संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

ॐ नमो भगवते वासुदेवाय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४४८

ॐ नमो भगवते वासुदेवाय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४४८


ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
वोडियाणा बंदु घालुनिया देहुडा लागसील पावो ।
वोतप्रोत सांडूनि मना धरिसि अहंभावो ।
ओंकारबिंदुचा न पवसि ठावो ।
वोळगे वोळगे कृष्णद्वारावतिये रावो ॥१॥
ओं नमो भगवते वासुदेवाय ।
द्वादशक्षरि मंत्रु न जपसि काह्या ॥ध्रु०॥
नागिणि उत्साहो नवहिद्वारें निरोधुन ।
नाडित्रयामाजि सुषुम्नासंचरण ।
न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन ।
नरहरि चिंतने अहर्निशि मुक्तिस्थान ॥२॥
मोडिसि करचरण तेणें पावसि अंत समो ।
मोहो तृष्णा न तुटे ब्रह्मविद्या केवि गमो ।
मोठा हा अन्यावो जे हरिचरणीं
नाहीं नामो ।
मोक्षाची चाड तरी मुकुंदीं मन रमो ॥३॥
भांबावसी झणे हें शरीर कर्दळीस्तंभ ।
भस्म कृमि विष्ठा उभे आहे तों सुशोभ ।
भाविता किटकी जाली भृंगी
तिया क्रमिले नभ ।
भावें भक्ति सुलभ वोळगा गा पद्मनाभ ॥४॥
गति मती इंद्रियें जव आहेती समयोग ।
गणित आयुष्य न पुरें जंव हे
न नचे भंग ।
गमला हाचि योग जे अनुसरावा श्रीरंग ॥
गरुडध्वज प्रसादें निस्तरिजे भवतरंग ॥५॥
वनिं सिंह वसतां गजीं
मदु केवीं धरावा ।
वन्हिदग्धबीज त्यासि अंकुर
केवि फुटावा ।
वज्रपाणी कोपलिया गिरि उदधी
केवि लंघावा ।
वदनीं हरि न उच्चारी तेणें
संसार केंवि भुंजावा ॥६॥
तेज नयनींचा भानु जेणें
तेजे मीनले ते ।
त्याचे मानसिचा चंद्रमा
तो सिंपोते अमृतें ।
त्याचे नाभिकमळीं ब्रह्मा
तेणें सृजिलीं सकळहीं भूतें ।
तें विराटस्वरुप वोळखावें विष्णुभक्तें ॥७॥
वाताघातें फुटे गगनीं मेघाचा मेळावा ।
वारिबिंदु पद्यिणिपत्रीं केवी हो ठेवावा ।
वानराच्या हातीं चिंतामणी केवि द्यावा ।
वासुदेव चिंतनें तोचि कल्मशा उठावा ॥८॥
सूक्ष्म स्थूळ भूतें चाळिताहे परमहंसु ।
शूळपाणी देवोदेवि जयाचारे अंशु ।
शुभाशुभीं कर्मी न करि नामाचा आळसु ।
सुखें निरंतरी ध्याई ध्याई ह्रषिकेशु ॥९॥
देव होऊनि उदार भक्तां देतो अमरपदें ।
देतां न ह्मणे सानाथोर वैरियासि तेचि दे ।
देहे सार्थक अंति वासुदेव द्वय छंदे ।
देखा आजामेळ उध्दरिला
नामें येणें मुकुंदें ॥१०॥
वाडा सायासि मनुष्यजन्म पावावा ।
वियाला पुरुषार्थ तो कां
वाया दवडावा ।
वाचामनें करुनि मुरारी वोळगावा ।
व्रतें एकादशी करुनि परलोक ठाकावा ॥११॥
या धनाचा न धरी विश्वास ।
जैशी तरुवर छाया ।
यातायाती न चुकें तरी
हे भोगसिल काह्या ।
या हरिभजनेविण तुझें जन्म
जातें वायां ।
यालागी वैकुंठनाथाच्या तूं चिंती
पा रे पायां ॥१२॥
इहींच द्वादशाक्षरीं ध्रुव अढळ पद पावला ।
प्रल्हाद रक्षिला अग्निशस्त्रापासुनि जळा ।
बापरखुमादेविवरु विठ्ठलु तुह्मी
ध्यारे वेळोवेळां ।
तो कळिकाळापासुनी सोडविल अवलीळा ॥१३॥

अर्थ:-

ॐनमो भगवते वासुदेवाय नमस्कारुन त्याच्या प्राप्तीसाठी गुद् व शिश्न यांच्यामध्ये असलेल्या ओडीयान बंधाला पाय लावून असे श्रम करुन आत ओतप्रत भरलेल्या त्याला सोडून मनात अहंमभाव सोडून ओमकार बिंदूचा ठाव न कळता त्या कृष्ण नावाला शरण जा.ओम भगवते वासुदेवाय हा व्दाक्षरी मंत्र तू का जपत नाहीस. नवव्दारांचा निरोध करुन नाडीव्दारे सुश्सुम्नेत संचरणारी कुंडलीनी हा मार्ग सोपा नाही असे मुनी मानतात मात्र नरहरी नामाच्या सतत चिंतनाने मुक्तीस्थान मिळेल अंत समयी योगामुळे हात पाय मोडून घेणे हिताचे नाही. मोह व तृष्णा न तुटल्याने ब्रह्मविद्या कशी येईल हरी चरणाशी नम्र होत नाही हा मोठा अन्याय आहे. मोक्ष हवा असेल तर मुकुंद चरणी मन रमव कर्दळी प्रमाणे दिसणारे गोमटे शरीर पाहून भांबावू नकोस ते कृमी व विष्ठेने भरलेले आहे. उभे आहे तोपर्यत शोभा देते. जाळले तप भस्म होईल व तसेच ठेवले तर कोल्हे कुत्रे खातील त्यामुळे भक्तीने त्या पद् नाभाला ओळख जोपर्यत बुध्दी व इंद्रिय चांगली आहेत तो पर्यंत त्याला शरण जावून त्या योगाने हा भवसागर तरुन जा वनात सिंह असताना हत्तीने माज का करावा भाजलेल्या बीजापोटी अंकुर कसा फुटावा इंद्र कोपला तर पर्वताने समुद्र कसा ओलांडावा.तसेच तोंडाने हरी उच्चारण करणाऱ्याला संसार कसा बाधावा?त्याच्याच डोळ्यातील तेजामुळे सूर्य तेजस्वी होतो त्याच्या मनातील चंद्रमा अमृत वर्षाव करतो. त्याच्या नाभीत जन्मलेल्या ब्रह्माने ही सृष्टी निर्मिलेली आहे हे विष्णूभक्ता त्याचे विराट स्वरुप तू ओळख. वादळामुळे आकाशातील ढग विस्कळीत होतात कमळाच्या पानावर पाण्याचा थेंब कसा राहील. माकडाच्या हाती चिंतामणी कसा दयावा?वासुदेव चिंतनामुळे जीवाच्या ठिकाणी दोष कसे राहतील?सर्वस्थूल व सूक्ष्म जीवाचे चालक महादेव आहेत ते व इतर देवता त्याचेच अंश आहेत. चांगली वाईट कर्मे करताना नामाचा आळस का करतोस.निरंतर सुख हवे असेल तर त्या ऋषीकेशाला स्मर.तो उदार झाला की लहान थोरपणा न पाहता भक्तासकट वैऱ्यालाही अमरपद देतो.वासुदेव नाम छंदाने देह सार्थक होतो. पहा तो पापी अजामेळा कृष्ण नामाने उध्दार पावला.मोठ्या सायासाने मिळालेल्या मनु्ष्य जन्मातील पुरुषार्थ का वाया घालवतोस.वाचा व मनाने त्या मुरारीला ओळख एकादशी व्रत करुन परलोक प्राप्त करून घे.झाडाच्या छायेप्रमाणे असलेल्या धनसंपत्तीवर विश्वास ठेऊ नकोस ते तुझ्या जन्म मृत्युची यातायाती चुकवणार नाहीत. हरीजन्मावीण तुझा जन्म वाया जात आहे त्यामुळे त्या वैकुंठ नाथाच्या पायाचे चिंतन कर. याच बारा अक्षरी मंत्राने ध्रुव अढळ पदाला गेला. अग्नी जळ व शस्त्रा पासुन प्रल्हाद रक्षिला ते माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविठठल नाम वेळोवेळी घ्या तेच तुम्हाला कळीकाळापासून अलगद सोडवेल असे माऊली सांगतात.


ॐ नमो भगवते वासुदेवाय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४४८

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *