sant eknath maharaj

एकनाथी भागवत अध्याय 13

एकनाथी भागवत अध्याय 13

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
ॐ नमो जी अनादि हंसा । हंसरूपा जी जगदीशा ।
तूं द्‍गुरु परमहंसा । परमपरेशा परिपूर्णा ॥१॥
ॐकारस्वरूप अनादि हंसा ! हे सरूप जगदीशा ! तुला नमस्कार असो. हे श्रेष्ठ परमेश्वरा ! हे परिपूर्णा ! तूं परमहंसाचाही सद्गुरु आहेस १.

उभयपक्षेंवीण देख । तुझे शोभती दोनी पांख ।
शुद्धसत्त्वाहोनि चोख । स्वरूप सुरेख सोज्वळ ॥२॥
विद्या-अविद्या, ज्ञान-अज्ञान, प्रकृति-पुरुष इत्यादि द्वैतभावनेशिवायच (दोन पक्षांशिवायच) तुझे दोन पंख शोभत आहेत, आणि शुद्ध सत्त्वाहूनही उत्तम असें तुझें सुरेख आणि सोज्वळ स्वरूप आहे २.

हंस बोलिजे शुभ्रवर्ण । तुझी हंसता विलक्षण ।
सांडोनियां सकळ वर्ण । हंसपण तुज शोभे ॥३॥
हंस हा पांढऱ्या शुभ्रवर्णाचा आहे असे म्हणतात, पण तुझा हंसपणा विलक्षणच आहे. सर्व वर्ण सोडून देउन हंसपणा तुला शोभत आहे ३.

विकासल्या सुवर्णपंकजें । इतर हंसीं तेथें क्रीडिजे ।
प्रेमें उत्फुल्लित कमळ जें । तुवां क्रीडिजे ते ठायीं ॥४॥
सुवर्णाचीं कमळें विकसित झालीं असता तेथे इतर हंस क्रीडा करतात. पण प्रेमानें उत्फुल्ल झालेले जे हृदयकमळ, त्या कमळांत तूं क्रीडा करतोस ४.

मानससरोवरीं वस्ती हंसासी । तूं मानसातीत रहिवासी ।
हंसा उत्पतन आकाशीं । तुझें चिदाकाशीं उड्डाण ॥५॥
हंसाचें राहण्याचें ठिकाण मानससरोवरांत आहे, पण तूं मानसाविरहितच (मनाशिवाय) राहणारा आहेस. हंसाचें उड्डाण आकाशांत असते, आणि तुझें उड्डाण चिदाकाशांत असतें. ५.

विवेकचंचूचिया मुद्रा । स्वभावें निवडिसी क्षीरनीरां ।
मग सांडोनियां असारा । शुद्ध सारा सेविसी ॥६॥
विवेकरूप चोंचीनें तूं दूध व पाणी सहज निरनिराळे करतोस, आणि मग असार टाकून देऊन शुद्ध सार ग्रहण करतोस ६.

ऐसिया हंसा जी सुकुमारा । मुक्तमोतियांचा तुज चारा ।
जीं कां वैराग्यशुक्तिद्वारा । चित्सागरामाजीं झालीं ॥७॥
अशा तुला सुकुमार हंसाला, जी चित्समुद्रामध्यें वैराग्यरूप शिंपींत तयार झालीं, त्या मुक्तरूप मोत्यांचा चारा असतो ७.

सर्वथा नातळोनि क्षिती । निरालंब मार्गाप्रती ।
चालणें चालसी हंसगती । हे गमनशक्ती अभिनव ॥८॥
पृथ्वीला मुळींच स्पर्श न करता केवळ निराधार मार्गानें तूं हंसाच्या गतीनें प्रवास करतोस, ही तुझी प्रवासाची कला मोठी अद्‌भुत आहे ८.

अभिन्न स्वभावतां निज‍अंशीं । चिन्मात्रवागीश्वरी तूं वाहसी ।
हंसवाहिनी आख्या ऐशी । तुझेनि अंशेंसीं तीस झाली ॥९॥
स्वभावतःच तुझ्या अंशाहून भिन्न नाही, अशा चिन्मय वाग्देवतेला तूं वागवितोस. तुझ्या अंशामुळेच तिला हंसवाहिनी असें नांव प्राप्त झाले आहे ९.

तुझेनि चालविल्या सरस्वती चाले । तुवां बोलविल्या वेदू बोले ।
तुवां चेतविल्या प्राण हाले । तुझेनि वाचाळें वाग्देवी वदे ॥१०॥
तूं चालविलेंस तरच सरस्वती चालते, तूं बोलविलेंस तरच वेद बोलतो, तूं जागृत केलास तरच प्राण हालतो, आणि तुझ्या वक्तृत्वशक्तीनेंच सरस्वती बोलते १०.

झाली वागीश्वरी वाग्देवता । तियेसी तुझेनि वाचाळता ।
जेवीं कां वेणु वाजे मधुरता । परी वाजविता तो भिन्न ॥११॥
सरस्वती ही वाणीची देवता झाली, तरी तिला तुझ्यामुळेंच बोलण्याचें सामर्थ्य प्राप्त झालें आहे-ज्याप्रमाणें मुरली ही मंजुळपणानें वाजते, पण वाजविणारा असतो तो वेगळाच असतो ११.

एवं वाच्य वचन वक्ता । तूंचि वागीश्वरी तूंचि वदता ।
आपुल्या हंसरूपाची कथा । स्वभावतां बोलविसी ॥१२॥
ह्याप्रमाणें वाचा, वचन आणि वक्ता तूंच, सरस्वती तूंच आणि बोलणाराही तूंच. म्हणून आपल्या हंसरूपाची कथाही तूंच सहज बोलवितोस १२.

बोलावया महाकवीच्या ठायीं । तुवां वागीश्वरी द्योतिली पाहीं ।
ते हंसरूपाची नवाई । अभिनव कांहीं बोलवी ॥१३॥
मोठमोठ्या कवींच्या ठिकाणीं बोलण्यासाठीं तूं सरस्वती प्रकट केलीस पहा. त्या हंसरूपाची अपूर्वता काही अभिनव गोष्टीच बोलविते १३.

तो तूं सर्वभूतीं समान । हंसस्वरूपी श्रीजनार्दन ।
त्याचे वंदितां निजचरण । जन्ममरण पळालें ॥१४॥
तो तं हंसस्वरूपी श्रीजनार्दन सर्वभूतीं समानच आहेस. त्याचे श्रीचरण मस्तकी धारण केल्यामुळें जन्ममरण पळून गेलें १४.

आपभयें पळतां त्यासी । लपणी मिळाली भ्रमापाशीं ।
जन्मामागे मरणासी । ठावू वसतीसी दीधला ॥१५॥
ते आपल्या आपणच भिऊन पळूं लागलें असतां श्रमापाशीं त्याला लपावयाला जागा सांपडली, आणि त्यानें जन्मापाठीमागून मरणाला राहावयाला ठिकाण नेमून दिलें १५.

यालागीं भ्रमामाजीं जो पडला । तो जन्ममरणांसी आतुडला ।
मग न सुटे कांहीं केल्या । यंत्रीं पडला भ्रमचक्रीं ॥१६॥
म्हणून जो भ्रमात पडतो तो जन्ममरणांत सांपडतो, आणि एकदा भ्रमाच्या चक्रांत गुंतला की मग काहीं केलें तरी सुटत नाहीं १६.

तेथ राहाटमाळेच्या परी । जन्ममरणांचे पडे यंत्रीं ।
एकाची सोसी भरोवरी । तंव दुसरें शिरीं आदळे ॥१७॥
तेथे तो रहाटमाळेसारखा जन्ममरणाच्या यंत्रांत सांपडतो. एकाचा तडाका सोसतो तोंच दुसरा तडाका डोक्यावर येऊन आदळतो १७.

तें निस्तरावया जन्ममरण । तुज सोहंहंसाचें स्मरण ।
जैं कां करी सावधान । भ्रममोचन तैं होय ॥१८॥
तें जन्ममरण निस्तरण्याकरितां तुझे ‘ सोहहंसाचे ‘ स्मरण करावें लागतें. जेव्हां कोणी तें स्मरण सावधपणानें करतो, तेव्हांच त्याचा भ्रम नष्ट होतो १८.

तो तूं परमात्मा परमहंसू । परब्रह्मैक पूर्ण परेशू ।
ब्रह्मपुत्रांसी उपदेशू । करावया हंसू झालासी ॥१९॥
तो तूं परमात्मा परमहंस आहेस. परब्रह्मस्वरूपी पूर्ण परमेश्वर आहेस. ब्रह्मदेवाच्या पुत्राला उपदेश करण्यासाठी तूं हंस झाला होतास १९.

तें हंसमुखींचें निरूपण । बोलावया बोलका श्रीशुक जाण ।
त्या वचनार्थातें लेवून । परम पावन परीक्षिती ॥२०॥
त्या हंसमुखांतील निरूपणच सांगण्यासाठी श्रीशुकाचार्य वक्ते झाले, आणि त्या भाषणांतील अर्थ ग्रहण करूनच परीक्षिति परम पावन झाला २०.

त्या हंसाचें हंसगीत । कृष्ण उद्धवासी सांगत ।
श्रोतां व्हावें दत्तचित्त । अचुंबित निजबोधू ॥२१॥
त्या हंसाचें हंसगीत श्रीकृष्ण उद्धवाला सांगत आहेत. ह्याकरितां श्रोत्यांनीही इकडे लक्ष द्यावे, म्हणजे सहज आत्मबोध प्राप्त होईल २१.

तो हा तेरावा अध्यावो । अत्यादरें सांगे देवो ।
तें ऐकतां उद्धवो । विषयविलयो देखेल ॥२२॥
तोहा तेरावा अध्याय देव मोठ्या कळकळीनें सांगत आहे. तो ऐकतांच उद्धव विषयांचा नाश पाहूं शकेल २२.

तेरावे अध्यायीं निरूपण । सत्त्ववृद्धीचें कारण ।
विद्याउद्‍भवक्रमू जाण । अतिसुलक्षण सोपारा ॥२३॥
तेराव्या अध्यायामध्यें सत्त्वबुद्धीचें कारण निरूपण केलें असून सद्विद्येच्या उद्‌भवाचा अनुक्रम अत्यंत सुलभ अशा रीतीनें वर्णिला आहे २३.

हंस‍इतिहासाचा योगू । स्वयें सांगेल श्रीरंगू ।
तेणें चित्तासी विषयवियोगू । सुगम साङ्ग सांगेल ॥२४॥
त्या हंसाच्या इतिहासाचा योग देव स्वतः सांगेल, व त्यांतच चित्ताला विषयांचा वियोग कसा होतो तेंही सुलभ रीतीनें सांगण्यात येईल २४.

द्वादशाध्यायाचे अंतीं । करूनि सद्‍गुरूचीं भक्ती ।
पावोनि विद्याकुठारप्राप्ती । छेदावा निश्चितीं जीवाशयो ॥२५॥
बाराव्या अध्यायाच्या शेवटी सद्‌गुरूची भक्ति करून विद्यारूपी कुठार प्राप्त करून घेऊन जीवांतील वासनाच छेदून टाकावी असें सांगितलें २५.

छेदिल्या जीवाचें जीवपण । सकळ सांडावें साधन ।
हें उद्धवें ऐकूनि जाण । प्रतिवचन नेदीच ॥२६॥
जीवाचें जीवपणच छेदून टाकिलें म्हणजे सर्वच साधनें सोडून द्यावीत, हे उद्धवानें ऐकून त्यावर काहीच उत्तर दिलें नाहीं २६.

उद्धवाचे जीवींचा भावो । सखोल हृदयींचा अभिप्रावो ।
सकळ आकळोनियां सद्‍भावो । स्वयें श्रीकृष्णदेवो बोलत ॥२७॥
तेव्हां उद्धवाच्या मनांतील हेतु, त्याच्या अंत:करणांत चाललेला गूढ विचार, हे सर्व नीटपणें ओळखून देव श्रीकृष्ण आपण होऊनच बोलूं लागला २७.

म्हणसी लागोनि सूत्र त्रिगुण । जीवासी आलें जीवपण ।
ते अंगीं असतां तिनी गुण । सद्विद्या जाण उपजेना ॥२८॥
तूं म्हणशील की, त्रिगुणाचे सूत्र लागून जीवाला जीवपण आलेलें असते. ते तीन गुण आंगांत आहेत तोंपर्यंत सद्विद्या उत्पन्नच होणार नाही २८.

तोंडींचा खिळू नव्हता दूरी । नारेळजळ न चढे करीं ।
तेवीं गुण न वचतां निर्धारीं । विद्या कैशापरी उपजेल ॥२९॥
नारळाच्या तोंडावरची खीळ काढली नाहीं तर नारळांतील पाणी काहीं हातांत यावयाचें नाही. त्याप्रमाणें गुणच जर खरोखर गेले नाहींत, तर विद्या कशी उत्पन्न होणार ? २९.

ऐसा आशंकेचा भावो । जाणोनियां श्रीवासुदेवो ।
तिहीं श्लोकीं तो पहा हो । गूढाभिप्रावो निरसितू ॥३०॥
हाच उद्धवाच्या शंकेचा तात्पर्यार्थ जाणून, हें पहा ! श्रीकृष्ण तीन श्लोकांनीं त्याच्या त्या गहन शंकेचा निरास करतो ३०.

श्रीभगवानुवाच –
सत्त्वं रजस्तम इति गुणा बुद्धेर्न चात्मनः ।
सत्त्वेनान्यतमौ हन्यात् सत्त्वं सत्त्वेन चैव हि ॥ १ ॥
[श्लोक १] भगवान श्रीकृष्ण म्हणाले – सत्त्व, रज आणि तम हे तीन बुद्धीचे गुण आहेत, आत्म्याचे नव्हेत, सत्त्वगुणाने रज आणि तमाचा नाश करावा नंतर शुद्धसत्त्वाने वृत्तिरूप सत्त्वगुणाचाही त्याग करावा. (१)
सत्त्वरजतमादि गुण । निश्चयेंसी मायेचे जाण ।
हें द्वादशाध्यायीं निरूपण । तुज म्यां संपूर्ण सांगीतलें ॥३१॥
सत्त्व, रज, तम, इत्यादि जे गुण आहेत, ते खरोखर मायेचे आहेत हें लक्षात ठेव. हें सर्व निरूपण बाराव्या अध्यायांत मी तुला सांगितलेंच आहे ३१.

सच्चिदानंदू जो येथ । आत्म्यासीं अभिन्न नित्य ।
तैसे गुण नव्हती समस्त । ते प्राकृत प्रकृतिकार्यें ॥३२॥
आतां सच्चिदानंद म्हणून जो आहे, तो कांही आम्याहून भिन्न नाही. पण सारे गुण कांहीं तसे नव्हेत. ते प्रकृतीचींच कार्ये असल्यामुळें प्राकृत होत ३२.

जें सद तेंचि चिद । जें चिद तोचि आनंद ।
स्वरूपीं नाहीं त्रिविध भेद । तें एकवद सच्चिदानंद ॥३३॥
जें सत् तेंच चित्. आणि जें चित् तोच आनंद. आत्मस्वरूपामध्यें काहीं तीन प्रकारचे भेद नाहींत. ते एकीएक सच्चिदानंदस्वरूपच आहे ३३.

जेवीं श्वेतता मृदु मधुर । त्रिविध भेदें एक साखर ।
तेवीं सच्चिदानंद अविकार । वस्तु साकार एकवद ॥३४॥
ज्याप्रमाणे पांढरी, मऊ आणि गोड ह्या तिन्ही प्रकारांनी साखर ही एकच; त्याप्रमाणे सच्चिदानंद ही अविकृत वस्तु असून आकारानेंही एकरूपच आहे ३४.

प्रकृति गुणांतें उपजविती । गुणांस्तव सबळ प्रकृती ।
गुणांसी आत्म्यासी संगती । न घडे कल्पांतीं उद्धवा ॥३५॥
प्रकृति हीच गुणांना उत्पन्न करणारी आहे, आणि त्या गुणांमुळेच प्रकृति बलिष्ठ झाली आहे. याकरिता उद्धवा ! गुणांची आणि आत्म्याची संगति कधी कल्पांतींसुद्धा घडत नाही ३५.

येथ विद्याउत्पत्तिलक्षण । स्वयें सांगे नारायण ।
करूनि गुणें गुणांचें मर्दन । सद्विद्या जाण साधावी ॥३६॥
आतां विद्या साध्य करण्याचें लक्षण श्रीकृष्ण स्वतःच सांगतात. गुणानेंच गुणांचा नाश करून सद्विद्या संपादन करावी हें लक्षात ठेव ३६.

सत्त्व वाढवून सुरवाडें । जैं रज तम निःशेष झडे ।
तैं सद्विद्या हाता चढे । सत्त्वाची वाढी मोडे निजसत्त्वेकरूनी ॥३७॥
ज्यावेळी प्रेमानें सत्त्वच वाढवून रज आणि तम ही पूर्णपणे झडून जातात, तेव्हां सद्विद्या हातीं लागते, आणि आत्मस्वरूपाचा बोध झाला म्हणजे सत्वाची झालेली वाढही मोडून जाते ३७.

सर्पु लागला होय ज्यासी । विष खादल्या उतार त्यासी ।
तें विष खातां येरे दिशीं । आत्मघातासी वाढवी ॥३८॥
सर्प ज्याला चावतो, त्याला विष खाल्लें असतां उतार पडतो. पण तेच विष जर भलत्याच दिवशी खाल्लें तर आत्मघाताला वाढवितें ३८.

तैसें रजतमलोपें सत्त्व वाढे । वाढलें सत्त्व बाधकत्वें कुडें ।
तेही बाधा मी तुज पुढें । अतिनिवाडें सांगेन ॥३९॥
त्याचप्रमाणें रजाचा आणि तमाचा लोप होऊन सत्त्व वाढतें, पण तेच वाढलेलें सत्त्व बाधकपणानें मोठे वाईट आहे. ती त्याची बाधा मी तुला पुढे अगदी स्पष्ट करून सांगेन ३९.

मी अलिप्त कर्मकार्या । मी ज्ञाता मी महासुखिया ।
ऐशा वाढवूनि अभिप्राया । गुणें गुणकार्या गोंविजे सत्त्वे ॥४०॥
सर्व कर्मापासून व कार्यापासून मी अगदी अलिप्त आहे. ज्ञाता तो मी, अत्यंत सुखी काय तो मी, अशा कल्पना वाढवून सत्वानेंच गुणानें गुणांच्या कार्यामध्यें गुंतवून टाकलें आहे ४०.

ऐसा वाढला जो सत्त्वगुण । त्यासी उपशमात्मक निजसत्त्वे जाण ।
समूळ करावें निर्दळण । तैं समाधान पाविजे ॥४१॥
असा जो सत्त्वगुण वाढतो, त्याचा आत्मतत्त्वानेंच उपशम केला पाहिजे. त्याचें जेव्हां समूळ निर्दाळण करावें, तेव्हांच समाधान प्राप्त होते ४१.

उद्धवा तूं ऐसें म्हणसी । समानता तिहीं गुणांसी ।
केवीं वाढी होईल सत्त्वासी । गुण गुणांसी राखण ॥४२॥
उद्धवा ! तूं म्हणशील कीं, तिन्ही गुण जर सारखेच आहेत, तर सत्त्वाचीच वाढ कशी होईल ? त्याचे उत्तर असें की, गुण हेच गुणांना राखणदार असतात ४२.

वाढल्या तमोगुण । नावडे तेव्हां ज्ञानध्यान ।
नावडे त्याग भोग चंदन । निद्रा दारुण कां कलहो ॥४३॥
तमोगुण वाढला असता त्याला ज्ञान-ध्यान आवडत नाही, त्याग आवडत नाही व चंदनादि सुखविलास आवडत नाहीत. झोप किंवा दांडगा कलह हीं आवडतात ४३.

वाढल्या रजोगुण । ऐकतां ज्ञाननिरूपण ।
त्याचें भोगासक्त मन । सदा ध्यान विषयांचे ॥४४॥
रजोगुण वाढला तर ज्ञानाचे निरूपण ऐकत असतांही त्याचे मन भोगाविषयीं आसक्त असते. त्याला सदासर्वदा विषयाचेच ध्यान लागलेले असतें ४४.

धनलोभ सुदल्या दिठी । पांपरा घेतल्या क्रोध नुठी ।
हे रजोगुणाची कोटी । लोभिष्ट पोटीं स्त्रीपुत्रां ॥४५॥
धनलोभ दृष्टीत भरला असतां मग कोणीं पायपोस काढला तरी त्याला राग येत नाही. ही रजोगुणाची जात आहे. तो रजोगुणी मनुष्य मनांत स्त्रीपुत्रांविषयी फार लोभी असतो ४५.

वाढलिया सत्त्वगुण । स्त्रियादिभोगीं उदासीन ।
सदा करी भगवच्चिंतन । कां करी कीर्तन हरीभक्ती ॥४६॥
सत्वगुण वाढला असतां स्त्रियादि भोगाविषयीं उदासीन होतो. तो निरंतर भगवच्चिंतन करितो, किंवा कीर्तन अथवा हरीची भक्ति करितो ४६.

क्रोधलोभमोहलक्षण । सत्त्वकाळीं नुठे जाण ।
परी एकला केवीं वाढे सत्त्वगुण । गुणांसी राखण गुण होती ॥४७॥
क्रोध, लोभ किंवा मोह ह्यांचें लक्षण सत्त्वाच्या कालांत उत्पन्न होत नाही. परंतु एकटाच सत्त्वगुण तरी वाढणार कसा ? कारण गुणांना गुणच रक्षण करीत असतात ४७.

मागें तम पुढें रज पूर्ण । मध्यें अडकला सत्त्वगुण ।
तो कैसेनि वाढेल जाण । अडकलेपण सुबद्ध ॥४८॥
सत्त्वगुणाच्या मागें तमोगुण असतो, पुढे परिपूर्ण रजोगुण भरलेला असतो, आणि त्या दोहोंमध्यें सत्त्वगुण अडकलेला असतो. तेव्हां तो कसा वाढेल ? तो तर पक्का अडकलेला असतो ! १८.

ऐसी आशंका धरूनि जाण । म्हणसी वाढेना सत्त्वगुण ।
तें सत्त्ववृद्धीचें लक्षण । ऐक संपूर्ण सांगेन ॥४९॥
अशी शंका मनांत आणून सत्त्वगुण वाढावयाचा नाहीं असें म्हणशील, तर त्याच सत्त्ववृद्धीचें संपूर्ण लक्षण सांगतों ऐक ४९.

सत्त्वाद् धर्मो भवेद् वृद्धात् पुंसो मद्‍भक्तिलक्षणः ।
सात्त्विकोपासया सत्त्वं ततो धर्मः प्रवर्तते ॥ २ ॥
[श्लोक २] माणसाचा सत्वगुण वाढला असता माझ्या भक्ति रूप धर्माची वाढ होते सात्त्विक पदार्थांचे सेवन केले असता सत्त्व गुण वाढतो आणि त्यामुळे धर्माकडे प्रवृत्ती होते. (२)
ये श्लोकींचें निरूपण । पहिलें उत्तरार्धव्याख्यान ।
तेथें सत्त्ववृद्धीचें कारण । सात्त्विक सेवन करावें ॥५०॥
या श्लोकांचे निरूपण करतांना प्रथम उत्तरार्धाचें व्याख्यान सांगतो. त्यांत सत्त्ववृद्धीचें कारण सात्त्विक वस्तूंचेच सेवन करणें हें सांगितलें आहे ५०.

सात्त्विक पदार्थ सेवितां । सत्त्वबुद्धि होय सर्वथा ।
सत्त्वविजयें वर्ततां । पवित्रता करावें जीवाची ॥५१॥
सात्त्विक पदार्थच सेवन केले असतां सर्वस्वीं सत्त्वाचीच वृद्धि होते, आणि सत्त्ववृद्धीनेंच वागले असतां जीवांचीही पवित्रता होते ५१.

सत्त्व‍उत्कर्षाचें लक्षण । धर्मनिष्ठा स्वधर्माचरण ।
तैसें तेथील वासनाबंधन । इहामुत्र जाण वांछीना ॥५२॥
सत्त्वाच्या उत्कर्षाचें लक्षण म्हणजे धर्मनिष्ठा व स्वधर्माचें आचरण हें होय. त्याचप्रमाणें तेथील वासनांचें बंधन तो इहलोकांत व परलोकांतही इच्छीत नाही हें लक्षात ठेव ५२.

झालिया शुद्ध अंतःकरण । तेव्हां निःसीम वाढे सत्त्वगुण ।
पुरुषासी मद्‍भक्तिलक्षण । धर्म जाण उपतिष्ठे ॥५३॥
अंतःकरण शुद्ध झालें असतां सत्त्वगुण अमर्याद वाढतो, आणि पुरुषाच्या ठिकाणी माझ्या भक्तीचें लक्षण जो धर्म, तो उत्पन्न होतो ५३.

सत्त्वें वाढल्या धर्मप्रवृत्ती । तैं गुरुभजनीं अतिप्रीती ।
कां सत्त्वविग्रही माझी मूर्ती । ते ठायीं भक्ती उल्हासे ॥५४॥
सत्त्वानें धर्माची प्रवृत्ति वाढली असतां गुरुभजनावर अत्यंत प्रेम जडतें, किंवा सत्त्वशील अशी माझी मूर्ति जेथें असते, त्या ठिकाणी भक्ति उल्हास पावते ५४.

कायिक वाचिक मानसिक । मदर्पण करी स्वाभाविक ।
मजवेगळा आणिक । भावार्थ देख स्फुरेना ॥५५॥
कायिक, वाचिक आणि मानसिक कर्म, तो साहजिक मलाच अर्पण करतो, माझ्याशिवाय इतरांची भक्ति त्याच्या ठिकाणी उत्पनच होत नाही ५५.

गुरु भगवंत अभिन्न । हें ते काळीं प्रकटे चिन्ह ।
ते अतिसत्त्वाची वोळखण । हे धर्म पूर्ण सात्त्विक ॥५६॥
गुरु आणि भगवंत हे भिन्न नव्हेत, असें लक्षण त्या वेळी स्पष्ट दिसं लागतें. तेंच अत्यंत थोर सत्त्वाचें लक्षण होय. हे धर्म पूर्ण सात्त्विकच होत ५६.

धर्मो रजस्तमो हन्यात् सत्त्ववृद्धिरनुत्तमः ।
आशु नश्यति तन्मूलो ह्यधर्म उभये हते ॥ ३ ॥
[श्लोक ३] सत्त्वगुणाची वाढ हाच श्रेष्ठ धर्म होय कारण तो रज आणि तम यांचा नाश करतो रज आणि तम नष्ट झाले असता त्यांच्यामुळे उत्पन्न होणारा अधर्मसुद्धा ताबडतोप नष्ट होतो. (३)
ऐसा वाढलिया सात्त्विक धर्म । तैं सत्त्ववृद्धि सर्वोत्तम ।
जे सत्त्वीं प्रकटे पुरुषोत्तम । विश्रामधाम मुमुक्षां ॥५७॥
असे सात्त्विक धर्म वाढले असतां, ज्या सत्त्वामध्येंच मुमुक्षूंचें विश्रांतिस्थान असा पुरुषोत्तम प्रगट होतो, त्या सर्वोत्तम सत्त्वाची वृद्धि होते ५७.

एवं सत्त्ववृत्तीं वाढला धर्म । तो तत्काळ नाशी अधर्म ।
अधर्माचें मूळ रजतम । त्यांचें रूपनाम उरों नेदी ॥५८॥
अशा प्रकारे सत्त्ववृत्तींत जो धर्म वाढतो, तोच अधर्माचा तत्काळ नाश करतो. कारण अधर्माचें मूळ रजोगुण आणि तमोगुण हे असतात. त्यांचे तो रूपनामसुद्धा उरूं देत नाहीं ५८.

सात्त्विकसेवने सत्त्ववृद्धी । तेणें सद्विद्येची उपलब्धी ।
हे उपायाची विधानविधी । कृष्ण कृपानिधी बोलिला ॥५९॥
सात्त्विक पदार्थाच्या सेवनानें सत्त्वाची वृद्धी होते. त्या सत्त्ववृद्धीमुळें सद्विद्या प्राप्त होते. कृपानिधि श्रीकृष्णानें हे सद्विद्याप्राप्तीच्या उपायाचें साधन सांगितलें ५९.

करावें सात्त्विकसेवन । ते सात्त्विक पदार्थ कोण कोण ।
ऐक त्यांचेंही निरूपण । दशलक्षण सांगेन ॥६०॥
आतां सात्त्विक पदार्थाचे सेवन करावे असें जें सांगितले, ते सात्त्विक पदार्थ कोणकोणते ? त्यांचेही दहा लक्षणांनीं निरूपण सांगतों ऐक ६०.

आगमोऽपः प्रजा देशः कालः कर्म च जन्म च ।
ध्यानं मन्त्रोऽथ संस्कारो दशैते गुणहेतवः ॥ ४ ॥
[श्लोक ४] शास्त्र, पाणी, प्रजा, देश, काळ, कर्म, जन्म, ध्यान, मंत्र आणि संस्कार ही दहा गुणांच्या वाढीची कारणे आहेत. (४)
गुणवृद्धीचें कारण । आगम म्हणिजे शास्त्र जाण ।
आप म्हणिजे तें जीवन । आवडतें स्थान तो देशू ॥६१॥
गुणवृद्धीचे कारण आगम म्हणजे शास्त्र, हे लक्षात ठेव. आप म्हणजे पाणी, आणि आवडतें स्थान तो देश होय ६१.

ऐक प्रजांचें विंदान । प्रजा म्हणिजे त्रिविध जन ।
जैसी ज्याची संगती जाण । तैसें लक्षण तो पावे ॥६२॥
आता प्रजांचे लक्षण ऐक. प्रजा म्हणजे तीन प्रकारचे लोक. जशी ज्याची संगति, तसे लक्षण त्याला प्राप्त होते ६२.

काळ म्हणिजे दिवसभाग । कर्म म्हणिजे जें जें करी अंग ।
जन्म म्हणिजे दीक्षा सांग । मंत्राचें लिंग यथारुचि ॥६३॥
काळ म्हणजे दिवसाचे विभाग, कर्म म्हणजे शरीर जी जी क्रिया करतें तें. जन्म म्हणजे चांगल्या प्रकारची दीक्षा. [ दीक्षेप्रमाणे इष्टदेवतेचे ध्यान ]. मंत्राचे लक्षण आपल्या आवडीप्रमाणे ६३.

कर्त्याचा जेथ अत्यादरू । त्या नांव बोलिजे संस्कारू ।
हा दशलक्षणप्रकारू । गुणवृद्धिविचारू तो ऐक ॥६४॥
कर्त्याचा ज्यांत अत्यंत आदर दिसतो, त्याला संस्कार म्हणतात. हा दहा लक्षणांचा प्रकार आहे. आतां जो गुणवृद्धीचा विचार, तो ऐक ६४.

येथ सत्त्ववृद्धीसी प्रस्तुत । साधकांसी शास्त्र निवृत्त ।
उपनिषद्‍भागेंसीं वेदांत । त्याचा मथितार्थ सेवावा ॥६५॥
प्रस्तुत येथें सत्त्ववृद्धीला साधकांना निवृत्तिशास्त्र (वेदांतशास्त्र) हें मुख्य आहे. उपनिषद्‌भागांसह जो वेदान्त, त्याचा मथितार्थ ग्रहण करावा ६५.

आप म्हणिजे जळपवित्रता । गौतमीभागीरथ्यादि पुण्यसरिता ।
ज्यांचा अवचटें शिंतोडा लागतां । पाप सर्वथा उरेना ॥६६॥
आप म्हणजे जलाची पवित्रता. गोदावरी, भागीरथी आदिकरून पवित्र नद्या-ज्यांचा अकस्मात एक शिंतोडा अंगावर उडाला तरी पाप मुळींच शिल्लक उरत नाहीं ६६;

कां माझ्या प्रतिमांचें चरणामृत । ज्यालागीं ब्रह्मादिक आर्तभूत ।
किंवा शालिग्रामशिळेचें तीर्थ । सकळ दुरित निवारी ॥६७॥
किंवा ज्याकरिता ब्रह्मादिक देवसुद्धा लाळ घोंटीत असतात असे माझ्या प्रतिमेचें चरणामृत; किंवा शाळिग्राम शिळेचें तीर्थ हेंही सर्व पातकांचा नाश करतें ६७.

जेणें सकळ तीर्थें होती पावन । तें ब्राह्मणाचें चरणतीर्थ जाण ।
स्वयें वंदी श्रीनारायण । निजहृदयीं चरण वाहतसे ॥६८॥
ज्यानें सर्व तीर्थें पावन होतात, तें ब्राह्मणांचे चरणतीर्थ श्रीनारायण स्वतः शिरसावंद्य करतो आणि ब्राह्मणाचे पाय आपल्या वक्षःस्थळावर धारण करतो ६८.

भलतैसें हो कां पाणी । जें लागलें सद्‍गुरुचरणीं ।
तें सकळ तीर्थां शिरोमणी । सेवितां तत्क्षणीं उद्धरी ॥६९॥
पाणी कसलेही का असेना ? जे पाणी सद्गुरूच्या चरणाला लागलेले असेल तें सकळ तीर्थापेक्षांही श्रेष्ठ होय. तें सेवन केलें असतां तत्काळ उद्धार करितें ६९.

सत्त्ववृद्धीचें कारण आप । तें इये तीर्थीं जाण पुण्यरूप ।
सेविता सत्त्ववृद्धीचे स्वरूप । आपेआप प्रकाशे ॥७०॥
सत्त्ववृद्धीचें कारण उदक आहे. तें ह्या तीर्थानें पुण्यपावन होतें आणि तें सेवन केलें असतां सत्त्ववृद्धीचें स्वरूप आपोआप प्रकट होतें ७०.

प्रजा म्हणिजे महाजन । सेवावे साधु सज्जन ।
ज्यांचे संगतीस्तव जाण । उद्धरण जडजीवां ॥७१॥
प्रजा म्हणजे श्रेष्ठ लोक. साधु व वैराग्यशील पुरुषांची सेवा करावी. कारण त्यांच्या संगतीनें जड जीवांचा उद्धार होतो ७१.

सत्त्ववृद्धीसी कारण । मुख्यत्वें सत्संगतीचि जाण ।
त्या सत्संगाचें महिमान । केलें निरूपण द्वादशीं ॥७२॥
सत्त्ववृद्धीला कारण मुख्यत्वेंकरून सत्संगतीच आहे असे समज. त्या सत्संगतीचे महत्त्व बाराव्या अध्यायांत वर्णन केलें आहे ७२.

देशू पूण्यभूमिका सिद्धिस्थळ । विजनवासू एकांतशीळ ।
जेथ बैसतांचि तत्काळ । सत्त्वासी बळ चढोवढीं ॥७३॥
आतां देश म्हणजे नैमिषारण्यादि पुण्यभूमि किंवा सत्पुरुषांनी सिद्धि प्राप्त करून घेण्याकरितां स्थापन केलेलें सिद्धिस्थान. तें स्थान निर्जन, एकान्त, आणि जेथें बसलें असतां तत्काळ सत्त्वाला अधिकाधिक बळ प्राप्त होतें असें असावें ७३.

एकांतीं स्थिरावल्या आसन । सहजें वाढे सत्त्वगुण ।
मनीं हव्यासू चढता जाण । वस्तु चिद्‍घन साधावया ॥७४॥
एकांतांत आसन घालण्याचा अभ्यास पूर्ण झाला आणि चिद्धन असें परब्रह्म प्राप्त करून घेण्यासाठी अत्यंत आवड उत्पन्न झाली, की सत्त्वगुण आपोआप वाढतो ७४.

साधकांसी काळ यथोचित । अवश्य ब्राह्ममुहूर्त ।
कां जे काळीं उद्वेगरहित । हर्षयुक्त मन होय ॥७५॥
त्याचप्रमाणे साधकांना योग्य काळ म्हटला म्हणजे ब्राह्म मुहूर्त (रात्रीच्या चवदाव्या मुहूर्ताचा वेळ)-पहाट. हाच काळ पूर्णपणे योग्य व अवश्य आहे. किंवा ज्या वेळी मन उद्वेगरहित असून हर्षयुक्त असेल तोही काळ योग्य होय ७५.

प्रेमयुक्त अंतःकरणें । जो काळ जाय कथाश्रवणें ।
कां जयंत्यादि महापूजा करणें । जागरणें हरिदिनीं ॥७६॥
प्रेमपूर्ण अंत:करणानें कीर्तन श्रवण करण्यामध्यें जो काळ जातो; किंवा जयंत्यादि महापूजा करणे, एकादशीला जागरण करणे ह्यांत जो काळ जातो ७६;

थोर काळाची सार्थकता । हरिकीर्तनीं गातां नाचतां ।
त्या काळाचा महिमा तत्त्वतां । माझेन सर्वथा न बोलवे ॥७७॥
तीच काळाची उत्कृष्ट सार्थकता होय. हरिकीर्तनांत गातांना आणि नाचतांना जो काल जातो, त्या काळाचा महिमा खरोखर मला पूर्णपणे सांगतांसुद्धा येणार नाहीं ७७.

निरभिमान कीर्तन करणें । निर्लोभ गाणें नाचणें ।
तो काळू वंदिजे म्यां श्रीकृष्णें । महिमा कोणें बोलावा ॥७८॥
निरभिमानपणानें कीर्तन करणें, निर्लोभानें गाणें व नाचणें, ह्यांत जो काळ जातो त्या काळाला मी प्रत्यक्ष श्रीकुष्णसुद्धा शिरसावंद्य करतो. त्याचें माहाम्य कोणीं वर्णन करावें ? ७८.

कर्म म्हणिजे तें निवृत्त । जें आशापाशफळरहित ।
कां क्रिया जे उपकारार्थ । सात्त्विक निश्चित तें कर्म ॥७९॥
जे आशापाशाच्या फळाविरहित किंवा निष्काम कर्म असेल, त्यालाच कर्म असें म्हणावें. किंवा उपकारासाठीच जी क्रिया करावयाची, तेंच खरोखर सात्त्विक कर्म होय ७९.

गुरूपासोनि दीक्षाग्रहण । तें पुरुषासी नवें जन्म जाण ।
गुरु मायबाप संपूर्ण । तें ऐक लक्षण उद्धवा ॥८०॥
गुरूपासून दीक्षा ग्रहण करणे तो पुरुषाचा एक नवा जन्मच होय, हें लक्षांत ठेव. उद्धवा ! गुरु हाच सर्वस्वी मायबाप आहे. त्याचेंही लक्षण ऐक ८०.

उपजलिया बाळकासी तत्त्वतां । पंचविध जाण पिता ।
जनिता आणि उपनेता । तिजा प्रतिपाळिता अन्नदानें ॥८१॥
खरोखर जन्मलेल्या बालकालासुद्धा पांच प्रकारचे बाप असतात. एक जन्म देणारा, दुसरा उपनयन करणारा, आणि तिसरा अन्न घालून सांभाळ करणारा ८१.

जो भयापासूनि सोडविता । जे बंधविमोचन करविता ।
जो देहाचें मरण चुकविता । तोही पिता शास्त्रार्थें ॥८२॥
जो भयापासून सोडविणारा, जो बंधापासून मुक्त करणारा, आणि जो देहाचें मरण चुकविणारा, तोही शास्त्राप्रमाणे पिताच होतो ८२.

यांवेगळा पांचवा पिता । जो झाडणी करी पंचभूतां ।
मृत्यूपासून सोडविता । जो गर्भव्यथा निवारी ॥८३॥
ह्याशिवाय एक पांचवा पिता आहे. तो पंचमहाभूतांचा निरास करतो, तो मृत्यूपासून सोडविणारा असतो व गर्भवासाचें दुःख निवारण करतो ८३.

ज्याचे देखिलिया चरण । बाधूं न शके भवबंधन ।
तो सद्‍गुरु पिता जाण । भाग्येंवीण न पाविजे ॥८४॥
ज्याचें चरण दृष्टीस पडलें असतां संसारबंधन पीडा देऊं शकत नाहीं, तो सद्गुरु म्हणजे पिता होय. तो भाग्याशिवाय मिळत नाहीं ८४.

उपजल्या बाळकासी सर्वथा । वेगळालीं माता पिता ।
एक वीर्यातें निक्षेपिता । धारणपोषणता जननीची ॥८५॥
जन्मलेल्या मुलाला जिकडे तिकडे आई आणि बाप हीं वेगवेगळीं असतात. बाप वीर्य घालणारा असतो, आणि त्या वीर्याचें धारण व त्यापासून होणाऱ्या गर्भाचें पोषण करण्याचें कार्य आईचें असतें ८५.

तैसा सद्‍गुरु नव्हे पिता । निजवीर्य न वेंचितां ।
योनिद्वारें नुपजवितां । जननी जनिता स्वयें झाला ॥८६॥
सद्गुरु हा कांही तसा पिता नाही. तो आपलें वीर्य न खर्च करतां व योनीच्या द्वारानें जन्म न देतांच स्वतः आई आणि बाप होतो ८६.

उदराबाहेरी घातल्यापाठीं । माता पुत्रस्नेहें कळवळा उठी ।
बाहेरिलें सूनि आपुले पोटीं । निजस्नेहें गोमटी गुरुमाता ॥८७॥
उदरांतून बाहेर आल्यानंतर आईला पुत्रस्नेंहानें कळवळा उत्पन्न होतो. पण बाहेर असेल तें पोटांत घालून गुरुमाता ही खऱ्या कळवळ्यानें थोरपणा पावली आहे ८७.

यालागीं शिष्यासी तत्त्वतां । सद्‍गुरुचि माता पिता ।
निजस्नेहें वाढविता । तदात्मता अभेदें ॥८८॥
म्हणून शिष्याला खरोखर सद्गुरुच माता-पिता होय. तोच आपल्या ममतेनें त्याला वाढविणारा असतो, आणि अभिन्नभावनेंच्या योगानें गुरुशिष्यांचें तादात्म्य होतें ८८.

मागील पिते जे चौघेजण । ते याचे सावत्र बाप जाण ।
माता पिता भिन्न भिन्न । सखेपण त्यां कैंचें ॥८९॥
पूर्वी जें चार पिते सांगितले, ते ह्याचे सावत्र बाप होत असें समज, माता आणि पिता ही दोघेंही भिन्नभिन्न असल्यामुळें त्यांना सख्खेपण तें कशाचें ? ८९.

यालागीं सद्‍गुरु जो सकृपू । तो सच्छिष्यासी सखा बापू ।
पित्यापुत्रांमाजीं अल्पू । कांहीं विकल्पू उपजेना ॥९०॥
म्हणून दयाळू सद्गुरु असेल तोच सच्छिष्याचा सख्खा बाप होय. त्यामुळेच त्या पितापुत्रांमध्यें थोडा देखील विकल्प उत्पन्न होत नाही ९०.

त्या सद्‍गुरूपासून जाण । शैवीवैष्णवीदीक्षाग्रहण ।
अथवा उपदेशी निर्गुण । चैतन्यघन निजबोधें ॥९१॥
त्या सद्गुरुपासून शैवी किंवा वैष्णवी दीक्षा प्राप्त होते; अथवा तो गुरु आत्मज्ञानानें चैतन्यधन अशा निर्गुणाचा उपदेश देतो ९१.

ऐक दीक्षानामाची युक्ती । दे चारी पुरुषार्थ चारी मुक्ती ।
निःशेष अविद्येची नाशी स्थिती । दीक्षाव्युत्पत्ती त्या नांव ॥९२॥
आतां दीक्षा हा नांवाचें लक्षण ऐक. जी चारही पुरुषार्थ व चारही मुक्ति देते, आणि अविद्येची स्थिति पूर्णपणे लयास नेंते, तिचेंच नांव खरोखर दीक्षा होय ९२.

एवं दीक्षाजन्माची जे कथा । उद्धवा सांगीतली म्यां तत्त्वतां ।
ध्याननिष्ठ जे सात्त्विकता । ऐक आतां सांगेन ॥९३॥
अशा प्रकारे हे उद्धवा ! दीक्षारूप जन्माची जी कथा, ती मीं तुला यथातथ्य सांगितली. आता ध्याननिष्ठ म्हणून जी सात्विकता असतें, ती सांगतो ऐक ९३.

सत्त्वोपाधि शरीर साचें । चैतन्यघन स्वरूप ज्याचें ।
तो श्रीविष्णु ध्येय सात्त्विकांचे । ध्यान त्याचें करावें ॥९४॥
खरोखर ज्याचे शरीर सत्त्वोपाधिक आणि ज्याचें स्वरूप केवळ ज्ञानमय असतें, तो श्रीविष्णु हेंच सात्त्विकांचें ध्येय होय. त्याचें ध्यान करावें ९४.

अथवा धवळधाम गोक्षीर । कर्पूरगौर पंचवक्त्र ।
ध्यानीं आणावा शंकर । संसारपार तरावया ॥९५॥
अथवा गाईच्या दुधासारखा शुभ्र किंवा कापुरासारखा गौर वर्ण ज्याचा आहे, तो पंचमुखी श्रीशंकर, संसारांतून तरून पलीकडे जाण्यासाठी ध्यानात आणावा ९५.

या मूर्तींचें ध्यान करितां । हारपे ध्येय ध्यान ध्याता ।
ठसावे चैतन्यघनता । सात्त्विकता हें ध्यान ॥९६॥
ह्या मूर्तीचें ध्यान करूं लागले असतां ध्येय, ध्यान आणि ध्याता हें सर्वच नाहींसें होतें, आणि अंत:करणामध्यें ज्ञानस्वरूप ठसून राहतें. सात्विकतेचे ध्यान हेंच होय ९६.

जैसी दीक्षा तैसें ध्यान । हें आगमशास्त्रींचे प्रमाण ।
त्या ध्यानाचें पर्यवसान । चैतन्यघन पावावें ॥९७॥
जशी दीक्षा तसेंच ध्यान, हाच आगमशास्त्रांतील सिद्धांत आहे. आणि ज्ञानस्वरूपाला पोचणें हेंच त्या ध्यानाचें पर्यवसान आहे ९७.

केवळ जें चैतन्यघन । तें सद्‍गुरुस्वरूप जाण ।
त्याचें करावें नित्य ध्यान । अनुसंधान निजनिष्ठा ॥९८॥
केवळ ज्ञानाचें जें भांडार तेंच सद्गुरूचें स्वरूप होय. त्याचेंच निरंतर आत्मनिष्ठेनें अनुसंधान ठेवून ध्यान करावें ९८.

पंचभूतदेहाची मूस । तेथ वोतिला ब्रह्मरस ।
गुरुस्वरूप तें सविलास । ध्यान रात्रंदिवस करावें त्याचें ॥९९॥
पंचभूतात्मक देहाची मूस करून त्यांत ब्रह्मरूपी रस ओतला की शोभिवंत गुरुस्वरूप तयार होते. ह्याकरितां त्याचेंच रात्रंदिवस ध्यान करावें ९९.

सात्त्विकांचें जें कां ध्यान । तें हें तूं उद्धवा जाण ।
आतां मंत्रांचें मंत्रग्रहण । तेंही निरूपण अवधारीं ॥१००॥
उद्धवा ! सात्त्विकांचें जें ध्यान आहे तें हें आहे, हें लक्षांत ठेव. आता मंत्राचे ग्रहण कसें असतें तेंही निरूपण ऐक १००.

सकळ मंत्रांची जननी । जे द्विजन्मा करी तत्क्षणीं ।
गायत्रीच्या मंत्रग्रहणीं । ब्राह्मणपणीं अधिकारू ॥१॥
जी सर्व मंत्रांची माता, जी तत्काल ब्राह्मणाला द्विजपणा देतें, त्या गायत्रीच्या मंत्राचें ग्रहण केलें असतां ब्राह्मणांना ब्राह्मणपणाचा अधिकार प्राप्त होतो १.

जे सकळ मंत्रांचा राजा । जे वांट्या आली असे द्विजा ।
जिचेनि धाकें द्विजपूजा । मज अधोक्षजा करणें पडे ॥२॥
जी सर्व मंत्रांचा राजा आहे, जी ब्राह्मणांच्या वाट्यास आली आहे, जिच्या धाकानें मला श्रीकृष्णालाही ब्राह्मणांची पूजा करणे भाग पडतें २.

ते गायत्री स्वभावतां । आली असे ब्राह्मणांच्या हाता ।
तिची उपेक्षा करितां । लौल्यें दरिद्रता पावले ॥३॥
ती गायत्री ब्राह्मणांच्या हाती सहज आली आहे. तिची लोभिष्टपणानें उपेक्षा करून ब्राह्मण दरिद्रदशा पावले आहेत ३.

गायत्रीनिष्ठ जो ब्राह्मण । त्याचे मस्तकीं मी वंदीं चरण ।
मंत्रीं गायत्री श्रेष्ठ जाण । वेद प्रमाण ये अर्थीं ॥४॥
गायत्रीवर निष्ठा ठेवणारा जो ब्राह्मण असतो, त्याचे चरण मी शिरसावंद्य करतो. मंत्रांमध्यें गायत्रीमंत्र श्रेष्ठ आहे अशाबद्दल वेद प्रमाण आहेत ५.

गायत्री रिघाल्यावीण कांहीं । इतर मंत्रां रिघमू नाहीं ।
मुख्यत्वें गायत्रीच्या ठायीं । ते लागले पाहीं सकळ मंत्र ॥५॥
गायत्री मंत्राचा प्रवेश झाल्यावांचून इतर मंत्रांना वेदांत प्रवेश करण्यास मुळीं वावच नव्हता. मुख्यतः गायत्री मंत्राच्या ठिकाणी ते सर्व मंत्र वसती करून राहिले आहेत ५.

नव्हतां गायत्रीसंबंध । मुखीं रिघों न शके वेद ।
इतर मंत्रां केवीं संवाद । वेदां वंद्य गायत्री ॥६॥
गायत्री मंत्राचा संबंध नसेल तर ब्राह्मणांच्या मुखांत वेद शिरूंच शकणार नाहीत. मग इतर मंत्रांची गोष्ट काय सांगावी ? तात्पर्य, वेदांना गायत्री वंद्य आहे ६.

गायत्रीचें गुह्य परम । चिन्मात्रैक परब्रह्म ।
तो मंत्र ब्राह्मणासीच सुगम । परी तेही वर्म चुकले ॥७॥
गायत्री मंत्रांतील अत्यंत गुह्य म्हणजे एक ज्ञानस्वरूप परब्रह्मच होय. तो मंत्र ब्राह्मणांनाच सुलभ आहे. पण तेसुद्धा त्यांतील वर्म चुकले ७.

एवं गायत्रीमंत्र ब्रह्मपूर्ण । सकळ सिद्धींचें कारण ।
शैववैष्णवमंत्रग्रहण । तेणें त्वरित जाण सत्त्वशुद्धी ॥८॥
अशा प्रकारें गायत्री मंत्र हा पूर्ण ब्रह्मस्वरूप आहे व सर्व सिद्धींना उत्पन्न करणारा आहे. शैव किंवा वैष्णव मंत्रांचे ग्रहण केले, तरीसुद्धा गायत्रीमंत्रानेंच तत्काल सत्त्वशुद्धि होते ८.

सत्त्वशुद्धीचे परिपाटीं । शैववैष्णवमंत्रकोटी ।
तेणें सत्त्वशुद्धी उठाउठीं । होय निजात्मदृष्टी साधकां ॥९॥
सत्त्वाची शुद्धि झाल्यावर त्याच्यामागून कोट्यवधि शैवमंत्र किंवा वैष्णवमंत्र प्राप्त होतात, आणि त्या सत्त्वशुद्धीनेंच साधकांना तत्काळ आत्मदृष्टि प्राप्त होते ९.

मंत्रग्रहणविचार । उद्धवा जाण हा साचार ।
आतां बोलिला जो संस्कार । तोही प्रकार परियेसीं ॥११०॥
उद्धवा ! मंत्रग्रहण करण्याचा हा खरा विचार आहे हें तूं लक्षांत ठेव. आतां संस्कार असें ज्याला म्हणतात तो प्रकार ऐक ११०.

मनाचे संकल्पविकल्प । तोडावया अतिसाक्षेप ।
येचि अर्थींचा खटाटोप । महासाटोप जो मांडीं ॥११॥
मनाचे संकल्प व विकल्प तोडावयाच्या उत्कट इच्छेनें त्याचविषयींचा प्रयत्न जो मोठ्या नेंटानें सुरू करतो ११.

संकल्पु उठूंचि न लाहे । जेथें उठी तेथें ठेंचित जाये ।
विवेकाचेनि बळें पाहे । मोकळु होये मनाचा ॥१२॥
त्याला आधी संकल्प उत्पन्नच होत नाही. आणि कदाचित् उत्पन्न झालाच तर तो त्याला जेथल्या तेथेच ठेचून टाकीत असतो. तो निरंतर विचारदृष्टीनेंच पाहात असतो, म्हणून तो मनानेंही मोकळा असतो १२.

परमात्मनिष्ठापरवडी । अखंड मनाची मोडी पाडी ।
उसंत घेवों नेदी अर्धघडी । स्मरणनिरवडी मन राखे ॥१३॥
परमात्मनिष्ठेच्या भरांत तो निरंतर मनाला मोडूनच काढतो, त्याच्याशिवाय मनाला अर्धघटकाही मोकळे राहूं देत नाही. स्मरणाच्या कौशल्यांतच मन गुंतवून ठेवतो १३.

वैराग्यबळें दमी मन । तेणें भेणें करी हरिचिंतन ।
दासी नुल्लंघी स्वामीचें वचन । तैसें स्मरणाधीन मन करी ॥१४॥
तो वैराग्याच्या बळानें मनाचें दमन करतो, आणि त्याच्या भयानेंच हरीचें चिंतन करीत राहतो. धन्याचा शब्द जसा दासी उल्लंघन करीत नाही, त्याप्रमाणे तो आपलें मनही ईश्वरनामस्मरणाधीन करून ठेवतो १४.

इंद्रियें पाहती नाना पदार्थां । मन न पाहे आणिका अर्था ।
जागृतीं स्वप्नीं स्वभावतां । अखंडतां हरि स्मरे ॥१५॥
इंद्रियें अनेंक प्रकारच्या पदार्थांना पाहात असतात, परंतु मन हे दुसऱ्या कोणत्याच विषयाला पाहात नाही. तें जागृतीमध्यें व स्वप्नामध्येंसुद्धा स्वभावतःच अखंड हरीचें स्मरण करीत असतें १५.

ऐशा संस्कारें संस्कारिलें मन । निमिषोन्मेषीं हरिचिंतन ।
श्वासोच्छ्वासांचे गमनागमन । सोहंध्यान त्या ठायीं ॥१६॥
अशा संस्कारानें मन संस्कृत झाले म्हणजे ते निमिषानिमिषाला हरीचेंच चिंतन करीत राहातें. श्वासोच्छासांचें जाणेंयेणें होत असतें त्यांतसुद्धा ‘परब्रह्म तें मीच’ हें ध्यान असते १६.

स्वाभाविक स्मरणादरु । या नांव आत्मसंस्कारु ।
हा सत्त्ववृद्धीचा प्रकारु । शारङ्गधरु बोलिला ॥१७॥
साहजिकच भगवंताच्या नामस्मरणाचा आदर असणें, ह्यालाच आत्मसंस्कार असें म्हणतात. हाच सत्ववृद्धीचा प्रकार श्रीकृष्णानें सांगितला १७.

आत्मशुद्धीचें महाकारण । बोलिलों तें हें दशलक्षण ।
साधकीं सेवावया जाण । विशद निरूपण म्यां केलें ॥१८॥
आत्मशुद्धीचें जें मुख्य कारण, तेंच हें दहा लक्षणांनी तुला सांगितले. साधकांनीही त्याचे सेवन करावे म्हणून मीही त्याचें अधिक स्पष्टीकरण केलें १८.

जेणें खवळला वाढे तमोगुण । तें तमोवृद्धीचें दशलक्षण ।
केवळ त्यागावया जाण । तेंही निरूपण सांगेन ॥१९॥
आता जेणेंकरून तमोगुण खवळून वाढतो, त्या तमोवृद्धीचीही दहा लक्षणे आहेत. त्यांचा निखालस त्याग करावा म्हणून तेंही निरूपण सांगतों १९.

तेथींचा आगम आभिचारिक । वेदविरुद्ध मार्ग देख ।
वारुणी माध्वी मद्योदक । आवश्यक सेविती ॥१२०॥
त्यांतील शास्त्र आभिचारिद्ध असतें. तो मार्ग वेदविरुद्ध होय. त्यांत दारू, मद्य, ताडी ही हटकून ग्रहण करतात १२०.

जे उभयभ्रष्ट पाखंडी । वेषधारी वृथा मुंडी ।
त्याचें संगतीची अतिगोडी । जेथ अपरवडी विधिवेदां ॥२१॥
जे इहलोक व परलोक ह्यांपासून भ्रष्ट झालेले, पाखांडी, नाना प्रकारची सोंगें घेणारे व मस्तकाचें मुंडण केलेले असतात, त्यांच्या संगतीची मोठी आवड असते; आणि ज्यांत वेदविधींना विरोधी प्रकार असतात २१.

द्वेष चोहटा कां परद्वार । तेथेंचि बैसका निरंतर ।
काळ तों त्यासी मध्यरात्र । तैं व्यापार कर्माचा ॥२२॥
द्वेष, जुवा किंवा परदारा, ही दुर्व्यसनें असतील तेथेंच कायमची बैठक असते, आणि त्याला वेळ तर ऐन मध्यरात्रीची ! त्या वेळीं त्या कर्माचा विधि चालावयाचा ! २२.

क्रियारंभु जारणमारण । मोहन स्तंभन उच्चाटण ।
कां करावें वशीकरण । हें कर्म जाण तामस ॥२३॥
त्या कर्माचा आरंभ म्हणजे जारण, मारण, मोहन, स्तंभन, उच्चाटन, किंवा वशीकरण करावें. हे सर्व कर्म तामस होय असें समज २३.

जन्म म्हणिजे दीक्षाग्रहण । प्रेतभूतपिशाचविद्या जाण ।
करितां प्रेतभूतआराधन । प्रेतजन्म जाण तामसां ॥२४॥
जन्म म्हणजे दीक्षाग्रहण होय. म्हणून प्रेतभूतपिशाचविद्येनें प्रेतभूतांचें आराधन केलें म्हणजे तामसांनाही प्रेताचाच जन्म प्राप्त होतो २४.

जेथ तमोगुण प्रधान । तो क्रोधयुक्त पुरुष जाण ।
सदा शत्रूचें करी ध्यान । करावया हनन उद्यतू ॥२५॥
ज्याच्या अंगीं तमोगुण प्रामुख्यानें असतो, तो पुरुष क्रोधयुक्त होऊन निरंतर शत्रूचाच ध्यास घेतो व त्याचा घात करावयालाच उद्युक्त असतो २५.

तामसी मंत्र मुकी मैळी । अथवा उच्छिष्टचांडाळी ।
कां प्रेतदेवता कंकाळी । मंत्रशैली हे तेथें ॥२६॥
त्याचे मंत्र तामसी असतात, आणि देवता पाहिल्या तर मुकी, मैळी (घाणेरडी), उष्टी चांडाळीण किंवा प्रेताची देवता कंकाळी म्हणून असते ती. आणि त्यांची मंत्रयोजनाही अशीच ! २६.

संस्कार दगड माती । माझें घर हे माझी क्षिती ।
स्वप्नीं निजेला घाली भिंती । एवढी आसक्ती गृहाची ॥२७॥
दगडमातीचा संस्कार करून बांधलेलें घर माझें, ही जमीन माझी, हाच निरंतर ध्यास. निजल्यावर स्वप्नांतसुद्धा भिंती घालीत असतो, एवढी घराची आसक्ति ! २७.

घर करावया अशक्त । तरी त्या खिंडोराआंत ।
सदा दगडमाती राखत । नांदतें तेथ येवों नेदी ॥२८॥
घर बांधण्याचेंसुद्धा सामर्थ्य नसलें, तरी त्या बखळीच्या आंत नेहमीं दगडमाती राखीत असतो. चिटपांखरूंसुद्धा तेथे राहावयाला येऊं देत नाही २८.

देहालागीं गेह करणें घडे । तें देह कष्टवी अतिदुर्वाडें ।
तामससंस्कारें रोकडें । केवळ वेडें गृहासक्तीं ॥२९॥
ज्या देहासाठी घर बांधावें लागतें, त्या देहालाही तो दुःसह कष्ट देत असतो. तामस संस्काराच्या योगानें घराच्या आसक्तीनें तो केवळ वेडाच बनलेला असतो २९.

गृहासक्तीचा व्यापारू । जो मरणान्त न सोडी नरू ।
तो जाण तामस संस्कारू । त्याचा संसारू तो माती ॥१३०॥
गृहाच्या लोभाची खटपट जो पुरुष मरेपर्यंत सोडीत नाही, तोच त्याचा तामस संस्कार होय. आणि त्याचा संसार म्हणजे माती १३०.

जेणें थोरावे तमोगुण । तें हें जाण दशलक्षण ।
ऐक राजसाचें चिन्ह । त्याचें भिन्न स्वरूप ॥३१॥
ज्याच्या योगानें तमोगुण बळावतो, त्यांची ही दहा लक्षणे आहेत. आतां राजसाचें स्वरूप ऐक. त्याचें स्वरूप याच्याहून निराळें असतें ३१.

करावें सत्त्वाच्या अंगीकारा । त्यागावा तमोगुण दुसरा ।
पुढें चाविरा मागें लातिरा । ऐक तिसरा रजोगुण ॥३२॥
सत्त्वगुणाचा स्वीकार करावा, आणि दुसरा जो तमोगुण त्याचा त्याग करावा. आतां पुढून चावरा आणि मागून लाथा मारणारा असा तिसरा रजोगुण ऐक ३२.

हो कां शाहाणी सिंदळी नारी । ते पुरुषाचें मन बरें धरी ।
मग ठकोनि जाय व्यभिचारीं । तैसी परी रजोगुणा ॥३३॥
हें पहा, शहाणी आणि शिंदळ स्त्री असते, ती आपल्या पतीचें मन प्रसन्न ठेविते, आणि मग त्याला फसवून व्यभिचाराकरितां बाहेर जाते. त्याप्रमाणेंच हा रजोगुण आहे ३३.

जैसें कां कुचर घोडें । बरें दिसें परी आडवीं अडे ।
कांहीं केल्या न चले पुढें । मागिलीकडे सरों लागे ॥३४॥
ज्याप्रमाणें एखादें अडेल तट्टूं दिसण्यांत मोठे छान दिसते, पण रस्त्यामध्यें अडते आणि आडवाटेंत शिरतें ; आणि मग काहीं केलें तरी पुढें पाऊल म्हणून टाकीतच नाही, मागें मागेंच सरूं लागतें ३४;

तैसी रजोगुणाची स्थिती । त्यागू न संभवे कल्पांतीं ।
धर्म करितो केवळ स्फीती । मनीं आसक्ती कामाची ॥३५॥
त्याप्रमाणेंच रजोगुणाची स्थिति आहे. त्यामध्यें कल्पान्त येऊन ठेपला तरी त्याग घडण्याचा संभवच नाही. असा मनुष्य धर्म करतो, तो केवळ दांभिक भावानेंच करतो, आणि मनांत कामाची आसक्ति असते ३५.

सर्वस्व घ्यावया संवचोरू । सवें धांवे होऊनि नफरू ।
तैसा रजोगुणाचा विचारू । कामनासंसारू वाढवी ॥३६॥
सोबतीनें चालत असलेला चोर, सर्वस्व लुटण्याकरितां चाकर होऊन बरोबर धावत असतो. त्याचप्रमाणे रजोगुणाचाही प्रकार आहे. तोही इच्छेचा संसार वाढवीत असतो ३६,

धर्म करी कामासक्ती । केलें भोगवी निश्चितीं ।
पाडी जन्ममरणआवर्तीं । कदा कल्पांतीं सुटेना ॥३७॥
त्यामुळे मनुष्य कामाच्या आसक्तीनें धर्म करतो, केलेलें कर्म निश्चयपूर्वक उपभोगून घेतो, आणि त्यामुळे तो स्वतःलाच जन्ममरणाच्या भोवऱ्यांत पाडतो. कधी कल्पांतीसुद्धा त्यांतून सुटत नाही ३७.

सात्त्विक तरले माझेनि भजनें । तामस तरले मद्विरोधध्यानें ।
राजसाचें जन्ममरणधरणें । रजोगुणें उठीना ॥३८॥
सात्त्विक लोक माझ्या भजनानें तरून जातात. तामस असतात ते माझ्या विरोधभक्तीनें तरून जातात. परंतु राजसांचे जन्ममरणांतील भ्रमण रजोगुणामुळें कधी सुटतच नाही ३८.

जेणें प्रबळ वाढ रजोगुणा । त्या सांगेन मी दशलक्षणां ।
केवळ त्यागावया काम्यकल्पना । या निरूपणा अवधारीं ॥३९॥
रजोगुणाची वाढ ज्याच्या योगानें प्रबळ होते, ती दहा लक्षणें तुला सांगतों. काम्यकल्पना निखालस सोडून देण्याकरितां हेंही निरूपण ऐक ३९.

राजसाचें प्रवृत्तिशास्त्र । जें केवळ कामनापर ।
जेणें होय इहामुत्र । तेथें अत्यादर राजसा ॥१४०॥
राजस लोकांचें जें शास्त्र तें केवळ प्रवृत्तिपर असतें. तें केवळ वासनामय असतें. ज्याच्या योगानें इहलोकीं व परलोकीं सुख मिळेल त्यासाठींच राजस माणसाला नेहमीं अत्यंत आदर असतो १४०.

आप म्हणिजे तें तंव जळ । वेळा वाळा सुपरिमळ ।
कर्पूरयुक्त अतिशीतळ । प्रिय प्रबळ तें राजसा ॥४१॥
आप म्हणजे केवळ पाणी. पण त्यालाच वेलदोड्याचा व वाळ्याचा उत्तम सुगंध येत असेल, त्यांत कापुराचाही वास असेल, व अत्यंत थंडगार असें असेल, तेंच राजसाला अत्यंत प्रिय असते ४१.

प्रजासंगति त्याची ऐक । राजवर्गीं सभानायक ।
व्यवहारीं चतुर अतिरंजक । प्रवृत्तिलोक प्रिय त्यासी ॥४२॥
आतां तो कोणाची संगत धरतो तें ऐक. राजासारखे लोक, सभापति, व्यवहारांत चतुर, लोकांचें अत्यंत चित्तरंजन करणारे, असे प्रवृत्तिपर लोक असतील तेच त्याला आवडत असतात ४२.

राजद्वारीं कां सभेमाझारीं । बैसावें पारीं अथवा वेव्हारीं ।
कां मंडपतोरणाभीतरीं । सन्मानें करी उपविष्ट ॥४३॥
राजदरबारांत किंवा सभेत, पारावर किंवा मोठी व्यापारी देवघेव चालते अशा ठिकाणीं, किंवा मंडप व तोरणें लावलेलीं असतील त्यांत तो मोठ्या सन्मानानें जाऊन बसतो ४३.

वेळु न गमे जैं घरिंच्या घरीं । तैं क्रमी चौहाटा नगरीं ।
कां बैसे बुद्धिबळांवरी । अत्यादरीं सादर ॥४४॥
जेव्हां घरच्या घरांत वेळ जाईनासा होतो, तेव्हां शहरांतील एखाद्या अड्डयावर जाउन बसतो, नाहीतर बुद्धिबळाचा डाव खेळण्यास मोठ्या आवडीनें तयार होऊन बसतो ४४.

ऐक रजोगुणाची वेळ । सूर्योदया‍उपरी जो काळ ।
कां राजस जे सांजवेळ । ते ते काळ प्रिय त्यासी ॥४५॥
आतां रजोगुणाची वेळ ऐक. सूर्योदय झाल्यानंतर जो काळ असेल तो, किंवा संध्याकाळची वेळ ही राजस होय. ह्या वेळा त्याला मोठ्या प्रिय ! ४५.

राजसांचें सकाम कर्म । धनधान्यार्थ करिती धर्म ।
वासना ते पशुपुत्रकाम । स्वप्नीं निष्काम नेणती ॥४६॥
राजस लोकांचें सर्व कृत्य लोभिष्टपणाचें असतें. धनधान्य प्राप्त व्हावें म्हणून ते धर्म करतात. पशु-पुत्र असावे हीच त्यांची नेहमींची वासना. ते निरिच्छपणा स्वप्नांतसुद्धा जाणत नाहींत ४६.

राजसांसी काम गहन । कामासक्ती दीक्षाग्रहण ।
तेंचि त्यांचें जन्म जाण । सदा ध्यान स्त्रियेचें ॥४७॥
राजसांना इच्छा मोठी दांडगी असते. कामाच्या आसक्तीसाठींच दीक्षा घ्यावयाची, तेंच त्यांचें जन्म हें लक्षांत ठेव. त्यांना निरंतर स्त्रियेचाच ध्यास असतो ४७.

मंत्र घ्यावा अभिलाखें । जेणें सन्मान होय लौकिकें ।
ज्याचा सुगरावा थोर देखे । तो मंत्र आवश्यकें आदरी ॥४८॥
मंत्र घ्यावयाचा तो मनात काहीतरी अभिलाप धरून घ्यावयाचा. जेणेंकरून आपला सन्मान होईल, आपली प्रतिष्ठा वाढेल आणि ज्याचा गुण मोठा अलौकिक दिसेल, असला मंत्र तो अत्यंत आदरपूर्वक अवश्य ग्रहण करतो ४८.

संस्कार अतिराजस । शरीरभोगांचे विलास ।
नाना परिमळ बहुवस । उत्तम वास सुधूत ॥४९॥
त्याचा संस्कार तर अतिशयच राजस असतो. त्यांत शरीरभोगाचेच विलास असावयाचे. परोपरीचे अनेक सुगंध, आणि धुवून अगदी स्वच्छ केलेली वस्त्रें, हींच त्याला नेहमीं आवडत असतात ४९.

संस्काराची अंतरनिष्ठा । लौकिकीं व्हावी देहप्रतिष्ठा ।
माझी आज्ञा वंद्य वरिष्ठां । सभेचे चौहाटां मी पूज्य ॥१५०॥
पोटांतील हेतु हाच कीं, माझा लौकिक वाढून लोकांनीं मला गादीतक्याशीं बसवावें, माझी आज्ञा मोठमोठ्या लोकांनी शिरसावंद्य करावी, आणि भर सभेत लोकांनी मलाच मान द्यावा १५०.

रजोगुण दशलक्षण । उद्धवा त्याची ही वोळखण ।
राजसासी जन्ममरण । सर्वथा जाण सोडीना ॥५१॥
उद्धवा ! रजोगुणाची जी दहा लक्षणे आहेत, त्यांचे स्वरूप हें. म्हणून राजस लोकांना जन्ममरण सर्वस्वी कधीच सुटत नाही ५१.

सात्त्विक त्याग करी विवेकनिष्ठें । तामस त्याग करी कडकडाटें ।
राजसासीं त्याग न घडे स्पष्टें । द्रव्यदारालोभिष्टें लोभाळू ॥५२॥
सात्त्विक मनुष्य विवेकावर निष्ठा ठेवून त्याग करतो, तामस असतो तो रागाच्या झपाट्यानें त्याग करतो, परंतु राजस हा कनक-कांतेला लोभाविष्ट झालेला असल्यामुळे त्याला खरा त्याग म्हणून कधीच घडत नाही ५२.

तिहीं गुणांचें लक्षण । म्यां सांगितलें भिन्न भिन्न ।
तिहींचें सर्वसाधारण । सांगेन चिन्ह तें ऐक ॥५३॥
या तीन गुणांचे लक्षण मी तुला निरनिराळ्या प्रकारानें सांगितले. आतां तिहींचे सर्वसाधारण स्वरूपही सांगतों ऐक ५३.

तत्तत्सात्त्विकमेवैषां यद् यद् वृद्धाः प्रचक्षते ।
निंदन्ति तामसं तत्तद् राजसं तदुपेक्षितम् ॥ ५ ॥
[श्लोक ५] श्रेष्ठ लोक ज्यांची प्रशंसा करतात, ते सात्त्विक समजावेत, ज्यांची उपेक्षा करतात ते राजस आणि ज्यांची निंदा करतात, ते तामस समजावेत. (५)
विवेकवृद्ध वृद्धाचारें । ज्यातें स्तविती अत्यादरें ।
तें तें सात्त्विक जाण खरें । निजनिर्धारे निश्चित ॥५४॥
विचारानें ज्यांची बुद्धि परिपक्व झाली आहे असे वाडवडील जें आचरण करतात, ज्याची लोक अत्यंत आदरानें स्तुति करतात, तें तें खरोखर सात्त्विक कृत्य होय, असे माझे ठाम मत आहे ५४.

विवेकियाचे अनुवादा । ज्या पदार्थांची करिती निंदा ।
ते ते जाण तामसबाधा । माझ्या निजबोधा मानलें ॥५५॥
विचारवंतांच्या उपदेशानें ज्या गोष्टींची लोक निंदा करतात, ती ती तमोगुणाची पीडा होय असें माझ्या मनाला वाटतें ५५.

ज्यातें स्तवित ना निंदित । जीवें भावें उपेक्षित ।
तें राजस जाण निश्चित । बाधा अद्‍भुत तयाची ॥५६॥
ज्याची कोणी स्तुतीही करीत नाहीं, कोणी निंदाही करीत नाहीं, मनापासून उपेक्षा मात्र करतात, तें कृत्य खरोखर राजस होय, हें लक्षांत ठेव. त्याची बाधा फार कठीण ! ५६.

जैसें कां विखें रांधिलें अन्न । वरिवरी गोड अंतरीं मरण ।
तैसा जाण राजस गुण । अतर्क्य बंधन तयाचें ॥५७॥
ज्याप्रमाणें विष घालून शिजविलेलें अन्न वरून वरून गोड लागतें, परंतु त्याच्या आंत मरण असतें, त्याप्रमाणें हा राजस गुण आहे असें समज. त्याचें बंधन मोठें विलक्षण असतें ५७.

राजसासी ज्ञानबोधू । करितां थोंटावला वेदू ।
त्याचे उपदेशीं ब्रह्मा मंदू । माझेनेही बोधू न करवे ॥५८॥
राजसाला ज्ञानोपदेश करतां करतां वेदसुद्धा टेकीस आला. त्याला उपदेश करतांना ब्रह्मदेवसुद्धा थकला. खुद्द माझ्यानेंसुद्धा त्याला उपदेश करवत नाही ५८.

याचिलागीं रजोगुण । विवेकी सांडिला उपेक्षून ।
उपेक्षेचें हेंच कारण । तुज म्यां जाण सांगीतलें ॥५९॥
याचकरितां विचारी लोकांनी रजोगुण उपेक्षा करून फेंकून दिला आहे. त्याला दूर लोटण्याचें हेंच कारण. तुलाही मी तें सांगितलें ५९.

यालागीं सात्त्विक सेवन । साधकीं अवश्य करावें जाण ।
सात्त्विकसेवनाचा गुण । तुज मी संपूर्ण सांगेन ॥१६०॥
म्हणून साधकांनी सात्त्विकाचेंच सदासर्वदा अवश्य सेवन करीत असावे. त्या सात्त्विकसेवनाचा संपूर्ण गुण तुला मी आतां सांगतों ऐक १६०.

सात्त्विकान्येव सेवेत पुमान् सत्त्वविवृद्धये ।
ततो धर्मस्ततो ज्ञानं यावत् स्मृतिरपोहनम् ॥ ६ ॥
[श्लोक ६] माणसाने सत्त्वगुणाच्या वृद्धीसाठी सात्त्विक पदार्थांचेच सेवन करावे त्यामुळे धर्म वाढून ज्ञान उत्पन्न होईल आणि ज्ञानामुळे आत्मसाक्षात्कार होऊन सर्व प्रकारचे संशय नाहीसे होतील. (६)
सात्त्विक द्रव्यें सेवितां । सत्त्ववृद्धी होय तत्त्वतां ।
सत्त्ववृद्धी पुरुषीं होता । धर्म स्वभावतां प्रवर्ते ॥६१॥
सात्त्विक पदार्थांचे सेवन केलें असतां खरोखरच सत्वगुणाची वृद्धि होते आणि पुरुषामध्यें सत्त्वगुणाची वृद्धि झाली असतां धर्माकडे आपोआपच प्रवृत्ति होते ६१.

धर्मप्रवृत्ति माझें भजन । माझ्या भक्तिउल्हासें जाण ।
भक्तांसी मी होयें प्रसन्न । तैं स्वभावें ज्ञान प्रकाशे ॥६२॥
धर्मप्रवृत्तीनें माझें भजन घडतें, आणि माझ्या भक्तीचा उल्हास वाढला कीं भक्तांना मी प्रसन्न होतों, त्या वेळीं ज्ञानही आपोआप प्रगट होतें असें समज ६२.

तत्त्वमस्यादि वाक्यव्युत्पत्ती । ते गुरुद्वारा ज्ञानाची प्राप्ती ।
तरी सत्त्वशुद्धित्वें धर्म भक्ती । कोणे अर्थीं सेवावी ॥६३॥
‘तत्त्वमसि’ इत्यादि जीं वाक्यें आहेत, त्यांचा अर्थ गुरूच्या द्वारानें कळून ज्ञानप्राप्ति होते, तर मग सत्त्वशुद्धीनें कोणत्या हेकरितां धर्मभक्ति केली पाहिजे? ६३.

ऐसा विकल्प जरी तूं धरिसी । उद्धवा ऐक त्याही विचारासी ।
यथार्थ सांगेन तुजपाशीं । सत्त्वशुद्धीसी उपयोगू ॥६४॥
उद्धवा ! असा जर तूं मनामध्यें विकल्प धरशील, तर त्याचा विचारही ऐक. सत्त्वशुद्धीचा उपयोग काय, तोही मी तुला यथार्थ रीतीनें सांगेन ६४,

केवळ सत्त्वशुद्धीविण । जाहल्या गुरुवाक्याचें श्रवण ।
तें पां हाटगाण्याऐसें जाण । अनोळखपण स्वस्वरूपा ॥६५॥
सत्त्वशुद्धि झाल्याशिवाय, केवळ गुरुवाक्याचेंच श्रवण घडलें, तर ते बाजारांतल्या कलकलाटाप्रमाणें होय. त्यानें कधी आत्मस्वरूपाची ओळख व्हावयाची नाहीं ६५.

आंधळें उपजलें जे कुशीं । स्तनपान करी अहर्निशीं ।
परी तें न देखे माउलीसी । दशा तैशी उपदेशा ॥६६॥
आंधळे पोर जिच्या पोटीं जन्मास येतें, तें रात्रंदिवस तिचें स्तनपान करीत राहातें. पण त्याला आई म्हणून कसली असतें ती दृष्टीसही पडत नाहीं. तशीच त्या उपदेशाची स्थिति असते ६६.

इंद्रियें सचेतनमेळीं । भगवंत सर्वांतें प्रतिपाळी ।
त्यातें न देखती विषयांधळीं । अतिअंध झालीं चित्तशुद्धीविण ॥६७॥
प्रत्येक इंद्रियांत सजीवपणा ठेवून भगवान् हा सर्वांचाच प्रतिपाळ करीत असतो. परंतु विषयानें आंधळी झालेली माणसें त्याला पहात नाहीत. त्यांच्या चित्ताची शुद्धीच झालेली नसल्यामुळें त्यांना कांहींच दिसत नाहीं ६७.

अजागळां लोंबते जाण । मिथ्या भाषण म्हणती ते स्तन ।
त्यापरी सत्त्वशुद्धीविण । वृथा जाण उपदेश ॥६८॥
शेळीच्या गळ्यांत चामडें लोंबत असतें, त्याला ‘स्तन’ असें खोटेंच म्हणत असतात. त्याचप्रमाणे सत्वाची बुद्धि झाल्याशिवाय उपदेश हाही व्यर्थ होय १८.

वाहते उदकीं लिहिले लेख । तळीं अक्षर नुमटे एक ।
तेवीं सत्त्वशुद्धीविण देख । निजज्ञान सुटंक प्रकटेना ॥६९॥
वाहत्या पाण्यावर अक्षरें लिहिलीं तर त्या पाण्याच्या पृष्ठभागावर एक अक्षरसुद्धा उमटत नाहीं. त्याप्रमाणें आत्मज्ञानही सत्त्वशुद्धीशिवाय स्पष्टपणें प्रगट होत नाहीं ६९.

झाल्या आपादतां सत्त्वशुद्धी । जंव प्रकटेना धर्मबुद्धी ।
तंव निजज्ञानाची नव्हे सिद्धी । जेवीं ग्रहणामधीं चंद्रमा ॥१७०॥
पूर्णपणें सत्त्वशुद्धि झाली असतांही जोंपर्यंत धर्मबुद्धि प्रगट होत नाहीं, तोंपर्यंत, ग्रहणांत ज्याप्रमाणें चंद्र दिसावयाचा नाही, त्याप्रमाणें आत्मज्ञानाचीही सिद्धि व्हावयाची नाहीं १७०.

ऐकतां हरिकथाश्रवण । बाष्प रोमांच स्वेद रुदन ।
रुका वेंचितां जाय प्राण । तेथेंही ब्रह्मज्ञान प्रकटेना ॥७१॥
हरिकथाश्रवण करूं लागलें कीं, कंठ भरून यावयाचा, आंगावर रोमांच उभे रहावयाचे, आंगाला घाम यावयाचा, रडूं लागावयाचें; पण एक पै खर्चण्याचा वेळ आला कीं प्राणच जावयाचा ; असें ज्याचें वर्तन असेल त्याच्या ठिकाणींही ब्रह्मज्ञान प्रगट व्हावयाचें नाहीं ७१.

हृदयींचा लोभ जंव न तुटे । तंव निश्चयज्ञान कैंचे भेटे ।
सत्त्वशुद्धिधर्मू जैं प्रकटे । तैं निजज्ञाननेटें सुपंथीं लागे ॥७२॥
अंत:करणांतील लोभ जोंपर्यंत सुटला नाहीं, तोंपर्यंत खरें ज्ञान कसें मिळणार ? जेव्हां सत्त्वशुद्धि आणि धर्म हीं दोन्ही स्पष्ट दिसूं लागतील, तेव्हांच तो आत्मज्ञानाच्या जोरदार प्रेरणेनें योग्य मार्गाला लागतो ७२.

ते चालतां धर्मपंथीं । जै माझी भक्ति होय सांगाती ।
तैं चोरांची न पडे गुंती । शीघ्रगती मज पावे ॥७३॥
त्या धर्ममार्गानें वागत असतांही जर माझी भक्ति सोबतीला असेल तरच चोरांपासून अडवणूक होत नाहीं, व झटदिशीं तो मला येऊन मिळतो ७३.

ते भक्तीचा सांडितां सांगातू । पुढील अनोळख महापंथू ।
तेथ कामक्रोध करिती घातू । विकल्पआवर्तू बुडविती ॥७४॥
त्या भक्तीची संगत सोडून दिली असतां पुढील राजमार्गसुद्धा ओळखत नाहींसे होतात. तेव्हां काम-क्रोध घात करण्याला प्रवृत्त होतात आणि विकल्परूप भोंवरे असतात ते बुडवितात ७४.

भाग्येंवीण माझी भक्ती । प्राण्यासी नव्हे गा सांगाती ।
जिचे संगें चालतां पंथीं । अल्पही गुंती पडेना ॥७५॥
अरे ! भाग्याशिवाय माझी भक्ति प्राण्यांच्या संगतीला असत नाहीं. ज्या भक्तीच्या संगतीनें मार्ग चालूं लागलें असतां यत्किंचितही अडचण पडत नाहीं ७५.

माझे भक्तीसवें महाशूर । नांवाणिगे नवविध वीर ।
सन्नदबद्ध सदा समोर । महाझुंझार निजबोधें ॥७६॥
माझ्या भक्तीबरोबर मोठे शूर व नांवाजलेले असे नऊ प्रकारचे वीर असतात. ते युद्धाला सज झालेले असून सदोदित शत्रूच्या समोर उभे राहतात. आत्मज्ञानाच्या योगानें ते मोठे योद्धे बनले आहेत ७६.

यालागीं माझे भक्तीविण । सहस्त्रधा केल्या श्रवण मनन ।
माझी प्राप्ति नव्हे जाण । भजनें पूर्ण मत्प्राप्ती ॥७७॥
म्हणून माझ्या भक्तीशिवाय हजारों प्रकारांनीं श्रवण व मनन केलें असतांही माझी प्राप्ति होत नाही. भजनानेंच माझी पूर्ण प्राप्ति होते ७७.

सर्व भूतीं भगवद्‍भावो । या नांव मुख्यभक्ति पहा हो ।
ते सांगाती झालिया स्वयमेवो । कामक्रोधमोहो न शकती बाधूं ॥७८॥
अहो ! सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी भगवंताचीच भावना ठेवणे ह्याचंच नांव माझी श्रेष्ठ भक्ति होय. ती स्वत:च सोबतीण झाली म्हणजे काम, क्रोध, मोह हे पीडा देऊं शकत नाहींत ७८.

साक्षेपें नेऊनि घागरी । पालथी घातल्या गंगासागरीं ।
जळबिंदु रिघेना भीतरीं । तैशी परी महावाक्या ॥७९॥
मोठ्या अगत्यानें घागर नेऊन ती गंगेत किंवा समुद्रात उपडी बुडविली असतां तींत पाण्याचा एक थेंबसुद्धा शिरत नाहीं, त्याप्रमाणेंच महावाक्याचीही गोष्ट आहे ७९.

यालागीं अत्यादरेंसीं जाण । धर्मयुक्त माझें भजन ।
करितां मी होय प्रसन्न । मत्प्रसादें ज्ञान प्रकाशे ॥१८०॥
म्हणून अत्यंत आदरानें आणि धर्मशील बुद्धीनें माझे भजन केलें असतां मी प्रसन्न होतो, आणि माझ्या प्रसादानेंच ज्ञान प्रकाशित होतें १८०.

लोभ ठेऊनि अर्थस्वार्थीं । कोरडी करितां माझी भक्ती ।
मी प्रसन्न नव्हें श्रीपती । जाण निश्चितीं उद्धवा ॥८१॥
उद्धवा ! असें न करता अर्थावर आणि स्वार्थावरच लोभदृष्टि ठेवून माझी कोरडीच भक्ति केली असतां मी लक्ष्मीपति प्रसन्न होत नाहीं, हें निश्चित समज ८१,

जो धनें मनें काया वचनें । वेंचूनि भजे मजकारणें ।
त्यासीच म्यां प्रसन्न होणें । जेवीं चंद्रकिरणें चकोरा ॥८२॥
जो धन, मन, शरीर, वाणी ही झिजवून माझं भजन करतो, त्यालाच, जसा चंद्रकिरणांनी चकोर प्रसन्न होतो, तसा मी प्रसन्न होतों, ८२.

व्याली धेनु वत्सा वोरसे । तेवीं मी तुष्टें अतिसंतोषें ।
तेवीं माझेनि प्रसादवशें । माझें ज्ञान प्रकाशे मद्‍भक्तां ॥८३॥
व्यालेली गाय जशी वत्साला स्नेहभरित होऊन दूध देतें, त्याप्रमाणें अत्यंत संतोषानें मीही प्रसन्न होतो. त्या माझ्या प्रसादाच्या योगानेंच माझे ज्ञान माझ्या भक्तांना प्रगट होते ८३.

सगुण सुंदर आणि पतिव्रता । अतिशयें पढियंती होय कांता ।
तिसी सर्वस्व दे न मागतां भर्ता । तेवीं मी मद्‍भक्तां प्रसन्न ॥८४॥
मोठी सद्गुणी, सुंदर आणि पतिव्रता असून पतीला अत्यंत आवडणारी स्त्री असेल तर तिचा पति तिनें न मागतांच तिला सर्वस्व देतो, त्याप्रमाणें मी माझ्या भक्तांना प्रसन्न होतो ८४,

माझेनि प्रसादें प्रकाशे ज्ञान । श्रुति स्मृती नांव म्हणती जाण ।
सविलास अविद्यानिरसन । ‘अपोहन’ या नांव ॥८५॥
माझ्याच प्रसादानें जें ज्ञान प्रगट होतें, त्यालाच ‘श्रुति’ व ‘स्मृति’ अशी नांवे देतात हें लक्षांत ठेव. आणि सहज लीलेनें अविद्येचा नाश होतो, त्याचे नांव ‘अपोहन’ (दोन्ही शरीरांना कारणभूत अशा गुणांचे निरसन ) ८५.

गुणास्तव देह जाण । देहास्तव उपजे ज्ञान ।
तेणें ज्ञानें गुणनिर्दळण । देहनिरसन न घडे म्हणसी ॥८६॥
गुणांपासून देह उत्पन्न होतो, आणि देहापासून ज्ञान उत्पन्न होतें, पण त्याच ज्ञानानें गुणांचा नाश होतो, तेव्हां देहाचे काही निरसन होत नाहीं असें म्हणशील ८६.

हे गोष्टी तूं म्हणसी कुडी । कीं पक्षी आपुले पांख मोडी ।
नारळ नारळीतें तोडी । स्वमांसाची गोडी व्याघ्र चाखे ॥८७॥
कारण पक्षी आपलेच पंख तोडून टाकील, किंवा नारळच नारळीला तोडील, किंवा वाघ आपल्या मांसाची गोडी आपणच चाखील, ही गोष्ट खोटी असें तूं म्हणशील ८७.

हें न घडतें जैं घडों बैसे । तैं देहींचेनि ज्ञानें गुणदेह नासे ।
हा विकल्पू धरिसी मानसें । ऐक अनायासें तो निरासू ॥८८॥
हें कधीं न घडणारेंच जर घडून येईल तर देहांतील ज्ञानानें गुणांचा आणि देहाचा नाश होईल. असा जर तुझ्या मनात विकल्प येईल, तर त्याचेंही निराकरण सहज ऐकून ठेव ८८.

वेणुसङ्घर्षजो वह्निर्दग्ध्वा शाम्यति तद्वनम् ।
एवं गुणव्यत्ययजो देहः शाम्यति तत्क्रियः ॥ ७ ॥
[श्लोक ७ ] माणसाने सत्त्वगुणाच्या वृद्धीसाठी सात्त्विक पदार्थांचेच सेवन करावे त्यामुळे धर्म वाढून ज्ञान उत्पन्न होईल आणि ज्ञानामुळे आत्मसाक्षात्कार होऊन सर्व प्रकारचे संशय नाहीसे होतील. (६)
दैवें वायूच्या कल्लोळीं । परस्परें वेळूजाळीं ।
स्वजातिकांचणीं इंगळी । पेटली ते होळी वनाची करी ॥८९॥
दैवयोगानें वाऱ्याच्या सोसाट्यांत वेळूंच्या रानामध्यें ते वेळु परस्परांवर घांसले जातात व अशा रीतीनें त्यांच्या स्वजातीयांच्या घर्षणानें ठिणगी पडते, आणि ती पेटून सर्व वनाची होळी करून टाकते ८९.

अग्नि उपजला जे कांडीं । तेंही कांडें जाळूनि सांडी ।
वनीं नुरवूनियां काडी । स्वयें राखोंडी होऊनि विझे ॥१९०॥
त्याच्या ज्या कांड्यांत अग्नि उत्पन्न होतो, तें कांडेंसुद्धा तो जाळून खाक करतो. तो त्या वनांतील एक काडीसुद्धा शिल्लक ठेवीत नाहीं; आणि स्वतःही राख होऊन विझून जातो १९०.

तेवीं वैराग्याभ्यासवायूंनीं । होतां त्रिगुणांची कांचणी ।
तेथें प्रकटला ज्ञानाग्नी । अविद्यावनीं दाहकू ॥९१॥
त्याप्रमाणें वैराग्याच्या अभ्यासरूप वायूनें त्रिगुणांचे घर्षण होतांच तेथे ज्ञानरूप अग्नि उत्पन्न होतो, आणि तो अविद्यारूप वनाला जाळणारा होतो ११.

तो हरिगुरुकृपा खवळला । वृत्तिरूपें प्रज्वळला ।
देहद्वयेंसीं लागला । प्रवर्तला गुणांतें जाळूं ॥९२॥
तो हरिरूप गुरूच्या कृपेनें धडाडतो, वृत्तीच्या रूपानें भडकतो, आणि दोन्ही देहांना लागून गुणांना जाळावयास प्रवृत्त होतो ९२.

जळाल्या आषातृष्णेच्या पाळी । जळालीं कामलोभांची कोल्हीं ।
क्रोधव्याघ्राची होळी झाली । आगी लागली मदगजा ॥९३॥
तेव्हां आशेच्या आणि तृष्णेच्या झुंडी जळून जातात, कामलोभरूप कोल्हीं जळून जातात, क्रोधरूप वाघाची होळी होते, आणि मदरूपी हत्तीही पेटूं लागतो ९३.

जाळिली स्नेहाची आरांटी । जाळिली असत्याची बोरांटी ।
जाळिला मोह‍अजगरू उठाउठी । जाळिला शेवटीं काळविट काळू ॥९४॥
स्नेहाचें कांटेरी झुडुप जळून जातें, असत्यरूप बोरीचे कांटे जळून जातात, मोहरूप अजगर तर तत्काळ जळून जातो, आणि शेवटी काळरूप काळवीटही जळून जातो ९४.

उठिला अहंकाराचा सोरू । धरितां न धरे अनिवारू ।
तोही जाळिला दुर्धरू । वणवा चौफेरू कोंडला ॥९५॥
इतक्यांत अहंकाररूप डुकर उठतो. कितीही पाठलाग केला तरी तो सापडत नाही, इतका तो अनिवार होतो. पण तो विक्राळरूपी डुकर देखील जळून जातो. इतका तो वणवा चहूं बाजूंनीं पसरलेला असतो ९५.

पळूनि जावयापुरता । अणुभरी ठावो नुरेचि रिता ।
एवं जळाला तो पळतपळतां । अहंसोरु सर्वथा निमाला ॥९६॥
पळून जाण्यापुरती एक अणुभरसुद्धा सुटी जागा राहात नाहीं; अशा रीतीनें अहंतारूप रानडुकर पळता पळतांच जळून जातो व पूर्णपणे मरतो ९६.

नवल अग्नीचें विंदाण । आपणिया जाळी आपण ।
दाहकशक्तीतें जाळून । स्वस्वरूपीं जाण उपरमे ॥९७॥
अग्नीचें लाघव मोठें विलक्षण आहे. तो आपणच आपल्यालासुद्धा जाळून घेतो ! इतकेच नव्हे, तर तो दाहकशक्तीलासुद्धा जाळून टाकून आपल्या स्वस्वरूपांत जाऊन स्थिर होतो ९७.

ऐसें ऐकोनि निरूपण । उद्धवासी विस्मयो गहन ।
जनास केवढी नागवण । आप आपणिया आपण वोढवली ॥९८॥
हें निरूपण ऐकून उद्धवाला मोठें आश्चर्य वाटलें. तो म्हणाला, लोकांवर केवढा हा संकटप्रसंग आपोआप ओढवला आहे ! ९८.

नश्वरदेहाचिये साठीं । पाविजे परब्रह्माची पुष्टी ।
ते सांडूनियां करंटीं । विषयनिष्ठीं मरमरों मरती ॥९९॥
ह्या नश्वर देहापासून परब्रह्माचा आनंद प्राप्त होतो. असें असतां तो सोडून देऊन दुर्दैवी लोक विषयांवरच लुब्ध होऊन मर मर मरतात ! ९९.

सात्त्विकसेवनें सत्त्ववृद्धी । तेणें अलभ्य लाभे सिद्धी ।
ते सांडोनियां दुर्बुद्धी । विषयविधीं रातले ॥२००॥
सात्विक सेवनानें सत्त्वाची वृद्धि होतें, आणि तेणेंकरून दुर्मिळ अशा सिद्धीचा लाभ होतो. पण ती सिद्धि सोडून देऊन दुर्बुद्धि लोक विषयाच्या विधीमध्येंच रममाण होतात ! २००.

केवढा नाडू मांडला लोकां । ऐशी जीवींची आशंका ।
यालागीं यदुनायका । आदरें देखा पुसत ॥१॥
हा लोकांमध्यें केवढा अनर्थ माजला आहे ! अशी मनात शंका उत्पन्न झाली, म्हणूनच पहा ! मोठ्या जिज्ञासेनें तो श्रीकृष्णाला विचारूं लागला १.

श्रीउद्धव उवाच ।
विदन्ति मर्त्याः प्रायेण विषयान् पदमापदाम् ।
तथापि भुञ्जते कृष्ण तत्कथं श्वखराजवत् ॥ ८ ॥
[श्लोक ८] उद्धवाने विचारले – भगवान ! साधारणतः सर्वच माणसांना हे माहीत आहे की, विषय हे संकटांचे घर आहे तरीसुद्धा ती माणसे कुत्री, गाढवे किंवा बोकडांप्रमाणे ते विषय का भोगतात ? (८)
उद्धव म्हणे श्रीमुकुंदा । ऐक सर्वज्ञा गोविंदा ।
विषयांची पदोपदीं आपदा । सर्वीं सर्वदा कळलीसे ॥२॥
उद्धव म्हणाला, “हे मुकुंदा ! सर्वज्ञ गोविंदा ! ऐक. विषयांचे संकट पावलोपावली नडतें, हें सदोदित सर्वांना कळून चुकलें आहे २.

जो झाला विषयाधीन । तो सर्वीं सर्वत्र सदा दीन ।
ऐसें जाणतजाणतां जन । आसक्ति गहन विषयांची ॥३॥
जो विषयाधीन होतो तो सर्वत्र सर्वस्वीं नेहमीं दीनच झालेला असतो. हें सर्व लोक धडधडीत पहात असतांही त्यांना विषयांची केवढी भयंकर आसक्ति पहा ! ३.

जैसें कां श्वान आणि खर अज । तैसे विषयांसी लोक निर्लज्ज ।
सांडूनि स्वहिताचें काज । का विषयांचे भोज नाचती ॥४॥
ज्याप्रमाणें कुत्रा, गाढव व बोकड असावेत, त्याप्रमाणेच विषय भोगण्यामध्यें लोक निर्लज्ज झालेले असतात. आपल्या हिताचें कार्य सोडून विषयाच्या आवडीनेंच लोक कां नाचत असतात ? ४.

शुनी वसवसोनि पाठीं लागे । श्वान सवेंच लागे मागें ।
पुच्छ हालवूनि हुंगे । लाज नेघे जनाची ॥५॥
कुत्री खेंकसून पाठीला लागत असते, तरी त्याच वेळीं कुत्रा तिच्या मागें लघळपणा करीत राहून शेंपूट हालवून हुंगीतच असतो. तो लोकांचीसुद्धा लाज बाळगीत नाही ५.

काणा कुंटा व्याधिव्याप्त । चिंता कांठफरा गळां वाहत ।
तोही शुनीमागें धांवत । कामासक्त अविचार ॥६॥
आंधळा, लूत भरलेला, रोगी, चिंतारूप फुटक्या मडक्याचा कांठ गळ्यांत अडकलेला असतो, तरीसुद्धा तो कुत्रीच्या पाठीमागें धावतो. इतका तो कामासक्तीनें विचारशून्य होतो ६.

शुनी सक्रोधें वसवसी । तें गोड लागे श्वानासी ।
जीवित बांधलें तिच्या पुंसीं । तीमागमागेंसीं हिंडतू ॥७॥
कुत्री रागारागानें त्याच्यावर खेंकसत असते, तरी तें कुत्र्याला गोडच वाटतें. त्याचा सर्व जीव तिच्या शेपटींत गुंतलेला असल्यामुळे तिच्या मागोमाग हिंडत असतो ७.

अंगीं अंगा होतां भेटी । सक्रोध शुनी लागे पाठीं ।
तरी न सोडी पुसांटी । कुंकांत उठी कामासी ॥८॥
तिच्या आंगाला त्याचें आंग लागले की ती कुत्री क्रोधानें त्याच्या मागे धावते, तरी तो तिची शेंपटी म्हणून सोडीत नाही. त्याच्या कामेच्छेला जोरच चढत असतो ८.

ऐशा संकटीं जैं भोग चढे । तैं भोगासवेंचि आडकोनि पडे ।
हड हड करिती चहूंकडे । जगापुढें फजीती ॥९॥
इतक्या यातनेंतूनही जर भोग मिळालाच, तर त्या भोगाबरोबरच तो अडकून पडतो. तेव्हां चारही बाजूंनी लोक ‘हड हड’ करूं लागतात, आणि जगापुढें सर्व फजिती होते ९.

निंदेचे सैंघ वाजती धोंडे । मूर्ख तेही थुंकिती तोंडें ।
ऐंसेंचि पुरुषासही घडे । तरीही आवडे अतिकामू ॥२१०॥
निंदेचे अनेक दगड अंगावर बसत असतात. मूर्ख लोकसुद्धा तोंडावर थुंकतात. पुरुषाची अवस्थाही अशीच होते. तरीही त्याला कामच अतिशय आवडतो २१०.

श्वानाचें हेंड तत्काळ सुटे । मनुष्याचें आकल्प न सुटे ।
स्त्रीलोभाळू अतिलोभिष्ठे । तीलागीं संकटें नाना सोशी ॥११॥
तें कुत्र्याचें जूग लागलेंच सुटतें, आणि मनुष्याचे जूग कल्पान्तींही सुटत नाही. स्त्रीच्या लोभानें अतिशय लंपट झाल्यामुळे तिच्यासाठी तो नाना प्रकारची संकरें सोशीत असतो ११.

नातरी गाढवाच्या परी । दूरी देखोनियां खरी ।
भुंकत धांवे तीवरी । लाज न धरी सर्वथा ॥१२॥
किंवा गाढवाचा प्रकार पहा ! गाढवी लांब पाहिली की गाढव ओरडत तिच्याकडे धावत सुटतो. मुळींच लाज धरीत नाही १२.

खरी पळे पुढेंपुढें । खरू धांवे वाडेंकोडें ।
लाता हाणोनि फोडी जाभाडें । तरी पुढेंपुढें धसो लागे ॥१३॥
गाढवी पुढें पुढें पळत असते, आणि गाढव मोठ्या लालचीनें तिच्या मागे धावत असतो. ती लाथ मारून त्याचें थोबाड फोडते, तरी हा तिच्या पुढें पुढेंच घुसतो १३.

लाता हाणे उरावरी । तरी तिची प्रीती धरी ।
ऐशिया स्त्रियांचे घराचारीं । खराच्यापरी नांदती ॥१४॥
तिनें छातीवर लाथा मारल्या तरी तो तिच्यावर प्रेमच करतो. अशा रीतीनें स्त्रियांचे पति गाढवासारखे वावरत असतात १४.

नातरी बोकडाची गति जैशी । तैशी दशा दिसे पुरुषासी ।
मारूं आणिल्या पशुहत्यार्‍यापाशीं । तरी शेळ्यांसी सेवित ॥१५॥
किंवा बोकडाची जशी गति, तशी दशा पुरुषाची असते. बोकड मारावयासाठी खाटकपाशी जरी आणला, तरी तो शेळ्यांच्या मागे लागतच असतो ! १५.

स्वयाती मारितां देखे । अनुताप नेघे तेणें दुःखें ।
मृत्युसमीपही अभिलाखें । कामसुखें वांछिती ॥१६॥
आपल्याच जातवाल्यांना मारतांना प्रत्यक्ष पहात असतो, पण त्या दुःखानें तो कांहींच पश्चात्ताप पावत नाही. मृत्यूच्या जवळ जाऊन पोहोंचले असतांही ते लोभानें विषयसुखांच्या इच्छा करीतच असतात १६.

पूर्ण मृत्यूची पायरी । तें वार्धक्य वाजलें उरीं ।
तरी धांवे विषयावरी । आठवू न धरी मरणाचा ॥१७॥
मरणाची शेवटची पायरी जें वार्धक्य, तें येऊन उरावर आदळलें, तरी विषयाकडेच तो धावत असतो. मरणाची आठवणसुद्धा करीत नाहीं १७.

मेष मारूं आणिला घातकें । निजसख्यांतें मारितां देखे ।
तें न मनूनियां यथासुखें । अजीसीं हरिखें रमों धांवे ॥१८॥
खाटकांनी बकरा कापावयाला आणलेला असतो, तो आपल्या सोबत्यांना मारतांनाही पहात असतो, पण त्याची पर्वा न बाळगता आनंदानें शेळीजवळ रममाण होण्यासाठी तडफडत असतो ! १८.

मेष श्वान आणि खर । हे ऋतुकाळींचि विषयतत्पर ।
त्याहूनि विशेषेंसीं नर । कामी दुर्धर सर्वदा ॥१९॥
बोकड, कुत्रा आणि गाढव हे विषयी खरे, पण ते शेळी, कुत्री व गाढवी ह्यांच्या ऋतुकाळांतच विषयभोगाला तयार असतात. पुरुषाचा कामाचा प्रकार त्याच्याहूनही जबर ! कारण, तो नेहमी अनिवार कामातुर असतो १९.

गर्भ संभवल्यापाठीं । श्वानही स्त्रीभोगासी नुठी ।
पुरुषाची अभिनव गोठी । गरोदर गोमटी भोगिती ॥२२०॥
कुत्रीला गर्भ राहिला म्हणजे मग कुत्रासुद्धा तिच्या संभोगासाठी तयार होत नाही. पण पुरुषाची गोष्ट मोठी विचित्र आहे ! ते गरोदर असलेल्या स्त्रीचाही उपभोग घेतात ! २२०.

गाढव गाढवीसी बुंथड । न करी अलंकार मोथड ।
मनुष्यासी स्त्रियेचें कोड । तिचें वालभ वाड वाढवी ॥२१॥
गाढव गाढवीला झोंबतो इतकेंच, पण तो काही तिला मोत्याचे अलंकार घालीत नाही पण मनुष्याला स्त्रीची आवड इतकी दांडगी असते की, तिचे तो अनेक प्रकारें कौतुक पुरवितो २१.

दांडा गोंडा मूद वेणी । टिळकुवरी रत्‍नखेवणी ।
नाकींचें हालों दे सुपाणी । हें मनुष्यपणीं वालभ ॥२२॥
तिच्या वेणींत गोंडे फुलें पाहिजेत, तिच्या कुकुंमतिलकावर रत्नजडित बिजवरा पाहिजे, आणि तिच्या नाकांत पाणीदार मोत्यांची नथ हालत राहिली पाहिजे. ही मनुष्यजन्मांतील आवड ! २२.

जरी प्रसूतिकाळ निकट । गाड्याएवढें वाढलें पोट ।
तरी कामचारी विवेकनष्ट । रमताती दुष्ट स्त्रियांसीं ॥२३॥
जरी प्रसूत होण्याचा काल जवळ येऊन ठेपला, आणि पोट जरी गाड्याएवढें वाढलें, तरी कामांध, विवेकहीन व दुष्ट लोक अशा स्त्रियांशी रममाण होतच असतात २३.

अस्थि मांस विष्ठा मूत । तेणें कामिनी पूर्ण भरित ।
ते कुश्चळीं जन कामासक्त । जाणोनि होत कां देवा ॥२४॥
देवा ! हाडे, मांस, विष्ठा, मूत्र, यांनी स्त्री ही पूर्णपणे भरलेली असता अशा घाणीत लोक समजून उमजून को बरे कामासक्त होतात ? २४.

या प्रश्नाचें प्रत्युत्तर । तीं श्लोकीं सांगे शार्ग्ङधर ।
कामासक्तीचा विचार । ऐक सादर उद्धवा ॥२५॥
या प्रश्नाचें उत्तर श्रीकृष्ण तीन श्लोकांनी सांगत आहे. तो म्हणाला, उद्धवा ! नीट लक्ष देऊन कामासक्तीचा विचार ऐक २५.

श्रीभगवानुवाच ।
अहमित्यन्यथाबुद्धिः प्रमत्तस्य यथा हृदि ।
उत्सर्पति रजो घोरं ततो वैकारिकं मनः ॥ ९ ॥
[श्लोक ९] श्रीकृष्ण म्हणाले – अज्ञानी माणासाच्या मनामध्ये देहाविषयी ‘मी’ अशी खोटी कल्पना उत्पन्न होते, तेव्हा त्याच्या सत्त्वगुणप्रधान मनात घोर रजोगुण उत्पन्न होतो. (९)
मोहप्रमत्त विवेकशून्य । त्या पुरुषांच्या ठायीं जाण ।
देहात्मवादें अभिमानें । रजोगुणें खवळला ॥२६॥
जे मोहमदानें मत्त झालेले विवेकशुन्य पुरुष असतात, त्या पुरुषांच्या ठिकाणी देहात्मवादाच्या योगानें रजोगुण उत्पन्न होऊन त्यापासून अभिमान खवळतो २६.

जैसा मदिरापानें उन्मत्तू । विसरूनि आपुला निजस्वार्थू ।
मग अन्योन्य अनर्थू । आत्मघातू करूं धांवे ॥२७॥
ज्याप्रमाणें मनुष्य मद्य प्राशन करून उन्मत्त झाला म्हणजे तो आपलें हित विसरून जातो, व मग निरनिराळे अनर्थ उत्पन्न करून आत्मघात करावयालासुद्धा प्रवृत्त होतो २७,

तेवीं शुद्ध बुद्ध नित्यमुक्तु । हा विसरोनि निजस्वार्थु ।
रजोगुणें लोलंगतु । कामासक्तु नरू कीजे ॥२८॥
त्याप्रमाणे आपण शुद्ध, बुद्ध व नित्यमुक्त होणे यांतच आपलें खरें कल्याण आहे ही गोष्ट विसरून जाऊन रजोगुणाशी लंपट झाल्यामुळे तो रजोगुण त्या पुरुषाला कामासक्त बनवितो २८.

रजीं रंगल्या अभिमान । दुःखरूप तो दारुण ।
दुर्धर वाढे रजोगुण । विचारी मन तेणें होय ॥२९॥
अभिमान हा रजोगुणांत रंगून गेला की, तो दुःखरूपी भयंकर रजोगुण अनावर वाढतो आणि त्यामुळें मन विकाराला वश होतें २९.

रजोयुक्तस्य मनसः सङ्कल्पः सविकल्पकः ।
ततः कामो गुणध्यानाद् दुःसहः स्याद्धि दुर्मतेः ॥ १० ॥
[श्लोक १० ] रजोगुणाने घेरलेले मन अनेक प्रकारचे संकल्पविकल्प करू लागते नंतर त्याच त्याच विषयांचे चिंतन केल्यामुळे त्याच्याविषयी असह्य अशी कामना उत्पन्न होते. (१०)
जैं रजोयुक्त झालें मन । तैं संकल्पविकल्प गहन ।
एकांतीं घातल्या आसन । ध्यानीं चिंतन स्त्रियेचें ॥२३०॥
जेव्हां मान रजोगुणसंपन्न होतें, तेव्हां प्रचंड संकल्पविकल्प उत्पन्न होतात, आणि एकांतांत आसन घालून बसलें असतांही ध्यानामध्यें स्त्रियेचेंच चिंतन होत असतें २३०.

रजोगुणें कामासक्ती । होय दुष्ट वासना दुर्मती ।
कामावांचूनि चित्तीं । आणिक स्फूर्ती स्फुरेना ॥३१॥
रजोगुणानेंच कामासक्ति उत्पन्न होते. दुष्ट वासना उत्पन्न होऊन बुद्धीही दुष्टच होते. त्यामुळे चित्तामध्यें कामाशिवाय दुसरी स्फूर्ति उत्पन्नच होत नाही ३१.

जनीं वनीं आणि विजनीं । जागृतीं सुषुप्तीं स्वप्नीं ।
ध्यानीं मनीं चिंतनीं । स्त्रीवांचूनी स्मरेना ॥३२॥
जनांत, वनांत एकांतांत, जागृतींत, सुषुप्तींत, स्वप्नांत, ध्यानांत, मनांत किंवा चिंतनांत स्त्रियेशिवाय दुसरें कांहीं आठवत नाहीं ३२.

कामिनीकामाचा अध्यास । हावभाव अतिविलास ।
गुणलावण्य सुरतरस । आसक्त मानस ते ठायीं ॥३३॥
स्त्रीच्या कामेच्छेचा सर्व ध्यास. तिचे हावभाव, तिचे अत्यंत मनोहर विलास, तिचे सुंदर लावण्य आणि तिचा सुरतरस ह्यामध्येंच मन गढलेलें असतें ३३.

रतिसुखाचा आराम । कामिनीक्रीडेचा संभ्रम ।
तेणें दुर्धर झाला जो काम । तयासि नियम चालेना ॥३४॥
रतिसुखाचें सुख व स्त्रियेच्या क्रीडेचा बडेजाव माजवून त्यामुळें जो काम अनावर झालेला असतो, त्याच्यापुढें नियमन चालतच नाहीं ३४.

धनधान्यपुत्रसुख । वांछी इहलोकपरलोक ।
हा रजोगुणाचा देख । अलोलिक अतिकामू ॥३५॥
धन, धान्य, पुत्र, यांचे सुख असावें, इहलोकचें व परलोकचें सुख असावें, अशी रजोगुणाची आश्चर्यकारक उत्कट इच्छा असतें पहा ! ३५.

करोति कामवशगः कर्माण्यविजितेन्द्रियः ।
दुःखोदर्काणि सम्पश्यन् रजोवेगविमोहितः ॥ ११ ॥
[श्लोक ११ ] त्या कामनांच्या अधीन झालेला व मन ताब्यात नसलेला मनुष्य कळून सवरून परिणामी दुःखदायक अशी कामे करतो कारण तो रजोगुणाच्या आवेगाने अतिशय मोहित झालेला असतो. (११)
जेथ रजाचा वेग उदित । तेथ कामग्रहो खवळे अद्‍भुत ।
जो पुरुष झाला कामग्रस्त । तो सदा अंकित कामाचा ॥३६॥
जेथें रजोगुणाचा आवेश उत्पन्न होतो, तेथे कामरूप ग्रह अद्‌भुत रीतीनें पिसाळतो. आणि जो पुरुष कामानें ग्रस्त होतो तो सदोदित कामाचाच अंकित होऊन राहतो ३६.

ज्यासी विवेक नाहीं मानसीं । तो जाण पां कामाची आंदणी दासी ।
काम नाचवी जैसें त्यासी । तेणें विकारेंसीं नाचत ॥३७॥
ज्याच्या मनात विचार नाही, तो कामाची आंदण दिलेली बटिक होऊन राहतो. त्याला काम जसें जसें नाचवीत असतो, त्या त्या विकारांनी तो नाचतो ३७.

कामांकित झालिया पुढें । सकाम कर्म करणें पडे ।
ज्याचें उत्तरोत्तर दुःख वाढे । अतिदुर्वाडें गर्वितु ॥३८॥
कामाचा अंकित झाला की, पुढें ज्याचें दुःख उत्तरोत्तर वाढतच असतें, असें सकाम कर्मच करणें भाग पडतें आणि तो अतिशय गर्विष्ठ होतो ३८.

रजोगुणें अतिमोहित । यालागीं अजितेंद्रिय अयुक्त ।
जन्ममरणांचा अंकित । कर्में करीत तद्‌रूपें ॥३९॥
तो रजोगुणानें अतिशय मोहात पडलेला असतो, म्हणून तो इंद्रियें न जिंकलेला व अयोग्य असतो. तो जन्ममरणांचा अंकित होऊन तदनुसारच सर्व कर्मे करतो ३९,

रजोगुणाचा अतिबाध । तेणें जन केले विषयांध ।
रजरागी महामंद । जाण प्रसिद्ध उद्धवा ॥२४०॥
रजोगुणाची भयंकर पीडा आहे. त्यानें सर्व लोक विषयांध केले आहेत. उद्धवा ! रजावर लोलुप होणारे लोक अत्यंत निर्बुद्ध असल्याचें प्रसिद्धच आहे हें लक्षांत ठेव २४०.

रजें बांधल्यापाठीं जाण । होय महामोहाचें संचरण ।
तेव्हां भ्रमाचें वाउधाण । सैरा तमोगुण उल्हासे ॥४१॥
रजोगुणानें बद्ध केल्यानंतर महामोहाचा प्रवेश होतो, तेव्हां भ्रमाची वावटळ सुटून तमोगुणही सैरावैरा फैलावतो ४१.

ऐशी प्राणियांची मती । उद्धवा जाण निश्चितीं ।
यालागीं काम ते सेविती । नव्हे विरक्ती विषयांची ॥४२॥
उद्धवा ! प्राण्यांची बुद्धि खरोखर अशी असतें, हें लक्षांत ठेव. म्हणून ते कामाचे सेवन करतात. विषयांची विरक्ति त्यांना होत नाही ४२.

तुज ऐसें वाटेल चित्तीं । बुडाली तरणोपायस्थिती ।
खुंटली प्राण्यांची परम गती । विषयासक्ती अनिवार ॥४३॥
आतां तुझ्या मनांत कदाचित असें येईल की, तर मग तरणोपायच खुंटला, आणि प्राण्यांची सद्गति देखील खुंटली. ही विषयासक्ति अनिवार आहे ४३.

जीवा अविद्याविषयसंबंधू । याचा बाधू अतिसुबद्धू ।
अविद्यायोग अनादिसिद्धू । तेणें दृढ भेदू जीवासी ॥४४॥
जीवाला तर अविद्येशी आणि विषयाशी संबंध. त्यांची पीडा फार मोठी असते. अविद्येचा संबंध अनादिसिद्ध आहे. त्यामुळे नानाप्रकारच्या दृढतर कल्पना उठतात ४४.

अंतःकरणही अनादी । प्रवाहरूपें त्याची सिद्धी ।
तेणें दृढ झाली विषयबुद्धी । त्याग त्रिशुद्धी घडेना ॥४५॥
अंत:करण हेही अनादीच आहे, आणि त्याची परिपूर्णताही ओघानुसारच होत असते. त्यामुळेच विषयबुद्धीही दृढ होते आणि त्याग मुळींच घडत नाही ४५.

सत्त्वीं उत्पन्न अंतःकरण । परी तें प्रकृतिकार्य जाण ।
तेथें भोगाध्यासें रजोगुण । खवळला कोण आवरी ॥४६॥
अंत:करण सत्त्वापासून उत्पन्न होते ही गोष्ट खरी, पण तें कार्य मायेचें आहे हें लक्षांत ठेव. तेथे सुखभोगाच्या सवयीनें रजोगुण खवळला, कीं त्याला आवरणार कोण ? ४६.

विषयीं बांधिले विवेकी । तो विषयत्याग नव्हे ये लोकीं ।
उद्धवा तुझी आशंका हेच कीं । ऐक तेविखीं उपावो ॥४७॥
विचारी असतात तेही विषयानें बद्ध झालेले असतात. म्हणून तो विषयाचा त्याग या लोकांत होत नाही. उद्धवा ! तुझी शंका हीच ना? तर त्याविषयींचा उपाय ऐक ४७.

विवेकियांच्या ठायीं । विषयबुद्धि नुपजे पाहीं ।
विक्षेपू झाल्या कहींबहीं । अभ्यासू तिंहीं करावा ॥४८॥
विचारशील लोकांच्या ठिकाणी विषयवासना उत्पन्नच होत नाही. इतकेंही करून कधी काळी त्यांत विक्षेप आलाच, तर त्यांनी अभ्यास करावा ४८.

रजस्तमोभ्यां यदपि विद्वान् विक्षिप्तधीः पुनः ।
अतन्द्रितो मनो युञ्जन् दोषदृष्टिर्न सज्जते ॥ १२ ॥
[श्लोक १२] रजोगुणतमोगुणांनी ज्ञानी माणसाचीसुद्धा बुद्धी विषयांकडे धाव घेते परंतु तो सावधगिरी बाळगून मन एकाग्र करून विषय दोषयुक्त आहेत, हे जाणून त्यांमध्ये आसक्त होत नाही. (१२)
हो कां रजतमांचेनि गुणें । जरी बुद्धि विक्षिप्त केली तेणें ।
तरी आळस सांडूनि सज्ञानें । आवरणें मनातें ॥४९॥
रज आणि तम या गुणांनी कदाचित् एखादें वेळी त्याच्या बुद्धीला विक्षेप घातलाच, तर ज्ञात्यानें आळस सोडून मनाला आवरून धरावें ४९.

अस्थिमांसाचा घडिला । विष्ठामूत्रांचा कोथळा ।
स्त्री विचारितां कांटाळा । नरकजिव्हाळा तो भोगू ॥२५०॥
स्त्रीचा देह हाडांचा आणि मांसाचा बनविलेला विष्ठामूत्रांचा कोथळा असल्यामुळें तिच्याविषयी विचार केला तर कंटाळा येतो. तिचा भोग तो केवळ नरकाचें साधन होय २५०.

भोगीं दावूनि दोषदृष्टी । मनासी विषयांची तुटी ।
करावी गा उठाउठी । नेमूनि निहटीं मनातें ॥५१॥
याप्रमाणें स्त्रीच्या भोगामध्यें असलेले दोष दाखवून दिले, व मन विषयांपासून तत्काळ दूर करून ते नियमांनी आवरून धरावें असें सांगितलें ५१.

ऐसेनिही मन अतिदुर्धर । नियमासी नावरे अनावर ।
साधकांसी अतिदुस्तर । अशक्त नर ये अर्थीं ॥५२॥
अशा प्रकारेही अत्यंत अनिवार मन अनावर होऊन नियमाच्या बंधनांत सापडत नाही. अभ्यास करणारांना तें मोठें अनावर होते. अर्थात त्याविषयी सामान्य लोक असमर्थच होत ५२.

तरी ऐक बापा सावधान । मनोनिग्रहाचें लक्षण ।
तेंही सांगेन साधन । जेणें प्रकारें मन आकळे ॥५३॥
तर बाबा ! नीट लक्ष देऊन ऐक. त्या मनोनिग्रहाचे जें लक्षण आणि साधन, कीं जेणेंकरून मनाला आळा बसेल, तेंही सांगतों ५३.

अप्रमत्तोऽनुयुञ्जीत मनो मय्यर्पयञ्छनैः ।
अनिर्विण्णो यथाकालं जितश्वासो जितासनः ॥ १३ ॥
[श्लोक १३] म्हणून साधकाने त्रिकाळ सावधपणे उत्साहपूर्वक आसन व प्राण यांवर विजय मिळवून क्रमाक्रमाने मन वारंवार माझ्या ठिकाणी लावावे. (१३)
आळसनिद्रेसी दवडूनि दूरी । जो सावधान निजवृत्ति धरी ।
माझें चिद्‌रूप निर्धारीं । शनैः शनैः करी अभ्यासू ॥५४॥
आळस आणि निद्रा ह्यांना दूर झुगारून देऊन जो सावधचित्तानें ब्रह्मभावना धारण करतो, तोच खरोखर माझ्या चित्स्वरूपाच्या अभ्यासाला हळूहळू लागतो ५४.

अभ्यासीं प्रथम भूमिका । शिकावी आसनगाढिका ।
मूळबंध अतिनेटका । आसनजयो देखा शिकावा ॥५५॥
अभ्यासाला लागले असता त्यांतील पहिले काम म्हणजे आसन स्थिर करावयास शिकावयाचें हें होय. मूळबंधावर आसन नीट घालून आसनजय करावयाला शिकावें ५५.

आसनजयो आल्या हाता । सहजें चढे योगपंथा ।
तेथें प्राणापानसमता । अभ्यासितां हों लागे ॥५६॥
आसनजय साध्य झाला असतां तो सहज योगमार्गाला लागतो, आणि त्या वेळी अधिक अभ्यास केला असतां प्राण आणि अपान ह्यांचीही समान स्थिति होऊं लागतें ५६.

विषय ते मनाआधीन । मन पवनासी वश्य जाण ।
अभ्यासें वश केला पवन । सहजें मन स्थिरावे ॥५७॥
विषय हें मनाच्या आधीन असतात; मन वायूला वश असतें. ह्यामुळें अभ्यासानें वायूलाच वश करून घेतलें, म्हणजे मन आपोआपच स्थिर होतें ५७.

यापरी जो हळू हळू । अभ्यासें सार्थक करी काळू ।
अविरक्त परी प्रबळू । होय भुकाळू परमार्थी ॥५८॥
ह्याप्रमाणें जो हळूहळू अभ्यासानें कालाचें सार्थक करतो, तो विरक्त नसला तरी तो महान् सामर्थ्यवंत असून परमार्थाविषयीं तर फारच भुकाळू होतो ५८.

हरिचिंतनीं एकाग्र मन । तैं एक होती प्राणापान ।
हाचि पवनजयो पूर्ण । योगसाधन सहजेंचि ॥५९॥
हरिचिंतनामध्यें मन एकाग्र करीत गेलें म्हणजे प्राण आणि अपान हे दोन्ही वायु एकरूप होऊन जातात. वायूचा परिपूर्ण जय तो हाच, तो साधला म्हणजे सहजच योगसाधन घडतें ५९.

तंव प्राणापान सम जोडी । षट्चक्रांचे पदर फोडी ।
तैं विषयांतें चित्त सांडी । विषयो वोसंडी चित्तातें ॥२६०॥
त्या वेळी प्राणापानांची समसमान जोडी सहाही चक्रांचे पदर फोडून टाकतें. तेव्हां चित्त विषयांना सोडून देतें, व विषयही चित्ताला सोडून देतात २६०.

यापरी या अभ्यासवाटे । सकाम कामाचा तटका तुटे ।
सनकादिक येणें परिपाठें । म्यां आत्मनिष्ठे लाविले ॥६१॥
ह्याप्रमाणे या अभ्यासाच्या मार्गानें वासनायुक्त इच्छेचा संबंधच तुटून जातो. ह्याच मार्गानें मी सनकादिकांना आत्मज्ञानाकडें वळविलें ६१.

एतावान् योग आदिष्टो मच्छिष्यैः सनकादिभिः ।
सर्वतो मन आकृष्य मय्यद्धाऽऽवेश्यते यथा ॥ १४ ॥
[श्लोक १४] सर्व विषयांपासून मनाला बाजूला करून ते प्रत्यक्ष माझ्यामध्येच स्थिर करावे माझे शिष्य असणार्‍या सनकादिकांनी योगाचे हेच स्वरूप सांगितले आहे. (१४)
येणेंचि उपदेशें देख । माझे शिष्य सनकादिक ।
अभ्यासबळें अलोकिक । निजात्मसुख पावले ॥६२॥
हे पहा ! ह्याच उपदेशानें माझे सनकादिक शिष्य आपल्या अभ्यासाच्या सामर्थ्यानेंच अलौकिक असें आत्मज्ञानाचें सौख्य पावलें ६२.

तो उपदेश कोण म्हणसी । जो वियोग चित्तविषयांसी ।
हें म्यां सांगोनियां त्यांसी । आत्माभ्यासीं लाविलें ॥६३॥
असा तो उपदेश कोणता ? असें म्हणशील, तर जो चित्त आणि विषय ह्यांचा संबंध तोडून टाकावयाचा, तोच. हें मी त्यांना सांगून आत्मज्ञानाच्या अभ्यासाला लावलें ६३.

मन जेथें जेथें जाये । तेथें तेथें वस्तूचि आहे ।
येणें अभ्यासें लवलाहें । सनकादिक पाहें सिद्ध झाले ॥६४॥
मन जिकडे जिकडे जाईल, तिकडे तिकडे परब्रह्मच भरलेलें आहे अशी भावना धरण्याची संवयच लागल्यामुळें, सनकादिक ब्रह्मस्वरूप झालें पहा ! ६४.

चित्तासी विषयांचा वियोगू । हा सनकादिकीं साधिला योगू ।
त्यांसी उपदेशावया सांगू । मी स्वयें श्रीरंगू उपदेष्टा ॥६५॥
चित्ताला विषयांचा वियोग घडविणे हाच योग सनकादिकांनी साधला. त्यांना याचा यथासांग उपदेश करावयास मीच श्रीकृष्ण स्वतः उपदेशक झालों ६५.

तें ऐकोनि उद्धव पाहीं । विचारी आपुलिया ठायीं ।
मी श्रीकृष्णावेगळा कंहीं नाहीं । सनकादिक कंहीं उपदेशिले ॥६६॥
हें उद्धवानें श्रवण करतांच तो आपल्या ठिकाणी विचार करू लागला की, मी तर श्रीकृष्णाला सोडून कधीच राहिलों नाही, असे असतां सनकादिकांना ह्यानें उपदेश केला तरी केव्हां ? ६६.

सनकादिक ब्रह्मशीळ । पूर्वीं जाहले बहुकाळ ।
कृष्ण ये काळींचें देवकीबाळ गुरुत्व केवळ घडे कैसें ॥६७॥
सनकादिक हे फार पूर्वीच्या काळीं ब्रह्मरूप झालेले आहेत. आणि हा कृष्ण तर या काळांतील देवकीचा मुलगा. त्याला हें गुरुत्व घडणार कसें ? ६७.

श्रीउद्धव उवाच ।
यदा त्वं सनकादिभ्यो येन रूपेण केशव ।
योगमादिष्टवानेतद् रूपमिच्छामि वेदितुम् ॥ १५ ॥
[श्लोक १५] उद्धवाने विचारले – हे केशवा ! हा योग आपण सनकादिकांना ज्यावेळी ज्या रूपाने उपदेशिला होता, ते रूप मी जाणून घेऊ इच्छितो. (१५)
उद्धव म्हणे गा केशवा । सनकादिकांसी केव्हां ।
उपदेश केला गा तुवां । जवळी तेव्हां मी कां नव्हतों ॥६८॥
असें मनांत आणून उद्धव म्हणाला, “हे श्रीकृष्णा ! तूं सनकादिकांना केव्हां उपदेश केलास ? त्या वेळीं मी कां जवळ नव्हतों ? ६८.

येणेंचि रूपें हृषीकेशी । योग सांगीतला तयांसी ।
किंवा रूपांतरें म्हणसी । तें जाणावयासी मज इच्छा ॥६९॥
देवा, ह्याच स्वरूपानें त्यांना योग सांगितलास, की दुसऱ्या कोणत्या रूपानें केला म्हणतोस ? तें समजून घेण्याची मला इच्छा आहे ६९.

कोण काळ समयो कोण । कोण योग कैसा प्रश्न ।
तें कृपा करोनि आपण । मज संपूर्ण सांगावें ॥२७०॥
तो काळ कोणता ? ती वेळ कोणती ? आणि त्याकरितां त्यांनी प्रश्न कसा केला ? आपण मला संपूर्ण सांगावें” २७०.

ऐकोनि उद्धवाचा प्रश्न । कृपा कळवळला नारायण ।
हंस‍इतिहासनिरूपण । आपुलें आपण सांगत ॥७१॥
हा उद्धवाचा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण कृपनें गहिवरला आणि तो आपली हंसाची कथा आपणच सांगूं लागला २७१.

श्रीभगवानुवाच ।
पुत्रा हिरण्यगर्भस्य मानसाः सनकादयः ।
पप्रच्छुः पितरं सूक्ष्मां योगस्यैकान्तिकीं गतिम् ॥ १६ ॥
[श्लोक १६] श्री भगवान म्हणाले – ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनकादिकांनी एकदा आपल्या वडिलांना योगाची सूक्ष्म आणि अंतिम मर्यादा विचारली होती. (१६)
ब्रह्मयाचे मानसपुत्र । महाप्रसिद्ध सनत्कुमार ।
तिंहीं सत्यलोकीं प्रश्न थोर । अतिदुस्तर पूशिला ॥७२॥
महाप्रसिद्ध सनकुमार हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. त्यांनी सत्यलोकामध्यें, अत्यंत गहन असा एक प्रश्न विचारला होता. ७२.

अतिसूक्ष्म योगगती । दुर्ज्ञेय स्वस्वरूपस्थिती ।
परम कठिण प्रश्नोक्ती । पित्याप्रती पूशिली ॥७३॥
तो हा कीं, योगाची गति अत्यंत सूक्ष्म आहे, आणि आत्मस्वरूपाची स्थिति समजण्याला परम दुर्घट आहे, ती कशी समजेल ? असा बिकट प्रश्न त्यांनी आपल्या पित्याला विचारला. ७३.

सनकादय ऊचुः ।
गुणेष्वाविशते चेतो गुणाश्चेतसि च प्रभो ।
कथमन्योन्यसंत्यागो मुमुक्षोरतितितीर्षोः ॥ १७ ॥
[श्लोक १७] सनकादींनी विचारले – तात ! हे चित्त स्वभावतःच विषयांचे ठिकाणी आसक्त राहाते आणि ते विषय वासनारूपाने चित्तात राहातात तर मग या संसारसागरातून तरून जाऊ इच्छिणार्‍या मुमुक्षूने त्यांना एकमेकांपासून दूर कसे ठेवावे ? (१७)
सनकादिक पुसत । विषयांच्या ठायीं चित्त ।
स्वभावें असे विषयासक्त । तें विषयीं सतत आवेशलें ॥७४॥
सनकादिकांनीं विचारलें, “चित्त हें स्वभावधर्माप्रमाणेंच विषयांमध्यें आसक्त असते, म्हणून तें नेहमीं विषयांतच गुंतून राहतें ७४.

तैसेचि विषय पाहीं । प्रवेशले चित्ताच्या ठायीं ।
वासनारूपें जडले तेही । निघों कंहीं नेणती ॥७५॥
त्याचप्रमाणें विषय असतात तेही चित्तामध्यें शिरून वासनेच्या रूपानेंच त्याला चिकटून राहतात. म्हणून तेथून कधींही निघू शकत नाहींत ७५.

फळ काळ दोनी नाहीं । तरी तैंचे आंबे गोड पाहीं ।
ऐसे विषय चित्ताचे ठायीं । रिघाले कंहीं न निघती ॥७६॥
फळ आणि काळ ही दोन्ही नसलीं तरी त्या वेळचे आंबे गोडच असतात. त्याप्रमाणेंच विषय हे एकदा चित्तांत शिरले कीं, तेथून कधी निघत नाहींत ७६.

पर्णिली कांता माहेरा जाये । चित्तीं रिघाली दूरी न राहे ।
यापरी विषयो पाहें । जडला ठाये चित्तासी ॥७७॥
लग्नाची स्त्री माहेरीं गेली, तरी ती मनांतून लांब जात नाहीं, त्याप्रमाणें विषयही चित्ताला जखडून बसलेला असतो ७७.

चित्त विषयो अन्योन्यत्यागू । मुमुक्षां केवीं घडे चांगू ।
ये उपायीं उपाययोगू । स्वामीनें साङ्गू सांगावा ॥७८॥
ह्यास्तव चित्त आणि विषय यांची परस्पर पूर्ण ताटातूट मुमुक्षूंना घडणार कशी ? ह्याच्या निरसनार्थ एखादा उपाययोग स्वामीनें यथासांग सांगावा” २७८.

श्रीभगवानुवाच ।
एवं पृष्टो महादेवः स्वयंभूर्भूतभावनः ।
ध्यायमानः प्रश्नबीजं नाभ्यपद्यत कर्मधीः ॥ १८ ॥
[श्लोक १८] भगवान श्रीकृष्ण म्हणाले – भूतांना उत्पन्न करणार्‍या श्रेष्ठ स्वयंभू ब्रह्मदेवाला सनक इत्यादींनी असा प्रश्न केला होता परंतु त्याची बुद्धी कर्माच्या ठिकाणी आसक्त असल्याकारणाने पुष्कळ विचार करूनही त्याला प्रश्नाचा आशय कळला नाही. (१८)
ज्यासी अग्रपूजेचा सन्मान । श्रेष्ठ देवांमाजीं महिमान ।
महादेव म्हणावया कारण । ब्रह्मयासी जाण या हेतू ॥७९॥
ज्याला अग्रपूजेचा मोठा मान आहे, सर्व देवांमध्यें ज्याचा महिमा श्रेष्ठ आहे, त्या ब्रह्मदेवाला श्रेष्ठ देव म्हणावयास त्याचा हा मोठेपणाच कारण आहे ७९.

जो आंगें स्रजी चराचर । जो वेदांचें निजमंदिर ।
त्या ब्रह्मयाप्रती अतिगंभीर । प्रश्न महाथोर पुत्रीं केला ॥२८०॥
जो स्वतः चराचरसृष्टि उत्पन्न करतो, जो वेदांचें वसतिस्थान आहे, त्या ब्रह्मदेवाला त्याच्या श्रेष्ठ पुत्रांनीं असा मोठा गहन प्रश्न विचारला २८०.

त्या प्रश्नाची प्रश्नोत्तरविधी । ब्रह्मयासी न कळे त्रिशुद्धी ।
कर्मजड झाली बुद्धी । बोधकसिद्धी स्फुरेना ॥८१॥
पण त्या प्रश्नाचें यथायोग्य उत्तर कसे द्यावें हें ब्रह्मदेवाला खरोखर कळलें नाहीं. कारण कर्माच्या योगानें त्याची बुद्धि मंद झाली होती. त्याला ज्ञानोपदेश करण्याचें सुचेना ८१.

प्रश्न अत्यंत सखोल पडिला । तेणें ब्रह्मा वेडावला ठेला ।
कांहीं न बोलवे जी बोला । तो चिंतूं लागला मज तेव्हां ॥८२॥
प्रश्न तर अत्यंत गहन पडला. त्यामुळें ब्रह्मदेव वेडा होऊन राहिला. त्याला मुळींच शब्द बोलवेना. तेव्हां तो माझें चिंतन करूं लागला ८२.

सनकादिकांची प्रश्नावस्था । सत्यलोकीं समस्तांदेखतां ।
न कळे न म्हणवे सर्वथा । सांगों जातां नव्हे बोध ॥८३॥
सत्यलोकामध्यें सर्वांच्या देखत सनकादिकांनीं प्रश्न केलेले ऐकून ते आपल्याला मुळींच कळत नाहीत असें म्हणवेना आणि उत्तर सांगावयास जावें तर त्याविषयी कांहींच ज्ञान होईना ८३.

ऐसें ब्रह्मयासी दुर्घट । कांहीं न बोलवे स्पष्ट ।
परम देखोनि संकट । मी ज्ञानवरिष्ठ चिंतिलों ॥८४॥
असें ब्रह्मदेवाला मोठें संकट पडलें. स्पष्ट अंसे कांहींच सांगतां येईना. असें परम संकट पाहून त्यानें मज ज्ञानश्रेष्ठाचें चिंतन केलें ८४.

स मामचिंतयद् देवः प्रश्नपारतितीर्षया ।
तस्याहं हंसरूपेण सकाशमगमं तदा ॥ १९ ॥
[श्लोक १९] प्रश्नाचे उत्तर समजून घेण्यासाठी ब्रह्मदेवाने माझे स्मरण केले तेव्हा मी हंसरूपाने त्याच्यासमोर प्रगट झालो. (१९)
निरसावया पुत्राचें अज्ञान । आणि तरावया त्यांचा प्रश्न ।
ब्रह्मा करी माझें चिंतन । तेव्हां माझेंही मन कळवळलें ॥८५॥
पुत्रांचें अज्ञान नाहींसें करण्याकरितां, आणि त्यांच्या प्रश्नाचें उत्तर मिळावें म्हणून ब्रह्मदेव माझे स्मरण करूं लागला, तेव्हां माझेंही मन कळवळलें. ८५,

ब्रह्मा माझे पोटींचे बाळ । त्यासी कर्मजाड्यें आलें पडळ ।
तें निरसावया तत्काळ । हंस केवळ मी जाहलों ॥८६॥
ब्रह्मदेव माझ्याच पोटचें अपत्य होय. त्याच्या दृष्टीवर कर्माच्या जाड्यतेनें अज्ञानाचा पडदा आला होता, तो तत्काळ काढून टाकण्यासाठी मी केवळ हंस झालों ८६

प्रश्न केला अपरंपार । जो परमहंसाचें परम सार ।
त्याचा पावावया परपार । हंसरूपधर मी जाहलों ॥८७॥
त्यांनी फार गहन प्रश्न केला होता. जो परमहंसाचें परमतत्त्व, अशा त्या प्रश्नांतून पार पडण्यासाठी मी हंसाचें स्वरूप धारण केलें. ८७.

नातळे वर्णव्यक्तिविलास । तो मी श्वेतवर्ण स्वप्रकाश ।
स्वयें झालों राजहंस । ब्रह्मपुत्रांस उपदेशावया ॥८८॥
वर्ण किंवा व्यक्ति यांच्या पसाऱ्याला स्पर्शसुद्धा करीत नाहीं असा तो मी श्वेतवर्ण असून स्वयंप्रकाशच आहें. तो मी ब्रह्मदेवाच्या पुत्रांना उपदेश करण्यासाठीं स्वतः राजहंस झालों ८८.

सृष्टि स्त्रजावयाचे विधी । विधाता लागला त्रिशुद्धी ।
तेणें कर्मजड झाली बुद्धी । निजज्ञानसिद्धी विसरला ॥८९॥
खरोखर ब्रह्मदेव सृष्टि निर्माण करण्याच्या कामांत गुंतला होता, म्हणून त्या कर्मानें त्याची बुद्धि जड झाली, आणि आत्मज्ञानाची सिद्धि तो विसरून गेला ८९.

जो म्हणे मी कर्माधिकारी । तेव्हांचि तो देहधारी ।
तो परमार्थाचे नगरीं । न सरे निर्धारीं बाह्यमुद्रा ॥२९०॥
मी कर्माचा अधिकारी आहें असें जो म्हणतो, तो त्याच वेळी देह धारण करणारा होतो. तो परमार्थाच्या नगरांत केवळ बाह्य स्वरूपानें कधींच शिरावयाचा नाहीं २९०.

‘न कर्मणा न प्रजया’ ऐसी वेदोक्ति । कर्म निषेधें त्यागवि श्रुती ।
तेणें कर्में ब्रह्मप्राप्ती । जे म्हणती ते अज्ञान ज्ञाते ॥९१॥
‘न कर्मणा न प्रजया’-ब्रह्मप्राप्ति ही कधीं कर्मानें होत नाही आणि पुत्राच्या द्वारेंही होत नाही-अशी वेदोक्ति आहे. अशा प्रकारें श्रुति कर्माचा निषेध सांगून त्याचा त्याग करविते. त्याच कर्मानें ब्रह्मप्राप्ति होईल असें जे म्हणतात, ते ज्ञाते असले तरी अज्ञानी होत ९१.

म्यां उपदेशिलें ब्रह्मयासी । शेखीं कर्मजाड्य आलें त्यासी ।
केवळ कर्में कर्मठासी । मुक्ति तयासी कैसेनी ॥९२॥
मी ब्रह्मदेवाला उपदेश केला होताच, पण शेवटी कर्मानें त्याला जाड्य आलें. मग जो कर्मानें केवळ कर्मठच झाला आहे, त्याला मुक्ति कशानें प्राप्त होणार ? ९२.

ब्रह्मा अदृष्टद्रष्टा लोकीं तिहीं । तो कर्मजाड्यें झाला विषयी ।
इतरांचा तो पाड कायी । ठकले ये ठायीं सज्ञान ॥९३॥
ब्रह्मदेव हा त्रिभुवनांत सर्वांच्या अदृष्टाचा जाणता असून तोसुदा कर्मजाड्यानें विषयी साला. मग इतरांची ती कथा काय ? ह्यामध्यें मोठमोठे शातेसुद्धा फसले ! ९३.

सांगतां पुत्रांचा प्रश्न । उजळेल ब्रह्मयाचें निजज्ञान ।
ऐसें साधोनियां विंदान । सत्यलोकीं जाण उतरलों ॥९४॥
पुत्रांच्या प्रश्नाचें उत्तर सांगतांना ब्रह्मदेवाचें ज्ञानही उज्ज्वलित होईल, अशी संधि साधून मीही सत्यलोकांत उतरलों ९५.

प्रश्नकर्ते सनकादिक । वक्ता सत्यलोकनायक ।
दोहींसीही पडली अटक । ते काळीं देख मी आलों ॥९५॥
प्रश्न करणारे सनकादिक, आणि वक्ता ब्रह्मदेव, पण त्या दोघांनाही जेव्हां संकट पडलें, तेव्हां मी तेथें प्रकट झालों ९५.

नासों नेदितां साचार । हंस निवडी क्षीरनीर ।
तैसें निवडावया सारासार । ज्ञानचतुर मी राजहंस ॥९६॥
खरोखर हंस जसा दूध नासूं न देतां त्यांतील दूध आणि पाणी वेगळें वेगळें करतो, त्याप्रमाणें सार कोणतें आणि असार कोणतें हें निवडण्याकरिता मी ज्ञानानें चतुर असा राजहंसच आहें ९६.

पूर्वपुण्यसंचयेंवीण । विमानेंवीण स्वयें गमन ।
सत्यलोकीं आगमन । कोणाचेंही जाण कदा नव्हे ॥९७॥
पूर्वपुण्याईचा सांठा असल्याशिवाय किंवा दिव्य विमानाशिवाय स्वत: प्रवास करून सत्यलोकामध्यें कोणाचाही प्रवेश कधींही घडत नाहीं ९७.

मी पापपुण्यातीत पाहीं । यालागीं मज पाप पुण्य नाहीं ।
पाखीं कां चालोनि पायीं । तो मी सर्वां ठायीं सर्वगतू ॥९८॥
पण मी पापपुण्यांच्या पलीकडचा आहें. त्यामुळें मला पापपुण्य नाहीं. तरी असा मी पंखांनीं किंवा पायांनीं चालून सर्वत्र पाहिजे तेथें पाहिजे तेव्हां जाऊं शकतों ९८.

त्या सत्यलोका मी अवचितां । हंसस्वरूपें झालों येता ।
त्या मज देखोनियां समस्तां । परमाश्चर्यता वाटली ॥९९॥
त्या सत्यलोकाला अकस्मात मी हंसरूपानें आलों. त्या मला पाहून सर्वांना अत्यंत आश्चर्य वाटलें ९९.

दृष्ट्वा मां त उपव्रज्य कृत्वा पादाभिवंदनम् ।
ब्रह्माणमग्रतः कृत्वा पप्रच्छुः को भवानिति ॥ २० ॥
[श्लोक २०] हे उद्ववा ! तत्त्व जाणून घेण्यासाठीच आलेल्या मुनींनी मला असे विचारले, तेव्हा मी त्यांना जे सांगितले, ते ऐक. (२०)
परब्रह्मैक परम मूर्ती । मज येतां देखोनि हंसस्थितीं ।
उभे ठाकोनि सामोरे येती । चरण वंदिती साष्टांग ॥३००॥
केवळ परब्रह्मस्वरूप अशी माझी श्रेष्ठ मूर्ति, त्या मला हंसरूपानें येतांना पाहून सर्व देव उभे राहून मला सामोरे आले, आणि त्यांनी माझ्या चरणाला साष्टांग नमस्कार घातला ३००.

ब्रह्मसदनीं वेद मूर्तिमंत । पुण्यही मूर्तिमंत तेथ ।
सत्यलोकीं मूर्तिमंत सत्य । तपादि समस्त मूर्तिमंतें ॥१॥
ब्रह्मलोकांत वेद हे मूर्तिमंत असतात, तेथे पुण्यही मूर्तिमंत असते, सत्यलोकांत सत्य हें मूर्तिमंत आहे आणि तपादि सर्व तेथें मूर्तिमंत असतात ३०१.

त्या समस्तां देखतां जाण । ब्रह्मयानें पुसावें तूं कोण ।
पुसल्या येईल नेणतेपण । यालागीं मौन धरोनि ठेला ॥२॥
त्या सर्वांच्या देखत “तूं कोण ?” असें जर ब्रह्मदेवानें मला विचारावें, तर तसें विचारलें असतां त्याच्याकडे अज्ञानपणा येईल, म्हणून तो मौन धरूनच बसला २.

ब्रह्मा पुढें करूनि जाण । सनकादिकीं आपण ।
मज केला गा तिंहीं प्रश्न । तुम्ही कोण कोठील ॥३॥
आणि ब्रह्मदेवाला पुढें करून त्या सनकादिकांनीं स्वतः मला प्रश्न केला कीं “तुम्ही कोण ? आणि कोठचे ?” ३.

इत्यहं मुनिभिः पृष्टस्तत्त्वजिज्ञासुभिस्तदा ।
यदवोचमहं तेभ्यस्तदुद्धव निबोध मे ॥ २१ ॥
[श्लोक २१] तेव्हा मला पाहून सनकादिक ब्रह्मदेवाला पुढे करून माझ्याजवळ आले त्यांनी मला प्रणाम केला आणि विचारले की, “आपण कोण आहात ?” हे उद्ववा ! तत्त्व जाणून घेण्यासाठीच आलेल्या मुनींनी मला असे विचारले, तेव्हा मी त्यांना जे सांगितले, ते ऐक. (२१)
ब्रह्मयासी पुसिला जो प्रश्न । त्याचा तत्त्वार्थ जाणावया जाण ।
मज पुशिलें तिंहीं तूं कोण । अतिविचक्षण जिज्ञासू ॥४॥
त्यांनीं ब्रह्मदेवाला जो प्रश्न केला होता, त्यांतील मथितार्थ मला जाणतां यावा म्हणून त्यांनीं मला विचारलें कीं, “तूं कोण ?” असे ते अत्यंत चतुर व जिज्ञासु होते ४.

त्यासी स्थूळ लिंग कारण । यावेगळी वस्तु चिद्‌घन ।
सांगावया प्रश्नखंडण । तीं श्लोकीं जाण म्यां केलें ॥५॥
त्यावर स्थूलदेह, लिंगदेह आणि कारणदेड ह्यांशिवाय असलेली वस्तु चैतन्यस्वरूप आहे, हें सांगण्याकरितां त्या प्रश्नाचे खंडन मी तीन श्लोकांनीं केलें असें समज ५.

करोनियां प्रश्नखंडण । नित्यानित्यविवेकज्ञान ।
त्यांसी म्यां सांगीतलें जाण । तेंचि निरूपण तूं ऐक ॥६॥
त्यांच्या प्रश्नाचें खंडन करून नित्यानित्यविवेकाचें ज्ञान मीं त्यांना सांगितले. तेंच निरूपण तूं ऐक ६.

सनकादिकांसमान । उद्धवा तुज मी मानीं जाण ।
यालागीं त्यांचें ज्ञानकथन । ऐक सांगेन म्हणतसें ॥७॥
उद्धवा ! तुला मी सनकादिकांप्रमाणेंच मानतों हें लक्षात ठेव. म्हणूनच त्यांना जें ज्ञान सांगितलें तें तुलाही सांगेन म्हणतों. ऐक ७.

तें अतिश्रेष्ठ जुनाट ज्ञान । उद्धवा परिसें सावधान ।
ऐसें ऐकोनियां वचन । येरें मनाचे कान पसरले ॥८॥
तें ज्ञान अत्यंत श्रेष्ठ असून जुनाट आहे. ह्याकरितां उद्धवा ! लक्ष देऊन ऐक. असें भाषण ऐकून उद्धवानें मनाचेच कान पसरले ! ८.

देहद्वय सांडोनि मागें । उद्धव श्रवण झाला सर्वांगें ।
यालागीं स्वयें श्रीरंगें । गुह्य ज्ञान स्वांगें सांगीतलें ॥९॥
स्थूलदेह व सूक्ष्मदेह ह्यांना मागें टाकून उद्धव हा सर्वांगानें कर्णरूपच झाला. म्हणून श्रीकृष्णानें स्वतः आपण होऊन त्याला गुप्त ज्ञान सांगितलें ९.

देवालयीं लागे रत्‍नखाणी । त्यांमाजीं सांपडला स्पर्शमणी ।
अमृत स्रवे त्यापासोनि । तैसा सभाग्यपणीं उद्धवू ॥३१०॥
देवालयांत रत्नाची खाण सांपडावी, त्यांत परिस सांपडावा, आणि त्या परिसापासून अमृताचा पाझर फुटावा, त्याप्रमाणेंच त्या उद्धवाला मोठे भाग्य प्राप्त झालें होतें १०.

सांगता श्रीमहाभागवता । श्रीकृष्णासारिखा वक्ता ।
त्याहीमाजी हंसगीतकथा । आदरें सांगता हरि झाला ॥११॥
श्रीमद्‌भागवत सांगणारा श्रीकृष्णासारखा वक्ता मिळाला, आणखी त्यामध्यें ही हंसगीताची कथा श्रीकृष्ण मोठ्या आवडीनें सांगू लागले ११.

सनकादिकांची जे प्राप्ती । ते दाटूनि उद्धवाचे हातीं ।
स्वयें देतसे श्रीपती । त्याचें भाग्य किती वर्णावें ॥१२॥
अहो ! सनकादिकांचा जो वांटा, तो आपण होऊन श्रीकृष्ण स्वत: उद्धवाच्या हातांत देत होता, तेव्हां त्याचें भाग्य किती वर्णन करावें ? १२.

ब्रह्मरूप स्वयें वक्ता । तोही उपदेशी ब्रह्मकथा ।
गुरु ब्रह्मचि स्वभावतां । हे सभाग्यता उद्धवीं ॥१३॥
वक्ता हा स्वतःच ब्रह्मस्वरूप, तोही ब्रह्मकथेचाच उपदेश करणार, तेव्हां सहजच परब्रह्म गुरु झाले. एवढे उद्धवाचें भाग्य ! १३.

यालागीं निजभाग्यें भाग्यवंतू । जगीं उद्धवचि अतिविख्यातू ।
ज्यालागीं स्वयें जगन्नाथू । ज्ञानसमर्थू तुष्टला ॥१४॥
म्हणून आत्मभाग्यानें भाग्यवंत व जगामध्यें अत्यंत प्रसिद्ध असा एक उद्धवच होय. ज्याच्याकरितां स्वतः ज्ञानसमर्थ असा जगन्नाथ प्रसन्न झाला १४.

हंस उवाच –
वस्तुनो यद्यनानात्वं आत्मनः प्रश्न ईदृशः ।
कथं घटेत वो विप्रा वक्तुर्वा मे क आश्रयः ॥ २२ ॥
[श्लोक २२] हे विप्रवर ! जर आत्म्याबद्दल आपला हा प्रश्न असेल तर, आत्मारूप वस्तू एकच आहे मग तुमचा हा प्रश्न कसा योग्य आहे ? बरे ! उत्तर देण्यासाठी जर मी बोलू लागलो, तर निर्विशेष आत्म्याविषयी कशाचा आधार घेऊन बोलू ? (२२)
परमात्मा अवघा एक । तेथ ‘मी तूं’ हें न रिघे देख ।
‘तूं कोण’ हें जें वाचिक । वृथा शाब्दिक वाचाळे ॥१५॥
परमात्मा सर्वत्र एकच आहे. त्यांत ‘मी’ आणि ‘तूं’ हे मुळीं शिरतच नाही. म्हणून ‘तूं कोण’ हें जें भाषण आहे, तें व्यर्थ शब्दांची बडबड होय १५.

तुम्हीं केला जो प्रश्न । त्यासी द्यावया प्रतिवचन ।
वक्त्यासी आश्रयो नाहीं जाण । मीतूंपण दिसेना ॥१६॥
तुम्हीं जो प्रश्न केलात, त्याला प्रत्युत्तर द्यावयाला वक्त्याला जागाच नाही. कारण, मीतूंपणा म्हणून कांही दिसतच नाहीं १६.

तुम्हीं पुसिलें नेणोन । म्यां काय सांगावें जाणोन ।
मूळीं नाहीं मीतूंपण । पुशिला प्रश्न तो मिथ्या ॥१७॥
हें न जाणून तुम्हीं प्रश्न केलात, पण हें मी जाणत असून त्याचें उत्तर तुम्हाला काय द्यावें ? मीतूंपणा हाच मुळांत नाहीं, म्हणून तुम्हीं विचारलेला तो प्रश्न मिथ्या आहे १७.

नामरूपवर्णव्यक्ती । नाहीं स्वजातिविजाती ।
विप्र हो तुमची वचनोक्ती । न घडे निश्चितीं सत्यत्वें ॥१८॥
नाम, रूप, वर्ण, व्यक्ति हें कांहींच नाही. आपली जात आणि परकी जात नाही. म्हणून हे विप्र हो ! तुम्हीं केलेलें भाषणही खरोखर सत्यत्वानें होऊंच शकत नाहीं १८.

चारी पुरुषार्थ पूर्ण करिती । हे विप्रनामाची परमख्याती ।
त्या तुम्हां सज्ञानाची प्रश्नोक्ती । न घडे निश्चितीं विप्र हो ॥१९॥
चारही पुरुषार्थ पूर्ण करणारे अशी तर ब्राह्मणांच्या नांवाची मोठी ख्याति आहे. पण विप्र हो ! त्या तुम्हांला खरोखर ज्ञानाचा प्रश्नच उपस्थित होऊं शकत नाहीं १९.

असावें जरी बहुपण । तरी पुसणें घडे तूं कोण ।
आत्म्याचे ठायीं ऐसा प्रश्न । न घडे जाण सर्वथा ॥३२०॥
जर अनेकत्व असेल तरच तूं कोण असें विचारणें शक्य होईल. आत्म्याच्या ठिकाणी असा प्रश्न मुळींच करता येणार नाहीं ३२०.

प्रश्न न घडे आत्म्याच्या ठायीं । जरी म्हणाल देहाविषयीं ।
तेंही न घडे गा पाहीं । तो देहाचे ठायीं योजेना ॥२१॥
आत्म्याच्या ठिकाणीं असा प्रश्न उपस्थित होऊंच शकत नाहीं, म्हणून जर देहाविषयीं म्हणत असाल, तर तेथेंही असा प्रश्न उपस्थित होत नाहीं. देहाच्या ठिकाणीं तो लागू पडत नाहीं २१.

पञ्चात्मकेषु भूतेषु समानेषु च वस्तुतः ।
को भवानिति वः प्रश्नो वाचारंभो ह्यनर्थकः ॥ २३ ॥
[श्लोक २३] वास्तविक पंचमहाभूतात्मक तत्त्वे सर्व प्राण्यांमध्ये सारखीच आहेत म्हणून “आपण कोण ?” हा आपला प्रश्न म्हणजे फक्त शब्द आहेत तत्त्वतः त्याला काहीही अर्थ नाही. (२३)
आदी ब्रह्मा अंतीं मशक । देह तितुका पांचभौतिक ।
तेथ तूं कोण म्हणावया देख । वेगळीक दिसेना ॥२२॥
कारण ब्रह्मदेवापासून तों मशकापर्यंत देह म्हणून जेवढा आहे तेवढा पंचभूतात्मक आहे. तेव्हां त्यांत ‘तूं कोण’ असें म्हणावयाला वेगळेपणा दिसतच नाहीं २२.

कटक कुंडलें मुकुट माळा । करमुद्रिका कटिमेखळा ।
अलंकार पाहातां डोळां । सुवर्णावेगळा अंशु नाहीं ॥२३॥
कडीं, कुंडलें, मुकुट, माळा, हातांतील आंगठ्या, कमरपट्टा, किंवा इतर अलंकार डोळ्यांनीं पाहिले असतां त्यांत सोन्याशिवाय दुसरा अंशही दिसत नाहीं २३.

कां घडा गाडगें वेळणी । परळ रांजण माथणी ।
हें मृत्तिकेवांचुनी । आन कांहीं असेना ॥२४॥
किंवा घागर, मडकें, वेळणी, परळ, रांजण, माथणी हीं पाहिलीं तर त्यांतही मातीशिवाय दुसरें कांहींच असत नाहीं २४.

तेवीं सर्व देहीं देहत्वें जाण । पांचभौतिक समसमान ।
तेथ म्हणावया तूं कोण । वेगळेपण असेना ॥२५॥
त्याप्रमाणें सर्व देहांमध्यें देहपणानें पंचमहाभूतें समसमानच असतात. तेव्हां तेथें तूं कोण असें म्हणावयाला वेगळेपणाच असत नाहीं २५.

वस्तु वस्तुत्वें समसमान । भूतें भूतत्वें समान जाण ।
तेथ प्रश्नोक्ति वाचारंभण । ‘तूं कोण’ हें अनर्थू ॥२६॥
ब्रह्म है ब्रह्मपणानें समसमान आहे, आणि प्राणी प्राणित्वानें समान आहेत. तेव्हां तेथे प्रश्नोक्तीची भाषा सुरू करणें व ‘तूं कोण’ असें विचारणें हा अनर्थच होय २६.

हो कां आपणिया आपण । जो कोणी पुसेल तूं कोण ।
तो अतिभ्रमें भुलला जाण । निजात्मज्ञान विसरला ॥२७॥
किंवा आपल्यालाच आपण जो कोणी ‘तूं कोण’ म्हणून प्रश्न करील, तो अत्यंत भ्रमानें भुलला म्हणून समजावें. तो आत्मज्ञानच विसरला २७.

विचारितां प्रश्नाचा अर्थू । एवढा दिसतसे अनर्थू ।
कांहीं भासेना परमार्थू । तूं कोण हा व्यर्थू प्रश्न तुमचा ॥२८॥
तुमच्या प्रश्नाच्या अर्थाचा विचार करूं लागलें असतां एवढा अनर्थ दिसतो. त्यात कांहींच परमार्थ दिसत नाही. म्हणून ‘तूं कोण ?’ हा तुमचा प्रश्न व्यर्थ होय २८.

देहासी तूं कोण ऐसें । आत्मा जैं स्वयें पुसे ।
तैं आत्मत्वा लागलें पिसें । अतिभ्रंशें भूलला ॥२९॥
देहाला ‘तूं कोण ?’ असें आत्मा जेव्हा स्वतःच विचारतो, तेव्हां त्याच्या आत्मत्वाला वेड लागलें व तो अतिशय भ्रमानें भ्रांतींत पडला असें होईल २९.

दोराअंगीं सर्प नसे । त्यावरी तो भ्रमें भासे ।
त्या सर्पातें दोरू पुसे । तूं कोण ऐसें तें मिथ्या ॥३३०॥
दोराच्या आंगामध्यें काही सर्प नसतो. तो त्याच्यावर भ्रमानें भासतो. त्या सर्पाला जर ‘तूं कोण ?’ असें दोरच विचारील, तर ते खोटें ! ३०.

या रीतीं त्यांचें प्रश्नखंडन । उद्धवा तैं म्यां केलें जाण ।
तेणें भेदाचें निरसन । वचनोक्तीं जाण दाविलें ॥३१॥
उद्धवा ! अशा रीतीनें त्यांच्या प्रश्नाचें खंडण मी त्या वेळी केले, हें लक्षांत ठेव. त्या भाषणानें त्यांच्यांतील भेदभावाचें निरसन मी करून दाखविलें ३१.

प्रश्नखंडणाचे अर्थें । कैंचीं करणें कैंचीं भूतें ।
भेद नाहीं जीवशिवांतें । हेंही त्यांतें सूचिलें ॥३२॥
प्रश्नाचें खंडन करण्याच्या निमित्तानेंच, कसलीं इंद्रियें ? आणि कसले प्राणी ? जीव आणि शिव यांमध्यें भेद नाहीं असेंही त्यांना सुचविलें ३२.

याहीवरी जे कथा गहन । परम कारणेंसीं अभिन्न ।
त्यांसी म्यां सांगीतलें निजज्ञान । ऐक सावधान उद्धवा ॥३३॥
ह्याहूनही महाकारणाशी अभिन्न अशी जी गहन कथा म्हणजे आत्मज्ञान. तेंही मी त्यांना सांगितलें. उद्धवा ! लक्ष देऊन ऐक ३३.

मनसा वचसा दृष्ट्या गृह्यतेऽन्यैरपीन्द्रियैः ।
अहमेव न मत्तोऽन्यद् इति बुध्यध्वमञ्जसा ॥ २४ ॥
[श्लोक २४] मनाने, वाणीने, दृष्टीने किंवा अन्य इंद्रियांनी जे काही घेतले जाते ते सर्व “मीच आहे, माझ्याशिवाय दुसरे काहीच नाही” हे तुम्ही निश्चित समजा. (२४)
मजवेगळा तिळाइतुका । रिता ठावो नाहीं देखा ।
तेथ व्याप्य आणि व्यापका । अभिन्नत्व देखा सहजचि ॥३४॥
हें पहा ! माझ्याशिवाय तिळाइतकीसुद्धा रिकामी जागा नाहीं. तेव्हां व्याप्य आणि व्यापक ह्या दोघांना सहजच अभिन्नत्व आहे ३४.

मनाच्या संकल्पा आलें जें जाण । त्यासी शाब्दिक म्हणती भिन्न ।
माझ्या स्वरूपाचा विवर्त तें मन । हे अभिन्न खूण कळेना ॥३५॥
जें मनाच्या संकल्पाला येतें, त्याला शब्दपंडित भिन्न म्हणतात. परंतु माझ्या स्वरूपाचा जो भोंवरा तेंच मन ही अभिन्नपणाची खूण त्यांना कळत नाहीं ३५.

मन लक्षितां सावधान । सर्वथा लक्षेना तें जाण ।
परब्रह्मही अलक्ष्य पूर्ण । दोनी समान चिद्‌रूपें ॥३६॥
कितीही सावधपणानें मनाला पाहूं लागलें तरी तें मुळींच दृष्टीस पडत नाही. परब्रह्मही तसेंच पूर्णपणें अदृश्य आहे. म्हणून दोन्ही सारखींच चैतन्यस्वरूप होत ३६.

शिंपीच्या अंगीं रुपें आभासे । तेंचि तेथें साचें नसे ।
माझ्या स्वरूपीं मन तैसें । मिथ्या भासे कल्पनामात्र ॥३७॥
शिंपीच्या आंगी रुपें भासतें, पण तेंच रुपें तेथें खरें नसतें. त्याचप्रमाणें माझ्या स्वरूपामध्यें मन हें केवळ कल्पनामय असें मिथ्या भासतें ३७.

विचारितां शब्दमहिमान । शब्द स्वरूपें ज्ञानघन ।
ज्ञानार्थेंवीण वचन । अल्पही जाण असेना ॥३८॥
आतां शब्दाच्या मोठेपणाचा विचार केला, तर शब्द हा स्वरूपानें ज्ञानमयच आहे. ज्ञानाच्या अर्थाशिवाय लेशमात्रही भाषण असूं शकत नाहीं ३८.

वक्ता वाच्य वचन । तीनी मीचि आहें जाण ।
बोलु बोलका मजवीण । दुसरा जगीं कोण असे ॥३९॥
वक्ता, वाच्य आणि वचन हीं तिन्ही मीच आहे हें लक्षांत ठेव. शब्द बोलणारा माझ्याशिवाय जगांत दुसरा कोण आहे ? ३९.

मी वेदू जाण पां वेदांचा । प्रणवरूप मीचि साचा ।
मुख्य वाचेची मीचि वाचा । वेगळा शब्दाचा ठावो नाहीं ॥३४०॥
मी वेदांचा वेद आहें असें समज. मीच खरोखर ॐकारस्वरूप आहें. मुख्य वाणीची वाणी मीच आहे. शब्दाची जागा माझ्याशिवाय दुसरी नाहींच ३४०.

दृष्टीचें जें देखणेंपण । देखणें तेंचि मुख्य ज्ञान ।
तेंचि जाण ब्रह्म पूर्ण । चैतन्यघन निजदृष्टीं ॥४१॥
दृष्टीचें जें देखणेपण आहे तें देखणेंच मुख्य ज्ञान आहे. आत्मदृष्टीनें चैतन्यस्वरूप असें पूर्णबह्मही तेंच ४१.

मीचि डोळा मीचि देखता । दृश्य द्रष्टा मीचि तत्त्वतां ।
मजवेगळी देखणी अवस्था । नाहीं सर्वथा तिहीं लोकीं ॥४२॥
डोळा मीच, पाहाणारा मीच, दृश्य मीच व खरोखर द्रष्टाही मीच. माझ्याशिवाय पहाण्याची शक्ति त्रिभुवनांतसुद्धा मुळींच नाहीं ४२.

मीचि डोळियांचा निजडोळा । मी सर्वांगदेखणा सोज्ज्वळा ।
मजवेगळी देखणी कळा । नाहीं जिव्हाळा आणिकांचा ॥४३॥
डोळ्यांचा खरा डोळा मीच, सोज्ज्वळ सर्वांगदेखणा मी, माझ्याशिवाय पहाण्याच्या कलेला इतरांचा जिव्हाळा नाहीं ४३.

मीचि शब्दांतें शब्दविता । मीचि श्रवणांमाजीं श्रोता ।
ऐशिया एकात्मता पाहतां । शब्द निःशब्दता परब्रह्म ॥४४॥
शब्दाला बोलविणारा मीच, कर्णामध्यें ऐकणारा मीच, अशा ऐक्यभावनेंनें पाहिलें म्हणजे शब्दाची जी निःशब्दता तेंच परब्रह्म होय ४४.

कान वचन मीचि श्रोता । मीचि जाणता शब्दार्था ।
ऐकणाही मजपरता । नाहीं तत्त्वतां श्रवणाचा ॥४५॥
कान, भाषण आणि श्रोता मीच; शब्दाच्या अर्थाला जाणणारा मीच; व ज्याला कान आहेत असा ऐकणाराही खरोखर माझ्याशिवाय दुसरा कोणी नाहीं ४५.

मीचि घ्राण मीचि वास । मीचि जाणता सुवास ।
मजवेगळा रहिवास । परिमळास असेना ॥४६॥
नाक मीच, वास मीच, सुवास जाणणारा मीच. सुवासाला राहण्याचें ठिकाण माझ्याशिवाय दुसरें नाहीं ४६.

रसना रसज्ञत्वें चोखडी । परी ते केवळ चामडी ।
कापून सोडिल्या बापुडी । गोडी अगोडी ते नेणे ॥४७॥
जिव्हा ही रसज्ञपणानें मोठी उत्तम आहे, पण ती केवळ चामडीच ! ती बिचारी कापून टाकली असतां ती गोडी आणि अगोडी जाणत नाहीं ४७.

मीचि रसू मीचि रसना । स्वादु सेविता मीचि जाणा ।
मजवेगळा चवीचाखणा । रसज्ञपणा आन नाहीं ॥४८॥
रस मीच, रसना मीच आणि रस सेवन करणारा मीच. माझ्याशिवाय रसास्वाद जाणणारा रसिकपणा दुसरा नाहीं १८.

इतर इंद्रियप्रवृत्ती । त्याही मद्‌रूप जाण निश्चितीं ।
मी सर्वात्मा आत्ममूर्ती । क्रियाशक्ती तेही मीचि ॥४९॥
इंद्रियांच्या ज्या इतर प्रवृत्ति आहेत, त्याही खरोखर मद्रूपच आहेत हें लक्षांत सर्वांच्या अंतरात्म्यांत आत्मस्वरूपानें राहणारा मीच; आणि क्रियाशक्ति तीही मीच ४९.

पांचभौतिक देहाचा गोळा । भ्रांत म्हणती मजवेगळा ।
चुकोनि व्यापका सकळा । तो कोठें निराळा राहों लाहे ॥३५०॥
जे भ्रांतिष्ट लोक असतात ते हा पंचमहाभूतात्मक देहाचा गोळा माझ्याहून निराळा आहे असें म्हणतात. सर्वव्यापक अशा मला सोडून तो निराळा कोठें राहूं शकेल ? ३५०.

जैसे जळींचे जळतरंग । जळरूपें जळीं क्रीडती चांग ।
तैसे माझ्या स्वरूपीं साङ्ग । देह अनेग मद्‌रूपे ॥५१॥
ज्याप्रमाणें पाण्यांतील पाण्याच्या लाटा पाण्याच्याच स्वरूपानें पाण्यात मजेनें खेळत असतात, त्याप्रमाणेंच माझ्या स्वरूपामध्यें अनेंक देह मत्स्वरूपानेंच पूर्णपणे असतात ५१.

हो कां घृताची पुतळी । थिजोनि जाली एके काळीं ।
परी ते नव्हे घृतपणावेगळी । तेवीं भूतें झालीं मजमाजीं ॥५२॥
किंवा एखादे वेळी तुपाची थिजून पुतळी झाली, तरी ती कांहीं तूपपणापासून वेगळी नसते. त्याप्रमाणें माझ्यामध्यें हे जीव झाले आहेत ५२.

जळीं जळाची जळगार । जळामाजीं भासली साकार ।
तैसें मजमाजीं चराचर । अभिन्न साचार मद्‌रूपीं ॥५३॥
पाण्यामध्यें पाण्याचीच झालेली गार पाण्यामध्यें साकार आहे अशी भासते, त्याप्रमाणें माझ्यामध्येंच हें चराचर उत्पन्न होऊन खरोखर माझ्या स्वरूपांत अभिन्नच आहे ५३.

जैसा एकला एक तंतू । सुतेंचि विणिला सुताआंतू ।
त्यां वेगळाले म्हणती तांतू । तैसें मजआंतू जग भासे ॥५४॥
ज्याप्रमाणे एकटा एक तंतु सुतानेंच सुताच्या आंत विणलेला असतो, तरी त्याला वेगवेगळे तंतु असें म्हणतात, त्याप्रमाणेच माझ्यामध्यें जग भासते ५४.

तंतू पाहतां वस्त्र न दिसे । आत्मा लक्षितां जगचि नसे ।
येणें अद्वैततत्त्वसौरसें । आहे अनायासें परब्रह्म ॥५५॥
तंतूच पाहूं लागलें तर वस्त्रपणा दिसत नाही, त्याप्रमाणें आत्म्याला पाहूं लागलें असतां जगच नाहींसें होतें. अशा ऐक्यतत्त्वदृष्टीनें पाहिलें असतां अनायासें सर्व परब्रह्म आहे असें वाटतें ५५.

ऐसा अद्वैतबोधें मी एकू । सर्वात्मा सर्वात्मकू ।
हा निश्चयेंसीं विवेकू । बुद्धिबोधें निष्टंकू जाणावा ॥५६॥
असा ऐक्यभावानें मीच एक सर्वात्मा व सर्वात्मक आहे हा विचार निश्चयपूर्वक बुद्धीनें नि:संशय जाणावा ५६.

मीचि एक सर्वां ठायीं । हेंचि दृढ धरिल्या पाहीं ।
मग साधनाचें कार्य नाहीं । ठायींच पाहीं नित्यमुक्त ॥५७॥
सर्व ठिकाणी एक मीच आहे हाच दृढ निश्चय धरिला असतां मग इतर साधनाचें कांहीं कामच नाहीं. तो जागच्या जागीच नित्य मुक्त होतो ५७.

सर्वात्मा चैतन्यघन । अतिसुलभ हें निजज्ञान ।
उद्धवा म्यां हें सांगोन जाण । भेदखंडण केलें त्यांचें ॥५८॥
सर्वत्र भरलेला आत्मा चैतन्यस्वरूप आहे असें जाणणें हे आत्मज्ञान अत्यंत सुलभ आहे. उद्धवा ! मी हेच सांगून त्यांच्या भेदाचें खंडण केलें ५८.

सनकादिकांचा पूर्वील प्रश्न । जो ब्रह्मादिकां अटक जाण ।
त्याचेंही म्यां प्रतिवचन । विवंचूनि ज्ञान सांगितलें ॥५९॥
सनकादिकांचा जो पूर्वीचा प्रश्न ब्रह्मदेवादिकांनासुद्धा अडचणींत पाडणारा होता, त्याचेंही उत्तर देतांना मी अशा प्रकारें विवरण करून त्यांना ज्ञान सांगितलें ५९.

गुणेष्वाविशते चेतो गुणाश्चेतसि च प्रजाः ।
जीवस्य देह उभयं गुणाश्चेतो मदात्मनः ॥ २५ ॥
[श्लोक २५-] हे पुत्रांनो ! चित्त विषयाकार होते आणि विषय चित्तात वासनारूपाने राहातात परंतु विषय आणि चित्त हे दोन्ही माझेच स्वरूप असणार्‍या जीवाचे देह आहेत. (२५)
तुम्हीं ब्रह्मयासी पुसिलें पाहीं । विषय रिघाले चित्ताच्या ठायीं ।
चित्त जें रिघालें विषयीं । तें वेगळें कांहीं निवडेना ॥३६०॥
तुम्हीं ब्रह्मदेवाला जें विचारलें कीं, “चित्तामध्यें विषय शिरले, आणि चित्त विषयांत शिरले, म्हणजे तें कांहीं निराळें करतां येत नाहीं ३६०;

विषयत्यागेंविण । कदा नव्हे ब्रह्मज्ञान ।
त्याही त्यागाची त्यागिती खूण । ऐक संपूर्ण सांगेन ॥६१॥
आणि विषयत्याग केल्याशिवाय ब्रह्मज्ञान तर कधींच होत नाहीं. ” तेव्हां तोही त्याग कसा करतात त्याचें खरें लक्षण पूर्णपणें सांगतों ऐक ६१.

चित्त विषय दोनी पाहें । तें जीवाचें निजस्वरूप नव्हे ।
हे उपाधिवशें दोनी देहें । लागलीं पाहें प्रवाहरूपें ॥६२॥
हें पहा ! चित्त आणि विषय हें कांहीं जीवाचें आत्मस्वरूप नव्हें. हीं दोन्हीं उपाधीच्या योगानें प्रवाहरूपानें देहाला लागलेलीं आहेत ६२.

कर्तृत्वभोक्तृत्वरूपें जाण । विषयी जाहलें अंतःकरण ।
तेणें उभय देहांचें कारण । अहंकारू जाण खवळला ॥६३॥
कर्तृत्वरूपानें आणि भोक्तृत्वरूपानें अंतःकरण हें विषयी झालेलें असतें. त्यामुळें दोन्ही देहांचें कारण जो अहंकार तो खवळतो ६३.

तेणें भुलविलें चित्त विषयांसी । विसरला निजात्मस्वरूपासी ।
तेणें तदात्मता जीवामनांसी । अतिशयेंसी दृढ झाली ॥६४॥
त्यानें विषयांच्या नादी लावून चित्त भुलविलें की मनुष्य आत्मस्वरूपाला विसरतो. त्यामुळें जीव आणि मन यांचे तादात्म्य अतिशय दृढ होऊन राहतें ६४.

चित्त जीवाचें स्वरूप होतें । तरी विषयीं लोलुप नव्हतें ।
हा उभय उपाधी जीवातें । अभिमानें येथें वाढविला ॥६५॥
चित्तच जर जीवाचें स्वरूप असतें, तर तें विषयाला लुब्ध झालें नसतें. जीवाला या दोन्ही उपाधि येथें अभिमानानें वाढविलेल्या आहेत ६५.

जेवीं कां विसरोनि आपणासी । स्वप्नींचिया स्वप्नदेहासी ।
अतिप्रीति वाढे पुरुषासी । तैसी दशा जीवासी येथ झाली ॥६६॥
ज्याप्रमाणें पुरुष आपल्या खऱ्या देहाला विसरून स्वप्नामध्यें स्वप्नांतील देहावरच त्याची अत्यंत आवड असतें, त्याप्रमाणेंच जीवाचीही येथें दशा झाली आहे ६६.

नित्य शुद्ध मुक्त जाण । जीवाचें स्वरूप चैतन्यघन ।
त्यासी अभिमानें हें जाण । मिथ्या बंधन लाविलें ॥६७॥
नित्य, शुद्ध, मुक्त आणि ज्ञानरूप असें जीवाचें स्वरूप आहे. त्याला अभिमानानें हें मिथ्या बंधन लावून दिलेलें असतें ६७.

यालागीं सांडावा अभिमान । तैं तुटे सकळ बंधन ।
अभिमान निरसावया जाण । माझें भजन करावें ॥६८॥
ह्याकरितां अभिमान सोडून द्यावा, तेव्हांच सर्व बंधन तुटतें; आणि तो अभिमान जाण्याकरितां माझें भजन करावें ६८.

परी वैराग्येंवीण माझी भक्ती । पोंचट जाण पां निश्चितीं ।
जैं वैराग्ययुक्त उपजे भक्ती । तैं मद्‌रूपप्राप्ती जीवासी ॥६९॥
परंतु वैराग्याशिवाय माझी भक्तीही खरोखर पोचटच आहे. म्हणून वैराग्यासहवर्तमान जेव्हां माझी भक्ति उत्पन्न होतें, तेव्हांच जीवाला माझ्या स्वरूपाची प्राप्ति होतें ६९.

हृदयीं विषयांचा अभावो । आणि सर्वांभूतीं भगवद्‍भावो ।
हे वैराग्ययुक्त भक्ति पहा हो । तैं जीवासी निर्वाहो मद्‌रूपीं ॥३७०॥
हृदयामध्यें विषयाचें अस्तित्व मुळींच नाही, आणि सर्व प्राणिमात्रांमध्यें भगवंताची भावना असतें. अहो ! हीच वैराग्ययुक्त भक्ति होय. ती प्राप्त होईल तेव्हांच माझ्या स्वरूपांत जीवाचा प्रवेश होईल ४७०.

जीव मद्‌रूपचि तत्त्वतां । त्यासी देहाभिमान जीविता ।
सदा भूतीं मद्‍भावो पाहतां । सिद्ध मद्‌रूपता उद्‍बोधे ॥७१॥
खरे म्हटले तर जीव हा मत्स्वरूपीच आहे. पण त्याला देहाभिमान पोशीत असतो. ह्याकरितां सदासर्वदा प्राणिमात्राच्या ठायीं माझीच भावना ठेवली असतां आपोआपच मत्स्वरूप प्राप्त होतें ७१.

जीवासी जाहल्या मद्‌रूपता । सहजें त्यागू विषयचित्ता ।
देखें उभयांसी मिथ्यात्वता । न त्यागितां हा त्यागू ॥७२॥
जीवाला मत्स्वरूप प्राप्त झालें कीं, विषय व चित्त ह्या दोघांचाही सहजच त्याग घडतो. कारण ती दोन्ही मिथ्याच आहेत पहा ! त्याग न करतांच हा त्याग घडतो ७२.

चित्तविषयांचा त्यागू । पुत्र हो तुम्हीं पुशिला चांगू ।
तो म्यां सांगितला अव्यंगू । हा ज्ञानमार्गू अतिशुद्ध ॥७३॥
हे पुत्र हो ! तुम्हीं चित्ताचा आणि विषयाचा त्याग विचारलांत, हे फारच उत्तम होय. तो मी तुम्हांला यथासांग सांगितला. हा ज्ञानमार्ग अत्यंत शुद्ध असा आहे ७३.

म्हणाल मिथ्या उभयांचें भान । तरी एवढें जीवासी बंधन ।
लागावया कांहीं कारण । ऐसें कांहीं मन कल्पील जरी ॥७४॥
आता तुम्ही म्हणाल की, ह्या दोघांचाही भास मिथ्या आहे तरीसुद्धा जीवाला एवढें बंधन घडतें, त्याला कांहींतरी तसेच कारणही असलें पाहिजें. अशी जर मनांत कांहीं कल्पना येईल ७४,

गगनसुमनांची माळा । कधीं कोणी लेइली गळां ।
तारूं बुडे मृगजळां । हें कोणी तरी डोळां देखतें काय ॥७५॥
आकाशाच्या पुष्पांची माळा कधी कोणी गळ्यांत घातली आहे ? मृगजळांत तारूं बुडालें असें कोणीतरी डोळ्यांनी पाहातें काय ? ७५.

सत्यासी बाधक । कदा बाधूं न शके लटिक ।
ऐसें कल्पाल तुम्हीं कल्पक । तोही परिपाक अवधारा ॥७६॥
त्याप्रमाणें खऱ्याला खोटें बाधक होऊन कधींही बाधा करूं शकणार नाही, अशीही कल्पना तुम्ही कल्पक आहांत म्हणून तुमच्या मनात येईल, तर त्याचेंही समाधान ऐका ७६.

तरी परिसा सावधान । तें मी सांगेन निरूपण ।
जेणें जीवासी बंधन । लटिकेंचि जाण दृढ झालें ॥७७॥
तर आता सावधानचित्तानें ऐका. मी तें निरूपण सांगतो, कीं ज्याच्या योगानें जीवाला लटकेंच बंधन दृढ झालेलें आहें ७७.

गुणेषु चाविशच्चित्तं अभीक्ष्णं गुणसेवया ।
गुणाश्च चित्तप्रभवा मद् रूप उभयं त्यजेत् ॥ २६ ॥
[श्लोक २६] नेहमी विषयांचेच सेवन करीत राहिल्याने चित्त त्या विषयांमध्ये प्रवेश करते आणि हे विषय चित्तातूनच निर्माण होतात म्हणून साधकाने मद्रूप होऊन या दोन्हींचाही त्याग करावा. (२६)
अनादिसंसारमाळेच्या ठायीं । नित्य विषय भोगिले पाहीं ।
ते ठसावले चित्ताच्या ठायीं । वारंवार देहीं सेवितां ॥७८॥
अनादि अशा संसारमालिकेमध्यें विषयांचा उपभोग नेंहमी घेतला, आणि देहानें वारंवार त्या विषयांचे सेवन केलें, म्हणजे ते चित्तामध्यें वतनदार होऊन बसतात ७८.

चित्तासी विषयांची अतिप्रीती । तेणें वाढली विषयासक्ती ।
ते प्रवेशलें विषयांप्रती । न निघे मागुती सर्वथा ॥७९॥
चित्ताला विषयांची अत्यंत प्रीति असतेंच. त्यामुळें विषयासक्ति वाढतें, आणि तें एकदा विषयांत घुसलें म्हणजे मुळींच परत फिरत नाहीं ७९,

बुद्धीसी विषयांचें ध्यान । चित्तीं विषयांचें चिंतन ।
विषयांलागीं तळमळी मन । विषयाभिमान तेणें झाला ॥३८०॥
बुद्धीला विषयांचे ध्यान लागलें, आणि चित्तांत विषयांचे चिंतन सुरू झालें, म्हणजे त्या विषयांसाठीच मन तळमळू लागतें. तेणेंकरुन विषयाभिमान उत्पन्न होतो ३८०.

विषयीं खवळल्या अभिमान । देहद्वयाचें दृढ बंधन ।
जीवासि लागलें अतिकठिण । परम दारुण दुस्तर ॥८१॥
विषयामध्यें अभिमान खवळला म्हणजे दोन्ही देहांना बंधन प्राप्त होतें. तेंच जीवाला अत्यंत कठीण, महाभयंकर व दुस्तर होतें ८१.

मग त्या देहाचे विकार । ते आपुले मानी साचार ।
अंध पंगू मी कुष्ठी नर । स्वरूपें सुंदर मी ज्ञाता ॥८२॥
तेव्हां मग त्या देहाचें जें विकार असतील तें तो खरोखर आपलेच मानतो. आंधळा मी, पांगळा मी, कोड भरलेला पुरुष मी, किंवा स्वरूपानें सुंदर तो मी व ज्ञाता तोही मी ८२.

मी देह हें मानोनि चित्तें । निजरूप विसरला भावार्थें ।
हें मिथ्याबंधन जीवातें । सत्यत्वें त्यातें अभिमानू ॥८३॥
देह तोच मी असें चित्तामध्यें मानून भोळेपणानें आत्मस्वरूप विसरून जातो. जीवाला जें मिथ्याबंधन असतें, तेंच खरें असा त्याला अभिमान वाटतो ८३.

मिथ्या बुद्धिबळाचा खेळ । हारी जैती ही निष्फळ ।
तरी खेळत्या अभिमान प्रबळ । तैसें देहबळ जीवासी ॥८४॥
बुद्धिबळाचा खेळच मुळीं खोटा; तेव्हां त्यांतील पराजय आणि जय हेही निष्फळच होत. तरी तो खेळ खेळत राहणाऱ्याला त्याचा अभिमान भयंकर वाढतो. त्याप्रमाणेंच जीवालाही देहाचें बळ असतें ८४.

त्या खेळाचे घोडे हस्ती । पहिले काय जीत होती ।
मा मारिले म्हणोनि भांडती । तेवीं जन्मपंक्ती जीवासी ॥८५॥
त्या खेळांतले घोडे-हत्ती असतात, ते काय मूळचे जिवंत असतात आणि मग ते मारले म्हणून खेळणारे लोक भांडतात ? त्याचप्रमाणे जीवांनाही जन्माचे फेरे आहेत ८५.

हें निरसावया जीवबंधन । निःशेष सांडावा देहाभिमान ।
अभिमान सांडितांचि जाण । मद्‌रूपपण सहजेंचि ॥८६॥
हें जीवाचें बंधन नष्ट करण्यासाठी देहाभिमान निखालस सोडून द्यावा. अभिमान सोडला असतां सहज मद्रूपपणा प्राप्त होतो ८६.

जीवें साधिल्या मद्‌रूपता । सहजेंचि त्याग विषयचित्ता ।
माझे स्वरूपीं अहंता । नाहीं वार्ता विषयांची ॥८७॥
जीवानें माझी स्वरूपता साध्य केली, की विषय व चित्त ह्यांचा सहज त्याग घडतो. कारण, माझ्या स्वरूपामध्यें अहंता आणि विषय यांची वार्तासुद्धा नाही ८७.

जेव्हां बुद्धिबळांचा खेळ मोडे । तेव्हां राजाप्रधानादि लांकुडें ।
तेवीं अहंकारू निमाल्या पुढें । प्रपंच उडे मिथ्यात्वें ॥८८॥
जेव्हां बुद्धिबळांचा डाव संपतो, तेव्हां ज्याप्रमाणें राजा-प्रधान आदिकरून सारीं मोहरीं लांकडेच होतात, त्याप्रमाणे अहंकार नाहीसा झाला की, मग प्रपंचही मिथ्यत्वानें उडून जातो ८८.

जेवीं स्वप्नींचा स्वप्नाभिमान । दारा पुत्र स्वजन धन ।
स्वदेहेंसी मिथ्या जाण । जागेपण झालिया ॥८९॥
स्वप्नांतील बायका, मुलें, आप्तइष्ट, द्रव्य आणि स्वतःचा देह ह्यांचा झालेला अभिमान, जागेपणा प्राप्त होईल तेव्हां स्वत:च्या स्वप्नदेहासह मिथ्या होतो ८९,

तेवीं पावलिया माझी सरूपता । कैंचा देह कैंची अहंता ।
विषयचित्तांची वार्ता । नाहीं अवस्था गुणत्रया ॥३९०॥
त्याप्रमाणे माझे स्वरूप प्राप्त झालें कीं मग देह कशाचा ? अहंता कशाची ? विषय आणि चित्त ह्यांची तर गोष्टच नाही. तीन गुणांनाही अस्तित्व नाही ३९.

तिहीं अवस्थीं अवस्थाभूत । जागृतिस्वप्नसुषुप्तिमंत ।
तो होऊनि जीव निरवस्थ । परमात्म्यांत मिळे कैसा ॥९१॥
जागृति, स्वप्न आणि सुषुप्ति ह्या तिन्ही अवस्थांमध्यें जो तिन्ही अवस्थारूप होऊन राहतो, तोच जीव अवस्थाहीन होऊन परमात्म्यामध्यें कसा मिळतो ? ९१.

ऐसा कांहीं कल्पाल भावो । त्या जीवासी अवस्थांचा अभावो ।
त्रिगुण गुणांचा स्वभावो । या वृत्ति पहा हो बुद्धिच्या ॥९२॥
अशी काही कल्पना मनांत आणाल, तर त्या जीवाला मुळीं अवस्थाच नाहीत. तो त्या तीन प्रकारच्या गुणांचा स्वभावधर्म असून त्यांपासून उत्पन्न होणाऱ्या तिन्ही वृत्ति बुद्धीच्या असतात ९२.

जाग्रत्स्वप्नः सुषुप्तं च गुणतो बुद्धिवृत्तयः ।
तासां विलक्षणो जीवः साक्षित्वेन विनिश्चितः ॥ २७ ॥
[श्लोक २७] जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या क्रमाने सात्त्विक, राजस आणि तामस गुणांपासून बनलेल्या बुद्धीच्या वृत्ती आहेत जीव या सर्वांचा साक्षी आहे, असा शास्त्रांचा सिद्धांत आहे. (२७)
तिन्ही गुणांच्या तिन्ही वृत्ती । सत्त्वगुणाची जागृती ।
रजोगुणें स्वप्नप्राप्ती । केवळ सुषुप्ती तमाची ॥९३॥
तीन गुणांच्या तीन वृत्ति असतात. जागृति ही सत्त्वगुणाची, रजोगुणापासून स्वमावस्था प्राप्त होते, आणि सुषुप्ति ही केवळ तमाची असते ९३.

या तिनी अवस्था पाहीं । दृढ जडल्या बुद्धीच्या ठायीं ।
जीवासी यांचा संबंध नाहीं । तो वेगळा पाहीं साक्षित्वें ॥९४॥
हें पहा ! या तिन्ही अवस्था बुद्धीमध्यें दृढतर जडून राहिलेल्या असतात. त्यांचा जीवाशी काही संबंध नाहीं. तो जीव साक्षीरूपानें वेगळाच असतो ९४.

जैं जीवाअंगीं अवस्था जडे । तैं जो अवस्थेमाजीं बुडे ।
तिहींचें साक्षित्व त्यासी न घडे । ऐक निवाडें अवस्था ॥९५॥
जर जीवाच्या अंगाला अवस्था जडून राहील, तर तो त्या अवस्थेमध्यें बुडेल. तिन्ही अवस्था साक्षित्वसुद्धा त्याला घडू शकणार नाही. ह्याकरितां त्या अवस्थांची स्थिति ऐक ९५.

जागृतीमाजीं नाहीं स्वप्न । स्वप्न जागृतीसी नेणे जाण ।
सुषुप्ती नेणे जागृतिस्वप्न । सुषुप्तीचें भान त्या नेणती ॥९६॥
जागृतीमध्यें स्वप्न नसते, म्हणून स्वप्न हे जागृतीला जाणत नाही हे लक्षात ठेव. सुषुप्ति ही जागृति आणि स्वप्न ह्या दोहोंनाही जाणत नाहीं, म्हणून त्या दोघीही सुषुप्तीचें भान जाणत नाहींत ९६.

जीवूं अवस्थांचा अभिमानी । हेंही न घडे जीवालागुनी ।
विश्व तैजस प्राज्ञ तिन्ही । अवस्थाभिमानी हे तिहींचे ॥९७॥
बरें, जीव ह्या अवस्थांचा अभिमानी म्हणावा, तर हेंही जीवाला घडत नाही. विश्व (हा देह मी व हे विषय माझे असा जागृतींत अभिमान वाहणारा जीव), तैजस (स्वप्नदेहाचा अभिमानी जीव ), आणि प्राज्ञ ( सुषुप्तिदेहाचा अभिमानी जीव) हे तिघे तीन अवस्थांचे अभिमानी होत ९७.

जो जे अवस्थेचा अभिमानी । तो ते अवस्थेसवें जाय निमोनी ।
जीव वेगळा साक्षिपणीं । अवस्थाभिमानी तो नव्हे ॥९८॥
जो ज्या अवस्थेचा अभिमानी असतो, तो त्या अवस्थेबरोबरच तद्प होऊन जातो. पण ‘जीव’ हा तिन्ही अवस्थांचा साक्षी असून त्या साक्षित्वाच्या नात्यानें वेगळाच असतो, म्हणून तो कांहीं अवस्थाभिमानी नव्हे ९८.

देहातीत गुणातीत । तिहीं अवस्थां अतीत ।
द्रष्टा साक्षी निश्चित । जाणता येथ तो जीवू ॥९९॥
येथे ‘जीव’ म्हणजे जो देहाहून निराळा, गुणांहुन निराळा, तिन्ही अवस्थांहून निराळा, केवळ द्रष्टा, साक्षी आणि जो खरोखर जाणता तोच होय ९९.

अवस्थाभिमान नाहीं जीविता । तरी कवण भोगी तिनी अवस्था ।
मी निजलों मीचि जागता । म्यां स्वप्नावस्था देखिली ॥४००॥
जीवाला जर अवस्थाभिमान नाहीं म्हणावा, तर तिन्ही अवस्था भोगतो कोण ? मी निजलों, मी जगलों, मी स्वप्नावस्था पाहिली ४००.

ऐसा प्रत्यक्ष अनुभवू । स्वयें बोलताहे जीवू ।
हा म्हणाल जीवाचा स्वभावू । ऐक अभिप्रावू सांगेन ॥१॥
जसा प्रत्यक्ष अनुभव स्वतः जीवच बोलत असतो. हा जीवाचा स्वभावच आहे असें म्हणाल, तर त्यांतील अभिप्राय सांगतों ऐक १.

यर्हि संसृतिबंधोऽयं आत्मनो गुणवृत्तिदः ।
मयि तुर्ये स्थितो जह्यात् त्यागस्तद् गुणचेतसाम् ॥ २८ ॥
[श्लोक २८] ज्याअर्थी हे बुद्धीमुळे उत्पन्न झालेले बंधन आत्म्याला तिन्ही अवस्थांत बांधून टाकते म्हणून साधकाने तुरीय अवस्थास्वरूप माझ्यामध्ये राहून बुद्धीचे बंधन तोडावे त्यामुळे विषय व चित्त या दोन्हींचाही परस्परसंबंध तुटतो. (२८)
जो डोल्हारां बैसे यथासुखें । तो न हालतां हाले तेणें हरिखें ।
उंच नीच खाय झोंके । निजकौतुकें हिंदोळे ॥२॥
जो खुशाल झोंपाळ्यावर बसलेला असतो, तो आपण न हालतांही त्या झोपाळ्याच्या हालण्यानेंच हालतो, त्या आनंदानें वरखाली झोंके खातो, व आपल्याच हौसेनें झोंपाळ्याबरोबर हालत राहतो २.

हिंदोळतांही प्रबळ । डोल्हाराचि अतिचंचळ ।
बैसला तो निजनिश्चळ । मानी केवळ मी हालतों ॥३॥
तो मोठमोठाले झोंके घेत असला तरी त्या वेळी वस्तुतः केवळ झोंपाळाच जलद हालत असतो, आणि बसणारा असतो तो आपल्या ठिकाणी स्थिरच असतो. तो फक्त मी हालतों असें मानतो ३.

जीवासी झाली तैशी वानी । अहंममतेच्या अभिमानीं ।
तिनी अवस्था स्वयें मानी । जेवीं कां स्वप्नीं गृहदारा ॥४॥
जीवाला तशीच अवस्था झालेली आहे. ज्याप्रमाणे स्वप्नामध्यें घर, बायको, वगैरे सर्व आपलींशींच वाटतात, त्याप्रमाणें अहंममतेच्या अभिमानानेंच तिन्ही अवस्था मीच भोगतों असें तो मानतो १.

हो कां लोखंडकाम घडतां । लोहाचे घाय अग्नीचे माथां ।
प्रत्यक्ष दिसती वाजतां । लोहतादात्मतासंयोगें ॥५॥
लोखंडाचे काम घडवितांना लोखंडाचें अग्नीशी तादात्म्य झाल्यामुळें लोखंडावर घातलेले घाव प्रत्यक्ष विस्तवाच्याच माथ्यावर बसलेले दिसतात ५;

तेणें अग्निसंगें वाडेंकोडें । लोहकामचि घडे मोडे ।
परी अग्नीसी घडमोड न घडे । तेणें पडिपाडें जीवू येथें ॥६॥
त्या अग्नीच्या संगतीनेंच खरोखर लोखंडाचें काम घडतें आणि मोडतें; परंतु अग्नि हा घडतही नाहीं आणि मोडतही नाही. त्याच रीतीनें जीवही, येथें राहिलेला असतो ६.

जेवीं अग्निवीण लोह न घडे । तेवीं आत्मसंयोगेंवीण पुढें ।
बुद्धि केवळ जड वेडें । कर्मक्रिया नातुडे सर्वथा ॥७॥
ज्याप्रमाणें अग्नीशिवाय लोखंड घडत नाहीं, त्याप्रमाणें आत्म्याच्या संयोगाशिवाय बुद्धि ही केवळ जड व वेडी आहे. आत्म्याशिवाय तिला कोणतीच कर्मक्रिया कधींही करतां येणार नाहीं ७.

लोह घडवूनि अग्नि न घडता । कर्म करवूनि जीव अकर्ता ।
तरी वृत्तिसंगें तदात्मता । अहंकर्ता हें मानी ॥८॥
लोखंड घडवूनही अग्नि हा कांहीं घडविणारा नसतो. त्याप्रमाणें कर्म करवूनही जीव अकर्ताच असतो. तरीपण वृत्तीबरोबर त्याचें तादात्म्य झाल्यामुळे ‘कर्ता तो मीच’ असें मानतो. ८.

जीव आपुले प्रकाशता । झाला वृत्तीतें प्रकाश करिता ।
वृत्ति जीवासी नानावस्था । निजस्वभावता देतसे ॥९॥
जीवानें आपल्या प्रकाशानें वृत्तीला प्रकाशित केलें आहे आणि ती वृत्तीच ह्या जीवाला अनेक प्रकारच्या अवस्था आपल्या स्वभावानुरूप देत असते ९.

सूर्यें प्रकाशिलें जळ । जळें केलें प्रतिमंडळ ।
खळाळ चंचळ निश्चळ । कांपे चळचळ जळकंपें ॥४१०॥
सूर्यामुळेंच पाणी प्रकाशित होतें, त्या पाण्यानेंच सूर्याचें प्रतिबिंब तयार केलें आहे, आणि त्या पाण्याच्या खळाळीप्रमाणें, किंवा चंचलतेप्रमाणें किंवा स्थिरपणाप्रमाणें तें सूर्याचें प्रतिबिंब पाण्याच्या कंपानुसार चळचळां कांपतें किंवा स्थिर रहातें ४१०.

सूर्याची गगनीं नित्य वस्ती । तो जळें आणिला अधोगती ।
तेवीं वृत्तीचि या निजख्याती । मुक्तांतें दाविती बद्ध करूनी ॥११॥
सूर्याचें राहणें नेंहमी आकाशांत आहे, त्याला पाण्यानें खालीं आणिलें ! त्याप्रमाणें वृत्तीही या आपल्या नांवालौकिकाप्रमाणें मुक्तांनाही बद्ध करून दाखविते ११.

आत्म्यानें प्रकाशिली वृत्ती । वृत्तीनें आत्म्यासी जीवप्राप्ती ।
जीवा जीवत्वें देहासक्ती । सुखदुःखप्राप्ती तेणें भोगी ॥१२॥
आत्म्यानें वृत्तीला प्रकाशित केलेलें असतें; पण त्याच वृत्तीमुळें आत्म्याला जीवपणा येतो, त्या जीवाला जीवपणामुळें देहाची ममता जडते, आणि त्यामुळेंच तो प्राप्त झालेल्या सुखदुःखांचा उपभोग घेतो १२.

एवं वृत्तीचिया संगती । वाढली विषयांची आसक्ती ।
तेणें संसारबंधप्राप्ती । झाली निश्चितीं जीवासी ॥१३॥
तात्पर्य, वृत्तीच्या संगतीनेंच विषयांची आसक्ति वाढते, आणि त्यामुळेंच खरोखर जीवाला संसारबंधन प्राप्त होतें १३.

हो कां गुणचित्त-विषयासक्ती । जरी झाली जीवासी बंधप्राप्ती ।
तरी आवरावी विषयवृत्ती । वैराग्ययुक्तीं गुरुकृपा ॥१४॥
अशा रीतीनें गुण आणि चित्त ह्यांच्या विषयासक्तीनें जरी जीवाला बंधन प्राप्त झालें, तरी वैराग्यभावनेंनें व गुरूच्या कृपेनें विषयवृत्ति आवरीत असावें १४.

ऐक गुरुकृपेची मातू । तिहीं अवस्थांमाजीं सततू ।
जो मी तुरीय गुणातीतू । ते अभ्यासीं लावितू निजबोधें ॥१५॥
आतां गुरुकृपेची गोष्ट ऐक. जो मी निरंतर तिन्ही अवस्थांमध्यें ज्ञानस्वरूप आणि गुणांपासून अलिप्त, त्या मला ती गुरुकृपा आत्मज्ञानाच्या योगेंकरूनच अभ्यासाकडे वळविते १५.

नवल अभ्यासाची गोठी । विषयवृत्तीच्या पाठींपोटीं ।
मज तुरीयातें दावी दिठी । बोधपरिपाटी निजबोधें ॥१६॥
अभ्यासाची गोष्ट तर काही विलक्षणच आहे ! तो आत्मज्ञानानें उपदेशाच्या रूपानें विषयवृत्तीच्या मागेंपुढें माझें ज्ञानस्वरूपच दृष्टीला दाखवीत असतो १६.

मी तुरीय तंव संततु । सर्वीं असे सर्वगतु ।
शिष्यवृत्तीसी मजआंतु । गुरु निजस्वार्थु दाखवी ॥१७॥
मी तर सदोदित ज्ञानस्वरूपच आहे. मी सर्वांमध्यें सर्वस्वी व्यापलेला आहे. त्यामुळें गुरु हा शिष्याच्या वृत्तीला माझ्या आंत आत्महितच दाखवून देतो १७.

सुतावेगळें लुगडें । करूं जातां गा उघडें ।
तेथ क्रियाचि लाजोनि बुडे । मागें पुढें सूतचि ॥१८॥
अरे ! लुगडें हें सुताहून पूर्णपणें निराळें करण्याचा प्रयत्न करूं लागलें असतां त्या ठिकाणीं ती कृतीच लाजून नष्ट होते. कारण त्याच्या आंतबाहेर सर्व सूतच असतें १८.

तेवीं साधकासी जाण । विषयांचें विषयभान ।
माझे स्वरूपीं नव्हेचि भिन्न । चैतन्यघन मीचि मी ॥१९॥
त्याप्रमाणे साधकांना में विषयांचे भान असतें, तेंही माझ्या स्वरूपांत भिन्न असत नाहीं. कारण सर्व ज्ञानाचें स्वरूप माझा मीच आहे १९.

तेथ नामरूपवर्णभेद । नाहीं कर्म कर्ता विधिवाद ।
बुडाले प्रणवेंसीं वेद । केवळ शुद्ध मी एक ॥४२०॥
त्यांत नाम, रूप, वर्ण यांचा भेद नाहीं. किंवा कर्म, कर्ता अथवा कर्माचा वादही नाही. ॐकारासहवर्तमान ज्यांत वेद बुडाले, असा केवळ शुद्ध एक मीच आहें ४२०.

तेथें भ्रमेंसहित पळाली भ्रांती । क्रियेसहित गळाली प्रवृत्ती ।
लाजा विराली निवृत्ती । स्वस्वरूपीं वृत्ती विनटली ॥२१॥
तेथून भ्रमासहवर्तमान भ्रांति पळून गेली, क्रियेसहवर्तमान प्रवृत्ति गळून पडली, निवृत्ति लज्जेनेंच विरून गेली, आणि वृत्ति स्वस्वरूपामध्यें एकरूप होऊन राहिली २१.

सूर्योदयो जाहल्यापाठीं । समूळ अंधारातें घोंटी ।
खद्योताची नळी निमटी । नक्षत्रकोटी तत्काळ गिळी ॥२२॥
सूर्योदय झाला की तो अंधाराला सर्वस्वी गिळून टाकतो, काजव्याला तर गळा दाबून ठार करून टाकतो, व नक्षत्रांचे समुदाय त्वरित नाहींसे करतो २२.

तेवीं माझी स्वरूपप्राप्ती । मायेची मावळे स्फूर्ती ।
लाजा विसरे प्रवृत्तिनिवृत्ती । नित्यतृप्ती स्वानंदें ॥२३॥
त्याप्रमाणें माझ्या स्वरूपाची प्राप्ति झाली कीं, मायेची स्फूर्तीच मावळते, प्रवृत्ति आणि निवृत्ति लज्जेनें नाहीशा होतात, आणि आत्मानंदानें नित्य तृप्तीच होते २३.

ऐशी माझ्या स्वरूपाची गोडी । जैं साधकां लागे धडफुडी ।
तैं चित्त विषयातें सांडी । विषयो वोसंडी चित्तातें ॥२४॥
अशी माझ्या स्वरूपाची गोडी जेव्हां साधकांना पूर्णपणे लागून राहते, तेव्हां चित्तही विषयांना सोडितें आणि विषयही चित्ताला सोडतो २४.

जीं देंठीं वाढलीं फळें । तींचि परिपाकाचे वेळे ।
होती देंठावेगळें । देंठू तो फळें धरीना ॥२५॥
देंठाला लागून जीं फळें वाढतात, तींच पिकावयाच्या वेळेला देंठापासून वेगळीं होतात. देंठही तीं फळें धरीत नाहीं २५.

कां मंथूनि काढिलें नवनीत । तें परतोनि घातल्या ताकाआंत ।
तें ताकेंसी होय अलिप्त । तैसें चित्त विषयांसी ॥२६॥
किंवा दहीं घुसळून लोणी काढलें, आणि तें पुन्हा ताकांत घातलें तर तें ताकापासून निराळें राहतें. त्याप्रमाणें चित्तही विषयांपासून अलिप्त राहतें २६.

पावल्या माझी स्वरूपता । दैव बळें विषयो देतां ।
चित्तासी नुपजे विषयावस्था । स्वभावतां अलिप्त ॥२७॥
माझें स्वरूप प्राप्त झालें असतां दैव बलात्कारानें त्याला विषयोपभोग देऊं लागलें, तरी त्याच्या चित्ताला विषयवासना उत्पन्न होत नाहीं. कारण तें स्वभावतःच अलिप्त असतें २७.

एवं साधिल्या माझा योगू । चित्तविषयांचा वियोगू ।
सहजेंचि होय चांगू । हा सुगम सांगू उपावो ॥२८॥
अशा प्रकारें माझा योग साधला असतां आपोआपच उत्तम रीतीनें चित्त आणि विषय ह्यांचा वियोग होतो. ह्याचा सुलभ उपाय सांगतों २८.

येथें झणें आशंका धराल देख । स्वरूप शुद्ध अवघें एक ।
तेथें कैंचें बाध्यबाधक । काय साधक साधिती ॥२९॥
आतां पहा ! ह्यांतसुद्धा कदाचित तुम्ही शंका घ्याल कीं, स्वरूप हें सर्वत्र एकच भरलेले असून शुद्ध आहे. तेथे बाध्य आणि बाधक कशाचें ? अर्थात त्या वेळीं साधक साधतात तरी काय ? २९.

ऐशाही संधीमाजीं जाण । अहंता बंधाचें कारण ।
त्याचें सांगेन मी लक्षण । सावधान परियेसीं ॥४३०॥
पण अशा संधींतही अहंता हीच बंधनाला कारण होतें, त्याचेही लक्षण मी सांगतों, नीट लक्ष देऊन ऐक ४३०.

अहङ्कारकृतं बन्धं आत्मनोऽर्थविपर्ययम् ।
विद्वान्निर्विद्य संसार चिन्तां तुर्ये स्थितस्त्यजेत् ॥ २९ ॥
[श्लोक २९] मी, माझे या अहंकारानेच बंधन निर्माण होते त्याच्यामुळेच आत्म्याच्या वास्तविक सच्चिदानंद रूपाचा लोप होतो म्हणून हे जाणणार्‍याने विरक्त होऊन विषयांची चिंता सोडून तुरीय अवस्थेतच असावे. (२९)
जेथ मुहूर्तमात्र वसती घडे । त्या ठायाचा अभिमान चढे ।
ऐसें अभिमानाचें सांकडें । पाहें पां रोकडें कौतुक त्याचें ॥३१॥
जेथें एक क्षणभर वस्ती होते, त्या ठिकाणचासुद्धा मनुष्याला अभिमान चढतो. इतकें अभिमानाचें व्यसन असते. हें त्याचें कौतुक प्रत्यक्षच पहा म्हणजे झालें ३१.

बुद्धि अहंकार अळुमाळ । उठतां शुद्धासी करी शबळ ।
तेणें देहयोगें धरिल्या बळ । करी तत्काळ विपरीत ॥३२॥
यत्किंचित् अहंकार उत्पन्न झाला तरीदेखील बुद्धि पवित्र मनुष्यालाही मायाग्रस्त करून सोडते. तो अहंकार देहाच्या संगतीनें प्रबळ झाला की तत्काळ काहीतरी विरुद्ध परिणाम करतो ३२.

अहंकार खवळल्या जाण । करी आनंदाचें आच्छादन ।
बुडे परमात्मस्फूर्तीचें स्फुरण । देहाचें मीपण वाढवी ॥३३॥
अहंकार खवळला असतां तो आनंदाला लोपवून टाकितो. त्यामुळे परमात्मस्फूर्तीचें स्फुरण नाहींसें होतें आणि तो अभिमान देहाचा मीपणा मात्र वाढवितो ३३.

जेवीं कूर्मीच्या पिलियां । चक्षुरमृतें तृप्ती तयां ।
तेंचि मातेसि चुकलिया । मग भुकेलिया कर्दमू सेवी ॥३४॥
ज्याप्रमाणें कासवीचीं पिलें असतात त्यांना आईच्या नयनामृतानेंच तृप्ति होत असते ; पण आईपासून त्या मुलाची चुकामूक झाली आणि मग त्याला भूक लागली म्हणजे तें चिखलच खाऊं लागतें ! ३४.

तेवीं खुंटलिया आनंद‍अभिव्यक्ती । जीवासी वाढे विषयासक्ती ।
कामिनीकामा पंगिस्त होती । चिंता चित्तीं विषयांची ॥३५॥
त्याप्रमाणें आनंदाचा विकास थांबला की, जीवाची विषयासक्ति वाढतें, आणि तें स्त्रीविषयक वासनेंच्या आधीन होतात. त्यांच्या चित्तामध्यें नेंहमी विषयांचीच चिंता राहाते ३५.

विसरला आपुलें पूर्णपण । धनालागीं अतिहीन दीन ।
मी देहवंत परिच्छिन्न । ऐसा देहाभिमान दृढ होय ॥३६॥
असा मनुष्य आपणच परिपूर्ण आहोंत हें विसरतो आणि द्रव्यासाठी अतिशय लाचार होतो. मर्यादित देहाकार तोच मी असा दृढ देहाभिमान त्याला होऊन बसतो ३६.

तेणें कर्माकर्मांचे आघात । नाना नरकयातना होत ।
जन्ममरणादि आवर्त । तेणें दुःखी होत अतिदुःखें ॥३७॥
त्यामुळें कर्माकर्मांचे आघात बसून अनेक प्रकारच्या नरकयातना होतात, आणि जन्मभरणादिकांच्या भोवऱ्यात सांपडून त्या महान् दुःखानें तो व्याकुळ होतो ३७.

भोगितां दुःखयातना । त्रासु उपजे ज्याच्या मना ।
न साहवे भववेदना । तेणें देहाभिमाना सांडावें ॥३८॥
त्या दुःखयातना भोगतांना ज्याच्या मनाला त्रास उत्पन्न होतो, व संसाराची वेदना ज्याला सोसवत नाही, त्यानें देहाभिमानाला सोडून द्यावें ३८.

अभिमान सांडितां न संडे । हेंचि दुर्घट थोर मांडे ।
यालागीं साधनाचें सांकडें । सोसणें पडे साधकां ॥३९॥
परंतु हा देहाभिमान सोडावयाला गेलें तरी सुटत नाहीं. हेंच मोठें संकट उत्पन्न होतें. म्हणूनच साधकांना साधनाचें संकट सोसणें भाग पडतें ३९.

जें जें करावें साधन । साधनीं रिघे साधनाभिमान ।
धांवणें नागवी संपूर्ण । साधनीं विघ्न होय तैसें ॥४४०॥
परंतु जें जें साधन करावें, त्या साधनांत साधनाभिमान उत्पन्न होतो. ज्याप्रमाणें लुटारूंचें धांवणें आलें म्हणजे ते सर्वस्व लुबाडून नेतात, त्याप्रमाणें साधनांत अहंकार हा विघ्नरूप होतो ४४०.

ऐक साधकांचें साधन । वेदोक्त स्वधर्माचरण ।
साधावें वैराग्य पूर्ण । माझें भजन अतिप्रीतीं ॥४१॥
आतां साधकांचे साधन ऐक. तें असें कीं, वेदोक्त स्वधर्माचरण करावें, पूर्ण वैराग्य साधावें आणि अत्यंत प्रेमानें माझें भजन करावें ४१.

तत्काळ जावया देहाभिमान । अखंड माझें नामस्मरण ।
गीत नृत्य हरिकीर्तन । सर्वांभूतीं समान मद्‍भावो ॥४२॥
देहाभिमान तत्काळ जाण्यासाठीं माझें अखंड नामस्मरण करीत रहावें. गायन, नृत्य, ह्यांनी युक्त असें हरीचें कीर्तन करावें; आणि सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी समान मत्स्वरूप भावना ठेवावी ४२.

मद्‍भावें भूतें समस्त । सर्वदा पाहतां सतत ।
मी तुरीय जो सर्वगत । ते ठायीं चित्त प्रवेशे ॥४३॥
सर्व भूतें मत्स्वरूपच आहेत अशा भावनेनें सदासर्वदा पहात असलें म्हणजे ज्ञानस्वरूप व सर्वव्यापी असा जो मी, त्या माझ्यामध्यें चित्त प्रवेश करितें ४३.

तिहीं अवस्थांमाजीं मी सतत । तिहीं अवस्थांतें मी प्रकाशित ।
तिहीं अवस्थांहूनि अतीत । तो जाण निश्चित मी तुरीयू ॥४४॥
मी निरंतर तिन्ही अवस्थांमध्यें राहातो. तिन्ही अवस्थांना मी प्रकाशित करतों. पण तिन्ही अवस्थाहुनही जो निराळा तोच मी खरोखर ज्ञानस्वरूप आहे ४४.

तिहीं गुणांहूनि परता । चौथेपणेंवीण चौथा ।
तो मी तुरीय जाण तत्त्वतां । ते ठायीं चित्ता जो ठेवी ॥४५॥
तीन गुणांच्याही पलीकडचा, चौथेपणाशिवायच चौथा, तो मी खरोखर ज्ञानस्वरूप आहे. त्या माझ्यामध्यें जो आपलें चित्त ठेवतो ४५,

तेथें ठेवितां चित्ता । जीवू पावे मद्‌रूपता ।
निमाली सांसारिक चिंता । विषयावस्था बुडाली ॥४६॥
त्यानें तेथें चित्त ठेवलें असतां जीव हा मत्स्वरूपच होतो, आणि संसारासंबंधीं चिंता नाहीशी होऊन विषयावस्था बुडूनच जाते ४६.

तेव्हां चित्त चिंता चिंतन । विषयवासना अभिमान ।
या अवघियांचें होय शून्य । मी स्वानंदघन स्वयें प्रकटें ॥४७॥
त्या वेळी चित्त, चिंता आणि चिंतन; विषयवासना व अभिमान; ह्या सर्वांचा नाश होऊन स्वानंदघन असा मी स्वत:च प्रगट होतो ४७.

न तुटतां भेदाचें भेदभान । जो म्हणवी मी सज्ञान ।
वृथा धरी ज्ञानाभिमान । तोही अज्ञान तें ऐका ॥४८॥
द्वैताची भेदभावना तुटली नसतांच जो स्वतःला ज्ञानी असें म्हणवितो, आणि व्यर्थ ज्ञानाचा अभिमान बाळगतो, तोही अज्ञानीच होय. कसें तें ऐका ४८.

यावन्नानार्थधीः पुंसो न निवर्तेत युक्तिभिः ।
जागर्त्यपि स्वपन्नज्ञः स्वप्ने जागरणं यथा ॥ ३० ॥
[श्लोक ३०] मनुष्य जोपर्यंत हा अनेकत्वाचा भ्रम युक्तीयुक्तीने नाहीसा करीत नाही, तोपर्यंत जो जागृत असूनही अज्ञाननिद्रेत झोपलेलाच समजावा त्याचे हे जागेपण स्वप्नातल्या जागेपणासारखेच मिथ्या होय. (३०)
नाना वर्ण नाना व्यक्ती । नाना गोत्रें नाना जाती ।
अधमोत्तमविधानस्थिती । भेदु चित्तीं दृढ भासे ॥४९॥
अनेक वर्ण, अनेक व्यक्ति, निरनिराळी गोत्रें, निरनिराळ्या जाती, अधम व उत्तम असे विधींचे प्रकार, यांमुळे चित्तामध्यें दृढतर भेद उत्पन्न होतो ४९.

मी काळा गोरा सांवळा । मी सज्ञानत्वें आगळा ।
माझी उत्तम पवित्र लीळा । मी कुळें आगळा सत्कुलीन ॥४५०॥
काळा मी, गोरा मी, काळासांवळा मी, उत्तम ज्ञानानें श्रेष्ठ तो मी, उत्तम पवित्र कृति माझीच, माझे कुल श्रेष्ठ व मी उत्तम कुलवान ४५०,

ऐशी झाल्या भेदप्राप्ती । पाहतां अभेदपरा श्रुती ।
साधकां शास्त्रार्थयुक्तीं । भेदनिवृत्ती ज्यां नव्हेचि ॥५१॥
असा भेदाभेद मनांत उत्पन्न झाला असतां, अद्वैत सांगणारी श्रुति पाहून किंवा शास्त्रार्थाच्या युक्ति ऐकूनही ज्या साधकांच्या मनातील भेदाची निवृत्ति होणार नाही ५१,

त्याचा व्यर्थ ज्ञानाभिमान । त्याचें व्यर्थ कर्माचरण ।
तो जागाचि निजेला जाण । जागेपण त्या नाहीं ॥५२॥
त्याचा ज्ञानाभिमान व्यर्थ होय, त्याचें कर्माचरण व्यर्थ होय. तो जागा असतांनाच निजलेला म्हणून समजावे. त्याला जागेपणाच नाही ५२.

दृढ जो कां देहाभिमान । तेंचि कनकबीजसेवन ।
करूनि थोर भ्रमला जाण । अविद्या दीर्घ स्वप्नभेदु देखे ॥५३॥
जो दृढ देहाभिमान बाळगणे, तेंच जणू काय धोत्र्याचें बीज होय. तें सेवन करून मनुष्य अत्यंत भ्रमात पडला म्हणजे अविद्यारूप लांबलचक स्वप्न पहात बसतो ५३.

वोसणतां बोली न लभे अर्थू । तेवीं पठणमात्रें परमार्थू ।
श्रुतिशास्त्रांचा निजशास्त्रार्थू । नव्हेचि प्राप्तु तयांसी ॥५४॥
झोंपेंत बरळलेल्या शब्दांनी कांहीं अर्थ निघत नाहीं, त्याप्रमाणें केवळ पठण केलें असतां परमार्थ प्राप्त होत नाहीं. इतकेंच नव्हे, तर श्रुतिशास्त्रांचा खरा शास्त्रार्थही त्यांना समजत नाही ५४.

वेदाध्ययन नित्य करिती । अरण ब्राह्मण सूत्र निरुक्ती ।
नव्हेचि कामक्रोधनिवृत्ती । पठणें परमप्राप्ती कदा न घडे ॥५५॥
नित्य वेदाध्ययन करतात; अरण, ब्राह्मण, सूत्र, निरुक्त म्हणतात; पण कामक्रोधांची जर निवृत्ति होत नाही, तर त्या पठणानें परमार्थाची प्राप्ति कधींच व्हावयाची नाहीं ५५.

देहाभिमानें भेददृष्टी । पढतां श्रुतिशास्त्रांच्या कोटी ।
परमार्थेंसीं नव्हे भेटी । भेददृष्टी न वचतां ॥५६॥
देहाभिमान धरून आणि भेददृष्टि ठेवून कोट्यवधि वेदशास्त्रें पठण केलीं असतांही, भेददृष्टि गेली नाहीं तर परमार्थाची भेट व्हावयाची नाहीं ५६.

जो कां स्वप्नींचे स्वप्नीं जागा जाहला । स्वप्नीं वेदशास्त्र पढिन्नला ।
जागा म्हणतां असे निजेला । तैसा व्यवहारू झाला शास्त्रज्ञांसी ॥५७॥
जो स्वप्नांतल्या स्वप्नांतच जागा होतो व स्वप्नांतच वेदशास्त्र पढतो; तो जागा आहे म्हटलें तरी निजलेलाच होय. त्याप्रमाणेंच शास्त्रज्ञांचा व्यवहार होतो ५७.

देहाभिमानेंसीं भेदभान । निःशेष जंव न वचे जाण ।
तंववरी नव्हे निजज्ञान । अत्यंत बंधन तो भेद ॥५८॥
देहाभिमानासह सर्व भेदभावना जोंपर्यंत पूर्णपणे गेली नाही, तोंपर्यंत आत्मज्ञान प्राप्त व्हावयाचें नाहीं. कारण भेद हाच मोठें बंधन होय ५८.

सनकादिकांची आशंका । घेऊनि देव बोले देखा ।
वेदविभाग नेटका । सकळ लोकां कळे तैसा ॥५९॥
सनकादिकांचीच शंका लक्षात घेऊन सर्व लोकांस नीट कळेल अशा रीतीनें वेदाचा विभाग नीट रीतीनें देव सांगूं लागला ५९.

स्वयें प्रकाशोनि सकळ भेदू । गर्जत उठी तुझा वेदू ।
भेद वेदेंचि प्रतिपाद्यू । वेदानुवादू नव्हे मिथ्या ॥४६०॥
(ती आशंका अशी) सर्व भेद स्वत:च प्रगट करून तुझा वेद गर्जना करीत उठलेला आहे. भेद हा मुळीं वेदानेंच प्रतिपादन केलेला आहे, आणि वेदाचें म्हणणें तर खोटें असत नाहीं ४६०.

वेदवचन तें तात्त्विक । मानावें पैं आवश्यक ।
हे तुझीच शिकवण देख । तो वेद लटिक म्हणावा कैसा ॥६१॥
वेदाचें वचन हेंच खरें आहे, तें अवश्य मान्य केलेंच पाहिजे, असें तुझेंच सांगणे आहे. तेव्हां तो वेद लटका कसा म्हणावा ? ६१.

वेदाज्ञेचा परम नेम । वेदें प्रतिपाद्य क्रियाकर्म ।
वेदबळें वर्णाश्रम । निज स्वधर्म चालविती ॥६२॥
वेदाज्ञेचा नियम म्हणजे सर्वांत श्रेष्ठ. वेदानेंच क्रिया व कर्म ह्यांचे प्रतिपादन केलेले आहे. सर्व वर्णाश्रम आपले स्वधर्म वेदाच्याच बळावर चालवितात ६२.

वेद म्हणे जो लटिक । जो वेदबाह्य आवश्यक ।
हें तूंचि बोलिलासी देख । तो वेद लटिक केवीं मानूं ॥६३॥
वेद लटका असें जो म्हणेल, तोच खरोखर वेदबाह्य होय, हे तूंच सांगितले आहेस. तो वेद खोटा असें कसें मानूं ? ६३.

ऐशी मानाल आशंका । तोहीविषयीं मीचि देखा ।
वेदवादाच्या विवेका । विभाग नेटका सांगेन ॥६४॥
(आशंकेचे उत्तर)-अशीही शंका घ्याल तर त्याविषयी मीच तुम्हांला वेदवचनांतील निरनिराळ्या भागांचा विचार नीट सांगतों ६४.

अविद्याभेद सबळ ज्यासी । वेदू नियामक म्यां केला त्यासी ।
मद्‌रूपीं अभेदता ज्या भक्तासी । मिणधा त्यापाशीं वेदवादु ॥६५॥
अविद्यात्मक भेद ज्याच्यापाशी प्रबळ झालेला असतो, त्यालाच मी हा वेदाचा नियम लावून दिलेला आहे. परंतु ज्या भक्ताला माझ्या स्वरूपांत पूर्ण ऐक्य लाभलेलें असतें, त्याच्यापाशी वेदवचनें लाचार होतात ६५.

वेद तितुकाही त्रिगुण । अभेदभजनें भक्त निर्गुण ।
त्यासी वेदाचें नियामकपण । न चले जाण ममाज्ञा ॥६६॥
वेद म्हणून जितका आहे तितका तीन गुणांनी व्याप्तच आहे, आणि अभेदभजनानें भक्त हा निर्गुण झालेला असतो, तेव्हा त्याला माझ्या आज्ञेमुळे वेदाचे निर्बंध मुळींच चालत नाहींत ६६.

रायाचा जिवलग सेवकू । त्यासी द्वारपाळ नव्हे नियामकू ।
कां दासीस लागल्या राजांकू । तीस मानी लोकू प्रधानादि ॥६७॥
राजाचा जिवलग नोकर असला, तर त्याला दारांतला पहारेकरी कधीं अटकाव करीत नाही. किंवा एखाद्या दासीला जर राजाची मांडी बसावयाला मिळाली, तर मोठे मोठे प्रधानादि लोकसुद्धा तिला मान देतात ६७.

निजकन्येसी शिकवी माता । लाज धरावी लोकांदेखतां ।
एकांतीं मीनल्या कांता । लाज सर्वथा सोडावी ॥६८॥
आपल्या कन्येला आईसुद्धा शिकवीत असतें कीं, लोकांच्या देखत मात्र नवऱ्याविषयीं लाजावें, परंतु एकांतात पतीची गांठ पडली असतां सर्व लाज सोडून द्यावी ६८.

सबळ भेदांचें भेदमान । तंव दुर्लंघ्य वेदवचन ।
अभेद भक्त माझे जाण । वेदविधान त्यां न बाधी ॥६९॥
भेदांची भेदभावना प्रबळ असते, तोंपर्यंतच वेदाचें वचन दुर्लंघ्य असतें. पण माझें जें अभेदभावना धरणारें भक्त असतात, त्यांना कोणतेंच विधान बाधक होत नाहीं ६९.

आशा तेचि अविद्याबाधू । छेदिल्या बाधीना वेदवादू ।
जेवीं सूर्योदयापुढें चांदू । होय मंदू निजतेजें ॥४७०॥
ज्याप्रमाणें सूर्योदयापुढे चंद्र आपल्या तेजानें फिका पडतो, त्याप्रमाणें आशा हीच अविद्यारूपानें बाधक होतें, तीं छेदून टाकलीं असतां वेदवाद बाधत नाहीं ४७०.

असत्त्वाद् आत्मनोऽन्येषां भावानां तत्कृता भिदा ।
गतयो हेतवश्चास्य मृषा स्वप्नदृशो यथा ॥ ३१ ॥
[श्लोक ३१] वास्तविक या विश्वात आत्म्याव्यतिरिक्त अन्य कोणतीही देहादिक वस्तू सत्य नाही म्हणून स्वप्न पाहाणार्‍याच्या सर्व क्रिया जशा खोट्या असतात, त्याप्रमाणे अज्ञानी माणसाचेसुद्धा खोट्या देहाच्या आश्रयाने असणारे वर्णाश्रमधर्म त्यामुळे मिळणार्‍या स्वर्गादी गती आणि त्यांना कारण असणारी कर्मे हे सर्व खोटेच आहे. (३१)
गुरुकृपा जो सज्ञान । त्यासी देहाचें अबाधित भान ।
मिथ्या प्रपंचाचें दर्शन । कर्में कर्तेपण त्या नाहीं ॥७१॥
गुरुकृपेच्या योगानें जो ज्ञानसंपन्न होतो, त्याला देहाची भावना बाधक होत नाहीं. त्याला प्रपंचाचें दर्शन मिथ्या होतें, आणि त्यानें कर्मे केली तरी त्यायोगानें त्याच्याकडे कर्तेपणा येत नाहीं ७१.

अविद्या द्योतिले वर्णाश्रम । तेथींचे आविद्यक क्रियाकर्म ।
तेथील जो वेदोक्त धर्म । तो अविद्याभ्रम अज्ञाना ॥७२॥
वर्ण आणि आश्रम हें अज्ञानानेंच निर्मिलेलें आहेत. तेव्हां त्यांतील क्रियाकर्मही अज्ञानात्मकच असतें, म्हणून त्या वर्णाश्रमांतील जो वेदोक्त धर्म तो अज्ञान्यालाच अविद्येनें भ्रम उत्पन्न करतो ७२.

सज्ञान भक्तांच्या ठायीं । ते अविद्या निःशेष नाहीं ।
मा वेदविधान तेथें पाहीं । रिघावया कायी कारण ॥७३॥
परंतु ज्ञानसंपन्न भक्त असतात त्यांच्या ठिकाणी तीं अविद्या मुळींच नाहीं. मग त्यांच्यामध्यें वेदाचें विधान शिरण्याचें कारण काय ? ७३.

आंबा सफळित जव असे । तंव नेटेंपाटें राखण बैसे ।
फळ हाता आल्या आपैसें । राखण वायसें राहेना ॥७४॥
आंब्याला जोंपर्यंत फळे आलेली असतात, तोंपर्यंतच त्याला दक्षतेनें राखण राहाते. पण फळें हाती आली की, आपोआपच राखण निष्फळ उरून उठतें ७४.

तेवीं अविद्येचें जंव बंधन । तंव वेदाचें वेदविधान ।
अविद्या नाशिलिया जाण । विधीनें तें स्थान सोडिलें ॥७५॥
त्याप्रमाणें जोंपर्यंत अज्ञानाचें बंधन आहें, तोंपर्यंत वेदाचें विधान आहें. तें अज्ञानच नाहींसें झालें असतां वेदविधीनें तें ठिकाण सोडलेंच म्हणून समजावें ७५,

अविद्या जाऊनि वर्ततां देहीं । देहाचा देहत्वें हेतु नाहीं ।
हें म्हणाल न घडेच कांहीं । ऐक तेंही सांगेन ॥७६॥
अज्ञान नष्ट होऊन देहानें वागू लागलें असतां देहपणा हा देहाचा हेतूच राहत नाहीं, पण हें कांहीं घडावयाचेंच नाहीं असें म्हणाल तर तेंही सांगतों, ऐका ७६.

स्वप्नींचें देहादि प्रपंचभान । स्वप्नाचमाजीं सत्य जाण ।
जागें होतां तें अकारण । संस्कारें स्वप्न दिसतांही ॥७७॥
स्वप्नांतील देहादिक प्रपंचाचा भास स्वप्नामध्येंच काय तो खरा असतो. काही संस्कारानें स्वप्न पडूनही जागे झाल्यावर तें सर्वच निष्कारण असें वाटतें ७७.

स्वप्नीं राज्यपद पावला । कां व्याघ्रमुखीं सांपडला ।
अथवा धनादिलाभ झाला । रत्‍नें पावला अनर्घ्यें ॥७८॥
एखादा मनुष्य स्वप्नामध्यें राज्यपद पावला, किंवा वाघाच्या तोंडांत सांपडला, अथवा त्याला द्रव्यादिकांचा लाभ झाला, अमूल्य रत्नें मिळाली ७८,

तेथींचें सुख दुःख हरिख । जागत्यासी नाहीं देख ।
तेवीं सज्ञानासी आविद्यक । नोहे बाधक निजबोधें ॥७९॥
तरी तेथचें सुख, दुःख किंवा हर्ष जागा झाल्यावर नाही. त्याप्रमाणें ज्ञात्यालाही आत्मज्ञानाच्या योगानें अज्ञानात्मक असें कांहींच बाधक होत नाहीं ७९.

देहीं असोनि विदेहस्थिती । ऐशा बोधसाधिका ज्या युक्ती ।
स्वयें सांगेन म्हणे श्रीपती । भेदाची उत्पत्ती छेदावया ॥४८०॥
देहामध्यें असूनच विदेहस्थिति धारण करतां येईल अशा ज्या ज्ञानदायक युक्ति आहेत, त्या भेदाचा नाश करण्याकरितां तुम्हांला आता मी स्वतःच सांगतों असें श्रीकृष्ण म्हणाला ५८०.

यो जागरे बहिरनुक्षणधर्मिणोऽर्थान् ।
भुङ्क्ते समस्तकरणैहृदि तत्सदृक्षान् ।
स्वप्ने सुषुप्त उपसंहरते स एकः ।
स्मृत्यन्वयात्त्रिगुणवृत्तिदृगिन्द्रियेशः ॥ ३२ ॥
[श्लोक ३२] जो बाल्य, तारूण्य इत्यादी अवस्थांच्या रूपाने वारंवार बदलणार्‍या देहादी पदार्थांना आपल्या इंद्रियांनी जागृत अवस्थेत उपभोगतो, तोच स्वप्नावस्थेत त्यांसारख्याच वासनामय पदार्थांचा मनाने उपभोग घेतो आणि गाढ निद्रेच्या वेळी तोच हे सर्व विषय आवरून ठेवतो अशा प्रकारे या तीनही अवस्थांचा अनुभव घेणारा साक्षी इंद्रियांचा स्वामी, चेतन आत्मा एकच आहे “ज्याने स्वप्न पाहिले, जो गाढ झोपला होता, तोच मी जागा आहे,” या प्रत्यभिज्ञेवरून आत्म्याची एकता सिद्ध होते. (३२)
तिहीं अवस्थांच्या ठायीं । आत्मा एकचि असे देहीं ।
तोचि देहाच्या ठायीं विदेही । साक्षी पाहीं सर्वांचा ॥८१॥
तिन्ही अवस्थांमध्यें देहांत आत्मा हा एकच असतो. तोच देहामध्यें विदेही असून सर्वांचा साक्षी आहे ८१.

मी बाळ तोचि झालों तरणा । आतां आलों म्हातारपणा ।
ऐशा वयसांचे साक्षीपणा । आपण आपणा देखतू ॥८२॥
मी मूल होतों तोच तरणा झालों, आणि आतां म्हातारपणाला आलों, अशी वयाची साक्ष आपली आपणच पहात असतों ८२.

जागृतीसी नाना भोग । सविस्तर भोगी अनेक ।
तेचि स्वप्नामाजीं साङ्ग । निजहृदयीं चांग विस्तारी ॥८३॥
जागृतीमध्यें असतांना नानाप्रकारचे सुखोपभोग अनेक प्रकारांनी पाहिजे तसे भोगतो, आणि तेच सर्व स्वप्नामध्यें आपल्या हृदयांत नीट रीतीनें पसरतो ८३.

जागृतिभोगाचा संस्कारू । तोचि स्वप्नामाजीं विस्तारू ।
मनोमय विश्वाकारू । निजहृदयीं वेव्हारू वाढवी ॥८४॥
जागृतीमध्यें भोगाचा जो संस्कार घडलेला असतो, त्याचाच स्वप्नामध्यें विस्तार होतो. स्वप्नामध्यें मनोमयच विश्व उत्पन्न करून आपल्या हृदयामध्यें त्याचाच व्यवहार वाढवितो ८४,

गज तुरंग खर नर । गिरि दुर्ग पुर नगर ।
विशाळ सरिता समुद्र । वासनेचें वैचित्र्य स्वप्नीं देखे ॥८५॥
हत्ती, घोडे, गाढव, पुरुष, पर्वत, किल्ले, पुरें, नगरें, मोठमोठ्या नद्या, समुद्र, इत्यादि वासनेंचे वैचित्र्य स्वप्नामध्यें पाहतो ८५.

नाहीं जागृती नाहीं स्वप्न । अंतःकरणही करोनि लीन ।
सुषुप्तिकाळीं तोचि जाण । अहंकारेंवीण उरलासे ॥८६॥
तोच सुषुप्तीमध्यें जागृतीही नाहीं आणि स्वप्नही नाहीं, अशा स्थितीत अंतःकरणही लीन करून अहंकाराशिवाय राहतो ८६.

विश्वाभिमानी इंद्रियवृत्ती । तेणें तो देखतसे जागृतीं ।
तैजस अभिमानी अविद्यावृत्ती । स्वप्नस्थिती तो देखे ॥८७॥
विश्वाभिमानी असतो तो आपला देह तोच मी व हे विषय माझे अशा वृत्तीचा असतो. त्या वृत्तीनें तो जागृतीमध्यें नेंहमी पहात असतो. तैजस अभिमानी असतो तो अज्ञानवृत्तीचा असतो, म्हणून तो स्वप्नस्थिति पहात असतो ८७.

प्राज्ञ अभिमानी मूढवृत्ती । तो देखतसे सुषुप्ती ।
एक आत्मा तिहींप्रती । न घडे निश्चितीं म्हणाल ॥८८॥
प्राज्ञ अभिमानी प्रवृत्तीचा असतो, म्हणून तो सुषुप्ति अवस्था पहातो. आता एकच आत्मा ह्या तिन्ही अवस्थांत राहणें खरोखर घडणार नाहीं असें म्हणाल ८८,

तिहीं अवस्थांचे अभिमानी । म्हणाल देखणे भिन्न तिनी ।
तरी एक आत्मा द्रष्टेपणीं । उरला निदानीं तें ऐका ॥८९॥
आणि तिन्ही अवस्था पाहणारे तिन्ही अभिमानी भिन्न भिन्न असतील असें म्हणाल, तर एकच आत्मा सरतेशेवटी द्रष्टेपणानें उरतो. तो कसा ? तें ऐका ८९.

पहिला जो कां मी जागता । तेणें म्यां देखिली स्वप्नावस्था ।
तोचि मी सुखें निजेला होता । या तिनी अवस्था स्वयें मी जाणें ॥४९०॥
पहिला जो मी जागणारा, त्या मी स्वप्नावस्था पाहिली, आणि तोच मी सुखानें निजलोंही होतो. ह्यावरून ह्या तिन्ही अवस्था मी स्वतः जाणतों ४९०.

जेणें जे देखिली नाहीं । तो ते अवस्था सांगेल कायी ।
यालागीं तिहीं अवस्थांचे ठायीं । आत्मा पाहीं अनुस्यूत ॥९१॥
ज्यानें जी अवस्था पाहिलीच नाहीं, तो ती अवस्था सांगू शकेल काय ? यावरूनच तिन्ही अवस्थांमध्यें आत्मा हा एकसारखाच भरलेला आहे ९१.

जागृतीं इंद्रियां देखणेपण । स्वप्नीं देखणें तें तंव मन ।
सुषुप्ति गाढ मूढ अज्ञान । कैंचें देखणेपण आत्म्यासी ॥९२॥
जागृतीमध्यें इंद्रियांना पहाण्याचें सामर्थ्य असतें, स्वप्नामध्यें तर मन पाहणारें असतें, आणि सुषुप्तीमध्यें पूर्णपणे मूढ अज्ञानच असतें. तेथे आत्म्याला देखणेपण कशाचें ? ९२.

येही आशंकेचें वचन । ऐका द्विज हो सावधान ।
मन इंद्रियें जडें जाण । देखणेपण त्यां कैंचें ॥९३॥
ब्राह्मण हो ! ह्याही शंकेचें उत्तर सावधान चित्तानें ऐका. मन आणि इंद्रियें ही जडच आहेत. त्यांना पाहण्याचें सामर्थ्य तें कशाचें ? ९३.

जो मनाचा चाळकू । जो इंद्रियांचा प्रकाशकू ।
जो सुषुप्तीचा द्योतकू । साक्षित्वें एकू तो आत्मा ॥९४॥
जो मनाचा चालक, जो इंद्रियांचा प्रकाशक, जो सुषुप्तीचा द्योतक, तो साक्षित्वानें असणारा एक आत्माच होय ९५.

म्हणाल सुषुप्ती आत्मा नाहीं । बोलणें न घडे कांहीं ।
मी सुखें निजेलों होतों पाहीं । हें कोणाचे ठायीं जाणवे ॥९५॥
आतां सुषुप्तीमध्यें आत्मा मुळींच नाहीं असें म्हणाल, तर तें बोलणें मुळींच शोभत नाहीं. कारण, मी मोठ्या आनंदांत निजलों होतो, ही जाणीव कोणाच्या ठिकाणी होतें ? ९५.

प्रकृतिकार्याहूनि परता । देहादि अवस्थांतें प्रकाशिता ।
गुण‍इंद्रियांचा नियंता । जाण तत्त्वतां तो आत्मा ॥९६॥
तर प्रकृतिकार्याहून निराळा, देहादि अवस्थांना प्रकाशित करणारा, आणि गुण व इंद्रिये ह्यांचें नियमन करणारा तोच खरोखर आत्मा होय ९६.

इंद्रियें आत्मा नव्हती हा नेम । त्यांचें सदा एकदेशी कर्म ।
आत्मा सर्वकर्ता सर्वोत्तम । करोनि निष्कर्म सर्वदा ॥९७॥
इंद्रिये आत्मा नव्हेत हा नियमच आहे. कारण त्याचे कर्म नेहमी एकदेशी असतें, आणि आत्मा तर सर्वकर्ता सर्वोत्तम असून सदासर्वदा कर्मे करून निष्कर्म आहे ९७.

मन आत्मा नव्हे तें ऐक वर्म । संकल्पविकल्प त्याचें कर्म ।
आत्मा निर्विकल्प निरुपम । विश्रामधाम जगाचें ॥९८॥
मन हा कांहीं आत्मा नव्हे, त्यांतील वर्म ऐक. संकल्प आणि विकल्प हें मनाचे कर्म आहे, आणि आत्मा हा निर्विकल्प, निरुपम असा असून जगाच्या विश्रांतीचें स्थान आहे ९८.

जो सुषुप्तिसुखभोगसाक्षी । जो देखणेपणें तिहीं लोकीं ।
तो मी आत्मा गा एकाकी । जाण निष्टंकीं निश्चित ॥९९॥
जो सुषुप्तिसुखभोगाचा साक्षी त्रिभुवनांत पाहणें हेंच ज्याचें स्वरूप आहे, असा जो एक अद्वितीय आत्मा, तो मीच हे निश्चयपूर्वक लक्षांत ठेव ९९.

एवं युक्तीचिया विभागलीला । परमात्मा जो एकू साधिला ।
तो साधकांसी उपयोगा आला । योग सिद्धी नेला तेणें बळें ॥५००॥
अशा युक्तीच्या कौशल्यानें जो एक परमात्मा साध्य करावा, तोच साधकांच्या उपयोगाला येतो, आणि त्याच्याच सामर्थ्यानें योगही सिद्धीला जातो ५००.

एवं विमृश्य गुणतो मनसस्त्र्यवस्था ।
मन्मायया मयि कृता इति निश्चितार्थाः ।
सञ्छिद्य हार्दमनुमानसदुक्तितीक्ष्ण ।
ज्ञानासिना भजत माखिलसंशयाधिम् ॥ ३३ ॥
[श्लोक ३३] मनाच्या या तीन अवस्था गुणांमुळेच झाल्या असून हे माझ्या पगडा असलेल्या मायेमुळेच माझ्यामध्ये कल्पिल्या गेलेल्या आहेत, असा निश्चय करा नंतर सगळ्या संशयांचा आधार असलेल्या अहंकाराला अनुमानप्रमाण व संतांचे उपदेश यांपासून उत्पन्न झालेल्या तीक्ष्ण ज्ञानरूपी खड्‌गाने छिन्नविच्छिन्न करा व आपल्याच हृदयात स्थित असलेल्या माझेपरमात्म्याचे भजन करा. (३३)
म्यां सांगीतल्या ज्या युक्ती । ज्या कां श्रुतिशास्त्रार्थसंमती ।
त्या विचारोनि परमार्थगतीं । संसारगुंतीं उगवावी ॥१॥
ह्या ज्या युक्त्या तुम्हांला मी सांगितल्या, आणि ज्या श्रुतिशास्त्रांना संमत अशाच आहेत, त्यांचा विचार करून परमार्थाच्या मार्गात संसाराचें कोडें सोडवावें १.

संसारगुंतीसी कारण गुण । गुणावस्थीं व्यापिलें मन ।
त्यासी माझी माया मूळ जाण । जिया केलें आवरण माझेंचि ॥२॥
संसाराच्या बंधनाला कारण गुण आहेत. त्या गुणांच्या अवस्थेनेंच मन व्यापलेलें आहे. जिला माझेंच आच्छादन केलेलें आहे अशी जी माया, तीच मूळ कारण आहे २.

माझी माया माझेनि सबळ । त्या मजचि आवरिलें तत्काळ ।
जैसें डोळ्याचें डोळां जळ । गोठूनि पडळ होऊनि ठाके ॥३॥
ज्याप्रमाणें डोळ्यांतील पाणी गोठून त्याचाच पडदा होऊन राहातो, आणि तो डोळ्यालाच झांकून टाकतो, त्याप्रमाणें माझी माया माझ्यामुळेंच प्रबळ झालेली आहे व मलाच तिनें लागलेंच झाकून टाकलें ३.

कां पूर्णचंद्र अतिनिर्मळ । तेथ पृथ्वी बिंबली सकळ ।
तेणें सलांछन चंद्रमंडळ । लोक सकळ देखती ॥४॥
किंवा पौर्णिमेचा अत्यंत निर्मल असा पूर्णचंद्र उगवला म्हणजे त्यावर पृथ्वीची पडछाया पडतें, व त्यामुळें चंद्रबिंबावर काळा डाग पडला आहे असें सर्व लोकांस दिसू लागतें ४.

पृथ्वीचंद्रासी अंतर । विचारितां दूरांतर ।
मिथ्या बाधिला रजनीकर । ते लोक साचार मानिती ॥५॥
पृथ्वी आणि चंद्र ह्यांच्यामधील अंतराचा विचार केला तर ते फारच मोठें आहे. अर्थात चंद्राला पडलेला डाग खोटा, पण लोक तोच खरा मानतात ५.

यापरी माया माझ्या ठायीं । आतळली नाहीं कंहीं ।
मिथ्याभासें लोक पाहीं । तिच्याठायीं भूलले ॥६॥
अशा प्रकारेंच माया ही माझ्या ठिकाणी आहे. तिनें मला स्पर्शसुद्धा केलेला नाही, तरी लोक मिथ्याभासानेंच तिच्या ठिकाणी भुलून पडतात ६.

तेणें नाथिली गुणावस्था । अहंकर्तृत्वें घेतली माथां ।
तेणें विषयभोग‍अवस्था । वासनायुक्ता वाढविल्या ॥७॥
त्यामुळें मिथ्या असलेली गुणांची अवस्था तें अहंकर्तृत्वानें आपल्याच माथ्यावर घेतात. तेणेंकरूनच विषयभोगाच्या अवस्था वासनायुक्त होऊन वाढतात ७.

एवं उभय देहबंधन । मिथ्या जीवत्वें लागलें जाण ।
त्याचें करावया छेदन । माझ्या युक्ती जाण विवराव्या ॥८॥
एकंदरीत दोन्ही देहांचे बंधन जीवाला मिथ्याच लागलेलें आहे. याकरितां त्याचें छेदन करण्यासाठी माझ्या ज्या युक्ति आहेत त्यांचाच विचार करावा ८.

करितां युक्तींचें अनुमान । तेणें अनुमानिक होय ज्ञान ।
न तुटे अविद्याबंधन । यालागीं साधुसज्जन सेवावे ॥९॥
युक्तीचें केवळ अनुमानच करीत राहिलें असतां त्यामुळें अनुमानिक ज्ञान होतें. त्यानें अविद्येचें बंधन तुटत नाहीं. म्हणून साधुसंतांची सेवा करावी ९.

साधूंमाजीं साधुत्व पूर्ण । सेवावे सद्‍गुरुचरण ।
तेणें निरसे भवबंधन । साधुसज्जन सद्‍गुरु ॥५१०॥
साधूंमध्येंसुद्धा परिपूर्ण साधुत्व एका सद्‌गुरूच्याच ठिकाणी असतें, ह्याकरितां सद्गुरूच्या चरणांची सेवा करावी. त्या सेवेनें संसारबंधन तुटतें. कारण, सद्गुरु हेच खरें साधु व सज्जन असतात ५१०.

त्या साधूंचिया सदुक्ती । श्रुत्यर्थें उपदेश करिती ।
तेणें होय ज्ञानखड्ग प्राप्ती । जे बुद्धीच्या हातीं हातवशी ॥११॥
त्या साधूची सुरस वचनें श्रुतीच्याच अर्थाचा उपदेश करतात, त्यामुळें ज्ञानरूपी खड्ग प्राप्त होतें, आणि तें बुद्धीच्या हातांत द्यावयास सांपडतें ११.

तेंही वैराग्यनैराश्यसाहाणे । लावूनि सतेज शस्त्र करणें ।
धृतीच्या धारणा दृढ धरणें । सावधपणें निःशंक ॥१२॥
तेंच शस्त्र मग वैराग्य आणि नैराश्यरूप सहाणेवर पाजळून लखलखीत करावें, आणि त्याला धैर्याची खबीर मूठ घालून अंत:करणांत निःसंशय सावधपणानें घट्ट धरावें १२.

शस्त्रासी आणि आपणा । एकपणाची धारणा ।
दृढ साधूनि साधना । देहाभिमाना छेदावें ॥१३॥
त्या शस्त्राचा आणि आपला अगदी एकजीव करावा आणि बरोबर नेंम साधून देहाभिमानाला छाटून टाकावें १३.

जो सकळ संशयाचा कंदू । जेणें देहदुःखाचा उद्‍बोधू ।
ज्याचेनि सदा विषयसंदू । जो कामक्रोधपोषकू ॥१४॥
जो सर्व संशयाचा मूळ गड्डा, ज्याच्या योगानें देहदुःख उत्पन्न होतें, ज्याच्या योगानें सदोदित विषयांचाच छंद घडतो, जो काम व क्रोध ह्यांचें पोषण करतो १४,

जो वाढवी तिनी गुण । जो शुद्धासी आणी जीवपण ।
ज्याचेनि जीव जन्ममरण । दुर्निवार जाण लागलें ॥१५॥
जो तिन्ही गुण वाढवितो, जो शुद्ध आत्म्याला जीवपणा आणतो, ज्याच्या योगानें जीवाला दुर्निवार जन्ममरण लागून राहिलें आहे १५,

जो सकळ अनर्थांचा दाता । ज्याची लडिवाळ कन्या ममता ।
तियेसी वाढवी माया माता । तिच्या सत्ता हा दाटुगा ॥१६॥
जो सर्व अनर्थाचा दाता, ममता ही ज्याची लाडकी मुलगी, असा हा अभिमान आहे. माया हीच आई ममतेला वाढवितें, आणि तिच्याच सामर्थ्यावर हाही इतका माजून राहतो १६.

तेथें शस्त्राचेनि लखलखाटें । राहोनियां नेटेंपाटें ।
समरांगणीं सुभटें । घावो येणें नेटें हाणावा ॥१७॥
ह्याकरितां शूरानें रणांगणांत हें लखलखीत धार लावलेलें शस्त्र घेऊन धैर्यानें नीट उभे राहून अशा जोरानें त्याच्यावर घाव घालावा की १७,

एकेचि घायें जाण । माया ममता अभिमान ।
त्रिपुटीचें होय छेदन । येणें बळें जाण छेदावा ॥१८॥
एकाच तडाक्याबरोबर माया, ममता आणि अभिमान ह्या तिघांचेही एकदम तुकडें तुकडें होतील, इतक्या जोरानें त्याचें छेदन व्हावें १८.

भोग्य भोगू भोक्ता । कर्म कार्य कर्ता ।
ध्येय ध्यान ध्याता । त्रिपुटी तत्त्वतां छेदावी ॥१९॥
भोग्य, भोग आणि भोक्ता, कर्म, कार्य आणि कर्ता; ध्येय, ध्यान आणि ध्याता; हीं सर्व त्रिपुटींच खरोखर छाटून टाकावी ११.

अहं कोहं सोहं स्वभावो । हाही छेदूनि अहंभावो ।
साधकां निजपदीं ठावो । ब्रह्म स्वयमेवो होऊनि ठेले ॥५२०॥
‘मी आहे,’ ‘मी कोण ?’, किंवा ‘ब्रह्म तें मीच’, असा हा आत्मीयतेचा अहंभावसुद्धा छेदून टाकल्यामुळें साधकांना माझ्या पदाजवळ स्थान प्राप्त होतें. अशा रीतीनें तें स्वतः ब्रह्मस्वरूप होऊन राहतात ५२०.

म्हणाल सांगतां जो प्रकारू । तो शब्दज्ञान वेव्हारू ।
बोलाचा कडकडाट थोरू । कैसेनि अहंकारू मारवे ॥२१॥
आता तुम्ही असें म्हणाल कीं, “आपण हा जो प्रकार सांगतां, तो केवळ शब्दज्ञानाचा व्यवहार आहे. बोलण्याचा पाहिजें तेवढा कडकडाट केला, म्हणून अहंकाराला कसें मारतां येईल ? २१.

शब्दमात्रें अभिमान । जरी पावता निर्दळण ।
तरी कां पां विद्वज्जन । अभिमानमग्न होताती ॥२२॥
जर केवळ शब्दांनीच अभिमान नाश पावता, तर हें मोठमोठे विद्वान् अभिमानांत का बुडून जाते ? २२.

अभिमान संमुख दिसता । तरी धांवोनि करूं ये घाता ।
तो अतर्क्य जी सर्वथा । शब्दें अहंता मरेना ॥२३॥
अभिमान जर समोरासमोर आलेला दिसला असता, तर तत्काळ त्याच्या अंगावर धावत जाऊन त्याला छेदून टाकता आलें असतें. पण तो तर सर्वस्वी अतर्क्य आहे. तेव्हां शब्दानें अभिमान नाहींसा व्हावयाचा नाही २३.

घडे अपरोक्षसाक्षात्कारू । तो शब्दमात्रें नव्हे प्रकारू ।
ऐसा आशंकेचा विचारू । ऐक निर्धारू सांगेन ॥२४॥
तसेंच आत्मानुभवाचा जो साक्षात्कार घडतो, तोही काही शब्दांचा खेळ नव्हे. ” तर अशा शंकेचा विचार ऐक. त्याचें समाधान सांगतों २४.

जो अनन्यभावें माझें भजन । सर्वदा करी सावधान ।
कां सद्‍गुरूचे श्रीचरण । मद्‍भावें जाण जो सेवी ॥२५॥
जो सदोदित सावध राहून अनन्य भावानें माझें भजन करतो, किंवा माझ्याच भावनेनें जो सद्गुरूच्या पवित्र चरणांची सेवा करतो २५,

मज आणि सद्‍गुरुमूर्ती । भेद नाहीं गा कल्पांतीं ।
येणें अभेदभावें जे भजती । ते ज्ञान पावती सहजचि ॥२६॥
मी आणि सद्गुरुमूर्ति यांच्या स्वरूपांमध्यें कल्पांतीसुद्धा भेद नाहीं अशा अभेदभावानें जें माझें भजन करतात, त्यांना सहजच ज्ञान प्राप्त होतें २६.

त्यांसी स्वभावें भजनस्थिती । ज्ञानखड्गाची होय प्राप्ती ।
सहजेंचि सांपडे हातीं । ज्या शस्त्रदीप्ति काळू कांपे ॥२७॥
तें स्वभावतःच माझ्या भजनांत मग्न असल्यामुळें त्यांना ज्ञानरूप खड्गाची प्राप्ति होंते. ज्या शस्त्राचें तेज पाहून काळाच्या हृदयांतसुद्धा कापरें भरतें, तें शस्त्र आपोआप त्यांच्या हाती लागतें २७.

ज्या शस्त्राच्या धाकाभेण । माया ममता अभिमान ।
सांडूनियां जीवपण । समूळ जाण पळालीं ॥२८॥
त्या शस्त्राच्या भीतीनेंच माया, ममता व अभिमान ही जिवाला सोडून पूर्णपणें पळून जातात असें समज २८.

हाणावया पुरता घावो । अहंममतेसी नाहीं ठावो ।
अविद्येचाही अभावो । आपभयें पहा हो आपणचि ॥२९॥
अहंममता व अविद्या यांना पूर्णपणे मारण्यासाठी घाव घालण्यास तयार व्हावें, तर भीतीनें आपल्या आपणच ती पळून गेल्यामुळे अहंममतेला मुळीं स्थळच राहिलेलें नाहीं, व अविद्येलाही अस्तित्व नाहीं असें दिसून येतें २९.

सद्‍भावें जें माझें भजन । करितां एवढें होय ज्ञान ।
येथ आशंका करील मन । कोठें भजन करावें ॥५३०॥
उत्तम भक्तिभावानें जें माझें भजन करावयाचें, तें केलें असतां एवढें ज्ञान प्राप्त होतें. येथें मन अशी शंका घेईल कीं, भजन कोठें करावें ? ५३०.

तुझें स्वरूप अतर्क्य जाण । अतिसूक्ष्म आणि निर्गुण ।
तुज भजावया कवण स्थान । आम्हांसी जाण कळेना ॥३१॥
कारण, तुझें स्वरूप अतर्क्य, अत्यंत सूक्ष्म आणि निर्गुण असें आहे. तेव्हां तुझें भजन करावयाला स्थान कोणतें तेंच आम्हांला कळत नाहीं ३१.

ऐसें कल्पील जरी मन । तरी ऐक सावधान ।
अतिसुगम भजनस्थान । मी सांगेन तें ऐक ॥३२॥
अशी कल्पना जर मन करील, तर त्याचें उत्तर नीट लक्ष देऊन ऐक. अत्यंत सुलभ असें भजनस्थान मी तुला सांगतों तें ऐक ३२.

नुल्लंघितां पर्वतकोटी । न रिघतां गिरिकपाटीं ।
दूरी न करितां आटाटी । जे स्थानीं भेटी सदा माझी ॥३३॥
कोट्यवधि पर्वत ओलांडून न जाता, ‘गिरिगव्हरांत न शिरतां, दूर जाऊन यातायात न करितां, ज्या ठिकाणी सदासर्वदा माझी भेट होतें ३३,

भजनस्थान निरुपम । जेथ मी वसें पुरुषोत्तम ।
प्राप्तीलागीं अतिसुगम । विश्रामधाम भक्तांचें ॥३४॥
जेथें मी पुरुषोत्तम राहत असतो, तें भजनस्थान केवळ निरुपम आहे. माझी प्राप्ति होण्याकरितां तें भक्तांचे अत्यंत सुलभ असें विश्रांतीचें स्थान आहे ३४.

सर्व सुखांचा आराम । निजहृदयीं आत्माराम ।
सर्वदा असे सम । भजावें सप्रेम ते ठायीं ॥३५॥
सर्व सुखाचें विश्रांतिस्थान असा जो आत्माराम, तो आपल्या हृदयांत सर्वदा समभावानें राहतो. त्या ठिकाणीच प्रेमानें त्याला भजावें ३५.

आदि ब्रह्मा अंतीं मशक । सर्वांचे हृदयीं मीचि एक ।
ऐसें पाहे तो सभाग्य देख । हें भजन चोख मत्प्राप्ती ॥३६॥
ब्रह्मदेवापासून तो माशीपर्यंत सर्वांच्या हृदयांत एक मीच आहे. हें जो जाणतो तो भाग्यवान् होय. आणि माझ्या प्राप्तीला हेंच भजन उत्तम होय ३६.

ज्या मज हृदयस्थाचे दीप्ति । मनबुद्ध्यादिकें वर्तती ।
ज्या माझिये स्फुरणस्फूर्ती । ज्ञानव्युत्पत्ती पायां लागे ॥३७॥
ज्या मज हृदयस्थाच्या तेजानें मन-बुद्ध्यादिक वागतात, ज्या माझ्या स्फुरणाच्या स्फूर्तीनें सविस्तर ज्ञान पायांजवळ येतें ३७,

त्या मज हृदयस्थाच्या ठायीं । भजनशीळ कोणीच नाहीं ।
शिणतां बाह्य उपायीं । जन अपायीं पडताती ॥३८॥
त्या मज हृदयस्थाच्या ठिकाणी कोणींच भजनतत्पर होत नाहीं, आणि बाह्य उपायांनी व्यर्थ थकून जाऊन लोक अनेक प्रकारच्या संकटांत मात्र पडतात ३८.

ऐशांत सदैव कोणी एक । निजभाग्यें अत्यंत चोख ।
मज हृदयस्थाचा विवेक । करूनि निष्ठंक मद्‍भजनीं ॥३९॥
अशा लोकांतही कोणी एखादा दैववान् आपल्या भाग्यानें अत्यंत थोर असा असतो, आणि तोच माझा हृदयस्थाचा विचार करून निश्चयानें माझ्या भजनी लागतो ३९.

करितां हृदयस्थाचें भजन । माझें पावे तो निजज्ञान ।
वैराग्ययुक्त संपूर्ण । जे ज्ञानीं पतन रिघेना ॥५४०॥
त्यानें मज हृदयस्थाचें भजन केलें असतां, ज्या ज्ञानानें अधःपात होत नाहीं, असें माझें संपूर्ण वैराग्ययुक्त आत्मज्ञान तो पावतो ५४०.

ज्या ज्ञानाभेणें जाण । धाकेंचि पळे अभिमान ।
तें मी आपुलें त्यांसी दें ज्ञान । जे हृदयस्थाचें भजन करिती सदा ॥४१॥
त्या ज्ञानाच्या भयानेंच धास्ती घेऊन अभिमान पळून जातो, तें आपलें ज्ञान, जें सदोदित मज हृदयस्थाचें भजन करतात, त्यांना मी देतों ४१.

ज्या ज्ञानाचिये ज्ञानसिद्धी । अखिल जाती आधिव्याधी ।
संशय पळती त्रिशुद्धी । भक्त निजपदीं पावती ॥४२॥
ज्या ज्ञानाची ज्ञानसिद्धि झाली असतां सर्व आधिव्याधी नाहीशा होतात, आणि खरोखर सर्व संशयही पळून जातात, त्या ज्ञानाच्या योगानें भक्त आत्मपदाला पोचतात ४२.

सबळ बळें सुभटें । शस्त्राचेनि लखलखाटें ।
संशयो छेदावा कडकडाटें । हें म्यां नेटेंपाटें सांगीतलें ॥४३॥
म्हणूनच बलवान् वीरानें लखलखीत शस्त्रानें संशय कडाकड छेदून टाकावा, असें मी मोठ्या आग्रहानें सांगितलें ४३.

यावरी ऐसें गमेल चित्तीं । संसाराची सत्यप्राप्ती ।
त्यासी शस्त्र घेऊनि हातीं । कोणे युक्तीं छेदावा ॥४४॥
यावर मनांत असें येईल कीं, खरोखर संसार प्राप्त झाला असतां, हातांत शस्त्र घेऊन त्याला कोणत्या युक्तीनें छेदावयाचें ? ४४.

तरी संसार तितुकी भ्रांती । हेंचि सांगावया दृष्टांतीं ।
पुढील श्लोकाची श्लोकोक्ती । स्वयें श्रीपती सांगतू ॥४५॥
तेव्हां संसार म्हणून जितका आहे, तितकी सर्व भ्रांति आहे, हेच दृष्टांतरूपानें सांगण्यासाठी पुढच्या श्लोकांतील सुरस भाषण श्रीकृष्ण स्वतः सांगत आहेत ४५.

ईक्षेत विभ्रममिदं मनसो विलासं ।
दृष्टं विनष्टमतिलोलमलातचक्रम् ।
विज्ञानमेकमुरुधेव विभाति माया ।
स्वप्नस्त्रिधा गुणविसर्गकृतो विकल्पः ॥ ३४ ॥
[श्लोक ३४] हे जग, हा मनाचाच खेळ आहे, भास आहे अलातचक्रासारखे हे अतिशय चंचल आहे हे दिसणारे असल्यामुळे नाशवंत आहे या दृष्टीने याच्याकडे पाहावे विज्ञान म्हणजे एक परमात्माच जणू अनेक रूपांनी प्रकाशित झाल्यासारखा दिसतो गुणांचे कार्य म्हणून जो हा तीन प्रकारचा भेद दिसतो, ती त्याची माया असल्यामुळे स्वप्नाप्रमाणे खोटी आहे. (३४)
देहादि अहंकारपर्यंत । पिंड ब्रह्मांड जें भासत ।
तें मनोमात्र विलसत । मिथ्याभूत संसारु ॥४६॥
देहापासून तो अहंकारापर्यंत जें पिंड-ब्रह्मांड भासतें, तो मनाचाच सर्व विलास आहे. संसार हा मिथ्याच होय ४६.

जैसें स्वप्नीं निद्रेमाजीं मन । स्वयें देखे त्रिभुवन ।
तैसेंचि हें दीर्घस्वप्न । अविद्या जाण विकाशी ॥४७॥
ज्याप्रमाणे झोपेमध्यें स्वप्नांत मन हे स्वतः सर्व त्रिभुवन पहातें, त्याप्रमाणेच अविद्या हें संसाररूपी लांबलचक स्वप्न उत्पन्न करितें ४७.

आन असूनि आन देखती । त्या नांव आभास म्हणती ।
शुक्तिकेमाजीं रजतभ्रांती । दोरातें म्हणती महासर्पू ॥४८॥
जें एका स्वरूपाचें असून निराळ्याच स्वरूपाचें पाहतात त्याला आभास असें म्हणतात. शिंपीमध्यें रूपें असल्याचा भास होतो, दोराला मोठा सर्प असें म्हणतात ४८,

सूर्याचे किरण निखळ । ते ठायीं देखती मृगजळ ।
तैशी शुद्ध वस्तू जे केवळ । तो संसार बरळ म्हणताती ॥४९॥
किंवा केवळ सूर्याचें किरण असतात त्या ठिकाणी मृगजळ पहातात, त्याप्रमाणें केवळ शुद्ध वस्तु जें परब्रह्म, त्यालाच भ्रमिष्ट लोक संसार असें म्हणतात ४९.

तया आरोपासी अधिष्ठान । मीचि साचार असें आपण ।
जेवीं कां कोलिताचें कांकण । अग्नितेजें जाण आभासे ॥५५०॥
पण त्या आरोपाला कारण खरोखर मीच स्वत: आहे. कोणतीं गरगरां वाटोळी फिरविली म्हणजे अग्नीचें कडें झाल्यासारखें दिसतें, तें अग्नीच्या तेजामुळेंच भासतें ५५०.

अलातचक्रींचा निर्धार । अग्नि सत्य मिथ्या चक्र ।
तेवीं निर्धारितां संसार । ब्रह्म साचार संसार मिथ्या ॥५१॥
त्या अग्निचक्राचा विचार केला असतां अग्नि हा सत्य असतो, आणि त्याचे कडें हें मिथ्या असतें. त्याप्रमाणें संसाराविषयीं विचार केला तर, ब्रह्म हें सत्य आणि संसार हा मिथ्या आहे ५१.

तेथ आधिदैव आधिभौतिक । आध्यात्मादि सकळिक ।
अलातचक्राच्याऐसे देख । त्रिगुणमायिक परिणाम ॥५२॥
त्या संसारांतील आधिदैविक, आधिभौतिक, आणि आध्यात्मिक इत्यादि सर्व विस्तवाच्या कोलतीप्रमाणें होत, असें समज. तें तीन गुणांनी झालेलें मायेचेंच परिणाम होत ५२.

कोलिताचेनि भ्रमभासें । भ्रमणबळें तें चक्र दिसे ।
क्षणां दिसे क्षणां नासे । तैसा असे हा संसारू ॥५३॥
कोलिताच्या परिभ्रमणाच्या भासामुळें आणि त्याच्या फिरण्याच्या वेगामुळें तें कोलीत चक्रासारखें दिसते. तें क्षणमात्र दिसतें व क्षणमात्रांत नाहींसें होतें. त्याचप्रमाणें हा संसार आहे ५३.

जंव भ्रमणाचें दृढपण । तंव कोलिताचें कांकण ।
भ्रम गेलिया जाण । कांकणपण असेना ॥५४॥
जोंपर्यंत परिभ्रमण वेगानें चालू असतें, तोंपर्यंतच कोलिताचें कडें दिसतें. तें परिभ्रमण नाहींसें झालें कीं, तें कड्याचें स्वरूपही नाहींसें होतें ५४.

तेवीं जंव जंव भ्रम असे । तंव तंव दृढ संसार भासे ।
भ्रम गेलिया अनायासें । संसार नसे पाहतांही ॥५५॥
त्याप्रमाणें जोंपर्यंत भ्रम असतो, तोंपर्यंत संसार हा खरा असा भासतो. तो भ्रम सहज गेला कीं, संसार पाहूं लागलें असतांही दिसत नाहीं ५५.

मी देहो माझें कलत्र पुत्र । हें भ्रमाचें मुख्य सूत्र ।
तें न छेदितां पामर । मुक्ताहंकार मिरविती ॥५६॥
देह हा मी, बायकामुले माझी, हेंच भ्रमाचें मुख्य सूत्र. तें छेदन केल्याशिवायच क्षुद्र लोक मुक्त असल्याचा अहंकार मिरवितात ! ५६,

एवं मायामय संसारू । ऐसा जाणोनि निर्धारू ।
तेथील सांडूनि अत्यादरू । उपरमप्रकारू सांगत ॥५७॥
अशा प्रकारें हा संसार मायामय आहे हा निश्चय समजून घेऊन त्यावरील आसक्ति सोडून शांति कशी स्वीकारावी तो प्रकार सांगतात ५७.

दृष्टिं ततः प्रतिनिवर्त्य निवृत्ततृष्णः ।
तूष्णीं भवेन्निजसुखानुभवो निरीहः ।
संदृश्यते क्व च यदीदमवस्तुबुद्ध्या ।
त्यक्तं भ्रमाय न भवेत् स्मृतिरानिपातात् ॥ ३५ ॥
[श्लोक ३५] म्हणून साधकाने हे जग नजरेआड करून सर्व इच्छा सोडून काहीही न करता स्वस्थ राहावे आणि आत्मानंदात मग्न असावे व्यवहारासाठी कधी काही दिसले तरी हे खरे नाही, असा निश्चय करून ते सोडून दिलेले असल्यामुळे भ्रम निर्माण होणार नाही शरीर असेपर्यंत फक्त स्मरणरूप संस्कार राहील. (३५)
पूर्विल्या भजनपरिपाटीं । सहजें निर्मळ झाली दृष्टी ।
मिथ्या सांसारिक त्रिपुटी । हा निर्धार पोटीं दृढ झाला ॥५८॥
पूर्वीच्या भजनाच्या अभ्यासानें सहजच दृष्टीही पवित्र होतें, आणि संसारात्मक त्रिपुटीही मिथ्या आहे असा दृढनिश्चय अंत:करणांत होतो ५८.

तेथें सांसारिक त्रिपुटी । सांडूनि उपरमवितां दृष्टी ।
मज हृदयस्थासी होय भेटी । जेवीं सुवर्णदृष्टीं अळंकारू ॥५९॥
त्या वेळीं संसारात्मक त्रिपुटी सोडून दृष्टि शांत केली असतां, ज्याप्रमाणें अलंकार हें सुवर्णाच्या रूपानें दिसतात, त्याप्रमाणें माझी हृदयस्थाची भेट होतें ५९.

तेथ दृष्य द्रष्टा दर्शन । मोडूनि त्रिपुटीचें भान ।
तेचि धारणा तेंचि ध्यान । तेथ समाधान धरावें ॥५६०॥
तेव्हां दृश्य, द्रष्टा आणि दर्शन हें त्रिपुटींचें भान सोडून देऊन तीच धारणा आणि तेंच ध्यान असें समजून त्यांत समाधान मानावें ५६०.

तेंचि अंगें व्हावया आपणा । सांडावी सकळ तृष्णा ।
वाचेसी धरावें महामौना । देहचेष्टा जाणा आवराव्या ॥६१॥
तेंच आपणां स्वत:ला साध्य होण्याकरितां सर्व आशा सोडावी, वाणीनें अत्यंत मौन धारण करावें, देहाचें व्यापार आवरून धरावें ६१,

सांडावी वेदशास्त्रव्युत्पत्ति वाड । सांडावी वाग्वादबडबड ।
भगवद्‍भावो धरावा दृढ । जेणें आशेचें बूड समूळ छेदे ॥६२॥
वेदशास्त्रांचा मोठा पसारा सोडून द्यावा, तोंडाच्या वादाची रिकामी बडबड सोडून द्यावी, आणि जेंणेंकरून आशेचें मूळ समूळ उच्छेदन होईल अशी भगवंताची दृढ भावना धारण करावी ६२.

काया वाचा आणि मन । दृढ आवरावें आपण ।
तुटों नेदावें अनुसंधान । सदा सावधान निजरूपीं ॥६३॥
काया, वाचा आणि मन यांना आपण नीटपणें आवरून धरावें. आत्मस्वरूपाचें लक्ष सुटू देऊ नयें. निरंतर आत्मस्वरूपांतच दक्ष असावें ६३.

ते स्वरूपसुखीं लोधल्या जाण । देहाचें स्फुरेना देहपण ।
अहंकारेंसीं मावळे मन । स्वानंद पूर्ण वोसंडे ॥६४॥
त्या स्वरूपाच्या सुखांत गुंतलें असतां देहाचें देहपणही आठवत नाही. अहंकारासह मनच लुप्त होऊन जातें. आणि परिपूर्ण स्वानंद भरून वाहू लागतो ६५.

तेथ संमुख ना पाठिमोरें । एकपण ना दुसरें ।
देवो भक्त हेंही नुरे । सुखें सुखभरें सुखरूप ॥६५॥
तेथें समोरही नाहीं आणि पाठमोरेंही नाहीं. एकपणहीं नाहीं आणि दुसरेपणहीं नाहीं. तेथें देव आणि भक्त हा भेदभावही शिल्लक राहात नाहीं. सुखाच्या सुखभरानें तो सुखस्वरूपच होऊन राहतो ६५.

मी एक सुखरूप आहें । वेगळेपणें ठावें नोहे ।
येणे आत्मानुभवें राहे । एवढी प्राप्ती होये मद्‍भक्तां ॥६६॥
सुखस्वरूप असा एक मीच आहे, वेगळेपणानें राहणें मला माहीत नाही, अशा आत्मानुभवांतच तो मग्न असतो. माझ्या भक्तांना एवढा लाभ होतो ६६.

म्हणाल काष्ठाच्या परी त्यासी । पडला असेल अहर्निशीं ।
हेंही न घडे गा तयासी । सांडूनि हेतूसी देहीं वर्ते ॥६७॥
तुम्ही त्याला कदाचित् असें म्हणाल कीं, तो आपला रात्रंदिवस लाकडासारखाच पडून राहात असेल. पण त्याला तसेंही घडत नाही. तो हेतु सोडून देऊन देहामध्यें वागत असतो ६७.

तोही प्रारब्धाचेनि बळें । आहारनिद्रादि खेळेंमेळें ।
देहींचीं कर्में करितां सकळें । सर्वथा नातळे देहबुद्धी ॥६८॥
तो प्रारब्धाच्या बळानें आहार, निद्रा इत्यादि देहाची सर्व स्वाभाविक कर्मे करीत असूनही देहबुद्धीला मुळींच शिवत नाही. ६८.

दंड काढोनि नेलिया कुंभारें । पहिले भवंडीं चक्र फिरे ।
तेवीं प्रारब्धाचेनि संस्कारें । कर्मानुसारें देह वर्ते ॥६९॥
कुंभारानें दांडा काढून नेंला तरी, त्याच्या पहिल्या गतीनेंच तें चाक फिरत राहातें, त्याप्रमाणें प्रारब्धाच्या संस्काराप्रमाणें देह कर्मानुसार वागत असतो ६९.

कुलालचक्रीं बैसली माशी । न हालतां भोंवे चक्रासरसी ।
कोटी फेरे म्हणती तिसी । तेवीं मुक्तासी देहकर्में ॥५७०॥
किंवा कुंभाराच्या चाकावर माशी बसली, तर ती न हालताही त्या चाकाबरोबर फिरतें. तेव्हा तिचेंही कोट्यवधि फेरें झालें असें म्हणतात, त्याप्रमाणेंच मुक्तालाही देहकर्मे होत असतात ५७०.

यापरी देहकर्मीं वर्ततां । ज्ञाता न म्हणे अहं कर्ता ।
जेवीं वार्‍याचिया स्वभावता । दिसे चपळता गलितपत्रीं ॥७१॥
अशा प्रकारें देहकर्मात वागत असतां ज्ञाता असतो तो मी कर्ता असें म्हणत नाहीं. ज्याप्रमाणें वाऱ्याच्या स्वभावामुळें गळून पडलेल्या पानालाही चपलता आलेली दिसतें, तशी त्याचीं कर्मे पूर्वसंस्काराप्रमाणें चालत असतात ७१.

जेवीं कां पुरुषासवें छाया असे । परी ते छायेसी पुरुष न बैसे ।
तेवीं ज्ञात्यासवेंही देह दिसे । परी तो देहदोषें मैळेना ॥७२॥
किंवा ज्याप्रमाणें पुरुषाबरोबर छाया असतें, परंतु त्या छायेमध्यें काही तो पुरुष बसत नाहीं; त्याप्रमाणें ज्ञात्याबरोबरही देह दिसतो, परंतु तो देहाच्या दोषानें मलिन होत नाहीं ७२.

निजछायेसी बैसों जातां । छायाचि पळे तत्त्वतां ।
तेवीं मद्‍भक्तीं माया पाहतां । माया स्वभावतां मिथ्यात्वें पळे ॥७३॥
आपल्याच छायेंत आपण बसूं लागलें असतां खरोखर ती छायाच पळतें. त्याप्रमाणें माझ्या भक्तांनी मायेला पाहिले कीं, माया स्वभावतः मिथ्या असल्यामुळें तीही पळून जातें ७३.

हो कां मुक्ताफळांची माळा । भ्रमें सर्परूप भासे डोळां ।
तेचि भ्रमांतीं घालितां गळां । नुपजे कंटाळा सर्पभयाचा ॥७४॥
किंवा मोत्यांची एखादी माळा असली, तर ती भ्रमानें डोळ्यांना सापासारखी दिसतें. परंतु तो भ्रम दूर झाल्यावर तीच गळ्यांत घातली तर सापाच्या भीतीची धास्ती राहात नाहीं ७४.

तेवीं अधमोत्तम योनी । कां वंद्यनिंद्य जे जनीं ।
ते मी म्हणतां ज्ञानी । शंका न मानी देहमिथ्यात्वें ॥७५॥
त्याप्रमाणें अधम योनी असो कीं उत्तम योनी असो, लोकांमध्यें वंद्य असो कीं निंद्य असो, त्या योनीतील देहच मी असें म्हणतांना ज्ञानी मनुष्य देह मिथ्या समजत असल्यामुळें शंकासुद्धा मानीत नाहीं ७५.

यापरी ते अतिसज्ञान । जाणोनि देहाचें मिथ्याभान ।
देहकर्मीं वर्ततां जाण । देहाचें देहपण स्फुरेना ॥७६॥
ह्याप्रमाणें तें अत्यंत ज्ञानसंपन्न असल्यामुळें देहाचें भान मिथ्या आहे असें जाणूनच देहाच्या कर्मामध्यें वागत असतांही त्यांना देहाचें देहपण भासत नाहीं ७६.

तो देहो सर्वांगीं तोडितां । कां वृकव्याघ्रादिकीं फाडितां ।
कां अग्निमाजीं धडाडितां । त्यासी देह‍अहंता स्फुरेना ॥७७॥
तो देह प्रत्येक अवयवाच्या ठिकाणी तोडिला, किंवा लांडगे, वाघ, इत्यादिकांनी फाडिला, किंवा अग्नीमध्यें भटाभट पेटविला, तरी त्याला देहाच्या अहंतेचें भानच असत नाहीं ७७.

आपुली छाया देखिली शूळीं । तीलागीं पुरुष न तळमळी ।
तेवीं देहाची होत होळी । ज्ञाता न डंडळी निजबोधें ॥७८॥
आपली छाया मुळावर पडलेली पाहिली म्हणून तिच्याकरिता जसा कोणताही पुरुष तळमळत नाहीं, त्याप्रमाणें देहाची होळी झाली तरी ज्ञाता हा आत्मज्ञानाच्या योगानें भीत नाहीं . ८.

म्हणाल देहसंगें वर्ततां । केवीं बाधीना देह‍अहंता ।
सांडूनि अंगींची क्षारता । लवण वर्ततां उरे कैसें ॥७९॥
आतां कदाचित् तुम्ही म्हणाल कीं, देहाच्या संगतीतें वागत असतां देहाची अहंता कशी बाधत नाहीं ? आपल्या अंगचा खारटपणा सोडून देऊन मीठ वागूं लागलें तर तें उरेल तरी कसें ? ७९.

हिंग सांडूनि आपुली घाणी । केवीं राहेल सुगंधपणीं ।
निःशेष सांडोनि अंगींचें पाणी । केळी केळीपणें उरे कैंची ॥५८०॥
हिंग आपला वास सोडून देऊन सुवासिकपणानें राहणार कसा ? आंगांत असलेलें सारेच पाणी टाकून केळ ही केळपणानें उरणार कशी ? ५८०.

न झुंझें म्हणोनि रणीं रिघतां । जेवीं कां घाय वाजती माथां ।
तेवीं देहसंगें वर्तता । देह‍अहंता सोडीना ॥८१॥
मी युद्ध करीत नाही असें म्हणून लढाईत शिरलें तरी ज्याप्रमाणें मस्तकावर घाव हें पडावयाचेंच, त्याप्रमाणें देहाच्या संगतीनें वागलें असतां देहाची अहंता आपणाला कांहीं सोडावयाची नाहीं ८१.

येविषयीं ऐका सावधान । ज्ञात्यासी देहाचें बाधीना भान ।
तेथें स्फुरे जो अभिमान । तो भर्जित जाण बीज जैसें ॥८२॥
अशा या शंकेचें उत्तरही लक्ष देऊन ऐका. ज्ञात्याला देहाचें भान बाधत नाही. त्या देहाविषयीं जो अभिमान स्फुरण पावतो, तो जसें भाजलेलें बीं असावें त्याप्रमाणें असतो ८२.

भर्जित बीजें जाण । हों शके क्षुधाहरण ।
परी करितां बीजारोपण । अंकुर जाण त्या नाहीं ॥८३॥
भाजलेल्या बियांच्या योगानें भूक निवारण होऊ शकेल; पण तें बीं पेरलें तर त्याला अंकुर मात्र फुटत नाहीं हें लक्षांत ठेवा ८३.

चित्रामाजीं व्याघ्र दिसे । परी बाधकत्व त्यासी नसे ।
तेवीं भर्जित अभिमानशेषें । बाधा नसे ज्ञात्यासी ॥८४॥
चित्रामध्यें वाघ दिसतो, पण पीडा करण्याचें सामर्थ्य त्याला नसतें. त्याप्रमाणें भाजलेला अभिमान शिल्लक राहिला असला तरी त्यामुळें ज्ञात्याला बाधा होत नाहीं ८४.

चित्रींच्या वाघासी जाण । निःशेष नाहीं व्याघ्रपण ।
तेवीं मुक्तांच्या देहासी जाण । देहपण असेना ॥८५॥
चित्रांतील वाघाच्या अंगी ज्याप्रमाणें मुळींच वाघपणा नसतो, त्याप्रमाणें मुक्तांच्या देहालाही देहपणा असत नाहीं हें लक्षांत ठेव ८५.

दृढ ठसावल्या चैतन्यघन । स्वरूपीं वृत्ति होय निमग्न ।
तेव्हां दिसे तेंही भर्जित भान । तेंही स्फुरण निमालें ॥८६॥
चैतन्यघन असा जो आत्माराम, तो हृदयामध्यें दृढ ठसला असतां त्याच्याच स्वरूपामध्यें वृत्ति निमग्न होऊन जातें. तेव्हां दिसत असलेलें भानही भाजलेलें असल्यामुळें त्याचेंही स्फुरण नाहींसें होतें ८६.

ऐशी मावळल्या स्मृती । ज्ञात्याची वर्तती स्थिती ।
स्वयें सांगतु श्रीपती । यथानिगुती निजबोधें ॥८७॥
अशा प्रकारें स्मृतीच लयास गेली असतां ज्ञातें कसें वागतात ती स्थिति यथार्थ रीतीनें आत्मबोधेंकरून स्वत:च श्रीकृष्ण सांगतो ८७.

सर्व कर्मी वर्ततां जाण । देहाचें स्फुरेना देहपण ।
तें मुख्य समाधिलक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥८८॥
सर्व कर्मात वागत असतां देहाचें देहपण स्मरत नाही, तें समाधीचें मुख्य लक्षण श्रीकृष्ण स्वतः सांगत आहेत ८८.

देहं च नश्वरमवस्थितमुत्थितं वा ।
सिद्धो न पश्यति यतोऽध्यगमत् स्वरूपम् ।
दैवादपेतमुत दैववशादुपेतं ।
वासो यथा परिकृतं मदिरामदांधः ॥ ३६ ॥
[श्लोक ३६] मदिरेने धुंद झालेल्या माणसाला आपल्या अंगावरील वस्त्राची शुद्ध असत नाही, त्याप्रमाणे आत्मज्ञान झालेल्या सिद्धाला हा नश्वर देह बसला आहे की उभा आहे, दैवयोगाने तो कोठे गेला की आला आहे, हेही माहीत नसते. (३६)
जया देहाचेनि मद्‍भजनें । माझें शुद्ध स्वरूप पावणें ।
त्या देहासी विसरिजे तेणें । मी माझेपणें देखेना ॥८९॥
जो ज्या देहानें माझे भजन करून माझ्या शुद्ध स्वरूपाला पोचतो, त्या देहालाच तो विसरतो आणि मी किंवा माझेपणानें तो त्या देहाकडे पहातच नाहीं ८९.

जेवीं कां भाडियाचें घोडें । जेणें आणिलें निजधामा रोकडें ।
तें आहे कीं गेलें कोणीकडे । हें स्मरेना पुढें तो जैसा ॥५९०॥
ज्याप्रमाणें एखाद्यानें भाड्याचें घोडें प्रत्यक्ष आपल्या घरापर्यंत आणलेलें असतें, पण त्याचें कार्य झाल्यावर पुढे तें घोडें आहे कीं कोणीकडें गेलें याची त्याला आठवणही होत नाहीं ५९०,

हो कां भेटावया भ्रतारासी । सवें मजुर आणी विश्वासी ।
ते पतीसीं पहुडल्या राणिवसीं । त्या मजुरासी विसरली ॥९१॥
किंवा एखादी स्त्री माहेराहून सासरी नवऱ्याला भेटावयाला निघाली असतां बरोबर एखादा विश्वासू मजुरदार आणितें, पण ती रात्री अंत:पुरांत जाऊन नवऱ्यापाशी निजली म्हणजें मग त्या मजुराला विसरून जातें ९१

कां जो दैवयोगें पालखीं चढे । तो पूर्वील तुटके मोचडे ।
आहेत कीं गेले कोणीकडे । हें स्मरेना पुढें तेणें हरिखें ॥९२॥
किंवा दैवयोगानें जो पालखीत बसतो, तो मग पूर्वीची आपली फाटकी पादत्राणे आहेत कीं कोणीकडें गेली, हें त्या आनंदापुढे आठवीत राहात नाहीं ९२,

हो कां बहुकाळें पत्‍नी जैसी । भर्तारू मीनल्या निजसेजेसी ।
ते निःशेष विसरे लाजेसी । देहाची तैसी दशा जाहली ॥९३॥
किंवा ज्याप्रमाणें एखादी स्त्री फार दिवसांनी भ्रतार आपल्या अंथरुणावर निजावयास मिळाला असतां संपूर्ण लाज विसरून जातें; तशीच त्याच्या देहाची दशा होतें ९३.

त्या दांपत्याचे सुखभेटी । पारकें देखतां लाज उठी ।
तेवीं देहाचें भान द्वैतदृष्टीं । मदैक्यपुष्टीं देह कैंचें ॥९४॥
पण त्याच दांपत्याच्या सुखकारक भेटीमध्यें कोणी परकें मनुष्य तेथ आलेलें दिसताच त्यांना लज्जा उत्पन्न होतें; त्याप्रमाणें द्वैतष्टीनें पाहिलें तरच देहाचें भान असतें. पण माझ्याशी ऐक्यतेचें बळ प्राप्त झाल्यावर देह कशाचा ! ९४.

एवं पावोनि माझ्या स्वरूपासी । स्वानंदपूर्ण साधकासी ।
सुखें सुखरूपता जाहली त्यासी । निजदेहासी विसरोनी ॥९५॥
अशा प्रकारें माझ्या स्वरूपाला पोंचून आत्मानंदानें भरलेल्या त्या साधकाला आपल्या देहाचा विसर पडून आनंदानें सुखरूपता प्राप्त होतें ९५.

मग उठलें कीं बसलें । चालतें कीं राहिलें ।
जागतें कीं निजलें । हें स्मरण ठेलें देहाचें ॥९६॥
मग शरीर उठलें आहे कीं बसलें आहे, चालतें आहे कीं स्थिर राहिलें आहे, जागतें आहे की निजलें आहे, हें शरीराचें स्मरणच बंद होतें ९६.

हें धालें कीं भुकेलें । हिंवले कीं तापलें ।
प्यालें कीं तान्हलें । राहिलें उगलें स्मरेना तो ॥९७॥
हें तृप्त झालें कीं भुकेलेलें आहे, थंडीनं कुडकुडलें की उन्हाळ्यानें तापलें आहे, यानें पाणी प्राशन केलें कीं याला तहान लागली आहे, किंवा हें उगाच स्वस्थ राहिलें आहे, ही तो आठवीत नाहीं ९७.

हें येथें कीं तेथें । मुकें कीं बोलतें ।
होतें कीं नव्हतें । स्मरणसहितें स्मरेना तो ॥९८॥
हें येथें आहे कीं तेथें आहे मुकें आहे कीं बोलकें आहे ? हें होतें कीं नव्हतें ? ह्याचें स्मरण करून तो आठवीत नाहीं ९८.

हें ओंवळें कीं सोंवळें । चोखट कीं मैळें ।
डोळस कीं आंधळें । अंगीं पांगुळलें स्मरेना तो ॥९९॥
हें ओवळें आहे कीं सोंवळें आहे ? हें स्वच्छ आहे कीं मलिन आहे ? हें डोळस आहे कीं आंध आहे ? कीं अंगानें पांगळें आहे ? हेंही तो स्मरत नाही ९९.

हें आलें कीं गेलें । होतें कीं केलें ।
जाहलें कीं मेलें । तटस्थ राहिलें स्मरेना तो ॥६००॥
हें आलें कीं गेलें हें मूळचेंच होतें कीं कोणी केलें हें उत्पन्न झालें कीं मेलें ? कीं स्थिर होऊन राहिलें ? ही तो स्मरत नाहीं ६००.

हें बाळ कीं प्रौढ । मोठें कीं रोड ।
हळू कीं जड । कांहीं सदृढ स्मरेना तो ॥१॥
हें बाळ आहे कीं तरुण आहे ? हें मोठें जाड आहे कीं रोड आहे ? हें हलकें आहे कीं जड आहे ? हें तो पुस्तेपणीं कांहींच स्मरत नाहीं १.

हें खोटे कीं भुयीं । ठायीं कीं कुठायीं ।
आहे कीं नाहीं । हेंही पाहीं स्मरेना तो ॥२॥
हें खाटेवर आहे कीं जमिनीवर आहे ? हें चांगल्या ठिकाणी आहे कीं वाईट ठिकाणी आहे ? हें आहे कीं नाहीं ? ह्याचींसुद्धा त्याला आठवण नसतें पहा ! २.

हें मंत्रीं कीं तंत्रीं । तीर्थीं कीं क्षेत्रीं ।
विष्ठीं कीं मूत्रीं । आहे पवित्रीं स्मरेना तो ॥३॥
हें मंत्रांत आहे कीं तंत्रांत आहे ? तीर्थात आहे कीं क्षेत्रांत आहे ? हें विष्ठेंत आहे कीं मूत्रामध्यें आहे ? कीं एखाद्या पवित्र ठिकाणी आहे ? हें देखील तो स्मरत नाहीं ३.

जनीं कीं वनीं । अथवा निरंजनीं ।
जपीं कीं ध्यानीं । हेंही मनीं स्मरेना तो ॥४॥
हें जनांत आहे कीं वनांत आहे ? कीं निर्गुणांत आहे ? जपांत आहे कीं ध्यानांत आहे ? हेंसुद्धा तो मनांत आठवीत नाहीं ४.

हें सुजनीं कीं दुर्जनीं । बंदी कीं विमानीं ।
मंदिरीं कीं मसणीं । पाहती कोणी स्मरेना तो ॥५॥
सज्जनांत आहे कीं दुर्जनांत आहे ? हें एखाद्या कारागृहांत आहे कीं विमानांत आहे ? हें घरांत आहे कीं स्मशानांत आहे ? ह्याला कोणी पहात आहे काय ? हेही तो स्मरत नाहीं ५

हें गजीं कीं तुरगीं । कीं अंगनासंभोगीं ।
खरीं कीं उरगीं । अंगीच्या अंगीं स्मरेना तो ॥६॥
हें हत्तींत आहे कीं घोड्यांत आहे ? कीं स्त्रियांच्या संभोगांत आहे ? हें गाढवांत आहे कीं सपांत आहे ? कीं हें अंगांतल्या अंगांत आहे ? हें त्याचें त्यालाच स्मरत नाहीं ६.

हें काशीं कीं कैकटीं । नरकीं कीं वैकुंठीं ।
घरी कीं कपाटीं । राहिलें नेहटी स्मरेना तो ॥७॥
हें काशीत आहे कीं कैकटदेशांत आहे ? हें नरकांत आहे कीं वैकुंठांतच आहे ? हें घरी आहे कीं गिरिकंदरांत आहे ? किंवा एकांतात ध्यानस्थ आहे ? हेंही त्याला स्मरत नाहीं ७.

हें पूजिलें कीं गांजिलें । धरिलें कीं मारिलें ।
देहाचें येकही केलें । अथवा काय झालें स्मरेना तो ॥८॥
ह्याची लोकांनी पूजा केली कीं ह्याला छळलें ? ह्याला धरलें कीं मारलें ? हें देहांत एकरूप झालें कीं द्याचें काय झालें ? हें त्याला स्मरत नाहीं ८.

मी शेषशयनावरी । कीं मातंगाच्या घरीं ।
कीं बैसलों शूळावरी । हेंही न स्मरी सहसा तो ॥९॥
मी शेषावर निजलों आहे कीं मांगाच्या घरांत आहे की शूळावर बसलों आहें. ह्याचेंही त्याला बहुतकरून स्मरण होत नाहीं ९.

ऐशी ज्ञात्याची निरभिमानता । माझेनि न सांगवे तत्त्वतां ।
जे पावले माझी सायुज्यता । त्यांची कथा न बोलवे ॥६१०॥
असा ज्ञात्यांचा निरभिमानपणा असतो. तो खरोखर माझ्यानें सांगवत नाही. जे माझ्याच स्वरूपाला पोंचले, त्यांचें चरित्र सांगता येणें शक्य नाहीं ६१०.

जेथ वेदां मौन पडे । स्वरवर्णेंसीं वाचा बुडे ।
त्या संतांचे पवाडे । माझेनिही निवाडे न सांगवती ॥११॥
जेथें वेदांनाही मौन पडतें, स्वर आणि वर्ण यांसह वाणीही बुडून जातें, त्या संतांचे थोर गुणवर्णन खरोखर माझ्यानें सुद्धा करवत नाहीं ११.

ऐकोनि सज्ञानाची स्थिती । तुम्हांसी गमेल ऐसें चित्तीं ।
केवळ जड मूढ झाली प्राप्ती । एकही स्फूर्ती स्फुरेना ॥१२॥
ही ज्ञात्यांची स्थिति ऐकून तुम्हांला मनामध्यें कदाचित् असें वाटेल कीं, त्यांच्या अंगी केवळ जडत्व व मूढत्व प्राप्त होतें. त्यांना कोणतीच स्फूर्ति स्फुरत नाहीं १२.

जेवीं कां केवळ पाषाण । तैसें झालें अंतःकरण ।
एकही स्फुरेना स्फुरण । ज्ञातेपण घडे कैसें ॥१३॥
ज्याप्रमाणें शुद्ध पाषाण असावा, त्याप्रमाणेंच त्यांचे अंत:करण झालेलें असतें. कारण त्याला एकाही विषयाचें स्फुरण स्फुरत नाहीं. मग ज्ञातेपणा तरी असेल कसा ? १३.

ऐशी धरिल्या आशंका । तेविषयीं सावध ऐका ।
ज्ञान‍अज्ञानभूमिका । अतर्क्य लोकां निश्चित ॥१४॥
अशी शंका तुम्ही घेतली असेल तर त्या शंकेच्या निराकरणाविषयीं नीट लक्ष देऊन श्रवण करा. ज्ञान आणि अज्ञान यांच्या भूमिका लोकांना खरोखरच अतर्क्य आहेत १४.

केवळ जें शुद्ध ज्ञान । आणि जडमूढ अज्ञान ।
दोहींची दशा समान । तेथीलही खूण मी जाणें ॥१५॥
केवळ जें शुद्ध ज्ञान असतें, आणि जें जड मूढ अज्ञान असतें, त्या दोहोंची अवस्था सारखीच असतें. त्यांतील खूण देखील मीच जाणतों १५.

निबिड दाटला अंधकारू । त्यामाजीं काजळाचा डोंगरू ।
तेथ आंधळा आला विभाग करूं । तैसा व्यवहारू अज्ञाना ॥१६॥
घनदाट अंधार दाटलेला असावा, आणि त्यांत काजळाचा डोंगर असून त्याची वाटणी करण्याकरितां आंधळा यावा, त्यांतलाच अज्ञानाचाही व्यवहार होय १६.

शोधावया अध्यात्मग्रंथ भले । अंधमूकाहातीं दीधले ।
तें ऐके देखे ना बोले । तैसें जडत्वें झालें अज्ञान ॥१७॥
उत्तम उत्तम वेदांतशास्त्राचें ग्रंथ आणून त्यांचें संशोधन करण्याकरिता तें आंधळ्याच्या किंवा मुक्याच्या हातांत दिलें, तर तो ऐकतही नाहीं, पहातही नाही आणि बोलतही नाही. जडत्वाच्या योगानें अज्ञानही त्याप्रमाणेंच झालेलें असतें १७.

ऐशी अज्ञानाची गती । ऐका सज्ञानाची स्थिती ।
अपरोक्षसाक्षात्कारप्रतीती । देहीं वर्तती विदेहत्वें ॥१८॥
अशी ही अज्ञानाची दशा झाली. आतां सज्ञानाची स्थिति ऐका, त्यांना आत्मसाक्षात्काराचाच अनुभव आला असल्याकारणामुळें तें देहांतच विदेहपणानें वागत असतात १८.

जेवीं कां रत्‍नें आणि गारा । दोहींचा सारिखा उभारा ।
मोल वेंचूनि नेती हिरा । फुकट गारा न घेती ॥१९॥
ज्याप्रमाणे रत्नें आणि गारा या दोहोंचें स्वरूप सारखेच दिसतें, परंतु लोक भरपूर किंमत देऊन हिरा घेऊन जातात, आणि गारा कोणी फुकटही घेत नाहीत १९;

जैसें कण आणि फलकट । दोहींसी वाढी एकवाट ।
तैसें ज्ञानाज्ञान निकट । दिसे समसकट सारिखें ॥६२०॥
ज्याप्रमाणे दाणा आणि फोल दोन्ही एकें ठिकाणींच वाढत असतात, त्याप्रमाणें ज्ञान आणि अज्ञान ही दोन्ही अगदी जवळ जवळच असल्यामुळें दोन्ही दिसण्यांत एकसारखींच दिसतात ६२०.

जेवीं कां खरें कुडें नाणें । पाहतां दिसे सारिखेपणें ।
खरें पारखोनि घेती देखणे । मूर्खीं नाडणें ते ठायीं ॥२१॥
ज्याप्रमाणें खरें नाणें आणि खोटें नाणें पहावयास गेलें तर सारखेंच दिसतें, परंतु परीक्षक असतात तें पारखून खरें असेल तेंच घेतात, आणि मूर्ख असतात तें तशा प्रसंगी फसतात २१;

तेवीं ज्ञानाज्ञानाची पेंठ । भेसळली दिसे एकवट ।
तेथ अणुभरी चुकल्या वाट । पाखंड उद्‍भट अंगीं वाजे ॥२२॥
त्याप्रमाणें ज्ञानाची व अज्ञानाची पेठ एकें ठिकाणी मिश्र झाली आहे असें वाटतें. त्यांत यत्किंचितही वाट चुकली असतां आंगावर भयंकर पाखंड कोसळेल ! २२.

यालागीं मद्‍भक्तीपाशीं आले । जे माझ्या विश्वासा टेंकले ।
त्यांसी म्यां निजरूप आपुलें । खरें दीधलें अतिशुद्ध ॥२३॥
ह्याकरितां जें माझ्या भक्तीपाशी येतात, जें माझ्यावरील विश्वासामुळेंच तेथें स्थिर होतात, त्यांना मी आपलें अत्यंत शुद्ध व खरें स्वरूप देतों २३.

माझ्या नामविश्वासासाठी । प्रल्हाद द्वंद्वें पायें पिटी ।
न घेतां मुक्ती लागे पाठीं । विश्वासें भेटी माझ्या रूपीं ॥२४॥
माझ्या एका नामाच्या विश्वासामुळेंच प्रल्हादानें सारी द्वंद्वे लाथेनें झुगारून दिली. अशा भक्तानें मुक्ति घेत नाही म्हटले तरी ती पाठीस लागतें, आणि विश्वासानेंच माझ्या स्वरूपाची भेट होतें २४.

पावोनि माझ्या निजस्वरूपेसी । तेंचि ते झालें मद्‌भावेंसीं ।
जेवीं लवण मीनल्या जळासी । लवणपणासी मूकलें ॥२५॥
ज्याप्रमाणें मीठ पाण्यात मिसळलें असतां तें मिठाच्या स्वरूपाला मुकतें, त्याप्रमाणें जें माझ्या स्वरूपाला पोंचतात, तें माझ्या भक्तीसह मद्रूपच होतात. त्यांचें निराळें स्वरूप शिल्लक राहात नाहीं २५.

तेथ मी एक लवण । हेही विराली आठवण ।
स्वयें समुद्र झालें जाण । तेवीं सज्ञान मद्‌रूपें ॥२६॥
त्यावेळी मी एक मीठ अशी आठवण त्या मिठाला राहात नाहीं, तें स्वतःच समुद्र होऊन जातें, त्याप्रमाणेंच ज्ञानी असतात तेंही मद्रूपच होऊन जातात २६.

ऐसें पावोनि माझ्या स्वरूपासी । विसरले देह‍अभिमानासी ।
झाले चैतन्यघन सर्वांशीं । आनंदसमरसीं निमग्न ॥२७॥
अशा प्रकारें माझ्या स्वरूपाला पोंचून जें देहाभिमानाला विसरलें, तें माझ्याशी ज्ञानमयच होऊन आनंदरूप रसामध्यें निमग्न होतात २७.

जेवीं दोरीं सर्पू उपजला । नांदोनि स्वयें निमाला ।
तो दोरें नाहीं देखिला । तैसा झाला देहभावो मुक्तां ॥२८॥
ज्याप्रमाणें दोराच्या ठिकाणी सर्पाचा भास उत्पन्न होतो, आणि काही वेळ त्या दोराच्या ठिकाणी तो आभासरूप सर्प राहून मग नाहीसा होतो, तो सर्प दोरानें काही पाहिलेला नसतो, त्याप्रमाणेंच मुक्तांना देहभावना भासतें २८.

तेव्हां मी तूं हे आठवण । आठवितें आहे कोण ।
विसरोनि गेलें अंतःकरण । आपण्या आपण विसरला ॥२९॥
तेव्हा मी आणि तूं ही आठवण करणारा कोण आहे ? अंत:करणाचेंच विस्मरण झाल्यामुळें तो आपणच आपल्याला विसरून जातो २९.

तेथ कैंचा स्वर्ग कैंचा नरक । कैंचें चोख कैंचें वोख ।
कैंचे चतुर्दश लोक । ब्रह्म एक एकलें ॥६३०॥
तेथें कसला वा आणि कसला नरक ! चांगलें कशाचें आणि वाईट कशाचें ? चौदा लोक तरी कशाचें सर्वत्र एकटें एकच ब्रह्मस्वरूप शिल्लक राहातें ६३०.

कैंचें पवित्र कैंचें अपवित्र । कैचें तीर्थ कैंचें क्षेत्र ।
कैचा वेदू कैंचें शास्त्र । ब्रह्म स्वतंत्र अद्वय ॥३१॥
तेथें पवित्र कशाचें आणि अपवित्र कशाचें ? तीर्थ कशाचें आणि क्षेत्र कशाचें ? वेद कशाचा आणि शास्त्र कशाचें ? ब्रह्म हें स्वतंत्र आणि अद्वयच आहे ३१.

तेथ कैंचा उत्पत्तिविनाशू । कैंचा वैकुंठ कैलासू ।
कैंचा ब्रह्मा विष्णु महेशू । एक अविनाशू उरलासे ॥३२॥
तेथें उत्पत्ति कसली आणि विनाश कसला ? वैकुंठ कसला आणि कैलास कसला ? ब्रह्मा, विष्णु आणि महेश्वर तरी कसलें ? एक अविनाशी ब्रह्मच काय तें शिल्लक राहतें ३२.

तेथ कैंचा बोधू कैंची बुद्धी । देवपण बुडालें त्रिशुद्धी ।
लाजा निमाली मोक्षसिद्धी । कैंचा क्षीराब्धिशेषशायी ॥३३॥
तेथें कसला बोध आणि कसली बुद्धि ! तेथें खरोखर देवपणसुद्धा नाहींसें होतें. मोक्षसिद्धीसुद्धा लाजेनें नाश पावते. तेथें क्षीरसमुद्रातील शेषशायी तरी कोठचा ? ३३.

तेथ माझीही भगवंतता । हारपोनि जाय तत्त्वतां ।
प्रणवाचा बुडाला माथा । ऐशी सायुज्यता पावले ॥३४॥
तेथें खरोखर माझा भगवंतपणासुद्धा नाहीसा होतो. ॐकाराचें मस्तकसुद्धा बुडून जातें. इतकें सायुज्यस्वरूप त्यांना प्राप्त होतें ३४.

यालागीं देहाचें केलें ठेलें । अथवा आलें कां गेलें ।
हें स्फुरेना जें बोलिलें । ते विशद केलें या रीती ॥३५॥
म्हणून देह राहिला काय, किंवा तो आला काय आणि गेला काय, ह्याचेंच त्यांना स्फुरण होत नाही असें जें म्हणतात, तें अशा रीतीनें स्पष्ट केलें ३५.

अविद्या कारण देह कार्य । ते अविद्या नासोनि जाये ।
कारण नासल्या कार्य राहे । हें न घडे पाहें म्हणाल ॥३६॥
अविद्या ही कारण होय, आणि देह हें त्याचें कार्य होय. ती अविद्याच नाहीशी होऊन जातें, तेव्हां कारण नसतां कार्य राहील असें घडणार नाही, असें तुम्ही म्हणाल ३६.

वृक्ष समूळीं उपडिला जाये । सार्द्रता तत्काळ न जाये ।
पत्र पुष्प फळ सार्द्र राहे । शुष्क होये अतिकाळें ॥३७॥
तर वृक्ष जरी मुळासकट उपडून पडला, तरी त्यांतील ओलावा कांहीं लागलाच नाहीसा होत नाही. पानें, फुलें, फळें, ओलींच असतात. ती वाळून जाण्याला पुष्कळ वेळ लागतो ३७.

तेवीं अविद्या नासोनि जाये । भोगानुरूप दैव जें राहे ।
तेणें ज्ञाता वर्तताहे । निजदेहीं पाहे विदेहत्वें ॥३८॥
त्याप्रमाणें अविद्येचा जरी नाश झाला, तरी भोगानुरूप दैव म्हणून जें शिल्लक राहतें, तेणेंकरूनच ज्ञानी मनुष्य कर्मे करीत असतो. तो आपल्या देहांतच विदेहपणानें पाहात असतो ३८.

म्हणाल वाढवितां वाडेंकोडें । प्रतिपाळितां सुरवाडें ।
राखतराखतां देह पडे । प्रत्यक्ष रोकडें दिसताहे ॥३९॥
आतां तुम्ही कदाचित असेंही म्हणाल कीं, देह मोठ्या प्रेमानें वाढवीत असतां, कौतुकानें त्याचें प्रतिपालन करीत असतां, आणि सतत संरक्षण करीत असतांही तो पडतो हें प्रत्यक्ष उघड दिसतें ३९.

ज्याचें देह त्यासी दृढ नव्हे । तरी तें तत्काळचि पडावें ।
वांचलें असे कोणे भावें । ऐसें कांहीं जीवें कल्पाल ॥६४०॥
ज्याचा देह त्याच्या स्वाधीन नसेल तर तो तत्काळ पडावा. मग तो वाचतो तरी का ? अशीही मनांत काही कल्पना कराल ६४०.

ज्याचें देह तो न पुसे त्यातें । तरी तें देह केवीं कर्मीं वर्ते ।
ऐशी आशंका तुम्हांतें । ऐका सावचित्तें सांगेन ॥४१॥
ज्याचा तो देह असतो, तोच त्याला विचारीत नाही, तर मग तो देह कर्मे तरी कशाला करील ? अशी तुम्हाला शंका असेल, तर त्याचेंही उत्तर सांगेन. लक्ष देऊन श्रवण करा ४१.

देहाचें उत्पत्तिस्थितिनिदान । पुरुषासी वश्य नव्हे जाण ।
त्यासी अदृष्टचि प्रमाण । दैवयोगें चळण देहाचें ॥४२॥
देहाची उत्पत्ति, स्थिति आणि लय, ही कांहीं पुरुषाच्या स्वाधीन नसतात. दैवच त्याला वागविणारें असतें, म्हणून दैवयोगामुळेंच देहाचें कर्म होत असतें ४२.

उठणें कां बैसणें । तें देहासी दैवगुणें ।
अदृष्टगतीं देणें घेणें । खाणें जेवणें अदृष्टें ॥४३॥
उठणें किंवा बसणें हें देहाला दैवयोगानेंच घडतें. देणेंघेणें होतें तेंही दैवयोगानेंच होतें, आणि खाणें-जेवणें हेंही पण दैवानेंच होतें ४३.

स्वदेशीं कां परदेशीं । अदृष्ट नेतसे देहासी ।
स्वर्गनरकभोगासी । अदृष्ट देहासी उपजवी ॥४४॥
देहाला स्वदेशी किंवा परदेशी दैवच घेऊन जात असतें. देहाला स्वर्गाचें किंवा नरकाचें भोग दैवच भोगावयास लावतें ४४.

यश लाभ हानि मृत्यु । देहासी अदृष्टें असे होतू ।
ज्ञाता देहासी अलिप्तू । जैसा घटांतू चंद्रमा ॥४५॥
यश लाभ, हानि किंवा मृत्यु हें सर्व देहाला दैवयोगानेंच होतें, परंतु जो ज्ञानसंपन्न असतो, तो ज्याप्रमाणें घटांतील पाण्यांत दिसणारा चंद्र त्या घटापासून निराळा असतो त्याप्रमाणें देहापासून निराळा असतो ४५.

जैशी छाया पुरुषासरसी । तैशी काया सज्ञानासी ।
ते राहिली अदृष्टापाशीं । निजकर्मासी भोगावया ॥४६॥
ज्याप्रमाणें पुरुषाच्याजवळ छाया असतें, त्याप्रमाणें ज्ञात्याच्या सान्निध्याला देह असतो. तो देह आपली कर्मे भोगण्यासाठी देवाच्या ताब्यात राहातो ४६.

जन्मोनि छाया सरसी वाढे । माझी ऐशी अहंता न चढे ।
तैसेंच देह ज्ञात्याकडे । मी म्हणोनि पुढें येवों न शके ॥४७॥
छाया ही आपल्यापासूनच उत्पन्न होतें, आणि आपल्याच सान्निध्यानें वाढतें, तरी ती माझी आहे असा काही कोणाला कधीं गर्व होत नाहीं. त्याप्रमाणेंच ज्ञात्याकडें देह असतो, पण तो ‘मी’ असें अभिमानानें म्हणून पुढे येऊ शकत नाहीं ४७.

सदा छाया सरिसी असे । परी कोठें असे कोठें नसे ।
हें ज्याची तो न पुसे । देहाचें तैसें वर्तन झालें ॥४८॥
छाया ही सदोदित जवळच असतें, पण ती कोठें असतें व कोठें असत नाहीं हें, ती ज्याची असतें तोही तिला विचारीत नाहीं. त्याचप्रमाणें ज्ञात्याचें देहासंबंधी वर्तन असतें ४८.

छाया विष्ठेवरी पडे । कां पालखीमाजीं चढे ।
पुरुषासी सुखदुःख न जोडे । ज्ञात्यासी तेणें पाडें देहभोग ॥४९॥
छाया ही विष्ठेवर पडतें, किंवा पालखींतही चढतें, पण त्यामुळें त्या पुरुषाला कोणतेंच सुखदुःख होत नाही. त्याप्रमाणेंच ज्ञात्यालाही देहभोगांचें सुखदुःख असत नाहीं १९.

येथवरी निजदेहासी । कैसेन विसर पडिला त्यासी ।
ऐक त्याही अभिप्रायासी । दृष्टांतेंसीं सांगेन ॥६५०॥
पण एवढा आपल्याच देहाचा त्याला विसर पडतो कसा ? त्याचेंही कारण दृष्टांत देऊन सांगतों ऐका ६५०.

जो मोलें मदिरा पिवोनि ठाये । तो तेणें मदें नाचे गाये ।
देहवंत देह विसरोनि जाये । वस्त्र नाहीं आहे स्मरेना ॥५१॥
जो पैसें देऊन दारू पितो, तो त्या दारूच्या धुंदीनें नाचूं लागतो व गाऊं लागतो. तो खरोखर देहधारी असूनही आपल्या देहाला विसरून जातो. आपल्या आंगावर वस्त्र आहे कीं नाहीं हेही त्याला आठवत नाही ५१.

हा तंव ब्रह्मरस प्याला । परमानंदें तृप्त झाला ।
देहो झाला कीं मेला । आठवू ठेला तेणें मदें ॥५२॥
आणि हा तर ब्रह्मरसच पिऊन टाकून परमानंदानें तृप्त झालेला असतो. त्यामुळें त्या निशेच्या धुंदीनें त्यालाही देह झाला कीं मेला ह्याची दाद नसतें ५२.

एवं देहाचें भरण पोषण । जन्म अथवा मरण ।
तें दैवयोगें जाण । तेंचि निरूपण हंस बोले ॥५३॥
तात्पर्य, देहाचें पालन किंवा पोषण, जन्म किंवा मरण, हें सर्व दैवयोगानेंच होत असतें असें समज. हंसानें आपल्या भाषणांत तेंच प्रतिपादन केलें ५३.

देहोऽपि दैववशगः खलु कर्म यावत् ।
स्वारंभकं प्रतिसमीक्षत एव सासुः ।
तं सप्रपञ्चमधिरूढसमाधियोगः ।
स्वाप्नं पुनर्न भजते प्रतिबुद्धवस्तुः ॥ ३७ ॥
[श्लोक ३७] प्राणांसह देहसुद्धा प्रारब्धाच्या अधीन असल्याकारणाने जोपर्यंत तो प्राप्त करून देणारे कर्म शिल्लक आहे, तोपर्यंत तो पडण्याची वाट पाहात असतो समाधीमध्ये स्थिर असलेला आत्मसाक्षात्कारी प्रपंचासह या देहाचा पुन्हा स्वीकार करीत नाही स्वप्नातून जागा झालेला जसा स्वप्नातील गोष्टींचा स्वीकार करीत नाही तसाच. (३७)
जितुकें देहाचें वर्तन । तितुकें अदृष्टास्तव जाण ।
अज्ञानासी देहाभिमान । त्यातें सज्ञान न धरिती ॥५४॥
देहाचें जितकें म्हणून वर्तन आहे, तितकें दैवयोगानेंच होत आहे हें लक्षांत ठेव. अज्ञान्याला देहाभिमान असतो, तो देहाभिमान ज्ञातें कधीही धरीत नाहीत ५४.

जैसें अदृष्ट पूर्वस्थित । तैसा देह उपजे येथ ।
सावेव प्राणेंसहित । ऐसें वर्तत जंव दैवें ॥५५॥
ज्याप्रमाणें पूर्वीचें संचित कर्म असतें, याप्रमाणेंच येथें देह उत्पन्न होतो. तो सर्व इंद्रियांसह व प्राणांसह अशा प्रकारें जर दैवाप्रमाणेंच वागत असतो ५५,

म्हणाल दैवयोगें देहीं असतां । अवश्य वाढेल देह‍अहंता ।
जेवीं एकत्र गमनें मार्गस्थां । येरयेरांच्या व्यथा भोगिती ॥५६॥
तर तुम्ही म्हणाल कीं, दैवयोगानें तो जर देहामध्यें आहे, तर देहाची अहंता अवश्य वाढावयाचीच. ज्याप्रमाणें एकमेकांच्या सोबतीनें चाललेलें पांथस्थ परस्परांची संकटें भोगीत असतात ५६,

लवणाच्या मिळणीं पाणी । होऊनि ठाके खारवणी ।
तेवीं ज्ञाताही देहाचे मिळणीं । देहाभिमानी होईल ॥५७॥
लवणाच्या मिश्रणानें पाणीसुद्धा खारेच होऊन जातें, त्याप्रमाणें ज्ञातासुद्धा देहाच्या संगतीनें देहाभिमानी होईल ५७.

जेवीं लोहसंगाचिये प्राप्ती । दुर्धर अग्नि घण वरी घेती ।
तेवीं देहाचिया संगती । ज्ञाते भोगिती सुखदुःखें ॥५८॥
ज्याप्रमाणें लोखंडाची संगति प्राप्त झाली असतां अग्नीलाही घणाचें दुःसह घाव आपल्या अंगावर सहन करणें भाग पडतें, त्याप्रमाणें देहाच्या संगतीनें ज्ञातही सुखदुःखें भोगतात ५८.

ऐसा कल्पाल अभिप्रावो । तो सज्ञानासी न घडे भावो ।
तिंहीं निवटूनियां अहंभावो । चिदानंदें पहा हो समाधिस्थ ॥५९॥
अशी तुम्ही मनांत कल्पना कराल, परंतु ती गोष्ट ज्ञात्यांना लागूं नाहीं. कारण, त्यांनी सर्व अहंभाव सोडून तें चिदानंदामध्येंच समाधिस्थ झालेलें असतात ५९.

‘अधिरूढसमाधियोग’ । हें मूळींचें पद अभंग ।
येणें समाधि अतिनिर्व्यंग । साधिली चांग निजबोधें ॥६६०॥
‘अधिरूढसमाधियोग’ असें मूळामध्यें स्पष्ट पद आहे. त्यावरून अत्यंत निर्दोष अशी समाधि त्यानें आत्मज्ञानानें उत्तम रीतीनें साधिलेली असतें असा अर्थ निघतो ६६०.

तरी समाधी ते कैशी असे । तटस्थ काष्ठाचेपरी दिसे ।
कां समाधिस्थ केवळ पिसें । अथवा असे सज्ञान ॥६१॥
तर ती समाधि कशी असतें ? तीत असलेला मनुष्य लाकडाप्रमाणें तटस्थ दिसतो, कीं समाधींतील मनुष्य निखालस वेडाच बनलेला असतो, कीं ज्ञानसंपन्न असतो ? ६१.

ते सामाधीचीं लक्षणें । ऐक सांगेन संपूर्णें ।
देहीं असोनि देहबंधनें । नाहीं अडकणें सज्ञाना ॥६२॥
त्या समाधीची संपूर्ण लक्षणें सांगतो ऐक. तिच्या योगानें ज्ञानसंपन्न माणसाला देहांत असूनही देहबंधनात अडकावें लागत नाही ६२.

केवळ ताटस्था नांव समाधी । म्हणतां ज्ञात्याची ठकली बुद्धी ।
ते समाधि नव्हे त्रिशुद्धी । मूर्च्छित ते संधी असे वृत्ती ॥६३॥
‘केवळ तटस्थपणानें राहणें ह्याचेंच नाव समाधि’, असें जर ज्ञातेंच म्हणूं लागतील, तर त्यांची बुद्धि भ्रष्ट झाली म्हणून समजावें. कारण खरोखर ती कांहीं समाधि नव्हे. अशा स्थितीमध्यें वृत्ति ही मूछनेंच्या अवस्थेमध्यें असतें ६३.

निरभिमान निरवधी । त्या नांव अखंडसमाधी ।
परी काष्ठांतें त्रिशुद्धी । नव्हे समाधी सर्वथा ॥६४॥
सदोदित निरभिमानपणानें राहणें याचेंच नांव अखंड समाधि होय. पण निखालस लाकडाप्रमाणें होऊन पडणें ही खरोखर मुळींच समाधि होत नाहीं ६४.

ताटस्थ्यचि समाधि साचें । जे मानिती त्यांसी स्वरूपाचें ।
ज्ञान नाहीं निश्चयाचें । अनुमानाचें बोलणें ॥६५॥
खरोखर तटस्थपणा हीच समाधि असें जें मानतात, त्यांना खऱ्या स्वरूपाचें ज्ञान नाही आणि निश्चयाचेंही पण ज्ञान नाही. त्यांचें बोलणें केवळ अनुमानाचें असतें ६५.

प्रचंड आघाताच्या भुली । तत्काळ तटस्थता बाणली ।
तरी काय तेणें झाली । सत्यचि भली समाधि त्यासी ॥६६॥
एखादा भयंकर आघात झाला तर मनुष्य बेशुद्ध होऊन त्याच्या अंगी तत्काळ लाकडासारखी तटस्थता येतें. म्हणून काय त्यामुळें खरोखरच चांगली समाधि लागली असें समजावयाचें ? ६६.

ओंवाळणीचिया आस्था । बहुरूपी सोंग संपादितां ।
वायु स्तंभविला अवचितां । तेणें तटस्थता बहुकाळ ॥६७॥
देणगीच्या आशेनें बहुरूपी आपल्या सोंगाची यथासांग बतावणी करीत असतां त्यानें एखाद्या वेळी वायु कोंडून धरला म्हणजे त्याच्या अंगीही त्यामुळे फार वेळ तटस्थता येतें. म्हणून ती काही समाधि नव्हे ६७.

परी वासना जंव उरली आहे । तंव समाधि कैसेनि हों लाहे ।
सावध होतांचि म्हणे काये । ये दात्याचे रायें उचित द्यावें ॥६८॥
कारण जोंपर्यंत अंत:करणांत वासना शिल्लक राहिलेली असतें, तोंपर्यंत समाधि कशी लागणार ? तो बहुरूपी सावध झाला कीं लागलाच काय म्हणतो ? तर “आपण उदार लोकांत श्रेष्ठ आहांत म्हणून आपण मला योग्य असें कांहीं द्यावें” ६८.

सर्व संकल्पांची अवधी । त्या नांव निर्विकल्प समाधी ।
सकळ शास्त्र हेंचि प्रतिपादी । समाधि त्रिशुद्धी त्या नांव ॥६९॥
सर्व संकल्पांचा जो शेवट, त्याचेंच नांव निर्विकल्प समाधि होय. सर्व शास्त्रांनी हेंच प्रतिपादन केलें आहे. खरोखर त्याचेंच नांव समाधि ६९.

सापु आल्या शेळीप्रती । तटस्थ होय सकळवृत्ती ।
तैशी झालिया ताटस्थ्यस्थिती । नव्हे निश्चितीं ते समाधी ॥६७०॥
शेळीजवळ साप आला म्हणजें ती देखील सर्व वृत्तींनी शून्य होऊन तटस्थ होतें. तशीच केवळ तटस्थ वृत्ति झाली असता ती कांहीं खरोखर समाधि नव्हे ६७०.

अकस्मात अवचितां । दिव्य स्वरूप देखतां ।
आश्चर्यें झाली तटस्थता । तेथ जाणावी तत्त्वतां वृत्ति आहे ॥७१॥
चटकन एकाएकी एखादें दिव्य स्वरूप पाहिलें, तर त्या आश्चर्यानेंही तटस्थता प्राप्त होतें. अशा प्रसंगी खरोखर वृत्ति म्हणून असतेंच असें समजावें ७१.

स्वस्वरूप देखतां प्रथमदृष्टीं । न संवरतु विस्मयो उठी ।
तोही जिरवूनियां पोटीं । दशा जे उठी ते समाधी ॥७२॥
त्याप्रमाणें प्रथमत:च आत्मस्वरूप डोळ्यांना दिसू लागलें असतां इतकें आश्चर्य उत्पन्न होतें कीं, तें सांवरतां येत नाही. पण तें आश्चर्यही पोटांतल्या पोटांत दाबून टाकून जी दशा उत्पन्न होतें, तीच समाधि होय ७२.

निःशेष कल्पना जेथ विरे । तेथ विस्मयो कोठें स्फुरे ।
सूक्ष्म कल्पना थावरे । तेणें वोसरे विस्मयो ॥७३॥
कल्पना निखालस जेथें नाहीशी होतें, तेथें विस्मय कोठें स्फुरण पावणार ? तेथें अतिसूक्ष्म कल्पनाही नष्ट होतें, त्यामुळें आश्चर्यही नाहीसें होतें ७३.

जेथ साचार ब्रह्मप्राप्ती होये । तेथें देहचि स्फुरों न लाहे ।
तेव्हां तटस्थ कीं चालताहे । हें देखणें होये पुढिलांचें ॥७४॥
ज्याच्या ठिकाणी खरोखर ब्रह्माचीच प्राप्ती झालेली असतें, त्याच्या ठिकाणी देहाचेंच स्फुरण होत नाहीं, आणि त्या वेळी तो तटस्थ उभा आहे कीं चालत आहे हें देखील दुसऱ्यांनी पाहावें लागतें ७४.

एवं देहचि जेथ मिथ्यापणें । त्याचीं कवण लक्षी लक्षणें ।
हो कां मृगजळींचेनि नाहाणें । जेवीं कां निवणें सज्ञानीं ॥७५॥
अशा प्रकारें जेथें देहच मिथ्या मानलेला असतो, तेथें त्याची लक्षणें कोण पहाणार ? मृगजळांतील स्नानानें ज्ञात्यानें जितपत समाधान पावावें, तितपतच तेंही शक्य आहे ७५.

मिथ्यादेहासी तटस्थता । झाल्या मानावी समाध्यवस्था ।
ऐशीं लक्षणें सत्य मानितां । ठकले तत्त्वतां परीक्षक ॥७६॥
मिथ्या असलेल्या ह्या देहाला तटस्थता प्राप्त झाली असतां तीच समाधीची अवस्था समजावी असें लक्षण खरें मानून मोठमोठें ज्ञातेही फसलें आहेत ७६.

हो कां स्वप्नींचे सज्ञानासी । ताटस्थ्यमुद्रा लागल्या त्यासी ।
जरी मान्य झाल्या स्वप्नींच्यासी । तरी जागृतीसी नाहीं आला ॥७७॥
स्वप्नामध्यें सज्ञानी बनलेल्या माणसाला तटस्थ स्थिति प्राप्त झाली आणि जरी ती त्या स्वप्नांतल्या माणसाला खरी वाटली, तरी जागृतींत कांहीं तो त्याच अवस्थेत येत नाहीं ७७.

हो कां स्वप्नींच्या लोकांप्रती । थोर झाली समाधीची ख्याती ।
तरी नाहीं आला तो जागृती । जाणावा निश्चितीं निद्रितू ॥७८॥
किंवा स्वप्नांत असलेल्या मनुष्यांना समाधीमध्यें मोठा लौकिक प्राप्त झाला, तरी तो लौकिक कांहीं जागेपणांत व्हावयाचा नाहीं. तो खरोखर झोपी गेला आहे असेंच समजावें ७८.

तेवीं ताटस्थ्या नांव समाधी । ते अविद्या स्वप्नमूर्च्छासिद्धी ।
परी स्वस्वरूपप्रबोधीं । जागा त्रिशुद्धी नाहीं झाला ॥७९॥
त्याप्रमाणें तटस्थपणालाच समाधि नांव देणे तीच अविद्या होय. ती अविद्या स्वप्न व मूर्च्छा यांचे स्वरूप होय. तो आत्मस्वरूपज्ञानामध्यें मुळींच जागृत झाला नाहीं असें समजावें ७९.

तो जागा होऊनि स्वप्न पाहे । तें मिथ्यात्वें देखताहे ।
त्यांतु आपुला देहो सत्य काये । मा ताटस्थ्य राहे ते ठायीं ॥६८०॥
जो जागा होऊन स्वप्नाकडे पाहू लागतो, तो तें स्वप्न खोटेंच आहे असें मानितो. त्यांत आपला देह तरी सत्य होता काय ? तसा तो सत्य असेल तर मग त्याच्या ठिकाणी तटस्थता राहूं शकेल; असा प्रश्न त्याला पडतो ६८०.

जो जागा होऊनि तत्त्वतां । स्वप्नदेहासी तटस्थता ।
साक्षेपपूर्वक लावूं जातां । लाजे परी अधिकता दशा न मनीं ॥८१॥
जो खरोखर जागा झाल्यानंतर त्या स्वप्नांतील देहाला कल्पनेनें पुन्हा साक्षेपानें तटस्थता लावूं लागतो, त्याला त्यावेळी लाज वाटू लागतें. यापेक्षा त्यांत अधिक महत्त्व त्याला कांहींच वाटत नाहीं ८१.

जो जागा होऊनि स्वप्न सांगे । तें मिथ्यापणेंचि अवघें ।
परी सत्यसत्त्वाचेनि पांगें । कदा निजांगें नातळे ॥८२॥
जो जागा होऊन स्वप्न सांगतो, तें सारे खोटेंच असतें. त्यांत मुळींच काही खरेपणा नसल्यामुळें तो त्याला कधी शिवतही नाहीं ८२.

तैशी साचार वस्तुप्राप्ती । तो नातळे देहस्थिती ।
तरी देह वर्ते कोणे रीती । तो प्रारब्धगतीचेनि शेषें ॥८३॥
त्याप्रमाणेंच ज्याला खरोखर परब्रह्माचीच प्राप्ति होतें, तोही देहाच्या स्थितीला लिप्त होत नाही. तर त्याचा देह कोणाच्या बलानें क्रिया करतो ? तर उरलेल्या प्रारब्धाच्या गतीनें ८३.

स्थंडिलीं अग्नि विझोनि जाये । तरी भूमिये उष्णता राहे ।
कर्पूर सरल्याही पाहें । सुवासु आहे ते देशीं ॥८४॥
स्थंडिलांतील अग्नि विझून गेला, तरी जमिनींत त्याची उष्णता राहते. किंवा कापूर जळून गेला, तरी त्या ठिकाणी सुवास हा राहतोच ८४.

पाळणा हालवितां वोसरे । तरी तो हाले पूर्वसंस्कारे ।
तेवीं अविद्यानाशें प्रारब्ध उरे । तेणें देहो वावरे मुक्तांचा ॥८५॥
पाळणा हालवितांना तो हालविणारा मनुष्य थांबला, तरी पूर्वीच्या धक्क्यानें तो पाळणा हालतच असतो. त्याप्रमाणें अविद्येचा नाश झाला तरी प्रारब्ध हें बाकी उरतेंच, त्याच शेषप्रारब्धानें मुक्तांचा देह चालत असतो ८५.

लक्ष्य भेदोनियां तीरें । बळें चालिजे पुढारें ।
तेवीं अविद्यानाशें प्रारब्ध उरे । तेणें देहो वावरे मुक्तांचा ॥८६॥
बाणाचा नेंम ज्या वस्तूवर धरलेला असतो, त्या वस्तूचा भेद करूनही तो पहिल्याच जोरानें पुढे जात असतो. त्याप्रमाणें अविद्येच्या नाशानें प्रारब्ध हें उरतेंच, आणि त्यामुळेंच मुक्तांचा देह चालत असतो ८६.

शरीराचेनि छाया चळे । परी शरीर छायेवेगळें ।
तेवीं देह मिथ्या मुक्ताजवळें । चळे वळे प्रारब्धें ॥८७॥
शरीरामुळेंच छाया हालतें, परंतु शरीर हें छायेहून निराळेंच असतें. त्याप्रमाणें मुक्तांजवळ देह हा मिथ्या असून तो प्रारब्धाच्या योगानें चलनवलन करीत असतो ८७.

हेतुवीण अनायासें । पुरुषासवें छाया असे ।
तेवीं सज्ञानासरिसें । देह दिसे मिथ्यात्वें ॥८८॥
पुरुषाबरोबर छाया असतें ती कोणत्याही कारणाशिवाय साहजिकच असतें. त्याप्रमाणेंच ज्ञात्याबरोबरही देह मिथ्यात्वानेंच असलेला दिसतो ८८.

जैसें गलित पत्र वारेनि चळे । तैसें देह वर्ते प्राचीन मेळें ।
परी देहकर्माचेनि विटाळें । ज्ञाता न मैळे निजबोधें ॥८९॥
ज्याप्रमाणें गळून पडलेलें पान वाऱ्याच्या योगानें हालतें, त्याप्रमाणें देहही पूर्वकर्माप्रमाणें वागत असतो. परंतु ज्ञाता असतो तो आत्मज्ञानामुळे देहकर्माच्या विटाळानें मलिन होत नाहीं ८९.

त्या प्रारब्धाच्या पोटीं । सांगो सकळ जगेंसीं गोठी ।
कां धरोनि मौनाची मिठी । गिरिकपाटीं पडो सुखें ॥६९०॥
मग त्या प्रारब्धाच्या ताब्यांत राहून तो सर्व जगाबरोबर गोष्टी सांगत असो, किंवा मौनाला मिठी मारून आनंदानें गिरिकंदरांत जाऊन पडो ६९०.

तो आचरो सकळ कर्में । अथवा पिसा हो कां निजभ्रमें ।
तेणें तेणें अनुक्रमे । जाण परिणामें प्रारब्धें ॥९१॥
तो सर्व कर्मे करो, अथवा भ्रमाच्या योगानें वेडा होवो. तो प्रारब्धाप्रमाणें जी जी स्थिति प्राप्त होईल त्या त्या क्रमानें वागत असतो ९१.

तो चढो पालखीं गजस्कंधीं । कां पडो विष्ठामूत्रसंधीं ।
ते ते प्रारब्धाची सिद्धी । जाण त्रिशुद्धी ज्ञात्यासी ॥९२॥
तो पालखीत असो की हत्तीच्या गंडस्थळावर बसो, किंवा विष्ठामूत्रांत पडो, ती ती स्थिति प्रारब्धाचीच होय असें खरोखर ज्ञात्याला वाटत असतें, हें लक्षांत ठेव ९२.

जेथ बाध्यबाधकता फिटली । सकळ अहं अविद्या तुटली ।
सहज समाधी त्या नांव झाली । हे संख्या केली सिद्धांतीं ॥९३॥
ज्याच्या ठिकाणी बाध्य आणि बाधकता संपते, ‘अहं’ काराची सर्व अविद्या नाहींशी होतें, त्याच्या त्या स्थितीला स्वभावसिद्ध समाधि असेंच नांव प्राप्त होतें. हाच सर्व सिद्धांतांचा तात्पर्यार्थ आहे ९३.

ऐशी जे सैर समाधिअवस्था । तोचि भोग भोगोनि अभोक्ता ।
कर्में करोनि अकर्ता । जाण तत्त्वतां तो एक ॥९४॥
अशी नैसर्गिक समाधि अवस्था ज्याला प्राप्त होतें, तोच सर्व भोग भोगून अभोक्ता असतो, आणि सर्व कर्मे करूनही तोच एक खरोखर अकर्ता असतो हें लक्षांत ठेव ९४.

तो क्रियाकारणसंयोगें । डुलत देखिजे विषयभोगें ।
परी समाधिमुद्रा न भंगे । भोगसंगें अलिप्त ॥९५॥
तो क्रिया आणि कारण ह्यांच्या संयोगानें विषयोपभोगांत डुलत असलेला दिसतो, तरी त्याच्या समाधीच्या अवस्थेचा भंग होत नाहीं. भोग भोगूनही तो अलिप्तच असतो ९५.

त्यासी स्त्री म्हणे माझा भर्ता । पुत्र म्हणे माझा पिता ।
शिष्य म्हणे स्वामी तत्त्वतां । त्यांहूनि परता त्यांमाजीं वर्ते ॥९६॥
त्याची स्त्री त्याला ‘माझा पति’ असें म्हणतें, पुत्र ‘माझा बाप’ असें म्हणतो, शिष्य म्हणतो ‘हा माझा खरोखर गुरु आहे. ‘ परंतु तो या सर्व संबंधांपासून अगदी भिन्न असूनही त्यांच्यामध्यें वागत असतो ९६.

हो कां काष्ठास्तव उत्पत्ती । काष्ठावरी ज्याची स्थिती ।
तो आकळितां काष्ठीं बहुतीं । नावरे निश्चितीं अग्नि जैसा ॥९७॥
किंवा ज्याप्रमाणें लाकडापासूनच अग्नि उत्पन्न होतो, लाकडामध्येंच तो राहतो, पण त्यालाच पुष्कळ लाकडांनी धरून ठेवूं म्हटलें तर मात्र तो त्यांना खरोखर ज्याप्रमाणें आवरावयाचा नाहीं ९७,

फुंकितां लखलखिला । जो फुंकास्तव प्रकटला ।
तो फुंक न साहतां ठेला । निर्वातींचा संचला दीप जैसा ॥९८॥
किंवा फुंकलें असतांच जो प्रकाश देऊ लागतो, जो फुंकल्यामुळेंच उत्पन्न होतो, तोच दिवा फुंकर सहन न करील तरच निर्वात स्थानी असलेल्या दिव्याप्रमाणे टिकून राहील ९८.

तेवीं कर्मास्तव उत्पत्ती । कर्मेंचि झाली परब्रह्मप्राप्ती ।
त्या कर्मामाजीं वर्तती । निष्कर्मस्थिती महायोगी ॥९९॥
त्याप्रमाणें कर्मापासूनच उत्पत्ति होतें, कर्मापासूनच परब्रह्मप्राप्ति होतें, पण महान् योगी असतात तें त्या कर्मामध्येंच निष्कर्म स्थितीनें वागत असतात ९९.

तो व्यवहारी दिसो जनीं । कीं पिसेपणीं नाचो वनीं ।
अथवा तटस्थ राहो विजनीं । दशा अधिक‍उणी बोलूं नये ॥७००॥
तो लोकांमध्यें संसारी दिसो, किंवा वेड्यासारखा अरण्यामध्यें नाचो, किंवा एकांतामध्यें एकटाच स्वस्थ राहो, त्याच्या स्थितीमध्यें काही कमीजास्ती होईल हें बोलावयासच नको ७००.

जें सिंहासनीं राजत्व जोडे । तें वनांत खेळतां न मोडे ।
कीं धांवतां व्याहाळीपुढें । राजपद चोखडें ढळूं नेणे ॥१॥
सिंहासनावर बसून जो राजेपणा प्राप्त झालेला असतो, तो बागेत खेळ खेळत असतांना काही नाहींसा होत नाही. किंवा तो शिकारीमागें पळत असला म्हणूनही त्याचा थोर राज्याधिकार ढळू शकत नाहीं १.

रावो रानीं वसिन्नला । त्या रानासी राजभोग आला ।
रावो राजत्वा मुकला । मूर्खही या बोला न बोलती ॥२॥
राजानें रानांत जाऊन वस्ती केली, तरी त्या रानामध्यें त्याचें राजभोग येऊन पोचतातच. तेथें राजाची सत्ता नाहींशी झाली, असें मूर्खसुद्धा म्हणणार नाहींत २.

तेवीं पावोनि स्वरूपप्राप्ती । योगी प्रारब्धाच्या स्थिती ।
नाना कर्में करितां दिसती । परी निजात्मस्थिती भंगेना ॥३॥
त्याप्रमाणें योगी स्वस्वरूपाला पोंचूनही प्रारब्धाच्या अवस्थेप्रमाणें अनेंक प्रकारची कर्मे करतांना दिसतात, तरी त्यांची आत्मस्वरूपस्थिति मुळींच बिघडत नाहीं ३.

यालागीं समाधि आणि व्युत्थान । या दोहीं अवस्थांचें लक्षण ।
अपक्वासीचि घडे जाण । परिपूर्णासी लक्षण तें कैंचें ॥४॥
म्हणून समाधि लावणें आणि समाधि विसर्जन करणें या दोन्ही अवस्थांचा अनुभव अर्धवट ज्ञानी असतात त्यांनाच घडतो. परिपूर्ण ज्ञानी असतात त्यांना ही लक्षणें कशाची ? ४.

स्वरूपावेगळें कांहीं एक । पूर्णासी उरलें नाहीं देख ।
समाधिव्युत्थानाचें मुख । त्यासंमुख येवों लाजे ॥५॥
कारण, परिपूर्ण असतात त्यांना आत्मस्वरूपाशिवाय दुसरें काहीएक उरलेलें नसतें हें लक्षांत ठेव. म्हणून समाधि लावणें आणि विसर्जन करणें हें विधीच त्याला तोंड दाखविण्यास लाजतात ५.

अर्जुना देवोनि समाधि । सवेंचि घातला महायुद्धीं ।
परी कृष्ण कृपानिधी । तटस्थ त्रिशुद्धी न करीच ॥६॥
अर्जुनाला समाधि लावली, आणि लागलेंच त्याला घोर युद्धांत घातलें. दयानिधि श्रीकृष्णांनी त्याला खरोखर तटस्थ (क्रियाशून्य) असा केला नाहींच ६.

यालागीं समाधिव्युत्थानविधी । ताटस्थ्येंसहित निरवधी ।
गिळूनि झाली सैर समाधी । पूर्ण निजपदीं विलसतां ॥७॥
म्हणून परिपूर्णत्वानें आत्मस्वरूपांत रममाण होता होतांच, समाधि लावणें आणि विसर्जन करणें ही दगदग निश्चलपणासह सर्वस्वी गिळून टाकूनच खरी समाधि होत असतें ७.

एवं प्रारब्ध जंव असे । तंव मुक्ताचें देह वर्ते ऐसें ।
परी अहंममतेचें पिसें । पूर्विल्याऐसें बाधीना ॥८॥
अशा प्रकारें जोंपर्यंत प्रारब्ध असतें तोंपर्यंत मुक्ताचा देह अशा रीतीनें वागत असतो. पण त्याला अहंपणाच्या ममतेचें वेड मात्र पूर्वीप्रमाणें पीड देत नाही ८.

जेवीं स्वप्नदेहाच्या नाना अवस्था । जागृतीं आलिया तत्त्वतां ।
पुरुष नेघे आपुले माथां । तेवीं समाधिस्था देहकर्में ॥९॥
ज्याप्रमाणें स्वप्नांतील देहाला प्राप्त झालेल्या नानाप्रकारच्या अवस्था खरोखर जागृत झाल्यानंतर पुरुष आपल्या माथीं घेत नाही, त्याप्रमाणेंच समाधींत असलेला मनुष्यही देहाची कर्मे आपल्या माथ्यावर घेत नाहीं ९.

हेचि परमार्थता ब्रह्मस्थिती । नाना परींच्या उपपत्ती ।
म्यां सांगीतल्या तुम्हांप्रती । ज्ञानसंपत्ती निजगुह्य ॥७१०॥
श्रेष्ठत्वपूर्ण ब्रह्मस्वरूपस्थिति ती हीच होय. निरनिराळ्या प्रकारच्या स्पष्टीकरणानें मी तुम्हांला माझ्या गुह्य ज्ञानसंपत्ति सांगितल्या ७१०.

तूं कोण हें पुसिलें होतें । सांगावया तें सनकादिकांतें ।
सांगतसें निजरूपातें । विश्वास त्यातें दृढ व्हावया ॥११॥
‘तूं कोण ?’ असें सनकादिकांनी विचारलें होतें. तें त्यांना सांगण्यासाठी व त्याचा विश्वास दृढ व्हावा म्हणून मीं आत्मस्वरूप सांगितलें ११.

मयैतदुक्तं वो विप्रा गुह्यं यत् साङ्ख्ययोगयोः ।
जानीत माऽऽगतं यज्ञं युष्मद् धर्मविवक्षया ॥ ३८ ॥
[श्लोक ३८] हे ऋषींनो ! सांख्य आणि योग या शास्त्रांमध्ये जे गुप्त ज्ञान सांगितले आहे, तेच मी तुम्हांला सांगितले मी यज्ञस्वरूप भगवान स्वतःच तुम्हांला तत्त्वज्ञानाचा उपदेश करण्यासाठी हंसरूपाने आलो आहे, असे समजा. (३८)
अतिगुह्य ज्ञान परात्पर । जें उपनिषदांचें भांडार ।
म्यां सांगितलें साचार । योगसार योग्यांचें ॥१२॥
अत्यंत गुह्य, श्रेष्ठांतील श्रेष्ठ, असें जें उपनिषदांतील भांडार आणि योग्यांच्या योगमार्गातील रहस्य असें तें खरें ज्ञान मी तुला सांगितलें १२.

ज्या ज्ञानालागीं साधनकोटी । मुमुक्षु करिती हटतटीं ।
योगी रिघोनि गिरिकपाटीं । महामुद्रा नेहटीं साधिती ॥१३॥
ज्या ज्ञानाकरितां मुमुक्षु लोक खडतर कष्ट सोसून कोट्यवधि साधनें करतात, आणि ज्यासाठी योगी लोक गिरिकंदरांत शिरून आसनमुद्रा वगैरे साध्य करतात १३.

वेदशास्त्रांचिया युक्ती । थोंटावल्या जिये अर्थीं ।
तें निजज्ञान म्यां तुम्हांप्रती । यथानिगुती सांगीतलें ॥१४॥
ज्याच्यासाठी वेदशास्त्रांच्या सर्व युक्त्या असमर्थ ठरल्या, तें आत्मज्ञान यथार्थ रीतीनें मी तुम्हांला सांगितलें १४.

एवढिया ज्ञानाचा ज्ञानवक्ता । मी कोण हें न कळेल सर्वथा ।
तरी यज्ञाचा यज्ञभोक्ता । जाण तत्त्वतां मी विष्णू ॥१५॥
एवढें ज्ञान सांगणारा ज्ञानवक्ता असा मी कोण ? हें मुळींच कळावयाचें नाहीं. तर सर्व यज्ञांचा यज्ञभोक्ता खरोखर जो विष्णु तो मी हें लक्षांत ठेवा १५.

मज यावया हेंचि कारण । तुम्हीं ब्रह्मयाप्रती केला प्रश्न ।
तें उपदेशावया ब्रह्मज्ञान । स्वयें आपण येथें आलों ॥१६॥
मला येथें येण्याचें कारण हेंच कीं, तुम्ही ब्रह्मदेवाला प्रश्न केला होता, त्या ब्रह्मज्ञानाचा उपदेश तुम्हांला करण्यासाठी मी स्वतःच येथें आलों १६.

ज्या उपदेशाच्या पोटीं । वर्णाश्रमपरिपाटी ।
न सांडितां होय माझी भेटी । तेही गोष्टी ध्वनिलीसे ॥१७॥
ज्या उपदेशामध्यें वर्णाश्रमधर्माची पद्धति न सोडतां माझें दर्शन होतें, ती गोष्टही ध्वनित केली आहे १७.

सांडावें ब्राह्मणपण । मग मांडावें संन्यासग्रहण ।
हे दोनी धर्म देहींचे जाण । उपदेशीं देहपण मुख्यत्वें मिथ्या ॥१८॥
ब्राह्मणपण सोडून द्यावें, मग संन्यासग्रहण करावें, हें दोन्ही धर्म देहाचेंच आहेत. परंतु उपदेशामध्यें मुख्यत्वेंकरून देह हाच मुळीं मिथ्या असतो १८.

उपदेशू करूनि प्रमाण । सनकादिकीं ब्राह्मणपण ।
अद्यापि सांडिलें नाहीं जाण । माझें गुह्य ज्ञान पावले ॥१९॥
उपदेश हाच प्रमाण आहे असें मानून सनकादिकांनी ब्राह्मणपणा अद्यापि सोडिला नाही तरी त्यांना माझें गुह्य ज्ञान प्राप्त झालेंच १९.

तेणेंचि उपदेशें निश्चित । नारद ब्राह्मणपणें वर्तत ।
ब्रह्मानंदें डुल्लत । गात नाचत निजबोधें ॥७२०॥
आणि खरोखर त्याच उपदेशानें नारदही ब्राह्मणपणानेंच राहतो; आणि आत्मानंदानेंच गात आणि नाचत ब्रह्मानंदानें डुलत असतो ७२०.

ऐसें जें चैतन्यघन । आपुलें स्वरूप आपण ।
स्वयें करिताहे स्तवन । निजमहिमान द्योतावया ॥२१॥
असें जें आपलें चैतन्यघनस्वरूप, तें आपण स्वतःच आपला महिमा प्रगट करण्याकरितां वर्णन करीत आहे २१.

अहं योगस्य साङ्ख्यस्य सत्यस्यर्तस्य तेजसः ।
परायणं द्विजश्रेष्ठाः श्रियः कीर्तेर्दमस्य च ॥ ३९ ॥
[श्लोक ३९] हे श्रेष्ठ ब्राह्मणांनो ! योग, सांख्य, सत्य, ऋत, तेज, श्री, कीर्ती आणि इंद्रियनिग्रह या सर्वांचे आश्रयस्थान मीच आहे. (३९)
सांख्य जें परम ज्ञान । योग अष्टांगादिसाधन ।
सत्याचें सत्यपण । सत्यस्वरूप जाण मी एक ॥२२॥
सांख्य या नांवाचें जें श्रेष्ठ ज्ञान, अष्टांगादि साधनानें साध्य होणारा योग, किंवा सत्याचे जें सत्यत्व, तेंच माझें खरें स्वरूप आहे असें समज २२.

पहां पां ज्या सत्याच्या ठायीं । संत सद्धर्में राहिले पाहीं ।
सूनृत जे वाचा तेही । मजवेगळी कांहीं हों नेणे ॥२३॥
हें पहा ! ज्या सत्यामध्यें संत हें सद्धर्मानें वागत असतात, किंवा निरिच्छ अशी जी वाणी असतें, ती देखील माझ्यापासून भिन्न होऊ शकत नाहीं २३.

तेजाची जे प्रगल्भता । ते माझेनि तेजें सतेजता ।
श्रियेची जे ऐश्वर्यता । जाण तत्त्वतां माझेनि ॥२४॥
तेजाचा जो प्रगल्भपणा, त्याला माझ्यामुळेच प्रकाशता प्राप्त झाली आहे. किंवा लक्ष्मीला जें ऐश्वर्य प्राप्त झालें तें खरोखर माझ्यामुळेंच होय हें लक्षांत ठेव २४.

कीर्ति माझेनि कीर्तनें । सदा वंदिजे साधुजनें ।
मजवेगळें कीर्तीचें जिणें । कोणी पोसणें न घेती ॥२५॥
साधु लोक कीर्तीला जो थोर मान देतात, ती कीर्ति त्यांना माझ्या कीर्तनामुळेच लाभते. माझ्याशिवाय त्या कीर्तीला कोणीही स्वीकारणार नाही २५.

माझेनि तेजें निग्रहता । निग्रहो करी समस्तां ।
अदम्या दमू दमिता । जाण तत्त्वतां माझेनि ॥२६॥
निग्रहता ही माझ्याच प्रभावानें सर्वांना निग्रह करावयास लावतें. जें कधीं दमाचा स्वीकार करणारें नव्हेंत, त्यांनाही दम माझ्याच सामर्थ्यानें दमन करावयास लावतो असें समज २६.

येथ ध्येय आणि ध्यान । कां साध्य आणि साधन ।
या अवघियां मी अधिष्ठान । मजवेगळें भान यां कैंचें ॥२७॥
यावरून ध्येय आणि ध्यान; किंवा साध्य आणि साधन; ह्या सर्वांना आश्रयाचें स्थान मीच, माझ्याशिवाय त्यांना कार्याची प्रेरणा कशी मिळणार ? २७,

तुम्ही ब्राह्मण अतिश्रेष्ठ । मजही पूज्यपणें वरिष्ठ ।
यालागीं निजज्ञान चोखट । तुम्हांसी म्यां प्रकट सांगीतलें ॥२८॥
तुम्ही अत्यंत श्रेष्ठ असें ब्राह्मण आहांत, तुम्ही मोठेपणानें मलाही पूज्य आहात. म्हणून माझें शुद्ध आत्मज्ञान तुम्हांला मी स्पष्ट करून सांगितलें २८.

मां भजन्ति गुणाः सर्वे निर्गुणं निरपेक्षकम् ।
सुहृदं प्रियमात्मानं साम्यासङ्गादयोऽगुणाः ॥ ४० ॥
[श्लोक ४०] समता, अनासक्ती इत्यादी जे अविनाशी गुण आहेत, ते सर्व, निर्गुण, निरपेक्ष, सर्वांचा सुहृद, सर्वांचा प्रिय आत्मा अशा माझ्या ठिकाणी सदैव वास करतात. (४०)
मी वस्तुतां निरपेक्ष निर्गुण । त्या माझ्या ठायीं भजोनि गुण ।
सुहृद आत्मा प्रिय जाण । ऐसें लक्षण मज करिती ॥२९॥
खरे पाहिले तर मी निरिच्छ व निर्गुण आहे. तरी त्या माझ्याच ठिकाणी गुणांच्या कल्पनेनें भक्ति करून सुहृद, आत्मा, प्रिय इत्यादि लक्षण मला लावतात हें लक्षांत ठेव २९.

समता आणि असंगता । याही गुणांच्या अवस्था ।
आणूनि ठेविती माझ्या माथां । गुणस्वभावतां लक्षणें ॥७३०॥
समता आणि निःसंगता या गुणांच्या अवस्थाही गुणस्वभावलक्षणांनी माझ्या माथीं आणून ठेवतात ७३०.

हो कां सबळ बळें अंधकार । कैं युद्धा आला सूर्यासमोर ।
तरी तमारी हा बडिवार । सूर्या आंधार जेवीं देत ॥३१॥
हें पहा, अंधार हा आपलें पराक्रमी सैन्य घेऊन सूर्याच्या समोर येऊन कधीं युद्धाला उभा राहिला आहे ? तरी ज्याप्रमाणें ‘अंधकाराचा नाशकर्ता’ अशा नांवाचा मोठेपणा तो अंधार सूर्याला देतोच ३१,

कोणें धरोनियां आकाश । घटीं घातलें सावकाश ।
तरी घटयोगें घटाकाश । मिथ्या गगनास नांव आलें ॥३२॥
किंवा आकाशाला धरून घटांत सावकाशपणें कोणी कोंबलें आहे ? तरी पण घटाच्या योगेंकरून आकाशाला घटाकाश असें खोटेंच नांव प्राप्त झालें आहे ३२.

नाहीं घटासी आतळला । गगनींचा गगनींच संचला ।
तो घटें घटचंद्रमा केला । मूर्खासी मानला सत्यत्वें ॥३३॥
चंद्र घटाला शिवत नाही, आकाशांतल्या आकाशांतच राहिलेला असतो, तरी घट हा चंद्राला घटचंद्र करून सोडतो, आणि मूर्खांना तोच खरा वाटतो ३३.

तेवीं मी केवळ निर्गुण । त्या माझ्या ठायीं भजोनि गुण ।
सुहृद आत्मा इत्यादि जाण । असंगादि लक्षण मज देती ॥३४॥
त्याप्रमाणें मी केवळ निर्गुण असतांही त्या माझ्याच ठिकाणी गुणांच्या कल्पनेनें भजन करून सुहृद, आत्मा, असंग इत्यादि लक्षणें माझ्याकडेंच लावतात ३४.

गुणासी मी नातळें जरी । तरी मज म्हणती लीलाधारी ।
एवं गुणचि गुणांमाझारीं । मिथ्या मजवरी आळ हा ॥३५॥
मी जरी गुणांना शिवतसुद्धा नाही, तरी मला लीलाधारी असें म्हणतात. अशा प्रकारें गुणच गुणांमध्यें राहतात, आणि नसतां आरोप मात्र माझ्यावर येतो ३५.

तेथ मी घेता ना देता । कर्ता ना करविता ।
हे माझी निजस्वभावता । येर ते अवस्था गुणांची ॥३६॥
म्हणून मी घेणाराही नव्हें आणि देणाराही नव्हें. मी कांहीं नव्हें आणि करवितांही नव्हें. हा माझा स्वभावधर्म आहे. इतर जी अवस्था आहे ती गुणांची होय ३६.

एवं पूर्वापर अतिविचित्र । सांगोनि ज्ञानविज्ञाननिर्धार ।
त्या इतिहासाचा उपसंहार । स्वयें सारंगधर करीतसे ॥३७॥
अशा प्रकारें ज्ञानाचें आणि विज्ञानाचें पूर्वापार चालत आलेलें जें अत्यंत विलक्षण स्वरूप, त्या गोष्टीचा उपसंहार आता स्वतः श्रीकृष्ण करीत आहे ३७.

इति मे छिन्नसंदेहा मुनयः सनकादयः ।
सभाजयित्वा परया भक्त्यागृणत संस्तवैः ॥ ४१ ॥
[श्लोक ४१] या माझ्या उपदेशाने सनकादी मुनींचा संदेह दूर झाला, तेव्हा माझी पूजा करून अत्यंत भक्तिभावाने ते माझी स्तुती करू लागले. (४१)
आत्मज्ञानी परम दक्ष । मुमुक्षुंमाजीं अतिनेटक ।
संदेहापन्न सनकादिक । म्यां यापरी देख निःसंदेह केले ॥३८॥
आत्मज्ञानी, अत्यंत दक्ष, मुमुक्षंमध्यें अत्यंत श्रेष्ठ असें सनकादिक संदेहयुक्त झालें होतें, त्यांना मी ह्याप्रमाणें निःसंदेह केलें ३८.

सदा सावधानें निर्मळ । माझ्या भजनीं अतिप्रेमळ ।
सदा मद्‌रूपें मननशीळ । अव्याकुळ श्रवणार्थी ॥३९॥
तें सदासर्वदा सावध, शुद्ध, माझ्या भजनाविषयी अत्यंत प्रेमळ, निरंतर मत्स्वरूपामध्यें राहून मनन करणारें, आणि उपदेश ऐकावयाला कधीच न कंटाळणारें होतें ३९.

उद्धवा तिंहीं ऐकतां माझी गोष्टी । माझ्या स्वरूपीं घातली मिठी ।
मद्‌रूप झाले उठाउठी । बाप जगजेठी ब्रह्मपुत्र ॥७४०॥
त्यांनी माझा हा उपदेश ऐकतांच माझ्या स्वरूपाला तत्काल मिठी घातली, आणि तें तत्काळ मत्स्वरूप झालें. असें तें ब्रह्मपुत्र जगांत अत्यंत धन्य होत ७४०.

तिंहीं दृश्य द्रष्टा दर्शन । त्रिपुटीचें केलें शून्य ।
परब्रह्मचि झाले पूर्ण । माझेनि जाण उपदेशें ॥४१॥
माझ्या उपदेशाच्या योगानें त्यांनी दृश्य, द्रष्टा व दर्शन ह्या त्रिपुटीचें शून्य करून टाकलें आणि तें परिपूर्ण ब्रह्मस्वरूपच झालें ४१.

परम पावले समाधान । गद्यपद्यादि सुलक्षण ।
माझें करोनियां स्तवन । पूजाविधान मांडिलें ॥४२॥
तें अत्यंत समाधान पावलें, आणि गद्यपद्यादिकेंकरून अत्यंत मनोहर असें माझें स्तवन करून माझी पूजा करावयास त्यांनी आरंभ केला ४२.

तैरहं पूजितः सम्यक् संस्तुतः परमर्षिभिः ।
प्रत्येयाय स्वकं धाम पश्यतः परमेष्ठिनः ॥ ४२ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
एकादशस्कंधे त्रयोदशोऽध्यायः ॥ १३ ॥
[श्लोक ४२] त्या श्रेष्ठ ऋषींनी माझी यथासांग पूजा करून स्तुती केली नंतर ब्रह्मदेवांच्या देखतच मी आपल्या धामाकडे निघून गेलो. (४२)
जरी पूज्यपूजकता गेली । तरी तिंहीं गुरूची पूजा केली ।
सांडूनि द्वैताची भुली । पूजा मांडिली अतिप्रीतीं ॥४३॥
जरी त्यांची पूज्यता आणि पूजकता ह्या वृत्ति नाहींशाच झालेल्या होत्या, तरी त्यांनी गुरूची पूजा केली. द्वैताचा भ्रम सोडून देऊन त्यांनी परमभक्तिभावानें माझ्या पूजेला प्रारंभ केला ४३.

शिष्य झालियाही ब्रह्मसंपन्न । त्याहीवरी त्यासी गुरु पूज्य जाण ।
सद्‍गुरु तोचि ब्रह्म पूर्ण । हे पावली खूण सनकादिकां ॥४४॥
शिष्य जरी ब्रह्मस्वरूप झाला, तरी त्यानंतरही त्याला गुरु पूज्यच आहे हें लक्षांत ठेव, सद्गुरु हा खरोखर परिपूर्ण ब्रह्म आहे. ही गोष्ट सनकादिकांना सुद्धा मान्य झाली ४४.

ज्याच्या बोलासरिसेंचि पाहें । अवघें ब्रह्मचि होऊनि ठाये ।
त्या सद्‍गुरूचे पूज्य पायें । सांगूं काये बोलवरी ॥४५॥
ज्याच्या शब्दाबरोबर सर्व ब्रह्मस्वरूप होऊन राहातें, त्या सद्गुरूचें पूज्य चरण मी शब्दांनी किती वर्णन करूं ? ४५.

ज्यासी परब्रह्म आलें हाता । तोचि जाणे सद्‍गुरूची पूज्यता ।
इतरांसी हे न कळे कथा । अनुमानता बोलवरी ॥४६॥
परब्रह्मच ज्या या हाती आलें, तोच सद्गुरूची खरी पूज्यता जाणतो. इतरांना ती गोष्ट कळत नाही. ती शब्दांनी सांगितली तरी केवळ अनुमान मात्र होते ४६.

ते सनकादिक समस्त । माझी पूजा करोनि यथोक्त ।
वारंवार स्तवन करीत । चरणा लागत पुनःपुनः ॥४७॥
असो. तें सर्व सनकादिक माझी यथासांग पूजा करून वारंवार माझें स्तवन करूं लागले, आणि पुनःपुन्हा माझ्या पायांशी नम्र झालें ४७.

माझ्या भजनीं एकमुख । माझिया निजभावें अतिभाविक ।
मज अवाप्तकामासी सुख । त्यांचे पूजनीं देख उथळलें ॥४८॥
माझ्या भजनामध्यें तें सर्व एकदिलानें तल्लीन झालें, माझ्या भक्तीनें तें अत्यंत भक्तियुक्त झालें, तेव्हां निरंतर पूर्णकाम असणाऱ्या मलाही त्यांच्या पूजेनें संतोष झाला. १८.

मग करूनि प्रदक्षिणा । ते लागले माझिया चरणा ।
परम सुख झालें ब्राह्मणां । वचनार्थें जाणा माझेनी ॥४९॥
मग प्रदक्षिणा करून त्यांनी माझ्या चरणी नमस्कार केलें. माझ्या भाषणांतील गहन अर्थानें त्या ब्राह्मणांना इतकें अत्यंत सुख झालें ४९.

पहात असतां प्रजापती । सनकादिक उभे असती ।
त्यांदेखतां निजधामाप्रती । शीघ्रगती मी आलों ॥७५०॥
ब्रह्मदेव हें सर्व पहात असतां व सनकादिक उभे असतां त्या सर्वांसमक्ष मी मोठ्या वेगानें निजधामाला आलों ७५०.

माझे शिष्य सनकादिक । उद्धवा या रीतीं झाले देख ।
तो इतिहास अलोलिक । तुज म्यां सम्यक सांगीतला ॥५१॥
उद्धवा ! अशा रीतीनें सनकादिक माझे शिष्य झालें आहेत हें लक्षांत ठेव. तोच अलौकिक इतिहास मी तुला थोडक्यात सांगितला ५१.

ते योगियांमाजीं अतिउद्‍भट । भक्तांमाजीं अतिश्रेष्ठ ।
ज्ञानियांमाजीं अतिवरिष्ठ । शिष्य चोखट सनकादिक ॥५२॥
योग्यांमध्यें अत्यंत श्रेष्ठ, भक्तांमध्यें अत्यंत श्रेष्ठ, ज्ञात्यांमध्यें अत्यंत अधिकारी, असें तें सनकादिक माझे अत्युत्तम शिष्य आहेत ५२.

हंसगीतनिरूपण । पुरातन जें ब्रह्मज्ञान ।
तें उद्धवासी श्रीकृष्ण । प्रसन्न होऊन दीधलें ॥५३॥
‘हंसगीतनिरूपण’ ह्या नावानें प्रसिद्ध असें जें पुरातन ब्रह्मज्ञान होतें, तें श्रीकृष्णांनी प्रसन्न होऊन उद्धवाला सांगितलें ५३.

भागवतपंथें चालतां । हे पुरातन ब्रह्मकथा ।
एका एकादशू पाहतां । स्वभावें हाता पैं आली ॥५४॥
भागवतधर्मानें चालत असतां ही पुरातन ब्रह्मकथा एकनाथ एकादशस्कंध पहात असतां त्याच्या सहज हातांत आली ५४.

जीं हंसमुखींचीं चिद्रत्‍नें । जीं सनकादिकां झालीं भूषणें ।
उद्धवा अळंकारिला श्रीकृष्णें । तें शेष जनार्दनें मज दीधलें ॥५५॥
हंसाच्या मुखातून निघालेली जी ज्ञानरत्नें; आणि जी सनकादिकांना अलंकारांप्रमाणें भूषणभूत झाली, त्याच रत्नांनी श्रीकृष्णांनी उद्धवाला शृंगारले, आणि त्यांतीलच जी शिल्लक उरली, ती श्रीगुरु जनार्दनांनी मला दिली ५५.

सनकादिक-उद्धवाचें शेष । हाता आलें हा बोल वोस ।
ते गोष्टीसी जाहले बहु दिवस । म्हणाल वायस हा जल्पू ॥५६॥
परंतु सनकादिक व उद्धव यांचेकडून शिल्लक राहिलेली रत्नें मला मिळाली हें बोलणे खोटें होय. कारण सनकादिक व उद्धव ह्यांच्या गोष्टीला कितीतरी दिवस होऊन गेले. तेव्हा ही बडबड व्यर्थ असें तुम्ही कदाचित् म्हणाल ५६;

कृतयुगीं शंखासुरासी । देवें मर्दिलें होतें त्यासी ।
ते ठायीं अद्यापि सभाग्यासी । अव्हाशंखासी पावती ॥५७॥
तर देवानें त्या शंखासुराला कृतयुगांत मारलें होतें, परंतु भाग्यवान् असतो त्याला अद्यापही त्या ठिकाणी उजवे शंख सांपडतातच ५७.

रामें पूर्वीं अयोध्येसी । केलें होतें महायागासी ।
तेथें हविःशेष लोकांसी । अद्याप हातासी येतसे ॥५८॥
रामचंद्रानें पूर्वी अयोध्येत मोठा यज्ञ केला होता, पण त्या ठिकाणी त्या यज्ञांतील यज्ञद्रव्यांचा काही उरलेला भाग लोकांच्या हाती अद्यापही लागतो ५८.

तैसेंचि येथें भागवतीं । जनार्दनकृपापद्धतीं ।
सनकादिकांची शेषप्राप्ती । एकादशार्थीं आम्हां झाली ॥५९॥
त्याचप्रमाणें येथें भागवतांत जनार्दनगुरूंच्या कृपाप्रसादानें सनकादिकांच्या ज्ञानरत्नांतील शिल्लक राहिलेल्या ज्ञानाची प्राप्ति एकादशस्कंधाच्या अर्थामध्यें मला झाली ५९.

मागेंपुढें अवघें एक । हा एकादशाचा विवेक ।
तेणें सनकादिक -उद्धवशेख । आम्हांम्ही देख प्राप्त झालें ॥७६०॥
मागें आणि पुढें सर्व एकच परब्रह्म भरलेलें आहे, हाच या एकादशस्कंधांतील विचार आहे. त्यामुळें सनकादिक व उद्धव यांच्या ज्ञानरत्नांतील अवशेष आम्हालाही प्राप्त झाला ७६०.

करूं नेदितां गयावर्जनीं । न रिघवे समर्थजनीं ।
ते पदीं माशीलालागुनी । निवारण कोणी करीना ॥६१॥
गयावर्जन करितांना विष्णुपदाजवळ जाण्याची जर परवानगी मिळाली नाही, तर त्या ठिकाणी मोठ्या श्रीमंतालासुद्धा जातां येत नाही. पण त्याच पदावर जर एखादी माशी खुशाल बसली असेल, तर तिचे निवारण कोणी करीत नाही ६१.

तेवीं नाना शास्त्रार्थयुक्तींसी । शिणतां समर्थ साधकांसी ।
प्राप्ती नव्हे ज्ञानशेषासी । ते झाली आम्हांसी एकादशें ॥६२॥
त्याप्रमाणें अनेक प्रकारच्या शास्त्रांचा विचार करून थकलें असतां मोठमोठ्या साधकांनासुद्धा त्या ज्ञानशेषाची प्राप्ति होत नाही. पण ती आम्हाला ह्या एकादशस्कंधानें झाली ६२.

हंसकृष्ण जनार्दन । स्वरूप एक नामें भिन्न ।
तेणें घालूनि बोधांजन । जुना ठेवा जाण दाखविला ॥६३॥
हंस, कृष्ण आणि जनार्दन यांचे स्वरूप एकच आहे, नवें मात्र भिन्न. त्यानेंच हें बोधरूपी अंजन घालून हा जुना ठेवा दाखवून दिला, हें लक्षांत ठेव ६३.

तेथ मी एका एकू देखता । आणि तो एकू मातें दाखविता ।
हेही नुरेचि बोध्यबोधकता । पाहता पाहविता तोचि तो ॥६४॥
तेथें मी एक एकनाथ पहाणारा, आणि तो एक मला दाखविणारा, हा बोध आणि ही बोधकताही राहिली नाही. कारण पाहणारा आणि पाहविणाराही एक तोच आहे ६४.

आरसा आलिया मुख दिसे । तो गेलिया तें न दिसे ।
परी येणें जाणें मुखासी नसे । ते सहजेंचि असे संचलें ॥६५॥
आरसा पुढें आला असतां त्यांत तोंड दिसते, आणि तो बाजूला गेला म्हणजे तें दिसेनासें होतें. पण त्या तोंडाला येणेंही नाहीं आणि जाणेंही नाहीं. तें स्वभावतः असतें तसेंच असतें ६५.

आरिशाचें मुख आरिसें नेलें । परी पाहातया नाहीं ऐसें झालें ।
जें कटकटा माझें मुख गेलें । तें असे संचलें तो जाणे ॥६६॥
आरशांतलें तोंड आरशानें नेलें, तेव्हां पाहणाराला तें नाहीसें झालें, म्हणून ‘हाय हाय ! माझे तोंड गेलें’ असें कांहीं पाहणारा म्हणत नाही. कारण, आपले तोंड आहे तसेंच आहे असें तो जाणतो ६६.

तेवीं अज्ञानें न्यावें । कां ज्ञान झालिया यावें ।
तैसें वस्तूसी न संभवे । तें असे स्वभावें संचलें ॥६७॥
त्याप्रमाणें अज्ञानानें नाहीसें करावें आणि ज्ञान झाल्यावर परत यावें असें परब्रह्माच्या ठिकाणी घडत नाही. परब्रह्म हें स्वभावत:च असावयाचें तसेंच आहे ६७.

तैसें देखतें आणि दाखवितें । दोनी जाऊनियां तेथें ।
माझें मीपण जें जुनें होतें । तें दाविलें मातें जनार्दनें ॥६८॥
त्याचप्रमाणें पाहणारें व दाखविणारें ही दोन्ही जाऊन त्या जागी माझें जें मूळचे मीपण होतें, तेच जनार्दनानें मला दाखविलें ६८.

जेवीं सूर्याचेनि प्रकाशें । सूर्येंचि कीं सूर्यो दिसे ।
तेवीं माझेनि निजप्रकाशें । मज मीचि असें देखत ॥६९॥
ज्याप्रमाणें सूर्याच्या प्रकाशानें सूर्यामुळेच सूर्य दिसतो, त्याप्रमाणें माझ्या आत्मप्रकाशानें मीच मला पाहात असतों ६९.

ऐशियाही ठायीं जाण । कैंचें नवें जुनें ज्ञान ।
बहु काळ ठेविलें सुवर्ण । त्यासी म्हणे कोण कुहजकू ॥७७०॥
मग अशा ठिकाणी नवें ज्ञान आणि जुनें ज्ञान तें कशाचें ? पुष्कळ दिवस सोनें ठेवलेलें असलें तरी त्याला कुजलेलें असें कोण म्हणणार ? ७७०.

कालचाचि आजि उगवला । तो सूर्य काय म्हणावा शिळा ।
कीं आजिचा अग्नि सोंवळा । कालचा काय वोंवळा म्हणों ये ॥७१॥
कालचाच सूर्य आज उगवला, म्हणून तो सूर्य शिळा म्हणावा काय ? किंवा आजचा अग्नि तेवढा सोवळा, आणि कालचा अग्नि ओवळा होता असें म्हणता येईल काय ? 1.

तेवीं सनकादिकांचें जें ज्ञान । तेंचि मराठीभाषेमाजीं जाण ।
येथें ठेवूं जातां दूषण । दोषी आपण होइजे ॥७२॥
त्याप्रमाणें सनकादिकांचे जें ज्ञान आहे, तेच मराठी भाषेमध्यें आणून ठेवावयास लागलें असतां जर कोणी त्याबद्दल दूषण देऊं लागला, तर तो आपण मात्र दोषी होईल ७२.

कां सुवर्णाचें केलें सुणें । परी तें मोलें नव्हेचि उणें ।
तेवीं सनकादिकांचीं ज्ञानें । देशभाषा हीनें नव्हतीच ॥७३॥
किंवा सोन्याचें कुठें केलें, तरी तें किंमतीत काही कमी व्हावयाचे नाही, त्याप्रमाणे सनकादिकांचें जें ज्ञानविचार आहेत, तेंही देशी भाषेत-मराठीत-सांगितलें म्हणून तें काही हीन होत नाहींत ७३.

जेवीं कां गुळाचें कारलें केलें । परी तें कडूपणा नाहीं आलें ।
तेवीं हंसगीत मराठें झालें । नाहीं पालटलें चिन्मात्र ॥७४॥
ज्याप्रमाणें गुळाचें कारलें केलें तर तें काही कडू लागत नाहीं, त्याप्रमाणें हंसगीत मराठींत झालें म्हणून त्यांतील ज्ञान कांहीं पालटलें नाहीं ७४.

जें मोल मुकुटींच्या हेमासी । तेंचि मोल सुवर्णश्वानासी ।
जो कां ग्राहिक सुवर्णासी । तो घे दोघांसी समत्वें ॥७५॥
मुकुटातील सोन्याला जें मोल असतें. तेच मोल सोन्याच्या कुत्र्यालाही असतें. जो सोनें विकत घेणारा गिर्‍हाईक असेल, तो त्या दोघांनाही सारख्याच किंमतीनें विकत घेतो ७५,

तैसें आत्मानुभवी जे येथें । ते मानितील या ग्रंथातें ।
येर ते हेळसितील यातें । निजभावार्थें न घेती ॥७६॥
त्याप्रमाणें येथें जें आत्मानुभवी असतील, तेंच या ग्रंथाला मान देतील, आणि जें आत्मानुभवी नसतील तें ह्या ग्रंथाचा विकार करतील, व अंतःकरणपूर्वक भक्तीनें या ग्रंथाचा स्वीकार करणार नाहीत ७६.

जे वंदिती कां निंदिती । ते दोघे आम्हां ब्रह्ममूर्ती ।
हे निजात्मभावाची प्रतीती । केली निश्चितीं जनार्दनें ॥७७॥
या ग्रंथाला जें वंदितील किंवा जें निंदितील, तें दोघेंही आम्हांला ब्रह्मस्वरूपच आहेत. हाच खरा आत्मस्वरूपाचा अनुभव आम्हांला जनार्दनानें दाखवून दिला आहे ७७.

एका जनार्दना शरण । रिघतां विरालें एकपण ।
जेवीं कां समरसोनि लवण । स्वयें जाण समुद्र झालें ॥७८॥
हा एका जनार्दनाला शरण जातांच, ज्याप्रमाणें मीठ समुद्रांत मिळालें म्हणजे तें स्वतः समुद्रस्वरूप होतें, त्याप्रमाणें त्याचा एकपणाही नाहींसा होऊन गेला ७८.

तेथे एका आणि जनार्दन । एक झाले हें म्हणे कोण ।
जेवीं डोळ्यांचें देखणेपण । डोळाचि आपण स्वयें जाणे ॥७९॥
तेथें एकनाथ आणि जनार्दन हें एकरूप झालें असें तरी कोण म्हणणार ? ज्याप्रमाणें डोळ्याचा पहावयाचा धर्म असतो तो डोळ्याला स्वत:लाच कळत असतो, त्याप्रमाणेंच हें आहे ७९.

डोळ्यांनी आरिसा प्रकाशिजे । तेथें डोळेनि डोळा पाहिजे ।
तेवीं हें ज्ञान जाणिजे । देखणें देखिजे देखणेनी ॥७८०॥
डोळ्यांनी आरसा दिसू लागला म्हणजे डोळ्यांनाच डोळा दिसू लागतो, त्याप्रमाणें हें ज्ञान समजावें. ज्याला दृष्टि असेल त्यानेंच दृश्य पहावें ७८०.

सांडोनियां एकपण । एका जनार्दना शरण ।
हेंचि हंसगीतनिरूपण । झालें परिपूर्ण पूर्णत्वें ॥७८१॥
आपला एकनाथपणा सोडून एकनाथ जनार्दनाला शरण आहे, म्हणून हें हंसगीताचें निरूपण पूर्णपणें परिपूर्ण झालें ७८१.

इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे एकाकारटीकायां
श्रीकृष्णोद्धवसंवादे हंसगीतनिरूपणं नाम त्रयोदशोऽध्यायः ॥१३॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ मूळ श्लोक ॥४२॥ ओंव्या ॥७८१॥
तेरावा अध्याय समाप्त.

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 

ref:satsangdhara 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *