दासबोध दशक विसावा

दासबोध दशक विसावा



 

दासबोध दशक विसावा

॥ श्रीमत् दासबोध ॥
॥ दशक विसावा : पूर्णनामदशक

समास पहिला : पूर्णापूर्णनिरूपण
॥ श्रीराम ॥

प्राणीव्यापक मन व्यापक । पृथ्वी व्यापक तेज व्यापक ।
वायो आकाश त्रिगुण व्यापक । अंतरात्मा मूळमाया ॥ १ ॥
या समासात श्रोत्यांनी सुरुवातीलाच वक्त्याला दोन प्रश्न विचारले आहेत. ते म्हणतात की, प्राणी व्यापक आहे. मन व्यापक आहे. त्याचप्रमाणे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, त्रिगुण, अंतरात्मा आणि मूळ माया ही सर्वच व्यापक आहेत. (१)

निर्गुण ब्रह्म तें व्यापक । ऐसें अवघेंच व्यापक ।
तरी हें सगट किं काये येक । भेद आहे ॥ २ ॥
याशिवाय आपण सांगता की निर्गुण ब्रह्म हेही व्यापक आहे. असे सर्वच जर व्यापक असेल, तर ते व्यापकपण सरसकट एकसारखेच आहे की यात काही भेद आहे ? (२)

आत्मा आणि निरंजन । येणेंहि वाटतो अनुमान ।
आत्मा सगुण किं निर्गुण । आणि निरंजन ॥ ३ ॥
आत्मा आणि निरंजन हे शब्द ऐकूनही मनात काही संदेह उत्पन्न होतो. तरी आत्मा सगुण आहे की निर्गुण, निरंजन आहे ? (३)

श्रोता संदेहीं पदिला । तेणें संदेह वाढला ।
अनुमान धरून बैसला । कोण तो कैसा ॥ ४ ॥
याप्रमाणे श्रोत्यांच्या मनात संदेह उत्पन्न झाला आणि अनुमानाने तो वाढतच चालला. कोण कसा आहे, याविषयी तो अनुमान करीत बसतो. (४)

ऐका पहिली आशंका । अवघा गल्बला करूं नका ।
प्रगट करून विवेका । प्रत्यये पाहावा ॥ ५ ॥
आता पहिल्या आशंकेचे उत्तर सांगितले जाईल, ते प्रथम ऐका. सगळा एकच गोंधळ करू नका. मनाशी नीट विचार करून अनुभव घेऊन पहावा. (५)

शरीपाडें सामर्थ्यपाडें । प्राणी व्याप करी निवाडें ।
परी पाहतां मनायेवढें । चपळ नाहीं ॥ ६ ॥
प्रत्येक प्राण्याचे शरीर भिन्न भिन्न प्रकारचे असते आणि त्याच्या शरीरास अनुसरून त्याच्या सामर्थ्यानुसार लहान-मोठे प्राणी व्याप करीत असतात. पण स्थूल शरीर मनाएवढे चपळ असत नाही.

चपळपण येकदेसी । पूर्ण व्यापकता नव्हे त्यासी ।
पाहातां पृथ्वीच्या व्यापासी । सीमा आहे ॥ ७ ॥
मनाचे चपळपणही परिपूर्ण नाही. कारण मन एका वेळी एकाच विषयाचा अंगीकार करते, म्हणजेच ते एकदेशी असल्याने त्यास पूर्ण व्यापकता नाही. पृथ्वीचा व्याप पाहिला असता त्यालाही सीमा आहे, हे स्पष्टपणे कळून येते. म्हणजेच प्राणी, मन, पृथ्वी ही संपूर्ण व्यापक नाहीत.

तैसेंचि आप आणि तेज । अपूर्ण दिसती सहज ।
वायो चपळ समज । येकदेसी ॥ ८ ॥
त्याप्रमाणे आप आणि तेज ही अपूर्ण आहेत, हेही सहज कळून येते आणि वायू तर चपळ असून एकदेशी आहे, हेही जाणून घ्यावे. (८)

गगन आणि निरंजन । तें पूर्ण व्यापक सघन ।
कोणीयेक अनुमान । तेथें असेचिना ॥ ९ ॥
गगन आणि निरंजन ब्रह्म ही दोन्ही पूर्णपणे व्यापक असून सर्वत्र घनदाट व्याप्त आहेत, यात अनुमान करण्याचे कारणच नाही.

त्रिगुण गुणक्षोभिणी माया । माईक जाईल विलया ।
अपूर्ण येकदेसी तया । पूर्ण व्यापकता न घडे ॥ १० ॥
त्रिगुण आणि पंचमहाभूते, गुणक्षोभिणी माया ही सर्व मायिक असून नाश पावतात. जे अपूर्ण आहे आणि एका वेळी एकाच स्थानी असते, त्यास पूर्ण व्यापकपण नसते. (१०)

आत्मा आणि निरंजन । हें दोहिकडे नामाभिधान ।
अर्थान्वये समजोन । बोलणें करावें ॥ ११ ॥
आत्मा आणि निरंजन या शब्दांचा प्रयोग दोन्हीकडे करतात. आत्मा म्हणजे जीवात्मा आणि आत्मा म्हणजे परब्रह्म अशा अर्थानेही त्या शब्दाचा प्रयोग केला जातो. ज्या संदर्भात प्रयोग केला असेल तसा अर्थ करावा. ही दोन्ही नावे पर्यायी आहेत. (११)

आत्मा मन अत्यंत चपळ । तरी हें व्यापक नव्हेचि केवळ ।
सुचित अंतःकर्ण निवळ । करून पाहावें ॥ १२ ॥
अंतरात्मा आणि मन ही दोन्ही अत्यंत चपळ आहेत हे खरे, पण ते पूर्णपणे व्यापक नसते. एकाग्र अंत:करण करून विचार करून पहावा. (१२)

अंतराळीं पाहातां पाताळी नाहीं । पाताळीं पाहातां अंतराळीं नाहीं ।
पूर्णपणें वसत नाहीं । चहुंकडे ॥ १३ ॥
मन ज्यावेळी अंतराळात जाते किंवा जीवात्माही अंतराळात जातो तेव्हा पाताळी नसतो. पाताळी असतो तेव्हा अंतराळात नसतो. चहूकडे पूर्णपणे एकाच वेळी असू शकत नाही. (१३)

पुढें पाहातां मागें नाहीं । मागें पाहातां पुढें नाहीं ।
वाम सव्य व्याप नाहीं । दशदिशा ॥ १४ ॥
ज्या वेळी पुढे असतो, तेव्हा मागे नसतो. मागे असतो तेव्हा पुढे नसतो. डावीकडे असतो तेव्हा उजवीकडे नसतो. दशदिशांना एकाच वेळी व्यापून नसतो. (१४)

चहुंकडे निशाणें मांडावीं । येकसरीं कैसीं सिवावीं ।
याकारणें समजोन उगवी । प्रत्ययें आपणासी ॥ १५ ॥
समजा, चहूबाजूकडे निशाणे लावलेली असली तर एखादा माणूस एकाच वेळी त्या सर्व निशाणांना स्पर्श करू शकत नाही. हा अनुभव लक्षात घेतला की कळून येते की, माणूस हा एकदेशी आहे. तो सर्वव्यापी असू शकत नाही. (१५)

सूर्य आला प्रतिबिंबला । हाहि दृष्टांत न घडे वस्तुला ।
वस्तुरूप निर्गुणाला । म्हणिजेत आहे ॥ १६ ॥
निर्गुण परब्रह्म शाश्वत आहे, तर सूर्याला उदयास्त आहेत. म्हणून सूर्याचे प्रतिबिंब जसे घयत पडते, तसेच परब्रह्माचे बुद्धीत पडलेले प्रतिबिंब म्हणजे जीवात्मा असा दृष्टांत देणे योग्य ठरत नाही. (१६)

घटाकाश मठकाश । हाहि दृष्टांत विशेष ।
तुळूं जातां निर्गुणास । साम्यता येते ॥ १७ ॥
घटाकाश, मठाकाश हाही दृष्टांत दिला जातो. आकाशाचा हा दृष्टांत पहिल्यापेक्षा जास्त बरोबर आहे. कारण आकाशाचे निर्गुणाशी साम्य आहे. (१७)

ब्रह्मींचा अंश आकाश । आणी आत्म्याचा अंश मानस ।
दोहींचा अनुभव प्रत्ययास । येथें घ्यावा ॥ १८ ॥
आकाश हा परब्रह्मींचा अंश आणि जीवात्म्याचा अंश म्हणजे मन असे जरी आपण म्हटले तरी दोन्हींचा अनुभव आपण घ्यावा. कारण दृष्टांत पूर्णांशाने कधीच साम्यतादर्शक नसतो. योग्य तेवढ्याच भागाचा विचार केला पाहिजे. नाहीतर येथे आकाश आणि मन हे सारखेच म्हणावे लागेल, परंतु ते अशक्य आहे. (१८)

गगन आणि हें मन । कैसे होती समान ।
मननसीळ महाजन । सकळहि जाणती ॥ १९ ॥
आकाश आणि मन ही दोन्ही कधीही समसमान असू शकत नाहीत. जे मननशील महाजन असतात, त्यांना ही गोष्ट कळते. (१९)

मन हें पुढें वावडे । मागें आवघेंचि रितें पडे ।
पूर्ण गगनास साम्यता घडे । कोण्या प्रकारें ॥ २० ॥
मन जेव्हा पुढे धाव घेते. तेव्हा मागे सर्व मोकळे पडते. अशा एकदेशी मनाची पूर्ण गगनाशी साम्यता कशी असू शकेल ? (२०)

परब्रह्मचि अचळ । आणि पर्वतासहि म्हणती अचळ ।
दिनीही येक केवळ । हें कैसें म्हणावें ॥ २१ ॥
परब्रह्माला अचल म्हणतात आणि पर्वतालाही अचल म्हणतात, पण म्हणून केवळ एवढ्यावरून दोन्हींना एक कसे म्हणता येईल ? (२१)

ज्ञान विज्ञान विपरितज्ञान । तिनी कैसीं होती समान ।
याचा प्रत्ययो मनन । करून पाहावा ॥ २२ ॥
ज्ञान, अज्ञान आणि विपरीत ज्ञान यांना समान कसे म्हणता येईल ? याचा मनन करून अनुभव घेऊन पाहावा. (२२)

ज्ञान म्हणिजे जाणणें । अज्ञान म्हणिजे नेणणें ।
विपरितज्ञान म्हणिजे देखणें । येकाचें येक ॥ २३ ॥
ज्ञान म्हणजे जाणणे. अज्ञान म्हणजे नेणणे, आणि विपरीत ज्ञान म्हणजे एक असता दुसरेच पाहणे होय. (२३ )

जाणणें नेणणें वेगळें केलें । ढोबळें पंचभूतिक उरलें ।
विपरीतज्ञान समजलें । पाहिजे जीवीं ॥ २४ ॥
जाणणे एका बाजूला केले, नेणणेही दूर सारले की मग स्थूल पांचभौतिकाची जाणीव हेच विपरीत ज्ञान उरते. हाच भ्रम होय हे जाणून घेतले पाहिजे. (२४)

द्रष्टा साक्षी अंतरात्मा । जीवात्माची होये शिवात्मा ।
पुढें शिवात्मा तोचि जीवात्मा । जन्म घेतो ॥ २५ ॥
वास्तविक अंतरात्मा हा द्रष्टा, साक्षी आहे. तो सर्व पिंडांच्या ठिकाणी जीवात्मा म्हणून ओळखला जातो. देहरूपी उपाधीचा त्याग केला की तो जीवात्माच शिवात्मा होतो. पण जेव्हा शिवात्मा आपले साक्षीत्व विसरतो, तेव्हा तोच जीवात्मा बनून जन्म घेतो. (२५)

आत्मत्वीं जन्ममरण लागे । आत्मत्वीं जन्ममरण न भंगे ।
संभवामि युगे युगे । ऐसे हें वचन ॥ २६ ॥
जोपर्यंत आत्मत्व म्हणजे मी आत्मा ही जाणीव असते, तोपर्यंत जन्ममरण चुकत नाही. ईश्वरालाही युगायुगात जन्म घ्यावे लागतात. हे ‘संभवामि युगे युगे’ या वचनावरून कळते. (२६)

जीव येकदेसी नर । विचारें जाला विश्वंभर ।
विश्वंभरास संसार । चुकेना कीं ॥ २७ ॥
जीव एका देही नर म्हणून जन्मास येतो. तो विचाराच्या योगाने विश्व व्यापणारा विश्वंभर म्हणजे शिवात्मा बनतो. पण विश्वंभर ईश्वरालाही विद्या मायेची उपाधी असल्याने अवताररूपी संसार चुकत नाही. (२७)

ज्ञान आणि अज्ञान । वृत्तिरूपें हें समान ।
निवृत्तिरूपें विज्ञान । जालें पाहिजे ॥ २८ ॥
ज्ञान आणि अज्ञान दोन्हीची स्थिती मीपणामुळेच असल्याने जाणीवरूपाने ही दोन्ही सारखीच म्हणजे वृत्तिरूपच आहेत. वृत्तीचाही संपूर्ण लय परब्रह्माच्या ठिकाणी होऊन निवृत्ती म्हणजे वृत्तिरहित स्थितीलाच विज्ञान असे म्हटले जाते. याचा साक्षात अनुभव येणे अत्यंत आवश्यक आहे. (२८)

ज्ञानें येवढें ब्रह्मांड केलें । ज्ञानें येवढें वाढविलें ।
नाना विकाराचें वळलें । तें हें ज्ञान ॥ २९ ॥
एका ज्ञानानेच एवढे ब्रह्मांड करून, ते वाढविले आहे. असे हे ज्ञान नाना विकारांनी भरलेले आहे. (२९)

आठवें देह ब्रह्मांडीचें । तें हें ज्ञान साचें ।
विज्ञानरूप विदेहाचें । पद पाविजे ॥ ३० ॥
मळमाया हेच ज्ञान होय. ज्ञानाने अज्ञानाचा नाश करून, ते ज्ञानही सोडून मीपणरहित अशा केवळ अनुभवरूप स्थितीला पोहोचले पाहिजे. विज्ञानरूप विदेह स्थितीची प्राप्ती करून घेतली पाहिजे. (३०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
पूर्णापूर्णनिरूपणनाम समास पहिला ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘पूर्णापूर्णनिरूपणनाम’ समास पहिला समाप्त.


समास दुसरा : सृष्टीत्रिविधलक्षणनिरूपण
॥ श्रीराम ॥

मूळमाया नस्तां चंचळ । निर्गुण ब्रह्म तें निश्चळ ।
जैसें गगन अंतराळ । चहुंकडे ॥ १ ॥
चंचळ मूळमाया नव्हती, त्यावेळी केवळ निर्गण निश्चळ परब्रह्मच आकाशाप्रमाणे, चहूकडे कोंदाटून राहिले होते. (१)

दृश्य आलें आणि गेलें । परी तें ब्रह्म संचलें ।
जैसें गगन कोंदाटलें । चहुंकडे ॥ २ ॥
दृश्य विश्व तर होत असते व परत जात असते म्हणजे विनाश पावते. पण परब्रह्म मात्र गगनाप्रमाणेच सर्वत्र ओतप्रोत कोंदाटून राहिलेले असते. त्याचा कधी नाश होत नाही. (२)

जिकडे पाहावें तिकडे अपार । कोणेकडे नाहीं पार ।
येकजिनसी स्वतंत्र । दुसरें नाहीं ॥ ३ ॥
जिकडे पहावे तिकडे अपार परब्रह्मच कोंदाटलेले असते, त्याचा पार लागूच शकत नाही. ते एकटे एकच स्वतंत्र सर्वत्र ओतप्रोत भरलेले असते. त्याच्याखेरीज दुसरे काही नसतेच. (३)

ब्रह्मांडावरतें बैसावें । अवकाश भकास अवलोकावें ।
तेथें चंचळ व्यापकाच्या नांवें । सुन्याकार ॥ ४ ॥
विवेकाने दृश्य ब्रह्मांड ओलांडून आकाशाशी तन्मय झाल्याने आपल्या ठिकाणचे चांचल्य जण नाहीच असा अनुभव येईल. विश्वाला व्यापून असणारा चंचलपणा तेथे जराही शिल्लक राहात नाही. (४)

दृश्य विवेकें काढिलें । मग परब्रह्म कोंदाटलें ।
कोणासीच अनुमानलें । नाहीं कदा ॥ ५ ॥
विवेकाने दृश्यास बाजूस सारल्यावर शून्यत्वाचे आकाशाचे आकलन होईल. परंतु सदोदित कोंदाटून असलेल्या परब्रह्माचे मात्र आकलन होत नाही. कारण तेथे पाहाणारा वेगळा राहूच शकत नाही. (५)

अधोर्ध पाहातां चहुंकडे । निर्गुण ब्रह्म जिकडे तिकडे ।
मन धांवेल कोणेकडे । अंत पाहावया ॥ ६ ॥
वर-खाली जिकडे पहावे तिकडे निर्गुण ब्रह्मच कोंदाटलेले असते. मन तर एकदेशी असल्याने त्या सर्वव्यापी निर्गुण ब्रह्माचा अंत ते कसा पाहू शकेल ? (६)

दृश्य चळे ब्रह्म चळेना । दृश्य कळे ब्रह्म कळेना ।
दृश्य आकळे ब्रह्म आकळेना । कल्पनेसी ॥ ७ ॥
दृश्य चळते, ब्रह्म चळत नाही. दृश्य कळू शकते, तर परब्रह्मास जाणता येत नाही. दृश्यास कल्पनेने आकलन करता येते. परब्रह्माचे आकलन कल्पनेच्या योगे होऊ शकत नाही. (७)

कल्पना म्हणिजे कांहींच नाहीं । ब्रह्म दाटले ठाईंचा ठाईं ।
वाक्यार्थ विवरत जाई । म्हणिजे बरें ॥ ८ ॥
कल्पना म्हणजे काहीच नाही. कारण कल्पनेने जे निर्माण होते ते वास्तविक अस्तित्वात नसते. आणि ब्रह्म तर सत्य वस्तू असून तेच सर्वाठायी ओतप्रोत कोंदटलेले असते. म्हणून मनुष्याने महावाक्याचा जो लक्ष्यार्थ – ‘अहं ब्रह्मास्मि’ अथवा ‘तत्त्वमसि’ त्याचे नेहमी चिंतन, करीत असावे, म्हणजे बरे. (८)

परब्रह्मायेवढें थोर नाहीं । श्रवणापरतें साधन नाहीं ।
कळल्याविण कांहींच नाहीं । समाधान ॥ ९ ॥
खरे तर परब्रह्माएवढी थोर वस्तू नाही आणि त्याची प्राप्ती करून घेण्यास श्रवणासारखे उत्कृष्ट साधन दुसरे नाही. आणि श्रवण, मनन, निदिध्यासनाने परब्रह्माचा साक्षात अनुभव आल्याखेरीज खरे समाधान लाभणे शक्य नाही. (९)

पिप्लीकामार्गें हळु हळु घडे । विहंगमें फळासी गांठी पडे ।
साधक मननीं पवाडे । म्हणिजे बरें ॥ १० ॥
हे ज्ञान पिपीलिका मार्गाने म्हणजे कर्मसाधनमार्गाने मुंगीसारखे हळूहळू होते. तर पक्ष्यासारख्या झेपेने म्हणजे ज्ञानमार्गाने – लवकर प्राप्त होते. म्हणून साधकाने तत्परतेने निरंतर मनन करीत राहावे म्हणजे बरे. (१०)

परब्रह्मासारिखें दुसरें । कांहींच नाहीं खरें ।
निंदा आणि स्तुतिउत्तरें । परब्रह्मीं नाहीं ॥ ११ ॥
परब्रह्मासारखे दुसरे खरे तर काही नाहीच. निंदा अथवा स्तुती यांपैकी काहीही परब्रह्मापर्यंत पोहोच्च शकत नाही. (११)

ऐसे परब्रह्म येकजिनसी । कांहीं तुळेना तयासी ।
मानुभव पुण्यरासी । तेथें पवाडती ॥ १२ ॥
असे हे परब्रह्म एकले एकच असल्याने त्याची कुणाशी तुलनाच करता येत नाही. जेथे साक्षात्कारी महानुभाव असतात, तेच त्यास जाणतात. (१२)

चंचळें होते दुःखप्राप्ती । निश्चळायेवडी नाहीं विश्रांती ।
निश्चळ प्रत्ययें पाहाती । माहानुभाव ॥ १३ ॥
चंचळाच्या योगे नेहमी दु:खच प्राप्त होते, तर निश्चल अशा परब्रह्माशी ऐक्य पावण्याइतकी विश्रांती दुसऱ्या कशानेही मिळत नाही. महानुभाव असतात, तेच अनुभवाने निश्चलाची प्राप्ती करून घेतात. (१३)

मुळापासून शेवटवरी । विचारणा केलीच करी ।
प्रत्ययाचा निश्चयो अंतरीं । तयासीच फावे ॥ १४ ॥
मूळमायेपासून संपूर्ण दृश्य सृष्टीच्या पसाऱ्यासंबंधी म्हणजे उभारणी-ते संहारणीपर्यंत जो कोणी निरंतर विचारणा करीतच राहतो. त्याचा स्वानुभव मनननिदिध्यासामुळे दृढ निश्चयात परिणमतो. (१४)

कल्पनेचि सृष्टी जाली । त्रिविध प्रकारें भासली ।
तिक्षण बुद्धीनें आणिली । पाहिजे मना ॥ १५ ॥
सर्व दृश्य सृष्टी ही कल्पनेपासून निर्माण झाली आहे. ती तीन प्रकारे भासते : १) मूळ मायेपासून त्रिगुणांपर्यंत अदृश्य (२) त्रिगुणांपासून पंचमहाभूतातल्या पृथ्वीपर्यंत (दृश्यादृश्य) (३) पृथ्वीपासून चारी खाणीवाणीपर्यंत दृश्य. या तिन्ही प्रकारांसंबंधी तीव्र बुद्धीने वारंवार मनाशी विचार केला पाहिजे. (१५)

मूळमायेपासून त्रिगुण । अवघें येकदेसी लक्षण ।
पांचा भूतांचा ढोबळा गुण । दिसत आहे ॥ १६ ॥
मूळमायेपासून त्रिगुणापर्यंत सर्व अदृश्य असून सूक्ष्म आहेत. ती सर्व एकदेशी आहेत. पंचमहाभूतांच्या मुळे सृष्टी दृश्य-स्थूल रूपाने प्रगट होते. तिचा पसारा आपल्याला प्रत्यक्षच दिसून येतो. (१६)

पृथ्वीपासून च्यारी खाणी । चत्वार वेगळाली करणी ।
सकळ सृष्टीचि चाली येथुनी । पुढें नाहीं ॥ १७ ॥
पृथ्वीपासूनच चारी खाणीचे जीव उत्पन्न होतात. त्यांचे व्यवहारही चार प्रकारचे असतात. येथे सगळी सृष्टिरचना संपते. यापुढे सृष्टिरचना नाही. (१७)

सृष्टीचें विविध लक्षण । विशद करूं निरूपण ।
श्रोतीं सुचित अंतःकर्ण । केलें पाहिजे ॥ १८ ॥
सृष्टीचे जे हे त्रिविध प्रकार सांगितले, त्यांची लक्षणे आता स्पष्ट करून सांगितली जातील. तरी श्रोत्यांनी अंत:करण स्थिर करून श्रवण करणे आवश्यक आहे. (१८)

मूळमाया जाणीवेची । मुळीं सूक्ष्म कल्पनेची ।
जैसी स्थिती परे वाचेची । तद्रूपचि ते ॥ १९ ॥
परा वाचा जशी केवळ स्फूर्तिमय असते, त्याप्रमाणेच ‘बहु स्याम्’ ही आद्यस्फूर्ती म्हणजेच मूळमाया होय. ही केवळ जाणीवरूप असते. (१९)

अष्टधा प्रकृतीचें मूळ । ते हे मूळमायाच केवळ ।
सूक्ष्मरूप बीज सकळ । मुळींच आहे ॥ २० ॥
मूळमाया हीच अष्टधा प्रकृतीचे मूळ आहे. मूळमायेतच सृष्टीचे सूक्ष्म बीज आहे. (२०)

जड पदार्थ चेतवितें तें । म्हणौन चैतन्य बोलिजेतें ।
सूक्ष्म रूपें संकेतें । समजोन घ्यावीं ॥ २१ ॥
सूक्ष्म रूप हे कधी प्रत्यक्ष दाखविता येत नाही. ते चिह्नांच्यावरून जाणून घ्यावे लागते. त्याप्रमाणेच मूळ माया जड पदार्थांना चेतविते, म्हणून तिला चैतन्य असेही म्हणतात. पण हे संकेताने जाणून घ्यावे. (२१)

प्रकृती पुरुषाचा विचार । अर्धनारीनटेश्वर ।
अष्टधा प्रकृतीचा विचार । सकळ कांहीं ॥ २२ ॥
प्रकृती पुरुषाचा विचार, अर्धनारीनटेश्वर, अष्टधा प्रकृतीचा विचार सर्व काही मूळमायेतच येतो. (२२)

गुप्त त्रिगुणाचें गूढत्व । म्हणौन संकेत महत्तत्त्व ।
गुप्तरूपें शुद्धसत्व । तेथेंचि वसे ॥ २३ ॥
त्रिगुणही गुप्तरूपाने मूळमायेतच वास करतात. त्या गूढत्वाला संकेताने महत्तत्त्व म्हणतात. शुद्ध सत्त्वगुण देखील गुप्तरूपाने तेथेच वास करतो. (२३)

जेथून गुण प्रगटती । तीस गुणक्षोभिणी म्हणती ।
त्रिगुणाचीं रूपें समजती । धन्य ते साधु ॥ २४ ॥
जेव्हा गुण व्यक्त दशेला येतात, तेव्हा त्या मायेला गुणक्षोभिणी असे म्हणतात. त्रिगुणांची रूपे ज्यांना समजतात ते साधू धन्य होत. (२४)

गुप्तरूपें गुणसौम्य । म्हणौनि बोलिजे गुणसाम्य ।
सूक्ष्म संकेत अगम्य । बहुतांस कैंचा ॥ २५ ॥
हे त्रिगुण अप्रगट स्थितीत एकसारखेच वाटत असल्याने त्या स्थितीला गुणसाम्य म्हणतात. हा संकेत सूक्ष्म आहे. तो समजण्यास सोपा नाही. त्यामळे बयाच जणांना तो समजत नाही. (२५)

मूळमायेपासून त्रिगुण । चंचळ येकदेसी लक्षण ।
प्रत्ययें पाहातां खूण । अंतरीं येते ॥ २६ ॥
मूळमायेपासून त्रिगुणापर्यंतची तत्त्वे चंचल आणि एकदेशी आहेत. ती सर्वव्यापी नाहीत. अनुभव घेतला की अंतरात त्याची खूण पटते. (२६)

पुढें पंचभूतांचीं बंडें । वाढलीं विशाळें उदंडें ।
सप्तद्वीपें नवखंडें । वसुंधरा हे ॥ २७ ॥
त्यानंतर पंचमहाभूतांचा विशाल आणि उदंड, अफाट विस्तार झाला आणि सात द्वीपे व नऊ खंड असलेली ही पृथ्वी निर्माण झाली. (२७)

त्रिगुणापासून पृथ्वीवरी । दुसया जिनसान्याची परी ।
दोनी जिनस याउपरी । तिसरा ऐका ॥ २८ ॥
त्रिगुणापासून पृथ्वीपर्यंत चंचलाचा हा दुसरा विभाग झाला. या दोन्हीची माहिती सांगून झाली. आता तिसऱ्या प्रकाराची माहिती ऐका. (२८)

पृथ्वी नाना जिनसाचें बीज । अंडज जारज श्वेतज उद्भिज ।
च्यारी खाणी च्यारी वाणी सहज । निर्माण जाल्या ॥ २९ ॥
पृथ्वीमध्ये नाना वस्तूंचे बीज असते. अंडज, जारज, स्वेदज आणि उद्भिज असे जीवांचे चार प्रकार आणि चारी वाणी पृथ्वी तत्त्वातून निर्माण झाल्या. (२९)

खाणी वाणी होती जाती । परंतु तैसीच आहे जगती ।
ऐसे होती आणी जाती । उदंड प्राणी ॥ ३० ॥
खाणी, वाणी उत्पन्न होतात आणि जातात, नाश पावतात. परंतु पृथ्वी जशीच्या तशीच राहते. याप्रमाणे असंख्य प्राणी उत्पन्न होतात आणि नाश पावतात. परंतु परब्रह्म जसेच्या तसेच असते. (३०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सृष्टीत्रिविधलक्षणनिरूपणनाम समास दुसरा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘सृष्टित्रिविधलक्षणनिरूपणनाम’ समास दुसरा समाप्त.


समास तिसरा : सूक्ष्मनामाभिधाननिरूपण
॥ श्रीराम ॥

मुळींहून सेवटवरी । विस्तार बोलिला नानापरी ।
पुन्हा विवरत विरत माघारी । वृत्ति न्यावी ॥ १ ॥
मूळमायेपासून चारी खाणीच्या जीवमात्रापर्यंतचा सृष्टीचा विस्तार नाना प्रकारे वर्णन केला. त्यासंबंधी मनन करीत करीत आपली वृत्ती परत मूळमायेकडे न्यावी. (१)

च्यारी खाणी च्यारी वाणी । चौर्‍यासी लक्ष जीवयोनी ।
नाना प्रकारीचे प्राणी । जन्मास येती ॥ २ ॥
चारी वाणी, चारी खाणी आणि त्यातील चौऱ्यांशी लक्ष जीवयोनी यांमध्ये नाना प्रकारचे असंख्य प्राणी जन्मास येतात. (२)

अवघे होती पृथ्वीपासूनी । पृथ्वीमधें जाती नासोनी ।
अनेक येती जाती परी अवनी । तैसीच आहे ॥ ३ ॥
सर्व पृथ्वीपासून उत्पन्न होतात आणि पृथ्वीवरच नाश पावतात. असे अनेक प्राणी येतात आणि जातात. पण ती पृथ्वी जशीच्या तशीच असते. (३)

ऐसें हें सेंड्याकडिल खांड । दुसरें भूतांचें बंड ।
तिसरें नामाभिधानें उदंड । सूक्ष्मरूपें ॥ ४ ॥
असा हा सृष्टिरचनेचा शेंड्याकडील विभाग आहे. तो येथे सांगितला. पंचमहाभूतांचा अफाट विस्तार हा दुसरा विभाग आहे आणि मूळमायेपासून त्रिगुणापर्यंत अत्यंत सूक्ष्म तत्त्वे हा तिसरा विभाग होय. त्यांची नावे सांगितली आहेतच. (४)

स्थूळ अवघें सांडून द्यावें । सूक्ष्मरूपें वोळखावें ।
गुणापासून पाहिलेच पाहावें । सूक्ष्मदृष्टीं ॥ ५ ॥
जेवढे स्थूल आहे ते सर्व सोडून द्यावे. सूक्ष्म जे आहे त्याचे गुणधर्म जाणून घ्यावेत. गुणांपासून मूळ मायेपर्यंत वारंवार सूक्ष्म दृष्टीने यांचा विचार करणे आवश्यक आहे. (५)

गुणाचीं रूपें जाणिव नेणीव । पाहिलाच पाहावा अभिप्राव ।
सूक्ष्मदृष्टीचें लाघव । येथून पुढें ॥ ६ ॥
जाणीव व नेणीव ही गुणांचीच रूपे आहेत. त्यासंबंधी वारंवार विचार करून त्यांतील रहस्य जाणून घ्यावे. येथून पुढेच सूक्ष्म दृष्टीचे खरे लाघव दिसून येते. (६)

शुद्ध नेणीव तमोगुण । शुद्ध जाणीव सत्वगुण ।
जाणीवनेणीव रजोगुण । मिश्रित चालिला ॥ ७ ॥
शुद्ध नेणीव हा तमोगुण असून शुद्ध जाणीव हा सत्त्वगुण जाणावा. जाणीव-नेणीवमिश्रित तो रजोगुण होय. (७)

त्रिगुणाचीं रूपें ऐसीं । कळों लागलीं अपैसीं ।
गुणापुढील कर्दमासी । गुणक्षोभिणी बोलिजे ॥ ८ ॥
याप्रमाणे त्रिगणांची रूपे आहेत. हे मननाने आपोआप कळून येते. गुणापूर्वीच्या मिश्रणास गुणक्षोभिणी असे म्हणतात. (८)

रज तम आणि सत्व । तिहींचें जेथें गूढत्व ।
तें जाणिजे महत्तत्त्व । कर्दमरूप ॥ ९ ॥
रज, तम आणि सत्त्व हे त्रिगुण जेथे सूक्ष्म रूपाने गुप्तपणे असतात, त्यालाच महत्तत्त्व असे म्हणतात. ते मिश्रणरूप असते. (९)

प्रकृती पुरुष शिवशक्ति । अर्धनारीनटेश्वर म्हणती ।
परी याची स्वरूपस्थिती । कर्दमरूप ॥ १० ॥
यालाच प्रकृती-पुरुष, शिव-शक्ती अर्धनारीनटेश्वर असेही म्हणतात. पण याची स्वरूपस्थिती मिश्रणरूप असते. (१०)

सूक्ष्मरूपें गुणसौम्य । त्यास बोलिजे गुणसाम्य ।
तैसेंचि चैतन्य अगम्य । सूक्ष्मरूपी ॥ ११ ॥
ज्या स्थितीत त्रिगुण अप्रगट म्हणजेच साम्यावस्थेत एकसारखेच वाटत असतात, त्या स्थितीला गुणसाम्य म्हणतात. तसेच जड पदार्थाला चेतविते, म्हणून मूळमायेलाही चैतन्य म्हणतात. पण हे सर्व कळण्यास अवघड असून सूक्ष्म दृष्टीने जाणून घ्यावे लागते. (११)

बहुजिनसी मूळमाया । माहांकारण ब्रह्मांडीची काया ।
ऐसिया सूक्ष्म अन्वया । पाहिलेंचि पाहावें ॥ १२ ॥
मूळमाया अशी अनेक तत्त्वांनी युक्त आहे. ब्रह्मांडाचा महाकारण देह असेही तिला म्हणतात. अशी ही तत्त्वे आणि त्यांचे संबंध अत्यंत सूक्ष्म आहेत. म्हणून त्यांच्यासंबंधी वारंवार विचार करून त्यांचे ज्ञान करून घ्यावे. (१२)

च्यारी खाणी पांच भूतें । चौदा सूक्ष्म संकेतें ।
काये पाहणें तें येथें । शोधून पाहावें ॥ १३ ॥
चारी खाणी, पंचमहाभूते आणि मूळमायेची चौदा नावे सूक्ष्म संकेताने जाणून घ्यावीत आणि सृष्टिरचनेसंबंधी जे काय जाणण्यासारखे असेल, ते सर्व जाणून घ्यावे. (१३)

आहाच पाहातां कळेना । गरज केल्यां समजेना ।
नाना प्रकारीं जनाच्या मना । संदेह पडती ॥ १४ ॥
नुसते वरवर पाहिल्याने अथवा गरजेपुरते पाहण्याने हे सर्व समजत नाही आणि लोकांच्या मनात नाना प्रकारचे संदेह मात्र उत्पन्न होतात. (१४)

चौदा पांच येकोणीस । येकोणीस च्यारी तेविस ।
यांमधें मूळ चतुर्दश । पाहिलेंचि पाहावें ॥ १५ ॥
मूळमायेची चौदा नावे, पंचमहाभूते मिळून एकोणीस आणि चार खाणी मिळून तेवीस तत्त्वे होतात. त्यांपैकी मूळ मायेची चौदा नामे वारंवार त्यांच्यावर विचार करून जाणून घ्यावीत. (१५)

जो विवरोन समजला । तेथें संदेह नाहीं उरला ।
समजल्याविण जो गल्बला । तो निरर्थक ॥ १६ ॥
त्यांचे विवरण वारंवार केल्यानेच त्यांचे ज्ञान होते आणि मग सर्व संदेह दूर होतात. ते नीट जर जाणून घेतले नाही, तर निरर्थकच गोंधळ माजतो. (१६)

सकळ सृष्टीचें बीज । मूळमायेंत असे सहज ।
अवघें समजतां सज्ज । परमार्थ होतो ॥ १७ ॥
सर्व दृश्य सृष्टीचे बीज साहजिकरीत्याच मूळमायेतच आहे. हे सर्व नीट समजून घेऊन मनन केल्याने परमार्थ सहज सिद्ध होतो. (१७)

समजलें माणूस चावळेना । निश्चै अनुमान धरीना ।
सावळगोंदा करीना । परमार्थ कदा ॥ १८ ॥
मूळमाया आणि त्रिगुणांचे स्वरूप जो माणूस मननाने जाणून घेतो, त्याच्या मनात काही संदेह राहात नाही. त्यासंबंधीचा त्याचा निश्चय कधी ढळत नाही आणि त्यामुळे उगीच अनुमान करीत राहून तो कधी परमार्थात सावळा गोंधळही उपस्थित करीत नाही (१८)

शब्दातीत बोलतां आलें । त्यास वाच्यांश बोलिलें ।
शुद्ध लक्ष्यांश लक्षिलें । पाहिजे विवेकें ॥ १९ ॥
जे शब्दातीत आहे, त्याच्यासंबंधी काही बोलता आले, तरी तो वाच्यांशच असणार. पण विवेकाने शुद्ध लक्ष्यांशावर लक्ष केंद्रित करून त्याचे मनन, निदिध्यासन केले पाहिजे. (१९)

पूर्वपक्ष म्हणिजे माया । सिद्धांतें जाये विलया ।
माया नस्तां मग तया । काये म्हणावें ॥ २० ॥
ही ज्ञानचर्चा म्हणजे मायेतील पूर्वपक्ष होय. ती माया सिद्धांतरूप परब्रह्मात विलीन होते. साक्षात्काराने ती कधी झालीच नाही हे पटते. जेथे मायाच नाही तेथे वाणी तरी कुठली ? अशा वेळी परब्रह्म हे नाव तरी कुठे राहते ? (२०)

अन्वये आणी वीतरेक । हा पूर्वपक्षाचा विवेक ।
सिद्धांत म्हणिजे शुद्ध येक । दुसरें नाहीं ॥ २१ ॥
अन्वय म्हणजे उभारणी आणि व्यतिरेक म्हणजे संहारणी हा सर्व पूर्वपक्षाचाच विवेक आहे. म्हणजे तोही मायिकच आहे. सिद्धांत म्हणजे केवळ एक शुद्ध परब्रह्मच होय. त्याच्याशिवाय दुसरे काही अस्तित्वातच नाही. (२१)

अधोमुखें भेद वाढतो । ऊर्धमुखें भेद तुटतो ।
निःसंगपणें निर्गुणी तो । माहांयोगी ॥ २२ ॥
अधोमुखाने म्हणजे विस्ताराचा विचार केल्याने भेद-भाव वाढतो आणि ऊर्ध्वमुखे म्हणजे मुळासंबंधी विवेक केला म्हणजे भेद नष्ट होतो. आणि विवेकविचाराला कारण जे मीपण त्याचाच त्याग केल्याने तो साधक निर्गुणी ऐक्य पावून महायोगी बनतो. (२२)

माया मिथ्या ऐसी कळली । तरी मग भीड कां लागली ।
मायेचें भिडेनें घसरली । स्वरूपस्थिती ॥ २३ ॥
एकदा माया मिथ्या असे कळल्यानंतर मग मायेची भीड का लागावी ? मायेची भीड धरल्याने स्वरूपस्थिती मात्र घसरते. (२३)

लटके मायेनें दपटावें । सत्य परब्रह्म सांडावें ।
मुख्य निश्चयें हिंडावें । कासयासी ॥ २४ ॥
मिथ्या मायेच्या भिडेने सत्य परब्रह्माकडे दुर्लक्ष करणे जसे अयोग्य आहे, तसेच ब्रह्मस्वरूपाच्या निश्चयानंतर परत मायिकाच्या आशेने इकडे-तिकडे वणवण करीत फिरणे, हेही अयोग्यच आहे. (२४)

पृथ्वीमधें बहुत जन । त्यामधें असती सज्जन ।
परी साधूस वोळखतो कोण । साधुवेगळा ॥ २५ ॥
पृथ्वीमध्ये अनेक लोक आहेत. त्यांमध्ये कित्येक सज्जनही आहेत. पण जो स्वतः साधू असेल तोच दुसऱ्या साधूला ओळखू शकतो. इतरांना त्याची ओळख पटत नाही. (२५)

म्हणौन संसार सांडावा । मग साधूचा शोध घ्यावा ।
फिरफिरों ठाइं पाडावा । साधुजन ॥ २६ ॥
म्हणून संसार सोडून प्रथम साधूचा शोध घ्यावा. ठिकठिकाणी फिरून साधूलोकांची माहिती करून घ्यावी. (२६)

उदंड हुडकावे संत । सांपडे प्रचितीचा महंत ।
प्रचितीविण स्वहित । होणार नाहीं ॥ २७ ॥
उदंड संत शोधावेत, तेव्हा कुठे एखादा – स्वानुभवी महंत सापडतो. अशा स्वानुभवी महंताशिवाय आपले हित होणार नाही. (२७)

प्रपंच अथवा परमार्थ । प्रचितीविण अवघें वेर्थ ।
प्रत्ययेज्ञानी तो समर्थ । सकळांमध्यें ॥ २८ ॥
प्रपंच असो वा परमार्थ असो, प्रचीतीवीण दोन्हीकडे सर्व व्यर्थच ठरते. जो साक्षात्कारी – स्वानुभवी संत असतो, तोच सर्वांमध्ये श्रेष्ठ होय. (२८)

रात्रंदिवस पाहावा अर्थ । अर्थ पाहेल तो समर्थ ।
परलोकींच निजस्वार्थ । तेथेंचि घडे ॥ २९ ॥
रात्रंदिवस परमार्थाचा निदिध्यास असावा. असा जो निरंतर आत्मानुसंधान करीत असतो. तोच श्रेष्ठ जाणावा. त्याच्या संगतीने, त्याच्या कृपेनेच परलोकीचा निजस्वार्थ साधता येतो. (२९)

म्हणौन पाहिलेंचि पाहावें । आणि शोधिलेंचि शोधावें ।
अवघें कळतां स्वभावें । संदेह तुटती ॥ ३० ॥
म्हणून साधकाने अध्यात्म ग्रंथाचे वारंवार परिशीलन करावे, पाहिलेलेच पुन्हा पहावे, जे श्रवण केले असेल, त्याचे मनन, निदिध्यासन करून सूक्ष्म विवेकाने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत राहावे. म्हणजे स्वाभाविकरीत्याच जे रहस्य ते कळून येते, त्या परब्रह्माचा साक्षात अनुभव येऊन सर्व संदेह नष्ट होतात. (३०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सूक्ष्मनामाभिधाननिरूपणनाम समास तिसरा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘सूक्ष्मनामाभिधाननाम’ समास तिसरा समाप्त.


समास चौथा : आत्मानिरूपण
॥ श्रीराम ॥

सकळ जनास प्रार्थना । उगेंच उदास करावेंना ।
निरूपण आणावें मना । प्रत्ययाचें ॥ १ ॥
सर्व लोकांना माझी अशी प्रार्थना आहे की, त्यांनी उगीच निराश होऊ नये. तसेच उगीच निरूपणामुळे आलेले तात्पुरते वैराग्यही दाखवू नये. तर समर्थ जे निरूपण करतात, ते स्वानुभवाचे आहे, हे जाणून त्याचे मनन करावे. (१)

प्रत्यये राहिला येकेकडे । आपण धांवतो भलतेकडे ।
तरी सारासाराचे निवाडे । कैसे होती ॥ २ ॥
स्वानुभव राहतो एकीकडे आणि आपण धावतो भलतीकडे अशी परिस्थिती असल्याने सारासारविवेकाने होणारा निश्चय कसा प्राप्त होणार ? (२)

उगिच पाहातां सृष्टी । गल्बला दिसतो दृष्टीं ।
परी ते राजसत्तेची गोष्टी । वेगळीच ॥ ३ ॥
सृष्टीकडे दृष्टी टाकली की, सर्वत्र गोंधळच आढळून येतो. पण राजसत्तेची गोष्टच वेगळी असते. ती प्रत्यक्ष दिसत नसूनही कार्यकारी असते. तसेच ईश्वरी सत्तेचे समजावे. (३)

पृथ्वीमधें जितुकीं शरीरें । तितुकीं भगवंताचीं घरें ।
नाना सुखें येणें द्वारें । प्राप्त होती ॥ ४ ॥
पृथ्वीमध्ये जितकी म्हणन शरीरे आहेत. ती ती तितकी सर्वच्या सर्व भगवंताची घरे आहेत. या शरीराच्या द्वारेच जीवाला नाना सुखे प्राप्त होत असतात. (४)

त्याचा महिमा कळेल कोणाला । माता वांटून कृपाळु जाला ।
प्रत्यक्ष जगदीश जगाला । रक्षितसे ॥ ५ ॥
त्या ईश्वराचा महिमा कोणीही यथार्थ जाणू शकत नाही. प्रत्येक जीवमात्राच्या आईच्या रूपाने ईश्वरच सर्वांमध्ये आपली कृपा वाटत असतो आणि तो जगदीशच सर्व जगाचे रक्षण करीत असतो. (५)

सत्त पृथ्वीमधें वांटली । जेथें तेथें विभागली ।
कळेनें सृष्टि चालिली । भगवंताचे ॥ ६ ॥
ईश्वराचीच सत्ता या पृथ्वीवरील निरनिराळ्या प्राण्यांच्या मध्ये वाटली गेली आहे. गीतेत भगवान सांगतात की माझ्या एका अल्प अशा अंशाने संपूर्ण जग चालले आहे. (६)

मूळ जाणत्या पुरुषाची सत्ता । शरीरीं विभागली तत्वता ।
सकळ कळा चातुर्यता । तेथें वसे ॥ ७ ॥
मूळ जगदीशाची म्हणजे अंतरात्म्याची सत्ता निरनिराळ्या शरीरात तत्त्वता विभागली गेली आहे. सर्व कला, चातुर्य वगैरे अंतरात्म्याच्या ठिकाणी असतात. (७)

सकळ पुराचा ईश । जगामध्यें तो जगदीश ।
नाना शरीरीं सावकास । करूं लागे ॥ ८ ॥
सकळ देहरूपी पुरांचा जो ईश आहे, तोच जगामध्ये जगदीश म्हणून ओळखला जातो. नाना शरीरात तो त्या त्या शरीरास अनुसरून सावकाश व्यवहार करत असतो. (८)

पाहातां सृष्टिची रचना । ते येकाचेन चालेना ।
येकचि चालवी नाना । देह धरुनी ॥ ९ ॥
सृष्टीची रचना पाहिली की, वाटते, हा व्याप एकटादुकटा कुणीही चालवू शकणार नाही. परंतु नाना देह धारण करून एक अंतरात्माच सर्व काही चालवत असतो. (९)

नाहीं उंच नीच विचारिलें । नाहीं बरें वाईट पाहिलें ।
कार्ये चालों ऐसें जालें । भगवंतासी ॥ १० ॥
भगवंताने सृष्टीची रचना केली, तेव्हा त्याने उच्चनीच पाहिले नाही की, बरे-वाईट हाही विचार केला नाही. कुठून का होईना सृष्टीचे कार्य व्यवस्थित चालले म्हणजे झाले, असेच जणू काय भगवंतास वाटत असावे आणि म्हणून त्याने अनेक देह निर्माण केले. (१०)

किंवा नेणणें आडवें केलें । किंवा अभ्यासीं घातलें ।
हें कैसें कैसें केलें । त्याचा तोचि जाणे ॥ ११ ॥
त्याने काही लोकांना नेणते केले, तर काही लोकांना साधक बनवून अभ्यासात घातले. हे सर्व कसे कसे आणि का केले हे एक त्याचा तोच जाण शकतो (११)

जगदांतरीं अनुसंधान । बरें पाहाणें हेंचि ध्यान ।
ध्यान आणी तें ज्ञान । येकरूप ॥ १२ ॥
जगाच्या अंतरात्म्याचे अनुसंधान ठेवणे हेच ध्यान होय. ज्ञानाशिवाय हे जमणार नाही. म्हणूनच तत्त्वतः ध्यान आणि ज्ञान ही एकरूपच आहेत (१२)

प्राणी संसारास आला । कांहीं येक शाहाणा जाला ।
मग तो विवरों लागला । भूमंडळीं ॥ १३ ॥
मनुष्य जगात जन्माला येतो. कालांतराने तो थोडाफार शहाणाही होतो आणि मग तो जगाबद्दल विचारही करू लागतो. (१३)

प्रगट रामाचें निशाण । आत्माराम ज्ञानघन ।
विश्वंभर विद्यमान । भाग्यें कळे ॥ १४ ॥
रामाचे अस्तित्व जगात प्रगट आहे. प्रत्येक प्राणिमात्राच्या अंतर्यामी ज्ञानघन आत्माराम विराजमान असतो. पण या विद्यमान असणाऱ्या विश्वंभराचे ज्ञान एखाद्याला भाग्याने होते. (१४)

उपासना धुंडुन वासना धरिली । तरी ते लांबतचि गेली ।
महिमा न कळे बोलिली । येथार्थ आहे ॥ १५ ॥
माणसाने उपासनेच्या मिषाने स्वर्गादी प्राप्तीची वासना धरली तर पुण्यक्षयानंतर परत जन्म असल्याने जन्ममृत्यूची परंपरा लांबतच राहील. मायेचा महिमा असा अगाध आहे असे जे तिचे वर्णन करतात ते यथार्थच आहे. (१५)

द्रष्टा म्हणिजे पाहाता । साक्षी म्हणिजे जाणता ।
अनंतरूपी अनंता । वोळखावें ॥ १६ ॥
अंतरात्मा हा द्रष्टा म्हणजे पाहणाराही आहे आणि साक्षी म्हणजे जाणणाराही आहे. तोच सर्व प्राण्यांच्या अंतर्यामी जाणीवरूपाने वास्तव्य करीत असतो. अशा अनंतरूपाने नटलेल्या अनंतास ओळखावे. (१६)

संगती असावी भल्यांची । धाटी कथा निरूपणाची ।
कांहीं येक मनाची । विश्रांती आहे ॥ १७ ॥
भल्यांची संगत नेहमी असावी आणि कथा आणि अध्यात्मनिरूपण श्रवण, मनन करण्याची सवय असावी. म्हणजे त्यायोगेच मनाला काही एक विश्रांती प्राप्त होते. (१७)

त्याहिमधें प्रत्ययेज्ञान । जाळून टाकिला अनुमान ।
प्रचितीविण समाधान । पाविजेल कैंचें ॥ १८ ॥
त्यातही अनुभवाचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. असे अनुभवाचे ज्ञान असेल, तरच अनुमानाचे जळून भस्म होते. स्वानुभवाशिवाय शाश्वत समाधान कसे प्राप्त होईल ? (१८)

मूळसंकल्प तो हरिसंकल्प । मूळमायेमधील साक्षेप ।
जगदांतरीं तेंचि रूप । देखिजेतें ॥ १९ ॥
मळ संकल्प तोच हरिसंकल्प होय. मूळमायेचा सर्व खटाटोप या संकल्पानुसार चालतो. त्या संकल्पानुसारच जगातील सर्व घटना घडत असतात. (१९)

उपासना ज्ञानस्वरूप । ज्ञानीं चौथा देह आरोप ।
याकारणें सर्व संकल्प । सोडून द्यावा ॥ २० ॥
मूळमाया-हरिसंकल्प-हा परब्रह्माच्या ठिकाणी केलेला केवळ आरोप आहे. तो मिथ्या असल्याने साधनाने सर्व संकल्पांचा त्याग करावयास हवा. हे ज्ञान उपासनेने होते म्हणूनच उपासना ही ज्ञानस्वरूप होय. म्हणजेच उपासनेची परिपूर्ती या ज्ञानात झाली पाहिजे. (२०)

पुढें परब्रह्म विशाळ । गगनासारिखें पोकळ ।
घन पातळ कोमळ । काये म्हणावें ॥ २१ ॥
सर्व संकल्प सोडून दिले की पुढे गगनासारखे पोकळ, विशाल असे परब्रह्म सर्वत्र अनुभवास येते. त्याला घनदाट म्हणावे, पातळ म्हणावे की कोमल म्हणावे, काय म्हणावे हे खरोखर कळतच नाही. (२१)

उपासना म्हणिजे ज्ञान । ज्ञानें पाविजे निरंजन ।
योगियांचें समाधान । येणें रितीं ॥ २२ ॥
उपासना म्हणजेच ज्ञान होय. या ज्ञानानेच निरंजन परब्रह्माची प्राप्ती होते. पण ज्ञानातील सूक्ष्म मीपणा जेव्हा नष्ट होतो, तेव्हाच परब्रह्मप्राप्ती होते. हेच योग्याचे समाधान होय. (२२)

विचार नेहटूनसा पाहे । तरी उपासना आपणचि आहे ।
येक जाये एक आहे । देह धरुनी ॥ २३ ॥
नीट लक्षपूर्वक नेटाने विचार करून पाहिले की, ज्याची उपासना करावयाची ते उपास्य आपणच असल्याचा प्रत्यय येतो. त्यामुळे उपासक उपास्यात समरसून जातो मग उपासक उरतच नाही, तर उपास्यच त्याच्या देहाच्या आश्रयाने राहाते. (२३)

अखंड ऐसी घालमेली । पूर्वापार होत गेली ।
आतां हि तैसीच चालिली । उत्पत्ति स्थिती ॥ २४ ॥
जगात पूर्वापारच उत्पत्ती, स्थिती, संहार अशी घालमेल चालत आली आहे व आताही ही तशीच चालू आहे. (२४)

बनावरी बनचरांची सत्ता । जळावरी जळचरांची सत्ता ।
भूमंडळीं भूपाळां समस्तां । येणेंचि न्यायें ॥ २५ ॥
वनावर वनचरांची सत्ता असते, जलावर जलचरांची सत्ता असते तर त्याच न्यायाने भूमंडळावर भूपालांची सत्ता असते. (२५)

सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें ।
परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ॥ २६ ॥
तशीच सर्व जगावर जगदीश्वराची सत्ता असते. ती सर्वांच्या ठिकाणीच विभागलेली असते. त्यामुळे जो कोणी जे जे कार्य करतो, त्यास त्या कार्यानुसार सामर्थ्य प्राप्त होते. परंतु कुठल्याही कार्याला, चळवळीला भगवंताचा आश्रय असतो, अशी दृढ श्रद्धा पाहिजे. (२६)

कर्ता जगदीश हें तों खरें । परी विभाग आला पृथकाकारें ।
तेथें अहंतेचें काविरें । बाधिजेना ॥ २७ ॥
सर्व कार्याचा कर्ता जगदीश असतो, ही गोष्ट पूर्णपणे सत्य आहे. पण भगवंताच्या सत्तेचे वेगवेगळ्या प्राण्यांच्या ठिकाणी जे अधिष्ठान आहे, त्याच्याकरवीच सर्व कार्य चालत असते. हे जाणन आपण केवळ निमित्त आहोत, कर्ता-करविता भगवंत आहे, अशी भावना करून कार्य केले की, अहंकाराचे वेड बाधत नाही. (२७)

हरिर्दाता हरिर्भोक्ता । ऐसें चालतें तत्वता ।
ये गोष्टीचा आतां । विचार पाहावा ॥ २८ ॥
देणायात आणि घेणायात तो भगवंत हरीच असल्याने तोच दाता व तोच भोक्ता अशी वास्तविक स्थिती असते. या गोष्टीचा मनाशी विचार करून पाहावा. (२८)

सकळ कर्ता परमेश्वरु । आपला माइक विचारु ।
जैसें कळेल तैसें करूं । जगदांतरें ॥ २९ ॥
परमेश्वर हाच सकळ कर्ता आहे. आपण मायिक आहोत. आपले कर्तेपणही मायिक आहे, म्हणून ईश्वर आपणाकडून जे काही कार्य करवून घेईल, ते त्याच्या कृपेने जसे यथामती कळेल त्याप्रमाणे या जगासाठी करू. (२९)

देवायेवढें चपळ नाहीं । ब्रह्मायेवढें निश्चळ नाहीं ।
पाइरी चढोन पाहीं । मूळपरियंत ॥ ३० ॥
इतके सामर्थ्य जरी असले, तरी हा अंतरात्मा चंचलच आहे. एक परब्रह्म तेवढे निश्चल असून त्याच्यासारखे निश्चल दुसरे कोणीही नाही. पण हे कळण्यासही पायरी-पायरीने मूळमायेपर्यंत जावे आणि नंतर स्वानुभवाने ते परब्रह्म जाणावे. (३०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
आत्मानिरूपणनाम समास चौथा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘आत्मानिरूपणनाम’ समास चौथा समाप्त.


समास पाचवा : चत्वारजिन्नसनिरूपण
॥ श्रीराम ॥

येथून पाहातां तेथवरी । चत्वार जीनस अवधारीं ।
येक चौदा पांच च्यारी । ऐसें आहे ॥ १ ॥
या सृष्टीमध्ये येथून तेथवर विचार करून पाहिले असता एकूण चारच जिन्नस आहेत असे दिसून येते. ते कोणते ते ऐका. एक परब्रह्म, मायेची चौदा नावे हा दुसरा जिन्नस, पंचमहाभूते हा तिसरा जिन्नस आणि चारी खाणी हा चौथा जिन्नस होय. (१)

परब्रह्म सकळांहून वेगळें । परब्रह्म सकळांहून आगळें ।
नाना कल्पनेनिराळें । परब्रह्म तें ॥ २ ॥
त्यात परब्रह्म हे या सर्वांहून वेगळे आणि आगळे आहे. अनेक प्रकारच्या कल्पनांहून ते अगदी निराळे आहे. (२)

परब्रह्माचा विचार । नाना कल्पनेहून पर ।
निर्मळ निश्चळ निर्विकार । अखंड आहे ॥ ३ ॥
परब्रह्माचा विचार हा कल्पनेतून अगदी पलीकडचा असून ते निर्मळ, निश्चल, निर्विकार आणि अखंड आहे. (३)

परब्रह्मास कांहींच तुळेना । हा येक मुख्य जिनसाना ।
दुसरा जिनस नाना कल्पना । मूळमाया ॥ ४ ॥
परब्रह्माची तुलना कशाहीबरोबर करता येत नाही आणि चारी जिन्नसांत हे मुख्य आहे, श्रेष्ठ आहे. दुसरा जिन्नस मूळमाया असून ती नाना कल्पनांनी भरलेली आहे. (४)

नाना सूक्ष्मरूप । सूक्ष्म आणी कर्दमरूप ।
मुळींच्या संकल्पाचा आरोप । मूळमाया ॥ ५ ॥
मूळमायेची अनेक सूक्ष्मरूपे आहेत. ती अत्यंत सूक्ष्म असून मिश्रणरूप आहेत. परब्रह्माच्या ठिकाणी जो स्फुरणरूप संकल्पाचा आरोप केला जातो, तो म्हणजेच मूळमाया होय. (५)

हरिसंकल्प मुळींचा । आत्माराम सकळांचा ।
संकेत नामाभिधानाचा । येणें प्रकारें ॥ ६ ॥
या मूळ संकल्पालाच हरिसंकल्प असे म्हणतात. सर्वांच्या अंतर्यामी असणारा आत्माराम अथवा अंतरात्मा तो हाच होय. त्याला जी नावे दिली गेली आहेत, ती पुढीलप्रमाणे आहे. (६)

निश्चळीं चंचळ चेतलें । म्हणौनि चैतन्य बोलिलें ।
गुणसामानत्वें जालें । गुणसाम्य ऐसें ॥ ७ ॥
निश्चल परब्रह्माच्या ठिकाणी जी चंचल चेतना चेतविली गेली तिला चैतन्य असे म्हणतात. तेथे गुणांचे प्रमाण सम असते म्हणून त्याला गुणसाम्य असेही म्हणतात. (७)

अर्धनारीनटेश्वर । तोचि शड्गुणैश्वर ।
प्रकृतिपुरुषाचा विचार । शिवशक्ती ॥ ८ ॥
अर्धनारीनटेश्वर, षडगुणेश्वर, प्रकृती-पुरुष आणि शिव-शक्ती यांचाही विचार तोच आहे. (८)

सुद्धसत्वगुणाची मांडणी । अर्धमात्रा गुणक्षोभिणी ।
पुढें तिही गुणांची करणी । प्रगट जाली ॥ ९ ॥
शुद्ध सत्त्वगुणाची मांडणी, अर्धमात्रा असलेली गुणक्षोभिणी, सत्त्व, रज आणि तम या गुणांची करणी यातून प्रगट झाली. (९)

मन माया अंतरात्मा । चौदा जिनसांची सीमा ।
विद्यमान ज्ञानात्मा । इतुके ठाइं ॥ १० ॥
मन, माया, अंतरात्मा इत्यादी सर्व मिळून मूळ मायेची चौदा नामे होतात. सदैव विद्यमान असणारा तो ज्ञानात्मा अथवा आदि संकल्प इतक्या प्रकारे अनुभवास येतो. (१०)

ऐसा दुसरा जिनस । अभिधानें चतुर्दश ।
आतां तिसरा जिनस । पंचमाहाभूतें ॥ ११ ॥
असा हा दुसरा जिन्नस चौदा नावांनी ओळखला जातो. आता तिसरा जिन्नस जो पंचमहाभूते त्यासंबंधी ऐका. (११)

येथें पाहातां जाणीव थोडी । आदिअंत हे रोकडी ।
खाणी निरोपिल्या तांतडी । तो चौथा जिनस ॥ १२ ॥
या पंचमहाभूतामध्ये जाणीव अत्यंत थोडी असते. यांना प्रत्यक्ष उत्पत्ती आणि नाश आहे हा रोकडा अनुभव येतो. चारी खाणींचे जे पूर्वी वर्णन केले आहे, त्या चारी खाणी हा चौथा जिन्नस होय. (१२)

च्यारी खाणी अनंत प्राणी । जाणीवेची जाली दाटणी ।
च्यारी जिनस येथूनी । संपूर्ण जाले ॥ १३ ॥
चारी खाणीत अनंत प्राणी उत्पन्न होत असतात. त्या प्राण्यांच्या अंतर्यामी जाणिवांची एकच दाटी झालेली असते. याप्रमाणे पूर्वी सांगितलेले चारी जिन्नस येथे संपूर्ण सांगून झाले. (१३)

बीज थोडें पेरिजेतें । पुढें त्याचें उदंड होतें ।
तैसें जालें आत्मयातें । खाणी वाणी प्रगटतां ॥ १४ ॥
थोडे बीज पेरले तरी त्यातून पुढे उदंड पीक उगवून येते. तशीच अवस्था आत्म्याची म्हणजे अंतरात्म्याची चारी खाणी आणि चारी वाणी प्रगट झाल्यावर झाली. (१४)

ऐसी सत्ता प्रबळली । थोडे सत्तेचि उदंड जाली ।
मनुष्यवेषें सृष्टी भोगिली । नान प्रकारें ॥ १५ ॥
अशा प्रकारे सत्तेची वाढ झाली. पूर्वी थोडी सत्ता होती, ती उदंड झाली. अखेर मनुष्यदेहामध्ये ती सत्ता सृष्टीचा नाना प्रकारे उपभोग घेते. (१५)

प्राणी मारून स्वापद पळे । वरकड त्यास काये कळे ।
नाना भोग तो निवळे । मनुष्यदेहीं ॥ १६ ॥
पशु, श्वापदे असतात, ती दुसऱ्या प्राण्यांना मारून स्वसंरक्षणाच्या भीतीने पळून जातात. याशिवाय इतर त्यांना काय कळणार ? पण नाना प्रकारचे भोग भोगण्यात मनुष्य मोठा कुशल आहे. (१६)

नाना शब्द नाना स्पर्श । नाना रूप नाना रस ।
नाना गंध ते विशेष । नरदेह जाणे ॥ १७ ॥
नाना शब्द, नाना प्रकारचे स्पर्श, नाना प्रकारची रूपे, नाना प्रकारचे रस तसेच नाना प्रकारचे गंध याप्रमाणे पांची प्रकारचे विषय कसे भोगावे. हे फक्त नरदेह धारण केल्यानेच कळते. (१७)

अमोल्य रत्नें नाना वस्त्रें । नाना यानें नाना शस्त्रें ।
नाना विद्या कळा शास्त्रें । नरदेह जाणे ॥ १८ ॥
अमूल्य रत्ने, नाना प्रकारची वस्त्रे, नाना प्रकारची वाहने आणि नाना शस्त्रे, तसेच नाना विद्या, नाना कला आणि नाना शास्त्रे यांचे ज्ञान फक्त मनुष्यासच असते. (१८)

पृथ्वी सत्तेनें व्यापिली । स्थळोस्थळीं आटोपिली ।
नाना विद्या कळा केली । नाना धारणा ॥ १९ ॥
ईश्वरी सत्तेने सर्व पृथ्वी व्यापली आहे आणि ठिकठिकाणी ती सत्ताच व्यवस्था निर्माण करते. त्या सत्तेच्या प्रभावानेच नाना विद्या, नाना कला, नाना धारणा प्रगट होतात. (१९)

दृश्य अवघेंचि पाहावें । स्थानमान सा।म्भाळावें ।
सारासार विचारावें । नरदेहे जालियां ॥ २० ॥
म्हणून नरदेह प्राप्त झाला असता हे सगळे दृश्य पाहून घ्यावे. व्यवहारातील आपले स्थान आणि आपला मान यांचे रक्षण करावे, आणि सारासारविचार करावा. (२०)

येहलोक आणी परलोक । नाना प्रकारींचा विवेक ।
विवेक आणी अविवेक । मनुष्य जाणे ॥ २१ ॥
इहलोक आणि परलोक, नाना प्रकारचा विवेक, तसेच विवेक आणि अविवेक इत्यादी गोष्टी फक्त मनुष्यच जाणतो. (२१)

नाना पिंडीं ब्रह्मांडरचना । नाना मुळींची कल्पना ।
नाना प्रकारीं धारणा । मनुष्य जाणे ॥ २२ ॥
या ब्रह्मांडरचनेत नाना तहेच्या पिंडांचा समावेश आहे. त्या पिंडांची रचना, ब्रह्मांडाची रचना, मूळ मायेतील अनेक कल्पना आणि नाना प्रकारच्या धारणा मनुष्यच जाणतो. (२२)

अष्टभोग नवरस । नाना प्रकारींचा विळास ।
वाच्यांश लक्ष्यांश सारांश । मनुष्य जाणे ॥ २३ ॥
पंचविषय आणि त्रिगुण मिळून अष्टभोग अथवा अन्न, उदक, तांबूल, पुष्प, चंदन, वसन, शय्या आणि अलंकार हे आठ भोग, तसेच नऊ प्रकारच्या कटु, आम्ल आदी चवी; अथवा शृंगार, वीर, करुण, रौद्र, बीभत्स, भयानक, अद्भुत, हास्य आणि शांत हे साहित्यातील नऊ रस, तसेच अनेक प्रकारचे विलास आणि वाच्यांश, लक्ष्यांश आणि सारांश या सर्व गोष्टी मनुष्यच जाणतो. (२३)

मनुष्यें सकळांस आळिलें । त्या मनुष्यास देवें पाळिलें ।
ऐसें हें अवघें कळलें । नरदेहयोगें ॥ २४ ॥
मनुष्याने सर्वांना आपल्या ताब्यात ठेवले आहे, पण या मनुष्याचे देव पालन-पोषण करतो. पण हे सर्व काही नरदेहातच कळते. (२४)

नरदेह परम दुल्लभ । येणें घडे अलभ्य लाभ ।
दुल्लभ तें सुल्लभ । होत आहे ॥ २५ ॥
नरदेह हा अत्यंत दुर्लभ आहे. त्याच्या योगेच अलभ्य लाभ घडतो. जी गोष्ट दुर्लभ असते ती सुलभ होऊन जाते. (२५)

बरकड देहे हें काबाड । नरदेह मोठें घबाड ।
परंतु पाहिजे जाड । विवेकरचना ॥ २६ ॥
इतर देह हे काबाड आहेत, तर नरदेह हे फार मोठे घबाड आहे. परंतु त्याचा फायदा होण्यासाठी अतिशय मोठ्या विवेकाची आवश्यकता आहे. (२६)

येथें जेणें आळस केला । तो सर्वस्वें बुडाला ।
देव नाहीं वोळखिला । विवेकबळें ॥ २७ ॥
हा नरदेह प्राप्त झाला असताही जो आळसात आयुष्य घालवतो तो सर्वस्वी बुडतो. कारण त्याने विवेकाच्या बळावर परमात्म्याची प्राप्ती करून घेतलेली नसते. (२७)

नर तोचि नारायेण । जरी प्रत्ययें करी श्रवण ।
मननशीळ अंतःकर्ण । सर्वकाळ ॥ २८ ॥
जो मनुष्य निरंतर मननशील अंत:करणाने श्रवण करून अध्यात्म्याचा साक्षात अनुभव घेतो, तो नराचा नारायण बनतो. (२८)

जेणें स्वयेंचि पोहावें । त्यास कासेस नलगे लागावें ।
स्वतंत्रपणें शोधावें । सकळ कांहीं ॥ २९ ॥
ज्याला स्वत:ला पोहायला येते, त्याला दुसऱ्याची कास धरावी लागत नाही. म्हणून जो मननशील असेल त्याने स्वतः स्वतंत्रपणे सर्व गोष्टींचा शोध घ्यावा. (२९)

सकळ शोधून राहिला । संदेह कैचा तयाला ।
पुढें विचार कैसा जाला । त्याचा तोचि जाणे ॥ ३० ॥
अशा रीतीने जो सर्व गोष्टींचा स्वतंत्रपणे शोध घेतो, त्यास स्वानुभवामुळे कुठलाही संदेह उरत नाही. अशा रीतीने संदेहरहित झाल्यानंतर पुढे काय स्थिती होते, ती ज्याची तोच जाणतो. (३०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
चत्वारजिनसनाम समास पांचवा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘चत्वारजिनसनाम’ समास पाचवा समाप्त.


समास सहावा : आत्मागुणनिरूपण
॥ श्रीराम ॥

पाहों जातां भूमंडळ । ठाईं ठाईं आहे जळ ।
कित्तेक तें निर्मळ माळ । जळेंविण पृथ्वी ॥ १ ॥
या भूमंडळावर फिरून पाहिले असता ठिकठिकाणी पाणी आढळून येते. पण कित्येक ठिकाणी मुळीच पाणी नसलेले निर्मळ माळरान आढळून येते. (१)

तैसें दृश्य विस्तारलें । कांहींयेक जाणिवेनें शोभलें ।
जाणीवरहित उरलें । कीतीयेक दृश्य ॥ २ ॥
त्याप्रमाणे ही दृश्य सृष्टी विस्तारलेली दिसते. यातील काही भाग जाणिवेने शोभून दिसतो, तर दृश्याचा काही भाग जाणीवरहित असतो. (२)

च्यारी खाणी च्यारी वाणी । चौयासी लक्ष जीवयोनी ।
शास्त्रीं अवघें नेमुनी । बोलिलें असे ॥ ३ ॥
जाणीवसहित भागात चारी खाणी, चारी वाणी आणि चौयांशी लक्ष जीवयोनी येतात. शास्त्रात हे सर्व नीट व्यवस्थितपणे सांगितलेले आहे. (३)

श्लोक ॥ जलजा नवलक्षाश्च दशलक्षाश्च पक्षिणः । कृमयो रुद्रलक्षाश्च विंशल्लक्षा गवादयः ॥
स्थावरा स्त्रिंशल्लक्षाश्च चतुर्लक्षाश्च मानवाः । पापपुण्यं समं कृत्वा नरयोनिषु जायते ॥
अर्थ : पाण्यात जन्मणारे नऊ लक्ष, पक्षी दहा लाख, कृमीकीटक अकरा लाख, गाई-बैलासारखे पशू वीस लाख, वृक्षादी स्थावर तीस लाख, माणसे चार लाख. पापपुण्य सारख्या प्रमाणात असेल, तेव्हा नरदेहाची प्राप्ती होते.

मनुष्यें च्यारी लक्ष । पशु वीस लक्ष ।
क्रिम आक्रा लक्ष । बोलिलें शास्त्रीं ॥ ४ ॥
माणसे चार लाख, पश् वीस लाख, कृमी अकरा लाख आहेत, असे शास्त्रात सांगितलेले आहे. (४)

दाहा लक्ष ते खेचर । नव लक्ष जळचर ।
तीस लक्ष स्थावर । बोलिलें शास्त्रीं ॥ ५ ॥
दहा लाख पक्षी, नऊ लाख जलचर, तीस लाख स्थावर वृक्षादी आहेत असे शास्त्र सांगते. (५)

ऐसी चौयासी लक्ष योनी । जितुका तितुका जाणता प्राणी ।
अनंत देह्याची मांडणी । मर्यादा कैंची ॥ ६ ॥
याप्रमाणे चौऱ्यांशी लक्ष योनी आहेत. यामध्ये जितके म्हणून प्राणी आहेत त्यांना जाणीव आहे. या असंख्य प्राण्यांच्या देहाची रचना अनंत प्रकारची आहे. त्या प्रकारांना मर्यादा कशी असणार ? (६)

अनंत प्राणी होत जाती । त्यांचें अधिष्ठान जगती ।
जगतीवेगळी स्थिती । त्यास कैंची ॥ ७ ॥
अनंत प्राणी जन्माला येतात आणि मरतात. त्यांना आधार पृथ्वीचाच असतो. पृथ्वीवाचून ते जग तरी कसे शकतील ? (७)

पुढें पाहातां पंचभूतें । पावलीं पष्टदशेतें ।
कोणी विद्यमान कोणी तें । उगीच असती ॥ ८ ॥
यानंतर विचार करू लागल्यास स्पष्ट दशेला आलेली पंचमहाभूते आढळतात. त्यांच्यापैकी काही प्रत्यक्ष दिसून येतात उदा. पृथ्वी, जल, अनी. तर काही अदृश्य असतात. उदा. वायू व आकाश. (८)

अंतरात्म्याची वोळखण । तेचि जेथें चपळपण ।
जाणीवेचें अधिष्ठान । सावध ऐका ॥ ९ ॥
जेथे चपळपणा म्हणजेच चंचलपणा, हालचाल असते, ती अंतरात्म्याची ओळख होय असे जाणावे. आता जाणिवेचे अधिष्ठान कुठे कुठे असते ते सावधपणे ऐकावे. (९)

सुखदुख जाणता जीव । तैसाचि जाणावा सद शिव ।
अंतःकर्णपंचक अपूर्व । अंश आत्मयाचा ॥ १० ॥
सुखदुःखाची जाणीव जीवाला असते, तशीच ती सदाशिवालाही असते. अपूर्व असे अंतःकरणपंचक म्हणजे मन, बुद्धी, अंत:करण, चित्त आणि अहंकार हे अंतरात्म्याचेच अंश आहेत. (१०)

स्थुळीं आकाशाचे गुण । अंश आत्मयाचे जाण ।
सत्व रज तमोगुण । गुण आत्मयाचे ॥ ११ ॥
स्थूल देहातील आकाशाचे गुण म्हणजे काम, क्रोध, शोक, मोह, भय, अज्ञान आणि शून्यत्व हेही अंतरात्म्याचेच अंश आहेत. सत्त्व, रज आणि तम हेही अंतरात्म्याचेच गुण जाणावेत. (११)

नाना चाळणा नाना धृती । नवविधा भक्ति चतुर्विधा मुक्ती ।
अलिप्तपण सहजस्थिती । गुण आत्मयाचे ॥ १२ ॥
नाना प्रकारच्या चालना, अनेक प्रकारचे धैर्य, नवविधा भक्ती, चतुर्विध मुक्ती, अलिप्तपण, सहजस्थिती हे अंतरात्म्याचे गुण होत. (१२)

द्रष्टा साक्षी ज्ञानघन । सत्ता चैतन्य पुरातन ।
श्रवण मनन विवरण । गुण आत्मयाचे ॥ १३ ॥
द्रष्टा, साक्षी, ज्ञानघन, सत्ता, चैतन्य, पुरातन, श्रवण, मनन, विवरण, (१३)

दृश्य द्रष्टा दर्शन । ध्येय ध्याता ध्यान ।
ज्ञेय ज्ञाता ज्ञान । गुण आत्मयाचे ॥ १४ ॥
द्रश्य, द्रष्टा, दर्शन, ध्येय, ध्याता, ध्यान, ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान हे सर्व अंतरात्याचे गुण जाणावेत. (१४)

वेदशास्त्रपुराणार्थ । गुप्त चालिला परमार्थ ।
सर्वज्ञपणें समर्थ । गुण आत्मयाचे ॥ १५ ॥
वेदशास्त्रे, पुराणे यांचा अर्थ, गुप्तपणे चाललेला परमार्थ, सर्वज्ञपणे समर्थ, (१५)

बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध । विचार पाहाणें शुद्ध ।
बोध आणी प्रबोध । गुण आत्मयाचे ॥ १६ ॥
बद्ध, मुमुक्षू, साधक, सिद्ध, शुद्ध विचार पाहाणे, बोध आणि प्रबोध म्हणजे अनुभवाचे यथार्थ ज्ञान हे सर्व अंतरात्म्याचेच गुण आहेत. (१६)

जागृति स्वप्न सुषुप्ति तुर्या । प्रकृतिपुरुष मूळमाया ।
पिंड ब्रह्मांड अष्टकाया । गुण आत्मयाचे ॥ १७ ॥
जागृती, स्वप्न, सुषुप्ती व तुर्या या चारी अवस्था, तसेच प्रकृतिपुरुष, मूळमाया, पिंड, ब्रह्मांडाचे आठ देह हेही अंतरात्म्याचेच गुण होत. (१७)

परमात्मा आणि परमेश्वरी । जगदात्मा आणीई जगदेश्वरी ।
महेश आणी माहेश्वरी । गुण आत्मयाचे ॥ १८ ॥
परमात्मा आणि परमेश्वरी जगदात्मा आणि जगदीश्वरी महेश आणि माहेश्वरी हेही अंतरात्म्याचेच गुण आहेत. (१८)

सूक्ष्म जितुकें नामरूप । तितुकें आत्मयाचें स्वरूप ।
संकेतनामाभिधानें अमूप । सीमा नाहीं ॥ १९ ॥
जितकी म्हणून सूक्ष्म नामे आणि रूपे आहेत, ते सर्व अंतरात्म्याचेच स्वरूप आहे. खूण पटण्यासाठी अनेक नावे सांगितली आहेत, ती असंख्य आहेत. त्यांना सीमाच नाही. (१९)

आदिशक्ती शिवशक्ती । मुख्य मूळमाया सर्वशक्ती ।
नाना जीनस उत्पती स्थिती । तितुके गुण आत्मयाचे ॥ २० ॥
आदिशक्ति, शिवशक्ति, मुख्य मूळ्माया, शर्वशक्ति, नाना जिनसांची उत्पत्ति आणि स्थिती सर्व अंतरात्म्याचेच गुण आहेत (२०)

पूर्वपक्ष आणी सिद्धांत । गाणें वाजवणें संगीत ।
नाना विद्या अद्‍भुत । गुण आत्मयाचे ॥ २१ ॥
पूर्वपक्ष आणि सिद्धांत, गाणे, वाद्य वाजवणे, संगीत, नाना अद्भुत विद्या, हे सर्वही अंतरात्म्याचेच गुण जाणावेत. (२१)

ज्ञान अज्ञान विपरीतज्ञान । असद्‍वृति सद्‍वृति जाण ।
ज्ञेप्तिमात्र अलिप्तपण । गुण आत्मयाचे ॥ २२ ॥
ज्ञान, अज्ञान, विपरीत ज्ञान, असद् वृत्ती आणि सद्वृत्ती तसेच केवळ जाणीव आणि अलिप्तपण हेही अंतरात्म्याचेच गुण आहेत. (२२)

पिंड ब्रह्मांड तत्वझाडा । नाना तत्वांचा निवाडा ।
विचार पाहाणें उघडा । गुण आत्मयाचे ॥ २३ ॥
पिंड, ब्रह्मांड, तत्त्वझाडा, नाना तत्त्वांचा निवाडा, प्रगटपणे विचार पाहणे, हेही अंतरात्याचे गुण होत. (२३)

नाना ध्यानें अनुसंधानें । नाना स्थिति नाना ज्ञानें ।
अनन्य आत्मनिवेदनें । गुण आत्मयाचे ॥ २४ ॥
अनेक प्रकारची ध्याने, अनुसंधाने, नाना स्थिती, नाना ज्ञाने एवढेच नव्हे तर अनन्य आत्मनिवेदने हेही अंतरात्म्याचेच गुण आहेत. (२४)

तेतीस कोटी सुरवर । आठ्यासी सहश्र ऋषेश्वर ।
भूत खेचर अपार । गुण आत्मयाचे ॥ २५ ॥
तेहतीस कोटी देव, अठ्याऐंशी हजार ऋषीश्वर, अपार भूते आणि खेचर हेही अंतरात्म्याचे गुण आहेत. (२५)

भूतावळी औट कोटी । च्यामुंडा छपन्न कोटी ।
कात्यायेणी नव कोटी । गुण आत्मयाचे ॥ २६ ॥
साडेतीन कोटी भूतावळी, छप्पन्न कोटी चामुंडा, नऊ कोटी कात्यायनी हेही अंतरात्म्याचे गुण होत. (२६)

चंद्र सूर्य तारामंडळें । नाना नक्षत्रें ग्रहमंडळें ।
शेष कूर्म मेघमंडळें । गुण आत्मयाचे ॥ २७ ॥
चंद्र, सूर्य, तारामंडळे, अनेक नक्षत्रे आणि ग्रहमंडळे व शेष, कर्म आणि मेघमंडळे हेही अंतरात्म्याचेच गुण आहेत. (२७)

देव दानव मानव । नाना प्रकारीचे जीव ।
पाहातां सकळ भावाभाव । गुण आत्मयाचे ॥ २८ ॥
देव, दानव, मानव, अनेक प्रकारचे जीव आणि सर्व प्रकारचे भाव आणि अभाव हेही अंतरात्म्याचे गुण होत. (२८)

आत्मयाचे नाना गुण । ब्रह्म निर्विकार निर्गुण ।
जाणणें येकदेसी पूर्ण । गुण आत्मयाचे ॥ २९ ॥
अंतरात्म्याच्या ठिकाणी नाना गुण असतात. परब्रह्म मात्र निर्विकार आणि निर्गुण आहे. जाणीव परिच्छिन्न असो वा परिपूर्ण असो, ती अंतरात्म्याचेच रूप असते. (२९)

आत्मरामौपासना । तेणें पावले निरंजना ।
निसंदेहे अनुष्ठना । ठावचि नाहीं ॥ ३० ॥
या सगुण अंतरात्म्याच्या उपासनेनेच अंती निरंजन परब्रह्माची प्राप्ती होते. परब्रह्मास अनुभवाने जाणले की साधक नि:संदेह होतो मग तेथे अनुमानाला वावच नसतो. (३०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
आत्मागुणनिरूपणनाम समास सहावा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘आत्मागुणनिरूपणनाम’ समास सहावा समाप्त.


समास सातवा : आत्मानिरूपण
॥ श्रीराम ॥

अनुर्वाच्य समाधान जालें । तें पाहिजे बोलिलें ।
बोलिल्यासाठीं समाधान गेलें । हें तों घडेना ॥ १ ॥
आत्मसाक्षात्काराने शब्दातीत समाधान झाले, तरी ते शब्दात वर्णन केले पाहिजे. शिवाय ते वर्णन केल्याने समाधान नाहीसे झाले असे तर कधी होत नाही (१)

कांहीं सांडावें लागत नाहीं । कांहीं मांडावें लागत नाहीं ।
येक विचार शोधून पाहीं । म्हणिजे कळे ॥ २ ॥
असे समाधान प्राप्त होण्यासाठी काही सोडावे लागत नाही किंवा नवीन काही मांडावेही लागत नाही. फक्त एक विचार करून सर्वांचा शोध घेतल्याने ते कळून येते. (२)

मुख्य कासीविश्वेश्वर । श्वेतबंद रामेश्वर ।
मलकार्जुन भीमाशंकर । गुण आत्मयाचे ॥ ३ ॥
मुख्य काशी विश्वेश्वर, शिवाय सेतुबंध रामेश्वर, मल्लिकार्जुन, भीमाशंकर हे सर्व अंतरात्म्याचेच गुण आहेत. (३)

जैसीं मुख्य बारा लिंगें । यावेगळीं अनंत लिंगें ।
प्रचित जाणिजेत जगें । गुण आत्मयाचे ॥ ४ ॥
अशी ही मुख्य बारा ज्योतिर्लिंगे याशिवाय इतर अनंत लिंगे याची जगातील लोकांना प्रचीती येते. हे अंतरात्म्याचेच गुण आहेत. (४)

भूमंडळीं अनंत शक्ति । नाना साक्षात्कार चमत्कार होती ।
नाना देवांच्या सामर्थ्यमूर्ती । गुण आत्मयाचे ॥ ५ ॥
या भूमंडळावर अनंत शक्ती आहेत. नित्य नाना साक्षात्कार आणि चमत्कार होतच असतात. नाना देवतांच्या मूर्तीमध्येही सामर्थ्य असल्याचे जाणवते. हे सर्व गण अंतरात्म्याचेच जाणावेत. (५)

नाना सिद्धांचीं सामर्थ्यें । नाना मंत्रांचीं सामर्थ्यें ।
नानामोहरेवल्लींत सामर्थ्यें । गुण आत्मयाचे ॥ ६ ॥
अनेक सिद्धांची सामर्थ्य, नाना मंत्रांची सामर्थ्य आणि नाना वनस्पतीत असणारे सामर्थ्य, सर्पाच्या मस्तकावरील मण्याचे सामर्थ्य हे सर्व अंतरात्म्याचे गुण आहेत. (६)

नाना तीर्थांचीं सामर्थ्यें । नाना क्षेत्रांचीं सामर्थ्यें ।
नाना भूमंडळीं सामर्थ्यें । गुण आत्मयाचे ॥ ७ ॥
नाना तीर्थांची सामर्थ्य, नाना क्षेत्रांची सामर्थ्य आणि या भूमंडळावरील अनेक प्रकारची सामर्थ्य अंतरात्म्याचेच गुण आहेत. (७)

जितुके कांहीं उत्तम गुण । तितुकें आत्मयाचें लक्षण ।
बरें वाईट तितुकें जाण । आत्म्याचकरितां ॥ ८ ॥
जितके म्हणून उत्तम गुण असतील, तितके सर्व अंतरात्म्याचे लक्षण होय. बरे-वाईट जे काही असेल, तेही सर्व अंतरात्म्याचेच लक्षण होय. (८)

शुद्ध आत्मा उत्तम गुणी । सबळ आत्मा अवलक्षणी ।
बरी वाईट आवघी करणी । आत्मयाची ॥ ९ ॥
शुद्ध आत्मा उत्तमगुणी असतो, तर शबल (अशुद्ध, विकारी) आत्मा अवलक्षणी असतो. बरी-वाईट सर्व करणी अंतरात्म्याचीच असते. (९)

नाना साभिमान धरणें । नाना प्रतिसृष्टी करणें ।
नाना श्रापौश्रापलक्षणें आत्मयाचेनी ॥ १० ॥
नाना प्रकारचे अभिमान धारण करणे, नाना प्रकारे प्रतिसृष्टी करणे, नाना प्रकारचे शाप-उश्शाप देणे ही सर्व लक्षणे अंतरात्म्याचीच आहेत. (१०)

पिंडाचा बरा शोध घ्यावा । तत्वांचा पिंड शोधावा ।
तत्वें शोधितां पिंड आघवा । कळों येतो ॥ ११ ॥
माणसाने विवेकाने पिंडाचा चांगल्या प्रकारे शोध घ्यावा. पिंड हा तत्त्वांचा आहे, हे जाणून घ्यावे. तत्त्वाने तत्त्वांचे निरसन केल्याने पिंडासंबंधी सर्व काही कळून येते. (११)

जड देह भूतांचा । चंचळ गुण आत्मयाचा ।
निश्चळ ब्रह्मावेगळा ठाव कैचा । जेथें तेथें ॥ १२ ॥
स्थूल जड देह हा पंचमहाभूतांचा आहे, चंचलता हा गुण अंतरात्म्याचा आणि निश्चल ब्रह्माशिवाय तर अणुमात्र स्थान रिकामे नाही. ते जेथे तेथे ओतप्रोत कोंदाटलेलेच असते. (१२)

निश्चळ चंचळ आणी जड । पिंडीं करावा निवाड ।
प्रत्ययवेगळें जाड । बोलणें नाहीं ॥ १३ ॥
निश्चल परब्रह्म, चंचल अंतरात्मा आणि जड पांचभौतिक देह याचा अनुभव आपल्या देहातच घ्यावा. अनुभवाशिवायचे ज्ञान व्यर्थ होय. (१३)

पिंडामधून आत्मा जातो । तेव्हां निवाडा कळों येतो ।
देहे जड हा पडतो । देखतदेखतां ॥ १४ ॥
मृत्युसमयी पिंडामधून अंतरात्मा निघून जातो, तेव्हा निवाडा अनुभवाने कळून येतो. हा जड देह पाहता पाहता पडून जातो. (१४)

जड तितुकें पडिलें । चंचळ तितुकें निघोनी गेलें ।
जडचंचळाचें रूप आलें । प्रत्ययासी ॥ १५ ॥
जड पांचभौतिक देह जागच्या जागी पडतो. चंचल अंतरात्मा देह सोडून निघून जातो. याप्रमाणे अनुभवाने जड आणि चंचलाचे रूप कळून येते. (१५)

निश्चळ आहे सकळां ठाईं । हें तों पाहाणें नलगे कांहीं ।
गुणविकार तेथें नाहीं । निश्चळासी ॥ १६ ॥
निश्चल तर सर्वत्र सदा व्याप्त असते. ते काही पाहावे लागत नाही. निश्चलाच्या ठायी काहीही गुण, विकार नसतो. (१६)

जैसें पिंड तैसें ब्रह्मांड । विचार दिसतो उघड ।
जड चंचळ जातां जाड । परब्रह्मचि आहे ॥ १७ ॥
जसे पिंडासंबंधी तसेच ब्रह्मांडासंबंधी जाणावे, हे तर सर्व विचाराने स्पष्टपणे कळते. जड आणि चंचल निघून गेल्यावर ओतप्रोत घनदाट परब्रह्मच सर्वत्र संचलेले असते. (१७)

माहांभूतांचा खंबीर केला । आत्मा घालून पुतळा जाला ।
चालिला सृष्टीचा गल्बला । येणें रितीं ॥ १८ ॥
पंचमहाभूतांचा दणकट बाह्य आकार केला, त्यात अंतरात्मा घालून पुतळा तयार केला. याप्रकारे सर्व जीवसृष्टी निर्माण होऊन त्यांचा गलबला या सृष्टीत निरंतर चालू असतो. (१८)

आत्मा माया विकार करी । आळ घालिती ब्रह्मावरी ।
प्रत्ययें सकळ कांहीं विवरी । तोचि भला ॥ १९ ॥
अंतरात्मा म्हणजेच माया विकार उत्पन्न करते, त्याचा आरोप ब्रह्मावर घातला जातो. अनुभव घेऊन जो विवरण करून सर्व जाणून घेतो तोच भला होय. (१९)

ब्रह्म व्यापक अखंड । वरकड व्यापकता खंड ।
शोधून पाहातं जड । कांहींच नाहीं ॥ २० ॥
परब्रह्मच केवळ अखंड व्यापक आहे. इतरांची व्यापकता खंडित, सापेक्ष, मर्यादित असते. नीट विचार करून शोध घेतला असता यात न कळण्यासारखे काहीच नाही. (२०)

गगनासी खंडता नये । गगनाचें नासेल काये ।
जरी जाला माहांप्रळये । सृष्टीसंव्हार ॥ २१ ॥
गगनाला खंडित करता येत नाही, तसेच त्याचा नाशही करता येत नाही. महाप्रलयाच्या वेळी सर्व सृष्टीचा संहार जरी झाला तरी गगन जसेच्या तसेच असते. (२१)

जें संव्हारामध्यें सापडले । तें सहजचि नासिवंत जालें ।
जाणते लोकीं उगविलें । पाहिजे कोडें ॥ २२ ॥
जे जे संहारात सापडते ते नाशिवंत होय हे सहजच स्पष्ट कळून येते. शहाण्या लोकांनी विवेकाच्या योगाने शाश्वत काय हे ठरविले पाहिजे. (२२)

न कळतां वाटे कोडें । कळतां आवघें दिसें उघडें ।
म्हणोनी येकांतीं निवाडे । विचार पाहावा ॥ २३ ॥
जोपर्यंत ज्ञान होत नाही. तोपर्यंत ते कोडे वाटते. ज्ञान झाले की सर्व काही उघड होते. स्पष्ट कळून येते. म्हणून एकांतात बसून विचाराने शाश्वत-अशाश्वताचा निवाडा करावा. (२३)

मिळता प्रत्ययाचे संत । येकांपरीस येकांत ।
केली पाहिजे सावचित । नाना चर्चा ॥ २४ ॥
मात्र साक्षात्कारी अनुभवसंपन्न संत जर भेटले, तर त्यांच्याबरोबर चित्त सावध करून एकाग्र करून अध्यात्मविषयक चर्चा अनेक प्रकारे केली पाहिजे. त्यांचा सहवास म्हणजे एकांतापेक्षाही एकांत समजावा. (२४)

पाहिल्यावेगळें कळत नाहीं । कळतां कळतां संदेह नाहीं ।
विवेक पाहातां कोठेंचि नाहीं । मायाजाळ ॥ २५ ॥
विचाराने सर्व शोधून पाहिल्याखेरीज कळत नाही. कळता कळता अनुभव आला की संदेह उरत नाही. विवेक करून पाहिले असता मायाजाळ कुठेही नाहीच हे कळून येते. (२५)

गगनीं आभाळ आलें । मागुती सवेंचि उडालें ।
आत्म्याकरितां दृश्य जालें । उडेल तैसें ॥ २६ ॥
आकाशात ढग येतात आणि नंतर लगेच सर्व उड्नही जातात. अंतरात्म्याशी झालेल्या तादात्म्यामुळे दृश्य सत्य वाटते. परंतु निश्चल स्वरूप साक्षात्कार झाल्यानंतर ते दृश्य मिथ्या ठरते. (२६)

मुळापासून सेवटवरी । विवेकी विवेकें विवरी ।
तोचि निश्चय थावरी । चळेना ऐसा ॥ २७ ॥
आपल्यापासून ते परब्रह्मापर्यंत विवेकी माणस विवेकाने सर्वांचे विवरण करून आत्मस्वरूपासंबंधी कधीही चळणार नाही, असा दृढ निश्चय करतो. (२७)

वरकड निश्चय अनुमानाचे । अनुमानें बोलतां काये वेंचे ।
जाणते पुरुष प्रचितीचे । ते तों मानीतना ॥ २८ ॥
इतर जे अनुमानाचे निश्चय असतात, ते टिकत नाहीत. लोक अनुमानाने हवे ते बोलतात, त्यात त्यांना काही तोशीस पडत नाही. पण जे अनुभवी पुरुष असतात, त्यांना अनुमानाचे बोलणे मान्य होत नाही. (२८)

उगेंच बोलणें अनुमानाचें । अनुमानाचें कोण्या कामाचें ।
येथें सगट विचाराचें । काम नाहीं ॥ २९ ॥
अनुमानाचे बोलणे फुकटचे असते. ते कोणाच्या कामी येत नाही. येथे सरसकट तर्क करून चालत नाही. (२९)

सगट विचार तो अविचार । कित्येक म्हणती येकंकार ।
येकंकार भ्रष्टाकार । करूं नये ॥ ३० ॥
सरसकट विचार हा अविचार होय. कुणी याला एकंकार असेही म्हणतात. निर्विकार स्वरूप सर्वत्र एकच आहे, परंतु विकारी जाणिवेमध्ये अनेकत्व असल्याने व्यवहारात सर्वसारखे एकंकार मानणे हे अयोग्य होय. असा भ्रष्टाचार करू नये. (३०)

कृत्रिम अवघें सांडावें । कांहीं येक शुद्ध घ्यावें ।
जाणजाणों निवडावें । सारासार ॥ ३१ ॥
जे कृत्रिम आहे ते सर्व सोडावे. जे शुद्ध असेल ते घ्यावे. पुन्हा पुन्हा समजून घेऊन सारासारविचाराने कृत्रिम काय व सत्य काय ते निवडून घ्यावे. (३१)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
आत्मानिरूपणनाम समास सातवा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘आत्मनिरूपणनाम’ समास सातवा समाप्त.


समास आठवा : देहेक्षेत्रनिरूपण
॥ श्रीराम ॥

विधीप्रपंचतरु वाढला । वाढतां वाढतां विस्तीर्ण जाला ।
फळें येतां विश्रांती पावला । बहुत गुणी ॥ १ ॥
ब्रह्मदेवाने निर्मिलेला हा प्रपंचवृक्ष खूप वाढला. वाढता वाढता तो अतिशय विस्तीर्ण झाला. त्याला फळे लागली. त्यामुळे अनेक प्राण्यांना समाधान मिळाले. (१)

नाना फळें रसाळें लागलीं । नाना जिनसी गोडीस आलीं ।
गोडी पाहावया निर्माण केलीं । नाना शरीरें ॥ २ ॥
त्याला अनेक रसाळ फळे लागली आणि ती नाना प्रकारच्या गोडीने संपन्न झाली. ती गोडी चाखावयासाठी ईश्वराने नाना शरीरे निर्माण केली. (२)

निर्माण जाले उत्तम विषये । शरीरेंविण भोगितां नये ।
म्हणोनी निर्मिला उपाये । नाना शरीरें ॥ ३ ॥
अनेक उत्तम विषय निर्माण झाले, पण शरीराशिवाय त्यांचा भोग घेता येत नाही, म्हणून यावर उपाय म्हणून नाना शरीरे निर्माण केली. (३)

ज्ञानैंद्रियें निर्माण केलीं । भिन्न भिन्न गुणांचीं निर्मिलीं ।
येका शरीरासी लागलीं । परी वेगळालीं ॥ ४ ॥
नंतर ज्ञानेंद्रिये निर्माण केली. ती भिन्न भिन्न गुणांची केली. एकाच शरीरात ती असतात, पण प्रत्येकाचा गुण वेगवेगळा असतो. (४)

श्रोत्रैंद्रिंई शब्द पडिला । त्याचा भेद पाहिजे कळला ।
ऐसा उपाये निर्माण केला । इंद्रियांमधें ॥ ५ ॥
श्रोत्रंद्रिय म्हणजे कान. त्याच्यावर शब्द पडला की तो ग्रहण केला जातो व शब्दाशब्दांतील भेद कळेल असा उपाय, अशी योजनाही इंद्रियामध्ये केली. (५)

त्वचेइंद्रियें सीतोष्ण भासे । चक्षुइंद्रियें सकळ दिसे ।
इंद्रियांमधें गुण ऐसे । वेगळाले ॥ ६ ॥
त्वचेंद्रियाने शीत-उष्ण आदी स्पर्शाचे ज्ञान होते, तर चक्षु- इंद्रियाने सर्व काही पाहता येते. याप्रमाणे प्रत्येक इंद्रियामध्ये वेगवेगळा गण आहे. (६)

जिव्हेमधें रस चाखणें । घ्राणामधें परिमळ घेणें ।
इंद्रियांमधें वेगळाल्या गुणें । भेद केले ॥ ७ ॥
जिव्हेने रस चाखला जातो. नाकाने वास घेतला जातो. असे इंद्रियांच्या गुणांमध्ये वेगवेगळे भेद केले आहेत. (७)

वायोपंचकीं अंतःकर्णपंचक । मिसळोनि फिरे निशंक ।
ज्ञानैंद्रियें कर्मैंद्रियें सकळिक । सावकास पाहे ॥ ८ ॥
पाच प्रकारच्या वायूंमध्ये अंत:करणपंचक मिसळून नि:शंकपणे शरीरात फिरते आणि ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रियांनी जी कार्ये होतात त्यांचे आपण सावकाश निरीक्षण करावे. (८)

कर्मैंद्रियें लागवेगीं । जीव भोगीं विषयांलागीं ।
ऐसा हा उपाये जगीं । ईश्वरें केला ॥ ९ ॥
कर्मेद्रियांच्या द्वाराने जीव निरनिराळे विषय भोगतो. ईश्वराने अशा प्रकारे या जगात हा उपाय केला. (९)

निषय निर्माण जाले बरवे । शरीरेंविण कैसें भोगावे ।
नाना शरीराचे गोवे । याकारणें ॥ १० ॥
उत्तम उत्तम विषय निर्माण झाले, पण शरीराशिवाय त्यांचा भोग घेणे शक्यच नाही, म्हणून यासाठीच नाना प्रकारची शरीरे निर्माण केली. (१०)

अस्तीमांशाचे शरीर । त्यामधें गुणप्रकार ।
शरीरासारिखें यंत्र । आणीक नाहीं ॥ ११ ॥
खरे तर हे शरीर अस्थी आणि मांस यांचे बनलेले आहे, पण त्यामध्ये अनेक प्रकारचे गुण आहेत. या शरीरासारखे यंत्र जगात दुसरे नाही. (११)

ऐसीं शरीरें निर्माण केलीं । विषयभोगें वाढविलीं ।
लाहानथोर निर्माण जालीं । येणें प्रकारें ॥ १२ ॥
अशा प्रकारे अनेक शरीरे निर्माण झाली आणि विषयभोगाने त्यांची वाढ झाली. याच प्रकारे अनेक लहान-मोठी शरीरे निर्माण झाली. (१२)

अस्तीमांशांचीं शरीरें । निर्माण केली जगदेश्वरें ।
विवेकें गुणविचारें । करूनियां ॥ १३ ॥
अस्थिमांसाची अशी शरीरे जगदीश्वराने निर्माण केली आणि विवेकाने योग्य शरीरात योग्य गुण ठेवून ती निर्माण केली. (१३)

अस्तिमौंशाचा पुतळा । जेणें ज्ञानें सकळ कळा ।
शरीरभेद वेगळा । ठाईं ठाईं ॥ १४ ॥
वास्तविक शरीर म्हणजे अस्थिमांसाचा पुतळा असतो, पण ज्या ज्ञानाने सर्व कला अवगत होतात, ते शरीरभेदाप्रमाणे वेगवेगळे असते. जाणीव तत्त्वतः एकच असली, तरी शरीरभेदानुसार तिचे अनेक प्रकार होतात. (१४)

तो भेद कार्याकारण । त्याचा उदंड आहे गुण ।
सकळ तीक्ष्ण बुद्धीविण । काये कळे ॥ १५ ॥
हा भेद कार्यसापेक्ष असतो. कार्याच्या दृष्टीने तो अत्यंत उपयोगी आहे. त्यात उदंड गुण आहेत, पण सूक्ष्म आणि तीक्ष्ण बुद्धीशिवाय त्यातील कार्यकारणभाव कसा कळणार ? (१५)

सकळ करणें ईश्वराला । म्हणोनी भेद निर्माण जाला ।
ऊर्धमुख होतां भेदाला । ठाव कैंचा ॥ १६ ॥
सर्व सृष्टीचा व्यवहार करावयाचा असल्याने निरनिराळी कार्ये लक्षात घेऊन हा भेद ईश्वराने निर्माण केला. ब्रह्मत्वदृष्टीने तो खरा नाही. ऊर्ध्वमुख होऊन म्हणजे वृत्ती अंतर्मुख करून विचार केला की भेदाला स्थानच उरत नाही. (१६)

सृष्टिकर्णीं आगत्य भेद । संव्हारें सहजचि अभेद ।
भेद अभेद हा संवाद । मायागुणें ॥ १७ ॥
सृष्टीची उत्पत्ती करताना हा भेद आवश्यक आहे. ज्या वेळी संहार होतो, तेव्हा सहजच अभेद होतो. मायेमुळेच भेद आणि अभेद हे शब्द वापरले जातात. (१७)

मायेमधें अंतरात्मा । नकळे तयाचा महिमा ।
जाला चतुर्मुख ब्रह्मा । तोहि संदेहीं पडे ॥ १८ ॥
मायेमध्येच अंतरात्मा असतो. त्याचा महिमा कोणाला कळत नाही. प्रत्यक्ष चार तोंडांचा , तोही महिमा न जाणल्याने संदेहात पडला. (१८)

पीळ पेंच कडोविकडीं । तर्क तीक्षण घडीनें घडी ।
मनासी होये तांतडी । विवरण करितां ॥ १९ ॥
या अंतरात्म्याचा विचार करताना पदोपदी अनेक , प्रकारचे तर्क, पीळ, पेच हे घडीघडीने कडोविकडी वाढतच जातात आणि त्याच्यासंबंधी विवरण करताना मनाची त्रेधातिरपीट उडते. (१९)

आत्मत्वें लागतें सकळ कांहीं । निरंजनीं हे कांहींच नाहीं ।
येकांतकाळीं समजोन पाहीं । म्हणिजे बरें ॥ २० ॥
अंतरात्म्याचा विचार करताना या सर्व गोष्टी लागतात, कारण आत्मत्वाने मीपणाचे भान असते. पण निरंजनी म्हणजे परब्रह्मात काहीच कधीच झालेले नसल्याने याची आवश्यकता नसते. फक्त एकांतात जाऊन विवेकाने विवरण करून समजून घ्यावे, म्हणजे बरे. (२०)

देहे सामर्थ्यानुसार । सकळ करी जगदेश्वर ।
थोर सामर्थ्यें अवतार । बोलिजेती ॥ २१ ॥
ज्या देहाचे जेवढे सामर्थ्य असेल तेवढेच कार्य जगदीश्वर त्या देहाकडून करवून घेतो. ज्याच्या ठिकाणी फार मोटे सामर्थ्य असते त्यांना अवतार असे म्हटले जाते. (२१)

शेष कूर्म वर्ह्हाव जाले । येवढे देहे विशाळ धरिले ।
तेणें करितां रचना चाले । सकळ सृष्टीची ॥ २२ ॥
शेष, कूर्म, वराह हे अवतारच होत. त्यांचे देह एवढे विशाल धरलेले आहेत की, त्यांच्या आधारावरच ह्या सर्व सृष्टीची रचना, व्यवहार इत्यादी चालते. (२२)

ईश्वरें केवढें सूत्र केलें । सूर्यबिंब धावाया लाविलें ।
धुकटाकरवीं धरविलें । अगाध पाणी ॥ २३ ॥
ईश्वराने केवढे सूत्र केले आहे पहा बरे. त्याने सूर्यबिंबाला धावायला लावले आहे आणि धुक्यांमध्ये प्रचंड पाणी साठविण्याची व्यवस्था केली आहे. (२३)

पर्वताऐसे ढग उचलिती । सूर्यबिंबासी अछ्यादिति ।
तेथें सवेंचि वायोची गती । प्रगट होये ॥ २४ ॥
पर्वतासारखे प्रचंड ढग उत्पन्न होतात आणि वर आकाशात चढून सूर्यबिंबास आच्छादून टाकतात. तेव्हा तेथे आपोआप वायूची गती निर्माण होते. (२४)

झिडकझिडकुं धांवे वारा । जैसा काळाचा म्हणियारा ।
ढग मारुनी दिनकरा । मोकळे करी ॥ २५ ॥
जोरजोरात वारा वाहू लागतो. जणू काय तो काळाचा सेवकच असतो आणि ढगांना मारून तो दिनकराला मोकळा करतो. (२५ )

बैसती विजांचे तडाखे । प्राणीमात्र अवचिता धाके ।
गगन कडकडून तडके । स्थळांवरी ॥ २६ ॥
विजेचा कडकडाट सुरू होऊन ती चमकू लागली की, प्राणिमात्र एकाएकी घाबरून जातात आणि आकाशात कडकडून ती वीज कुठल्या तरी स्थळावर पडते. (२६)

येहलोकासी येक वर्म केलें । महद्‍भूतें महद्‍भूत आळिलें ।
सकळां समभागें चालिलें । सृष्टिरचनेसी ॥ २७ ॥
या लोकात ईश्वराने एक असे वर्म केले आहे की, एका महाभूताने दुसऱ्या महाभूताला मर्यादेत ठेवले आहे. हे नियंत्रण सर्वत्र सारखेच राखल्याने सृष्टिरचनेची स्थिती उत्तम आहे. (२७)

ऐसे अनंत भेद आत्मयाचे । सकळ जाणती ऐसे कैंचें ।
विवरतां विवरतां मनाचे । फडके होती ॥ २८ ॥
असे अंतरात्म्याचे अनंत भेद आहेत. ते सगळे कोण आणि कसे जाणू शकणार आहे ? याचे विवरण करता करता मनाच्या चिंधड्या होतात. (२८)

ऐसी माझी उपासना । उपासकीं आणावी मना ।
अगाध महिमा चतुरानना । काये कळे ॥ २९ ॥
माझी उपासना ही अशी आहे. जे उपासक असतील त्यांनी मनात यावर विचार करावा. या उपासनेचा अगाध महिमा चतुराननालाही कळत नाही. (२९)

आवाहन विसर्जन । हें चि भजनाचें लक्षण ।
सकळ जाणती सज्जन । मी काय सांगों ॥ ३० ॥
आवाहन आणि विसर्जन हेच भजनाचे म्हणजे उपासनेचे मुख्य लक्षण आहे. म्हणजेच उभारणी आणि संहारणी याचा विवेक करून शाश्वत काय ते ओळखणे हेच खरे भजन होय. संत असतात, ते या सर्व गोष्टी जाणतात. तर मी तरी अधिक काय सांगावे ? (३०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
देहेक्षेत्रनिरूपणनाम समास आठवा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘देहेक्षेत्रनिरूपणनाम’ समास आठवा समाप्त.


समास नववा : सूक्ष्मनिरूपण
॥ श्रीराम ॥

मृतिकापूजन करावें । आणी सवेंचि विसर्जावें ।
हें मानेना स्वभावें । अंतःकर्णासी ॥ १ ॥
मातीची मूर्ती करून तिची पूजा करावी आणि परत स्वत:च तिचे विसर्जन करावे हे साहजिकच अंत:करणाला पटत नाही. (१)

देव पूजावा आणी टाकावा । हें प्रशस्त न वटे जीवा ।
याचा विचार पाहावा । अंतर्यामीं ॥ २ ॥
देवाची पूजा करावी आणि नंतर तो टाकून द्यावा हे जीवाला प्रशस्त वाटत नाही. म्हणून यासंबंधी अंत:करणात विचार करून पहावा. (२)

देव करिजे ऐसा नाहीं । देव टाकिजे ऐसा नाहीं ।
म्हणोनि याचा कांहीं । विचार पाहावा ॥ ३ ॥
देव म्हणजे असा काही पदार्थ नाही की, जो निर्माण करता येतो किंवा देव असाही नाही की, जो टाकून देता येतो. म्हणून या गोष्टीचा नीट विचार करून पाहिला पाहिजे. (३)

देव नाना शरीरें धरितो । धरुनी मागुती सोडितो ।
तरी तो देव कैसा आहे तो । विवेकें वोळखावा ॥ ४ ॥
देव म्हणजेच अंतरात्मा नाना शरीरे धारण करतो आणि नंतर मागाहून ती सोडतो. तरी हे करणारा देव आहे तरी कसा हे विवेकाने ओळखावे. (४)

नाना साधनें निरूपणें । देव शोधायाकारणें ।
सकळ आपुले अंतःकर्णें । समजलें पाहिजे ॥ ५ ॥
देवाचा शोध घेण्यासाठी अनेक साधने आहेत, निरूपणे आहेत, पण आपण आपल्या अंत:करणात सर्व काही समजून घेतले पाहिजे. (५)

ब्रह्मज्ञाचा उपाये । समजल्याविण देतां नये ।
पदार्थ आहे मा घे जाये । ऐसें म्हणावें ॥ ६ ॥
ब्रह्मज्ञानाचा उपदेश योग्य अधिकारी असल्याशिवाय देता येत नाही. तो काही एखादा पदार्थ नव्हे की, ‘ये, घेऊन जा’ असे म्हणावे. (६)

सगट लोकांचे अंतरींचा भाव । मज प्रतक्ष भेटवावा देव ।
परंतु विवेकाचा उपाव । वेगळाचि आहे ॥ ७ ॥
सर्वांनाच सरसकट वाटत असते की मला प्रत्यक्ष देव भेटावा. पण नुसता असा भाव अंतरात असून भागत नाही. त्यासाठी विवेकाचाच वेगळा उपाय करावा लागतो. (७)

विचार पाहातां तगेना । त्यास देव ऐसें म्हणावेना ।
परंतु जन राहेना । काये करावें ॥ ८ ॥
विचार करून पाहिला असता जो टिकत नाही. त्याला देव असे म्हणवत नाही. पण लोकांना हे पटत नाही, याला काय करावे ? (८)

थोर लोक मरोनि जाती । त्यांच्या सुरता करुनी पाहाती ।
तैसीच आहे हेहि गती । उपासनेची ॥ ९ ॥
थोर महात्मे मरून जातात, तेव्हा सामान्य लोक त्यांच्या समाध्या अथवा मूर्ती वगैरे करून त्यांची पूजा करतात, कारण सामान्यतः उपासकाला प्रतीक लागत असते. उपासनेची गती ही अशीच आहे. (९)

थोर व्यापार ठाकेना जनीं । म्हणोनि केली रखतवानी ।
राजसंपदा तयाचेनी । प्राप्त कैची ॥ १० ॥
एखाद्याने मोठा व्यापार करणे जमत नाही म्हणून शाईचा व्यापार करावा, तर त्याला राजसंपदा कशी प्राप्त होईल ? (१०)

म्हणोनि जितुका भोळा भाव । तितुका अज्ञानाचा स्वभाव ।
अज्ञानें तरी देवाधिदेव । पाविजेल कैचा ॥ ११ ॥
म्हणून भोळा भाव म्हणजे तो अज्ञानाचाच स्वभाव होय आणि अज्ञानाने देवाधिदेवाची प्राप्ती कशी होणार ? (११)

अज्ञासी ज्ञान न माने । ज्ञात्यास अनुमान न माने ।
म्हणोनि सिद्धांचिये खुणें । पावलें पाहिजे ॥ १२ ॥
अज्ञानी माणसाला ज्ञान मानवत नाही आणि ज्ञानी माणसाला अनुमान मान्य होत नाही. म्हणून साधकाने सिद्धांताच्याच मार्गाने गेले पाहिजे. (१२)

माया सांडून मुळास जावें । तरीच समाधान पावावें ।
ऐसें न होतां भरंगळावें । भलतीकडे ॥ १३ ॥
माया सांडून मुळाकडे म्हणजे परब्रह्मापर्यंत गेले तरच शाश्वत समाधान प्राप्त होते. तसे जर केले नाही तर भलतीकडेच भरकटत जावे लागते. (१३)

माया उलंघायाकारणें । देवासी नाना उपाय करणें ।
अध्यात्मश्रवणपंथेंचि जाणें । प्रत्ययानें ॥ १४ ॥
मायेचे उल्लंघन करून देवाच्या प्राप्तीसाठी नाना उपाय करावे लागतात पण अध्यात्म्याच्या श्रवणाच्या मार्गानेच मनन, निदिध्यासन करून अनुभवाच्या मार्गाने गेल्यानेच भगवंताची प्राप्ती होते. (१४)

ऐसें न करितां लोकिकीं । अवघीच होते चुकामुकी ।
स्थिति खरी आणि लटकी । ऐसी वोळखावी ॥ १५ ॥
असे जर केले नाही, तर लौकिक साधनाने देवाची प्राप्ती न होता चुकामूक होते. म्हणून खरी स्थिती आणि खोटी स्थिती नीट ओळखावी. (१५)

खोट्याचे वाटे जाऊं नये । खोट्याची संगती धरूं नये ।
खोटें संग्रहीं करूं नये । कांहींयेक ॥ १६ ॥
खोट्याच्या वाटेला जाऊ नये. खोट्याची संगती करू नये. खोट्याचा संग्रह जरा सुद्धा कधी करू नये. (१६)

खोटें तें खोटेंचि खोटें । खयासी तगेनात बालटें ।
मन अधोमुख उफराटें । केलें पाहिजे ॥ १७ ॥
खोटे ते अखेर खोटेच असते. ते केसभर सुद्धा खयाची बरोबरी करू शकत नाही. मन हे मायिक असल्याने त्याची स्वाभाविक प्रवृत्ती अधोमुख म्हणजे मायानिर्मित दृश्याकडेच असते. साधकाने ही प्रवृत्ती बदलून त्याला परब्रह्माच्या अभ्यासाकडे, अनुसंधानाकडे वळवले पाहिजे. (१७

अध्यात्मश्रवण करीत जावें । म्हणिजे सकळ कांहीं फावे ।
नाना प्रकारीचे गोवे । तुटोनी जाती ॥ १८ ॥
नित्य अध्यात्मश्रवण करीत जावे म्हणजे सर्व काही साध्य होते. नाना प्रकारचा गुंता तुटून जातो. सर्व समस्या नष्ट होतात. (१८)

सूत गुंतलें तें उकलावें । तैसे मन उगवावें ।
मानत मानत घालावें । मुळाकडे ॥ १९ ॥
सूत गुंतले की ते जसे हळूहळू उकलावे लागते, त्याप्रमाणे मन उकलावे आणि मायेतून मोकळे करून त्याच्या कलाने घेत घेत त्याला मुळाकडे म्हणजे परब्रह्माकडे लावावे. (१९)

सकळ कांहीं कालवलें । त्या सकळाचें सकळ जालें ।
शरीरीं विभागले । सकळ कांहीं ॥ २० ॥
(पंचवीस) तत्त्वांच्या मिश्रणाने, हे सर्व पिंड, ब्रह्मांडादी झालेले आहेत आणि हे पिंड, ब्रह्मांडही नाना शरीररूपी स्थूल विभागाने नटले आहे. (२०)

काये तें येथेंचि पाहावें । कैसें तें येथेंचि शोधावें ।
सूक्ष्माचीं चौदा नांवें । येथेंचि समजावी ॥ २१ ॥
जे जे काही आहे. ते याच शरीरात पाहावे, जे जे काही शोधावयाचे ते येथेच म्हणजे या देहातच शोधावे. सूक्ष्म अशा मूळ मायेची चौदा नावे या देहातच समजून घ्यावीत. (२१)

निर्गुण निर्विकारी येक । तें सर्वां ठाईं व्यापक ।
देह्यामधें तें निष्कळंक । आहे कीं नाहीं ॥ २२ ॥
निर्गुण-निर्विकार, सर्वांठायी व्यापक असणारे एकमेव अद्वितीय ब्रह्म निष्कलंक असे या देहामध्ये आहे की नाही हे जाणून घ्यावे. (२२)

मूळमाया संकल्परूप । तें अंतःकर्णाचें स्वरूप ।
जड चेतवी चैतन्यरूप । तें हि शरीरीं आहे ॥ २३ ॥
मूळमाया ही संकल्पना असून तेच अंत:करणाचे स्वरूप आहे. जडाला चैतन्य चेतविते ते चैतन्यरूपही शरीरात आहे. (२३)

समानगुण गुणसाम्य । सूक्ष्म विचार तो अगम्य ।
सूक्ष्म साधु जाणते प्रणम्य । तया समस्तांसी ॥ २४ ॥
समानगुण गुणसाम्य, सूक्ष्म विचार, त्यासच अगम्यही म्हणतात. पण जे साधू हा सूक्ष्म विचार जाणतात, त्या सर्वांना माझा प्रणाम असो. (२४)

द्विधा भासतें शरीर । वामांग दक्षिणांग विचार ।
तोंचि अर्धनारीनटेश्वर । पिंडीं वोळखावा ॥ २५ ॥
आपल्या शरीरातही डावा, उजवा विभाग असतो, त्यामुळे ते द्विधा भासते. पण वास्तविक ते एकच असते. तोच पिंडात अर्धनारीनटेश्वर होय. (२५)

तोचि प्रकृतिपुरुष जाणिजे । शिवशक्ती वोळखिजे ।
शडगुणईश्वर बोलिजे । तया कर्दमासी ॥ २६ ॥
त्यालाच प्रकृती-पुरुष म्हणून जाणावे, अथवा शिवशक्ती म्हणून ओळखावे आणि त्या मिश्रणालाच षड्गुणेश्वर म्हणावे. (२६)

तयासीच म्हणिजे महत्तत्त्व । जेथें त्रिगुणाचें गूढत्व ।
अर्धमात्रा शुद्धसत्व । गुणक्षोभिणा ॥ २७ ॥
त्यालाच महत्तत्त्व असेही म्हणतात आणि तेथेच त्रिगुण गुप्तरूपाने असतात. अर्धमात्रा, शुद्धसत्त्व आणि गणक्षोभिणी ही नावेही त्यास दिली जातात. (२७)

त्रिगुणें चालतें शरीर । प्रतक्ष दिसतो विचार ।
मुळींच्या कर्दमाचें शरीर । ऐसें जाणावें ॥ २८ ॥
त्रिगुणाच्या योगेच, शरीराचा व्यापार चालतो, हे तर प्रत्यक्ष दिसून येते. मूळमायेच्या कर्दमाचेच हे शरीर आहे, हे जाणून घ्यावे. (२८)

मन माया आणि जीव । हाहि दिसतो स्वभाव ।
चौदा नामांचा अभिप्राव । पिंडीं पाहावा ॥ २९ ॥
मन, माया आणि जीव असेही याला स्वाभाविकपणे म्हणतात. याप्रमाणे मूळमायेच्या चौदा नावांचा प्रत्यय पिंडाच्या ठिकाणी पाहावा. (२९)

पिंड पडतां अवघेंचि जातें । परंतु परब्रह्म राहातें ।
शाश्वत समजोन मग तें । दृढ धरावें ॥ ३० ॥
पिंड पडताच सर्व काही जाते, परंतु फक्त परब्रह्म तेवढे राहते. म्हणून परब्रह्म एकच तेवढे शाश्वत आहे, हे जाणून त्यालाच घट्ट धरून ठेवावे. (३०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सूक्ष्मनिरूपणनाम समास नववा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘सूक्ष्मनिरूपणनाम’ समास नववा समाप्त.


समास दहावा : विमलब्रह्मनिरूपण
॥ श्रीराम ॥

धरूं जातां धरितां न ये । टाकूं जातां टाकितां न ये ।
जेथें तेथें आहेच आहे । परब्रह्म तें ॥ १ ॥
परब्रह्माला धरायला जावे, तर त्यास धरता येत नाही. त्याला टाकावे म्हटले तर त्याला टाकताही येत नाही. जेथे तेथे हे परब्रह्म आहेच आहे. (१)

जिकडे तिकडे जेथें तेथें । विन्मुख होतां सन्मुख होतें ।
सन्मुखपण चुकेना तें । कांहीं केल्या। ॥ २ ॥
जिकडे-तिकडे, जेथे-तेथे आपण कुठेही गेलो, तरी आपण त्याच्या विन्मुख होऊ शकतच नाही. ते सदासर्वदा सन्मुखच असते. काहीही उपाय केले तरी त्याचे सन्मुखपण चुकविता येत नाही. (२)

बैसलें माणूस उठोन गेलें । तेथें आकाशचि राहिलें ।
आकाश चहुंकडे पाहिलें । तरी सन्मुखचि आहे ॥ ३ ॥
एखादा बसलेला माणूस उठून गेला, तरी तेथील आकाश तेथे जसेच्या तसेच असते. आकाशाला कुठूनही पाहावे, ते चहूकडून सन्मुखच असते. (३)

जिकडेतिकडे प्राणी पळोन जातें । तिकडे आकाशचि भोवतें ।
बळें आकाशाबाहेर । कैसें जावें ॥ ४ ॥
जिकडे तिकडे प्राणी पळून जातो. जिकडे तिकडे त्याच्यासभोवती सर्वत्र आकाशच असते. आकाशाबाहेर बळेच जाता कसे येईल ? (४)

जिकडेतिकडे प्राणी पाहे । तिकडे तें सन्मुखचि आहे ।
समस्तांचें मस्तकीं राहे । माध्यानीं मार्तंड जैसा ॥ ५ ॥
प्राणी जिकडे जिकडे पाहातो, तेथे तेथे त्याला आकाशच सन्मुख दिसते. जसा मध्याह्नकाळी सूर्य सर्वांना त्याच्या मस्तकीच दिसतो, तसेच हे जाणावे. (५)

परी तो आहे येकदेसी । दृष्टांत न घडे वस्तुसी ।
कांहीं येक चमत्कारासी । देउनी पाहिलें ॥ ६ ॥
पण तो सूर्य मर्यादित आहे. त्याचा दृष्टांत परब्रह्म वस्तूला देता येत नाही. पण थोडीशी कल्पना यावी म्हणून हा चमत्कार सांगितला आहे. एकच सूर्य एकाच वेळी कोट्यवधी लोकांना आपल्या माथ्यावर दिसतो हा एक चमत्कारच आहे. पण परब्रह्म वस्तू एकदेशीय नसून सर्वव्यापक आहे. (६)

नाना तीर्थें नाना देसीं । कष्टत जावें पाहाव्यासी ।
तैसें न लगे परब्रह्मासी । बैसलें ठाईं ॥ ७ ॥
नाना तीर्थे पाहण्यासाठी नाना देशांत कष्ट सोसत ती पाहण्यासाठी जावे लागते. पण परब्रह्मास पाहण्यासाठी असे कष्ट करावे लागत नाहीत. बसल्या ठिकाणीच त्याची प्राप्ती होते. (७)

प्राणी बैसोनीच राहातां । अथवा बहुत पळोन जातां ।
परब्रह्म तें तत्वतां । समागमें ॥ ८ ॥
प्राणी एका ठिकाणी बसून राहिला अथवा खूप दूरवर पळून गेला तरी परब्रह्म तत्त्वतः त्याच्या समागमेच असते. (८)

पक्षी अंतराळीं गेलां । भोवतें आकाशचि तयाला ।
तैसे ब्रह्म प्राणीयाला । व्यापून आहे ॥ ९ ॥
पक्षी आकाशात कितीही उंच गेला, तरी त्याला सभोवती आकाशच दिसते. तसेच सर्व प्राणिमात्रांना ब्रह्मच सर्व बाजूने व्यापून आहे. (९)

परब्रह्म पोकळ घनदाट । ब्रह्म सेवटाचा सेवट ।
ज्यासी त्यासी ब्रह्म नीट । सर्वकाळ ॥ १० ॥
परब्रह्म पोकळही आहे आणि घनदाटही आहे. सर्व शेवटांचा शेवट ब्रह्मातच होतो. ज्याला त्याला सर्वकाळ ब्रह्मच प्राप्त आहे. (१०)

दृश्या सबाहे अंतरीं । ब्रह्म दाटलें ब्रह्मांडोदरीं ।
आरे त्या विमळाची सरी । कोणास द्यावी ॥ ११ ॥
दृश्यांच्या सबाह्य अंतरी, ब्रह्मांडाच्या उदरात सर्वत्र ब्रह्म ओतप्रोत घनदाट भरलेले आहे. अरे त्या विमल ब्रह्माला कुणाची उपमा द्यावी ? त्याची बरोबरी कुणाशी करावी ? (११)

वैकुंठकैळासस्वर्गलोकीं । इंद्रलोकीं चौदा लोकीं ।
पन्नगादिकपाताळलोकीं । तेथेंचि आहे ॥ १२ ॥
वैकुंठ, कैलास, स्वर्गलोक, इंद्रलोक, चौदा भुवने, नागादिकांच्या पाताळलोकी सर्वत्र ते परब्रह्म आहेच. (१२)

कासीपासून रामेश्वर । आवघें दाटलें अपार ।
परता परता पारावार । त्यास नाहीं ॥ १३ ॥
काशीपासून रामेश्वरापर्यंत सर्वत्र अपार परब्रह्म ओतप्रोत कोंदाटलेले आहे. जी पलीकडेची अन्तिम सीमा मानावी तिच्याही ते पलीकडे आहे. (१३)

परब्रह्म तें येकलें । येकदांचि सकळांसी व्यापिले ।
सकळांस स्पर्शोन राहिलें । सकळां ठाईं ॥ १४ ॥
परब्रह्म एकले एक असून त्याने एकदाच सर्वांना व्यापले आहे. सर्वांना व्यापून ते सर्वांठायी राहिले आहे. (१४)

परब्रह्म पाउसें भिजेना । अथवा चिखलानें भरेना ।
पुरामधें परी वाहेना । पुरासमागमें ॥ १५ ॥
परब्रह्म पावसाने भिजत नाही अथवा चिखलाने माखले जात नाही. पुरामध्ये व्याप्त असते, पण पुराच्या समागमे ते वाहून जात नाही. (१५)

येकसरें सन्मुक विमुख । वाम सव्य दोहिंकडे येक ।
आर्धऊर्ध प्राणी सकळीक । व्यापून आहे ॥ १६ ॥
एकाच वेळी ते सन्मुख असते, विमुखही असते. डावीकडे असते, उजवीकडेही असते. दोन्हीकडे एकच असते आणि वर-खाली सर्वत्र सर्व प्राण्यांना ते व्यापून आहे. (१६)

आकाशाचा डोहो भरला । कदापी नाहीं उचंबळला ।
असंभाव्य पसरला । जिकडे तिकडे ॥ १७ ॥
परब्रह्माने आकाशाचा डोह जणू भरून गेला आहे. पण त्यात भरती इत्यादी विकार नाहीत. तो जिकडेतिकडे अवाढव्य पसरलेला आहे. (१७)

येकजिनसि गगन उदास । जेथें नाहीं दृश्यभास ।
भासेंविण निराभास । परब्रह्म जाणावें ॥ १८ ॥
दृश्यभास नसल्यामुळे गगन एकसारखे शून्य वाटते. हा शून्यत्वाचा भासही परब्रह्मात नसतो. (१८)

संतसाधुमहानुभावां । देवदानवमानवां ।
ब्रह्म सकळांसी विसांवा । विश्रांतिठाव ॥ १९ ॥
संत, साधू, महानुभाव तसेच देव-दानव-मानव सर्वांना फक्त परब्रह्माच्या ठायीच विसावा मिळतो. ते सर्वांच्या विश्रांतीचे एकमेव स्थान आहे. (१९)

कोणेकडे सेवटा जावें । कोणेकडे काये पाहावें ।
असंभाव्य तें नेमावें । काये म्हणोनी ॥ २० ॥
कोणत्या बाजूला परब्रह्माचा शेवट आहे, कोणीकडे त्याला कसे पहावे हे सांगणे शक्य नाही. जे संभाव्य कोणी केलेले नाही, त्याचे मोजमाप तरी कसे सांगावे ? (२०)

स्थूळ नव्हे सूक्ष्म नव्हे । कांहीं येकासारिखें नव्हे ।
ज्ञानदृष्टीविण नव्हे समधान ॥ २१ ॥
ते परब्रह्म स्थूल नाही, सूक्ष्मही नाही. ते दुसऱ्या कशासारखेही नाही. त्यास जाणण्यास ज्ञानदृष्टीची आवश्यकता आहे आणि ज्ञानदृष्टीने त्याचा साक्षात अनुभव आल्याखेरीज समाधान लाभत नाही. (२१)

पिंडब्रह्मांडनिरास । मग तें ब्रह्म निराभास ।
येथून तेथवरी अवकास । भकासरूप ॥ २२ ॥
सर्व प्रकृतीचा निरास केल्यावरच मग निराभास परब्रह्मस्वरूपाशी तादात्म्य होऊ शकते. मात्र त्याला वेगळेपणाने पाहू गेले तर सर्वत्र उदासवाणे आकाशच दिसेल. (२२)

ब्रह्म व्यापक हें तो खरें । दृश्य आहे तों हें उत्तरें ।
व्यापेंविण कोण्या प्रकारें । व्यापक म्हणावें ॥ २३ ॥
ब्रह्म व्यापक आहे, हे तर खरेच; पण जोवर दृश्य द्वैत आहे तोवरच असे म्हणता येते. त्याच्याशी ऐक्य पावल्यावर व्याप्य-व्यापक असा भेदच राहात नाही. एकले एक ब्रह्म उरते, तर ते कुणाला व्यापणार ? (२३)

ब्रह्मासी शब्दचि लागेना । कल्पना कल्पूं शकेना ।
कल्पनेतीत निरंजना । विवेकें वोळखावें ॥ २४ ॥
शब्द ब्रह्मापर्यंत पोहोचू शकत नाही. कल्पनेने त्याला कल्पिता येत नाही. त्या कल्पनेच्या अतीत असलेल्या निरंजनाला विवेकानेच ओळखावे लागते. (२४)

शुद्ध सार श्रवण । शुद्ध प्रत्ययाचें मनन ।
विज्ञानी पावतां उन्मन । सहजचि होतें ॥ २५ ॥
शुद्ध साराचे श्रवण, शुद्ध प्रत्ययाचे मनन केल्याने म्हणजे सारासारविवेकाने सार निवडून त्याचे निरंतर मनन केले की, मन सहजच उन्मन होते आणि विज्ञानस्वरूप झाले की सहजच मनाचा स्वरूपात लय होतो. (२५)

जालें साधनाचें फळ । संसार जाला सफळ ।
निर्गुण ब्रह्म तें निश्चळ । अंतरीं बिंबलें ॥ २६ ॥
या साधनाचे फळ आता प्राप्त झाले आहे. या अभ्यासाने संसार सफल झाला असून निर्गुण निश्चल परब्रह्म अंतरी बिंबले आहे (२६)

हिसेब जाला मायेचा । जाला निवाडा तत्वांचा ।
साध्य होतां साधनाचा । ठाव नाहीं ॥ २७ ॥
मायेचा हिशोब चुकता झाला आहे, तत्त्वांचा निवाडा झाला असून साध्य जे ब्रह्मसाक्षात्कार तो झाल्यावर साधनाचा ठाव उरला नाही. (२७)

स्वप्नीं जें जें देखिलें । तें तें जागृतीस उडालें ।
सहजचि अनुर्वाच्य जालें । बोलतां न ये ॥ २८ ॥
स्वप्नात जे जे दृश्य पाहात होतो, ते जागृती येताच नाहीसे झाले. अज्ञानामुळे जी दृश्यसृष्टी सत्य वाटत होती ती आत्मानुभवामुळे मिथ्या हे कळून आले. त्यामुळे ज्याचे शब्दात वर्णन करता येत नाही, असे अनिर्वाच्य समाधान सहजच प्राप्त झाले. (२८)

ऐसें हें विवेकें जाणावें । प्रत्ययें खुणेंसी बाणावें ।
जन्ममृत्याच्या नांवें । सुन्याकार ॥ २९ ॥
असे हे सर्व विवेकाने जाणून घ्यावे आणि त्याचा साक्षात अनुभव घेऊन खूण अंतरी बाणावी म्हणजे अनुभव घेणारा जन्ममृत्यूच्या नावे शून्याकार होतो. (२९)

भक्तांचेनि साभिमानें । कृपा केली दाशरथीनें ।
समर्थकृपेचीं वचनें । तो हा दासबोध ॥ ३० ॥
भक्तांच्या अभिमानाने दाशरथी रामांनी कृपा केली आणि त्या समर्थांच्या कृपेची वचने म्हणजेच हा दासबोध होय. (३०)

वीस दशक दासबोध । श्रवणद्वारें घेतां शोध ।
मनकर्त्यास विशद । परमार्थ होतो ॥ ३१ ॥
हा दासबोध ग्रंथ वीस दशकांचा असून श्रवणद्वारे त्याचा शोध घेतल्यावर मननकर्त्यास स्पष्टपणे परमार्थाचे ज्ञान होते. (३१)

वीस दशक दोनीसें समास । साधकें पाहावें सावकास ।
विवरतं विशेषाविशेष । कळों लागे ॥ ३२ ॥
यात वीस दशक असून दोनशे समास आहेत. साधकांनी ते सावकाश वाचावेत आणि त्याचे वारंवार विशेष विवरण करावे म्हणजे यांतील मर्म कळून येईल. (३२)

ग्रंथाचें करावेंस्तवन । स्तवनाचें काये प्रयोजन ।
येथें प्रत्ययास कारण । प्रत्ययो पाहावा ॥ ३३ ॥
ग्रंथाचे स्तवन करावे म्हणतात. पण स्तवनाचे काय प्रयोजन आहे ? येथे मुख्य जो स्वानुभव कथन केला आहे, त्या प्रत्ययाचा अनुभव स्वत: घेऊन पहावा. (३३)

देहे तंव पांचा भूतांचा । कर्ता आत्मा तेथींचा ।
आणी कवित्वप्रकार मनुशाचा । काशावरुनी ॥ ३४ ॥
हा देह तर पंचभौतिक आहे. येथील कर्ता आहे अंतरात्मा. मग कवित्व-प्रकार मात्र मनुष्याचा असे कशावरून ? (३४)

सकळ करणें जगदीशाचें । आणी कवित्वचि काय मानुशाचें ।
ऐशा अप्रमाण बोलण्याचें काये घावें ॥ ३५ ॥
सर्व कर्तृत्व जर जगदीशाचे आहे. तर मग कवित्व तेवढे मनुष्याचे कसे ? अशा अप्रमाण बोलण्याचे काय प्रयोजन ? (३५)

सकळ देह्याचा झाडा केला । तत्वसमुदाव उडाला ।
तेथें कोण्या पदार्थाला । आपुलें म्हणावें ॥ ३६ ॥
सर्व देहाचा संपूर्ण निरास केला की तत्त्वांचा समुदाय उडून जातो. मग तेथे कुठल्या पदार्थाला आपले म्हणावे ? (३६)

ऐसीं हें विचाराचीं कामें । उगेंच भ्रमों नये भ्रमें ।
जगदेश्वरें अनुक्रमें । सकळ केलें ॥ ३७ ॥
अशा प्रकारे विचार करण्याची आवश्यकता आहे. माणसाने उगीच भ्रमात पडून भटकू नये, यथानुक्रमे जगदीश्वरानेच सर्व काही केले आहे, असे समजावे. (३७)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
विमळब्रह्मनिरूपणनाम समास दहावा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘विमलब्रह्मनिरूपणनाम’ समास दहावा समाप्त.

दश विसावा समाप्त ॥ श्री दासबोध ग्रंथ समाप्त ॥


दासबोध दशक विसावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *