श्री क्षेत्र कुमशी

श्री क्षेत्र कुमशी

श्री क्षेत्र कुमशी – विश्वरुपदर्शन
स्थळ: गाणगापूर पासून ३४ कि. मी. अलमेल-देवणगाव रोड
सत्पुरूष: श्री नृसिंहसरस्वती, श्री त्रिविक्रम भारती
विशेष: श्रीगुरु नृसिंहसारस्वतींनी येथे श्री त्रिवक्रमभारतींना विश्वरुप दाखविले
पादुका: विश्वरूपदर्शन पादुका


त्रिकालाबाधीत सत्य असणारे स्वामी समर्थाच्या उक्तिप्रमाणे महर्षि वाल्मिकींनी ज्या ठिकाणी तपश्चर्या केली, ते तपोवन परमपुण्य व पवित्र स्थान ठरले व मानले जाते. कोणत्याही क्षेत्राचे महत्व व पावित्र्य हे त्या परिसरात वास्तव्य करणाऱ्या व्यक्तिची योग्यता व त्याची साधना यावरच अवलंबून असते. तव्दतच श्री क्षेत्र गाणगापूरहून १२ मैल (१८ कि. मी.) आणि आलमेल-देवणगाव रोडपासून सुमारे १० कि. मी. अंतरावरील श्री क्षेत्र कुमसी हे छोटेसे गाव एक पुण्यक्षेत्र म्हणून नावारूपास आले आहे. याचे कारण उग्र नरसिंहाची मानसपूजा करणारे सकलवेदपारंगत, त्रिकालज्ञानी, घोर तपश्र्चर्या करणारे महामुनी श्री त्रिविक्रमभारती यांची कर्मभूमी आहे.

व्दापारयुगात भगवान श्रीकृष्णाने परमशिष्य अर्जुनाला विश्वरूप दर्शन दिल्याचे आपण श्रीमद्भगवतगीतेत पाहिले आहे. त्याचप्रमाणे गाणगापूरचे दत्तावतारी श्री नरसिंह सरस्वतींनी परमतपस्वी अशा महामुनी श्री त्रिविक्रमभारतींना वैशाख शुध्द दशमीच्या दिवशी विश्वरूपदर्शन दिलेले पवित्र स्थान म्हणजे ‘श्री क्षेत्र कुमसी’ ही कथा पवित्र व महान धार्मिक ग्रंथ ‘श्रीगुरूचरित्र’ च्या २४ व्या अध्यायात पहावयास मिळते.

व्दापारयुगापासून कलियुगापर्यंत भगवंतानी केवळ दोन वेळाच विश्व्ररूपदर्शनाचा दिल्याची कथा आपण जाणतो. प्रथम विश्वरूपदर्शन श्रीकृष्णाने कुरूक्षेत्रावर अर्जुनाला व दुसरे विश्वरूपदर्शन दत्तावतारी श्री नरसिंह सरस्वती स्वामीनी श्री क्षेत्र कुमसीच्या तपोभूमित महामुनी त्रिविक्रम भारती यांना दिले. या व्यतिरिक्त कोणत्याही पुराणात विश्व्ररूपदर्शनाचा उल्लेख नाही.

आजही या पवित्र क्षेत्राचे दर्शनाने घोर पातकांचा नाश होतो. येथील नामस्मरण व पूजनाने संसारीक व अन्य तापाने हतबल झालेल्यांना मुक्त व भवसागरातून पार करण्याची पवित्र शक्ति या विश्वरूपदर्शन क्षेत्री आहे. श्री नरसिंह सरस्वती स्वामीमहाराजांनी महामुनी त्रिविक्रमभारतींना विश्वरूप दर्शन देऊन चिरतेज अस्तित्वात ठेवलेले हे पवित्र स्थानी आज जिर्णोद्धाराचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. तेथे श्रींचे मंदिर, श्रींचे पादुका मंदिर, भक्तनिवास, पारायण हॉल असे सर्व सुखासोईने युक्त तीर्थक्षेत्र होणार आहे. सदर क्षेत्र निसर्गरम्य परिसरात असून पुण्यपावन नदीच्या किनाऱ्यावर आहे.
इ. स. १३९० मध्ये एक मोडि लिपीतील एक पत्र उपलब्ध झालेले आहे. त्याचा भावार्थ असा,

श्री परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत त्रिविक्रम स्वामी यांचे चारणाविंदला नमस्कार. कुमसी ग्रामवासी भारतीतीर्थ, तीन वेद आणि संस्कृत देवावाणी पारंगत, आचार-विचारसंपन्न, देशमान्य यतिश्वर या देशातील सर्वमान्य राजे व ऋषी यांनी मान्य केलेले याना नमन करतो. तीन जणांचे समक्ष तसेच भीमा अमरजा नदीच्या संगमावर बसून हा लेख लिहिलेला आहे. प. पु. श्री १००८ श्रीमत नरसिंह सरस्वती यांच्या पवित्र स्पर्शाने ते येथे पालखीतून आले. तसेच दलभार, छत्र व चामर यांचे ऐश्वर्याने दुपारचे वेळी दर्शन दिले व सर्वाना कृतार्थ केले. त्यावेळी विश्वरुप, विश्वम्भर रूप याचे विराट दर्शन दिले व सर्वाना पावन केले. मिती वैशाख शुद्ध दशमी यादिवशी महाराधना आणि श्री स्वामींची चरणंसेवा करून, आशीर्वाद मिळवून सर्वजण कृतार्थ झाले. श्री गुरुदेवांच्या पदचरणांचे तेज अद्भुत आहे. हा प्रसंग गुरुदेवांच्या शिष्यानी् या गुरुस्तुतीत लिहून ठेवलेला आहे.


– श्री नरहरी कविश्वर, हिप्परगा. श्री भीमन्ना शिवराम, ग्रामधीपती कुमशी.
श्रीक्षेत्र कुमशी क्षेत्रमहात्म्य
संदर्भ गुरुचरित्र

नामधारक सिद्ध्मुनींना म्हणाला, “त्रिविक्रमभारती श्रीगुरू नृसिंहसरस्वतींची ‘दांभिक संन्यासी’ अशी निंदा करीत होता. हे अंतर्ज्ञानाने श्रीगुरुंना समजले. त्यानंतर काय झाले ते मला विस्तारपूर्वक सांगा.” सिद्धमुनी म्हणाले, “नामधारका, ती मोठी अद्भुत कथा आहे. ती ऐक. कुमसी गावचा त्रिविक्रमभारती श्रीगुरुंची दांभिक, ढोंगी संन्यासी अशा शब्दांत सतत निंदा करीत असे. सर्व जगाचे मन ओळखणाऱ्या श्रीगुरुंना हे समजले. तेव्हा त्याला प्रत्यक्ष भेटून त्याच्या मनातील गैरसमज दूर करावा असे श्रीगुरुंना ठरविले. ही गोष्ट त्यांनी राजाला सांगितली, तेव्हा राजाने त्यांच्या प्रवासाची तयारी केली. पालखी सजविली. हत्ती, घोडे, पायदळ शृंगारिले. श्रीगुरू पालखीत बसले. मग वाद्यांच्या गजरात श्रीगुरूंची स्वारी त्रिविक्रमभारतीला भेटण्यासाठी कुमसी गावाकडे निघाली. त्याचवेळी कुमसी गावात त्रिविक्रमभारती त्याचे उपास्य दैवत नृसिंहाची मानसपूजा करीत होता. परंतू त्या दिवशी नृसिंहाची मूर्ती त्याच्या डोळ्यापुढे येईना. त्याने डोळे मिटून खूप प्रयत्न केला; पण नृसिंहाची मूर्ती काही प्रकट होईना. आज असे का होत आहे. हे त्याला समजेना. ‘माझी आजपर्यंतची सगळी साधना व्यर्थ गेली’ अशा विचाराने तो अगदी निराश, उदास झाला. त्याने डोळे उघडून समोर पाहिले, तो नदीवरून श्रीगुरूंची पालखी येत असलेली दिसली. त्या पालखीत त्याला त्याचे उपास्य दैवत जे नृसिंह त्याचीच मूर्ती दिसली. त्या पालखीबरोबर जे सैनिक होते ते सर्व श्रीगुरुंसारखेच दंडधारी संन्यासी दिसत होते. ते सगळे दृश्य पाहून त्रिविक्रमभारतीला मोठे आश्चर्य वाटले. त्याचा सगळा अहंकार गळून पडला. आपण पाहतो आहोत ते सत्य की भास? त्याला काहीच समजेना. तो धावतच त्या पालखीजवळ गेला. पालखीत विराजमान असलेल्या नृसिंहाला, आपल्या उपास्य दैवताला साष्टांग नमस्कार घालून तो म्हणाला “महाराज, आपण मला नृसिंहरुपात दर्शन दिलेत. मी खरोखर धन्य झालो.’ आपण ब्रह्मा-विष्णू-महेशरूप आहात. अविद्यामायेने मी आपणास ओळखू शकलो नाही. आपले स्वरूप केवळ अचिंत्य आहे. चर्मचक्षुंनी ते ओळखता येणार नाही. आपणच खरोखर नृसिंह आहात. आता मला निजरुपात दर्शन देण्याची कृपा करा.” त्रिविक्रमभारतीने अशी प्रार्थना केली असता श्रीगुरू प्रसन्न झाले. त्यांनी आपली योगमाया आवरून विश्वरूप दाखविले. त्यावेळी श्रीगुरू त्याला म्हणाले, “तू आमची निंदा करतोस, म्हणूनच आम्ही तुला भेटावयाला आलो. तू मानसपूजेत नृसिंहमूर्तीची पूजा करतोस. त्या नृसिंहाचे तुला दर्शन झाले ना? जे नृसिंह तेच आम्ही आहोत. आता आम्ही दांभिक आहोत का? हे तूच ठरव.”

श्रीगुरू असे म्हणाले असता त्रिविक्रमभारतीच्या मनातील संशय नाहीसा झाला. श्रीनृसिंहसरस्वती व आपले उपास्यदैवत नृसिंह एकच आहेत. श्रीगुरू हे चराचर व्यापक परमात्मा-परमेश्वर आहेत याची त्याला खात्री पटली. मग तो श्रीगुरुंना शरण गेला व त्यांचे स्तवन करू लागला. तो म्हणाला, “स्वामी, मला क्षमा करा. अविद्येमुळे मी आपले स्वरूप ओळखले नाही. आपण परमात्मा आहात. आपण ज्याच्यावर कृपा कराल तो कळिकाळालाही जिंकेल. आपण भवसागरतारक त्रैमूर्ती अवतार आहात. आज आपले चरणदर्शन झाल्याने मी धन्य झालो. आपण भक्तवत्सल, कृपामूर्ती आहात. आता माझा उद्धार करा. मी आपणास शरण आलो आहे. माझा स्वीकार करा. त्रिविक्रमभारतीने अशी प्रार्थना केली असता श्रीगुरु त्यावर प्रसन्न झाले. त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून म्हणाले, “मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला सद्गती प्राप्त होईल. तुला आता पुनर्जन्म मिळणार नाही.” असा वर देऊन श्रीगुरू गाणगापुरास परत गेले. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, “नामधारका, श्रीगुरूमाहात्म्य हे असे आहे. त्रैमूर्ती अवतार असलेले श्रीगुरू आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठीच मनुष्यरूपाने राहिले होते. त्यांना जे मनुष्य म्हणतील ते सप्तजन्मपर्यंत नरकवास भोगतील. गुरु हाच ब्रह्मा, गुरु हाच विष्णू, व गुरु हाच महेश्वर आहे. तो परब्रह्मस्वरूप आहे. असे वेद्पुराणेही सांगतात, म्हणून श्रीगुरू त्रैमूर्ती आहेत अशी दृढ श्रद्धा ठेवावी व त्यांना शरण जावे. हे स्थान म्हणजेच श्रीक्षेत्र कुमशी! जेथे श्री त्रिविक्रमभारातीस विश्वरुप दर्शन घडले. तेथेच श्री पादुका आहेत.


श्री क्षेत्र कुमशी माहिती समाप्त.


                                                                   

                                                           संक्षिप्त श्री गुरुचरित्र विकत घेण्यासाठी संपर्क करा  :७२१८२७४९७४

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *