संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

उपदेश मदलसा देहो निर्मिला – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७३३

उपदेश मदलसा देहो निर्मिला – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७३३


उपदेश मदलसा देहो निर्मिला कैसा आलासी कवण्या
वाटां मातेचिया गर्भवासा ।
जो पंथ वोखटारे पचलासि कर्मकोठा ।
अविचार बुध्दि तुझी पुत्रराया अदटा ॥१॥
पर्ये दे मदलसा सोहं जोजोरे बाळा ।
निजध्यानीं निजपारे लक्ष लागों दें डोळा ।
निज तें तूं विसरलासि होसि वरपडा काळा ॥२॥
नवामास कष्टलासी दहाव्याने प्रसूत जाली ।
येतांचि कर्मजाड तुझीं मान अडकली ।
आकांतु ते जननी दु:खें धाय मोकली ।
स्मरे त्या हरिहराध्यायीं कृष्णमाउली ॥३॥]
उपजोनि दुर्लभुरे मायबापा जालासी ।
वाढविती थोर आशा थोर कष्टी सायासी ।
माझें माझें म्हणोनियां झणीवायां भुलसी ।
होणार जाणार रे जाण नको गुंफ़ों भव पाशीं ॥४॥
हा देहो नाशिवंत मळमूत्राचा बांधा ।
वरि चर्म घातलेरे कर्मकीटकाचा सांदा ।
रवरव दुर्गधारे अमंगळ तिचा बांधा ।
स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा ॥५॥
या देहाचा भरंवसा पुत्रा न धरावा ऐसा ।
माझें माझें म्हणौनियां बहु दु:खाचा वळसा ।
बहुत ठकियेले मृगजळाच्या आशा ।
तृष्णा सांडुनियां योगी गेले वनवासा ॥६॥
या पोटाकरणेरे काय न करिजे एक ।
यालागि सोय धरीरे तिहीं भुलविलें लोक ।
ठाईचें नेमियलें त्याचें आयुष्य भविष्य ।
लल्लाटीं ब्रह्मरेखा नेणती ते ब्रह्मादिक ॥७॥
जळींचीं जळचरेंरे जळींचियारे रमती ।
भुललीं तीं बापुडीरे ते कांही नेणती ।
जंव नाहीं पुरलीरे त्याचि आयुष्यप्राप्ति ।
वरि घालुनि भोंवरजाळ बापा तयातें गिवसिती ॥८॥
पक्षणी पक्षीयारे निरंजनीं ये वनीं ।
पिलिया कारणेरे गेलिचारया दोन्ही ।
अवचिती सांपडली पारधिया लागुनी ।
गुंतोनि मोहोपाशीं प्राण त्यजिती दोन्ही ॥९॥
मृग हा चारियारे अतिमाने सोकला ।
अविचार बुध्दि त्याची परतोनि मागुता आला ।
तंव त्या पारधियानें गुणीं बाणु लाविला ।
आशारे त्यजूनियां थिता प्राण मुकला ॥१०॥
अठराभार वनस्पती फ़ुलीं फ़ळीं वोळती ।
बावित्या पोखरणी नदी गंगा वाहती ।
ज्या घरीं कुलस्त्रीयाराज्य राणीव संपत्ती ।
हें सुख सांडूनिया कासया योग सेविती ॥११॥
हें सुख सांडूनिया कोण फ़ळ तयासी ।
कपाट लंघूनियां योगी ध्याती कवणासी ।
योग तो सांग मज कवण ध्यान मानसीं ।
सर्वत्र गोविंदुरे ह्रदयीं ध्याई ह्रषिकेशी ॥१२॥
इतुकिया उपरि रे पुत्रा घेई उपदेशु ।
नको भुलों येणे भ्रमें जिवित्त्वाचा होईल नाशु ।
क्षीरा निरा पारखीरे परमात्मा राजहंसु ।
निर्गुण निर्विकार पुत्र सेवी ब्रह्मरसु ॥१३॥
इतुकिया उपरीरे मातें विनवितां जाला ।
संसार सोहळा हा थोरा कष्टीं जोडला ।
पंच भूतें निवती येथें म्हणौनि विश्रामु केला ।
वोखटा गर्भवासु कवणा कार्या रचिला ॥१४॥
गर्भाची यातनारे पुत्रा ऐके आपल्या कानी ।
येतां जातां येणें पंथे सांगाति नाहिरे कोण्ही ।
अहंभावो प्रपंचु पुत्र सांडीरे दोन्ही ।
चौर्‍यांशी जीवयोनी पर्तले मुनिजन तत्क्षणीं ॥१५॥
वाहतां महापुरी रे पुत्रा काढिलें तुज ।
रक्षिलासी प्रसिध्द सांपडले ब्रह्मबीज ।
मग तुज वोळखी नाहीं कारें नेणसि निज ।
आपेआप सदगुरु कृपा करील सहज ॥१६॥
उपजत रंगणारे पुत्रा तुवा जावें वना बैसोनि आसनीरे
पाहे निर्वाणीच्या खुणा ।
प्राणासी भय नाहीं तापत्रये चारणा ।
मग तुज सौरसु पाहारे परब्रह्मींच्या खुणा ॥१७॥
बैसोनि आसनीरे पुत्रा दृढ होई मनीं ।
चेतवी तूं आपणापे चेतविते कुंडलिनी ।
चालतां पश्चिमपंथें जाई चक्रें भेदुनी ।
सतरावी जिवनकळा पाहे आत्मा हा चिंतुनी ॥१८॥
मग तूं देखसी त्रिभुवन स्वर्ग पाताळ ।
नको भुलों येणें सांडीं विषय पाल्हाळ ।
आपणापे देखपारे स्वरुप नाहीं वेगळें ।
परमात्मा व्यापकुरे पाहा परब्रह्म सांवळें ॥१९॥
इतुकिया उपरीरे पुत्रा विनवीतें जननी परियेसि माउलिये संतोषलों ततक्षणीं ।
इंद्रायणी महातटीं विलासलों श्रीगुरुचरणीं ।
बोलियेले ज्ञानदेवो संतोषलों वो मनीं ॥२०॥

अर्थ:-

मदालसा आपल्या मुलाला उपदेश करते की हे पुत्रा तुझा देह कसा उत्पन्न केला. तूं कोणत्या वाटेने मातेच्या गर्भावासांत आला. हे पराक्रमी राजाच्या मुला तूं विचारशून्य बुद्धीने ज्या कर्म मार्गाचा अवलंब केलास तो वाईट मार्ग आहे. बाळा तुझी आई मदालसा तुला झोकेरूपी उपदेश देत आहे की तूं आपल्या स्वात्मस्वरूपाला विसरलास. म्हणून मृत्यूच्या जबड्यांत पडलास. म्हणून तुझे लक्ष आत्मस्वरूपांकडे असू दे.व अनात्मवस्तुबद्दल झोप घे. नऊ महिने गर्भवासाचे कष्ट सोसून दहाव्या महिन्यांत प्रसुतीच्या वेळी तुझे दुःख देणारे प्रारब्धकर्म असल्यामुळे योनीचे संकुचित भागांत तुझी मान अडकली. त्यामुळे तुझ्या आईला त्रास होऊन ती आक्रोश करू लागली. असे दुःखप्रसंग येऊ नये म्हणून त्या हरिहरांचे स्मरण कर व कृष्णमाऊलीचे ध्यान कर. जन्मल्यानंतर आईबापांनी मोठ्या कष्टाने व पुढील आशेने तुझे पालनपोषण केले. व हा आपल्याला लाभतो की नाही अशा चिंतेत असताना तूही त्यांचे ठिकाणी ही माझी आहेत असे कदाचित म्हणशिल पण लक्षात ठेव ज्याचा जन्म झाला त्याला मृत्यू हा ठेवलेलाच आहे. म्हणून या संसारपाशांत तूं अटकू नको. देहाची स्थिति पहा हा नाशिवंत असून या दुर्गधियुक्त मलमूत्र असून वर चामडे घातलेला अपवित्र वस्तुंचा बनलेला आहे. अशा कुत्सित शरीरास पुन्हा यावयाचे नसेल तर हरिहराचे स्मरण करून गोविंदाला शरण जा. हा देह माझा आहे. असा विश्वास धरू नये. कारण या देहांत जे माझे माझे म्हणतात त्यांना जन्ममरणदुःखाचे वळसे भोगावे लागतात. या आशारूपी मृगजळाच्या मागे लागून पुष्कळ लोक फसले. म्हणूनच योग्यांनी आशेचा त्याग करून वनवास पत्करला.आपला योगक्षेम पुढे नीट चालावा म्हणून मुलाची आशा धरतात. परंतु शेवटी तेही फसतात. कारण प्रत्येक जीवास मिळणारे सुखदुःखाचे भोग व आयुष्य हे सर्व ठरलेले असते. पण ती लल्लाट रेषा सहसा ब्रह्मादिकालाही कळत नाही. याला दृष्टांत पाण्यांमध्ये राहणारे मांसे आपल्या सख्या सोयऱ्याबरोबर रमतात. पण त्या बिचाऱ्यांना कोळी येऊन त्यांने जाळे टाकले आहे व आपण त्यांत सापडलो आहो. असे कळत नाही. किवा पक्षिणी व पक्षी आपल्या पिलावरील प्रेमाने चारा आणण्यांकरीता घोर आरण्यांत जातात व तेथे पारध्यांच्या फाशांत सांपडून प्राणास मुकतात. किंवा आपले जीवन चालावे म्हणून एका ठिकाणी पुष्कळ चारा पाहून मृग तेथे गेला पण पुन्हा जर आपण तेथे येऊं तर पारधी मला मारील अशा तहेची विचार बुद्धी त्याजजवळ नसल्याने मृग पुन्हा तेथे गेला. इतक्यांत पारध्याने धनुष्याला बाण लावला, बिचाऱ्या मृगाला जिवंत राहाण्यांची आशा सोडून प्राणास मुकावे लागले. पुत्र विचारतो, आपल्याघरी सर्व तऱ्हेची फुले, फळे, वनस्पती, विहीरी, तलाव, नद्या असून तसेच घरांत कुल स्त्रिया सर्व संपत्तियुक्त असे राज्य असून हे सर्व विषयसुख टांकून देऊन काही लोक योग का करतात? हे सुख सोडण्यांत त्यांना फल काय आहे.? योग म्हणजे काय? व ते मनांत कोणाचे ध्यान करतात? मदालसा म्हणाली सर्व ठिकाणी जो गोविंद त्यांत हृषिकेशाचे तू त्याचे यांमध्ये ध्यान कर. विषयसुखाला भुलू नको. भूललास तर तुझ्या जीवात्म्याचा नाश होईल.म्हणजे जन्ममरण भोगांवे लागेल. ज्याप्रमाणे राजहंस दूध व पाणी भिन्न करून दधाचे सेवन करतो. त्याप्रमाणे सत्य काय व असत्य काय याचा विचार करून. ब्रह्मरसरूपी निर्गुण निर्विकार जो परमात्मा तोच सत्य आहे. म्हणून त्याचेच सेवन कर. यावर पुत्र विचारतो. पंचमहाभूतापासून उत्पन्न होणारा संसार थोरांना ही दुःख देणारा तसेच अत्यंत कष्ट देणारा गर्भवास कशा करिता उत्पन्न केला. गर्भवासाचे कष्ट आपल्या कानांनी नीट ऐक. या गर्भवासात येताना किंवा मेल्यानंतर बरोबर काहीही येत नाही. या संसारातील चौयांशी लक्षयोनी पाहून विचारवंत पुरूष ताबडतोब संसार विमुख झाले म्हणून शरीराच्या टिकाणी अहंभाव व इतर पदार्थाच्या ठिकाणी ममभाव या दोन प्रकारचा प्रपंच सोड.. मायानदीच्या महापुरातून तुला काढून जगत कारण श्रुतीसिद्ध ब्रह्म दाखविले पण ते आत्मत्वाने जाणण्याकरिता सद्गुरु कृपा संपादन कर.म्हणजे तें तुला आत्मत्वाने सहजच समजेल. एवढ्याकरिता तूं वनांत जाऊन पवित्र ठिकाणी आसनांवर बसून मोक्षसुखाचा अनुभव घे. तुझ्याठिकाणी पुष्कळ तापत्रय असले तरी त्याठिकाणी तुझ्या प्राणास भिती नाही. अशा रितीने ब्रह्मसुखाची गोडी पहा. मन अत्यंत दृढ करून आसनावर बस व आपल्या ठिकाणी असणारी कुंडलीनी जागृत करून पश्चिम मागनि षड्चक्रे भेदून सतरावी जीवनकलाच आत्मा आहे. असा अनुभव घे. परमात्मा व्यापक असल्याने तुझ्या स्वरूपांतच तुला स्वर्ग, मृत्यु पाताळ सर्व त्रिभुवन दिसेल. आभास मात्र सुख देणारे विषयांना तूं न भुलता त्यांचा त्याग करव सुखरूप ब्रह्माचे ध्यान करून घे. यावर पुत्र म्हणाला माते तुझ्या उपदेशाने मी कृतार्थ झालो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मीही इंद्रायणी तटी राहणारे श्रीगुरू निवृत्तिनाथ त्यांचे उपदेशाने कृतार्थ झालो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


उपदेश मदलसा देहो निर्मिला – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७३३

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *