दासबोध दशक विसावा

दासबोध दशक एकोणिसावा

दासबोध दशक एकोणिसावा विडिओ सहित



॥ श्रीमत् दासबोध ॥
॥ दश एकोणिसावा : शिकवण

समास पहिला : लेखनक्रियानिरूपण
॥ श्रीराम ॥

ब्राह्मणें बाळबोध अक्षर । घडसुनी करावें सुंदर ।
जें देखतांचि चतुर । समाधान पावती ॥ १ ॥
ब्राह्मणाने बाळबोध अक्षर घोटून घोटून इतके सुंदर करावे की, ते पाहिल्यावर चतुर पुरुषांना समाधान व्हावे. (१)

वाटोळें सरळें मोकळें । वोतलें मसीचें काळें ।
कुळकुळीत वळी चालिल्या ढाळें । मुक्तमाळा जैशा ॥ २ ॥
अक्षर वाटोळे, सरळ, मोकळे, काजळाच्या शाईने लिहिलेले असावे. ते काळे कुळकुळीत असावे. ओळीत असे लिहावे की जणू काही मोत्यांच्या माळाच आहेत. (२)

अक्षरमात्र तितुकें नीट । नेमस्त पैस काने नीट ।
आडव्या मात्रा त्या हि नीट । आर्कुलीं वेलांड्या ॥ ३ ॥
प्रत्येक अक्षर नीटनेटके लिहिलेले असावे. प्रत्येक शब्दात सारखे अंतर असावे. त्याप्रमाणेच काने, आडव्या मात्रा, रफार आणि वेलांट्याही नीट असाव्यात. (३)

पहिलें अक्षर जें काढिलें । ग्रंथ संपेतों पाहात गेलें ।
येका टांकेंचि लिहिलें । ऐसें वाटे ॥ ४ ॥
ग्रंथाचा आरंभ करताना पहिले अक्षर जे काढलेले असेल तिथपासून ग्रंथसमाप्तीपर्यंत जर पाहात गेले, तर एकाच टाकाने सर्व लिखाण केले आहे, असे वाटावे. (४)

अक्षराचें काळेपण । टांकाचें ठोसरपण ।
तैसेंचि वळण वांकाण । सारिखेंचि ॥ ५ ॥
सर्वत्र अक्षराचे काळेपण, टाकाचे ठोसरपण, अक्षराचे वळण आणि वाकण अगदी एकसारखे असावे. (५)

वोळीस वोळी लागेना । आर्कुली मात्रा भेदीना ।
खालिले वोळीस स्पर्शेना । अथवा लंबाकार ॥ ६ ॥
ओळीला ओळ लागू नये. रफाराने मात्रा भेदली जाऊ नये. अक्षरांचा खालच्या ओळीला स्पर्श होऊ नये आणि लांबट अक्षर काढू नये. (६)

पान शिषानें रेखाटावें । त्यावरी नेमकचि ल्याहावें ।
दुरी जवळी न व्हावें । अंतर वोळींचे ॥ ७ ॥
पानावर शिशाने रेखा आखून घ्याव्यात. त्यावर मोजकेच शब्द लिहावेत. सर्व ओळींच्यामध्ये सारखे अंतर असावे. ते कमी-जास्त असू नये. (७)

कोठें शोधासी आडेना । चुकी पाहातां सांपडेना ।
गरज केली हें घडेना । लेखकापसुनी ॥ ८ ॥
कोठे शोध घालायचा असेल तर अडू नये. शोधूनही चूक सापडणार नाही असे बिनचूक लिहावे. कुणालाही ते वाचता यावे. वाचायलाही लेखकाची आवश्यकता लागू नये असे लिहावे. (८)

ज्याचें वय आहे नूतन । त्यानें ल्याहावें जपोन ।
जनासी पडे मोहन । ऐसें करावें ॥ ९ ॥
ज्याचे वय लहान आहे त्याने जपून लिहावे. अक्षर पाहूनच लोकांना वाचण्याचा मोह व्हावा, अशा प्रकारे लिहावे. (९)

बहु बारिक तरुणपणीं । कामा नये म्हातारपणीं ।
मध्यस्त लिहिण्याची करणी । केली पाहिजे ॥ १० ॥
फार बारीक लिहिलेले तरुणपणी वाचता येते, पण म्हातारपणी ते उपयोगी पडत नाही. म्हणून मध्यम आकाराचे अक्षर लिहिण्याची सवय केली पाहिजे. (१०)

भोंवतें स्थळ सोडून द्यावें । मधेंचि चमचमित ल्याहावें ।
कागद झडतांहि झडावें । नलगेचि अक्षर ॥ ११ ॥
आपण लेखन करताना सभोवती मोकळी जागा सोडून मध्ये स्पष्ट आणि ठसठशीत लिहावे. काही काळाने समजा, कागद झडला तरी अक्षर झडू नये. (११)

ऐसा ग्रंथ जपोनी ल्याहावा । प्राणी मात्रास उपजे हेवा ।
ऐसा पुरुष तो पाहावा । म्हणती लोक ॥ १२ ॥
ग्रंथ असा जपून काळजीपूर्वक लिहावा की, मनुष्यमात्रांना हेवा वाटावा. ज्यांनी हा ग्रंथ लिहिला त्या पुरुषाला पहावे असे लोकांना वाटावे. (१२)

काया बहुत कष्टवावी । उत्कट कीर्ति उरवावी ।
चटक लाउनी सोडावी । कांहीं येक ॥ १३ ॥
लेखनासाठी भरपूर शरीर कष्टवावे आणि उत्कट कीर्ती मिळवावी. लोकांना चटक लागेल अशाप्रकारे लेखन करावे. (१३)

घट्य कागद आणावे । जपोन नेमस्त खळावे ।
लिहिण्याचे सामे असावे । नानापरी ॥ १४ ॥
घट्ट कागद आणावेत. जपून ते नीट खळावेत. त्यांच्यावर लेखन करण्यासाठी लागणारी नाना प्रकारची सामग्री जवळच असावी. (१४)

सुया कातया जागाईत । खळी घोंटाळें तागाईत ।
नाना सुरंग मिश्रित । जाणोनि घ्यावें ॥ १५ ॥
सुऱ्या, कातऱ्या, समासफळी, खळ घोटण्यासाठी चिवट घोटा, खळ लावण्यासाठी ब्रशासारखे साधन, चाकूला आणि सुरीला धार लावण्यासाठी सुरेख रंगाचे दगड या सर्व वस्तू नीट चांगल्या पाहून घ्याव्यात. (१५)

नाना देसीचे बरु आणावे । घटी बारिक सरळे घ्यावे ।
नाना रंगाचे आणावे । नाना जिनसी ॥ १६ ॥
नाना देशांतील बोरू आणावेत. त्यांतील घट्ट, बारीक आणि सरळ असतील ते वापरायला घ्यावेत. अनेक रंगाचे आणि अनेक प्रकारचे बोरू जवळ संग्रही ठेवावेत. (१६)

नाना जिनसी टांकतोडणी । नाना प्रकारें रेखाटणी ।
चित्रविचित्र करणी । सिसेंलोळ्या ॥ १७ ॥
बोरूची टोके तोडण्यासाठी अनेक प्रकारच्या टाकतोडणी असाव्यात. अनेक प्रकारच्या ओळी आखण्याच्या पट्ट्या किंवा रूळ असावेत. कलाकुसर करावी आणि वजनासाठी शिशाच्या गोळ्या ठेवाव्यात. (१७)

हिंगुळ संग्रहीं असावे । वळले आळिते पाहोन घ्यावे ।
सोपें भिजौनी वाळवावे । संग्रह मसीचे ॥ १८ ॥
हिंगुळ आपल्या संग्रही असावे. वाळलेला आळता पाहून जवळ ठेवावा. निरनिराळ्या शाईच्या गोळ्या वाळवून संग्रही ठेवाव्या. (१८)

तगटी इतिश्रया कराव्या । बंदरी फळ्या घोटाव्या ।
नाना चित्रीं चिताराव्या । उंच चित्रें ॥ १९ ॥
ग्रंथ लिहून पूर्ण झाल्यावर शेवटी ‘इतिश्री’ असे लिहावे. सुरत, मलबार इत्यादी बंदरांहून आणलेल्या फळ्या घोटाव्यात आणि उच्च प्रतीच्या त्या फळ्यांवर उत्तम प्रकारची सुंदर चित्रे काढावीत. (१९)

नाना गोप नाना बासनें । मेणकापडें सिंदुरवणें ।
पेट्या कुलुपें जपणें । पुस्तकाकारणें ॥ २० ॥
ग्रंथ बांधून ठेवण्यासाठी नाना प्रकारचे गोफ, नाना बासने, शेंदरी रंगाची मेणकापडे आणि ग्रंथ सुरक्षित ठेवण्यासाठी पेट्या, कुलुपे वगैरे आणून ग्रंथ जपून ठेवण्यासाठी काळजीपूर्वक प्रयत्न करावेत. हिंगुळ-एक लाल रंगाचा पदार्थ आहे. पारा, गंधक व लाख यांच्या मिश्रणापासून तो तयार करतात.

ग्रंथाचा आरंभ, शेवट आणि ग्रंथातील आकडे यावर तो लावतात. आळिता-कापसाचा वाळवलेला रंगीत बोळा. लाखेपासून तयार केलेल्या तांबड्या रंगामध्ये कापसाचा बोळा भिजवून तो वाळवून ठेवायचा. जरूर लागल्यावर पाण्यात टाकला की तांबडी शाई तयार होते. सोपा-म्हणजे शाईत बुडवून ठेवलेली चिंधी. पूर्वी निरनिराळ्या रंगांच्या शाईमध्ये चिंध्या भिजवून त्या वाळवून जवळ ठेवीत. हवा तेव्हा उपयोग करीत. निरनिराळ्या रंगांच्या शाईचा संग्रह करण्याची अशी पद्धत होती. (२०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
लेखनक्रियानिरूपणनाम समास पहिला ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘लेखनक्रियानिरूपणनाम’ समास पहिला समाप्त.


समास दुसरा : विवरणनिरूपण
॥ श्रीराम ॥

मागां बोलिले लेखनभेद । आतां ऐका अर्थभेद ।
नाना प्रकारीचे संवाद । समजोन घ्यावे ॥ १ ॥
मागील समासात लेखनाच्या भेदाबद्दल सांगितले. आता अर्थभेद ऐका. माणसाने नाना प्रकारचे संवाद समजून घ्यावेत. (१)

शब्दभेद अर्थभेद । मुद्राभेद प्रबंधभेद ।
नाना शब्दाचे शब्दभेद । जाणोनी पाहावे ॥ २ ॥
शब्दभेद, अर्थभेद, मुद्राभेद, प्रबंधभेद, नाना शब्दांचे शब्दभेद जाणून घ्यावेत. (२)

नाना आशंका प्रत्योत्तरें । नाना प्रचित साक्षात्कारें ।
जेणें करितां जगदांतरें । चमत्कारती ॥ ३ ॥
नाना प्रकारच्या शंका आणि त्यांची प्रत्युत्तरे, नाना प्रकारचे अनुभव आणि साक्षात्कार यांच्या घटना त्याने (वक्त्याने) जाणून घ्याव्यात. त्या ऐकन जगातील लोकांना आश्चर्य वाटावे. (३)

नाना पूर्वपक्ष सिद्धांत । प्रत्ययो पाहावा नेमस्त ।
अनुमानाचे स्वस्तवेस्त । बोलोंचि नये ॥ ४ ॥
वक्त्याने नाना पूर्वपक्ष आणि सिद्धान्त यांचा खात्रीपूर्वक अनुभव घेऊन मग बोलावे. अनुमानाने असंबद्ध असे कधीही बोलू नये. (४)

प्रवृत्ति अथवा निवृत्ती । प्रचितीविण अवघी भ्रांती ।
गलंग्यांमधील जगज्जोति । चेतेल कोठें ॥ ५ ॥
प्रवृत्ती असो वा निवृत्ती, अनुभवाशिवाय सर्वव्यर्थ होय. भ्रांतीच होय. गळाठ्यांतील अग्नी जसा चेतत नाही, त्याप्रमाणे केवळ कल्पनेने अनुभवदीप प्रकाशणार नाही. (५)

हेत समजोन उत्तर देणें । दुसयाचे जीवीचें समजणें ।
मुख्य चातुर्याचीं लक्षणें । तें हें ऐसीं ॥ ६ ॥
प्रश्न विचारणाऱ्याच्या मनातील हेतू समजून प्रश्नाचे उत्तर द्यावे. दुसऱ्याच्या अंतरंगातील विचार जाणावेत, ही चातुर्याची लक्षणे आहेत. (६)

चातुर्येंविण खटपट । ते विद्यादि फलकट ।
सभेमधें आटघाट । समाधान कैचें ॥ ७ ॥
ज्याच्या अंगी चातुर्य नसते, त्याचे बोलणे, करणे (त्याची खटपट) सर्व व्यर्थ ठरते. त्याची विद्या फोलपटासारखी अर्थहीन होय. ज्या सभेमध्ये खंडण-मंडणाचा आटपिट चालतो, तेथे समाधान कसे असणार ? (७)

बहुत बोलणें ऐकावें । तेथें मोन्यचि धरावें ।
अल्पचिन्हें समजावें । जगदांतर ॥ ८ ॥
लोकांचे खूप बोलणे ऐकून घ्यावे. आपण तेथे मौनच धरावे. थोड्याशा चिह्नावरून लोकांचे अंतरंग जाणून घ्यावे. (८)

बाष्कळामधें बैसो नये । उद्धटासिं तंडों नये ।
आपणाकरितां खंडों नये । समाधान जनाचें ॥ ९ ॥
स्वच्छंदपणाने वागणा-या लोकांत बसू नये. उद्धट माणसाबरोबर भांडणतंटा करू नये. आपल्या वागण्याने लोकांचे समाधान भंगणार नाही, याची काळजी घ्यावी. (९)

नेणतपण सोडूं नये । जाणपणें फुगो नये ।
नाना जनाचें हृदये । मृद शब्दें उकलावें ॥ १० ॥
आपले नेणतेपण सोडू नये. जाणतेपणाने ताठ्याने वागू नये. आपल्या मृदु भाषणाने अनेक लोकांची हृदये उकलावीत. (१०)

प्रसंग जाणावा नेटका । बहुतांसी जाझु नका ।
खरें असतांचि नासका । फड होतो ॥ ११ ॥
प्रसंग कसा आहे हे नीट समजून घ्यावे. अनेकांशी उगीच झगडा करू नये. त्यामुळे आपले म्हणणे खरे असले तरी सभेच्या रंगाचा बेरंग होतो. (११)

शोध घेतां आळसों नये । भ्रष्ट लोकीं बैसों नये ।
बैसलें तरी टाकूं नये । मिथ्या दोष ॥ १२ ॥
कुठल्याही गोष्टीचा शोध घेण्यात आळस करू नये. भ्रष्ट लोकांत बसू नये. समजा, बसावे लागले तरी खोटे दोषारोपण करू नये. (१२)

अंतर आर्ताचें शोधावें । प्रसंगीं थोडें चि वाचावें ।
चटक लाउनी सोडावें । भल्या मनुष्यासी ॥ १३ ॥
जो कोणी दुःखी असेल त्याच्या अंतरातील दुःख जाणून घ्यावे व ते दूर करण्याचा प्रयत्न करावा. प्रसंगी थोडेच वाचावे. पण भल्या माणसांना आपली चटक लावून सोडावे. (१३)

मज्यालसींत बैसों नये । समाराधनेसी जाऊं नये ।
जातां येळीलवाणें होये । जिणें आपुलें ॥ १४ ॥
सभेत बसू नये. जेथे मुक्तद्वार अन्नसंतर्पण असते, तेथे भोजन करण्यास जाऊ नये. जर गेलो तर आपले जिणे ओशाळवाणे होते. (१४)

उत्तम गुण प्रगटवावे । मग भलत्यासी बोलतां फावे ।
भले पाहोन करावे । शोधून मित्र ॥ १५ ॥
आपल्या अंगचे उत्तम गुण प्रकट करावेत म्हणजे मग कुणाशीही बोललो तरी आपली किंमत राहाते. उत्तम माणसे पारखून मग त्यांच्याशी मैत्री करावी. (१५)

उपासनेसारिखें बोलावें । सर्व जनासि तोषवावें ।
सगट बरेंपण राखावें । कोण्हीयेकासी ॥ १६ ॥
उपासनेला साजेल असे बोलावे. सर्व लोकांना संतुष्ट करावे. सरसकट सर्व लोकांशी चांगले संबंध राखावेत. (१६)

ठाईं ठाईं शोध घ्यावा । मग ग्रामीं प्रवेश करावा ।
प्राणीमात्र बोलवावा । आप्तपणें ॥ १७ ॥
कुठल्याही गावात प्रवेश करण्यापूर्वी ठिकठिकाणी माहिती गोळा करून मग प्रवेश करावा. तेथे सर्वांशी आपलेपणाने वागावे. (१७)

उंच नीच म्हणों नये । सकळांचें निववावें हृदये ।
अस्तमानीं जाऊं नये । कोठें तर्‍ही ॥ १८ ॥
त्यात उच्च-नीच भाव ठेवू नये. सर्वांचे हृदय निववावे. सूर्यास्तानंतर उगीच भलतीकडे जाऊ नये. (१८)

जगामधें जगमित्र । जिव्हेपासीं आहे सूत्र ।
कोठें र्‍ही सत्पात्र । शोधून काढावें ॥ १९ ॥
जगात सर्वांशी मैत्री करायची असेल, तर त्याचे सूत्र आपल्या जिव्हेपाशी आहे. म्हणजे आपण जर गोड बोललो तर सर्वांशी मैत्री जुळते. आपण जेथे जाऊ तेथील उत्तम माणसे शोधून काढावीत. (१९)

कथा होती तेथें जावें । दुरी दीनासारिखें बैसावें ।
तेथील सकळ हरद्र घ्यावें । अंतर्यामीं ॥ २० ॥
गावात जेथे कथा होत असेल, तेथे आपण जावे, पण दूर दीनांसारखे बसावे आणि अंतर्यामी तेथील सर्व वर्म जाणून घ्यावे. (२०)

तेथें भले आडळती । व्यापा ते हि कळों येती ।
हळुहळु मंदगती । रीग करावा ॥ २१ ॥
तेथे भले लोकही आढळतात. विशाल अंत:करणाचेही लोक कोणते हेही कळून येते. मग हळहळ मंदगतीने तिथे शिरकाव करावा. (२१)

सकळामधें विशेष श्रवण । श्रवणाहुनी थोर मनन ।
मननें होये समाधान । बहुत जनाचें ॥ २२ ॥
सर्व साधनांत श्रवणाचे फार महत्त्व आहे. पण श्रवणाहूनही मनन श्रेष्ठ आहे. अनेक लोकांचे समाधान मननानेच होते. (२२)

धूर्तपणें सकळ जाणावें अंतरीं अंतर बाणावें ।
समजल्याविण सिणावें । कासयासी ॥ २३ ॥
धूर्तपणाने सर्व काही जाणून घ्यावे. आणि आपल्या अंतर्यामी लोकांचे अंतरंग समजून घ्यावे. समजल्याशिवाय उगीच शिणण्यात काय अर्थ आहे ? (२३)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
विवरणनिरूपणनाम समास दुसरा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘विवरणनिरूपणनाम’ समास दुसरा समाप्त.


समास तिसरा : करंटलक्षणनिरूपण
॥ श्रीराम ॥

सुचित करूनी अंतःकर्ण । ऐका करंटलक्षण ।
हें त्यागितां सदेवलक्षण । आंगीं बाणें ॥ १ ॥
अंत:करण एकाग्र करून आता करंट लक्षण ऐका. या करंटलक्षणाचा त्याग केल्याने सदेवलक्षण अंगी बाणते. (१)

पापाकरितां दरिद्र प्राप्त । दरिद्रें होये पापसंचित ।
ऐसेंचि होत जात । क्षणक्षणा ॥ २ ॥
पूर्वजन्मीच्या पापामुळे दायि प्राप्त होते. दायिामुळे आणखी पाप होते. असे हे क्षणोक्षणी होत राहाते. (२)

याकारणें करंटलक्षणें । ऐकोनी त्यागचि करणें ।
म्हणिजे कांहीं येक बाणें । सदेवलक्षण ॥ ३ ॥
म्हणून अभागी माणसाची लक्षणे ऐकून घेऊन त्यांचा त्यागच करावा, म्हणजे मग भाग्यवान माणसाचे लक्षण थोडेफार अंगी बाणते. (३)

करंट्यास आळस आवडे । यत्‍न कदापि नावडे ।
त्याची वासना वावडे । अधर्मीं सदा ॥ ४ ॥
करंट्या माणसाला आळसच आवडतो. त्याला प्रयत्न करणे कधीही आवडत नाही. त्याची वासना सदा अधर्मातच वावरते. (४)

सदा भ्रमिष्ट निदसुरा । उगेंचि बोले सैरावैरा ।
कोणीयेकाच्या अंतरा । मानेचिना ॥ ५ ॥
तो सदा भ्रमिष्टासारखा आणि जणू अर्धवट झोपेत असल्यासारखाच वागतो. उगीच अवाच्या सवा बोलत राहातो. त्याचे कुणाशी पटतच नाही. (५)

लेहों नेणे वाचूं नेणे । सवदासुत घेऊं नेणे ।
हिशेब कितेब राखों नेणे । धारणा नाहीं ॥ ६ ॥
त्याला लिहायला येत नाही, वाचायला येत नाही. बाजारहाट करता येत नाही. हिशोब जमाखर्च लिहिता येत नाही. त्याचप्रमाणे त्याच्या लक्षातही काही राहात नाही किंवा कुठल्याही गोष्टीवर तो मन एकाग्र करू शकत नाही. (६)

हारवी सांडी पाडी फोडी । विसरे चुके नाना खोडी ।
भल्याचे संगतीची आवडी । कदापी नाहीं ॥ ७ ॥
तो सदा वस्तू हरवतो, सांडतो, पाडतो, फोडतो किंवा विसरतो. नाना प्रकारे चुका करतो. अशा नाना खोडी त्याच्या अंगी असतात. त्याला भल्या माणसाच्या संगतीची आवड कधीही नसते. (७)

चाट गडी मेळविले । कुकर्मी मित्र केले ।
खट नट येकवटिले । चोरटे पापी ॥ ८ ॥
तो कुकर्मी, चावट लोक गोळा करतो. त्यांच्याशीच मैत्री करतो. दुष्ट आणि नष्ट असे चोरटे आणि पापी लोक एकत्र जमतात. (८)

ज्यासीं त्यासीं कळकटा । स्वयें सदाचा चोरटा ।
परघातकी धाटामोटा । वाटा पाडी ॥ ९ ॥
तो ज्याच्या-त्याच्याशी भांडणारा असतो. स्वतः सदा चोऱ्या करतो. धष्टपुष्ट, दांडगा असून लोकांचा घात करणारा व वाटमान्य असतो. (९)

दीर्घ सूचना सुचेचिना । न्याय नीति हे रुचेना ।
पराभिळासीं वासना । निरंतर ॥ १० ॥
करंट्या माणसाला दूरदृष्टी नसते. न्याय, नीती रुचत नाही. दुसऱ्याचे लुबाडण्याची वासना निरंतर त्याच्या ठिकाणी असते. (१०)

आळसें शरीर पाळिलें । परंतु पोटेंविण गेलें ।
सुडकें मिळेनासें जालें । पांघराया ॥ ११ ॥
तो प्रथम आळसाने शरीर पाळतो पण पुढे त्याला खायला अन्न मिळत नाही की पांघरायला सुडके, फाटकेतुटके वस्त्रही मिळत नाही, अशी स्थिती होते. (११)

आळसे शरीर पाळी । अखंड कुंसी कांडोळी ।
निद्रेचे पाडी सुकाळीं । आपणासी ॥ १२ ॥
असा आळसाने शरीर पोसणारा करंटा माणूस अखंड कुशी खाजवत बसतो किंवा आपल्याला खुशाल निद्रेच्या स्वाधीन करतो. (१२)

जनासीं मीत्री करीना । कठिण शब्द बोले नाना ।
मूर्खपणें आवरेना । कोणीयेकासी ॥ १३ ॥
तो कोणाशीही मैत्री करत नाही. ज्याला त्याला नाना प्रकारे कठोर शब्द बोलतो. स्वत:च्या मूर्खपणामुळे तो कोणालाही आवरेनासा होतो. (१३)

पवित्र लोकांमधें भिडावे । वोंगळामधें निशंक धांवे ।
सदा मनापासून भावे । जननिंद्य क्रिया ॥ १४ ॥
पवित्र लोकांमध्ये जायला त्याला भीड, संकोच वाटतो. आणि ओंगळ लोकांकडे तो नि:शंकपणे धाव घेतो. त्याला नेहमी लोकांमध्ये ज्या निंद्य मानल्या जातात त्या गोष्टी करायलाच मनापासून आवडते. (१४)

तेथें कैचा परोपकार । केला बहुतांचा संव्हार ।
पापी अनर्थी अपस्मार । सर्वाबद्धी ॥ १५ ॥
अशा माणसांकडून परोपकार कसा घडणार ? त्याने अनेकांचा संहार केलेला असतो. तो पापी, अनर्थ घडवून आणणारा, पिशाच्चवत् वागणारा, सर्व दृष्टीने असंबद्ध असतो. (१५)

शब्द सांभळून बोलेना । आवरितां आवरेना ।
कोणीयेकासी मानेना । बोलणें त्याचें ॥ १६ ॥
तो शब्द सांभाळून कधी बोलत नाही. एकदा बोलायला लागला की तो कुणालाही आवरता आवरत नाही. त्याचे बोलणे कुणाला आवडत नाही. (१६)

कोणीयेकास विश्वास नाहीं । कोणीयेकासीं सख्य नाहीं ।
विद्या वैभव कांहींच नाहीं । उगाचि ताठा ॥ १७ ॥
त्याचा कुणावरही विश्वास नसतो. त्याचे कुणाशीही सख्य नसते. त्याच्या अंगी विद्या अथवा वैभव वगैरे काहीच नसते. फक्त उगीचच ताठा मात्र असतो. (१७)

राखावीं बहुतांची अंतरें । भाग्य येतें तदनंतरें ।
ऐसीं हें विवेकाचीं उत्तरें । ऐकणार नाहीं ॥ १८ ॥
त्याला जर ‘आधी अनेकांची अंतरे राखावीत म्हणजे मग त्यानंतर भाग्य उदयास येते. ‘ यासारखी विवेकाची उत्तरे शिकवू लागावे, तर तो ऐकूनच घेत नाही. (१८)

स्वयें आपणास कळेना । शिकविलें तें ऐकेना ।
तयासी उपाय नाना । काये करिती ॥ १९ ॥
त्याला स्वत:ला तर काही कळत नाहीच, पण शिकविले तरी ते ऐकत नाही. त्याला नाना उपाय केले तरी काय होणार आहे ? (१९)

कल्पना करी उदंड कांहीं । प्राप्तव्य तों कांहींच नहीं ।
अखंड पडिला संदेहीं । अनुमानाचे ॥ २० ॥
तो उदंड नाना कल्पना करीत राहातो, पण त्याने काहीही प्राप्त होत नाही. तो नेहमी अनुमानाच्यामुळे संदेहात पडलेला असतो. (२०)

पुण्य मार्ग संडिला मनें । पाप झडावें काशानें ।
निश्चय नाहीं अनुमानें । नास केला ॥ २१ ॥
मनाने त्याने पुण्यमार्गाचा त्याग केलेला असतो, तर त्याचे पाप नष्ट तरी कसे होणार ? मनात कुठल्याही गोष्टीसंबंधी निश्चय नसल्याने केवळ कल्पना करीत राहिल्याने त्याचा नाश होतो. (२१)

कांहींयेक पुर्तें कळेना । सभेमधें बोलों राहेना ।
बाष्कळ लाबाड ऐसें जना । कळों आलें ॥ २२ ॥
त्याला काहीही पुरते कळत नाही. मात्र सभेमध्ये तो बोलल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे लोकांना तो थापाड्या, लबाड आहे, हे कळून येते. (२२)

कांहीं नेमकपण आपुलें । बहुत जनासी कळों आलें ।
तेंचि मनुष्य मान्य जालें । भूमंडळीं ॥ २३ ॥
ज्या माणसाच्या वागण्यात निश्चितपणा, नियमितपणा आहे असे अनेक लोकांना अनुभवावरून कळून येते, तोच माणूस या जगात मान्य होतो. (२३)

झिजल्यावांचून कीर्ति कैंची । मान्यता नव्हे कीं फुकाची ।
जिकडे तिकडे होते ची ची । अवलक्षणें ॥ २४ ॥
माणूस झिजल्याशिवाय त्याला कीर्ती मिळत नाही. लोकांची मान्यता काही फुकटची मिळत नाही. अवलक्षणी माणसाची जिकडे-तिकडे छीथू होते ! (२४)

भल्याची संगती धरीना । आपणासी शाहाणे करीना ।
तो आपला आपण वैरी जाणा । स्वहित नेणे ॥ २५ ॥
जो माणूस भल्यांची संगती धरीत नाही, आपले आपणास शहाणा करीत नाही, तो आपले स्वहित जाणत नसल्याने स्वत:च स्वत:चा वैरी बनतो. (२५)

लोकांसी बरें करवें । तें उसिणें सवेंचि घ्यावें ।
ऐसें जयाच्या जीवें । जाणिजेना ॥ २६ ॥
आपण लोकांचे बरे केले की, तेही आपले बरे करतात. हे त्या करंट्या जीवाला कळतच नाही. (२६)

जेथें नाहीं उत्तम गुण । तें करंट्याचें लक्षण ।
बहुतांसीं न मने तें अवलक्षण । सहजचि जालें ॥ २७ ॥
जेथे उत्तम गुण नाही, ते करंटेपणाचे लक्षण जाणावे. जे पुष्कळांना मान्य होत नाही ते सहजच अवलक्षण असे समजावे. (२७)

कार्याकारण सकळ कांहीं । कार्येंविण तो कांहींच नाहीं ।
निकामी तो दुःखप्रवाहीं । वाहातचि गेला ॥ २८ ॥
जगातील सर्व व्यवहार सापेक्ष असतात. आपण जर कोणाच्या उपयोगी पडलो, तरच तो आपले कार्य करतो. निरुपयोगी मनुष्य दुर्लक्षित झाल्याने नेहमीच दुःखप्रवाहात वाहातच जातो. (२८)

बहुतांसीं मान्य थोडा । त्याच्या पापासी नाहीं जोडा ।
निराश्रई पडे उघडा । जेथें तेथें ॥ २९ ॥
जो पुष्कळांना मान्य नसतो, त्याच्या पापाला जोड नाही. तो पापी जाणावा. त्यास कोणी आश्रय देत नसल्याने जिथे तिथे तो उघडा पडतो. (२९)

याकारणें अवगुण त्यागावे । उत्तम गुण समजोन घ्यावें ।
तेणें मनासारिखें फावे । सकळ कांहीं ॥ ३० ॥
म्हणून माणसाने अवगुणांचा त्याग करून, उत्तम गुण कोणते हे जाणून ते घ्यावेत, म्हणजे सर्व काही त्याच्या मनासारखे होते. (३०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
करंटलक्षणनिरूपणनाम समास तिसरा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘करंटलक्षणनिरूपणनाम’ समास तिसरा समाप्त.


समास चौथा : सदेवलक्षणनिरूपण
॥ श्रीराम ॥

मागां बोलिले करंटलक्षण । तें विवेकें सांडावें संपूर्ण ।
आतां ऐका सदेवलक्षण । परम सौख्यदायेक ॥ १ ॥
मागील समासात करंट लक्षणाचे वर्णन केले. ते विवेकाने संपूर्ण सोडावे. आता परम सौख्यदायक असे भाग्यवान माणसाचे, लक्षण सांगतो, ते ऐका. (१)

उपजतगुण शरीरीं । परोपकारी नानापरी ।
आवडे सर्वांचे अंतरीं । सर्वकाळ ॥ २ ॥
काही माणसांच्या अंगी उपजतच काही गुण असतो. तो अनेक प्रकारे परोपकार करीत असल्याने सर्वकाळ सर्वांना अंत:करणापासून आवडतो. (२)

सुंदर अक्षर लेहो जाणे । चपळ शुद्ध वाचूं जाणे ।
अर्थांतर सांगों जाणे । सकळ कांहीं ॥ ३ ॥
सुंदर अक्षर कसे लिहावे, हे तो जाणतो. भराभर आणि शुद्ध कसे वाचावे हे त्याला बरोबर कळते. वाचलेल्या मजकुराचा सर्व अर्थ अगदी स्पष्ट करून कसा सांगावा, हे त्याला माहीत असते. (३)

कोणाचें मनोगत तोडिना । भल्यांची संगती सोडिना ।
सदेवलक्षण अनुमाना । आणून ठेवी ॥ ४ ॥
तो कुणाचेही अंत:करण दुखवीत नाही. चांगल्या माणसांची संगत कधी सोडत नाही. भाग्यवंताच्या लक्षणाची त्याला चांगली कल्पना असते. (४)

तो सकळ जनासी व्हावा । जेथें तेथें नित्य नवा ।
मूर्खपणें अनुमानगोवा । कांहींच नाहीं ॥ ५ ॥
तो सर्व लोकांना हवाहवासा वाटतो. जेथे जेथे तो जातो तेथील लोकांना दरवेळी तो नवाच वाटतो. मूर्खपणामुळे केल्या जाणाऱ्या कल्पनेला त्याच्या ठिकाणी वावच नसतो. (५)

नाना उत्तम गुण सत्पात्र । तेचि मनुष्य जगमित्र ।
प्रगट कीर्ती स्वतंत्र । पराधेन नाहीं ॥ ६ ॥
ज्याच्या ठिकाणी अनेक उत्तम गुण असतात, तोच सत्पात्र माणूस जगमित्र होऊ शकतो. त्याच्या उत्तम गणांच्या प्रगटीकरणामुळे आपोआपच त्याला कीर्ती मिळते. ती स्वतंत्रपणे सर्वत्र पसरते. तिला दुसऱ्या कशाचा आधार घ्यावा लागत नाही. (६)

राखे सकळांचें अंतर । उदंड करी पाठांतर ।
नेमस्तपणाचा विसर । पडणार नाहीं ॥ ७
तो सर्वांचे अंतःकरण संभाळतो, उदंड पाठांतर करतो. नियमितपणाचा त्याला कधी विसर पडत नाही. (७)

नम्रपणें पुसों जाणे । नेमस्त अर्थ सांगों जाणे ।
बोलाऐसें वर्तों जाणे । उत्तम क्रिया ॥ ८ ॥
लोकांना नम्रपणे कसे विचारावे, हे तो जाणतो. ग्रंथाचा निश्चित अर्थ सांगण्याचे कौशल्य त्याच्याजवळ असते. तो जसे बोलतो त्याप्रमाणेच उत्तम आचरण कसे करावे हेही तो जाणतो. (८)

तो मानला बहुतांसी । कोणी बोलों न शके त्यासी ।
धगधगीत पुण्यरासी । माहांपुरुष ॥ ९ ॥
जो अनेक जणांना मान्य असतो, त्याला कोणी बोलू शकत नाही. तो अत्यंत तेजस्वी आणि पुण्यवान महापुरुष असतो. (९)

तो परोपकार करितांचि गेला । पाहिजे तो ज्याला त्याला ।
मग काय उणें तयाला । भूमंडळीं ॥ १० ॥
तो नेहमी परोपकारच करीत असतो, त्यामुळे ज्यालात्याला तो हवासा वाटतो. मग त्याला या जगात काय कमी पडणार आहे ? (१०)

बहुत जन वास पाहे । वेळेसी तत्काळ उभा राहे ।
उणें कोणाचें न साहे । तया पुरुषासी ॥ ११ ॥
अनेक लोक त्याची वाट पाहात असतात. कुणाच्याही अडचणीच्या वेळी तो मदतीला तयार असतो. त्या पुरुषाला कुणाचेही उणे सहन होत नाही. (११)

चौदा विद्या चौसष्टी कळा । जाणे संगीत गायेनकळा ।
आत्मविद्येचा जिव्हाळा । उदंड तेथें ॥ १२ ॥
त्याच्याजवळ चौदा विद्या आणि चौसष्ट कला यांचे ज्ञान असते. त्याला संगीताची उत्तम जाण असते आणि गायनकलाही अवगत असते. त्याच्यापाशी आत्मविद्येचा उदंड जिव्हाळा असतो. (१२)

सकळांसी नम्र बोलणें । मनोगत राखोन चालणें ।
अखंड कोणीयेकाचे उणें । पडोंचि नेदी ॥ १३ ॥
तो सर्वांशी नम्रतेने बोलतो. त्याचे मनोगत जाणून त्यांना सुख होईल, अशा प्रकारे वागतो. सदैव कुणाचेही उणे तो पडूच देत नाही. (१३)

न्याय नीति भजन मर्याद । काळ सार्थक करी सदा ।
दरिद्रपणाची आपदा । तेथें कैची ॥ १४ ॥
न्याय, नीती, भजन आणि मर्यादा यांविषयी तो सावध असतो आणि आपला वेळ सर्वदा सार्थकी लावतो. मग तेथे दारिद्र्याचे संकट कसे असू शकेल ? (१४)

उत्तम गुणें श्रृंघारला । तो बहुतांमधें शोभला ।
प्रगट प्रतापें उगवला । मार्तंड जैसा ॥ १५ ॥
जो उत्तम गुणांनी संपन्न असतो, तो अनेक लोकांत शोभून दिसतो. सूर्य जसा आपल्या तेजाने, प्रतापाने प्रगट होताच जग उजळून टाकतो, तसेच याच्या गुणांमुळे तो त्याच्या तेजाने लोकांना दिपवून टाकतो. (१५)

जाणता पुरुष असेल जेथें । कळहो कैचा उठेल तेथें ।
उत्तम गुणाविषीं रितें । तें प्राणी करंटे ॥ १६ ॥
जेथे जाणता पुरुष असतो, तेथे कलह उत्पन्न होत नाही. ज्यांच्याजवळ उत्तम गुण नसतात ते प्राणी करंटे, भाग्यहीन असतात. (१६)

प्रपंची जाणे राजकारण । परमार्थीं साकल्य विवरण ।
सर्वांमधें उत्तम गुण । त्याचा भोक्ता ॥ १७ ॥
प्रपंचात तो मुत्सद्दीपणे वागतो. परमार्थात साकल्याने अध्यात्माचे विवरण कसे करावे हे तो जाणतो. तो लोकांच्या उत्तम गुणांची कदर करतो. (१७)

मागें येक पुढें येक । ऐसा कदापी नाहीं दंडक ।
सर्वत्रांसीं अलोलिक । तया पुरुषाची ॥ १८ ॥
मागे एक, पुढे एक अशी त्याची वागण्याची रीत कधीही नसते, म्हणून त्या पुरुषाचे सर्वांना खुप कौतुक वाटते. (१८)

अंतरासी लागेल ढका । ऐसी वर्तणूक करूं नका ।
जेथें तेथें विवेका । प्रगट करी ॥ १९ ॥
लोकांचे अंतःकरण दुखावेल असे वर्तन तो कधीही करीत नाही. प्रत्येक ठिकाणी तो अत्यंत विचाराने वागतो. (१९)

कर्मविधी उपासनाविधी । ज्ञानविधी वैराग्यविधी ।
विशाळ ज्ञात्रुत्वाची बुद्धी । चळेल कैसी ॥ २० ॥
कर्म, उपासना, ज्ञान आणि वैराग्य या सर्वांतच तो पारंगत असतो. अशी विशाल ज्याची प्रज्ञा आहे, त्याची बुद्धी चळेल तरी कशी ? (२०)

पाहातां अवघे उत्तम गुण । तयास वाईट म्हणेल कोण ।
जैसा आत्मा संपूर्ण । सर्वां घटीं ॥ २१ ॥
त्याचे सर्व उत्तम गुण पाहिल्यावर त्याला वाईट कोण म्हणेल ? जसा आत्मा सर्व प्राणिमात्रांच्या अंत:करणात संपूर्णपणे वास करतो, तसे तोही आपल्या प्रेमाने सर्वांच्या अंत:करणात स्थान मिळवतो. (२१)

आपल्या कार्यास तत्पर । लोक असती लाहानथोर ।
तैसाचि करी परोपकार । मनापासुनी ॥ २२ ॥
तो आपल्या कार्यात अत्यंत तत्पर असतो. लहानथोर कुणीही असो, दुसऱ्याचे कार्य ते आपलेच कार्य असे समजून मनापासून परोपकार करतो. (२२)

दुसर्‍याच्या दुःखें दुखवे । दुसयाच्या सुखें सुखावे ।
आवघेचि सुखी असावे । ऐसी वासना ॥ २३ ॥
तो दुस-याच्या दु:खाने दु:खी होतो आणि दुसयाच्या सुखाने सुखी होतो. सर्वच लोक सुखी असावेत, अशीच त्याची वासना असते. (२३)

उदंड मुलें नानापरी । वडिलांचें मन अवघ्यांवरी ।
तैसी अवघ्यांची चिंता करी । माहांपुरुष ॥ २४ ॥
एखाद्या माणसाला खूप मुले असतात आणि वडिलांचे सर्वांवरच प्रेम असते. त्याप्रमाणे असा महापुरुषही सर्वांच्याच कल्याणाची चिंता करतो. (२४)

जयास कोणाचें सोसेना । तयाची निःकांचन वासना ।
धीकारिल्या धीकारेना । तोचि महापुरुष ॥ २५ ॥
ज्याला कुणाचेही अकल्याण सोसवत नाही आणि ज्याला चुकूनही पैशाची वासना होत नाही, अशा महापुरुषाचा कुणी धिक्कार केला तरी तो मात्र कुणाचा धिक्कार करीत नाही. (२५)

मिथ्या शरीर निंदलें । तरी याचें काये गेलें ।
ज्ञात्यासी आणि जिंतिलें । देहेबुद्धीनें ॥ २६
एखाद्याने निंदा केली, तरी ती मिथ्या असलेल्या शरीराची असते, मग त्यात आपले काय गेले, अशी त्याची भावना असते. ज्ञाता आहे आणि त्यास देहबुद्धीने जिंकले, असे कधी होईल का ? (२६)

हें अवघें अवलक्षण । ज्ञाता देहीं विलक्षण ।
कांहीं र्‍ही उत्तम गुण । जनीं दाखवावे ॥ २७ ॥
देहबुद्धीने जिंकले जाणे हे अवलक्षण आहे. पण ज्ञाता हा देहधारी असूनही स्वार्थरहित आणि आत्मनिष्ठ असा विलक्षण असतो. माणसाने काही ना काही उत्तम गुण लोकांत दाखवावेत. (२७)

उत्तम गुणास मनुष्य वेधे । वाईट गुणासी प्राणी खेदे ।
तीक्षण बुद्धि लोक साधें । काये जाणती ॥ २८ ॥
उत्तम गुणांनी मनुष्य आकर्षित होतात. वाईट गुणांमुळे लोकांना खेद होतो. ज्ञात्याची बुद्धी अत्यंत तीक्ष्ण (सूक्ष्म) असते. सर्वसामान्य लोक ती जाणू शकत नाहीत. (२८)

लोकीं अत्यंत क्षमा करिती । आलियां लोकांचे प्रचिती ।
मग ते लोक पाठी राखती । नाना प्रकारीं ॥ २९ ॥
लोकांनी अपराध केले तरी तो लोकांना अत्यंत क्षमा करतो. त्याच्या क्षमाशीलतेचा अनुभव लोकांना आला की ते त्याची नाना प्रकारे पाठ राखतात. (२९)

बहुतांसी वाटे मी थोर । सर्वमान्य पाहिजे विचार ।
धीर उदार गंभीर । माहांपुरुष ॥ ३० ॥
अनेक लोकांना असे वाटते की, आपण थोर आहोत. पण सर्व लोकांनी तो थोर आहे हे मान्य व्हावयास हवे. जे महापुरुष असतात, ते नेहमी धीर, उदार आणि गंभीर असतात. (३०)

जितुके कांहीं उत्तम गुण । तें समर्थाचें लक्षण ।
अवगुण तें करंटलक्षण । सहजचि जालें ॥ ३१ ॥
जेवढे म्हणून उत्तम गुण आहेत, ते समर्थ पुरुषाचे लक्षण समजावे. मग अवगुण हे सहजच करंटेपणाचे लक्षण ठरते. (३१)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सदेवलक्षणनिरूपणनाम समास चौथा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘सदेवलक्षणनिरूपणनाम’ समास चौथा समाप्त.


समास पाचवा : देहमान्यनिरूपण
॥ श्रीराम ॥

मातीचे देव धोंड्याचे देव । सोन्याचे देव रुप्याचे देव ।
काशाचे देव पितळेचे देव । तांब्याचे देव चित्रलेपे ॥ १ ॥
या जगात देवांचे अनेक प्रकार आहेत. मातीचे देव, धोंड्याचे देव, सोन्याचे देव, रुप्याचे देव, काशाचे देव, पितळेचे देव, तांब्याचे देव आणि गंधाच्या लेपाने काढलेले चित्ररूपी देव. (१)

रुविच्या लांकडाचे देव पोंवळ्य्यांचे देव । बाण तांदळे नर्मदे देव ।
शालिग्राम काश्मिरी देव । सूर्यकांत सोमकांत ॥ २ ॥
याशिवाय रुईच्या लाकडाचे देव, पोवळ्याचे देव. बाण, तांदळे, नर्मदे देव, शाळिग्राम, काश्मीरी देव तसेच सूर्यकांत, सोमकांत, (२)

तांब्रनाणीं हेमनाणी । कोणी पूजिती देवार्चनीं ।
चक्रांगीत चक्रतीर्थाहुनी । घेऊन येती ॥ ३ ॥
याखेरीज तांब्याची नाणी, सोन्याची नाणी यांचीही देव म्हणून पूजा लोक करतात. कुणी चक्रतीर्थाहून चक्रांकित शाळिग्राम घेऊन येतात. (३)

उदंड उपासनेचे भेद । किती करावे विशद ।
आपलाले आवडीचा वेध । लागला जनीं ॥ ४ ॥
उपासनेचे उदंड भेद आहेत. कितींचे स्पष्टीकरण करणार ? लोकांना आपापल्या आवडीच्या देवाचा वेध लागलेला असतो. (४)

परी त्या सकळांचें हि कारण । मुळीं पाहावें स्मरण ।
तया स्मरणाचे अंश जाण । नाना देवतें ॥ ५ ॥
पण त्या सगळ्या देवांचे कारण ‘एकोऽहं’ हे आद्यस्फुरण म्हणजेच मूळमाया हेच आहे. त्या स्मरणाचे अंश म्हणजे नाना दैवते होत. (५)

मुळीं द्रष्टा देव तो येक । त्याचे जाहाले अनेक ।
समजोन पाहातां विवेक । उमजों लागे ॥ ६ ॥
मूळ द्रष्टा देव एकच आहे. त्याचेच अनेक देव झाले. विवेक करून नीट पाहिले की उमजू लागते. (६)

देह्यावेगळी भक्ति फावेना । देह्यावेगळा देव पावेना ।
याकारणें मूळ भजना । देहेचि आहे ॥ ७ ॥
देहाशिवाय भक्ती करता येत नाही. देहाशिवाय देव पावत नाही. म्हणून भजनाचे मूळ देहच आहे. (७)

देहे मुळींच केला वाव । तरी भजनासी कैंचा ठाव ।
म्हणोनी भजनाचा उपाव । देह्यात्मयोगें ॥ ८ ॥
देह मुळात मिथ्या आहे, असे जर म्हटले, तर भजनाला कुठला वाव मिळणार ? म्हणून देह आणि अंतरात्मा यांच्या एकत्रित येण्याने भजनाचा उपाय करता येतो. (८)

देहेंविण देव कैसा भजावा । देहेंविण देव कैसा पुजावा ।
देह्याविण मोहछाव कैसा करावा । कोण्या प्रकारें ॥ ९ ॥
देहाशिवाय देवाचे भजन कसे करावे ? देहाविना देव कसा पूजावा ? देहाशिवाय महोत्सव कसा आणि कोणत्या प्रकारे करावा ? (९)

अत्र गंध पत्र पुष्प । फल तांबोल धूप दीप ।
नाना भजनाचा साक्षेप । कोठें करावा ॥ १० ॥
. अत्तर, गंध, पत्र, पुष्प, फल, तांबूल, धूप, दीप तसेच नाना प्रकारच्या भजनाचा उद्योग देहाशिवाय कोठे करावा ? (१०)

देवाचें तीर्थ कैसें घ्यावें । देवासी गंध कोठें लावावें ।
मंत्रपुष्प तरी वावें । कोणें ठाईं ॥ ११ ॥
देवाचे तीर्थ कसे घ्यावे, देवाला गंध कोठे लावावे, मंत्रपुष्प तरी कुठे वहावे ? (११)

म्हणोनी देह्याविण आडतें । अवघें सांकडेंचि पडतें ।
देह्याकरितां घडतें । भजन कांहीं ॥ १२ ॥
म्हणून देहाशिवाय अडते. सर्व कोडेच पडते. देहामुळेच काही ना काही भजन घडते. (१२)

देव देवता भूतें देवतें । मुळींचे सामर्थ्ये आहे तेथें ।
अधिकारें नाना देवतें । भजत जावीं ॥ १३ ॥
देव, देवता, भूते, दैवते या सर्वांच्या ठिकाणी मूळमायेचे, ईश्वराचे सामर्थ्य आहे. योग्यतेप्रमाणे नाना दैवते भजत जावीत. (१३)

नाना देवीं भजन केलें । तें मूळ पुरुषासी पावलें ।
याकारणें सन्मानिलें । पाहिजे सकळ कांहीं ॥ १४ ॥
नाना प्रकारच्या देवांचे भजन केले तरी ते मूळ ईश्वरालाच प्राप्त होते. म्हणून सर्वच देवतांचा सन्मान केला पाहिजे. (१४)

मायावल्ली फांपावली । नाना देहेफळीं लगडली ।
मुळींची जाणीव कळों आली । फळामधें ॥ १५ ॥
मायारूपी वेल फोफावली असून नाना देहरूपी फळांनी लगडली आहे. मूळची जी जाणीव फळांमध्येही दिसून आली. (१५)

म्हणोनी येळील न करावें । पाहाणें तें येथेंचि पाहावें ।
ताळा पडतां राहावें । समाधानें ॥ १६ ॥
म्हणून कंटाळा करू नये. जे काही पाहायचे असेल ते येथेच पाहावे. अनुभव आला की समाधानात रहावे. (१६)

प्राणी संसार टाकिती । देवास धुंडीत फिरती ।
नाना अनुमानीं पडती । जेथ तेथें ॥ १७ ॥
प्राणी संसार सोडतात आणि देवाला धुंडीत फिरतात आणि जेथे-तेथे नाना प्रकारच्या अनुमानात पडतात. (१७)

लोकांची पाहातां रिती । लोक देवार्चनें करिती ।
अथवा क्षत्रदेव पाहाती । ठाईं ठाईं ॥ १८ ॥
लोक एकमेकांची रीत पाहून देवतार्चन करतात अथवा जागोजागी क्षेत्रातील देव पाहतात. (१८)

अथवा नाना अवतार । ऐकोनी धरिती निर्धार ।
परी तें अवघें सविस्तर । होऊन गेलें ॥ १९ ॥
अथवा नाना अवतारांच्या विषयी ऐकून तेथे देवत्वाचा निर्धार करतात. पण ते सर्व अवतार येऊन सविस्तर चरित्र करून होऊन गेले. (१९)

येक ब्रह्माविष्णुमहेश । ऐकोन म्हणतीं हे विशेष ।
गुणातीत जो जगदीश । तो पाहिला पाहिजे ॥ २० ॥
कुणी ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याबद्दल ऐकून त्यांना विशेष महत्त्व देतात. पण गुणातीत जो जगदीश त्याचा शोध घेऊन त्याला जाणले पाहिजे. (२०)

देवासी नाहीं थानमान । कोठें करावें भजन ।
हा विचार पाहातां अनुमान । होत जातो ॥ २१ ॥
देव निराकार आहे, म्हणून त्याला निश्चित ठावठिकाणा नाही, म्हणून भजनही करता येत नाही, असे समजाल तर घोटाळ्यात पडाल. (२१)

नसतां देवाचें दर्शन । कैसेन होईजे पावन ।
धन्य धन्य ते साधुजन । सकळ जाणती ॥ २२ ॥
लोकांना वाटते की, सगुण-साकार देवाचे दर्शन जर झाले नाही तर आपण पावन कसे होणार ? पण खरा देव कोण हे सर्व रहस्य साधुजन जाणतात, म्हणून ते खरोखर धन्य होत. (२२)

भूमंडळी देव नाना । त्यांची भीड उलंघेना ।
मुख्य देव तो कळेना । कांहीं केल्यां ॥ २३ ॥
जगात अनेक देव आहेत. त्यांची भीड ओलांडन पलीकडे जाता येत नाही. त्यामुळे मुख्य देव कोण हे काही केल्या कळत नाही. (२३)

कर्तुत्व वेगळें करावें । मग त्या देवासी पाहावें ।
तरीच कांहींयेक पडे ठावें । गौप्यगुह्य ॥ २४ ॥
मीपणाच्या त्यागाने कर्तृत्व वेगळे करावे आणि मग त्या देवाला पाहावे. मग त्यातील गुप्त रहस्य काय आहे, हे थोडे फार कळू लागते. (२४)

तें दिसेना ना भासेना । कल्पांतीं हि नासेना ।
सुकृतावेगळें विश्वासेना । तेथें मन ॥ २५ ॥
ते दिसत नाही, भासत नाही आणि कल्पांतीही नाश पावत नाही. पण पूर्वपुण्याई असल्याखेरीज तेथे मनाचा विश्वास बसत नाही. (२५)

उदंड कल्पिते कल्पना । उदंड इछिते वासना ।
अभ्यांतरीं तरंग नाना । उदयातें पावती ॥ २६ ॥
मग मनात नाना कल्पना येतात. उदंड वासना, इच्छा उत्पन्न होतात. अंत:करणात नाना तहेचे विचारतरंग निर्माण होतात. (२६)

म्हणोनी कल्पनारहित । तेचि वस्तु शाश्वत ।
अंत नाहीं म्हणोनी अनंत । बोलिजे तया ॥ २७ ॥
म्हणून कल्पनारहित जी वस्तू तेच शाश्वत ब्रह्म होय. त्याला अंत नाही, म्हणून त्याला अनंत असे म्हणतात. (२७)

हें ज्ञानदृष्टीनें पाहावें । पाहोनी तेथेंचि राहावें ।
निजध्यासें तद्रूप व्हावें । संगत्यागें ॥ २८ ॥
हे सर्व ज्ञानदृष्टीने पाहावे आणि तेथेच राहावे. आणि मीपणा-विरहित होऊन निदिध्यासाने तद्रूप व्हावे. (२८)

नाना लीळा नाना लघवें । तें काये जाणिजे बापुड्या जीवें ।
संतसंगें स्वानुभवें । स्थिति बाणे ॥ २९ ॥
अशा आत्मरूपाशी ऐक्य पावलेल्या पुरुषाच्या लीला, त्याचे चरित्र, त्याचे लाघव ते बिचाऱ्या सामान्य जीवांना कसे आणि काय कळणार ? संतांच्या संगतीने आत्मानुभव आला की, अशी स्थिती बाणते. (२९)

ऐसी सूक्ष्म स्थिति गती । कळतां चुके अधोगती ।
सद्‍गुरुचेनि सद्‍गती । तत्काळ होते ॥ ३० ॥
अशी सूक्ष्म स्थिती आणि गती प्राप्त झाली की अधोगती चुकते. सदुरूंच्या कृपेने तात्काळ सद्गती प्राप्त होते. (३०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
देहमान्यणनिरूपणनाम समास पांचवा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘देहेमान्यनिरूपणनाम’ समास पाचवा समाप्त.


समास सहावा : बुद्धिवादनिरूपण
॥ श्रीराम ॥

परमार्थी आणि विवेकी । त्याचें करणें माने लोकीं ।
कां जे विवरविवरों चुकी । पडोंचि नेदी ॥ १ ॥
जो परमार्थी असून विवेकीही असतो. त्याचे करणे लोकांना मान्य होते. कारण कुठेही काम करण्यापूर्वी तो नाना तहेने त्यासंबंधी विवरण करून कामात चूक होऊच देत नाही. (१)

जो जो संदेह वाटे जना । तो तो कदापी करीना ।
आदिअंत अनुमाना । आणून सोडी ॥ २ ॥
ज्या गोष्टीबद्दल लोकांच्या मनात संदेह असतो, ती गोष्ट तो कधीही करीत नाही. कुठल्याही कार्यास आरंभ करताना तो त्याचा शेवटी काय परिणाम होईल, यासंबंधी अनुमान करून मगच कामास आरंभ करतो आणि ते पार पाडतो. (२)

स्वतां निस्पृह असेना । त्याचें बोलणेंचि मानेना ।
कठिण आहे जनार्दना । राजी राखणें ॥ ३ ॥
जो स्वतः नि:स्पृह नसतो, त्याचे बोलणे कुणाला मान्य होत नाही. जनता-जनार्दनाला राजी राखणे फार कठीण आहे. (३)

कोणी दटून उपदेश देती । कोणी मध्यावर्ती घालिती ।
ते सहजचि हळु पडती । लालचीनें ॥ ४ ॥
कोणी जबरदस्तीने उपदेश देतात, तर कुणी मध्यस्थ घालतात. असे गुरू त्यांच्या लालची स्वभावाने पत घालवून बसतात. (४)

जयास सांगावा विवेक । तोचि जाणावा प्रतिकुंचक ।
पुढें पुढें नासक । कारबार होतो ॥ ५ ॥
ज्याला विवेक सांगावा तोच प्रतिकूल होतो, अशा वेळी सर्व कारभार बिघडतो. (५)

भावास भाऊ उपदेश देती । पुढें पुढें होते फजिती ।
वोळकीच्या लोकांत महंती । मांडूंचि नये ॥ ६ ॥
भाऊच भावाला उपदेश देतो आणि पुढे पुढे फजिती होते. म्हणून ओळखीच्या लोकांत महंती मांडू नये. (६)

पहिलें दिसे परी नासे । विवेकी मान्य करिती कैसे ।
अविवेकी ते जैसे तैसें । मिळती तेथें ॥ ७ ॥
पहिला थाट पुढे राहात नाही. नष्ट होतो. विवेकी लोक अशा गोष्टीस मान्यता कसे देतील ? त्यांच्यासारखेच अविवेकी असतात तेच तेथे गोळा होतात. (७)

भ्रतार शिष्य स्त्री गुरु । हाहि फटकाळ विचारु ।
नाना भ्रष्टाकारी प्रकारु । तैसाचि आहे ॥ ८ ॥
नवरा शिष्य आणि बायको गुरू हाही विचार योग्य नाही. इतर नाना प्रकारच्या भ्रष्टाचारासारखाच हा प्रकार आहे. (८)

प्रगट विवेक बोलेना । झांकातापा करी जना ।
मुख्य निश्चय अनुमाना । आणूंच नेदी ॥ ९ ॥
उघडपणे विवेक बोलत नाही आणि लोकांसमोर वेळ मारून नेतो. मुख्य आत्मज्ञानाचा निश्चय लोकांच्या अनुमानात आणूनच देत नाही. (९)

हुकीसरिसा भरीं भरे । विवेक सांगतां न धरे ।
दुरीदृष्टीचे पुरे । साधु नव्हेती ॥ १० ॥
लहरीनुसार भरीला पडतो. आता विवेक शिकवायला गेले तरी ग्रहण करीत नाही. खरे साधू जसे दूरदृष्टीचे असतात, तसे भोंदू लोक असे नसतात. (१०)

कोण्हास कांहींच न मागावें । भगवद्‍भजन वाढवावें ।
विवेकबळें जन लावावे । भजनाकडे ॥ ११
खरा साधू असेल, त्याने कोणाकडे काहीही माग नये. लोकांत भगवद्भजन वाढवावे आणि विवेकाच्या बळावर लोकांना भजनाकडे लावावे. (११)

परांतर रक्षायाचीं कामें । बहुत कठीण विवेकवर्में ।
स्वैछेनें स्वधर्में । लोकराहाटी ॥ १२ ॥
दुसऱ्या लोकांचे अंत:करण राखावयाचे काम फार कठीण आहे. विवेकानेच त्यातील वर्म जाणून घ्यावे लागते. कारण लोक नेहमी स्वत:च्या इच्छेनुसार, त्यांच्या स्वभावधर्मानुसार वागत असतात अशी लोकराहाटीच आहे. (१२)

आपण तुरुक गुरु केला । शिष्य चांभार मेळविला ।
नीच यातीनें नासला । समुदाव ॥ १३ ॥
एखाद्याने मुसलमान गुरू केला आणि एखाद्या चांभाराला शिष्य केला, तर नीच यातीमुळे सर्व समुदायच भ्रष्ट होतो. (१३)

ब्रह्मणमंडळ्या मेळवाव्या । भक्तमंडळ्या मानाव्या ।
संतमंडळ्या शोधाव्या । भूमंडळीं ॥ १४ ॥
ब्राह्मण मंडळ्या जमवाव्यात, भक्तांच्या समुदायास मान द्यावा आणि जगात संतमंडळीचा शोध घ्यावा. (१४)

उत्कट भव्य तेंचि घ्यावें । मळमळीत अवघेंचि टाकावें ।
निस्पृहपणें विख्यात व्हावें । भूमंडळीं ॥ १५
जे जे उत्कट आणि भव्य असेल ते घ्यावे. जे मिळमिळीत असेल ते सर्व टाकावे आणि आपल्या नि:स्पृहपणाने जगात प्रसिद्धी मिळवावी. (१५)

अक्षर बरें वाचणें बरें । अर्थांतर सांगणें बरें ।
गाणें नाचणें अवघेंचि बरें । पाठांतर ॥ १६ ॥
जो परमार्थी आणि विवेकी असतो त्याचे अक्षर चांगले असते. वाचणे चांगले असते. ग्रंथातील अर्थाची फोड करून सांगणे चांगले असते. गाणे, नाचणे, पाठांतर वगैरे सर्वच चांगले असते. (१६)

दीक्षा बरी मित्री बरी । तीक्षण बुधी राजकारणी बरी ।
आपणास राखे नानापरी । अलिप्तपणें ॥ १७ ॥
त्याची दीक्षा चांगली असते. मैत्री चांगली असते. राजकारणात चालणारी तीक्ष्ण बुद्धी त्याच्याजवळ असते आणि तो नाना प्रकारे स्वतःला अलिप्त ठेवतो. (१७)

अखंड हरिकथेचा छंदु । सकळांस लागे नामवेदु ।
प्रगट जयाचा प्रबोधु । सूर्य जैसा ॥ १८ ॥
त्याला अखंड हरिकथेचा छंद लागलेला असतो. तो लोकांना नामाचा वेध लावतो. त्याचा प्रबोध, त्याचे ज्ञान सूर्यासारखे प्रगट असते. (१८)

दुर्जनासी राखों जाणे । सज्जनासी निवऊं जाणे ।
सकळांचे मनीचें जाणे । ज्याचें त्यापरीं ॥ १९ ॥
दुर्जनांना कसे संभाळावे हे तो जाणतो. सज्जनांना कसे निववावे हेही तो जाणतो. ज्याच्या जे मनात असेल, ते तसेच तो बरोबर जाणतो. (१९)

संगतीचें मनुष्य पालटे । उत्तम गुण तत्काळ उठे ।
अखंड अभ्यासीं लगटे । समुदाव ॥ २० ॥
त्याच्या संगतीत येणाऱ्या माणसात बदल घडून येतो. त्याच्या ठिकाणी उत्तम गुण उत्पन्न होऊ लागतात आणि लोकसमुदाय अखंड परमार्थाचा अभ्यास करूलागतो. (२०)

जेथें तेथें नित्य नवा । जनासी वाटे हा असावा ।
परंतु लालचीचा गोवा । पडोंचि नेदी ॥ २१ ॥
तो जेथे जेथे जातो तेथे तेथे नित्यनवाच वाटतो. सर्व लोकांना तो असावा असे वाटते. परंतु तेथे लालचीच्या मोहात तो कधीही अडकत नाही. (२१)

उत्कट भक्ति उत्कट ज्ञान । उत्कट च्यातुर्य उत्कट भजन ।
उत्कट योग अनुष्ठान । ठाईं ठाईं ॥ २२ ॥
त्याच्या ठिकाणची उत्कट भक्ती, उत्कट ज्ञान, उत्कट चातुर्य, उत्कट भजन, उत्कट योग, उत्कट अनुष्ठान ठायी ठायी प्रगट होत असते. (२२)

उत्कट निस्पृहता धरिली । त्याची कीर्ति दिगांतीं फांकली ।
उत्कट भक्तीनें निवाली । जनमंडळी ॥ २३ ॥
त्याच्या उत्कट नि:स्पृहतेमुळे त्याची कीर्ती सर्व दिशांस पसरते आणि त्याच्या उत्कट भक्तीने लोकसमुदाय निवतो. (२३)

कांहीं येक उत्कटेविण । कीर्ति कदापि नव्हे जाण ।
उगेंच वणवण हिंडोन । काये होतें ॥ २४ ॥
कुठलीही गोष्ट उत्कटतेने केल्याशिवाय कधीही कीर्ती मिळत नाही. उगीच वणवण हिंडून काय होणार ? (२४)

नाहीं देह्याचा भरंवसा । केव्हां सरेल वयसा ।
प्रसंग पडेल कैसा । कोण जाणे ॥ २५ ॥
आपल्या देहाचा भरवसा नसतो. आयुष्य केव्हा सरेल हे सांगता येत नाही. केव्हा कसा प्रसंग पडेल हे कोण जाणते ? (२५)

याकारणें सावधान असावें । जितुकें होईल तितुकें करावें ।
भगवत्कीर्तीनें करावें । भूमंडळ ॥ २६ ॥
म्हणून माणसाने सावध असावे. आपल्या हातून जितके होईल तितके करत राहावे आणि भगवंताच्या कीर्तीने भूमंडळ भरून टाकावे. (२६)

आपणास जें जें अनुकूळ । तें तें करावें तत्काळ ।
होईना त्यास निवळ । विवेक उमजावा ॥ २७ ॥
आपल्याला अनुकूल असेल ते तत्काळ करावे. जे सहज होण्यासारखे नसेल त्यासंबंधी नीट विवेक करावा. (२७)

विवेकामधें सापडेना । ऐसें तो कांहींच असेना ।
येकांतीं विवेक अनुमाना । आणून सोडी ॥ २८ ॥
विवेकाच्या योगे उमजत नाही असे काहीही नसते. एकांतात बसून विवेक केला की अचूक अनुमान करता येते. (२८)

अखंड तजवीजा चाळणा जेथें । पाहातं काय उणें तेथें ।
येकांतेंविण प्राणीयांतें । बुद्धि कैसी ॥ २९ ॥
जेथे अखंड योजना आखणे आणि प्रयत्न करणे चालू असते, तेथे काहीही उणे पडत नाही असे दिसून येते. एकांताशिवाय माणसाची बुद्धी काम करीत नाही. (२९)

येकांती विवेक करावा । आत्माराम वोळखावा ।
येथून तेथवरी गोवा । कांहींच नाहीं ॥ ३० ॥
एकांतात विवेक करून आत्माराम ओळखावा. म्हणजे मग येथून तेथवर काहीच घोटाळा उरत नाही. (३०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
बुद्धिवादनिरूपणनाम समास सहावा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘बुद्धिवादनिरूपणनाम’ समास सहावा समाप्त.


समास सातवा : यत्‍ननिरूपण
॥ श्रीराम ॥

कथेचें घमंड भरून द्यावें । आणी निरूपणीं विवरावें ।
उणें पडोंचि नेदावें । कोणीयेकविषीं ॥ १ ॥
महंताने थाटयची रंगतदार कथा करावी आणि अध्यात्मनिरूपण विवरून सांगावे. कोठेही उणेपणा येऊ देऊ नये. (१)

भेजणार खालें पडिला । तो भेजणारी जाणितला ।
नेणता लोक उगाच राहिला । टकमकां पाहात ॥ २ ॥
वक्ता वक्तृत्वात घसरला तर जे त्या विषयाचे ज्ञाते असतील त्यांनाच समजणार. नेणते लोक उगीच टकमका पाहात राहाणार. (२)

उत्तर विलंबीं पडिलें । श्रोतयांस कळों आलें ।
म्हणिजे महत्व उडालें । वक्तयाचें ॥ ३ ॥
एखाद्याने वक्त्याला प्रश्न विचारला आणि वक्त्याला उत्तर द्यायला विलंब झाला की श्रोते त्याची योग्यता जाणतात आणि मग वक्त्याचे महत्त्व राहात नाही. (३)

थोडें बोलोनि समाधान करणें । रागेजोन तरी मन धरणें ।
मनुष्य वेधींच लावणें । कोणीयेक ॥ ४ ॥
वक्त्याने थोडेच बोलावे, पण श्रोत्यांचे समाधान करावे. मनात राग आला तरी मन आवरून धरावे. मनुष्यांना आपल्याकडे आकर्षित करून घ्यावे. (४)

सोसवेना चिणचिण केली । तेथें तामसवृत्ती दिसोन आली ।
आवघी आवडी उडाली । श्रोतयाची ॥ ५ ॥
त्याला सहन न झाल्याने जर चिडचिड केली तर त्याची तामसी वृत्ती दिसून येते. मग श्रोत्यांची श्रवणाची सर्व आवडच नष्ट होते. (५)

कोण कोण राजी राखिले । कोण कोण मनी भंगिले ।
क्षणक्षणा परीक्षिले । पाहिजे लोक ॥ ६ ॥
कोणकोण लोक संतुष्ट आहेत, कोणाकोणाचे अंत:करण दुखावले गेले आहे याचे वक्त्याने क्षणोक्षणी निरीक्षण, परीक्षण केले पाहिजे. (६)

शिष्य विकल्पें रान घेत । गुरु मागें मागें धांवतो ।
विचार पाहों जातां तो । विकल्पचि अवघा ॥ ७ ॥
एखाद्या शिष्याच्या मनात विकल्प आल्याने तो संदेहाच्या आडरानात शिरतो आणि गुरू त्याला समजाविण्यासाठी त्याच्या मागे मागे धावतो अशी स्थिती असेल तर विचार करून पाहिल्यावर तेथे अवघा विकल्पच भरून राहिला आहे हे कळते. (७)

आशाबद्धी क्र्यियाहीन । नाहीं च्यातुर्याचें लक्षण ।
ते महंतीची भणभण । बंद नाहीं ॥ ८ ॥
जो आशाबद्ध, क्रियाहीन आणि अंगी चातुर्याचे एकही लक्षण नसलेला महंत असेल, त्याची महती कटकटी निर्माण करते. त्याच्या वागण्याला धरबंद, मर्यादा राहात नाही. (८)

ऐसे गोसावी हळु पडती । ठाईं ठाईं कष्टी होती ।
तेथें संगतीचे लोक पावती । सुख कैचें ॥ ९ ॥
असे गोसावी, महंत त्यांचे महत्त्व घालवून बसतात आणि ठायी ठायी कष्टी होतात. ते स्वतः कष्टी होतात, तर त्यांच्या संगतीत असणाऱ्या लोकांना सुख कसे लाभणार ? (९)

जिकडे तिकडे कीर्ति माजे । सगट लोकांस हव्यास उपजे ।
लोक राजी राखोन कीजे । सकळ कांहीं ॥ १० ॥
जिकडे-तिकडे उत्तम कीर्ती होईल, सरसकट सर्व लोकांना हौस वाटेल, उत्साह वाटेल असे झाले पाहिजे. जे काही सर्व कार्य करायचे असेल ते लोकांना राजी राखून करावे. (१०)

परलोकीं वास करावा । समुदाव उगाच पाहावा ।
मागण्याचा तगादा न लवावा । कांहीं येक ॥ ११ ॥
आपण परमात्म्याच्या अनुसंधानात राहावे आणि त्या भूमिकेवरून लोकांकडे पहावे. कुणाकडेही काहीही मागण्याचा तगादा लावू नये. (११)

जिकडे जग तिकडे जगन्नायेक । कळला पाहिजे विवेक ।
रात्रीदिवस विवेकी लोक । सांभाळीत जाती ॥ १२ ॥
जिकडे जग तिकडे जगन्नायक हा विवेक कळला पाहिजे. विवेकी लोक असतात ते रात्रंदिवस हा विवेक सांभाळत असतात. (१२)

जो जो लोक दृष्टीस पडिला । तो तो नष्ट ऐसा कळला ।
अवघेच नष्ट येकला भला । काशावरुनी ॥ १३ ॥
एखाद्याचा स्वभाव असा असतो की, त्याला जे जे लोक दिसतात ते नष्टच वाटतात, कुणीही चांगला वाटत नाही. सर्व लोक नष्ट आणि हा एकटाच भला हे कशावरून ? (१३)

वोस मुलकीं काये पाहावें । लोकांवेगळें कोठें राहावें ।
तर्ह्हे खोटी सांडतें घ्यावें । कांहीं येक ॥ १४ ॥
ओसाड मुलुखात जाऊन काय पाहावे ? लोकांशिवाय कोठे राहावे ? तहेवाईकपणा, अभिमान खोटा असतो. थोडे तरी पडते घ्यावे. (१४)

तस्मात लोकिकीं वर्ततां नये । त्यास महंती कामा नये ।
परत्र साधनाचा उपाये । श्रवण करून असावें ॥ १५ ॥
म्हणून ज्याला चारचौघात नीट वागता येत नाही, त्यास महंती उपयोगी पडत नाही. त्याने अध्यात्माचे श्रवण करून परमार्थ साधण्याचा उपाय करावा. (१५)

आपणासी बरें पोहतां नये । लोक बुडवावयाचें कोण कार्य ।
गोडी आवडी वायां जाये । विकल्पचि अवघा ॥ १६ ॥
आपल्याला नीट पोहायला येत नसेल, तर लोकांना वाचविण्याचा प्रयत्न करणे म्हणजे त्यांना बुडवून मारण्यासारखेच आहे. अशा महंताच्या नादी जे लागतात, त्यांची परमार्थाची आवड आणि गोडी नाहीशी होऊन त्यांच्या मनातही सर्व विकल्पच उत्पन्न होतो. (१६)

अभ्यासें प्रगट व्हावें । नाहीं तरी झांकोन असावें ।
प्रगट होऊन नासावें । हें बरें नव्हे ॥ १७ ॥
महंताने अभ्यासाने (त्याच्या अंगच्या गुणाने) प्रकट व्हावे, नाहीतर एकांतात राहावे. पण प्रकट होऊन नासावे, हे बरे नव्हे. (१७)

मंद हळु हळु चालतो । चपळ कैसा अटोपतो ।
अरबी फिरवणार तो । कैसा असावा ॥ १८ ॥
जो मंद घोड्यालाही कसाबसा हळूहळू चालवतो, तो चपळ अरबी घोड्याला कसा आवरू शकेल बरे ? (१८)

हे धकाधकीचीं कामें । तिक्षण बुद्धीचीं वर्में ।
भोळ्या भावार्थें संभ्रमें । कैसें घडे ॥ १९ ॥
महंती हे धकाधकीचे काम आहे. तीक्ष्ण बुद्धी असल्याशिवाय ते होऊ शकत नाही. त्याशिवाय त्यातील वर्म कळत नाही. तेथे भोळ्या भावार्थाने संभ्रमात पडावे लागते. कार्य होऊ शकत नाही. (१९)

सेत केलें परी वाहेना । जवार केलें परी फिरेना ।
जन मेळविलें परी धरेना । अंतर्यामीं ॥ २० ॥
एखाद्याने शेत केले पण निगा राखली नाही, जवाहिराचा व्यापार केला, पण तो फिरला नाही, तर कार्य होऊ शकत नाही. . त्याप्रमाणे एखादा कार्यकर्ता लोकसंग्रह करतो, पण त्यांना तो अंतर्यामी संतुष्ट करू शकत नसेल, तर लोकसंग्रह टिकू शकत नाही. (२०)

जरी चढती वाढती आवडी उठे । तरी परमार्थ प्रगटे ।
घसघस करितां विटे । सगट लोकु ॥ २१ ॥
जर लोकांच्या ठिकाणी चढती-वाढती आवड उत्पन्न झाली तरच परमार्थ साधू शकतो, प्रगट होऊ शकतो. घसघस केल्याने सर्व लोक कंटाळतात. (२१)

आपलें लोकांस मानेना । लोकांचें आपणांस मानेना ।
अवघा विकल्पचि मना । समाधान कैचें ॥ २२ ॥
आपले लोकांना मान्य होत नाही, लोकांचे आपल्याला मान्य होत नाही, तेथे परस्परांविषयी विकल्पच निर्माण होतो. मग तेथे समाधान कसे असेल ? (२२)

नासक दीक्षा सिंतरु लोक । तेथें कैचा असेल विवेक ।
जेथें बळावला अविवेक । तेथें राहणें खोटें ॥ २३ ॥
भोंदूपणाची दीक्षा आणि फसवे ठक लोक, मग तेथे विवेक कसा असेल ? आणि जेथे असा अविवेक बळावतो, तेथे राहाणेच खोटे होय. (२३)

बहुत दिवस श्रम केला । सेवटीं अवघाचि वेर्थ गेला ।
आपणास ठाकेना गल्बला । कोणें करावा ॥ २४ ॥
अनेक दिवस केलेले कष्ट शेवटी व्यर्थ ठरतात. आपल्याला जर लोकांचा गलबला सोसत नसेल, तर लोकसंग्रह करण्याच्या भानगडीत पडूच नये. (२४)

संगीत चालिला तरी तो व्याप । नाहीं तरी अवघाचि संताप ।
क्षणक्षणा विक्षेप । किती म्हणौनि संगावा ॥ २५ ॥
एखादे कार्य सुरळित व्यवस्थितपणे चालले, तर तो व्याप ठरतो, नाहीतर मग अवघाच संताप ठरतो. त्यात क्षणोक्षणी इतके विक्षेप म्हणजे अडथळे येतात की किती म्हणून सांगावेत ? (२५)

मूर्ख मूर्खपणें भरंगळती । ज्ञातेपणें कळ्हो करिती ।
होते दोहींकडे फजिती । लोकांमधें ॥ २६ ॥
समाजातील मूर्ख माणसे असतात ती मूर्खपणाने भरकटतात आणि ज्ञाते, शहाणे असतात ते शहाणपणाच्या अभिमानाने भांडत बसतात आणि मधल्यामध्ये महंताची मात्र लोकांत फजिती होते. (२६)

कारबार आटोपेना करवेना । आणि उगेंहि राहेना ।
याकारणें सकळ जना । काये म्हणावें ॥ २७ ॥
त्याला कारभार आटोपत नाही, नीट व्यवस्थित करता येत नाही आणि गप्पही राहावत नाही, स्वस्थही बसवत नाही. अशा या सर्व लोकांना काय म्हणावे ? (२७)

नासक उपाधीस सोडावें । वय सार्थकीं घालावें ।
परिभ्रमणें कंठावें । कोठें तरी ॥ २८ ॥
असली नासकी उपाधी सोडावी आणि आपल्या आयुष्याचे सार्थक करावे, परिभ्रमण करून कोठे तरी आयुष्याचा काळ कंठावा. (२८)

परिभ्रमण करीना । दुसयाचें कांहींच सोसीना ।
तरी मग उदंड यतना । विकल्पाची ॥ २९ ॥
परिभ्रमणही करीत नाही आणि दुसऱ्याचे वागणेबोलणेही सहन करीत नाही. अशा माणसाला विकल्पामुळे उदंड यातना सोसाव्या लागतात. (२९)

आतां हें आपणाचिपासीं । बरें विचारावें आपणासी ।
अनुकुळ पडेल तैसी । वर्तणूक करावी ॥ ३० ॥
आता हे सर्व आपल्यावरच अवलंबून असते. आपण आपल्याशीच नीट विचार करावा आणि जे काही आपल्याला अनुकूल वाटेल, त्याप्रमाणे वर्तणूक करावी. (३०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
येत्‍ननिरूपणनाम समास सातवा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘येत्‍ननिरूपणनाम’ समास सातवा समाप्त.


समास आठवा : उपाधिलक्षणनिरूपण
॥ श्रीराम ॥

सृष्टीमधें बहू लोक । परिभ्रमणें कळे कौतुक ।
नाना प्रकारीचे विवेक । आडळों लागती ॥ १ ॥
सृष्टीमध्ये अनेक लोक आहेत. परिभ्रमण केल्याने त्यांचे कौतुक पाहायला मिळते आणि नाना प्रकारचे विचारही आपल्या नजरेस पडू लागतात. (१)

किती प्रपंची जन । अखंड वृत्ति उदासीन ।
सुखदुःखें समाधान । दंडळेना ॥ २ ॥
कित्येक प्रापंचिक लोक असे असतात की, त्यांची वृत्ती अखंड उदासीन असते. ते अलिप्तपणे वागत असतात आणि सुख-दु:खामुळे त्यांचे समाधान जराही ढळत नाही. (२)

स्वभावेंचि नेमक बोलती । सहजचि नेमक चालती ।
अपूर्व बोलण्याची स्थिती । सकळांसी माने ॥ ३ ॥
ते स्वाभाविकच अत्यंत मोजके बोलतात, सहजच नियमितपणाने वागतात आणि त्यांची बोलण्याची पद्धती तर अशी अपूर्व असते की ती सर्वांनाच मान्य होते, आवडते. (३)

सहजचि ताळज्ञान येतें । स्वभावेंचि रागज्ञान उमटतें ।
सहजचि कळत जातें । न्यायेनीतिलक्षण ॥ ४ ॥
त्यांना सहजच तालाचे ज्ञान असते. स्वाभाविकपणे रागाचे ज्ञान प्रगट होते आणि सहजच त्यांच्या ठिकाणी न्याय आणि नीतीचे लक्षण आढळून येते. (४)

येखादा आडळे गाजी । सकळ लोक अखंड राजी ।
सदा सर्वदा आवडी ताजी । प्राणीमात्राची ॥ ५ ॥
एखादा असा पराक्रमी पुरुष आढळतो की सगळे लोक त्याच्यावर अखंड खूष असतात. प्राणिमात्रांना त्याच्याविषयी नित्य नवी आवड वाटत असते. (५)

चुकोन उदंड आढळतें । भारी मनुष्य दृष्टीस पडतें ।
महंताचें लक्षणसें वाटतें । अकस्मात ॥ ६ ॥
एखादे वेळी असे चुकून घडते की फार मोठा ठेवा हाती लागतो. एखादी अशी थोर व्यक्ती दृष्टीस पडते की, महंताची सर्व लक्षणे त्याच्या ठिकाणी आहेत असे वाटू लागते. (६)

ऐसा आडळतां लोक । चमत्कारें गुणग्राहिक ।
क्रिया बोलणें नेमक । प्रत्ययाचें ॥ ७ ॥
अशी व्यक्ती चमत्कार वाटावा अशी गुणग्राहक असते. त्याचे बोलणे अनुभवाचे आणि निश्चयात्मक आणि मोजके असते. (७)

सकळ अवगुणामधें अवगुण । आपले अवगुण वाटती गुण ।
मोठें पाप करंटपण । चुकेना कीं ॥ ८ ॥
सगळ्या अवगुणांमध्ये मोठा अवगुण कुठला असेल तर आपले अवगुण हेच गुण वाटू लागतात हा होय. हे फार मोठे पाप असून त्यामुळे करंटेपण आल्याशिवाय राहात नाही. (८)

ढाळेंचि काम होतें सदा । जें जपल्यानें नव्हे सर्वदा ।
तेथें पीळपेंचाची आपदा । आडळेचिना ॥ ९ ॥
जे काम नेहमी तेजस्वीपणाने अथवा तडजोडीने होते ते काम भिडस्तपणाने अथवा जपून काळजीपूर्वक केल्यानेही होईलच असे कधी सांगता येत नाही. सहज जेव्हा काम होते तेव्हा त्यात पेचप्रसंग, अडथळे वगैरे आढळून येतच नाहीत. (९)

येकासी अभ्यासितां न ये । येकासी स्वभावेंचि ये ।
ऐसा भगवंताचा महिमा काये । कैसा कळेना ॥ १० ॥
एखाद्याला खूप प्रयत्नानिशी जे काम करता येत नाही ते एखाद्याला अगदी सहजपणे स्वाभाविकरीत्या जमते. असा हा भगवंताचा महिमा असतो. तो कसा आणि का हे कळून येत नाही. (१०)

मोठीं राजकारणें चुकती । राजकारणा वढा लागती ।
नाना चुकीची फजिती । चहुंकडे ॥ ११ ॥
राजकारणात एखादी मोठी चूक झाली, तर त्या राजकारणाने अनेक माणसे वेढली जातात, संकटात सापडतात. या चुकीमुळे चहूकडे नाना प्रकारे फजिती होते. (११)

याकारणें चुकों नये । म्हणिजे उदंड उपाये ।
उपायाचा अपाये । चुकतां होये ॥ १२ ॥
यासाठी चूक होऊ नये म्हणून उदंड उपाय करावेत. चूक झाली तर उपायाचाच अपाय होतो. (१२)

काये चुकलें तें कळेना । मनुष्याचें मनचि वळेना ।
खवळला अभिमान गळेना । दोहिंकडे ॥ १३ ॥
काय चुकले हेच कळत नाही. ज्या माणसाशी राजकारण चालू असते त्याचे मन काही केल्या वळत नाही आणि दोन्ही बाजूचा अभिमान खवळतो तो काही केल्या कमी होत नाही. (१३)

आवघे फडचि नासती । लोकांचीं मनें भंगती ।
कोठें चुकते युक्ती । कांहीं कळेना ॥ १४ ॥
यामुळे सगळे राजकारणच बिघडते. सर्व लोकांची मने दुखावली जातात आणि तरी युक्तीत कोठे चूक होते, हे कळत नाही. (१४)

व्यापेंविण आटोप केला । तो अवघा घसरतचि गेला ।
अकलेचा बंद नाहीं घातला । दुरीदृष्टीनें ॥ १५ ॥
व्याप सांभाळता येत नसताना जो खटाटोप केला, तो सर्व घसरतच गेला. दूरदृष्टीने अकलेला पायबंद घातला नाही. (१५)

येखादें मनुष्य तें सिळें । त्याचें करणेंचि बावळें
नाना विकल्पाचें जाळें । करून टाकी ॥ १६ ॥
एखादा माणूसच उत्साहरहित असतो. कर्तत्वहीन असतो. सर्व करणे बावळटपणाचे असते. त्यामुळे तो कामात घोटाळ्याचे जाळेच निर्माण करतो. (१६)

तें आपणासी उकलेना । दुसयास कांहींच कळेना ।
नाचे विकल्पें कल्पना । ठाईं ठाईं ॥ १७ ॥
ते त्याचे त्यालाही उकलत नाही. दसऱ्यालाही ते कळत नाही. आणि विकल्पामुळे नाना कल्पना मात्र थैमान घालतात. (१७)

त्या गुप्त कल्पना कोणास कळाव्या । कोणें येऊन आटोपाव्या ।
ज्याच्या त्यानें कराव्या । बळकट बुद्धि ॥ १८ ॥
त्याच्या मनातील त्या गुप्त कल्पना कोणाला कशा कळाव्यात ? आणि त्यांना कोण कसा आवरणार ? बळकट बुद्धी करून ज्याच्या त्यानेच त्या आवरल्या पाहिजेत. (१८)

ज्यासी उपाधी आवरेना । तेणें उपाधी वाढवावीना ।
सावचित करूनियां मना । समाधानें असावें ॥ १९ ॥
ज्याला उपाधी आवरणे जमत नसेल, त्याने उपाधी वाढवूच नयेत. आपले मन स्वस्थ ठेवन त्याने समाधानाने राहावे. (१९)

धांवधावों उपाधी वेष्टी । आपण कष्टी लोक हि कष्टी ।
हे कामा नये गोष्टी । कुसमुसेची ॥ २० ॥
घाईगर्दीने काम करू लागले की ती उपाधी वेदन टाकते. कामाचा विचका होतो. त्यामुळे तो स्वतः कष्टी होतो आणि इतरांनाही कष्टी करतो. अशा रीतीने चरफडत काम करणे चांगले नाही. (२०)

लोक बहुत कष्टी जाला । आपणहि अत्यंत त्रासला ।
वेर्थचि केला गल्बला । काअसयासी ॥ २१ ॥
अनेक लोक कष्टी झाले. स्वतः करणाराही अत्यंत त्रासला. हा सर्व गलबला कशासाठी केला ? (२१)

असो उपाधीचें काम ऐसें । कांहीं बरें कांहीं काणोंसें ।
सकळ समजोन ऐसें । वर्ततां बरें ॥ २२ ॥
असो. उपाधीचे कामच असे असते. काही बरे असते, काही त्रासदायक असते. हे सर्व आधी समजून घेऊन त्याप्रमाणे वागावे म्हणजे बरे. (२२)

लोकांपासीं भावार्थ कैचा । आपण जगवावा तयांचा ।
सेवट उपंढर कोणाचा । पडोंचि नये ॥ २३ ॥
लोकांचा भावार्थ कसा आहे, हे जाणून त्यांना त्याप्रमाणे चेतवावे लागते. शेवटी कोणाचाही दंभस्फोट, फजिती होऊ देऊ नये. (२३)

अंतरात्म्याकडे सकळ लागे । निर्गुणीं हें कांहींच न लगे ।
नाना प्रकारीचे दगे । चंचळामधें ॥ २४ ॥
ह्या सर्व गोष्टी अंतरात्म्याकडे लागतात. निर्गणाकडे हे काहीच लागत नाही. नाना प्रकारचे धोके सर्व चंचळामध्येच असतात. (२४)

शुद्ध विश्रांतीचें स्थळ । तें एक निर्मळ निश्चळ ।
तेथें विकारचि सकळ । निर्विकार होती ॥ २५ ॥
एक निर्मळ, निश्चळ परब्रह्म हेच शुद्ध विश्रांतीचे स्थळ आहे. तेथे सर्व विकार निर्विकार होतात. (२५)

उद्वेग अवघे तुटोनि जाती । मनासी वाटे विश्रांती ।
ऐसी दुल्लभ परब्रह्मस्थिती । विवेकें सांभाळावी ॥ २६ ॥
त्या ठिकाणी सर्व उद्वेग नष्ट होतात. मनाला विश्रांती लाभते. अशी ही दुर्लभ परब्रह्मस्थिती विवेकाने जतन करावी. (२६)

आपणास उपाधी मुळींच नाहीं । रुणानुबंधें मिळाले सर्वहि ।
आल्यागेल्याची क्षिती नाहीं । ऐसें जालें पाहिजे ॥ २७ ॥
आपल्याला उपाधी मुळातच नाही, ऋणानुबंधाने एकमेकांच्या गाठी पडतात, सर्व भेटतात, कुणी येवो वा जावो त्याची पर्वा नाही, असे व्हायला पाहिजे. (२७)

जो उपाधीस कंटाळला । तो निवांत होऊन बैसला ।
आटोपेना तो गल्बला । कासयासी ॥ २८ ॥
जो उपाधीला कंटाळतो, तो स्वस्वरूपी निवांत होऊन राहातो. जो आपल्याला आटोपत नाही असा गलबला, व्याप कशासाठी करावा ? (२८)

कांहीं गल्बला कांहीं निवळ । ऐसा कंठीत जावा काळ ।
जेणेंकरितां विश्रांती वेळ । आपणासी फावे ॥ २९ ॥
माणसाने काही गलबला, तर शांत राहून काही काळ कंठीत जावा, यामुळे आपल्याला विश्रांतीसाठी वेळ मिळतो. (२९)

उपाधी कांहीं राहात नाहीं । समाधानायेवढें थोर नाहीं ।
नरदेहे प्राप्त होत नाहीं । क्षणक्षणा ॥ ३० ॥
उपाधी काही टिकू शकत नाही. ती अशाश्वतच असते. आणि समाधानासारखे श्रेष्ठ दुसरे काही नाही. नरदेह काही वारंवार प्राप्त होत नाही. (म्हणून आयुष्यातील राहिलेला काळ तरी सार्थकी लावावा आणि शाश्वत समाधान प्राप्त करून घ्यावे. ) (३०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
उपाधिलक्षणनिरूपणनाम समास आठवा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘उपाधीलक्षणनिरूपणनाम’ समास आठवा समाप्त.


समास नववा : राजकारणनिरूपण
॥ श्रीराम ॥

ज्ञानी आणी उदास । समुदायाचा हव्यास ।
तेणें अखंड सावकाश । येकांत सेवावा ॥ १ ॥
जो ज्ञानी आणि वैराग्यसंपन्न पुरुष असतो, त्याला जर लोकसंग्रह करण्याचा हव्यास असेल, तर प्रथम त्याने अखंड सावकाश एकांत सेवन करावा. (१)

जेथें तजवीजा कळती । अखंड चाळणा निघती ।
प्राणीमात्राची स्थिती गती । कळों येते ॥ २ ॥
एकांतात युक्ती-प्रयुक्ती सुचतात. अखंड चिंतन आणि चर्चा होतात, आणि लोकांची स्थिती-गतीही कळून येते. (२)

जरी हा चाळणाचि करीना । तरी कांहींच उमजेना ।
हिसेबझाडाचि पाहीना । दिवाळखोर ॥ ३ ॥
जर त्याने चिंतन, चर्चा इत्यादी काहीच केले नाही, तर त्याला काहीच उमजत नाही. दिवाळखोर माणूस जसा हिशेब पाहातच नाही, तसाच हा प्रकार घडतो. (३)

येक मिरासी साधिती । येक सीध्या गवाविती ।
व्यापकपणाची स्थिती । ऐसी आहे ॥ ४ ॥
एखादा विवेकाने वागून इनामी वतन मिळवतो, तर दुसरा कणी मुर्खपणामुळे पूर्वीपासन असलेले गमावतो. सर्व गोष्टींचा विचार करून वागण्याची स्थिती अशी आहे. (४)

जेणें जें जें मनीं धरिलें । तें तें आधींच समजलें ।
कृत्रिम अवघेंचि खुंटलें । सहजचि येणें ॥ ५ ॥
दुसऱ्याच्या मनात जे जे काही असेल ते ते जर आधीच समजले, तर दुसऱ्याला कपट करताच येत नाही. सहजच कृत्रिमपणे वागणेच खुंटते. (५)

अखंड राहतां सलगी होते । अतिपरिचयें अवज्ञा घडते ।
याकारणें विश्रांती ते । घेतां नये ॥ ६ ॥
अखंड एका ठिकाणी राहिल्याने काही लोकांशी सलगी होते आणि अति परिचयाने अवज्ञा होते. म्हणून एकाच स्थळी फार काळ राहूच नये. (६)

आळसें आळस केला । तरी मग कारबारचि बुडाला ।
अंतरहेत चुकत गेला । समुदायाचा ॥ ७ ॥
आळसाने कामाचा आळस केला, तर सर्व कारभार बुडतो आणि मनातील लोकसंग्रहाचा हेत राहूनच जातो. (७)

उदंड उपासनेचीं कामें । लावीत जावीं नित्यनेमें ।
अवकाश कैंचा कृत्रिमें । करावयासी ॥ ८ ॥
लोकांच्या मागे उपासनेची उदंड कामे नित्यनेमाने लावून द्यावीत म्हणजे त्यांना लबाडी करायला अवसरच मिळत नाही. (८)

चोर भांडारी करावा । घसरतांच सांभाळावा ।
गोवा मूर्खपणाचा काढावा । हळु हळु ॥ ९ ॥
चोरालाच भांडारी करावे आणि त्याच्या हातून काही चुकले तर त्याला सांभाळून घ्यावे आणि त्याला हळूहळू शिकवून मूर्खपणाच्या गुंत्यातून मोकळे करावे. (९)

या अवघ्या पहिल्याच गोष्टी । प्राणी कोणी नव्हता कष्टी ।
राजकारणें मंडळ वेष्टी । चहुंकडे ॥ १० ॥
या सर्व पूर्वीच्याच गोष्टी आहेत. कणाही प्राण्याला कष्टी न होऊ देता मुत्सद्देगिरीने चहूकडील लोकांना आपल्याकडे आकर्षित करून घ्यावे. (१०)

नष्टासी नष्ट योजावे । वाचळासी वाचाळ आणावे ।
आपणावरी विकल्पाचे गोवे । पडोंच नेदी ॥ ११ ॥
नष्ट माणसाची दुसऱ्या नष्ट माणसाशी गाठ घालून द्यावी. वाचाळाची दुसऱ्या वाचाळाशी गाठ घालावी. आपल्याबद्दल संशय निर्माण होईल, असे वागूच नये. (११)

कांटीनें कांटी झाडावी । झाडावी परी ते कळों नेदावी ।
कळकटेपणाची पदवी । असों द्यावी ॥ १२ ॥
काट्याने काय काढावा, पण हे कळू देऊ नये. गबाळेपणाचा किंवा अजाणतेपणाचा आपल्याबद्दल असलेला समज तसाच राहू द्यावा. (१२)

न कळतां करी कार्य जें तें । तें काम तत्काळचि होतें ।
गचगचेंत पडतां तें । चमत्कारें नव्हे ॥ १३ ॥
जे काम गुपचूप कोणाला कळू न देता केले जाते, ते त्वरित होते. गवगवा झाला, तर मग लोकांना त्याचे महत्त्व वाटत नाही. (१३)

ऐकोनी आवडी लागावी । देखोनी बळकटचि व्हावी ।
सलगीनें आपली पदवी । सेवकामधें ॥ १४ ॥
महंत असा असावा की, त्याच्याविषयी ऐकूनच लोकांना त्याला पाहाण्याची आवड उत्पन्न व्हावी आणि प्रत्यक्ष तो दिसल्यावर ती आवड अधिकच बळकट व्हावी. आत्मीयतेमुळे सेवकांना त्याच्याविषयी परकेपणा वाटू नये, असे त्याने वागावे. (१४)

कोणीयेक काम करितां होतें । न करितां तें मागें पडतें ।
या कारणें ढिलेपण तें । असोंचि नये ॥ १५ ॥
कुठलेही काम केल्यानेच ते होते. जर केलेच नाही तर ते मागे पडते अथवा राहून जाते. म्हणून काम करण्यात ढिलेपणा म्हणजे दिरंगाई नसावी. (१५)

जो दुसयावरी विश्वासला । त्याचा कार्यभाग बुडाला ।
जो आपणचि कष्टत गेला । तोचि भला ॥ १६ ॥
जो दुसर्‍यावर जास्त विश्वास टाकतो, त्याचा कार्यभाग बुडतो. जो स्वतः कष्ट करतो तोच भला होय. (१६)

अवघ्यास अवघें कळलें । तेव्हां तें रितें पडिलें ।
याकारणें ऐसें घडलें । न पाहिजे कीं ॥ १७ ॥
जे काम करावयाचे असेल त्याविषयी सर्वांनाच सर्व काही कळले तर ते उघड होते. म्हणून असे घडणार नाही हे पहावे. (१७)

मुख्य सूत्र हातीं घ्यावें । करणें तें लोकांकरवीं करवावें ।
कित्तेक खलक उगवावे । राजकारणामधें ॥ १८ ॥
मुख्य सूत्र महंताने आपल्या हाती ठेवावे आणि लोकांकडून काम करवून घ्यावे. राजकारणामध्ये कित्येक धूर्त लोक एकत्र जमवावेत. (१८)

बोलके पहिलवान कळकटे । तयासीच घ्यावे झटे ।
दुर्जनें राजकारण दाटे । ऐसें न करावें ॥ १९ ॥
जे बोलके वादपटू धूर्त लोक असतील त्यांच्याशी झुंज द्यावी आणि त्यांना नामोहरम करावे. दुर्जनांच्यामुळे राजकारण अडले, असे होऊ देऊ नये. (१९)

ग्रामण्य वर्मीं सांपडावें । रगडून पीठचि करावें ।
करूनि मागुती सांवरावें । बुडऊं नये ॥ २० ॥
गावगुंडांना वर्मी पकडून त्यांची मस्ती जिरवावी. इतरत्र त्यांचा उपयोग करता येण्यासारखा असल्याने त्यांना आपलेसे करून ठेवावे. त्यांना बुडवू नये. (२०)

खळदुर्जनासी भ्यालें । राजकारण नाहीं राखिलें ।
तेणें अवघें प्रगट जालें । बरें वाईट ॥ २१ ॥
दुष्ट आणि दुर्जन यांना भिऊन आपण आपले राजकारण जर सांभाळले नाही, तर बरे-वाईट सर्व प्रगट होऊन कार्याचा नाश होईल. (२१)

समुदाव पाहिजे मोठा । तरी तनावा असाव्या बळकटा ।
मठ करुनी ताठा । धरूं नये ॥ २२ ॥
मोठा लोकसंग्रह करायचा असेल, तर तंबूच्या दोऱ्या अर्थात व्यापाची शक्ती, साह्य करणारी माणसे बळकट खंबीर असावी लागतात. मठ करून महंतीचा गर्व धरू नये. (२२)

दुर्जन प्राणी समजावे । परी ते प्रगट न करावे ।
सज्जनापरीस आळवावे । महत्व देउनी ॥ २३ ॥
दुर्जन लोक कोण आहेत, हे समजून घ्यावे, पण ते प्रगट करू नये. त्यांना महत्त्व देऊन सज्जनांच्या सारखेच आळवावे. (२३)

जनामधें दुर्जन प्रगट । तरी मग अखंड खटखट ।
याकारणें ते वाट । बुझूनि टाकावी ॥ २४ ॥
जर लोकांत आपण त्यांचा दुर्जनपणा प्रगट केला, तर मग आपल्या कार्यात अखंड कटकट निर्माण होते. म्हणून ती वाटच बुजवून टाकावी. (२४)

गनीमाच्या देखतां फौजा । रणशूरांच्या फुर्फुरिती भुजा ।
ऐसा पाहिजे किं राजा । कैपक्षी परमार्थी ॥ २५ ॥
शत्रूच्या फौजा पाहिल्या की रणशूर असतात त्याचे बाहू, भुजा स्फुरण पावू लागतात. मात्र राजा परमार्थाचा कैवारी असा असावा. (२५)

तयास देखतां दुर्जन धाके । बैसवी प्रचितीचे तडाखे ।
बंडपाषांडाचे वाखे । सहजचि होती ॥ २६ ॥
त्याला पाहताच दुर्जनांना त्याचा धाक वाटावा आणि त्याने दुर्जनांना मारलेल्या तडाख्याच्या अनुभवामुळे बंड आणि पाखंड यांची सहज धूळधाण व्हावी. (२६)

हे धूर्तपणाचीं कामें । राजकारण करावें नेमें ।
ढिलेपणाच्या संभ्रमें । जाऊं नये ॥ २७ ॥
ही सर्व चातुर्याची कामे आहेत. राजकारणात अगदी व्यवस्थित नियंत्रितपणाने राजकारण करावे लागते. त्यात ढिलेपणाच्या भ्रमाने वागून चालत नाही. (२७)

कोठेंच पडेना दृष्टीं । ठाईं ठाईं त्याच्या गोष्टी ।
वाग्विळासें सकळ सृष्टी । वेधिली तेणें ॥ २८ ॥
असा राजकारणी महंत लोकांच्या सहसा दृष्टीसच पडत नाही. पण ठायी ठायी त्याच्यासंबंधीच गोष्टी चालतात. त्याने आपल्या वक्तृत्वाने सर्व जग (सृष्टी) आपल्याकडे आकर्षित करून घेतलेले असते. (२८)

हुंब्यासीं हुंबा लाऊन द्यावा । टोणप्यास टोणपा आणावा ।
लौंदास पुढें उभा करावा । दुसरा लौंद ॥ २९ ॥
गुरगुरणाऱ्यापुढे दुसरा गुरगुरणारा उभा करावा. टोणप्यापुढे म्हणजे मूर्खापुढे दुसरा मूर्ख योजावा. गलेलठ्ठ माणसाची गाठ दुसऱ्या गलेलठ्ठ माणसाशी घालून द्यावी. (२९)

धटासी आणावा धट । उत्धटासी पाहिजे उत्धट ।
खटनटासी खटनट । अगत्य करी ॥ ३० ॥
दांडग्यासाठी दुसरा दांडगा योजावा. उर्मट माणसास दुसरा उर्मटच योजला पाहिजे. लुच्चा असेल त्यास दुसऱ्या लुच्च्या माणसासमोर उभे करावे. याप्रमाणे जशास तसे अगत्य योजावे. (३०)

जैशास तैसा जेव्हां भेटे । तेव्हां मज्यालसी थाटे ।
इतुकें होतें परी धनी कोठें । दृष्टीस न पडे ॥ ३१ ॥
जशास तसे भेटले की मग सभेला रंग भरतो. पण इतके झाले तरी मूळ मालक कोठे आहे, हे मात्र लोकांच्या दृष्टीस पडू देऊ नये. (३१)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
राजकारणनिरूपणनाम समास नववा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘राजकारणनिरूपणनाम’ समास नववा समाप्त.


समास दहावा : विवेकलक्षणनिरूपण
॥ श्रीराम ॥

जेथें अखंड नाना चाळणा । जेथें अखंड नाना धारणा ।
जेथें अखंड राजकारणा । मनासी आणिती ॥ १ ॥
जेथे राजकारणी महंत असतो. त्या ठिकाणी अखंड नाना विषयांवर विचारविनिमय चाल असतो. तेथे अखंड नाना विषयांवर एकाग्रतेने चिंतन केले जाते आणि अखंड राजकारणासंबंधी चर्चा चालते. (१)

सृष्टीमधें उत्तम गुण । तितुकें चाले निरूपण ।
निरूपणाविण क्षण । रिकामा नाहीं ॥ २ ॥
सृष्टीमध्ये जितके म्हणून उत्तम गुण आहेत, त्यांच्यावर तेथे निरूपण चालते. निरूपणाशिवाय एक क्षणही रिकामा जात नाही. (२)

चर्चा आशंका प्रत्योत्तरें । कोण खोटें कोण खरें ।
नाना वगत्रुत्वें शास्त्राधारें । नाना चर्चा ॥ ३ ॥
तेथे नित्य चर्चा, शंका आणि त्यांची प्रत्युत्तरे, खरे कोण, खोटे कोण अशा अनेक प्रकारच्या चर्चा शास्त्राधारे केल्या जातात. नाना वक्तृत्वे होतात. (३)

भक्तिमार्ग विशद कळे । उपासनामार्ग आकळे ।
ज्ञानविचार निवळे । अंतर्यामीं ॥ ४ ॥
तेथे भक्तिमार्गाचे स्वरूप स्पष्ट केले जाते. उपासना कशी करावी हे कळते आणि श्रोत्यांच्या मनात, ज्ञानाचा विचार दृढपणे बिंबतो. (४)

वैराग्याची बहु आवडी । उदास वृत्तीची गोडी ।
उदंड उपाधी तरी सोडी । लागोंच नेदी ॥ ५ ॥
त्याला वैराग्याची अत्यंत आवड असते, अलिप्तता त्याला गोड वाटते आणि उदंड उपाधी त्याच्या मागे असली, तरी तो अलिप्ततेचा वियोग होऊ देत नाही. (५)

प्रबंदाचीं पाठांतरें । उत्तरासी संगीत उत्तरें ।
नेमक बोलतां अंतरें । निववी सकळांचीं ॥ ६ ॥
त्या महंताला अनेक प्रबंध पाठ असतात. कुणी प्रश्न विचारले तर त्यांची अत्यंत समर्पक उत्तरे तो देतो. तो मोजके पण नेमस्त बोलतो. त्यामुळे सगळ्यांच्या अंत:करणाला संतोष होतो. (६)

आवडी लागली बहु जना । तेथें कोणाचें कांहीं चालेना ।
दळवट पडिला अनुमाना । येईल कैसा ॥ ७ ॥
अनेक लोकांना त्याच्याविषयी प्रेम वाटू लागते. त्यामुळे त्याच्यापुढे कोणाचे काही चालत नाही. त्याच्याभोवती अनुयायांची गर्दी होते, तरी कोणालाही त्याचे आकलन होत नाही. (७)

उपासना करूनियां पुढें । पुरवलें पाहिजे चहुंकडे ।
भूमंडळीं जिकडे तिकडे । जाणती तया ॥ ८ ॥
तो स्वत: उपासना करतो आणि चहूकडे उपासनेचा सर्व लोकांमध्ये प्रचार करतो. त्यामुळे या भूमंडळावरील ठिकठिकाणचे लोक त्याला ओळखतात. (८)

जाणती परी आडळेना । काये करितो तें कळेना ।
नाना देसीचे लोक नाना। येऊन जाती ॥ ९ ॥
त्याला जाणतात पण तो त्यांना कुठे आढळतच नाही आणि तो काय करतो, हेही त्यांना कळत नाही. नाना देशातील नाना लोक त्याला भेटण्यासाठी येऊन जातात. (९)

तितुक्यांचीं अंतरें धरावीं । विवेकें विचारें भरावीं ।
कडोविकडीचीं विवरावीं । अंतःकर्णें ॥ १० ॥
जितके लोक येतात तितक्यांची अंत:करणे तो राखतो. ती विवेकाने आणि विचारांनी भरून टाकतो आणि दुःखी-कष्टी झालेल्यांची, आडमार्गाला गेलेल्यांची अंत:करणे जाणून तो त्यांचे दु:ख दूर करतो (१०)

किती लोक तें कळेना । किती समुदाव आकळेना ।
सकळ लोक श्रवणमनना । मध्यें घाली ॥ ११ ॥
त्याला भेटायला किती लोक येतात हे कळत नाही. त्याचे किती अनुयायी आहेत हे जाणता येत नाही. पण त्याच्याकडे येणा-या सर्व लोकांना तो श्रवण-मननाकडे लावतो. (११)

फड समजाविसी करणें । गद्यपद्य सांगणें ।
परांतरासी राखणें । सर्वकाळ ॥ १२ ॥
सभेतील लोकांना समजावणे, त्यांना गद्य-पद्य सांगणे आणि निरंतर लोकांचे अंत:करण राखणे, (१२)

ऐसा ज्याचा दंडक । अखंड पाहाणें विवेक ।
सावधापुढें अविवेक । येईल कैचा ॥ १३ ॥
अशी त्याची वागण्याची रीत असते. तो अखंड विवेकाने आणि सावधपणे वागत असल्याने तेथे अविवेक येईलच कसा ? (१३)

जितुकें कांहीं आपणासी ठावें । तितुकें हळुहळु सिकवावें ।
शाहाणें करूनी सोडावे । बहुत जन ॥ १४ ॥
आपल्याला जितके काही ज्ञान असेल, तितके हळूहळू लोकांना शिकवावे आणि अनेक लोक शहाणे करून सोडावेत. (१४)

परोपरीं सिकवणें । आडणुका सांगत जाणें ।
निवळ करुनी सोडणें । निस्पृहासी ॥ १५ ॥
नाना त-हेने शिकवावे, त्यांच्या अडचणी दूर कराव्यात आणि जे नि:स्पृह असतील त्यांना नि:संदेह करून सोडावे (१५)

होईल तें आपण करावें । न होतां जनाकरवीं करवावें ।
भगवद्‍भजन राहावें । हा धर्म नव्हे ॥ १६ ॥
आपल्याला जेवढे जमेल ते आपण करावे, आपल्याकडून जे होण्यासारखे नसेल ते लोकांकडून करवावे. पण भगवद्भजन खंडित व्हावे हा धर्म नव्हे. (१६)

आपण करावें करवावें । आपण विवरावें विवरवावें ।
आपण धरावें धरवावें । भजनमार्गासी ॥ १७ ॥
आपण स्वतः अध्यात्माचे विवरण करावे आणि दुसऱ्यांकडूनही विवरण करवावे. आपण स्वतः भजनमार्गाचे अवलंबन करावे आणि लोकांकडूनही करवावे. (१७)

जुन्या लोकांचा कंटाळा आला । तरी नूतन प्रांत पाहिजे धरिला ।
जितुकें होईल तितुक्याला । आळस करूं नये ॥ १८ ॥
जुन्या लोकांचा जर कंटाळा आला असेल, तर नवीन प्रांत शोधून तेथे जाऊन कार्य करावे. जितके होईल तेवढे करीतच असावे. त्यात आळस करू नये. (१८)

देह्याचा अभ्यास बुडाला । म्हणिजे महंत बुडाला ।
लागवेगें नूतन लोकांला । शाहाणे करावें ॥ १९ ॥
महंत जर आळशी आणि ऐषआरामी झाला तर तो बुडाला म्हणून समजावे. म्हणून आळस न करता सतत नवीन नवीन लोकांना शिकवून शहाणे करावे. (१९)

उपाधींत सांपडों नये । उपाधीस कंटाळों नये ।
निसुगपण कामा नये । कोणीयेकविषीं ॥ २० ॥
उपाधीत गुंतू नये, पण उपाधीला कंटाळूही नये. कामचुकारपणा कोठल्याच बाबतीत उपयोगी पडत नाही. (२०)

काम नासणार नासतें । आपण वेडें उगें च पाहातें ।
आळसी हृदयसुन्य तें । काये करूं जाणें ॥ २१ ॥
जो आळशी आणि हृदयशून्य असतो तो कामाचा नाश होत असता उगीच वेड्यासारखा पाहातच राहातो. काय करावे हे त्याला कळतच नाही. (२१)

धकाधकीचा मामला । कैसा घडे अशक्ताला ।
नाना बुद्धि शक्ताला । म्हणोनी शिकवाव्या ॥ २२ ॥
जो अशक्त, असमर्थ असतो, त्याला धकाधकीचा मामला निभत नाही. म्हणून जे सशक्त असतात, सामर्थ्यसंपन्न असतात त्यांनाच नाना प्रकारच्या बुद्धीच्या गोष्टी शिकवाव्यात. (२२)

व्याप होईल तों राहावें । व्याप राहातां उठोन जावें ।
आनंदरूप फिरावें । कोठें र्‍ही ॥ २३ ॥
जोपर्यंत व्याप होत असतो, तोपर्यंत तेथे राहावे. व्याप जर थांबला, तर तेथून उठून जावे आणि कोठेही आनंदरूप होऊन फिरावे. (२३)

उपाधीपासून सुटला । तो निस्पृहपणें बळावला ।
जिकडे सानुकूळ तिकडे चालिला । सावकास ॥ २४ ॥
जो उपाधीपासून सुटतो त्याचे सामर्थ्य नि:स्पृहपणामुळे वाढत असते. जिकडे अनुकूलता असते, तिकडे तो सावकाश जातो. (२४)

कीर्ति पाहातां सुख नाहीं । सुख पाहातां कीर्ति नाहीं ।
केल्याविण कांहींच नाहीं । कोठें तर्‍ही ॥ २५ ॥
कीर्ती हवी असेल, तर सखाची अपेक्षा करू नये. सुखाची अपेक्षा ठेवली तर कीर्ती मिळणार नाही. कोठेही काही ना काही केल्याखेरीज, प्रयत्नाशिवाय कार्य घडणारच नाही. (२५)

येरवीं काय राहातें । होणार तितुकें होऊन जातें ।
प्राणी मात्र अशक्त तें । पुढें आहे ॥ २६ ॥
आपण केल्यावाचून कार्य अडत नाही. जे होणार असते ते होऊनच जाते. पण हा मात्र उगीचच स्वत:ला दुर्बल समजत असतो. (२६)

अधींच तकवा सोडिला । मधेंचि धीवसा सांडिला ।
तरी संसार हा सेवटाला । कैसा पावे ॥ २७ ॥
आधीच चिवटपणा किंवा प्रयत्न सोडला किंवा मध्येच धैर्य सोडले, तर ह्या संसाराचा शेवट कसा पावेल ? (२७)

संसार मुळींच नासका । विवेकें करावा नेटका ।
नेटका करितां फिका । होत जातो ॥ २८ ॥
संसार हा मुळातच नासका आहे. तो विवेकाने नीटनेटका करावा. नेटका केला तरी तो आपोआप फिका वाटू लागतो. (२८)

ऐसा याचा जिनसाना । पाहातां कळों येतें मना ।
परंतु धीर सांडावाना । कोणीयेकें ॥ २९ ॥
असे याचे स्वरूप आहे. नीट विचार करून पाहिल्यावर आपल्या मनाला ते कळून येते. पण म्हणून माणसाने कधीही धीर सोडू नये. (२९)

धीर सांडितां कये होतें । अवघें सोसावें लागतें ।
नाना बुद्धि नाना मतें । शाहाणा जाणे ॥ ३० ॥
धीर सोडून काय होणार ? सर्व सोसावे तर लागतेच. नाना प्रकारचे विचार आणि नाना मते असतात. त्यांतील योग्य-अयोग्य शहाणा माणूस जाणतो. (३०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
विवेकलक्षणनिरूपणनाम समास दहावा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘विवेकलक्षणनिरूपणनाम’ समास दहावा समाप्त.

॥ दशक एकोणिसावा समाप्त ॥


दासबोध दशक एकोणिसावा समाप्त

ref: satsangdhara

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *