सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय बारावा

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा

(ओव्या ११० ते १८०)

(ओव्या ५१ ते १०९)

(ओव्या १ ते ५०)


वरील ऑडिओ मधील आवाज सौ. मनीषा भास्कर अभ्यंकर यांचा आहे, त्यांनी हे ऑडिओ टाकायची परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार


संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि ।
यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम् ॥ १ ॥
अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, कर्माचा त्याग करावा असे तू सांगतोस आणि पुन्हा कर्मांचे अनुष्ठान करावे असेही तू सांगतोस. या दोहोंपैकी खरोखर तुझ्या मताने जे श्रेयस्कर असेल ते सांग. ॥५-१॥

मग पार्थु श्रीकृष्णातें म्हणे । हां हो हें कैसें तुमचें बोलणें ।
एक होय तरी अंतःकरणें । विचारूं ये ॥ १ ॥
मग अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, अहो हे असे कसे तुमचे बोलणे ? यात एकवाक्यता असेल तर त्यासंबाधाने काही विचार करता येईल. ॥ १॥

मागां सकळ कर्माचा सन्यासु । तुम्हींचि निरोपिला होता बहुवसु ।
तरी कर्मयोगीं केवीं अतिरसु । पोखीतसां पुढती ? ॥ २ ॥
सर्व कर्मांचा त्याग करावा असे तुम्हीच मागे पुष्कळ रीतीने सांगितले होते. तर आता कर्मयोगाविषयीच्या भराला जास्त उत्तेजन का देता ? ॥ २॥

ऐसें द्व्यर्थ हें बोलतां । आम्हां नेणतयांच्या चित्ता ।
आपुलिये चाडें श्रीअनंता । उमजु नोहे ॥ ३ ॥
श्रीअनंता (कृष्णा), असे हे दुटप्पी बोलले असता आमच्यासारख्या अल्पसमजुतीच्या लोकांच्या मनाला पाहिजे तसा उलगडा होत नाही. ॥ ३॥

ऐकें एकसारातें बोधिजे । तरी एकनिष्ठचि बोलिजे ।
हें आणिकीं काय सांगिजे । तुम्हांप्रति ॥ ४ ॥
ऐक. एक तत्व जर सांगावयाचे असेल तर एकच निश्चित सांगितले पाहिजे, हे तुम्हाला दुसर्‍यांनी सांगवयास पाहिजे काय ? ॥ ४॥

तरी याचिलागीं तुमतें । म्यां राउळासि विनविलें होतें ।
जे हा परमार्थु ध्वनितें । न बोलावा ॥ ५ ॥
एवढ्यासाठी मी आपल्यासारख्या श्रेष्ठांना विनंती केली होती की हे तत्वज्ञान संदिग्ध भाषेत सांगू नये. ॥ ५॥

परी मागील असो देवा । आतां प्रस्तुतीं उकलु देखावा ।
सांगें दोहींमाजि बरवा । मार्गु कवण ॥ ६ ॥
परंतु देवा, मागे झाले ते राहू द्या. आता ह्यावेळी उलगडा करा आणि या दोन मार्गांपैकी चांगला कोणता ते सांगा. ॥ ६॥

जो परिणामींचा निर्वाळा । अचुंबितु ये फळा ।
आणि अनुष्ठितां प्रांजळा । सावियाचि ॥ ७ ॥
ज्याचा शेवट शुद्ध असून ज्याचे फळ अचूक प्राप्त होते व ज्याचे अनुष्ठान सहजच सरळ आहे. ॥ ७॥

जैसें निद्रेचें सुख न मोडे । आणि मार्गु तरी बहुसाल सांडे ।
तैसें सोहोकासन सांगडें । सोहपें होय ॥ ८ ॥
ज्याप्रमाणे झोपेच्या सुखात व्यत्यय न येता रस्ता तर पुष्कळ काटत जातो अशा सुखकारक वाहना सारखा जो सोईचा मार्ग असेल तो सांगा. ॥ ८॥

येणें अर्जुनाचेनि बोलें । देवो मनीं रिझले ।
मग होईल ऐकें म्हणितलें । संतोषोनियां ॥ ९ ॥
ह्या अर्जुनाच्या बोलण्याने देव मनात खूष झाले. मग संतुष्ट होऊन म्हणाले, ऐक तसेही होईल. ॥ ९॥

देखा कामधेनु ऐसी माये । सदैवा जया होये ।
तो चंद्रुही परी लाहे । खेळावया ॥ १० ॥
पहा ज्या दैववानाला कामधेनुसारखी आई मिळते त्याला चंद्र पण तो सुद्धा खेळावयास मिळतो. ॥ १०॥

पाहे पां श्रीशंभूची प्रसन्नता । तया उपमन्यूचिया आर्ता ।
काय क्षीराब्धि दूधभाता । देइजेचिना ? ॥ ११ ॥
हे पहा, शंकरांनी प्रसन्न होऊन त्या उपमन्यूच्या इच्छेप्रमाणे त्याला दूधभाताकरता क्षीरसमुद्र दिला नाही का ? ॥ ११॥

तैसा औदार्याचा कुरुठा । श्रीकृष्णु आपु जाहलिया सुभटा ।
कां सर्व सुखांचा वसौटा । तोचि नोहावा ॥ १२ ॥
त्याप्रमाणे उदारपणाचे घर जो श्रीकृष्ण, तो अर्जुनाच्या स्वाधीन झाल्यावर मग तो अर्जुन सर्व सुखांचे वसतीस्थान का होऊ नये ? ॥ १२॥

एथ चमत्कारु कायसा । गोसावी श्रीलक्ष्मीकांतासा ।
आतां आपुलिया सवेसा । मागावा कीं ॥ १३ ॥
यात आश्चर्य कसले ? लक्ष्मीकांतासारखा मालक मिळाला असतांना आता आपल्याला हवे तसे त्याने का मागून घेऊ नये ? ॥ १३॥

म्हणौनि अर्जुनें म्हणितलें । तें हांसोनि येरें दिधलें ।
तेंचि सांगेन बोलिलें । काय कृष्णें ॥ १४ ॥
म्हणून अर्जुनाने जे मागितले ते श्रीकृष्णांनी प्रसन्न होऊन दिले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात श्रीकृष्ण जे काय म्हणाले ते मी सांगेन. ॥ १४॥

श्रीभगवानुवाच –
संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ ।
तयोस्तु कर्मसंन्यासात्कर्मयोगो विशिष्यते ॥ २ ॥
श्रीकृष्ण म्हणाले – कर्माचा त्याग आणि कर्माचे अनुष्ठान ही दोन्ही श्रेयाला म्हणजे मोक्षाला कारणीभूत आहेत. या दोहोंपैकी कर्मत्यागापेक्षा कर्मयोगच (तो जाणत्या-नेणत्यांना सर्वांना सुलभ असल्याने) विशेष (श्रेयस्कर) आहे. ॥५-२॥

तो म्हणे गा कुंतीसुता । हे संन्यासयोगु विचारितां ।
मोक्षकरु तत्त्वता । दोनीही होती ॥ १५ ॥
श्रीकृष्ण म्हणाले – अर्जुना हे संन्यास व कर्मयोग विचार करून पाहिले तर तात्विक दृष्ट्या दोन्ही मोक्ष प्राप्त करून देणारे आहेत. ॥ १५॥

तरी जाणानेणा सकळां । हा कर्मयोगु कीर प्रांजळा ।
जैसी नाव स्त्रियां बाळां । तोयतरणीं ॥ १६ ॥
तरी पण जाणते व नेणते या सगळ्यांना हा निष्काम कर्मयोग आचरण्याला सरळ आहे. ज्याप्रमाणे पाण्यातून तरून जाण्याला स्त्रियांना व बालकांना होडी हे सुलभ साधन आहे त्याप्रमाणे भवसागरातून तरून जाण्यास हा कर्मायोग साधन आहे. ॥ १६॥

तैसें सारासार पाहिजे । तरी सोहपा हाचि देखिजे ।
येणें संन्यासफळ लाहिजे । अनायासें ॥ १७ ॥
त्याचप्रमाणे सारासाराचा विचार केला तर हाच सोपा दिसतो. याने कर्माच्या संन्यासापासून मिळणार्‍या फलाची प्राप्ती कष्टावाचून होते. ॥ १७॥

आतां याचिलागीं सांगेन । तुज संन्यासियाचें चिन्ह ।
मग सहजें हें अभिन्न । जाणसी तूं ॥ १८ ॥
आता एवढ्याकरता मी तुला कर्मसंन्य़ास करणाराचे लक्षण सांगेन, मग हे दोन्ही मार्ग सहजच एक आहेत असे तू जाणशील. ॥ १८॥

ज्ञेयः स नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति ।
निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात्प्रमुच्यते ॥ ३ ॥
हे महाबाहो अर्जुना, जो कशाचा द्वेष करीत नाही व कशाची इच्छा करत नाही तो कर्मयोगी नित्य कर्मसंन्यासीच जाणावा. (प्रीति-द्वेष, सुख-दुख, जय-पराजय इत्यादी) द्वंद्वांनी रहित असलेला तो बंधापासून सहज अनायासे मुक्त होतो. ॥५-३॥

तरी गेलियाची से न करी । न पवतां चाड न धरी ।
जो सुनिश्चळु अंतरीं । मेरु जैसा ॥ १९ ॥
तरी गत गोष्टींची जो आठवण धरत नाही, काही मिळाले तर त्याची इच्छा करत नाही, जो मेरु पर्वताप्रमाणे अंत:करणात अगदी अचळ असतो ॥ १९॥

आणि मी माझें ऐसी आठवण । विसरलें जयाचें अंतःकरण ।
पार्था तो संन्यासी जाण । निरंतर ॥ २० ॥
आणि ज्याच्या अंत:करणात मी व माझे यांचे स्मरण राहिलेले नाही. अर्जुना तो सदोदित संन्यासीच आहे हे जाणावे. ॥ २०॥

जो मनें ऐसा जाहला । संगीं तोचि सांडिला ।
म्हणौनि सुखें सुख पावला । अखंडित ॥ २१ ॥
ज्याच्या मनाची अशी तयारी झाली, त्याला संगच सोडून जातात, म्हणून त्याला शाश्वत सुखाची अनायासे प्राप्ती होते. ॥ २१॥

आतां गृहादिक आघवें । तें कांहीं नलगे त्यजावें ।
जे घेतें जाहलें स्वभावें । निःसंगु म्हण‍ऊनि ॥ २२ ॥
अशा स्थितीत घर वगैरे सर्वांचा त्याग करण्याची काही जरुरी नाही. कारण त्यांची आसक्ती घेणारे मन तेच स्वभावत: नि:संग झाले आहे म्हणून. ॥ २२॥

देखें अग्नि विझोनि जाये । मग जे राखोंडी केवळु होये ।
तैं ते कापुसें गिंवसूंये । जियापरी ॥ २३ ॥
पहा अग्नी विझून गेल्यावर मग जो राखेचा ढेपसा शिल्लक रहातो तेव्हा त्याला कापसामधे सुद्धा ज्याप्रमाणे गुंडाळून ठेवता येते. ॥ २३॥

तैसा असतेनि उपाधी । नाकळिजे तो कर्मबंधीं ।
जयाचिये बुद्धी । संकल्पु नाहीं ॥ २४ ॥
त्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीत संकल्प नाहीत तो परिवारात असून सुद्धा कर्मबंधात पडत नाही. ॥ २४॥

म्हणोनि कल्पना जैं सांडे । तैंचि गा संन्यासु घडे ।
इयें कारणें दोनी सांगडे । संन्यासयोगु ॥ २५ ॥
म्हणून ज्यावेळेला कल्पना सुटते त्याच वेळेला संन्यास घडतो. या कारणाने कर्मसंन्यास व कर्मयोग दोन्ही सारखेच आहेत. ॥ २५॥

सांख्ययोगौ पृथग्बालाः प्रवदन्ति न पण्डिताः ।
एकमप्यास्थितः सम्यगुभयोर्विन्दते फलम् ॥ ४ ॥
सांख्य व कर्मयोग भिन्न फल देणारे आहेत असे अज्ञ बोलतात, ज्ञानी बोलत नाहीत. (सांख्य व कर्मयोग यापैकी) एकाचे जरी अनुष्ठन केले तरी करणाराला दोहोंचेही फल जो मोक्ष तो प्राप्र होतो. ॥५-४॥

एर्‍हवीं तरी पार्था । जे मूर्ख होती सर्वथा ।
ते सांख्ययोगुसंस्था । जाणती केवीं ? ॥ २६ ॥
एरव्ही अर्जुना, जे पूर्णपणे अज्ञानी आहेत ते सांख्ययोग व कर्मयोग यातील भेद कसे जाणतील ? ॥ २६॥

सहजें ते अज्ञान । म्हणोनि म्हणती ते भिन्न ।
एर्‍हवीं दीपाप्रति काई आनान । प्रकाशु आहाती ? ॥ २७ ॥
ते स्वभावत:च मूर्ख असतात. म्हणून या दोन मार्गांना भिन्न समजतात. नाही तर प्रत्येक दिव्याचा प्रकाश काय वेगवेगळे आहेत काय ? ॥ २७॥

पैं सम्यक् येणें अनुभवें । जिहीं देखिलें तत्त्व आघवें ।
तें दोहींतेंही ऐक्यभावें । मानिती गा ॥ २८ ॥
एकाचेच चांगले आचरण करून ज्यांनी संपूर्ण तत्व समजावून घेतले ते दोघांनाही एकच रूपाने समजतात. ॥ २८॥

यत्सांख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते ।
एकं साख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति ॥ ५ ॥
सांख्य मार्गाने जाणार्‍यांना जे मोक्षरूपी स्थान प्राप्त होते तेच निष्काम कर्मयोगाचे अनुष्ठान करणारांनाही प्राप्त होते. सांख्य व कर्मयोग हे एक आहेत असे जाणणारा खरा ज्ञाता होय. ॥५-५॥

आणि सांख्यीं जें पाविजे । तेंचि योगीं गमिजे ।
म्हणोनि ऐक्य दोहींतें सहजें । इयापरी ॥ २९ ॥
आणि सांख्य मार्गाने जे मिळते तेच योगाने प्राप्त होते. अशा रीतीने या दोन मार्गात सहजच एकता आहे. ॥ २९॥

देखें आकाशा आणि अवकाशा । भेदु नाहीं जैसा ।
तैसें ऐक्य योगसंन्यासा । वोळखे जो ॥ ३० ॥
पहा आकाश आणि पोकळी यांच्यामधे ज्याप्रमाणे भिन्नता नाही त्याप्रमाणे कर्मयोग व आणि सांख्ययोग यांची एकता ज्याला पटलेली असते ॥ ३०॥

तयासींचि जगीं पाहलें । आपणपें तेणेंचि देखिलें ।
जया सांख्ययोग जाणवले । भेदेंविण ॥ ३१ ॥
ज्याला सांख्य व कर्मयोग अभिन्नतेने पटले त्यालाच जगात उजाडले, ज्ञानप्राप्ती झाली व त्यानेच आत्मस्वरूप पाहिले. ॥ ३१॥

संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः ।
योगयुक्तो मुनिर्बह्म न चिरेणाऽधिगच्छति ॥ ६ ॥
हे महाबाहो, कर्मयोगावाचून कर्मसंन्यासाची प्राप्ती होणे दुष्कर आहे. फलनिरपेक्ष कर्मयोगाचे ठिकाणी रत असलेल्या मुनीला ब्रह्माची प्राप्ती तात्काल होते. ॥५-६॥

जो युक्तिपंथें पार्था । चढे मोक्षपर्वता ।
तो महासुखाचा निमथा । वहिला पावे ॥ ३२ ॥
अर्जुना, जो निष्काम कर्म करण्याची हातवटीरूपी रस्त्याने मोक्षरूप पर्वतावर चढतो, तो परमानंदरूप शिखर त्वरेने गाठतो. ॥ ३२॥

येरा योगस्थिति जया सांडे । तो वायांचि गा हव्यासीं पडे ।
परि प्राप्ति कहीं न घडे । संन्यासाची ॥ ३३ ॥
त्याहून दुसरा, ज्याचे हातून कर्मयोगाचे अनुष्ठान होत नाही, तो व्यर्थच (संन्यासाच्या) छंदात पडतो. परंतु त्याला संन्यासाची प्राप्ती कधीच होत नाही. ॥ ३३॥

योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः ।
सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते ॥ ७ ॥
शुद्धचित्त, जितदेह, जितेंद्रिय व ज्याचा आत्मा सर्व भूतांच्या आत्मरूप झाला आहे. असा निष्काम कर्मयोगाचे ठिकाणी रत असलेला मनुष्य कर्म करीत असला तरी त्यापासून अलिप्त असतो. ॥५-७॥

जेणें भ्रांतीपासूनि हिरतलें । गुरुवाक्यें मन धुतलें ।
मग आत्मस्वरूपीं घातलें । हरौनियां ॥ ३४ ॥
ज्याने भ्रमापासून हिरावून घेतलेले आपले मन गुरूपदेशाने स्वच्छ करून आत्मस्वरूपात मुरवून ठेवले, ॥ ३४॥

जैसें समुद्रीं लवण न पडे । तंव वेगळें अल्प आवडे ।
मग होय सिंधूचि एवढें । मिळे तेव्हां ॥ ३५ ॥
ज्याप्रमाणे समुद्रात मीठ पडले नाही तोपर्यंत ते मर्यादित असे दिसते, मग ज्यावेळी समुद्राशी त्याचा योग होतो, त्यावेळी ते समुद्राएवढे होते ॥ ३५॥

तैसें संकल्पोनि काढिलें । जयाचें मनचि चैतन्य जाहलें ।
तेणें एकदेशियें परी व्यापिलें । लोकत्रय ॥ ३६ ॥
त्याप्रमाणे संकल्पापासून दूर गेल्यामुळे ज्याचे चित्त चिद्रूप झाले तो मर्यादित दिसत असला तरी त्याने तिन्ही लोक व्यापले आहेत. असे समज. ॥ ३६॥

आतां कर्ता कर्म करावें । हें खुंटलें तया स्वभावें ।
आणि करी जर्‍ही आघवें । तर्‍ही अकर्ता तो ॥ ३७ ॥
आता कर्ता-कर्म-कार्य हा त्रिपुटीचा व्यवहार स्वभावत:च बंद पडतो, आणि यावर त्याने सर्व जरी केले तरी तो तत्वत: त्याचा कर्ता होत नाही. ॥ ३७॥

नैव किंचित्करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् ।
पश्यञ्श्रृण्वन्स्पृशञ्जिघ्रन्नश्नन्गच्छन्स्वपन्श्वसन् ॥ ८ ॥
प्रलपन्विसृजन्गृह्णन्नुन्मिषन्निमिषन्नपि ।
इंद्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ॥ ९ ॥
पहात असता, ऐकत असता, स्पर्श करीत असता, वास घेत असता, खात असता, चालत असता, झोप घेत असता, श्वास घेत असता, डोळ्याची पापणी उघडत व मिटत असता, इंद्रियांच्या अर्थांच्या ठिकाणी इंद्रियांची प्रवृत्ती असते, असे लक्षात आणून कर्मयोगाच्या ठिकाणी रत असलेल्या आत्म्याचे खरे स्वरूप जाणणार्‍या तत्ववित् मनुष्याने “मी काही करीत नाही” असे लक्षात ठेवावे. ॥५-८, ९॥

जे पार्था तया देहीं । मी ऐसा आठऊ नाहीं ।
तरी कर्तृत्व कैचैं काई । उरे सांगें ? ॥ ३८ ॥
कारण अर्जुना त्याच्या ठिकाणी ‘मी देह’ अशी आठवणच नसते. तर मग कर्तेपणा कोठचा ? तो कर्तेपणा तेथे राहील काय ? सांग. ॥ ३८॥

ऐसें तनुत्यागेंवीण । अमूर्ताचे गुण ।
दिसती संपूर्ण । योगयुक्तां ॥ ३९ ॥
याप्रमाणे शरीराचा त्याग केल्याशिवाय अव्यक्त परमात्म्याचे सर्व स्वभाव त्या कर्मयोग्याच्या ठिकाणी स्पष्टपणे अनुभवास येतात. ॥ ३९॥

एर्‍हवीं आणिकांचिये परी । तोही एक शरीरी ।
अशेषाही व्यापारीं । वर्ततु दिसे ॥ ४० ॥
एरवी तोही इतर लोकांप्रमाणे शरीरात असून, सर्व व्यवहार करीत असतांना दिसतो. ॥ ४०॥

तोही नेत्रीं पाहे । श्रवणीं ऐकतु आहे ।
परि तेथींचा सर्वथा नोहे । नवल देखें ॥ ४१ ॥
तो देखील इतर लोकांसारखा डोळ्यांनी पहातो, कानांनी ऐकतो, परंतु आश्चर्य पहा की तो त्या व्यवहारात मुळीच लिप्त होत नाही. ॥ ४१॥

स्पर्शासि तरी जाणे । परिमळु सेवी घ्राणें ।
अवसरोचित बोलणें । तयाहि आथी ॥ ४२ ॥
तो इतरांसारखा स्पर्शासही समजतो, नाकाने गंधाचा अनुभव घेतो व समयोचित बोलण्याचा व्यवहारही त्याच्याकडून घडतो. ॥ ४२॥

आहारातें स्वीकारी । त्यजावें तें परिहरी ।
निद्रेचिया अवसरीं । निदिजे सुखें ॥ ४३ ॥
आहाराचे सेवन करतो, टाकायचे ते टाकतो व झोपेच्या वेळेला समाधानाने झोप घेतो. ॥ ४३॥

आपुलेनि इच्छावशें । तोही गा चालतु दिसे ।
पैं सकळ कर्म ऐसें । रहाटे कीर ॥ ४४ ॥
तो आपल्या इच्छेनुरूप चालतांना दिसतो. असे तो सर्व कर्मांचे खरोखर आचरण करतो. ॥ ४४॥

हें सांगों काई एकैक । देखें श्वासोच्छ्वासादिक ।
आणि निमिषोन्निमिष । आदिकरूनि ॥ ४५ ॥
हे एकेक काय सांगावे ? पहा, श्वास घेणे व सोडणे, आणि पापण्यांची उघडझाप करणे इत्यादी कर्मे ॥ ४५॥

पार्था तयाचे ठायीं । हें आघवेंचि आथि पाहीं ।
परी तो कर्ता नव्हे कांहीं । प्रतीतिबळें ॥ ४६ ॥
अर्जुना त्याच्या ठिकाणी ही सर्वच असतात असे समज. परंतु तो आपल्या अनुभवाच्या सामर्थ्यावर ह्यांचा कर्ता मुळीच होत नाही. ॥ ४६॥

जैं भ्रांतिसेजे सुतला । तैं स्वप्नसुखें भुतला ।
मग तो ज्ञानोदयीं चेइला । म्हणौनियां ॥ ४७ ॥
ज्यावेळी भ्रांतिरूप अंथरुणावर झोपला होता त्यावेळी तो स्वप्नाच्या सुखाने घेरला होता, मग ज्ञानाचा उदय झाला असतांना जागा झाला म्हणून तो आपल्याला कर्ता समजत नाही ॥ ४७॥

ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः ।
लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा ॥ १० ॥
ब्रह्माचे ठिकाणी कर्मे अर्पण करून, फलाची आसक्ती टाकून, जो कर्मे करतो तो कमलपत्र जसे पाण्यापासून अलिप्त असते, तसा पापापासून अलिप्त असतो. ॥५-१०॥

आतां अधिष्ठानसंगती । अशेषाही इंद्रियवृत्ती ।
आपुलालिया अर्थीं । वर्तत आहाती ॥ ४८ ॥
आता चैतन्याच्या आश्रयाने सर्वेंद्रियांच्या वृत्ती आपापल्या विषयाकडे धाव घेत असतात. ॥ ४८॥

दीपाचेनि प्रकाशें । गृहींचे व्यापार जैसे ।
देहीं कर्मजात तैसे । योगयुक्ता ॥ ४९ ॥
दिव्याच्या उजेडावर घरातील सर्व व्यवहार चालतात, त्याप्रमाणे ज्ञानाच्या आश्रयाने योगयुक्तांची सर्व कर्मे देहात चालतात. ॥ ४९॥

तो कर्में करी सकळें । परी कर्मबंधा नाकळे ।
जैसें न सिंपे जळीं जळें । पद्मपत्र ॥ ५० ॥
ज्याप्रमाणे कमलाचे पान पाण्यात असून पाण्याने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तो सर्व कर्मे करतो, परंतु धर्माधर्मरूप कर्मबंधाने आकळला जात नाही. ॥ ५०॥

कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि ।
योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये ॥ ११ ॥
केवळ शरीराने, केवळ मनाने, केवळ बुद्धीने आणि इंद्रियांनी कर्मयोगी फलासक्ती टाकून कर्म करतात, म्हणून त्यांची चित्तशुद्धी होते. (ते अहंकारविरहित कर्मे करत असतात, म्हणून ते कर्म करीत असूनही शुद्ध असतात.). ॥५-११॥

देखैं बुद्धीची भाष नेणिजे । मनाचा अंकुर नुदैजे ।
ऐसा व्यापारु तो बोलिजे । शारीरु गा ॥ ५१ ॥
पहा जे कर्म बुद्धीला समजण्याचे पूर्वी व मनात विचार उद्भवण्याच्या अगोदर होते त्या व्यवहाराला कायिक व्यवहार म्हणतात. ॥ ५१॥

हेंच मराठे परियेशीं । तरी बाळकाची चेष्टा जैशी ।
योगिये कर्में करिती तैशीं । केवळा तनु ॥ ५२ ॥
हेच स्पष्ट पाहिजे असेल तर ऐक. ज्याप्रमाणे तान्ह्या मुलाची हालचाल असते त्याप्रमाणे योगी केवळ शरीरानेच कर्म करतात. ॥ ५२॥

मग पांचभौतिक संचलें । जेव्हां शरीर असे निदेलें ।
तेथ मनचि रहाटें एकलें । स्वप्नीं जेवीं ॥ ५३ ॥
शरीर हे पाच भूतांचे बनलेले असते, त्यावेळेला ज्याप्रमाणे एकटे मनच स्वप्नात व्यवहार करते ॥ ५३॥

नवल ऐकें धनुर्धरा । कैसा वासनेचा पसारा ।
देहा होऊं नेदी उजगरा । परी सुखदुःखें भोगी ॥ ५४ ॥
अर्जुना, एक आश्चर्य पहा. या वासनेचा विस्तार केवढा आहे ! ती देहाला जागे होऊ देत नाही पण सुखदु:खाचा भोग भोगवते. ॥ ५४॥

इंद्रियांच्या गांवीं नेणिजे । ऐसा व्यापारु जो निपजे ।
तो केवळु गा म्हणिजे । मानसाचा ॥ ५५ ॥
इंद्रियांना ज्यांचा पत्ता नसतो, असे जे कर्म उत्पन्न होते त्याला केवळ मानसिक कर्म म्हणतात. ॥ ५५॥

योगिये तोही करिती । परी कर्में तें न बंधिजती ।
जे सांडिली आहे संगती । अहंभावाची ॥ ५६ ॥
योगी तेही कर्म करतात, पण त्या कर्माने बांधले जात नाहीत. कारण त्यांनी अहंकाराची संगती टाकलेली असते. ॥ ५६॥

आतां जाहालिया भ्रमहत । जैसें पिशाचाचें चित्त ।
मग इंद्रियांचें चेष्टित । विकळु दिसे ॥ ५७ ॥
आता ज्याप्रमाणे भूतांचा संचार झाल्यामुळे चित्त भ्रमाच्या स्वाधीन झाल्यावर मग संचार झालेल्या माणसाच्या इंद्रियांच्या क्रिया अमेळ दिसतात ॥ ५७॥

स्वरूप तरी देखे । आळविलें आइके ।
शब्दु बोले मुखें । परी ज्ञान नाहीं ॥ ५८ ॥
त्यास रूप तर दिसते, हाका मारलेले ऐकू येते, तो तोंडाने शब्दाचा उच्चारही करतो परंतु हे सर्व केल्याची त्यास जाणीव नसते. ॥ ५८॥

हें असो काजेंविण । जें जें कांहीं करण ।
तें केवळ कर्म जाण । इंद्रियांचें ॥ ५९ ॥
हे राहू दे, तो प्रयोजनावाचूनच जे काही करतो ते सर्व केवळ इंद्रियाचे कर्म आहे असे समज. ॥ ५९॥

मग सर्वत्र जें जाणतें । ते बुद्धीचें कर्म निरुतें ।
ओळख अर्जुनातें । म्हणे हरी ॥ ६० ॥
मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, सर्व ठिकाणी जाणण्याचे जे काम आहे, ते खरोखर बुद्धीचे आहे असे ओळख. ॥ ६०॥

ते बुद्धी धुरे करुनी । कर्म करिती चित्त देऊनी ।
परी ते नैष्कर्म्यापासुनी । मुक्त दिसती ॥ ६१ ॥
ते बुद्धीच्या प्रामुख्याने मन:पूर्वक कर्मे करतात पण ते कर्मयोगी नैष्कर्म्य स्थितीस प्राप्त झालेल्या पुरुषापेक्षाही मुक्त दिसतात. ॥ ६१॥

जें बुद्धीचिये ठावूनि देही । तयां अहंकाराची सेचि नाहीं ।
म्हणौनि कर्म करितां पाहीं । चोखाळले ॥ ६२ ॥
कारण त्यांच्यामध्ये बुद्धीपासून देहापर्यंत कोठेही अहंकाराचे स्मरणच नसते. म्हणून अशा कर्माचे आचरण करीत असताही ते शुद्धच असतात असे समज. ॥ ६२॥

अगा करितेनवीण कर्म । तेंचि तें नैष्कर्म्य ।
हें जाणती सुवर्म । गुरुगम्य जें ॥ ६३ ॥
अर्जुना, कर्तेपणाचा अहंकार टाकून केलेले जे कर्म तेच निष्कर्म होय. ही गुरूकडून कळणारी मर्माची गोष्ट प्राप्तपुरुष समजतात. ॥ ६३॥

आतां शांतरसाचें भरितें । सांडीत आहे पात्रातें ।
जें बोलणें बोलापरौतें । बोलवलें ॥ ६४ ॥
आता शांतरसाचा पूर मर्यादा सोडून उचंबळत आहे. कारण बोलण्याच्या पलीकडील गोष्टींचे व्याख्यान करता आले. ॥ ६४॥

एथ इंद्रियांचा पांगु । जया फिटला आहे चांगु ।
तयासीचि आथि लागु । परिसावया ॥ ६५ ॥
ज्यांचा इंद्रियांविषयींचा पराधीनपणा चांगल्या तर्‍हेने नाहीसा झाला आहे, त्यांनाच हे ऐकण्याची योग्यता आहे. ॥ ६५॥

हा असो अतिप्रसंगु । न संडी पां कथालागु ।
होईल श्लोकसंगति भंगु । म्हणौनियां ॥ ६६ ॥
(या ज्ञानेश्वर महाराजांच्या बोलण्यावर संत श्रोते म्हणतात) हे विषयांतर करणे पुरे. कथेचा संबंध सोडू नकोस. कारण तसे करण्याने श्लोकसंगतीचा बिघाड होईल. ॥ ६६॥

जें मना आकळितां कुवाडें । घाघुसितां बुद्धी नातुडे ।
तें दैवाचेनि सुरवाडें । सांगवलें तुज ॥ ६७ ॥
जे मनाने आकलन करणे कठिण आहे, घासाघीस केली तरी बुद्धीला जे प्राप्त होत नाही, ते दैवाच्या अनुकूलतेने तुला सहज सांगता आले. ॥ ६७॥

जें शब्दातीत स्वभावें । तें बोलींचि जरी फावे ।
तरी आणिकें काय करावें । कथा सांगैं ॥ ६८ ॥
जे स्वभावत: शब्दाच्या पलीकडचे आहे, ते बोलण्यात सापडले तर इतरांचे काय प्रयोजन ? तेव्हा तू श्रीकृष्ण संवादाची चाललेली कथा सांग. ॥ ६८॥

हा आर्तिविशेषु श्रोतयांचा । जाणोनि दास निवृत्तीचा ।
म्हणे संवादु दोघांचा । परिसोनि परिसा ॥ ६९ ॥
श्रोत्यांची अशी ही अतिशय उत्कंठा जाणून निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात, कृष्ण व अर्जुन या दोघात चाललेले हे संभाषण एवढा वेळ ऐकले ते लक्षात देऊन यापुढे ऐका. ॥ ६९॥

युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् ।
अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते ॥ १२ ॥
कर्मफालाचा त्याग करून (कर्म करणारा) योगी अत्यंत श्रेष्ठ अशी शांती (मोक्ष) मिळवतो. (कर्मयोगाचे ठिकाणी अयुक्त असलेला व फलाचे ठिकाणी आसक्त असलेला मनुष्य कामाचे योगाने प्रेरित झाल्यामुळे बंधन पावतो. ॥५-१२॥

मग श्रीकृष्ण म्हणे पार्थातें । आतां प्राप्ताचें चिन्ह पुरतें ।
सांगेन तुज निरुतें । चित्त देईं ॥ ७० ॥
मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, आता तुला कृतकृत्य झालेल्या पुरषाचे चिन्ह संपूर्ण सांगेन. तू चांगले लक्ष दे. ॥ ७०॥

तरी आत्मयोगें आथिला । जो कर्मफळाशीं विटला ।
तो घर रिघोनि वरिला । शांति जगीं ॥ ७१ ॥
तरी ज्ञानयोगाने जो संपन्न झाला आहे आणि ज्याला कर्मफलाचा वीट आलेला आहे त्याला या जगात शांती घरात घुसून वरते. ॥ ७१॥

येरु कर्मबंधें किरीटी । अभिलाषाचिया गांठीं ।
कळासला खुंटी । फळभोगाच्या ॥ ७२ ॥
अर्जुना त्याहून दुसरा प्रपंची कर्माच्या बंधामुळे अभिलाषेच्या दाव्याने फलभोगाच्या खुंट्याला बांधला जातो. ॥ ७२॥

सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी ।
नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन् ॥ १३ ॥
सर्व कर्मांचा (साक्षात नाही) मनाने संन्यास करून, जितेंद्रिय देहवान् पुरुष नवद्वाराच्या या देहरूपी नगरात सर्व करूनही काही न करता वा न करविता आनंदाने पडलेला असतो. ॥५-१३॥

जैसा फळाचिये हांवें । तैसें कर्म करी आघवें ।
मग न कीजेचि येणें भावें । उपेक्षी जो ॥ ७३ ॥
फलाची इच्छा असलेल्या पुरुषाप्रमाणे तो सर्व कर्मे करतो आणि नंतर आपल्या हातून ती गोष्ट घडलीच नाही अशा अकर्तेपणाच्या समजुतीने त्याविषयी उदासीन रहातो. ॥ ७३॥

तो जयाकडे वासु पाहे । तेउती सुखाची सृष्टि होये ।
तो म्हणे तेथ राहे । महाबोधु ॥ ७४ ॥
तो जिकडे पाहतो तिकडे सुखमय सृष्टी होते आणि तो जेथे सांगेल तेथे महाबोध नांदतो. ॥ ७४॥

नवद्वारें देहीं । तो असतुचि परि नाहीं ।
करितुचि न करी कांहीं । फलत्यागी ॥ ७५ ॥
नऊ छिद्रांच्या देहामध्ये वागत असूनही त्याचे देहाशी तादात्म्य नसते. तो फलांचा त्याग करणारा कर्मे करीत असताही (परिणामाच्या दृष्टीने पाहिले असता) काहीच करत नाही. ॥ ७५॥

न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः ।
न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते ॥ १४ ॥
विश्वाचा कर्तेपणा, कर्म अथवा कर्माचा फलाशी संयोग यापैकी काहीही सर्वेश्वर उत्पन्न करत नाही. स्वभाव म्हणजे प्रकृतीच सर्व करते. ॥५-१४॥

जैसा कां सर्वेश्वरू । पाहिजे तंव निर्व्यापारु ।
परि तोचि रची विस्तारु । त्रिभुवनाचा ॥ ७६ ॥
ज्याप्रमाणे सर्वेश्वर जर पाहिला तर तो वस्तुत: क्रियाशून्य असतो, परंतु तोच तिन्ही लोकांच्या विस्ताराची रचना करतो. ॥ ७६॥

आणि कर्ता ऐसें म्हणिपे । तरी कवणें कर्मीं न शिंपें ।
जे हातुपावो न लिंपे । उदासवृत्तीचा ॥ ७७ ॥
आणि त्यास कर्ता असे म्हणावे, तर तो कोणत्याही कर्मात लिप्त होत नाही. कारण त्याच्या ठिकाणी असणार्‍या उदासीनतेचा कोणताही अवयव अशुद्ध होत नाही. (ज्याची उदासीनता किंचितही बिघडत नाही. ॥ ७७॥

योगनिद्रा तरी न मोडे । अकर्तेपणा सळु न पडे ।
परी महाभूतांचें दळवाडें । उभारी भले ॥ ७८ ॥
त्याच्या सहज स्थितीचा तर भंग होत नाही व त्याचा अकर्तेपणा चोळवटत नाही असे असूनही तो महाभूतांचे समुदाय चांगल्या तर्‍हेने उत्पन्न करतो. ॥ ७८॥

जगाच्या जीवीं आहे । परी कवणाचा कहीं नोहे ।
जगचि हें होय जाये । तो शुद्धीहि नेणे ॥ ७९ ॥
तो जगातील सर्व प्राण्यांना व्यापून असतो. परंतु केव्हाही कोणाचीही आसक्ती धरत नाही. हे जग उत्पन्न होते व नाहीसे होते ह्याची त्य़ास खबरही नसते. ॥ ७९॥

नादत्ते कस्यचित्पापं न चैव सुकृतं विभुः ।
अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः ॥ १५ ॥
ईश्वर कोणाचे पाप घेत नाही, पुण्य घेत नाही, ज्ञान अज्ञानाने आच्छादलेले आहे, तेणेकरून प्राणी मोह पावतात. ॥५-१५॥

पापपुण्यें अशेषें । पासींचि असतु न देखें ।
आणि साक्षीही होऊं न ठके । येरी गोठी कायसी ? ॥ ८० ॥
प्राणिमात्राकडून होणारी संपूर्ण पापपुण्ये ही त्याच्या अगदी जवळ असतात, तरी तो त्यांना जणत नाही फार काय तो त्यांचा साक्षीही होऊन रहात नाही. तर मग दुसरी गोष्ट कशाला बोलायला पाहिजे ? ॥ ८०॥

पैं मूर्तीचेनि मेळें । तो मूर्तचि होऊनि खेळे ।
परि अमूर्तपण न मैळे । दादुलयाचें ॥ ८१ ॥
सगुण स्वरूपाच्या संगतीने तो सगुण होऊन क्रीडा करतो, परंतु त्या समर्थाच्या निर्गुणपणाला भ्रष्टता येत नाही. ॥ ८१॥

तो सृजी पाळी संहारी । ऐसें बोलती जे चराचरीं ।
तें अज्ञान गा अवधारीं । पंडुकुमरा ॥ ८२ ॥
तो उत्पन्न करतो, पालन करतो, असे त्याच्या कर्तृत्वाविषयी सर्व लोकात वर्णन होते. अर्जुना ऐक. ते केवळ अज्ञान आहे. ॥ ८२॥

ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः ।
तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम् ॥ १६ ॥
परमात्म्याच्या ज्ञानाने ज्यांचे अज्ञान नाश पावले आहे, त्यांना ते ज्ञान (सर्व वस्तूंच्या ठिकाणी) पर जी वस्तु आहे तिचे सूर्याप्रमाणे प्रकाशन करते. ॥५-१६॥

तें अज्ञान जैं समूळ तुटे । तै भ्रांतीचें मसैरें फिटे ।
मग अकर्तृत्व प्रगटे । मज ईश्वराचें ॥ ८३ ॥
ते अज्ञान ज्या वेळेला संपूर्ण नाहीसे होते, त्यावेळेला भ्रांतिरूप काजळी दूर होते आणि मग ईश्वराचे अकर्तृत्व प्रतीतीला येते. ॥ ८३॥

एथ ईश्वरु एकु अकर्ता । ऐसें मानलें जरी चित्ता ।
तरी तोचि मी हें स्वभावता । आदीचि आहे ॥ ८४ ॥
आणि ईश्वर एक अकर्ता आहे, असे जर चित्ताला पटले आणि मुळापासून स्वभावत: तोच (ईश्वरच) मी आहे. (तर मीही उघडच अकर्ता आहे) ॥ ८४॥

ऐसेनि विवेकें उदो चित्तीं । तयासी भेदु कैंचा त्रिजगतीं ।
देखें आपुलिया प्रतीति । जगचि मुक्त ॥ ८५ ॥
अशा विचाराने चित्तात उदय केला असता, त्याला तिन्ही लोकात भेद कशाचा ? तो आपल्या अनुभवाने सर्व जगच मुक्त आहे असे पहातो. ॥ ८५॥

तद्‌बुद्धयस्तदात्मानः तन्निष्ठातत्परायणः ।
गच्छन्त्यपुनरावृत्ति ज्ञाननिर्धूतकल्मषाः ॥ १७ ॥
त्या परब्रह्माचे ठिकाणी ज्यांच्या बुद्धी रंगल्या आहेत, ते परब्रह्म ज्यांचा आत्मा आहे. (ते परब्रह्मच आपण आहोत असा ज्यांच्या बुद्धि निश्चय करतात) त्यांचेच ठिकाणी ज्यांचा अभिनिवेश आहे (तेच आपण आहोत अशी भावना ज्यांच्या बुद्धी करत आहेत) आणि जे तत्परायण आहेत (त्याचाच निजध्यास ज्यांच्या बुद्धी करतात) त्या लोकांना पुनरपि संसार प्राप्त होत नाही. कारण ज्ञानाच्या योगाने त्यांचे दोष नाह

जैशी पूर्वदिशेच्या राउळीं । उदया येतांचि सूर्य दिवाळी ।
कीं येरीही दिशां तियेचि काळीं । काळिमा नाहीं ॥ ८६ ॥
ज्याप्रमाणे पूर्वदिशारूपी राजवाड्यात सूर्योदयरूपी दिवाळी झाली असता त्याच वेळेला दुसर्‍याही दिशातील काळोख नाहीसा होतो. ॥ ८६॥

बुद्धिनिश्चयें आत्मज्ञान । ब्रह्मरूप भावी आपणा आपण ।
ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण । तत्परायण अहर्निशीं ॥ ८७ ॥
बुद्धीच्या निश्चयाने आत्मज्ञान झाले, म्हणजे साधक आपणच आपल्याला ब्रह्मरूप मानू लागतो, आणि आपली वृत्ति पूर्ण ब्रह्माकार ठेऊन तो रात्रंदिवस त्याच अनुसंधानात असतो. ॥ ८७॥

ऐसें व्यापक ज्ञान भलें । जयांचिया हृदया गिंवसित आलें ।
तयांची समता दृष्टि बोलें । विशेषूं काई ॥ ८८ ॥
असे चांगले व्यापक ज्ञान ज्यांच्या हृदयांचा तपास करत आले आहे (ज्यांना प्राप्त झाले आहे) त्यांची जी समतादृष्टी होते, तिचे शब्दांनी विशेष काय वर्णन करू ? ॥ ८८॥

एक आपणपांचि जैसें । ते देखतीं विश्व तैसें ।
हें बोलणें कायसें । नवलु एथ ॥ ८९ ॥
ते जसे आपल्यालाचा ब्रह्मरूप पहातात, हे येथे सांगण्यात काय मोठे आश्चर्य आहे ? ॥ ८९॥

परी दैव जैसें कवतिकें । कहींचि दैन्य न देखे ।
कां विवेकु हा नोळखे । भ्रांतीतें जेवीं ॥ ९० ॥
परंतु ज्याप्रमाणे दैव हे लीलेने देखील केव्हाच दरिद्रतेला पहात नाही किंवा विचार हा ज्याप्रमाणे ओळखत नाही. ॥ ९०॥

नातरी अंधकाराची वानी । जैसा सूर्यो न देखे स्वप्नीं ।
अमृत नायके कानीं । मृत्युकथा ॥ ९१ ॥
किंवा अंधकाराचा मासला ज्याप्रमाणे सूर्याला स्वप्नातही दिसत नाही किंवा अमृताच्या कानावर मृत्यूची वार्ताही येत नाही ॥ ९१॥

हें असो संतापु कैसा । चंद्रु न स्मरे जैसा ।
भूतीं भेदु नेणती तैसा । ज्ञानिये ते ॥ ९२ ॥
हे राहू दे, उष्णता कशी असते हे ज्याप्रमाणे चंद्राला आठवूनही लक्षात येणार नाही, त्याप्रमाणे ते ज्ञानी लोक प्राण्यांच्या ठिकाणी भेदाला जाणत नाही. ॥ ९२॥

विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि ।
शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः ॥ १८ ॥
विद्या व विनय यांनी युक्त असा ब्राह्मण, गाय, हत्ती, तसेच कुत्रा आणि चांडाल या सर्वांचे ठिकाणी त्या ज्ञानी पुरुषांची दृष्टी सारखीच असते. ॥५-१८॥

मग हा मशकु हा गजु । कीं हा श्वपचु हा द्विजु ।
पैल इतरु हा आत्मजु । हें उरेल कें ? ॥ ९३ ॥
मग त्यांचे ठिकाणी हे चिलट, आणि हा हत्ती, किंवा हा चांडाळ आणि हा ब्राह्मण, किंवा हा आपला मुलगा आणि हा पलिकडे असलेला परका, हा भेद कोठून उरणार ? ॥ ९३॥

ना तरी हे धेनु हें श्वान । एक गुरु एक हीन ।
हें असो कैचें स्वप्न । जागतया ॥ ९४ ॥
अथवा ही गाय आणि हे कुत्रे अथवा एक थोर आणि एक नीच हे कोठले ? हे राहू दे, जागा असलेल्याला स्वप्न कोठून पडणार ? ॥ ९४॥

एथ भेदु तरी कीं देखावा । जरी अहंभाव उरला होआवा ।
तो आधींचि नाहीं आघवा । आतां विषमु काई ॥ ९५ ॥
जर अहंकार उरलेला असेल तरच भेदाची प्रतीती येईल. तो अहंकार तर अगोदरच सर्व नाहीसा झाला आता भेदभाव कोठला ? ॥ ९५॥

इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः ।
निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद् ब्रह्मणि ते स्थिताः ॥ १९ ॥
अशा समदृष्टीने ज्यांचे मन स्थिर झाले आहे त्यांनी या लोकीच संसाराला जिंकले. कारण ब्रह्म (सर्व भूतांचे ठिकाणी) सम आहे व दोषरहित आहे व यासाठी ते ज्ञानी पुरुष ब्रह्माचे ठिकाणी निश्चल झालेले असतात. (आणि म्हणून ते सर्वत्र सम आहेत). ॥५-१९॥

म्हणौनि सर्वत्र सदा सम । तें आपणचि अद्वय ब्रह्म ।
हें संपूर्ण जाणें वर्म । समदृष्टीचें ॥ ९६ ॥
म्हणून सर्व ठिकाणी सर्व काळ सारखे असणारे जे अद्वय ब्रह्म तेच आपण आहोत हे जे समदृष्टीचे तत्व ते तो संपूर्णपणे जाणतो. ॥ ९६॥

जिहीं विषयसंगु न सांडितां । इंद्रियांतें न दंडितां ।
परी भोगिली निसंगता । कामनेविण ॥ ९७ ॥
ज्यांनी विषयांचा संबंध टाकला नाही आणि इंद्रियांना शासन केले नाही, परंतु एक आपले ठिकाणी इच्छा नसल्यामुळे ज्यांनी अलिप्तता भोगली. ॥ ९७॥

जिहीं लोकांचेनि आधारें । लौकिकेंचि व्यापारें ।
परि सांडिलें निदसुरें । लौकिकु हें ॥ ९८ ॥
जे लोकांना अनुसरून, लोक करतात त्याप्रमाणे व्यवहार करतात, परंतु ज्यांनी लोकांचे ठिकाणी असणार्‍या अज्ञानाचा त्याग केला आहे ॥ ९८॥

जैसा जनामाजि खेचरु । असतुचि जना नोहे गोचरु ।
तैसा शरीरीं परी संसारु । नोळखे तयांतें ॥ ९९ ॥
ज्याप्रमाणे पिशाच जगात असून जगाला दिसत नाही, त्याप्रमाणे तो देहधारी असूनही संसारी लोक त्याला ओळखत नाहीत. ॥ ९९॥

हें असो पवनाचेनि मेळें । जैसें जळींचि जळ लोळे ।
तें आणिकें म्हणती वेगळें । कल्लोळ हे ॥ १०० ॥
हे राहू दे, वार्‍याच्या संगतीने ज्याप्रमाणे पाण्यावरच पाणी (लाटारूपाने) खेळते (पण) लोक त्य़ास, ह्या लाटा पाण्याहून वेगळ्या आहेत असे म्हणतात. ॥ १००॥

तैसें नाम रूप तयाचें । एर्‍हवीं ब्रह्मचि तो साचें ।
मन साम्या आलें जयाचें । सर्वत्र गा ॥ १०१ ॥
त्याप्रमाणे त्याचे नामरूपाची गोष्ट आहे. एरवी ज्याचे मन सर्व ठिकाणी साम्याला आलेले आहे, तो खरोखर ब्रह्मच आहे. ॥ १०१॥

ऐसेनि समदृष्टी जो होये । तया पुरुषा लक्षणही आहे ।
अर्जुना संक्षेपें सांगेन पाहें । अच्युत म्हणे ॥ १०२ ॥
अशा तर्‍हेने जो समदृष्टीने असतो. त्या पुरुषाला लक्षण देखील आहे. अच्युत म्हणाले, अर्जुना, मी तुला ते थोडक्यात सांगतो, त्याचा तू विचार कर, ॥ १०२॥

न प्रहृष्येत्प्रियं प्राप्य नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम् ।
स्थिरबुद्धिरसंमूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः ॥ २० ॥
प्रिय वस्तूची प्राप्ती झाली असता आनंद मानू नये आणि अप्रिय वस्तूची प्राप्ती झाली असता उद्वेग पावू नये. अशी समदृष्टी ज्यांची आहे तेच स्थिरबुद्धी, मोहरहित, ब्रह्मज्ञ व ब्रह्माचे ठिकाणी स्थित आहेत, असे ओळख. ॥५-२०॥

तरी मृगजळाचेनि पूरें । जैसें न लोटिजे कां गिरिवरें ।
तैसा शुभाशुभीं न विकरे । पातलिया जो ॥ १०३ ॥
मृगजलाच्या लोंढ्याने ज्याप्रमाणे मोठा पर्वत किंचितही ढकलला जात नाही, त्याप्रमाणे चांगल्या अथवा वाईट गोष्टी प्राप्त झाल्या असता ज्याच्यामधे विकार उत्पन्न होत नाहीत ॥ १०३॥

तोचि तो निरुता । समदृष्टी तत्त्वतां ।
हरि म्हणे पंडुसुता । तोचि ब्रह्म ॥ १०४ ॥
तोच खरोखर तात्विकदृष्ट्या समदृष्टीचा पुरुष होय. कृष्ण म्हणाले अर्जुना, ब्रह्म ते तोच समज. ॥ १०४॥

बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखम् ।
स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते ॥ २१ ॥
बाह्य विषयांचे ठिकाणी ज्यांचे अंत:करण आसक्त झालेले नाही, त्याला आत्म्याच्या ठिकाणी जे काय सुख आहे ते मिळते. तो ब्रह्माशी समरस होऊन युक्त झालेला पुरुष अक्षय्य सुखाचा अनुभव घेतो. ॥५-२१॥

जया आपणपें सांडूनि कहीं । इंद्रियग्रामावरी येणेंचि नाहीं ।
तो विषय न सेवी हें काई । विचित्र येथ ॥ १०५ ॥
जो आत्मस्वरूपाला सोडून केव्हाही इंद्रियरूपी गावात येत नाही, (म्हणजे तो इंद्रियांशी तादात्म्य पावत नाही) तो विषयसेवन करत नाही, यात काय आश्चर्य आहे ? ॥ १०५॥

सहजें स्वसुखाचेनि अपारें । सुरवाडलेनि अंतरें ।
रचिला म्हणौनि बाहिरें । पाउल न घाली ॥ १०६ ॥
अपरिमित अशा स्वाभाविक असलेल्या आत्मसुखाच्या विपुलतेने अंत:करणातच स्थिर झाल्यामुळे तो बाहेर पाऊल टाकत नाही. (विषयांकडे प्रवृत्त होत नाही. ॥॥ १०६॥

सांगैं कुमुददळाचेनि ताटें । जो जेविला चंद्रकिरणें चोखटें ।
तो चकोरु काई वाळुवंटें । चुंबितु असे ? ॥ १०७ ॥
सांग कमळाच्या पाकळीच्या पात्रावर जो शुद्ध चंद्रकिरणांचे भोजन करतो, तो चकोर पक्षी वाळवंटातील दगड चाटत बसेल काय ? ॥ १०७॥

तैसें आत्मसुख उपाइलें । जयासि आपणपेंचि फावलें ।
तया विषयो सहजें सांडवले । म्हणो काई ? ॥ १०८ ॥
त्याप्रमाणे ज्याला स्वत:च्या आपल्या ठिकाणी उत्कृष्ठ आत्मसुख प्राप्त झाले त्याला विषय सुटले हे काय सांगावयास पाहिजे ? ॥ १०८॥

एर्‍हवीं तरी कौतुकें । विचारूनि पाहें पां निकें ।
या विषयांचेनि सुखें । झकविती कवण ॥ १०९ ॥
एरवी सहजच चांगला विचार करून पहा, या विषयांच्या सुखाने कोण फसले जातात ? ॥ १०९॥

ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते ।
आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः ॥ २२ ॥
विषय व इंद्रिये यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे भोग दु:खालाच कारण होतात. त्यांना आदि आहे व अंत आहे, हे कौंतेया, ज्ञानी पुरुष त्यांचे ठिकाणी रममाण होत नाहीत. ॥५-२२॥

जिहीं आपणपें नाहीं देखिलें । तेचि इहीं इंद्रियार्थीं रंजले ।
जैसें रंकु कां आळुकैलें । तुषांतें सेवी ॥ ११० ॥
ज्याप्रमाणे भुकेलेला दरिद्री पुरुष कोंडा खातो, त्याप्रमाणे ज्यांनी आत्मस्वरूपाचा अनुभव घेतला नाही तेच या विषयात रंगतात. ॥ ११०॥

नातरी मृगें तृषापीडितें । संभ्रमें विसरोनि जळांतें ।
मग तोयबुद्धी बरडीतें । ठाकूनि येती ॥ १११ ॥
अथवा तहानेने त्रस्त झालेली हरणे भ्रमाने खर्‍या पाण्याला विसरून (मृगजळाला) पाणी आहे असे समजून माळरानावरच येऊन पोहोचतात. ॥ १११॥

तैसें आपणपें नाहीं दिठे । जयातें स्वसुखाचे सदा खरांटे ।
तयासीचि विषय हे गोमटे । आवडती ॥ ११२ ॥
तसेच ज्याला आत्मस्वरूपाचा अनुभव नाही (अर्थात) ज्यांचे ठिकाणी स्वरूपानंदाचा नेहेमी पूर्ण अभाव असतो त्यालाच हे विषय सुखरूप वाटतात. ॥ ११२॥

एर्‍हवीं विषयीं सुख आहे । हे बोलणेंचि सारिखें नोहे ।
तरी विद्युत्स्फुरणें कां न पाहे । जगामाजीं ॥ ११३ ॥
एरवी विषयांमधे काही सुख आहे, हे म्हणणे बोलण्यात जमा होणारे नाही. नाहीतर विजेच्या चमकण्याने जगामधे का उजाडत नाही ? ॥ ११३॥

सांगैं वात वर्ष आतपु धरे । ऐसे अभ्रच्छायाचि जरी सरे ।
तरी त्रिमाळिकें धवळारें । करावीं कां ॥ ११४ ॥
सांग, वारा, पाऊस आणि ऊन यांच्यापासून बचाव करण्याचे काम जर ढगांच्या सावलीनेच होईल, तर तीन मजल्यांची चुनेगच्ची घरे बांधण्याचा खटाटोप कशाला ? ॥ ११४॥

म्हणौनि विषयसुख जें बोलिजे । तें नेणतां गा वायां जल्पिजे ।
जैसें महूर कां म्हणिजे । विषकंदातें ॥ ११५ ॥
म्हणून ज्याप्रमाणे विषाच्या कांद्याला (बचनागाला) मधुर म्हणावे, त्याप्रमाणे विषयात सुख आहे असे जे म्हणतात ती (विषयांचे खरे स्वरूप न जाणताच) व्यर्थ केलेली बडबड आहे असे समज. ॥ ११५॥

नातरी भौमा नाम मंगळु । रोहिणीतें म्हणती जळु ।
तैसा सुखप्रवादु बरळु । विषयिकु हा ॥ ११६ ॥
किंवा पृथ्वीचा पुत्र असलेल्या ग्रहाला मंगळ असे म्हणतात, (पण त्याचा परिणाम पीडाकारक दिसून येतो) किंवा मृगजळालाच जल असे म्हणतात, त्याप्रमाणे विषयांपासून येणार्‍या अनुभवाला सुख म्हणणे व्यर्थ आहे. ॥ ११६॥

हे असो आघवी बोली । सांग पां सर्पफणीचा साउली ।
ते शीतल होईल केतुली । मूषकासी ? ॥ ११७ ॥
हे सर्व प्रतिपादन राहू दे, तूच सांग, सर्पाच्या फडेची सावली आहे ती उंदराला कितपत शांत करणारी होईल बरे ? ॥ ११७॥

जैसा आमिषकवळु पांडवा । मीनु न सेवी तंवचि बरवा ।
तैसा विषयसंगु आघवा । निभ्रांत जाणें ॥ ११८ ॥
अर्जुना, ज्याप्रमाणे गळाला लावलेल्या आमीषाचा पिंड जोपर्यंत मासा गिळत नाही तोपर्यंतच ठीक. त्याप्रमाणे विषयांचा सर्व संग आहे, हे तू नि:संशय समज. ॥ ११८॥

हे विरक्तांचिये दिठी । जैं न्याहाळिजे किरीटी ।
तैं पांडुरोगाचिये पुष्टी- । सारिखें दिसे ॥ ११९ ॥
विरक्तांच्या नजरेने पाहिले तर हे विषय, अर्जुना, पंडुरोगामधे आलेल्या लठ्ठपणाप्रमाणे घातक आहेत असे समज. ॥ ११९॥

म्हणौनि विषयभोगीं जें सुख । तें साद्यंतचि जाण दुःख ।
परि काय कीजे मूर्ख । न सेवितां न सरे ॥ १२० ॥
म्हणून विषयांच्या उपभोगामधे जे सुख असते ते प्रारंभापासून शेवटपर्यंत दु:खच आहे हे समज. परंतु काय करतील वेडे ? विषयांचे सेवन केल्याशिवाय त्यांचे चालतच नाही. ॥ १२०॥

तें अंतर नेणती बापुडे । म्हणौनि अगत्य सेवणें घडे ।
सांगैं पूयपंकींचे किडे । काय चिळसी घेती ॥ १२१ ॥
ते बिचारे वेडे लोक आतले स्वरूप जाणत नाहीत. म्हणून त्यांच्याकडून विषयांचे सेवन होते. तूच सांग, पुवाच्या चिखलातील किडे पुवाची किळस घेतात काय ? ॥ १२१॥

तयां दुःखियां दुःखचि जिव्हार । ते विषयकर्दमींचे दर्दुर ।
ते भोगजळींचे जळचर । सांडिती केवीं ॥ १२२ ॥
त्या दु:खी लोकांना दु:खच जीवन होऊन राहिलेले असते. ते विषयरूपी चिखलातील बेडूकच बनतात. ते विषयासक्त लोकरूपी मासे विषयभोगरूपी पाण्याला कसे टाकतील ? ॥ १२२॥

आणि दुःखयोनि जिया आहाती । तिया निरर्थका तरी नव्हती ।
जरी विषयांवरी विरक्ती । धरिती जीव ॥ १२३ ॥
शिवाय जर हे जीव विषयांवर अनासक्त होतील तर दु:खदायक योनी ज्या आहेत, त्या निरर्थक होणार नाहीत काय ? ॥ १२३॥

नातरी गर्भवासादि संकट । कां जन्ममरणींचे कष्ट ।
हे विसांवेवीण वाट । वाहावी कवणें ॥ १२४ ॥
अथवा गर्भात रहाणे वगैरे संकट किंवा जन्म आणि मरण यापासून होणारे कष्ट हा मार्ग अविश्रांतपणे कोणी चालावा ? ॥ १२४॥

जरी विषयीं विषयो सांडिजेल । तरी महादोषीं कें वसिजेल ।
आणि संसारु हा शब्दु नव्हेल । लटिका जगीं ? ॥ १२५ ॥
जर विषयासक्त लोक विषय सोडून देतील तर मोठमोठ्या दोषांना रहायला जागा कशी मिळणार ? आणि या जगामधे संसार हा शब्दच खोटा ठरणार नाही का ? ॥ १२५॥

म्हणौनि अविद्याजात नाथिलें । तें तिहींचि साच दाविलें ।
जिहीं सुखबुद्धी घेतलें । विषयदुःख ॥ १२६ ॥
म्हणून ज्यांनी विषयांपासून होणारे दु:खच सुख या समजुतीने स्वीकारले त्यांनीच मिथ्या असलेले सर्व अविद्यादिक खरे करून दाखवले. ॥ १२६॥

या कारणें गा सुभटा । हा विचारितां विषय वोखटा ।
तूं झणें कहीं या वाटा । विसरोनि जाशी ॥ १२७ ॥
अर्जुना, यामुळेच विचार करून पाहिले तर हे विषय वाईट आहेत. तू विस्मरणाने कदाचित चुकून जरी कधी त्या मार्गाला लागशील तर जाऊ नकोस. ॥ १२७॥

पैं यातें विरक्त पुरुष । त्यजिती कां जैसें विष ।
निराशा तयां दुःख । दाविलें नावडे ॥ १२८ ॥
हे जे विरक्त पुरुष आहेत ते या विषयांना जसे काही विषच आहेत असे मानून त्यांचा त्याग करतात. कारण ते निरीच्छ असल्या कारणाने विषयांनी दाखवलेले दु:खरूपी सुख त्यांना आवडत नाही. ॥ १२८॥

शक्नोतीहैव यः सोढुं प्राक्‌शरीरविमोक्षणात् ।
कामक्रोधोद्‌भवं वेगं स युक्तः स सुखी नरः ॥ २३ ॥
इहलोकी मरणाचे अगोदर जो मनुष्य काम व क्रोध यांचा वेग सहन करू शकतो तोच योगी व तोच सुखी होय ॥५-२३॥

ज्ञानियांच्या हन ठायीं । याची मातुही कीर नाहीं ।
देहीं देहभावो जिहीं । स्ववश केले ॥ १२९ ॥
आत्मज्ञान्यांच्या ठिकाणी तर या दु:खरूपी विषयांची गोष्टसुद्धा नाही. कारण त्यांनी देहात असतानाच काम-क्रोधादी वृत्ती आपल्या स्वाधीन ठेवल्या आहेत. ॥ १२९॥

जयांतें बाह्याची भाष । नेणिजेचि निःशेष ।
अंतरीं सुख । एक आथि ॥ १३० ॥
त्यांना अंत:करणात एक ब्रह्मसुखच अनुभावाला आलेले असते, म्हणूण ते बाह्य विषयांची गोष्ट मुळीच जाणत नाहीत. ॥ ३०॥

परि तें वेगळेपणें भोगिजे । जैसें पक्षियें फळ चुंबिजे ।
तैसें नव्हे तेथ विसरिजे । भोगितेपणही ॥ १३१ ॥
परंतु पक्षी जसे फळ खातो (म्हणजे खाणारा पक्षी, खाण्याचा विषय फळ आणि क्रिया ही त्रिपुटी स्पष्ट भासते) तसे ते ब्रह्मसुख वेगळेपणाने (भोक्ता, भोग्य व भोग ही त्रिपुटी कायम ठेऊन) भोगण्यासारखे नाही. तर तेथे भोक्तेपणही विसरले पाहिजे. (म्हणजे हे भोगणे त्रिपुटीविरहित म्हणजेच तद्रूपतेने असते). ॥ १३१॥

भोगीं अवस्था एकी उठी । ते अहंकाराचा अंचळु लोटी ।
मग सुखेंसि घे आंटी । गाढेपणें ॥ १३२ ॥
त्या भोगामधे वृत्तीची अशी एक स्थिती उत्पन्न होते की ती स्थिती अहंकाराचा पडदा दूर करते आणि मग तो जीव सुखाला गाढ आलिंगन देतो ॥ १३२॥

तिये आलिंगनमेळीं । होय आपेंआप कवळी ।
तेथ जळ जैसें जळीं । वेगळें न दिसे ॥ १३३ ॥
पाण्यात पाणी मिळाले असता जसे वेगळे दिसत नाही, त्याप्रमाणे त्या आलिंगनाच्या संबंधात आपणच आपल्याला मिठी मारतो. (म्हणजे आपलेच आपल्याशी सहजच ऐक्य होते.) ॥ १३३॥

कां आकाशीं वायु हारपे । तेथ दोन्ही हे भाष लोपे ।
तैसे सुखचि उरे स्वरूपें । सुरतीं तिये ॥ १३४ ॥
अथवा आकाशामधे वायूचा लय झाला की आकाश व वायु हे दोन आहेत असे म्हणता येत नाही, तसे या भोगामधे केवळ एक ब्रह्मसुखच स्वरूपाने रहाते. ॥ १३४॥

ऐसी द्वैताची भाष जाय । मग म्हणों जरी एक होय ।
तरी तेथ साक्षी कवणु आहे । जाणते जें ॥ १३५ ॥
अशी द्वैताची गोष्टच गेली म्हणजे ऐक्य होते, असे जर म्हणावे अर तसे ऐक्य जाणून ‘ऐक्य आहे’ असे म्हणणारा तेथे साक्षी तरी कोण उरला आहे ? ॥ १३५॥

योऽन्तःसुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः ।
स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति ॥ २४ ॥
जो अंत:सुखी (आत्मस्वरूप बनल्यामुळे स्वत:च सुखरूप झालेला) अंतराराम (आत्मरूप बनून तेथेच क्रीडा करणारा), अंतर्ज्योती (आत्मप्रकाश ज्याच्या आत पडला आहे) असा जो योगी तो ब्रह्मरूप होऊन त्याला इहलोकीच मुक्ती प्राप्त होते. ॥५-२४॥

म्हणौनि असो हें आघवें । एथ न बोलणें काय बोलावें ।
ते खुणाचि पावले स्वभावें । आत्माराम ॥ १३६ ॥
म्हणून हे मागील सगळे असू दे. जे न बोलण्यासारखे आहे ते काय बोलावे ? जे ब्रह्मनिष्ठ आहेत तेच हे मर्म सहज जाणतील. ॥ १३६॥

जे ऐसेनि सुखें मातले । आपणपांचि आपण गुंतले ।
ते मी जाणें निखिळ वोतले । सामरस्याचे ॥ १३७ ॥
जे अशा सुखाने मस्त अथवा धुंद झाले आहेत, ते पूर्णपणे सामरस्याचे (ब्रह्मैक्य भावाचे) ओतलेले पुतळेच आहेत, असे मी समजतो. ॥ १३७॥

ते आनंदाचे अनुकार । सुखाचे अंकुर ।
कीं महाबोधें विहार । केले जैसे ॥ १३८ ॥
ते आनंदाचे प्रतिबिंब किंवा सुखाचे ओतलेले कोंब आहेत, जणु काही महाबोधाने आपल्याला रहाण्याला मंदिर केले आहेत. ॥ १३८॥

ते विवेकाचें गांव । कीं परब्रह्मींचे स्वभाव ।
नातरी अळंकारले अवयव । ब्रह्मविद्येचे ॥ १३९ ॥
ते शुद्ध सत्वाचे सात्विक आहेत अथवा चैतन्याचे अवयव आहेत. ते विवेकाचे मूळ वसतिस्थान आहेत किंवा परब्रह्माच्या ठिकाणचे स्वभाव किंवा जणु काय मूर्तिमंत ब्रह्मविद्येचे सजवलेले अवयवच आहेत. ॥ १३९॥

ते सत्त्वाचे सात्त्विक । कीं चैतन्याचे आंगिक ।
हें बहु असो एकैक । वानिसी काई ॥ १४० ॥
यावर श्रीगुरु निवृत्तिनाथ म्हणाले, हा बोलण्याचा विस्तार पुरे कर. तू एक एक कोठवर वर्णन करणार ? ॥ १४०॥

तूं संतस्तवनीं रतसी । तरी कथेची से न करिसी ।
कीं निराळीं बोल देखसी । सनागर ॥ १४१ ॥
तू जेव्हा संतांच्या स्तुतीत तन्मय होतोस तेव्हा चालू विषयाचे स्मरण तुला रहात नाही आणि विषयाला सोडून पण चांगले बोल तू बोलतोस. ॥ १४१॥

परि तो रसातिशयो मुकुळीं । मग ग्रंथार्थदीपु उजळीं ।
करी साधुहृदयराउळीं । मंगळ‌उखा ॥ १४२ ॥
परंतु हा रसाचा अधिकपणा आवरता घे आणि आता ग्रंथाचा अर्थरूपी दिवा प्रज्वलित कर. तू सज्जनांच्या अंत:करणरूपी मंदिरात मंगलकारक दिवसाचा प्रात:काल कर. ॥ १४२॥

ऐसा श्रीगुरूचा उवायिला । निवृत्तिदासासी पातला ।
मग तो म्हणे श्रीकृष्ण बोलिला । तेंचि आइका ॥ १४३ ॥
याप्रमाणे श्रीगुरूंचा इशारा निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव यांना मिळाला. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, श्रीकृष्ण जे म्हणाले तेच ऐका. ॥ १४३॥

अर्जुना अनंत सुखाच्या डोहीं । एकसरा तळुचि घेतला जिहीं ।
मग स्थिराऊनि तेही । तेंचि जाहले ॥ १४४ ॥
अर्जुना, अमर्याद सुखाच्या डोहात जे एकदम तळाशी जाऊन पोहोचले आहेत ते मग त्याच ठिकाणी स्थिर होऊन तद्रूपतेला प्राप्त झाले. ॥ १४४॥

लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषयः क्षीणकल्मषाः ।
छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः ॥ २५ ॥
ज्यांचे पापादि दोष नष्ट झाले आहेत, ज्यांच्या संशयाचा छेद झाला आहे, ज्यांनी मन ताब्यात ठेवले आहे आणि प्राणिमात्रांच्या हिताविषयी जे रत आहेत असे ऋषी मोक्ष मिळवतात. ॥५-२५॥

अथवा आत्मप्रकाशें चोखें । जो आपणपेंचि विश्व देखे ।
तो देहेंचि परब्रह्म सुखें । मानूं येईल ॥ १४५ ॥
अथवा शुद्ध आत्मज्ञानाने जो, आपणच आहोत असे जाणतो, तो देहामधेच परब्रह्म आहे असे खुशाल म्हणता येईल. ॥ १४५॥

जें साचोकारें परम । ना तें अक्षर निःसीम ।
जिये गांवींचे निष्काम । अधिकारिये ॥ १४६ ॥
जे खरोखर अतिशय श्रेष्ठ आहे अथवा जे क्षयरहित व अमर्याद आहे व कामनाशून्य लोक ज्या ठिकाणची प्राप्ती करून घेण्यास अधिकारी आहेत ॥ १४६॥

जे महर्षीं वाढले । विरक्तां भागा फिटलें ।
जे निःसंशया पिकलें । निरंतर ॥ १४७ ॥
ते थोर ऋषींकरताच काढून ठेवले आहे किंवा वैराग्यावानांच्या वाट्याला आलेले आहे व जे नेहेमी संशयरहितास फालद्रूप होते. ॥ १४७॥

कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् ।
अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम् ॥ २६ ॥
काम व क्रोध यांनी विरहित असलेले, मन ताब्यात ठेवणारे आणि आत्मतत्व जाणणारे यती येथेच (या देहातच) ब्रह्म बनतात. ॥५-२६॥

जिहीं विषयांपासोनि हिरतलें । चित्त आपुलें आपण जिंतिलें ।
ते निश्चित जेथ सुतले । चेतीचिना ॥ १४८ ॥
ज्यांनी आपण आपले चित्त विषयांपासून हिरावून घेऊन आपले स्वाधीन करून ठेवले आहे, असे पुरुष निश्चयाने ज्या स्वरूपात लीन झाले असता पुन: जागे होत नाहीत (वृत्तीवर येत नाहीत) ॥ १४८॥

तें परब्रह्म निर्वाण । जें आत्मविदांचें कारण ।
तेंचि ते पुरुष जाण । पंडुकुमरा ॥ १४९ ॥
आत्मज्ञान्यांचे साध्य, जे मोक्षरूप ब्रह्म तेच ते पुरुष आहेत. असे अर्जुना, तू समज. ॥ १४९॥

ते ऐसे कैसेंनि जहाले । जे देहींचि ब्रह्मत्वा आले ।
हें पुससी तरी भलें । संक्षेपें सांगों ॥ १५० ॥
(वर सांगितलेले) जे देहधारी असतांनाच ब्रह्मभावास आले ते असे कशाने झाले हेही विचारशील तर ते आम्ही चांगले पण थोडक्यात सांगतो. ॥ १५०॥

स्पर्शान्कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः ।
प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ ॥ २७ ॥
बाह्य विषयांना दूर करून, दोन भुवयांमधे दृष्टि ठेऊन, नासिकेमधे असलेले प्राण व अपान यांना समान करून ॥५-२७॥

तरी वैराग्याचेनि आधारें । जिहीं विषय दवडूनि बाहिरें ।
शरीरीं एकंदरें । केलें मन ॥ १५१ ॥
तरी वैराग्याच्या आश्रयाने अंत:करणातील विषयवासना बाहेर काढून देऊन त्यांनी मनाच्या वृत्ती शरीरामधे अंतर्मुखतेने एकाग्र केल्या. ॥ १५१॥

सहजें तिहीं संधी भेटी । जेथ भ्रूपल्लवां पडे गांठी ।
तेथ पाठिमोरी दिठी । पारखोनियां ॥ १५२ ॥
इडा, पिंगळा व सुषुम्ना या तिघींच्या संधीत जेथे भुवयांच्या टोकांचा मिलाफ होतो तेथे दृष्टि स्थिर करून मागे फिरवतात ॥ १५२॥

सांडूनि दक्षिण वाम । प्राणापानसम ।
चित्तेंसीं व्योम- । गामिये करिती ॥ १५३ ॥
उजव्या (पिंगळा) व डाव्या (इडा) नाकपुडीतून जात येत असलेल्या वायूची गति (रेचक व पूरक) बंद करून (म्हणजे कुंभक करून) प्राण (हृदयस्थ वायु) व अपान (गुदस्थ वायु) यांची समगति म्हणजे ऐक्य करून त्यासह चित्तास ते व्योमगामी (म्हणजे मूर्ध्नी आकाशाकडे जाणारे) करतात. ॥ १५३॥

यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः ।
विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः ॥ २८ ॥
मन व बुद्धी यांचे नियमन करून जो मुनि मोक्ष हेच आपले अंतिम ध्येय ठेवतो व इच्छा, भय आणि क्रोध ही ज्याची नाश पावली आहेत, तो सर्वदा मुक्तच समजावा. ॥५-२८॥

तेथ जैसीं रथ्योदकें सकळें । घेऊनि गंगा समुद्रीं मिळे ।
मग एकेकु वेगळें । निवडूं नये ॥ १५४ ॥
तेथे ज्याप्रमाणे रस्त्यावरून वहाणारे पाणी आपल्या पोटात घेऊन गंगा समुद्राला मिळते, त्यावेळेला (एक हे गटारातील पाणी एक हे गंगेचे पाणी अशी वेगवेगळी निवड करता येत नाही. ॥ १५४॥

तैसी वासनांतराची विवंचना । मग आपैसी पारुखे अर्जुना ।
जे वेळीं गगनीं लयो मना । पवनें कीजे ॥ १५५ ॥
त्याप्रमाणे अर्जुना, ज्यावेळी प्राणापानांच्या निरोधाने मूर्ध्न्याकाशात मनाचा लय केला जातो, त्यावेळी नाना प्रकारच्या वासनांची निवड सहजच थांबते. ॥ १५५॥

जेथ हें संसारचित्र उमटे । तो मनोरूपु पटु फाटे ।
जैसें सरोवर आटे । मग प्रतिभा नाहीं ॥ १५६ ॥
त्यावेळी ज्या ठिकाणी हे संसाररूप चित्र उमटते तो मनोरूपी पडदा (वस्त्र) फाटून जातो. ज्याप्रमाणे सरोवर आटले म्हणजे प्रतिबिंब नाहीसे होते, ॥ १५६॥

तैसें मन एथ मुद्दल जाय । मग अहंभावादिक कें आहे ।
म्हणौनि शरीरेंचि ब्रह्म होये । अनुभवी तो ॥ १५७ ॥
त्याप्रमाणे मनाचे मनपण मुळीच नाहीसे झाल्यावर मग ‘मी देह’ वगैरे अहंकारादी विकार कोठे राहिले ? (देहाहंकारादी विकार नाहीसे झाले) म्हणून तो ब्रह्मानुभवी पुरुष देहधारी असतानाच ब्रह्म बनतो. ॥ १५७॥

भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम् ।
सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति ॥ २९ ॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भजगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसंज्ञासयोगोनाम पंचमोऽध्यायः ॥ ५ ॥
यज्ञ व तप यांचा भोक्ता, सर्व लोकांचा महेश्वर व प्राणिमात्रांचा मित्र मी आहे, अशा प्रकारे जो मला जाणतो त्याला शांती प्राप्त होते. ॥५-२९॥

आम्हीं मागां हन सांगितलें । जे देहींचि ब्रह्मत्व पावले ।
ते येणें मार्गें आले । म्हणौनियां ॥ १५८ ॥
देहधारी असतांनाच ब्रह्मभावाला पावले, असे जे आम्ही मागे सांगितले, ते या मार्गाने आले म्हणून ॥ १५८॥

आणि यमनियमांचे डोंगर । अभ्यासाचे सागर ।
क्रमोनि हे पार । पातले ते ॥ १५९ ॥
आणि यमनियमांचे डोंगर व अभ्यासाचे समुद्र ओलांडून ते ह्या पलीकडच्या तीराला ब्रह्मत्वाला पोचले. ॥ १५९॥

तिहीं आपणपें करूनि निर्लेप । प्रपंचाचें घेतलें माप ।
मग साचाचेंचि रूप । होऊनि ठेले ॥ १६० ॥
त्यांनी आपणा स्वत:ला शुद्ध करून प्रपंचाची योग्य किंमत केली आणि मग सत्य पदार्थ जे ब्रह्म, ते तद्रूप होऊन ते राहिले. ॥ १६०॥

ऐसा योगयुक्तीचा उद्देशु । जेथ बोलिला हृषीकेशु ।
तेथ अर्जुनु सुदंशु । म्हणौनि चमत्कारला॥ १६१ ॥
जेव्हा श्रीकृष्णांनी योगमार्गाचा अभिप्राय अशा रीतीने थोडक्यात सांगितला, तेव्हा अर्जुन मर्मज्ञ असल्याकारणाने आश्चर्यचकित झाला. (कारण त्याने कधी ऐकला नाही असा योगाचा हा प्रकार पहिल्यांदाच ऐकला.) ॥ १६१॥

तें देखिलिया कृष्णें जाणितलें । मग हांसोनि पार्थातें म्हणितलें ।
काई पां चित्त उवाइलें । इये बोलीं तुझें ? ॥ १६२ ॥
श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या मनाची ही स्थिती जाणली व मग ते हसून अर्जुनाला म्हणाले, ‘आमच्या बोलण्याने तुझे चित्त प्रसन्न झाले का ? ॥ १६२॥

तंव अर्जुन म्हणे देवो । परचित्तलक्षणांचा रावो ।
भला जाणितला जी भावो । मानसु माझा ॥ १६३ ॥
यावर अर्जुन म्हणाला श्रीकृष्णा, आपण मनकवड्यांचे राजे अहात. आपण माझ्या चित्तातला अभिप्राय चांगलाच ओळखलात. ॥ १६३॥

म्यां जें कांहीं विवरोनि पुसावें । तें आधींचि जाणितलें देवें ।
तरी बोलिलें तेंचि सांगावें । विवळ करूनि ॥ १६४ ॥
मी जे काही विचार करून तुम्हास विचारावे, ते देवा, आपण आधीच जाणलेत. तरी आपण जे बोललात तेच स्पष्ट करून सांगा. ॥ १६४॥

एर्‍हवीं तरी अवधारा । जो दाविला तुम्हीं अनुसारा ।
तो पव्हण्याहूनि पाय‌उतारा । सोहपा जैसा ॥ १६५ ॥
सहज विचार करून पाहिले तर देवा, ऐका, तुम्ही जो मार्ग दाखवला, तो पोहून जाण्यापेक्षा पाय उताराने जाणे जसे सोपे ॥ १६५॥

तैसा सांख्याहूनि प्रांजळा । परी आम्हांसारिखियां अभोळां ।
एथ आहाति परि कांहीं काळा । तो साहों ये वर ॥ १६६ ॥
तसा हा योगमार्ग सांख्यमार्गाहून सोपा आहे. परंतु आमच्यासारख्या दुर्बळांना येथे काही विलंब लागेल, पण तो सहन करता येईल. ॥ १६६॥

म्हणौनि एक वेळ देवा । तोचि पडताळा घेयावा ।
विस्तरेल तरी सांगावा । साद्यंतुचि॥ १६७ ॥
म्हणून देवा, एक वेळ त्याचाच अनुवाद करावा, जरी विस्तार झाला तरी हरकत नाही. पण तो योगमार्ग आरंभापासून अखेरपर्यंत सांगाच. ॥ १६७॥

तंव श्रीकृष्ण म्हणती हो कां । तुज हा मार्गु गमला निका ।
तरी काय जाहलें आईकीजो कां । सुखें बोलों॥ १६८ ॥
तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, असे का ? तुला हा मार्ग चांगला वाटतो, तर सांगायला आमची काय हरकत आहे ? ऐक, आम्ही तो आनंदाने सांगतो. ॥ १६८॥

अर्जुना तूं परिससी । परिसोनि अनुष्ठिसी ।
तरी आम्हांसीचि वानी कायसी । सांगावयाची ? ॥ १६९ ॥
अर्जुना तू ऐकतोस व ऐकून त्याप्रमाणे आचरण करतोस असे जर आहे, तर आम्हीच सांगावयास का कमी करू ? ॥ १६९॥

आधींचि चित्त मायेचें । वरी मिष जाहले पढियंतयाचें ।
आतां तें अद्‍भुतपण स्नेहाचें । कवण जाणे ॥ १७० ॥
(ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की) अगोदरच आईचे अंत:करण, त्यात आवडतेपणाचे निमित्त झाले, मग त्या ममतेच्या अद्भुततेची कल्पना कोणाला येईल ? ॥ १७०॥

तें म्हणो कारुण्यरसाची वृष्टि । कीं नवया स्नेहाची सृष्टि ।
हें असो नेणिजे दृष्टी । हरीची वानूं ॥ १७१ ॥
ती हरीची कृपादृष्टि करुणरसाचा वर्षाव आहे असे म्हणू ! अथवा नव्या स्नेहाची सृष्टि आहे असे म्हणू ? हे राहू द्या. कृष्णाच्या दृष्टीचे वर्णन कसे करावे हे आम्हाला कळत नाही. ॥ १७१॥

जे अमृताची वोतली । कीं प्रेमचि पिऊनि मातली ।
म्हणौनि अर्जुनमोहें गुंतली । निघों नेणें ॥ १७२ ॥
ही हरीची दृष्टी (जणू काय) अमृताचीच ओतलेली होती अथवा अर्जुनाविषयीचे प्रेम पिऊन मस्त झाली होती. म्हणून अर्जुनाच्या मोहात अडकलेल्या त्या हरीच्या दृष्टीस बाहेर निघण्याचे कळेना. ॥ १७२॥

हें बहु जें जें जल्पिजेल । तेथें कथेसि फांकु होईल ।
परि तें स्नेहरूपा न येल । बोलवरी॥ १७३ ॥
या हरीच्या दृष्टांता संबंधाने जितकी जास्त जास्त बडबड करावी तितकी तितकी कथेची संगती सुटून या वर्णनाचा विस्तार वाढेल. परंतु शेवटी हरीच्या अर्जुनाविषयीच्या प्रेमाचे यथार्थ वर्णन शब्दांनी करता येणार नाही. ॥ १७३॥

म्हणौनि विसुरा काय येणें । तो ईश्वरु कवळावा कवणें ।
जो आपुलें मान नेणें । आपणचि॥ १७४ ॥
यात आश्चर्य ते काय ? कारण जो आपले मोजमाप आपणच जाणत नाही तो ईश्वर कोणी आकलन करावा ? ॥ १७४॥

तरी मागीला ध्वनीआंतु । मज गमला सावियाचि मोहितु ।
जे बलात्कारें असे म्हणतु । परिस बापा ॥ १७५ ॥
तर मागील बोलण्याच्या अभिप्रायावरून मला सहज असे वाटते की देव अर्जुनाच्या प्रेमरूपी मोहात गुंतले आहेत कारण ते अर्जुनाला बलात्काराने अरे बाबा, ऐक, असे म्हणत होते. ॥ १७५॥

अर्जुना जेणें जेणें भेदें । तुझें कां चित्त बोधे ।
तैसें तैसें विनोदें । निरूपिजेल ॥ १७६ ॥
अर्जुना, ज्या प्रकाराने तुझ्या चित्ताला कळेल त्या त्या रीतीने कौतुकाने सांगण्यात येईल. ॥ १७६॥

तो काइसया नाम योगु । तयाचा कवण उपेगु ।
अथवा अधिकारप्रसंगु । कवणा येथ ॥ १७७ ॥
योग हे कशाला नाव आहे ? त्याचा उपयोग काय ? अथवा योगाचा कोणाला अधिकार आहे ॥ १७७॥

ऐसें जें जें कांहीं । उक्त असे इये ठाईं ।
तें आघवेंचि पाहीं । सांगेन आतां ॥ १७८ ॥
याप्रमाणे जे जे काही या बाबतीत शास्त्रात सांगितलेले असेल ते सर्वच मी तुला आता सांगेन, पहा. ॥ १७८॥

तूं चित्त देऊनि अवधारीं । ऐसें म्हणौनि श्रीहरी ।
बोलिजेल ते पुढारी । कथा आहे ॥ १७९ ॥
तू मन लाऊन ऐक. असे म्हणून श्रीहरी जे बोलले ती कथा पुढे आहे, ती सांगण्यात येईल. ॥ १७९॥

श्रीकृष्ण अर्जुनासी संगु । न सांडोनि सांगेल योगु ।
तो व्यक्त करूं प्रसंगु । म्हणे निवृत्तिदासु ॥ १८० ॥
अर्जुनाशी असलेल्या सख्ख्यात बिघाड येऊ न देता श्रीकृष्ण अर्जुनाला अष्टांगयोग सांगतील, तो प्रसंग निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात की मी स्पष्ट रीतीने सांगेन ॥॥ १८०॥


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref:satsangdhara 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *