महाशिवरात्री

महाशिवरात्री

महाशिवरात्री हा उत्सव माघ कृष्ण चतुर्दशी या दिवशी संपन्न होतो. इंग्रजी महिन्यानुसार हा उत्सव बहुदा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो हिंदु बांधवांचा एक पवित्र सण जो अतिशय भक्तिभावाने सर्वत्र साजरा करण्यात येतो तो म्हणजे महाशिवरात्री. सर्वदेवांमधे भगवान शिवाचे महत्व अत्याधिक असुन हा दिवस अत्यंत पवित्र वातावरणात साजरा केल्या जातो. या दिवसाचे महत्व सांगत पुराणात अनेक कथा सांगितल्या जातात. महाशिवरात्री म्हणजे “शिवाची महान रात्र” हा भारतीय आध्यात्मिक कॅलेंडरमधील एक महत्वाचा सोहळा आहे. ही रात्र एवढी महत्वाची का आहे आणि आपण तिचा वापर कसा करून घेऊ शकतो हे सद्गुरु आपल्याला समजावून सांगत आहेत. महाशिवरात्रीचे महत्व वेगळेच आहे. प्रत्येक चंद्र महिन्यातील १४ वा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो. वर्षभर येणार्‍या बारा शिवरात्रींमध्ये फेब्रुवारी-मार्च मध्ये येणार्‍या महाशिवरात्रीला सर्वात अधिक आध्यात्मिक महत्व आहे. या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची स्थिती अशी असते की मनुष्यात नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होतो. या दिवशी निसर्ग एखाद्या व्यक्तीला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर ढकलत असतो. याचा वापर करून घेण्यासाठी, या संस्कृतीमध्ये आपण रात्रभर सुरू असणारा उत्सव साजरा करायला सुरुवात केली. नैसर्गिक ऊर्जेच्या या उद्रेकाला योग्य दिशा देण्यासाठी, रात्रभर सुरू असणार्‍या या उत्सवातील प्राथमिक आवश्यकता म्हणजे आपण आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवून संपूर्ण रात्र न झोपता, जागे राहणे. अध्यात्माच्या मार्गावर असणार्‍या व्यक्तींसाठी महाशिवरात्र अतिशय महत्वाची आहे. कौटुंबिक व्यक्ती, तसेच जगातील महत्वाकांक्षी लोकांसाठीसुद्धा ही अतिशय महत्वाची आहे. कुटुंबात रममाण होणार्‍या व्यक्ती हा दिवस शंकराच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून साजरा करतात. जी लोकं अतिशय महत्वाकांक्षी आहेत ते हा दिवस शिवाने त्याच्या सर्व शत्रुंवर मात केली म्हणून साजरा करतात. परंतु योगी व्यक्तींसाठी, हा दिवस म्हणजे शिव कैलास पर्वताशी एकरूप झाले तो दिवस आहे. ते पर्वतासारखेच बनले – अतिशय स्थिर. योग परंपरेत, शिव देव म्हणून पूजले जात नाही तर त्यांना आदिगुरु, म्हणजे ज्यांच्यापासून योग विज्ञान उगम पावले ते प्रथम गुरु असे मानले जाते. हजारो वर्षे ध्यान केल्यानंतर एके दिवशी ते अत्यंत स्थिर बनले. तो महाशिवरात्रीचा दिवस आहे. त्यांच्यामधील सर्व हालचाल बंद झाली व ते संपूर्णतः स्थिर झाले त्यामुळे योगी महाशिवरात्रीकडे स्थैर्याची रात्र या दृष्टीने पाहतात. समजुती बाजूला ठेवून दिल्या तरीसुद्धा, योग परंपरेत हा दिवस आणि रात्र महत्वाची मानली जातो याचे कारण हा दिवस अध्यात्माची ओढ असणार्‍या व्यक्तींना प्रचंड संधी उपलब्ध करून देतो. आधुनिक विज्ञान अनेक टप्प्यांमधून पुढे गेलेले आहे आणि आज या निष्कर्षापर्यन्त पोहोचलेले आहे की ज्याला तुम्ही जीवन असे म्हणता, तुमच्या अस्तित्वाबद्दल माहिती असणारी प्रत्येक गोष्ट, तुम्हाला विश्व आणि आकाशगंगा म्हणून माहिती असणारी गोष्ट, या सर्व गोष्टी एकच आहेत आणि त्या लक्षावधी मार्गांनी प्रकाशित होतात हे आज सिद्ध झालेले आहे. प्रत्येक योगीमध्ये हे वैज्ञानिक सत्य म्हणजे अनुभवात्मक सत्यता आहे. योगी या शब्दाचा अर्थ ज्याला या एकरूपतेचा साक्षात्कार झालेला आहे अशी व्यक्ती. जेंव्हा मी “योग” असे म्हणतो, तेंव्हा मी कोणत्याही विशिष्ट पद्धतीविषयी बोलत नाही. अथांगतेची माहिती करून घेण्यासाठी उत्सुक असणे, अस्तित्वातील एकत्व जाणून घेण्याची उत्सुकता म्हणजे योग. याचा अनुभव घेण्याची संधी महाशिवरात्रीची रात्र तुम्हाला उपलब्ध करून देते.

हे पण वाचा: भारतातील बारा ज्योतिर्लिंगे


महाशिवरात्री ची पुराणकथा

ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यात सृष्टीशी निगडीत सर्व महत्वपुर्ण गोष्टींची निर्मीती झाली परंतु त्याचवेळी समुद्रमंथनातुन हलाहल विष देखील बाहेर आले. या विषात ब्रम्हांडाला नष्ट करण्याची ताकद होती. आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवांमधेच होती त्यामुळे त्यांनी हे हलाहल विष प्राशन करून ब्रम्हांडाला वाचवले. पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपुर्ण देहाचा दाह होत होता. वैद्यांनी भगवान शिवांना संपुर्ण रात्र जागुन काढण्याचा उपाय सांगितला. सर्व देवांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणुन रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली. सकाळी महादेवांनी सर्वांना आशिर्वाद दिला. या संपुर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली म्हणुन या दिवसाला महाशिवरात्री असे म्हंटले जाते. अंगाच्या होत असलेल्या दाहामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते. महाशिवरात्री या दिवशी भाविक संपुर्ण दिवस उपवास करतात. भगवान शिवांचे शिवलिलामृत, महारूद्र, भजन, गायन इत्यांदिचे आयोजन केले जाते. भगवान शिवाचे दर्शन घेउन त्यांचा कृपाप्रसाद मिळवण्याकरीता आराधना केली जाते. शिवाच्या मंदिरांमधे महाशिवरात्रीला मोठया संख्येने भाविकांची गर्दी दिसुन येते. बारा ज्योर्तिलिंग ज्या ज्या ठिकाणी आहे तेथे तर लाखोंच्या संख्येने भाविक महाशिवरात्रीला दर्शन घेण्याकरता जमा होतात. भगवान शिवाचे ज्या ज्या ठिकाणी तिर्थक्षेत्र आहेत तेथे मोठयामोठया यात्रा भरतात. शिवशंकराला १०८ बेल वाहुन शिवनामावली देखील उच्चारली जाते. महाशिवरात्रीला काटेधोत्र्याचे फुल भगवान शंकराला वाहाण्याची देखील पध्दत आहे. विदर्भात आजच्या दिवशी घोंगलाचे फुल शिवाला वाहाण्याची परंपरा आहे. शिवकृपा प्राप्त होण्यासाठी ‘ओम नमः शिवाय’ हा जप जास्तीत जास्त करावा भगवान शिवाला ‘भोळा शंकर’ देखील म्हंटलेले आहे. उपासना केल्यावर त्वरीत प्रसन्न होणारा आणि ईच्छित फळ देणारा हा महादेव सर्वांचे कल्याण करणारा आहे. शिवपुराणात एक कथा सांगितली जाते ती अशी  एक पारधी जंगलात सावज शोधण्याकरता झाडावर बसला होता. संपुर्ण दिवस गेला परंतु त्याला शिकार गवसली नाही. सायंकाळी हरणांचा एक कळप तेथे पाणी पिण्याकरता आला पारधी बाण सोडणार तेवढयात त्यातील एक हरीण पुढे येउन पारध्याला म्हणाला‘हे पारध्या तु बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे परंतु मी तुला एक विनंती करतो मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटुन येऊ दे, माझी कर्तव्ये मला पार पाडुन येउ दे’, हरणाने वचन दिल्याने पारध्याने त्यांची विनंती मान्य केली. दुरवरून मंदिरातील घंटांचे आवाज येत होते ओम नमः शिवाय कानावर येत होते. पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते. सहज चाळा म्हणुन एक एक पान तो खाली टाकत होता त्या झाडाखाली असलेल्या शिवपिंडीवर ती बेलाची पानं पडत होती. नकळत का होईना त्या पारध्याच्या हातुन शिवउपासना घडली. हरीण परत आल्यानंतर त्याने पारध्याला म्हंटले ’की आता मला मार मी माझे कुटूंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावुन आलो आहे तेंव्हा लगेच हरणी पुढे आली आणि तीने म्हंटले ‘त्यांना नको मला मार मला माझे पत्नीधर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे’ त्वरीत हरणाची लहान पिल्लं पुढे आली आणि म्हणाली ‘आईला नको आम्हाला मार आम्हाला आमचे पुत्रधर्माचे कर्तव्य पार पाडूदे’ ते पाहाता पारध्याच्या मनात विचार आला हे प्राणीमात्र असुन देखील आपापल्या कर्तव्याला चुकत नाहीत तर मी माझा मानवधर्म, दयाधर्म का सोडु? त्याने सर्वांना जीवदान दिले. देवाधिदेव महादेव हे सर्व पाहुन हरणावर आणि पारध्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना कृपाआशिर्वाद दिला. सर्वांचा उध्दार केला हरिणाला मृग नक्षत्र म्हणुन व पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणुन अवकाशात नेहमीकरता स्थान दिले. हा प्रसंग ज्या समयास घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता


शिव पूजन विधी

– सर्वात आधी मातीच्या भांड्यात पाणी भरून त्यात बिल्वपत्र, धोतऱ्याचे फुल, तांदूळ इत्यादी पदार्थ घालावेत. ह्या मिश्रणाने शिवलिंगावर          अभिषेक करावा.
– आपल्या घराच्या जवळपास जर शिवालय नसेल तर शुद्ध वाळूचे शिवलिंग तयार करून पूजन करता येते.
– ह्या दिवशी रात्री जागरण व शिव पुराणाच्या श्रवणास महत्व आहे.
– दुसऱ्या दिवशी सकाळी जव, तीळ, खीर व बिल्वपत्र ह्यांचे हवन करून व्रताची पूर्णाहुती करण्यात येते.
– दिवसाच्या चौथ्या प्रहरी शिवालयात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करून बिल्वपत्र अर्पण केल्यास भोलेनाथांची कृपा प्राप्त होते.
– रात्रीच्या चौथ्या प्रहरी ब्राह्मणां द्वारा करण्यात आलेल्या वेदमंत्र संहिता, रुद्राध्याय ह्यांचे श्रवण करावे.

महाशिवरात्री व्रत केव्हा करावे

चतुर्दशीच्या आदल्या दिवशी जर महानिशिथकाल असल्यास त्याच दिवशी महाशिवरात्र साजरी करण्यात येते. रात्रीचा आठव्या प्रहरास निशिथकाल असे संबोधण्यात येते. सोप्या भाषेत सांगावयाचे म्हणजे जेव्हा चतुर्दशी हि तिथी सुरु होते व रात्रीचा आठवा प्रहर हा चतुर्दशीसच असेल तर त्या दिवशीच शिवरात्री साजरी करावी.
– चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी जर निशिथकाल येत असेल व पहिला दिवस निशिथाने व्याप्त असेल तर पहिल्या दिवशीच महाशिवरात्री साजरी करण्यात येते.
– वरील दोन्ही स्थितींना वगळून इतर स्थिती असता व्रत आदल्या दिवशी करण्यात येते.

महाशिवरात्री व्रत कथा 

ह्या दिवशीच भगवान श्री शिव ह्यांचा विवाह झाला होता, म्हणूनच भगवान श्री शिव ह्यांची वरात रात्री काढण्यात येते. पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान श्री शिव ह्यांना पतीच्या रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती. ह्या तपस्येचे फल म्हणून माघ कृष्ण चतुर्दशीस भगवान श्री शिव व माता पार्वती ह्यांचा विवाह संपन्न झाला. महाशिवरात्रीस अत्यंत महत्वपूर्ण व पवित्र मानण्याचे हेच प्रमुख कारण आहे.  गरुड पुराणानुसार ह्या दिवशी निषाद आपल्या कुत्र्यासह शिकारीस गेला, परंतु त्यास शिकार मिळू शकली नाही. त्या नंतर तो भूक व तहानेने व्याकुळ होऊन एका तळ्याकाठी आला. तेथे बेलाच्या वृक्षाखाली एक शिवलिंग होते. आपल्या शरीरास थोडी विश्रांती देण्यासाठी त्याने काही बिल्वपत्र तोडली, ज्यातील काही शिवलिंगावर सुद्धा पडली. आपले पाय धुण्यासाठी त्याने तळ्याचे पाणी शिंपडले, ज्यातील काही थेंब शिवलिंगावर सुद्धा पडले. हे सर्व करत असताना त्याचा एक बाण खाली पडला, जे घेण्यास तो खाली वाकला, तर समोरच शिवलिंग होते. ह्या प्रकारे शिवरात्रीच्या दिवशी नकळतच त्याच्या हातून शिव पूजन घडले. त्याच्या मृत्यू नंतर जेव्हा यमदूत त्यास घेऊन जाण्यास आले तेव्हा भगवान श्री शिवांच्या गणाने त्याचे रक्षण करून यमास पिटाळून लावले.

शिव अभिषेक कशाने करावा 

– दही – ह्याने अभिषेक केल्यास आज्ञाकारी संतती प्राप्त होते.
– दूध – जीवनातील कष्टां पासून मुक्ती.
– मध – श्री शंकरास अतिप्रिय. ह्याने वाणी दोष दूर होतो.
– तूप – मोक्ष प्राप्ती.
– पंचामृत – धन, संपत्तीची प्राप्ती.
– चंदन पावडर – लक्ष्मी प्राप्ती.
– तांदळाचे पीठ – कर्ज मुक्ती.
– उसाचा रस – शत्रूं पासून मुक्ती.
 महाशिवरात्री पर्व तिथी व मुहूर्त २०२१

महाशिवरात्रीचे व्रत का करावे

शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी-अवस्थेत जातो. शिवाची समाधी-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्त्व स्वीकारत नाही.
त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्त्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे कात करावे.



शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: webdunia, lokmat, sadhguru, majhimarathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *