sant eknath maharaj

एकनाथी भागवत अध्याय 16

एकनाथी भागवत अध्याय 16

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
ॐ नमो द्‍गुरु श्रीमूर्ती । चराचर तुझी विभूती ।
विश्वात्मा विश्वस्फूर्ती । अमूर्तमूर्ती श्रीगुरुराया ॥ १ ॥
ॐकारस्वरूप सद्‌गुरु श्रीमूर्तीला नमस्कार असो. हे श्रीगुरुराया ! हें सर्व चराचर तुझेच रूप आहे. विश्वाचा आत्मा तूंच, विश्वाचें स्फुरणही तूंच, आणि निराकार व साकार मूर्ति तूंच. १.

तुझे मूर्तीचे महिमान । सकळ शास्त्रां अतर्क्य जाण ।
श्रुतीने घेतलें मौन । शब्दें आण वाहिली ॥ २ ॥
तुझ्या स्वरूपाचा महिमा सर्व शास्त्रांना अतर्क्य आहे. तो वर्णन करितां करितां श्रुतीने मौन धारण केले; आणि तो वर्णन करणे शक्य नाही अशी शब्दांनी तर शपथच घेतली २.

आण वाहिली दृष्टांती । तुजसमान नाही दुजी स्थिती ।
जे जे योजावी उपपत्ती । ते ते विभूती पैं तुझी । ३ ॥
तुझ्यासारखे दुसरे कोणतेच स्वरूप नाही अशी दृष्टांतांनीही शपथ वाहिली. जें जें सादृश्य म्हणून युक्तीने योजावयास जावें, ते ते तुझेंच स्वरूप असते ३.

तुझिया प्रभावाची ऐशी खोडी । जे दुजेपणाचें मूळ तोडी ।
मग एकपणाचे परवडी । दृष्टांत काढी कोण कोठें ॥ ४ ॥
तुझ्या प्रभावाची अशी एक खुबी आहे की, दुसरेपणाचें मूळच तुटते. मग सर्वत्र एकपणाच भरून राहिल्यावर त्याच्याच प्रकारचा दुसरा दृष्टांत कोण कोठे काढणार ? ४.

कोठें तुझे स्थानमान । हेंच सर्वथा न कळे जाण ।
अगाध तुझें महिमान । कैसेनि ध्यान करावें ॥ ५ ॥
तुझे ठावठिकाण तरी कोठे आहे हेच मुळी कळत नाही. तुझा महिमा अगाध आहे, तेव्हां ध्यान तरी धरावें कसे? ५.

हेतु मातु दृष्टांतू । न रिघे ज्यांचे शिंवे आंतू ।
तो भागवतींचा भागवतार्थू । ओंवियांआंतू बोलविशी ॥ ६ ॥
हेतु, शब्द आणि दृष्टांत ही ज्याच्या वर्णनक्षेत्रांत शिरूच शकत नाहीत, तो श्रीमद्भागवतांतील अर्थ तूं ओव्यांच्या रूपाने बोलवितोस ६.

ते माझे मर्‍हाटे आरुष बोल । सद्‍गुरूंनी केले सखोल ।
तेथींच्या प्रेमाचे जे बोल । जाणती केवळ गुरुभक्त ॥ ७ ॥
ते माझे मराठी भाषेतील शब्द खरे म्हटले म्हणजे आर्षपणाचेच आहेत, पण सद्गुरूंनी तेच गहन करून सोडले. त्यांतील प्रेमाचा ओलावा केवळ गुरुभक्त असतील तेच जाणतात ७.

ज्यासी नाहीं गुरुचरणीं भक्ती । त्यासी कैसेनि होईल विरक्ती ।
जरी पढले श्रुतिस्मृती । शास्त्रव्युत्पत्ती केल्याही ॥ ८ ॥
ज्यांची गुरुचरणांवर भक्ति नाही, ते जरी वेदशास्त्र पढले असले, व शास्त्रव्युत्पत्ति शिकले असले, तरी त्यांना विरक्ति कशी होणार ? ८.

करितां साधनांच्या कोटी । साधनीं समाधान नुठी ।
झालिया सद्‍गुरुकृपादृष्टी । ब्रह्मत्वें पुष्टी गुरुभक्तां ॥ ९ ॥
कोटिशः जरी साधनें केली, तरी त्या साधनांपासून समाधान व्हावयाचे नाही. परंतु सद्गुरूची कृपादृष्टि झाली असतां गुरुभक्तांना ब्रह्मपणानेच पुष्टि प्राप्त होते ९.

तो तूं सद्‍गुरु श्रीजनार्दन । सकळ जगाचें अधिष्टान ।
भूतीं भूतात्मा तूं आपण । सहजें जाण समसाम्यें ॥ १० ॥
तो तूं सदुरु श्रीजनार्दन, सर्व जगाचे अधिष्ठान आहेस. स्वाभाविक ऐक्यरूपाने तू स्वतःच सर्व प्राणिमात्रांमधील आत्मा आहेस १०.

समसाम्य सर्व भूतीं । ज्यांसी घडे सद्‍गुरुभक्ती ।
तेचि ये श्रीमहाभागवतीं । अर्थप्राप्ती प्रविष्ट ॥ ११ ॥
ज्यांचे सर्व प्राणिमात्रांशी ऐक्य होते, ज्यांना सद्गुरूची भक्ति घडते, तेच ह्या श्रीमहाभागवताच्या अर्थामध्ये प्रवेश करूं शकतात ११.

झालिया सद्‍गुरुकृपा वरिष्ठ । न करितां व्युत्पत्तीचे कष्ट ।
भागवतार्थीं होय प्रविष्ट । भक्त सुभट भावार्थीं ॥ १२ ॥
सद्गुरूची पूर्ण कृपा झाली असतां व्युत्पत्ति शिकण्याचे कष्ट न करताही उत्तम भावार्थी भक्त हा भागवताच्या अर्थामध्ये सहज प्रवेश करितो १२.

हृदयीं झालिया सद्‍भावो । भावें प्रकटे देवाधिदेवो ।
तेथें भागवताचा अभिप्रावो । सहजेंचि पहा वो ठसावे ॥ १३ ॥
अंत:करणांत एकनिष्ठ भक्ति उत्पन्न झाली की, त्या भक्तीच्या योगानंच देवाधिदेव प्रगट होतो. तेव्हां भागवतांतील खरे रहस्य सहजच मनांत ठसते १३.

यालागीं करितां गुरुभक्ती । प्राप्त होईजे भागवतार्थीं ।
तेथ काव्यादि व्युत्पत्ती । नाना युक्ती किमर्थ ॥ १४ ॥
ह्याकरितां गुरुभक्ति केली असतां भागवताचा अर्थ नीट कळतो. तेथे काव्य इत्यादि, किंवा व्युत्पत्ति, किंवा अनेक प्रकारच्या युक्ति यांची गरज काय ? १४.

किमर्थ करावें शास्त्र ज्ञान । किमर्थ धरावें वृथा ध्यान ।
चालतें बोलतें ब्रह्म पूर्ण । सद्‍गुरुचरण साधकां ॥ १५ ॥
शास्त्रज्ञान तरी कशाला शिकावें ! आणि व्यर्थ ध्यान तरी कशाला धरावे ? कारण साधकांना सद्गुरूचे चरण हेंच चालतेंबोलतें पूर्ण ब्रह्म आहे १५.

वांचूनिया गुरुभजन । शिष्यासी नोहे समाधान ।
याहूनियां श्रेष्ठ साधन । नाहीं जाण सर्वथा ॥ १६ ॥
गुरुभजनावांचून शिष्याला समाधान नाही. कारण त्याच्याहून श्रेष्ठ साधन मुळीच नाहीं १६.

त्या सद्‍गुरुकृपापरिपाटी । एकादशीं पूर्वार्ध कोटी ।
वाखाणिली की मर्‍हाटी । यथार्थदृष्टीं निजबोधें ॥ १७ ॥
त्याच सद्गुरुकृपेच्या अभ्यासाने अकराव्या स्कंधामधील पूर्वार्धांचे ज्ञान मराठी भाषेमध्ये यथामति आत्मबोधाने वर्णन केले १७.

ऊंस गाळितां रस होये । तो ठेविलिया बहुकाळ न राहे ।
त्याचा आळूनियां पाहे । गूळ होये सपिंड ॥ १८ ॥
ऊस गाळला की त्याचा रस होतो. तो तसाच ठेवला तर फार वेळ टिकत नाही. तो आटवून गूळ तयार करून ढेपाच बांधून ठेवाव्या लागतात १८.

तोहि ठेवितां लिगाड धरी । मग साखर कीजे रायपुरी ।
तेही घोटूनियां चतुरीं । नाबद करिजे कोरडी ॥ १९ ॥
तो गूळ फार दिवस ठेवला तरीसुद्धा पाझरूं लागतो. ह्याकरितां त्याची रायपुरी साखर करावी लागते. मग ती साखरही घोंटून चतुर लोक स्वच्छ व कोरडी अशी खडीसाखर करतात १९.

तैसें हे श्रीभागवत जाण । मुळीं बोलिला नारायण ।
तेंचि श्रीव्यासें आपण । दशलक्षण वर्णिले ॥ २० ॥
त्याचप्रमाणे या भागवताची गोष्ट आहे हे लक्षात ठेवा. तें भागवत प्रथमतः श्रीनारायणांनींच सांगितले, आणि त्याचीच श्रीव्यासांनी दहा प्रकारांनी फोड केली २०.

ते दशलक्षण परवडी । श्रीशुकमुखें चढली गोडी ।
तेथील कठिण पदबंधमोडी । टीका चोखडी श्रीधरी ॥ २१ ॥
श्रीशुकाच्या मुखाने ती दशलक्षणयुक्त कथा विशद झाल्यामुळे फारच गोडी चढली. त्यांतील कठीण शब्द स्पष्ट करून श्रीधरांनी त्यावर फारच उत्तम टीका केली २१.

ते श्रीधरीचें व्याख्यान । भावार्थदीपिका जाण ।
त्या भावार्थाची सद्‍भाव खूण । केलें निरूपण देशभाषा ॥ २२ ॥
ती जी श्रीधरी टीका, तिलाच ‘भावार्थदीपिका’ असे म्हणतात. त्याच भावार्थातील रहस्य मीही भक्तिभावाने देशभाषेत म्हणजे मराठीत निरूपण केले २२.

मुळीं वक्ता एक नारायण । व्यास शुक श्रीधरव्याख्यान ।
त्यांत मुळींचे लक्षूनि गोडपण । एका जनार्दन कविकर्ता ॥ २३ ॥
मूळचा नारायण हा एकच वक्ता आहे. आणि त्यावर व्यास, शुक आणि श्रीधर यांनी व्याख्यान केले आहे. त्यांतील मूळच्या गोडीवर लक्ष ठेवून एकाजनार्दन ह्या काव्याचा कर्ता झाला आहे २३.

मुळीं बीज श्रीनारायण । ब्रह्मयाचे ठायीं प्रेरिलें जाण ।
तें नारदक्षेत्रीं संपूर्ण । पीक परिपूर्ण निडारलें ॥ २४ ॥
मूळ बीज श्रीनारायणांनी ब्रह्मदेवाच्या ठिकाणी पेरले. आणि तेच नारदरूप भूमीमध्ये अत्यंत जोमदारपणे पूर्ण तयार झाले २४.

त्याचें व्यासें दशलक्षण । संपूर्ण केलें संवगण ।
शुकें परीक्षितीच्या खळां जाण । मळूनि निजकण काढिले ॥ २५ ॥
त्याचीच दशलक्षण-भागवतरूपी कणसें व्यासाने संकलित केली. आणि शुकाचार्यांनी परीक्षितीच्या खळ्यामध्ये मळणी करून त्यांतील दाण्यांची रास केली २५.

तेंचि शास्त्रार्थें जाण । श्रीधरें निजबुद्धीं पाखडून ।
काढिले निडाराचे कण । अतिसघन सुटंक ॥ २६ ॥
तेच दाणे शास्त्ररीतीने आत्मबुद्धीच्या सुपांतून श्रीधरांनी पाखडून काढून त्यांतील भरीव टवटवीत व अस्सल दाणे वेगळे निवडले २६.

त्याची पक्वान्नें चोखडी । मर्‍हाटिया पदमोडी ।
एका जनार्दनें केली परवडी । ते जाणती गोडी निजात्मभक्त ॥ २७ ॥
त्यांची मराठी शब्दरूपाने उत्तमोत्तम पक्वान्ने करून एका जनार्दनाने त्यांची रेलचेल करून सोडली आहे. आत्मभक्त असतील तेच त्यांतील गोडी जाणतील २७.

त्या श्रोत्यांचेनि अवधानें । जनार्दनकृपा सावधानें ।
पूर्वार्ध एका जनार्दनें । संपूर्ण करणें देशभाषा ॥ २८ ॥
त्या श्रोत्यांनी लक्ष दिल्यामुळे, आणि जनार्दनाची कृपा दक्ष असल्यामुळे एका जनार्दनाने देशी भाषेमध्ये हे पूर्वार्धं संपूर्ण केले. २८

ते प्रथमाध्यायीं अनुक्रम । वैराग्य उत्पत्तीचा संभ्रम ।
कुलक्षयासी पुरुषोत्तम । करी उपक्रम ब्रह्मशापें ॥ २९ ॥
त्याचा अनुक्रम असा-पहिल्या अध्यायांत बैराग्याच्या उत्पत्तीचा उपक्रम असा केला आहे की, श्रीकृष्णांनी आपल्या कुलाचा क्षय करण्याकरितां ब्राह्मणांच्या शापरूपाने आरंभ केला २९.

दुसर्‍यापासूनि चतुर्थवरी । नारदें वासुदेवाच्या घरीं ।
निमिजायंत प्रश्नोत्तरीं । पंचाध्यायी खरी संपविली ॥ ३० ॥
दुसऱ्यापासून चौथ्या अध्यायापर्यंत नारदांनीं वसुदेवाच्या घरी जाऊन निमिजायंतीच्या प्रश्नोत्तराच्या रूपानें पंचाध्यायी संपविली ३०.

षष्ठाध्यायी श्री कृष्णमूर्ती । पाहो आलिया सुरवरपंक्ती ।
तिहीं प्रर्थिला श्रीपती । निजधामाप्रती यावया ॥ ३१ ॥
सहाव्या अध्यायांत श्रीकृष्णमूर्तीचे दर्शन घेण्याकरितां देवांच्या पंक्तीच्या पंक्ति लोटल्या. आणि त्यांनी श्रीकृष्णाला निजधामास येण्याविषयी प्रार्थना केली ३१.

ऐकोनि सुरवरांची विनंती । देखोनि अरिष्टभूत द्वारावतीं ।
उद्धवें प्रार्थिला श्रीपती । निजधामाप्रती मज नेईं ॥ ३२ ॥
ती सुरश्रेष्ठांची विनंति ऐकून आणि द्वारकेवर अरिष्ट कोसळलेले पाहून उद्धवानें, ‘मलाही निजधामास न्यावे’ अशी श्रीकृष्णाची विनंति केली ३२.

त्याचे प्रश्नांचे प्रश्नोत्तर । त्यागयुक्त ज्ञानगंभीर ।
सप्तमाध्यायीं शारङ्गधर । थोडेनि फार बोलिला ॥ ३३ ॥
त्याच्या प्रश्नांच्या उत्तरांत ज्ञानमय त्यागयुक्त असें श्रीकृष्णांनी सातव्या अध्यायांत थोडेबहुत भाषण केलें ३३.

तेथ त्यागसंग्रह लक्षण । यदुअवधूत संवादें जाण ।
चोविसां गुरूंचे प्रकरण । केलें संपूर्ण अष्टमीं नवमीं ॥ ३४ ॥
त्या वेळी त्यागसंग्रहाच्या लक्षणाच्या निमित्ताने यदूच्या आणि अवधूताच्या संवादरूपाने चोवीस गुरूंचे प्रकरण आठव्या अध्यायांत आणि नवव्या अध्यायांत संपूर्ण केले ३४.

श्राद्धासंग्रह ज्ञानविश्वास । तेथ नाना मतांचा मतनिरास ।
दशमाध्यायी हृषीकेश । ज्ञानविलास बोलिला ॥ ३५ ॥
श्रद्धा कशी धरावी, आणि ज्ञानावर कसा विश्वास ठेवावा, हे सांगून त्यांत अनेक मतांचे निरसन करण्यासाठी श्रीकृष्णांनी दहाव्या अध्यायांत ज्ञानाचा चमत्कार सांगितला ३५.

अकरावें अध्यायीं जाण । बद्धमुक्तांचे वैलक्षण्य ।
सांगूनि साधूचे लक्षण । भक्तीचे संपूर्ण दाविलें रूप ॥ ३६ ॥
अकराव्या अध्यायांत बद्ध-मुक्तांचे भेद सांगून साधूचे लक्षण आणि भक्तीचे पूर्ण स्वरूप दाखवून दिले ३६.

भागवतीं बारावा अध्यावो । अतिगुह्य बोलिला देवो ।
तेथील लावितां अभिप्रावो । पडे संदेहो सज्ञाना ॥ ३७ ॥
भागवतांतील बाराव्या अध्यायांत देवांनी अत्यंत गूढ ज्ञान प्रगट केले आहे. त्यांतील रहस्य उकलतांना मोठमोठ्या ज्ञात्यांनासुद्धा संशय पडतो ३७.

बारावे अध्यायाची किल्ली । युक्तिप्रयुक्ती नातुडें बोली ।
जनार्दन कृपा माऊली । तेणें मागी दाविली ग्रंथाची ॥ ३८ ॥
बाराव्या अध्यायांतील गुरुकिल्ली आहे ती केवळ युक्तिप्रयुक्तीने सांगू म्हटले तर सांगतां यावयाची नाही, परंतु जनार्दनाची कृपारूप मातु:श्री जवळ होती, म्हणून तिने ग्रंथाचा मार्ग दाखविला ३८.

तें द्वादशाध्यायी निरूपण । सत्संगाचा महिमा गहन ।
कर्माचा कर्ता कोण । त्यागितें लक्षण कर्माचें ॥ ३९ ॥
त्या बाराव्या अध्यायांत संत्संगाचा अगाध महिमा, कर्माचा कर्ता कोण, त्यागबुद्धि हेच कर्माचें लक्षण होय, हा विषय आहे ३९.

तो द्वादशाध्यावो ऐकतां । ज्ञानसंलग्नता होय चित्ता ।
आडवी ठाके विषयावस्था । तेणें बाधकता साधकां ॥ ४० ॥
तो बारावा अध्याय ऐकला असतां, चित्ताला ज्ञानाचा संस्कार घडतो. पण त्यांत विषयवासना आडवी येते आणि त्यामुळे साधकांना पीडा होते ४०.

गुणवैषम्याचें लक्षण । तेणें विषयावस्था गहन ।
तेथ सत्त्वशुद्धीचें कारण । केले निरूपण त्रयोदशीं ॥ ४१ ॥
गुणभेदाचे लक्षण आणि त्यामुळे उत्पन्न होणारी विषयाची आवड, तसेंच सत्वशुद्धि कशी करावी त्याचा प्रकार, ह्यांचे निरूपण तेराव्या अध्यायांत केले ४१.

तेचि प्रसंगे यथोचित । चित्तविषयांचे जें प्रथित ।
उगवावया हंसगीत । सुनिश्चित सांगितलें ॥ ४२ ॥
नंतर त्याच उचित प्रसंगी विषयांची आणि चित्ताची सांगड कशी असते, आणि ती उकलावी कशी हे समजण्याकरितां उत्तम निर्णयात्मक हंसगीताचे कथन केले ४२.

हंसगीतीं जे निरूपिले ज्ञान । समाधिपर्यंत समाधान ।
तेंचि साधावया साधन । चवदावा आपण बोलिला देवो ॥ ४३ ॥
हंसगीतांत जें ज्ञान सांगितले आहे व समाधीपर्यंत जे समाधान केले आहे, तेच साधन साधण्याचा मार्ग देवांनी आपण होऊन चौदाव्या अध्यायांत सांगितला ४३.

साधनांमाजी मुख्य भक्ती । सगुण तेचि माझी निर्गुण मूर्ती ।
योगयुक्त ध्यानस्थिती । बोलिला श्रीपती चतुर्दशीं ॥ ४४ ॥
साधनांमध्ये भक्ति हीच मुख्य आहे, सगुण स्वरूप हीच माझी निर्गुण मूर्ति होय, आणि योगयुक्त ध्यानस्थिति कशी असते तेही श्रीकृष्णांनी चौदाव्या अध्यायांत सांगितले ४४.

विविधा सिद्धींची धारणास्थिती । देवें सांगितली उद्धवाप्रती ।
सिद्धी बाधिका माझे प्राप्ती । हें पंधराव्याअंती निरूपिलें ॥ ४५ ॥
सिद्धीसाठी ध्यानधारणा करण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. तेही श्रीकृष्णांनी उद्धवाला सांगून आपल्या प्राप्तीला सिद्धि ह्या विघातक आहेत हे पंधराव्या अध्यायांत सांगितले ४५.

एवं पंधराध्यायी पूर्वार्ध । निरूपण झाले अतिशुद्ध ।
आतां उरलें उत्तरार्ध । तो कथासंबंध अवधारा ॥ ४६ ॥
ह्याप्रमाणे पंधरा अध्यायांत पूर्वार्धाचे अत्यंत निर्मळ असें निरूपण झाले. आतां उत्तरार्ध शिल्लक राहिले आहे, त्यांतील कथेचाही संबंध ऐका ४६.

षोडशीं भगवद्विभूती । सतरा अठरा अध्यायांप्रती ।
वर्णाश्रम कर्मगती । विधानस्थिती निरूपण ॥ ४७ ॥
सोळाच्या अध्यायांत भगवंताच्या विभूतीचे निरूपण असून सतराव्या व अठराव्या अध्यायांत वर्णाश्रमकांची माहिती व त्यांचे विधानाचे प्रकार, ह्यांचे निरूपण आहे ४७.

एकुणिसावा अध्याय गहन । ज्ञाननिर्णयाचें महिमान ।
उद्धवाचें यमनियमादि प्रश्न । सांगितलें ज्ञानपरिपाकें ॥ ४८ ॥
एकोणिसावा अध्याय गहन आहे. त्यांत ज्ञाननिर्णयाचे माहात्म्य असून उद्धवाचे यमनियमादि प्रश्न ज्ञानात्मक उत्तरांसह सांगितले आहेत ४८.

त्या ज्ञानाधिकाराचा योग । अज्ञान ज्ञान मध्यस्थ भाग ।
विसावें अध्यायी श्रीरंग । त्रिविध विभाग बोलिला ॥ ४९ ॥
त्या ज्ञानाच्या अधिकाराचा योग अज्ञान, ज्ञान आणि मध्यावस्था अशा तीन प्रकारांनी श्रीकृष्णांनी विसाव्या अध्यायांत सांगितला आहे ४९.

तेथ गुणदोषांची अवस्था । उद्धवें ठेविली वेदांचे माथां ।
ते वेदवादसंस्था । केली तत्त्वतां एकविसांत । ॥ ५० ॥
पुढे उद्घवाने गुणदोषांची अवस्था वेदांच्या माथ्यावर ठेविली, तेव्हा त्या वेदवादांतील खरे खरे सात्त्विक निरूपण एकविसाव्यांत सांगितले ५०.

तेचि वेदवाद व्युत्पत्ती । तत्त्वांची संख्या किती ।
ते तत्त्वसंख्या उपपत्ती । केली श्रीपती यथान्वयें ॥ ५१ ॥
त्याच वेदवादनिरूपणाच्या प्रसंगी तत्त्वांची एकंदर संख्या किती हा प्रश्न उद्भवला. तेव्हां श्रीकृष्णांनी त्या तत्त्वसंख्येचे यथार्थ निरूपण केलें ५१.

सकळ तत्त्वांचे विवेचन । प्रकृतिपुरुषांचे लक्षण ।
जन्ममरणांचें प्रकरण । केलें निरूपण बाविसावां ॥ ५२ ॥
सर्व तत्त्वांचे विवेचन, प्रकृति आणि पुरुष ह्यांचे लक्षण, आणि जन्ममरणांचे प्रकरण इतक्यांचे निरूपण बाविसाव्यांत केलें ५२.

साहोनियां परापराध । स्वयें राहावें निर्द्वंद्व ।
हा भिक्षुगीतसंवाद । केला विशद तेविसांवा ॥ ५३ ॥
दुसऱ्याचे अपराध सहन करून स्वत: निर्द्वव राहावे अशा प्रकारचा भिक्षुगीतसंवाद तेविसाव्यामध्ये स्पष्ट केला आहे ५३.

अद्वैती राहावया स्थिती । चोविसावां सांख्यव्युत्पत्ती ।
निर्गुणापासोनि गुणोत्पत्ती । गुणक्षया अंती निर्गुण उरे ॥ ५४ ॥
अद्वैतामध्ये स्थिर होण्यासाठी चोविसाव्या अध्यायांत सांख्यशास्त्र सांगितले. निर्गुणापासूनच गुणांची उत्पत्ति होते; आणि गुणांचा क्षय झाला म्हणजे अखेर निर्गुणच शिल्लक राहतें ५४.

आदीं निर्गुण अंतीं निर्गुण । मध्यें भासले मिथ्या गुण ।
ये अद्वैतप्राप्तीलागीं जाण । केलें निरूपण सांख्याचें ॥ ५५ ॥
आधी निर्गुण असते व अंतीही निर्गुणच असते. मध्ये मिथ्याच गुणांचा भास होतो. अशा या अद्वैतप्राप्तीसाठी सांख्यशास्त्राचे निरूपण केलें ५५.

ते मिथ्यागुण प्रवृत्तियुक्त । त्रिगुणगुणांचा सन्निपात ।
बोलिला पंचविसाव्यांत । निर्गुणोक्त निजनिष्ठा ॥ ५६ ॥
ते मिथ्या गुण प्रवृत्तियुक्त असतात, त्या तीन गुणांचा परस्परांत संबंध असतो, आणि निर्गुणाच्या संबंधाने आत्मनिष्ठा कशी ठेवावी, हे पंचविसाव्यांत सांगितले आहे ५६.

सव्विसावे अध्यायाप्रती । अनिवार अनुतापाची शक्ती ।
भोगितां उर्वशी कामप्राप्तीं । पावला विरक्ती पुरूरवा ॥ ५७ ॥
सव्हीसाव्या अध्यायामध्ये अनुतापाची अनिवार शक्ति दाखविण्यासाठी पुरूरवा हा कामपाशांत सांपडून उर्वशीचा उपभोग घेत असताही विरक्ति पावला ही कथा सांगितली आहे ५७.

भजनक्रिया मूर्तिलक्षण । वैदिक तांत्रिक मिश्र भजन ।
या उद्धवप्रश्नांचे निरूपण । केलें संपूर्ण सत्ताविसावां ॥ ५८ ॥
भजनाचा विधि, मूर्तीचे लक्षण, वैदिक, तांत्रिक व मिश्र भजन म्हणजे काय, या उद्धवाच्या प्रश्नांचें संपूर्ण निरूपण सत्ताविसाव्यांत आहे ५८.

महायोग्यांचे योगभांडार । परम ज्ञानें ज्ञानगंभीर ।
निजसुखाचें सुखसार । केवळ चिन्मात्र अठ्ठाविसावा ॥ ५९ ॥
मोठमोठ्या योग्यांचे योगभांडार, गहन ज्ञानाने पूर्ण भरलेला, आत्मसुखाचे केवळ सारच, असा अठ्ठाविसावा अध्याय केवळ ज्ञानविषयानेच भरलेला आहे ५९.

त्याचि अध्यायामाजीं जाण । संसार असंभवाचा प्रश्न ।
उद्धवें केला अतिगहन । त्याचेंही प्रतिवचन दिधले देवें ॥ ६० ॥
त्याच अध्यायामध्ये ‘संसार हा असंभवनीय आहे’ असा उद्धवाने अत्यंत गहन प्रश्न केला होता, त्याचेही प्रत्युत्तर देवाने दिले आहे ६०.

एकादशाचा निजकळसू । भक्तिप्रेमाचे अतिविलासू ।
एकुणतिसावां सुरसरसू । ज्ञानोपदेशू भक्तियुक्त ॥ ६१ ॥
अकराव्या स्कंधाचा केवळ कळस, आणि भक्तिप्रेमाचें अत्यंत मनोहर स्वरूप, अशा प्रकारचा अत्यंत रसाळ असा भक्तियुक्त ज्ञानोपदेश एकुणतिसाव्या अध्यायांत आहे ६१.

पुढिले दों अध्यायांआंत । स्त्रीपुत्रादि कुळाचा घात ।
होतां डंडळीना ज्ञानसमर्थ । तें प्रत्यक्षभूत हरि दावी ॥ ६२ ॥
त्याच्या पुढच्या दोन अध्यायांत स्त्रीपुत्रादि साऱ्या कुळाचा घात प्रत्यक्ष डोळ्यांसमोर झाला असतांही, जो ज्ञानानें समर्थ असतो, त्याचे चित्त यत्किंचितही डळमळत नाही हे श्रीकृष्णांनीच प्रत्यक्ष दाखवून दिले आहे ६२.

ब्राह्मणांचा शाप कठिण । शापें बाधिला श्रीकृष्ण ।
इतरांची कथा कोण । कुळनिर्दळण ब्रह्मशापे ॥ ६३ ॥
ब्राह्मणांचा शाप अत्यंत कठीण असतो. त्या शापानें श्रीकृष्णाला सुद्धा पीडा दिली. मग इतरांची कया काय ! ब्राह्मशापानें सर्व कुळाचे सुद्धा निर्दाळण होतें ! ६३.

ब्राह्मणांचा कोप समर्थ । सगळा समुद्र केला मूत ।
शिवाचा झाला लिंगपात । ब्रह्मक्षोभांत निमेषार्धे ॥ ६४ ॥
ब्राह्मणाचा कोप विलक्षण सामर्थ्यवान् असतो, सगळा समुद्रसुद्धा त्याने मूत्र करून सोडला ! ब्राह्मणांच्या क्षोभाने एका निमिषार्धात शिवाचा सुद्धा लिंगपात झाला ! ६४.

यालागीं सज्ञान अथवा मुग्ध । तिहीं न करावा ब्रह्मविरोध ।
हेंचि दावावया मुकुंद । कुलक्षयो प्रसिद्ध दाखवी ॥ ६५ ॥
याकरिता सज्ञान असो की अज्ञान असो; कोणीही ब्राह्मणांशी वैर करूं नये. हेच दाखविण्याकरितां श्रीकृष्णांनी प्रसिद्धपणे कुलक्षय करवून दाखविला ६५.

निजदेहासी जो करी घात । तो जराव्याध केला मुक्त ।
येथवरी ज्ञाता देहातीत । क्षमायुक्त तो सज्ञान ॥ ६६ ॥
स्वतः (श्रीकृष्णा)च्याच देहाचा ज्याने घात केला, तो जराव्याधही कृष्णानें मुक्त केला. येथपर्यंत ज्ञाता असतो तो देहातीत व क्षमाशील कसा असतो हे दाखवून दिले ६६.

एकुणतीस अध्यायापर्यंत । कृष्णें उपदेशिला ज्ञानार्थ ।
पुढील दोन अध्यायांत । स्वयें दावीत विदेहत्व ॥ ६७ ॥
एकुणतीस अध्यायापर्यत श्रीकृष्णांनी ज्ञानाचा उपदेश केला. त्यापुढील दोन अध्यायांत स्वतःच विदेह स्थिति दाखविली ६७.

राम अयोध्या घेऊन गेला । कृष्णें निजदेहही सांडिला ।
येणें देहाभिमान मिथ्या केला । तरावया पुढिलां मुमुक्षां ॥ ६८ ॥
राम अयोध्येसह निजधामाला गेला, आणि कृष्णांनीही आपला देह ठेविला, ह्या कृतींनी त्यांनी पुढील मुमुक्षूंना तरावयासाठी देहाभिमान मिथ्या करून दाखविला ६८.

पंधरा अध्याय पूर्वार्ध । व्याख्यान झालें अतिशुद्ध ।
सूत्रप्राय उत्तरार्ध । दाविले विशद अध्यायार्थ ॥ ६९ ॥
पंधराव्या अध्यायापर्यंत ह्या स्कंधाचे पूर्वार्ध झाले. त्यांत अत्यंत पवित्र कथन केले आहे. आणि सूत्ररूपाने उत्तरार्धातील प्रत्येक अध्यायाचे तात्पर्यही स्पष्ट दाखवून दिले ६९.

साह्य सद्‍गुरु जनार्दन । श्रोतीं द्यावें अवधान ।
पुढील उत्तरार्ध व्याख्यान । एका जनार्दन बोलवी ॥ ७० ॥
सद्गुरु जनार्दन साहाय्याला आहे, ह्याकरितां श्रोत्यांनी लक्ष द्यावे. पुढच्या उत्तरार्धाचे व्याख्यानही जनार्दन एकनाथाकडून बोलवील ७०.

झालिया वसंताचे रिगवणें । वृक्ष सपुष्प सफळ तेणें ।
तेवीं जनार्दनकृपागुणें । सार्थक वचनें कवित्वाचीं ॥ ७१ ॥
वसंताचा प्रवेश झाला की त्यायोगानें वृक्ष पुष्पं व फळे यांनी बहरून जातात. त्याप्रमाणे जनार्दनाच्या कृपाकटाक्षामुळे कवित्वांतील शब्दही फलद्रूप होतात ७१.

गगनीं उगवला अंशुमाळी । जेवीं विकासिजे नवकमळीं ।
तेवीं जनार्दनकृपामेळीं । कवित्वनमाळी विकासे ॥ ७२ ॥
आकाशात सूर्य उगवला म्हणजे ज्याप्रमाणे नूतन कमले प्रफुल्लित होतात, त्याप्रमाणे जनार्दनाच्या कृपेंकरून कवित्वांतील नावीन्याचे तेज विकास पावते ७२.

वेणु घेऊनियां हातें । विश्वा मोहिलें कृष्णनाथें ।
तेवीं कवीश्वर करोनि मातें । वक्ता येथें जनार्दन ॥ ७३ ॥
हातांत मुरली घेऊन श्रीकृष्णाने सर्व जगाला मोहून टाकिले. त्याप्रमाणे मला कवीश्वर करून हातीं धरिलें व जनार्दनच सर्व बोलत आहे ७३.

तो जनार्दनकृपाक्षीराब्धी । ज्याची कृपेसी नाहीं अवधी ।
तेणें उत्तरार्धीं प्रवेशे बुद्धी । अर्थसिद्धीसमवेत ॥ ७४ ॥
त्या जनार्दनाची कृपा म्हणजे केवळ क्षीरसागर आहे. त्याच्या कृपेला मर्यादा म्हणून नाहींच, त्या जनार्दनाच्या कृपेमुळे पुढील उत्तरार्धातही अर्थसिद्धिसहवर्तमान बुद्धि प्रवेश करीत आहे ७४.

मागील कथासंगती । पंधरावे अध्यायाअंती ।
सिद्धी बाधिका माझे प्राप्ती । ऐसें श्रीपती बोलिला ॥ ७५ ॥
मागच्या कथेचा संदर्भ असा आहे की, पंधराव्या अध्यायाच्या शेवटी माझ्या प्राप्तीला सिद्धि या बाधक होतात असें श्रीकृष्ण म्हणाले ७५.

एवं सांडूनि सिद्धींचें ध्यान । माझे स्वरूपीं राखावें मन ।
हें ऐकोनि कृष्णवचन । उद्धवें प्रश्न मांडिला ॥ ७६ ॥
म्हणजे सिद्धींवरचे ध्यान सोडून देऊन माझ्याच स्वरूपामध्ये मन ठेवावे. हे श्रीकृष्णाचे भाषण ऐकून उद्धवाने प्रश्न विचारला ७६.

उद्धव म्हणे श्रीकृष्णनाथा । विनंती अवधारीं समर्था ।
तुझ्या विभूति समस्ता । मज तत्त्वतां सांगाव्या ॥ ७७ ॥
उद्धव म्हणाला, श्रीकृष्णनाथा ! समर्था ! माझी एक विनंति ऐक. तुझ्या खरोखर ज्या विभूति असतील त्या सर्व तूं मला सांगाव्या ७७.

श्रीउद्धव उवाच –
त्वं ब्रह्म परमं साक्षाद् अनाद्यन्तमपावृतम् ।
सर्वेषामपि भावानां त्राणस्थित्यप्ययोद्‍भवः ॥ १ ॥
[श्लोक १ ] उद्धव म्हणाला – भगवन ! आपण स्वतः परब्रह्म आहात, आपल्याला आदी नाही की अंत नाही आपण मायेचे आवरण नसलेले अद्वितीय तत्त्व आहात सर्व पदार्थांची उत्पत्ती, स्थिती, रक्षण आणि प्रलय यांना कारणीभूत आपणच आहात उच्चनीच अशा सर्व प्राण्यांमध्ये आपण आहात. (१)

भूतभौतिकांचें तूं कारण । तुझेनि जन्म-स्थिति-निदान ।
इतुकें करोनि अकर्ता जाण । ब्रह्म परिपूर्ण तूं यालागीं ॥ ७८ ॥
भूत आणि भौतिक याचे कारण तूच; जन्म, स्थिति आणि लय तुझ्यामुळेच होतात; आणि इतकेही करून तू अकर्ताच आहेस, म्हणूनच तूं परिपूर्ण ब्रह्म आहेस ७८.

म्हणसी उत्पत्ति स्थिति मरण । भूतांतें प्रकृति करी जाण ।
ते प्रकृति तुझे अधीन । तुझेनि चलन प्रकृतीसी ॥ ७९ ॥
आतां तूं म्हणशील की, प्राण्यांना उत्पत्ति, स्थिति व लय ही प्रकृतीच करते. पण ती प्रकृति म्हणजे माया ही तुझ्या आधीन आहे. तुझ्यामुळेच प्रकृतीला चालन प्राप्त होते ७९.

यालागीं प्रकृति ते परतंत्र । तूं परमात्मा स्वतंत्र ।
अनादि अव्यवो अपार । श्रुतींसी पार न कळेचि ॥ ८० ॥
म्हणून ती प्रकृति परतंत्र होय. तूं परमात्मा स्वतंत्र आहेस. तूं अनादि, अव्यय आणि अपार आहेस. वेदांनासुद्धा तुझा पार लागत नाही ८०.

प्रकृतीसी तुझें आवरण । तूं अनंत गा निरावरण ।
जीवांचे स्वरूप गा तूं आपण । परी जीवपण तुज नाहीं ॥ ८१ ॥
प्रकृतीला तुझे आवरण आहे. तूं अनंत असल्यामुळे आवरणरहित आहेस. तूं स्वतः जीवांचे स्वरूप आहेस, पण तुला मात्र जीवपणा नाही ८१.

जीवू तितुका अज्ञानयुक्त । तूं ज्ञानाज्ञानातीत निश्चित ।
यालागीं ब्रह्म तूं साक्षात । अविनाशवंत अपरोक्ष ॥ ८२ ॥
जीव तितका अज्ञानाने युक्त आहे, आणि तुं खरोखर ज्ञान व अज्ञान ह्यांहूनही पलीकडचा आहेस, म्हणूनच तुं अविनाशी व अपरोक्ष असें साक्षात् परब्रह्म आहेस ८२.

तो तूं अपरोक्ष कैसा म्हणशी । सर्वीं सर्वत्र सबाह्य असशी ।
ऐसा असोनि अतर्क्य होशीं । हृषीकेशी तें ऐक ॥ ८३ ॥
तो तूं अपरोक्ष कसा ? असें म्हणशील, तर तूं सर्वामध्ये सर्वत्र अंतर्बाह्य आहेस, आणि असा व्यापलेला असूनही, श्रीकृष्णा! तूं अतर्क्य आहेस. तें ऐक ८३.

उच्चावचेषु भूतेषु दुर्ज्ञेयमकृतात्मभिः ।
उपासते त्वां भगवन् याथातथ्येन ब्राह्मणाः ॥ २ ॥
[श्लोक २] परंतु ज्यांनी आपले मन आणि इंद्रिये आपल्या ताब्यात ठेवली नाहीत, ते आपल्याला जाणू शकत नाहीत. ब्रह्मवेत्ते लोकच यथार्थरूपाने आपली उपासना करतात. (२)

मशकादि हिरण्यगर्भ पर्यंत । तूं सबाह्य सर्व भूतीं संतत ।
ऐशिया तूतें निश्चित । ब्राह्मण जाणत वेदार्थें ॥ ८४ ॥
माशीपासून हिरण्यगर्भापर्यंत सर्व प्राणिमात्रांमध्ये निरंतर अंतर्बाह्य व्यापून असणाऱ्या अशा तुला ब्राह्मण वेदाच्या अर्थावरून निश्चितपणे जाणतात ८४.

आकळूनि उपनिषदर्थ । तुझ्या ठायीं भजनयुक्त ।
ते तुज सर्वगतातें जाणत । सुनिश्चित सर्वात्मा ॥ ८५ ॥
किंवा जे कोणी उपनिषदांचे यथार्थ रहस्य जाणून तुझ्या ठायीं भजनयुक्त असतात, ते सर्वव्यापी असा तूं सर्वात्मा आहेस असें निश्चितार्थाने समजतात ८५.

त्या सर्वात्म्याचा पाहतां पार । अचिंत्यानंत ऐश्वर्यधर ।
त्या तुज नेणती प्राकृत नर । ऐक विचार तयांचा ॥ ८६ ॥
त्या तुज सर्वात्म्याचा अंतपार पाहूं गेले असतां तूं अचिंत्य व अनंत ऐश्वर्ययुक्त आहेस. अशा तुला जे सामान्य लोक जाणत नाहीत, त्यांचा विचार ऐक ८६.

जे मनाचे विकिले । उपस्थाचे अंकिले ।
जे रसनेचे पोसणे झाले । निद्रेनें केले घरजांवयी ॥ ८७ ॥
जे मनाला विकलेले असतात, कामेंद्रियांचे दास बनतात, जे जिव्हेचे पोसणे होतात, आणि ज्यांना निद्रेने जणूं काय आपले घरजांवईच केलेले असते! ८७.

त्यांसी स्वतः सिद्ध स्वरूप पाहीं । सर्वगत न पडेचि ठायीं ।
निजात्मता न कळे देहीं । सदा विषयीं भूलले ॥ ८८ ॥
अशा लोकांना, तुझे जे स्वतःसिद्ध व सर्वव्यापक स्वरूप, त्याची कल्पनाही होत नाही. आपल्या देहांतच आत्मस्वरूप आहे हे त्यांस कळत नाही. ते सदासर्वदा विषयांतच भुललेले असतात ८८.

विषयीं चंचळ अंतःकरण । त्यांसी नव्हे ध्यान सगुण ।
निर्गुणीं प्रवेशेना मन । अज्ञान जन केवीं तरती ॥ ८९ ॥
विषयांत त्यांचे अंत:करण चंचल झालेले असते. त्यांना सगुण स्वरूपाचेही ध्यान होत नाही, आणि त्यांचे मन निर्गुण स्वरूपांत शिरतच नाही. असे अज्ञानी लोक कसे तरावे? ८९.

न करितां नाना व्युत्पत्ती । न धरितां ध्यानस्थिती ।
तुझ्या उत्तमा ज्या विभूती । त्या सांग निश्चितीं भजनासी ॥ ९० ॥
याकरिता अनेक प्रकारची शास्त्रे न धुंडाळतां व ध्यानधारणेच्याही भरीस न पडतां त्यांना केवळ भजन करावयास मिळावें, अशा प्रकारच्या ज्या तुझ्या उत्तमोत्तम विभूति असतील त्या निश्चयेकरुन सांगाव्या ९०.

येषु येषु च भावेषु भक्त्या त्वां परमर्षयः ।
उपासीनाः प्रपद्यन्ते संसिद्धिं तद् वदस्व मे ॥ ३ ॥
[श्लोक ३] मोठमोठे ऋषी आपल्या ज्या विभूतींची भक्तीने उपासना करून सिद्धी प्राप्त करून घेतात, त्या विभूती आपण मला सांगाव्यात. (३)

ज्या ज्या तुझ्या विभूती । पूर्वीं उपासिल्या संतीं ।
दृढ भावें करोनियां भक्ती । तुझी स्वरूपप्राप्ती पावलें ॥ ९१ ॥
तुझ्या ज्या ज्या विभूतींची संतांनी पूर्वी दृढ भावनेने भक्ति करून उपासना केली, व तुझ्या स्वरूपाला पोचले ९१.

त्या सकळ तुझ्या विभूती । कवण स्थिती कवण व्यक्ती ।
कवण भाव कवण गती । हें निश्चितीं मज सांगा ॥ ९२ ॥
त्या तुझ्या सर्व विभूति, त्यांची स्थिति कशी? त्यांची स्वरूपे कोणती? त्यांची भक्ति कशी ? त्यांपासून कोणती गति प्राप्त होते हें निश्चयेंकरून मला सांगा ९२.

म्हणसी सकळ भूतांप्रती । तूंचि वोळख माझ्या विभूती ।
तरी ते तुझी अतर्क्य स्थिती । न कळे श्रीपती आमुचेनि ॥ ९३ ॥
आतां ह्यावर तूं म्हणशील की, सर्व वस्तुमात्रामध्ये माझ्या विभूति तूंच ओळख म्हणजे झाले. तर ते तुझें स्वरूप अतर्क्य आहे. श्रीकृष्णा! तें कांहीं आमच्याने ध्यानात आणवत नाहीं ९३.

गूढश्चरसि भूतात्मा भूतानां भूतभावन ।
न त्वां पश्यन्ति भूतानि पश्यन्तं मोहितानि ते ॥ ४ ॥
[श्लोक ४] हे प्रभो ! आपण सर्व प्राण्यांचे अंतरात्मा आहात आपण त्यांच्यामध्ये स्वतःला गुप्त ठेवून लीला करीत असता आपण सर्वांना पाहाता, पंरतु जगातील प्राणी आपल्या मायेने मोहित झाल्यामुळे आपल्याला पाहात नाहीत. (४)

सर्व भूतांचा हृदयस्थ । हृदयीं असोनि गुप्त ।
त्या तूतें भूतें समस्त । न देखत देहभ्रमें ॥ ९४ ॥
सर्व प्राणिमात्रांच्या हृदयामध्ये तूंच आहेस. पण हृदयांत असूनही तूं गुप्त आहेस. देह हाच मी अशा भ्रमामुळे सर्व प्राणी तुला पहात नाहीत ९४.

त्या देहभ्रमासी देवराया । मूळकारण तुझी माया ।
तेथें तुझी कृपा झालिया । माया जाय विलया गुणेंसीं ॥ ९५ ॥
हे देवराया! त्या देहभ्रमाला मूळ कारण तुझी माया आहे, पण त्यांतच तुझी कृपा झाली तर ती माया गुणांसहवर्तमान लयास जाते ९५.

मग सर्वत्र सर्वां ठायीं । सर्व भूतीं सबाह्य देहीं ।
तुझें स्वरूप ठायीं ठायीं । प्रकटें पाहीं सदोदित ॥ ९६ ॥
आणि मग सर्वत्र, सर्व ठिकाणी, सर्व प्राणिमात्रांच्या देहांतही अंतर्बाह्य असें तुझेंच स्वरूप ठिकठिकाणी निरंतर व्यक्त होते ९६.

एवढें तुझे कृपेचे करणें । ते कृपा लाहिजे कवणें गुणें ।
यालागीं तुझ्या विभूती उपासणें । तुझे कृपेकारणें गोविंदा ॥ ९७ ॥
एवढी तुझ्या कृपेची करणी आहे. पण ती कृपा कोणत्या गुणांनी प्राप्त होते? म्हणून हे गोविंदा! तुझी कृपा प्राप्त होण्यासाठी तुझ्या विभूतींची उपासना केली पाहिजे ९७.

याचिलागी विभूतींची स्थिती । समूळ सांगावी मजप्रती ।
तेचि अर्थींची विनंती । पुढतपुढती करीतसें ॥ ९८ ॥
म्हणूनच तुझ्या विभूतींची समग्र स्वरूपे मला सांगावीत, याच अर्थाची विनंति पुनःपुन्हा करतो आहे ९८.

याः काश्च भूमौ दिवि वै रसायां
विभूतयो दिक्षु महाविभूते ।
ता मह्यमाख्याह्यनुभावितास्ते
नमामि ते तीर्थपदाङ्‌घ्रिपद्मम् ॥ ५ ॥
[श्लोक ५] हे अचिंत्य ऐश्वर्यसंपन्न प्रभो ! पृथ्वी, स्वर्ग, पाताळ तसेच दिशांदिशांमध्ये आपल्या प्रभावांनी युक्त अशा ज्या ज्या विभूती आहेत, त्या आपण मला सांगाव्यात प्रभो ! मी आपल्या चरणकमलांना वंदन करतो ही सर्व तीर्थांनाही तीर्थपण देणारी आहेत. (५)

स्वर्गमृत्युपाताळ स्थिती । विस्तारल्या दशदिशांप्रती ।
त्या समस्तही तुझ्या विभूती । सांग श्रीपती मजलागीं ॥ ९९ ॥
श्रीकृष्णा! स्वर्ग, मृत्यु व पाताळ यांत असलेल्या व दशदिशांना विस्तारलेल्या त्या तुझ्या सर्व विभूति मला सांग ९९.

ऐसा करोनियां प्रश्न । उद्धवें घातले लोटांगण ।
सकळ तीर्थांचे जन्मस्थान । मस्तकीं श्रीचरण वंदिले ॥ १०० ॥
असा प्रश्न करून उद्धृवानें लोटांगण घातलें. आणि सव तीर्थाचे जन्मस्थान असे जे श्रीकृष्णाचे चरण, त्यांवर मस्तक ठेवून वंदन केलें १००

ऐकोनी उद्धवाच्या प्रश्नासी । परम संतोषे हृषीकेशी ।
पुरस्करोनि उद्धवासी । काय त्यासी बोलिला ॥ १ ॥
उद्धवाचा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण फार संतुष्ट झाला. आणि उद्धवाला उद्देशून त्याला काय म्हणाला ? १

जो वैरिगजयूथ पंचानन । कोदंडदीक्षाप्रतापगहन ।
सखा जिवलग पढियंता जाण । जीवप्राण जो माझा ॥ २ ॥
जो शत्रुरूप हत्तींच्या कळपाचा सिंह, गांडीव धनुष्य धारण करून थोर प्रताप गाजविणारा. माझा सखा जिवलग आणि आवडता, इतकेच नव्हे तर जो माझा जीव की प्राण २

ज्याचें रथींचे मी धुरेवरी । ज्याच्या अश्वांचे वाग्दोरे धरीं ।
जो उपदेशिला कुरुक्षेत्रीं । उभय सेनेमाझारी रणरंगीं ॥ ३ ॥
ज्याच्या रथाच्या धुरेवर बसून मी घोड्यांचे लगाम धरतों, ज्याला कुरुक्षेत्रावर दोन्ही सैन्यामध्ये समरांगणांत मी उपदेश केला ३.

तो नरावतार अर्जुन । त्याच्याऐसा तुझा हा प्रश्न ।
ऐसे उद्धवासी संतोषोन । काय श्रीकृष्ण बोलिला ॥ ४ ॥
असा तो नरावतार अर्जुन, त्याच्यासारखाच तुझा हा प्रश्न आहे. असें म्हणून उध्दवावर संतुष्ट होऊन श्रीकृष्ण काय म्हणाला ! ४.

श्रीभगवानुवाच –
एवमेतदहं पृष्टः प्रश्नं प्रश्नविदां वर ।
युयुत्सुना विनशने सपत्नैरर्जुनेन वै ॥ ६ ॥
[शोक ६] श्रीभगवान म्हणाले – हे उद्धवा ! प्रश्न विचारणार्‍यांमध्ये तू श्रेष्ठ आहेस कुरूक्षेत्रावरील युद्धाच्या वेळी शत्रूंशी युद्ध करण्यास तयार झालेल्या अर्जुनाने मला हाच प्रश्न विचारला होता. (६)

हाचि प्रश्न मजकारणें । पूर्वीं पुशिला अर्जुनें ।
जेव्हां तिरस्कारूनि दुर्योधनें । युद्ध सत्राणें मांडिलें ॥ ५ ॥
पूर्वी जेव्हां दुर्योधनाने माझा तिरस्कार करून घनघोर युद्धाला सुरुवात केली, तेव्हां अर्जुनाने मला हाच प्रश्न विचारला होता ५.

अरिनिर्दळणीं प्रतापपूर्ण । धीर वीर आणि सज्ञान ।
प्रश्नकर्त्यामाजीं विचक्षण । माझा आत्मा जाण अर्जुन ॥ ६ ॥
शत्रूंचे निर्दालन करण्यांत अत्यंत प्रतापशाली, धैर्यशाली, वीर, ज्ञानसंपन, आणि प्रश्न करणारांमध्ये अत्यंत चतुर असा अर्जुन माझा केवळ आत्माच होय ६.

तेणें अर्जुनें कुरुक्षेत्रीं । युद्धसमयीं महामारी ।
स्वजनवधाचें भय भारी । हाचि प्रश्न करी मज तेव्हां ॥ ७ ॥
त्या अर्जुनानें कुरुक्षेत्रामध्ये प्राणघातक अशा युद्धांत आपल्याच लोकांचा वध होणार याचे अतिशय भय धरून त्या वेळी मला हाच प्रश्न केला होता ७.

ज्ञात्वा ज्ञातिवधं गर्ह्यं अधर्मं राज्यहेतुकम् ।
ततो निवृत्तो हन्ताहं हतोऽयमिति लौकिकः ॥ ७ ॥
*स तदा पुरुषव्याघ्रो युक्त्या मे प्रतिबोधितः ।
अभ्यभाषत मामेवं यथा त्वं रणमूर्धनि ॥ ८ ॥
[श्लोक ७-८] राज्यासाठी कुटुंबियांना मारणे हे निंद्य आणि अधर्माचे कृत्य आहे, असे वाटून सामान्य माणसाप्रमाणे तो असा विचार करीत होता की, “मी मारणारा आहे आणि हे सर्वजण मरणारे आहेत” असा विचार करून तो युद्धापासून परावृत्त झाला होता. (७) तेव्हा मी रणभूमीवर अनेक युक्त्या सांगून वीराग्रणी अर्जुनाची समजूत घातली होती त्यावेळी अर्जुनानेसुद्धा तू मला विचारलास, तोच प्रश्न विचारला होता. (८)

केवळ राज्यलोभाकारणें । गुरुगोत्र पितृव्य वधणें ।
हें अतिनिंद्य मजकारणें । नाहीं झुंझणें प्राणांती ॥ ८ ॥
तो म्हणाला, केवळ राज्यलोभाकरितां गुरु, गोत्रज, चुलते, ह्यांचा वध करणे हे मला अत्यंत निंद्य होय. ह्याकरितां प्राण गेला तरी मला युद्ध करावयाचें नाहीं ८.

लौकिक धर्मप्रवृत्ती । मी मारिता हे मरती ।
हे महामोहाची भ्रांती । उपजली चित्तीं अर्जुना ॥ ९ ॥
लौकिक धर्मप्रवृत्तीवरून ‘मी मारणारा आणि हे मरणारे’ अशी महामोहाची भ्रांति अर्जुनाच्या मनामध्ये उत्पन्न झाली ९.

राज्य भोगाचें धरोनि वर्म । ज्ञातिवधाचें निंद्य कर्म ।
हा केवळ मज अधर्म । धर्माचा स्वधर्म बुडेल ॥ ११० ॥
राज्यसुखाचीच हांव धरून त्यासाठी ज्ञातिबांधवांच्या वधाचें निंद्य कर्म करणे, हा मला निखालस अधर्म वाटतो. यांत धर्माचा स्वधर्म बुडेल ११०.

ज्यांचें तीर्थ घ्यावें प्रतिदिनीं । जे पूजावे वरासनीं ।
ते खोंचूनि तिखट बाणीं । भोगावी अवनी स्वगोत्र रुधिरें ॥ ११ ॥
दररोज ज्यांच्या पायांचे तीर्थ घ्यावे, ज्यांना उच्चासनावर बसवून त्यांची पूजा करावी, त्यांना तीक्ष्ण बाणांनी जखमी करून त्या आप्तजनांच्या रक्ताने लिडबिडलेल्या पृथ्वीचा उपभोग घ्यावा ११.

स्वगोत्र रुधिराचा पूर । पृथ्वीवरी वाहेल दुस्तर ।
तेणें आम्हीं होऊं राज्यधर । हें कर्म घोर न करवें मज ॥ १२ ॥
आपल्याच आप्त इष्टांच्या रक्ताचा भयंकर पूर जेव्हां पृथ्वीवर वाहील, तेव्हांच आम्ही राज्यकर्ते होऊ. हे कर्म फार भयंकर आहे. ते माझ्यानें करवत नाही १२.

कुळीं सुपुत्र वांछिजे जिंही । बाण खोंचावे त्यांचे हृदयीं ।
यापरी पूर्वजांसी पाहीं । झालो उतराई मानावें ॥ १३ ॥
ज्यांनी आपल्या कुळांत सत्पुत्र निपजावे अशी इच्छा करावी, त्यांच्याच हृदयांत आम्ही बाण खुपसावेत. अशा रीतीनेंच पूर्वजांचे उपकार फेडले असे आम्हीं मानावे ना ? १३.

ज्यांचे करावें श्राद्धतर्पण । त्यांचे बाणवरी घ्यावे प्राण ।
भलें पूर्वजां झालों उत्तीर्ण । आली नागवण निजधर्मा ॥ १४ ॥
आम्ही ज्यांचे श्राद्ध तर्पण करावयाचे, त्यांचेच प्राण आम्ही बाण मारून घ्यावे ना ? म्हणजे वाडवडिलांचा आम्ही चांगलाच उद्धार केला म्हणावयाचा! त्याने आमच्या धर्माचा नाशच होईल १४.

संमत श्लोक ॥
हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् ॥
[संमत श्लोक] तूं युद्धांत शत्रूकडून मारला गेलास तर स्वर्गाला प्राप्त होशील व कर्णादि शूरांना जिंकलेस तर पृथ्वीचा उपभोग घेशील.

युद्धीं निमालिया स्वर्गगती । जयो आलिया राज्यप्राप्ती ।
दोन्ही नश्वरें गा श्रीपती । कोणे हितार्थी झुंझावें ॥ १५ ॥
ह्या युद्धामध्ये मेलों असतां स्वर्गाला जाऊ आणि विजयी झालो तर राज्य प्राप्त होईल. पण श्रीकृष्णा ! ती दोन्ही नश्वरच आहेत. मग कोणत्या हितासाठी युद्ध करावे ? १५,

ऐसेनि अनुतापें जाण । सांडूनिया धनुष्यबाण ।
शोकाकुलित अर्जुन । म्लानवदन रणरंगीं ॥ १६ ॥
अशा सखेद वृत्तीने धनुष्यबाण टाकून देऊन तो शोकाकुल अर्जुन त्या समरांगणामध्ये म्लान वदन करून राहिला १६.

ते काळीं म्यांची जाण । तो महावीरपंचानन ।
नाना युक्तिं केलें समाधान । तेंही लक्षण अवधारी ॥ १७ ॥
त्या वेळेस त्या महान् वीरसिंहाचें नानाप्रकारच्या युक्तींनी मीच समाधान केले. त्याची हकीकत ऐक १७.

अर्जुना देह तितुका नश्वर । मळमूत्रांचे कोठार ।
करितां नाना उपचार । मरणतत्पर क्षणिक ॥ १८ ॥
अर्जुना ! देह तितका नश्वर असून मळमूत्राचे केवळ कोठार आहे. त्याला पाहिजे तितके उपचार केले असताही तो मरणाधीन असून क्षणिक आहे १८.

जीव निज नित्य निर्मळ । अज अव्यय अचळ ।
अच्छेद्य अभेद्य अमळ । अचंचळ निजांगे ॥ १९ ॥
आणि जीव आहे तो स्वतःसिद्ध नित्य असून निर्मल आहे. त्याला जन्म नाही; त्याला नाश नाही; तो अचळ, अच्छेद्य, अमेय व निर्मल आहे. तो मूळचाच जड आहे १९.

अर्जुना ऐक साचें । देहो तुझेनि प्रयत्‍नें न वांचे ।
जीव तुझेनि मारिला न वचे । पातक हत्येचें अहंभावे ॥ १२० ॥
अर्जुना ! यांतील खरा प्रकार ऐक. देह तुझ्या प्रयत्नानें वांचावयाचा नाही, आणि जीव हा तूं मारून काही मरावयाचा नाही. त्याच्या हत्येचे पातक लागेल असें जें तूं समजतोस, ते केवळ अहंभावनेनें होय १२०.

हो कां त्वां असते केले । तरी तुझेनि जातें मारिलें ।
मी मारिता येणे बोले । तुजसि गोंविलें अभिमानें ॥ २१ ॥
सर्व जर तूंच निर्माण केलेले असतेस. तर तुझ्याने ते मारले गेले असते. पण तसा प्रकार नाही. याकरितां मी यांना मारणार असें म्हणण्यांत तूं अभिमानाने गुरफटल्याचे मात्र दिसून येते २१.

जो देहाचा निर्माणकर्ता । तोचि तयाचा संहर्ता ।
तूं करण्यामारण्या परता । व्यर्थ अहंता कां घेसी ॥ २२ ॥
देहाचा जो निर्माणकर्ता असतो, तोच त्याचा संहार करणारा असतो. तूं निर्माणकर्ताही नव्हेस आणि मारणाराही नव्हेस; मग व्यर्थ अहंता कशाला भोगतोस? २२.

जरी हे अहंता तूं न सांडिशी । तरी सकळ हत्येचिया राशी ।
साचचि आल्या तुजपाशी । दोषी झालासी अर्जुना ॥ २३ ॥
ही अहंता तूं जर न सोडशील, तर या सर्व हत्यांच्या राशीच खरोखर तुझ्यापाशी आल्या, आणि अर्जुना ! तूं दोषी झालास असें होईल २३.

ऐक पां बापा पार्था । देहादि कर्मांची अहंता ।
जो घे आपुले माथां । तो दोषी सर्वथा तिहीं लोकीं ॥ २४ ॥
बा अर्जुना ! ऐक. देहादि कमांची अहंता जो आपल्या माथ्यावर घेतो, तो तिन्ही लोकांमध्ये सर्वस्वी दोषी होतो २४.

हो कां स्वधर्मचि तूं पुसशी । तरी ऐक क्षत्रियाच्या क्षात्रधर्मासी ।
समरांगणीं पित्यापुत्रांसी । वधिता क्षत्रियासी दोष नाहीं ॥ २५ ॥
आता जर तूं स्वधर्म विचारीत असशील, तर क्षत्रियाचा क्षात्रधर्म ऐक. त्या क्षात्रधर्माप्रमाणे समरांगणांत पित्यापुत्रांनी एकमेकांना वधिलें असतां क्षत्रियांना दोष नाही २५.

युद्ध म्हणजे स्वधर्मतीर्थ । समरांगणीं निमे तो नित्यमुक्त ।
जें तुज निजभाग्यें प्राप्त । तें तूं अहित मानिसी ॥ २६ ॥
युद्ध म्हणजे क्षात्रधर्माचें एक तीर्थच आहे. समरागणांत मृत्यु पावतो तो नित्यमुक्तच होतो. हें जें तुला तुझ्या भाग्याने प्राप्त झालें तें अनिष्ट असें तू मानतोस! २६.

कर्ता दोष अहंतेच्या माथां । ते जो नातळे देह‍अहंता ।
तोचि कर्म करूनि अकर्ता । भोगूनि अभोक्ता तोचि एक ॥ २७ ॥
कर्तृत्व मानणे हा दोष अहंतेच्या माथ्यावर आहे. त्या देह अहंतेला जो स्पर्शीत नाही, तोच कर्म करूनही अकर्ता, आणि भोग भोगूनही अभोक्ता असा एक होय २७.

तोचि संगामाजीं निःसंग । अवघें जग तो एकला सांग ।
जो निरभिमानी अव्यंग । तो सौरा चांग समरंगीं ॥ २८ ॥
तोच संगामध्ये असून निःसंग होय. तो एकटाच पूर्णपणे सर्व जग होय. जो निखालस निरभिमानी असतो, तोच समरांगणामध्ये खरा शूर होय २८.

अर्जुना अभिमान सांडितां । तूं माझी पावशी समसाम्यता ।
तेव्हां सकळ पापाची वार्ता । तुज सर्वथा स्पर्शेना ॥ २९ ॥
अर्जुना ! तूं अभिमान सोडलास तर माझ्याच बरोबरीला पोचशील. आणि मग कोणत्याही पातकाची वार्तासुद्धा तुला मुळींच स्पर्श करणार नाही २९.

म्हणशी केवीं जाय अहंता । तरी मज लक्षूनि तत्त्वतां ।
स्वधर्मकर्मातें आचरितां । चित्तशोधकता तेणें होय ॥ ३० ॥
आता ती अहंता जाईल कशी ? असें म्हणशील, तर निश्चयेंकरून माझ्यावरच लक्ष ठेवून स्वधर्मकर्माचे आचरण केले असता, तेणेकरून चित्ताची शुद्धि होईल १३०.

निर्मळत्व आलिया चित्ता । तो लागे माझिया भक्तिपंथा ।
भजनें माझिया समरसता । माझ्या निजभक्तां तत्काळ ॥ ३१ ॥
आणि चित्ताला शुद्धता प्राप्त झाली असतां तो माझ्या भक्तिमार्गाला लागतो. भजनाच्या योगाने माझ्या भक्तांना, तत्काळ माझ्याशी समरस होता येते ३१.

अर्जुना सांडावया अभिमान । तूं नाइकसी माझें वचन ।
तरी जन्ममरणांचे भूषण । सकळ दोष जाण भोगिसी ॥ ३२ ॥
अर्जुना ! अभिमान सोडण्याविषयीं तूं जर माझे वचन ऐकणार नाहीस, तर जन्ममरणांचे भूषण असे सर्व दोष तूं भोगशील हें लक्षात ठेव ३२.

तूं नित्यमुक्त अज अव्ययो । हा बुडेल तुझा सद्‍भावो ।
मग जन्ममरणांचा निर्वाहो । अविश्रम पहा हो भोगिसी ॥ ३३ ॥
नित्यमुक्त आहेस, अजन्मा आहेस, अविनाशी आहेस, ही तुझी सबुद्धि लयास जाईल, आणि मग पहा ! निरंतर जन्ममरणाचाच सोहळा भोगीत राहशील ३३.

यालागीं करणें न करणें दोन्ही । प्रकृतीचे माथां ठेवूनी ।
तूं कायावाचामनींहूनी । मजलागुनी शरण रिघें ॥ ३४ ॥
ह्याकरिता करणे आणि न करणे ही दोन्ही प्रकृतीच्या माथ्यावर ठेवून तूं कायावाचामनेंकरून मला शरण ये ३४.

यापरी गा तत्त्वतां । मज सद्‍भावें शरण येतां ।
तुज सकळ कर्मांची वार्ता । मी सर्वथा शिवों नेदी ॥ ३५ ॥
खरोखर अशा रीतीनें तूं सदबुद्धीने मला शरण येशील तर कोणत्याही कर्माची वार्ता मी तुला मुळींच शिवू देणार नाही ३५.

यालागीं गा कोदंडपाणी । मरतें मारितें सांडूनि दोन्ही ।
सौरा होयीं रणांगणीं । मी तुजलागोनी उद्धरीन ॥ ३६ ॥
ह्याकरितां हे अर्जुना ! मरणारे आणि मारणारें या दोन्ही भावना सोडून समरांगणांत शूर हो, म्हणजे मी तुझा उद्धार करीन ३६.

तूं एक येथें कर्म करिता । मी एक तूतें उद्धरिता ।
ऐसे भिन्नत्व गा पार्था । माझ्या शरणागता असेना ॥ ३७ ॥
अर्जुना ! तूं एक येथे कर्म करणारा, व मी एक तुझा उद्धार करणारा, असा भेदभाव माझ्या शरणागतांच्या ठिकाणी असत नाही ३७.

मज अनंता शरण येणें । आणि जीवत्वें वेगळे उरणें ।
तें गुळदगडा ऐसें जिणें । अनन्यपणें नव्हे शरण ॥ ३८ ॥
मला अनंताला शरण येणे, आणि मग जीव ह्या नात्याने वेगळे राहणे, म्हणजे गुळांतल्या दगडाचाच प्रकार तो. ते अनन्यभावाने शरण येणे नव्हे ३८.

सरिता सागरा शरण गेली । ते समुद्रचि होऊनि ठेली ।
पुढती परतावया मुकली । समरसिली सिंधुत्वें ॥ ३९ ॥
नदी समुद्राला शरण गेली, म्हणजे ती समुद्रच होऊन राहते. ती मग परत फिरावयाचे विसरून जाते. कारण ती समुद्राशींच एकरूप झालेली असते ३९.

गंगा पावोनि सिंधुत्वासी । मागील यावा वंचीना तिसीं ।
तेवीं सबाह्य आत्मसमरसीं । शरण अहर्निशीं अखंडत्वें ॥ १४० ॥
गंगा समुद्रस्वरूप झाल्यावर मागे येण्याचा ओघ तिला मागे खेचीत नाही. त्याप्रमाणे अंतर्बाह्य आत्मस्वरूपाशी तद्रूप होऊन माझा भक्त मला रात्रंदिवस सतत शरण आलेला असतो १४०.

दीप दावाग्नी भेटों गेला । तो तेव्हढाची होऊनि ठेला ।
तेवीं मजलागीं जो शरण आला । तो मीचि झाला अर्जुना ॥ ४१ ॥
दिवा जर वणव्याला भेटावयाला गेला, तर तोही वणव्याएवढाच होऊन राहतो. त्याप्रमाणे अर्जुना ! मला जो शरण आला, तोही मत्स्वरूप होऊन राहिला ४१.

पार्था परिस पा चिन्ह प्राप्ताचें । हें भूताकार मज अच्युताचें ।
ऐसें सद्‍भावें जो देखे साचें । त्यासी ब्रह्मसायुज्याचें साम्राज्य लाभे ॥ ४२ ॥
अर्जुना ! आतां मुक्ताचे लक्षण ऐक. हे जे प्राणिमात्राचे आकार दिसतात, ते सर्व माझे श्रीकृष्णाचेच आहेत, असें खरोखर जो श्रद्धापूर्वक पाहतो, त्यालाच ब्रह्मस्वरूपाचे साम्राज्य प्राप्त होते ४२.

मज आत्मयाचे निजस्थितीं । संसार मुळीं मुख्य भ्रांती ।
तेथ मारिता मी हे मरती । कोणें हे युक्ती मानावी ॥ ४३ ॥
माझ्या आत्मस्वरूपामध्ये संसार ही मुळी मुख्य भ्रांति आहे. तेव्हा मी हा मारणारा व हे मरणारे ही गोष्ट कोण मान्य करणार ? ४३.

मृगजळ जेथें नसे । तेथें तव कोरडेंचि असे ।
मा जे ठायीं आभासे । तेथ तर्‍ही असे वोल्हांशु कायी ॥ ४४ ॥
मृगजळ जेथे नसते, तेथें तर कोरडे असतेच; पण त्या मृगजळाचा जेथें भास होतो, तेथें तरी काही ओलावा असतो काय ? ४४.

तेवीं संसाराचे रूप नाम । ठेविती तेथें निखळ ब्रह्म ।
हाचि ज्याचा स्वभाव परम । तें चालतें ब्रह्म वर्ततां देहीं ॥ ४५ ॥
तद्वत् संसाराला रूप-नांव कल्पितात तेथें वस्तुत: त्या रूप-नांवांचा अभाव असून शुद्ध ब्रह्मच असते, असाच ज्याचा दृढभाव असतो, तो देहांत वागत असला तरी चालतें ब्रह्मच होय ४५.

देहा जडत्वें न बाधी कर्म । आत्मा नातळे धर्माधर्म ।
हें ज्यासी कळलें वर्म । तें चालतें ब्रह्म वर्ततां देहीं ॥ ४६ ॥
देहाला जडत्वामुळे कर्म कधी बाधत नाही. आणि आत्मा धर्माधर्मांना कधी शिवत नाही. हें वर्म ज्याला कळलें, तो देहांत वागत असला तरी ते चालतें ब्रह्मच होय ४६.

देही वर्ततां तो विदेह । विदेह तेंच त्याचें देह ।
हें माझें परम गुह्य । अर्जुनासी पाहीं सांगितलें ॥ ४७ ॥
तो देहामध्ये वागत असतांही विदेहीच होय. विदेह हाच त्याचा देह होय. हे माझें अत्यंत गुह्य ज्ञान मी अर्जुनाला सांगितले पहा ४७.

यापरी म्यां नानायुक्तीं । युद्धीं बोधिला सुभद्रापती ।
तेणेंही मज करोनि विनंती । पुशिल्या विभूती तुझ्याऐशा ॥ ४८ ॥
अशा प्रकारे मी अनेक प्रकारच्या अनेक युक्तिप्रयुक्तींनी त्या युद्धामध्ये अर्जुनाला बोध केला. तेव्हा त्यानेही मला विनंती करून तुझ्याप्रमाणेच माझ्या विभूति विचारल्या होत्या ४८.

ज्या सांगितल्या अर्जुनासी । त्याचि मी सांगेन तुजपाशीं ।
ऐसें पुरस्करूनि उद्धवासी । निजविभूति त्यासी सांगत ॥ ४९ ॥
त्या वेळी अर्जुनाला मी ज्या सांगितल्या, त्याच मी तुला सांगेन. अशा प्रकारे उद्धवाला आश्वासन देऊन त्याला आपल्या विभूति सांगू लागले ४९.

उद्धवा ज्या पुशिल्या विभूती । त्या माझ्या मज न गणवती ।
मी जगदात्मा त्रिजगतीं । संख्यासंस्थिती गणी कोण ॥ १५० ॥
उद्ध्वा ! तूं ज्या विभूति विचारल्यास, त्या माझ्या मलासुद्धा मोजवत नाहीत. मी त्रैलोक्याचाच अंतरात्मा असल्यामुळे माझ्या विभूतींची गणना करणार कोण? १५०.

अहमात्मोद्धवामीषां भूतानां सुहृदीश्वरः ।
अहं सर्वाणि भूतानि तेषां स्थित्युद्‍भवाप्ययः ॥ ९ ॥
[श्लोक ९] उद्धवा ! मी या सर्व प्राण्यांचा आत्मा, सृहृद आणि नियमन करणारा आहे मीच हे सर्व चराचर आहे आणि याच्या उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाला कारणही मीच आहे. (९)

मी हृदयस्थ समर्थ हृदयीं । त्या मज जीवू मागें जें कांही ।
त्यासी विमुख मी नव्हें कहीं । पुरवीं सर्वही ईश्वरत्वें ॥ ५१ ॥
मी सर्वसमर्थ असून प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये हृदयस्थ होऊन राहात असतो. त्या माझ्याजवळ जीव जें जे काही मागेल ते ते त्याला नाही असें मी कधींच म्हणत नाही. प्रभुत्वाच्या नात्याने सर्व काही पुरवितों ५१.

जीवू अतिअडलेपणें । जें मागे मजकारणें ।
तें मी त्यासी अलोट देणें । यालागी म्हणणें ईश्वर मज ॥ ५२ ॥
जीव अत्यंत संकटाच्या वेळी जे काही माझ्याजवळ मागतो, तें मी त्याला अत्यंत अमर्याद देतो. म्हणूनच मला ईश्वर असें म्हणतात ५२.

मी आत्मा असें हृदयीं । हा विश्वास जयांसी नाहीं ।
ते मृगजळाचे डोहीं । नावेसकट पाहीं बुडबुडों गेले ॥ ५३ ॥
मी आत्म्याच्या रूपाने हृदयांत असतो हा विश्वास ज्यांना नाही, ते मृगजळाच्या डोहांत नौकेसह बुडून गेले असे समज ५३.

तेथनांव करावयाचे कष्ट वृथा गेले फुकट ।
तेवीं साधनें सोसूनि कचाट । साधनेंसकट बुडों गेले ॥ १५४ ॥
त्यांत नौका बांधण्याचे कष्ट मात्र फुकट जातात. त्याप्रमाणे अवघड साधनें सहन करून त्या साधनांसहवर्तमान ते बुडून जातात ५४.

माझे प्राप्तीचे मुख्य वर्म । मी हृदयीं असें परब्रह्म ।
हेंचि ज्याचे नित्य कर्म । तो विभूती परम पैं माझी ॥ ५५ ॥
माझ्या प्राप्तीचे मुख्य वर्म हेच की, परब्रह्म असा मी हृदयांतच असतो. हेच ज्याचे नित्यकर्म, तोच माझी श्रेष्ठ विभूति होय ५५.

मी सर्वभूतहृदयवासी । सुहृद सोयरा मी सर्वांसी ।
नियंता ईश्वरसत्तेसी । नियामक भूतांसी मी एक ॥ ५६ ॥
मी सर्व प्राणिमात्रांच्या हृदयांत राहणारा मी सर्वांचा सुहृद व सोयरा; मी ईश्वरसत्तेचा नियामक आणि मीच एक प्राणिमात्रांचा शास्ता आहे ५६.

एवं सर्व भूतांचा मी स्वामी । इयें सर्व भूतें तेंही मी ।
भूतांचे जन्मभूमीची मी भूमी । उत्पत्त्यादि कर्मीं मी कर्ता ॥ ५७ ॥
अशा प्रकारे सर्व प्राणिमात्रांचा धनी मी; हे जे सर्व प्राणी, तेही मीच; प्राणिमात्रांच्या जन्मभूमीचेही उत्पत्तिस्थान मी; आणि उत्पत्ति वगैरे कर्मामध्ये कर्ता तो मी ५७.

कृषीवळाचियेपरी । मी सृजीं पाळीं संहारीं ।
ब्रह्मा विष्णु त्रिपुरारी । गुणावतारी मी एक ॥ ५८ ॥
शेतकऱ्याप्रमाणे मी निर्माण करणारा व पालन करणारा व संहार करणारा आहे. निरनिराळ्या गुणांप्रमाणे ब्रह्मा, विष्णु व महेश्वर हे अवतार घेणाराही मी एकच ५८.

कर्माची जे क्रियाशक्ती । ते मी म्हणे श्रीपती ।
हे सामान्ये बोलिली स्थिती । विशेष विभूती त्या ऐक ॥ ५९ ॥
श्रीकृष्ण म्हणाले, कर्माची जी क्रियाशक्ति तीही मीच. ही सामान्य स्वरूपें सांगितली. आतां ज्या विशेष विभूति आहेत त्याही ऐक ५९.

अहं गतिर्गतिमतां कालः कलयतामहम् ।
गुणानां चाप्यहं साम्यं गुणिन्यौत्पत्तिको गुणः ॥ १० ॥
[श्लोक १०] गतिशील पदार्थांची गती मी आहे गणना करणार्‍यांमध्ये काळ मी आहे गुणांची साम्यावस्था जी प्रकृती, ती मी आहे गुणी लोकांचा नैसर्गिक गुण मी आहे. (१०)

गतिमंतांमाजी जे गती । ते मी म्हणे लक्ष्मीपती ।
गतीसी माझेनि निजगती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ १६० ॥
लक्ष्मीपति म्हणाले, गतिमंतांमध्ये गति म्हणून जी असते ती मी. उद्धवा ! खरोखर गतीला मूळ गति ती मी होय असे समज १६०.

चेतनेनें सर्वां गती । ते चेतना चैतन्याची शक्ती ।
चेतनेस्तव इंद्रियप्रवृत्ती । एवं गतीची गती मी एक ॥ ६१ ॥
चेतनेनेच सर्वांना गति प्राप्त होते. ती चेतनाही माझीच शक्ति आहे. चेतनेपासूनच इंद्रियांची प्रवृत्ति होते. अर्थात गतींची गति असा एक मीच आहे ६१.

सकळ गतींची परम गती । प्राण्यासी मुख्यत्वें मुक्ती ।
ते मुक्तीसी मजमाजीं मुक्ती । एवं गतीची गती मी एक ॥ ६२ ॥
साऱ्या गतींत श्रेष्ठ गति म्हटली म्हणजे मुख्यत्वेकरून प्राण्याला मुक्ति मिळणे ही होय. पण त्या मुक्तीलाही माझ्यामध्येच मुक्ति मिळते. तात्पर्य, गतींचीही गति एक मीच आहे ६२.

सुरनरां आकळिता । ते जाण काळाची सत्ता ।
त्या काळाचा मी आकळिता । जाण तत्त्वतां मी महाकाळू ॥ ६३ ॥
देवांना आणि मनुष्यांनाही मर्यादेत ठेवणारी एक ‘काळाची सत्ता आहे. पण त्या काळालाही खरोखर मर्यादेत ठेवणारा महाकाळ तो मी होय ६३.

तिहीं गुणांची समानावस्था । ते मी जाण गा निजभक्ता ।
अकृत्रिम गुण जो धर्मता । तो मी तत्त्वतां म्हणे हरी ॥ ६४ ॥
हे भक्तराजा! तिन्ही गुणांची साम्यावस्था ती मी असे समज. आकाशादिकांचा शब्दादिगुणरूपी जो स्वभावधर्म, तोही खरोखर मीच असें श्रीहरि म्हणाला ६४.

गुणिनामप्यहं सूत्रं महतां च महानहम् ।
सूक्ष्माणामप्यहं जीवो दुर्जयानामहं मनः ॥ ११ ॥
[श्लोक ११ ] गुणयुक्त पदार्थांमध्ये ज्ञानशक्तिप्रधान वस्तूंतील महत्तत्त्व मी आहे आणि क्रियाशक्तिप्रधान सूत्रात्मा मी आहे सूक्ष्म वस्तूंमध्ये जीव मी आहे अजिंक्य वस्तूंमध्ये मन मी आहे. (११)

गुणी म्हणावया हेंचि कारण । ज्या मजमाजीं सूत्र क्रियाप्रधान ।
मायेचें प्रथमकार्य जाण । तो गुणी मी संपूर्ण उद्धवा ॥ ६५ ॥
उद्धवा! मी गुणी म्हणावयाला कारण हेच की, माझ्यामध्ये क्रियेचे प्रथमसूत्र प्रधान असते. मायेचे पहिले कार्य तें मी. म्हणून सर्वस्वी गुणी तोही मीच ६५.

जगी आकाश थोर पाहीं । तें मजमाजीं खेळे लपंडायी ।
माझ्या महत्तत्त्वाची नवायी । मजही निश्चयीं नेमेना ॥ ६६ ॥
जगामध्ये आकाश हे सर्वांत थोर आहे. पण तेसुद्धा माझ्यामध्ये लपंडाव खेळतें. माझ्या महत्तत्त्वाच्या चमत्काराची तर मलासुद्धा निश्चयपूर्वक कल्पना होत नाहीं ६६.

महत्तत्त्व जे ज्ञानप्रधान । तें मी म्हणे नारायण ।
सूक्ष्मामाजीं मी जीवूं आपण । ब्रह्मादिकां जाण अतर्क्य ॥ ६७ ॥
नारायण म्हणाले, ‘ज्ञानप्रधान जे महत्तत्त्व ते मी. सूक्ष्मामध्ये ब्रह्मदेवादिकांनाही अतर्क्य असा जीव तो मी ६७.

दुर्जयांमाजीं मी मन । त्यासी जिंकावया जाण ।
मजवेगळी आंगवण । नाहीं संपूर्ण आणिकासी ॥ ६८ ॥
अजिंक्य वस्तूंमध्ये मन ते मी. त्या मनाला जिंकावयाला माझ्याशिवाय कोणालाच पूर्ण सामर्थ्य नाहीं ६८.

मज लक्षितां मन आकळे । मज विसरतां चौताळे ।
मन न धरवे वेदशास्त्रबळें । मन नाकळे मजवीण ॥ ६९ ॥
माझे स्मरण केले असतां मन ताळ्यावर येते, आणि मला विसरले की मन चवताळते. वेदशास्त्राच्या बळावर काही मनाचे आकलन होत नाही. माझ्याशिवाय मन कधीच आकलन होत नाही ६९.

मन तेंचि मी आहें । मज चिंतितां तें विरोनि जाये ।
मज विसरतां तें पाहें । सैरा जाये सुनाट ॥ १७० ॥
मन ते मीच आहे. माझे चिंतन केलें असता ते विरून जाते आणि मला विसरले की, तेही सैरावैरा भलतीकडेच धावू लागते १७०.

हिरण्यगर्भो वेदानां मंत्राणां प्रणवस्त्रिवृत् ।
अक्षराणामकारोऽस्मि पदानि च्छन्दसामहम् ॥ १२ ॥
[श्लोक १२] वेदांचा अध्यापक हिरण्यगर्भ मी आहे मंत्रांमध्ये ‘अउम’ या तीन मात्रांनी युक्त असा ॐकार मी आहे अक्षरांमध्ये अकार आणि छंदांमध्ये त्रिपदा गायत्री मी आहे. (१२)

वेद अध्यापक प्रसिद्ध । हिरण्यगर्भ मी म्हणे गोविंद ।
माझेनि जगीं अनुल्लंघ्य वेद । वेदवाद तोही मी ॥ ७१ ॥
गोविंद म्हणाले, वेदांचे अध्यापन करणारा प्रसिद्ध असा जो ब्रह्मदेव तो मी आहे. माझ्यामुळेच जगामध्ये वेदाचे उल्लंघन करता येत नाही. वेदांसंबंधींचा सर्व विचार तोही मीच ७१.

ओंकारेवीण मंत्रश्रेणी । ते जाण बाळकाची कहाणी ।
मंत्रीं ओंकार मी चक्रपाणी । सकळ मंत्र त्याचेनी पावन ॥ ७२ ॥
ओंकाराशिवाय कितीही मंत्र असले तरी ते पोरांच्या गोष्टीप्रमाणेच निष्फळ होत. मी श्रीकृष्ण हाच मंत्रांमधील ओंकार आहे, त्याच्यामुळेच सारे मंत्र पावन झाले ७२.

अकार उकार मकार । अर्धमात्रेसी उच्चार ।
या नांव ‘त्रिविध ओंकार’ । पावन मंत्र येणेंसीं ॥ ७३ ॥
अकार, उकार आणि मकार ह्यांचा अर्धमात्रेसह जो उच्चार, तोच त्रिवर्णात्मक ओंकार होय. याच्या योगानेच मंत्र पावन होतात ७३.

अक्षरांच्या उच्चारासी । अकार लागला सर्वांसी ।
तो अकारू मी हृषीकेशी । जाण निश्चयेसी उद्धवा ॥ ७४ ॥
कोणत्याही अक्षराच्या उच्चाराला अकार हा अवश्य लागतोच. उद्ध्वा ! तो अकारही खरोखर मी श्रीकृष्णच होय, हे निश्चयात्मक समज ७४.

अक्षरीं अकार मी मुकुंदू । छंदामाजीं गायत्री छंदू ।
तो मी म्हणे गोविंदू । यालागीं ब्रह्मवृंदू सेविती ॥ ७५ ॥
अक्षरांमध्ये अकार तो मी श्रीकृष्ण होय. श्रीकृष्ण म्हणाले, छंदांमध्ये गायत्री छंद तो मी. म्हणून ब्रह्मवृंद त्या गायत्री मंत्राचे सेवन करतात ७५.

छंदामाजीं गायत्री छंद । सकळ द्वंद्वामाजीं निर्द्वंद्व ।
तो मी म्हणे गोविंद । पूज्य द्विजवृंद येणेंचि मज ॥ ७६ ॥
श्रीकृष्ण म्हणाले, सर्व छंदांत मुख्य असा गायत्री छंद व सर्व द्वंद्वांमध्ये निर्द्वंद्व तो मी आहे. त्या गायत्रीमंत्रामुळेच ब्रह्मवृंद मला पूज्य झाले आहेत ७६.

इन्द्रोऽहं सर्वदेवानां वसूनामस्मि हव्यवाट् ।
आदित्यानामहं विष्णू रुद्राणां नीललोहितः ॥ १३ ॥
[श्लोक १३] सर्व देवांमध्ये इंद्र, आठ वसूंमध्ये अग्नी, बारा आदित्यांमध्ये विष्णू आणि अकरा रूद्रांमध्ये शंकर मी आहे. (१३)

देवांमाजी मी इंद्र जाण । वसूंमाजीं मी हुताशन ।
आदित्यांमाजी मी वामन । रुद्रांमाजी जाण मी नीललोहितू ॥ ७७ ॥
देवांमध्ये इंद्र तो मी, वसूंमध्ये अग्नि तो मी, आदित्यांमध्ये वामन तो मी, आणि रुद्रांमध्ये नीललोहित तो मी होय ७७.

ब्रह्मर्षीणां भृगुरहं राजर्षीणामहं मनुः ।
देवर्षीणां नारदोऽहं हविर्धान्यस्मि धेनुषु ॥ १४ ॥
[श्लोक १४] मी ब्रह्मषर्मींध्ये भृगू, राजर्षीमध्ये मनू, देवर्षीमध्ये नारद आणि गाईंमध्ये कामधेनू आहे. (१४)

शापूनि ब्रह्म अपूज्य केला । शिवाचा नैवेद्य त्यागविला ।
विष्णू हृदयीं लाता हाणितला । भृगु वाखाणिला श्रीवत्सें ॥ ७८ ॥
मी ब्रह्मदेवाला शाप देऊन पूजा करण्यास अयोग्य ठरविले. शंकराचा नैवेद्य भक्षण करणे निषिद्ध ठरविले,

ब्रह्मऋषींमाजीं संपन्न । भृगु तो मी म्हणे श्रीकृष्ण ।
मनुस्वरूपें मी आपण । राजर्षि जाण मुख्यत्वें ॥ ७९ ॥
भृगूने विष्णूला हृदयावर लाथेने मारले, आणि त्या लाथेची खूण जें श्रीवत्सचिन्ह त्या चिन्हाने भृगूचे माहात्म्य वर्णन केले ७८.

देवर्षीमाजीं मुनि नारद । तोही मी म्हणे गोविंद ।
कामधेनु अतिशुद्ध । स्वरूप प्रसिद्ध तें माझें ॥ १८० ॥
श्रीकृष्ण म्हणाले, ब्रह्मर्षीमध्ये पूज्य झालेला जो भूगुऋषि तो मी. आणि मनूच्या स्वरूपाने मी स्वतः श्रेष्ठ राजर्षि झालो आहे ७९.

सिद्धेश्वराणां कपिलः सुपर्णोऽहं पतत्रिणाम् ।
प्रजापतीनां दक्षोऽहं पितॄणामहमर्यमा ॥ १५ ॥
श्रीकृष्ण म्हणाले, देवीमध्ये नारदमुनि तोही मीच. कामधेनु हे माझेच अत्यंत पवित्र असें सुप्रसिद्ध स्वरूप आहे १८०.

सिद्धांमाजीं कपिल मुनीश्वर । तो मी म्हणे सारंगधर ।
पक्ष्यांमाजीं खगेश्वर । तो मी श्रीधर गरुडरूपें ॥ ८१ ॥
[श्लोक १५] मी सिद्धेश्वरांमध्ये कपिल, पक्ष्यांमध्ये गरूड, प्रजापतींमध्ये दक्ष प्रजापती आणि पितरांमध्ये अर्यमा आहे. (१५)

प्रजापतींमाजी मुख्य । कृष्ण म्हणे तो मी दक्ष ।
पितृगणांमाजीं अध्यक्ष । अर्यमा प्रत्यक्ष स्वरूप माझे ॥ ८२ ॥
श्रीकृष्ण म्हणाले, सिद्धांमध्ये मुनिश्रेष्ठ कपिल तो मी. पक्ष्यांमध्ये गरुडाच्या रूपाने असणारा पक्षिराज तो मीच श्रीकृष्ण होय ८१.

मां विद्ध्युद्धव दैत्यानां प्रह्लादमसुरेश्वरम् ।
सोमं नक्षत्रौषधीनां धनेशं यक्षरक्षसाम् ॥ १६ ॥
कृष्ण म्हणाले, प्रजापतींमध्ये मुख्य जो दक्ष तो मी आहे आणि पितृगणामध्ये श्रेष्ठ जो अर्यमा तो तर माझेच प्रत्यक्ष स्वरूप आहे ८२.

भक्तिप्रतापें अतिअगाध । तो दैत्यांमाजीं मी प्रह्लाद ।
नक्षत्र‍औषधींचा जो स्वामी चंद्र । तें म्हणे गोविंद स्वरूप माझे ॥ ८३ ॥
[श्लोक १६] – हे उद्धवा ! मी दैत्यांमध्ये दैत्यराज प्रह्लाद, नक्षत्रांचा आणि वनस्पतींचा राजा चंद्र मी आहे यक्षराक्षसांमध्ये मी कुबेर आहे. (१६)

यक्षराक्षसांमाजीं थोर । माझें स्वरूप तो कुबेर ।
ज्याचे विश्वासें निरंतर । असे भांडार हरीचें ॥ ८४ ॥
श्रीकृष्ण म्हणाले, भक्तीच्या सामर्थ्याने अत्यंत थोर असा दैत्यांमधील प्रहाद तो मीच होय. तसेंच नक्षत्रांचा आणि औषधींचा स्वामी जो चंद्र तेंही माझंच स्वरूप होय ८३,

ऐरावतं गजेन्द्राणां यादसां वरुणं प्रभुम् ।
तपतां द्युमतां सूर्यं मनुष्याणां च भूपतिम् ॥ १७ ॥
यक्षराक्षसांमध्ये श्रेष्ठ जो कुबेर तोही माझंच स्वरूप आहे. त्याच्या विश्वासावर श्रीहरीचे भांडार नेहमी त्याच्याजवळ असते ८४.

ऐरावत जो गजेंद्र । तो मी म्हणे यादवेंद्र ।
वरुण जो जळचरेंद्र । तें म्हणे उपेंद्र स्वरूप माझे ॥ ८५ ॥
[श्लोक १७] गजेंद्रांमध्ये ऐरावत नावाचा हत्ती, जलचरांचा राजा वरूण, तापणार्‍या आणि प्रकाश देणार्‍यांमध्ये सूर्य आणि मनुष्यांमध्ये राजा मी आहे. (१७)

स्वप्रभा प्रकाशनिष्ठ । जग प्रकाशूनि उद्‍भट ।
तो सूर्य मी म्हणे वैकुंठ । अतितिखट निजतेजें ॥ ८६ ॥
श्रीकृष्ण म्हणाले, गजेंद्रांमध्ये जो ऐरावत तो मी; जलचरांचा राजा जो वरुण, तेही माझेच स्वरूप होय ८५.

मनुष्यांमाजीं जो भोगी क्षिती । सर्व भूमी ज्याच्या हातीं ।
ज्यातें बोलती भूपती । ते माझी विभूती हरि म्हणे ॥ ८७ ॥
श्रीकृष्ण म्हणाले, आपल्या प्रभेनें निरंतर प्रकाश देणारा; जगालाही प्रकाशित करून दैदीप्यमान दिसणारा व आपल्या तेजानें अत्यंत प्रखर असणारा तो सूर्य मीच होय ८६.

उच्चैःश्रवास्तुरङ्गाणां धातूनामस्मि काञ्चनम् ।
यमः संयमतां चाहं सर्पाणामस्मि वासुकिः ॥ १८ ॥
मनुष्यांमध्ये जो पृथ्वीचा उपभोग घेतो, सर्व भूमि ज्याच्या हातांत असते, ज्याला राजा असे म्हणतात, ती माझीच विभूति होय, असे श्रीकृष्ण म्हणाले ८७.

नागेन्द्राणामनन्तोऽहं मृगेन्द्रः शृङ्‌गिदंष्ट्रिणाम् ।
आश्रमाणामहं तुर्यो वर्णानां प्रथमोऽनघ ॥ १९ ॥
[श्लोक १८-१९] मी घोड्यांमध्ये उच्चैःश्रवा, धातूंमध्ये सोने, दंड करणार्‍यांमध्ये यम आणि सर्पांमध्ये वासुकी आहे. (१८) हे पुण्यशील उद्ववा ! मी नागराजांमध्ये शेषनाग, शिंग आणि दाढा असलेल्या प्राण्यांमध्ये मुख्य सिंह, आश्रमांमध्ये संन्यास आणि वर्णांमध्ये ब्राह्मण आहे. (१९)

उच्चैःश्रवा तुरंगजाती । तो मी म्हणे कमळापती ।
सुवर्ण धातु माझी विभूती । जीलागीं लुलाती तिनी लोक ॥ ८८ ॥
श्रीकृष्ण म्हणाले, सर्व घोड्यांमध्य श्रेष्ठ उच्चैःश्रवा तो मी ; आणि जिच्यासाठी त्रैलोक्य धडपड करते, ती सुवर्ण नामक धातु मी ८८.

दंडधारित्यांमाजी गहन । यमधर्म मी आपण ।
सर्पामाजी जाण । मी नारायाण वासुकी ॥ ८९ ॥
शासन करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ शासन करणारा यमधर्म तो मी स्वत:च आहे. मी श्रीकृष्ण सर्पामध्ये वासुकी आहे, हे लक्षात ठेव ८९.

अनंत या नामातें जो धरी । तो नाग मी म्हणे श्रीहरी ।
नखदंष्ट्राशृंगधारी । त्यांमाजीं केसरी म्हणे देवो ॥ १९० ॥
श्रीहरी म्हणतात, नागांमध्ये अनंत हे नांव जो धारण करतो, तो नाग मी. नखें, दाढा व शिंगें धारण करणारी जी श्वापदें, त्यांमध्ये सिंह तो मी असे देव म्हणाले १९०.

चतुर्थाश्रम संन्यास जाण । तो मी म्हणे नारायण ।
वर्णाग्रज जे ब्राह्मण । ते मी ब्रह्म जाणे बोलतें ॥ ९१ ॥
नारायण म्हणाले, चारही आश्रमांमध्ये संन्यास तो मी. वर्णामध्ये श्रेष्ठ व चालतेंबोलतें ब्रह्म जे ब्राह्मण ते मीच ९१.

तीर्थानां स्रोतसां गङ्गा समुद्रः सरसामहम् ।
आयुधानां धनुरहं त्रिपुरघ्नो धनुष्मताम् ॥ २० ॥
[श्लोक २०] मी तीर्थे आणि नद्यांमध्ये गंगा, जलाशयांमध्ये समुद्र, शस्त्रांमध्ये धनुष्य तसेच धनुर्धार्‍यांमध्ये त्रिपुरारी शंकर आहे. (२०)

तीर्थसरितांमाजीं गांग । तें मी म्हणे श्रीरंग ।
तडागीं श्रेष्ठ तडाग । समुद्र सांग मी म्हणे हरी ॥ ९२ ॥
श्रीरंग म्हणाले, पवित्र नद्यांमध्ये गंगोदक तें मी. सरोवरांमध्ये श्रेष्ठ सरोवर जो समुद्र तो पूर्णपणे मी आहे असें श्रीकृष्ण म्हणाले ९२.

आयुधीं धनुष्य हतियेर । तें मी म्हणे सारंगधर ।
त्रिपुरारि मी धनुर्धर । जेणें केला संहार त्रिपुराचा ॥ ९३ ॥
आयुधांमध्ये धनुष्य नामक हत्यार तें मी असें श्रीहरि म्हणाले. आणि ज्याने त्रिपुरांचा संहार केला, तो त्रिपुरशत्रु धनुर्धर मी होय ९३.

धिष्ण्यानामस्म्यहं मेरुर्गहनानां हिमालयः ।
वनस्पतीनामश्वत्थ ओषधीनामहं यवः ॥ २१ ॥
[श्लोक २१] मी निवासस्थानांमध्ये सुमेरू पर्वत, दुर्गम स्थानांमध्ये हिमालय, वनस्पतींमध्ये पिंपळ आणि धान्यांमध्ये सातू आहे. (२१)

त्रिभुवन निवासस्थान महामेरू । तो मी म्हणे धराधरू ।
दुर्गमत्वें अतिदुर्धरू । तो मी हिमगिरिवरू म्हणे कृष्ण ॥ ९४ ॥
श्रीकृष्ण म्हणाले, त्रिभुवनाचे निवासस्थान जो महामेरु तो मी. चढून जाण्यास अत्यंत कठीण जो हिमालय पर्वत तोही मीच असें श्रीकृष्ण म्हणाले ९४.

वृक्षांमाजीं जो अश्वत्थू । तो मी म्हणे श्रीकृष्णनाथू ।
ओषधींमाजीं अतिविख्यातू । यव मी अच्युतू म्हणे वेगें ॥ ९५ ॥
वृक्षांमध्ये पिंपळ तो मी असें श्रीकृष्ण म्हणाले. औषधीमध्ये प्रसिद्ध जो यव तो मी असेंही श्रीकृष्णांनी उत्साहभराने सांगितले ९५.

पुरोधसां वसिष्ठोऽहं ब्रह्मिष्ठानां बृहस्पतिः ।
स्कन्दोऽहं सर्वसेनान्यामग्रण्यां भगवानजः ॥ २२ ॥
[श्लोक २२] मी पुरोहितांमध्ये वसिष्ठ, वेदवेत्त्यांमध्ये बृहस्पती, सर्व सेनापतींमध्ये कार्तिक स्वामी तसेच सन्मार्गप्रवर्तकांमध्ये भगवान ब्रह्मदेव आहे. (२२)

श्रीरामपौरोहित्यें श्रेष्ठ । देवो म्हणे तो मी वसिष्ठ ।
वेदवेत्त्यांमाजीं उद्‍भट । सुरगुरु वरिष्ठ मी उद्धवा ॥ ९६ ॥
देव म्हणाले, श्रीरामाचा पुरोहितपणा करून थोरपणास चढलेला वसिष्ठ तो मी. आणखी उद्धवा ! वेदवेत्त्यांमध्ये अग्रगण्य जो श्रेष्ठ देवगुरु बृहस्पति तो मी ९६.

स्कंद सेनापतिशिरोमणी । तो मी म्हणे चक्रपाणी ।
स्वधर्मप्रवर्तकू अग्रगणी । वंद्य ब्राह्मणीं तो ब्रह्मा मी ॥ ९७ ॥
श्रीकृष्ण म्हणाले, सेनापतींमध्ये श्रेष्ठ जो स्कंद (कार्तिकस्वामी), तो मी. स्वधर्मप्रवर्तकांमध्ये अग्रगण्य व ब्राह्मणांमध्ये अत्यंत पूज्य जो ब्रह्मा तो मी ९७.

यज्ञानां ब्रह्मयज्ञोऽहं व्रतानामविहिंसनम् ।
वाय्वग्न्यर्काम्बुवागात्मा शुचीनामप्यहं शुचिः ॥ २३ ॥
[श्लोक २३] पंचमहायज्ञांमध्ये ब्रह्मयज्ञ मी आहे, व्रतांमध्ये अहिंसाव्रत आणि शुद्ध करणार्‍या पदार्थांमध्ये नित्यशुद्ध वायू, अग्नी, सूर्य, जल, वाणी व आत्मा मी आहे. (२३)

यज्ञांमाजीं ब्रह्मयज्ञ । तो मी म्हणे सर्वज्ञ ।
देवर्षिपितृभूतगण । आब्रह्म भुवन जेणें तृप्त ॥ ९८ ॥
आणखी सर्वज्ञ असे श्रीहरि म्हणाले, ज्याच्या योगाने देव, ऋषि, पितर, इतर प्राणिमात्र आणि सर्व विश्व तृप्त होते, तो यज्ञांतील ब्रह्मयज्ञ मी होय ९८.

जीवमात्रासी पैं जाणे । नेदावे दुःखवचन ।
व्रतांमाजीं जें अविहिंसन । ते मी श्रीकृष्ण स्वयें म्हणे ॥ ९९ ॥
श्रीकृष्ण म्हणाले, कोणत्याही प्राणिमात्राला दुःख होईल असें भाषण करूं नये, असें जें व्रतांमध्ये अहिंसाव्रत तें मीच स्वतः होय ९९.

एका वायूचेनि पवित्रपण । एक अग्नीस्तव पवित्र जाण ।
एकातें पवित्र करी जीवन । एक पावन वचनमात्रें ॥ २०० ॥
कोणाला वायूनें पवित्रपणा येतो, कोणाला अशी पवित्रपणा येतो, कोणाला पाण्याने पवित्रपणा येतो व कोणी भाषणानेच पवित्र होतात २००.

एक बुद्धिस्तव पवित्र जाण । या समस्तांमाजीं पवित्रपण ।
तें माझे स्वरूप म्हणे श्रीकृष्ण । पावना पावन मी एक ॥ १ ॥
कोणी बुद्धीनेच पवित्र होतात, पण अशा ह्या सर्वांमध्ये जे पवित्रपण म्हणून आहे, ते माझंच स्वरूप होय. पावनालाही पावन करणारा एक मीच आहे असें श्रीकृष्ण म्हणाले १.

जग माझेनि नामें पुनीत । हें सर्वांचे संमत ।
त्या माझें स्वरूप जें येथ । परम पुनीत पुनीतां ॥ २ ॥
जग हे माझ्या नामानेच पवित्र होते, हे सर्वसंमत आहे. त्या माझे जें स्वरूप येथे आहे ते पुनीतांहूनही अत्यंत पुनीत आहे २.

योगानामात्मसंरोधो मन्त्रोऽस्मि विजिगीषताम् ।
आन्वीक्षिकी कौशलानां विकल्पः ख्यातिवादिनाम् ॥ २४ ॥
[श्लोक २४] योगांमध्ये मनोनिरोधरूपी समाधियोग मी आहे जिंकण्याची इच्छा करणार्‍यांची गुप्त मसलत मी आहे आत्मानात्मविवेकाच्या चर्चेमधील ब्रह्मविद्या मी आहे वादविवाद करणार्‍यांमधील विकल्प मी आहे. (२४)

विविध योगांमाजीं आत्मरोधू । तो योग मी म्हणे गोविंदू ।
जेणें प्रकटे परमानंदू । समाधिबोधू साधकां ॥ ३ ॥
गोविंद म्हणतात, ज्याच्या योगाने साधकांच्या अंत:करणामध्ये परमानंद उत्पन्न होतो व समाधीचे ज्ञान प्राप्त होते, असा जो नाना प्रकारच्या योगांमध्ये ‘आत्मनिरोध’ म्हणून योग आहे, तो योग मी ३.

मुख्यत्वें विवेक धरोनि हातीं । जो न्यायतां विजयो वांछी चित्तीं ।
ते नीतीची नीति मी श्रीपती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ४ ॥
आणखी उद्ध्वा ! मुख्यत्वे विवेक हाताशी घेऊन नीतिन्यायानेच विजयी होण्याची जो इच्छा करतो, त्या नीतीचीही नीति मीच श्रीकृष्ण होय, हे निश्चित समज ४.

आत्मानात्मविवेक केवळ । ते आन्वीक्षिकी विद्या कुशळ ।
ते विद्या म्हणे मी गोपाळ । विवेक प्रबळ माझेनी ॥ ५ ॥
गोपाल म्हणतात, केवळ आत्मानात्माचा विचार करणारी अशी जी अध्यात्मविद्या, ती विद्या मी आहे. माझ्याच योगानें विवेक वृद्धिंगत होतो ५.

वादांमाजी वाद अनंत । जेथ विकल्पा नाही अंत ।
तो वादू मी म्हणे अच्युत । ऐक निश्चित विकल्प ॥ ६ ॥
श्रीकृष्ण म्हणाले, ज्याच्यामध्ये विकल्पाला अंतच नाही असा, वादांमध्ये अनंत चालणारा जो वाद, तो वाद मी. आणखी विकल्प कोणते ते ऐक ६.

आख्याती अन्यथाख्याती । शून्यख्याती सत्‍ख्याती ।
अनिर्वचनीय जे ख्याती । तो वादू निश्चितीं मी उद्धवा ॥ ७ ॥
उद्धृवा! आख्याति, अन्यथाख्याति, शून्यख्याति, सत्ख्याति आणि अनिर्वचनीय अशी जी ख्याति ते वादही खरोखर मीच होय ७.

स्त्रीणां तु शतरूपाहं पुंसां स्वायम्भुवो मनुः ।
नारायणो मुनीनां च कुमारो ब्रह्मचारिणाम् ॥ २५ ॥
* [ श्लोक २५] मी स्त्रियांमध्ये मनुपत्‍नी शतरूपा, पुरूषांमध्ये स्वायंभुव मनू, मुनीश्वरांमध्ये नारायण आणि ब्रह्मचार्‍यांमध्ये सनत्कुमार आहे. (२५)

शतरूपा आणि मनू । इयें दोनी मी म्हणे जनार्दनू ।
मुनींमाजीं मी नारायणू । बदरी सेवुनू सदा असे ॥ ८ ॥
जनार्दन म्हणाले, शतरूपा आणि मनु हे दोन्ही मीच. सदासर्वकाळ बदरिकाश्रमांत राहणारा मुनींमधील नारायण तो मी ८.

नैष्ठिक ब्रह्मचर्यधर । माझें स्वरूप सनत्कुमार ।
स्वयें सांगताहे श्रीधर । जाण साचार उद्धवा ॥ ९ ॥
आणखी श्रीकृष्ण स्वतः सांगतात की, खरोखर हे उद्धवा ! निष्ठेने ब्रह्मचर्यव्रत धारण करून राहणारे जे सनत्कुमार तेही माझेंच स्वरूप होत असे समज ९.

धर्माणामस्मि सन्यासः क्षेमाणामबहिर्मतिः ।
गुह्यानां सूनृतं मौनं मिथुनानामजस्त्वहम् ॥ २६ ॥
[ श्लोक २६] धर्मांमध्ये सन्यासधर्म मी आहे कल्याण करून घेऊ इच्छिणार्‍यांची अंतर्मुख वृत्ती मी आहे कोणतीही गोष्ट गुप्त राखण्यासाठी लागणारी मधुर वाणी आणि मौन मी आहे, ज्याच्या शरीरापासून स्त्रीपुरूषांची पहिली जोडी उत्पन्न झाली, तो ब्रह्मदेव मी आहे. (२६)

भूतां अभयदान उपक्रमू । सर्वां भूतीं मी आत्मारामू ।
हा संन्यासाचा मुख्य धर्मू । तो धर्म पुरुषोत्तमू स्वयें मी म्हणे ॥ २१० ॥
सर्व प्राणिमात्रांना अभयदान देण्याचा क्रम ठेवणे, सर्व भूतांमध्ये आत्माराम तो मी असे समजणे, हाच संन्यासाचा मुख्य धर्म होय. पुरुषोत्तम म्हणतात की, तो धर्म स्वतः मीच आहे २१०.

भूतांसी काया वाचा मनें । दुःख नेदूनि सुख देणें ।
या नांव संन्यासधर्म म्हणणें । तो धर्म मी म्हणे गोविंद ॥ ११ ॥
कायावाचामनेंकरून कोणत्याही प्राण्याला दुःख न देतां सुखच देणे याला संन्यासधर्म असे म्हणतात. गोविंद म्हणाले, तो संन्यासधर्म मी आहे ११.

अंतरीं शुद्ध नाहीं बोध । दांत चावोनि साहतां द्वंद्व ।
ते क्षमा नोहे शुद्ध । ऐके विनोद क्षमेचा ॥ १२ ॥
अंत:करणामध्ये शुद्ध बोध झालेला नसतो, आणि दांत ओंठ चावून द्वंद्वे सहन करावयाची, ती काही खरी क्षमा नव्हे. क्षमेचे स्वरूप ऐक १२.

अंतरीं ठसावलें परब्रह्म । बाह्य सर्वा भूतीं जाहला सम ।
ते क्षमा मी म्हणे पुरुषोत्तम । द्वंद्वाराम बाधिना ॥ १३ ॥
पुरुषोत्तम म्हणतात, अंत:करणांत परब्रह्माचा खरा ठसा उमटून जो बाहेर सर्व प्राणिमात्रांशी समान: भावाने वागतो, त्याची ती वृत्ति म्हणजेच क्षमा होय. ती क्षमा मी आहे. अशी क्षमा ज्याचेजवळ असते, त्याला द्वंद्वांची पीडा होत नाही १३.

असत्य पापी सकळ सृष्टीं । असत्यांमाजीं पापकोटी ।
असत्याची खोटी गोठी । जो तो पोटीं सांडीना । ॥ १४ ॥
सर्व जगामध्ये असत्यवादी मनुष्यच पातकी होय. असत्यामध्ये कोट्यवधि पातकें भरलेली असतात. असत्याची गोष्ट अत्यंत खोटी असते. ती कोणीही मनावर घेत नाही १४.

उभय लौकिकीं खोटेपणें । असत्यबहिर्मुख नाणें ।
तें मनींहूनि जेणें सांडणें । तो म्यां श्रीकृष्ण वंदिजे ॥ १५ ॥
बहिर्मति असणे हे इहलोकीं व परलोकीही खोटें नाणेच होय. ते ज्याने मनापासून सोडले, त्याला मी श्रीकृष्णसुद्धा वंदन करतों १५.

ते गुह्यामाजीं अतिगुह्य जाण । सत्य वाचा कां मनींहूनि मौन ।
तें मी म्हणे मधुसूदन । सत्य प्रिय जाण निजगुह्य ॥ १६ ॥
सत्य भाषण करणे, किंवा जें मनःपूर्वक मौन धारण करणे तेंच गुह्यांतील अत्यंत मोठे गुह्य होय. श्रीकृष्ण म्हणाले की ते गुह्य मी होय. कारण सत्यावर प्रीति असणे हेच माझे आत्मगुह्य आहे १६.

स्रष्ट्याचे देह द्विधा जाण । मनू शतरूपा मूळमिथुन ।
तें मी म्हणे नारायण । मनुष्य सृजन सद्‍भावें ॥ १७ ॥
ब्रह्मदेवाचा देह मनु आणि शतरूपा ह्या अगदी पहिल्या जोडप्याच्या रूपाने द्विभागात्मक झाला. नारायण म्हणतात, ते एकनिष्ठेनें मनुष्यसृष्टि उत्पन्न करणारे जोडपें मीच होय १७.

संवत्सरोऽस्म्यनिमिषाम् ऋतूनां मधुमाधवौ ।
मासानां मार्गशीर्षोऽहं नक्षत्राणां तथाभिजित् ॥ २७ ॥
[श्लोक २७] – नेहमी जागृत असणार्‍यांमध्ये संवत्सररूप काळ मी आहे, ऋतूंमध्ये वसंत, महिन्यांमध्ये मार्गशीर्ष आणि नक्षत्रांमध्ये अभिजित. (उत्तराषाढाचा चौथा व श्रवणाचा पहिला चरण याला अभिजित नाव आहे) मी आहे. (२७)

सावधानेंअविकळ । न चुकतां पळें पळ ।
संवत्सरात्मक जो काळ । तो मी गोपाळ स्वयें म्हणे ॥ १८ ॥
श्रीकृष्ण म्हणतात, एक पळभरही न चुकतां निरंतर सावधपणाने दक्ष राहाणारा जो संवत्सरात्मक काळ, तो मीच स्वतः होय १८.

त्रसरेणूपासोनि जाण । लवनिमिषदिनमान ।
संवत्सरवरी सावधान । गणीं मी संकर्षण काळगणना ॥ १९ ॥
त्रसरेणूपासून संवत्सरापर्यंत लव, निमिष, दिवस इत्यादि मानांची कालगणना मी संकर्षणच सावधानतेने करीत असतों १९.

मधुमाधव वसंतयुक्तू । कृष्ण म्हणे तो मी ऋतू ।
मार्गशीर्ष मी मासांआंतू । धान्यपाकयुक्तू आल्हादी ॥ २२० ॥
कृष्ण म्हणतात, मधु-माधव या दोन महिन्यांचा जो वसंत ऋतु, तो ऋतु मी आहे. सर्व महिन्यांमध्ये, धान्ये परिपक्व दशेस आणणारा आल्हादकारक असा मार्गशीर्ष महिना मी आहे २०.

गणितां न ये पंचांगांत । नक्षत्रीं असोनि सदा गुप्त ।
अव्यक्त परी सज्ञाना प्राप्त । तें मी अभिजित् म्हणे हरी ॥ २१ ॥
पंचांगांत ज्याला गणितां येत नाहीं; नक्षत्रांत असूनही जें सर्वदा गुप्त असते, अदृश्य असतांही सुज्ञ लोकांना सांपडते; ते अभिजित् नक्षत्र मी आहे असें श्रीहरि म्हणतात २१.

अहं युगानां च कृतं धीराणां देवलोऽसितः ।
द्वैपायनोऽस्मि व्यासानां कवीनां काव्य आत्मवान् ॥ २८ ॥
[श्लोक २८] मी युगांमध्ये सत्ययुग, विवेकी पुरूषांमध्ये महर्षी देवल व असित, व्यासांमध्ये द्वैपायन व्यास आणि विद्वानांमध्ये बुद्धिमान शुक्राचार्य आहे. (२८)

युगांमाजीं कृतयुग । तें मी म्हणे श्रीरंग ।
जेथ संपूर्ण धर्म सांग । अधर्मभाग असेना ॥ २२ ॥
श्रीरंग म्हणतात, युगांमध्ये ज्यात सर्व धर्म यथासांग चालतात, अधर्माचा भाग मुळींच असत नाही, ते कृतयुग मी २२.

निजधैर्य अतिअद्‍भुत । असित देवल धैर्यवंत ।
तो मी म्हणे गा अच्युत । जाण निश्चित उद्धवां ॥ २३ ॥
अच्युत म्हणाले, उद्धवा ! धैर्यामध्ये आत्मधैर्य हे मोठे विलक्षण आहे. असे धैर्यशाली जे असित आणि देवल ते मीच होय, असें निश्चित समज २३.

वेदविभागी राजहंस । जो कां द्वैपायन व्यास ।
तो मी म्हणे हृषीकेश । निवडूनि द्विजांस दीधले वेद ॥ २४ ॥
हृषीकेशी म्हणतात, वेदांचे विभाग करण्याविषयीं केवळ राजहंस, आणि ज्याने वेदांची निवड करून ते ब्राह्मणांना दिले असा जो द्वैपायन व्यास तो मी २४.

कवि त्यांमाजीं परमार्थज्ञाता । उशना कवी जाण तत्त्वतां ।
तो मी म्हणे रमाभर्ता । निजात्मकविता मी शुक्र ॥ २५ ॥
लक्ष्मीपति म्हणतात, जे कवि आहेत, त्यांमध्ये खरोखर परमार्थज्ञानी जो उशना (शुक्राचार्य) कवि, तो मी. साक्षात् आत्मस्वरूप ज्ञानच असा शुक्राचार्य मी होय २५.

वासुदेवो भगवतां त्वं तु भागवतेष्वहम् ।
किंपुरुषाणां हनुमान् विद्याध्राणां सुदर्शनः ॥ २९ ॥
[ श्लोक २९] मी षड्‌गुणैश्वर्य संपन्नांमध्ये वासुदेव, भगवद्‌भक्तांमध्ये तू. (उद्वव), किंपुरूषांमध्ये हनुमान आणि विद्याधरांमध्ये सुदर्शन आहे. (२९)

षड्‍गुणभाग्यें भाग्यवंत । पूर्णांशे जो भगवंत ।
वासुदेवनामें विख्यात । जाण तो मी येथे श्रीकृष्ण ॥ २६ ॥
षड्गुणैश्वर्याने भाग्यवान्, पूर्णाशाने भगवत्स्वरूप व वासुदेव ह्या नावाने प्रसिद्ध असणारा, असा श्रीकृष्णरूपाने मीच येथे आहे असे समज २६.

भागवतांमाजी अतिगहन । उद्धवा तूं तो मीचि जाण ।
ऐसें बोलतां श्रीकृष्ण । उद्धवें श्रीचरण वंदिले ॥ २७ ॥
आणखी उद्धवा ! भगवद्भक्तांमध्ये अत्यंत श्रेष्ठ जो तूं , तो मीच होय, हे लक्षात ठेव. असें श्रीकृष्णाने म्हणतांच उद्धवाने श्रीकृष्णाच्या चरणांना वंदन केले २७.

उद्धवें करितां नमन । कृष्णें दिधले आलिंगन ।
आनंदे कोंदलें त्रिभुवन । स्वानंदघन तुष्टला ॥ २८ ॥
उद्धवाने नमस्कार करतांच श्रीकृष्णानेंही त्याला आलिंगन दिले. तेव्हां सर्व त्रैलोक्य आनंदाने भरून गेले. इतका आत्मानंदाचा केवळ मेघ असा श्रीकृष्ण संतुष्ट झाला २८.

उद्धव आणि श्रीकृष्ण । दोनी एक जाहले जाण ।
‘मी तो तूं’ जें बोलिला श्रीकृष्ण । तें उद्धवासी आपण सत्यत्वें दावी ॥ २९ ॥
उद्धव आणि श्रीकृष्ण दोन्ही एकरूप झाले. ‘मी’ तोच ‘तूं ‘ असे जे श्रीकृष्ण बोलला होता, तें उद्धवाला स्वतः प्रत्यक्षच खरे करून दाखविले २९.

दोघांचे मोडलें दोनीपण । उद्धव जाहला श्रीकृष्ण ।
कृष्णाअंगी उद्धवपण । संपूर्ण जाण बाणलें ॥ २३० ॥
दोघांचे दोन भिन्न भाव मोडून जाऊन उद्धव श्रीकृष्णच झाला आणि श्रीकृष्णाच्या आंगींही संपूर्ण उद्धवपणच बिंबून राहिले २३०.

तेणें उद्धव झाला विस्मित । नावेक श्लाघला आपणांत ।
मीच कृष्णाचा प्रिय भक्त । हें जाणोनि अनंत बोलिला ॥ ३१ ॥
त्यामुळे उद्धव आश्चर्यचकित झाला आणि श्रीकृष्णाचा प्रियभक्त काय तो मीच असें म्हणून क्षणभर आपल्या ठिकाणींच मोठेपणाने फुगला. हे जाणून श्रीकृष्ण म्हणाले ३१,

वानरांमाजी हनुमंत । तो मी म्हणे कृष्णनाथ ।
तंव उद्धव जाहला गर्वहत । लाजला पोटांत ते काळीं ॥ ३२ ॥
वानरांमध्ये हनुमंत तो मी असें श्रीकृष्ण म्हणाले. तेव्हां उद्धवाचा अभिमान नष्ट झाला आणि तो मनांतल्या मनांतच खजिल होऊन गेला ३२.

जेथ वानर आणि वनचर । मजहूनि कृष्णाचे प्रियकर ।
न कळे हरिभक्तांचा पार । मी कोण किंकर ते ठायीं ॥ ३३ ॥
कारण की, जेथें वानरें आणि श्वापदेसुद्धा कृष्णाची माझ्याहून प्रियकर भक्त झाली, तेथे हरिभक्तांचा अंतच लागणे कठीण. मग मज दासाचा तेथ पाड काय? ३३.

ऐसें विचारूनि चित्तां । सवेंचि नमिलें कृष्णनाथा ।
तुझ्या विभूति अचुंबिता । कृपेनें तत्त्वतां मज सांग ॥ ३४ ॥
असा मनामध्ये विचार करून लागलाच त्याने श्रीकृष्णाला नमस्कार केला. आणि म्हणाला, खरोखर आपल्या ज्या विभूति आहेत त्या कृपा करून सर्वच मला सांगाव्यात ३४.

तंव हांसोनि श्रीधर । काय बोलिला उत्तर ।
सुदर्शन जो विद्याधर । तो विभूति साचार पैं माझी ॥ ३५ ॥
तेव्हां श्रीकृष्ण हसून काय म्हणाले? ते म्हणाले की, विद्याधर असा जो सुदर्शन तो खरोखर माझीच विभूति होय ३५.

रत्‍नानां पद्मरागोऽस्मि पद्मकोशः सुपेशसाम् ।
कुशोऽस्मि दर्भजातीनां गव्यमाज्यं हविःष्वहम् ॥ ३० ॥
[श्लोक ३०] रत्‍नांमध्ये पद्मराग, सुंदर वस्तूंमध्ये कमळाची कळी, तृणांमध्ये कुश आणि हविर्द्रव्यांमध्ये गाईचे तूप मी आहे. (३०)

रत्नांमाजी जो पद्मराग । तो मी म्हणे श्रीरंग ।
मनोहरांमाजी अव्यंग । हरि म्हणे सांग पद्मकळा तो मी ॥ ३६ ॥
श्रीरंग म्हणतात, रत्नांमध्ये जो पद्मराग तो मी. श्रीहरि म्हणाले, मनोहर वस्तूंमध्ये अत्यंत निर्दोष असा जो कमळाचा कळा तो मी ३६.

दशदर्भांमाझारीं । कुश तो मी म्हणे श्रीहरी ।
सकळ हविषांच्या शिरीं । गोघृत श्रीहरि स्वयें मी म्हणे ॥ ३७ ॥
श्रीहरि म्हणतात, दहा प्रकारच्या दर्भांमध्ये कुश ज्याला म्हणतात तो मी. आणखी श्रीहरींनी स्वतः सांगितले की, सर्व होमद्रव्यांमध्ये अग्रगण्य जें गाईचे तूप ते मी ३७.

व्यवसायिनामहं लक्ष्मीः कितवानां छलग्रहः ।
तितिक्षास्मि तितिक्षूणां सत्त्वं सत्त्ववतामहम् ॥ ३१ ॥
[श्लोक ३१] मी व्यापार करणार्‍यांमध्ये राहाणारी लक्ष्मी, कपटाने खेळ करणार्‍यांमध्ये द्यूत, सहनशील लोकांची सहनशीलता आणि सात्त्विक पुरूषांचा सत्त्वगुण आहे. (३१) मी व्यापार करणार्‍यांमध्ये राहाणारी लक्ष्मी, कपटाने खेळ करणार्‍यांमध्ये द्यूत, सहनशील लोकांची सहनशीलता आणि सात्त्विक पुरूषांचा सत्त्वगुण आहे. (३१)

व्यवसायाचे व्यवस्थिती । दानयुक्त अतिसंपत्ती ।
ते लक्ष्मी मी म्हणे श्रीपती । जाण निश्चिती उद्धवा ॥ ३८ ॥
लक्ष्मीपति म्हणाले, हे उद्ध्वा! व्यापार व उद्योगधदे करणाऱ्यांना साधनभूत व दुसन्याला दान देण्यास योग्य जी अपरंपार संपत्ति ती मीच होय. हे खरोखर लक्षात ठेव ३८.

कपटाचिये कपटगती । अगम्य जे छळणस्थिती ।
तो मी कृष्ण मायिकमूर्ती । अतर्क्य युक्ती छळणाची ॥ ३९ ॥
कापट्यातील जी कपटयुक्ति, जिच्या योगाने अतर्क्य छळ करता येतो, ती मायामय मूर्ति मीच श्रीकृष्ण आहे. माझी छळ करण्याची युक्ति केवळ अतर्क्य आहे ३९.

ब्रह्माचे अंगी निजजीविता । जीवासी ब्रह्मसायुज्यता ।
त्या कपटाचा मीचि कर्ता । देवांदेवतां अतर्क्य ॥ २४० ॥
परब्रह्माच्या ठायीं जीवपणाची कल्पना आणि जीवाचे ब्रह्मस्वरूपाशी ऐक्य ह्या सर्व कपटाचा कर्ताही मीच. हें कपट देव-देवतांनाही अतर्क्य आहे २४०.

आम्ही मायानियंते म्हणविती । तो शिवू ठकिला मोहिनीप्रती ।
ब्रह्मा ठकिला वत्सहरणार्थी । ठकडा निश्चितीं मी एकू ॥ ४१ ॥
ब्रह्मदेव व शंकर हे आपल्याला मायेचे नियंते असें म्हणवितात, पण तोच शंकर मोहिनीदर्शनाने मी फसविला आणि ब्रह्मदेव गाइचीं वत्सें चोरून नेण्यांत मी फसविला ! म्हणून खरोखर ठकांतला महाठक तो एक मीच ४१.

सहनशीळीं सहनशक्ती । ते मी म्हणे कमळापती ।
सात्त्विकांची निजसत्त्ववृत्ती । ते मी श्रीपती स्वयें म्हणे ॥ ४२ ॥
लक्ष्मीपति म्हणतात, सहनशीलांमध्ये सहनशक्ति म्हणतात ती मीच. आणखी श्रीपति सांगतात, सात्त्विकांची जी मूळची सत्त्ववृत्ति तीही मीच स्वत: होय ४२.

ओजः सहो बलवतां कर्माहं विद्धि सात्वताम् ।
सात्वतां नवमूर्तीनामादिमूर्तिरहं परा ॥ ३२ ॥
[श्लोक ३२] मी बलवानांमधील उत्साह आणि पराक्रम, भगवद्‌भक्तांमधील भक्तियुक्त निष्काम कर्म आणि वैष्णवांना पूज्य अशा वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरूद्ध, नारायण, हयग्रीव, वराह, नृसिंह आणि वामन या नऊ मूर्तीमध्ये पहिली व श्रेष्ठ मूर्ती वासुदेव आहे. (३२)

बळवंतांच्या ठायीं प्रबळ । मनोबळ शरीरबळ ।
धैर्यबळ तें मी गोपाळ । जेणें अळुमाळ डंडळीना ॥ ४३ ॥
बलवानांच्या ठिकाणी अत्यंत प्रबळ असें जें मनोबळ, शरीरबळ व धैर्यबळ असते व ज्याच्या योगानें तो यत्किंचितही डगमगत नाही, ते धैयबळही मीच श्रीकृष्ण होय ४३.

भक्तांच्या ठायीं भजनकर्म । जेणें माझें अनिवार प्रेम ।
तें कर्म म्हणे मी पुरुषोत्तम । भक्तकामनिर्दळणू ॥ ४४ ॥
पुरुषोत्तम म्हणाले, ज्याच्या योगाने मजविषयीं अनिवार प्रेम उत्पन्न होते, असे जे भक्तांच्या अंगचे कामना नष्ट करणारे भजनकर्म ते मीच होय ४४,

नवव्यूह अर्चनस्थिती । सात्त्वतां ज्या नवमूर्ती ।
त्यांत वासुदेव प्रथमस्थिती । ऐक व्युत्पत्ती नवांची ॥ ४५ ॥
नऊ प्रकारच्या भक्तिपूर्वक पूजाविधीसाठी भक्तांना ज्या नऊ प्रकारच्या मूर्ति सांगितल्या आहेत, त्यांत मज वासुदेवाची मूर्ति प्रथम होय. आता नऊ मूर्तीचीही उपपत्ति ऐक ४५.

वासुदेव संकर्षण । अनिरुद्ध आणि प्रद्युम्न ।
हयग्रीव नारायण । वराह वामन नरसिंह ॥ ४६ ॥
वासुदेव, संकर्षण, अनिरुद्ध, प्रद्युन्म , हयग्रीव, नारायण, वराह, वामन आणि नरसिंह ४६,

हे नवव्यूहांची व्युत्पत्ती । यांमाजी मी प्रथम मूर्ती ।
येर आठही माझ्या विभूती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ४७ ॥
ही नऊ प्रकारच्या मूर्तीची स्वरूप आहेत. त्यांत पहिली जी मूर्ति ती मी होय. उद्धवा! बाकीच्या ज्या आठ मूर्ति आहेत, त्याही खरोखर माझ्याच विभूति होत ४७.

हयग्रीव वेदमूर्ती । तेथें श्रीव्यासें करूनि भक्ती ।
वेदव्यासपदप्राप्ती । हे केली ख्याती तिहीं लोकीं ॥ ४८ ॥
हयग्रीव ही वेदाची मूर्ति आहे. तिची श्रीव्यासांनी भक्ति केल्यामुळे त्यांना ‘वेदव्यास’ ह्या पदवीची प्राप्ति झाली व त्रिभुवनांत आपला लौकिक गाजवून सोडला ४८.

नारायण निजमूर्ती । स्रष्ट्यानें करूनि त्याची भक्ती ।
चतुःश्लोकी ज्ञानस्थिती । पावोन निश्चितीं ब्रह्मत्वा आला ॥ ४९ ॥
नारायण ही मत्स्वरूपी मूर्ति आहे. ब्रह्मदेवाने तिची भक्ति करून चतुःश्लोकांनी ज्ञान प्राप्त करून घेतल्यामुळेच तो खरोखर ब्रह्मपदाला पोंचला ४९.

श्वेतवराह महामूर्ती । धरेनें केली पूर्ण भक्ती ।
तीस उद्धरूनि कृपामूर्ती । अभिनव शांती अर्पिली ॥ २५० ॥
श्वेतवराह ही सर्वात श्रेष्ठ मूर्ति होय. तिची पृथ्वीने परिपूर्ण भक्ति केली, म्हणून त्या दयासागराने तिचा उद्धार करून तिला अप्रतिम शांति अर्पण केली २५०.

माझी निजमूर्ती वामन । देवीं करूनि पूर्ण भजन ।
त्यांच्या छळें बळी बांधोन । देवांचा सन्मान स्वाधिकार केला ॥ ५१ ॥
वामनही माझीच मूर्ति होय. त्याचे देवांनी पूर्णपणे भजन केले तेव्हा त्या देवांचा होणारा छळ बंद करण्यासाठी वामनाने बळीला बांधून टाकलें आणि देवांचा अधिकार देवांना देऊन त्यांचा सन्मान केला ५१.

नरहरि दिव्यमूर्ती । प्रल्हादें करूनि अनन्यभक्ती ।
मी सर्वात्मा सर्वांभूतीं । हे लोकप्रतीती विश्वासिली जेणें ॥ ५२ ॥
नरहरि ही एक दिव्य मूर्ति आहे. प्रल्हादाने त्या मूर्तीची एकनिष्ठ भक्ति केली, व मी सर्व विश्वाचा आत्मा असून सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी सर्वत्र भरून राहिलेलों आहे, ही गोष्ट त्याने सर्व लोकांच्या अनुभवास आणून देऊन सर्वांचा विश्वास त्यावर बसविला ५२.

संकर्षण श्रेष्ठ मूर्ती । ब्रह्माज्ञा रैवतें केली भक्ती ।
अर्पूनियां रेवती । स्वानंदस्थितीं निवाला ॥ ५३ ॥
संकर्षण म्हणजे बळराम ही मूर्तीही श्रेष्ठच आहे. ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून रैवतक पर्वताने त्याची भक्ति केली व आपली कन्या रेवती त्यास अर्पण करून तो आत्मानंदानुभवानें तृप्त झाला ५३.

प्रद्युम्न काममूर्ती । सकाम कामुकीं करूनियां भक्ती ।
जे जे काम वांछिती । ते ते निश्चितीं तो पुरवी ॥ ५४ ॥
प्रद्युम्न ही मूर्ति कामस्वरूप आहे. ह्याकरितां नाना प्रकारच्या इच्छा करणाऱ्या कामुकांनी त्याची भक्ति करून ज्या इच्छा मागितल्या, त्यांचे ते ते इच्छित मनोरथ तो निश्चयेंकरून पूर्ण करतो ५४.

अनिरुद्ध माझा निजसखा । शिवाज्ञा भक्ती केली उखा ।
बाणासुर तारिला देखा । साह्य चित्ररेखा नारदाज्ञा ॥ ५५ ॥
अनिरुद्ध हाही माझा अत्यंत जिवलग होय. शिवाच्या आज्ञेवरून उषेने त्याची भक्ति केली, आणि तिने बाणासुराचा उद्धार केला. नारदाच्या आज्ञेनें चित्ररेखा तिला साहाय्य झाली ५५.

पूर्णांशे ब्रह्मस्थिती । वासुदेव मी आदिमूर्ती ।
लीलेनें तारिलें नेणों किती । तेथील निजभक्ती उद्धवार्जुनीं नांदे ॥ ५६ ॥
पूर्णाशाने ब्रह्मस्वरूप आदिमूर्ति जो वासुदेव तो मीच होय. मी लीलेनेच कित्येकांचा उद्धार केला. त्यांची गणना करता येत नाही. त्या माझी भक्ति उद्धवाच्या ठिकाणी व अर्जुनाच्या ठिकाणी मात्र नांदत आहे ५६.

नव भक्ति नव मूर्ती । तेथील भक्तीची स्थिती ।
उद्धवा म्यां तुजप्रती । यथार्थ गती सांगीतली ॥ ५७ ॥
उद्धवा! ह्याप्रमाणे नऊ प्रकारच्या भक्ति, नऊ प्रकारच्या मूर्ति आणि त्यांच्या भक्तीचा प्रकार मी तुला यथार्थ रीतीने कथन केला ५७.

विश्वावसुः पूर्वचित्तिर्गन्धर्वाप्सरसामहम् ।
भूधराणामहं स्थैर्यं गन्धमात्रमहं भुवः ॥ ३३ ॥
[श्लोक ३३] मी गंधर्वामध्ये विश्वावसू, अप्सरांमध्ये पूर्वचित्ती, पर्वतांमध्ये स्थैर्य आणि पृथ्वीमध्ये शुद्ध गंध तन्मात्रा आहे. (३३)

ज्याचें गायन अतिअपूर्व । जो विश्वावसु गंधर्व ।
तो मी म्हणे माधव । ऐके उद्धव सावध ॥ ५८ ॥
ज्याचे गायन अत्यंत अपूर्व आहे, असा जो विश्वावसु नामक गंधर्व तो मी असें माधव म्हणाले. ५८.

नृत्य करूनि मनोहरा । सबाह्य सद्‍भावें सुंदरा ।
पूर्वचित्ती जे अप्सरा । ते मी म्हणे नोवरा भीमकीचा ॥ ५९ ॥
रुक्मिणीपति म्हणतात, मनोहर नृत्य करून सुस्वभावाने अंतर्बाह्य सुंदर दिसणारी जी ‘पूर्वचित्ती’ नांवाची अप्सरा, ती मी ५९.

पर्वतांमाजीं जें ‘स्थैर्यपण’ । तें मी म्हणे नारायण ।
पृथ्वीमाजीं जो ‘गंध’ जाण । तो मी श्रीकृष्ण स्वयें म्हणे ॥ २६० ॥
नारायण म्हणतात, पृथ्वीमध्ये जे स्थैर्यपण आहे, ते मी आहे. पृथ्वीमध्यें जो गंध म्हणून आहे तोही स्वतः मीच ६०

अपां रसश्च परमस्तेजिष्ठानां विभावसुः ।
प्रभा सूर्येन्दुताराणां शब्दोऽहं नभसः परः ॥ ३४ ॥
[श्लोक ३४] मी पाण्यामध्ये तन्मात्रा रस, तेजस्वी पदार्थांमध्ये अग्नी, सूर्य, चंद्र आणि नक्षत्रांमध्ये प्रभा आणि आकाशाचा गुण शब्द आहे. (३४)

उदकाच्या ठायीं ‘रस’ सुरसु । तो मी म्हणे श्रीनिवासु ।
तेजिष्टांमाजीं जो ‘प्रकाशु’ । तो मी निजतेजसु उद्धवा ॥ ६१ ॥
श्रीनिवास म्हणतात, उदकामध्ये उत्तम रस तो मीच. आणखी उद्धवा! तेजस्वी प्राण्यांमध्ये जो प्रकाश तो मीच स्वयंज्योति होय ६१.

चंद्रसूर्यतारांच्या ठायीं । जें ‘तेज’ तें माझें पाहीं ।
‘अनाहतशब्द’ तो मीही । जो गगनासीं कंहीं नातळे ॥ ६२ ॥
चंद्र-सूर्य-तारांच्या ठिकाणी जें तेज आहे, ते माझेच आहे. आणखी आकाशालाही मुळीच लिप्त न होणारा अनाहतध्वनि तोही मीच ६२.

ब्रह्मण्यानां बलिरहं वीराणामहमर्जुनः ।
भूतानां स्थितिरुत्पत्तिरहं वै प्रतिसङ्क्रमः ॥ ३५ ॥
[श्लोक ३५] मी ब्राह्मणभक्तांमध्ये बली, वीरांमध्ये अर्जुन आणि प्राण्यांमध्ये त्यांची उत्पत्ती, स्थिती व लय आहे. (३५)

ब्राह्मणभजनीं ‘बळी’ची थोरी । तो मी कृष्ण म्हणे निर्धारीं ।
ब्राह्मणभजनप्रतापें करीं । मी बळीच्या द्वारीं द्वारपाळु ॥ ६३ ॥
श्रीकृष्ण म्हणतात, ब्राह्मणभजनामध्ये बळीचे श्रेष्ठत्व आहे. तो बळी निश्चयेंकरून मीच होय. ब्राह्मणभजनाच्या सामर्थ्याने मला बळीच्या द्वारांतील द्वारपाळ केले आहे ६३.

नरावतारें अतिसंपन्न । पांडवांमाजी वीर ‘अर्जुन’ ।
तो मी म्हणे नारायण । जीवप्राण तो माझा ॥ ६४ ॥
नारायण म्हणतात, पांडवांमध्ये सामर्थ्याने परिपूर्ण नरावतार जो अर्जुन तो मीच होय. म्हणूनच तो माझा जीव की प्राण आहे ६४.

भूतांची ‘उत्पत्ति-स्थिती’ । तो मी म्हणे श्रीपती ।
भूतांसी जे ‘प्रळयगती’ । तेही मी निश्चिती उद्धवा ॥ ६५ ॥
श्रीपति म्हणतात, उद्धवा ! प्राणिमात्रांची उत्पत्ति, स्थिति तीही मीच; आणि त्या प्राण्यांची जी संहारगति, तीही खरोखर मीच होय ६५.

गत्युक्त्युत्सर्गोपादानम् आनन्दस्पर्शलक्षणम् ।
आस्वादश्रुत्यवघ्राणम् अहं सर्वेन्द्रियेन्द्रियम् ॥ ३६ ॥
[श्लोक ३६] चालणे, बोलणे, मलत्याग, घेणे, आनंद उपभोगणे, स्पर्श, पाहाणे, स्वाद घेणे, ऐकणे, वास घेणे ही कामे करणार्‍या सर्व इंद्रियांची शक्ती मीच आहे. (३६)

ज्ञान-कर्म उभय इंद्रियें । त्या इंद्रियांचे मी इंद्रिय पाहे ।
त्यांची क्रिया जे जे आहे । ते माझेनि होये अभिव्यक्त ॥ ६६ ॥
ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रियें ह्या दोन्ही इंद्रियांचे खरें इंद्रिय मीच आहे असे समज. त्यांची जी जी क्रिया आहे ती ती माझ्यामुळेच प्रगट होते. ६६

‘गति-ग्रहण-गमन’ । ‘उत्सर्ग’ आणि ‘मोहन’ ।
‘दर्शन’ ‘स्पर्शन’ ‘ घ्राण’ । ‘श्रवण’ स्वादन’ माझेनी । ६७ ॥
गति, घेणे, जाणे, मलमूत्र विसर्जन करणे, दुसऱ्यावर छाप बसविणे, पहाणे, स्पर्श करणे, वास घेणे, ऐकणे किंवा चाखणे हे सर्व, माझ्यामुळेच होते ६७.

ते इंद्रियक्रियेचे चलन । तिळभरी नव्हे मजवीण ।
ऐक त्याचेंही लक्षण । तुज मी संपूर्ण सांगेन ॥ ६८ ॥
हे इंद्रियांच्या क्रियेचे चलन माझ्याशिवाय तिळभरही व्हावयाचे नाही. त्याचेही संपूर्ण लक्षण मी तुला सांगतों ऐक ६८.

मी मनाचेंही ‘महामन’ । नयनाचेंही ‘नयन’ ।
स्पर्शाचेंही ‘स्पर्शन’ । जिव्हेची जाण ‘निजजिव्हा’ ॥ ६९ ॥
मनाचेही महामन मी आहे. नयनांचाही नयन मी आहे. स्पर्शाचा स्पर्श मी आहे आणि जिव्हेची मूलजिव्हा ती मी आहे ६९.

मी घ्राणाचेंही निजघ्राण । श्रवणाचें ‘आदिश्रवण’ ।
ग्रहणाचें निज ‘ग्रहण’ । गतीची जाण मी ‘गती’ ॥ २७० ॥
नाकाचे मूळ नाक ते मी ; कानाचे आद्य कान ते मी; ग्रहणाचें निजग्रहण ते मी; आणि गतीची गति ती मी असे समज ७०.

मी आनंदाचा ‘आनंदु’ । मी बुद्धीचाही ‘प्रबोधु’ ।
सकळ इंद्रियांचा ‘विषय स्वादु’ । तो मी मुकुंदु उद्धवा ॥ ७१ ॥
उद्धवा ! आनंदाचा आनंद तो मी; बुद्धीचाही प्रबोध तो मी; आणि सर्व इंद्रियांचा विषयस्वाद तो मीच मुकुंद होय ७१.

मी वाचेची ‘वाचा’ सावकाश । मी परेचाही ‘परेश’ ।
सकळ इंद्रियांचा मी ‘ईश’ । यालागीं ‘हृषीकेश’ नांव माझें ॥ ७२ ॥
वाणीची व्यापक वाणी ती मी; परावाणीचाही प्रेरक तो मी; आणि सर्व इंद्रियांचा स्वामी तो मीच; म्हणूनच मला ‘हृषीकेश’ (इंद्रियस्वामी) असें नांव आहे ७२.

पृथिवी वायुराकाश आपो ज्योतिरहं महान् ।
विकारः पुरुषोऽव्यक्तं रजः सत्त्वं तमः परम् ॥ ३७ ॥
[श्लोक ३७] पृथ्वी, वायू, आकाश, जल, तेज, अहंकार, महतत्त्व, पंचमहाभूते, जीव, अव्यक्त प्रकृती, सत्त्व, रज, तम हे सर्व विकार आणि त्यांच्याही पलीकडे असणारे ब्रह्म मीच आहे. (३७)

तत्त्वसंख्या पंचवीस । त्रिगुण घालितां अठ्ठावीस ।
ऐक त्यांचाही विलास । सावकाश सांगेन ॥ ७३ ॥
मूळ तत्त्वांची संख्या पंचवीस आहे. त्यातच तीन गुण धरले तर ती संख्या अठ्ठावीस होते, त्यांचा विस्तारही आतां तुला खुलासेवार सांगतों ऐक ७३.

अहं महतत्त्व पंचतन्मात्रा । हा स्थूल प्रकृतीचा उभारा ।
महाभूतेंद्रियें अकरा । हे षोडश विकारांची संख्या ॥ ७४ ॥
अहंकार, महत्तत्त्व आणि पृथ्वी (गंध), वायु (स्पर्श), आकाश (शब्द), उदक (रस), व तेज (तेज) या पंचतन्मात्रा मिळून स्थूळ प्रकृति होते आणि पंचमहाभूते व अकरा इंद्रिये मिळून विकारांची संख्या सोळा आहे ७४.

यांत मिळाल्या प्रकृति-पुरुष । तत्त्वसंख्या पंचवीस ।
प्रकृतीमाजीं गुणांचा वास । हा तत्त्वविलास तत्त्वांचा ॥ ७५ ॥
यांत आणखी प्रकृति व पुरुष ही दोन मिळविली, म्हणजे एकंदर तत्त्वांची संख्या पंचवीस होते. प्रकृतीमध्ये गुणांचे वास्तव्य असते. हा तत्त्वांचा तत्त्वविलास आहे ७५.

प्रकृति गुणविकार । तत्त्वसंख्या निर्धार ।
हा म्यां सांगितला जो विचार । तें परात्पर स्वरूप माझें ॥ ७६ ॥
गुणविकारयुक्त प्रकृति आणि तत्त्वसंख्येचा निश्चय, ह्यांचा जो विचार मी तुला सांगितला, तेंच माझे परात्परस्वरूप होय ७६.

अहमेतत्प्रसङ्ख्यानं ज्ञानं तत्त्वविनिश्चयः ।
मयेश्वरेण जीवेन गुणेन गुणिना विना ।
सर्वात्मनापि सर्वेण न भावो विद्यते क्वचित् ॥ ३८ ॥
[श्लोक ३८] या तत्त्वांची गणना, लक्षणांच्या द्वारे त्यांचे ज्ञान व तत्त्वज्ञानरूप त्यांचे फळुसद्धा मीच आहे मीच ईश्वर, जीव, गुण आणि गुणी आहे मीच सर्वांचा आत्मा आहे आणि सर्वरूपसुद्धा आहे माझ्या व्यतिरिक्त कोणताच पदार्थ कोठेही नाही. (३८)

एवं ‘पंचवीसतत्त्वसंख्यान’ । तें अवघें मीचि जाण ।
या गणण्याचें गणितें ‘ज्ञान’ । तेंही मी आपण म्हणे देवो ॥ ७७ ॥
अशा प्रकारे पंचवीस तत्त्वांचे जे ज्ञान ते सर्व मीच होय. आणखी देव म्हणाले, ही तत्त्वे मोजण्याचे जे मोजणारे ज्ञान, तेही मीच स्वत: होय ७७.

हेंही जाणतें जें लक्षण । तेंही देवो म्हणे मी आपण ।
मजवेगळें अणुप्रमाण । सर्वथा जाण असेना ॥ ७८ ॥
आणखी देव म्हणतात, हे जाणण्याचे जे लक्षण तेही मीच स्वत: आहे. माझ्याशिवाय एक अणुमात्रही दुसरे काही मुळीच नाही ७८.

जीव आणि ईश्वर । गुणी आणि गुणावतार ।
क्षेत्रक्षेत्रज्ञ निर्धार । सर्वही साचार मीचि मी ॥ ७९ ॥
जीव आणि ईश्वर; गुणी आणि गुणावतार; क्षेत्र (शरीर) आणि क्षेत्रज्ञ (आत्मा) ही सर्व निश्चयेंकरून मीच आहे ७९.

मजवेगळें अणुमात्र । उरलें नाहीं गा स्वतंत्र ।
मी सर्वात्मा सर्वत्र । केवळ ‘चिन्मात्र’ तेंही मी ॥ २८० ॥
माझ्या व्यतिरिक्त एक अणुभरही दुसरे काही स्वतंत्र असें राहिलेले नाही. सर्वत्र मीच सर्वात्मा आहे; आणि केवळ चिन्मात्र तेंही मीच ८०

मजवेगळें येथें कांही । उद्धवा गा उरले नाही ।
सर्वसाधारण पाहीं । सर्वां देहीं असें मी ॥ ८१ ॥
उद्धवा ! येथे माझ्याशिवाय निराळे असे काहीच उरलेले नाही आणि सर्वसाधारण सर्व देहांमध्ये मीच आहे, असें जाण ८१.

उद्धवा ऐसें म्हणसी कांही । ‘संक्षेपु न करावा पाहीं’ ।
विस्तारू न चले ये ठायीं । ऐक तेंही सांगेन ॥ ८२ ॥
आता उद्धवा! कदाचित् असें म्हणशील की, याचा संक्षेप करूं नये. तर या ठिकाणी विस्तार करता येत नाही, तो कसा ? तेही सांगतों ऐक ८२

सङ्ख्यानं परमाणूनां कालेन क्रियते मया ।
न तथा मे विभूतीनां सृजतोऽण्डानि कोटिशः ॥ ३९ ॥
[श्लोक ३९] मी कालान्तराने का असेना, परमाणूंचीसुद्धा गणना करू शकेन, परंतु अनंत कोटी ब्रह्मांडे रचणार्‍या माझ्या विभूतींची गणना मला करता येणार नाही. (३९)

पृथ्वीचिया परमाणुकणा । मी काळरूपें करी गणना ।
परी विभूतिसंख्याप्रमाणा । माझेनिही जाण न गणवती ॥ ८३ ॥
मी काळरूपाने पृथ्वीच्या परमाणूंची सुद्धा मोजदाद करूं शकेन ; परंतु माझ्या विभूतींच्या संख्येची गणना मात्र मलाही करितां येणार नाही ८३.

म्यां सृजिलें अनंत ब्रह्मगोळ । ते मज गणवतीना सकळ ।
मा विभूति माझ्या केवळ । कोण तोंडाळ गणूं शके ॥ ८४ ॥
मी अनंत ब्रह्मांडगोल निर्माण केले आहेत. ते सर्व मला मोजवत नाहीत; मग माझ्या सर्व विभूति कोणता तोंडाळ मोजू शकेल ? ८४.

मी सर्वज्ञ श्रीनारायण । माझ्या विभूति मज जाण ।
गणावया नाहीं आंगवण । मा निरूपण केवीं सांगें ॥ ८५ ॥
मी सर्वज्ञ असा श्रीनारायण आहे तरी माझ्या विभूति मोजण्याची शक्ति मला नाही; मग त्यांचे वर्णन कसे सांगणार? ८५.

मनुष्यांमाजी माझी विभूती । नांदतसे कोणे स्थितीं ।
ते खूण सांगेन मी तुजप्रती । ऐक निश्चितीं उद्धवा ॥ ८६ ॥
आतां उद्धवा ! मनुष्यांमध्ये माझी विभूति कोणत्या स्वरूपाने राहत असते, त्याचे खरे लक्षण तुला सांगतों, ऐक ८६.

तेजः श्रीः कीर्तिरैश्वर्यं ह्रीस्त्यागः सौभगं भगः ।
वीर्यं तितिक्षा विज्ञानं यत्र यत्र स मेऽंशकः ॥ ४० ॥
[श्लोक ४०] जेथे जेथे तेज, श्री, कीर्ती, ऐश्वर्य, लज्जा, त्याग, सौंदर्य, सौभाग्य, पराक्रम, तितिक्षा आणि विज्ञान असेल तो तो माझाच अंश आहे, असे समज. (४०)

ज्याची प्रबळ प्रतापशक्ती । जेथ निरंतर लक्ष्मीची वस्ती ।
ज्यासी मर्यादा नाहीं संपत्ती । ज्याची उदारकीर्ति स्वधर्में ॥ ८७ ॥
ज्याची प्रतापशक्ति (ओजस्विता ) अत्यंत प्रबळ आहे, ज्याच्या ठिकाणी निरंतर लक्ष्मी राहाते, ज्याच्या ऐश्वर्याला मर्यादा नाही, स्वधर्मामध्ये ज्याची कीर्ती थोर आहे ८७,

ज्याच्या ऐश्वर्याची परमगती । आज्ञेवरी नेमी त्रिजगती ।
ज्याची अनावर दानस्थिती । जेथे भाग्याची उत्पत्ती नीच नवी दिसे ॥ ८८ ॥
ज्याच्या वैभवाचे सामर्थ्य एवढे आहे की, संपूर्ण त्रैलोक्य आपल्या आज्ञेखाली वागवितो; आणि ज्याच्या दान देण्याला तर सीमाच नाही; ज्याचे भाग्य उत्तरोत्तर नवीन वाढत असल्याचे दिसते ८८;

ज्याचें सामर्थ्य अतिदुर्धर । कोणी बोलों शकेना उत्तर ।
ज्याचें सौभाग्य मनोहर । आल्हादकर जननयनां ॥ ८९ ॥
ज्याचे सामर्थ्य अत्यंत विलक्षण, ज्याच्या शब्दावर कोणी उत्तर देऊ शकत नाही, ज्याची भाग्यशालीनता सर्व जनांच्या नेत्रांना आल्हाददायक अशी मनोहर असते ८९;

ज्यासी सहनशीळतेची वोज । ज्यासी निंद्य कर्माची लाज ।
जो विज्ञानाचें भोज । सहजेंचि निज नाचत ॥ २९० ॥
सहनशीलतेची ज्याला आवड, निंद्यकाची ज्याला लाज; आणि व्यवहाराच्या नैपुण्याची साक्षात् मूर्तिच सहजगत्या ज्याच्या ठिकाणी नाचत असते २९०.

इयें लक्षणें जेथ वर्तती । ते जाण माझी विभूती ।
यांत एका लक्षणाची जेथ प्राप्ती । तेही विभूती पैं माझी ॥ ९१ ॥
ही लक्षणे ज्याचे ठायीं असतात, तो माझी विभूति होय असे समज, हे तर काय, पण ह्यांपैकी एक लक्षणही जेथे प्राप्त झालेले दिसेल, ती देखील माझीच विभूति होय ९१.

एतास्ते कीर्तिताः सर्वाः सङ्क्षेपेण विभूतयः ।
मनोविकारा एवैते यथा वाचाभिधीयते ॥ ४१ ॥
[श्लोक ४१] उद्धवा ! मी या सर्व विभूती तुला संक्षेपाने सांगितल्या वास्तविक या काल्पनिक आहेत कारण वाणीने सांगितलेली कोणतीही वस्तू पारमार्थिक दृष्ट्या खरी नसते. (४१)

केवळ संकोच संक्षेपस्थितीं । म्यां सांगितल्या ज्या विभूति ।
त्या मनोविकारप्रतीती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ९२ ॥
केवळ थोडक्यांत संक्षेप करून ज्या मी विभूति सांगितल्या, त्या उद्धवा ! खरोखर मनोविकाराच्या अनुभवरूपानेच जाणल्या पाहिजेत ९२.

साधकांचे साधनस्थिती । सत्य जाणाव्या माझ्या विभूती ।
विचारितां परमार्थगतीं । तरी या कल्पिती मनोजन्या ॥ ९३ ॥
साधकांच्या साधनस्थितीच्या दृष्टीने पहाता माझ्या विभूति सत्य जाणाव्यात. परमार्थदृष्टीने विचार करू लागले असता त्या मनोजन्य कल्पनेच्या जाणाव्यात ९३.

माझें स्वरूप अद्वैत जाण । नाहीं नाम रूप गुण वर्ण ।
तेथ नाना विभूतिलक्षण । मिथ्या जाण वाचिक ॥ ९४ ॥
वस्तुतः माझें स्वरूप अद्वैत आहे हे लक्षात ठेव. मला नाम नाही, रूप नहीं, गुण नाही व वर्णही नाही. तेव्हां नाना प्रकारच्या विभूतीचे लक्षण सांगावयाचे म्हटले तर तें मिथ्या शाब्दिकच समजावें ९४.

वाचं यच्छ मनो यच्छ प्राणान् यच्छेद्रियाणि च ।
आत्मानमात्मना यच्छ न भूयः कल्पसेऽध्वने ॥ ४२ ॥
[श्लोक ४२] म्हणून तू वाणी, मन प्राण आणि इंद्रियांना ताब्यात ठेव सात्त्विक बुद्धीने प्रपंचाकडे लागलेल्या बुद्धीला आवर मग तुला संसाराच्या जन्ममृत्यूच्या मार्गावर भटकावे लागणार नाही. (४२)

माझें स्वरूप नित्य निर्विकार । मनबुद्धिवाचा न कळे पार ।
तेथ बापुडीं इंद्रियें किंकर । प्राण निर्धार तें नेणे ॥ ९५ ॥
माझं स्वरूप नित्य निर्विकार असल्यामुळे मनाला, बुद्धीला किंवा वाचेलाही त्याचा पार लागत नाही. मग इंद्रिये तर काय बिचारी पामर ! प्राणालाही या स्वरूपाचा निर्धार कळणे शक्य नाही ९५.

यालागीं शमदमांच्या अनुक्रमीं । मनबुद्धि इंद्रियें वाचा नेमीं ।
प्राण नेमूनि प्राणधर्मीं । आत्मारामासी पावसी ॥ ९६ ॥
याकरितां शमदम अशा अनुक्रमाने मन, बुद्धि, वाणी व इंद्रिये यांचे नियमन कर, आणि प्राणधर्माप्रमाणे प्राणाचेही नियमन कर म्हणजे आत्मस्वरूपाला पोचशील ९६.

मनबुद्ध्यादि इंद्रियनेम । करावयाचें न कळे वर्म ।
म्हणसी तरी तो अनुक्रम । ऐक सुगम सांगेन ॥ ९७ ॥
आतां मन, बुद्धि, वाचा इंद्रियांदिकाचे नियमन करण्याचे वर्म कळत नाही असें म्हणशील तर त्याचाही अनुक्रम सुलभ रीतीने सांगतों ऐक ९७.

‘वाचा’ नेमावी माझेनि नामें । ‘मन’ नेमावें ध्यानसंभ्रमें ।
‘प्राण’ नेमावा प्राणायामें । ‘इंद्रियें’ दमें नेमावी ॥ ९८ ॥
वाणीचे नियमन माझ्या नामाने करावें ; मनाचे नियमन ध्यानसामर्थ्यानं करावें ; प्राणाचे नियमन प्राणायामाने करावे आणि इंद्रियांचे नियमन दमानें म्ह• संयमाने करावें ९८.

‘बुद्धि’ नेमावी आत्मविवेकें । ‘जीव’ नेमावा परमात्मसुखें ।
इतकेन तूं आवश्यकें । होसी कौतुकें मद्‌रूप ॥ ९९ ॥
बुद्धीचे नियमन आत्मविचाराने करावें; जीवाचे नियमन परमात्मसुखाने करावें. इतकें केलेंस की तूं हटकून सहजीं मत्स्वरूप होशील ९९.

मद्‌रूप झालियापाठीं । संसारचि न पडे दिठीं ।
खुंटल्या जन्ममरणांचिया गोठी । गमनागमन आटाआटी निमाली ॥ ३०० ॥
एकदा मत्स्वरूप झालास की मग संसारच दृष्टीला पडणार नाही. जन्ममरणाच्या गोष्टी बंद पडतील व येण्याजाण्याची यातायात संपेल ३००.

म्यां सांगितल्या नेमपरिपाटीं । हा नेम करणें नाहीं ज्याच्या पोटीं ।
तो भोगी दुःखांचिया कोटी । ऐक ते गोठी सांगेन ॥ १ ॥
मी सांगितलेल्या नियमपद्धतीनुसार नियमन करण्याचे ज्याच्या मनांत भरत नाही, तो कोट्यवधि दुःखें भोगतो, त्याचेही वर्णन सांगतों, ऐक १.

यो वै वाङ्‍मनसी सम्यगसंयच्छन् धिया यतिः ।
तस्य व्रतं तपो दानं स्रवत्यामघटाम्बुवत् ॥ ४३ ॥
[श्लोक ४३] जो साधक बुद्धीच्या द्वारा वाणी आणि मनाला पूर्णपणे ताब्यात ठेवत नाही, त्याचे व्रत, तप आणि ज्ञान कच्च्या घड्यात भरलेल्या पाण्याप्रमाणे नाहीसे होते. (४३)

म्यां सांगितल्या नेमाचे निगुतीं । मनबुद्धि इंद्रियपंक्ती ।
जो नेमीना साक्षेपस्थितीं । त्याचीं साधनें होती नश्वर ॥ २ ॥
मी सांगितलेल्या नियमाप्रमाणे मन, बुद्धि व इंद्रियगण यांचे एकनिष्ठेनें जो नियमन करीत नाही त्याची साधने व्यर्थ होतात २.

त्याचें व्रत तप दान । योग याग शब्दज्ञान ।
काचे भांड्यांतील जीवन । तैशीं जाण नासती ॥ ३ ॥
मातीच्या कच्च्या तांब्यातील पाणी ज्याप्रमाणे नाहीसे होते, त्याप्रमाणे त्याचे मत, तप, दान, योग, याग, शब्दज्ञान ही सर्व नाश पावतात ३.

जेवीं राखेमाजीं केला होम । कां अशौचें आचरला कर्म ।
कुपात्रीं दानधर्म । तैसा संभ्रम साधनां ॥ ४ ॥
ज्याप्रमाणे राखेत होम करावा किंवा अमंगलपणे कर्माचरण करावे किंवा कुपात्री दानधर्म करावा, त्याप्रमाणे साधनांची दशा होते ४.

उखरीं पेरिलें बीज । कां गोळक आवंतिला द्विज ।
डोहळ्यांचे सोहळे भोगी वांझ । तैशी वोज साधनां ॥ ५ ॥
खडकावर बी पेरावें, किंवा गोळकाला ब्राह्मणाचे आमंत्रण द्यावे, किंवा वांझेने डोहळ्याचे सोहाळे भोगावेत, त्याप्रमाणेच त्या साधनांची दशा समजावी ५.

यापरी गा निश्चितीं । विध्युक्त नेम नाहीं चित्ती ।
त्याचीं साधनें वृथा जाती । हातोहातीं उद्धवा ॥ ६ ॥
याप्रमाणे खरोखर उद्धवा ! मनामध्ये विधियुक्त जर नेम न केला, तर त्याची सर्व साधने हातोहाती व्यर्थ होऊन जातात ६.

यालागीं मनादि इंद्रियवृत्ती । नेमाव्या गा यथानिगुतीं ।
हेंचि उद्धवाप्रती । स्वयें श्रीपति सांगत ॥ ७ ॥
म्हणून मन आदिकरून ज्या इंद्रियांच्या वृत्ति आहेत, त्यांचे हळूहळू नियमनच करावें हेंच स्वतः श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात ७

तस्माद् वचो मनः प्राणान् नियच्छेन् मत्परायणः ।
मद्‍भक्तियुक्तया बुद्ध्या ततः परिसमाप्यते ॥ ४४ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
एकादशस्कंधे षोडशोऽध्यायः ॥ १६ ॥
[लोक ४४] म्हणून भक्ताने मत्परायण होऊन, भक्तियुक्त बुद्धीने, मन, वाणी आणि प्राणांचा संयम करावा असे केल्याने तो कृतकृत्य होतो. (४४)

मन बुद्धि इंद्रिय प्राण । अवश्य नेमावीं गा जाण ।
वृत्ति करोनि सावधान । माझें भजन जो करी ॥ ८ ॥
अरे ! मन, बुद्धि, इंद्रियें आणि प्राण यांचे अवश्यमेव नियमन करावे, हे लक्षात ठेव. अशा प्रकारे सावधान वृत्ति करून जो माझें भजन करतो ८,

भावें करितां माझीं भक्ती । विषयवासना जळोनि जाती ।
निर्विकल्प उपजे शांती । माझे भक्तिपंथीं चालतां ॥ ९ ॥
एकनिष्ठेनें जो माझी भक्ति करितो, त्याच्या विषयवासना जळून जातात, आणि अशा माझ्या भक्तिमार्गानं गेलें असतां निर्विकल्प अशी शांति उत्पन्न होते ९.

चालतां माझे भक्तिपंथीं । सकळ साधनें लाजोनि जाती ।
भावें प्रकटें मी श्रीपती । करीं संसारनिवृत्ती निजभक्तां ॥ ३१० ॥
भक्तिमार्गाने चालू लागलें असतां सर्व साधनें लाजून जातात. भक्तीसाठींच मी लक्ष्मीपति प्रगट होऊन माझ्या भक्तांच्या संसाराची निवृत्ति करून टाकतों ३१०.

हो कां माझिया निजभक्तां । संसारबाधेची व्यथा ।
ते लाज मज भगवंता । गांजूं निजभक्तां मी नेदीं ॥ ११ ॥
अहो ! माझ्या भक्तांला जर संसाराची बाधा होईल, तर त्याची लाज मला भगवंतालाच आहे. मी माझ्या भक्तांची गांजणूक होऊ देत नाही ११.

प्रल्हाद गांजितां जगजेठी । मी प्रकटलों कोरडें काष्ठीं
वैकुंठ सांडूनि उठाउठीं । गजेंद्रासाठीं पावलो ॥ १२ ॥
प्रल्हादाचा छळ होऊ लागतांच मी (नरसिंहरूपाने) कोरड्या काष्ठामध्ये प्रगट झालों आणि गजेंद्रासाठी वैकुंठ सोडून त्वरेने धावत आलों १२.

द्रौपदी गांजितां तत्काळीं । म्यां कौरवांची तोंडें केलीं काळीं ।
आगीनें गांजितां गोवळीं । म्यां प्राशिला ते काळीं दावाग्नी ॥ १३ ॥
कौरव द्रौपदीचा छळ करीत असतां मी तात्काळ कौरवांची तोंडे काळी करून सोडली. वणव्याने गोपाळांना पीडा दिली त्या वेळी तो दावाग्नि मी पिऊनच टाकिला ! १३.

गोकुळ गांजितां सुरपती । म्यां गोवर्धन धरिला हातीं ।
कीं गोपिकांची पुरवावया आर्ती । मी झालों श्रीपति कामारा ॥ १४ ॥
इंद्र गोकुळाला त्रास देत असता मी हातावर गोवर्धन पर्वत उचलून धरला. तसेंच गोपिकांचे मनोरथ पूर्ण करण्याकरितां मी श्रीपति कामी बनलों १४.

अर्जुनप्रतिज्ञेचे प्राप्ति । म्यां दिवसा लपविला गभस्ती ।
लावूनि जयद्रथासी ख्याती । सुभद्राप्रति वांचविला ॥ १५ ॥
अर्जुनाच्या प्रतिज्ञेचे पालन होण्यासाठी मी दिवसाच सूर्याला लपवून ठेवले आणि जयद्रथाला मारविण्याचा पराक्रम करून अर्जुनाला वाचविले १५.

अंबरीषाचे गर्भवास । म्यांचि सोसिले सावकाश ।
उणें आपुल्या निजभक्तांस । मी हृषीकेश येवों नेदी ॥ १६ ॥
अंबरीषाचे गर्भवास मी आनंदाने सोशिले. मी श्रीकृष्ण आपल्या भक्तांकडे कधीही कमीपणा येऊ देत नाही १६.

भक्तांचे पायींची माती । मी हृदयीं वाहें श्रीपती ।
वानरें वनचरें भावार्थीं । म्यां आपुले पंक्ती बैसविली ॥ १७ ॥
भक्तांच्या पायांची माती मी श्रीपति आपल्या हृदयावर धारण करतो. इतकेच नव्हे तर भावार्थी असलेली अस्वले व माकडेसुद्धा मी आपल्या पंक्तीला बसविली १७.

यालागी उद्धवा पुढतपुढती । मी सांगें करावी माझी भक्ती ।
माझे भजनें माझी प्राप्ती । अवलीळा पावती मद्‍भावें ॥ १८ ॥
म्हणूनच उद्धवा ! मी तुला पुनः पुन्हा सांगतो की, माझी भक्ति करावी. माझें भजन केले असता भक्त सहज मद्भवाला पावतात १८.

मद्‍भावें करितां माझी भक्ती । मी अनंत आतुडें त्यांच्या हातीं ।
शेखीं कामारा होय भक्तांप्रती । भक्तीची प्रीती मज ऐशी ॥ १९ ॥
सर्वत्र माझीच भावना धरून माझे भजन केले असता मी अनंत त्यांच्या हाती सांपडतों, आणि शेवटी मी त्यांचा सेवक होतों, इतकी मला भक्तीची प्रीति आहे १९.

माझिये भक्तीपरतें । सुगम साधन नाहीं येथें ।
हें जाणोनि म्यां तूतें । भजनपंथें लाविलें ॥ ३२० ॥
येथे माझ्या भक्तीपेक्षां सुलभ असे दुसरे साधनच नाही, हे जाणूनच मी तुला भक्तिमार्गाला लावलें आहे ३२०.

लाविल्या लागे सद्‍भक्ती । तैं संसार बापुडें तें किती ।
हेळसून चारी मुक्ती । निजसुख भोगिती मद्‍भक्त ॥ २१ ॥
सद्भक्ति लावून घेतली की ती लागते आणि सद्भक्ति लागली की मग संसार तो बिचारा काय ! माझे भक्त चारही मुक्तींना बाजूस सारून आत्मसुखाचा उपभोग घेतात २१.

मद्‍भक्तांचे महिमान । अतिशयें अगम्य गहन ।
ऐसें बोलूनियां श्रीकृष्ण । उद्धवासी जाण कुरवाळी ॥ २२ ॥
माझ्या भक्तांचा महिमा अत्यंत अतर्क्य व गहन आहे. असे म्हणून श्रीकृष्ण उद्धवाला कुरवाळू लागला २२.

तेणें श्रीकृष्णकराग्रस्पर्शें । उद्धवासी झालें कैसें ।
व्याले धेनूचेनि वोरसें । वत्स जैसें उल्हासे ॥ २३ ॥
श्रीकृष्णाच्या हाताच्या स्पर्शामुळे उद्ध्वाला कसे झाले ? तर नुकत्याच व्यालेल्या धेनूचे वासरूं तिच्या पान्ह्यानें जसें आल्हादित होते. (त्याप्रमाणे तोही आल्हादयुक्त झाला) २३.

जेवीं कां लागतां चंद्रकर । सबाह्य निवों लागे चकोर ।
मेघ देखोनि मयूर । नृत्यतत्पर स्वानंदें ॥ २४ ॥
ज्याप्रमाणे चंद्राचे किरण लागले असतां चकोर अंतर्बाह्य तृप्त होतो, किंवा मेघाला पाहून मोर जसा आनंदाने नाचू लागतो २४,

यापरी उद्धव जाण । स्वानंदें झाला परिपूर्ण ।
विसरला देवभक्तपण । कृष्णही कृष्णपण विसरला ॥ २५ ॥
त्याप्रमाणे उद्धवही आत्मानंदांत परिपूर्ण रंगून गेला आपण देवाचे भक्त आहोत हेही तो विसरून गेला, आणि श्रीकृष्णही आपला कृष्णपणा विसरले २५.

यापरी भक्तिसुखाआंत । दोघेही ऐक्यें झाले उन्मत्त ।
परमानंदाचा तेथ । धेंडा नाचत स्वानंदें ॥ २६ ॥
याप्रमाणे भक्तिसुखामध्ये दोघेही एकरूपतेनें उन्मत्त झाले, तेव्हां अर्थातच परमानंदाचा झेंडा तेथें स्वानंदाने नाचूं लागला २६.

या भक्तिसुखाची गोडी । भाग्येंविण न कळे फुडी ।
उद्धवभजनाचे कुळवाडी । जोडला जोडी श्रीकृष्ण ॥ २७ ॥
या भक्तिसुखाची जी गोडी आहे, ती भाग्याशिवाय नीट कळावयाची नाही. उद्धवाच्या भजनरूप व्यापारामध्येच श्रीकृष्णरूपी नफा लाभला २७.

एका जनार्दना शरण । भजनसुखाची उणखूण ।
तो एक जाणे संपूर्ण । भक्तजीवनजिव्हाळा ॥ २८ ॥
एकनाथ जनार्दनाला शरण गेला, म्हणूनच भजनसुखाचे रहस्य आणि भक्तांचे अंत:करणांतील गुहाही त्याला एकट्यालाच पूर्णपणे समजले २८.

जो निजभक्तांचा जिव्हाळा । तो गोकुळीं होऊनि गोंवळा ।
क्रीडोनि त्यांचिया खेळामेळा । गोपीगोपाळां उद्धरिलें ॥ २९ ॥
जो भक्तांचा केवळ प्राण, असा परमात्मा गोकुळामध्ये गवळी होऊन व त्या गवळ्यांच्याच खेळीमेळींत खेळून गोपींचा आणि गोपाळांचा त्याने उद्धार केला २९.

स्वयें खेळोनि त्यांचिया खेळा । उद्धरिलें बाळगोपाळा ।
हें नवल नव्हे त्याची कळा । उदार लीळा ते ऐका ॥ ३३० ॥
स्वतः त्यांचेच खेळ खेळून बालगोपाळांचा त्याने उद्धार केला, ह्यांत काही मोठेसें आश्चर्य नाही. तर त्याची अपूर्व कला आणि उदार लीला ती निराळीच आहे. ती ऐका ३३०.

पर्वत पाषाण तृण तरुवर । भृंग मत्स्य मृग मगर ।
व्याघ्र वनचर विखार । पारावतें मयूर आदिकरून ॥ ३१ ॥
पर्वत, पाषाण, गवत, वृक्ष, भृंग , मत्स्य, मृग, मगर, तसेंच व्यान, वनचर, सर्प इत्यादि विषारी प्राणी, पारवे, मोर इत्यादि ३१,

येणेंसी समवेत । गोकुळींचे जीव समस्त ।
स्वयें उद्धरी श्रीकृष्णनाथ । कृपाळू समर्थ स्वलीला ॥ ३२ ॥
ह्यांसहवर्तमान गोकुळांतील प्राणिमात्रांचाही कृपाळू व सर्वसमर्थ श्रीकृष्णांनी स्वतः आपल्या लीलेनेच उद्धार केला ३२.

कां पितृवचन पुढारां । सीतेचिया वियोगद्वारा ।
रिसां आणि वानरां । उद्धरी निशाचरां रघुनाथ ॥ ३३ ॥
पित्याच्या वचनाचे निमित्त करून सीतेच्या वियोगाच्या मिषाने, श्रीरामचंद्रांनी अस्वलांचा, माकडांचा आणि राक्षसांचाही उद्धार केला ३३.

सेवेनें तारिले रीसवानर । युद्धें तारिले निशाचर ।
हें नवल कांहीं नव्हे थोर । ऐक उदार लीला त्याची ॥ ३४ ॥
सेवेच्या योगानें अस्वले व वानर तारले, आणि युद्धाच्या निमित्ताने राक्षसांचा उद्धार केला, हे काही मोठेसें आश्चर्य नाही. त्याची ह्याहूनही थोर लीला ऐका ३४.

अयोध्येपासून लंकेपर्यंत । मार्गी वृक्षवल्ली पाषाण पर्वत ।
तृणादि जीव समस्त । उद्धरी रघुनाथ स्वलीला ॥ ३५ ॥
अयोध्येपासून लंकेपर्यंत मार्गामध्ये जे जे वृक्ष, वनस्पति, दगडधोंडे, पर्वत, गवतासारख्या क्षुद्रवनस्पति व कृमिकीटक होते, त्या सर्वांचा रामचंद्राने आपल्या लीलेनेच उद्धार केला ३५.

एवं नानावतारीं जनार्दन । यापरी उद्धरी सकळ जन ।
तेणें एका एकू केला पावन । हें नवल कोण मानावें ॥ ३६ ॥
अशा प्रकारे तो जनार्दन नाना प्रकारचे अवतार धारण करून सर्वांचाच उद्धार करीत असतो, त्याने हा एक एकनाथही पावन केला, यांत आश्चर्य तें कसलें मानावें? ३६.

परी नवल एक केलें मोठें । मज मूर्खाचेही मुखावाटें ।
श्रीभागवतबोल केले मर्‍हाटे । हें आश्चर्य वाटे माझेंचि मज ॥ ३७ ॥
परंतु यांत त्याने एक मात्र मोठे आश्चर्य केलें, तें हे की, मजसारख्या मूर्खाच्या तोंडून श्रीमद्भागवताचे शब्द मराठी भाषेत बोलविले. याचे माझे मलाच आश्चर्य वाटते ३७.

यालागीं एका जनार्दना शरण । ज्याची कृपा ऐशी परिपूर्ण ।
त्याचे स्मरोनि श्रीचरण । केला संपूर्ण सोळावा ॥ ३८ ॥
अशी ज्याची परिपूर्ण कृपा आहे, त्या जनार्दनालाच हा एकनाथ शरण आहे, त्याच्याच पायाचे स्मरण करून हा सोळावा अध्याय त्याने पूर्ण केला ३८.

इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धव संवादे
एकाकारटीकायां विभूतियोगो नाम षोडशोऽध्यायः ॥ १६ ॥
सोळावा अध्याय समाप्त.
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोकसंख्या ॥ ४४ ॥ ओव्या ॥ ३३८ ॥

हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *