संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

संसार वो ग्रामीं गेला सांडुनी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७८१

संसार वो ग्रामीं गेला सांडुनी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७८१


संसार वो ग्रामीं गेला सांडुनी ।
माझे अंत:करणीं माहियेर ॥१॥
सासुरवासिनी मी वो परदेशिनी ।
कां नये अझुनी मूळ मज ॥२॥
आणिक एक अवधारा ।
मज दिधलें हीनवरा ।
माझें कांहीं सर्वेश्वरा न विचारिशी ॥३॥
व्याली वेदना जाणे वांझ कांही नेणें ।
बालक काय जाणे तहान भूक ॥४॥
तैसी ते नव्हे लेकुराची माये ।
कृष्ण माझी धाये मोकलिते ॥५॥
आशा मनशा तृष्णा कल्पना चौघी नणंदा ।
पापीण रे चिंता सासू माझी ॥६॥
सासुरा हा स्वार्थ कांही न विचारी परमार्थ ।
आतां करीन घात तयावरी ॥७॥
दुरळ हा प्रपंच दुष्ट भावे आणि दीर ।
इहीं मज थोर कष्टविले ॥८॥
काम क्रोध थोर बोलती बडिवार ।
मज म्हणती पोर निर्देवाचे ॥९॥
नैश्वर गहिवरु दाटतसे गळा ।
आसुवें ढळढळा गळताती ॥१०॥
सासुरयाचे घरीं करित होते काम ।
अवचित विंदान मांडियेलें ॥११॥
घरा सोळा सांधी बहात्तर कोठे ।
नवही दारवंटे झाडीत होते ॥१२॥
चोळी व साउले हिरोनि घेतलें ।
उघडे पाठविलें माहेराशी ॥१३॥
समर्थाची लेकी परि मी संताची पोसणी ।
विमानीं बैसोनि जाते देखा ॥१४॥
बाप चक्रधरा रुक्मादेवीवरा ।
उबगला संसारा येऊं नेदी ॥१५॥

अर्थ:-

भगवंताचा वियोग झालेली विरहिणी( स्त्री) आपल्या मैत्रिणीजवळ म्हणते. माझा परमात्मरुपी पति मला या संसाराच्या गावी सोडून गेला.असल्यामुळे माझ्या अंतःकरणांत माहेराची ओढ आहे. मी सासुरवासिनी असून परदेशी झाले. मला अजून माहेरचे मूळ कां येत नाही ? आणकी एक गोष्ट सांगते ती तुम्ही नीट ऐका. मला गरीब नवऱ्याला पाहून दिले. याबद्दल तुम्ही त्या सर्वेश्वराला कांहीच का नाही विचारीत? बरोबरच आहे.जन्म देणाऱ्या आईलाच बाळांतपणाच्या वेदना समजतात. वांझेला त्या कशा समजणार? बालकाची तहान भूक तिला कशी कळणार. माझी श्रीकृष्णमाय मात्र तशी नाही. ती धाय मोकलीत माझ्यासाठी धावून येईल. आशा, तृष्णा, इच्छा, कल्पना ह्या माझ्या नंणदा असून संसार चिंता ही पापिणी सासू आहे. व्यवहारातील स्वार्थ हा माझा सासरा असून. तो परमार्थाचा कसलाही कधी विचार करीत नाही. म्हणून मी आतां त्याचा घातच करीन.या खडतर प्रपंचात दुष्ट भावना असलेले दीर, यानीही मला भारी कष्ट दिले.हे काम क्रोध दीर मोठ्या ऐटीने बोलतात की ही कारटी फार मोठ्या दुर्देवाची आहे. या निराशेमुळे कंठ दाटून येतो. व घळघळा डोळ्यांतून धारा वाहू लागतात. मी थोरा मोठ्याची( वस्तुतः ब्रह्मस्वरुप असलेली) मुलगी असून सासऱ्याच्या घरी मोलकरीणी प्रमाणे झाडलोट सारवण्याची कामे करीत होते. घर तरी लहान कोठे आहे. पंधरा सोळा वाकड्या तिकड्या जागा आहेत. (पंच ज्ञानेद्रिय, पंच कर्मेंद्रिय पंच प्राण व एक मन मिळून सोळा) तसेच बहत्तर कोठे आहेत. चार वेद, चार उपवेद, चौसष्ट कला मिळून बहात्तर दारेही काही थोड़े नाहीत.ती नऊ आहेत. एवढे मोठे घर मी झाडीत असता.माझे लुगडे चोळी हिसकावून( स्थूल सूक्ष्म शरीराचा अभिमान काढून घेऊन) मला अगदी उघडे करुन माझ्या माहेरी म्हणजे परमात्मस्वरुपाच्या ठिकाणी पाठविले.मी मूळची समर्थाचीच मुलगी म्हणजे मूळची परमात्मस्वरुपच असलेली पण उपाधिमुळे संसाराच्या त्रासांत पडलेली अशी मी संतांची पोसणी म्हणजे अनुग्रह झालेली असल्यामुळे आतां विमानांत बसून माझ्या माहेराला म्हणजे परमात्मस्वरुपाला निघाले आहे. माझा बाप सुदर्शनचक्र धारण करणारे माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते माझे संसारांतले कष्ट पाहून परत संसाराला येऊ देत नाहीत असे माऊली सांगतात.


संसार वो ग्रामीं गेला सांडुनी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७८१

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *