छत्रपती शिवाजी महाराज पोवाडे

छत्रपती शिवाजी महाराज पोवाडे

शिवाजी महाराज
इतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.


शिवाजी महाराजांचा पोवाडा

चौक १
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥ध्रु०॥
लंगोटयांस देई जानवीं पोषींदा कूणब्याचा । काल तो असे यवनांचा ॥
शिवाजीचा पिता शहाजी पुत्र मालोजीचा । असे तो डौल जहागिरीचा ॥
पंधराशें एकूणपन्नास साल फळलें । जुन्नर तें उदयासी आलें ॥
शिवनेरी किल्ल्यामध्यें बाळ शिवाजी जन्मलें । जिजीबाईस रत्‍न सांपडलें ॥
हातापायांचीं नखं बोटं शुभ्र प्याजी रंगीलें । ज्यांनीं कमळा लाजिवलें ॥
वरखालीं टिर्‍या पोटर्‍या गांठी गोळे बांधले । स्फटिकापरि भासले ॥
सान कटी सिंहापरी छाती मांस दुनावलें । नांव शिवाजी शोभलें ॥
राजहौंसी उंच मान माघें मांदे दोंदीलें । जसा का फणीवर डोले ॥
एकसारखे शुभ्र दंत चमकूं लागले । मोतीं लडीं गुंतविलें ॥
रक्तवर्ण नाजूक होटीं हासूं छपिवले । म्हणोन बोबडें बोले ॥
सरळ नीट नाक विशाळ डोळ्या शोभलें । विषादें मृग वनीं गेले ॥
नेत्र तीखे बाणी भवया कमठे ताणीले । ज्यांनी चंद्रा हाटिवलें ॥
सुंदर विशाळ भाळवटी जावळ लोंबलें । कुरळे केंस मोघीले ॥
आजानबाहू पायांपेक्षां हात लांबलेले । चिन्ह गादिचें दिसलें ॥
जडावाचीं कडीं तोडे सर्व अलंकार केले । धाकटया बाळा लेविवलें ॥
किनखाबी टंकोचें मोतीं घोसानें जडलें । कलाबतुचे गोंडे शोभले ॥
लहान कुंची पैरण बिरडी बंद लावले । डाग लाळीचे पडलेले ॥
हातापायांचे आंगठे चोखी मुखामधी रोळे । पायीं घुंगरुं खुळखुळे ॥
मारी पाठोपाठ लाथाबुक्या आकाश शोभले । खेळण्यावर डोळे फिरवीले ॥
मजवर हा कसा खेळणा नाहीं आवडले । चिन्ह पाळणीं दिसलें ॥
टाहीपेटे रडूं लागला सर्व घाबरले । पाळण्या हलवूं लागले ॥
धन्य जिजाबाई जिनें जो जो जो जो जो केलें । गातों गीत तिनें केलें ॥
चाल
जो जो जो जो जो जो गाऊ, जी जी जी जी जीजी गाऊं ।
चला वेरुळास जाऊं, दौलताबादा पाहूं ॥
मूळ बाबाजीस ध्याऊं, कीर्ति आनंदाने गाऊं ।
सरदारांत उमराऊ, सोबतीस जाधवराऊ ॥
पाटील होते गांवोगाऊ, पुत्रावरी अती जीऊ ।
थोर विठोजी नांव घेऊं, सान मालोजी त्याचा भाऊ ।
दीपाबाई त्यास देऊं, छंदाजोगा गिती गाऊं ॥
चाल
मालोजी राजा । तुझा बा आजा ॥
यवनी काजा । पाळिल्या फौजा ॥
लाविल्या ध्वजा । मारिल्या मौजा ॥
वेळेस मुक्का । साधल्या बुक्का ॥
विचारी पक्का । जाधवा धक्का ॥
शेशाप्पा नायका । ठेविचा पैका ।
द्रव्याची गर्दी । चांभारगोंदी ॥
देवळें बांधी । तळीं ती खांदी ॥
आगळी बुद्धि । गुणानें निधि ॥
लिहिलें विधि । लोकांस बोधी ॥
संधान साधी । जसा पारधी ॥
भविषी भला । कळलें त्याला ॥
सांगोनी गेला । गादी बा तुला ॥
चाल
उपाय नाहीं जाणोन चाकर झाला यवनाचा । शिपाई होता बाणीचा ॥
खोटया दैवा कोण खोडी बेत देवाजीचा । पवाडा गातो शिवाजीचा ॥
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥१॥
चौक २
वडील बंधु संभाजीनें लळे पुरवीले । धाकटयासवें खेळले ॥
उभयतांचें एक चित्त तालमींत गेले । फरीगदग्या शिकले ॥
आवडीनें खमठोकीं कुस्ती पेंचानें खेळे । पवित्रे दस्तीचे केले ॥
द्वादशवर्षी उमर आली नाहीं मन धालें । घोडी फिरवूं लागले ॥
आट्टल घोडेस्वार भाला बोथाटी शीकले । गोळी निशान साधले ॥
कन्या वीर जाधवाची जिनें भारथ लावलें । पुत्रा नीट ऐकविलें ॥
अल्पवयाचे असतां शिकार करुं लागले । माते कौतुक वाटलें ॥
नित्य पतीचा आठव डोंगर दुःखाचे झाले । घर सवतीनें घेतले ॥
छाती कोट करुन सर्व होतें साटिवलें । मुखमुद्रेनें फसविले ॥
चतुर शिवाजीनें आईचें दुःख ताडिले । पित्यास मनीं त्यागिले ॥
पुत्राचे डोळे फिरले माते भय पडलें । हीत उपदेशा योजिलें ॥
मनीं पतिभक्ति पुता बागेमधीं नेलें । वृक्षछायीं बसीवलें ॥
पूर्वजांचे स्मरण करुन त्यास न्याहाळीलें । नेत्रीं पाणी टपटपलें ॥
या क्षेत्राचे धनी कोणकोणी बुडविले । सांगतें मुळीं कसें झालें ॥
क्षेत्रवासी म्हणोन नांव क्षत्रिय धरलें । क्षेत्रीं सुखी राहिले ॥
अन्यदेशिचे दंगेखोर हिमालयीं आले । होते लपून राहिले ॥
पाठीं शत्रु भौती झाडी किती उपासी मेले । गोमासा भाजून धाले ॥
पाला फळें खात आखेर ताडपत्रा नेसले । झाडी उल्लंघून आले ॥
लेखणीचा धड शीपाया सैनापति केलें । मुख्य ब्रह्मा नेमलें ॥
बेफाम क्षत्रिय होते अचूक टोळ उतरले । कैदी सर्वांस केलें ॥
सर्व देशीं चाल त्याचें गुलाम बनीवले । डौलानें क्षुद्र म्हणाले ॥
मुख्य ब्रह्म राजा झाला जानें कायदे केले । त्याचे पुढें भेद केले ॥
ब्रह्मा मेल्यावर परशराम पुंड माजले । उरल्या क्षत्रिया पिडीले ॥
महारमांग झाले किती देशोधडी केले । ब्राह्मण चिरंजीव झाले ॥
देश निक्षत्रिय झाल्यामुळें यवना फावलें । सर्वांस त्यांहीं पिडीलें ॥
शुद्र म्हणती तुझ्या हृदयीं बाण टोचले । आज बोधाया फावलें ॥
गाणें गातें ऐक बाळा तुझ्या आजोळीं शिकले । बोलीं नाहीं मन धालें ।
चाल
क्षेत्र क्षत्रियांचें घर, तुझे पितृ माहावीर । सुखा नसे त्यांच्या पार,
आल्या गेल्याचें माहेर ॥ शीखराकार डोंगर, नानावल्ली तरुवर ॥
परीं खोरीं वाहे नीर खळखळे निरंतर । झाडा फुलें झाला भार,
सुगंधी वाहे लहर । पक्षी गाती सोळा स्वर, मंजूळ वाणी मनोहर ॥
नदी नाले सरोवर, शोभे कमळांचा भार । भूमी अती काळसर,
क्षेत्र देई पीका फार ॥ धाव घेती दंगेखोर, दिला क्षेत्रियास मार ।
दास केले निरंतर, ब्रह्मा झाला मनीं गार ॥ लोभी मेले येथें फार, विधवा झाल्या घरोघर ।
उपाय नाहीं लाचार, स्त्रिया वंदी पाटावर ॥ दुसरा झाला शीरजोर, परशा तोबा कठोर ।
मार त्याचा अनीवार, केला क्षत्रियां संव्हार ॥ क्षत्रिय केले जरजर, भये कांप थरथर ।
दुःखा नाहीं त्यांच्या पार, ठाव नाहीं निराधार ॥ बहु केले देशापर, बाकी राहि मांगमाहार ।
निःक्षेत्रीं झाल्यावर, म्लेंच्छें केलें डोकें वर । आले सिंधुनदावर, स्वार्‍या केल्या वारोंवार ।
गातें कटावांत सार, लक्ष देई अर्थावर ।
चाल
काबुला सोडी । नदांत उडी ॥
ठेवितो दाढी । हिंदूस पीडी ॥
बामना बोडी । इंद्रियें तोडी ॥
पिंडीस फोडी । देवळें पाडी ॥
चित्रास तोडी । लेण्यास छेडी ॥
गौमांसी गोडी । डुकरां सोडी ॥
खंडयास ताडी । जेजूरी गडी ॥
भुंग्यास सोडी । खोडीस मोडी ॥
मूर्तीस काढी । काबूला धाडी ॥
झाडीस तोडी । लुटली खेडीं ॥
गडास वेढी । लावली शीडी ॥
हिंदूस झोडी । धर्मास खोडी ॥
राज्यास बेडी । कातडी काढी ॥
गर्दना मोडी । कैलासा धाडी ॥
देवळें फोडी । बांधीतो माडी ॥
उडवी घोडी । कपाळा आढी ॥
मीजास बडी । ताजीम खडी ॥
बुरखा सोडी । पत्‍नीस पीडी ॥
गायनीं गोडी । थैलीतें सोडी ॥
चाल
माताबोध मनीं हसतां राग आला यवनांचा ।
बेत मग केला लढण्याचा ॥ तान्हाजी मालुसरे बाजी फसलकराचा ।
स्नेह येशजी कंकाचा ॥ मित्रा आधीं ठेवी जमाव केला मावळ्यांचा ।
पूर करी हत्यारांचा ॥ मोठया युक्तीनें सर केला किल्ला तोरण्याचा ।
रोविला झेंडा हिंदूचा ॥ राजगड नवा बांधला उंच डोंगराचा ।
भ्याला मनीं विजापुरचा । दुसरा भ्याला मेला बेत नव्हता पूर्वीचा ।
दादोजी कोंडदेवाचा ॥ मासा पाणीं खेळे गुरु कोण असे त्याचा ।
पवाडा गातो शिवाजीचा ॥ कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।
छत्रपती शिवाजीचा ॥२॥
चौक ३
जाहागीरचा पैसा सारा लावी खर्चास । चाकरी ठेवी लोकांस ॥
थाप देऊन हातीं घेई चाकण किल्ल्यास । मुख्य केले फिङ्‌र्गोजीस ॥
थोडया लोकांसहीत छापा घाली सुप्यास । कैद पाहा केलें मामास ॥
सुप्यासोबत हातीं घेतलें तीनशें घोडयास । करामत केली रात्रीस ॥
मुसलमानां लाच देई घेई कोंडाण्यास । सिंहगड नांव दिलें त्यास ॥
पुरंधरी जाई जसा भला माणूस न्यायास । कैद पाहा केलें सर्वांस ॥
गांव इनाम देऊन सर्वां ठेवी चाकरीस । मारलें नाहीं कोणास ॥
वाटेमधीं छापा घालून लुटी खजीन्यास । सांठवी राजगडास ॥
राजमाचीं लोहगडीं लढे घेई तिकोण्यास । बाकी चार किल्ल्यांस ॥
मावळ्यांस धाडी कोकणीं गांव लुटायास । धूर्त योजी फितूरास ॥
सन्मान कैद्यां देई पाठवि वीजापूरास । मुलान्या सुभेदारास ॥
विजापुरीं मुसलमाना झाला बहु त्रास । योजना केली कपटास ॥
करनाटकीं पत्र पाठवी बाजी घोरपडयास । कैद तुम्ही करा शहाजीस ॥
भोजनाचें निमित्त केलें नेलें भोसल्यास । दग्यानें कैद केलें त्यास ॥
थेट शहाजी कैदी आणिला विजापूरास । खुशी मग झाली यवनास ॥
चिरेबंदी कोठडीमध्यें बंद केलें त्यास । ठेविलें भोक वार्‍यास ॥
शहाजीला पिडा दीली कळलें शिवाजीस । ऐकून भ्याला बातमीस ॥
पिताभक्ति मनीं लागला लागला शरण जायास । विचारी आपला स्त्रियेस ॥
साजे नांव सईबाई स्त्री सुचवी पतीस । ताडा दंडीं दुसमानास ॥
स्त्रीची सुचना सत्य भासली लिहिलें पत्रास । पाठवी दिल्ली मोगलास ॥
चाकर झालों तुमचा आतां येतों चाकरीस । सोडवा माझ्या पित्यास ॥
मोलग थैली गेली थेट मुसलमानास ठेविले किल्ल्यावर त्यास ॥
बाजी शामराज का लाजला जात सांगायास । धरुं पाही शिवाजीस ॥
धेड म्हणावा नाक नाही द्यावा कोणास । अडचण झाली बखरीस ॥
सिद्धिस बेत गेला नाहीं अंतीं भ्याला जिवास । काळें केलें महाडास ॥
शाहाजीचा बाजी आखेर घेईल बक्षीस । हा पाजी मुकला जातीस ॥
करनाटकीं आज्ञा झाली शाहाजीस । यवन भ्याला सिंहास ॥
वर्षे चार झालीं शिवला नाहीं कबजास । पिताभक्ति पुत्रास ॥
चंद्रराव मोर्‍यास मारी घेई जावळीस । दुसरे वासोटा किल्ल्यास ॥
प्रतापगड बांधी पेशवा केला एकास । नवे योजी हुद्यास ॥
आपली बाकी काढी धाडी पत्र तगाद्यास । चलाखी दावी मोंगलांस ॥
रात्रीं जाऊन एकाएकीं लुटी जुन्नरास । पाठवी गडी लुटीस ॥
आडमाग करी हळूंच गेला नगरास । लुटी हत्तीघोडयांस ॥
उंच वस्त्रे, रत्‍नें होन कमती नाहीं द्रव्यास । चाकरि ठेवि बारगिरांस ॥
समुद्रतीरीं किल्ले घेई पाळी गलबतांस । चाकरी ठेवि पठाणास ॥
सिद्दि पेशव्या आपेश देई घेई यशास । उदासी लाभ शिवाजीस ॥
आबझूलखान शूर पठाण आला वांईस । शोभला मोठा फौजेस ॥
हातीं बारा हजार घोडा त्याचे दिमतीस । कमी नाहीं दारुगोळीस ॥
कारकुनाला वचनीं दिलें हिवरें बक्षीस । फितविलें लोभी ब्राह्मणांस ॥
गोपीनाथ फसवी पठाणा आणि एकांतास । चुकला नाहीं संकेतास ॥
मातेपायीं डोई ठेवी, लपवी इत्यारास । बरोबर आला बेतास ॥
समीप येतां शिवाजी जसा भ्याला व्याघ्रास । कमी करी आपल्या चालीस ॥
गोपीनाथ सुचना देई भोळ्या यवनास । भ्याला तुमच्या शिपायांस ॥
वर भेटभाव वाघनख मारीं पोटास । भयभित केलें पठाणास ॥
पोटीं जखम सोसी केला वार शिवाजीस । झोंबती एकमेकांस ॥
हातचलाखी केली बिचवा मारी शत्रूस । पठाण मुकला प्राणास ॥
स्वामीभक्ती धाव घेई कळले शिपायास । राहिला उभा लढण्यास ॥
त्याची धोप घेई शिवाजी बचवी आपल्यास । तान्हाजी भिडे बाजूस ॥
दांती दाढी चावी तोडी घेई धनी सूडास । घाबरें केलें दोघांस ॥
नांव सय्यदबंधू साजे शोभा आणी बखरीस । लाथाळी जीवदानास ॥
तान्हाजीला हूल देई मारी हात शिवाजीस । न्याहाळी प्रेतीं धण्यास ॥
उभयतांसीं लढतां मुकला आपल्या प्राणास । गेला जन्नत स्वर्गास ॥
छापा घाली मारी करी कैद बाकी फौजेस । पठाणपुत्र खाशा स्त्रियेस ॥
चार हजार घोडा लूट कमी नाहीं द्रव्यास । दुसर्‍या सरंजामास ॥
अलंकार वस्त्रें देई सर्व कैदी जखम्यांस । पाठवि विजापूरास ॥
वचनीं साचा शिवाजी देई हिवरें बक्षीस । फितुर्‍या गोपीनाथास ॥
नाचत गात सर्व गेले प्रतापगडास । उपमा नाहीं आनंदास ॥
चाल
शिवाचा गजर जयनामाचा झेंडा रोविला ॥
क्षेत्र्याचा मेळा मावळ्याचा शिकार खेळला ॥
मातेपायीं ठेवी डोई गर्व नाहीं काडीचा ।
आशिर्वाद घेई आईचा ॥ आलाबला घेई आवडता होता जिजीचा ।
पवाडा गातो शिवाजीचा ॥ कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।
छत्रपती शिवाजीचा ॥३॥
चौक ४
लढे रांगणीं विशाळगडीं घेई पन्हाळ्यास । केले मग शुरु खंडणीस ॥
रुस्तुल जमाना आज्ञा झाली विजापूरास । नेमिला कोल्हापूरास ॥
स्वार तीन हजार घेई थोडया पायदळास । आला थेट पन्हाळ्यास ॥
मार देत शिवाजी पिटी कृष्णा पैलतडीस । अती जेर केलें त्यास ॥
खंडणी घेत गेला भिडला विजापूरास । परत मग आला गडास ॥
राजापुर दाभोळ लुटी भरी खजीन्यास । मात गेली विजापुरास ॥
सिद्दी जोहरा नेमी मोठी फौज दिमतीस । सावंत सिद्दी कुमकेस ॥
बंदोबस्त करी शिवाजी राही पन्हाळ्यास । करी मग जमा बेगमीस ॥
वारंवार छापे घाली लुटी भौंती मुलखास । केलें महाग दाण्यास ॥
त्रासानें खवळून वेढा घाली शिवाजीस । कोंडिले गडीं फौजेस ॥
चार मास लोटले शिवाजी भ्याला वेढयास । योजना करी उपायास ॥
कोंकणामधीं सिद्दी झोडी रघुनाथास । उपद्रव झाला रयतेस ॥
फासलकर बाजीराव पडले वाडीस । दुःख मग झालें शिवाजीस ॥
सिद्दी जोहरा निरोपानें गोंवी वचनास । खुशाल गेला भेटीस ॥
वेळ करुन गेला उरला नाहीं आवकास । कच्चा मग ठेवी तहास ॥
सिद्दीस लाडी गोडी मधी मान डुकलीस । गेला थाप देऊन गडास ॥
सिद्धया पोटीं खुष्याली जाई झोपीं सावकास । हयगय झाली जप्तीस ॥
तों शिवाजी पळून गेला घेई पाठी रात्रीस । फसविलें मुसलमानास ॥
सिद्दी सकाळीं खाई मनीं लाडू चुरमुर्‍यास । स्वार दळ लावी पाठीस ॥
चढत होता खिंड शिवाजी गांठलें त्यास । बंदुका लावी छातीस ॥
बाजीपरभु मुख्य केला ठेवि मावळ्यास । एकटा गेला रांगण्यास ॥
स्वामीला वेळ दिला बाजी भिडला शत्रूस । हरवी नित्य मोगलास ॥
दोन प्रहर लढे वाट दिली नाहीं त्यास । धन्य त्याच्या जातीस ॥
मोठी मोगल फौज दाखल झाली साह्यास । खवळला बाजी युद्धास ॥
अर्धे लोक उरले सरला नाहीं पाउलास । पडला परभू भूमीस ॥
तो शिवाजी सुखी पोहंचला कान सुचनेस । अंती मनीं हाच ध्यास ॥
बार गडीं ऐकून सुखी म्हणे आपल्यास । नीघून गेला स्वर्गास ॥
सय्यद मागें सरे जागा देई बाजीरावास । पाहून स्वामीभक्तीस ॥
विजापुरीं मुसलमान करी तयारीस । खासा आला लढण्यास ॥
कराडास डेरे दिले घेई बहू किल्ल्यांस । वश करी चाचे लोकांस ॥
दळव्यासीं लडून घेई शृंगारपुरास । मारलें पाळेगारांस ॥
लोकप्रीतिकरितां करी गुरु रामदासास । राजगडीं स्थापी देवीस ॥
मिष्ट अन्न भोजन दिलें सर्वां बक्षीस । केली मग मोठी मजलस ॥
तानसैनी भले गवय्या बसवी गायास । कमी नाहीं तालस्वरास ॥
चाल
जीधर उधर मुसलमानी । बीसमिलाही हिंमानी ॥
सच्चा हरामी शैतान आया । औरंगजीब नाम लिया ॥
छोटे भाइकूं कैद हूल दिया । बडे भाईकी जान लिया ॥
छोटेकूंबी कैद किया । लोक उसके फितालिया ॥
मजला भाई भगा दिया । आराकानमें मारा गया ॥
सगे बापकूं कैद किया । हुकमत सारी छिनलीया ॥
भाईबंदकूं इजा दिया । रयत सब ताराज किया ॥
मार देके जेर किया । खाया पिया रंग उडाया ॥
आपण होके बेलगामी । शिवाजीकू कहे गुलामी ॥
आपण होके ऐशआरामी । शिवाजीकूं कहे हरामी ॥
बरे हुवा करो सलामी । हिंदवाणी गाव नामी ॥
चाल
आदी आंत न । सर्वां कारण ॥
जन्ममरण । घाली वैरण ॥
तोच तारण । तोच मारण ॥
सर्व जपून । करी चाळण ॥
नित्य पाळण । लावी वळण ॥
भूतीं पाहून । मनीं ध्याईन ॥
नांव देऊन । जगजीवन ॥
सम होऊन । करा शोधन ॥
सार घेऊन । तोडा बंधन ॥
चाल
सरनौबती डंका हुकूम पालेकराचा । घेई मुजरा शाईराचा ॥
सुखसोहळे होतां तरफडे सावंत वाडीचा । पवाडा गातो शिवाजीचा ॥
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥४॥
चौक ५
सावंत पत्र लिही पाठवी विजापूरास । मागे फौज कुमकेस ॥
बाजी घोरपडा बल्लोळखान येती साह्यास । शिवाजी करी तयारीस ॥
त्वरा करुन गेला छापा घाली मुधोळांस । मारिलें बाजी घोरपडयास ॥
भाऊबंद मारिलें बाकी शिपाई लोकांस । घेतलें बाप सूडास ॥
सावंताची खोड मोडून ठेवी चाकरीस । धमकी देई पोर्च्युग्यास ॥
नवे किल्ले बांधी डागडुजी केली सर्वांस । बांधिलें नव्या जाहाजास ॥
जळीं सैनापती केले ज्यास भीती पोर्च्युग्यीस । शोभला हुद्दा भंडार्‍यास ॥
विजापूरचा वजीर गुप्त लिही शिवाजीस । उभयतां आणलें एकीस ॥
व्यंकोजी पुत्रा घेई शाहाजी आला भेटीस । शिवाजी लागे चरणास ॥
शाहाजीचे सद्‌गुण गाया नाहीं आवकास । थोडेसे गाऊ अखेरीस ॥
सुखसोहळे झाले उपमा लाजे मनास । उणें स्वर्गी सुखास ॥
अपूर्व वस्तू घेऊन जाई विजापूरास । भेट मग देई यवनास ॥
पराक्रमी शिवाजी पाळी पाऊण लक्षास । साजे यवनी स्नेहास ॥
विजापूरचा स्नेह होता लढे मोगलास । घेतले बहूतां किल्ल्यास ॥
सर्व प्रांतीं लूट धुमाळी आणिलें जेरीस । घावरें केलें सर्वांस ॥
संतापानें मोंगल नेमी शाइस्तेखानास । जलदि केली घेई पुण्यास ॥
चाकणास जाऊन दावी भय फिङ्‌र्गोजीस । फुकट मागे किल्ल्यास ॥
मास दोन लढला घेऊन सर्व फौजेस । खान खाई मनास ॥
अखेर दारु घालून उडवी एका बुर्जास । वाट केली आंत जायास ॥
वारोंवार हल्ले गर्दी करुं पाहे प्रवेश । शाइस्ता पठाण पाठीस ॥
मागें पळति सर्व कोणी मानिना हुकूमास । भीति आंतल्या मर्दास ॥
लागोपाठ मार देत हटवि पठाणास । खचला खान हिंमतीस ॥
प्रातःकाळीं संतोषानें खाली केले किल्ल्यास । देई मुसलमानास ॥
फिङर्गोजीला भेट देती खुषी झाली यवनास । देऊन मान सोडी सर्वांस ॥
शिवाजीची भेट घेतां सन्मान दिला त्यास । वाढवी मोठया पदवीस ॥
फिड्‌र्गोजीचें नांव घेतां मनीं होतो उल्हास । पीढीजाद चाकरीस ॥
येशवंतशिंग आले घेऊन मोठया फौजेस । मदत शाईस्तेखानास ॥
सरनौबत भौती लुटी नगरी मुलखास । जाळून पाडिला ओस ॥
पाठी लागून मोंगल भारी त्याच्या स्वारांस । जखमा केल्या नेटाजीस ॥
राजगड सोडून राहीला सिंव्हगडास पाहून मोगलसेनेस ॥
जिजाबाईचें मुळचें घर होतें पुण्यास । खान राही तेथें वस्तीस ॥
मराठयांस चौकी बंदी गांवांत शिरण्यास । होता भीत शिवाजीस ॥
लग्नवर्‍हाडी रुपें केला पुण्यांत प्रवेश । मावळे सोबत पंचवीस ॥
माडीवर जाऊन फोडी एका खिडकीस । कळालें घरांत स्त्रीयांस ॥
शाइस्त्यास कळतां दोर लावी कठडयास । लागला खालीं जायास ॥
शिवाजीनें जलदी गांठून वार केला त्यास । तोडीलें एका बोटास ॥
स्त्रिपुत्रां सोडून पळे पाठ दिली शत्रूस । भित्रा जपला जिवास ॥
आपल्या पाठिस देणें उणें शिपायगिरीस । उपमा नाहीं हिजडयास ॥
सर्व लोकांसहित मारिलें खानपुत्रास । परतला सिंहगडास ॥
डौलानें मोंगल भौती फिरवी तरवारीस । दावी भय शिवाजीस ॥
समीप येऊं दिले हुकूम सरबत्तीस । शत्रू पळाला भिऊन मारास ॥
करनाटकी बदली धाडी शाइस्तेखानास । मुख्य केलें माजमास ॥
राजापुरीं जाई शिवाजी जमवी फौजेस । दावी भय पोर्च्यूग्यास ॥
सर्व तयारी केली निघाला नाशिक तीर्थास । हुल कसी दिली सर्वांस ॥
मध्यरात्रीं घेई बरोबर थोडया स्वारांस । दाखल झाला सुर्तेस ॥
यथासांग साहा दिवस लुटी शहरास । सुखी मग गेला गडास ॥
बेदनूराहून पत्र आलें देई वाचायास । आपण बसे ऐकायास ॥
शिपायाचे बच्चे शाहाजी गेले शिकारीस । लागले हरणापाठीस ॥
घोडया ठेंच लागे उभयतां आले जमीनीस । शाहाजी मुकला प्राणास ॥
पती कैलासा गेले कळलें जिजीबाईस । पार मग नाहीं दुःखास ॥
भुमी धडपडे बैसे रडून गाई गुणांस । घेई पुढे शिवाजीस ॥
चाल
अतीरुपवान बहु आगळा । जैसा रेखला चित्री पूतळा ॥
सवतीवर लोटती बाळा । डाग लाविला कुणबी कुळा ॥
सवतीला कसें तरी टाळा । कज्जा काढला पती मोकळा ॥
खर्‍या केंसानें कापि का गळा । नादीं लागला शब्द कोकिळा ॥
मूख दुर्बळ राही वेगळा । अती पिकला चिंतेचा मळ ॥
झाला शाहाजी होता सोहळा । मनीं भूलला पाहूनी चाळा ॥
बहुचका घेती जपमाळा । जाती देऊळा दाविती मोळा ॥
थाट चकपाक नाटकशाळा । होती कोमळा जशा निर्मळा ॥
खर्‍या डंखिणी घाली वेटोळा । विषचुंबनीं देती गरळा ॥
झाला संसारीं अती घोटाळा । करी कंटाळा आठी कपाळा ॥
मनीं भिऊन पित्याच्या कुळा । पळ काढला गेले मातुळा ॥
छातीवर ठेवल्या शिळा । नाहीं रुचला सवत सोहळा ॥
चाल
कमानीवर । लावले तीर ॥
नेत्रकटार । मारी कठोर ॥
सवदागर । प्रीत व्यापार ॥
लावला घोर । सांगतें सार ॥
शिपाई शूर । जुना चाकर ॥
मोडक्या धीर । राखी नगर ॥
आमदानगर विजापूरकर ॥ मंत्री मुरार ॥
घेई विचार ॥ वेळनसार ।
देई उत्तर ॥ धूर्त चतुर ।
लढला फार ॥ छाती करार ॥
करी फीतूर ॥ गुणगंभीर ।
लाविला नीर ॥ होता लायक ।
पुंडनायक ॥ स्वामीसेवक ।
खरा भाविक ॥
चाल
सिंहगडावर गेला बेत केला क्रियेचा । बजावला धर्म पुत्राचा ॥
रायगडी जाई राही शोक करी पित्याचा । शत्रु होता आळसाचा ॥
दुःखामधीं सुरु बंदोबस्त करी राज्याचा । पवाडा गातो शिवाजीचा ॥
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ॥ छत्रपती शिवाजीचा ॥५॥
चौक ६
सर्व तयारी केली राजपद जोडी नांवास । शिक्का सुरु मोर्तबास ॥
अमदानगरीं नटून पस्त केलें पेठेस । भौतीं औरंगाबादेस ॥
विजापूरची फौज करी बहुत आयास । घेई कोकणपट्टीस ॥ सावध शिवाजी राजे आले घेऊन फौजेस । ठोकून घेई सर्वांस ॥
जळीं फौज लढे भौती मारी गलबतास । दरारा धाडी मक्केस ॥
माल्वणीं घेऊन गेला अवचित फौजेस । पुकारा घेतो मोगलास ॥
जाहाजावर चढवी फौज गेला गोव्यास । लुटलें बारशिलोरास ॥
जलदी जाऊन गोकर्णी घेई दर्शनास । लुटलें मोंगल पेठांस ॥
पायवाटेनें फौज पाठवी बाकी लुटीस । आज्ञा जावें रायगडास ॥
स्वतां खासी स्वारी आज्ञा लोटा जाहाजास । निघाला मुलखीं जायास ॥
मोठा वारा सुटला भ्याला नाहीं तुफानास । लागले अखेर कडेस ॥
औरंगजीब पाठवी राजा जयशिंगास । दुसरे दिलीरखानास ॥
ठेवले मोगल अमीर येऊन पुण्यास । वेढिलें बहुतां किल्ल्यांस ।
मानकरी शिवाजी घेई बसे मसलतीस । सुचेना कांहीं कोणास ॥
बाजी परभू भ्याला नाहीं दिलीरखानास । सोडिलें नाहीं धैर्यास ॥
हेटकरी मावळे शिपाइ होते दिमतीस । संभाळी पुरंधरास ॥
चातुर्यानें लढे गुंतवी मोगल फौजेस । फुरसत दिली शिवाजीस ॥
फार दिवस लोटले पेटला खान इर्षेस । भिडला किल्लया माचीस ॥
बुर्जाखालीं गेला लागे सुरंग पाडायास । योजी अखेर उपायास ॥
हेटकरी मावळे जाती छापे घालण्यास । पिडीलें फार मोगलास ॥
मोगलाने श्रम केले बेत नेला सिद्धीस । काबीज केलें माचीस ॥
यशस्वी भोसले लागले निर्भय लुटीस । चुकले सावधपणास ॥
हेटकर्‍यांचा थाट नी मारी लुटार्‍यास । मोगल हटले नेटास ॥
बाजी मावळ्यां जमवी हातीं घेई खांडयास । भिडून मारी मोगलास ॥
मोगल पळ काढी पाठ दिली मावळ्यास । मर्द पाहा भ्याले उंद्रास ॥
लाजे मनीं दिलीरखान जमवी फौजेस । धीर काय देई पठाणास ॥
सर्व तयारी पुन्हा केली परत हल्ल्यास । जाऊन भिडला मावळ्यास ॥
बाजी मार देई पठाण खचले हिमतीस । हटती पाहून मर्दास ॥
पराक्रम बाजीचा पाही खान खोच मनास । लावीला तीर कमानीस ॥
नेमानें तीर मारी मुख्य बाजी परभूस । पाडिला गबरु धरणीस ॥
सय्यद बाजी ताजीम देती घेती बाजूस । सरले बालेकिल्ल्यास ॥
मोगल चढ करती पुन्हा घेती माचीस । धमकी देती मावळ्यास ॥
हेटकरी मारी गोळी फेर हटवि शत्रूस । पळवी इशानी कोणास ॥
वज्रगडाला शिडी लाविली आहे बाजूस । वरती चढवी तोफांस ॥
चढला मोगल मारी गोळे बालेकिल्ल्यास । आणले बहू खराबीस ॥
हेटकरी मावळे भ्याले नाहीं भडिमारास । मोगल भ्याला पाऊसास ॥
मोगल सल्ला करी शिवाजी नेती मदतीस । घेती यवनी मुलखास ॥
कुलद्रोही औरंगजीब योजी कपटास । पाठवि थैली शिवाजीस ॥
शिवाजीला वचन देऊन नेई दिल्लीस । नजरकैद करी त्यास ॥
धाडी परत सर्व मावळे घोडेस्वारांस । ठेविले जवळ पुत्रास ॥
दरबार्‍यां घरीं जाई देई रत्‍न भेटीस । जोडिला स्नेह सर्वांस ॥
दुखणें बाहाणा करी पैसा भरी हकीमास । गूल पाहा औरंगजीबास ॥
आराम करुन दावी शुरु दानधर्मास । देई खाने फकीरास ॥
मोठे टोकरे रोट भरी धाडी मशीदीस । जसा का मुकला जगास ॥
दानशूर बनला हटवि हातिमताईस । चुकेना नित्यनेमास ॥
औरंगजीबा भूल पडली पाहून वृत्तीस । विसरला नीट जप्तीस ॥
निरास कैदी झाला शिवाजी भास मोगलास । चढला मोठया दिमाखास ॥
पितापुत्र निजती टोकरी बदली रोटास । बाकी सोपी चाकरास ॥
जलदी करीती चाकर नेती टोकरास । करामत केली रात्रीस ॥
दिल्ली बाहेर गेले खुलें केले शिवाजीस । नेली युक्ती सिद्धीस ॥
मोगल सकाळीं विचकी दांत खाई होटांस । लावी पाठी माजमास ॥
चाल
औरंगजीबा धूर दीला । पुत्रासवें घोडा चढला ॥
मधींच ठेवी पुत्राला । स्वतां गोसावी नटला ॥
रात्रिचा दिवस केला । गाठलें रायगडाला ॥
माते चरणीं लागला । हळूच फोडी शत्रूला ॥
स्नेह मोगलाचा केला । दरारा देई सर्वांला ॥
चाल
हैद्राबादकर । विजापूरकर ॥
कापे थरथर । देती कारभार ॥
भरी कचेरी । बसे विचारी ॥
कायदे करी । निट लष्करी ॥
चाल
शिवाजीचा बेत पाहून जागा झाला गोव्याचा । बंदोबस्त केला किल्ल्याचा ॥
वेढा घालून जेर केला सिद्दी जंजिर्‍याचा । पवाडा गाती शिवाजीचा ॥
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥६॥
चौक ७
शिवाजी तों मसलत देई मित्र तान्हाजीला । बेत छाप्याचा सुचवीला ॥
तान्हाजीनें भाऊ धाकटा सोबत घेतला । मावळी हजार फौजेला ॥
सुन्या रात्रीं सिंहगड पायीं जाऊन ठेपला । योजिलें दोर शिडीला ॥
दोरीची शिडी बांधली शिपाई कमरेला । हळुच वर चढवीला ॥
थोडी चाहूल कळली सावध उदेबानाला । करी तयार लोकांला ॥
थोडया लोकांसवें तान्हाजी त्यांवर पडला । घाबरा गडकरी केला ॥
रणीं तान्हाजी पडे मावळे पळती बाजूला । सूर्याजी येऊन ठेपला ॥
धीर मोडक्या देई परत नेई सर्वांला । उगवी बंधू सूडाला ॥
उदेबान मारिला बाकिच्या राजपुत्राला । घेतलें सिंहगडाला ॥
गड हाती लागला तान्हाजी बळी घेतला । झालें दुःख शिवाजीला ॥
सिंहगडीं मुख्य केलें धाकटया सुर्याजीला । रुप्याचीं कडीं मावळ्याला ॥
पुरंधर माहूली घेई वरकड किल्ल्याला ॥ पिडा जंजिरी सिद्दयाला ॥
सुरत पुन्हां लुटी मार्गी झाडी मोगलाला । मोगल जेरदस्त केला ॥
कैद करी शिवाजी बाकी उरल्या फौजेला । त्यांमधीं अनेक स्त्रीयाला ॥
सुंदर स्त्रीया परत पाठवी नाहीं भाळला । लाजवी औरंगजीबाला ॥
सरनौबत वीर पाठवी खानदेशाला । शुरु केलें चौथाईला ॥
जलदी मोगल धाडी मोहबतखानाला । देई मोठया फौजेला ॥
औंढापट्टा घेऊन वेढी साल्हेर किल्ल्याला । धिंगाणा दक्षिणेंत केला ॥
गुजर उडी घाली सामना शत्रूचा केला । मोरोबा पठाण पंक्तीला ॥
लढतां पळ काढी दावी भ्याला मोगलाला । जसा खरा मोड झाला ॥
तों मराठे पळती मोगल गर्वानें फुगला । आळसानें ढिला पडला ॥
गुजर संधी पाहून परत मुरडला । चुराडा मोगलाचा केला ॥
बेवीस उमराव पाडले रणभूमीला । नाहीं गणती शिपायांला ॥
लहान मोठे कैदी बाकी सर्व जखम्यांला । पाठवी रायगडाला ॥
मोगल वेढा झोडून मार देत पिटीला । खिदाडी औरंगाबादेला ॥
रायगडीं नित्य शिवाजी घेई खबरेला । गोडबोल्या गोवी ममतेला ॥
एकसारखें औषधपाणी देई सर्वांला । निवडलें नाहीं शत्रुला ॥
जखमा बर्‍या होतां खुलासा सर्वांचा केला । राहिले ठेवी चाकरीला शिवाजीची कीर्ती चौमुलखीं डंका वाजला ।
शिवाजी धनी आवडला ॥ मोगल यवनी शिपायी सोडी चाकरीला ।
हाजरी देती शिवाजीला ॥ पोर्च्युग्यास धमकी देई मागे खंडणीला ।
बंदरी किल्ला वेढीला ॥ मधींच इंग्रज भ्याला जपे मुंबै किल्ल्याला ।
बनया धर्मा आड झाला ॥ दिल्लीस परत नेलें सुलतान माजूमाला ।
दुजें मोहबतखानाला ॥ उभयतांचा बदली खानजाहान आला ।
मुख्य दक्षणेचा केला ॥ मोगलाला धूर देऊन लुटलें मुलखाला ।
गोवळकुंडीं उगवला ॥ मोठी खंडणी घेई धाकीं धरी निजामाला ।
सुखें मग रायगडीं गेला ॥ मोगलाचे मुलखीं धाडी स्वार लुटायाला ।
लुटलें हुबळी शहराला ॥ समुद्रकांठीं गावें लुटी घेई जाहाजांला ।
केलें खुलें देसाईला ॥ परळी सातारा किल्ले घेई पांडवगडाला ।
आणिक चार किल्ल्यांला ॥
चाल
हुकूम विजापुरी झाला । सोडिलें बहुत फौजेला ॥
द्यावा त्रास शिवाजीला । घ्यावें त्याचे मुलखाला ॥
शिवाजी सोदी गुजराला । कोंडी आबदुल करीमाला ॥
केला माहग दाण्याला । शत्रु अती जेर केला ॥
आर्जव करणें शिकला । भोंदिलें सैनापतीला ॥
निघून विजापुरीं गेला । क्रोध शिवाजीस आला ॥
रागाऊन लिहिलें पत्राला । निषेधी प्रतापरावाला ॥
गुजर मनांत लाजला । निघून वराडांत गेला ॥
चाल
आबदुल्यानें । बेशर्म्यानें ॥
फौज घेऊन । आला निघून ॥
रावा प्रताप । झाला संताप ॥
आला घाईनें । गांठी बेतानें ॥
घुसे स्वतानें । लढे त्वेषानें ॥
घेई घालून । गेला मरुन ॥
चाल
प्रतापराव पडतां मोड फौजेचा झाला । पाठलाग मराठयाचा केला ॥
तोफ गोळया पोटीं दडती भिडती पन्हाळयाला । गेले नाहीं शरण शत्रूला ॥
अकस्मात हंसाजी मोहिता प्रसंगीं आला । हल्ला शत्रूवर केला ॥
गुजर दल मागें फिरुन मारी यवनाला । पळीवलें विजापुराला ॥
शिवाजीनें हंसाजीला सरनौबत केला । मोठा अधिकार दिला ॥
हंबिरराव पद जोडलें त्याच्या नांवाला । शिवाजी मनीं सुखी झाला ॥
सेनापतीचे गुण मागें नाहीं विसरला । पोशी सर्व कुटुंबाला ॥
प्रतापराव-कन्या सून केली आपल्याला । व्याही केलें गुजराला ॥
काशीकर गंगाभट घाली डौल धर्माचा । केला खेळ गारुडयाचा ॥
लुटारु शिवाजी सुटला धाक गृह फौजेचा । खर्च नको दारुगोळीचा ॥
बहुरुपी सोंग तूलदान सोनें घेण्याचा । पवाडा गातो शिवाजीचा ॥
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥७॥
चौक ८
विश्वासू चाकर नेमी मुलखीं लुटायाला । शिवाजी कोकणांत गेला ॥
छोटे मोठे गड घेई बांधी नव्या किल्ल्याला । जमाव फौजेचा केला ।
गोवळकुंडीं जाई मागुन घेई तोफांला । फितीवलें कसें निजामाला ॥
करनाटकीं गेला भेटे सावत्र भावाला । वाटणी मागे व्यंकोजीला ॥
लोभीं व्यंकोजी हिस्सा देईना बळासी आला । आशेनें फिरवी पगडीला ॥
बंधू आज्ञा मोडून गर्वानें हट्टीं पेटला । बिर्‍हाडीं रागाऊन गेला ॥
शिवाजीला राग आला कोट छातीचा केला । कैदी नाहीं केलें भावाला ॥
तंजोर बाकी ठेवी घेई सर्व मुलखाला । खडा कानाला लावला ॥
दासीपुत्र संताजी बंधु होता शिवाजीला । करनाटकीं मुख्य केला ॥
हंबीरराव सेनापती हाताखालीं दिला । निघाला परत मुलखाला ॥
वाटेमधी लढून घेई बिलरी किल्ल्याला । तेथें ठेवी सुमंताला ॥
शिवाजीचे मागें व्यंकोजीने छापा घातला । घेतलें स्वतां अपेशाला ॥
जेर झाला व्यंकोजी देई उरल्या हिश्याला । शिवाजी रायगडीं गेला ॥
विजापूरचा साह्य नेई राजे शिवाजीला । मोगल मुलखीं सोडला ॥
मुलखीं धिंगाणा धुळीस देश मिळीवला । सोडिलें नाहीं पिराला ॥
वाटेमधीं मोगल गांठी राजे शिवाजीला । घाबरा अतिशय केला ॥
भिडला शिवाजी मोगल मागें हाटीवला । वाट पुढें चालूं लागला ॥
दुसरी फौज आडवी माहाराज राजाला । थोडेसें तोंड दिलें तिजला ॥
काळ्या रात्रीं हळुच सुधरी आडमार्गाला । धूळ नाहीं दिसली शत्रूला ॥
फौजसुद्धां पोंहचला पटा किल्ल्याला । फसिवलें आयदि मोगलाला ॥
विजापूरचा आर्जव करी धाडी थैलीला । आश्रय मागे शिवाजीला ॥
हांबीरराव मदत पाठवी विजापुराला । बरोबर देई फौजेला ॥
नऊ हजार मोंगलांचा पराभव केला । त्यांनीं मार्ग अडीवला ॥
विजापुरीं जाऊन जेर केलें मोंगलाला । केला महाग दाण्याला ॥
शत्रूला पिडा होतां त्रासून वेढा काढला । मोगल भिऊन पळाला ॥
दिल्लीचा परत बोलवी दिलीरखानाला । पाठवी शाहाजाहानाला ॥
जलदी करुन शिवाजी वळवी पुत्राला । लाविला नीट मार्गाला ॥
तह करुन शिवाजी नेती विजापुरला । यवन घेती मसलतीला ॥
शिवाजीचें सोंवळें रुचले नाहीं भावाला । व्यंकोजी मनीं दचकला ॥
निरास मनीं होऊन त्यागी सर्व कामाला । निरा संन्यासी बनला ॥
शिवाजीने पत्र लिहिलें बधुं व्यंकोजीला । लिहितों पत्र अर्थाला ॥
वीरपुत्र म्हणवितां गोसावीअ कसे बनलां । हिरा कां भ्याला कसाला ॥
आपल्या पित्याचा ठसा कसा जलदी वीटला । मळावांचून काटला ॥
कनिष्ठ बंधू माझ्या लाडक्या पाठी साह्याला । तुम्ही कां मजवर रुसला ॥
बोध घ्या तुम्ही माझा लागा प्रजापालनाला । त्यागा ढोंगधतोर्‍याला ॥
मन उत्तम कामीं जपा आपल्या फौजेला । संभाळा मुळ आब्रूला ॥
कीर्ति तुझी ऐकूं यावी ध्यास माझ्या मनाला । नित्य जपतों या जपाला ।
कमी पडता तुम्ही कळवा माझ्या लोकांला । सोडा मनच्या आढीला ॥
सुभोधाचें पत्र ऐकता शुद्धीवर आला । व्यंकोजी लागे कामाला ॥
शिवाजीला रायगडीं गुडघी रोग झाला । रोगानें अती जेर केला ॥
त्याचे योगें नष्ट ज्वर फारच खवळला । शिवाजी सोसी दुःखाला ॥
यवनीं बिरास भिडतां नाहीं कुचमला । शिवाजी रोगाला भ्याला ॥
सतत सहा दिवस सोसी ताप दाहाला । नाहीं जरा बरळला ॥
सातव्या दिवशीं शिवाजी करी तयारीला । एकटा पुढें आपण झाला ॥
काळाला हूल देऊन स्वतां गेला स्वर्गाला । पडले सुख यवनाला ॥
कुळवाडी मनीं खचले करती शोकाला । रडून गाती गुणांला ॥
चाल
महाराज आम्हासीं बोला । धरला कां तुम्ही अबोला ॥
मावळे गडी सोबतीला । शिपाई केले उघडयाला ॥
सोसिलें उन्हातान्हाला । भ्याला नाहीं पाउसाला ॥
डोंगर कंगर फिरलां । यवन जेरीस आणला ॥
लुटलें बहुत देशांला । वाढवी आपुल्या जातीला ॥
लढवी अचाट बुद्धीला । आचंबा भुमीवर केला ॥
बाळगी जरी संपत्तीला । तरी बेताने खर्च केला ॥
वांटणी देई शिपायांला । लोभ द्रव्याचा नाहीं केला ॥
चतुर सावधपणाला । सोडिलें आधीं आळसाला ॥
लहान मोठया पागेला । नाहीं कधीं विसरला ॥
राजा क्षेत्र्यांमध्यें पहिला । नाहीं दुसरा उपमेला ॥
कमी नाहीं कारस्तानीला । हळूच वळवी लोकांला ॥
युक्‍तीनें बचवी जीवाला । कधीं भिईना संकटाला ॥
चोरघस्ती घेईअ किल्ल्याला । तसेंच बाकी मुलखांला ॥
पहिला झटे फितुराला । आखेर करी लढाईला ॥
युद्धीं नाहीं विसरला । लावी जीव रयतेला ॥
टळेना रयत सुखाला । बनवी नव्या कायद्याला ॥
दाद घेईअ लहानसानाची । हयगय नव्हती कोणाची ।
आकृती वामनमुर्तीची । बळापेक्षां चपळाईची ॥
सुरेख ठेवण चेहर्‍याची । कोंदली मुद्रा गुणरत्‍नाची ॥
चाल
भिडस्त भारी । साबडा घरीं ॥
प्रिय मधुरी । भाषण करी ॥
मोठा विचारी । वर्चड करी ॥
झटून भारी । कल्याण करी ॥
आपासोयरीं। ठेवी पदरीं ॥
लाडावरी । रागावे भारी ॥
चाल
इंग्लीश ज्ञान होतां म्हणे मी पुत्र क्षेत्र्याचा । उडवी फट्टा ब्रह्मयाचा ॥
जोतीराव फुल्यानें गाईला पुत क्षुद्राचा । मुख्य धनी पेशव्याचा ॥
जिजीबाईचा बाळ काळ झाला यवनाचा । पवाडा गातो शिवाजीचा ॥
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥८॥


शिवाजी महाराज पोवाडा – अफझलखान वध

चौक १
माझें नमन आधी गणा । सकळिक ऐका चित्त देऊन ॥
नमियेली सारज्या । ल्याली जडिताचें भूषण ॥
अज्ञानदासाचें वचन । नमिला सद्‌गुरु नारायण ॥
सद् गुरुच्या प्रसादें । संपूर्ण अंबेचें वरदान ॥
गाइन वजिराचें भांडण । भोसल्या सरजा दलभंजन ॥
फौजेवर लोटतां । यशवंत खंडेश्वरी प्रसन्न ॥
अज्ञानदास बोले वचन । गाइन राजाचें भांडण ॥
देश इलाइत । काबिज केलें तळकोंकण ॥१॥
चौक २
गड मी राजाचे गाईन । कोहज माहुली भर्जन ॥
पारगड कर्नाळा । प्रबळगड आहे संगिन ॥
मस्त तळा आणि घोसाळा । रोहरी आनसवाडी दोन ॥
कारला कासागड मंडन । दर्यांत दिसताती दोन ॥
गड बिरवाडी पांचकोन । सुरगड अवचितगड भूषण ॥
कुबल गड भीरिका कुर्डुगडाचें चांगुलपण ॥
धोडप तळकोंकणचे किल्ले, घाटावरले गड गाइन ॥२॥
चौक ३
गड आहे रोहिडा । जामली प्रतापगड मंडन ॥
मकरंदगड वांसोट । सिंहगड वृंदावन ॥
पुरंधराचें चांगुलपण । उंची झुलवा देत गगन ॥
सोन्याची सुवेळा आहे राजगड संगिन ॥
कोंडाण्यापासून तोरणा वर्ता । कोर रेखिली घाटमाथा ॥
तुंग आणि तुकोना । विसापुर लोहगड झुलता ॥
गड राहेरीची अवस्था । तीन पायर्‍या सोन्याच्या तक्ता ॥
दुसरा प्रतापगड पाहतां । अवघड दिसे घाटमाथा ॥३॥
चौक ४
मस्त हुडे दुर्गाचे खण । माहाल राजाचे गाइन ॥
पुणे भिस्तका दरगा । शेकसल्ला पीर, पाटण ॥
शिरवळ सुपे देस । घेतला ज्यानें इंदापुरा पासुन ॥
महाड गोरेगांवापासून । घेतले शिणगारपूर पाटण ॥
असे तुळजेचे परिपूर्ण । सोडविलें चवदा ताल कोंकण ।
घेतली बारा बंदरें । भाग्य राजाचें संगिन ॥४॥
चौक ५
देश दुनिया काबिज केली । बारा माउळें घेतलीं ॥
चंद्रराव कैद केला । त्याची गड जाउली घेतली ॥
चेतपाउली काबिज केली । ठाणी राजाचीं बैसलीं ॥
घेतली जाउली न् माहुली । कल्याण भिवंडी काबिज केली ॥
सोडविलें तळकोंकण । चेउलीं ठाणीं बैसविलीं ॥
कुबल, बांकी घरें । शिवराजाच्या हाता आलीं ॥
मुलाना हामाद । फिर्याद बाच्छायाप गेली ॥
बाच्छायजादी क्रोधा आली । जैशी अग्न परजळली ॥
जित धरावा राजाला । कुलवजिरांला खबर दिली ॥५॥
चौक ६
बाच्छाय(ये) पाठविले प्रमाण । वजीर बोलावा तमाम ॥
अबदुलखान, रस्तुम जुमा ॥ सिद्दी हिलाल, मुशेखान ॥
मेळविलें वजिरांला । बाच्छाय बोलावी कवणाला ? ॥
बोलावी बाजी घोरपडयाला । घाटग्या जुंझाररायाला ॥
बोलावी खर्‍या कोबाजीला । त्या नाइकजी पांढर्‍याला ॥
देवकांत्या जीवाजीला । मंबाजी भोसल्याला ॥
बावीस उंबराव मिळुनी । आले बाच्छाय सभेला ॥६॥
चौक ७
बाच्छायजादा पुसे वजीरांला । धरीसा आहे कोण शिवराजाला ॥
बावीस उंबराव आले सभेला । विडा पैजेचा मांडिला ॥
सवाई अबदुल्या बोलला । ’जिता पकडूं मैं राजाला’ ।
निरोप दिला कुल्‌वजिराला । अबदुल सदरे नवाजिला ॥
विडा पैजेचा घेतला (म्हणून) । तुरा मोत्याचा लाविला ॥
गळांअ घातलीं पदकें । खान विजापुरीं बोलला ॥
फिरंग घोडा सदरे दिला । बाच्छायानें नवाजीला ॥
तीवरसांची मोहीम । घेऊन अबदुल्या चालला ॥७॥
चौक ८
खान कटकबंद केला । कोटाबाहेर डेरा दिला ॥
मोठा अपशकुन जाहला । फत्यालसकरा हत्ती मेला ॥
खबर गेली बाच्छायाला । बिनीचा हत्ती पाठविला ॥
बारा हजार घोडा । अबदुलखानालागीं दिला ॥८॥
चौक ९
संगात कुंजर मस्त हत्ती । घेतली झगडयाची मस्तुती ॥
आरोब्याच्या गाडया । कोतवालतेजी धांवा घेती ।
सातशें उंट आहे बाणांचा । करडा लष्करी खानाचा ।
वजीर अबदुलखान । त्याच्या दळाची गणती ।
बारा हजार घोडा । उंबराव ताबिन चालती ॥९॥
चौक १०
तेथुनि कुच केलें कटकाला । अबदुल फौजेनें चालिला ॥
मजलीवर मजल । अबदुल तुळजापुरा आला ॥
फोडिली तुळजा । वरती मसुदच बांधिली ॥
मसुद बांधुनी । पुढें गाय जब केली ॥
अबदुलखान फोडी देवीला । ’कांहीं एक अजमत दाव मला’ ॥
कोपली भद्रकाली । बांधुनी शिवराजाप दिला ।
अंबा गेली सपनांत (ला) । कांहीं एक बोल शिवराजाला ॥
’बत्तीस दातांचा बोकड । आला वधायाला’ ॥१०॥
चौक ११
तेथून कुच केलें कटकाला । अबदुल दरमजली चालिला ॥
मजलीवर मजल । अबदुल माणकेश्वरा आला ॥
तेव्हां त्या अबदुलखानानें । हाल मांडिले देवाला ॥
तेथुनि कुच केलें कटकाला । अबदुल फौजेनें चालिला ॥
मजलीवर मजल । अबदुल करकंभोशा आला ॥
तेथुनि कुच केलें कटकाला । अबदुल दरमजली चालिला ॥
मजलीवर मजल । वेगीं पंढरपुरा आला ॥
फोडिला विठोबा । पुंडलिक पाण्यात टाकिला ॥११॥
चौक १२
खान (नें) कुच केलें कटकाला । अबदुल फौजेनें चालिला ॥
मजलीवर मजल । वेगीं महादेवासी आला ॥
तेव्हां त्या अबदुलखानानें । दंड बांधिला शंभुला ॥
हाल हिंदुच्या देवाला । अबदुलखान (नें) धाक लाविला ॥
तेथुनि कुच केलें कटकाला । अबदुल दरमजली चालिला ।
मजलीवर मजल । अबदुल रहिमतपुरा आला ॥१२॥
चौक १३
अबदुल आलासे बोलती । धाकें गड किल्ले कांपती ॥
वजीर उंबराव बोलती । ’शिवाजीस गडे कोंडू’, म्हणती ।
अबदुल सारा आहे किती । त्याच्या दळाची गणती ॥
बारा हजार घोडा । उंबराव ताबिन चालती ॥
सौंदळीं भांडतां । मग कणकीला मीठ किती ? ॥१३॥
चौक १४
तेथुनि कुच केलें कटकाला । अबदुल वांईलागी आला ॥
आपुल्या मुलखांत राहिला । कोट बांधुन पिंजरा केला ॥
बरेपणाचा कागद (देउन) । हेजिब महाराजाप गेला ॥
राजा पुण्यात मस्त झाला । देश पाठीशीं घेतला ॥
सोडून दिले किल्ले । डेरा जाउलींत दिला ॥
राजा जाउलींत राहिला । हेजिब अबदुल्याचा आला ॥१४॥
चौक १५
हेजिब बोले महाराजाला । ’खान बर्‍यापणाशीं आला ॥
खानाला भेटतां । थोर बाच्छाये सल्ला झाला’ ॥
राजा बोले हेजिबाला । ’कशाला बोलवितां वांईला ? ॥
किल्ले गड कोट । दवलत खानाच्या हवाला ॥
जाउली खानाच्या हवाला । लिहून देतों हेजिबाला ॥
बैसूं दोघेजण । खान बुध सांगेल आम्हांला’ ।
लुगडीं दिलीं हेजिबाला । हेजीब ’बेगीं’ रवाना झाला’ ॥१५॥
चौक १६
हेजिबाची खबर ऐकुनी । अबदुल महाभुजंग झाला ॥
अबदुलखान (नें) कउल दिला । रोटीपीर पाठविला ॥
’भिउ नको शिवाजी भाई । आहे तेरा मेरा सल्ला ॥
तुझे गड तुझ्या हवाला । आणिक दवलत देतों तुला ॥
तुझी थोडीशी गोष्ट । क्रिया शहाजीची आम्हाला’ ॥
इकडे कउल पाठविला । (पण) शीलचा राउत निवडिला ॥
हत्तीचे पायीं तोरड । लाविला गजढाळा ॥
नदरे पडतां । दस्त करा शिवराजाला ॥१६॥
चौक १७
राजा हेजीबासि बोलतो । “खंड काय मला मागतो ॥
चउआगळे चाळीस गड । मी अबदुलखानालागीं देतों ।
मजवर कृपा आहे खानाची । जावलींत सदरा सवारितो ॥
तेथें यावें भेटायाला । मी खानाची वाट पाहतों “॥
हेजिब तेथुनि निघाला । अबदुलखानाजवळ आला ॥
अबदुलखानामोहरें । हेजिब (बें) टाकिला प्रमाण ॥
अबदुल पाहतो वाचुन । “खुंटले गनिमाचें मरण” ॥
हाती आले गड किल्ले । खुशी जहाला अबदुलखान ॥१७॥
चौक १८
हिगडे सल्ला कउल दिला । खासा राउत निवडिला ॥
चार हजार घोडा । हालका धराया चालला ॥
हत्तींचे पायिं तोरड ज्याला । वरी सोडिल्या गजढाला ॥
फौजामागें फौजा । भार कडक्यानें चालला ॥
रडतोंडीच्या घाटाखालीं । अबदुल सारा उतरुं दिला ॥
इसारत सरज्याच्या लोकांला । ज्यांणीं घाट बळकाविला ॥
मागल्याची खबर नाहीं पुढिल्याला । कटकाची खबर, कैची त्याला ॥
जाऊं जाणें येऊं नेणें । ही गत झाली अबदुल्याला ॥
जावलींत उतरुनि । अबदुल दिशीभुला जाहला ॥१८॥
चौक १९
राजानी सदरा सवारिल्या । गाद्या पडगाद्या घातल्या ॥
तिवाशा जमखान टाकिले । सदर पिकदाण्या ठेविल्या ॥
सुरंग चारी खांब सदरेचे । वरी घोंस मोतीयांचें ॥
माणिकाच्या भरणी । हारी मोत्यांच्या बसविल्या ॥
दुसरे सदरेची मांडणी । सूर्य लखलखितो गगनीं ।
मणिकाचे ढाळ । सदरे सुवर्णाचें पाणी ॥
काचबंदी पटांगणाचा ढाळ । कापुर कस्तुरी परिमळ ॥१९॥
चौक २०
तिसरे सदरेची मांडणी । हिरे जोडिले खणोखणीं ॥
खासियाचे पलंग । ते ठेवोनी मध्यस्थानीं ॥
वाळियाच्या झांजी । दबण्याचे कुंड घालोनी ॥
बराणपुरी चिटाचे । आडोआड पडदे बांधुनी ॥
चाहुंकोनी चारी समया । चांदवा जडिताचा बांधोनी ॥
घोंस मोतियांचे । वर ठिकडी नानापरिची ॥
अवघी जडिताची लावणी । हिरे जोडिले खणोखणीं ॥
बहुत सवारिल्या सदरा ॥ ऐशी नाहीं देखिल्या कोणी ॥२०॥
चौक २१
राजानीं सदरा सवारिल्या । हेजिब अबदुल्यास धाडिला ॥
मोरो ब्राह्मण पाठविला । अबदुलखानासी बोलाविला ॥
“चार हजार घोडा । कोण्या कामास्तव आणिला ?” (म्हणून) त्यानें बाहेर निराळा ठेविला ।
दहा पांचांनिशीं चालिला ॥ “एकांतीच्या गोष्टी ।
तेथें दहा पांच कशाला ॥ पालखी दुर करा भोईयाला ।”
खासा अबदुल चालला ॥ “हात चालावा व्हा । दुर करा” म्हणे खानाला ॥
वस्त्रें केली हेजीबाला । शामराज नवाजीला ॥२१॥
चौक २२
भवानीशंकर प्रसन्न ज्याला । तुळजा मदत शिवराजाला ॥
भोग पुरला खानाचा । अबदुल जावळींत आला ॥
बिनहत्याराविण मोकळा । अबदुल सदरेलागीं आला ।
अबदुल पहिले सदरे गेला । सदर देखुनी सुखी झाला ॥
’ऐशी सदर नव्हती । आमच्या आली इदलशाला ॥”
खान दुसरे सदरे गेला । सदर देखुनि सुखी झाला ॥
’ऐशी सदर नव्हती । नवरंगशा बाच्छायाला” ॥
अबदुल तिसरे सदरे गेला । सदर देखुनि सुखी झाला ॥
“ऐसी सदर नाहीं अवरंगशा बाच्छायाला” ॥ अबदुलखान बोलिला ।
“शिवाजीस आणा भेटायाला” ॥२२॥
चौक २३
राजा नवगजींत बैसला । मोरो, शाम बोलविला ॥
रघुनाथ पेशवे । नारो शंकर पाचारिला ॥
दहातोंडया माणकोजीला । त्या इंगळ्या सुभानजीला ॥
देवकांत्या जीवाजीला । राजानें बोलाविले तुम्हांला ॥
करनखर्‍या सुभानजीला । बेलदारा पिलाजीला ॥
त्या बोबडया बहिरजीला । सरदार आले भेटायाला ॥२३॥
चौक २४
राजा विचारी भल्या लोकांला । “कैसें जावें भेटायाला” ॥
बंककर कृष्णाजी बोलला । “शिवबा सील करा अंगाला” ॥
भगवंताची सील ज्याला—-। आंतून, (तो) बारिक झगा ल्याला ॥
मुसेजरीच्या सुरवारा । सरजा (जें) बंद सोडुन दिला ॥
डावे हातीं बिचवा त्याला (ल्याला) । वाघनख सरज्याच्या पंजाला ।
पटा जिव म्हाल्याप दिला । सरजा बंद सोडुन चालिला ॥२४॥
चौक २५
“माझा रामराम दादानु” ॥ गडच्या गडकर्‍या बोलिला ॥
जतन भाईनु करा । आमच्या संभाजीराजाला ॥
सराईत उमाजी राज्य (राजा) होईल तुम्हांला ॥
गड निरवितो गडकर्‍याला राज्य निरवितो नेतोजीला ॥
निरवानिरव दादानु । विनंती केली सकलीकाला ॥
“येथुनि सलाम सांगा । माझा शहाजी महाराजाला” ॥
खबर गेली जिजाऊला । शिवबा जातो भेटायला ॥
पालखींत बैसुनी । माता आली भेटायाला ॥२५॥
चौक २६
शिवबा बोले जिजाऊ सवें । “बये वचन ऐकावें ॥
माझी आसोशी खानाला । “बये जातों भेटायाला” ॥
जिजाऊ बोले महाराजाला । “शिवबा न जावें भेटायाला ॥
मुसलमान बेइमान । खान राखिना तुम्हांला” ॥
राजा बोले जिजाऊला । “येवढी उंबर झाली भेट दिली नाहीं कोणाला ॥
येवढी गोष्ट माते । आज द्यावी मला ॥
आई अबदुलखान आला ॥ यानें धाक लाविला देवाला” ॥
जिजाऊ बोले महाराजाला । “शिवबा बुद्धिनें काम करावें ।
उसनें संभाजीचें घ्यावे” ॥२६॥
चौक २७
जिजाऊ घेती अलाबला । “शिवबा चढती दवलत तुला ॥
घे यशाचा विडा” । शिवबा स्मरे महादेवाला ।
गळां घातली मिठी । मातेच्या चरणासी लागला ॥
ध्यानीं आठवुनी भगवंताला । शिवाजी राजा सदरे गेला ॥२७॥
चौक २८
“पहिला सलाम । माझा भवानीशंकराला ॥
दुसरा सलाम । माझा शहाजी महाराजाला ।
तिसरा सलाम । अमचे अबदुलखानाला ” ।
शिवाजी सरजे सलाम केला । अबदुलखान (नानें) गुमान केला ॥
मनीं धरलें कपट । पुरतें कळलें महाराजाला ॥
मग तो शिवाजी सरज्याला । खान दापुनी बोलला ॥
“तूं तो कुणाबीका छोकरा । सवरत बाच्छाई सदरा” ॥२८॥
चौक २९
इतक्या उपरी राजा बोले । त्या अबदुलखानाला ॥
“खाना ज्याची करणी त्याला । कांहीएक भ्यावें रघुनाथाला ॥
तुम्ही जातीचे कोण । आम्ही जाणतों तुम्हाला ॥
तूं तरी भटारनीका छोरा । शिवाजी सरज्यापर लाया तोरा” ॥
यावर अबदुल बोलला ॥ “शिवा तुम चलो विजापुराला” ॥
“शिवाजी सरजे नेतां । बहुत दिन लागतील खानाला ॥
कळला पुरुषार्थ । तुमचा बसल्या जाग्याला” ॥२९॥
चौक ३०
“अबदुल जातका भटारी । तुमने करना दुकानदारी” ॥
इतकिया उपरी । अबदुल मनीं खवळिला पुरा ॥
कव मारिलि अबदुल्यानें । सरजा गवसून धरला सारा ॥
चालविली कटयार । सीलवर मारा न चाले जरा ॥
सराईत शिवाजी । त्यानें बिचव्याचा मारा केला ।
उजवे हातीं बिचवा त्याला । वाघनख सरजाच्या पंजाला ॥
उदरच फाडुनी । खानाची चरबी आणिली द्वारा ॥३०॥
चौक ३१
खान “लव्हा लव्हा” बोलिला । खानाचा लव्हा बेगिन आला ॥
राजानें पट्टा पडताळिला । अबदुलखानानें हात मारिला ।
शिरींचा जिरेटोप तोडला । सरजा(ला) जरासा लागला ।
भला सराईत शिवाजी । पटयाचा गुंडाळा मारिला ॥
मान खांदा गवसुनी । जानव्याचा दोरा केला ॥
अबदुलखान शिवाजी दोनी । भांडती दोनी धुरा ॥
बारा हजार घोडा । सरदार नाहीं कोणी तिसरा ॥३१॥
चौक ३२
अबदुलखान झाला पुरा । कृष्णाजी ब्राह्मण उठावला ॥
शिवाजी राजा बोलला । “ब्राह्मणा मारुं नये तुला ।
तुजशीं मारतां शंकर हांसेल आम्हांला” ॥ नाइकतां ब्राह्मणें ।
हात दुसरा मारिला । “ब्राह्मणा मारुं नये तुला ।
क्रिया शहाजीची आम्हांला” ॥ कृष्णाजी ब्राह्मण(णें) ।
हात तिसरा टाकिला ॥ (तरी) होईल ब्रह्महत्या भोंसल्यासी ।
( म्हणून ) शिवांजीनें राखिला ॥ कृष्णाजी ब्राह्मण मागें सरला ।
सैद बंडु मोहरे आला ॥ जवळ होता जिउ म्हाल्या ।
त्यानें सैद पुरा केला ॥३२॥
चौक ३३
संशय खानाचा फिटला । खान (नें) पळतां पाय काढिला ॥
मेळविला भोयांनीं । पालखींत घालून चालविला ॥
कावजीचा संभाजी भोंसला । मोठे उडीनें आला ॥
जखमा केल्या भोग्यांच्या पाया(ला) । खटारां धरणीवर पाडिला ।
शिवाजीराजा बेगिन आला । शिर कापुनी गडावर गेला ॥
जराचाच मंदिल । शिरीं त्या संभाजीचे घातला ॥
फाजिलखाना क्रोध आला । बाण आणि बंदुखा थोर वर्षाव एकच केला ॥
शिवाजीराजाचा चपाटा । फाजिलखान बारा वाटा ॥
हाल महाराजाचे झाले । अबदूलच्या लोकांला ॥३३॥
चौक ३४
प्रतापगडाहुनि केला हल्ला । मारिती खुण सरज्याच्या लोकांला ॥
धरल्या चारी वाटा । ज्यांनीं घाट बळकाविला ॥
दळ त्या समई । पायदळाचा कडका आला ॥
सिलीमकर, खोपडया, । काकडया, सुरव्या, लोटला ॥
अंगद हनुमंत रघुनाथाला । पायचे पायदळ शिवाजीराजाला ॥
“फिरंग ठेवी जाउद्या, त्याला । राखु नका तुम्ही उगारल्या पाइकाला” ॥
फत्ते महाराजाची झाली । वाट दिली कुलवजीराला ॥३४॥
चौक ३५
पळतां फाजिलखान । त्याचा दुमाळा घेतला ॥
माघारा फिरोनि । जान(नें) हातीचा आरोबा दिला ॥
शिवाजीचे हाल । फाजिलखान घाय (यें) पुरा केलाअ ।
घोडा आणि राऊत । ज्यांणीं पाडाव केला ॥
वळल्या हातीवरल्या ढाला । चार हजार घोडा अबदुल्या जावळींत बुडविला ॥
भवानी शंकर प्रसन्न ज्याला । यश राज्याला खंडयाला ।
सरज्या तोरड महीमोर्तब शिवाजीला । फत्ते झाली महाराजाची ते वेळ पन्हाळा घेतला ॥३५॥
चौक ३६
अज्ञानदास विनवी श्रोत्याला । राजा अवतारी जन्मला ॥
नळनीळ सुग्रीव जांबूवंत । अंगद हनुमंत रघुनाथाला ॥
एकांती भांडन । जैसें राम रावणाला ॥
तैसा शिवाजी सरजा । एकांती नाटोपे कवणाला ॥
दृष्टी पर्यस शिवाजीला । कलीमधीं अवतार जन्मला ॥
विश्वाची जननी । अंबा बोले शिवाजीला ॥
मोठें भक्तीचें फळ । महादेव भाकेला गोंविला ॥
जिकडे जाती, तिकडे यश राज्याच्या खंडाला ॥३६॥
चौक ३७
माता जिजाऊ बोलली । पोटीं अवतार जन्मला ॥
शंकपाळ शिवाजी महाराजानें केला । आतां मी गाईन ।
भोंसले शिवरायाच्या ख्याति ॥ दावा हेवा जाण ।
अखेर संग्रामाच्या गति ॥ राजगड राजाला ।
प्रतापगड जिजाऊला ॥ धन्य जिजाऊचे कुशी ।
राजा अवतार जन्मला ॥ आपल्या मतें अज्ञानदासानें ।
बीरमाल राज्याचा गाइला ॥ शिवाजी सरज्यानें ।
इनाम घोडा बक्षीस दिला ॥ शेरभर सोन्याचा ।
तोडा हातांत घातला ॥ यश जगदंबेचें ।
तुळजा प्रसन्न शिवराजाला ॥३७॥


शिवाजी महाराज पोवाडा – तानाजी मालुसरा

चौक १ (चाल-“सांग सखे सुंदरी इ०”)
राजगड राजाचा । प्रतापगड जिजाबाईचा ॥
सिंहगड पन्हाळा ॥ पहा त्या मोंगलाचा ॥
सरजा शिवाजी शिवभजन । काबिज केलें तळकोंकण ॥
गड माहुली घेतली । कल्याण भिंवडी काबिज केली ॥
खबर त्या विजापुराला गेली । ठाणें राजाचें बसलें ॥
शिवाजी महाराज राजगड किल्ल्यावर बसले ॥
जिजाबाई माता । आहे प्रतापगडावरी ॥
सोमवाराच्या दिवशीं । हातीं हस्तनाची फणी ॥
उगवते बाजुला नजर गेली । नजर सिंहगडावर गेली ॥१॥
चौक २
बारा मावळ पुण्याखालीं । बारा मावळ जुनराखालीं ॥
पुण्याच्या तोंडाला जेजुरीच्या बारीला । किल्ला सिंहगड पाहिला ॥
नवें कोंबडीचें अंडे । ऐसा किल्ला सिंहगड झळकला ॥
ऐसा पंतोजी तो काका । त्यानें हुजर्‍या बोलाविला ॥
“जावें राजगड किल्ल्याला । अंचवावें प्रतापगडाला” ॥२॥
चौक ३
शिवाजी महाराज पांच पोषाख नटला । पाई तुमानी सुरवारी चढविल्या ॥
अंगी किनखाप घातले । शिरीं जिरीटोप घातला ॥
हातीं वाघनखें घालून । कृष्ण घोडीला जिन केला ॥
ढाल पाठिवरी टाकिता झाला । सोनसाळीं पट्टा हातांत घेतला ॥
कृष्णघोडीला चाबुक केला । आला मढयाच्या घाटाला ॥
घाट मढयाचा उतरला । आला बिरवाडी गांवाला ॥
गांव बिरवाडी सोडिला । आला पोलातपुराला ॥
पोलातपुर पाराचा वेंघला ॥ आले प्रतापगड किल्ल्याला ।
सलाम जिजाबाईला केला ॥३॥
चौक ४
“धाडला तुम्हीं हुजराचा जासूद । काम सांगावें आम्हाला ” ।
“शिवाजी महाराज । डाव फांशाचा खेळावा” ॥
“डाव खेळावा उमाजी यानें । तूं माता मी तुझा पुत्र ॥
डाव खेळावा मातेसंगें । हें आमचें महत्त्व नव्हे” ॥
“मायलेकरांचा डाव । ह्यामधिं काही गुंता नाहीं”॥
येवढया जाबावरुन । ज्यानें तिवड मांडिली ॥
हातीं फांसा ह्यानें घ्यावा । “डाव पहिला येऊं दे तुला ॥
मी बायकोची जात । पहिला डाव येऊं दे तुझा” ॥४॥
चौक ५
हातीं फांसा जो घेतला । बारा बारा तो बोलला ॥
फांसा जमिनीवर फेकला । त्याचा तिरपगडा पडला ॥
तिरपगड पडला । त्याची बेती हो पडली ॥
बेती हो बोलला । त्याचे बारा जे पडले ॥
तिन डाव गेले ज्याचे । त्या शिवाजी महाराजाचे ॥
“जिजामाई ग माते । आता डाव येऊं दे तुझा” ॥
येवढया जाबावरुन । बाईनें हाती फांसा घेतला ॥
“प्रतापगडची भवानी देवी । तूं पाव माझ्या नवसाला” ॥
बारा रे बोलली बाई । बाईचे बारा रे पडले ॥
बाई बेतीन बोलली । बाईचे बेतीन पडले ॥
तिरपगडें बोलली । बाईचे तिरपगडें पडलें ॥
जिजाबाईचे डाव पुरे रे झाले ॥५॥
चौक ६
“ऐक जिजाबाई । सत्तावीस किल्ल्यांचा मी राजा ॥
माग माग जिजाबाई । जें मागाल तें देतों तुज ॥
नाशकाची बारी सांवताची वाडी । ह्यांतून किल्ला मागून घ्यावा ॥
तुंक तिकोना लघुगड किल्ला विसापुर । हयांतून कन्‌चा मागून घ्यावा ” ॥
’ह्यांतून नको मला बाळा । पुण्याचे तोंडाला ॥
आहे जेजुरीच्या बारीला । पुरंदर किल्ल्याला ॥
बारे पुरंदर किल्ला (ल्लयाला) । आहे सिंहगड किल्ला ॥
घेऊन द्यावा मला । आयुष्य मागेन तुझ्या राज्याला” ॥
नांव घेतां सिंहगडाचें । राजा थरथरां कांपला ॥
“हा किल्ला उदेभान मोगलाचा । बाई उदेभान मोगलाचा ॥
जे उमराव गेले सिंहगडाला । त्यांच्या पाठी ग पाहिल्या ॥
नाहीं पुढे पाहिले । किल्ला आहे वाघाचा जबडा ॥
सत्ताविस किल्ल्यांची बारी । ह्यांतून मागावा बाईनें” ॥
“नाहीं सिंहगड किल्ला दिल्या । मी शाप देईन ॥
राज्य जाळून टाकीन उभे” । “नको बाई चल माझ्या राजगड किल्ल्याला” ॥६॥
चौक ७
बारा भोयांची पालखी । आंत बाईला बसविली ॥
राजगड किल्ल्याला । शिवाजी महाराज जाऊन तक्तावर बसले ॥
ज्यानें वात लावूनी । जात शोधाया लागले ॥
’सिंहगड किल्ला घेणें । मला कोणी उमराव दिसेना’ ॥
प्रहर रात्रीपासुनि । बारांचा अंमल झाला ॥
प्रतापगडाखालीं । उमराठया गांवाला ॥
ज्यानें उमराव शोधिला । माझा तान्या मालुसरा ॥
तानाजी सुभेदार । पन्नास माणसांचा सरदार ॥
शिवाजीराजाचे राज्यास । ऐसा उमराव होणें नाहीं ॥
किल्ला घेईल सुभेदार । तानाजी सुभेदार ॥
खरखर लखोटा लिहीला । ज्यानें हुजर्‍या बोलविला ॥
“जावें उमराठया गांवाला । तानाजी सुभेदाराला ॥
तीन दिसांचा वायदा जो केला ॥ बारा हजार फौज ती घेऊन भेटावें तिसर्‍या दिवसाला ॥७॥
चौक ८
पंतोजी तो काका । ज्यानें लखोटा घेतला ॥
ज्यानें राजगड तो सोडिला । आला येल्याचे पेठेला ॥
पेठ येल्याची सोडिली । आला डोणीचे पाण्याला ॥
घाट मढयाचा उतरला । आला बिरवाडी गांवाला ॥
हुजरा तेथून निघाला । आला कोलातपुराला ॥
तेथून निघाला । गेला उमराठया गांवाला ॥
सवा प्रहर दिवस आला । तानाजी सुभेदार सदरेला बैसला ॥८॥
चौक ९
जासूद महाराजांचा पाहिला । तानाजी सुभेदार सुखी झाला ॥
पोटीं रायाबा तो बेटा । सयंवर बाळाचें मांडिलें ॥
काढल्या पंचमीच्या हळदी । काढलें षष्ठीचें लगिन ॥
लगिन बाळाचें मांडिलें । आली सिंहगडची कामगिरी ॥
लगिन रायाबाचें राहिलें । ज्यानें उमराव बोलाविले ॥
ज्याचा शलोर तो मामा । ज्याचा सूर्याबा तो बंधु ॥
येसा कणकर रुमाजी दादा । ज्यानें सरदार बोलाविला ॥
“माझ्या शेलार तूं मामा । आली सिंहगडची कामगिरी” ॥
दादा परपर बाबाजी । ज्यानें हुजर्‍या बोलाविला ॥
मिषा तोड मकाजी । ज्यानें हुजर्‍या बोलाविला ॥९॥
चौक १०
मामा बोलाया तो लागला । ऐंशीं वर्षांचा म्हातारा ॥
“लगिन राहिलें रायबाचें तो मजला सांगावी । माझ्या तानाजी सुभेदारा ।
जे गेले सिंहगडाला ॥ त्याचे पाठिरे पाहिले ।
नाहीं पुढारे पाहिले । ज्यानें आंबारे खाईला ।
बाठा बुरजा लाविला ॥ त्याचे झाड होउनि आंबे बांधले ।
किल्ला हातीं नाहीं आला ॥ सिंहगड किल्ल्याची वार्ता ।
काढूं नको तानाजी सुभेदारा ॥ जे गेले सिंहगडाला ।
ते मरुनशानी गेले ॥ तुमचा सपाटा होईल” ।
“असें बोलूं नको रे मामा ॥ आम्ही सूरमर्द क्षत्री ।
नाहीं भिणार मरणाला” ॥१०॥
चौक ११
मग रायाबा तो बेटा । बाबाच्या जवळ आला ॥
“ऐक ऐक माझ्या बाळा । जातों आम्ही सिंहगडाला” ॥
“माझें लगिन करील कोण ?” ॥ रायाबा पुसे बाबाला ॥
“साता नवसांचा माझा रायाबा । त्याचें लगीन मागीन ॥
भिऊं नको माझे बाळा । जातों राजगड किल्ल्याला ।
जाउन सांगतो महाराजाला ॥ सात दिवसांचा वायदा ।
घेऊन येतों तुझ्या लग्नाला ॥ आहे मी महाराजांचा चाकर ” ।
लखोटा हातांत घेतला ॥ ज्यानें एका लखोटयाचे ।
बारा लखोटे केले ॥ धाडले कागद खोर्‍याला ॥
मोठया मोठया सरदारांला ॥ पंधरा गांवचे पारुंचे ।
ज्यानें आपणांजवळ बोलाविले ॥ दसपटिचे मोकाशी ।
त्यानें आपणाजवळ बोलाविले ॥ उमराठयाचे शिरके ।
त्यानें आपणांजवळ बिलाविले ॥ नांदविचे सावंत ।
त्यानें आपणांजवळ बोलाविले ॥ वडघरचे नाईक ।
त्यानें आपणांजवळ बोलाविले ॥ सिलमाचे ठाकूर ।
त्यानें आपणांजवळ बोलाविले ॥ बारा हजार फौजेला ।
ज्याचा लखोटा पोंचला ॥११॥
चौक १२
’अरे फलाणाचे फलाणा । घाव घाला निशाणा’ ॥
बारा हजार लोक, बिनहत्यारी । होते. सैन्य बोलाया लागलें ॥
बिनहत्यारी लोक । कसे जाऊं महाराजांचे भेटिला ।
ज्यानें सैन्य पाहिलें । बारा हजार लोक बिनहत्यारी आले ॥
आंकडया कोयत्या त्या कमरेला । टापसीच्या खोळा डोईवर घेतल्या ॥
हातीं सोडा घेऊन । सलाम त्यांनीं केला सुभेदाराला ॥
माझे तानाजीची हिम्मत । म्हणून मिळाली जमात ॥
त्यानें पेटारा उघडिला । बारा हजार रुपया बाहेर काढिला ॥
बारा हजार मनुष्यें । त्यांचे हातांमधिं दिला ॥
’दाढि होई रे करावी । चिरी मिरी रे घ्यावी ॥
चला महाराजांचे भेटिला । राजगड किल्ल्याला” ॥१२॥
चौक १३
बारा हजार फौज बोलूं लागली । मनीं विचार त्यानें केला ॥
“जातों राजगड किल्ल्याला । धनगर अडविल बायकोला ॥
अब्रु घेईल आमुची । बारा हजार रुपया त्यांनें मागें लावून दिला ॥
सुभेदार बोले त्या सेनेला । “बारा हजार रुपया काय केला ॥
घेतलें धनगराचें घोंगडें । त्याला मागें लावून दिला” ॥
बारा भोयांची पालखी सवारिली । तोरण पालखीला बांधिलें ।
पाय दिला पालखीमध्यें । हात पालखीला दिला ॥
रायाबा तो बेटा । बाबाच्या आडवा येणार झाला ॥
“माझें लगीन करिल कोण । तुम्ही जातां सिंहगडाला” ॥
“भिऊं नको बेटा । तुझे मी येतों लग्नाला ।
आधीं लगीन सिंहगडचें । मग करीन रायाबाचें” ॥१३॥
चौक १४
हुकूम ज्यानें भोयांला केला । आले नगरीचे वेशीला ॥
तोरण पालखीचें तुटून उजव्या बाजूवर पडलें ॥
माझ्या शेलार तूं मामा । आम्ही जातों सिंहगडाला ॥
अपशकुन झाला । माझ्या तानाजी सुभेदाराला ॥
तानाजी सुभेदारानें । ह्याचा गुमान नाहीं केला ॥
गेला गांवाच्या शिवेवर । ज्याला आडवा तास गेला ॥
मग तो शेलार मामा बोलला । तानाजी सुभेदाराला ॥
“तानाजी सुभेदारा । मोहोरें बरें नाहीं होणार” ॥
“राजा शिवाजीचें देणें । अढळपदीं सोनें !” ॥१४॥
चौक १५
“अपशकून मानूं नये । ज्यानें हर हर वाहिला” ॥
गांव उमराठें सोडिलें । पांचकर्णांचा बाजा केला ।
आले त्या पोलातपुराला । पांचकर्णांचा बाजा केला ।
गेले बिरवाडी गांवाला । पांचकर्णांचा बाजा केला ।
घाट मढयाचा वेधला । गेले डोणीचे पाण्याला ॥
गलीम तेथुनि निघाला । गेला येल्याच्या पेठेला ॥
गलीम तेथुनि निघाला । गेला रायगडच्या पोटाला ॥
बारांच्या अंमलांत । गेले किल्ल्याच्या पोटाला ॥
बारा हजार फौज चाले । धुरळा गगनास गेला ॥१५॥
चौक १६
हिरव्या बुरुजावरुन । जिजाबाईनें पाहिला ॥
“माझ्या शिवाजीमहाराजा । गलीम वैरियाचा आला ॥
तोफांला आग घाला । गलीम मारावा किल्ल्याखाला” ॥
शिवाजी महाराजानें । गलीम नजरेनें पाहिला ॥
तो शिवाजी महाराजाचा । भगवा झेंडा ओळखिला ॥
“माझे जिजाबाई माते । आमचा तानाजी सुभेदार आला” ॥
नांव घेतलें सुभेदाराचें । बाई गदगदां हांसलि ॥
सेना तानाजीची पाहिली । मनांत संतोषित झाली ॥१६॥
चौक १७
बारा हजार फौज घेऊन । सुभेदार दरवाजाला आला ॥
पहिल्या सदरे जमाडिला । सूर्या गगनीं लखाकला ॥
दुसर्‍या सदरेमधीं । कमरकमर कापुस टाकला ॥
तिसर्‍या सदरेमधीं । ज्यानें चांदवे बांधिले ॥
चवथ्या सदरेमधीं । हंडया झुंबर बांधिले ॥
पाचव्या सदरेमधीं । महाराज शिवाजी बैसले ॥
सुभेदार सलामाला गेला । महाराजावर घुसा केला ॥
“मागचे दिवस मागल्यापरी । मोहरिल दिवस मोहरल्यापरी ॥
माझ्या बेटयाचें लगीन, तुम्हीं जासूद धाडिला । तुमचा काय वाद केला ?” ॥
“ऐक तानाजी सुभेदारा । आमची कामगिरी नव्हे तुम्हांला ॥
जिजामातेनें बोलाविलें” । दोघांचा जबाब जिजाबाईनें ऐकिला ॥
जिजाबाई बोलाया लागली । “मी जातीनें बाईल ॥
आतां सुभेदार येईल । माझी अबरु घेईल” ॥१७॥
चौक १८
सर्व शृंगार नटली । धांवा अंबाबाईचा मांडिला ॥
“भले भले अंबाबाई । तानाजी सुभेदार आला ॥
इच्छेप्रमाणें होऊं दे ।” सिंहगड किल्ल्याची पंचारती केली ॥
गेली सुभेदाराला ओंवाळायला । “तुझे जाऊं अलाबला ॥
तानाजी सुभेदारा । चढत्या दवलतीचें राज्य येऊं दे तुला” ॥
सुभेदाराला ओंवाळितां । त्याचा राग निघून गेला ॥
ज्याला वर्तली चिंता । ही आहे महाराजांची माता ॥
इच्या आरतीला । मी घालूं काय आता ॥
ज्यानें मंदिल काढिला । बाईचे पायांवर ठेविला ॥
जिजाबाई बोलली । तानाजी सुभेदाराला ॥
“माझा सुभेदार शाहाणा ।” हात मस्तकी ठेविला ॥
“माग माग जिजाबाई । जें मागशील (तें) देतों तुला” ॥
“काय मागूं सुभेदाराला ? । ह्या म्हातारपणीं सिंहगड किल्ला ॥
घेऊन द्यावा मला । आयुष्य मागेन तुझ्या राजाला ॥
माझा शिवाजी थोरला माझा तानाजी धाकटा । लेकाचें वाण दिलें त्याला” ॥१८॥
चौक १९
सुभेदार तेथुन निघाला । आपल्या सेनेमधिं आला ॥
शेलार त्याचा मामा । त्याला पुसाया लागला ॥
“गेला बाईच्या भेटीला । तुम्हीं काय मजकूर केला” ॥
“काय सांगू शेलारमामा । जाणें आहे सिंहगडाला” ॥
जावें जावें बाईच्या भेटीला । बारा हजार फौज आली तुझ्या ग कामाला ॥
नाहीं गाढव वळायाला । जेवण कर बारा हजारांला मग आम्ही जाऊ सिंहगडाला” ॥
“माझ्या सुभेदार बाळा । तुजवर घातलें गडाचें ओझें” ॥
“भला भला सुभेदारा । यावें जेवायाला ॥
आहे गडाची रे वस्ती । येथें अन्न रे मिळेल ॥
नाहीं मिळायाचें पाणी । जावें गुंजवर्‍या नदीला ॥
आंघोळ करायाला । मग यावें जेवायाला” ॥१९॥
चौक २०
बारा हजार फौजेनिशीं । सुभेदार गडाखालीं उतरला ॥
गडाखालीं उतरुन ज्यानें विचार काढिला । मग त्या शेलार मामानें ॥
विचार काढिला । “भला भला रे सुभेदारा ॥
तीन कोस जावयाला वेळ फार झाला । धोपर संध्या रे करा ॥
चला जाऊं रे जेवणाला” । बारा हजार फौजेतून ॥
एकटा सुभेदार गेला । गुंजवर्‍या नदीला ।
आंघोळ करायाला ॥ ज्याने आंघोळ संध्या केली ।
आला आपल्या फौजेमधीं ॥ बारा हजार घेऊन ।
आला दरवाजाचे तोंडीं ॥ ज्यानें सैंपाक पाहिला ।
बारा हजार पाट मांडला ॥ बारा हजार दुरुन ।
बारा हजार पंचपात्री ॥ बारा हजार लाविला ठाव ।
सैंपाक वाढून त्वरीत झाली (ला) ॥२०॥
चौक २१
ज्यानें सैंपाक पाहून । हुर्द ज्याचें भरुन आलें ॥
“आग लागो जेवणाला । माझा बाळ अंतरला” ॥
ज्याचा शेलार तो मामा । बोलाया लागला ॥
“भला भला सुभेदार । ऐंशीं वर्षांची उमर ॥
ह्या रे जिजाबाईची । एकटी वाढील रे कुणाला” ॥
मामा बोले सुभेदाराला । “अठरा शाखा अठरा भाज्या ॥
एक ठिकाणीं करा । जेवण वाढिलें फौजेला” ॥
अर्धे उठून उभे राहिले । बारा हजार फौजेनें एकच गर्दी केली ॥
कोणी करतो पोळी पोळी । कोणी करतो खीर खीर ॥
कोणी करतो भाजी भाजी । कोणी करतो डाळ डाळ ।
ज्यानें एकच गर्दी केली । जिजाबाई माता बहुत श्रमी झाली ॥
धांवा अवघा मांडिला । “प्रतापगडची भवानी धांव संकटाला” ॥
पांचजणी देवी । धांवुनिया आल्या ॥
सैंपाक वाढाया लागल्या । ऐकेनात कुणाला ॥
ज्याचा मापटयाचा आहार । त्याचा अधोलीचा झाला ॥
ज्याच्या मोहरें पांच पोळ्या ॥ याच्या पंधरा पोळ्या झाल्या ॥
खाववतील त्यानें खाव्या । उरतील त्यांनीं गडाखालीं टाकाव्या ॥२१॥
चौक २२
बारा हजार फौज । जेऊन तृप्त झाली ॥
तानाजी सुभेदार गेला । शिवाजीच्या मुजर्‍याला ॥
“आम्ही जातों सिंहगडाला । आमचा रायाबा संभाळा ॥
जर आलों सिंहगडाहून । लगीन करीन रायाबाचें ॥
जर गेलों तिकडे मेलो । लगीन करा रायाबाचें ॥
मज बापाची सरदारी । द्यावी रायाबा बेटयाला ।
दिवटी बुदलीची जहागीर । द्यावी रायाबा बेटयाला ।
डोजगांव द्यावा पानसुपारिला । मालसर्‍याला दंड द्यावा इनाम खायाला” ॥
सुभेदार तेथून निघाला । आला बाईचे भेटिला ॥
डोईचा मंदिल काढला । बाईच्या चरणावर ठेविला ॥
“आम्ही जातों सिंहगडाला । माझ्या बेटयाला सांभाळा” ॥
बाईनें पेटारा उघडिला । पांच पोषाख काढिले ॥
त्या ग सुभेदाराला दिले । ’यांतून जरि जगून (जिंकून?) तू आला ॥
नव पोषाख करिन तुला’ । ज्यानें पोषाख तो केला फौजेमधीं गेला ॥२२॥
चौक २३
शेलार मामानें पाहिला । “माझ्या ऐक सुभेदारा ।
बारा हजार फौज आली रे तुझ्या कामाला ॥ हा पोषाक तो घ्यावा नेऊनशानी द्यावा ।
देशील तर द्यावा बारा हजाराला” । येवढया जाबावरुन ।
बाई मनीं चरकली ॥ काय सांगू सुभेदाराला ।
देईन बारा हजाराला ॥ चढविन सिंहगडची पायरी ।
बाईनें कोठार उघडिले ॥ ’मोहरे येर’ बारा हजार तलवार ।
बारा हजार काढिल्या ढाला ॥ बारा हजार गूर्दा ।
बारा हजार सिंगडा ॥ बारा हजार चौकडा ।
बारा हजारांना तोडा ॥ बारा हजार पोषाक ।
बारा हजारांना केसरी झगा ॥ घेरदार, बारा हजार ।
कोणी उमराव समजेना ॥ एकापेक्षां एक अधिक ।
दादा फौज निघाली ॥२३॥
चौक २४
’माझे जिजाबाई माते । माझ्या बाळाला सांभाळा” ॥
तानाजी सुभेदार । बारा भोयाचे पालखीमधिं बसला ॥
सर्व सेनेला मग तो मुजरा केला ॥ बसा बसा दादांनो ॥
आम्हीं जातों सिहगडाला । आमचा रामराम तो घ्यावा ॥
ज्यानें राजगड तो सोडीला । पांच कर्णांचा बाजा केला ॥
गलीम तेथून निघाला । साखरेच्या मुक्कामी गेला ॥
पांच कर्णांचा बाजा केला ॥ गलीम तेथून निघाला ।
गेला खामगांवाला । पाच कर्णांचा बाजा केला ॥
गलीम तेथून निघाला । गेला डेर्‍याच्या मुक्कामी ॥
पांच कर्णांचा बाजा केला । गलीम तेथून निघाला ॥
गेला सिंहगडच्या पोटाला । तेथुनि कर्णा बंद केला ॥२४॥
चौक २५
गलीम आनंदी, बारीला । दबा दिला भला ॥
माझ्या शेलार मामानें काळी घोंगडी हांतरिली । विडे पैजेचे मांडले ॥
“ज्यानें विडा उचलावा । त्यानें जावे सिंहगडाच्या माहितीला ॥
माहिती काढून येईल त्याला । छत्री घोडा इनाम त्याला, बारा गांव इनाम देईन त्याला” ॥
ज्या वीरांच्या वरती माना । त्यांनीं खालती घातल्या ॥
हात कोणी लाविना विडयाला । तानाजी सुभेदार भला ॥
त्यानें हात विडयाला घातला ॥ विडा मंदिलीं खोंविला ॥२५॥
चौक २६
“सूर्याबा रे बंधु आरता येरे माझ्या दादा । आम्ही जातों सिंहगडाला ॥
जगुनशानि आलों । लगीन करुं रायाबाचें ॥
गेलों तिकडे मेलों । लगीन करा रायाबाचें” ॥
तानाजी सुभेदार त्यानें पोषाक काढिला । पाटलाचा थाट केला ॥
जंगल लागलें दारुण । वेळु करकरां वाजती ॥
लागलें चिंवारीचें रान । लागलें आळविचें रान ॥
आरीबोरीचें दारुण । वाट नाहीं रे जावयाला ॥
काळोखी रात्र । वाट नाहीं रे जावयाला ॥
वन धुंडाया लागला । वाट मिळेना जावयाला ॥
सुमार पाहाया लागला । बारे धोंडीवर चढला ॥
गेला कोळ्याचे ग्याटाला (म्याटाला) । बारा जण कोळी होते पहिल्या ग्याटाला (म्याटाला) ॥
त्यानें सुभेदार पाहिला । “मारा मारा ह्या चोराला” ॥
सुभेदार बोलाया लागला । “भ्यालों ह्या चोराला ॥
हे ठार मारतील मला” । “चोर असलों ठार मारा ॥
राव असलों तर काय मरतां । बायकोच्या याराला ? ॥
जरा बत्ती तुम्ही लावा । यावें मला पाहावयाला” ॥२६॥
चौक २७
पहिल्यानें सरदार पाहिला । “धन्य याची नारायणा ॥
कोण तुमचें नांव गांव । येवढे सांगावें आम्हांला ” ॥
“मी साखरेचा पाटील । गेलों होतों पुण्याला ॥
मंडईच्या वाडयांत । गेलों होतों पट्टी लावायाला ।
जात होतों घराला । तेथें वाघानें आडविला ॥
तुमच्या आलों आश्रमाला ॥ भले भले रे दादांनों ॥
घाईनें निघालों । पान खायला विसरलों ” ।
पान द्यावें खायाला ॥ ऐक ऐक दादा ।
ह्या बारा वर्षामधीं पान खाल्लें नाहीं ” ॥ बटवा खाकेचा सोडिला ।
यानें विडे जे काढिले ॥ बारा त्या कोळयाला ।
यानें बारा विडे दिले आफुमाजुमाचे विडे कोळ्यांला दिले ।
कोळी झिंगूनशानी गेले ॥२७॥
चौक २८
बारा बाराजण कोळी । पहिल्या दरबाराचे गेटकरी (मेटकरी) ॥
“बारा असामींचा कोण सरदार सांगावा” । आहे मी खंडोजी नाईक बारांचा सरदार” ॥
“ऐक खंडोजी नाईक । तुमची तैनात सांगावी” ॥
“तीन रुपयांची तैनात । मला सरदाराला मिळती” ॥
ह्यानें कठी जी काढिली । दिली खंडोजी नाईकाला ॥
ज्यानें तोडा जो काढिला । दिला विठोजी कोळ्याला ॥
चौकडा काढिला । दिला मालोजी कोळ्याला ॥
बारा कोळ्यांला बारा । ऐशा वस्ता त्यानें दिल्या ॥
कोळी फितूर ते केले । “ऐक ऐक पाटीलबोवा ॥
मोठया वस्तू आम्हांला जिरतील कशा । काम सांगा आम्हांला” ॥
“काम तुम्हांला सांगेन । भाक द्यावी रे मजला” ॥
इमान ज्यानें दिलें । कोळ्यांनीं इमान दिलें ॥
“मी आहें कोणाचा कोण । नांव सांगतों रे तुम्हांला ॥
राजा शिवाजीचा उंबराव । आहे मी तानाजी सुभेदार ।
पन्नास माणसांचा सरदार ॥ आहें मी, एकला ।
आलों सिंहगडच्या माहितीला । लांबी रुंदी सांगा मला” ॥२८॥
चौक २९
नांव घेतां शिवाजीचें । कोळी खालती बसले ॥
“ऐक ऐक तानाजी सुभेदारा । शिवाजीचें कुत्रे नाहीं येत सिंहगडाला” ॥
ज्यानें वस्ता घेतल्या । त्यानें सुभेदाराच्या पुढें ठेविल्या ॥
“घे रे सुभेदारा । आल्या वाटेनें जावें राजगडकिल्ल्याला ” ॥
“ऐक खंडोजी नाईका । इमान तूं रे मला दिलें ॥
द्यावी सेजेची बाइल । पण इमान देऊं नये” ॥
येवढया जाबावरुन । कोळी सांगायला लागला ॥
“ऐका सिंहगडची माहिती । तिनकोसांचा आहे बा घेरा ॥
दिडकोचासी आहे बा रुंदी । आहे अठराशें पठाण सिंहगडाला ॥
आहे उदेभान मोंगल । दीड गाई दीड शेळी सवामण तांदूळ वेळेला ॥
अठराजणी बिब्या । आहेत त्याच्या पलंगाला ॥
घेतो तेल्याची पहार । मणगटावर घालतो ॥
सरी करुन घालतो । बिबिच्या गळ्यांत ॥
चांदवडी रुपया । दोहों बोटांनी तोडितो” ॥२९॥
चौक ३०
“आहे बाच्छायाचा हत्ती । त्याचें नांव चंद्रावळी ॥
एक बाच्छायाचा हत्ती । करिल सब दुनियेची माती ॥
उदेभानाचा प्रधान । आहे सिद्दी हिलाल ॥
एक शेळी अर्धी गाई । आदमण तांदुळ त्याचे एका वेळेला ॥
नउजणी बिब्या । सिद्दी हिलालाच्या पलंगाला ॥
बाराजण होते लेक । उदेभानाच्या पेक्षां भारी ॥
उगवत्या बाजुला । कड़ा आहे डोणागिरी ॥
तेथें आहे सोलाची जागा । डोणागिरीच्या कडयाला ॥३०॥
चौक ३१
“बसावें सरदारांनो । जातों आपल्या गोटाला” ॥
बाराजण कोळी चरण धरुन । तुम्ही काय सांगतां आम्हांला ॥
त्या मर्दाला पाहुन । कोळी रडाया लागले ॥
“शिवाजीच्या राज्यांत कोणीं । तुजसारखा सरदार नाहीं पाहिला” ।
“भिऊं नको रे दादांनो । हा किल्ला हातीं आला तर ह्या किल्याची सरदारी देईन तुम्हांला ॥
हजाराची तैनात देईन बारा असामीला” ॥ तानाजी सुभेदारानें दिला हातचा लखोटा ।
त्या खंडोजी कोळ्याला ॥३१॥
चौक ३२
सुभेदार तेथुनि निघाला । आला आपल्या फौजेला ॥
ज्याचा शेलार तो मामा । त्याच्या पुढें धावत आला ।
“तुम्ही गेला सिंहगडाला । नवस केला बहिरोबाला ॥
माझा सुभेदार येऊं दे । बारा बकरे देईन तुला ॥
तुम्ही चला हो किल्ल्याला । जातों नवस फेडायाला” ।
ऐक ऐक शेलारमामा बारा द्यावयाचे ते चोवीस देऊं । पण किल्ला येऊं दे हाताला” ॥
“बहिरोबा आहे ओंगळ । त्याचा नवस पाहिजे फेडला” ॥
“ऐक ऐक शेलार मामा माझ्या महाराजाचें देणें । अढळ पदीं सोनें ॥
नाही आम्ही बहिरोबा जाणित । साडेतिनशें देव पाणी रांजणांत भरतात ॥
ऐसा शिवाजीमहाराजा । आहे तळकोंकणचा राजा” ॥३२॥
चौक ३३
चला माझे दादांनो । हुकूम सैन्याला केला ॥
बारा हजार फौज गेली । कल्याण दरवाज्याला ॥
ज्यानें पेटारा उघडिला । काढिली यशवंत घोरपड ॥
सात शेर शेंदुर । तिच्या मस्तकीं थापिला ॥
भांग मोत्यांचा भरला । चरणीं मस्तक ठेविलें ॥
सांखळी कमरेला बांधिली ॥ यशवंत घोरपड ज्यानें किल्ल्याला लाविली ॥
अर्ध्या किल्ल्याला गेली । घोरपड माघारीं परतली ॥
आउक्ष तानाजीचें समजली । घोरपड फिरली ती सुभेदारानें पाहिली ॥
“सत्ताविस किल्ले मी घेतले । घोरपड कधीं मागें नाही फिरली” ॥
राग आला त्या मर्दाला । “मी आहे मराठयाचा पोर नाही भिणार मरणाला ॥
एक हात टाकीन । अठरा खांडोळीं पाडीन, शिळ्या भाकरीसंगें खाईन” ॥
त्या मरणाचे धास्तीनें । सात वेढे जी फिरली नखें रोऊन बसली ॥३३॥
चौक ३४
“जावें जावें शेलारमामा सोल बघायाला” । ज्यानें टिचकीनें मारिली ॥
सोलाला जोरानें लागली ॥ काळी घोंगडी जी सोडली ॥
ज्यानें बटवा जो सोडिला । बारा विडे काढिले ॥
“कोण शूर मर्द आहे क्षत्री । त्यानें विडा उचलावा, हात सोलाला घालावा” ॥
ज्या वीरांच्या वरती माना । त्यांनीं खालीं घातल्या माना ॥
सुभेदार बोलतो । “भरा बायकांच्या बांगडया” ॥
एवढया जाबावरुन । राग आला त्या सैन्याला ॥
मोहिता म्हणतो धार माझी । घाग म्हणतो धार माझी ॥
चवाण म्हणतो धार माझी । जाधव म्हणतो धार माझी ॥
गायकवाड म्हणतो धार माझी । शिरके म्हणतो धार माझी ॥
महाडिक म्हणतो धार माझी । बारा हजार फोजेनें एकच गर्दी केली ॥३४॥
चौक ३५
अरे फलाणाचा फलाणा । घाव घाला निशाणा ॥
घस्त आली मोगलांची । त्यानं कानोसा घेतला ॥
हांक मारली गेटाला (मेटाला) । खंडोजी नायकाला ॥
“किस्का गलबला मेरे भाई । एवढा सांगावा आम्हांला” ॥
खालून कोळ्याने जबाब दिला । जंगलमें धनगराचा वाडा ॥
त्यामध्यें बडा वाघ शिर्‍या । गाईकी बचडी खाते ॥
रांड पोर किचाड करते । वरती सुखी राज्य करा” ॥३५॥
चौक ३६
सुभेदार बोलतो सेनेला । “पहिली सोल शिवाजीमहाराजांची ॥
दुसरी सोल अंबाबाईची । तिसरी सोल तानाजी सुभेदाराची” ॥
पट्टे घेतले तोंडामधीं । सोल धरली हातामधीं ॥
आपल्या बेताचे माणुस पन्नास मोजीले । सुभेदार गडावर चढले ॥
पन्नास कमी बारा हजार फौज । खालीं होती, त्याने एकच गर्दी केली ॥
सूर्याबा तो बंधु । त्यानें एकच गर्दी केली । दादा वरती गेला (म्हणून) ।
बारा हजार फौजेनें हात सोलाला घातला ॥ तीन पुरुष वरती गेले ।
सोल मधीच तुटली ॥ पन्नास कमी बारा हजार ।
फौज धरणीवर पडली ॥३६॥
चौक ३७
सुभेदार तो वरती जाऊन । त्याला दोन घटका झाल्या ॥
माझ्या “शेलार तूं मामा । कां वेळ लागला फौजेला तूं जावे बघायाला” ॥
सोल पाहुन मामा । धोतरात….ला ॥
“काय सांगूं सुभेदारा । सोल ते तुटली आली मरणाची वेळा” सुभेदार बोलाया लागला ।
“नाहीं सोल रे तुटली माझें आयुष्य तुटलें ॥ ऐक ऐक शेलार मामा ।
माझ्या रायाबा बेटयाला रामराम सांगा ” ॥३७॥
चौक ३८
शेलार मामा बोलतो । “ऐक ऐक मी तुला एक तोड सांगतो ॥
आहे अठराशें फौज । किल्ल्याला अठराशे पठाण ॥
आहे उदेभान मोंगल । आहे सिद्धी तो हिलाल, आहे चंद्रावळी हत्ती ।
उडी टाका किल्ल्याखालीं । म्हणजे पहायाला नको” ॥
“भला भला शेलार मामा । उडी टाकीली तरी प्राण जायाचा ॥
पन्नास माणसाचा सरदार । सत्तावीस किंल्ल्यांचा मी सरदार, नाहीं भिणार मरणाला” ॥
शूर मर्दाची कीर्ति । धावा केला अंबाबाईचा ॥
प्रतापगडची भवानी । पाव माझ्या नवसाला ॥
सातारची मंगळाई । मग पुण्याची पर्वती ॥
तुळापुरची (तुळजापूरची) भवानी । माता पाराची वरदानी ॥३८॥
चौक ३९
पांच देवी पुढे धांवत आल्या । गळ्यांत कवडयांच्या माळा ॥
हात मारिला पाठीवर । “भिऊं नका सुभेदारा ॥
यश तुझ्या तलवारीला” । बळ देवीचें सापडलें ॥
जोर हातींचा चढविला । मागची पुढची आशा सोडली ॥
खुन डोळ्यावर चढला । “ऐक माझ्या शेलारमामा ॥
जेथें सुभेदाराचा पटा । तेथें पन्नासांचा पटा ॥
जेथें सुभेदाराचा मान । तेथें पन्नासांची मान चलचल माझ्या मामा” ॥३९॥
चौक ४०
गेले पहिले दरवाजाला । ज्यानें दिंडीनें पाहिला ॥
होती आरबाची जात । होती मोगलाची जात ॥
होती मुसलमानाची जात । अफु माजुम खाल्ली ॥
मदनमस्त झाली । ज्यानें डाव जे मांडिले ॥
कोण बारा बारा बोलती । कोण ग्यारा रे बोलती ॥
ह्याने एकच गर्दी केली । खणाखण वाजिती ॥
व्हाळ आसुदाचे वाहती । रक्त अंगाला लागलें खुन डोळ्याला चढला ॥
कोण करितो खुदा खुदा । बुधा धरणीला पडला ॥
कोण करितो अल्ला अल्ला । खाली काला जो पडला ॥४०॥
चौक ४१
पहिला दरवाजा मारिला । गेला दुसर्‍या दरवाजाला ॥
काळोखी रात्र, पार–
दुसर्‍या दरवाजाला होता । तिनशें पठाण, ज्यानें दिन दिन वाहिला ॥
मुसलमानी लोक दादा । बिनफिकिर होते, नाहीं गलीमाची माहित ॥
तानाजी सुभेदार, जैसा ठाणांत । वाघ लोटला, सेनांत ॥
पांच पट्टयांचा मारा केला । सवाघटकेमधिं तिनशें पठाण कापिला ॥
गेला तिसर्‍या दरवाजाला । होता चारशें पठाण ॥
दिन दिन ज्यानें वाहिला । चारशें पठाण कापिला ॥
एकदंर हिशेब नऊशें मनुष्यांचा झाला ॥४१॥
चौक ४२
“ऐक शेलार मामा । गलीमाचा हिशेब घ्यावा ॥
एक ह्यानें कमी । नऊशें पठाण झाला” ॥
त्यांत बोंब्या निघून गेला । उदेभान मोंगलापाशीं गेला ॥
अठरा तो पेले अफूचे । उदेभान एकटा प्याला ॥
भंगीच्या जुडया । आणि अफुच्या वडया खाल्ल्या ॥
उदेभान मोंगल मगरमस्त झाला । आठरा पलंग ज्यानें बिब्यांचे सवारिले ॥
ज्यानें लुंगिज सोडिली । ज्यानें खुंटीवर ठेविली ॥
चोन कराया चालला । तो म्होरें बोंब्या अवचित गेला ॥
“मेरे उदेभान मोंगला । आग लागो तुझ्या चोन्याला ।
सिंहगड किल्ला डुब होया । भाई नऊशें पठाण कापिला ॥
काळोखी रात्र, नाहीं गलीमाची माहित । नऊशें पठाण काटया” ॥
“x x हमारे पर बैठया । आम्ही नाहीं चोन्याला सोडताया ॥
जा बालेकिल्ल्याला । जाऊन सांगा हत्तीच्या महाताला ॥
आठरा घागरी कुसुंबा पाजा हत्तीला । अठरा अफूचे ते पेले ॥
अठरा माजुमाच्या वडया, पांच पते त्या (द्या) सोंडेला । चंद्रावळीचा हत्ती जाऊं दे कल्याणदरवाज्याला ॥४२॥
चौक ४३
सुभेदारानें काय केलें । सुभेदार बोलतो मामाला ॥
“नऊशें पठाण कापिला । माझा जीव श्रमी झाला बटवा सोडा पान खायाला” ॥
शेलार तो मामा शिणल्यावर “दादा पोट रे फुगलें” । “भला भला माझ्या मामा ॥
बाराच्या ठोक्याला । किल्ला सई करुन देतों तुला ॥
पान खाऊं दे मला” । पान जो खातांना मोहरें हत्ती धांवत आला ॥
“किस्का उमराव । मेरा भाई सांगावा मजला” ॥
“उंबराव शिवाजीमहाराजांचा । मी आहें तानाजी सुभेदार” ॥
“नऊशें पठाण कोणी काटया, सांगावें मजला” । “नऊशें पठाण आम्ही काटया” ॥
महाता बोले सुभेदार । “कुणब्याच्या पोरा काय तुझा एवढा तोरा ॥
जंगलामधीं तूं रें जावें । लकडी तोडावी त्याची मोळी ।
बांधावी जाऊन बनियाला ओपावी ॥ ज्यानी धानोर्‍या आणाव्या ।
रांडा पोरा रे घालाव्या ॥ एवढया बडया बडया सरदारी एवढया बडया तलवारी ।
कोठें होत्या तुझ्या बाला ?” ॥ सुभेदार बोले महताला ।
“ऐक भुसार्‍याच्या पोरा जाऊन ताग तूं पेरावा ॥ गोणी ताटुक वळावा ।
यावें कुणब्याच्या वाडयाला ॥ भात रुपयाचे द्यावें ।
तुझ्या रंडीनें भरडावें ॥ कणी कोंडा आपण खावा ।
तांदूळ बनियाला ओपावा ॥ एवढया बडया बडया अंबार्‍या एवढया बडया तलवारा ।
कोठें होत्या रे मुसंडया तुला ?” ॥४३॥
चौक ४४
सलाम सलाम मेरे भाई । पहिला हात येऊं दे रे तुझा” ॥
पैलवान हत्तीवर बसला । शिवी दिली हत्तीला ॥
“तेरी रंडीका नर । ह्याला पाहुन घ्यावा” ॥
हत्ती सात पावलें मागे गेला । पांच पटयाचा मारा केला ॥
“संभाळ संभाळ मेरे भाई । आतां संभाळ सुभेदारा ॥
हा हात्ती बाच्छाईचा” । “मी रे आहे महाराजांचा” ॥
पहिला हत्तीनें डोईवर मारा केला । सुभेदार भला,
हत्तीच्या पोटाखालून निघून गेला ॥ हत्तीनें मारा केला ।
बंदुकीचा गजभर चिरा जो तुटला ॥ वरुन पहिलवान बोलला ।
“सहाही पाताळ गाडिला !” राग आला सुभेदाराला ।
सात हात जमीन उडाला लाथ मारिली महाताला ॥
अल्ला म्हणून बोलला । शब्द हत्तीनें ओळखिला ॥
हत्तीने उलटा पाठीवर मारा केला । ह्या वैर्‍याला मारायाला ॥
सुभेदार सराईत भला । कावा नदरेचा राखिला ॥
सळ पटयाचा सोडिला । नऊ तुकडे सोंडेचे नऊ सांखळीचे ॥
अठरा खांडोळीं पाडिलीं । सुभेदार खालीं उतरला ॥
पन्नास माणूस लागलें हत्तीला भोकाया । शेलार मामा धांवत आला ह्याचा “भोचु दे रे बोx” ॥४४॥
चौक ४५
तिथुन बोंब्या निघून गेला ॥ “मेरे उदेभानभाई आग लागो तुझे चोन्याला ॥
“सिंहगड किल्ला डुब होया” । “हम चोन नहीं सोडताई ॥
जा पिराच्या दरग्याला । सांगा सिद्दी हिलालाला ॥
पांच हत्यारें घेऊन जावें । कल्याण दरवाजाला” ॥
सिद्दी हिलाल भला । ज्याच्या नऊ जनी बिब्या पलंगा निजायाला ॥
चोन कराया लागला । लाखोटा मोगलाचा दिला ॥
सिद्दी हिलालानें । त्यानें वाचून पाहिला ॥
सिंहगड किल्ल्याला गलीम बहुत आला । तुम्हीं जावें लढायाला ॥
सिद्दी तो हिलाल पांच पोषाग नटला । दोहीं हातांत दोन पट्टे नऊजण बिब्या हारोहारीनें उभ्या केल्या ॥
ज्यानें पहिला हात टाकिला । अठरा खांडोळीं पाडिलीं ॥
आसुदाचा टिळा ल्याला । उमराव तेथून निघाला सुभेदारापाशीं आला ॥४५॥
चौक ४६
“सलाम सलाम मेरे भाई । किस्का तूं उमराव ऐसा सांगावा मजला” ॥
“उमराव आहे शिवाजीचा । मी तानाजी सुभेदार” ॥
“ऐक कुळंब्याच्या पोरा । पागोटयाच वेढे घाल गळ्यामधीं शरण यावें सरदाराला” ॥
सुभेदार त्याला बोलता झाला । “घ्यावे तोंडात तृण, घ्यावी डोईवर वहाण, शरण यावें सुभेदाराला ॥
पहिला हात येऊ दे तुझा सिद्दी तूं हिलाला” ।
पहिला हात जो टाकिला सात हात जमीन उडाला रे हातांमधीं हात त्यानें अठरा टाकीला ।
सुभेदार गुंजभर नाहीं ढळला ॥ “अरे सिद्दी तू हिलाल ।
दुसरा हात येऊं दे तुझा” ॥ सुभेदार बोलला ॥
“संभाळ संभाळ मेरे भाई । आतां हाच येतो सुभेदाराचा ॥
नऊ हात जमीन उडाला । मारा सुभेदारानं केला ॥
बत्तीस वेढे पागोटयाचे । बत्तीस वेढे मंदिलाचे ॥
बेंबीपावेतों चिरित नेला । खुदा रे खुदा बोलला बुध्या धरणीवर पाडिला ॥४६॥
चौक ४७
बोंब्या तेथुनि निघाला । उदेभानापाशीं गेला ॥
“मेरे उदेभान भाई आग लागो तुझ्या चोन्याला । सिंहगड किल्ला डुब होया ।
नऊशें पठाण कापिला । बाच्छाईचा हत्ती कापिला ॥
सीद्दी हिलाल कापिला । हमकु किल्ला डुब होया” ॥
“हम चोन नहीं सोडताई । जावें जळमंदिराला ॥
आहेत बारा जण छोकरे । जावा कल्याणदरवाजाला लढायाला” ।
तुम्हीं जावें लढाईला” ॥ बारा जण भाऊ, केला मरणाचा पोषाग, पांच हत्यारें घेतलीं ।
तेथुन निघाले आले सुभेदाराजवळी ॥ “सलाम सलाम मेरे भाई ।
किस्का तू उमराव सांगावें आम्हांला” ॥ “उमराव शिवाजी महाराजाचा ।
आहे मी तानाजी मालूसरा” ॥ “सुभेदार भाई ।
पहिला हात येऊं दे तुझा” । “तुम्ही आम्हां मोगलांचे बाळक ।
पहिला हात येऊं दे तुमचा ” ॥ बारा जण लडक्यांनीं ।
चोवीस हात जे टाकिले ॥ सुभेदार भला ।
त्यानें धांवा अंबेचा मांडला ॥ अंबाबाई तू पाव गे माझ्या नवसाला ।
नऊ हात जमीन उडाला ॥ बारा जण लडक्यांचीं ।
चोवीस खांडोळीं पाडिलीं ॥४७॥
चौक ४८
तेथून बोंब्या निघून गेला । उदेभानाचा जवळ आला ॥
“मेरे उदेभान भाई आग लागो ह्या चोन्याला । सिंहगड किल्ला डुब होया ॥
नऊशें पठाण काटया । बाच्छाईचा हत्ती काटया ॥
सिद्धी हिलाल काटया । तुम्हारे बारा लडके काटया !”
लडक्याचा तो जाब ह्याच्या कानावरतीं गेला ।
उदेभान मोंगल ज्या बिबी xxx बसला होता तेथून उठेनासा झाला ॥
लेंकांचा तो दुःखाचा शब्द । ज्याच्या ऊरामधीं बसला ॥
खरखर लखोटा लिहिला त्या बोंब्यापाशीं दिला ॥
“जाऊन सांगा उमरावाला । उदेभान तो मोंगल पळून पुण्याला गेला ॥
झेंडा लावा सिंहगडाला । यश तुमच्या तलवारीला” ॥४८॥
चौक ४९
उदेभान तेथुन निघाला । आला पिराच्या दरग्याला ॥
फोडल्या कापसाच्या उदी । ओतले तेलाचे बुधले ॥
ज्यानें आग जी लाविली । ज्यानें उजेड तो केला ॥
गलीम किती मोजून पाहिला । पन्नास माणूस पाहून ह्याच्या आलें हिशोबाला ॥
उदेभान माणूस पाहून । त्याच्या भुज्या ज्या थरारल्या ॥
पन्नास माणूस माझी आंबाडाची भाजी मोगल मागें परतला ।
गेला आखाडखान्यामधीं ॥ पायीं तुमानी सुरवारा घातल्या ।
अठरा खंडीचे किनखाप त्यानें आंगांत घातलें ॥ बारा आतबडीचा जोडा ।
त्यानें पायांमधीं घातला ॥ ज्यानें वाघनखें चढविलीं ॥
जिरेटोप डोईस घातला ॥ अठरा जागीं बिब्या ।
हारोहारीनें उभ्या केल्या ॥ सळ पट्टयाचा सोडिला ।
अठरा बिभ्यांची खांडें केलीं ॥ आसुदाचा टिळा ल्याला ।
गाभणीगाई जी काटली ॥ गेला पिराच्या दरग्याला ।
सवामण ऊद जाळिला ॥ एका हातीं गुरदा एका हातीं घेतला पट्टा ।
दोपट्टयाचा मारा केला । आला कल्याणदरवाजाला ।
ज्यानें सलाम वाहिला ॥ दादा नऊशें पठाण ।
ज्यानें दिमतीला घेतला ॥४९॥
चौक ५०
“सलाम मेरे भाई । उंबराव किस्का सांगावा मजला” ॥
“उंबराव शिवाजी महाराजांचा । आहें मी तानाजी सुभेदार” ॥
उंबराव मोगलानें पाहिला । “ऐसा भला आहेस रे दादा ॥
तुज्यासारख्या भाई पाठीला असावा । खाणें घालावें वजिराला वजीर पाळावा बाजूला ॥
सोड महाराजांची चाकरी । कर माझी मोगलाची चाकरी ॥
हवाला देतों सिंहगडाचा । हजार रुपयांची तैनात देतों बसून खायाला” ॥
सुभेदार बोले मोगलाला । “सोड सिंहगडाची गादी ॥
चल माझ्या राजगड किल्ल्याला । चलावे महाराजाचे भेटीला ॥
राजगड किल्ल्याचा हवाला । उदेभाना देतों तुला ” ।
एवढया जाबावरुन । घुस्सा आला मोगलाला ॥
“पहिला हात येऊं दे तुझा” । “उदेभान हात येऊं दे तुझा” ॥
तानाजी सुभेदार धांवा अंबेचा मांडिला । धांव धांव अंबाबाई ॥
अंबा त्या बाईनें घोस गाईचा पाहिला । देवी मागें जी सरली ॥
मोगलासमोर उभारिला । गर्भगाळ कोसळला ॥
नऊ हात जमीन उडाला । मोगलाला माराया गेला ॥
हातामधीं हात ज्यानें अठरा टाकिले । गुंजभर नाहीं जो सरला ॥
“ऐका उदेभान मोगला । पहिला हात माझा झाला ॥
दुसरा हात येऊं दे तुझा” । सुभेदार बोलतो “मामा ऐक निर्वाणाची वेळा ॥
लग्न करा रायाबाचें । दोहों हातांचा मुजरा सांगा शिवाजी महाराजाला” ॥
उदेभान मोगल बारा हात जमीन उडाला । वचक सुरबाईचा दाविला मारा कैफाचा केला ।
पन्नास वेढे पागोटयाचे पन्नास वेढे मंदिलाचे बेंबीपावेतों चिरित नेला ।
सुभेदार धरणीला लोटिला ॥५०॥
चौक ५१
पन्नास माणूस, ज्यानें रोजन्या—-मांडिल्या, आमच्या सुभेदार धन्या ॥
आम्हाला सांभाळील कोण । आणलेंस वाघाच्या रानाला ॥
मग तो शेलार मामानें । मुर्दा मांडीवर घेतला ॥
उदेभान बोलाया लागला । दादा आपल्या सेनेला ॥
“हात मी नऊशें पठाण । पन्नास माणसें घेऊन जावें॥
कल्याण दरवाजाला ॥ आऊत द्यावी हयांची बुरजाला” ॥
लोक खळखळा रडती कैसें झालें नारायणा । दिन दिन पटयानें वाहिला मारायाला लागला ॥
सुभेदार मेलेला मुरदा इरयानें झाला । ऐशी वर्षांचा तो मामा त्याच्या आंगात संचारला ॥
यश आलें मोगलाला । मोगल मागें जात होता ॥
मग तो सुभेदाराचा पट्टा । शेलार मामानें घेतला ॥
“फीर ग मर्दाचे लंडे फीर ग मर्दाचे लंडे” । मोगल मागे पहात होता ॥
दोहों हातांनीं कचका दिला बेंबीपावता चिरीत नेला ॥ खुदा खुदा बोलला ।
बुधा धरणीला पाडिला ॥ ज्यानें भाव तो आंतला सोडिला मग तो नऊशे पठाण राहीले ॥
नऊशे पठाण । मार माराया लागले ॥
त्यामध्ये एकटा शेलार मामा लढनेवाला । पन्नास माणसांतून पंचवीस माणूस पडला ॥५१॥
चौक ५२
नऊशे पठाण बोलाया लागला । चला कल्याण दरवाजाला ॥
आहुत देऊं पंचवीस माणसांची । संकट पडलें अंबाबाईला ॥
प्रतापगडची भवानी । उभी राहीली सांकडयाला ॥
पिवळें पातळ नेसली । गळीं कवडयांची माळा ॥
संकट पडलें देवीला । यश जातें शिवाजीमहाराजाचें ॥
देवीनें आपल्या हातून दरवाजा उघडिला । पन्नास कमी बारा हजार फौज किल्ल्याला घेतली ॥
ज्याचा सूर्याबा तो बंधु । मामाला पुसाया लागला ॥
“शेलार रे मामा । माझा दादा रे कुठे आहे बंधू रे कुठे आहे” ॥
शेलार मामा रे बोलला । जरी मेलासे बोललों तर सारी फौज बसेल ॥
सुभेदार आहे बाले सद्रेमधीं । मी आहे कल्याणदरवाजाला ॥
नऊशे पठाण मारावा । मग जाऊं दादाच्या भेटीला” ॥
मग त्या बारा हजार फौजेने । ज्यानें हर हर वाहिला ॥
एका एकाच्या मागें तिघे तिघे लागले । नऊशे पठाण कापिला ॥
पांढरें निशाण उपटलें । भगवा झेंडा शिवाजीचा ॥
पांच तोफा जों मारिल्या । यशाच्या तोफा जों मारिल्या ॥
त्या तोफांचा आवाज । गेला राजगड किल्ल्याला ॥
शिवाजी महाराज बोलला । माझ्या सुभेदारानें सिंहगड सही केला ॥
शिवाजी महाराजानें । यशाच्या दहा तोफा सोडिल्या ॥५२॥
चौक ५३
ज्याचा सूर्याबा तो बंधू । शेलार मामाला बोलला ॥
चला जाऊ दादाच्या भेटीला । शेलार मामानें सूर्याबा बंधूचे ।
पटे घेतले आपल्या हातामधीं ॥ गेले मुर्द्याचे जवळ ।
वरुन शेला उघडिला ॥ मुर्दा दादाचा पाहिला ।
मुर्दा सुभेदाराचा पाहिला ॥ “माझ्या सुभेदार दादा लग्न रायाबाचं राहिलं ।
ह्याचें लग्न करील कोण” ॥ बारा गेटांचे (मेटांचे) कोळी निघाले ।
आले सुभेदाराजवळ ॥ “आमचा सुभेदार धनी ।
आम्हांला तैनात देईल कोण आम्हांला हवाल देईल कोण” ॥
सुभेदार बोलायाला लागला । “भिऊं नका रे दादांनो ह्या दादाचें वचन पुरें करीन ॥
जातों राजगड किल्ल्याला । सांगतों शिवाजी महाराजाला सिंहगडाचा हवाला देतों तुम्हाला” ॥
अबिर गुलाल । ज्याचे मुर्द्यांत भरला ॥ दोरा रेशमाचा घातला ।
मुर्दा पालखींत ठेविला ॥ पंचवीस कमी बारा हजार लोक सगळे घेतले ।
वाजत गाजत मुर्दा गेला राजगड किल्ल्याला ॥५३॥
चौक ५४
आले किल्ल्याचे पोटाला । पांचकर्णांचा बाजा केला ॥
आवाज महाराजानें घेतला । सुभेदार किल्ला घेऊन आला ॥
सुभेदाराची पालखी । नेली राजाचे सदरेला ॥
शिवाजी महाराजानें । मुर्दा पाहिला सुभेदाराचा ॥
शिवाजीचे राज्यांत । ऐसा उंबराव होणें नाहीं सुभेदारासारखा ।
जिजाबाई धांवत आली । पालखी पाहिली ॥
गर्व आला सुभेदाराला । नाहीं आला भेटायाला ॥
बाई पालखीपाशीं आली । बाईनें शेला उघडिला ॥
मुर्दा सुभेदाराचा पाहिला ॥ आंग धरणीला टाकिलें ॥
“सुभेदारासारखा । ऐसा क्षत्री होणार नाही ॥
बाजू गेली महाराजांची । बाजू गेली शिवाजीची” ॥
मग त्या शिवाजीनें चाकराचे साठीं । डोईला रुमाल बांधला ॥
बारा भोयांचे पालखींत । सुभेदाराचा मुर्दा जो घातला ।
वाजत गाज्त आणला उमराठया गांवाला । ह्याचे लेकाचे भेटीला ॥
पांच कर्णांचा आवाज । रायाबा बेटयानें केला (ऐकला?) ॥
रायाबा बोलतो । बाबा आले माझे लग्नाला ॥
पालखीपाशीं धांवत आला । मुर्दा बाबाचा पाहिला ॥
“साता दिवसांची मुदत ॥ केली माझे लगनाला ॥
बाबा माझें लगीन करील कोण । यजमान होईल बाबा कोण ? मंडपांत मिरवेल कोण ? ॥
आग लागो ह्या लग्नाला । कां माझा बाबा निघून गेला” ॥
शिवाजी राजानें । मुलगा पोटासंगं धरिला ॥
“भिऊं नको माझे बेटा । शिवाजी महाराज तो गेला, तान्हाजी सुभेदार ।
आहे तुला ” ॥ बारा दिवसांचे सुतक धरिलें ।
शिवाजी महाराजांनीं सुभेदाराचें ॥५४॥
चौक ५५
मग त्या तेराव्या दिवसांत । संयबर बाळाचे मांडिलें ॥
ज्यानें मंडप घातला । मंडपाला तोरण बांधिलें ॥
पहिली नवरी रद्द केली । कडाशीचे दरकराची केली रायबा बेटयाला ॥
संयवर केलें रायाबाचें । रायाबा पुढें तो बसविला ॥
बापाची सरदारी । दिली रायाबा बेटयाला ॥
दिवटया बुदलीची जहागिर । दिली रायाबा बेटयाला ॥
डोणजं तें गांव । दिलें पानसुपारीला ॥
मालुसर्‍याचा दंड । दिला इनाम खायाला ॥
रायाबा तो बेटा । ज्यानें संगतिला घेतला ।
आले राजगड किल्ल्याला ॥ ज्यानें पंतोजी तो काका ।
ज्यानें हुजर्‍या बोलविला ॥ “पंतोजी तो काका ।
जावें पुण्याचे शहराला ॥ मंडईच्या बाजारीं ।
आहे तुळशीदास शाहीर ॥ घेऊन यावें त्याला ।
राजगड किल्ल्याला” ॥ तुळशीदास शाहिर ।
त्यानें सदरेला आणिला ॥ डफ तुणतुणें घेऊन ।
मग त्या तान्हाजी सुभेदाराला ॥ शिवाजी महाराजांचा ।
पोवाडा कटिबंध केला ॥ हजार रुपयांचा तोडा ।
हातामधीं घातला त्या रे तुळशीदास शाहीराच्या ॥ शूरमर्दाचा पोवाडा ।
शूरमर्दानें ऐकावा ॥ शिवाजीचे राज्यांत ।
ऐसा उमराव होणें नाहीं ॥ पोवाडा गात्याला उद्राण ऐकत्याला घडो पुण्य ।
सत्य युगींचा पोवाडा कलयुगीं वर्तला ॥ सत्तावीस किल्ल्यांचा सरदार निघूनशानी गेला ।
ऐसा पुनः होणें नाहीं ॥५५॥


शिवाजी महाराज पोवाडा – नरवीर तानाजी मालुसरे

चौक १
ज्यांची त्रैलोकीं कीर्ति गाजती । जो दक्षिणाधीपती ॥
शिवाजी छत्रपती । रणांत ज्यानें गाजविली तलवार ।
तानाजी मालुसरे त्यांचा सुभेदार । तसा नाहीं योद्धा हल्ली मिळणार ॥ध्रु०॥
महाड संस्थानांतिल छोटे । गांव ऊमराठे ।
कोंकण तें मोठें । डोंगराळ देश जंगल चोरवाट ।
मावळे लोकांची वस्ती आटोकाट । वनश्री रम्य दिसे आफाट ॥
त्या खेडयांतील राहाणार । तानाजी वीर ।
मराठा शूर । शिवाजिशी त्याची मैत्रि असे दाट ।
लहानपणापासून फक्त दुजे ताट । अशापरि त्यांनी जुळविला घाट ॥
अशा परिवारात तानाजी । दिसे रणगाजी ।
उमेद नित्य ताजी । अंगलोट वळण बाभळिची गांठ ।
भव्य दिसे चेहरा कल्ले असे दाट । मिशा पिळदार सदोदित ताठ ॥
चाल : जी जी जी जी
सडपातळ पण शत्रूस काळ दिसतसे जी जी ॥
पाणीदार डोळे त्याच्याकडे पहावत नसे जी जी ॥
निमगोरा वर्ण सिंहापरि भासत असे जी जी ॥
त्या वज्रापरि द्वयहस्त भासती जसे जी जी ॥
लोखंडासारख्या मांडया पोटर्‍या दिसे जी जी ॥
पांच हजार जोर एका दमांत काढित असे जी जी ॥
बैठकी वगैरेस त्याच्या गणती नसे जी जी ॥
मेहनतीच्या जागी घामानें चिखल होतसे जी जी ॥
त्यास आकनि पुलाव्याचें खुराख लागत नसे जी जी ॥
भाकरीवर मुठीनें तीळ पिळुन खातसे जी जी ॥
पैलवान आताचे पहा नाजुक तब्येती कसे जी जी ॥
कित्येकांस पुरी बासुंदीचा घास लागतसे जी जी ॥
चाल-गिलच्याची
असा वीर मावळा तानाजी खंदा तो निपजला ॥
छत्रपती शिवाजीस लहानपणापासून मित्र हा भला ॥
दांडपट्टा मर्दुमकी भिनलेली त्याच्या हाडा-मांसाला ॥
पूर्ण प्रेम शिवाजीचें म्हणून सुभेदारी दिली तानाजीला ॥
तानाजीच्या मदतीनें शिवाजीनें कैक किल्ला सर केला ॥
शिवाजीची मातुश्री जिजाबाई नित्य बोले शिवाजीला ॥
शिवबा तुजला तानाजी हा बंधुच आहे धाकला ॥
त्यावेळी औरंजेब बादशहा होता दिल्ली तक्ताला ॥
हिंदु लोकांचा द्वेष बादशहाचे मनीं भरलेला ॥
तेणेंकरुन हिंदुवर जुलमाचा कहर अती उसळला ॥
चाल : मिळवणी
यासाठीं शिवाजी वीर । घेऊनि अवतार ।
आले भूवर । अजरामर कीर्ति केली अनिवार ।
तानाजी मालुसरे त्यांचा सुभेदार । तसा नाही योद्धा हल्ली मिळणार ॥१॥
चौक २
सिंहगड आणखी भुलेश्वर । सात कोसावर ।
पुण्यापासून दूर । डोगरांच्या ओळी नैऋत्येला ।
त्यांत एक सुळका वरती गेला । त्यावर आहे कोंडाण्याचा किल्ला ॥
याच किल्ल्याविषयीं तानाजीचा । भाग शूरत्वाचा ।
वर्णितो सांचा । प्रथम किल्ल्याच्या माहितीला ।
देऊन निवेदितो भाग पुढला । लक्ष असो विनंति ही सकला ॥
कोंडन किंवा कौंडिण्यपूर । पायथ्यावर ।
हल्लीं खरोखर । कौंडिण्य ऋषीच्या आश्रमाला ।
म्हणतसे कोंडाण्याचा किल्ला । हल्ली म्हणती सिंहगड त्याला ॥
तीन हजार तीनशें फूट महान्‌ । समुद्रापासून ।
उंची प्रमाण । पुण्याच्या सपाटीपासून धरला ।
अडीच हजार फूट उंच भरला । आहे प्रचंड किल्ला असला ॥
कल्याण व पुणें असे दोन । दरवाजे महान ।
आज मितिस छान । दिसत आहेत पहा सकलां ।
झुंजार बुरुज उत्तरेला । कलावंतिणीचा दक्षिणेला ॥
( चाल : दुकानें औषधवाली )
या किल्ल्याविषयींची कहाणी हो । थोडिसी कथितो या स्थानीं ॥
नागनाइक नामें कोळीराजाच्या । ताब्यांत होता किल्ला हा त्याच्या ।
त्याच्यापासून यवनांनी हो । घेतला होता जिंकोनी ॥
अहमदनगरच्या अमदानींत । शहाजी राजांच्या तो होता ताब्यांत ।
सत्य जाणतिल ज्ञानी हो । डोलतील वार्ता ऐकोनी ॥
त्रिंबकच्या सुभेदारानें जिजाबाई साहेबांना । पकडून नेऊन सोडून दिल्यावर त्यांना ।
कोंडाण्याचे ठिकाणीं हो । राहिल्या होत्या येवोनी ॥
व्रिजापूरकरानें पाठलाग करितां । शहाजी दडून याच किल्ल्यांत होता ।
सत्य घ्यावे परिसोनी हो । इतिहास देतो समजोनी ॥
चाल : गिलच्याची
पुढें विजापुरकराकडे शहाजीने धरली नोकरी ।
किल्ला विजापूरकरांच्या ताब्यांत गेला गोष्ट ही खरी ।
पुणें प्रातांच्या संरक्षणार्थ हाच किल्ला बहुपरी ।
ज्यांचें त्यांचें लक्ष याच किल्ल्यावर जात असे सत्वरी ।
शिवाजीमहाराजांनी स्वराज्यांचें तोरण ज्या अवसरीं ।
तोरणा किल्ल्यावर बांधुन कोंडाणाहि घेतला तो सत्वरी ।
अशी दिली माहिती किल्ल्याची तात्पर्यांत अपुरी ।
चाल : मिळवणी
ज्यानें स्वतः हिमतीनें किल्ला । लढून सर केला ।
घोर समयाला । तोच शिवछत्रपतिचा सरदार ।
तानाजी मालुसरे बहादर सुभेदार । तसा नाहीं योद्धा हल्ली मिळणार ॥२॥
चौक ३
वर्णूं तानाजिची बहाद्दरी । तो शूर केसरी ।
शत्रुस काळ परी । नांव ऐकता दुष्ट मोंगलांस ।
भीतिनें हींव भरत होतें त्यास । होऊन गेला खंदा वीर समयास ॥
तानाजी व सूर्याजी दोघे बंधू । कल्पनेचा सिंधू ।
जणू का रवि इंदू । हेच दोन्ही हात शिवाजीचे खास ।
यांच्या सहाय्यानें मराठी राज्यास । स्थापिलें शिवाजीनें दक्षिण देशास ॥
कोंडाणा किल्ला घेण्याचा । हेतु शिवाजीचा ।
निश्चित होऊन साचा । कळविला बेत या दोघा बांधवास ।
ऐकून आले स्फुरण दोन्ही योध्यांस । म्हणति महाराज आज्ञेचाच अवकाश ॥
शिवाजीची मातुश्री जिजाबाई । वीराची माई ।
तानाजी लवलाही । बंधुसह घेतां तिच्या दर्शनास ।
आशिर्वचनांत बोलली त्यांस । तुम्हीच पाठीराखे माझ्या शिवबास ॥
जसे धर्मास भीम अर्जुन । पराक्रमी महान ।
तसे धैर्यवान । बंधुवत्‌ तुम्ही शिवाजीस खास ।
करुन साह्य राखाल हिंदुधर्मास । कराल बंधमुक्त हिंद देशास ॥
चाल : जी जीजी
जिजाबाई बोले आहे भवानी तुम्हां साह्याला ॥
याची खात्री आजपर्यंतची आहेच तुम्हांला ॥
करुनिया मुजरा तानाजीनें निरोप घेतला ॥
उमराठें गांवी येऊन लागला पुढिल तयारीला ॥
शूर शिपाई निवडक मावळे काढले बाजूला ॥
प्रत्येकाच्या जवळ जंबिया व बर्ची भाला ॥
तिरंदाज लोकांचा कंपू वेगळा केला ॥
घोडे आणखी उंटावर बाण भरले समयाला ॥
किल्ल्यावर चढविण्यास तिनशें घोरपडवाला ॥
खंडापट्टा बोथाटया परज समशेरवाला ॥
कडेकोट तयारीनें मावळा लोक जमला ॥
चाल : गिलच्याची
प्रत्येकाच्या चेहर्‍यावर वीरश्री तेव्हां चमकुं लागली ।
तलवार चमकती जणू काय ढगांतील बिजली ।
केली सर्व फौजेची तयारी उणीव नाहीं राहिली ।
बोले बंधु सूर्याजी तानाजीस वेळ आहे चांगली ।
इच्छा आहे माझी थोडया लोकानिशीं जावें मी त्या स्थलीं ।
येतों किल्ला सर करुन दादा मज हुकूम व्हावा या कालीं ।
वेळ पडेल तर मग मागाहुन यावें तुम्ही त्या स्थलीं ।
चाल : मिळवणी
शिवाजीचे विश्वासू दिलदार । बाजी फसलकर ।
येसाजी हुषार । पुष्कळ होते पण कुशल लढणार ।
तानाजी मालुसरे बहाद्दर सुभेदार । तसा नाही योद्धा हल्लिं मिळणार ॥३॥
चौक ४
सूर्याजीस बोले तानाजी । शाहाब्बास सूर्याजी ।
आहेस रणगाजी । वाटेल तेवढी फौज तू जा घेऊन ।
येउं नये शत्रुस पाठ दावून । उजाडण्यापूर्वी गांठ जाऊन ॥
सूर्याजीचा गनीमी कावा । कुणास समजावा ।
घेऊन फौज तेव्हां । व्याघ्र जणुं गर्जु लागे खवळून ।
तसा सूर्याजी चौताळून । गर्जे हरहर महादेव म्हणून ॥
जसा पारधी श्वापदासाठीं । टपून त्यांस गांठी ।
तशीच हातोटी । किल्ल्यातटीं भिडला सरसाऊन ।
चालविला मारा दांत खाऊन । थरारले आंतिल वीर पाहून ॥
उदयभानू रजपूत सरदार । होता किल्लेदार ।
हाडाचा शूर । फसला यवनांचें दास्य करुन ।
जात्याभिमानास गेला विसरुन । अधर्मकर्दमीं पडला घसरुन ॥
त्याची पत्‍नी नांव प्रभावती । खरीच प्रभावती ।
पतिव्रता सती । प्रार्थीत नित्य देवास कळवळून ।
रजपूत तेज गेलें कुठें मावळून । अधर्मानें टाकियलें आवळून ॥
ऐसा सतीचा पति तो किल्लेदार ॥ धूर्त बुद्धि फार ।
त्यानें किल्ल्यावर । रजपूत शिपायांना धैर्य देऊन ।
तोफा दिल्या तटावरती ठेवून । दिली सरबत्ती खालीं पाहून ॥
चाल : साधी
तोफांचा वरुन भडिमार । सारे दणाणले अंबर ॥
बंदुका उडती अनिवार । जणुं गारावृष्टी अनावर ॥
लालभडक गोळे अंगार । पहातां हातपाय थंडगार ॥
पण निधडया छातीचे हे वीर । मावळे लोक बहाद्दर ॥
त्यांना साह्य भवानीशंकर । तेथें काय कुणाचें चालणार ॥
बिन मार्‍यांची जागा सुंदर । त्यांना मिळाली होती भरपूर ॥
तेथून लपून बाण भराभर । होते सोडित मावळे हुषार ॥
केले वरिल बहुतेक लोक ठार । वरच्यांचे फुकट जाती बार ॥
अशी धुमश्चक्री तासभर । एकसारखि चालली अपार ॥
चाल : हो जी ची
तीस उंट बाण भरलेले हो । झाले खलास सूर्याजिनें पाहिले जी ॥
नाहीं अशानें भागत वाटले हो । जाऊन शत्रूस पाहिजे गांठले जी ॥
किल्ला अवघड उपाय खुंटले हो । चढण्यासाठीं इलाज खूप केले जी ॥
पांच वेळां थोडे वर चढले हो । पण थकुनि लोक खाली पडले जी ॥
सूर्याजीनें मनीं जाणिलें हो । आपल्या फौजेचे दोन भाग केले जी ॥
अर्धे किल्ल्याच्या पिछाडिस नेले हो । अर्धे तेथेंच लपवुन ठेविले जी ॥
पिछाडिच्या बाजुनें आलेले हो । लोक किल्लेदारानें पाहिले जी ॥
चाल : मिळवणी
कावा गनीमी सूर्याजीनें केला । शत्रुस फसविला ।
ऐकून समयाला । शिवाजी मनीं थक्क झाला अनिवार ।
तानाजी मालुसरे बहाद्दर सुभेदार । तसा नाहीं योद्धा हल्लीं मिळणार ॥४॥
चौक ५
लोक पाठविले मागिल बाजूला । फसविले शत्रूला ।
गनिमी कावा केला । खात्री झाली उदयभानुची खास ।
मोर्चा वळविला पिछाडी भागास । साधला डाव सूर्याजी वाघास ॥
पिछाडीवर सुरु केला मारा । किल्ल्यांतुन सारा ।
उदयभानु खरा । वीर पण गांगरला समयास ।
मावळा लोक हुषार दडून आसर्‍यास । भुलवी जसा चित्ता व्याघ्र हरणास ॥
जणुं बावरली भेकरें । रजपूत वीर सारे ।
कावरेबावरे । होऊनिया म्हणती एकमेकांस ।
सैतान बडा भारी हाय ये बदमाश । इसका नहीं लगता म्हणति अदमास ॥
सूर्याजीनें विचार असा केला । मागील बाजूला ।
शत्रु गुंतला । आपण चाल करावी पुढील भागास।
फोडुन किल्ल्याचे दरवाजास । घुसावें आंत हेंच उचित आपणांस ॥
आपल्या लोकांस म्हणे सूर्याजी । वीर हो गाजी ।
धनी शिवाजी । यानें धाडिले आहे आपणांस ।
अधर्माने ग्रासलेल्या देशांस । उद्धरायासाठीं आला तो जन्मास ॥
चहुंकडे झाला भ्रष्टाकार । हिंदुलोकांवर ।
जुलुम अनिवार । म्हणून आली दया श्रीशंकरास ।
घेऊनी अवतार शिवाजी रुपें खास । प्रगटला हिंदु धर्म रक्षणास ॥
चाल : लगट
आम्ही तुम्ही हिंदुचे बच्चे । हाडाचे सच्चे ।
नव्हे अर्धकच्चे । दर्जा आमचा उच्च ।
असुनी हे लुच्चे । मानती आम्हा तुच्छ ।
मोराचीं पिच्छें । बांधुन अंगाला ।
हे बगळे गडयांनो दटाविती हंसाला ॥ यास्तव धैर्य मनीं धरा ।
आठवा उमावरा । कीं शंभो हरा ।
म्हणुन ललकारा । करुनिया त्वरा ।
किल्ल्यामध्यें शिरा । शत्रुजन धरा ।
कापा चरचरा । दावा शौर्याला ।
अजरामर करुं या सनातन धर्माला ॥
ऐकतां लोक कडेकोट । थरारुन उठले चावती ओठ ।
माजले हत्ती खावोनी रोट । सिंहाचे बच्चे फोडूं त्यांचा गोट ।
कटयारी खुपसुन फाडूं पोट । टाकूं कडयाखाली बांधुनी मोट ।
शत्रूला दाऊं शौर्य अलोट । छातिवर बसून नरडीचा घोट ।
घेऊं समयाला । असें म्हणून धांवले खूप चढुन त्वेषाला ॥
जाऊन भिडले दरवाज्यावर । बंद दरवाजा मजबूत फार ।
लोखंडी तगड परते हत्यार । मग सूर्याजी करित सुविचार ।
मराठे वीर आम्ही बहाद्दर । आम्हांस काय दरवाज्याची खातर ।
म्हणून तीस हात उंच तटावर । मोकळया पायानें चढले भराभर ।
तया वेळेला । दुर्ग लंकेचा हे वानर भेदिती त्याला ॥
चाल : महासागरी हाय हाय हाय
बहाद्दर ते मावळे लोक । दाविलें खर्‍या शौर्याला ॥ध्रु०॥
तटावरुन आंत जावोनी । दरवाजा उघडिला त्यांनीं ॥
मावळा लोक आंत शिरला । एकदम चढविला हल्ला ॥१॥
बंदुका तीर बंद पडले । हातघाईवर वीर भिडले ॥
समशेरी चमकती भाले । खणखणाट त्यांचा उडाला ॥२॥
भेदाया चक्रव्यूहाला । अभिमन्यु बाळ जणु शिरला ॥
असा भास मनाचा झाला । त्या पाहुन सूर्याजीला ॥३॥
जणू गज कमलें उपटोनी । टाकितो तडागांतूनी ॥
तशीं शत्रु-शिरें छेदूनी । टाकितां सूर्याजी दिसला ॥४॥
चाल : मिळवणी
’जय शिवाजी’ म्हणुन करी वार । घावांत दोनचार ।
शत्रु होती ठार । शिवाजीच्या होत आनंद मनीं फार ।
तानाजी मालुसरे बहाद्दर सुभेदार । तसा नाहीं योद्धा हल्लीं मिळणार ॥५॥
चौक ६
असे चाललें रणकंदन । दुमदुमलें रण ।
वीरांचें आक्रंदन । धुळीनें व्यापियला तो ठाय ।
शत्रु किंवा मित्र त्यांत ओळखाय । समजेना म्हणती करावें काय ॥
रजपूत लोक लढती बेभान । मोठे धैर्यवान ।
लढाऊ महान। मरती पण मागे घेतीना पाय ।
कौरव पांडवांचें युद्धच कीं काय । असें लागलें मनीं बाटाय ॥
तानाजीनें किल्ल्यापासून दूर । बर्‍याच अंतरावर ।
फौज तय्यार । ठेवुन होता बैसला आठवित शिवराय ।
लढाईचें वर्तमान तरी काय । अजुनी कोणि येईना म्हणे सांगाय ॥
शिवाजीचा सेवक बहिर्जी । मावळा तो फर्जी ।
शिवाजीची मर्जी । त्याच्यावर पूर्ण, कारण ते काय ।
हेराच्या कामीं कुशल शिपाय । नंबर एक अचूक बातमी घ्याय ॥
तो बहिर्जी लढाईतून । बातमी पूर्ण ।
आला घेऊन । घडलेलें वर्तमान ऐकाय ।
तानाजीची उत्कंठा वर्णाय । कविमति गुंगलि सुचेना काय ॥
सूर्याजीचा पराक्रम खरा । ऐकुन खुले चेहरा ।
अंग फरफरा । फुगून लागला मन डोलवाय ।
वीराचाच बच्चा धन्य त्याची माय । लांडगे ते म्हणति वाघापुढें काय ॥
(चाल : मी माळिन तूं फुलमाळी )
इतक्यांत निरोप दुजा आला । वीरश्रींत साधली संधि कशी चिंतेला ॥ध्रु०॥
हिरोजी नामे नोकर जो शिवाजीचा दुसरा । महाराजाची आज्ञा म्हणे आज युद्ध बंद करा ॥
उद्या सकाळी तुम्हास येइल मदत ती । येइल किल्ला सहजचि मग आपुले हातीं ॥
म्हणे आतां करावं कसं याला । चहुबाजूंनीं पडला पेंच तानाजीला ॥१॥
मदतीसाठी महाराजानीं का घाई केली । गडावरती फौज सूर्योदया पूर्वींच गेली ॥
म्हणोनी मीही निघालों तिकडेच आतां । नाइलाज न ये लढाई बंद ठेवितां ॥
दिलगिरी वाटति मनाला । याचि क्षमा व्हावि सांग विनंति महाराजांला ॥२॥
इतक्या अवधींत ऐका हकिगत किल्ल्यांतली । असंख्य शत्रू संहारिले सूर्याजी तो महाबली ॥
एक्या अमृतास्तव देवादिकें समुद्र मंथियला । तसा सूर्याजी उदयभानूस कीं शोधूं लागला ॥
म्हणे उदयभानु हा कसला । उदयाचल सोडुनि कुठें गेला अस्ताला ॥३॥
उदयभानूचा मेहुणा मोहनलाल यानें । पायीं वार करुन पळाला तो मागल्याबाजूनें ॥
अपघातें वार लागता जखमी तो झाला । धिक्कार असे म्हणतसे रजपुतांच्या कुळीला ॥
होतां जखमी वेढिलें त्याला । जणुं चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू सांपडला ॥४॥
( चाल : मज टाकुनी बाळा जासी )
सूर्याजी शत्रूंनीं धरला । मराठयांचा तो धीर तूटला ॥ध्रु०॥
मालुसरा । आहे दुसरा ।
तानाजी तो । आणाया ।
समरीं त्या । आम्हीं जातो ।
असे बोलुन मावळे फिरले । तानाजी सन्मुख आले ।
पण चेहरे हिरमुसलेले । काय बरें ।
झालें खरें । सांगा त्वरे ।
तानाजी त्या पुसूं लागला ॥१॥
सूर्याजिला । कैद केला ।
शब्द येतां । वाहवा रे ।
षंढ कां रे । तुम्ही दिसतां ।
कशि लाज तुम्हां नच त्याची ।
बुडवितां कुळी मराठयांची ।
मागें फिरा । शस्त्र धरा ।
चाल करा । भित्रा हा स्वभाव कुठला ॥२॥
अहा रे भूता । रजपूता ।
माजलासी । तूंच पाहे ।
गांठ आहे तानाजीशीं । आजपासुन तीन दिवसांत ।
तुला ठार करुन किल्ल्यांत । भगवें निशाण लावलें नाहीं त्यांत ।
तर कुलहीन । मी होईन ।
जीव देइन । लागो बट्टा माझ्या या कुळीला ॥३॥
(चाल : मिळवणी)
अशी घोर प्रतिज्ञा केली । शूरवीर बली ।
कीर्ति गाजविली । छत्रपति शिवाजीचा आधार ।
तानाजी मालुसरे बहाद्दर सुभेदार । तसा नाहीं योद्धा हल्लीं मिळणार ॥६॥
चौक ७
इकडे किल्ल्यांत घडलेले वर्तमान । करितों निवेदन ।
तानाजीचा पण । कथन करुं पुढें योग्य भागास ।
कुर्‍हाडीचा दांडा काळ गोत्रास । अशी एक व्यक्ति जाणतो समरास ॥
प्रभावती जवळ वाढलेला । भाऊ जोडलेला ।
मोहनलाल भला । त्याच्या मनीं कपट आलें समयास ।
उदयभानुचा व्हावा यांत नाश । म्हणजे किल्लेदारी मिळेल आपणांस ॥
असें जाणून त्यानें कारस्थान । योजिलें महान ।
आंगठी चोरुन । आणली त्यानें प्रभावतीची खास ।
शिवाय सूर्याजीस धरले वक्तास । घेतली होती त्याची आंगठी आपणास ॥
आतां करणार म्हणतो कारस्थान । अतिशय छान ।
जुळवितों संधान । किल्ला बादशहास किंवा मराठयास ।
कुणासही जावो, देणारे ते खास ।
किल्लेदारी याच मोहनलालास ॥ आधीं तुरुंगांत सूर्याजीपाशीं ।
वळवावें जाऊन त्याशीं । वेळ येइल तशी ।
करावी नवी युक्ती त्याच प्रसंगास । किल्लेदारी आहेच माझ्या नशिबास ।
असा झाला गर्क मनोराज्यांस ॥ दिवसा लढून रजपूत थकलेले ।
म्हणुन मद्य प्याले । झिंगत बैसले ।
तुरुंगावर पहारा लागला घोरायास । मोहनलाल मध्यरात्रीं सुमारास ।
शिरला तुरुंगांत काढुन कुलपास ॥
( चाल : पनघटु पर होरही धूम)
आंत जाऊनी मोहन त्यांस । वदत समयास कपटपटु झटकीं ॥ध्रु०॥
धरीं वाट तूं म्हणे सूर्याजीला । पहा दरवाजा उघडीला ।
निसट झट खास सटक झटपट कीं ॥१॥
सूर्याजी दचकुन पाही । म्हणे विपरीत सर्वच कांहीं ।
दिसत ही खास फुकट लटपट कीं ॥२॥
बोले मोहन आणखी त्याला । युद्धामध्यें पाहुन तुजला ।
मोह पडला प्रभावतिला कीं ॥३॥
झणिं सोडविण्याशीं तुजला । वेष बदलुन धाडिलें मजला ।
झाली ती खास आशक तुझ्यावर कीं ॥४॥
सूर्याजी कपट म्हणी सारे । साध्वी त्या रजपूतणी रे ।
नव्हे पापी, थाप तुझी लटकी ॥५॥
शिवाय शूर मराठा वीर । नव्हे चोरासारखा पळणार ।
नको तुझी जारे युक्ति शिळपट कीं ॥६॥
(चाल)
किल्लेदाराचा मेहुणा । मोहनलाल जाणा ।
बंधु प्रभावतिला । हो । होता मानलेला ॥१॥
लहानपणापासुन त्यांनी यास । पाळला होता खास ।
आतां उलटला । हो । जातीवर गेला ॥२॥
किती नीचपणा तरी मनीं । सूर्याजीस म्हणी ।
खरें वाटण्याला । हो । खूण पटण्याला ॥३॥
तिनें दिली आंगठी ही घ्यावी । कुलपाची चावी ।
मागिल दाराला । हो । चोरवाटेला ॥४॥
तेथुन तिच्याकडे जाया । वाट आहे राया ।
मंदीराला । हो । सूर्याजी चकला ॥५॥
म्हणी कपट पाहिजे कपटयासी । थाप द्यावी याशीं ।
याच वेळेला । हो । मोहनलालाला ॥६॥
तुझें म्हणणें खरे आहे बरे । जातों मी किरे ।
म्हणुन निघाला । हो । बाहेर पडला ॥७॥
बाहेर जाऊन म्हणतो मोहनलाल्या ।
बाहेर ये रे साल्या । वीर नाहीं भुलला ।
हो । तुझ्या कपटाला ॥८॥
(चाल : मिळवणी)
त्या नराधमासी साचा । जमालगोटयाचा ।
जुलाब जोराचा । सूर्याजीनें दिला छान खुबीदार ।
मोहनलालास पुरती आली गार । म्हणतो चिंता नाहीं घेइन समाचार ॥७॥
चौक ८
सूर्याजी गेला म्हणून याची । मोहनलालाची ।
कायली अंगाची । होऊन गेली आग तळव्याची मस्तकास ।
म्हणतां बच्चाजी नाहीं सुटलास । घालतों तुला वेगळाच गळफांस ॥
योजिले कृष्ण-कारस्थान । बनावट पत्रें दोन ।
स्वताहा खर्डून । शिपाई बनुन गेला राजवाडयास ।
उजाडण्यापूर्वी शिवाजी महाराजास । पत्र आणि आंगठी हुजुरास ॥
शिवाय सूर्याजी प्रभावतीवर । आशक आहे फार ।
वचन खरोखर । दिलें तिला, मदत करणार रजपुतांस ।
असा गुतला तिच्या मोहास । वाचविणार म्हणतो किल्लेदारास ॥
असें ऐकून कोप शिवाजीला । अतिशय आला ।
आलेल्या शिपायाला । निरोप देऊन, करित विचारास ।
शंकरानें विष गिळलें प्रसंगास । तसा पोटीं घाली शिवाजी रागास ॥
येथुन मोहनलाल वेषधारी । जाऊन सत्वरीं ।
तानाजीच्या करीं । पत्र दिलें दुसरें वाचुन पाहण्यास ।
फितुर आणि परस्त्रीचा अभिलाष । शब्द हे झोंबले त्याच्या काळजास ॥
लाल डोळे थरारले ओठ । अग्नीचा लोट । भडकला दाट ।
वाटे जणुं सूर्य कोपला खास । भस्म करणार जाळुन सर्वांस ।
तसा तानाजी दिसे सकलांस ॥
(चाल : आजिसाहेब)
गर्जे तानाजी रागानें धिक्कार असो तुजला ।
वीरसिंहा पोटीं सूर्याजी हा नामर्द कसा आला ॥
ज्यानें परस्त्रीच्या अभिलाषें स्वकुल धर्माला ।
जाळून फस्त केलें त्याचा शिरच्छेद पाहिजे केला ॥
जाऊन शिवाजी सन्मूख मजकूर निवेदीला ।
तेव्हां शिवाजीनें दाखविली आंगठी आणि त्याला ॥
ही पर्वा दिलेली मी आंगठी सूर्याजीला ।
पाहुन घेई तानाजी तू करुन खात्री तुझी तुजला ॥
गेला भडकून अग्नी त्यांत तेल मिळालें त्याला ।
मग नाहीं पारावार क्रोधाग्नि तो जाळित सुटला ॥
आधीं महाराज किल्ल्यामध्यें गाठून त्या अधमाला ।
ठार करुन सूर्याजीशी, नंतर सर करतों किल्ला ॥
महापातकी चांडाळा बंधु तूं आतां कुठला ।
तुं खुशाल फितुर होई कंठस्नान घालीतो तुजला ॥
झाला मनिं खूष मोहनलाल डाव म्हणे साधला ॥
आतां किल्लेदारीं जाती कुठें माझीच आखेरीला ॥


शिवाजी महाराज पोवाडा – बाजी प्रभू

चौक १
जयोऽस्तु ते श्रीमहन्‌मंगले शिवास्पदे शुभदे ।
स्वतंत्रते भगवति त्वामहम् यशोयुतां वंदे ॥१॥
स्वतंत्रते भगवती या तुम्ही प्रथम सभेमाजीं ।
आम्ही गातसों श्रीबाजीचा पोवाडा आजी ॥२॥
चितूरगडिंच्या बुरुजानो त्या जोहारासह या ।
प्रतापसिंहा प्रथितविक्रमा या हो या समया ॥३॥
तानाजीच्या पराक्रमासह सिंहगडा येई ।
निगा रखो महाराज रायगड की दौलत आयी ॥४॥
जरिपटका तोलीत धनाजी संताजी या या ।
दिल्लीच्या तक्ताचीं छकलें उधळित भाऊ या ॥५॥
स्वतंत्रतेच्या रणांत मरुनी चिरंजीव झाले ।
या ते तुम्ही राष्ट्रवीरवर या हो या सारे ॥६॥
चाल
घनदाट सभा थाटली । गर्जना उठली ।
घोर त्या कालीं । जय छत्रपतींचा बोला ।
जय स्वतंत्रतेचा बोला । जय भवानी की जय बोला ।
तुम्ही मावळे बोल हर हर महादेव बोला ।
चला घालुं स्वांत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥१॥
चौक २
हर हर गर्जुनि वीर मावळे सर्व सज्ज असती ।
परंतु कोठें चुकले बाजी यांत कां न दिसती ॥१॥
हाय हाय तो म्लेंछासंगें घडित बसे साची ।
स्वदेशभूच्या पायासाठीं बेडी दास्याची ॥२॥
ऐकुनियां शिवहृदय हळहळे म्हणे दूत हो जा ।
बोधुनि वळवा वीर बाजि तो तुम्ही राष्ट्रकाजा ॥३॥
चाल
शिवदूत तेधवां जाती । बाजिला वदती ।
सोड रे कुमती । कां म्लेंच्छ कसाई भजसी ।
कां दास्य-नरकिं तूं पचसी । कां जिणें तुच्छ हें नेसी ।
स्वदेश नाहीं, स्वराज्य नाहीं, धिक या देहाला ।
चला घालुं स्वातत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥२॥
चौक ३
बाजीराया म्लेंछ सबळ हा दोष न काळाचा ।
ना देवाचा ना धर्माचा किंवा नशिबाचा ॥१॥
देशद्रोही चांडाळांचा भरला बाजार ।
गुलमगिरी जे देती त्यांसी निष्ठा विकणार ॥२॥
तुम्हीच ना स्वातंत्र्य चिरियलें या पोटासाठीं ।
तुम्हीच ना रे भूमातेच्या नख दिधलें कंठीं ॥३॥
चाल
हो सावध बाजीराया । दास्यिं कां काया ।
झिजविशी वाया । तुज भगवान्‌ श्री शिवराजा ।
स्वातंत्र्य प्राप्तिच्या काजा । बोलावी तिकडे जा जा ।
देशभक्तिची सुधा पिउनि घे प्रायश्चित्ताला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥३॥
चौक ४
शिवदूताचे बोल ऐकतां बाजी मनिं वदला ।
काळसर्प मीं कसा उराशी मित्र म्हणुनि धरिला ॥१॥
घरांत शिरला चोर तया मी मानुनिया राजा ।
बंड बोलिलों शिवरायाच्या परमपूत काजा ॥२॥
माता माझी कष्टविली मीं राजनिष्ठ त्यासी ।
या पाप्यानें युद्ध मांडिलें देशरक्षकांशीं ॥३॥
चाल
जा सांगा शिवभूपाला । अशा अधमाला ।
राजनिष्ठाला । त्वां आधीं शतधा चिरणें ।
तुज करवीं घडतां मरणें । पावेन शुद्धि मग मानें ।
तुझ्या करींच्या तरवारीच्या घेइन जन्माला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥४॥
चौक ५
देशभूमिच्या कसायासि कां इमान मी देऊ ।
भाकरि देतो म्हणुनि तयाच्या चाकरीस राहूं ॥१॥
कवणाची भाकरी बंधु हो चाकरि कवणाची ।
भाकर दे भूमाता चाकरि तिच्या घातकांची ॥२॥
राज्य हिसकलें देश जिंकला त्या पर अधमाशीं ।
राजनिष्ठ मी राहुनि कवण्या साधित नरकासी ॥३॥
चाल
ही गुलामगिरिची गीता । राजनिष्ठता ।
ह्यापुढें आतां । मद्देशचि माझा राजा ।
तो प्राण देव तो माझा । मी शरण शिवा सांग जा ।
राख उडाली प्रदीप्त बाजी वैश्वानल ठेला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥५॥
चौक ६
लोट धुळीचा सुटला अवचित दीन शब्द उठला ।
लगट करुनि शिद्दिनें पन्हाळा गड वेढुनि धरिला ॥१॥
लक्ष्मीचे मृदु कमल शारदा सुंदरिचा वीणा ।
स्वतंत्रतेचा कलिजा अडके गडांत शिवराणा ॥२॥
अफझल्याच्या वधा स्मरोनी फाजल सुत त्याचा ।
करितो पण कीं शिवभूपाला जिवंत धरण्याचा ॥३॥
चाल
बापासि तुझ्या जो खडे । चारि रोकडे ।
जाशि त्याकडे । जीवंत धरुं तरि साचा ।
जीवंत पवन धरण्याचा । अभ्यास आधिं कर याचा ।
खुशाल हरिणा मग तूं धावें धरण्या वणव्याला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥६॥
चौक ७
बाजि लागला शिवभूपाच्या थोडा कानाला ।
हातीं भाला एक मावळा गडाखालिं आला ॥१॥
शिद्दि पाहतां चुकुनि हात तरवारीला गेला ।
दाबुनि त्याला मुजरा केला धीट नीट वदला ॥२॥
शिवाजि राजा जिवंत येतो तुमच्या गोटाला ।
उद्यां सकाळीं करुं गड खालीं कळवी तुम्हांला ॥३॥
चाल
ऐकुनी शिद्दि बहु फुगला । रिपूजन भुलला ।
परस्पर वदला । अजि खान, खानखानाजी ।
हुए शिकस्त मराठे हैं जी । फिर लढना क्यौं कर आजी ।
चलो शराब उडायें ताजी । आप लेवजी, नहीं आप लेवजी ।
आप गाजि आप तो रणगाजी । झिंगविला अरि सर्प फुंकुनी पुंगी गुंगविला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥७॥
चौक ८
गुगवोनि अरि सर्प शिवा गारोडि गडावरि तो ।
प्रहर रात्र उलटतां मराठी जादू मग करितो ॥१॥
कृष्णपक्षिच्या काळ्या काळ्या रात्रीं त्या दडल्या ।
गर्द झाडिला भिउनि चांदण्या बाहेरि न पडल्या ॥२॥
अशा तमीं किलकिलें दार का तटावरी झालें ।
बाजि निघाले श्री शिव आले आले शत भाले ॥३॥
भाला खांद्यावरी मराठा घोडयावरि स्वारी ।
भरतां घोडा थै थै नाचे तोंचि शीळ झाली ॥४॥
चाल
वीर हो टाच घोडयाला । बाण हा सुटला ।
हटविणें त्याला । रिपु तुडवित व्हा व्हा पार ।
चौक्यासि तुम्हा दावील । काजवा चोर कंदील ।
गेला गडतळ गेला सत्तर मैल भूप आला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥८॥
चौक ९
तुरी शिद्धिच्या हातीं देउनि सुटता शिवनृपती ।
अब्रह्मण्यम् कितिक भाबडीं भोळिं भटें वदतीं ॥१॥
अब्रह्मण्यम् यांत कायरे दोष कोणता तो ।
आला ठक ठकवाया उलटा भला ठकविला तो ॥२॥
साप विखारी देश जननिला ये घ्याया चावा ।
अवचित गांठुनि फसवुनि भुलवुनि असाच ठेचावा ॥३॥
चाल
ये यथा प्रपद्यंते माम् । भजाम्यहं तान् ।
तथैव; धीमान् । भारतीं कृष्ण वदला हें ।
अधमासि अधम या न्यायें । रक्षिलें राष्ट्र शिवरायें ।
राष्ट्ररक्षका सावध हो रिपु हुडकित तुज आला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥९॥
चौक १०
हात जोडितों पाया पडतों बाजि तुझ्या राया ।
गड अवघड रांगणा तिथें तुम्ही जाणें या समया ॥१॥
राष्ट्रदेविचा हस्त कुशल तूं तरि लाखों भाले ।
अम्हासारिखे मिळतील; चिरतिल चरचर रिपु सारे ॥२॥
जाऊं काय मी बाजि मृत्युमुखिं ढकलुनि तुम्हाला ॥
कधीं शिवा जातिचा मराठा मृत्यूला भ्याला ॥३॥
चढा गड तुम्ही यशोदायिनी तोफ पांच करा ।
तोंवरि लढवूं गनीम अडवूं खिंड करुं निकरा ॥४॥
चाल
वसुदेव तूंचि शिवराया । कंस कपटा या ।
करुनियां वाया । स्वातंत्र्य कृष्ण चिन्मूर्ती ।
जा घेउनि अपुल्या हातीं । गड गोकुळांत नांदो ती ।
गडीं चालला शिव तो खिंडित दीन शब्द उठला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥१०॥
चौक ११
आले आले गनीम खिंडिंत चवताळुनि आले ।
झाले झाले सज्ज मराठे सरसावुनि भाले ॥१॥
संख्या दुप्पट रिपुची, परि ते निकरानें लढती ।
हर हर गर्जुनि समर रंगणीं तुटोनियां पडती ॥२॥
खङगाचे खणखणाट त्या मधिं शर सणसण येती ।
मारण मराणावीण नेणती वीर रणीं रंगती ॥३॥
चाल
तो हर हर एकचि झाला । वदति रे चला ।
म्लेंछ हा हटला । चला चढवा नेटाचा हल्ला ।
वीरश्रीचा करा रे हल्ला । निकराचा चालु द्या हल्ला ।
मारित हाणित हटवित म्लेंछा खिंडिपार केला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपुवरी घाला ॥११॥
चौक १२
म्लेंछ हटवितां बाजी वळुनी गडाकडे पाहे ।
श्री शिव चाले मागे बघुनियां वीर गर्जताहे ॥१॥
गडांत जाईल राष्ट्रदेविचा जिवलग शिवराणा ।
तोंवरि लढवूं खिंड शूर हो हा अपुला बाणा ॥२॥
त्या वाण्याच्या आधिं रणांगणि जरी घडे मरणें ।
पुनर्जन्म घेउनी तत्क्षणीं पुनः पुन्हा लढणें ॥३॥
चाल
रघुराया रावणहरणा । कंसमर्दना ।
भो जनार्दना । लाडक्या देश जननीचे ।
स्वातंत्र्य रक्षणीं साचे । हे प्राण दान जरि अमुचे ।
पवित्र हे जरि त्वत्प्रिय हे जरि दे तरि सुयशाला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥१२॥
चौक १३
आले आले गनीम चालुनि पुनरपि तों आले ।
झाले जाले सज्ज पुनरपी उठावले भाले ॥१॥
दीन दीन रण शब्दा हर हर महादेव भिडला ।
भिडला ओष्ठीं दंत मस्तकीं खङग वक्षिं भाला ॥२॥
हल्ला चढवित परस्परावरि पुनः पुन्हा लढती ।
नटती योद्धे समरभाजनीं वीररसा लुटिती ॥३॥
चाल
कचरला मराठी भाला । बाजि तों आला ।
तोलुनी धरिला । रणिं रंग पुन्हा ये साचा ।
गर्जती मराठे रिपुचा । घ्या सूड म्लेंच्छ मत्तांचा ।
उगवावा सूड देशाचा । आणि सूड स्वातंत्र्याचा ।
भोसका कटयारी बरच्या । करा माळा रिपुच्या आंतडयाच्या ।
लावा उटया त्यांच्या रक्ताच्या । त्याचा मस्तक चेंडू साचा ।
समररंगणीं चेंडूफळीचा डाव भरा आला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥१३॥
चौक १४
डाव उलटला म्लेंच्छावरी तो पुन्हा परत हटला ।
जय झाला परि वीर मराठा बहुतांशी पडला ॥१॥
तिकडे गडिंच्या तोफा अजुनी पांच कां न सुटती ।
वीर मराठे सचिंत आशाबद्ध सर्व बघती ॥२॥
तशांत घेउनि ताजी टोळी फाजलखां येतो ।
धन्य बाजिची; पुन्हा उसळुनी अशनी सम पडतो ॥३॥
खिंड तोफ तिज मधुनी सुटला गोळा श्री बाजी ।
रणीं तळपतो वीरश्रीचा रणनवरा बाजी ॥४॥
चाल
तों गोळी सूं सूं आली । अहो त्या काळीं ।
मर्मिं ती घुसली । श्री बाजी विव्हळ पडला ।
मागुती कांहिंसा उठला । बेहोष वीर परि वदला ।
तोफे आधीं न मरे बाजी सांगा मृत्यूला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥१४॥
चौक १५
थांबा बाजी जखम तरि पुरी बांधूं द्या थांबा ।
हर हर रणिंचा ऐकुनि वीरा उसळुं नका थांबा ॥१॥
जखम कुठें रे असे फक्त मी तृषाक्रांत थोडा ।
रिपुरक्ताते पितों घटघटा सोडा मज सोडा ॥२॥
खरी जखम भू-आईस माझ्या, फोडी हंबरडा ।
ओढुनि अरिची अंतडी बांधुया पट्टि तिला सोडा ॥३॥
भले मराठे लढा तसेची आलो मी सोडा ।
प्रखर आपुली भूक शमविण्या रिपु नरडी फोडा ॥४॥
चाल
होईल तोफ शिवबाची । क्षणीं दो क्षणिंची ।
तोवरी साची । खिंड लढवाची ।
फेडाया ऋण या भूचें । अजि उष्ण बिंदु रक्ताचे ।
द्या मुद्दल मोजुनि साचें । व्याज तिला स्वातंत्र्य देउनी फेडा कर्जाला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥१५॥
चौक १६
काय वाजलें ? बाजीराया बार न गडिं झाला ।
शिला कोसळे, पान सळसळे, पक्षी ओरडला ॥१॥
लढा तरी मग वीर चला हो रणांत घुसलों मी ।
रक्तें मढवूं लढवूं खिंडिची तसू तसू भूमी ॥२॥
शपथ तुम्हाला वृक्ष, पक्षि, जल, शिला तेज, वारे ।
मरतां आम्ही तोफेपूर्वी लढा तुम्ही सारे ॥३॥
देहबंध तो तुटला बाजीराय धरे पडला ।
वीरवराचा विव्हल आत्मा नयनाशीं भिडला ॥४॥
चाल
तों बार धडाधड झाले । प्राण परतले ।
हास्य मुख केलें । हा पहिला बार शिवाचा ।
हा दुसरा स्वतंत्र्याचा । हा तिसरा चवथा साचा ।
बार पांचवा धडाडला जय गर्जुनि प्राण दिला ।
चला घालुं स्वातंत्र्य संगरीं रिपूवरीं घाला ॥१६॥
चौक १७
दिव्य द्युतिचा चकचकाट आकाशीं कोंदटला ।
रथ श्रीमती स्वतंत्रतेचा भूवरती आला ॥१॥
ऊठ चितोडा ऊठ देविला उत्थापन द्याया ।
प्रतापसिंहा प्रथित विक्रमा उठि मंगल समया ॥२॥
भूमातेच्या तान्ह्या उठि कां वीतचिंत व्हाना ? ।
असे कुशल रांगण्यांत तुमचा जिवलग शिवराणा ॥३॥
स्वांतत्र्याचा पोवाडा हा ऐकाया आलां ।
उठा सर्व स्वातत्र्यवीरवर जयमंगल बोला ॥४॥
चाल
श्री स्वतंत्रता भगवती । बाजिला नेती ।
आपुल्या रथीं । गंधर्व तनन तैं करिती ।
दुंदुभी नभीं दुमदुमती । श्री बाजी स्वर्गा जाती ।
करी चराचर विश्व बाजिच्या जयजयकाराला ।
चला घालुं स्वांत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥१७॥
चौक १८
चला मराठे रणीं पहुडले जे आणिक सुर ते ।
पावन खिंडिंत बसून तीसह जाति नभः पंथें ॥१॥
श्री बाजीचें रक्त पेरिलें खिंडिंत त्या काळा ।
म्हणुन रायगडिं स्वातंत्र्याचा थोर वृक्ष झाला ॥२॥
अहो बंधु हो पूर्वज ऐसे स्वतंत्र रणगाजी ।
स्वतंत्र त्या पूर्वजां शोभतां वंशज कां आजी ॥३॥
विनवि विनायक समजुनि घ्यावें यांतिल अर्थाला ।
चरण घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥४॥
स्वदेश नाहीं स्वराज्य नाहीं धिक् या देहाला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥५॥


शिवाजी महाराज पोवाडा – सिंहगड

चौक १
धन्य शिवाजीतो रणगाजी धन्यचि तानाजी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥ध्रु०॥
देशमाजीं कहर गुदरला पारतंत्र्य जहरें ।
हलाहलहि या परदास्याहुनि झणिं प्राशितां बरें ॥
गोमातांची मान आणि ती शिखा ब्राह्मणांची ।
परदास्याची सुरी बंधु हो चिरी एकदांची ॥
देश हिंदुचा, हाय ! तयाचा मालक म्लेंच्छ ठरे ।
परि परमेशा फार दिवस हें रुचेल केविं बरें ॥
चाल
मग आर्य देशतारणा । अधम मारणा ।
कराया रणा । परदास्य रात्रि नाशाला ।
स्वातंत्र्य सूर्य उदयाला । शिवनेरीं श्रीमान्‌ झाला ।
त्या सूर्याचा किरण रणांगणि तळपे तानाजी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥१॥
चौक २
ठायीं ठायीं वीर मराठा सरसावुनि भाला ।
रामदास मत छत्रपतीचा अनुयायी झाला ॥
स्वातंत्र्य श्री-तोरण, तोरण-गड अवघड पडला ।
भगवा झेंडा त्या भाल्यासह सरसर वर चढला ॥
प्रतापगडची शांत कराया स्वतंत्रता देवी ।
पुढती फाडुनि अफझुल्याला भग तो मग ठेवी ॥
चाल
ते धन्य मराठे गडी । घेति रणिं उडी ।
करुनि तांतडी । देशार्थ मृत्युही वरिला ।
शाहिस्ता चर चर चिरिला । गनिमांनि वचक बहु धरिला ।
झुरतो परि रिपु अजुनि नांदतो सिंहगडामाजीं ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥२॥
चौक ३
जरा लढाई पाहुनि वदली जिजा शिवाजीला ।
गड सर केल्याविण वरणें ना अन्न शपथ तुजला ॥
परके बाळा भूमातेला ते लाथा देतां ।
अन्न न गमतें गोमांसाचा घांसचि तो घेतां ॥
गुलामगिरिची बेडिच पायीं अशीच खुपतांना ।
गुलामगिरिच्या नरकामाजीं असेच पचताना ॥
चाल
निर्जीव अन्न कां रुचे । उदर शत्रुचें ।
फाड तेथिंचें । रक्तानिं भूक शमवावी ।
मांसानि भूक शमवावी । अतडयांनि भूक शमवावी ।
घ्या गड कड कड फोडुनि अधरां धावा ये काजी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥३॥
चौक ४
धन्या माता जिजा तिलाची शिवबा सुत साजे ।
स्वतंत्र झाल्यावीण सुताला अन्नचि दे ना जे ॥
स्वातंत्र्याच्या सुखनीमाजीं जन्म स्वतंत्रांचे ।
गुलामगिरिच्या उकिरडयावरी गुलाम निपजाचे ॥
श्वानहि भरतें पोट बापुडें चघळुनिया तुकडे ।
शेणामाजीं बांधुनि वाडे नांदति शेणकिडे ॥
चाल
संसार असा जरि करी । मनुजता तरी ।
कशासी धरी । हो तुच्छ किडाचि न कां तो ।
जो गुलाम असुनी हंसतो । परदास्यीं स्वस्थचि बसतो ।
धिग् धिग् वदला श्री शिव घेउनि गड राखूं बाजी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥४॥
चौक ५
प्रभात झाली वाद्यें झडली मुहूर्त लग्नाचा ।
बोहल्यावरी उभा राहिला सुत तानाजीचा ॥
घटिका पात्रें मोजुनि द्विजगण शेवटच्या घटिला ।
दंगल सोडुनि मंगल व्हाया सावधान वदला ॥
वदला द्विज परि कुणि भेटाया तानाजीस आला ।
आला तो तों तरवारींनीं मंडप खणखणला ॥
चाल
तों हर हर एकचि झाला । चमकला भाला ।
म्हणति रे चला । शिवराय दूत पातले ।
हें लग्न राहुं द्या भलें । युद्धार्थ जनन आपुलें ।
लहान मोठा निघे मराठा पुढती तानाजी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥५॥
चौक ६
परमात्म्याशीं जीवात्म्याची तन्मयता झाली ।
वायुकुमर कीं रघुविरचरणीं मिठी पुन्हां घाली ॥
अरुणचि की श्रीजगन्मित्रवर सूर्या आलिंगी ।
आलिंगी कीं तानाजी श्रीशिवरायालागीं ॥
भेट जाहली मसलत बसली राया धाडिं मला ।
प्राणहि देईन, घेईन गड परि तानाजी वदला ॥
चाल
हें पर्व स्वातंत्र्याचें । शत्रु रुधिराचें ।
स्नान मज साचें । घडुं द्यावें हो शिवराया देशार्थ पडो द्या काया ।
जाईल ना तरी वाया । अखेर निसटे शिवहस्तांतुनि तीरचि तानाजी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥६॥
चौक ७
शिवरायाच्या तीरा जा बा तानाजी वीरा ।
वीरामाजीं हो रणगाजी अरि मारुनि घोरा ॥
सिंहगडावरी तुझी आर्य भू फोडी हंबरडे ।
गुलामगिरीचा खून पाडण्या जा जा जा तिकडे ॥
देवदूत हो स्वातंत्र्याच्या पवित्र कार्याला ।
जातो आहे अमुचा ताना रक्षण व्हा त्याला ॥
चाल
हे मंगल तारागण हो । अप्सरा जन हो ।
गडावरि जा हो । तानाजि लढाया जातो ।
अरि फार, एकला कीं तो । परि धीर पुढेंची घुसतो ।
त्या धीरावरि वर्षा अमृत आणि फुलें ताजीं ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥७॥
चौक ८
मध्य रात्रिची वेळ शांत परि भयदायी थोर ।
गडा खालच्या झाडी मध्ये घन अंधःकार ॥
रात्रीलाही निद्रा लागे किर्र शब्द उमटे ।
करवंदीच्या एका झाळिंत तो ध्वनि घोर उठे ॥
“अहो मारिती पूर्वज तुमचे स्वर्गांतुनि हांका ।
अहो मराठे कान देउनी तुम्ही सर्व ऐका ॥
आई तुमची ही भूमाता पाठीवरी तिच्या ।
उठला चाबुक फुटल्या ना रे धारा रक्ताच्या ॥
या रक्ताच्या एका थेंबासाठीं लक्ष शिरा ।
अरिच्या कुटुनी मलम लावणें आईच्या शरिरा ॥
अस्सल जो जो बीज मराठा तो तो मज व्हावा ।
त्यानें येउनि, देउनि प्राणा, मजसह गड घ्यावा ॥
चाल
बाकीचे षंढ हो चला । गृहाप्रति वळा ।
बचावुनि गळा । गळसरी त्यांत घालणें ।
तें योग्य तयांना लेणें । तलवार करीं ना घेणें ।” हर हर गर्जुनि सिंह झाडिंतुनि चवताळुनि ये जी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥८॥
चौक ९
रामा लक्ष्मण किंवा भीमा अर्जुन तो गमला ।
अपुल्या भावा सूर्याजीला तानाजी वदला ॥
कल्याणाचे दारामागें दबा धरुनि बसणें ।
शंभर घेउनि गडी दार मी फोडिन लाथेनें ॥
शंकित कां हो, हस्त, मस्तकें लढतां जरि पडतीं ।
धडें तथापि दार फोडितिल पार आमुची तीं ॥
चाल
हें कार्य आमुचे ठरे । बाकि जें उरे ।
तें करा पुरे । किल्ल्यांत शिरुनि तें खानीं ।
आणि तुम्हीं वीर मर्दानीं । हां निघा चाललों हा मी ।
जा तरि येशिल परत भेटण्या केव्हां तानाजी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥९॥
चौक १०
दरड उभट बहु चढणें मुश्किल घोरपडीलाही ।
म्हणुनि पहारा तिथें गडावरि मुळिं नव्हता कांहीं ॥
साधुनि ही संधी तानाजी तिथें नीट आला ।
सज्ज नव्हे चढण्यासि हवेमधिं उडण्यासी झाला ॥
कोणी वदतां, ’पाय निसरतां अहा ! काय होई ।’
वदे ’शूर देशार्थ मरोनी स्वर्गाप्रति जाई ॥’
चाल
यशवंती सरसर चढतां । हर्ष हो चित्ता ।
सोल घे हातां । तानाजि चढूं लागले ।
सद्‌भाग्य चढूं लागले । स्वातंत्र्य चढूं लागलें । सांभाळी रे म्लेंच्छा आतां आला तानाजी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥१०॥
चौक ११
एकामागुनि एक मराठा सरसर वर चढला ।
दहा हजारावरि रिपु असुनी चढविति ते हल्ला ॥
कोण कोठुनी किती आणखी कसें कुठें लढलें ।
दडले अंधारीं रिपु अपसामधिं झुंजुनि पडले ॥
खालीं वरती मागें पुढती आजूबाजूनीं ।
सैरावैरा पळतां मारिती भाला भोंसकुनी ॥
चाल
तो मर्द मराठा गडी । शत्रुंचीं मढीं ।
हजारों पाडी । तुडवीत चिखल मांसाचा ।
पोहुनी पूर रक्ताचा । दे मार करित ये साचा ।
कल्याणाचें दार धडाडे झाली रे बाजी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥११॥
चौक १२
झाली बाजी परि तो कोठें आहे तानाजी ।
मारित काटित छाटित चढला रणरंगामाजीं ॥
उदयभानु तो नजरे पडतां घे घे मार उडे ।
झुंज झुंजतां नजरा फिरल्या गर्जे सिंह पुढें ॥
सह्याद्रीच्या वाघा शेळी उदयभानु खाशी ।
खान आपुल्या बापा म्हणतो मी रजपुतवंशी ॥
धिक्‌ धिक्‌ नीचा लाविसि वंशा लाज रजपुतांच्या ।
श्रीकृष्णाच्या श्रीरामाच्या प्रतापसिंहाच्या ॥
मुसलमान कां बाप तुझा जो लढसी आम्हांसी ।
आर्यभूमिला मुक्त कराया जे झटती त्यांशी ॥
वदोनि पुनरपि तुटोनि पडला जरि तो श्रमलेला ।
उदयभानुचा वार मर्मिंचा अवचित तो बसला ॥
चाल
मूर्च्छना तया भीतरी । पातकी खरी ।
वीररसशाली । तानाजी खाली येतो ।
तो धैर्य मेरु उसळीतो । शिवकरिचा भाला गळतो ।
भूमातेच्या मांडीवरती पहुडे तानाजी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥१२॥
चौक १३
पडतां ताना आणि मराठे बंधू पळतांना ।
सूर्याजीची सिंहगर्जना भय देते कर्णा ॥
’अरे चालला सांगा कोठें सर्व मराठे हो ।
भाला ठेवा भरा बांगडया मग पुढती जा हो ॥
बाप तूमचा मरुनी पडला येथें लढतांना ।
परत जाउनी नरकी ढकला अपुल्या पितरांना ॥
जाउं इच्छितां काय धरोनी अपुल्या दोराला ।
अहो षंढ तो दोर मघांची तुटोनीयां गेला ॥
चाल
धिक्कार शब्द उठले । पुन्हा परतले ।
मराठे भले । घनधोर युद्ध मातले ।
वीरासि वीर तो भिडे । देशार्थ मराठा लढे ।
धमार्थ मराठा लढे । त्यांना घुटके वीर रसाचे स्वतंत्रता पाजी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥१३॥
चौक १४
’अहो धरा तो अधम घातकी मातृघातकी हो ।
चला चला हो त्या ठायाला अन्य विषय राहो ॥
सर्व मराठा लोटे तिकडे घ्याया सूडाला ।
उदयभानु परि अधींच कोणी वर कां पाठविला ॥
त्याच्या रक्तीं भिजवुनि फडका केला झेंडा तो ।
स्वातंत्र्याचा विजयध्वज जो अजुनि तिथें डुलतो ॥
चाल
तानाजिकडे जन वळे । दाटले गळे ।
वाहती जळें । तानाजि कांहींसा उठला ।
जय पाहुनि ’हर हर’ केला । ’देशार्थ मरें मी’ वदला ।
मागुति पडला आतां कैंचा उठतो तानाजी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥१४॥
चौक १५
मग त्या गडची भूमी ठेवी तानाजिस उदरीं ।
तेव्हां पासुनि रत्‍नाकर बहु तीचा द्वेष करी ॥
स्वातंत्रतेच्या रणांत लढतां स्वतंत्रतेसाठीं ।
त्या पक्षाचा कैवारी श्री मुरहर जगजेठी ॥
देशाला हो धर्माला हो स्वातंत्र्याला हो ।
बा तानाजी सूर्याजी श्री शिवरायाला हो ॥
धन्य मराठे पुनीत झाले अरि-रुधिर स्नानें ।
आणि ’विनायक’ त्यांच्या नामें यशःसुधापानें ॥
असो समाप्ती छत्रपतीच्या सरस्वतीमाजीं ।
’गड आला परि सिंह चालला’ अमुचा तानाजी ॥
धन्य शिवाजी तो रण गाजी धन्यचि तानाजी ।
प्रेमें आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी ॥


शिवाजी महाराजांचा पोवाडा – शिद्दी जोहार व बाजी देशपांडे

(चाल :- श्रीमंत पेशवे सवाई माधवराव ॥)
चौक १
श्रीभवानी पुढे कापिला अफझुला म्हैसा ।
बादशहाला भीति बडी बहुत डुबाया पैसा ॥
धारण पांचावर बसली वखत आया कैसा ।
धाडावा कोण इकडून, गनिम पकडून, आणिल जखडून, वीर कोण ऐसा ॥ध्रु०॥
रुस्तूम जमान बेगुमान सरदार शूर । तीन हजार स्वार पायदळ असूनी भरपूर ।
शिवाजीच्या पहिल्या धडकेंत जाहला चूर ।
मार खाऊन खाऊन वैतागें, पळाला मागें, गाठले वेगें, त्यानें विजापूर ॥
अल्ली अदिलशाहासी लागली चिंता हूरहूर ।
सरदार अमीर सर्वांचा उतरला नूर ।
खलबत करतां आठविला सरदार क्रूर ।
रणीं न खायेचि जो हार, शिद्दी जोहार,
धाडिता बहार, करिल तो शूर ॥
आणविला शिद्दी तो होता कर्नाटकीं दूर ।
सन्मान करुनी दिला किताब रणबहादूर ।
मदतीस फाजलखान जवान आतूर ।
सोळा हजार घोडेस्वार, पायदळ भार चाळीस हजार, सैन्य भ्यासूर ॥
चाल
दारु गोळा, तोफा बंदुका, पुरविन पैका निघा सत्वर, शिवाजीवर ॥
जय घेऊन येशील जरी देइन जहागिरी शिद्दी तुजवर माझी आहे नजर ॥
असे ऐकुनी संतोषला, घेऊनी आला सैन्य सागर, करविरावर ॥
चाल दुसरी
बादशहाचा हुकूम जंजिर्‍याचे शिद्दीला ।
दुजा हुकुम वाडीच्या सावंतासहि दिला ।
घेउनी उठा आपआपुल्या शिबंदिला ।
आम्ही पन्हाळगडाकडे शिवाजीस शह दिला ।
चहुंकडून सर्वांनी उठावें या संधिला ।
गनिमासि भिऊनी कोणी बसूं नये संधिला ॥
मोडते
शिवाजीस समजतां बेत शत्रुचा ऐसा ।
बंदोबस्त करुनी कडेकोट राज्यामध्यें खासा ।
स्वतः पन्हाळगडावरी आपण शार्दुल जैसा ।
नेताजी, पालकर खालीं, शत्रूभोवतालीं घिरटया घाली, पिडा देत लइसा ॥१॥
चौक २
आठ महिने लढविला किल्ला शिवाजीनें शांत ।
तीन वर्षे पुरेल असा होता पुरवठा आंत ।
शिद्दी फिरकू देईना आंत बाहेर निभ्रांत ।
दमादमानें लढतां सहजीं शिवाजी फर्जी, गनिम अपमर्जी, येईल हातांत ॥
शिवाजीने विचार केला आपुल्या मन मोहल्यांत ।
कोंडुनि राहुन काय उपयोग या किल्ल्यांत ।
शिद्दीस निरोप दिला नका पाहु म्हणे अंत ।
जरि अभय द्याल तुम्ही आम्हा, करु तहनामा,
दाविला प्रेमा, भेटिचा हेत ॥
एके दिवशीं अस्तमानीं भेट झाली दोघांत ।
मुख्य कलमें मुक्रर केलि चार चौघांत ।
बाकींची उद्यां पाहूं झाली काळोखी रात।
तुम्ही थोर पुरुष चांगले, दैव लाभले; वचन द्या भले, हातावरी हात ॥
चाल
ढिला पडला बंदोबस्त, शिपाई झाले सुस्त त्याच रात्रीला, तहनामा झाला ॥
वीस हजार घेऊन मावळे, शिवाजी पळे राजरोस गेला, गड उतरला ॥
शिपायांनी केला गलबला, गनिम आलबेला भाग गया अल्ला, गांठला पल्ला ॥
चाल दुसरी
सेनापतीस बातमी कळतां नाचे थयथया ।
झूट बात करुन बड़ा गनिम किदरसे गया ।
बेसावध भूल पडी हमें खबर नहीं दिया ।
इतनेमें फाजलखान दौडता आया ।
चलो उठो अभी लष्कर को हुकूम देव मिया ।
केला पाठलाग सुरु पहांटेच्या समया ॥
मोडते
दोनी फौजेंत अंतर मुळींच नव्हता लइसा ।
झाली नजरानजर दोन तास सुमारे दिवसा ।
वीर बाजी देशपांडे शूर सेनापती खासा ।
पांच हजार मावळ्यांसह भली, खिंड रोखली,
स्वारी पुढें गेली, करुनी बेत ऐसा ॥२॥
चौक ३
आली यवन फौज खिंडिच्या तोंडावरी वेगें ।
दिला मार त्यास अनिवार परतली मागें ।
पुन्हा दुसरा हल्ला चढविला परतुनी रागें ।
त्याचा फडशा उडविला पुरा, कापून चरचरां,
म्हणती शिव हरा, करी मना जोगें ॥
यवनांनी तयारी केली पुन्हा वैतागें ।
तोफखाना पुढे घोडदळ तयाच्या मागें ।
आले दीन दीन गर्जत पठाणवीर आगे ।
तोफांचा करीत भडिमार, उडविला कहर,
कोणी माघार, त्यांतुनी नेघे ॥
सहा हजार मुसलमान रणीं पाडिले नंगे ।
जसे मारुतीनें अहिमहिचे चिरडिले भोंगे ।
इतक्यांत गोळा बाजीच्या छातीवर लागे ।
गडावरच्या तोफा ऐकुन, आनंदित मन, नामस्मरण, करी वैरागे ॥
चाल
छातींत बैसला धक्का, धीराचा पक्का देशपांडे वीर, महारणशूर ॥
पांच तोफा होता क्षणीं हर्षला मनीं, नामउच्चार, करित झाला गार ॥
त्याचें प्रेत शीघ्र घेऊन, न लागतां क्षण, झाले पसार, मावळे वीर ॥
चाल दुसरी
झाली खिंड मोकळी यवन गेले चालून ।
बैसले गडाला शीघ्र वेढा घालून ।
शिवाजीनें आप पर सैन्यबल तोडून ।
बेजार केले रिपु रात्रीं छापे घालून ।
पोर भ्यालें अफझुल्याचें गेलें वाळुन ॥
मोडते
गेला पळून फाझल पन्हाळ्याकडे भर दिवसां ।
शिद्दी जोहारासी म्हणे काका जरा आगे बैसा ।
बरसात जवळ आला नको युद्धाचा फांसा ।
लोक झाले बहुत तजावजा, कित्येकांस इजा,
म्हणती द्या रजा, लढाई नको सहसा ॥३॥
चौक ४
गेला सारा उन्हाळा परि पन्हाळा नाहीं आला हातीं ।
गेलें द्रव्य फुकट सैन्याची जाहली माती ।
बादशहाची जाहली इतराजी धरुन तृण दातीं ।
गेला पळुन विजापुराकडे, शिवाजीची पुढें,
पसरली इकडे, कीर्ती चौप्रांती ॥
पुन्हा आला बादशहा अष्ट उमराव साथी ।
प्रचंड सैन्यसागर घेऊन सांगातीं ।
किल्ल्यामागें किल्ले जिंकुनी दाखवी महती ।
इतक्यांत कर्नाटकी बंड, उठलें आभंड, कराया थंड, गेला त्या प्रांती ॥
मागें शिवाजीच्या मित्रास नसे मुळीं शांती ।
सांवताचा करुनिया मोड जिरविली भ्रांती ।
जंजिर्‍याचे शिद्दीचा घेऊन समाचार अंतीं ।
गडकिल्ले घेऊनी सकळ, करीत धुमाकुळ, मांडिलें खूळ विजापुर प्रांतीं ॥
चाल
बाजी पुत्राचें कल्याण, केलें शिवाजीनें द्रव्य दिलें भारी, केले अधिकारी ॥
झाली जगदंबा प्रसन्न, दिलें बहु धन, तलवार कहारी, यशस्वी प्यारी ॥
नांव घेतां आपोआप, होय थरकांप शत्रुच्या हारी, पळती माघारी ॥
चाल दुसरी
जर्जर करुनी बादशहाचा गर्व हारविला ।
कोंडमार करुनी मनाजोगा तह करविला ।
द्यावे सात लक्ष दर साल खंड ठरविला ।
स्वतंत्र कबुल करवुनी हट्ट पुरविला ।
भगवा झेंडा गुरुचा चौ मुलखी फिरविला ।
त्यापरी कवीने कवनीं रंग भरविला ॥
मोडते
पुढें प्रसंग शाहिस्तेखान येईल आपैसा ।
त्याची बोटें तोडितां तडफडेल जणूं मासा ।
कवि रामचंद्राचे कवन श्रवण करा बैसा ।
श्रीगुरु कृपेच्या बळें, अनुप्रास जुळे,
श्रोत्याच्या मुळें रंग चढे खासा ॥४॥


शिवाजी महाराजांचा पोवाडा – सरदार शाहिस्तेखान

चौक १
दिल्लीपती बहु भ्याला ऐकुनी शिवाजीचा क्षत्रिय बाणा ।
बंड मोडाया पुंड धाडावा असा कोण रणपटु शाहाणा ॥ध्रु०॥
मामा शाहिस्ता म्हणे हम है तो शिवाजीकी क्या खातर जमा ।
रणांत लोळविन गर्दिस मिळविन तरिच घालिन पायजमा ॥
निवडक घोडा लाख शिपाई थोडी फौज द्या करुनी जमा ।
राज्य खालसा करीन साहसा असा माझा पहा तुर्जमा ॥
आटोकाट लष्कर अफाट घेऊनी खासा लवाजमा ।
विडा उचलुनी आला फांफडा डंका वाजवी लेहेजिमा ॥
चाल
सातशे हत्ती पुढे धाडी । पांच हजार उंट आघाडी ॥
तीन हजार बैलाची गाडी । दोन हजार छकडयाला घोडी ॥
दारु गोळा तोफखाना जाडी । बत्तीस कोटी खजीना काढी ॥
चाल दुसरी
या परि अफाट फौज आला उडवित ।
जिथे मुक्काम पडे तिथें लोक उर बडवित ।
दोन गांवें लांब दीड गांव जमिन आडवित ।
तीन महिने लागले दर्‍या डोंगर तुडवित ।
सारी फौज आणविली पुण्याजवळ भिडवित ।
किल्ल्यामागून फिरंगोजी नरसाळा नाइक गड लढवित ॥
मोडते
दोन महिन्यानें किल्ला मिळाला परंतु मेली बहु सेना ।
पुढें लढाई कशी करावी विचार पडला त्या खाना ॥१॥
चौक २
पाहून प्रसंग जसवंतसिंग बादशहानें मदतीस दिला ।
घालुनी पुण्याला वेढा धुतले हत्ती घोडे मुळा मुठा नदीला ॥
लाल महालामध्यें खुशाल जाउनी शाहिस्त्यानें तळ दिला ।
ठीक ठिकाणीं चौक्या ठेवूनी नाहीं मराठा फिरकूं दिला ॥
इकडे महाराज सिंहगडावरी पुसे विचार प्रतिनिधीला ।
कोण्या रीतीनें युद्ध करावें सरदार आणिले मसलतिला ॥
चाल
आला विडा उचलुनी खान । त्याचें फार दिसे अवसान ॥
बंद करुन रसद सामान ॥ आडचणींत धरावा जाण ॥
छापे घालून करावा हैराण । उडवावी दाणादाण ॥
चाल दुसरी
गेले विचारांत महाराज गुंग होऊन ।
बोलली भवानी स्वप्नीं मग येऊन ।
माझ्या बाळा शिवबा नको जाऊ भीऊन ।
जसा अफझुल वधिला रणीं साह्य होऊन, ।
त्यापरि दुष्टाला शासन मी देऊन ।
तुझ्या हातें धाडिते वचन ठेवि लीहून ।
महाराज देविचा अभय वर पाहुन ।
हर्षलें अंतरीं शकुन गांठ देऊन ॥
मोडते
खान घाताचा विचार करतां युक्ति चालवीतसे नाना ।
अजब युक्ति एक अतर्क्य सुचली भवनीची ही कृपा म्हणा ॥२॥
चौक ३
लाल महालांतुनी शिवाजीला एक पत्र धाडिलें खानानें ।
मर्कटासम तू करसी बंडाळी गडाच्या आश्रय स्थानानें ॥
रणीं मी पहा इंद्र मजपुढें का न येसी अवसानानें ।
डोंगरांत किती पळशी दडशी किती वदसी अभिमानानें ॥
शिवाजीनें दिले उत्तर तुजसम गर्व केला दशवदनानें ।
त्याला कसे माकडांनीं जिंकिले व्यर्थ फुगू नको गर्वानें ॥
चाल
मग युक्ती करुन मजेदार । वश केले हिंदु शिलेदार ॥
छावणींत लग्न टुमदार । वरातीचा ठरविला बहार ॥
सैन्य घेऊन दीड हजार । आले आपण पुण्याबाहेर ॥
चाल दुसरी
कात्रजच्या घाटांत युक्ति ठरविली बरी ।
ठेवून दिले तिथें दहा वीस कर्णे करी ।
ठाइ ठाइ झाडाला पोत बांधुन सत्वरीं ।
दहा वीस बैलांच्या शिंगालाही त्यापरी ।
फत्ते होतां कर्ण्याची किन्नरी झाल्यावरी ।
हे पोत पेटवुनी जावें तुम्ही लौकरी ।
येसाजी तानाजी पंचवीस गडी बरोबरी ।
शिवाजीनें शिरस्त्राण मंदिल वर भरजरी ।
चिलखत घालूनी झगा चढविला वरी ।
येका हातांत वाघनख तलवार दुसर्‍या करीं ॥
मोडते
मिरवणुकींतून आंत सरकले मध्य रात्रीच्या अवसाना ।
जिकडे तिकडे सामसुम रात्र चाहुल नाहीं कळली कुणा ॥३॥
चौक ४
लाल बागेच्या डेर्‍यांत जाउन तलवारीचा दिला रट्टा ।
आवाज ऐकुन सून खानाची पाहुन कांपे लटलटां ॥
खान हाच काय म्हणून पुसतां ती म्हणे त्याचा हा बेटा ।
कुठें शाहिस्ता सांग ओरडशील तरि मरशिल हा पहा पटा ॥
तिनें दावितां खान फिरविला तलवारीचा हात उलटा ।
त्याची बायको जागी होउनी करी विनंती शब्द मिठा ॥
चाल
जीवादान मागते येक । धर्माची समजा लेक ॥
मर्दासी नव्हे हें ठीक । देव साह्य करील आधीक ॥
आली दया केला विवेक । याला समरीं दाखवूं फेक ॥
चाल दुसरी
जीवदान देतो परी नका करुं गलबला ।
मज पोचवाया तुम्ही गोटाबाहेर चला ।
वाघनखं लाविली मग त्याच्या पोटाला ।
बायकोसहित त्याला वेशीबाहेर आणिला ।
जो शिवाजी तो तरी मीच पहा चांगला ।
तुज रणीं वधाया उशिर नाहीं रे मला ।
जीव नको असेल तर फिरुन पहा मासला ।
असें बोलून त्याचा हात हातीं घेतला ।
दोन बोटें छाटुनी मग सोडुनी दिला ॥
मोडते
जाऊन मिळाला आपुल्या लोकाला मग फुंकिला जय कर्णा ।
मागें खानानें शंख ठोकिला गनिम गया अबी क्या करना ॥४॥
चौक ५
संकेतापरी कात्रज घाटांत पोत लोकांनीं पाजळले ॥
शिंग कर्णे वाजवून एकंदर शीघ्र गडावरी उधळले ॥
इकडे खानाची फौज भयभित गडबड ऐकोनी खळबळले ।
हत्यारबंद होउनी शिपाई घाटाकडे अवघे वळले ॥
घाटावरती दिवटया झाडाला यवन पाहूनी जळफळले ।
बडा हार्दम शिवाजी बेटा तोबा तोबा आम्हा नाहीं कळलें ॥
चाल
मग दिला गडाला वेढा । आणा पकडुनी म्हणे शिव धेडा ॥
दम धरुनी शिवाजीनें थोडा । मारक्यांत येऊं दिला घोडा ॥
मग म्हणे तोफखाना सोडा । शत्रूची टाळकी फोडा ॥
चाल दुसरी
सरबत्ती तोफांची किल्ल्यावरुन झडविली ।
मोंगल सैन्याची दाणादाण उडविली ।
चराचरा कापुनी समूळ नदींत बुडविली ।
खान ऐकुनि म्याला मग छाती बडविली ।
आतां युद्ध नको म्हणे पुरी नरद नडविली ।
तात्काळ उठुनी दिल्लीची वाट मढविली ।
जीवावरचें बोटावर गेलें खूप लढविली ॥
मोडते
खान दिल्लीकडे पळुन गेला रडत रडत केविलवाणा ।
रामचंद्र म्हणे पुढें येईल जयपूरचा जयसिंग राणा ॥५॥


शिवाजी महाराजांचा पोवाडा – शिवप्रतिज्ञा

शिव छत्रपतीची कीर्ती । गाऊ दिनराती ।
येईल मग स्फूर्ती । जाई भयभीति सारी विलयाला ! ॥
बाळपणीं झेंडा उभा केला । स्वराज्याचा पाया घातला ।
मावळा जमविला । धन्य जगिं झाला ! ! ॥ध्रु०॥
चौक १
एके दिशीं शहाजी शिवबाला । बोलला, “चल बाळा । जाऊ दरबाराला ॥
जाऊ चल बादशाच्या भेटीला । थाटमाट मोठा बघ बाळा ! ।
बघुन होईल थंड तुझा डोळा । म्हणून ठरविला । बेत या वेळा” ॥
“चला, बाबा !” बाळ बोलला । पोशाख केला । गेला दरबाराला ।
पाहिला बादशहाचा मोठा दरबार । बसले होते कैक अमीर सरदार ।
शाहाचा होता मोठा परिवार ! ॥ हत्तींच्या सोंडांनी भले । कारंजे केले ।
तुषार उडविले । इंद्रधनुष्यांनीं कमान जिथं केली ! ।
अशी शोभा जिथं रंगली । आस भंगली । तिथंच, बघा आली ।
शिउला ओकारी !! ॥ सोन्याच्या फुलांचा सडा । कुबरे जिथं खडा ।
वाद्य झडझडा । झडति जिथं रंग आला नाचाला । जिथं प्राणीमात्र रंगला ।
तिथं शिवबाला कसा वीट आला । ठावं कोणाला !! ॥ तंव शहाजी बोले शहाला ।
“शिवबाळ आला । आपल्या भेटीला । कर रे बाळा ! कुर्निसात मानाचा । हा घ्यावा मुजरा
चाल
पोराचा । बंदा हुकमाचा । मुलगा हा आमुचा” ॥
शिवबाळ बोलला बापाला । “नमावं देवाला ।
नमावं तुम्हांला । नमणार नाहीं कधीं पण याला ।
अपमान झाला । राग मज आला ! ॥
हा ’बंदा’ नाहीं शाहाचा । बंदा रामाचा ।
पठया मानाचा । नमणार मान नाहीं कधीं याला ॥
राहवेना बाबा ! हो मला । जातो मी घरा । आतां या वेळा ” ! ॥
चाल
असं म्हणून दरबारात्‍नं बाळ थेट चालला ! ॥
जसा छावा सिंहाचा नाहीं ठाव भीतिला ! ॥
रस्त्यानं त्याअ वेळेला । एक ब्राह्मण नेई गाईला ।
तिचं वासरुं होतं पाठीला । येक खाटिक सुरा घेऊन मागं लागला ॥
’जब करतो गाय’ बोलला । पाणी गाईच्या हो डोळ्याला ।
झाली कावरीबावरी त्या वेळा । हंबरडा फोडूं लागली, लागली कांपायाला !! ॥
हजारों लोक बाजूला । पर बघा कोण पुढं आला ? । शिवबाळ वेगानं आला ।
अन् खाटकाचा हात उडविला । सारा लोक थक्क जाहला ! ।
कुजबुजती एकमेकाला । “आतां काय होईल ठाव देवा ! कोणाला” !! ।
शिवबाळ घरीं परतला । पर् त्याचा निर्धार झाला ।
“हिंदवीराज्य” करण्याचा हिय्या घेतला !! ॥१॥
चौक २
हिंदवी राज्य करण्याला । पुणें प्रान्ताला ।
शिवबाळ गेला । मावळीं बारा आणलीं सारीं कबजाला ॥
ध्रुवबाळ याच्या जोडीला । एकटा शोभला । निश्चय केला ! ॥
मावळ्यांची दुःखं ओळखून । द्रव्य देऊन । समाधान करुन ।
जोडली मनं त्यांचीं आपल्या कार्याला ॥ जशीं वानरं रामचंद्राला ।
यादव कृष्णाला । तसा मावळा झाला । शिवबाळाला ! ॥
चाल
नरस प्रभु रोहिला खोर्‍याचे । देशपांडे होते त्या वेळा ॥
दादाजी मुलगा हो त्यांचा । दिलदार चित्ताचा झाला ॥
नरस प्रभु ऐंशी वर्साचा । पर सुरकुती नव्हती गालाला ॥
मिश कल्ले पांढरे जरी झाले । तरी लाली होती डोळ्याला ॥
दांत किती घट्ट हो सांगू ? । जणू वज्रपंक्ति तोंडाला ! ॥
हरबरे घट्ट मुलखाचे । करि चूर एका दणक्याला ! ॥
धार्मिक मोठया भक्तीचा । नित्य पूजी रोहिडेशाला ।
चाल
पर विजापुरचा अंकीत ॥ नरस प्रभु होता ॥
वसूल जमा देत ॥ रोहिडया खोर्‍याचा यवनी राजाला ! ॥
चाल
एके दिवशीं दृष्टादृष्ट झाली । नरस प्रभु आणि शिवबाची ।
दृष्टिला दृष्टि ती भिडली । गांठ पडली जीवाशिवांची ॥
चाल
मग बाळ चौदा वर्साच बोले नरसाला ॥
“होतो विजापूर गांवाला । खाटीक कांपी गाईला ।
मी उडवलं त्याच्या हाताला । भवानी आली सप्नाला ।
रोहिडेश आला सप्नाला । अन् मला बोलूं लागला ।
’रे बाळा ! येऊं दे चढती दौलत तुला ! ॥
तू राख गायधर्माला । सारा मावळा येईल धांवून तुझ्या मदतीला ॥
कर बाळा ! आपल्या राज्याला, । असा दृष्टांत हो जाहला ! ॥
आतां राखा लाज पोराची यावं मदतीला” ॥
नरस प्रभु आणि दादाजी देती वचनाला ! ॥
चाल
नरसाजी आणि दादाजी । मोठे रणगाजी ।
जोडले निज कापी । झाला आरंभ मोठया कार्याला ।
शिवसांब सहाय हो ज्याला । अडथळा त्याला । कसला नाहीं झाला ! ॥२॥
चौक ३
रोहिडयाच्या डोंगरावर । जमले रणवीर ।
करण्या निर्धार । बेडी आर्यांची दूर करण्याला ॥
धन्य धन्य दिवस तो झाला । धन्य तो मेळा ! ।
अजरामर झाला ! ॥ गुरु कोंडदेव दादाजी ।
बाल शिवाजी । नरस, दादाजी । मावळे जमविले कैक त्या वेळा ।
सांबाच्या देवळामधीं । आणिल काय विधी ! ।
वेळ तशी कधीं । सुदिन तो झाला ! ॥
रोहिडेश सांब साक्षिला । ठेवून त्या वेळा ।
मध्यरात्रीला । बोलला शिवबाळ सार्‍या लोकांला ॥
“का जमलों आपण या वेळा । आज या स्थळा । सांगतो तुम्हांला ! ॥
चाल
घरदार लुटलं संपूर्ण । हैराण झालों जुलमानं ॥
हरघडी गाईची मान ॥ किती तुटती नाहीं त्या मान ! ॥
जर राखल नाहीं घरदारा । धिःकार आमच्या जगण्याला ! ॥
जर राखलं नाहीं गाईला । थू ! थू !! रे आमच्या जगण्याला !! ।
हिंदवी राज्य करण्याचा । आज आम्ही निश्चय केला ॥
चाल
काय भिताय आपल्या मरणाला ! ।
आज नाहीं उद्यां तर घाव मरणाचा आला ! ॥
नर्कांतले किडे नर्कात करती मौजेला ! ॥
काय तुम्ही तसले हो झाला ? । छे !
माणूस म्हणती तुम्हांला । म्हणून सांबाच्या शिवा पिंडीला ।
अन्‌ घ्यावं आतां शपथेला ।” असं शिवाजी हो बोलला ।
रोहिडयाच्या डोंगरानं, पुन्हां पुन्हां तोच बोल त्यांना सांगितला !! ॥
सांबाच्या पिंडीच्या भोंवती जमला मावळा । अन् पिंडीवरती ठेवलं हाताला ।
अन्‌तिथं घेतलं शपथेला !! ॥ धन्य ! धन्य ! दिवस तो ! धन्य रोहिडा झाला !! ॥३॥
चौक ४
देवळांत जमलेले लोक । होते कित्येक ।
त्यांत पर एक । होता स्वजनांचा घात करणारा ! ॥
जणू फुलं फुलली हो छान । दरवळलं वासाचं रान ।
पर लपला आंत दुष्मान । भुजंगम काळा ॥
जणुं राजहंसाचा मेळा । रोहिडयावर जमला ।
एक पर बगळा । त्यांत होता ठाव नाहीं कोणाला !! ॥
सापाचा विळखा चंदनाला । टोळ हिरव्या हिरव्या पानाला ।
वरी वरी दिसतो एकरंग । भिन्न अंतरंग । नित्य पर संग दोघांचा झाला !! ॥
नांव त्याचं होतं बाळाजी । सासरा नरसाजी । मेहुणा दादाजी ।
ज्याचा, तो हा झाला काळ देशाला । त्यानं लिहिला खलिता शहाला ।
कां “बंडाचा झेंडा उभा झाला । शिवाजीनें नरस वश केला ।
कितिक मावळा । झेंडयाखालीं जमला ! ॥
रोहिडयाच्या डोंगरावर । ऐका, सरकार ! ।
असला हा घोर । काल रात्रीला बेत हो झाला !!” ॥
फितुरीचा संचार झाला । तिनं त्याला खिळखिळा केला ।
अभिमान गेला । घातकी बनला ! ॥
चाल
फितुरानें देश किती मिळाले हो मातीला ॥
किती पापी चांडाळ गेले घोर नरकाला ! ॥
नखं दीड वीत बोटाला । लाली लालबुंद डोळ्याला ।
ते सुळके दांत तोंडाला । दीड हात जीभ टाळ्याला ।
रक्ताचा टिळा डोक्याला । हाडकांचा सांगाडा-असा आकार झाला !! ॥
जिथं जिथं गेली तिथं तिथं नाश तिनं केला ॥
रायगडच्या किल्ल्यावर गेली, माचा कोसळला ! ॥
झांशीच्या बुरुजावर गेली, बुरुज ढांसळला ! ॥
फितुरीच्या जळवा देशाला । सारं रक्त खाऊन देश निस्त्राण केला !! ॥
असो ! आतां ऐका गोष्टीला । असं पत्र धाडलं शाहाला । अन्‌ बाळाजी घरीं परतला ।
मग बोलला काय बायकोला । सांगीन दादांनो ! आतां पुढच्या चौकाला ॥४॥
चौक ५
बाळाजी गेले बायकोला । “ऐक गडे ! बोला ॥
उदयकाळ आला । झाले गेले हाल गरीबीचे ।
मान येतील सुभेदारीचे । सोन्यामोत्यानं ग फुलवीन ।
असा योग छान । आला या काळा ॥
शिवाजीचा नाद लागला । तुझ्या ग बापाला ।
तुझ्या भावाला । मावळा जमविला ।
बेत त्यांनीं केला ! ॥ रोहिडेश सांब साक्षिला ।
बंडाचा झेंडा उभा केला । आर्याचं राज्य स्थापावं ।
शिवानं बोलावं । थेरडयानं ऐकावं । चाळा असा केला !! ॥
चाल
साठी बुद्धि नाठी ! हे बोल !
खरे झाले ! गेला ग तोल ।
आतां दरी दुःखाची खोल ! ॥
शिवाजीनं पुंडावा केला ।
नरस प्रभु सामीलहि झाला ।
खलिता मी शाहाला असा लिहिला ! ।
चाल
आतां बादशाहा खूष होईल । बढती देईल ।
सुभेदार करील । खास ग मजला ।
मग हिर्‍यामाणकानं फुलवीन । सोन्यामोत्यानं ग नटवीन ।
उमलेल हृदयाचं पान । असा योग छान ।
आला या काळा” ॥ ऐकून पतीचे बोल । सतीला खोल ।
मंचकीं घोळ दुःखाचा झाला ! ॥ कीं चवताळली वाघीण ।
काय फणफणली नागीण । पतीस पाहून ।
बोलली बोला ॥ “कधीं नाहीं उलट बोललं ।
वचन मोडलं । दुःख नाहीं दिलं कोणत्या वेळा ।
बाई ! केलं केवढं हें पाप । माझ्या संताप । चित्ताला झाला !! ॥
चाल
राहवेना आतां हो मजला । ऐकावं चार शब्दाला ।
बायकोचा शब्द जरी झाला । तरि हळू चित्तावर झेला ॥
चाल
लागला डाग वंशाला । डाग नांवाला ।
डाग अंगाला । बाई ! केलं केवढं हें पाप ।
माझ्या संताप । चित्ताला झाला !! ॥
चाल
कां जळली नाहीं लेखणी पत्र लिहितांना ॥
कां झडला नाहीं हो हात पत्र लिहितांना ! ॥
कां झडली नाहीं हो जीभ असं वदतांना ! ॥
म्हणतील ’फितूर’ तुम्हाला । घात देशाला ।
द्यात कीर्तीला । खास हा आर्या ॥
बाई ! मला वाटते लाज । अशांची आज ।
झाले मी भार्या !! ॥ यवनांनीं धूमाकूळ केला ।
भीती साध्वीला । भीती गाईला । फांस कंठाला ! ॥
देवतांच्या मूर्ति भंगल्या । अशा त्यांच्या लीला चालल्या ।
जो झटे मुक्त करण्याला । अशा जीवाला ।
दीन दुबळ्याला । त्याच शिवबाला । वैरी तुम्ही झाला ॥
चाल
आग लागो सोन्यामोत्याला । आणि असल्या उसन्या भोगाला” ।
चाल
पर रुचला नाहीं बोला त्याला । लालेलाल झाला ! ।
म्हणे बायकोला । “हट्‌ गे वेडे ! सांगूं नको कांहीं मजला ॥
नवर्‍याची लाज नाहीं तुला । आंवर जीभेला ।
लहान तोंडाला । मोठा घांस झाला !! ” ॥५॥
चौक ६ वा
बादशाह खलिता वाचून । झाला रागानं ।
लाल, मग त्यानं । पाठवलं पत्र नरस प्रभुजीला ।
“तुम्ही घोर अपराध केला । शिवाजीच्या नादिं लागला ।
रोहिडयाच्या डोंगरावर । झाला विचार ।
आमचा कारभार । हाणुन पाडण्याला ! ॥
शिवाजी टवाळ एक पोर । तुम्ही पर थोर ।
विचार हा घोर । सुचला तुम्हाला कसा समजेना ।
होतील यातना नाना । बंडखोरांना ।
पाजी हरामांना । तुमच्या सारख्यांना ॥
या शरण आठ दिवसांत । मावळ्या सहित ।
नाहींतर घात । खास हो करिन तुमच्या जीवाला ।
करवून जप्त जहागीर । बेचिराख करिन घरदार ।
उडवीन तुमचं मग शीर, । यावं भेटीला” ॥
चाल
शहाच्या वाचलं पत्राला । नरस प्रभू घाबरुन गेला ! ॥
हाय खाल्ली त्याच वेळेला । पूजितो रोहिडेशाला ॥
अनुष्ठान करित सांबाला । सात दिवस उपास केला ॥
चाल
दादाजी प्रभु तंवा बोलला आपल्या बापाला ॥
“बाबा ! द्यावा धीर चित्ताला । कुणासाठीं करतां चिंतेला ? ॥
दोन दिवस जगणं तुम्हांला । मग कोणच्या करता चिंतेला ? ।
जहागीर राहावी पोराला । म्हणून करतां काय काळजीला ? ।
पर हा देह दिला धर्माला । जहागीर गेली तरी फिकीर नाहीं हो मला ! ॥
रोहिडेश वाली आम्हांला । तो दूर करील दुरिताला ।
असं बाबा ! असल्या प्रसंगीं वाटतंय मला” ॥
चाल
पर कशी बातमी कळली शाहाला । कळेना हो त्याला ।
वैरी कोण झाला । लागली चिंता हीच दादाला ॥
रोहिडेश सहाय हो त्याला । आला मदतीला । देव वश झाला ! ॥६॥
चोक ७
ती बातमी कळली शिवबाला । बाळ जरी झाला ।
धीर त्यानं केला । पत्र मग धाडलं नरस प्रभुजीला ।
काय चौदा वर्साच पोर । देई पर धीर ।
थोरामोठयाला ! ॥ “शाहाचा राग फार झाला ।
आपल्यावर आला । दुःखाचा घाला । कळली ही वार्ता आज आम्हांला ॥
रोहिडेश सांब मदतीला । सोडुं नका आपल्या धीराला ।
भार देवाला । भक्ताचा झाला ॥ ज्यानं दिलं सहाय्य ध्रुव बाळा ।
अंबरीषाला । पंडुकुमारांला । राखील तोच देव आम्हांला ! ॥
हिंदवी राज्य करण्याला । पुढं जो झाला ।
त्याच्या मदतीला । देव हो आला !!
चाल
नरसाजी ! आणि एक बोल । ऐकावा सांगतों तुम्हांला ॥
देहाची करुन हो ढाल । राखीन आधीं तुम्हांला ॥
देहाची करुनियां भिंत । आड करिन तुमच्या जीवाला ॥
माझ्या रक्ताचा हो कारंजा । भिजवील आधीं तुम्हांला ॥
माझ्या लालबुंद डोक्यानं । पूजीन तुमच्या पायांला ॥
पंच प्राणांच्या हो ज्योतीनं । ओंवाळीन आधीं तुम्हांला ॥
ही खूण द्यावी हृदयाला । लक्षांत ठेवा या बोला ।
चाल
जंवर माझा नाहीं जीव गेला ।
तंवर धक्का नाहीं कसला तो तुमच्या जीवाला ! ॥
लौकरच आतां मी येईन तुमच्या भेटिला” ॥
असं पत्र धाडलं नरसाला । इकडं काय प्रकार झाला ।
नरस प्रभू अनुष्ठान करित होते सांबाला ॥
पूजा बांधली रोहिडेशाला । गंधाचा वास पसरला ।
धूप देवाला हो घातला । इतक्यांत पत्र घेऊन एक जण आला ॥
त्यानं दिलं पत्र नरसाला । नरसप्रभू वाची पत्राला ।
शिवाजीचं पत्र पाहून नरस गहिंवरला ! ॥
“म्हणे, धन्य ! धन्य ! शिवबाळ आलं जन्माला !! ॥
अजून मिसरुड फुटलं नाहीं त्याला ! ॥
पद देतो धीर आम्हांला ” ! असं बोलला आपलं आपणाला ।
मग डोळे घट्ट झांकून । करित ध्यानाला ! ॥
एकाग्र चित्तानं झाला । मग काय चमत्कार पाहिला ।
ऐकावं सांगतों तुम्हांला । पिंडित्‍नं त्याच वेळेला ।
’घुम्‌म्’ असा आवाज झाला ! ॥ दुभंगली पिंडी ते वेळा ।
अन् शिवाजीचं रुप घेऊन सांब प्रगटला ! ॥ असा चमत्कार पाहिला ।
मग डोळे उघडून पाहिलं बाहेर त्या वेळा ॥ शिवबाळ त्याला दिसला ! ।
आला नंदीचा हो कंटाळा । म्हणुन घोडयावर बसून जणु काय सांब भेटिला आला ! ॥
बघा इकडं दुसर्‍या बाजूला । हा कोण त्याच वेळीं आला ।
दादाजी पुढच्या बाजूला । अन्‌ बाळाजी मागच्या बाजूला ।
दादानं त्याला कैदा केला ! । पुढं काय प्रकार झाला । सांगीन पुढच्या चौकाला ॥७॥
चौक ८
दादाजी बोले शिवबाला । “वैरी हा झाला ।
बादशाहाला । बेत कळविला यानं हो सारा ।
म्हणून कैद केलं मी याला । आणि आणलं आज या वेळा ।
आतां हातीं घ्यावी तलवार । उडवावं शीर ।
देहाचा चूर । करुन बळि द्यावा ।
घारीगिधाडाला !! ॥ इवितिवी नाश होणार ।
आमचा खरोखर । करा परि ठार ।
दुष्ट हा आधीं घात करणारा । देहान्त प्रायश्चित्त याला ।
अशा पातक्याला योग्य या काळा ॥ बहिणीचा माझ्या पति जरी ।
असे हा तरी । पाप जो करी । दया माया कधीं दाऊं नये याला ॥
आज साप आम्हां चावला । उद्या डसेल कितिक दुसर्‍याला ॥
’आईबाप भाऊ सोयरे । कांटे जर झाले ।
उचलावे सारे’ । धर्म हें वदला “।
चाल
दादाचा सल्ला आवडेना बाळ शिवबाला ॥
मग बाळाजीला बोलला । “बाळाजी ! ऐका शब्दाला ।
कठिण काळ आला । धर्म गांजियला ।
फांस कंठाला ॥ निशिदिनीं लागला घोर भरतखंडाला ! ॥
गाय हंबरती हरघडी । रडती बापडी ॥
सुरी पर खडी । मानेवर आली ! ।
झाली मान धडावेगळी ! । जीभ लांब बघा लोंबली ! ।
बघा चालल्या गुळण्या रक्ताच्या जीवा अंतरली !! ॥
जर नसे रुचत हा बोल । घ्या ही तलवार ।
उडवा हें शीर । आधीं या वेळा । मग सुभेदार होऊन भोगा सोहळा !” ।
चाल
उपरति झाली चित्ताला । बाळाजीपंत गहिंवरला ॥
मिठी मारली घट्ट शिवबाला । पाण्याचा पूर डोळ्याला ॥
मग काय बोलला शिवबाला । “अर्पिला जीव चरणाला ॥
जरी दिलं इंद्रपद मजला । तरी नाहीं शिवणार त्याला ! ॥
आपल्या चरणाचा मी पायपोस । काय काम सांगावं मजला” ।
असा सारा प्रकार झाला ।
चाल
पुढं तोरणा किल्ला घेऊन । बाळाजीरावानं ।
बांधलं तोरण । हिंदवी-स्वराज्याचं त्या वेळा ॥
’पांडुरंग’ शाहीर झाला ॥ कीर्ति गाण्याला । आज या वेळा ॥८॥


छत्रपती शिवाजी महाराज पोवाडे समाप्त 

1 thought on “छत्रपती शिवाजी महाराज पोवाडे”

  1. योगेश दि. शिंदे ?? नाशिककर

    हार्दिक पोवाडा mp3 मध्ये आहे का..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *