ग्रामगीता अध्याय

ग्रामगीता अध्याय तेहतिसावा

ग्रामगीता अध्याय तेहतिसावा

॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥

श्रोतियांनी केला प्रश्न । संतसंगें मिळे संतपण । ऐसें झालें निरूपण । हें तों जीवा पटेना ॥१॥
संत देवाचे अवतार । आम्ही गांवचे गवार । कैसें त्यांच्या बरोबर । व्हावें आम्ही ? अशक्य हें ! ॥२॥
याचें ऐका समाधान । जग झालें ईश्वरापासोन । नर तोचि नारायण । दाविली खूण संतांनी ॥३॥
जन्मासि आला तोचि अवतार । अवतार सर्वचि प्राणिमात्र । त्या अवताराचे अनंत प्रकार । प्रकट होती सत्कर्मे ॥४॥
कोणी आपुलें पोटचि भरी । कोणी कुटुंबाचें पोषण करी । कोणी गांवाची काळजी निवारी । आपुल्यापरीने ॥५॥
कोणी होती प्रांतव्यापी । प्रांताकरितां कष्टी-तपी । जनाकरितां वाट सोपी । करोनि द्याया हौसेने ॥६॥
हे अवतार साधारण । यापुढे विशेष अवताराचें लक्षण । जो मिरवी देशाचें भूषण । शरीरीं स्वयें ॥७॥
” माझा देशचि माझें घर । देश दु:खी जणुं माझेंचि शरीर । त्यासाठी मी निरतर । कष्टी होईन सांभाळाया ” ॥८॥
ऐसें ज्याने मनीं धरिलें । किंबहुना कार्यें अनुभवा आलें । अनेक आपत्तींनी उजळलें । सत्कार्य ज्याचें ॥९॥
त्यासि म्हणावा अवतार । जो करी सज्जन-चिंता निरंतर । दुष्ट बुध्दीचा तरस्कार । सदा जयासि सक्रिय ॥१०॥
जगाचें उद्दिष्ट आहे सत्य । तिकडे जग करावें प्रवृत्त । ऐसें ज्याचें ज्याचें कृत्य । तोचि अवतार निश्चयें ॥११॥
षडगुण ऐश्वर्याच्या प्रमाणांत । अंश, पूर्ण आदि प्रकार त्यांत । ज्ञानी कर्तबगार निरासक्त । उदार श्री-यशसंपन्न ॥१२॥
या अवताराचे पंथ दोन । एक हृदयपरिवर्तन दुसरा दमन । एका क्रांति करी सशस्त्र पूर्ण । दुसरा भावभक्तीने वळवी ॥१३॥
धर्मनीति सेवामार्गे गवसिली । त्यासि संत-अवतार संज्ञा लाभली । सामदामदंडभेदाने क्रांति केली । त्यासि म्हणती देवावतार ॥१४॥
देव-अवतार नित्य नसती । ते महाप्रसंगीं पुढे येती । संत-अवतार नेहमी चालती । लोकीं सुनीति वाढवाया ॥१५॥
कांही अवतारांची महिमा । विश्वव्यापक त्यांचा आत्मा । प्रकट करण्या मानवतेची सीमा । प्रचार त्यांचा ॥१६॥
ज्यांचा जैसा अधिकार । त्यांचा चाले तैसा व्यवहार । मार्ग एकचि परि मागे-समोर । पाय अनुभवें पडताति ॥१७॥
कोणी भक्ति शिकवोनि सुधारी । मंत्र शिकवोनि जनता तारी । कोणी ज्ञानमार्ग सांगोनि समर्थ करी । मानवता लोकीं ॥१८॥
अखेर मानवांची उन्नति करणें । तयां राष्ट्रधर्म निजधर्म शिकविणें । हेंचि संतांचें असतें लेणें । सर्वतोपरी ॥१९॥
वाउगा संकल्पचि नाही उठला । स्फुरला तो अनुभवचि ठरला । त्या दिव्यदृष्टीच्या पुरुषाला । संत-अवतार म्हणों आम्हीं ॥२०॥
कोणी कुटुंबासि त्रस्त करी । कोणी गांवाचे होती वैरी । कोणी देशांत उपद्रव करी । पाखांडपंथीं ॥२१॥
जो देशद्रोही धर्मद्रोही ठरला । प्रेमाने सांगतां न समजला । सर्व प्राण्यांना त्रास झाला । ज्याच्या योगें ॥२२॥
कांही केल्या न सुधारें । शिरलें क्रूरवृत्तींचें वारें । सज्जनांचें मनहि थरारे । ज्याच्या धाकें ॥२३॥
त्याची झाली परिसीमा । तेव्हा देवावतार येतो कामा । पाठवावयासि विरामा । देहा त्याच्या निरुपायें ॥२४॥
ते दुर्जन राक्षस-अवतार । जे जनतेसि दु:ख देती फार । त्यांना दंड द्याया देव-अवतार । प्रकट होती ॥२५॥
ऐसें हें नेहमीच चालतें । जैसें जन्ममरण-रहाट फिरतें । तैसेचि संत-देव येताति ते । भूमीवरि ॥२६॥
राक्षसी आणि देववृत्ति । रूपांतरें खेळते जगतीं । संतदेव स्थापूं पाहती । शांति प्रेमशक्तीने ॥२७॥
येथे श्रोत्यांनी प्रश्न केला । जरि दुष्ट तोचि राक्षस ठरला । तरि त्याने वरदहस्त कैसा मिळविला । दैवतांचा ? ॥२८॥
काय ठावे नव्हते त्याचे गुण ? कां दिले शक्तीचें वरदान ? आम्हां न कळे हें पुराण । कैसें आहे सांगा की ॥२९॥
याचें ऐकावें उत्तर । हा राक्षसहि आधी भक्त फार । त्याच्या तपानेचि देवता निरंतर । प्रसन्न त्यासि ॥३०॥
त्याचिया गुणकर्मे मिळालें वरदान । तें सहन न झालें मागाहून । त्याचा दुरुपयोग दारुण । केला त्याने मनमाने ॥३१॥
प्रथम हाती आली सत्ता । मग भुलला तो भगवंता । लागला उपभोगाच्या पंथा । नीतिप्रवृत्ति सोडोनि ॥३२॥
त्याची राखती संत मर्जी । तंव तो अधिकचि चढे समाजीं । जनतेमनीं वाढतांहि नाराजी । पर्वा न करी अहंकारें ॥३३॥
भरावया पापांचा रांजण । त्यासि देती प्रोत्साहन । जेणें त्वरित होय निकाल पूर्ण । पंख फुतलिया उधळीपरी ॥३४॥
कितीहि साधुसंत समजाविती । परि न वळे त्याची मति । म्हणोनि देवावताराहातीं । कार्य आलें तयाचें ॥३५॥
देव-अवतार समजाविती । नाना योजना करूनि पाहती । शेवटीं शस्त्र धारण करिती । दुष्टासाठी ॥३६॥
त्याच्या मोक्षाने सुटती जन । मुक्त होती दु:खापासून । म्हणोनि करावा लागे प्रयत्न । अवतारासि निर्वाणींचा ॥३७॥
ऐसें ज्याने ज्याने केलें । दु:ख जगाचें निवारिलें । ते सर्व अवतारचि ठरले । पुराणें झालीं तयांचीं ॥३८॥
तैसें कोणी करी अजून । त्यांचीं गुणकर्मे पाहून । पूर्वीच्या थोरांचे अवतार जन । मानिती तयां ॥३९॥
तुलसीदास आधी आसक्त । ते वैराग्यें झाले महाभक्त । रामकथा गावोनि तारिलें जगत । म्हणोनि वाल्मीकि-अवतार ॥४०॥
कोणी भिन्न देवां अवतार मानिती । हेहि आहे आपुलीच भक्ति । पुढे पुढे कळेल तयांप्रति । पायर्‍या अवतार-कार्याच्या ॥४१॥
कोणा म्हसोबा खंडोबा मान्य । कोणी शक्तिअवताराचें करी पूजन । कोणी अवतार राम-कृष्ण । म्हणती महाविष्णूचे ॥४२॥
कोणी दश अवतार मानिती । कोणी गुरुनानक-परंपरा वानिती । कोणी तीर्थकरचि अवतार म्हणती । कोणी गणती चोवीस ॥४३॥
कोणी बुध्द-अवतार पूजती । कोणी दत-अवतारा भजती । कोणी येशु ईशपुत्रावतार समजती । जगतीं झाला ॥४४॥
कोणी म्हणे महंमद प्रेषित-अवतार । कोणी म्हणे संत अंशावतार । लोक मानिती अनंत प्रकर । किती सांगों ? ॥४५॥
याचें एकचि कारण । जो जो उन्नतीसि लागला न्यूनपूर्ण । तोचि अवतार मानिला वेगळा समजोन । सज्जनांनी ॥४६॥
कोणी ब्राह्मा-विष्णु-हर । यांसि मानिती खरे अवतार । कोणी म्हणती देवचि भूमीवर । कधी नाही प्रकट झाला ॥४७॥
देव आहे आत्मशक्ति । तो देह धारण न करी कल्पान्तीं । त्यासि जाणणें यांतचि उन्नति । मानवाची ॥४८॥
ऐसीं भिन्न लोकांचीं भिन्न मतें । सत्य सर्वांतचि उणेंपुरें तें । परि संगति कैसी लावावी यातें । विसरोनि गेले ॥४९॥
जे जे पुरुष थोर झाले । त्यांसि अवतारचि संबोधिलें । ज्यांचें ज्यांना चारित्र्य पटलें । त्यांनी मानलें त्यांलागी ॥५०॥
जुने ते सोनें विशेष ठरले । येथे कोणाचेंचि नाही चुकलें । परि ज्यांनी सत्य अनुभवलें । तेचि पावले देव-पदा ॥५१॥
कोणी म्हणती देवता अयोनिसंभव । अवतार करी चमत्कारचि सर्व । हें  म्हणणें आहे अर्थगौरव । भाविकपणाचा ॥५२॥
गर्भ, नर्क, वैकुंठपुरी । यांचें महत्त्व काय देवाअंतरीं ? हें पाहोनि भांति-मोह धरी । तरि तो देव कैसेनि ? ॥५३॥
देवास वैकुंठ गर्भ सारिखे । येणें-जाणें स्वाभाविकें । सुखदु:खें एकाचि कौतुकें । राहती तयापुढे ॥५४॥
योनीद्वारें जरी प्रकटला । तरी दु:ख न वाटे त्याच्या हृदयाला । म्हणोनीच तो अयोनिसंभव मानिला । ज्ञानियांनी ॥५५॥
एरव्ही जन्ममरण सकला सारिखें । सहनशक्ति अधिकारभेद राखे । जैसें जयाचें स्थानमान देखे । तैसें निकें नाम तया ॥५६॥
सर्व अवतार मानवीच असती । परि अधिकाराऐसें कार्य करिती । त्यांची धारणा जीवन्मुक्ति । तैसीच असते सर्वदा ॥५७॥
अनेक जन्मांची संस्कार-संगति । घेवोनि येताति सांगातीं । उध्दराया जड जीवांप्रति । मार्ग दाविती अवतार ॥५८॥
परि मानवीच कार्य करणें । मानवी मार्गानेचि येणें-जाणें । मानवांच्या भूषणापरी मिरविणें । अवताराचें ॥५९॥
मानवें सर्व प्राणिमात्रा सुखवावें । सर्व कार्य सुरळीत चालवावें । एक असोनि अनंत व्हावें । उल्हास हाचि अंतरीं ॥६०॥
हें समजोनि जो वर्तला । तोचि अवतार शेवटीं ठरला । ज्याने पृथ्वीचा संबंध जोडला । एकसूत्रीं प्रयत्नें ॥६१॥
ज्यांनी सर्व विश्व सूत्रांत गोविलें । सन्मार्ग मानवमात्रा शिकविले । तेचि थोर अवतार झाले । पुढेहि होतील निश्चयें ॥६२॥
म्हणोनि अवतार हा उन्नतिवाद । अधिकार तैसा प्रकटे विशद । विश्वात्मभावें स्वयंपूर्ण सिध्द । अवतार आम्ही मानतों ॥६३॥
तोचि सर्वांसि एक करी । एक करोनि अनेकत्वीं वावरी । त्यासीच पावली पूर्णता खरी । विश्वात्म्याची ॥६४॥
एवढी विशाल ज्याची धारणा । एवढा कार्याचा व्याप जाणा । विश्वाचिया मतभेदांना । मिटवूं शके जो ॥६५॥
तोचि शेवटचा अवतार । महामानव विकासकेंद्र । आपण तयाचे अंश अंकुर । मानवधर्मी ॥६६॥
निश्चय व्हावा श्रोतियाजना । अवतार म्हणजे अतिमानव जाणा । मानवाची पूर्णता म्हणा । अवतारकार्य ॥६७॥
देवताची करावी उपासना । उपासकासीच ये अवतारपणा । ऐसाचि आहे अवताराचा बाणा । आजवरीचा ॥६८॥
यांत एकचि तारतम्य पहावें । मानवा कोणाचेनि सुख पावे । कोण समाजकार्य करी बरवें । जनमानस रंगवोनि ॥६९॥
तोचि समजावा महाभला । जो जनहितार्थी लागला । दैवी शक्तीचा सागर भरला । अंगीं ज्याच्या ॥७०॥
अवतारासि सामर्थ्य पाहिजे । आत्मबल प्रखर तयासि साजे । बोलिजे तैसेंचि कार्य कीजे । अवतार तो या जनीं ॥७१॥
ऐशा शांति-अवतारांची कीर्ति । मानवांसि संत सांगती । देव-अवतार प्रकट होती । क्रांति कराया देशामाजीं ॥७२॥
शांति-अवतार क्रांति-अवतार । या दोघांचें कार्य भिन्न सर्वत्र । एक करी सदबोध मात्र । एक करी निर्णय ॥७३॥
दोघांचीहि असे जरूरी । म्हणोनि ही योजना मानिली चतुरीं । आपणहि व्हावें अवतारी । त्यांचिया ऐसें निर्धारें ॥७४॥
नाहीतरि अरत्र ना परत्र । हेंहि म्हणतां ये अवतार-वैचित्र्य । परंतु अवतार तो अवतारकार्य । करावयासि ॥७५॥
मानवधर्मासि उजळोन । दुष्कृतिनाशा सज्जनरक्षण । करणें हेंचि अवतारलक्षण । सर्वमान्य सेवात्मक ॥७६॥
ज्यांनी जगाची सेवा केली । त्यांसीच अवतार पदवी लाभली । त्यावांचूनि अवतार बोली । ही तों आपुल्या भावनेची ॥७७॥
सेवेएवढें महत्त्व नाही । ज्ञान ध्यान वैराग्यासहि । ह्या सर्व साधनीं सफलता ही । सेवेनेचि होतसे ॥७८॥
देव-देवता जगीं आली । जपतपें करूं लागली । परि पूर्णता नाही झाली । सेवा नाही तोंवरि ॥७९॥
जेव्हा सेवाकार्य प्रकट केलें । अनंत जीव संतुष्ट झाले । तेव्हाचि अवतार तयां मानिलें । भूलोकीं या ॥८०॥
रामचंद्रें राज्य त्यागिलें । रावणा संहारूनि सज्जन रक्षिले । म्हणोनीच अवतार ठरले । सर्वतोमुखीं ॥८१॥
श्रीकृष्णें कंस मर्दिला । दुर्योधनाचा नाश घडविला । सुख देवोनि गोरगरीबांला । मगचि ठरला अवतार तो ॥८२॥
ऐसें सेवाकार्य केलें ज्याने । त्यासीच जन अवतार म्हणे । त्या कार्यलीला आठवती जीवेंप्राणें । सर्वतोपरी ॥८३॥
आठवती तेहि अवतार होती । तैसी करितां सेवाकृति । परि कोरडी सहानुभूति । ही तों नव्हें उध्दारक ॥८४॥
ज्यांनी सेवाकार्यासि जीवन दिलें । स्वानंदीं बुडोनि जगा तारिलें । तेचि संत आणि अवतार झाले । कर्तव्यशील मानव ॥८५॥
साधुसंतें सेवा केली । अनंत हृदयें संतोषविलीं । व्यवहार-उपासनेने दाविली । सिडी मोक्षमार्गाची ॥८६॥
साधुसंतें सेवा केली । जीवासि ब्रह्मप्राप्तीची ओळख दिली । तैसी सेवा पाहिजे घडली । आपणांसीहि ॥८७॥
एक संत जन्मास आला । त्याने प्रांताचा प्रांत कीर्तीने व्यापला । परि काम जनसुधारणेला । अपुरा पडला व्याप त्याचा ? ॥८८॥
याचें कारण आम्ही लोक । संदेश ऐकतांना डोळेझांक । नमस्कार करायाचें कौतुक । आमुच्यापाशी ॥८९॥
लोक करिती त्यांचा उत्सव । गाती मनोभावें गौरव । परन्तु तैसा सेवाभाव । अंगीं न आणिती आपुल्या ॥९०॥
देव घेतील अवतार । म्हणोनि वाट पाहती उतराया भार । हा दुबळेपणाचा विचार । शिरला थोर या लोकीं ॥९१॥
अरे ! हें सर्व आता विसरावें । संतीं सांगितलें तेंचि करावें । मानवाने मानवां सुधारावें । याहूनि पुण्य कोणतें ? ॥९२॥
हें पवित्र अवतारकार्य । आपणचि होऊनिया निर्भय । कां न करावें टाकोनि पाय ? लाभेल जय निश्चयाने ॥९३॥
कोणी रोगराईने मरे । त्यास कोण पुसतो सांगा बरें ? परि सेवा करितां प्राण अंतरे । लोक श्रध्दाभरें कीर्ति गाती ॥९४॥
म्हणोनि बोललों सेवक बना । ओळखा मानव म्हणोनि आपणा । घेवोनि अवतार-तत्त्वाचय खुणा । उजळा भुवना कीर्तीने ॥९५॥
नका अज्ञानामाजी दडूं । नका बायकापोरांसाठी रडूं । नका स्वार्थासाठी अडूं । निघा मानवसेवा साधाया ॥९६॥
जो आपुल्या स्वार्थासि मुकला । विश्वस्वार्थ मानितो आपुला । तोचि अवतारकार्यी लागला । मानतों आम्ही ॥९७॥
यासाठी करा आपुली उन्नति । सेवा देवोनि गांवाप्रति । गांवापासोनि विश्वाप्रति । पोहचोनि जावें ॥९८॥
आपली समज वाढवावी । पैस तेवढीं कामें करावीं । म्हणजे लाभेल अवतारपदवी । क्रमाने आपणा ॥९९॥
सेवेंतचि आहे देवभक्ति । कार्य करण्यांतचि राष्ट्रशक्ति । यानेच मिळे शेवटीं मुक्ति । अवतारदीप्ति अंगीं येई ॥१००॥
कोणालाहि न वाटावें अवघड । कैसें अवतारकार्य प्रचंड । पावतां नये ऐसें उदंड । नाहीच कांही ग्रामजनहो ! ॥१०१॥
तैसें भयचि वगळावें । म्हणोनि बोलिलों साध्या भावें । तुकडया म्हणे समजोनि घ्यावें । तारतम्याने मर्म याचें ॥१०२॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । कथिला अवतारकार्याचा पथ । तेहतिसावा अध्याय संपूर्ण ॥१०३॥

॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥


कृषी क्रांती 

ग्रामगीता अध्याय तेहतिसावा ग्रामगीता अध्याय तेहतिसावा ग्रामगीता अध्याय तेहतिसावा ग्रामगीता अध्याय तेहतिसावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *