सार्थ तुकाराम गाथा 1 ते 100

सार्थ तुकाराम गाथा 1 ते 100

सार्थ तुकाराम गाथा 1 ते 100

अभंग क्र.१
मचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥१॥
आणी न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ध्रु.॥
ब्रम्हादिक पदें दुःखाची शिराणी । तेथें दुश्चिंत झणी जडों देसी ॥२॥
तुका म्हणे त्याचें कळलें आम्हां वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत ॥३॥

अर्थ

हे हरी तुमचे चरण विटेवर सम आहेत तुमची दृष्टीही सम आहे आणि अशा तुमच्या साजर्‍या रूपावर माझी वृत्ती स्थिर राहो.आणि देवा या व्यतिरिक्त मला कोणतेही माइक पदार्थ म्हणजे मायेने व्यापलेले पदार्थ नको व त्या ठिकाणी माझी तृष्णा इच्छा देखील राहू देऊ नका.हे देवा ब्रह्मादिक पदे व या सारखे पदे उच्च ठिकाणी माझे मन जडू देऊ नको कारण ते पद म्हणजे एक प्रकारची दुःखाची शीराणीचा आहे.तुकाराम महाराज म्हणतात देवा जे जे काही कर्म धर्म आहे त्याचे वर्म आता आम्हाला समजले आहे ते म्हणजे असे की हे सर्वकाही नाशिवंत आहे

हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .


अभंग क्र.२
नये जरी तुज मधुर उत्तर । दिधला सुस्वर नाहीं देवें ॥१॥
नाहीं तयाविण भुकेला विठ्ठल । येईल तैसा बोल रामकृष्ण ॥ध्रु.॥
देवापाशीं मागें आवडीची भक्ति । विश्वासेंशीं प्रीति भावबळें ॥२॥
तुका म्हणे मना सांगतों विचार । धरावा निर्धार दिसेंदिस ॥३॥

अर्थ

: देवाने गोड स्वर दिला नसला, मला गोड गळ्याने तुझे स्वर गाता येत नसले तरी काही हरकत नाही.विठ्ठल त्या वाचून भूकेला नाही जसा जमेल तसा “राम कृष्ण” हा मंत्र जप .श्रद्धेने, निष्ठेच्या बळाने व प्रेमाने देवाची भक्तिपूर्ण आळवनि कर .तुकाराम महाराज म्हणतात हे मना तुला मी सांगतो ते तू ऐक की हरी विषयी तू दृढ निर्धार धर.

हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .


 

अभंग क्र.३
सावध झालों सावध झालों । हरीच्या आलों जागरणा ॥१॥
तेथें वैष्णवांचे भार । जयजयकार गर्जतसे ॥ध्रु.॥
पळोनियां गेली झोप । होतें पाप आड तें ॥२॥
तुका म्हणे तया ठाया । ओल छाया कृपेची ॥३॥

अर्थ

तुकाराम महाराज दोन वेळा सवध झालो असे म्हणून हरिच्या जागराला आलो असे म्हणतात.तेथे आता वैष्णवांची गर्दी झाली असून, हरी भजनांची गर्जना होत आहे .नाम साधनेच्या आड येणारी पापरूपी झोप आता उडून गेली आहे.तुकाराम महाराज म्हणतात की त्या ठिकाणी हरीकृपेचा ओलाव व छाया आहे . website

हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .


अभंग क्र.४
आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥१॥
कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक । तयाचा हरीख वाटे देवा ॥ध्रु.॥
गीता भागवत करिती श्रवण । अखंड चिंतन विठोबाचें ॥२॥
तुका म्हणे मज घडो त्याची सेवा । तरी माझ्या दैवा पार नाहीं ॥३॥

अर्थ

ज्याला आपल्या हिताची चिंता असते, ज्याला आपले हित कळते त्याचे माय बाप धन्य आहेत.ज्या कुळामधे सात्विक वृत्तीची मूली – मुले जन्माला येतात त्या कुळाविषयी परमेश्वरालादेखिल हरिख वाटतो .अशी सात्विक वृत्तीची मुले गीता-भागवत श्रवण करतात, विठ्ठलाचे अखंड चिंतन करतात .तुकाराम महाराज म्हणतात अश्या लोकांची सेवा माझ्या हातून घडली तर माझ्या सारखा भाग्यवान मीच ठरेल .

हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .


अभंग क्र.५
अंतरिचीं घेतो गोडी । पाहे जोडी भावाची ॥१॥
देव सोयरा देव सोयरा । देव सोयरा दीनाचा ॥ध्रु.॥
आपुल्या वैभवें । शृंगारावें निर्मळे ॥२॥
तुका म्हणे जेवी सवें । प्रेम द्यावें प्रीतीचें ॥३॥

अर्थ

परमेश्वर भक्ताच्या अतःकरणातील भक्तिचि गोडी स्विकारतो आणि त्याच्या अतःकरणातील भाव पाहतो .देव भक्ताचा सोयरा झालेला असतो असे महाराज तीन वेळा म्हणतात.आपुल्या जवळ जे वैभव आहे मग ते कसे का असेना पण ते वैभवाच निर्मळमानाने देव समजावे.तुकाराम महाराज म्हणतात तो हरी भक्तांबरोबर भोजन करतो व त्याच्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव करावा .

हा अभंग व्हिडिओ स्वरूपात पहा.


अभंग क्र.६
पावलें पावलें तुझें आम्हां सर्व । दुजा नको भाव होऊं देऊं ॥१॥
जेथें तेथें देखे तुझींच पाउलें । त्रिभुवन संचलें विठ्ठला गा ॥ध्रु.॥
भेदाभेदमतें भ्रमाचे संवाद । आम्हां नको वाद त्यांशीं देऊं ॥२॥
तुका म्हणे अणु तुजविण नाहीं । नभाहूनि पाहीं वाढ आहे ॥३॥

अर्थ

हे देवा अरे तुझे आम्हाला जे हवे आहे ते आम्हाला सर्व पावले आहे आता दुसरी भावना आमच्या मना मध्ये तू येऊ देऊ नकोस.अरे विठ्ठला मी जिथे तिथे पाहतो तेथे तुझीच पाऊले दिसतात आणि त्रिभुवनात तूच संचार केला आहे.देवा भेद आणि अभेद वाद आणि संवाद हि सर्व भ्रम आहेत आम्हाला त्याच्याशी वाद विवाद होईल असे होऊ देऊ नकोस.तुकाराम महाराज म्हणतात सगळ्यात छोटा असा अणु त्या मध्येही तू आहेस आणि जर पहिले तू तर नाभाहूनही मोठा आहेस.

हा अभंग विडिओ स्वरूपात पहा.


अभंग क्र.७
सुखे वोळंब दावी गोहा । माझें दुःख नेणा पाहा ॥१॥
आवडीचा मारिला वेडा । होय कैसा म्हणे भिडा ॥ध्रु.॥
अखंड मज पोटाची व्यथा । दुधभात साकर तूप पथ्या ॥२॥
दो पाहरा मज लहरी येती । शुद्ध नाहीं पडे सुपती ॥३॥
नीज नये घाली फुलें । जवळीं न साहती मुलें ॥४॥
अंगी चंदन लावितें भाळीं । सदा शूळ माझे कपाळीं ॥५॥
निपट मज न चले अन्न । पायली गहूं सांजा तीन ॥६॥
गेले वारीं तुम्हीं आणिली साकर । साता दिवस गेली साडेदहा शेर ॥७॥
हाड गळोनि आलें मास । माझें दुःख तुम्हां नेणवे कैसें ॥८॥
तुका म्हणे जिता गाढव केला । मेलियावरी नरका नेला ॥९॥

अर्थ

एक भोगवादी स्त्री हि नवऱ्याला म्हणते खरे तर ती सुखी असते पण ती सोंग आणते आणि म्हणते तुम्ही माझे काही दुःख पाहत नाही मग तो पती तिच्या आवडीने वेडा झाल्या मुळे तिच्या प्रत्येक गोष्टीला होकार देतो.ती स्त्री त्या नवऱ्याला म्हणते मला अखंड पोटाची व्यथा आहे त्यामुळे त्याला पथ्य म्हणजे दुध तूप साखर घालून भात खावा लागेल.आहो मला दुसऱ्या प्रहराला चक्कर येते आणि मी बेशुध्द पडते मला शुध्द राहत नाहीव त्या मुळे मला झोप लागत नाही.मला माझ्या खाली फुले टाकल्यावर झोप येते व हि माझी मुले माझ्या जवळ असल्यावर किरकिर करतात त्यामुळे ते मला सहन होत नाही.नाटक करत ती त्याला म्हणते कि मला कपाळ शूळ आहे त्यामुळे मी अंगाला व कपाळाला चंदन लावते.साधे अन्न मला जमत नाही मला तीन पायली गव्हाचा सांजा लागतो.गेल्या आठवड्या मध्ये तुम्ही जी साडे दहा शेर साखर आणली ती सातच दिवस गेली.आहो माझे हाडे बारीक होऊन माझे मांस वाढले केव्हढे माझे हे दुख आहे हे तुम्हाला कळत कसे नाही?तुकाराम महाराज म्हणतात अश्या प्रकारे त्या माणसाचा जिवंत पणे गाढव केला आणि मेल्यावर तो नरकाला गेला.

हा अभंग विडिओ स्वरूपात पहा.


 

अभंग क्र.८
पुढें गेले त्यांचा शोधीत मारग । चला जाऊं माग घेत आम्ही ॥१॥
वंदूं चरणरज सेवूं उष्टावळी । पूर्वकर्मा होळी करुनी सांडूं ॥ध्रु.॥
अमुप हे गांठीं बांधूं भांडवल । अनाथा विठ्ठल आम्हां जोगा ॥२॥
अवघे होती लाभ एका या चिंतनें । नामसंकीर्तनें गोविंदाच्या ॥३॥
जन्ममरणाच्या खुंटतील खेपा । होईल हा सोपा सिद्ध पंथ ॥४॥
तुका म्हणे घालूं जीवपणा चिरा । जाऊं त्या माहेरा निजाचिया ॥५॥

अर्थ

जे संत पुढे गेले त्यांची चरणवंदना करुण, त्यांचे उष्टे सेवन करू; त्यामुळे आपल्या पूर्व कर्मचि होळी होईल .हे ज्ञानभक्तिचे भांडवल पदरी बांधून, विठ्ठलास वश करुण घेऊ .गोविंदाचे केवळ नामस्मरणान व् चिंतनाने जीवनातील सर्व लाभ प्राप्त होतील .जन्ममृत्युच्या येरझार्‍या संपतील आणि संत सहवासाने हा जन्म सार्थकी लागेल .पुढे गेलेल्या संतसजनांच्या मार्गाने शोध करीत त्यांच्या मार्गाने आपण त्यांचा माग घेत पुढे जाऊ .तुकाराम महाराज म्हणतात की, या मार्गाने गेले असता मोक्षरुपी माहेराचा लाभ होईल .

हा अभंग विडिओ स्वरूपात पाहण्यासाठी खालील फोटो वर क्लिक करा .

https://youtu.be/oz8lMy9jwLY


अभंग क्र.९
जेविले ते संत मागें उष्टावळी । अवघ्या पत्रावळी करुनी झाडा ॥१॥
सोवळ्या ओंवळ्या राहिलों निराळा । पासूनि सकळां अवघ्यां दुरीं ॥ध्रु.॥
परें परतें मज न लागे सांगावें । हें तों देवें बरें शिकविलें ॥२॥
दुसर्‍यातें आम्ही नाहीं आतळत । जाणोनि संकेत उभा असे ॥३॥
येथें कोणीं कांहीं न धरावी शंका । मज चाड एका भोजनाची ॥४॥
लांचावला तुका मारितसे झड । पुरविलें कोड नारायणें ॥५॥

अर्थ

संतसज्जनांच्या ज्ञानरूपी उष्ट्या भोजनाची मी अपेक्षा करतो आहे .मी सोवळे-ओवळे या कल्पनेच्या पलीकडे गेलो आहे .ब्रम्हरूपाचे तत्वज्ञान मला इतरांनी संगावयाचे कारण नाही; कारण प्रत्यक्ष भगवंताने मला ते सांगितले आहे .आमच्यामध्ये द्वैतभाव नाही म्हणून प्रत्येक्ष भगवंत आमच्या पाठीमागे उभा आहे .मी संतांच्या उच्छिष्टाच्या भोजनाची इच्छा बाळगत आहे.म्हणुन कोणीहि मनामधे शंका धरु नये .तुकाराम महाराज म्हणतात की, प्रत्यक्ष भगवंतनेच लालचवलेल्या माझ्या मनाची ही इच्छा पूर्ण केली आहे .

yt


अभंग क्र.१०
देवाच्या प्रसादें करा रे भोजन । व्हाल कोण कोण अधिकारी ते ॥१॥
ब्रम्हादिकांसि हें दुर्लभ उच्छिष्ट । नका मानूं वीट ब्रम्हरसीं ॥ध्रु.॥
अवघियां पुरतें वोसंडलें पात्र । अधिकार सर्वत्र आहे येथें ॥२॥
इच्छादानी येथें वळला समर्थ । अवघेंचि आर्त पुरवितो ॥३॥
सरे येथें ऐसें नाहीं कदाकाळीं । पुढती वाटे कवळीं घ्यावें ऐसें ॥४॥
तुका म्हणे पाक लक्षुमीच्या हातें । कामारीसांगातें निरुपम ॥५॥

अर्थ

संतसज्जनांच्या उच्छिष्टाच्या सेवनाने तुम्ही या अध्यात्ममार्गातील अधिकारी व्हाल .देवादिकांनाही न मिळणार हे उच्छिष्ट कनिष्ट मानु नका .सर्वांना पुरुन उरेल इतका ज्ञानरस ईथे भरला आहे, त्याचा सेवन करण्याचा अधिकार येथे सर्वांना आहे .जो जो मनुष्य इथे जी जी इच्छा करेल ती पूरविणारा इच्छादानी विठ्ठल येथे सर्वांची नमोकामना पूर्ण करीत आहे .या प्रसादाच्या सेवनात जो आनंद मिळतो तो चिरंतन टिकणारा आहे, त्याचे सेवन करण्याची इच्छा वारंवार होते . तुकाराम महाराज म्हणतात हे भोजन प्रत्यक्ष लक्ष्मी तयार करते तिच्याच हातून या भोजनाचा लाभ व्हावा.

yt


अभंग क्र.११
अवगुणांचे हातीं । आहे अवघीच फजीती ॥१॥
नाहीं पात्रासवें चाड । प्रमाण तें फिकें गोड ॥ध्रु.॥
विष तांब्या वाटी । भरली लावूं नये होटीं ॥२॥
तुका म्हणे भाव । शुद्ध बरा सोंग वाव ॥३॥

अर्थ

जगामद्धे अवगुणी लोकांची नेहमी फजीति होत असते .धातुचे भांडे चांगले की वाइट हे पहण्यापेक्षा त्यातील रस प्राशन करण्यास योग्य की अयोग्य हे प्रथम पहावे .विष तांब्याच्या वाटित जरी भरले तरी त्याचे सेवन करने हे अयोग्य आहे . तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे मनातील परमेश्वरा विषयीचा शुद्ध भाव महत्वाचा आहे, त्याचे सोंग घेऊ नये असे .

yt


अभंग क्र.१२
हरिच्या जागरणा । जातां कां रे नये मना ॥१॥
कोठें पाहासील तुटी । आयुष्य वेंचे फुकासाठी ॥२॥
ज्यांची तुज गुंती । ते तों मोकलिती अंतीं ॥२॥
तुका म्हणे बरा । लाभ काय तो विचारा ॥३॥

अर्थ

हरिचे नामस्मरण करने, भक्ति करने हे तुझ्या मनात का बरे येत नाही? .या संसारामधे तुझे जीवन व्यर्थ जात आहे, ती तूट भरून निघणार नाही .ज्यांच्यासाठी तू आपले आयूष्य व्यर्थ घालवित आहे, ते तुला शेवट पर्यंत साथ देणार नाहीत.तुकाराम महाराज म्हणतात , की तू आपल्या जीवनाचे सार्थक कश्यामध्ये आहे याचा विचार कर .

yt


अभंग क्र.१३
धर्माची तूं मूर्ती । पाप पुण्य तुझे हातीं ॥१॥
मज सोडवीं दातारा । कर्मापासूनि दुस्तरा ॥ध्रु.॥
करिसी अंगीकार । तरी काय माझा भार ॥२॥
जिवींच्या जीवना । तुका म्हणे नारायणा ॥३॥

अर्थ

हे परमेश्वरा, तू प्रत्यक्ष धर्माची मूर्ति आहेस, पाप-पूण्य घडवुन आणणे हे सर्वस्व तुमच्या हाती आहे .
या प्रपंच्यातील कर्मापासून माझी सोडवणुक करा .हे परमेश्वरा, माझा स्वीकार केल्याने तुम्हाला माझा भार होईल काय? तुकाराम महाराज म्हणतात जीवाचे जीवन असलेल्या नारायणा मी तुला विनंती करीत आहे .

yt


अभंग क्र.१४
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥१॥
तुळसी हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर हेंचि ध्यान ॥ध्रु.॥
मकरकुंडले तळपती श्रवणी । कंठी कौस्तुभमणि विराजित ॥२॥
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥

अर्थ

अतिशय सुंदर असे विठ्ठलाचे ध्यान, कमरेवर हात ठेऊन विटेवर उभे आहे .त्याच्या गळ्यात तुळशीचा हार आहे पीतांबर नसलेला आहे असे हे विठ्ठालाचे रूप मला नेहमीच आवडते .मसोळीच्या आकारची कुंडले त्याच्या कानात झळकत आहेत गळ्यात कौस्तुभमणी धारण केलेला आहे .तुकाराम महाराज म्हणतात की, हे ध्यान माझे सर्वसुख आहे असे सुशोभित ध्यान मी नेहमी आवडिने पाहीन.

yt


अभंग क्र.१५
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥
गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥
विठो माउलिये हाचि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥
तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥

अर्थ

हे माझ्या सोयरिया रखुमाईच्या पती माझे डोळे नित्य तुझ्या मूर्तीवर जडलेले असो अरे तुझे नाम व रूप इतके गोड आहे कि ते मला सदा सर्व काळ प्रेम देते व तू मला नित्य प्रेम दे.हे विठू माऊली मला हाच वर दे कि तू माझ्या हृदया मध्ये संचारून राहशील.तुकाराम महाराज म्हणतात हे देवा मी तुला दुसरे काही मागत नाही तुझ्या पायाशीच सर्व सुख आहे.

yt


अभंग क्र.१६
राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥१॥
कस्तुरीमळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥ध्रु.॥
मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतिलें सकळही ॥२॥
कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळा बाईयांनो ॥३॥
सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥४॥

अर्थ

राजस, सुकुमार असा हा विठ्ठल म्हणजे जणू मदनाचा पुतुळा आहे सूर्य-चंद्राच्या प्रभा त्याच्या तेज्यात लपल्या आहे .त्याच्या कपाळि कस्तूरिचा मळवट भरला असून अंगावर चंदनाची ऊटी लावलेली आहे गळ्यात वैजयंती माळा रूळत आहे .मस्तकावर मुकुट व कानात कुंडले असलेले सुंदर रूप म्हणजे जणू सर्व सुखाचे आगर आहे .त्याने कमरेला जरीकाठी पितांबर नेसले आहे व् भरजरि शेला पांघरला आहे बायानो असा हा विठुराया सवळया रंगाचा आहे .तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही सर्व बयांनी एका बाजुला व्हा मझ्या आड येउ नका, श्रीमुख पहिल्याखेरीज माझ्या मनाला समाधान लागत नाही .

yt


अभंग क्र.१७
कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥१॥
ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दावीं डोळां ॥ध्रु.॥
कटीं पीतांबर कास मिरवली । दाखवीं वहिली ऐसी मूर्ती ॥२॥
गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवें मानसीं तेचि रूप ॥३॥
झुरोनी पांजरा होऊं पाहें आतां । येईं पंढरीनाथा भेटावया ॥४॥
तुका म्हणे माझी पुरवावी आस । विनंती उदास करूं नये ॥५॥

अर्थ

विठुराया कमरेवर हात ठेऊन, गळ्यात तुळशिमाळा धारण करून उभा आहे, हे हरी असे रूप मला वारंवार दाखव .दोन्ही पाय विटेवर ठेवलेले असे तुझे रूप माझ्या डोळ्यांना दाखवावे .कमरेला पितांबर कास शोभून दिसते आहे असे रूप मला दाखव .गरुड पारावार उभे असलेले तुझे रूप मला नेहमी अठवते .या गोड सरूपाच्या आठवानीने माझे शरिर अस्थिपंजर बनु लागले आहे तेव्हा हे पंढरी राया, मला भेटायला ये .तुकाराम महाराज म्हणतात, की माझी एवढी आस पूर्ण करावी माझ्या प्राथनेचा अव्हेर करू नये.

yt


अभंग क्र.१८
गरुडाचें वारिके कासे पीतांबर । सांवळें मनोहर कैं देखेन ॥१॥
बरविया बरवंटा घनमेघ सांवळा । वैजयंतीमाळा गळां शोभे ॥ध्रु.॥
मुगुट माथां कोटि सूर्यांचा झल्लाळ । कौस्तुभ निर्मळ शोभे कंठीं ॥२॥
ओतींव श्रीमुख सुखाचें सकळ । वामांगीं वेल्हाळ रखुमादेवी ॥३॥
उद्धव अक्रूर उभे दोहींकडे । वर्णिती पवाडे सनकादिक ॥४॥
तुका म्हणे नव्हे आणिकांसारिखा । तोचि माझा सखा पांडुरंग ॥५॥

अर्थ

गरुडरूपी अश्वावर आरूढ झालेले, कमरेला पीतांबर नसलेले, मोहक असे हे सावळे सुंदर रूप मी केव्हा पाहीन? उत्तमात उत्तम असे मेघासारखे श्यामल हे रूप आहे गळ्यात वैजयंती माळा शोभत आहे .त्याने मस्तकावर कोटि सूर्‍याच्या तेज्याप्रमाणे झळकणारा मुकुट घातला आहे, गळ्यात कौस्तुभमणी शोभुन दिसत आहे.सर्व सुखांनी युक्त असे हे सुंदर रूप असून, त्याच्या डाव्या बाजूला अतिशय सुंदर अशी रखुमाई आहे .त्याच्या दोन्ही बाजूस उद्धव व अक्रूर ‍हे उभे आहेत सनकादिक त्याच्या किर्तीचे गुणगान करत आहेत .तुकाराम महाराज म्हणतात, जो इतर कोणासारखाहि नाही ऐसा ईश्वर माझा सखा पांडुरंग आहे .

yt


अभंग क्र.१९
ब्रम्हादिक जया लाभासि ठेंगणे । बळिये आम्ही भले शरणागत ॥१॥
कामनेच्या त्यागें भजनाचा लाभ । जाला पद्मनाभ सेवाॠणी ॥ध्रु.॥
कामधेनूचिया क्षीरा पार नाहीं । इच्छेचिये वाही वरुषावे ॥२॥
बैसलिये ठायीं लागलें भरतें । त्रिपुटीवरतें भेदी ऐसें ॥३॥
हरी नाहीं आम्हां विष्णुदासां जगीं । नारायण अंगीं विसावला ॥४॥
तुका म्हणे बहु लाटे हें भोजन । नाहीं रिता कोण राहत राहों ॥५॥

अर्थ

ब्रम्हादिक देवसुद्धा ज्या भक्तिप्रेमाच्या लाभाला पारखे झाले, तो लाभ आम्हाला मिळाला आहे आम्ही परमेश्वराला शरणागत आम्ही आहोत, म्हणून बलवान आहोत .आम्ही विषय वासनेचा त्याग केल्यामुळे या भजनांचा लाभ आम्हाला झाला आहे आमच्या भक्ति मुळे हा परमेश्वर आमचा ऋणी झाला आहे .कामधेनुच्या दुधला अंत नाही, याचकाच्या मर्जी प्रमाणे ती त्याला दुग्धपान देत असते, तसा परमेश्वर भक्ताच्या इच्छेला मान देत असतो .परमेश्वरप्रेमाचे असे भरते आमच्या मनामधे निर्माण झाले आहे ,की त्यामुळे त्रिपुटिंचाहि भेद करता येतो .आमच्या ठिकाणी परमेश्वराचा वास आसल्यामुळे आम्हाला हार मनण्याची माहित नाही; कारण आम्ही विष्णुदास आहोत .या भक्तिप्रेमाच्या भोजनामुळे विचारी मनुष्य उपवाशी राहत नाही अविचारी मनुष्य भक्तिप्रेमाला मुकला आहे .

yt


अभंग क्र.२०
दुजे खंडे तरी । उरला तो अवघा हरी । आपणाबाहेरी । न लगे ठाव धुंडावा ॥१॥
इतुलें जाणावया जाणा । कोंड तरी मनें मना । पारधीच्या खुणा । जाणतेणेचि साधाव्य ॥ध्रु.॥
देह आधीं काय खरा । देहसंबंधपसारा । बुजगावणें चोरा । रक्षणसें भासतें ॥२॥
तुका करी जागा । नको वासपूं वाउगा । आहेसि तूं अंगा । अंगीं डोळे उघडी ॥३॥

अर्थ

ज्ञान मिळाल्यामुळे द्वैतभावनेचा निरास होतो, सर्वत्र परमेश्वराचा संचार आहे , हे ध्यानात येते; त्यामुळे आपल्यामधील आत्माराम ओळखता येतो .हे रहस्य जाणून घेण्यासाठी या आत्मारामची ओळख पटउन घेतली पाहिजे ज्या प्रमाणे परध्याची कला पारध्यालाच अवगत असते, तसे विष्णुदासाचे मन परमेश्वराला जाणून त्याच्याशी एकरूप होते .विषयवासनेमधे गुंतलेला हा देह खरा आहे का हे समजल्यावर देहासंमंधीचा पसारा खारा की खोटा हे लक्ष्यात येते जसे शेतीतिल बुजगावने चोराला पिकाचे रक्षण करणारे वाटते, तसा भ्रम मनुष्याच्या मनात देहाविषयी निर्माण होतो .तुकाराम महाराज म्हणतात, हे जीवा, जागा हो आणि तुझ्यामधील आत्मारामाला ओळख पटउन घे; कारण तूच परमेश्वरस्वरूप आहेस .

yt


अभंग क्र.२१
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१॥
अइका जी तुम्ही भक्त भागवत । कराल तें हित सत्य करा ॥ध्रु.॥
कोणा ही जिवाचा न घडावा मत्सर । वर्म सर्वेश्वरपूजनाचें ॥२॥
तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे ॥३॥

अर्थ

हे जग विष्णुमय आहे, वैष्णव हा एकच धर्म सर्वत्र आहे, माणसामाणसांमध्ये भेद करने ही अमंगल बाब आहे .हे भक्तजनहो, तुम्ही भगवंतचे श्रवण, चिंतन करून आपले हित साधुन घ्या .आपल्या हातून कोण्याही जीवांचा मत्सर घडू नये, हीच खरी ईश्वर भक्ति आहे .तुकाराम महाराज म्हणतात, की शरीच्या कुठल्याही अवयवाला दुःख झाले तर ते संपुर्ण शरीराला, तसेच शरीरातील जीवाला जाणवते त्याप्रमाणे विष्णुमय जगातील कोणत्याही जीवाचा मत्सर आपल्या हातून घडला असता तो इश्वराचा मत्सर केल्यासारखा आहे .

yt


अभंग क्र.२२
आम्ही जरी आस । जालों टाकोनि उदास ॥१॥
आतां कोण भय धरी । पुढें मरणाचें हरी ॥ध्रु.॥
भलते ठायीं पडों । देह तुरंगीं हा चढो ॥२॥
तुमचें तुम्हांपासीं । आम्ही आहों जैसीं तैसीं ॥३॥
गेले मानामान । सुखदुःखाचें खंडन ॥४॥
तुका म्हणे चित्तीं । नाहीं वागवीत खंती ॥५॥

अर्थ

आम्ही प्रपंच्यातील सर्व आशा- अपेक्षा, विषयवासना सोडून प्रपंच्याविषयी उदासीन झालो आहो .हे परमेश्वरा, त्यामुळे आता आम्हाला मरणाची भीति वाटत नाही .जीवनात आम्ही विठ्ठलाचे दास बनूण राहु; मग भले सुख येवो वा दुःख येवो माणपान, सुखदुःखाचे आमच्या जीवनातून उच्चाटन झाले आहे .तुकाराम महाराज म्हणतात, या माझ्या प्रपंच्याविषयीच्या उदासिनतेचि मला खंत वाटत नाही .

yt


अभंग क्र.२३
निंदी कोणी मारी । वंदी कोणी पूजा करी ॥१॥
मज हें ही नाहीं तें ही नाहीं । वेगळा दोहीं पासुनी ॥ध्रु.॥
देहभोग भोगें घडे । जें जें जोडे तें बरें ॥२॥
अवघें पावे नारायणीं । जनार्दनीं तुकयांचें ॥३॥

अर्थ

या जगात आपली कुणी स्तुति करो वा निंदा करो, मला त्याचे काही सुखदुःख वाटत नाही .कारण निंदा व स्तुति या दोन्ही गोष्टीं पासून मी निराळा आहे .पूर्वसंचितानुसार या देहाला सुखदुःख प्राप्त होतात, ते देहभोग मी निमुटपने भोगतो.तुकाराम महाराज म्हणतात मी विठ्ठलरूप असल्यामुळे माझे देह भोग मी विट्ठलालाच अर्पण करीत आहे.

yt


अभंग क्र.२४
जन विजन जालें आम्हां । विठ्ठलनामा प्रमाणें ॥१॥
पाहें तिकडे बापमाय । विठ्ठल आहे रखुमाई ॥ध्रु.॥
वन पट्टण एकभाव । अवघा ठाव सरता जाला ॥२॥
आठव नाहीं सुखदुःखा । नाचे तुका कौतुकें ॥३॥

अर्थ

भक्तीचेप्रेम प्राप्त झाल्यामुळे जन आणि अरण्य आम्हाला समान भासते .जिकडे पहावे तिकडे आम्हाला विठ्ठल-रखमाईच दिसते .जनात आणि वनात आम्हाला काहीच फरक जाणवत नाही; कारण माझे मन देहावर नाही सर्वत्र माझी समदृष्टी झाली आहे .तुकाराम महाराज म्हणतात मी विठ्ठलाच्या नामसंकीर्तनामधे तन्मय झालो त्यामुळे मला सूखदुःखाची आठवनहि राहत नाही .

yt


अभंग क्र.२५
हिरा ठेवितां ऐरणीं । वांचे मारितां जो घणीं ॥१॥
तोचि मोल पावे खरा । करणीचा होय चुरा ॥ध्रु.॥
मोहरा तोचि अंगें । सूत न जळे ज्याचे संगें ॥२॥
तुका म्हणे तोचि संत । सोसी जगाचे आघात ॥३॥

अर्थ

खरा हीरा ऐरणीवर ठेऊन वरुण घन मारला तरी फुटत नाही .त्याच हिर्‍याला खरे मूल्य असते चुरा होतो तो कृत्रिम होय .ज्याच्या संगतित सूत जळत नाही, तोच खरा मोहरा होय .तुकाराम महाराज म्हणतात, संत ही तसेच असते, जे जगाचे आघात सहन करत असतात.

yt


अभंग क्र.२६
आलिंगनें घडे । मोक्ष सायुज्यता जोडे ॥१॥
ऐसा संताचा महिमा । जाली बोलायाची सीमा ॥ध्रु.॥
तीर्थे पर्वकाळ । अवघीं पायांपें सकळ ॥२॥
तुका म्हणे देवा । त्यांची केली पावे सेवा ॥३॥

अर्थ

संतांच्या अलिंगनाने, सहवासाने सायुज्य मोक्षाची प्राप्ति होते .अश्या संतसहवासाचा महिमा शब्दातून वर्णन करतांना शब्द अपुरे पडतात .संतांच्या पायाशी सर्व तीर्थ व पर्वकाळ एकवटलेले असतात .तुकाराम महाराज म्हणतात, म्हणूनच संतचरणांची सेवा करावी .

yt


अभंग क्र.२७
माझिया मीपणा । जाला यावरी उगाणा ॥१॥
भोगी त्यागी पांडुरंग । त्यानें वसविलें अंग ॥ध्रु.॥
टाळिलें निमित्त । फार थोडें घात हित ॥२॥
यावें कामावरी । तुका म्हणे नाहीं उरी ॥३॥

अर्थ

संत-सज्जनांमुळे मझ्यातील “मी पण” लयास गेले आहे .कारण प्रपंच्यातील विषयभोग आम्ही भोगत नसून, आमच्या हृदयतील परमेश्वर भोगत असतो .घात हित होण्याचे जे काही निमित्त आहे तेच मी टाळले आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्या मुळे जीवनातील कर्म-कुकर्मचि चिंता उरलीच नाही.

yt


अभंग क्र.२८
सकळ चिंतामणी शरीर । जरी जाय अहंकार समूळ आशा ॥
निंदा हिंसा नाहीं कपट देहबुद्धि । निर्मळ स्फटिक जैसा ॥१॥
मोक्षाचें तीर्थ न लगे वाराणसी । येती तयापासीं अवघीं जनें ॥
तीर्थांसी तीर्थ जाला तोचि एक । मोक्ष तेणें दर्शनें ॥ध्रु.॥
मन शुद्ध तया काय करिसी माळा । मंडित सकळा भूषणांसी ॥
हरिच्या गुणें गर्जताती सदा । आनंद तया मानसीं ॥२॥
तन मन धन दिलें पुरुषोत्तमा । आशा नाहीं कवणाची ॥
तुका म्हणे तो परिसाहूनि आगळा । काय महिमा वर्णूं त्याची ॥३॥

अर्थ

त्यांचेच शरीर चिंतामणी आहे ज्यांच्या शरीरातून अहंकार, आशा हे समूळ नाहीसे झाले आहेत. ज्यांच्या शरीरातुन निंदा, हिंसा, कपट, देहबुद्धी नाहीशी झाली तो अगदीच स्फटिका प्रमाणे निर्मळ आहे जसा स्फटिक मनी असतो अगदी त्याप्रमाणे तो मनुष्य आहे. मोक्षाची प्राप्ती करुन देणारे काशी या तीर्थक्षेत्री सुद्धा त्याला जाण्याची गरज नाही सर्व काही त्याच्याजवळ आपोआप येते, कारण तो स्वतःच तीर्थक्षेत्र झालेला असतो आणि त्याच्या दर्शनाने मोक्ष प्राप्त होतो. अहो ज्याचे मन शुद्ध झाले आहे त्याला माळ मुद्राचे बाह्य भूषण काय करायचे आहे कारण त्याचे अंतरंगाचं शुद्ध झाले असते त्यामुळे तो त्याच भूषणने मंडित झालेला असतो. हरीचे गुण गर्जुन वर्णन करतात इतरांना सांगतात ते स्वतःच्या मनाने आनंदित असतात. तुकाराम महाराज म्हणतात ज्याने आपले तन मन आणि धन हे सर्व पुरुषोत्तमाला दिले व ज्याला कशाचीही अपेक्षा नाही, तो मनुष्य परीसा होऊनही वेगळा आहे त्याचा महिमा कसा वर्णन करावा?

yt


अभंग क्र.२९
आहे तें सकळ कृष्णासी अर्पण । न कळतां मन दुजें भावी ॥१॥
म्हणउनी पाठी लागतील भूतें । येती गवसीत पांचजणें ॥ध्रु.॥
ज्याचे त्या वंचलें आठव न होतां । दंड हा निमित्ताकारणें हा ॥२॥
तुका म्हणे काळें चेंपियेला गळा । मी मी वेळोवेळा करीतसे ॥३॥

अर्थ

आपण जे काही कर्म करतो ते सर्व कृष्णाच्या कृपेनेच करतो त्यामुळे ते सर्व कृष्णाला अर्पण करावीत अशी भावना ठेवावी परंतु अज्ञानी जीव तसे न करता सर्व कर्मे मीच करत आहे असेच भावना मनात ठेवतात.त्यामुळेच पंचमहाभूते जीवाला त्याच्या अहंकारामुळे व भ्रमा मुळे शोधत शोधत येतात व त्याला पुन्हा पुन्हा देहाची पुन्हा पुन्हा प्राप्ती करून देतात.आपण जे काही कर्म करतो ते सर्व श्रीकृष्णाचे आहे याची जाणीव राहत नाही त्यामुळेच आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म प्राप्त होण्याचा दंड प्राप्त होतो.तुकाराम महाराज म्हणतात काळाने आपला गळा दाबलेला आहे तरी देखील हा जीव “मी मी” असे करतच आहे तेही वेळोवेळा.

yt


अभंग क्र.३०
महारासी शिवे । कोपे ब्राम्हण तो नव्हे ॥१॥
तया प्रायश्चित्त कांहीं । देहत्याग करितां नाहीं ॥ध्रु.॥
नातळे चांडाळ । त्याचा अंतरीं विटाळ ॥२॥
ज्याचा संग चित्तीं । तुका म्हणे तो त्या याती ॥३॥

अर्थ

ज्याने अजुन क्रोधचा त्याग केला नाही तो जातीने ब्राम्हण असला तरी त्याला ब्रांम्हण म्हणू नये .त्याने देहान्त प्रयाचित्त जरी घेतले तरी त्याची शुद्धि होत नाही .आशा मनुष्याचा चांडाळास देखिल विटाळ होतो कारण त्याचे मन रागामुळे विटाळलेले असते .तुकाराम महाराज म्हणतात, आशा व्यक्तीला स्पर्श करणारा, त्याच्या सानिध्यात राहणार्‍या व्यक्तीचे चित्त सुद्धा तसेच होते आणि तो देखिल त्याच जातीचा होतो त्याला त्याची वृत्ती प्राप्त होते .

yt


अभंग क्र.३१
तेलनीशीं रुसला वेडा । रागें कोरडें खातो भिडा ॥१॥
आपुलें हित आपण पाही । संकोच तो न धरी कांहीं ॥ध्रु.॥
नाडिले लोकां टाकिला गोहो । बोडिले डोकें सांडिला मोहो ॥२॥
शेजारणीच्या गेली रागें । कुत्र्यांनी घर भरिलें मागें ॥३॥
पिसारागें भाजिलें घर । नागविलें तें नेणे फार ॥४॥
तुका म्हणे वाच्या रागें । फेडिलें सावलें देखिलें जगें ॥५॥

अर्थ

क्रोधाने वेडा झालेला मनुष्य तेलनिवर रुसून तेल आनावयास गेला नाही व रुक्ष अन्न खात बसला .ज्याला आपले हित समजत नाही, हरी भक्ति करत नाही त्याचे अंति अहितच होते.एक स्री समाजाने त्रास दिला म्हणून नवरा, मुलबालांविषयी प्रेम न बाळगता त्यांचा त्याग करते, डोक्यावरील केस कापून टाकते.एक स्रि शेजारनिवर रुसून घर सोडून गेली, तेव्हा तिच्या घरात कुत्रे शिरले.एकान घरात पिसवा झाल्या म्हणून क्रोधान स्वताचेच घर जाळले त्यात स्वतांचे नुक्सान स्वतानेच केले.एका स्रि ने उवा झाल्या म्हणून लुगडे सोडले, तर नागवेपणने तिचिच फजीति झाली, तुकाराम महाराज क्रोधच्या आहारी गेलेल्या व्यक्ति स्वताचे नुकसान स्वताच कश्या प्रकारे करुण घेतात याची उदाहरणे देतात.त्या मुळे आपल्याला आपली हित हे कळाले पाहिजे, आपला क्रोध आपल्याला आवरता आला पाहिजे, प्रपंच नुस्ताच पैश्याने नहीं चलात आणि नुस्ताच चगल्या माणसाने नाही चालत तर त्याला पर्मार्थाची जोड असायला हवि तेव्हा आपल्याला आपले हित अहित कळते.


अभंग क्र.३२
मज दास करी त्यांचा । संतदासांच्या दासांचा ॥१॥
मग होत कल्पवरी । सुखें गर्भवास हरी ॥ध्रु.॥
नीचवृत्तिकाम । परी मुखीं तुझें नाम ॥२॥
तुका म्हणे सेवे । माझे संकल्प वेचावे ॥३॥

अर्थ

मला संत सज्जनांचा दासांचा दास कर भगवंता .त्यासाठी कल्पांत होई पर्यंत मला गर्भवासाला घ्यायला आवडेल .निच काम मी करने पण मी माझ्या मुखाने सतत तुझे हरिनाम उच्यारीन .तुकाराम महाराज म्हणतात, तुझी सेवाभक्ति हाच माझ्या जीवनाचा संकल्प असावा .


अभंग क्र.३३
सदा तळमळ । चित्ताचिये हळहळ ॥१॥
त्याचें दर्शन न व्हावें । शव असतां तो जिवे ॥ध्रु.॥
कुशब्दाची घाणी । अमंगळविली वाणी ॥२॥
नेणे शब्द पर । तुका म्हणे परउपकार ॥३॥

अर्थ

ज्याच्या चित्तामधे प्रपंच्याची सतत हळहळ, तळमळ चालु असते, .त्याचे मला दर्शनहि होउ नये, तो जिवंत असुनही मेल्यासारखा आहे.ज्याच्या मुखी नेहमी कुशब्द, अश्लील शब्द असतात, ती अमंगल वाणी माझ्या कानी पडू नये .तुकाराम महाराज म्हणतात जो दुसर्‍याशी कधीच चांगले बोलत नाही, जो कोणावरहि परउपकार करत नाही, अश्या मनुष्याचे दर्शन घेण्याची माझी इच्छा नाही.


अभंग क्र.३४
जया नाहीं नेम एकादशीव्रत । जाणावें तें प्रेत सर्व लोकीं ॥१॥
त्याचें वय नित्य काळ लेखीताहे । रागें दात खाय कराकरा ॥ध्रु.॥
जयाचिये द्वारीं तुळसीवृंदावन । नाहीं तें स्मशान गृह जाणां ॥२॥
जये कुळीं नाहीं एक ही वैष्णव । त्याचा बुडे भवनदीतापा ॥३॥
विठोबाचें नाम नुच्चारी जें तोंड । प्रत्यक्ष तें कुंड चर्मकांचें ॥४॥
तुका म्हणे त्याचे काष्ठ हातपाय । कीर्तना नव जाय हरीचिया ॥५॥

अर्थ

जो नेमधर्म एकादशी व्रत पाळीत नाही, तो प्रेतासमान समजला जावा .काळही त्याच्यावर रागाउन करकरा दांत खात असतो .ज्याच्या दारामधे तुळशीवृंदावन नाही, ते घर स्मशाणा प्रमाणे आहे .ज्याच्या कुळा मध्ये एकही वैष्णव नाही त्याचे संपूर्ण कुळच भवनदि च्या त्रिविध तापात बुडते . ज्या मुखामधे विठ्ठलाचे नावच येत नाही, ते चर्मकाराचे कुंड समजावे .तुकाराम महाराज म्हणतात जो हरी कीर्तनाला जात नाही, त्याचे हात पाय लकडा प्रमाणे असतात, असे मानावे.


अभंग क्र.३५
आम्ही सदैव सुडके । जवळीं येतां चोर धाके । जाऊं पुडी भिकें । कुतरीं घर राखती ॥१॥
नांदणूक ऐसी सांगा । नाहीं तरी वांयां भागा । थोरपण अंगा । तरी ऐसें आणावें ॥ध्रु.॥
अक्षय साचार । केलें सायासांनी घर । एरंडसी हार । दुजा भार न साहती ॥२॥
धन कण घरोघरीं । पोट भरे भिकेवरी । जतन तीं करी । कोण गुरें वासरें ॥३॥
जाली सकळ निश्चिंती । भांडवल शेण माती । झुळझुळीत भिंती । वृंदावनें तुळसीचीं ॥४॥
तुका म्हणे देवा । अवघा निरविला हेवा । कुटुंबाची सेवा । तोचि करी आमुच्या ॥५॥

अर्थ

आम्ही सदैव गरीब आहोत, दरिद्री आहोत; त्यामुळे चोरांना देखील आमच्या जवळ येण्यास भय वाटते . आम्ही घर सोडून भिक्ष्या मागण्यास जातो तेव्हा कुत्री आमच्या घराच राखन करतात .अशी हरी भक्तिचि ख्याति आहे, हरी भक्तिमुळे आम्हाला थोरपंण लाभल आहे .आम्ही हरिभक्तीचे जे घर तयार केले आहे त्याला नाजुक लाकडे वापरली आहेत ते घर अक्षय आहे , एरांडा व शेराची लाकडे आम्ही घराला वापरली आहेत ते दुसऱ्या कुणाची भर सहन करत नाही.आमच्या घरी धनधान्य भरपूर आहे आम्ही केवळ आमच्या पोटापुरते भीक्षा मागतो, गुरेढोरे त्यांचा गोठा याचे कोण रक्षण करत बसेल?आम्ही सर्व बाबतीत निश्चिंत झालो आहोत आमचे भाडंवल म्हणजे शेण , माती आहे आमच्या घराच्या भिंतीला शेणाने आम्ही चांगले सारवून घेतो व त्यानेचआमचे तुळशीवृदावंन लखलखित झालेले दिसते .तुकाराम महाराज म्हणतात देवने आमचा सर्व हेवा पूर्ण केला व आमच्या कुटुंबाचा भार विठ्ठलावर आहे आमच्या कुटुंबाची सेवा विठ्ठलच करत आहे, असे आम्ही नशीबवान आहोत .


अभंग क्र.३६
पराविया नारी माउलीसमान । मानिलिया धन काय वेचे ॥१॥
न करितां परनिंदा द्रव्य अभिळास । काय तुमचें यास वेचे सांगा ॥ध्रु.॥
बैसलिये ठायी म्हणतां रामराम । काय होय श्रम ऐसें सांगा ॥२॥
संताचे वचनीं मानितां विश्वास । काय तुमचें यास वेचे सांगा ॥३॥
खरें बोलतां कोण लागती सायास । काय वेचे यास ऐसें सांगा ॥४॥
तुका म्हणे देव जोडे याचसाठी । आणीक ते आटी न लगे कांहीं ॥५॥

अर्थ

वारकरी संप्रदायाच्या वचनाप्रमाने परस्त्रीला मातेसमान मानल्याने कोणतेही नुकसान होत काय? परनिंदा, परद्रव्य अभिलाषा न धरल्यानेही नुकसान होते काय? एका जागी बसून हरिनाम स्मरण केल्यानेही कोणत्याही प्रकारचे श्रम होते ते काय सांगा?संतांच्या वचनावर विश्वास ठेवल्यानेही लाभच होतो; त्यात तुमचे नुकसान मात्र काही होते काय? सत्य बोलन्यासाठी सुद्धा काहीच कष्ट पडत नाही तुमचे नुकसान मात्र काही होते काय? तुकाराम महाराज म्हणतात अशा शुद्ध आचरनाने देह-बुद्धि परमेश्वराशी जोडलि जाते, त्याला इतर कर्माचि आवशकता भासत नाही.


अभंग क्र.३७
शुद्धबीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं ॥१॥
मुखीं अमृताची वाणी । देह देवाचे कारणीं ॥ध्रु.॥
सर्वांग निर्मळ । चित्त जैसें गंगाजळ ॥२॥
तुका म्हणे जाती । ताप दर्शनें विश्रांती ॥३॥

अर्थ

बिज शुद्ध असले तर येणारे फळ पण उत्तम उपजते .ज्याच्या मुखी हरिणामामृत असते, त्या मधुर वाणीमुळे त्याचा देह सत्कारणी लागतो .जो देह-चित्त-बुद्धिने निर्मळ आहे, त्याचे चित्त गंगाजलाप्रमाने पवित्र असते.तुकाराम महाराज म्हणतात, अशा संतांच्या दर्शनाने त्रिविध ताप नष्ट होतात आणी जीव विसावा घेतो.


अभंग क्र.३८
चित्त समाधान । तरी विष वाटे सोनें ॥१॥
बहु खोटा अतिशय । जाणां भले सांगों काय ॥ध्रु.॥
मनाच्या तळमळें । चंदनें ही अंग पोळे ॥२॥
तुका म्हणे दुजा । उपचार पीडा पूजा ॥३॥

अर्थ

चित्त समाधानी असेल तर सोने सुध्दा विषासमान भासते .विषयलोलुपता जीवनाला घातक ठरते, तुम्ही विचारी गृहस्थ हे सर्व काहि जाणता.मनामध्ये प्रपंच्याविषयीची भोगलालसा असेल तर शरीराचा दाह चंदनाच्या उटिनेही कमी होत नाही .तुकाराम महाराज म्हणतात, प्रपंच्याविषयी आसक्ती असलेल्या माणसाला कितीही मिळाले तरि तो मनुष्य असंतृष्ट राहतो.


अभंग क्र.३९
परिमळ म्हणूनी चोळूं नये फूल । खाऊं नये मूल आवडतें ॥१॥
मोतियाचें पाणी चाखूं नये स्वाद । यंत्र भेदुनि नाद पाहूं नये ॥२॥
कर्मफळ म्हणुनी इच्छूं नये काम । तुका म्हणे वर्म दावूं लोकां ॥३॥

अर्थ

फुले सुगंधी असता त्याचा वास घेण्या करता त्याचा चोळामोळा करू नये, गोजिरे मूल आपल्याला आवडते तर ते आपण खात नाही.मोत्याचे पाणी निर्मळ आहे म्हणून मोती चाखु नये, विविध वाद्य मधुर वाजतात म्हणून ती फोडुन पाहू नये. तुकाराम महाराज म्हणतात तसेच कर्म केल्या नंतर त्याच्या फलाची अपेक्षाहि करू नये, हेच भक्तीचे वर्म आहे.


अभंग क्र.४०
माया तेचि ब्रम्ह ब्रम्ह तेंचि माया । अंग आणि छाया जयापरी ॥१॥
तोडितां न तुटे सारितां निराळी । लोटांगणांतळीं हारपती ॥ध्रु.॥
दुजें नाहीं तेथें बळ कोणासाठीं । आणिक ते आटी विचाराची ॥२॥
तुका म्हणे उंच वाढे उंचपणें । ठेंगणीं लवणें जैसीं तैसीं ॥३॥

अर्थ

माया म्हणजे ब्रम्ह आहे आणि ब्रम्‍ह म्हणजेच माया आहे यांचा संबंध देह आणि सावली यांच्या सारखा आहे.देहाचि सावली शस्राच्या अघाताने तुटत नाही, ती सावली देहाला सोडून दूर सरत नाही,लोटांगण घातले असता देहाखाली ती नाहीशी होते.ब्रम्ह आणि माया एकरूप असतील तर तेथे विचाराच्या बळाचा वापर कश्यासाठी करायचा.तुकाराम महाराज म्हणतात जसा देह उंच बुटका असेल तशी सावली असते, लोटांगनाने ती नाहिशी होते तशे ब्रम्हाला लोटांगण घातले, शरण गेले असता मायाही नाहिशी होते.


अभंग क्र.४१
दुर्जनासि करी साहे । तो ही लाहे दंड हे ॥१॥
शिंदळीच्या कुंटणी वाटा । संग खोटा खोट्याचा ॥ध्रु.॥
येर येरा कांचणी भेटे । आगी उठे तेथूनी ॥२॥
तुका म्हणे कापूं नाकें । पुढें आणिकें शिकविती ॥३॥

अर्थ

दुर्जनाना जे मदत करतात ते शिक्षेस पात्र ठरतात.एखादी स्त्री वेश्येच्या सानिध्यात राहिल्याने शिंदळकी ( दुर्वर्तन) करू लागते .दोन लाकडी एकमेकांवर घासली गेली की अग्निचि निर्मिति होते.वाइटाच्या संगतिने चांगल्या मनुष्याची वृत्ती बिघडते; तुकाराम महाराज म्हणतात की, अशा दृष्टांचि नाके आम्ही कापून काढू म्हणजे त्यांच्या पासुन इतरांचे नुकसान होणार नाही.


अभंग क्र.४२
वृत्ति भूमि राज्य द्रव्य उपार्जिती । जाणा त्या निश्चितीं देव नाहीं ॥१॥
भाडेकरी वाहे पाठीवरी भार । अंतरींचें सार लाभ नाहीं ॥ध्रु.॥
देवपूजेवरी ठेवूनियां मन । पाषाणा पाषाण पूजी लोभें ॥२॥
तुका म्हणे फळ चिंतिती आदरें । लाघव हे चार शिंदळीचे ॥३॥

अर्थ

भूमी, राज्य, द्रव्य यांच्या लोभान जो हरिभक्ती करतो त्याला देव भेटत नाही हे निश्चीत जाणावें.हमाल पाठीवर ओझे वाहतो, पण त्याच्या ओझ्यामधील कोणत्याही वस्तुचा त्याला लाभ होत नाही.मनामधे इच्छा-आकांक्षा ठेउन देवाची पूजा करणारा पाषाणासारखा असतो. असा पाषाणच पाषाणाची पूजा करतो.तुकाराम महाराज म्हणतात मनामधे विषयाचि लालसा धरून केलेले कर्मे हे वेष्याच्या शिंदळकि प्रमाणे असतात.


अभंग क्र.४३
पवित्र सोंवळीं । एक तींच भूमंडळीं ॥१॥
ज्यांचा आवडता देव । अखंडित प्रेमभाव ॥ध्रु.॥
तींच भाग्यवंतें । सरतीं पुरतीं धनवित्तें ॥२॥
तुका म्हणे देवा । त्यांची केल्या पावे सेवा ॥३॥

अर्थ

या भुमंडळी संतसज्जनच एक पवित्र, शुद्ध आहेत.त्यांच्या मनात फक्त परमेश्वराविषयीच प्रेम, भक्ति असते.धनद्रव्याने समृद्ध, बुद्धिने तल्लख असे ते संत या जगात भाग्यवंत आहेत .तुकाराम महाराज म्हणतात अशा संतसज्जनाची सेवा केली तर ती देवाला पावते.


अभंग क्र.४४
आशाबद्ध जन । काय जाणे नारायण ॥१॥
करी इंद्रियांची सेवा । पाहे आवडीचा हेवा ॥ध्रु.॥
भ्रमलें चावळे । तैसें उचित न कळे ॥२॥
तुका म्हणे विषें । अन्न नाशियलें जैसें ॥३॥

अर्थ

प्रपंच्याविषयी आसक्त असणारे जिव परमेश्वराला काय जाणून घेऊ शकतात? त्यांना स्वता:च्या इंद्रियाची सेवा करण्यास आनंद वाटतो .तो भ्रमिष्ट स्वता:च्या जीवनाचे हित जाणु शकत नाही .तुकाराम महाराज म्हणतात, सुग्राम अन्नात विष कालवले असता ते सर्व अन्न वाया जाते, त्या प्रमाणे मनात भोगलालसा असणाऱ्या जीवाचे जीवन व्यर्थ जाते.


अभंग क्र.४५
ढेकरें जेवण दिसे साचें । नाहीं तरि काचें कुंथाकुंथी ॥१॥
हे ही बोल ते ही बोल । कोरडे फोल रुचीविण ॥ध्रु.॥
गव्हांचिया होती परी । फके वरी खाऊं नये ॥२॥
तुकां म्हणे असे हातींचें कांकण । तयासी दर्पण विल्हाळक ॥३॥

अर्थ

भोजनाच्या तृप्तीनंतर दिलेली ढेकर खरी असते, पण भोजन न करता दिलेली ढेकर हे ढोंग असते .भोजन करुन तृप्तीने दिलेली ढेकर हा अनुभव असतो, तर भोजन न करताच दिलेली ढेकर हे फोलपटा प्रमाणे असते .गव्हाच्या पीठाची पुरणपोळी बनते, म्हणून केवळ पीठ खल्याने पुराणपोळी खाल्ल्याचा अनुभव येत नाही .म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हातात कंकण दिसत आहं तरी आरसा पाहणे हे निरर्थ असते .


अभंग क्र.४६
करावी ते पूजा मनेचि उत्तम । लौकिकाचें काम काय असे ॥१॥
कळावें तयासि कळे अंतरींचें । कारण तें साचें साच अंगीं ॥ध्रु.॥
अतिशया अंतीं लाभ किंवा घात । फळ देतें चित्त बीजा ऐसें ॥२॥
तुका म्हणे जेणें राहे समाधान । ऐसें तें भजन पार पावी ॥३॥

अर्थ

देवाची पूजा करायची असेल तर मनोभावे करावे चांगल्याप्रकारे करावे तेथे उगाचंच पूजेचे साहित्य वगैरे ठेवून पूजा करायचा लौकिक दाखवायचे त्याचा काय उपयोग आहे?आपल्या अंतःकरणातील खरी पूजा ज्याला कळायला पाहिजे त्या देवाला आपल्या अंतःकरणातील खरा भक्तिभाव समजतो कारण भक्ताच्या अंतःकरणातील सत्य भाव देव ओळखतो व तेच त्याला आवडते.काहीतरी उगाचच आगोचर पने कर्म केले तर त्याच्या पासून एकतर लाभ तरी होतो किंवा घात तरी होतो जसे बीज असेल तसे फळ मिळते त्या प्रमाणे ज्या व्यक्तीच्या चित्ता मध्ये जसे असेल तसा त्याला लाभ होतो.तुकाराम महाराज म्हणतात ज्या भजनाने आपले अंतकरण समाधान पावते असे भजन आपल्याला भवसागरच्या पलीकडे पोहोचवत असते.


अभंग क्र.४७
नव्हे आराणूक संवसारा हातीं । सर्वकाळ चित्तीं हाचि धंदा ॥१॥
देवधर्म सांदीं पडिला सकळ । विषयीं गोंधळ गाजतसे ॥ध्रु.॥
रात्रि दीस न पुरे कुटुंबाचें समाधान । दुर्लभ दर्शन ईश्वराचें ॥२॥
तुका म्हणे आत्महत्या रे घातकी । थोर होते चुकी नारायणीं ॥३॥

अर्थ

सदा-सर्वकाळ संसाराची चिंता करतात त्यांना क्षणभराचिसुद्धा विश्रांति मिळत नाही .देव धर्म त्यांनी कोपर्‍यात टाकले आहेत, संसारातील कामपुर्तिसाठी जेव्हा हवे तेव्हा त्यांचा उपयोग करतात .रात्रं दिवस कष्ट केले तरी कुटुंबाचे समाधान होत नाही, त्यामुळे त्यांचे देवाकडे लक्ष जात नाही .तुकाराम महाराज म्हणतात, नारायणा विषयी त्यांची मोठी चूक होते असे प्रापंचिक लोक स्वत:च स्वत:ची हत्या करतात .


अभंग क्र.४८
श्मशान ते भूमि प्रेतरूप जन । सेवाभक्तिहीन ग्रामवासी ॥१॥
भरतील पोटे श्वानाचिया परी । वस्ति दिली घरीं यमदूतां ॥ध्रु.॥
अपूज्य लिंग तेथें अतित न घे थारा । ऐसी वस्ती चोरां कंटकांची ॥२॥
तुका म्हणे नाहीं ठावी स्थिति मती । यमाची निश्चिती कुळवाडी ॥३॥

अर्थ

ज्या गावामधे परमेश्वराची सेवा व भक्ती घडत नाही ते गाव स्मशानवत व तेथील रहिवाशी प्रेतरूप असतात .कुत्र्याप्रमाने भटकुन ते पोट भारतात, त्यामुळे त्यांच्या घरामधे यमदूताचि वस्ती असते .जेथे हरिहरांची पूजा भक्ति घडत नाही, ते स्थान चोरांचे, नास्तिकांचे वस्तीस्थान बनते .तुकाराम महाराज म्हणतात, त्यांना आपले हित विठ्ठलभक्तीत आहे हे न कळाल्यामुळे ते यमाचे कुळे बनले आहेत .


अभंग क्र.४९
एकादशीव्रत सोमवार न करिती । कोण त्यांची गति होईल नेणों ॥१॥
काय करूं बहु वाटे तळमळ । आंधळीं सकळ बहिर्मुख ॥ध्रु.॥
हरीहरां नाहीं बोटभरी वाती । कोण त्यांची गति होईल नेणों ॥२॥
तुका म्हणे नाहीं नारायणीं प्रीति । कोण त्यांची गति होईल नेणों ॥३॥

अर्थ

जे कोणी एकादशी आणि सोमवार हे व्रत करत नाही त्यांची गत काय होईल काय माहित? काय करावे सर्व लोकांचे कल्याण व्हावे यासाठी खूप तळमळ वाटते परंतु हे सर्वच संसारिक लोक आंधळी व बहिर्मुख आहेत. हरी व हर म्हणजे हरी आणि शंकर या दोन देवतांना जे लोक बोटभर वातीने देखील ओवाळत नाही त्यांची गती काय होईल हे काही कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात ज्या कोणाला नारायणा विषयी आवडच नाही त्यांची गती काय होईल ते काही मला कळतच नाही.


अभंग क्र.५०
आहाकटा त्याचे करिती पितर । वंशीं दुराचार पुत्र झाला ॥१॥
गळेचि ना गर्भ नव्हेचि कां वांज । माता त्याची लाजलावा पापी ॥ध्रु.॥
परपीडें परद्वारीं सावधान । सादरचि मन अभाग्याचें ॥२॥
न मळितां निंदा चाहडी उपवास । संग्रहाचे दोष सकळ ही ॥३॥
परउपकार पुण्य त्या वावडें । विषाचें तें कीडें दुग्धीं मरे ॥४॥
तुका म्हणे विटाळाचीच तो मूर्ति । दया क्षमा शांति नातळे त्या ॥५॥

अर्थ

ज्या घरामधे दुर्वर्तनी पुत्र जन्माला येतो, त्याचे पीतर दुःखाने आक्रोश करत असतात .अश्या पुत्रांचा त्याच्या मातेच्या उदरात असतानाच गर्भपात का झाला नाही? त्याची माता वांझ का राहिली नाही? अश्या पुत्राला तिने का बरे जन्म दिला? अशा अभाग्याचे मन सतत परपीड़ा, परनिंदा करण्यात रमते .त्याला एखाद्या दिवशी निंदा, चहाडी करण्यास मिळाली नाही तर उपवास घाडल्याप्रमाणे वाटते .परोपकार, पूण्य यांचे त्याला वावडे असते जसे विषारी कीडे दुधात टाकल्यावर मरून जातात तसाच हा आहे .तुकाराम महाराज म्हणतात, असा मनुष्य साक्षात विटाळाची मूर्ति असतो; त्याच्या मनामधे दया, क्षमा, शांतीचा लवलेश नसतो .


अभंग क्र.५१
श्वान शीघ्रकोपी । आपणा घातकर पापी ॥१॥
नाहीं भीड आणि धीर । उपदेश न जिरे क्षीर ॥ध्रु.॥
माणसांसि भुंके । विजातीनें द्यावे थुंके ॥२॥
तुका म्हणे चित्त । मळिण करा तें फजित ॥३॥

अर्थ

शीघ्रकोपि मनुष्य स्वता:च्या नाश करून घेतो, तो कुत्र्यप्रमाणे असतो .ज्याला दुसर्‍याचा आदर करता येत नाही, आणि ज्याच्याकडे धैर्य नसते, त्याला उपदेश व दुध पचतच नाही ते वाया जातो .माणसांना तो अपशब्द बोलतो म्हणून त्यावर लोक थुंकतात .तुकाराम महाराज म्हणतात, आशा अमंगळ वृत्तीच्या लोकांची फजीती करावी .


अभंग क्र.५२
देखोनि हरखली अंड । पुत्र जाला म्हणे रांड । तंव तो जाला भांड । चाहाड चोरटा शिंदळ ॥१॥
जाय तिकडे पीडी लोकां । जोडी भांडवल थुंका । थोर झाला चुका । वर कां नाहीं घातली ॥ध्रु.॥
भूमि कांपे त्याच्या भारें । कुंभपाकाचीं शरीरें । निष्ठुर उत्तरें । पापदृष्टी मळिणचित्त ॥२॥
दुराचारी तो चांडाळ । पाप सांगातें विटाळ । तुका म्हणे खळ । म्हणोनियां निषिद्ध तो ॥३॥

अर्थ

आपुल्याला पुत्र झाला म्हणून एक स्त्री मनातून आनंदी झाली ; पण पुढे तो पुत्र भांडखोर, चोर, दुर्वर्तनी निघाला .तो जिकडे जाईल तिकडे लोकांना पीडा देत असे, त्यामुळे लोक त्याला त्रासले होते, त्याच्या आईने मोठी चूक केलि की तिने जन्मतच त्याला मरून टाकले नाही .ज्याच्या देहभाराने भूमि थरथर कापते , जो दुसर्यांना अपशब्द बोलतो, ज्याचे चित्त मलिन व पापी आहे, तो साक्षात कुंभीपाक नरकाचे रूप आहे .तुकाराम महाराज म्हणतात, तो दुराचारी, चांडाळ असून पापालासुधा त्याच्या संगतीत विटाळ होतो, अशा खळप्रवृत्तीचा धिक्कार असो .


अभंग क्र.५३
नेणें गाणें कंठ नाहीं हा सुस्वर । घालूं तुज भार पांडुरंगा ॥१॥
नेणें राग वेळ काळ घात मात । तुझे पायीं चित्त ठेवीं देवा ॥२॥
तुका म्हणे मज चाड नाहीं जना । तुज नारायणा वांचूनिया ॥३॥

अर्थ

मी गाणे जानत नाही, माझा कंठ सुस्वर नाही; पण हे पांडुरंगा, माझा सर्व भार तुझ्यावर आहे .कोटा राग गाण्यासाठी कोणती वेळ, काळ योग्य की अयोग्य मी हे जानत नाही; पण माझे चित्त मी तुझ्या पायावर वाहिले आहे .तुकाराम महाराज म्हणतात, हे नारायणा, मला तुझ्यावाचून इतर जनांची आवड नाही .


अभंग क्र.५४
माझी पाठ करा कवी । उट लावी दारोदार ॥१॥
तंव तया पारखी सिव । लाजे ठाव सांडितां ॥ध्रु.॥
उष्टावळी करूनि जमा । कुंथुनि प्रेमा आणितसे ॥२॥
तुका म्हणे बाहेरमुदी । आहाच गोविंदीं न सरती ॥३॥

अर्थ

आपल्या काव्यात काव्यगुण नसतांना कहीजण कविता रचतात आणि माझी कविता पाठ करा असे दरोदारी जाउन लोकांनां सांगतात .जे जाणकार आहेत, ते त्यांची योग्य पारख करतात मग तेथून जातांना त्या स्वत:ला कवी म्हणावणारर्‍याची मान लाजेने खाली जाते .उष्ठावळी जमा करुण बळेच प्रेमाचे आव आणतात .तुकाराम महाराज म्हणतात अश्या वरकर्णि भगवंतभक्तिचा देखावा करणारे भगवंत चरणी लीन होत नाहीत.


अभंग क्र.५५
उपाधीच्या नांवें घेतला सिंतोडा । नेदूं आतां पीडा आतळों ते ॥१॥
काशासाठीं हात भरूनि धुवावे । चालतिया गोवे मारगासि ॥ध्रु.॥
काय नाहीं देवें करूनि ठेविलें । असें तें आपुलें ते ते ठायीं ॥२॥
तुका म्हणे जेव्हां गेला अहंकार । तेव्हां आपपर बोळविले ॥३॥

अर्थ

प्रायश्चित्ताने संसार रुपी उपाधीचे निवारण करता येते, तद्ववत प्रपंच्यातील उपाधीपासून सुटका होण्यासाठी मी शिंतोडा उडवुन घेतला आता प्रपंच्याची पीडा मला मी शिवु देणार नाही.भक्तिमार्ग हाती घेतलेला असतांना कशासाठी एखाद्या अमंगळ वस्तुस स्पर्श करुण हात धुवावे .या विश्वामधे भगवंतने जे जे निर्माण केले आहे ते ज्ञानदृष्टीने पाहिले असता आपल्या हिताचे आहे हे कळते .तुकाराम महाराज म्हणतात, अशी ज्ञानदृष्टी प्राप्त होण्यासाठी अहंकाराचा नाश झाला पाहिजे माझा अहंकार गेला म्हणजे आपले-परके हा भेदच संपला .


अभंग क्र.५६
योगाचें तें भाग्य क्षमा । आधीं दमा इंद्रियें ॥१॥
अवघीं भाग्यें येती घरा । देव सोयरा जालिया ॥ध्रु.॥
मिरासीचें म्हूण सेत । नाहीं देत पीक उगें ॥२॥
तुका म्हणे उचित जाणां । उगीं सिणा काशाला ॥३॥

अर्थ

योगाचे भाग्य हे क्षमा आहे जो इंद्रियांचे दमन करतो ज्याच्या चित्तामधे क्षमा असते तो योगी असतो .त्या मुळे देव त्याचा सोयरा होतो आणि त्याला सर्व सुखांची प्राप्ति होते .ज्या प्रमाणे ईनामी मिळालेल्या शेतातसुद्धा कष्ट केल्याशिवाय पिक येत नाही . तुकाराम महाराज म्हणतात , योग्य अयोग्य जाणुन घ्या , नाहीतर वृथा शिण होईल.


अभंग क्र.५७
न ये नेत्रां जळ । नाहीं अंतरीं कळवळ ॥१॥
तों हे चावटीचे बोल । जन रंजवणें फोल ॥ध्रु.॥
न फळे उत्तर । नाहीं स्वामी जों सादर ॥२॥
तुका म्हणे भेटी । जंव नाहीं दृष्टादृष्टी ॥३॥

अर्थ

ज्याच्या नेत्रांमध्ये परमेश्वराबद्दल प्रेमाने पाणी येत नाही, ज्याच्या अंतरि भक्तीचि तळमळ नाही .त्याचे बोल हे वृथा लोकांना रंजविणारे असतात .आणि असे रंजक बोल निष्फळ ठरतात .ज्याच्या मना मध्ये आपल्या स्वामी हरी,गुरु विषयी आदर नसतो त्यांनी उपदेश फल्द्रुप होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात,जो पर्यंत समोरा समोर भेट होत नाही तो पर्यंत आम्ही भेटलो म्हणणे उपयोगाचे नाही .


अभंग क्र.५८
बाईल सवासिण आई । आपण पितरांचे ठायीं ॥१॥
थोर वेच जाला नष्टा । अवघ्या अपसव्य चेष्टा ॥ध्रु.॥
विषयांचे चरवणीं । केली आयुष्याची गाळणी ॥२॥
तुका म्हणे लंडा । नाहीं दया देव धोंडा ॥३॥

अर्थ

एका ढोंगी, कर्मठ मनुष्याने आपल्या माता-पित्याचे श्राद्ध घातले, आईसाठी सवासिन म्हणून आपल्या बायकोला बसवले व वडिलांच्या जागी ब्राम्हण म्हणून आपणच बसला .त्या मुळे त्याचे श्राद्ध निष्फळ झाले; कारण या गोष्टी धर्मशास्त्रानुसार ग्राह्य नाहीत .असे विषयलोलुपता गृहस्थ स्वत:च्या जीवनाचा नाश स्वतःच करून घेतात .तुकाराम महाराज म्हणतात , असे पाखंडी, अहंकारी लोक दगडालाच देव मानतात .


अभंग क्र.५९
दानें कांपे हात । नावडे तेविशीं मात ॥१॥
कथी चावटीचे बोल । हिंग क्षीरीं मिथ्या फोल ॥ध्रु.॥
नव जाती पाप । तीर्था म्हणे वेचूं काय ॥२॥
तुका म्हणे मनीं नाहीं । न ये आकारातें कांहीं ॥३॥

अर्थ

ज्याचा हात दानासाठी थरथर कापतो व् ज्याला दानधर्म करण्याचा सल्ला दिला तर अवडत नाही .ज्याला कथेच्या वेळी फक्त चावट बोल बोलने आवडते, दुधात हींग घातले असता ते वाया जाते, तसे त्याचे भाषण ढोंगिपणाचे असते .त्याचे पाय तीर्थ यात्रेला वळत नाहीत; कारण तो गरीब, दरिद्रयाचे ढोंग करतो .तुकाराम महाराज म्हणतात, जर एखाद्या मनुष्याला मनापासून वाटत नसेल तर ती गोष्ठ त्यांच्या हातून कधीच घडत नाही .


अभंग क्र.६०
वळितें जें गाई । त्यासि फार लागे काई ॥१॥
निवे भावाचे उत्तरीं । भलते एके धणी वरी ॥ध्रु.॥
न लगती प्रकार । कांहीं मनाचा आदर ॥२॥
सांडी थोरपणा । तुका म्हणे सवें दीना ॥३॥

अर्थ

गाई-गुरे वळणाऱ्या गुराख्याला परमेश्वर भक्ती करण्यासाठी कष्ट करावे लगत नाही त्यांना कर्मकांडाची आवशकता भासत नाही .त्याच्या मनातील भक्तिभाव व शुद्ध आचरण पाहुन परमेश्वर त्याच्यावर प्रसन्न होतो .परमेश्वराला वश करुण घेण्यासाठी कोणत्याही दिखाऊ पणाची त्यांना गरज नसते .तुकाराम महाराज म्हणतात, जो आपला अहंकार, मनपान, मोठेपणा विसरून हरीला शरण जातो, त्याला परमेश्वर वश होतो .


अभंग क्र.६१
मैत्र केला महाबळी । कामा न ये अंतकाळीं ॥१॥
आधीं घे रे रामनाम । सामा भरीं हा उत्तम ॥ध्रु.॥
नाहीं तरी यम । दांत खातो करकरा ॥२॥
धन मेळविलें कोडी । काळ घेतल्या न सोडी ॥३॥
कामा न ये हा परिवार । सैन्य लोक बहु फार ॥४॥
तंववरी तुमचे बळ । जंव आला नाहीं काळ ॥५॥
तुका म्हणे बापा । चुकवीं चौर्‍याशींच्या खेपा ॥६॥

अर्थ

महाबलवान मित्र जोडलेस तरि ते अंत:काळी उपयोगी पडत नाही .तेव्हा मृत्यु येण्याआधी रामनाम संपत्ति तू जमवुन ठेव .रामनामाचि संपत्ति नसेल तर यम (काळ) कराकरा दांत खाईल .धन-संपत्ति कितीही मिळवली तरी काळाचा आघात हा होणारच आहे .तुझ्याजवळ सैन्य, परिवार, नातेवाईक कितीही असले तरी शेवटी कोणीच कामाला येणार नाहीत .जो पर्यन्त काळाचा आघात होणार नाही तो पर्यंत तुझी शक्ती कामे करील .तुकाराम महाराज म्हणतात, अहोबापांनो चौर्‍यांशीचा फेरा चुकविण्यासाठी, तुला राम नामाचे साधन जमविले पाहिजे .


अभंग क्र.६२
सुख पाहतां जवापाडें । दुःख पर्वता एवढें ॥१॥
धरीं धरीं आठवण । मानीं संताचें वचन ॥ध्रु.॥
नेलें रात्रीनें तें अर्धें । बाळपण जराव्याधें ॥२॥
तुका म्हणे पुढा । घाणा जुंतीजसी मूढा ॥३॥

अर्थ

जीवनात सुख हे फार थोडे असते, दुःख मात्र पर्वतायेवढे असते .ते दुःख कमी करण्यासाठी संतवचन, संत्सहवास आवश्यक असतो .मानवाच्या आयुष्याचि अर्धी वर्ष रात्री झोपण्यात जातात, बाकीचे बालपन, म्हतारपणात, आजारपणात जातात .तुकाराम महाराज म्हणतात, हे मूर्खा, असे आयुष्य निरर्थक गेले तर जन्म-मृत्युच्या घाण्यामध्ये तू बैलासरखा फिरत राहशील


अभंग क्र.६३
कानडीनें केला मर्‍हाटा भ्रतार । एकाचें उत्तर एका न ये ॥१॥
तैसें मज नको करूं कमळापति । देई या संगति सज्जनांची ॥ध्रु.॥
तिनें पाचारिलें इल बा म्हणोन । येरु पळे आण झाली आतां ॥२॥
तुका म्हणे येर येरा जें विच्छिन्न । तेथें वाढे सीण सुखा पोटीं ॥३॥

अर्थ

एका कानडी भाषा बोलणार्‍या स्त्रीने मराठी भाषा बोलणारा नवरा केला , त्यांना एकमेकांचे बोलणे न कळल्याणे विपर्‍यास निर्माण होत असे .तशी माझी स्थीति हे कमलापती, तू करू नकोस, मला संतसहवास घडू दे .त्या कानडी स्त्रीने त्याला ‘इल बा’ (इकडे या) म्हंटले .त्याने बा’ म्हणजे बाबा असा अर्थ घेतला व भलता गैरसमज करून तो दूर पळू लागला. तुकाराम महाराज म्हणतात अशी परिस्थीती झाली म्हणजे जीवनात विसंगतीचे दुःख निर्माण होते.


अभंग क्र.६४
बोलायाचा त्यासीं । नको संबंध मानसीं ॥१॥
जया घडली संतनिंदा । तुज विसरूनि गोविंदा ॥ध्रु.॥
जळो त्याचें तोंड । नको दृष्टीपुढें भांड ॥२॥
तुका म्हणे देवा । तया दुरी मज ठेवा ॥३॥

अर्थ

जे संतांची निंदा करणारे नास्तिक लोक असतात त्यांचा माझा संबध येऊ नये .हे गोविंदा, जे तुला विसरतात, ते संतांची निंदा करतात .अश्या नास्तिकांचे तोड पाहण्याची देखील माझी इच्छा नाही, असे लोक माझ्या दृष्टिस पडू नयेत .तुकाराम महाराज म्हणतात, हे परमेश्वरा, मला त्यांच्यापासून दूर ठेव .


अभंग क्र.६५
तीळ जाळिले तांदुळ । काम क्रोधे तैसेचि खळ ॥१॥
कां रे सिणलासी वाउगा । न भजतां पांडुरंगा ॥ध्रु.॥
मान दंभ पोटासाठीं । केली अक्षरांची आटी ॥२॥
तप करूनि तीर्थाटन । वाढविला अभिमान ॥३॥
वांटिलें तें धन । केली अहंता जतन ॥४॥
तुका म्हणे चुकलें वर्म । केला अवघाचि अधर्म ॥५॥

अर्थ

हे साधका, समाज्यात कर्मकांडाला महत्त्व देणारे तीळ, तांदूळ यज्ञ करुण तू होमामधे जाळतोस, पण स्वत:च्या स्वभावातील काम-क्रोधादी शत्रु मात्र तू तसेच ठेवतोस .यज्ञयागादि कर्मकांडामध्ये व्यर्थ का स्त:ला शिणुन घेतोस, त्यापेक्षा पांडुरंगाची सेवा का करात नाहीस? .समाजात मानसन्मान मिळविण्यासाठी व उदरनिर्वाहासाठी ग्रंथपठण, विद्याअध्यायन करण्याचे कृत्य तू करतोस .तीर्थाटन करुण स्वत:विषयी अभिमान वाढविलास .दानधर्म करुण आपल्या दातृत्वाचे प्रदर्शन करुण, अहंकार बाळगलास .तुकाराम महाराज म्हणतात, की हे कर्मकांड म्हणजे अधर्माचे वर्म आहे .


अभंग क्र.६६
संसारच्यातापें तापलों मी देवा । करितां या सेवा कुटुंबाची ॥१॥
म्हणऊनी तुझे आठविले पाय । ये वो माझे माय पांडुरंगे ॥ध्रु.॥
बहुतां जन्मींचा झालों भारवाही । सुटिजे हें नाहीं वर्म ठावें ॥२॥
वेढियेलों चोरीं अंतर्बाह्यात्कारीं । कणव न करी कोणी माझी ॥३॥
बहु पांगविलों बहु नागविलों । बहु दिस झालों कासाविस ॥४॥
तुका म्हणे आतां धांव घाली वेगीं । ब्रीद तुझें जगीं दीनानाथा ॥५॥

अर्थ

कुटुंबाची सेवा करता करता मी या प्रपंचिक त्रासाने त्रासुन गेलो आहे .म्हणून मी तुझे चिंतन करत आहे, हे पांडुरंगा, मला भेटायला ये .अनेक जन्मांचा भार वाहून मी श्रमलो आहे, यातून सुटण्याचा उपाय माला सापडत नाही .कामक्रोधादिक षडरीपुंनी मला चहुबाजूंनी वेढले आहे, माझी दया कुणालाच येत नाही .त्यामुळे मी अस्वस्थ झालो आहे, सर्वांनी मला लुटले आहे, माझी तळमळ होत आहे .तुकाराम महाराज म्हणतात, हे दिनानाथ, आता तूच माझा तारणहार आहेस, अनाथांचा तू नाथ आहेस, अशी जगी तुझी ख्याति आहे, तेव्हा तूच अता माझे रक्षण कर .


अभंग क्र.६७
भक्तॠणी देव बोलती पुराणें । निर्धार वचनें साच करीं ॥१॥
मागें काय जाणों अइकिली वार्ता । कबिर सातें जातां घडया वांटी ॥ध्रु.॥
माघारिया धन आणिलें घरासि । ने घे केला त्यासि त्याग तेणें ॥२॥
नामदेवाचिया घरासि आणिलें । तेणें लुटविलें द्विजां हातीं ॥३॥
प्रत्यक्षासि काय द्यावें हें प्रमाण । व्यंकोबाचें ॠण फेडियेलें ॥४॥
बीज दळोनियां केली आराधना । लागे नारायणा पेरणें तें ॥५॥
तुका म्हणे ऐसा नाहीं ज्या निर्धार । नाडेल साचार तोचि एक ॥६॥

अर्थ

देव भक्तांचा ऋणी आहे, भक्तांनी आपल्या भक्तीने त्याला बांधून टाकले आहे, असे पुराणाने सांगितलेले आहे .पूर्वीची अशी गोष्ट सांगितली, की संत कबीरांनी विणलेली वस्त्रे बाजारात नेउन वाटली तेव्हा एक माणूस वस्त्रा साठी विणवनी करीत असताना कबीरांनी आपल्या आंगावरील अर्धे वस्त्र त्याला दिले .तो वस्त्रहीन मनुष्य साक्षात परमेश्वर होता .संत नामदेवांना पण असाच अनुभव अला त्यांचेही धन परमेश्वराने ब्राम्हणाकडून लुटविले .या सर्व प्रत्यक्ष घडलेल्या कथा आहेत, एकनाथांच्या भक्तीचे ऋण फेडण्यासाठीसुध्दा विठ्ठलाने नाथांच्या घरी पानी भरले, कष्ट केले .शेतात पेरण्यासाठी आलेले बी दळून नाथांचे पणजे संत भानुदासांनी संतांना भोजन दिले .तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या विठ्ठला बद्दल ज्याला प्रेम नाही, तो या भवसागरातून पार पडू शकत नाही .


अभंग क्र.६८
भोगें घडे त्याग । त्यागें अंगा येती भोग ॥१॥
ऐसें उफराटें वर्म । धर्मा अंगींच अधर्म ॥ध्रु.॥
देव अंतरे तें पाप । खोटे उगवा संकल्प ॥२॥
तुका म्हणे भीड खोटी । लाभ विचाराचे पोटीं ॥३॥

अर्थ:-

विवेकरुपी बुध्दी ठेउन प्रपंच्यातील विषयभोग भोगले त्याचे तर त्याचे त्यागत रूपांतर होते, पण अविचाराने भोगाचा त्याग केला तर तो सफल होत नाही . खरे तर हे ऊफराटेच दिसते भेगाचा त्याग करणे हा धर्म आहे तरीही कधी कधी अधर्मच होतो आणि भोग भोगल्याने धर्म होतो. धर्मामधेच अधर्म लपलेला असतो .ज्या कर्मामुळे परमेश्वर व् भक्त यांच्यामध्दे द्वैतभाव निर्माण होतो, ती सर्व पापकर्मे ठरतात .तुकाराम महाराज म्हणतात, शुध्द अतःकरणाने भिडेचा(कोणाच्‍याही भिडे पोटी) सर्व त्याग करावा म्हणजे जीवनातील सर्व लाभ मिळून जीवन सार्थक होते .


अभंग क्र.६९
भोरप्यानें सोंग पालटिलें वरी । बक ध्यान धरी मत्स्या जैसें ॥१॥
टिळे माळा मैंद मुद्रा लावी अंगीं । देखों नेदि जगीं फांसे जैसे ॥ध्रु.॥
ढीवर या मत्स्या चारा घाली जैसा । भीतरील फांसा कळों नेदी ॥२॥
खाटिक हा स्नेहवादें पशु पाळी । कापावया नळी तया साठीं ॥३॥
तुका म्हणे तैसा भला मी लोकांत । परी तूं कृपावंत पांडुरंगा ॥४॥

अर्थ

बहुरूपी वरवर विविध सोंग घेऊन दखवितो अथवा बगळा मासा पकडण्यासाठी डोळे बंद असल्याचे सोंग करतो .त्या प्रमाणे भक्तीचे ढोंग करणारा टिळा, माळ, मुद्रा लाऊन जगाला फसवित असतो .कोळी मासे पकडण्याआधी गळाला खाद्य लावतो, त्या खादयामधील फासा माश्याला समजून येत नाही .खाटिक बकर्‍याला कापण्याआधी प्रेमाने पाळत असतो .तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, तू माझा अव्हेर करू नको; कारण तू दयाळू, प्रेमळ असा तारणहार आहेस .


अभंग क्र.७०
गेली वीरसरी । मग त्यासि रांड मारी ॥१॥
मग नये तैसी सत्ता । गेली मागील आणितां ॥ध्रु.॥
भंगलिया चित्ता । न ये काशानें सांदितां ॥२॥
तुका म्हणे धीर । भंगलिया पाठीं कीर ॥३॥

अर्थ

एखाद्या मनुष्याच्या स्वभावातील वीरत्व गेले तर त्याला कोणीही मान देत नाही एखादी क्षुद्र स्त्रीसुद्धा त्याला मारते .एकदयाची जगात नाचक्की झाली तर पुन्हा त्याला समाजात कोणत्याही प्रकारचा मान सन्मान मिळत नाही .एखादी व्यक्ती मना मधुन उतरली म्हणजे पुन्हा चित्तामधे ती बसत नाही .तुकाराम महाराज म्हणतात, की एखाद्या मनुष्याने आत्मविश्वास जर गमवला तर त्याला जगात सर्व ठिकाणी हार पत्कारावि लागते .


अभंग क्र.७१
युक्ताहार न लगे आणिक साधनें । अल्प नारायणें दाखविलें ॥१॥
कलियुगामाजी करावें कीर्तन । तेणें नारायण देईल भेटी ॥ध्रु.॥
न लगे लौकिक सांडावा वेव्हार । घ्यावें वनांतर भस्म दंड ॥२॥
तुका म्हणे मज आणिक उपाव । दिसती ते वाव नामेंविण ॥३॥

अर्थ

परमार्थ साधन्यासाठी युक्त्ताहार, साधानांची गरज नाही; कारण परमार्थ थोडक्याश्या कष्टाने साध्य होतो, हे नारायणाने सांगितले आहे .या कलियुगात कीर्तना सारखे दूसरे साधन नाही, त्यामुळे भगवंतची भेट घडते .त्यासाठी प्रपंच्याचा त्याग करून, वनामधे जावुन, भस्म-दंड धारण करण्याची काहीही आवशकता नाही .तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठलाच्या नामस्मरनाशिवाय इतर कोणतेही उपाय मला दिसत नाही .


अभंग क्र.७२
कंठीं कृष्णमणी । नाहीं अशुभ ते वाणी ॥१॥
हो का नर अथवा नारी । रांड तयें नावें खरी ॥ध्रु.॥
नाहीं हातीं दान । शूरपणाचें कांकण ॥२॥
वाळियेली संतीं । केली बोडोनि फजिती ॥३॥
तुका म्हणे ताळा । नाहीं त्याची अकळा ॥४॥

अर्थ

ज्यांच्या कंठातून कृष्णनाम येत नाही ती वाणी अशुभ आहे .अशी व्यक्ति परमार्थ मार्गात अमंगळ मानली जाते .जे हात दान देण्यास पुढे होत नाही अश्या नास्तिक मनुष्यास संत जवळ करीत नाहीत, त्याला कडक शब्दात सुनावितात त्याची चांगलीच फजीती करतात . तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या आचारणामध्ये ताळमेळ नाही, त्याला अवकळा प्राप्त होते.


अभंग क्र.७३
माया ब्रम्ह ऐसें म्हणती धर्मठक । आपणासरिसे लोक नागविले ॥१॥
विषयीं लंपट शिकवी कुविद्या । मनामागें नांद्या होऊनि फिरे ॥ध्रु.॥
करुनी खातां पाक जिरे सुरण राई । करितां अतित्याई दुःख पावे ॥२॥
औषध द्यावया चाळविलें बाळा । दावूनियां गुळा दृष्टीपुढें ॥३॥
तरावया आधीं शोधा वेदवाणी । वांजट बोलणीं वारा त्यांचीं ॥४॥
तुका म्हणे जयां पिंडाचें पाळण । न घडे नारायण भेट तयां ॥५॥

अर्थ

समाजात काही पढतमुर्ख, धर्मपंडित माया आणि ब्रम्ह यावर बडबड करुण सामान्य लोकांची दिशाभूल करीत असतात असे बोलुन ते स्वत:ची तर फजीती करतात परंतु दुसर्‍याची दिशाभुल करुन त्यांचीही फजीती करतात .विषयलंपट इतरांना कुविद्या, अधर्म शिकवितो, त्याच्यामागे लोक फिरत असतात .सुरन आणि मोहरी शिजवुन खाल्ल्याने लाभ होतो ,तर कच्चे खल्ल्याने अपचन होते .आजारी मुलाला कडु औषध देताना आई त्याला गुळाच्या खडयाचे आमिष दाखवते .प्रपंचाच्या भवसगरातून तरुन जाण्यासाठी वेदाचे संशोधन करुन त्यातील रहस्य जाणून घ्यायला हवे, त्यातील त्रुटि काढून टाकल्या पाहिजे .तुकाराम महाराज म्हणतात, जो स्वताच्या देहाविषयी आसक्त असतो, त्याला देव भेटने कठिण आहे .


अभंग क्र.७४
मृगजळ दिसे साचपणा ऐसें । खोटियाचें पिसें ऊर फोडी ॥१॥
जाणोन कां करा आपुलाले घात । विचारा रे हित लवलाहीं ॥ध्रु.॥
संचित सांगातीं बोळवणें सवें । आचरलें द्यावें फळ तेणें ॥२॥
तुका म्हणे शेखी श्मशान तोंवरी । संबंध गोवरी आगीं सवें ॥३॥

अर्थ

उन्हाच्या झळया हरणाला पाण्याप्रमाने भासतात म्हणून ते तहानलेले हरिण ऊर फोडून त्याच्या पाठीमागे धावत असते, मृगजळ हा एक भास आहे .मानविजिवन हे तसेच आहे, प्रपंचिक मनुष्य या सुखाच्या मृगजळामागे धावतो .आपले पूर्वसंचित ज्या प्रमाणे आहे त्याप्रमानेच आपल्याला जीवनातील सुखे मिळतात .तुकाराम महाराज म्हणतात, मानवी देहाचा शेवट श्मशानात होतो तेथे अग्नि, गोवर्‍यांशी त्याचा समंध येतो तेव्हा मानवाने नारदेहाचे सार्थक करून घ्यावे .


अभंग क्र.७५
गौळीयाची ताकपिरें । कोण पोरें चांगलीं ॥१॥
येवढा त्यांचा छंद देवा । काय सेवा भक्ती ते ॥ध्रु.॥
काय उपास पडिले होते । कण्याभोंवते विदुराच्या ॥२॥
तुका म्हणे कुब्जा दासी । रूपरासी हीनकळा ॥३॥

अर्थ

गोकुळातील गवळ्यांची ताक-दूध पीणारी मुले मनाने चांगली होती .म्हणून प्रत्यक्ष श्रीकृणाला त्यांच्याशी नाते जुळवायला आवडले .विदुराघरी प्रेमाने दिलेल्या ताककण्यांचा आस्वाद घेतला ते, श्रीकृष्णला प्रेमळअन्नाची कमतरता भसली होती म्हणून नव्हे .तुकाराम महाराज म्हणतात, अत्यंत कुरूप, अष्टवक्रा कृब्जादासी तिच्या भक्तिप्रेमाने श्रीकृष्णला ती प्रिय झाली होती .


अभंग क्र.७६
आतां तरी पुढें हाचि उपदेश । नका करूं नाश आयुष्याचा ॥१॥
सकळांच्या पायां माझें दंडवत । आपुलालें चित्त शुद्ध करा ॥ध्रु.॥
हित तें करावे देवाचें चिंतन । करूनियां मन एकविध ॥२॥
तुका म्हणे लाभ होय तो व्यापार । करा काय फार शिकवावें ॥३॥

अर्थ

तुकाराम महाराज प्रापंचिक मनुष्याला विनऊन सांगता, की या आयुष्याचा स्व:ताच्या हाताने नाश करू नका .या जीवनाचे सार्थक करण्यासाठी आपले चित्त शुद्ध ठेवा; या साठी ते सर्वांना दंडवत घालून विनंती करतात .एकाग्र मन करुण भगवंतचे चिंतन करा .तुकाराम महाराज म्हणतात की जीवनाचे, नरदेहाचे सार्थक होईल असा व्यापार करा .


अभंग क्र.७७
भक्ताविण देवा । कैंचें रूप घडे सेवा ॥१॥
शोभविलें येर येरां । सोनें एके ठायीं हिरा ॥ध्रु.॥
देवाविण भक्ता । कोण देता निष्कामता ॥२॥
तुका म्हणे बाळ । माता जैसें स्नेहजाळ ॥३॥

अर्थ

भक्तावाचुन देवाची सगुण भक्ती कोण करेल? भक्तामुळे भगवंताला महत्व प्राप्त होते .हीरा सोन्याच्या कोंदनातच शोभून दिसतो तसा भक्त व भगवंताचा परस्पर संबंध आहे .देवाशिवाय भक्ताला निष्कामभक्ती शिकविणारा कोणी नाही . तुकाराम महाराज म्हणतात की, आई आणि मुलाचा जसे प्रेमाचे नाते असते त्याप्रमाणे देव व भक्त यांचे नाते आहे .


अभंग क्र.७८
विश्वाचा जनिता । म्हणे यशोदेसि माता ॥१॥
ऐसा भक्तांचा अंकित । लागे तैसी लावी प्रीत ॥ध्रु.॥
निष्काम निराळा । गोपी लावियेल्या चाळा ॥२॥
तुका म्हणे आलें । रूपा अव्यक्त चांगलें ॥३॥

अर्थ

या विश्वाचा जनक यशोदेला माता म्हणतो .तो भक्तांचा अंकित आहे, भक्ताला त्याच्या भक्तीप्रमाणे प्रेम देत असतो .परमेश्वर निष्काम असूनही गोपीनां त्याचा वेध लागला आहे .तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या भक्तीसाठी तो अव्यक्त असुन व्यक्त, सगुन साकार रूपामधे आला आहे .


अभंग क्र.७९
काय दिनकरा । केला कोंबड्यानें खरा ॥१॥
कां हो ऐसा संत ठेवा । भार माझे माथां देवा ॥ध्रु.॥
आडविलें दासीं । तरि कां मरती उपवासी ॥२॥
तुका म्हणे हातीं । कळा सकळ अनंतीं ॥३॥

अर्थ

सूर्योदयासमयी कोबडा आरवतो व त्यासमायी सूर्य उदयाला येतो, म्हणून कोबड्याने सूर्योदय घडऊन अणला, असे होत नाही .माझी योग्यता नसताना हे विठ्ठला, तू मला हा संतपणाचा भार का दिला आहेस ? एखादी श्रीमंत व्यक्ती दासिच्या अडविण्याने उपाशी राहणार आहे काय ? तुकाराम महाराज म्हणतात, मानवी जीवन सर्वस्वी परमेश्वराच्या आधीन आहे .


अभंग क्र.८०
जेवितांही धरी । नाक हागतियेपरी ॥१॥
ऐसियाचा करी चाळा । आपुलीच अवकळा ॥ध्रु.॥
सांडावें मांडावें । काय ऐसें नाहीं ठावें ॥२॥
तुका म्हणे करी । ताक दुधा एकसरी ॥३॥

अर्थ

काही मुर्ख माणसे प्रात:विधीवेळी(शौच्याच्या वेळेस) वास येतो म्हणून नाकाला हात लावतात, तसेच जेवतनाही लावतात .कोणत्या वेळी काय करावे, काय करू नाही याचे ज्ञान त्यांना नसते .त्यामुळे ते आपलिच फजीति करुण घेतात .तुकाराम महाराज म्हणतात , ताक व दूध यातील फरक त्यांना कळत नाही .


अभंग क्र.८१
हो का पुत्र पत्नी बंधु । त्यांचा तोडावा संबंधु ॥१॥
कळों आलें खट्याळसें । शिवों नये लिंपों दोषें ॥ध्रु.॥
फोडावें मडकें । मेलें लेखीं घायें एकें ॥२॥
तुका म्हणे त्यागें । विण चुकी जे ना भोगें ॥३॥

अर्थ

परमार्थामध्ये पत्नी, पुत्र, बंधू यांचा संबंध जर अडथळा निर्माण करीत असेल तर तो संबंध तोडून टाकावा .या नातेवाईकांना आपल्यापासून दूर केले असता त्यांचा दोष आपल्याला लागत नाही .एखाद्या मनुष्या मृत्यु झाला म्हणजे त्याच्या नावाने मडके फोडले जाते, त्याप्रमाणे सार्‍या नातेवाइकांचा संबंध तोडूंन टाकावा .तुकाराम महाराज म्हणतात, सर्वस्वाचा त्याग केल्याशिवाय प्रपंचिक भोग संपत नाही .


अभंग क्र.८२
व्याल्याविण करी शोभनतांतडी । चार ते गधडी करीतसे ॥१॥
कासया पाल्हाळ आणिकांचे देखी । सांगतां नव्हे सुखी साखरेसि ॥ध्रु.॥
कुंथाच्या ढेंकरें न देवेल पुष्टी । रूप दावी कष्टी मळिण वरी ॥२॥
तुका म्हणे अरे वाचाळ हो ऐका । अनुभवेंविण नका वाव घेऊं ॥३॥

अर्थ

एक मुर्ख स्त्री प्रसूत न होता प्रसूत झाल्याचा देखावा करते .इतर प्रसुत झालेल्या स्त्रीयांच्या क्रीया पाहुन तिही प्रसुतीचे चाळे करते, तसे साखरेची गोडी सांगुण कळत नाही, त्याचा अनुभव घ्यावा लागतो .त्याचप्रमाने न जेवताच ढेकर देणाराहि जेवनाने तृप्त झाल्याचा देखावा करुन स्वत:लाच कष्टि करतो .तुकाराम महाराज म्हणतात, जीवनातील काही गोष्टींचा अनुभव घ्यावा लागतो, त्याचे नाटक करता येत नाही, आणि तसे केले असता फजीतीच होते .


अभंग क्र.८३
जेणें घडे नारायणीं अंतराय । होत बाप माय वर्जावीं तीं ॥१॥
येर प्रिया पुत्र धना कोण लेखा । करिती तीं दुःखा पात्र शत्रु ॥ध्रु.॥
प्रल्हादें जनक बिभीषणें बंधु । राज्य माता निंदु भरतें केली ॥२॥
तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय । आणीक उपाय दुःखमूळ ॥३॥

अर्थ

नारायणाचि भक्ती करतांना प्रत्यक्ष जन्मदाते बाप माय जरी आड आले तरी त्यांना दूर सारावे .पत्नी, पुत्र, धन यांनाही पमार्थापासून दूर ठेवावे, परमार्थ मार्गात आड येणारे सर्व शत्रु आहेत . प्रल्हादाने आपल्या माता पित्यांचा, बिभीषणाने बंधू रावणाचा, भरताने माता कैकेयीचा त्याग करून परमार्थ साधला .तुकाराम महाराज म्हणतात, सर्वधर्म हरिच्या पायाशी असतांना इतर केलेले उपाय म्हणजे दुःखाचें मूळ आहेत .


अभंग क्र.८४
मान अपमान गोवे । अवघे गुंडूनी ठेवावे ॥१॥
हेंचि देवाचें दर्शन । सदा राहे समाधान ॥ध्रु.॥
शांतीची वसती । तेथें खुंटे काळगती ॥२॥
आली ऊर्मी साहे । तुका म्हणे थोडें आहे ॥३॥

अर्थ

परमार्थमार्गात अहंकार निर्माण करणारे वृथा मान, अभिमान गुंधळून ठेवावे .चित्ताचे समाधान हेच देवाचे दर्शन आहे .जेथे शांति असते तेथे काळही थांबतो .तुकाराम महाराज म्हणतात प्रपंच्यातील सर्व कामविकारांच्या उर्मि शांतपणे सहन करणे म्हणजे परमार्थमार्गाची वाटचाल करणे होय.


अभंग क्र.८५
थोडें आहे थोडें आहे । चित्त साह्य जालिया ॥१॥
हर्षामर्ष पाहीं अंगीं । पांडुरंगीं सरलें तें ॥ध्रु.॥
अवघ्या साधनांचें सार । न लगे फार शोधावें ॥२॥
तुका म्हणे लटिकें पाहें । सांडीं देह अभिमान ॥३॥

अर्थ

भक्तिमार्गाची वाटचाल करतांना मनाची परमेश्वराला एकरूपता साधली पाहिजे .हर्ष आणि खेद हे दोन्ही ज्यांना सामान भासतात, तेच भक्तीचे अधिकारी होतात .सर्व भक्तीमार्गाचे सार एकच आहे, ते फारसे शोधवे लागत नाही .तुकाराम महाराज म्हणतात, हा प्रपंच खोटा आहे, हे ओळखून अहंकार, देहसक्तीचा त्याग म्हणजेच परमार्थ होय .


अभंग क्र.८६
आतां उघडीं डोळे । जरी अद्यापि न कळे । तरी मातेचिये खोळे । दगड आला पोटासी ॥१॥
मनुष्यदेहा ऐसा निध । साधिली ते साधे सिद्ध । करूनि प्रबोध । संत पार उतरले ॥ध्रु.॥
नाव चंद्रभागे तीरीं । उभी पुंडलीकाचे द्वारीं । कट धरूनियां करीं । उभाउभी पालवी ॥२॥
तुका म्हणे फुकासाठीं । पायीं घातली या मिठी । होतो उठाउठी । लवकरीच उतार ॥३॥

अर्थ

मायामोहाने भ्रमीष्ट झालेल्या जीवा,आता तरी तू डोळे उघड, मातेच्या उदारतुन तू जन्म घेऊन तु फक्त दगड आहेस .हा मनुष्य देह तुला मिळालेला आहे त्याचे तू सार्थक करून घे, संतांनी जसा भक्तिचा मार्ग धरला आणि ते भवसागरातून तरले , तसा तू भक्तिमार्ग धरुण नारादेहाचे सार्थक करुन घे .हा भवसागर तरुन जाणारी नाव चंद्रभागेतीरि, पुंडलिकाच्या द्वारी कमरेवर हात ठेऊन उभी आहे, उभ्या उभ्या ती सर्वांना बोलविते आहे .तुकाराम महाराज म्हणतात या नावेला कुठालेही मोल द्यावे लागत नाही, अनन्य भावाने त्याला शरण जाणे, हा एकच उपाय या भवसागरातून तरुण जाण्यासाठी आहे .


अभंग क्र.८७
न करीं रे संग राहें रे निश्चळ । लागों नेदीं मळ ममतेचा ॥१॥
या नांवें अद्वैत खरें ब्रम्हज्ञान । अनुभवावांचून बडबड ते ॥ध्रु.॥
इंद्रियांचा जय वासनेचा क्षय । संकल्पा ही न ये वरी मन ॥२॥
तुका म्हणे न ये जाणीव अंतरा । अंतरीं या थारा आनंदाचा ॥३॥

अर्थ

तू कोणाचाही संग करू नको, नीश्चिल रहा, मनाला माया- मोहाचा मळ लागू देऊ नको .अशी मनाची निसं:ग अवस्थालाच अव्दैत स्थिती म्हणतात व खरे आत्मज्ञान, ब्रम्हज्ञान हेच होय, बाकी सर्व अनुभवावाचुन केलेले निष्फल बडबड आहे .इंद्रियांचे दमन करूण त्यांच्यावर विजय मिळविने, वासना, कामना, नाहीशी करणे, कोणत्याही प्रकारचा संकल्प मना मध्ये येऊ देऊ नको .तुकाराम महाराज म्हणतात, अश्या व्यक्तीच्याअंतकरणा मधुन अहंकार नाहिसा होतो आणि आनंदि आनंद निर्माण होतो .


अभंग क्र.८८
पंढरीचा महिमा । देतां आणीक उपमा ॥१॥
ऐसा ठाव नाहीं कोठें । देव उभाउभी भेटे ॥ध्रु.॥
आहेति सकळ । तीर्थे काळें देती फळ ॥२॥
तुका म्हणे पेठ । भूमिवरी हे वैकुंठ ॥३॥

अर्थ

पंढरी या तीर्थक्षेत्राचा महिमा किती वर्णन करावा तेवढा थोडाच आहे .या सारखे ठिकाण दुसरे कोठेही नाही करण येथे भक्तांना भेटण्यासाठी देव आतुर होऊन उभा राहिला आहे .इतर क्षेत्र बर्‍याच कालानंतर फळ देणारी आहे .तुकाराम महाराज म्हणतात, पंढरी ही साक्षात भक्तीची बाजार पेठ व भुमीवरिल वैकुंठच आहे


अभंग क्र.८९
तीर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनीं ॥१॥
मिळालिया संतसंग । समर्पितां भलें अंग ॥ध्रु.॥
तिर्थी भाव फळे । येथें आनाड तें वळे ॥२॥
तुका म्हणे पाप । गेलें गेल्या कळे ताप ॥३॥

अर्थ

सर्व तीर्थक्षेत्रांवर दगाडाचा देव व तीर्थाचे पाणी दिसते; पण तुकाराम महाराजांना संतसज्जनांमधे देव दिसतो .अश्या संतांचा सहवास मिळाला तर तिथे देहहि अर्पण करावा .तीर्थस्नानाने पापक्षालन होत नाही जर मनामधे भक्ति भावना असेल तरच तीर्थक्षेत्री त्याचे फळ मिळते, म्हणून संतसज्जन नास्तिक लोकांना आपल्या संगतित बदलून टाकतात .तुकाराम महाराज म्हणतात, संतसज्जनांमधे राहून कि एकदा पाप गेले मग जीवनातील त्रिविध ताप नाहिसे ज़ाले हे माहित होते .


अभंग क्र.९०
घेऊनियां चक्र गदा । हाचि धंदा करीतो ॥१॥
भक्ता राखे पायापासीं । दुर्जनासी संहारी ॥ध्रु.॥
अव्यक्त तें आकारलें । रूपा आलें गुणवंत ॥२॥
तुका म्हणे पुरवी इच्छा । जया तैसा विठ्ठल ॥३॥

अर्थ

हातामधे चक्र, गदा घेऊन देव सतत भक्ताचे रक्षण करण्याचा धंदा करत असतो .भक्तांचे रक्षण करुण त्यांना आपल्या पायजवर स्थान देतो; पण दुष्टांचा मात्र नाश करतो .भक्तांसाठी तो अव्यक्त रूपातुन व्यक्त रुपात येतो .तुकाराम महाराज म्हणतात, भक्तांच्या सर्व इच्छा तो पूर्ण करतो .


अभंग क्र.९१
देखोनि पुराणिकांची दाढी । रडे स्फुंदे नाक ओढी ॥१॥
प्रेम खरें दिसे जना । भिन्न अंतरीं भावना ॥ध्रु.॥
आवरीतां नावरे । खुर आठवी नेवरे ॥२॥
बोलों नयें मुखावाटां । म्हणे होतां ब्यांचा तोटा ॥३॥
दोन्ही सिंगें चारी पाय । खुणा दावी म्हणे होय ॥४॥
मना आणितां बोकड । मेला त्याची चरफड ॥५॥
होता भाव पोटीं । मुखा आलासे शेवटीं ॥६॥
तुका म्हणे कुडें । कळों येतें तें रोकडें ॥७॥

अर्थ

एका मंदिरात पुराणिकाचे पुराण ऐकतांना एक धनगर स्फुंदुन स्फुंदुन रडत असे .लोकांना वाटे, तो पुराणीकांवरील श्रद्धेमुळे राडतो आहे, पण त्याला पुराणीकांची दाढ़ी पाहुन आपल्या बोकडयाची आठवण येत असे .त्याला बोकडयाचे खुर, पाय आठवत असत .इतर सर्व शेळ्यान मधे हा एकच बोकड होता .पुराणीकांने माया आणि ब्रम्ह अशी दोन बोटे वर केली की त्याला वाटे, बोकडाचि दोन शिंगे, चार वेदांसाठी त्यांनी चार बोटे वर केली की त्याला वाटे, बोकडयाचे चार पाय; या साठी या खुना आहेत .धनगराला मेलेल्या बोकडयाची आठवण येत असे .पुराणीकांना पाहुन धनगराला मेलेला बोकड आठवला, हा त्याच्या मनातील भाव शेवटी बाहर पडला .तुकाराम महाराज म्हणतात, प्रपंचिक मनुष्याच्या अंत:करणात काही लपुन राहत नाही, सत्य बाहर पडते .


अभंग क्र.९२
दुर्जनाची गंधी विष्ठेचिया परी । देखोनियां दुरी व्हावें तया ॥१॥
अइका हो तुम्ही मात हे सज्जन । करूं संघष्टन नये बोलों ॥ध्रु.॥
दुर्जनाचे अंगीं अखंड विटाळ । वाणी रजस्वला स्रवे तैशी ॥२॥
दुर्जनाचें भय धरावें त्यापरी । पिसाळलेवरी धांवे श्वान ॥३॥
दुर्जनाचा भला नव्हे अंगसंग । बोलिलासे त्याग देश त्याचा ॥४॥
तुका म्हणे किती सांगावें पृथक । अंग कुंभीपाक दुर्जनाचें ॥५॥

अर्थ

दुर्जनंचा सहवास हा विष्टेप्रमाने दुर्गंधीयुक्त असतो तेव्हा सज्जनाने त्या पासून दूर राहावे .हे सज्जन हो, तुम्ही माझे एवढे ऐका, अश्या दुर्जनंचि संगत तुम्ही करू नका . दुर्जनांचे अंग अखंड विटाळलेले असते व त्याची वाणी विटाळशी स्त्रीच्या स्रवलेल्या द्रव्या प्रमाणे आहे .हे दुर्जन लोक एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यासारखे असतात ज्या प्रमाणे पिसाळलेल्या कुत्र्या चे भय बाळगुन आपण त्या पासुन दुर पळतो त्या प्रमाणे दुर्जना पासुन दुर पळावे .दुर्जनंचि संगती करू नये, त्यांचा त्याग करावा; एवढेच नव्हे तर त्यांच्या देशाचाहि त्याग करावा, असे श्यास्त्र सांगते .तुकाराम महाराज म्हणतात, मी तुम्हांला किती सांगु हे दुर्जन लोक म्हणजे साक्षात कुंभीपाक नरकाचे उदाहरण आहेत.


अभंग क्र.९३
अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा । ओळखा जातीचा अंत्यज तो ॥१॥
वेद श्रुति नाहीं ग्रंथ ज्या प्रमाण । श्रेष्ठाचें वचन न मानी जो ॥ध्रु.॥
तुका म्हणे मद्यपानाचें मिष्टान्न । तैसा तो दुर्जन शिवों नये ॥२॥

अर्थ

प्रपंच्यामधे कारणाशिवाय वादविवाद करणारा हा शुद्ध बिजाचा नाही तो अत्यंज आहे असे संत सांगतात, तो विद्वान ब्रम्हण असला तरी त्याला अंत्यज पुराण समजावे .वेद, श्रुती यांना जो प्रमाण मानत नाहीत नाही, श्रेष्ठांनचे वचन जो मानित नाही .तुकाराम महाराज म्हणतात अश्या मद्यपान करणाऱ्या व्यक्तीच्या घरी मिष्टान्न सेवन करू नये, त्याला स्पर्शही करू नये .


अभंग क्र.९४
शब्दा नाहीं धीर । ज्याची बुद्धि नाहीं स्थिर ॥१॥
त्याचें न व्हावे दर्शन । खळा पंगती भोजन ॥ध्रु.॥
संतासी जो निंदी । अधम लोभासाठीं वंदी ॥२॥
तुका म्हणे पोटीं । भाव अणीक जया ओठी ॥३॥

अर्थ

ज्याच्या शब्दात धर्य नाही, ज्याची बुद्धि अस्थीर आहे .आशा पापी व्यक्तींचे चुकुनहि दर्शन घेऊ नये, त्याच्या पंगतिला भोजनाचे लाभ घेऊ नये .तो दुर्जन संतांची निंदा करतो व द्रव्यालाभासाठी अधम श्रीमंतांच्या पाया पडतो .तुकाराम महाराज म्हणतात, अश्या व्यक्तींच्या पोटातील (हृदयातील) व ओठातील (वाणीतील) भाव वेगवेगळा असतो .


अभंग क्र.९५
चोरें चोरातें करावा उपदेश । आपुला अभ्यास असेल तो ॥१॥
शिंदळीच्या मागें वेचितां पाउलें । होईल आपुलें तिच्या ऐसें ॥ध्रु.॥
तुका म्हणे भितो पुढिलिया दत्ता । म्हणऊनि चिंता उपजली ॥२॥

अर्थ

एक चोर दुसऱ्या चोराला चोरिच्या, घरफोडीच्या युक्त्या शिकवितो.जसा त्याचा आभ्यास असेल तसाच उपदेश करतो .एखाद्या वेश्येच्या सहवासात एखादी घरंदाज स्त्री आली तर तीही कालांतराने वाममार्गी बनते.वाईट व्यक्तींच्या संगतिला राहून संगतीत राहणारा देखिल वाईट होते .तुकाराम महाराज म्हणतात, वाईट लोकांच्या संगती मला नको.कारण मला पुढील भविष्यकाळात त्यामुळे होणाऱ्या दुषपरीणामांचे भय वाटते .


अभंग क्र.९६
मांडवाच्या दारा पुढें । आणिला म्हातारा ॥१॥
म्हणे नवरी आणा रांड । जाळा नवर्‍याचें तोंड ॥ध्रु.॥
समय न कळे । काय उपयोगीं ये वेळे ॥२॥
तुका म्हणे खरा । येथूनिया दूर करा ॥३॥

अर्थ

एका विवाहा प्रसंगी नवरा-नवरी वेळेवर आले नाहीत म्हणून एक तारतम्य नसलेला म्हातारा मधे बोलू लागला .नवरी वेळेवर येत नाही हे पाहुन तो म्हातारा त्या रांड नवरीला आणा आणि त्या ‘नावर्‍याचे तोड पेटून दया’ अशी अशुभ वार्ता करू लागला .कोणत्या वेळी काय बोलावे हे त्या म्हातार्‍याला कळत नाही मग त्याचा काय उपयोग आहे .तुकाराम महाराज म्हणतात, आशा मुर्ख म्हतार्‍याला मंडवातून प्रथम दूर करा .


अभंग क्र.९७
कांहीं नित्यनेमाविण । अन्न खाय तो श्वान । वांयां मनुष्यपण । भार वाहे तो वृषभ ॥१॥
त्याचा होय भूमी भार । नेणे यातीचा आचार । जाला दावेदार । भोगवी अघोर पितरांसि ॥ध्रु.॥
अखंड अशुभ वाणी । खरें न बोले स्वप्नीं । पापी तयाहुनी । नाहीं आणीक दुसरा ॥२॥
पोट पोसी एकला । भूतीं दया नाहीं ज्याला । पाठीं लागे आल्या । अतिताचे द्वारेशीं ॥३॥
कांहीं संतांचे पूजन । न घडे तीर्थांचें भ्रमण । यमाचा आंदण । सीण थोर पावेल ॥४॥
तुका म्हणे त्यांनीं । मनुष्यपणा केली हानी । देवा विसरूनी । गेलीं म्हणतां मी माझें ॥५॥

अर्थ

दररोज कही पारमार्थिक नित्यनेम केल्यावाचुन जो अन्न खातो, तो कुत्र्या सामान असतो, मनुष्यदेहाचा भार वाहणारा तो निव्वळ बैल असतो .त्याचा भूमिला भार होतो, त्याचे आचरण शुद्ध नसते; त्यामुळे त्याचे पितर नारकवास भोगत असतात .त्याची वाणी अमंगळ असते, तो स्वप्नात सुध्दा खरे बोलत नाही, त्याच्यासारखा पापी शोधून सपडणार नाही .तो फक्त आपल्या कुटुंबाचे पोट भरतो, त्याच्याजवळ भूतदया नाही, दाराशी आलेल्या अतिथीला हाकलुन देतो .त्याच्या हातून संतसेवा, तीर्थयात्रा घडत नाही, तो म्हणजे यमाला दिलेला एक ठेवा आहे, यम त्याला भरपूर दुःख देईल .तुकाराम महाराज म्हणतात , अश्या व्यक्ती जन्माला येऊन स्वत:चेच नूकसान करून घेतात; कारण प्रपंच्यात ते रमुन जातात, त्यांना परमेश्वराची आठवण येत नाही .


अभंग क्र.९८
कन्या गौ करी कथेचा विकरा । चांडाळ तो खरा तया नांवें ॥१॥
गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण । यातिशीं कारण नाहीं देवा ॥२॥
आशाबद्ध नये करूं तें करिती । तुका म्हणे जाती नरकामधीं ॥३॥

अर्थ

जी व्यकि आपली कन्या, गाय आणि हरिकथा यांची विक्री करुन धन मिळवतो, ती वृत्तीने चांडाळ आहे .मनुष्या मधील गुण-अवगुण परमेश्वर पाहतो, जात पाहत नाही.ज्या व्यक्तीच्या अंगी परमार्थ गुण आहे, ती व्यक्ती भगवंतला अतिप्रिय आहे, आणि ज्या व्यक्तीच्या अंगी परमार्थाचे गुण नाही; ती व्यक्ती देवाल अप्रिय आहे; मग ती व्यक्ती कोणत्याही जातीची असली तरी देव त्याच्याकडे पाहत नाही .तुकाराम महाराज म्हणतात, असे आश्यावादि लोक लालसेने नको त्या गोष्टी करतात आणि नरकात जातात .


अभंग क्र.९९
हरीहरां भेद । नाहीं करूं नये वाद ॥१॥
एक एकाचे हृदयीं । गोडी साखरेच्या ठायीं ॥ध्रु.॥
भेदकासी नाड । एक वेलांटीच आड ॥२॥
उजवें वाम भाग । तुका म्हणे एकचि अंग ॥३॥

अर्थ

हरी (विष्णु) आणि हर (शिव) यांच्यामधे भेद करून अकारण वाद निर्माण करू नये.कारण ते दोन्ही एकच आहे, जसे साखर आणि तिची गोडी .फरक करणार्‍यांच्या डोळ्याला केवळ एका वेलांटिचा फरक दिसतो .तुकाराम महाराज म्हणतात , उजवे व डावे दोन भाग एकत्र येऊन त्याचा देह बनतो त्याप्रमाणे हरी आणि हर हे सारखेच आहे .


अभंग क्र.१००
वक्त्या आधीं मान । गंध अक्षता पूजन । श्रोता यति झाला जाण । तरी त्या नाहीं उचित ॥१॥
शीर सर्वांगा प्रमाण । यथाविधि कर चरण । धर्माचें पाळण । सकळीं सत्य करावें ॥ध्रु.॥
पट्ट पुत्र सांभाळी । पिता त्याची आज्ञा पाळी । प्रमाण सकळीं । ते मर्‍यादा करावी ॥२॥
वरासनीं पाषाण । तो न मानावा सामान्य । येर उपकरणें । सोनियाचीं परी नीच ॥३॥
सोनियाचा पैंजण । मुगुटमणि केला हीण । जयाचें कारण । तया ठायीं अळंकार ॥४॥
सेवका स्वामीसाठीं मान । त्याचें नाम त्याचें धन । तुका म्हणे जाण । तुम्ही संत यदर्थी ॥५॥

अर्थ

परमार्थाविषयी बोलणाऱ्यास आगोदर गंध, फुल, अक्षतादि पुजेचा मान दिला पाहिजे .श्रोता जरी संन्यासी असेल तरी वक्त्याच्या आधी त्याचा मानसन्मान करू नये .ज्याप्रमाणे देहामधे मस्तक श्रेष्ट आहे, म्हणून त्याचे पूजन प्रथम करावे; नंतर क्रमशः हात, पाय यांचे पूजन करावे; असा धर्मादेश आहे आणि तोच सर्वांनी पाळावा .ज्याप्रमाणे पुत्र वयाने जरी बापापेक्षा लहान असला आणि तो राज्याच्या आसनावरती बसलेला असेल तर बाप त्याची आज्ञा पाळतो; त्या प्रमाणे संतांचे वय न पाहता श्रेष्ठत्व पहावी आणि त्यांनाच प्रमाण मानावे .देवाची मूर्ति जरी पाषाणांची असेल तरी ती देव्हार्‍यातच ठेवावी, देवाची उपकरन चांदी, सोन्याची असली तर ती खाली ठेवावित.देव्हार्‍यात देव ठेवतात, मौल्यावान भांडी नव्हे .एकान सोन्याचे पैजनी केले आणि काचेचा मुकुटमणि केला तरी पैंजन पायातच आणि मुकुट डोक्यावरच घातला पाहिजे.जेथला अलंकार त्या जागीच घातला पाहिजे .तुकाराम महाराज म्हणतात सेवकांना मालकामुळे नावलौकिक मिळतो, तेच त्याचे धन आहे; त्याच प्रमाणे संतहो तुम्ही मालक आहात आणि मी तुकचा सेवक आहे.


सार्थ तुकाराम गाथा 1 ते 100 समाप्त 

3 thoughts on “सार्थ तुकाराम गाथा 1 ते 100”

  1. Great job! Thank you very much for making such great literature available to seekers! Is there a way to download these Sant Tukaram Abhanga?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *