संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

दीव दीपिका शशी तारा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४८८

दीव दीपिका शशी तारा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४८८


दीव दीपिका शशी तारा
होतुका कोटिवरीरे ।
परि नसरे निशि नुगवे दिवसु
दिनकरनाथें जियापरीरे ॥१॥
नुध्दरिजे नुध्दरिजे नुध्दरिजे
गोपाळेंविण नुध्दरिजे ॥ध्रु०॥
नगर भ्रमतां जन्म जावो
परि प्रवेशु एक्या द्वारेरे ।
तैसा यजिजो भजिजो पूजिजो
परि उकलु नंदाकुमरुरे ॥२॥
सर्वावयवीं शरीर सांग परि विरहित
एका जिवेरे ।
तैसा धिक तो श्रोता धिक तो वक्ता
जो वाळिला विठ्ठलदेवेरे ॥३॥
गळित शिर हें कलेवररे
उदकेंविण सरिता भयंकररे ।
रविशशीविण अंबर तैसें हरिविण
जिणें असाररे ॥४॥
अंत:करणीं रुक्मिणीरमणु परि
त्या श्वपचाहि स्वरुपा बंधन
नघडें नघडेरे ।
येरु यति होकां भलतैसा परि तो
भव अगाडीहुनि न सुटे न सुटेरे ॥५॥
शिखिपक्षींपत्रींडोळे जेंवि अकाळ
जळद पडळेरे ।
तैसीं गोकुळपाळकबाळेंविण
कर्मे सकळेंविफ़ळेरे ॥६॥
यम नियम प्राणायाम प्रत्याहार हे
सकळ उपाय परि अपायरे ।
जंव तमाळनीळ सांवळा ह्रदयीं
ठाण मांडूनि न र्‍हायेरे ॥७॥
मी उत्तम पैल हीनु भूतीं
द्वेषाद्वेष ठेलेरे ।
केलोंनि कर्मे उफ़कां निफ़जे सुख
तें दुरी ठेलेरे ॥८॥
आतां असोत हे भेदाभेद
आम्ही असों एक्या बोधे रे ।
बापरखुमादेविवरु विठ्ठल
निवृत्तिमुनिरायप्रसादेरे ॥९॥

अर्थ:-
लहान मोठे दिवे, चांदण्या, चंद्र असे कोट्यवधी जरी आकांशात उदयाला आले तरी त्या योगाने रात्रीचा नाश होत नाही व दिवसही उगवत नाही. पण तोच जर एक सूर्य उदयाला आला तर मात्र रात्र नाहीशी होऊन दिवस येतो. त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाच्या कृपेशिवाय इतर देवतेचा कांही एक उपयोग नाही. कारण त्या गोपाळाच्या कृपेशिवाय जीवाचा उद्धार केंव्हाही होणार नाही. एखांद्या शहराला चहुकडून तट असून आंत जाण्यास एकच दार आहे. ते दार सोडून इतर सर्व शहर फिरत राहिला तर त्याला त्या शहरातून बाहेर पडता येणार नाही. त्याच प्रमाणे एक श्रीकृष्ण परमात्मा सोडून इतर देव देवतांचे भजन पुजन जरी केले तरी त्यांपासून संसारदुःख निवृत्ती होणार नाही. एखाद्याचे शरीर सर्व अवयवांनी परिपूर्ण आहे. पण त्यांत जर जीव नसल तर ते सर्व व्यर्थ आहे. त्याप्रमाणे श्रीविठ्ठलाचे स्मरण सोडून श्रवण करणारा श्रोता व तसेच करणारा वक्ता हे ही व्यर्थच होत. डोके नसलेले कलेवर, पाण्यावीण कोरडी नदी हे भयंकर आहेत. चंद्रसुर्याविण जसे आकाश तसेच त्या हरिविण जिवन आहे. अंतःकरणात रक्मिणीचा पती असेल तर कसलेच बंधन पडत नाही. व जरी उच्च यातीत जन्मला व मुखी हरिनाम नसेल तर तो ह्या संसाराच्या भानगडीतुन बाहेर पडत नाही. मोरपिसाऱ्यावर बरेच डोळे असतात पण त्यानी पाहता येत नाही. जसे अवकाळीचे मेघपटल काही कामाचे नाहीत.तसेच केलेल्या कर्माला त्या गोपाळ नामाचे वलय नसेल तर ते फोल ठरते. यम नियम प्राणायाम प्रत्याहार हे सगळे त्याच्या प्राप्तीचे उपाय अपाय ठरतात.जेंव्हा तो घननिळ कृष्ण त्या हृदयात स्थापित नसतो. मी उत्तम व बाकी हीन ही भावना मनात ठेऊन भूतमात्रांचा द्वेष करुन केलेली कर्मे निर्फळ होतात. व सुख दुर जाते. निवृत्तीनाथांच्या प्रसादाने माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठलाचा बोध घेतला तर सर्व भेदाभेद गळुन पडतात असे माऊली सांगतात.


दीव दीपिका शशी तारा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४८८

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *