे जर खरेपणानें विचारीत असशील, तर त्याविषयीही स्पष्ट म्हणणे ऐकून घे ९९.

निजमायेचेनि योगें । नाना विषय भोगिसी अंगें ।
तें भोगिलेपण अंगीं न लगे । अकर्तात्मसंगें अलिप्त ॥२००॥
तूं आपल्या मायेच्या योगानें अनेक प्रकारचे विषय स्वतः भोगतोस; पण ते भोगलेपण तुझ्या अंगाला लागत नाही. कारण अकात्मबोधाच्या संगतीनें तूं अलिप्त असतोस २००.

तोचि अकर्तात्मबोधु कैसा । जरी म्हणशी हृषीकेशा ।
ते आगमनिगमां अतर्क्य दशा । परम पुरुषा परियेसीं ॥१॥
हे हृषीकेशी ! तो अकर्तात्मक बोध कसा असतो असे जर म्हणशील, तर हे परमपुरुषा ! ऐक. ती दशा वेदशास्त्रांनासुद्धा अतर्क्य आहे १.

भोग्य-भोग-भोक्ता । या तिहींतें तूं प्रकाशिता ।
जेवीं घटीं बिंबोनि सविता । अलिप्तता स्वभावें ॥२॥
भोग्य, भोग आणि भोक्ता ह्या तिहींनाहीं प्रकाशित करणारा तूंच आहेस. ज्याप्रमाणें सूर्य घटामध्यें प्रतिबिंबित झाला तरी तो स्वभावगत्याच अलिप्त असतो २.

घट-जळ-प्रति-बिंबासी । स्वयें सविता प्रकाशी ।
प्रकाशूनि अलिप्त त्यांसी । तेवीं तूं भोगासी श्रीकृष्णा ॥३॥
घट, जळ आणि प्रतिबिंब ह्या तिघांनाहीं सूर्य स्वतः प्रकाशित करतो; पण तो प्रकाशित करूनही त्यांच्यापासून अलिप्तच असतो, त्याप्रमाणें हे श्रीकृष्णा ! तूंही भोग भोगून अलिप्त असतोस ३.

अथवा कर्म-कार्य-कर्ता । या तिहींमाजीं निजात्मता ।
देखे तो अभोक्ता । भोगोनि तत्वतां निजभोग ॥४॥
किंवा कर्म, कार्य आणि कर्ता ह्या तिहींमध्येंही जो आपला आत्माच आहे असे मानतां, तोही निश्चितपणे भोग भोगून अभोक्ताच होय ४.

दर्पणींच्या प्रतिबिंबासीं । जो प्रवर्तला भोगासी ।
व्यभिचाराचा आळ त्यासी । केवीं अंगासी लागेल ॥५॥
दर्पणांतील प्रतिबिंबाशीच जो विलास करण्याला प्रवृत्त झाला, त्याच्या अंगावर व्यभिचाराचा आरोप कसा येणार ? ५.

जगचि हें अवघें । जो होऊनि ठाके अंगें ।
त्यासी बाधावें कोणें भोगें । निजात्मयोगें योगिया ॥६॥
जो स्वतः हे सारे जगच होऊन राहतो, त्या निजात्मयोगयुक्त योग्याला कोणते भोग बाधणार ? ६.

ऐशिया बोधाचेनि बळें । तो विषयावरी जरी लोळे ।
तरी विषयाचेनि विटाळें । बोधु न मैळे तयांचा ॥७॥
अशा बोधाच्याच सामर्थ्यानें तो जरी विषयावर लोळत असला, तरी त्या विषयाच्या विटाळानें त्याचे आत्मज्ञान मलिन होत नाहीं ७.

तो घेणें देणें करी । पाहतां दिसे व्यवहारी ।
नांदतांही घरदारीं । त्यामाझारीं तो नाहीं ॥८॥
तो देणे घेणे करीत असतो, पाहूं गेलें तर व्यवहारी दिसतो, घरदार करून नांदत असतो पण तो मात्र त्यांत नसतो ८.

नेणोनि बोधाची मागी । भोगत्याग केला योगीं ।
तरी कांपताति सर्वांगीं । वासना अंगीं उरलीसे ॥९॥
असा आत्मबोधाचा मार्ग न समजतां योग्यांनी भोगाचा मात्र त्याग केला, तरी अंगांत वासना राहिलेली असल्यामुळे, त्यांचे सारें आंग लटलट कांपत असते ९.

स्वप्नीं विषय देखती । जागे जाहल्या प्रायश्चित घेती ।
नाहीं मावळली अहंकृती । यालागीं भीती सर्वदा ॥२१०॥
ते स्वप्नामध्यें विषय पाहातात, आणि जागे झाल्यावर प्रायश्चित्त घेतात ! ह्याचे कारण अहंकार गेला नसल्यामुळें त्यांना सदासर्वदा भीतीच वाटते २१०

ऐशिया जी विषयभेडा । नाहीं निजबोधु धडफुडा ।
तैसा नव्हेसी तूं निधडा । दिसे रोकडा निजबोधु ॥११॥
अशा विषयाच्या बागुलाला भिणाऱ्यांना खरोखर आत्मबोध झालेला नसतो; पण तसा काहीं तूं नव्हेस. तूं महान् धैर्यशाली असून तुझा आत्मबोध कसा स्पष्ट दिसतो आहे ११.

स्मायावलोकलवदर्शितभावहारि
भ्रूमण्डलप्रहितसौरतमन्त्रशौण्डैः ।
पत्‍न्यस्तु षोडशसहस्रमनङ्गबाणैः
यस्येन्द्रियं विमथितुं करणैर्न विभ्व्यः ॥ १८ ॥
[श्लोक १८] सोळा हजारांहून अधिक राण्या आपल्या मंद हास्ययुक्त नेत्रकटाक्षांनी प्रगट केलेल्या भावामुळे मनोहर दिसणार्‍या भुवयांच्या इशार्‍याने प्रेमभाव प्रगट करण्यात निपुण असणारे सम्मोहक कामबाण आपल्यावर सोडून आणि कामकलांचे प्रदर्शन करूनही आपले मन जराही विचलित करू शकल्या नाहीत. (१८)

मी निधडा निजबोधें संपूर्ण । म्हणशी देखों न शके कवण ।
ये अर्थींचें उपलक्षण । ऐक ते खूण स्वामिया ॥१२॥
आतां तूं कदाचित् असें म्हणशील की, ‘मी धैर्यशाली आहे, आत्मज्ञानानें परिपूर्ण आहे, असे मला कोणी पाहू शकणार नाही.’ तर हे स्वामी ! तशा प्रकारची लक्षणे व ती प्रत्यक्ष गोष्टही सांगतो ऐक १२.

सोळा सहस्त्र पत्‍न्या घरीं । आणि गोकुळींच्या परनारी ।
कुब्जादि मथुरेमाझारीं । कर्णकुमारी भोगिल्या ॥१३॥
घरामध्यें सोळा हजार बायका; आणि गोकुळांतील इतरांच्या स्त्रिया खेरीज; ह्याशिवाय मथुरेमध्यें कुब्जा वगैरे आणि मिश्र जातींतील कुमारिका भोगल्या त्या वेगळ्याच १३.

मुंजी नव्हतां आधीं । भोगिली त्वां गोंवळी पेंधी ।
धरोनियां सांदीबिदीं । नदोनदीं असंख्य ॥१४॥
मुंजसुद्धा झालेली नव्हती; त्याच्या आधीच गवळ्याच्या पांगळ्या मुलीचा उपभोग घेतलास. सांदीकोंदीला आणि नदीविहिरीवरही किती धरल्या त्यांना तर संख्याच नाहीं ! १४.

अविधी भोगितां नारी । बोध न मैळेचि श्रीहरी ।
अंगें रिघालासी क्षीरसागरीं । अर्जुना करीं धरोनी ॥१५॥
हे हरी ! असा तूं अविधीनें जरी त्यांचा उपभोग घेतलास, तरी तुझा आत्मबोध काही मळला नाही. अर्जुनाला हातात धरून स्वतः क्षीरसागरांत शिरलास १५.

शेषशायी नारायणा । उत्कंठा तुझिया दर्शना ।
तेणें उपावो केला जाणा । हरूनि ब्राह्मणाचीं बाळें ॥१६॥
शेषशायी नारायणालासुद्धा तुझ्या दर्शनाची उत्कंठा लागून राहिली, म्हणून त्यानें मुद्दामच ब्राह्मणाची मुले हरण करून आपणाकडे नेली १६.

जेवीं आपुलें स्वरूप आपण । पहावया कीजे दर्पण ।
तेवीं पहावया कृष्णार्जुन । स्वयें नारायण अपत्यें आणी ॥१७॥
ज्याप्रमाणें आपले स्वरूप आपणच पाहावयाला आरसा घ्यावा लागतो, त्याप्रमाणें कृष्णार्जुनांना पाहाण्यासाठीच नारायणानें आपण होऊन ती मुले आणली १७.

‘तूं अवतार नर-नारायण । तुझें घ्यावया दरुषण ।
ब्राह्मणअवपत्यें जाण । म्यां आपण आणिलीं’ ॥१८॥
“तूं नरनारायणाचा अवतार आहेस, तुझें दर्शन घ्यावें म्हणूनच मी स्वतः ही ब्राह्मणांची मुले इकडे आणलीं” १८.

ऐसे नारायणाचे बोल । सप्रेम अतिसखोल ।
आम्हीं ऐकिले गा सकळ । तुझा बोध अकळ श्रीकृष्णा ॥१९॥
असे अत्यंत प्रेमाचे व गंभीर शब्द श्रीनारायणाच्या मुखांतून निघालेले आम्ही सारे ऐकलेले आहेत. म्हणून म्हणतों, हे श्रीकृष्णा ! तुझा आत्मबोध फार अगाध आहे १९.

तीं ब्राह्मणाचीं अपत्यें । जीं बहु काळ जाहलीं होतीं मृतें ।
तुवां आणोनि दिधिलीं श्रीअनंतें । तीं देखलीं समस्तें चरितें आम्हीं ॥२२०॥
ती मृत होऊन कितीक काळ लोटलेली ब्राह्मणाची मुले, श्रीकृष्णा ! तुम्ही आणून दिलीत. ती सारी चरित्रे आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेली आहेत २२०.

तुझी नारायणासी आस्था । तेथ आमुची कवण कथा ।
पार न कळे जी अच्युता । गुणातीता श्रीकृष्णा ॥२१॥
नारायणालासुद्धा तुझी इतकी आस्था, त्याच्यापुढे आमची ती कथा काय ? हे अच्युता ! हे गुणातीता श्रीकृष्णा ! तुझा अंतपार कोणालाही लागावयाचा नाहीं २१.

मागां अवतार जाहले । परी ऐसें चरित्र नाहीं केलें ।
विधिवेदां लाजविलें । व्यभिचारियां दिधलें निजपद ॥२२॥
मागे आपण पुष्कळ अवतार घेतले, पण असें चरित्र केलेले नाही. वेदविधीला लाजवून सोडलें, आणि व्यभिचार करणारांनाहीं आत्मपद देऊन टाकले २२.

जें म्यां भोगिलें स्त्रियांसी । तें तूं उदासीनत्वें म्हणसी ।
तेणें बाध न पवे बोधासी । हृषीकेशी तें न घडे ॥२३॥
पण ‘मी ज्या स्त्रिया भोगल्या, त्या निखालस उदासीनपणानें भोगल्या, म्हणून आत्मज्ञानाला कांहीं बाध आला नाही,’ असें म्हणशील, तर श्रीकृष्णा ! तसेंही झालेले नाहीं २३.

हावभावविलासेंसीं । अंगें दाविती चपळतेसी ।
तुज लक्षोनि पुरुषोत्तमासी । कामबाणासी योजिती ॥२४॥
त्या स्त्रियाही काही सामान्य नव्हत्या. त्या विलासामध्यें चतुर असून शृंगारयुक्त हावभाव करीत असत. नटून मुरडून अंगाची चपलताही दाखवीत असत आणि तुला पुरुषोत्तमाला पाहून कामबाणांचाही वर्षाव करीत २४.

वाऊनि भ्रमंडलाचे वेढे । व्यंकट कटाक्षें बाण गाढे ।
सुरतमंत्रीं रोकडे । केले धडफुडे सतेज ॥२५॥
भ्रुकुटिरूप धनुष्याचे वेढे चढवून वांकड्या कटाक्षाचे तीव्र बाण सुरतमंत्रांनी त्या देदीप्यमान करीत असत २५.

ज्या बाणांचे घायीं । इंद्र खोंचला सहस्त्रां ठायीं ।
शिव लोळविला पाहीं । मोहिनीव्यामोहीं महाबाणें ॥२६॥
ज्या बाणांच्या तडाक्यानें इंद्रालासुद्धा हजार ठिकाणी क्षते पडून त्याच्या देहाची चाळण होऊन गेली, ज्या प्रचंड बाणानें शंकराला मोहिनीच्या मोहामध्यें लोळवून सोडले २६;

ज्या बाणाचा पिसारा । लागतांचि पैं भेदरा ।
तापसीं घेतला परा । सोडोनि घरदारा पळाले ॥२७॥
ज्या बाणाचा नुसता पिसारा लागतांच तपस्वी लोकांची घाबरगुंडी उडते व ते घरदार सोडून पळून जातात २७,

ऐसें सोळा सहस्त्र बाण । अखंड तुजचिवरी संधान ।
करितां न मैळे बोधु जाण । अतिविंदान हें तुझें ॥२८॥
अशा सोळा हजार कामबाणांचे अखंड शरसंधान तुझ्यावर होत असतांनासुद्धा तुझा बोध मळला नाही. हे तुझे सामर्थ्य केवढे बरें ? २८.

घरींच्या स्त्रिया सहस्त्र सोळा । गोकुलादि मथुरेच्या अबळा ।
तुज विषयी करावया गोपाळा । नव्हती सकळा समर्था ॥२९॥
सोळा हजार घरच्या स्त्रियांशिवाय गोकुळांतील व मथुरेतील स्त्रिया. पण इतक्या साऱ्यासुद्धा हे गोपाळा ! तुला विषयी म्हणजे विषयलंपट करण्याला समर्थ नव्हत्या २९.

त्यांचेनि तुज न करवे विषयी । परी त्या त्वां केल्या निर्विषयी ।
ऐसा तूं त्रैलोक्याचे ठायीं । स्वामी पाहीं श्रीकृष्णा ॥२३०॥
त्यांच्यानें काही तुला विषयी करवले नाही; पण तूं मात्र त्यांना निर्विषयी करून सोडल्यास. हे श्रीकृष्णा ! असा तूं त्रैलोक्याच्या ठायीं स्वामी म्हणजे श्रेष्ठ आहे २३०.

ऐशी तुझी कीर्ति ऐकतां । अथवा चरणतीर्थ घेतां ।
याचि दोंही तीर्थांची समर्थता । पवित्रता जगासी ॥३१॥
अशी ही तुझी कीर्ति ऐकली, किंवा तुझ्या चरणाचे तीर्थ घेतले, तर ह्या दोन्ही तीर्थांच्या सामर्थ्यानें जग पवित्र होऊन जातें ३१.

विभ्व्यस्तवामृतकथोदवहास्त्रिलोक्याः
पादावनेजसरितः शमलानि हन्तुम् ।
आनुश्रवं श्रुतिभिरङ्घ्रिजमङ्गसङ्गैः
तीर्थद्वयं शुचिषदस्त उपस्पृशन्ति ॥ १९ ॥
[श्लोक १९]-त्रैलोक्यातील पापांच्या राशी धुऊन टाकण्यासाठी दोन पवित्र नद्या समर्थ आहेत. एक आपल्या अमृतमय लीलांनी भरलेली कथानदी आणि दुसरी आपले चरण धुतल्यानंतर वाहाणार्‍या पाण्याने भरलेली गंगानदी ! म्हणूनच आश्रमधर्म पाळणारे लोक कानांनी आपल्या कथानदीमध्ये आणि शरीराने गंगेमध्ये बुडी मारून दोन्ही तीर्थांचे सेवन करतात. (१९)

तुझिये कीर्तीचें श्रवण । आंतरमलाचें क्षालन ।
करूनियां वृत्ति जाण । परम पावन कीर्तनें ॥३२॥
तुझ्या कीर्तीचे श्रवण हे अंतःकरणांतील पातकाचे क्षालन करून वृत्ति अत्यंत पवित्र करतें ३२.

तुझिया चरणींची गंगा । सकळ पातकें ने भंगा ।
ते पायवणी श्रीरंगा । पवित्र जगातें करी ॥३३॥
तसेंच, तुझ्या चरणापासून निघालेली गंगा सर्व पातकांचा नाश करते. हे श्रीरंगा ! ते आपले चरणतीर्थ साऱ्या जगाला पुनीत करून सोडतें ३३.

या दोंही तीर्थांचें सेवन । अखंड करिती साधुजन ।
तेणें होऊनि परम पावन । समाधान निजवृत्ती ॥३४॥
म्हणून साधु लोक ह्या दोन्ही तीर्थांचे अखंड सेवन करतात, तेणेंकरून ते परमपावन होत्साते समाधानानें निजात्मवृत्तींत तल्लीन असतात ३४.

अवतारांचे अंतीं । ये दोनी तीर्थीं अतिविख्याती ।
प्रगट केली तुवां क्षिती । तारावया श्रीपती निजदासां ॥३५॥
हे श्रीपति ! अवताराच्या शेवटी ही दोन तीर्थे जगावर आपल्या दासांना तारण्यासाठी तूं जगत्प्रसिद्ध करून ठेवलेली आहेस ३५.

एक श्रवणें एक स्नानें । दोनी तीर्थें परम पावनें ।
प्रगट केलीं जगज्जीवनें । मलिन जनें तरावया ॥३६॥
एक श्रवणाने, आणि एक स्नानानें, मिळून दोन्ही तीर्थे अत्यंत पावन अशी, पातकी लोकांना तरून जाण्यासाठी जगजीवनानेंच उत्पन्न करून ठेविली आहेत ३६.

श्रीबादरायणिरुवाच ।
इत्यभिष्टूय विबुधैः सेशः शतधृतिर्हरिम् ।
अभ्यभाषत गोविन्दं प्रणम्याम्बरमाश्रितः ॥ २० ॥
[श्लोक २०]-श्रीशुक म्हणतात ब्रह्मदेवांनी, सर्व देव आणि शंकर यांच्यासह अशाप्रकारे भगवंतांची स्तुती केली नंतर नमस्कार करून आकाशात राहून भगवंतांना ते म्हणाले. (२०)

शुक म्हणे परीक्षिती । यापरी देवीं समस्तीं ।
स्तविला स्वानंदें श्रीपती । परमभक्तिभावार्थें ॥३७॥
शुकाचार्य म्हणतात, हे राजा परिक्षिती ! ह्याप्रमाणें सर्व देवांनी अत्यंत भक्तिभावानें व आनंदानें श्रीकृष्णाचा स्तव केला ३७.

ऐसा करूनि स्तुतिवादु । संतोषविला गोविंदु ।
देवांसी होत असे आल्हादु । परम विनोदु सर्वांसी ॥३८॥
अशा प्रकारे स्तुतिस्तोत्र गाऊन श्रीकृष्णाला त्यांनी संतुष्ट केले. सर्व देवांना मोठा आल्हाद होऊन अत्यंत कौतुक वाटले ३८.

स्तुति करावया अग्रणी । ब्रह्मा शिव पुढें येऊनी ।
तिंहीं जय-जयकार करूनी । लोटांगणें घातलीं ॥३९॥
ही स्तुति करण्याकरतां ब्रह्मदेव आणि शंकर सर्वांच्या पुढे आले होते, त्यांनी मोठा जयजयकार करून लोटांगण घातले ३९.

देव राहूनियां गगनीं । हात जोडोनि विमानीं ।
विनंती करावयालागोनी । ब्रह्मा पुढें राहोनी बोलतु ॥२४०॥
बाकीचे सारे देव आकाशांत विमानामध्यें राहून हात जोडून बसले होते. त्यांच्या सर्वांच्या तर्फेनें पुन्हा विनंती करण्यासाठी म्हणून ब्रह्मदेव पुढे सरून बोलू लागले २४०.

श्रीब्रह्मोवाच ।
भूमेर्भारावताराय पुरा विज्ञापितः प्रभो ।
त्वमस्माभिरशेषात्मन्तत्तथैवोपपादितम् ॥ २१ ॥
[श्लोक २१]-ब्रह्मदेव म्हणाले सर्वात्मन प्रभो ! आपण अवतार घेऊन पृथ्वीवरील भार कमी करावा, अशी आम्ही अगोदर प्रार्थना केली होती ते काम चांगल्या तर्‍हेने पूर्ण केले आहे. (२१)

उतरावया धराभारा । पूर्वीं प्रार्थिलासी यदुवीरा ।
अभय द्यावया सुरवरां । आम्हीं श्रीधरा विनविलें ॥४१॥
हे यादवश्रेष्ठा ! श्रीधरा ! पूर्वी आम्ही पृथ्वीस झालेला भार कमी करून सुरवरांना अभय द्यावे, म्हणून आपली प्रार्थना केली होती ४१.

आम्हीं विनविलें जैसें । तुवां कार्य केलें म्हणों तैसें ।
त्याहूनियां विशेषें । केली निजविन्यासें धर्मवृद्धी ॥४२॥
आम्ही जशी प्रार्थना केली, त्याप्रमाणें आपण कार्य केलेत असे म्हणावें, तर आपण आपल्या लीलेनें त्याहून विशेषच धर्मवृद्धि केलीत ४२.

तूं सर्वेश्वरु सर्वात्मा । जें कार्य न कळेचि आम्हां ।
तेंही तुवां पुरुषोत्तमा । घनश्यामा संपादिलें ॥४३॥
हे पुरुषोतमा ! हे घनश्यामा ! तूं सर्वेश्वर आणि सर्वात्मा असल्यामुळें जे कार्य आम्हाला कळत नाही, तेंही आपण करून टाकले ४३.

धर्मश्च स्थापितः सत्सु सत्यसन्धेषु वै त्वया ।
कीर्तिश्च दिक्षु विक्षिप्ता सर्वलोकमलापहा ॥ २२ ॥
[श्लोक २२]-सत्यपरायण साधुपुरूषांच्या ठिकाणी आपण धर्माची स्थापनासुद्धा केलीत आणि दाही दिशांना लोकांचे दोष दूर करणारी आपली कीर्ती पसरविली. (२२)

सत्यवादी साधु जे कांहीं । ज्यांचा संकल्प तुझ्या पायीं ।
धर्म स्थापिला त्यांच्या ठायीं । तुवां पाहीं यथस्थित ॥४४॥
जे कोणी सत्यवादी व साधु होते, तुझ्याच चरणी ज्यांचा संकल्प होता, त्यांच्या ठिकाणी तूं यथार्थपणे धर्म स्थापन केलास ४४.

आणिक दश दिशांप्रती । विस्तारिली उदार कीर्ती ।
तेणें पावन त्रिजगती । होय निश्चितीं श्रवणद्वारें ॥४५॥
आणखी, ही उत्कृष्ट कीर्ति तूं दशदिशांना पसरलीस. तिच्या श्रवणानें खरोखर त्रिभुवन पावन होऊन जाईल ४५.

अवतीर्य यदोर्वंशे बिभ्रद्‌रूपमनुत्तमम् ।
कर्माण्युद्दामवृत्तानि हिताय जगतोऽकृथाः ॥ २३ ॥
[श्लोक २३] आपण हे सर्वोत्तम रूप धारण करून यदुवंशात अवतार घेतलात आणि जगाच्या हितासाठी औदार्य आणि पराक्रमाने परिपूर्ण अशा अनेक लीला केल्या. (२३)

पूर्णपुरुषा हृषीकेशी । तूं अवतरलासी यदुवंशीं ।
सीमा तुझिया रूपासी । बरवेपणासी न करवे ॥४६॥
हे श्रीकृष्णा ! तूं पूर्ण पुरुष असून यादवकुलामध्यें अवतार घेतलास. तुझ्या स्वरूपाच्या चांगुलपणाला तर सीमाच नाहीं ४६.

तूं सर्वांमाजीं सर्वोत्तम । देखतां वृत्तींसी उपरम ।
लीलाविग्रही पुरुषोत्तम । मनोरम सकळिकां ॥४७॥
सर्वांमध्यें सर्वोत्तम तो तूं. तुला पाहातांच वृत्तीची खळबळ मोडून शांत होते. असा केवळ लीलेनें देह धारण करणारा तूं पुरुषोत्तम सर्वांनाच मनोरम वाटत आहेस ४७.

कर्में केलीं परमाभ्दुतें । गोवर्धन धरिला वाम हस्तें ।
मुखें प्राशूनि वणव्यातें । गोपाळांतें वांचविलें ॥४८॥
तूं अत्यंत अद्‌भुत कर्मे केलींस. डाव्या हातानें गोवर्धन पर्वत उचलून धरलास. मुखानें वणवा ग्गिळून गोपाळांचे संरक्षण केलेंस ४८.

मृता आणिलें गुरुपुत्रासी । गत गर्भ भेटविले देवकीसी ।
गोपालवत्सें तूं जाहलासी । विधात्यासी भुलविलें ॥४९॥
मृत झालेला गुरुपुत्र आणलास. गेलेले गर्भ देवकीला भेटविलेस. आणि गोपाळ व वत्से तूंच होऊन ब्रह्मदेवालाही भूल पाडलीस ४९.

जगाचिया परम हिता-। लागीं नाना चरित्रकथा ।
करिता जालासी श्रीअनंता । कृष्णनाथा निजजनका ॥२५०॥
हे श्रीकृष्णनाथा ! अनंता ! हे मज्जनका ! अशा प्रकारे जगाच्या अत्यंत हिताकरतां अनेक प्रकारच्या चरित्रकथा तूं करून दाखविल्यास २५०.

यानि ते चरितानीश मनुष्याः साधवः कलौ ।
श्रृण्वन्तः कीर्तयंतश्च तरिष्यन्त्यञ्जसा तमः ॥ २४ ॥
[श्लोक २४ ] हे प्रभो ! जी सज्जन माणसे कलियुगात आपल्या या लीलांचे श्रवणकीर्तन करतील, ती या अज्ञानरूप अंधकाराच्या पलीकडे सहज निघून जातील. (२४)

कथाकौतुकें विचित्रें । नाना परींचीं चरित्रें ।
परम पावन पवित्रें । येणें अवतारें त्वां केलीं ॥५१॥
आपण हा अवतार घेऊन अत्यंत पावन अशी विचित्र कथाकौतुके आणि नाना प्रकारची चरित्रे करून दाखविलींत ५१.

कलियुगीं साधुजन । या चरित्रांचें श्रवण कीर्तन ।
करितां तरले जाण । मायामोह त्रिगुणेंसीं ॥५२॥
साधुलोक कलियुगामध्यें ह्या चरित्रांचे श्रवण-कीर्तन करून त्रिगुणांसह मायामोह तरून जातील ५२.

यदुवंशेऽवतीर्णस्य भवतः पुरुषोत्तम ।
शरच्छतं व्यतीयाय पञ्चविंशाधिकं प्रभो ॥ २५ ॥
[श्लोक २५] हे पुरूषोत्तम प्रभो ! आपण यदुवंशात अवतार घेतल्याला एकशे पंचवीस वर्षे झाली आहेत. (२५)

अवतरल्या यदुवंशीं । पुरुषोत्तमा हृषीकेशी ।
संख्या या अवतारांसी । जाहली ते तुजपाशीं सांगेन ॥५३॥
हे पुरुषोत्तमा ! हे हृषीकेशी ! ह्या यदुवंशामध्यें आपण अवतार घेतला. त्या अवताराला होऊन किती वर्षे झाली, तेही मी आपल्यापाशी सांगतों ५३.

मृत्युलोकीं मनुष्यमर्यादा । शत वर्षें जी गोविंदा ।
ते अतिक्रमोनि आवदा । अधिक मुकुंदा पंचवीस जाहलीं ॥५४॥
हे गोविंदा ! मृत्युलोकामध्यें मनुष्याची आयुष्यमर्यादा शंभर वर्षे नेमलेली आहे. ती मर्यादा संपून जाऊन हे श्रीकृष्णा ! पंचवीस वर्षे अधिकच झाली आहेत. ५४.

नाधुना तेऽखिलाधार देवकार्यावशेषितम् ।
कुलं च विप्रशापेन नष्टप्रायमभूदिदम् ॥ २६ ॥
[श्लोक २६]-हे सर्वाधार ! आता देवांचे कोणतेही कार्य शिल्लक राहिलेले नाही आपले हे कुळसुद्धा ब्राह्मणांच्या शापामुळे जवळ जवळ नष्ट झालेलेच आहे. (२६)

आतां पुढें येथ कांहीं । देवकार्य उरलें नाहीं ।
यादवकुळ म्हणसी तेंही । नष्टप्राय पाहीं उरलेंसे ॥५५॥
ह्याउपर येथे देवांचे काही कार्य उरलेले नाही. यादवकुळ म्हणाल, तर तेही नष्टप्रायच राहिलेले आहे. ५५.

उठवणी आलें हतिरूं । कां पांख उपडिल्या पांखरूं ।
तैसा यादवांचा दळभारू । भूमिये भारु उरला असे ॥५६॥
उठवणीला आलेला हत्ती असावा, किंवा पंख उपटलेले पांखरूं असावे, त्याप्रमाणें यादवांची सेना भूमीला केवळ भारभूत होऊन राहिली आहे ५६.

निवणाचा फुटका डेरा । कां क्षयो लागल्या राजकुमरा ।
वणवा आहाळल्या अजगरा । यादववीरां ते दशा ॥५७॥
निवणाचा डेरा फुटका असावा, किंवा राजकुमाराला क्षयरोग जडावा, किंवा वणव्यामध्यें अजगर होरपळावा, त्याप्रमाणें ह्या यादववीरांची दशा झालेली आहे ५७.

दारुण ब्राह्मणाचा शाप । नाशला वीर्यशौर्यप्रताप ।
गळाला वाढिवेचा दर्प । केवळ प्रेतरूप दिसताती ॥५८॥
ब्राह्मणाचा शाप महाभयंकर. त्यामुळें यादवांचे वीर्य, शौर्य, प्रताप आणि त्यांचा शिखरास पोंचलेला गर्व, चट् सारा नाहीसा होऊन त्या सर्वांवर प्रेतकळा आलेली दिसत आहे ५८.

ततः स्वधाम परमं विशस्व यदि मन्यसे ।
सलोकाँल्लोकपालान्नः पाहि वैकुण्ठकिङ्करान् ॥ २७ ॥
[श्लोक २७]-म्हणून, हे वैकुंठनाथ ! आपणास योग्य वाटत असेल तर आपण आपल्या परम धामात परत यावे आणि आपले सेवक असलेल्या आम्हा लोकपालांचा तसेच आमच्या लोकांचा सांभाळ करावा. (२७)

यालागीं जी यादवराया । आम्ही वांछूं तुझ्या पायां ।
वेगु कीजे स्वधामा यावया । सुरवर्या श्रीकृष्णा ॥५९॥
ह्याकरतां हे देवाधिदेवा ! हे यादवराया ! हे श्रीकृष्णा ! आम्ही तुझ्या पायांची वाट पाहात आहों. तरी वैकुंठास येण्याची त्वरा करावी ५९.

ऐकें देवकींनंदना । जरी मानेल तुझिया मना ।
तरी निघिजो जी याचि क्षणा । सुरसेना तिष्ठत ॥२६०॥
हे देवकीनंदना ! जर तुझ्या मनाला येत असेल, तर ह्याच क्षणी निघण्याची तयारी करावी. देवांची सेना वाट पाहात उभी आहे २६०.

सलोक लोकपाळ जे जे । त्यांवरी तुवां कृपा कीजे ।
आम्ही किंकर गा तुझे । वचन मानिजे दासांचें ॥६१॥
सलोक, लोकपाळ म्हणून जे जे आहेत, त्यांवर तुम्ही कृपा करावी. आम्ही आपले दास आहोत. ह्याकरतां ह्या दासांच्या बोलण्याला मान द्यावा ६१.

ऐकें जी वैकुंठनाथा । तुझी थोर आम्हां अवस्था ।
आदिकरूनि उमाकांता । आणि समस्तां देवांसी ॥६२॥
हे वैकुंठनाथ महाराजा ! ऐकावें. मला व शंकरादि साऱ्या देवांनाहीं आपल्या सेवेविषयी अत्यंत उत्कंठा लागून राहिली आहे ६२.

श्रीभगवानुवाच ।
अवधारितमेतन्मे यदात्थ विबुधेश्वर ।
कृतं वः कार्यमखिलं भूमेर्भारोऽवतारितः ॥ २८ ॥
[श्लोक २८]-श्रीकृष्ण म्हणाले हे ब्रह्मदेवा ! तू म्हणालास, तसेच मी अगोदरच ठरवले आहे तुमचे सर्व काम मी पूर्ण केले असून पृथ्वीवरील भार उतरविला आहे. (२८)

जो योगज्ञाना मुकुटमणी । मेघगंभीरया वाणी ।
ब्रह्मयाप्रती चक्रपाणी । हास्यवदनीं । बोलिला ॥६३॥
हें ब्रह्मदेवाचे भाषण ऐकून योगज्ञान्यांतील मुकुटमणि श्रीकृष्ण मेघासारख्या गंभीर वाणीने, हास्यवदन करून ब्रह्मदेवाशी बोलू लागला ६३.

नादब्रद्म मुसावलें । कीं निजानंदाचें फळ पिकलें ।
तैसें श्रीमुखें बोलों आदरिलें । भाग्य उदेलें श्रवणांचें ॥६४॥
नादब्रह्म जणूं मुसावले किंवा आत्मानंदाचे फळच पक्वदशेला आले, तशा त्या श्रीकृष्णांनी बोलण्यास प्रारंभ केला. त्यामुळें कर्णाचे भाग्यच उदयास आले ६४.

गौरवें म्हणे ‘ब्रह्मदेवा । संतोषलों तुझिया भावा’ ।
पुत्रस्नेहेंकरूनि तेव्हां । उद्यत खेवा हरि जाला ॥६५॥
ते मोठ्या गौरवानें म्हणाले, “ब्रह्मदेवा ! तुझी भक्ति पाहून मी फार संतुष्ट झालो.” असे म्हणून श्रीहरि त्या वेळी पुत्रप्रेमानें आलिंगन देण्यास उद्युक्त झाले ६५.

आवडीं म्हणे विबुधेंद्रा । सत्य तुझी वाङ्मुलद्रा ।
तुझेनि वचनें ब्राह्मणेंद्रा । धराभारा उतरिलें ॥६६॥
आणि प्रेमानें म्हणाले, “हे देवेंद्रा ! तुझे म्हणणे खरे आहे. हे ब्राह्मणेंद्रा ! तुझ्या विनंतीप्रमाणें मी पृथ्वीचा भार तर उतरला खरा ६६.

सकळ कार्य निःशेख । म्यां संपादिलें देख ।
तरी उरलें असे एक । थोर अटक मजलागीं ॥६७॥
मी सारे कार्य पुरे केले आहे. बाकी काही राहिले नाही. तरी एक मोठे काम राहिलेले आहे, आणि त्याचीच मला अडचण येऊन पडली आहे ६७.

तदिदं यादवकुलं वीर्यशौर्यश्रियोद्धतम् ।
लोकं जिघृक्षद्रुद्धं मे वेलयेव महार्णवः ॥ २९ ॥
[श्लोक २९]- परंतु हे यादवकुळ पराक्रम, शौर्य आणि संपत्तीने उन्मत्त होऊ लागले आहे. हे सर्व पृथ्वी गिळून टाकील. किनारा समुद्राला रोखून धरतो, त्याप्रमाणे मी यांना रोखून धरले आहे. (२९)

यद्यसंहृत्य दृप्तानां यदूनां विपुलं कुलम् ।
गन्तास्म्यनेन लोकोऽयमुद्वेलेन विनङ्क्ष्यति ॥ ३० ॥
[श्लोक ३०]-या उच्छृंखल यदूंचा हा विशाल वंश नष्ट न करताच मी जर निघून गेलो, तर हा मर्यादेचे उल्लंघन करून या जगाचा संहार करील. (३०)

हें यादवकुळ येथ । वीर्यशौर्यश्रियोद्धत ।
धर्म नाशावया उद्यत । अतिदृप्त निजबळें ॥६८॥
हें जें येथे आमचे यादवांचे कुळ आहे, ते वीर्य, शौर्य आणि वैभव ह्यांनी उन्मत्त झालेले आहे. आपल्या बळाच्या गर्वानें ते धर्मनाशाला उद्युक्त आहेत ६८.

हे छेदूं पाहती धर्ममूळें । म्यां आवरिले असती योगबळें ।
जेवीं समुद्रातें मर्यादवेळें । असे राखिलें नेमूनी ॥६९॥
ते धर्माची पाळेमुळें खणून काढावयाला पाहात आहेत. पण समुद्राला जसें मर्यादेनें राखून ठेवलेले आहे, त्याप्रमाणें मी योगबळानें त्यांना आवरून धरले आहे ६९.

सांडोनि ऐशियांसी । मज गेलिया निजधामासी ।
हे प्रवर्ततील अधर्मासी । कोण यांसी वारील ॥२७०॥
अशांना असेच ठेवून मी जर निजधामाला गेलो, तर हे अधर्माला प्रवृत्त होतील. आणि मग ह्यांचे निवारण कोण करणार ? २७०.

जैसा निर्मर्याद सागरू । खवळल्या सर्वसंहारकरू ।
त्यासी कोण शकेल आवरूं । तैसा विचारू होईल ॥७१॥
ज्याप्रमाणें समुद्र आपली मर्यादा सोडून खवळला, तर तो साऱ्यांचा स्वाहा करीत सुटावयाचा, मग त्याला आवरणार कोण ? तशी गत होईल ७१.

हे अधर्मपर होतील गाढे । तुम्हांसी पडेल सांकडें ।
सांगों धांवाल मजपुढें । यांचें रोकडें गार्हा।णें ॥७२॥
हे अत्यंत अधर्मरत होतील आणि तुम्हांला संकट पडेल; आणि मग तुम्हीच त्यांचे गार्‍हाणे सांगावयाला माझ्याकडे धाव घ्याल ७२.

हे नाटोपती देवां । नाकळती दैत्यां दानवां ।
हें अधर्म करिती जेव्हां । तुम्हीच मज तेव्हां सांगों याल ॥७३॥
हे देवांना आटोपावयाचे नाहीत; दैत्यांना किंवा दानवांनाहीं हार जावयाचे नाहीत; आणि ते जेव्हां अधर्माचे बंड उभारतील, तेव्हां तुम्हीच मला सांगावयाला याल ७३.

इदानीं नाश आरब्धः कुलस्य द्विजशापतः ।
यास्यामि भवनं ब्रह्मन् नेतदन्ते तवानघ ॥ ३१ ॥
[श्लोक ३१]-हे पुण्यशील ब्रह्मदेवा ! ब्राह्मणांच्या शापामुळे आता या वंशाचा नाश होण्यास सुरूवात झाली आहे याचा अंत झाला की, मी स्वधामाला परत येईन. (३१)

यालागीं कुळनाशासी त्वरित । आजिपासोनि सुमुहूर्त ।
केला असे गा निश्चित । यथोचित यादवां ॥७४॥
ह्याकरतां ह्या आमच्या यादवांच्या कुलाचा लौकरच नाश करून टाकावयाचा निश्चय करून व त्याची यथोचित योजना करून आजपासूनच सुमुहूर्त केला आहे ७४.

ऐकें सखया प्रजापती । या कुळनाशाचिया अंतीं ।
तुझिया भुवनावरूनि निश्चितीं । निजधामाप्रती येईन ॥७५॥
हे सख्या ब्रह्मदेवा ! ऐक. ह्या कुळाचा एकदा फडशा पडला म्हणजे मी खरोखरच निजधामास येईन आणि तो तुझ्या लोकावरून येईन ७५.

ऐसें बोलिला प्रभू । ऐकोनि शंभु स्वयंभू ।
आनंदला देवकदंबू । समारंभू मांडिला ॥७६॥
असें श्रीकृष्ण बोलले, ते शंकरांनी व ब्रह्मदेवांनी ऐकले. सारा देवसमुदायही आनंदित होऊन त्यांनी एकदम आनंदाचा गजर सुरू केला ७६.

जयजयकारु केला सकळीं । परमानंदें पिटिली टाळी ।
चरण वंदूनि वनमाळी । पुष्पांजळी अर्पिल्या ॥७७॥
सर्वांनी मोठा जयजयकार करून मोठ्या आनंदानें टाळ्या पिटल्या आणि श्रीकृष्णाच्या चरणांना वंदन करून त्यांच्यावर फुलांच्या ओंजळीच्या ओंजळी वाहिल्या ७७.

श्रीशुक उवाच ।
इत्युक्तो लोकनाथेन स्वयम्भूः प्रणिपत्य तम् ।
सह देवगणैर्देवः स्वधाम समपद्यत ॥ ३२ ॥
[श्लोक ३२]-श्रीशुक म्हणतात अखिल लोकाधिपती श्रीकृष्णांनी असे सांगितल्यावर ब्रह्मदेवाने त्यांना नमस्कार केला आणि देवतांसह ते आपल्या धामाकडे निघून गेले. (३२)

शुक म्हणे परीक्षिती । ऐकोनि कृष्णवदंती ।
सुरवर आनंदले चित्तीं । आल्हादें करिती अभिवंदनें ॥७८॥
शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिती राजा ! हे कृष्णाचे भाषण ऐकून सुरवरांच्या मनांत मोठा आनंद उत्पन्न होऊन आल्हादानें त्यांनी नमस्कार केले ७८.

धाता सविता शूळपाणी । मिळोनियां देवगणीं ।
कृष्णासी घातल्या लोटांगणीं । चरण वंदूनी निघाले ॥७९॥
ब्रह्मदेव, सूर्य, शंकर, इत्यादि देवांनी मिळून कृष्णास लोटांगणे घातली. आणि चरणास वंदन करून ते निघून गेले ७९.

एवं वंदूनी श्रीपती । आपुलिया स्थानाप्रती ।
निघाल्या जी देवपंक्ती । पवनगती विमानें ॥२८०॥
अशा प्रकारे श्रीकृष्णाला वंदन करून आपआपली विमानें वायुवेगानें सोडून देवांच्या रांगाच्या रांगा आपआपल्या ठिकाणी निघाल्या २८०.

अथ तस्यां महोत्पातान् द्वारवत्यां समुत्थितान् ।
विलोक्य भगवानाह यदुवृद्धान्समागतान् ॥ ३३ ॥
[श्लोक ३३]-नंतर त्या द्वारकापुरीमध्ये मोठमोठे अपशकून होऊ लागले. ते पाहून यदुवंशातील ज्येष्ठश्रेष्ठ श्रीकृष्णांकडे आले तेव्हा त्यांनी त्यांना असे सांगितले. (३३)

कुळनाशु करणें रोकडें । ऐसें कृष्णें नेमिलें धडफुडें ।
तंव द्वारकेसी येरीकडे । महोत्पात गाढे उठिले ॥८१॥
आतां कुलाचा नाश लवकर करून टाकावयाचा असा श्रीकृष्णांनी निश्चय केला मात्र, तो इकडे द्वारकेमध्यें महाभयंकर उत्पात होऊ लागले ८१.

गगनीं निघाले त्रिकेतु । धूमकेतु दंडकेतु ।
शिखेसहित शिखाकेतु । गगनाआंतु उगवले ॥८२॥
आकाशामध्यें तिधारी केतू, धूमकेतू, दंडकेतू दिसू लागले. शिखा असलेली शेंडेनक्षत्रेही गगनमंडळांत उत्पन्न झाली ८२.

माध्यान्हीं वाजला आघात । दिवसा उल्कापात होत ।
होत भूतें नागवीं नाचत । गगनाआंतु रुदती ॥८३॥
भर दुपारी धरणीकंपाचा धक्का बसला; दिवसाढवळ्या उल्कापात झाले, भूते नग्न होऊन नाचत आकाशामध्यें रडू लागली ८३.

वृक जंबुक नगराआंत । दिवसा चौबारा कुंकात ।
नगरीं भालुवा भुंकत । जन कांपत देखोनी ॥८४॥
लांडगे, कोल्हे नगरांत शिरून दिवसा चव्हाट्यावर केकटू लागले. शहरांत जिकडे तिकडे कोल्हे व कोल्ह्या ओरडू लागल्या. ते पाहून लोकांच्या अंगांत कापरे भरले ८४.

नगरा आंतुबाहेरी । श्वानांची रडणीं भारीं ।
मार्जारकलहो नगरीं । घरोघरीं होतेसे ॥८५॥
गांवाच्या आंत आणि गांवाच्या बाहेर कुत्र्यांनी सारखा रडण्याचा धोशा चालविला. मांजरांच्या कळवंडी तर गांवांतील प्रत्येक घरांत माजून राहिल्या ८५.

गाई आरडती मध्यरात्रीं । लेंकुरें खेळती झुंझारीं ।
माणसांतें झडपिती घारी । घुंघाती घरोघरीं दिवाभीतें ॥८६॥
गाई मध्यरात्री हंबरूं लागल्या. मुले खेळतांना मारामारी करूं लागली, घारी माणसांवर झडपा घालूं लागल्या ! आणि घरोघर घुबडे घू घू करूं लागली ! ८६

वागीश्वरी क्षोभली गाढी । बोलीं म्हणती आली यमधाडी ।
कां रे धांवतां तांतडी । आगीं उडी घालूं पाहतां ॥८७॥
लोकांची वाग्देवी फार क्षोभली. ती बोलू लागली की, अरे, यमाची धाड आली, उगीच लोकर लौकर धावून आगीत उडी कशाला घालतां ? इत्यादि ८७.

भूस्फोट भूमिकंप । अग्निकरणीं तपे आतप ।
वारेनि सोडिला अहा कंप । लागे झडप खरस्पर्शें ॥८८॥
ज्वालामुखीचे स्फोट झाले; भूकंपाचे अचके बसू लागले; ऊन्ह तर अग्नीसारखें तापू लागले. आणि अहाहा ! वार्‍यानें तर कंपच सोडून दिला. त्या अत्यंत उष्ण वाऱ्याच्या स्पर्शानें झडप लागू लागली ! ८८.

धुळोरा उधळत नगरीं । रज भरे डोळ्यांमाझारीं ।
डोळा नुघडवे नरनारीं । दिशा चारी धुमधुमित ॥८९॥
नगरांत सर्वत्र धुरोळा उडूं लागला. डोळे सारे धुळीनें भरून गेले. स्त्रीपुरुषांना डोळे उघडण्याचे सामर्थ्य राहिले नाही. चारही दिशा धुंद होऊन गेल्या ८९.

ऐसे नाना परींचे उत्पात । नगरीं रुधिरवृष्टि होत ।
देखोनि यादव समस्त । भयचकित पैं जाहले ॥२९०॥
असे नाना तर्‍हेचे उत्पात उठले. शहरांत रक्ताचा पाऊस पडूं लागला ! हे सर्व पाहून सगळे यादव भयानें अगदी गर्भगळित झाले २९०.

यादव मिळोनि थोर थोर । वृद्ध वृद्ध करिती विचार ।
ये चिन्हें अरिष्टकर । विघ्न थोर दिसतसे ॥९१॥
सर्व यादव एकत्र होऊन त्यांत जे थोर थोर व वृद्ध वृद्ध होते, त्यांनी विचार केला की, ही चिन्हें अनिष्टसूचक आहेत. काही तरी मोठे विघ्न येणार असे दिसते ९१.

अवघे आले कृष्णापाशीं । वृत्तांत सांगती तयासी ।
उव्दिग्न देखोनि यादवांसी । हृषीकेशी बोलिला ॥९२॥
असे म्हणून ते सर्व कृष्णापाशी आले, आणि त्यांनी सर्व वृत्तांत त्याला निवेदन केला. सारे यादव उद्विन झालेले पाहून श्रीकृष्णांनी बोलण्यास प्रारंभ केला. ९२.

श्रीभगवानुवाच ।
एते वै सुमहोत्पाता व्युत्तिष्ठन्तीह सर्वतः ।
शापश्च नः कुलस्यासीद्ब्राह्मणेभ्यो दुरत्ययः ॥ ३४ ॥
न वस्तव्यमिहास्माभिः जिजीविषुभिरार्यकाः ।
प्रभासं सुमहत्पुण्यं यास्यामोऽद्यैव मा चिरम् ॥ ३५ ॥
[श्लोक ३४-३५]-श्रीकृष्ण म्हणाले जेथे जिकडेतिकडे आजकाळ मोठमोठे अपशकुन होत आहेत शिवाय ब्राह्मणांनी आपल्या वंशाला दिलेला शाप टाळणे कठीण आहे म्हणून सज्जन हो ! आपल्याला जर जगायचे असेल तर आपण येथे राहू नये. म्हणून आता उशीर करून नका आपण आजच परम पवित्र अशा प्रभासक्षेत्री जाऊ. (३४-३५)

कृष्ण यादवांसी सांगत । दिवि-भू-अंतरिक्षगत ।
उठिले जे महोत्पात । सर्वगत सर्वदा ॥९३॥
श्रीकृष्ण यादवांना सांगू लागले की, हे दिवसाढवळ्या पृथ्वीवर आणि आकाशांत मोठमोठाले उत्पात उठले आहेत, ते सर्व ठिकाणी सारखे आहेत ९३.

देखोनियां चिन्हांसी । मजही आठवलें मानसीं ।
ब्राह्मणशाप यदुकुळासी । चिन्हें त्यासी सूचकें ॥९४॥
ही अशुभ चिन्हें पाहून माझ्याही मनाला एक आठवण झाली, की ह्या आमच्या यादवकुलाला ब्राह्मणाचा शाप झालेला आहे, त्याची ही सूचक चिन्हें आहेत ९४.

ब्राह्मणांचा शापु खरा । नुल्लंघवे हरिहरां ।
तुम्ही आतांचि विचार करा । नगराबाहिरा जनु काढा ॥९५॥
ब्राह्मणांचा शाप खराच व्हावयाचा. तो हरिहरांनासुद्धा चुकावयाचा नाही. ह्याकरतां ह्याचा तुम्ही आतांच्या आतां विचार करा. सारे लोक आधीं गांवाबाहेर काढा ९५.

येथोनि द्वारकेची वस्ती । आम्हीं सांडावी समस्तीं ।
जीवें जियावयाची चाड चित्तीं । तरी प्रभासाप्रती निघावें ॥९६॥
जिवाची आशा असेल तर आम्ही सर्वांनी द्वारकेंतील वस्ती आजच्या आज सोडून प्रभासाला निघालें पाहिजे ९६.

वेगीं करा रे तांतडी । आजचि निघा लवडसवडी ।
सांडा घरदारांची गोडी । येथ अर्धघडी न रहावें ॥९७॥
पाहातां काय ? त्वरा करा. कसेंही करून आजच्या आज निघा. घरादारांची आशा सोडून द्या. येथे एक अर्धघटकासुद्धा राहूं नका ९७.

यत्र स्नात्वा दक्षशापाद् गृहीतो यक्ष्मणोदुराट् ।
विमुक्तः किल्बिषात्सद्यो भेजे भूयः कलोदयम् ॥ ३६ ॥
[श्लोक ३६]-दक्ष प्रजापतीच्या शापाने जेव्हा चंद्राला क्षयरोगाने ग्रासले, त्यावेळी त्याने तेथे जाऊन स्नान केले आणि त्याच क्षणी त्या पापजन्य रोगातून त्याची सुटका झाली आणि पुन्हा त्याच्या कला वाढू लागल्या. (३६)

ऐका समस्त यादवश्रेष्ठ । प्रभासतीर्थ महावरिष्ठ ।
जेथिंचेनि स्नानें उडुराट । निस्तरला कष्ट क्षयाचे ॥९८॥
सर्व यादवश्रेष्ठ हो ! ऐका. प्रभासतीर्थ हे अत्यंत पवित्र स्थान आहे. येथेच स्नान करून नक्षत्राधिपति चंद्र क्षयाच्या कष्टांतून सुटला ९८.

दक्षें निजकन्या चंद्रासी । सत्तावीस दिधल्या त्यासी ।
तो रतला रोहिणीसीं । येरां सर्वांसी उपेक्षुनी ॥९९॥
दक्षानें आपल्या सत्तावीस कन्या चंद्राला दिल्या होत्या. बाकीच्यांचा अव्हेर करून एका रोहिणीशी मात्र तो रममाण झाला ९९.

दक्षें शापिलें चंद्रासी । क्षयरोग लागला त्यासी ।
तेणें येऊनि प्रभासासी । स्नानदानासी पैं केलें ॥३००॥
त्यामुळें दक्षानें चंद्राला शाप दिला, म्हणून त्याला क्षयरोग जडला. तेव्हां तो ह्या प्रभासतीर्याला येऊन तेथे त्यानें स्नानदानादिक कर्म केलें ३००.

स्नानमात्रें केवळ । क्षयरोग गेला तत्काळ ।
कळा पावला सकळ । शोभे निर्मळ निजतेजें ॥१॥
स्नान करतांच तत्काल त्याचा क्षयरोग नाहीसा झाला; आणि त्याच्या सर्व कला त्याला प्राप्त होऊन मूळच्या निर्मळ तेजानें तो झळकू लागला ३०१

वयं च तस्मिन्नाप्लुत्य तर्पयित्वा पितॄन् सुरान् ।
भोजयित्वोशिजो विप्रान् नानागुणवतान्धसा ॥ ३७ ॥
तेषु दानानि पात्रेषु श्रद्धयोप्त्वा महान्ति वै ।
वृजिनानि तरिष्यामो दानैर्नौभिरिवार्णवम् ॥ ३८ ॥
[श्लोक ३७-३८]-आपणसुद्धा तेथे जाऊन स्नान करू देवता आणि पितरांचे तर्पण करू. त्याचबरोबर अनेक उत्तमोत्तम पक्वान्ने तयार करून श्रेष्ठ ब्राह्मणांना भोजन घालू. तेथे आपण सत्पात्र ब्राह्मणांना पूर्ण श्रद्धेने मोठी दानदक्षिणा देऊ आणि अशा प्रकारे नौकेने समुद्र पार करावा, त्याप्रमाणे दानांनी आपण संकटे पार करून जाऊ. (३७-३८)

आम्हीही तेथ स्नान दान । पितृतर्पण देवतार्चन ।
करूं ब्राह्मणपूजन । जे संपन्न श्रुति शास्त्रीं ॥२॥
आपणही तेथेच स्नान, दान, पितृतर्पण करूं व वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मण असतील त्यांचे पूजन करूं २.

नाना परींचीं पक्वान्ने । गुणाधिक्यें मिष्टान्ने ।
देवां ब्राह्मणांसी भोजनें । नाना दानें विधानोक्त ॥३॥
नाना प्रकारची पक्वान्नें तयार करून आणि गुणानें अधिक अशी रुचकर मिष्टान्नें तयार करून देवब्राह्मगांना समर्पण करूं व अनेक प्रकारची दानें यथाविधि देऊ ३.

श्रद्धेचेनि नेटेंपाटें । पाहूनि दानपात्रें चोखटें ।
दान द्यावें गोमटें । भूमी वोलटे जेवीं बीज ॥४॥
ओल्या भूमीत ज्याप्रमाणें बी रुजत घालतात, त्याप्रमाणें उत्तम दानपात्र ब्राह्मण पाहून श्रद्धापूर्वक उत्तमोत्तम दान देत असावें ४.

ब्राह्मणाचें मुख तें क्षेत्र । पालवियेपेढीवीण पवित्र ।
ऐसें पाहूनि सुक्षेत्र । दानें विचित्र पेरावीं ॥५॥
ब्राह्मणाचे मुख हेंच शेत आहे. ते बुंध्यावांचून आणि पाल्यावांचून पवित्र आहे. असे उत्तम शेत पाहून त्यांतच परोपरीची चित्रविचित्र दानें पेरून सोडावीत ५.

विनीततेची सेल वोल । श्रद्धेचें चाडें निर्मळ ।
शमदमादि बैल सबळ । ते तात्काळ जुंपोनी ॥६॥
विनयाची उत्तम ओल; श्रद्धेचे निर्मळ चाडें; त्याला शमदमादि मजबूत बैल लागलेच जुंपावेत ६.

ऐशिया वोजा परी । बीज पेरिलिया क्षेत्रीं ।
पीक पिकेल घुमरीं । पुरुषार्थ चारी लगटोनी ॥७॥
अशा साक्षेपानें शेतांत बी पेरलें म्हणजे पीक अगदीं गजबजून जाऊन चारही पुरुषार्थ त्याला लटकतील ७.

त्या पिकाचेनि सबळें । पापें तरोनि पैं सकळें ।
जेवीं नावेचेनि बळें । समुद्रजळें तरिजेती ॥८॥
ज्याप्रमाणें नौकेच्या बळानें समुद्रजलांतून तरून जाता येते, त्याप्रमाणें त्या पिकाच्या बळानें आपण सर्वजण पातकांतून तरून जाऊं. ८

श्रीशुक उवाच ।
एवं भगवतादिष्टा यादवाः कुरुनन्दन ।
गन्तुं कृतधियस्तीर्थं स्यन्दनान् समयूयुजन् ॥ ३९ ॥
[श्लोक ३९]-श्रीशुक म्हणतात – हे कुलनंदना ! भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा अशी आज्ञा केली, तेव्हा यादवांनी प्रभासक्षेत्री जाण्याचे ठरवून रथ सज्ज केले. (३९)

शुक म्हणे कौरवनंदना । ऐकें परिक्षिति सज्ञाना ।
कृष्णें दिधली अनुज्ञा । तीर्थविधाना प्रभासा ॥९॥
शुक म्हणतात, हे सुजाण परीक्षिती राजा ! ऐक. ह्याप्रमाणें प्रभासास जाऊन तीर्थविधि करण्याला श्रीकृष्णांनी अनुज्ञा दिली ९,

यादव उठिले गाढे । रथीं जुंपिले जी घोडे ।
येर धांवती येरांपुढें । चहूंकडे लगबग ॥३१०॥
तेव्हां त्या यादवांचा घोळक्याचा घोळका एकदम निघाला. त्यांनी रथाला घोडे जुंपले, आणि एकापुढे एक धावावयाला लागले. त्यामुळें चहूंकडे सारी गडबडच गडबड उडून राहिली ३१०.

तन्निरीक्ष्योद्धवो राजन् श्रुत्वा भगवतोदितम् ।
दृष्ट्वारिष्टानि घोराणि नित्यं कृष्णमनुव्रतः ॥ ४० ॥
विविक्त उपसङ्गम्य जगतामीश्वरेश्वरम् ।
प्रणम्य शिरसा पादौ प्राञ्जलिस्तमभाषत ॥ ४१ ॥
[श्लोक ४०-४१]-परीक्षिता ! उद्धव श्रीकृष्णांचा एकान्त भक्त होता जेव्हा त्याने ती तयारी पाहिली भगवंतांची आज्ञा ऐकली आणि अतिशय घोर अपशकुन झाल्याचेही पाहिले, तेव्हा तो जगाच्या अधिपतींचे ईश्वर असणार्‍या श्रीकृष्णांकडे एकांतात गेला, त्यांच्या चरणावर डोके टेकवून त्यांना त्याने नमस्कार केला आणि हात जोडून त्यांना प्रार्थना करू लागला. (४०-४१)

थोर वीरांचे बोभाट । गजरथांचे घडघडाट ।
द्वारकेमाजीं न फुटे वाट । प्रयाण उभ्दट प्रभासासी ॥११॥
वीरांच्या मोठमोठ्या हांकाट्या, हत्तींचे आणि घोड्यांचे घडघडाट, द्वारकेमध्यें कोणाला वाटही मिळेनाशी झाली. इतकी प्रभासाला जाण्याची गडबड उडाली ११.

हडबडली देखोनि द्वारावती । ऐक राया परीक्षिती ।
उद्धवास आठवलें चित्तीं । कृष्णवदंती देवांसी ॥१२॥
हे परीक्षिती राजा ! सारी द्वारकाच खडबडून निघालेली पाहून उद्धवाच्या मनाला श्रीकृष्णांनी देवांस जे सांगितले होते त्याची आठवण झाली १२.

कुळनाशासी त्वरित । आजीपासूनि सुमुहूर्त ।
तोचि देवें प्रस्तुत । कार्यार्थ निश्चित मांडिला ॥१३॥
लौकरच कुळाचा नाश करावयाचा, आणि आजपासूनच त्याला मुहूर्त, असे म्हटले होते; त्याच कार्याला देवानें आज खरोखर सुरवात केली असें त्याला दिसले १३.

उद्धव कृष्णासवें संतत । कृष्णानुमतें तो वर्तत ।
सुरसंवाद निश्चित । होता श्रुत तयासी ॥१४॥
उद्धव हा नेहमी कृष्णाबरोबरच असे आणि कृष्णाच्या अनुमतानेंच तो नेहमी वागे. म्हणून स्वर्गस्थ देवांचे आणि कृष्णाचे झालेले भाषण त्यानें ऐकलेले होते १४.

असतां येथ कृष्णनाथ । द्वारकेमाजीं अतिउत्पात ।
उठिले तें मनोगत । जाण निश्चित कृष्णाचें ॥१५॥
येथे श्रीकृष्ण असतांना ह्या द्वारकेमध्यें ज्याअर्थी एवढे मोठमोठे उत्पात उद्‌भवले, त्याअर्थी हा हेतु खरोखर कृष्णाचाच असला पाहिजे ह्यांत संशय नाहीं १५;

यादव नेऊनि प्रभासासी । अर्धक्षणें नाशील यांसी ।
जावया निजधामासी । हृषीकेशी उद्यत ॥१६॥
यादवांना प्रभासाला नेऊन अर्ध्या क्षणांत हा त्यांचा नाश करून टाकील, कारण श्रीकृष्ण हा आतां निजधामाला जाण्यासाठी उतावळा झालेला आहे १६.

म्हणाल ‘कां नेले इतुके दुरी । नाशु न करीच द्वारकापुरी ‘ ।
तरी तो सर्वज्ञ श्रीहरी । सूत्रधारी जाणता ॥१७॥
पण त्यांचा नाश करावयाचा होता तर तो द्वारकेंतच का केला नाहीं ? त्यांना इतके लांब कशाकरतां नेले ? असे म्हणाल तर श्रीहरि हा सर्वज्ञ होता; त्याला सर्व काही कळत होते; आणि तो सर्वांचा सूत्रधार होता १७.

यादव देवांश निश्चितीं । सातवी पुरी द्वारावती ।
येथ निमाल्या सायुज्यमुक्ती । हें जाणोनि श्रीपति न नाशी ॥१८॥
यादव हे खरोखर देवांश; आणि द्वारका ही सातवी मोक्षपुरी; त्यामुळें येथे त्यांचा नाश झाला, तर त्यांना सायुज्यमुक्ति प्राप्त होईल. हे लक्षात आणून श्रीकृष्णानें त्यांचा नाश येथे केला नाहीं १८.

यांसी आहे पदाभिमान । द्वारकेमाजीं न घडे निधन ।
हें जाणोनि जगज्जीवन । करवी प्रयाण प्रभासासी ॥१९॥
कारण ह्यांना पदाभिमान आहे, ह्यास्तव ह्यांना द्वारकेंत मृत्यु यावयाचा नाही; हे श्रीकृष्णानें मनांत आणूनच त्यांना प्रभासास पाठविले १९.

ब्रह्मशापाचें मूळ देखा । प्रभासासी निघाली ते येरिका ।
हें कळलेंसे यदुनायका । तेथ सकळिकां धाडिलें ॥३२०॥
ब्रह्मशापाचे मूळ म्हणजे त्या मुसळाचा झालेला लव्हाळा प्रभासामध्यें उत्पन्न झालेला होता, हे श्रीकृष्णाला माहीत होते. म्हणूनच सर्वांना तेथे पाठवून दिले ३२०.

स्वकुळ ग्रासोनि श्रीपती । निघेल निजधामाप्रती ।
हें जाणोनि उद्धव चित्तीं । बहुतां रीतीं कळवळला ॥२१॥
अशा प्रकारे आपल्या कुळाचा संहार करून श्रीकृष्ण निजधामास जाण्याकरतां निघेल, हे लक्षात आल्यामुळें उद्धवाच्या मनाला अनेक रीतींनी वाईट वाटले २१.

बाष्पें कंठ निरोधला । नेत्रीं अश्रूंचा पूर लोटला ।
स्वेदु सर्वांगीं चालिला । हृदयीं दाटला हुंदका ॥२२॥
गहिवरानें गळा दाटून आला. डोळ्यांतून अश्रुधारा वाहूं लागल्या. सर्वांगांतून घाम फुटला व हृदयांतून हुंदक्यावर हुंदके येऊ लागले २२.

कृष्णवियोग अर्ध क्षण । तेणें निघों पाहे प्राण ।
विसरला कार्य आठवण । कृष्णवदन निरीक्षी ॥२३॥
कृष्णवियोगांत जर अर्धक्षण गेला, तर त्याचा प्राण जातो की राहतो असें होत असे. त्यामुळें आपण आता काय करावे हे त्याला सुचेनासे झाले. तो कृष्णाच्या तोंडाकडेच टक लावून बसला २३.

वियोगप्राप्तीचे बाण प्रबळ । हृदयीं रुतले अतिसबळ ।
बुद्धि धैर्येंसीं होती विकळ । जीवीं तळमळ लागली ॥२४॥
प्राप्त होणाऱ्या वियोगाचे तीव्र बाण त्याच्या हृदयांत अतिशय जोरानें घुसून बसले. धैर्यासहवर्तमान बुद्धि गुंग होऊन गेली. आणि जिवाला सारखी तळमळ लागून राहिली २४.

एकांत देखोनि श्रीकृष्णासी । धांवोनि लागला पायांसी ।
मिठी घालोनि चरणेंसीं । उकसाबुकसीं स्फुंदत ॥२५॥
तेव्हां एकांत आहे असे पाहून धावत जाऊन त्यानें श्रीकृष्णाचे पाय धरले, आणि पायांना मिठी घालून ओक्साबोक्सी स्फुदूं लागला २५.

जो जगाचा नियंता । त्या काळाचा कृष्ण कळिता ।
त्याचे चरणीं ठेवूनि माथा । विनीतता बोलतु ॥२६॥
जगाचा नियंता काळ, त्याचा नियमनकर्ता जो श्रीकृष्ण, त्याच्या चरणावर मस्तक ठेवून तो विनयानें बोलू लागला २६.

श्रीउद्धव उवाच ।
देवदेवेश योगेश पुण्यश्रवणकीर्तन ।
संहृत्यैतत्कुलं नूनं लोकं सन्त्यक्ष्यते ।
भवान् विप्रशापं समर्थोऽपि प्रत्यहन्न यदीश्वरः ॥ ४२ ॥
[श्लोक ४२]-उद्धव म्हणाला हे योगेश्वर देवाधिदेव ! आपल्या लीलांचे श्रवणकीर्तन पुण्यकारक आहे आपण परमेश्वर असल्यामुळे शक्य असूनही आपण ब्राह्मणांचा शाप निष्प्रभ केला नाही यावरून मला वाटते की, आता आपण यदुवंशाचा संहार करून या लोकाचा त्याग करणार, हे निश्चित ! (४२)

उद्धव म्हणे यादवेंद्रा । देवेंद्राच्या आदि‍इंद्रा ।
योगियांच्या प्रबोधचंद्रा । अकळ मुद्रा पैं तुझी ॥२७॥
उद्धव म्हणाला, “हे यादवेंद्रा ! हे देवेंद्राच्याही आदिइंद्रा ! हे योग्यांच्या ज्ञानचंद्रा ! तुझें स्वरूप अलक्ष्य आहे २७.

देवांमाजीं इंद्र ईशु । त्या इंद्राचा तूं जगदीशु ।
योगियांमाजीं श्रेष्ठ महेशु । त्याचाही ईशु तूं श्रीकृष्णा ॥२८॥
देवांमध्यें इंद्र हा श्रेष्ठ आहे; पण तूं त्या इंद्राचाही इंद्र आहेस. योग्यांमध्यें शंकर हे श्रेष्ठ होत ! पण हे श्रीकृष्णा ! तूं त्यांचाही ईश आहेस २८.

तुझें जें श्रवणकीर्तन । तें पुण्यासी करी पावन ।
छेदी संसारबंधन । समाधान कीर्तनें ॥२९॥
तुझें हें श्रवण आणि कीर्तन, ते पुण्यालाही पावन करतें. कीर्तनानें संसारभवबंधन तुटून जाऊन समाधान प्राप्त होते २९.

संहारूनि निजकुळासी । सांडोनियां या लोकासी ।
निजधामा जावों पाहसी । हृषीकेशी निश्चित ॥३३०॥
आपल्या कुळाचा संहार करून हा लोक सोडून देऊन, हे श्रीकृष्णा ! तूं खचित निजधामाला जाण्याचा बेत केलेला दिसतो” ३३०.

नाहं तवाङ्‌घ्रिकमलं क्षणार्धमपि केशव ।
त्यक्तुं समुत्सहे नाथ स्वधाम नय मामपि ॥ ४३ ॥
[ श्लोक ४३]-परंतु हे केशवा ! आपल्या चरणकमलांना मी अर्ध्या क्षणासाठीसुद्धा सोडू शकत नाही. हे स्वामी ! आपण मलाही आपल्या धामाला घेऊन चला. (४३)

अन्यथा विप्रशापासी । करावया समर्थ होसी ।
तें न करूनि कुळ संहारिसी । निजधामासी जावया ॥३१॥
“ब्राह्मणाचा शाप खोटा करण्याचे सामर्थ्य तुझ्या आंगांत असून केवळ निजधामास जाण्याकरता तूं आपल्या कुळाचाच संहार करतोस ना ?” ३१.

ऐसें बोलतां आलें रुदन । न धरत चालिलें स्फुंदन ।
आसुवीं पूर्ण झाले नयन । धांवोनि चरण धरियेले ॥३२॥
असे बोलतांना त्याला रडें कोसळले. तें न आवरल्यामुळें हुंदक्यावर हुंदके येऊ लागले. अश्रूंनी डोळे अगदी भरून आले. अशा स्थितीतच त्यानें धावत जाऊन श्रीकृष्णाचे पाय धरले ३२.

माथा ठेविला चरणांवरी । सखा स्वामी तूं श्रीहरी ।
आम्हांसी सांडूनियां दुरी । कैशापरी जासील ॥३३॥
चरणांवर मस्तक ठेवून तो म्हणाला, हे श्रीहरी ! तूं माझा सखा आहेस; तूं माझा धनी आहेस; असे असतां आम्हांस सोडून तूं दूर कसा बरे जातोस ? ३३.

तुझिया प्रयाणाची वार्ता । ऐकतांचि गा अच्युता ।
उभड सांठवेना चित्ता । वियोग सर्वथा न व्हावा ॥३४॥
हे अच्युता ! तूं जाणार ही गोष्ट कानावर पडतांच मनामध्यें जो दुःखाचा उमाळा उठला, तो काही आवरत नाही. ह्याकरतां असा वियोग होऊ नये असें मी म्हणतो ३४.

जळावेगळी मासोळी । तैसा जीवु तळमळी ।
निष्ठुर जाहलासी अंतकाळीं । वनमाळी मजलागीं ॥३५॥
पाण्याशिवाय मासा जसा तळमळावा, त्याप्रमाणें माझा जीव तळमळतो आहे. एकूण हे श्रीकृष्णा ! अखेर अंतकालाच्या वेळी माझ्यावर तूं इतका निष्ठुर झालास ना ? ३५.

तुज गेलियापाठीं । मी दीनवदन ये सृष्टीं ।
कोणासी सांगों गोड गोष्टी । श्वासु पोटीं न समाये ॥३६॥
तूं गेल्यावर पाठीमागे ह्या जगांत मी दीनवदन होऊन जाईन. मग गोड गोड गोष्टी कोणाशी सांगाव्यात ? आतां देहांत प्राणसुद्धा राहात नाहीं रे ! ३६.

निघोनि गोलिया आत्मा । प्रेतरूप उरे प्रतिमा ।
तुवां गेलियां निजधामा । तैसें आम्हां होईल ॥३७॥
आत्मा निघून गेला म्हणजे देह केवळ प्रेतरूप होऊन राहतो; तद्वत् तूं निजधामाला गेलास तर आमची गत होईल ३७.

तूंचि आम्हां जनक जननी । हा दृढ विश्वास आमुचे मनीं ।
केवीं जातोसी सांडोनि । म्हणोनि लोळणी घातली ॥३८॥
आमचा मायबाप तूंच; असाच आमच्या मनाचा दृढतर विश्वास आहे. असे असतां तूं आम्हांला सोडून कसा वर जाऊं पहातोस ? असे म्हणून त्यानें पायांवर लोळण घेतली ३८.

तूं निघालासी निजधामा । कोणासी निरविलें जी आम्हां ।
कां रुसलासी पुरुषोत्तमा । बोलु निजकर्मा आमुच्या ॥३९॥
तूं निजधामाला निघालास, आणि आम्हांला कोणाच्या हातांत दिलेंस ? हे पुरुषोत्तमा ! तूं आम्हांवर इतका कां बरें रुसलास ? हा आमच्याच कर्माकडे बोल ! तुझ्याकडे काय आहे ? ३९.

मुकें बाळ सांडोनि क्षितीं । माता रिघों पाहे सती ।
तें जेवीं ये काकुळती । तैसी गती उद्धवा ॥३४०॥
मुकें बालक जमिनीवर टाकून आई सती जावयास निघाली, म्हणजे ते जसें काकुळतीला येते, तशी उद्धवाची दशा झाली ३४०.

गोडु गिळी आमिषकवळु । सवेंचि पारधी आंसुडी गळु ।
त्या मीनाऐसा विकळु । होय प्रेमळु उद्धव ॥४१॥
गळाला लावलेला गोड मांसाचा तुकडा माशानें गिळला न गिळला, तोंच मच्छिमार त्या गळाला हिसका मारून त्याला वर ओढतो, त्या माशाप्रमाणेच प्रेमळ अंतःकरणाचा उद्धव विकल होऊन गेला ४१.

तुजगेलियावरी देवा । म्यां कोणाची करावी सेवा ।
कां रुसलासी गा यादवा । आमच्या दैवा निश्चित ॥४२॥
देवा ! तूं गेल्यावर मी सेवा तरी कोणाची करावी ? हे श्रीकृष्णा ! तूं खरोखर आमचे भाग्य आहेस. असे असतां तूं आम्हांवर कां बरें रुसलास ? ४२.

कांटवणे आड क्षितीं । आंधळें सांडूनि जाये सांगाती ।
तें ग्लानी करी वनांतीं । तैसी गती उद्धवा ॥४३॥
एकादें आंधळे माणूस आपल्या बरोबरची सोबत सोडून देऊन आडवाटेनें कांटेरी रानांत शिरले म्हणजे ते त्या अरण्यांत जसें गयावया करीत बसते, तशीच उद्धवाची अवस्था झाली ४३.

धांवधावों पायां पडे । धाय मोकलोनि रडे ।
मज सांडोनि तूंचि पुढें । कोणीकडे जातोसी ॥४४॥
धावून धावून पायांवर पडू लागला. धाय धाय मोकलून रडूं लागला. आणि म्हणाला, मला सोडून तूंच पुढे कोठे जातोस ? ४४.

मी नव्हें पायांवेगळा । क्षण नोसंडीं चरणकमळा ।
तुझें प्रयाण जी गोपाळा । अंतकाळा मज काळु ॥४५॥
मी ह्या पायांपासून दूर होणार नाही. हे चरणकमल एक क्षणभरही मी सोडणार नाही. हे गोपाळा ! तुझें प्रयाण म्हणजे माझा अंतकाळचा काळच आहे ४५.

तुझी थोर लागली सवे । मज न्यावें आपणासवें ।
हेंचि प्रार्थीतसे जीवेंभावें । कृपा यादवें मज कीजे ॥४६॥
तुझा मला अतिशय लळा लागला आहे. ह्याकरता मलाही आपल्याबरोबर ने. एवढीच मनापासून आपल्याला प्रार्थना आहे. याकरतां श्रीकृष्णांनी एवढी कृपा करावीच ४६.

तूं गरुडारूढ होसी । तेव्हां कृपेनें बैसवीं पाठीसीं ।
सांडों नको हृषीकेशी । निजधामासी मज नेईं ॥४७॥
तूं गरुडावर बसशील, तेव्हां कृपा करून मला पाठीमागे बशीव. पण श्रीकृष्णा ! मला टाकून जाऊं नकोस. मला निजधामाला घेऊन जा ४७.

सलगी दिधली जन्मवरी । अंतीं का त्यागिसी दुरी ।
कृपाळुवा श्रीहरी । कृपा करीं सर्वथा ॥४८॥
जन्मभर मला सलगी दिलीस आणि आतां अंतकाळीच कां दूर टाकतोस ? हे कृपासागरा श्रीकृष्णा ! एवढी कृपा कर ४८.

म्हणसी मी निजकुळासी काळु । तो तुज केवीं होईन कृपाळु ।
हें न म्हणें तूं दीनदयाळु । अतिस्नेहाळु भक्तासी ॥४९॥
आतां तूं म्हणशील की, आपल्या कुलालाच मी काळ झालेलों आहे, तुलाच कृपाळू कसा होईन ! तर असें तूं म्हणू नकोस. कारण तूं दीनांचा दयाळू असून भक्तांविषयीं अत्यंत स्नेहाळू आहेस ४९.

तुझी कृपा भक्तांवरी । यालागीं मी सलगी करीं ।
मातें उद्धरीं श्रीहरी । झणें संसारीं सांडिसी ॥३५०॥
भक्तावर तुझी कृपा आहे, म्हणूनच मी इतकी सलगी करीत आहे. तर हे श्रीहरि ! माझा उद्धार कर. नाहीं तर संसारांतच पुन्हा टाकशील हो ! ३५०.

तव विक्रीडितं कृष्ण नृणां परममङ्गलम् ।
कर्णपीयूषमासाद्य त्यजन्त्यन्यस्पृहां जनः ॥ ४४ ॥
शय्यासनाटनस्थान स्नानक्रीडाशनादिषु ।
कथं त्वां प्रियमात्मानं वयं भक्तास्त्यजेम हि ॥ ४५ ॥
[श्लोक ४४-४५]- हे कृष्णा ! आपली लीला माणसांसाठी परम मंगल आणि कानांना अमृतस्वरूप आहे ज्याला एक वेळ तिची गोडी लागली, त्याच्या मनात नंतर दुसर्‍या कोणत्याही वस्तूची इच्छाच शिल्लक राहात नाही प्रभो ! आम्ही तर झोपणे बसणे, हिंडणे, फिरणे, स्नान, खेळ, भोजन इत्यादी सर्व प्रसंगांत आपल्याबरोबरच असतो आपण आमचे प्रियतम आत्मा आहात आम्ही आपल्याला कसे सोडू ? (४४-४५)

तुझी क्रीडा नाना खेळ । प्राणियांसी परम मंगळ ।
कर्णद्वारें वेल्हाळ । निजनिर्मळ सेविती ॥५१॥
तुझ्या नाना प्रकारच्या क्रीडा व खेळ जीवांना परम मंगलदायक असल्यामुळें ती तुझी प्रिय व निर्मल लीला ते कर्णद्वारानें सेवन करतात ५१.

तुझे कीर्तिश्रवणाचे आवडीं । लागली कर्णपीयूषीं गोडी ।
तेथ अमृताची चवी थोडी । होय अर्ध घडी न लागतां ॥५२॥
तुझ्या कीर्तिश्रवणामृताची गोडी कर्णांनी एक अर्धघटका घेतली न घेतली, तोच त्यांना इतकी आवड उत्पन्न होते की, त्याच्यापुढे खरें अमृतही फिकें वाटूं लागते ५२.

ऐशी ऐकतां तुझी कीर्ती । सवासना स्पृहा नासती ।
ते भक्तु तुज न विसंबती । हृदयीं वाहती सर्वदा ॥५३॥
अशी तुझी कीर्ति ऐकली की, वासनेसहवर्तमान इच्छा नाहींशीच होऊन जाते. म्हणून तुझे भक्त असतात ते तुझ्या कीर्तीला नेहमी हृदयांत धरून ठेवतात, तुला विसंबत नाहींत ५३.

त्या तुज प्रत्यक्ष श्रीकृष्णासीं । मज न साहवे वियोगासी ।
सवे लाविली आम्हांसी । सौजन्येंसीं स्वामित्वें ॥५४॥
त्या तुझा प्रत्यक्ष श्रीकृष्णाचा वियोग मला सहन होणार नाही. तुझ्या धनीपणाचें आणि चांगुलपणाचे आम्हांला व्यसनच लागून गेलेले आहे ५४.

तूं तंव आमुचा स्वामी होसी । मज अर्धांसनीं बैसविसी ।
मजवेगळें हृषीकेशी । निजगुजासी तुज नाहीं ॥५५॥
खरे म्हटले तर तूं आमचा धनी; असे असतां तूं मला आपल्या अर्ध्या आसनावर बसवीत होतास. हे श्रीकृष्णा ! एकादी जिवाची गोष्ट सांगावयाची असली तर माझ्याशिवाय तुला दुसरे कोणी नव्हतें ५५.

अचाट कार्य पडे थोर । तेव्हां मज पुससी विचार ।
मी सांगें जो जो मंत्र । तो साचार मानिसी ॥५६॥
एकादें अचाट कार्य करण्याचा प्रसंग आला, तर त्या वेळी तूं माझाच विचार घेत होतास, आणि मी जी जी काही मसलत सांगे, ती ती तुला खरी वाटत असे ५६.

जेव्हां भोजन करूं रिघसी । माझें ताट ताटेंसीं मांडिसी ।
जेवितां नाना विनोद करिसी । निजशेष देसी मजलागीं ॥५७॥
तूं भोजन करावयाला निघालास की, माझे ताट अगदी आपल्या ताटाला लावून मांडवीत होतास. आणखी जेवतांना नाना प्रकारचा विनोद करून आपल्या ताटांतील शेष मला देत होतास ५७.

ब्रह्मादिकां न लभे पंक्ती । तो मी जेवीं तुझिया पांतीं ।
शेषविभागी जी श्रीपती । केलें निश्चितीं त्वां मज ॥५८॥
ब्रह्मदेवादिक देवांनाहीं तुझा पंक्तिलाभ दुर्लभ; पण मी तुझ्या पंक्तीला जेवावयाला बसे आणि तुझा राहिलेला प्रसाद भक्षण करण्याला तर हे कृष्णा ! तूं मला भागीदारच करून ठेवले होतेस ५८.

मातें धरोनियां हातीं । एकला बैससी एकांतीं ।
ब्रह्मादिकांची विनंती । तुजप्रती मी सांगें ॥५९॥
मला हाताला धरून तूं एकटाच एकांतात बसत होतास. ब्रह्मदेवादिकांची काही विनंति तुला सांगावयाची झाली, तर ती तुला मी सांगावयाची ! ५९.

कळों नेदितां कोणासी । तुवां केलें रासक्रीडेसी ।
तें गुह्य सांगोनि मजपाशी । गोकुळासी धाडिलें ॥३६०॥
कोणाला न कळतां तूं रासक्रीडा केलीस; पण ती गुप्त गोष्ट माझ्यापाशीं सांगून तूं मला गोकुळाला धाडून दिले होतेस ३६०.

सेजेचे उठवूनि भीमकीसी । मज आपणाजवळ निजविशी ।
ते निद्रेचिया सुखासी । समाधि कायसी बापुडी ॥६१॥
पलंगावर निजलेल्या रुक्मिणीला उठवून तूं आपल्याजवळ मला निजवीत होतास. त्या निद्रेच्या सुखापुढे बिचारी समाधि ती काय ? ६१.

ऐशिया तुझे संगतीं । रात्री भोगिल्या नेणों कितीं ।
त्या मज सांडोनि श्रीपती । जाणें निश्चितीं करितोसी ॥६२॥
अशा तुझ्या संगतीनें किती रात्री काढल्या त्याची गणती नाही. हे श्रीकृष्णा ! त्या मला सोडून खरोखर जाण्याचे करतोस ना ? ६२

वेळु न गमे चक्रपाणी । मज बोलवूं धाडिसी रुक्मिणी ।
सारीपाटु आम्हीं दोघीं जणीं । एकासनीं खेळिजे ॥६३॥
हे श्रीकृष्णा ! तुझा वेळ जाईनासा झाला म्हणजे मला बोलवावयाला रुक्मिणीला पाठवीत होतास, आणि मग आपण दोघेजण एकासनावर बसून सारीपाट खेळत होतों ६३.

जेव्हां व्याहाळिये निघसी । मज आपुले रथीं बैसविशी ।
दोघां गमन एके रथेंसीं । आजि उबलासी सांघाता ॥६४॥
तूं अरण्यांत फिरावयाला निघालास म्हणजे मला आपल्या रथांत बसवीत होतास. एका रथांत बसून दोघांनी जावयाचे. असे असतां आजच माझ्या संगतीला कंटाळलास ना ? ६४.

जळक्रीडा करितां जळीं । करितां गोपिकांसी रांडोळी ।
तेव्हांही मी तुजजवळी । स्नानकाळीं सर्वदा ॥६५॥
पाण्यांत जलक्रीडा करतांना, किंवा गोपिकांबरोबर थट्टामस्करी करतांनासुद्धा मी तुझ्या जवळ असावयाचा. स्नान करतांना तर नेहमी मी पुढे उभा ६५.

ऐसें सांगों मी किती । तुजगेवळा श्रीपती ।
नाहीं झालों अहोरातीं । केवीं म्यां अंतीं सांडावें ॥६६॥
असे किती म्हणून मी सांगावे ? हे श्रीपति ! अहोरात्र तुझ्यापासून मी वेगळा झालेलाच नाही. मग अंतकालींच तुला कसे सोडावें ? ६६.

तूं स्वामी सखा सर्वात्मा । जीवाचा जीव पुरुषोत्तमा ।
तुझा वियोगु मेघश्यामा । केवीं आम्हां साहवेल ॥६७॥
तूं आमचा धनी; तूं आमचा सखा; तूं सार्‍या जीवांचा जीव; सारा प्राण काय तो तूं, हे पुरुषोत्तमा ! हे मेघश्यामा ! तुझा वियोग आम्हांला कसा सहन होईल ? ६७.

आमुचा जीवु आणि प्राण । ते तुझे गा श्रीचरण ।
ते वियोगदुःख साहावया जाण । समर्थपण मज नाहीं ॥६८॥
तुझे श्रीचरण, हाच आमचा जीव व प्राण. अशा त्या चरणांचे वियोगजन्य दुःख सहन करण्याला मला सामर्थ्य नाहीं ! ६८.

आमुचा हाचि लाभु अव्यंग । जे तुझिया पायांचा संयोग ।
त्यांचा न साहवे वियोग । देहभंग झालिया ॥६९॥
तुझ्या पायांचे सान्निध्य, हाच आमचा सर्वस्वलाभ. प्राण गेला तरी त्यांचा वियोग आपल्याला सोसावयाचा नाहीं ६९.

देह राहेल तरी राहो । अथवा जाईल तरी जावो ।
तुझ्या चरणांचा वियोग पहा हो । न शके साहों सर्वथा ॥३७०॥
देह राहिला तर राहूं या किंवा गेला तर जाऊं द्या. पण पाहा, तुझ्या चरणांचा वियोग आपल्याला मुळीच सहन होणार नाहीं ३७०.

थोर दुस्तर तुझी माया । ब्रह्मादिकां न ये आया ।
मज सुगम जाली तरावया । यादवराया निजशेषें ॥७१॥
तुझी माया मोठी दुस्तर. ती ब्रह्मदेवादिकांनासुद्धा आवरत नाहीं पण हे श्रीकृष्णा ! तुझ्या शेषग्रहणामुळें तीसुद्धा तरावयाला मला सुगम झाली ७१.

त्वयोपभुक्तस्रग्गन्ध वासोऽलङ्कारचर्चिताः ।
उच्छिष्टभोजिनो दासास्तव मायां जयेम हि ॥ ४६ ॥
[श्लोक ४६]-आपण वापरलेली माळ, चंदन, वस्त्रे, अलंकार इत्यादी वस्तू प्रसाद म्हणून घेणारे आम्ही आपले सेवक आहोत म्हणून आपल्या मायेवर आम्ही अवश्य विजय मिळवू शकू. (४६)

तुझें गंधशेष आणि माळा । धरितां कपाळीं आणि गळां ।
मी नागवें कळिकाळा । दास गोपाळ पैं तुझा ॥७२॥
हे गोपाळा ! मी तुझा दास असल्यामुळे, तुझ्या गंधांतील राहिलेले गंध कपाळी लावल्याने, व तुझ्या माळा गळ्यांत घातल्यानें मी कळिकाळालासुद्धा आटोपणार नाहीं ७२.

तुझे कांसेचा पिंवळा । येऊनि माझे कांसे लागला ।
तैंचि कामु म्यां जिंतिला । दृढ जाहला निजकांसे ॥७३॥
तुझ्या कांसेचा पिवळा पीतांबर येऊन माझ्या कांसेला लागला, तेव्हांच मी कामाला जिंकले आणि तो कांसेला दृढतर होऊन बसला ७३.

तुवां आपुले हृदयींचें पदक । जेव्हां मज दिधलें देख ।
तेव्हांचि माया जाहली विमुख । दासां सन्मुख न राहे ॥७४॥
तू आपल्या हृदयावरचे पदक जेव्हा मला दिलेंस, त्याच वेळी माया माझ्यापासून परतली. ती तुझ्या दासांपुढे उभीसुद्धा राहावयाची नाहीं ७४.

मायेसी असतें मुख । तरी हों लाहती सन्मुख ।
ते मिथ्या गा निःशेख । वृथा लोक भ्रमले पैं ॥७५॥
खरोखर मायेला तोंड असते तर ती पुढे उभी राहिली असती; पण ती मुळीच खोटी आहे. लोक मात्र वृथा भ्रमात पडले आहेत ७५.

तुझें उच्छिष्ट सेवितां देख । लाजोनि जाये समाधिसुख ।
निडारला निजात्मतोख । शेषें प्रत्यक्ष निजलाभु ॥७६॥
हे पहा ! तुझें उच्छिष्ट सेवन केले असता त्यापुढे समाधीचे सुखसुद्धा लाजून जाते व आत्मानंद परिपक्क होतो असा हा तुझ्या शेषोच्छिष्टाचा मोठा लाभ होय ७६.

ऐसा तुझेनि दास्यें सरता जाहला । तुझेनि निजशेषें चर्चिला ।
तुझी माया मी तरला । जिया धाकु लाविला योगियां ॥७७॥
ह्याप्रमाणें तुझें दास्य करूनच मी मोठेपणास चढलों आहे. तुझेंच अवशिष्ट सेवन करून, जिनें योग्यांनासुद्धा धाक दाखविला आहे, ती तुझी माया मी तरून गेलों ७७.

वातवसना य ऋषयः श्रमणा ऊर्ध्वमन्थिनः ।
ब्रह्माख्यं धाम ते यान्ति शान्ताः सन्न्यासीनोऽमलाः ॥ ४७ ॥
[श्लोक ४७]-अनेक ऋषी दिगंबर राहून आणि जन्मभर नैष्ठिक ब्रह्मचर्याचे पालन करून अध्यात्मविद्या प्राप्त करून घेण्यासाठी अतिशय परिश्रम करतात अशा त्या संन्याशांचे हृदय निर्मळ होते, तेव्हा कुठे ते शांत होऊन आपले ब्रह्म नावाचे स्थान प्राप्त करून घेतात. (४७)

मिथ्या मायेच्या धाकासाठीं । योगी रिघाले कपाटीं ।
जरी सांडिली लंगोटी । तरी पोटीं धाकती ॥७८॥
मिथ्या मायेच्या धाकानें योगी गिरिकंदरांत जाऊन लपून बसले; लंगोटीही सांडली. तरी पोटांत धाक आहेच ७८.

आसनस्थ होऊनि जाणा । आकळावया प्राणापाना ।
मूळबंधें आकोचना । दृढ धारणा ते करिती ॥७९॥
ते स्वस्तिकादि आसन घालून प्राणापान आकलन करण्याकरतां मूळबंधाचा संकोच करून बळकट धारणा धरून बसतात ७९.

अंगुलें बारा बारा । जिणावया जी वारा ।
रात्रंदिवस शरीरा । अभ्यासद्वारा आटिती ॥३८०॥
नाकातून वाहणारा बारा अंगुले वारा * जिंकण्याकरता अभ्यासाच्याद्वारे रात्रंदिवस शरीर झिजवितात ३८०.
[[ * “नासापुटौनि वारा । जो जातसे अंगुळे बारा । तो गच्च धरूनि माघारा । आंतु घाली ॥” (ज्ञा., अ. ६-२३६).]]

क्षुधेनें खादली भूक । तृषा तहान प्याली देख ।
जिणोनियां सुखदुःख । अतिनेटक निधीं ॥८१॥
भुकेनेंच भूक खातात; तहानेनेंच तहान पितात; ह्याप्रमाणें मोठ्या कृतनिश्चयानें सुखदुःखाला जिंकतात ८१.

सुबुद्धि धरूनिया हातीं । आकळूनि इंद्रियवृत्ती ।
वैराग्यें करित ख्याती । ऊर्ध्वगती निघाले ॥८२॥
सद्‌बुद्धीला हातात धरून इंद्रियवृत्तींना ताब्यात ठेवून वैराग्यांत ख्याति संपादीत ऊर्ध्वगतीनें चालू लागतात ८२.

भेदोनि मणिकर्णिका वोवरी । उसळले जी ब्रह्मरंध्रीं ।
जिणोनियां ब्रह्मगिरी । निशाणभेरी लाविल्या ॥८३॥
मणिकर्णिकेची ओवरी भेदन करून ब्रह्मरंध्रांत घुसतात; आणि ब्रह्मगिरि सर करून दुंदुभि वाजवितात ८३.

तेथ शांतीचेनि योगें । विलसत सर्वांगें ।
संकल्पत्यागवेगें । जाहले अंगें चिद्ब्राह्म ॥८४॥
तेथे त्यांचे सर्वांगांत शांतिसुख नांदूं लागते. आणि सर्व संकल्पांचाच त्याग झाल्यामुळें ते स्वतः चिद्‌ब्रह्मच होऊन राहतात ८४.

ऐसे योगबळें योगी । माया जिणती अंगोअंगीं ।
त्याहोनि अतिसुगम मार्गीं । आम्हांलागीं त्वां केली ॥८५॥
ह्याप्रमाणें योगी योगबलानें मायेला जिंकतात. पण ती माया जिंकावयाला तूं आम्हांला त्याहूनही सुगम मार्ग करून दिला आहेस ८५.

वयं त्विह महायोगिन् भ्रमन्तः कर्मवर्त्मसु ।
त्वद्वार्तया तरिष्यामस्तावकैर्दुस्तरं तमः ॥ ४८ ॥
स्मरन्तः कीर्तयन्तस्ते कृतानि गदितानि च ।
गत्युत्स्मितेक्षणक्ष्वेलि यन्नृलोकविडम्बनम् ॥ ४९ ॥
[श्लोक ४८-४९]-हे महायोगेश्वर ! आम्ही तर कर्ममार्गातच भटकणारे आहोत. परंतु आम्ही आपल्या भक्तजनांबरोबर आपले गुण आणि लीलांची चर्चा करून तसेच माणसासारख्या कृती करीत आपण जे काही केलेत, किंवा सांगितलेत, त्यांचे स्मरणकीर्तन करीत राहू. त्याचप्रमाणे आपले चालणेबोलणे, हास्ययुक्त पाहाणे आणि थट्टाविनोद यांच्या आठवणीत तल्लीन राहू केवळ एवढ्यानेच आम्ही आपली दुस्तर माया पार करू. (४८-४९)

भजावें तुझिया निजभक्तां । ऐकावी तुझी कथावार्ता ।
इतुकेनि तरलों जी सर्वथा । कृष्णनाथा निजमाया ॥८६॥
हे कृष्णा ! तुझ्या भक्ताला भजावें, तुझी कथावार्ता ऐकावी, इतक्यानेंच तुझी माया मी तरून गेलों ८६.

आम्हां कर्ममार्गींचिया कर्मठां । तुवां उपकारु केला मोठा ।
तुझ्या कथेचा श्रवणपाठा । मुक्त दारवंठा मोक्षाचा ॥८७॥
कर्ममार्गातील आम्हां कर्मठ लोकांवर तूं मोठा उपकार करून ठेवला आहेस. कारण, तुझ्या कथेच्या श्रवणपठणानेंच मोक्षाचे द्वार खुलें होतें ८७.

असो मोक्षाची कथा । चाड नाहीं गा सर्वथा ।
तुझ्या भक्तांसी तुझी कथा । करितां भवव्यथा न बाधीचि ॥८८॥
मोक्षाची कथा बाजूस राहो, त्याची आम्हांला मुळीच इच्छा नाही. कारण, तुझ्या भक्तांनी तुझी कथा श्रवण केली, की त्यांना संसाराची मुळीच बाधा होत नाहीं ८८.

तुझे अभेद भक्तीचें कोड । आम्हां संसारुचि गोड ।
ठेंचूनि त्रिगुणांचें तोंड । भक्त प्रचंड भजताति ॥८९॥
तुझ्या अभेद भक्तीचीच आवड असल्यामुळे, आम्हांला संसारच गोड आहे. जे भक्त असतात ते त्रिगुणांचेही तोंड ठेचून तुझें भजन उत्कृष्ट प्रेमानें करतात ८९.

तुझ्या चरित्राचें श्रवण । आवडीं करितां कीर्तन ।
त्यांचा भवबंध च्छेदन । बळेंचि जाण तूं करिशी ॥३९०॥
प्रेमानें तुझ्या चरित्राचे श्रवण आणि कीर्तन केले असतां, तूं आपण होऊन त्यांच्या संसारबंधनाचें छेदन करतोस ३९०.

पुसोनिया संसारभावो । निजपदीं देसी ठावो ।
हा श्रवणकीर्तनलाभ पाहा हो । आम्ही सहजें लाहों निजभक्त ॥९१॥
संसारभाव पुसून टाकून तूं आत्मपदाजवळ स्थान देतोस. ह्याप्रमाणें आम्ही तुझे भक्त, तुझ्या श्रवणकीर्ति लाभाला सहजासहजी पात्र होतों ९१.

स्वभावें कीर्तन करितां । एवढा लाभु होये तत्वतां ।
या तुझिये मुखींच्या कथा गातां । आपणियां देता तूं होशी ॥९२॥
सहज कीर्तन केले तर खरोखर एवढा लाभ होतो, मग तुझ्या मुखांतल्याच कथा गायन केल्या, तर तूं आपल्या स्वतःलासुद्धा अर्पण करशील ९२.

तुझीं गोकुळींचीं गमनपदें । आवडीं वर्णिती जे आनंदें ।
त्यांसी खांदीं वाऊनि निजबोधें । कीर्तनच्छंदें नाचशी ॥९३॥
तूं गोकुळांतून चालतांना जी तुझी पावले उठलेली आहेत, त्यांचे जे आनंदानें वर्णन करतात, त्यांना तूं खांद्यावर घेऊन निजबोधानें आणि कीर्तनाच्या छंदानें नाचतोस ९३.

तुवां जे केली लीला । ते आवडी गातां जी गोपाळा ।
नित्य त्या सेवकांजवळा । अंगें अंगवळा तूं होशी ॥९४॥
हे गोपाळा ! तूं जी लीला केली आहेस, ती आवडीनें गायन केली असता त्या सेवकांच्याजवळ तूं स्वतःच बसून राहतोस ९४.

तुझें वर्णिती जे हास्यवदन । त्या भक्ताचें तूं करिशी ध्यान ।
त्यांचेनि बोलें समाधान । स्त्रीशूद्रां जाण तूं देशी ॥९५॥
तुझ्या हास्यवदनाचे जे वर्णन करतात, त्या भक्तांचें तूं ध्यान करतोस. आणि त्यांच्या भाषणानें स्त्रीशूद्रांस तूं समाधान देतोस ९५.

तुझें दृष्टीचें दर्शन । दृश्यातीत निरीक्षण ।
सर्वत्र देखणेंपण । कीर्तनीं गान जे गाती ॥९६॥
तुझ्या दृष्टीचे दर्शन म्हणजे दृश्यातीताचे देखणे; तुझे सर्वत्र असलेले देखणेपण ह्याचे जे कीर्तनामध्यें वर्णन करतात ९६.

त्यांच्या पाउलांपाउलांसी । आपुलें सर्वांग तूं वोवाळिसी ।
अंग टाकूनि तिष्ठसी । त्यांपाशीं सर्वदा ॥९७॥
त्यांच्या पावलापावलाला, तूं आपल्या सर्वांगाचे लिंबलोण करतोस आणि त्यांच्यापाशी आपला मोठेपणा टाकून सर्वकाळ राहातोस ९७.

आपुली गुह्य ज्ञानमुद्रा । त्यांसी अर्पिसी तूं ज्ञानीनरेंद्रा ।
निजबोधें प्रबोधचंद्रा । त्यांच्या निजभद्रा तूं करिशी ॥९८॥
हे ज्ञानश्रेष्ठा ! आपली गुह्य ज्ञानमुद्रा तूं त्यांना अर्पण करतोस. आणि हे प्रबोधचंद्रा ! आत्मबोध देऊन त्यांचे तूं कल्याण करतोस ९८.

रासक्रीडादि नाना छंद । अंगनामंगनादि प्रबंध ।
कीर्ति अतिशयें विशद । भावार्थें शुद्ध जे गाती ॥९९॥
रासक्रीडादि नाना प्रकारच्या लीला किंवा ‘अंगनामंगनादि’ प्रबंध म्ह. मूळ गद्यपद्यकविता ह्यांमध्यें विशद केलेल्या तुझ्या कीर्तीचे जे गायन करतील ९९,

कां ठकूनियां ब्रह्मयासी । गोपाळवत्सें तूं जाहलासी ।
ऐसऐ सिया विनोदांसी । हृषीकेशी जे गाती ॥४००॥
किंवा हे कृष्णा ! ब्रह्मदेवाला ठकवून तूंच गोपाळ व वासरे कसा झाला होतास, असले असले विनोद हे हृषीकेशा, जे गातील ४००,

त्यांसी सर्वांभूतीं निजात्मता । देशी तूं आपुली सत्ता ।
त्यांच्या बोलांमाजी वर्तता । कृष्णनाथा तूं होशी ॥१॥
त्यांना सर्वांभूती आत्माच भरलेला आहे असे निदर्शनास आणून आपलीच सत्ता देतोस व हे कृष्णनाथा ! त्यांच्या बोलांत तूं वागत असतोस १.

मनुष्यनाट्याचेनि योगें । जें जें केलें तुवां अंगें ।
तें गातां ऐकतां अनुरागें । तरले वेगें निजभक्त ॥२॥
लीलेनें मनुष्यरूप घेऊन तूं जें जें कांहीं केलेंस, तें तें प्रेमानें गातांना व ऐकतांना तुझे भक्त हां हां म्हणतां तरून गेले २.

म्यांचि केली जे जे आळी । ते त्वां पुरविली सर्व काळीं ।
त्या मज उपेक्षूनि वनमाळी । अंतकाळीं कां जाशी ॥३॥
मीसुद्धा जो जो हट्ट घेतला, तो तो तूं सदासर्वकाळ पुरविलास. असे असतां हे श्रीकृष्णा ! आतां शेवटच्यावेळी माझी उपेक्षा करून तूं कां बरें जातो आहेस ? ३.

श्रीशुक उवाच ।
एवं विज्ञापितो राजन् भगवान्देवकीसुतः ।
एकान्तिनं प्रियं भृत्यमुद्धवं समभाषत ॥ ५० ॥
[श्लोक ५०]-श्रीशुक म्हणतात – परीक्षिता ! देवकीनंदन भगवान श्रीकृष्णांना जेव्हा उद्धवांनी अशी प्रार्थना केली, तेव्हा ते आपल्या अनन्यप्रेमी सखा व सेवक असलेल्या उद्धवाला म्हणाले. (५०)

एवं यापरी देवकीसुत । पूर्ण पूर्णाशें भगवंत ।
विनविला श्रीकृष्णनाथ । निजभृत्य-उद्धवें ॥४॥
श्रीशुकाचार्य म्हणतात–ह्याप्रमाणें देवकीचा पुत्र, म्हणजे पूर्णांशानें पूर्ण असा भगवंत, श्रीकृष्णनाथ, त्याच्यापाशी त्याचाच सेवक जो उद्धव त्यानें विनंति केली ४.

‘निजभृत्य’ म्हणणें । उद्धवासी याकारणें ।
निजगुज श्रीकृष्णें । त्यासीं बोलणें सर्वदा ॥५॥
उद्धवाला श्रीकृष्णाचा ‘निज सेवक’ म्हटले, ह्याचे कारण श्रीकृष्ण आपल्या पोटांतील कोणतीही गुप्त गोष्ट नेहमी त्याच्यापाशी बोलत असे ५.

जेथ रिगमु नाहीं रुक्मिणीसी । ठावो नाहीं वसुदेवदेवकीसी ।
बळिभद्रा प्रद्युम्नासी । अनिरुद्धासी जे ठायीं ॥६॥
रुक्मिणीलाही जेथें रिघाव नाहीं, वसुदेवाला किंवा देवकीलाही जेथें स्थान नाहीं, प्रद्युम्न, बळिभद्र किंवा अनिरुद्धालाही जेथें मज्जाव ६,

ते ठायीं कृष्णाप्रती । उद्धव असे अहोरातीं ।
यालागीं पैं ‘एकांती’ । ज्ञाते म्हणती तयासी ॥७॥
त्या ठिकाणी कृष्णापाशी उद्धव अहोरात्र राहत असे. म्हणूनच त्याला ज्ञाते लोक ‘एकांती’ म्ह० एकांतभक्त असे म्हणतात ७

श्रीकृष्णासी वाडेंकोडें । जीवापरीस जें जें आवडे ।
तें उद्धवासी देणें घडे । प्रेम गाढें भक्तांचें ॥८॥
श्रीकृष्णाला जें जें कांहीं जिवापेक्षाही अधिक आवडीचे, तें तें तो उद्धवाला देत असे, इतकें त्या भक्ताचे प्रेम अलोट ! ८.

देतां तो जरी नेघे । तरी धांवोनि आलिंगी वेगें ।
न घेतां देवो पायां लागे । भक्तपांगें पांगिला ॥९॥
ते देतांना जर त्यानें घेतले नाही, तर धावत जाऊन त्याला मिठी मारी; आणि इतक्याही उप्पर त्यानें नको म्हटलें, तर त्याच्या पायां पडे. इतका भक्तांच्या पांगलेपणानें देव पांगला होऊन राहतो ९.

यालागीं कृष्णासी प्रियकर । उद्धवुचि साचार ।
याहूनि प्रेम थोर । नाहीं सधर आनाचें ॥४१०॥
म्हणून कृष्णाला अत्यंत प्रिय असा एक उद्धवच होता, त्याच्यापेक्षा त्याला दुसऱ्या कोणाचेंच अधिक प्रेम नव्हते ४१०.

यालागीं ‘प्रिय-भृत्य-एकांती’ । ये बिरुदें उद्धवासी साजती ।
तेणें निजस्वामीस विनंती । निजप्रीतीं पैं केली ॥११॥
म्हणूनच ‘प्रिय’ ‘सेवक’ ‘एकांती’ ह्या पदव्या उद्धवालाच शोभतात. त्यामुळेच त्यानें आपल्या स्वामीला ही विनंती केली ११.

ऐकोनि उद्धवाचें वचन । चातकांलागीं जेवीं घन ।
तेवीं वोळला जगज्जीवन । स्वानंदघन निजबोधें ॥१२॥
उद्धवाचे भाषण ऐकून चातकासाठी जसा मेघ भरून येतो, त्याप्रमाणें स्वानंदघन असा जो श्रीकृष्ण तो प्रेमानें प्रसन्न झाला १२.

चातकाची तहान किती । तृप्त करूनि निववी क्षिती ।
उद्धवउीद्देशें श्रीपती । त्रिजगती निववील ॥१३॥
चातकाची तहान ती कितीशी ? ती तृप्त करून शिवाय सार्‍या पृथ्वीला मेघ ज्याप्रमाणें गारीगार करून सोडतो, त्याप्रमाणें श्रीकृष्ण आतां उद्धवाच्या निमित्तानें त्रिभुवनालाही तृप्त करून सोडील १३.

ऐकतां उद्धवाचे बोल । येताति श्रीकृष्णासी डोल ।
भक्तभाग्य जी सखोल । जाहली वोल प्रेमाची ॥१४॥
उद्धवाचे भाषण ऐकून श्रीकृष्ण डोलावयासच लागला. भर भाग्य मोठे, म्हणून प्रेमाची ओल चढली १४.

ते वोळले भक्तभूमीसी । निजबीज पेरील हृषीकेशी ।
तें पीक पुरेल जगासी । मुक्तराशी मुमुक्षां ॥१५॥
आतां त्या ओल्या झालेल्या भक्तरूपी भूमीमध्यें श्रीकृष्ण आत्मबीज पेरील. आणि त्याचे पीक सार्‍या जागाला पुरेल. मुमुक्षूंना तर मुक्तीची रासची रास ! १५.

धेनु वत्साचेनि वोरसें । घरा दुभतें पुरवी जैसें ।
तेवीं उद्धवाचेनि उद्देशें । जग हृषीकेशें निवविजे ॥१६॥
गाय वासराच्या पान्ह्याच्या निमित्तानें साऱ्या घराला जसे दुभते पुरविते, त्याप्रमाणें उद्धवाच्या निमित्तानें श्रीकृष्णही साऱ्या जगाला शांत करून सोडील १६.

घरीं पाहुणयालागीं । कीजती परवडी अनेगी ।
तेथ बालकें जेवीं विभागी । होतीं वेगीं न मागतां ॥१७॥
घरांत पाहुण्याकरतां अनेक पक्वान्नें करतात, ती न मागतांच मुले त्यांतील विभागी होतात १७.

पक्वान्न सेवूं नेणतीं बाळें । तरी माता मुखीं घाली बळें ।
तैसें जनार्दनें आम्हां केलें । स्वयें दिधलें निजशेष ॥१८॥
मुलांना ते पक्वान्न खातांसुद्धा येत नाही, तरी आई ते बळेच त्यांच्या तोंडात घालते, तसेंच आम्हांला जर्नादनानें केले. आपला शेष प्रसाद आपण होऊन आम्हांला दिला १८.

नवल कृपा केली कैशी । कृष्ण उद्धवातें उपदेशी ।
तोचि अर्थ दिधला आम्हांसी । देशभाषीं अर्थितां ॥१९॥
ही कशी अपूर्व कृपा केली पहा ! की कृष्णानें उद्धवाला उपदेश केला, त्याचा आमच्या मराठी भाषेत अर्थ करून आम्हाला सांगितला १९.

एका जनार्दनु म्हणे । श्रोतां सावधान होणें ।
हें मी तोंडें बोलों कवणें । तिंहीं मज करणें सावध ॥४२०॥
एकाजनार्दन म्हणतो, की आतां श्रोत्यांनी सावधान व्हावें; पण हे तरी मी कोणत्या तोंडानें म्हणू ? वास्तविक त्यांनीच मला सावध केले पाहिजे ४२०.

निजभक्तें केली विनंती । निजज्ञान बोलेल भक्तपती ।
श्रवणाची सावध पंक्ती । बैसवा वृत्ति तद्बोणधें ॥२१॥
निज भक्तानें विनंती केली, म्हणून तो भक्तिपति आतां आत्मज्ञान सांगेल. ह्याकरतां कानांची पंगत करून त्या बोधाकडे वृत्ति लावा २१,

येथ मुक्तांचें कोड । पुरे मुमुक्षांची चाड ।
येचिविषयीं कथा गोड । श्रवणकवाड उघडेल ॥२२॥
कारण मुक्तांची आवड आणि मुमुक्षूंची इच्छा तृप्त होईल अशी कथा पुढे आहे, ती ऐकावयाला श्रवणरूप द्वार सहज उघडेल २२.

उद्धवें श्रीकृष्ण विनविला । ना तो श्रवणीं डांगोरा पिटिला ।
मुमुक्षां म्हणे चला चला । कृष्ण वोळला निजबोधें ॥२३॥
उद्धवानें ही श्रीकृष्णाला केलेली विनंती नव्हे, तर भगवान् कृष्ण आतां आत्मज्ञानाची वृष्टि करायला तयार झाला आहे, तो लाभ घ्यावयाला म्हणजे श्रवण करावयाला चला हो चला, असा डांगोराच त्यानें पिटला आहे २३.

मोक्षमार्गींचे कापडी । अर्थतृषातृषितें बापुडीं ।
प्रबोधबोधाची पव्हे गाढी । उद्धवें रोकडी घालविली ॥२४॥
अर्थतृपेनें तृषित झालेल्या मोक्षमार्गाच्या यात्रेकरूंकरतां उद्धवानें ही बोधाची प्रत्यक्ष पाणपोईच घालविली आहे २४.

भक्तिजननी माझी तेथ । कडे घेवोनि होती नेत ।
जनार्दन परमामृत । जाहलें प्राप्त तिचेनीं ॥२५॥
माझ्या भक्तिरूप आईनें मला कडेवर घेऊन तेथे नेलें; तिच्यामुळेच जनार्दनरूप परमामृत मला प्राप्त झाले २५.

ते तुझी भक्ति तत्वतां । आम्हांसी असावी सर्वथा ।
तुज मागावी मुक्तता । तंव ते मूर्खता भक्तांची ॥२६॥
भगवंता ! खरोखर ती तुझी भक्तीच आम्हांला सदोदित असावी. तुझ्याकडे मुक्ति मागितली तर तो भक्तांचा मूर्खपणाच होईल २६.

साच असावी बद्धता । तरी म्यां मागावी मुक्तता ।
तेचि नाहीं गा तत्वतां । मिथ्या मागतां मूर्खता ॥२७॥
कारण बद्धता खरी असेल, तरच मी मुक्तता मागावी हें युक्त होईल; पण बंधन जर वस्तुतः नाही, तर मुक्तता मागितल्यानें पदरीं मूर्खपणाच यावयाचा ! २७.

मीतूंपणेंवीण सहजस्थिती । तुझी असो अभेद-भक्ती ।
हेचि मागणें पुढपुढतीं । संतांप्रती सर्वदा ॥२८॥
मीतूंपणाशिवाय असलेली जी ‘सहज स्थिति’ तीच तुझी अभेद भक्ति आम्हांला असू दे. संतांकडेही सदा सर्वकाळ पुन्हा पुन्हा हेंच मागणे आहे २८.

उद्धवासी ज्ञान गुप्त । उपदेशील कृष्णनाथ ।
एका जनार्दन विनवित । दत्तचित्त तुम्ही दीजे ॥४२९॥
आतां कृष्णनाथ उद्धवाला गुप्तज्ञानाचा उपदेश करील. तरी एका जनार्दनाकडे विनंति करतों की, श्रवण करण्यासाठी मला सावधान चित्त द्यावें ४२९.

इति श्रीमद्‌भागवते महापुराणे एकादशस्कंधे
एकाकारटीकायां देवस्तुत्युद्धवविज्ञापनं नाम षष्ठोऽध्यायः ॥६॥
ह्याप्रमाणें श्रीमद्‌भागवत महापुराणाच्या एकादशस्कंधांतील एकनाथकृत टीकेचा ‘देवस्तुति व उद्धवविज्ञापना’ नांवाचा सहावा अध्याय संपूर्ण झाला.)


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref:satsangdhara 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *