ग्रामगीता अध्याय

ग्रामगीता अध्याय एकेचाळीसावा

ग्रामगीता अध्याय एकेचाळीसावा

॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥

ईश्वरें व्यापिलें हें विश्व । म्हणोनि जगचि आम्हां देव । विश्वाचा मूळ घटक गांव । ग्रामगीता त्यासाठी ॥१॥
यांत ग्रामाचा जयजयकार । सर्व तीर्थक्षेत्रांचें ग्रामचि माहेर । ग्राम हा विश्वाचा पाया सुंदर । ग्राम नसतां प्रलयचि ॥२॥
ग्राम म्हणजे देवमंदिरे । मानव देवमूर्ति सुंदर । सर्वांची सेवा समप्रकार । तीच पूजा आमुची ॥३॥
ग्रामगीता शाब्दिक सेवा । परि दृढ करी संस्कारांचा ठेवा । तेणें ईश्वरी राज्य गांवां । नांदेल सदासर्वकाळ ॥४॥
ग्रामगीता दु:खांसि नाशवी । ग्रामगीता मृत्यूसि हसवी । ग्रामगीता सहकरीतत्त्व वाढवी । मानवधर्मा फुलवाया ॥५॥
चाळीस दिवस म्हणजे मंडळ । ऐसीं अनुष्ठानें प्रांजळ । करितां गांव सुधारेल सकळ । संस्कारें ग्रामगीतेच्या ॥६॥
म्हणोनि चातुर्मास्यादि निमित्तां । मंदिरीं, पारीं, बैठकींत बसतां । वाचावी हर्षभरें ग्रामगीता । रंग रंगणीं आणोनिया ॥७॥
परि ऐसी नसावी भावना । अर्थहीन करितां पारायणा । ना कळे तरी पुण्यराशी नाना । जमा होतील आमुच्या ॥८॥
माझ्या मतें हें अज्ञान । दूर सारोनि करावें वाचन । आधी शिकावें अर्थज्ञान । ग्रंथपठन करितांना ॥९॥
प्रथम हीच महत्त्वाची खूण । ग्रंथवाचनाचें कळावें ज्ञान । आपुलें वाचन आपणा समजून । बोध व्हावा उत्तम ॥१०॥
असेल मित्रमंडळी बसली । त्यांनाहि समजावी आपुली बोली । नाहीतरि वाचनपठनें केलीं । कोणा न कळलें तरि काय ? ॥११॥
काय वाचतो याचें ज्ञान । नाही वाचकासीच झालें पूर्ण । श्रोते पळती उगेच उठोन । अर्थ काय वाचनासि ? ॥१२॥
कोठे थांबावें वाचकांनी । कोठे वाचावें जोर देवोनि । कोठे रंगवावें गंभीरपणीं । कळलें पाहिजे वाचकां ॥१३॥
ऐसें जंव कळलेंच नाही । केलीं पारायणें  सर्वहि । लक्ष नसे अर्थप्रवाहीं । तरि तें व्यर्थ वाचन ॥१४॥
वाचतांनाचि बोध होतो । अंगीं स्फुरणभाव उठतो । कर्म करावयासि वळतो । जीव जैसा अंतरीं ॥१५॥
ऐसें वाचन आधी शिकावें । तरीच ग्रंथपठन करावें । मग आपणासि ओळखीत जावें । अधिकारपरत्वें वाचकें ॥१६॥
वाचक असावा आचारशील । तरीच श्रोत्यांवरि परिणाम करील । नाहीतरि होईल टिंगल । जनतेमाजीं तयाची ॥१७॥
मुखाने ग्रंथ वाचावे । घरीं विपरीत आचरावें । तैसेचि बाहेरि गोडवे । गाती लोक थट्टेने ॥१८॥
मुखें वाचतो ’ सत्य बोलावें ’ । परि सत्य करणेंचि नाही ठावें । म्हणे ’ मज सत्यवान म्हणावें ’ । कैसे म्हणतील ग्रामवासी ? ॥१९॥
मी तों धनावरचा सर्प बरवा । परि मला ’ उदार दाता ’ गौरवा । ऐसें कोण मानील आपुल्या गांवां ? सांगा सांगा ॥२०॥
रंजल्यासि न दे पाणी । म्हणे ’ मज म्हणा दानशूर राणी ’ । ऐकेलचि का ऐसें कोणी । किती वाजविले चौघडे तरी ? ॥२१॥
पानतंबाखू खावोनि आला । प्रवचनीं कीर्तनीं शाळेंत बसला । हसती श्रोते-विद्यार्थी त्याला । ’ व्यसनें सोडा ’ बोलतां ॥२२॥
एक पंडित जेवणासि बैसला । आरंभ शांतिपाठासि केला । परि जरा वाढण्यासि उशीर झाला । मारलें त्याने बाइलेसि ॥२३॥
ती म्हणे वाहवा ऐसी शांति ! उत्तम मंत्राची फलश्रुति ! तोंडाने पति दिव्य बोलती । आचरण करिती क्रूराचें ॥२४॥
ऐसें न व्हावें आतातरी । असोत वाचक वक्ते शिक्षक भारी । आहे सर्वांवरीच जबाबदारी । आधी आत्मशुध्दीची ॥२५॥
उपदेशक वाचक आचारशील । असले तरीच भाव फळेल । श्रोत्यांचें हृदय-परिवर्तन होईल । लागवेगेंसि ॥२६॥
वक्ता असेल सरळ सात्विक । तरीच श्रोते बनतील भाविक । जनलोक करितील कौतुक । बघोनि दोघांसि ॥२७॥
म्हणोनि हेंचि वरिष्ठांनी करावें । जैसें सांगावें तैसेंचि वागावें । तरीच होईल त्यांच्या प्रभावें । कल्याण ग्रामजीवनाचें ॥२८॥
येथे श्रोत्यांनी विचारलें । आपण अर्थासि वर्तनासि महत्त्व दिलें । परि कित्येक ग्रंथीं सांगितलें । पारायणचि फलदायी ॥२९॥
कोणी म्हणती ग्रंथाचें पारायण । करितां मिळेल पुत्र, धन । होईल भाग्याचा उदय पूर्ण । पारायणें ग्रंथाच्या ॥३०॥
कोणी म्हणती मंत्रचि जपा । हजारोंनी करा संकल्पा । म्हणती सांगतों मार्ग हा सोपा । ज्ञान मिळेल न वाचतां ॥३१॥
कोणी म्हणती अनुष्ठान करा । वाचा भागवत-गीता-ब्रह्मसूत्रा । मोक्ष चालत येईल घरां । कानीं पडतां शब्दचि ॥३२॥
कोणी म्हणती ग्रंथ ज्या घरीं । तेथे नये काळाची फेरी । याचा मेळ कोणेतरी । बसेल सांगा ? ॥३३॥
याचें उत्तर ऐका सज्जन ! फलश्रुति ही रोचक पूर्ण । ग्रंथ-प्रचार व्हावा म्हणून । दिलें प्रलोभन दावूनि ॥३४॥
त्यांत एक आहे उत्तमहि । लोक ठेविती ग्रंथ संग्रहीं । त्यापासूनि लाभ घेई । कोणी तरी थोडा-बहु ॥३५॥
कानीं पडो एकचि वचन । परि त्यांत असे महापुण्य । हेंहि ओढ लागावीं म्हणून । कथिलें असे थोरांनी ॥३६॥
नुसत्या पारायणाचें महत्त्व । त्यांतहि हेंचि आहे तत्त्व । कधीतरी येईल आचरणीं सर्व । संस्कार होतां ॥३७॥
कराया सांगितलें जप-अनुष्ठान । तेंहि शुध्द कराया जीवन । क्रमाने तितुके दिवस तरि मन । शुध्दाचरणीं लागाया ॥३८॥
म्हणोनि मी या सकलां मानितों । परि जपणारे एकांगी समजतों । तेणेंचि लाभ हातां न येतो । बहुतेकांच्या ॥३९॥
घोडयासि पाणी दाखवावें । म्हणतां तेंचि धरिलें जीवें । पाणी पाजणें नाही ठावें । तैसें झालें लोकांचें ॥४०॥
ऐसेचि नाना ग्रंथ वाचले । परि तैसें मुळीच नाही वर्तले । कोण्या तोंडाने मागावें भलें । फळ तयांसि ? ॥४१॥
कांही ग्रंथांतहि अवास्तवपणा । हें न राहवें सांगितल्याविना । त्यांनी श्रध्देचा होतो धिंगाणा । फल न येतां हातामाजीं ॥४२॥
ग्रंथीं अपार फलश्रुति कथिली । परि अनुभवासि नाही आली । हजारो लोकांनी आम्हां सांगितली । कर्मकहाणी ॥४३॥
ग्रंथीं सुखाची फलश्रुति । म्हणोनि वाचती सकाम पोथी । आळसी भोळे ओढवोनि घेती । अधिक आपत्ति दानादिकें ॥४४॥
कोणी कोणास साधन सांगती । सोने देवोनि करा म्हणे समाप्ति । घरोघरीं व्रतवैकल्यें आचरती । भुलती बायाबापडया ॥४५॥
व्रतांची वाचती कहाणी-पोथी । दान-उद्यापन करा म्हणती । नाहीतरि होईल अधोगति । धाक देती जनतेसि ॥४६॥
कांही उदरनिमित्तासाठी । पोथ्या वाचती उठाउठी । सोन्याचे करोनि ग्रंथ शेवटीं । अर्पा म्हणती देवासि ॥४७॥
लोकहि असती आसक्त बावरे । कांहीहि सांगोत सांगणारे । धावोनिया करिती बिचारे । व्रतसाधनें वेडयापरी ॥४८॥
फळ न लाभतां मग चिडती । म्हणती काय चाटावें ग्रंथाप्रति । रोज वाचावे ग्रंथ किती । तरीहि पुत्र होईना ॥४९॥
पतिपत्नी आरोग्याने वागेना । नवस करिती दगडोबासि नाना । काय होईल बापहो ! सांगाना । ऐशा रीतीं ? ॥५०॥
घाला उंबरीस प्रदक्षिणा । परि सुधारूं नका आचरणा । भोजना करा जडान्न पुन्हा । रोगी व्हाया वेळ कैचा ? ॥५१॥
कलकत्त्याच्या गाडींत बसावें । आणि म्हणे ’ देवा ! पंढरीसि न्यावें ’ । ऐशा प्रार्थनेसि फळ यावें । कोण्या प्रकारें ? ॥५२॥
एकाने चोरी केली ग्रामाप्रति । म्हणती त्यास आली साडेसाती । ती जावया वाची शनीची पोथी । चोरी कांही सोडीना ॥५३॥
शेवटीं पोलिसाहातीं सापडला । गुन्हा त्याचा साक्षींत आला । तो पुसतो आपुल्या गुरुला । ’ साधन सांगा सुटण्याचें ’ ॥५४॥
गुरुहि होता लाचलुचपती । म्हणे वाच शनीदेवाची पोथी । शिवलीलामृताचा अध्याय चित्तीं । सदभावने आठवी ॥५५॥
लावी देवीचें पुराण । करी नेटाने सत्यनारायण । आम्हांसि देई सुवर्णदान । मुक्त होशील लवकरचि तूं ॥५६॥
त्याने तैसेंचि सर्व केलें । ग्रंथ साधन करोनि वाचले । बुवाब्राह्मणा धन उधळलें । दंड कांही चुकेना ॥५७॥
शेवटीं पडला कैदेमाजीं । म्हणे दाखवा तो गुरु पाजी । त्याने केली फजीती माझी । धन तेंहि गमावलें ॥५८॥
वाचली नेमधर्माने पोथी । परि जेल न चुके मजप्रति । काय करावी देवपूजा ती ? ग्रंथ जाळावे अग्नीवरि ? ॥५९॥
बिचारा चोरी करणें सोडीना । पण गुरुसि मागे साधना । काय करिती गुरु, ग्रंथ नाना ?  वाचणारा लबाड हा ॥६०॥
ऐसें जन्मभरि साधन केलें । तरी मूर्ख ते मूर्खचि राहिले । याने सांगणारांचेंहि पतन झालें । फिकें पडलें साधन त्यांचें ॥६१॥
ऐसें कासयासि करावें । सत्य तेंचि शोधूनि आचरावें । आपण बुडावें दुसर्‍या नर्कीं न्यावें । ऐसें न करावें स्वार्थभरें ॥६२॥
सांगणाराने तर्कशुध्द सांगावें । करणाराने सत्यचि करावें । तेव्हाचि फळ अनुभवास यावें । होतें ऐसें ॥६३॥
हीच मुख्य घेवोनि धारणा । झाली ग्रामगीतेची रचना । हा ग्रंथ पुरवी सर्व कामना । कैसा तें ऐका ॥६४॥
हा आहे प्रखर शब्दबाण । जाय वाचकाचें हृदय भेदून । जैसी मूर्ति घडे टाकी लागून । तैसें वाचनबोधें होतसे ॥६५॥
ग्रामगीता नव्हे पारयणासि । वाचतां वाट दावी जनासि । समूळ बदली जीवनासि । मनीं घेतां अर्थ तिचा ॥६६॥
ही नव्हे फुलें टाकण्यासाठी । ही ग्रामाची उध्दारदृष्टि । आजच्या युगाची संजीवनी बुटी । मानतों आम्ही ग्रामगीता ॥६७॥
कोणी दु:खाने होरपळला । कोणी संसारतापें तापला । कोणी असहाय्यपणें संकटीं पडला । त्यासि धीरे दे ग्रामगीता ॥६८॥
कोणी अन्यायें लोकां त्रासावी । त्यासि ग्रामगीता मार्गीं लावी । देवत्व सर्वांचें जागवी । दिव्य व्हाया जग सारें ॥६९॥
याने संस्कार बनतील उत्तम । मनुष्य होई चारित्र्यक्षम । सुखशांति लाभेल करितां उद्यम । सांगितले जे या ग्रंथीं ॥७०॥
अल्पबुध्दि जाईल विलया । वाचतां ज्ञान होईल तया । खरा धर्म अंगीं ये सखया ! जीवन उज्ज्वल होतांचि ॥७१॥
प्रेम आजवरि होतें एकटें । ग्रंथ-चिंतनें वाढेल चोखटें । सर्वांभूतीं दयाभाव प्रकटे । ऐसी फलश्रृति ग्रंथाची ॥७२॥
द्वेषबुध्दीचें अज्ञान । ग्रंथ वाचतां जाईल पळोन । सत्कार्य कराया धावे मन । करितां अनुष्ठान सक्रिय ॥७३॥
ग्रामगीता वाचूनि करी चिंतन । त्यास होईल आत्मज्ञान । दिव्यदृष्टीची संत-खूण । कळे त्यासि आचरतां ॥७४॥
ग्रामगीता ग्रंथ वाचला । तैसाचि गांवीं वर्तूं लागला । त्यासि शत्रुचि नाही उरला । ग्राममाजीं कोणीहि ॥७५॥
सामुदायिक वाढली वृत्ति । सारें गांव त्याची संपत्ति । ग्रामगीता घडवी मूर्ति । ऐशा आदर्श मानवाची ॥७६॥
ग्रामगीतेंतील उद्योगचिंतन । जो कोनी करील मन लावून । त्याचे घरीं धनधान्य । भरपूर येईल समजावें ॥७७॥
आरोग्याचा वाचील धडा । आणि घेईल हातीं फडा । रोगराईचा होईल निवाडा । तत्क्षणीं त्याच्या ॥७८॥
कार्यास लागतां तत्क्षणीं । फलश्रुतीसि आरंभ होय झणीं । चरित्र सुधरे ग्रंथ ऐकोनि । लक्षांत घेतां अर्थ त्याचा ॥७९॥
एकांतीं बैसोनि वाचली गीता । अर्थ समजोनि मनन करितां । जीवनीं उतरे आदर्शता । घरादारांसहितहि ॥८०॥
ऐसें घर आदर्श झालें । कीर्ति-स्फूर्तीने गांवीं चमकलें । मग लोक सारे तैसेचि वर्तले । दिसती जनीं ॥८१॥
हा केवढा लाभ झाला ! सर्व लोकांना स्वर्ग जणू लाभला ! आपुला गांव आदर्श केला । ग्रामगीता वाचूनिया ॥८२॥
ग्रामगीतेचें फळ नव्हे एकटयासि । एकासहित आहे ग्रामासि । उध्दरतील गांववासी । वाचूनि वर्ततां ग्रामगीता ॥८३॥
एक एक साधन वाचतां । आणि मग तैसेंचि वर्ततां । केवढे लाभ येतील हातां । सांगतां नये ॥८४॥
ग्रामगीतेंतील संस्कार-रचना । उपासनेची तत्त्वयोजना । ग्राम-रक्षण ग्राम-सुधारणा । ग्राम-रचना आदर्श ॥८५॥
नाना कलांची उन्नति । शेती-सुधारणा श्रम-संपत्ति । समजूनि येतां विद्या-महती । विकास होई जीवनाचा ॥८६॥
सामुदायिक प्रार्थनेची प्रथा । रामधून, संत-उत्सव व्यवस्था । साधनसंपदा ऐकतां वर्ततां । शांति लाभे सर्वांसि ॥८७॥
गायीगुरांची वाचतां सेवा । करितां तैसेंचि आपुल्या गांवा । दहीदुधाचा दुष्काळ पहावा । न लागे कधी ॥८८॥
विवाहादि सर्व संस्कार । समाजीं होतील सुखकर । मागासल्यांची सुधारणा उध्दार । करील राष्ट्राचा ॥८९॥
स्त्रिया-मुलें होतील आदर्श पूर्ण । हा ग्रंथ घरीं होतां पठन । ग्राम होईल वैकुंठभुवन । वाचतां वर्ततां ग्रामगीता ॥९०॥
भिकारी बेकारी गांवीं राहीना । सत्तेचीं बंधनें नुरतील कोणा । सर्वचि शिकतील शहाणपणा । ग्रामगीता वाचूनिया ॥९१॥
आरोग्यसंपन्न होतील जन । नाही गांवीं तंटाभांडण । अन्याय, व्यसनें, कारस्थान । जातील लया द्वेषादि ॥९२॥
गांवीं वाढेल संघटना । बळ लाभेल सकळांच्या मना । नांदेल विश्वकुटुंबाची रचना । आपुल्या गांवीं ॥९३॥
ग्राम नांदेल स्वर्गापरी । सुखी होतील नरनारी । परमार्थाच्या खुलतील घरोघरीं । आनंद-लहरा ॥९४॥
जी जी इच्छा कराल मनीं । ती ग्रामदेवता देईल पुरवूनि । यांत संदेहचि नाही माझिया मनीं । उरला श्रोतेवक्तेहो ! ॥९५॥
येथे नाही अंधश्रध्दा । प्रत्यक्ष अनुभव मिळे सर्वदा । जे जे शब्द निघती ते गोविंदा । प्रिय समजावे निश्चयेंसि ॥९६॥
मी पंडित नोहे आपुल्या ठायीं । सांगावया पंडिताई । ईश्वराचीच प्रेरणा ही । प्रकट झाली ग्रंथाद्वारें ॥९७॥
माझिया बालरूप वृत्तींतूनि । स्फुरला तो गुरुदेव चक्रपाणी । चंद्रभागेतिरीं उमटली वाणी । केली ऐकोनि लिपिबध्द ॥९८॥
जैसे जडजीवाने वेद बोलावे । पंगूने हिमगिरीस ओलांडावें । तैसेंचि दासाकडोनि घ्यावें । गीताकथन मानतों मी ॥९९॥
म्हणोनि पुन:पुन्हा प्रार्थितो । माझा आवाज नव्हे सत्य तो । या शरीराचा शंख वाजवितो । ध्वनि काढतो भगवंत ॥१००॥
भगवदगीतेचें हें सक्रिय रूप । प्रकट झालें आपोआप । अर्जुनासम व्हावे महाप्रताप । सर्व ग्रामीन म्हणोनि ॥१०१॥
गीता बोधिली अर्जुनाला । ग्रामगीता ही सर्व ग्रामाला । राहूं नये कोणी मागासला । म्हणोनि बोलला देव माझा ॥१०२॥
मी तों केवळ बालकापरी । संतांचे आशीर्वाद घेतले शिरीं । म्हणोनिच प्रकटली धीट वैखरी । देहबासरीमधूनिया ॥१०३॥
श्री ज्ञानराज गुरुमाउली । त्यांच्या कृपादृष्टीची साउली । परंपरेने फळासि आली । ग्रामगीतास्वरूपाने ॥१०४॥
ग्रामगीतेंत ज्यांचीं नांवें, चित्रण । त्या सर्व संतांचेंचि सहवरदान । ऐसें मी मानतों विश्वासें पूर्ण । फळेल निधान ग्रामगीता ॥१०५॥
ग्रामगीता माझें हृदय । त्यांत बसले सदगुरुराय । बोध त्यांचा प्रकाशमय । दिपवोनि सोडील ग्रामासि ॥१०६॥
शब्दरचना गावंढळ । हें मी समजतों मनीं प्रांजळ । दोष तो तो माझा सकळ । गुण तो तो थोरांचा ॥१०७॥
वालुकापात्रीं गंगाजळ । तें पापनाशक मधुर निर्मळ । तैसें वाचक श्रोते केवळ । शुध्द घेवोत समजोनि ॥१०८॥
आमचें गांवचि मागासलें । तेथे जाड शब्द जरि योजिले । ग्रामीण म्हणतील नाही कळलें । सांगा अर्थ पंडितहो ! ॥१०९॥
घरोघरीं पंडित कुठले ? आहेत तेहि विकृत झाले । पोटापाण्यासि लागले । नोकरी धरिली धनिकांची ॥११०॥
जे जे कोणी उरले उत्तम । त्यांनाहि कांही रूढिभ्रम । ते म्हणतील हा उपक्रम । वेदबाह्य अधार्मिक ॥१११॥
क्वचित असती विद्वदरत्न । सर्वचि याती-यातींमधून । त्यांना आहे हा ग्रंथ प्रमाण । मानतों मी अंत:करणें ॥११२॥
ऐसियांसीच पंडित मानावें । जे असतील सात्विक संत स्वभावें । त्यांचे पिसाट शब्दचि ऐकावे । सुधारिती जे ग्रामासि ॥११३॥
धुंडाळूं नयेत पंडित कोणी । वाचक निवडावा गांवांतूनि । आचारशील सात्विक इमानी । सुबुध्द प्रेमळ कार्यकर्ता ॥११४॥
जो ग्रंथहि प्रेमें वाचतो । नांगर धराया शेतींतहि जातो । वेळ पडल्या सेवा करितो । गांवलोकांची पाहिजे ती ॥११५॥
ऐसा असेल कोण्याहि जातीचा । अथवा धर्म, पंथ, देश-विदेशींचा । तरी तो चालेल, ग्रामोन्नतीचा । जिव्हाळा जया ॥११६॥
पंडितांनी वाचूं नये । ऐसें माझें म्हणणें नोहे । परि काम न अडावें त्याशिवाय । नको निष्क्रिय वाद कोणी ॥११७॥
पंडित पुराणिक विद्वान । यांनीहि अवश्य करावें वाचन । समाजाचे जबाबदार म्हणोन । यथार्थ ज्ञान द्यावें सर्वां ॥११८॥
ग्रामीं विचारी शिक्षकजन । त्यांनी वाचावी ग्रामगीता पूर्ण । सकळांस द्यावी समजावोन । लहान-थोरां जमवोनि ॥११९॥
जमवोनि श्रोते वृध्द-तरुण-बाल । मुली-तरुणी-माता सकल । मागासल्यांसहि लावावी चाल । उन्नतीची हळूहळू ॥१२०॥
जे जे नारीनर साक्षर असती । त्यांना माझी नम्र विनंति । वाचा ग्रामगीता, अर्थसंगति । समजावोनि द्या निरक्षरां ॥१२१॥
जो समजोनि हा ग्रंथ न वाचे । ग्राम मागासावें असें मत ज्याचें । तो मार्ग धरील अधोगतीचे । पाप न चुके तयालागी ॥१२२॥
पाप म्हणजे बिघाड करणें । पाप म्हणजे कुमार्ग धरणें । पाप म्हणजे बळीच राहणें । गरीब प्राण्यां पिळोनि ॥१२३॥
ऐसें नसावें वाचकाचें । जें ज्ञान मिळेल ग्रामगीतेचें । तैसेंचि वर्ततां वर्तवितां पुढचे । दोष जळती बाधक जे ॥१२४॥
ग्रामगीता ग्रंथ वाचोन । कोणी घेऊं नयेत पैसे आपण । ग्रामासीच लाभाया महत्त्व पूर्ण । धन वेचावें वक्त्याने ॥१२५॥
ग्रामगीता ग्रंथ सुंदर । निर्मावया गांवाचें चारित्र्य । प्रचार करावा सर्वत्र । होऊनि पवित्र आपणहि ॥१२६॥
जे कोणी माझे स्नेही प्रेमळ । त्यांनी करावा ग्रंथाचा सुकाळ । घरोघरीं चालवावा प्रचार । निर्मळ । ग्रामगीता-वाचनाचा ॥१२७॥
ग्रामांत खेळावी ग्रामगीता । सर्वांस पाठ असावीं सूत्रें तत्त्वता । प्रमाण द्यावें कोणाचें चुकतां । सर्व आपुले म्हणोनिया ॥१२८॥
ज्याचे हातीं हा ग्रंथ पडला । अचानक मधूनि उघडला । वाचतांचि समजावा उपदेश केला । ग्रामदेवतेने मजलागी ॥१२९॥
मग तयाचा न घडो अपमान । विचार करावा तारतम्य जाणून । कळत नसतां घ्यावी पटवोन । ओवी जाणत्यापासूनि ॥१३०॥
उत्तम उपदेश हातीं लाभला । समजावा शुभदिन आज उदेला । तैसेंचि वर्तावें समजोनि बोला । ग्रामगीतेचिया ॥१३१॥
प्रथम ऐकावें हें गीतावचन । आचरणासि दृढ करावें मन । मग संकल्पावें कार्याचें साधन । ग्राम स्वर्ग करावया ॥१३२॥
प्रथम श्रध्देने वाचन करावें । अर्थ सर्व लक्षांत घ्यावे । उठतां बसतां कार्यास लागावें । ग्रामाच्या आपुल्या ॥१३३॥
यांतचि माझें समाधान । सुधारेल । ग्रामाचें जीवन । पाखंड जाईल वितळोन । मतलबियांचें ॥१३४॥
संपोनि जातील भेदवाद । नांदेल गांवीं प्रेम शुध्द । लाभेल आनंदी आनंद । सर्व जना सर्वभावें ॥१३५॥
मानवांतील असुरत्व, पशुत्व । संपोनि उजळेल देवत्व । जीवनीं संचरेल शुध्द तत्त्व । निरूढ ऐसें सर्वांच्या ॥१३६॥
निसर्ग साह्य दे वेळच्या वेळीं । वृक्षवेली बहरती फुलींफळीं । जलपूर्ण होतील नद्यातळीं । आपुली मर्यादा न सोडतां ॥१३७॥
आरोग्य होईल सर्वांचें भूषण । लोपेल दारिद्रय, उणीव, अज्ञान । कोणीच न राहतील हीनदीन । खळदुर्जन कोठेहि ॥१३८॥
समानतेची समाजरचना । शांति देईल जीवजना । प्रगतीची नवी नवी प्रेरणा । करील भुवना उन्नत ॥१३९॥
शोषण अथवा शासन । यांचें गळोनि पडेल बंधन । नाही शत्रूंचें आक्रमण । स्वयंपूर्ण गांव होता ॥१४०॥
दास होतील त्रिविध ताप । नुरेल वैताग वैर पाप । गांव झालिया स्वर्गरूप । शांति लाभेल विश्वासि ॥१४१॥
स्वर्गींचे अमर हेंचि इच्छिती । हेंचि संतऋषींच्या चित्तीं । ऐसिया गांवीं लाभतां वस्ती । कासया जाती वनांतरां ? ॥१४२॥
सांडोनिया आत्मस्थितिभाव । संतसज्जनांचे समुदाव । ऐसिया गांवा देतील वैभव । आपुल्या जीवन्मुक्तीचें ॥१४३॥
त्यांच्या बोधें धर्मनीति । त्यांच्या सहवासें सेवाभक्ति । त्यांच्या प्रभावें शांति, शक्ति । राहील जागती सर्वकाळ ॥१४४॥
ऐसी ग्रामगीतेची फलश्रुति । ज्यांत संतविभूतींची संकल्पपूर्ति । देवचि गेला बोलूनि चित्तीं । वरदवाणी सज्जन हो ! ॥१४५॥
उभा विश्वाचिया विटेवर । सदगुरु विठ्ठल सर्वेश्वर । त्याच्या कृपेचाचि विस्तार । तुकडया म्हणे ग्रामगीता ॥१४६॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । लाभ घेवोत नित्य ग्रामस्थ । म्हणोनि अर्पिला विश्वरूपा ॥१४७॥

॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥


कृषी क्रांती 

ग्रामगीता अध्याय एकेचाळीसावा ग्रामगीता अध्याय एकेचाळीसावा ग्रामगीता अध्याय एकेचाळीसावा ग्रामगीता अध्याय एकेचाळीसावा ग्रामगीता अध्याय एकेचाळीसावा ग्रामगीता अध्याय एकेचाळीसावा ग्रामगीता अध्याय एकेचाळीसावा

अभंग । abhang ।

ref:transliteral 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *