सार्थ तुकाराम गाथा 1701 – 1800

सार्थ तुकाराम गाथा 1701 – 1800


अभंग क्र.१७०१
नव्हों गांढे आळसी । जो तूं आम्हांपुढें जासी ॥१॥
दिलें आम्हां हातीं । वर्म विवादाचें संतीं ॥ध्रु.॥
धरोनियां वाट। जाली शिरोमणि थोंट ॥२॥
तुका म्हणे देवा । वादे करीन खरी सेवा ॥३॥

अर्थ

देवा तू आम्हाला जिंकून आमच्या पुढे जाऊ शकत नाही कारण आम्ही तुझ्याशि वाद घालण्याकरिता गावंढळ किंवा आळशी नाही आहोत. अरे देवा संतांनी आमच्या हाती असे वर्म दिले आहे की कोणाशी कसा वाद करावा किंवा कोणाशी कसा वाद न करावा. देवा तू वादातून पळून जाऊच शकत नाही कारण मी तुझी वाट धरली आहे व मी उद्घाटाचाही शिरोमणी आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी तुझ्याशी वाद करूनच तुझी सेवा करीन.


अभंग क्र.१७०२
तुझा विसर नको माझिया जीवा । क्षण एक केशवा मायबापा ॥१॥
जाओ राहो देह आतां येचि घडी । कायसी आवडी याची मज ॥ध्रु.॥
कुश्चीळ इंद्रियें आपुलिया गुणें । यांचिया पाळणें कोण हित ॥२॥
पुत्र पत्नी बंधु सोयरीं खाणोरीं । यांचा कोण धरी संग आतां ॥३॥
पिंड हा उसना आणिला पांचांचा । सेकीं लागे ज्याचा त्यासी देणें ॥४॥
तुका म्हणे नाहीं आणिक सोइरें । तुजविण दुसरें पांडुरंगा ॥५॥

अर्थ

हे केशवा मायबापा तुझा विसर मला एक क्षण एक पळ देखील नकोय. देवा माझा देह जावो अथवा राहो तरी मला या देहा विषयी आवड आता थोडीच राहिली आहे? देवा हा देह तुझे गुणानुवाद गात नसेल तर त्यांचे पालनपोषण करून काय उपयोग आहे. पुत्र, पत्नी, बहीण, बंधू हे तर केवळ खाण्याच्या पंक्तीला बसणारे आहेत आता यांची संगती कोण करतो? हा देह पाच तत्वांचा उसना आणलेला असतो मग तो ज्याचा त्याला द्यावा लागतो. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा तुझ्या वाचुन इतर दुसरा कोणीही मला सोयरा नाही.


अभंग क्र.१७०३
ऐसें सत्य माझें येईल अंतरा । तरि मज करा कृपा देवा ॥१॥
वचनांसारिखें तळमळी चित्त । बाहेरि तो आंत होईल भाव ॥ध्रु.॥
तरि मज ठाव द्यावा पायांपाशीं । सत्यत्वें जाणसी दास खरा ॥२॥
तुका म्हणे सत्य निकट सेवकें । तरिच भातुकें प्रेम द्यावें ॥३॥

अर्थ

देवा मी ज्या काही प्रतिज्ञा माझ्या मनात केल्या आहेत त्या खऱ्या करून दाखवण्याचे सामर्थ्य जर माझ्या मनात असेल तरच तुम्ही माझ्यावर कृपा करा. देवा मी जे काही बोलतो आहे त्याप्रमाणे वागण्याची तळमळ जर माझ्या चित्तात आहे आणि जो भक्ती भाव मी बाहेरून वर वर दाखवतो आहे तोच भक्तिभाव माझ्या अंतःकरणात असेल आणि मी खरच तुमचा दास आहे असं तुम्हाला वाटत असेल तरच तुम्ही तुमच्या पायापाशी मला जागा द्यावी. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुमच्या जवळ राहतो आणि तुमची खरोखर सेवा करत असेल तरच तुम्ही तुमचा प्रेमरूपी खाऊ मला द्यावा.


अभंग क्र.१७०४
आदि वर्तमान जाणसी भविष्य । मागें पुढें नीस संचिताचा ॥१॥
आतां काय देऊं पायांपें परिहार । जाणां तो विचार करा देवा ॥ध्रु.॥
आपुलें तें येथें काय चाले केलें । जोडावे ते भले हात पुढें ॥२॥
तुका म्हणे फिके बोल माझे वारा । कराल दातारा होईल तें ॥३॥

अर्थ

देवा तुम्ही भूत, भविष्य, वर्तमान व मागील सर्व संचित जाणता. देवा आता मी याविषयी तुमच्या पायाजवळ काय बोलु तुम्हीच काय योग्य निर्णय माझ्या विषय असेल तो घ्यावा. आमचे येथे काय चालणार आहे तुमच्या पुढे हात जोडावे हे चांगले. तुकाराम महाराज म्हणतात हे दातारा माझे बोलणे म्हणजे फिके आहे त्या बोलण्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा तुम्ही जे बोलाल ते होऊ शकते त्यामुळे तुम्ही माझे संचित नाहीसे करा.


अभंग क्र.१७०५
सुखें न मनी अवगुण । दुःख भोगी त्याचें कोण ॥१॥
हें कां ठायींचें न कळे । राती करा झांकुनि डोळे ॥ध्रु.॥
चालोनि आड वाटे । पायीं मोडविले कांटे ॥२॥
तुका म्हणे कोणा । बोल ठेवितो शाहाणा ॥३॥

अर्थ

अहो एखाद्याला स्वतःचे अवगुण समजतच नाहीत मग त्या अवगुणा पासून होणारे दुःख कोणाला भोगावे लागेल अर्थातच त्याचे त्यालाच भोगावे लागेल. हे तुम्हाला माहीत नाही की काय, मग उगाचच डोळे झाकून तुम्ही रात्र का करता? विनाकारण आडवाटेने जर गेले तर त्याने काय होईल तर जो आडवाटेने जाईल त्याच्याच पायात काटे मोडतील. तुकाराम महाराज म्हणतात शहाणा मनुष्य आपल्या अवगुणामुळे होणाऱ्या दुखाःला इतर कोणालाही दोषी ठरवतो काय?


अभंग क्र.१७०६
आम्ही न देखों अवगुणां । पापी पवित्र शाहाणा ॥१॥
अवघीं रूपें तुझीं देवा । वंदूं भावें करूं सेवा ॥ध्रु.॥
मज मुक्ती सवें चाड । नेणें पाषाण धातु वाड ॥२॥
तुका म्हणे घोटीं । विष अमृत तुजसाठीं ॥३॥

अर्थ

या विश्वामध्ये कसाही मनुष्य असो मग तो पापी असो, पवित्र असो किंवा शहाणा असो मी त्याचे अवगुण पहातच नाही.देवा हे सर्व तुझेच रुपे आहेत हेच आम्ही समजू व त्यांना भक्तिभावाने वंदन करू आणि त्यांची सेवा देखील करू.मला फक्त भक्तीची आवड आहे मग ते कोणीही असो पाषाण असो धातू असो किंवा लहान-मोठे असो मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही आणि त्याची मला आवडही नाही.तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्या भक्ती करिता मी विष देखील अमृताप्रमाणे समजून ते सेवन करीन.


अभंग क्र.१७०७
मज नाहीं तुझ्या ज्ञानाची ते चाड । घेतां वाटे गोड नाम तुझें ॥१॥
नेणतें लेंकरूं आवडीचें तान्हें । बोलतों वचनें आवडीनें ॥ध्रु.॥
भक्ती नेणें कांहीं वैराग्य तें नाहीं । घातला विठाई भार तुज ॥२॥
तुका म्हणे नाचें निर्लज्ज होऊनि । नाहीं माझे मनीं दुजा भाव ॥३॥

अर्थ

देवा मला तुझ्या ज्ञानाची अजिबात आवड नाही केवळ तुझे नाम जरी माझ्या मुखाने घेतले तरी माझ्या जीवाला खूप सुख वाटते. देवा मी तुझा अज्ञान आणि आवडीचे तान्हे बाळ, लेकरू आहे त्यामुळे मी तुझ्याशी आवडीने बोलत आहे. हे विठाई मी भक्ती आणि वैराग्य हे काहीच जाणत नाही परंतु मी माझ्या सर्व योगक्षेमाचा भार तुझ्यावर घातला आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुझ्या नामाच्या छंदात निर्लज्ज होऊन नाचत आहे तुझ्या वाचून इतर कोणा विषयही माझा भक्तीभाव नाही व मला लोक पर्वा देखील नाही.


अभंग क्र.१७०८
काय माझे संत पाहती जाणीव । सर्व माझा भाव त्यांचे पायीं ॥१॥
कारण सरतें करा पांडुरंगीं । भूषणाची जगीं काय चाड ॥ध्रु.॥
बोबडा उत्तरीं म्हणें हरीहरी । आणीक भीकारी नेणें दुजें ॥२॥
तुका म्हणे तुम्ही विठ्ठलाचे दास । करितों मी आस उच्छिष्टाची ॥३॥

अर्थ

संत माझे ज्ञान तपासणार आहेत काय आणि पाहिले तरी काही हरकत नाही पण माझा पूर्ण भक्तिभाव त्यांच्या ठिकाणी आहे. हे संत जन हो पांडुरंगाने माझा स्वीकार केला पाहिजे यासाठी तुम्ही काहीतरी करा, मला जगामध्ये माझे भूषण व्हावे याची इच्छा अजिबात नाही. मी तर भिकारी आहे मला काहीच येत नाही केवळ माझ्या बोबड्या बोला ने हरी हरी असे मी म्हणतो एवढेच. तुकाराम महाराज म्हणतात हे संतजन हो तुम्ही विठ्ठलाचे दास आहात त्यामुळे मी तुमचे उच्चिष्ट सेवन करण्याची इच्छा धरत आहे.


अभंग क्र.१७०९
जीवाचें जीवन अमृताची तनु । ब्रम्हांड भूषणु नारायण ॥१॥
सुखाचा सांगात अंतकासी अंत । निजांचा निवांत नारायण ॥ध्रु.॥
गोडाचें ही गोड हर्षाचें ही कोड । प्रीतीचा ही लाड नारायण ॥२॥
भावाचा निज भाव नांवांचा हा नांव । अवघा पंढरिराव अवतरलासे ॥३॥
तुका म्हणे जें हें साराचें हें सार । माझा अंगीकार तेणें केला ॥४॥

अर्थ

नारायण जीवाचे जीवन आहे अमृताचे स्वरूप आहे आणि संपूर्ण ब्रह्मांडाचे भूषण आहे. नारायणाचा संग सुखकारक आहे आणि तो काळाचाही काळ आहे आणि भक्तांचे निजस्थन आहे. नारायण गोडाचे ही गोड आहे म्हणजे गोडालाही गोड पण देणारा आहे आनंदाचे ही लाड पुरविणार आहे आणि प्रीतीचे ही लाड पुरवतो आहे. हा पंढरीराव भक्तीभावाचा ही निजरूप आहे सर्व नावाचे अधिष्ठान देखील हाच आहे असा हा सर्वत्र अवतरला आहे. तुकाराम महाराज म्हणतात नारायण सर्व साराचे ही सार आहे व त्या नारायणनेच माझा अंगिकार केला आहे.


अभंग क्र.१७१०
आतां मी सर्वथा नव्हें गा दुर्बळ । यातिहीनकुळ दैन्यवाणा ॥१॥
माय रखुमाई पांडुरंग पिता । शुद्ध उभयतां पक्ष दोन्ही ॥ध्रु.॥
बापुडा मी नव्हें दुर्बळ ठेंगणा । पांगिला हा कोणा आणिकांसी ॥२॥
दृष्ट नव्हों आम्ही अभागी अनाथ । आमुचा समर्थ कैवारी हा ॥३॥
संवसार आम्हां सरला सकळ । लपोनियां काळ ठेला धाकें ॥४॥
तुका म्हणे जालों निर्भर मानसीं । जोडलिया रासी सुखाचिया ॥५॥

अर्थ

आता मी कुठल्याही प्रकारे यातीहीन दिनहीन आणि कुळहीन नाही कारण माझी माता रखुमाई व पिता पांडुरंग आहे. अशाप्रकारे माझी माता पिता दोन्ही पक्ष शुद्ध आहेत म्हणून मीही शुद्ध आहे. मी आता वेडा, दुर्बळ, नकटा किंवा कोणाच्याही आधीन नाही. आता मी कोणत्याही प्रकारे दृष्ट, अभागी, आनाथ नाही कारण आमचा कैवारी हा सर्व समर्थ पंढरीचा राणा आहे. आता आम्ही सर्व संसार जिंकला आहे आमच्या भीतीने काळ देखील लपून बसला आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता आम्ही मनात तृप्त होऊन निर्भर झालो आहोत म्हणजे आनंदित झालो आहोत कारण आम्हाला सुखाच्या राशी जोडल्या गेले आहेत.


अभंग क्र.१७११
केलें नाहीं मनीं तया घडे त्याग । उबगें उद्वेग नाहीं चित्तीं ॥१॥
देवचि हा जाणे अंतरींचा भाव । मिथ्या तो उपाव बाह्य रंग ॥ध्रु.॥
त्यागिल्याचें ध्यान राहिलें अंतरीं । अवघी ते परी विटंबना ॥२॥
तुका म्हणे आपआपणा विचारा । कोण हा दुसरा सांगे तुम्हां ॥३॥

अर्थ

जो म्हणतो की मी काहीच केले नाही आणि सर्वस्वाचा त्याग ही जो करतो. व त्याच्या चित्तामध्ये प्रपंच याविषयी दुख नसते त्याचाच खरा त्याग घडतो. अंतःकरणातील त्यागाची वृत्ती केवळ देवच जाणत असतो आणि बाह्य रंगाने त्याग करण्याचे दाखविणे हे व्यर्थ आहे. एखाद्या विषया विषयी त्याग केला व त्याचे ध्यान तसेच अंतकरणात असेल तर तो त्याग होत नाही ती केवळ त्यागाची विटंबना आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्याग करण्याविषयी तुम्ही स्वतःच स्वतःला विचारून पहा दुसरे कोण तुम्हाला सांगेन?


अभंग क्र.१७१२
हित व्हावें तरी दंभ दुरी ठेवा । चित्त शुद्ध सेवा देवाची हे ॥१॥
आवडी विठ्ठल गाईजे एकांतीं । अलभ्य ते येती लाभ घरा ॥ध्रु.॥
आणीकां अंतरीं निदावी वसति । करावी हे शांती वासनेची ॥२॥
तुका म्हणे बाण हाचि निर्वाणींचा । वाउगी हे वाचा वेचूं नये ॥३॥

अर्थ

आपले हित व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर दंभ दूर ठेवा आणि आपले चित्त शुद्ध करून देवाची सेवा करा. एकांती बसून आवडीने विठ्ठलाचे भजन करा त्यामुळे अलभ्य लाभ तुमच्या घरी स्वतःहून चालत येतील. हरी वाचून इतर कोणत्याही विषयाला अंतकरणात स्थान देऊ नका व वासनेचा नाश करा. तुकाराम महाराज म्हणतात हरीचे नाम हा एकच निर्वाणीचा बाण आहे जो आपल्याला या संसारापासून दूर करू शकतो आणि संसाराला जिंकू शकतो त्यामुळे हरी वाचून इतर काहीच बोलू नये.


अभंग क्र.१७१३
हो कां नर अथवा नारी । ज्यांचा आवडता हरी ॥१॥
ते मज विठोबासमान । नमूं आवडी ते जन ॥ध्रु.॥
ज्याचें अंतर निर्मळ । त्याचें सबाह्य कोमळ ॥२॥
त्यांचा संग सर्वकाळ । घडो मज हे मंगळ ॥३॥
तुका म्हणे प्राण । काया कुरवंडी करीन ॥३॥

अर्थ

नर असो अथवा नारी असो ज्यांचा आवडता हरी आहे, ते लोक मला विठोबा समान आहेत त्यांना मी आवडीने नमस्कार करीन. ज्यांचे अंतकरण निर्मळ आहे त्यांचे बाह्य शरीर देखील कोमल असते निर्मळ असते. त्यांचा संघ मला सदासर्वकाळ घडू व हेच मंगल आहे असे मला वाटते. तुकाराम महाराज म्हणतात अशा नर अथवा नारी वरून मी माझे शरीर ओवाळून टाकीन.


अभंग क्र.१७१४
हरीची हरीकथा नावडे जया । अधम म्हणतां तया वेळ लागे ।
मनुष्यदेहीं तया नाट लागलें । अघोर साधिलें कुंभपाक ॥१॥
कासया जन्मा आला तो पाषाण । जंत कां होऊन पडिला नाहीं ।
उपजे मरोनि वेळोवेळां भांड । परि न धरी लंड लाज कांहीं ॥ध्रु.॥
ऐसियाची माता कासया प्रसवली । वर नाहीं घातली मुखावरी ।
देवधर्मांविण तो हा चांडाळ नर । न साहे भूमि भार क्षणभरी ॥२॥
राम म्हणतां तुझें काय वेचेल । कां हित आपुलें न विचारिसी ।
जन्मोजन्मींचा होईल नरकीं । तुका म्हणे चुकी जरी यासी ॥३॥

अर्थ

ज्याला हरीकथाच आवडत नाही त्याला अधम म्हणण्यास देखील वेळ लागतो इतका तो अदम असतो. अशा मनुष्याला मनुष्यदेह मिळाला खरा परंतु तो सुद्धा त्याला नाटच ठरला आणि त्याला अखेरीस कुंभीपाका सारखा नरकच प्राप्त झाला. असा दगड जन्मालाच का आला असेल बरे जंत होऊन घाणीत का बरं नाही कुठेतरी तो पडला. असा हा निर्लज्ज मनुष्य किती वेळा जन्माला येतो आणि किती वेळा मरतो तरीदेखील त्याला लाज कशी नाही. अशा माणसाला त्याची आई का बरे प्रसवली असेल तो जन्मताच त्याच्या तोंडावर त्याच्या आईने वार घालून त्याला का बर मारले नसेल? असा चांडाळ देव मानत नाही, धर्म मानत नाही अशा चांडाळाचा याचा भार पृथ्वीला देखील सहन करता येत नाही. अरे मुखाने नुसते राम राम जरी म्हटले तरी तुझे काही खर्च होणार आहे काय अरे तुला तुझो हीत कसे समजत नाही? तुकाराम महाराज म्हणतात जर असा मनुष्य देवाला, धर्माचाराला चुकत असेल तर तो केवळ जन्मोजन्मी नरकवास भोगेल.


अभंग क्र.१७१५
उपेक्षिला येणें कोणी शरणागत । ऐसी नाहीं मात आईकिली ॥१॥
आतां काय ब्रीद सांडील आपुलें । ठायींचें धरिलें जाणोनियां ॥ध्रु.॥
माझ्या दोषासाठीं होईल पाठमोरा । ऐसा कोण पुरा भोग बळी ॥२॥
तुका म्हणे रूप आमुच्या कैवारें । धरिलें गोजिरें चतुर्भुज ॥३॥

अर्थ

हरीने त्याला शरण आलेल्या भक्तांची उपेक्षा केली आहे अशी वार्ता मी तरी आजपर्यंत ऐकले नाही. मग हरी आपले दिन वत्सल हे ब्रीद सोडून देईल काय, त्याने आपले ब्रीद सर्व गोष्टी जाणूनच धारण केलेले आहे. माझा असा काय दोष आहे की जेणेकरून देव मला पाठमोरा होईल. तुकाराम महाराज म्हणतात हरीने गोजिरे चतुर्भूज रूप केवळ आम्हा भक्तां करिता धारण केले आहे.


अभंग क्र.१७१६
आवडीसारिखें संपादिलें सोंग । अनंत हें मग जालें नाम ॥१॥
कळे ऐशा वाटा रचिल्या सुलभा । दुर्गम या नभाचा ही साक्षी ॥ध्रु.॥
हातें जेवी एक मुखीं मागे घांस । माउली जयास तैसी बाळा ॥२॥
तुका म्हणे माझें ध्यान विटेंवरी । तैसीच गोजिरी दिसे मूर्ती ॥३॥

अर्थ

देवाने भक्तांच्या आवडीप्रमाणे अनेक अवतार म्हणजे सोंगे घेऊन त्याची संपादने ही केली आहे व त्याला त्याप्रमाणे अनेक नावेही प्राप्त झालीत. देवाचे ज्ञान भक्तांना व्हावे याकरिता जसा सोपा मार्ग असेल तसे भक्त देवाकडे गेले कारण तो आकाशाचा ही साक्षी आहे आणि कळण्यास ही अतिशय अवघड आहे. दोन मुलांना आई वेगवेगळ्या प्रकारचे वागणूक देते कारण जसे मुल असते तसे वागावे लागते म्हणजे एका मुलाला स्वतःच्या हाताने खाऊ घालते कारण तो ऐकत नाही तर दुसरा आपल्या हाताने स्वतः खातो. तुकाराम महाराज म्हणतात हरीची मूर्ती जी विटेवर समचरण ठेवून उभी आहे तीच मूर्ती ध्यान करताना माझ्या चित्तात असते.


अभंग क्र.१७१७
धन्य मी मानीन आपुलें संचित । राहिलीसे प्रीत तुझे नामीं ॥१॥
धन्य जालों आतां यासि संदेह नाहीं । न पडे या वाहीं काळा हातीं ॥ध्रु.॥
ब्रम्हरस करूं भोजन पंगती । संतांचे संगती सर्वकाळ ॥२॥
तुका म्हणे पोट धालेंचि न धाये । खादलेंचि खायें आवडीनें ॥३॥

अर्थ

मी माझे संचित धन्य मानिन कारण हरीच्या नामा विषयी माझे प्रेम जडले आहे. मी धन्य झालो यात कोणताही संदेह नाही आता मी कधीही काळाच्या हाती सापडणार नाही. आता केवळ संतांच्या संगतीत बसून ब्रम्‍हरसाचे भोजन करू. तुकाराम महाराज म्हणतात ब्रम्हरस भोजन कितीही सेवन केले तरी पोट भरतच नाही कितीही खाल्ले तरी अजून खावेसेच वाटते.


अभंग क्र.१७१८
आवडी न पुरे सेवितां न सरे । पडियेली धुरेसवें गांठी ॥१॥
न पुरे हा जन्म हें सुख सांठितां । पुढती ही आतां हें चि मागों ॥ध्रु.॥
मारगाची चिंता पालखी बैसतां । नाहीं उसंतितां कोसपेणी ॥२॥
तुका म्हणे माझी विठ्ठल माउली । जाणे ते लागली भूक तहान ॥३॥

अर्थ

हरीचे नाम कितीही सेवन केले तरी पोट भरल्यासारखे वाटत नाही आणि भूकही भागत नाही त्यामुळे मी हरीचे नाम घेतो आणि त्या कारणाने मला हरीची भेट झाली आहे. हरीचे सुख साठवण्या करिता हा मनुष्य जन्म पुरेसा पडणार नाही त्यामुळे पुन्हा हरीचे सुख साठविण्या करता आपण हरीला मनुष्यजन्मच मागु. पालखीत बसल्यानंतर किती कोस चालावे लागते याची चिंता पालखीत बसणाऱ्याला नसते कारण त्याला चालण्याचे श्रम नसते. त्याप्रमाणे हरीचे सुख भोगण्यासाठी आम्हाला कितीही जन्म घ्यावे लागले तरी आम्हाला त्याचे काहीच वाटणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात माझी विठ्ठल माऊली मला तहान भूक लागली की सर्व काही जाणून घेते.


अभंग क्र.१७१९
नाहीं त्रिभुवनीं सुख या समान । म्हणऊनि मन स्थिरावलें ॥१॥
धरियेलीं जीवीं पाउलें कोमळीं । केली एकावळी नाममाळा ॥ध्रु.॥
शीतळ होऊनियां पावलों विश्रांती । न साहे पुढती चाली चित्ता ॥२॥
तुका म्हणे जाले सकळ सोहळे । पुरविले डोहळे पांडुरंगें ॥३॥

अर्थ

हरी भजनाच्या सारखे सुख या त्रिभुवनात हि नाही त्यामुळे त्या ठिकाणीच माझे मन स्थिरावले आहे. विठ्ठलाचे पाऊले देखील या त्रिभुवनात ही त्याच्या समान काहीच नाही त्यामुळे मी विठ्ठलाची कोवळी पाऊले तसेच विठ्ठलाचे नाम माळ माझ्या कंठातच स्थापन केले आहे. त्यामुळे माझे शरीर त्रिविधतापासून अतिशय शितल होऊन मी विश्रांत पावलो आहे आणि या कारणामुळे मला आता संसार मधील झालेली प्रवृत्ती देखील सहन होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आता माझे सर्व सुखसोहळा पूर्ण झाले असून पांडुरंगाने माझे संपूर्ण डोहाळे म्हणजे इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या आहेत.


अभंग क्र.१७२०
मायबापापुढें लाडीकें लेंकरूं । तैसे बोल करूं कवतुकें ॥१॥
कृपावंता घालीं प्रेमपान्हारस । वोळली वोरस पांडुरंगे ॥ध्रु.॥
नाहीं धीर खुंटी जवळी हुंबरे । ठायीं च पाखर कवळिती ॥२॥
तुका म्हणे मज होऊं नेदी सीण । कळों नेदी भिन्न आहे तैसें ॥३॥

अर्थ

देवा आई-बापा पुढे लहान मुल आवडीने व लाडाने बोलते अगदी त्याप्रमाणे मी तुझ्याशी कौतुकाने बोलत आहे मी लाडाने बोलत आहे.हे कृपावंता पांडुरंगा तुही आम्हाला प्रेम रसपानहा पाजावे.अहो खुंटीला बांधलेले वासरू स्तनपान करण्यासाठी गाई कडे बघून सारखे हुंबरत असते आणि गाय देखील त्या वासराकडे प्रेमाने पाहून त्यालासारखे पाहून प्रेमाने साटत असते.तुकाराम महाराज म्हणतात देवा अगदी त्याप्रमाणे तू आणि मी आपण दोघेही भिन्न आहोत असे मला कधीही वाटू देऊ नकोस आणि तुझ्या वियोगाचा व्यर्थ शिण मला होऊ देऊ नकोस.


अभंग क्र.१७२१
उत्तम घालावें आमुचिये मुखीं । निवारावें दुःखी होऊ नेदी ॥१॥
न बैसे न वजे जवळूनि दुरी । मागें पुढें वारी घातपात ॥ध्रु.॥
नाहीं शंका असो भलतिये ठायीं । मावळलें पाहीं द्वैताद्वैत ॥२॥
तुका म्हणे भार घेतला विठ्ठलें । अंतरीं भरलें बाह्य रूप ॥३॥

अर्थ

हा पांडूरंग जे उत्तम आहे तेच आमच्या मुखामध्ये घालतो ते म्हणजे हरीनाम आणि आम्हाला कधीही हा पांडूरंग दु:खी होऊ देत नाही आमचे सर्व दु:ख निवारण करतो. हा पांडूरंग कधी बसत नाही व कधीही आमच्याजवळून दूर जात नाही केवळ आमच्यासाठी व आमच्यावर मागेपुढे होणाऱ्या घातपाताचे निवारणही हा करतो. आता आम्हाला कसल्याही प्रकारचे भय राहीले नाही कारण आमच्या मनातील द्वैत अद्वैत मावळले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “या पांडूरंगानेच आमच्या योगक्षेमाचा भार घेतला आहे व त्याचेच रुप आमच्या अंतरंगात व बाह्यरंगात भरले आहे.”


अभंग क्र.१७२२
आठवूंचि नेंदी आवडी आणीक । भरूनियां लोक तिन्ही राहे ॥१॥
मन धांवे तेथें तिचेंचि दुभतें । संपूर्ण आइतें सर्वकाळ ॥ध्रु.॥
न लगे वोळावीं इंद्रियें धांवतां । ठाव नाहीं रिता उरों दिला ॥२॥
तुका म्हणे समपाउलाचा खुंट । केला बळकट हालों नेदी ॥३॥

अर्थ

हा पांडूरंग मला इतर कोणत्याही व्यर्थ गोष्टी आठवू देत नाही व त्याविषयी आवडही निर्माण होऊ देत नाही कारण हा तीन्ही लोकांमध्ये भरुन राहीला आहे. माझे मन जिथे जिथे धावते तिथे तिथे या विठाईचेच प्रेमरुपी दूध मला मिळते व ते संपूर्ण सर्वकाळ आयते मिळते. आता माझ्या इंद्रियांना वळवण्याची गरज मला लागत नाही कारण सर्वत्र ही विठाईच भरुन उरली आहे त्यामुळे कोठेही जावे तेथे विठाईच राहाते मग इंद्रियांना इतर कोणत्याही विषयांकडे वळण्यास गरजच पडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “हा विठ्ठल आपले समचरण पाऊल विटेवर ठेवून बळकटपणे उभा आहे व आम्हीही त्याला कधी हलू देणार नाही.”


अभंग क्र.१७२३
आम्हां अळंकार मुद्रांचे शृंगार । तुळसीचे हार वाहों कंठीं ॥१॥
लाडिके डिंगर पंढरिरायाचे । निरंतर वाचे नामघोष ॥ध्रु.॥
आम्हां आणिकांची चाड चित्ती नाहीं । सर्व सुख पायीं विठोबाच्या ॥२॥
तुका म्हणे आम्ही नेघोंचि या मुक्ती । एकाविण चित्तीं दुजें नाहीं ॥३॥

अर्थ

आम्हा हरीभक्तांना आमचे अलंकार म्हणजे मुद्रांचे श्रृंगार तसेच तुळशीचे हार कंठी धारण करणे हेच आहे. आम्ही या पंढरीरायाचे लाडके सेवक आहोत व आमच्या वाचेने त्याचे नामघोष आम्ही निरंतर करत राहू. आता इतर कोणाविषयी आमच्या चित्तामध्ये आवड नाही सर्व सुखच या विठोबाच्या पायामध्ये आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “या विठोबावाचून दुसरे कोणी आमच्या चित्तामध्ये नाही आम्हाला कोणी मुक्ती घ्या म्हटले तरी आम्ही मुक्ती घेणार नाही.”


अभंग क्र.१७२४
चला पंढरीसी जाऊं । रखुमादेवीवरा पाहूं ॥१॥
डोळे निवतील कान । मना तेथें समाधान ॥ध्रु.॥
संतां महंतां होतील भेटी । आनंदें नाचों वाळवंटीं ॥२॥
तें तीर्थांचे माहेर । सर्वसुखाचें भांडार ॥३॥
जन्म नाहीं रे आणीक । तुका म्हणे माझी भाक ॥४॥

अर्थ

हे जनहो चला आपण पंढरीस जावू आणि रुक्मादेवीचा वर पांडूरंग याला पाहू या. त्याच्या दर्शनाने डोळे आणि कथा श्रवणाने कान तृप्त होतील आणि तेथे मनालाही समाधान मिळेल. तेथे गेल्यानंतर आपल्याला संत महंत याची भेट होईल व आनंदाने आपण वाळवंटात नाचू. पंढरपूर म्हणजे सर्व श्रेत्रांचे माहेर तसेच सर्व सुखाचे भांडार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “अरे जो कोणी तेथे जातो त्याला पुन: जन्ममरण नाही हे मी प्रतिज्ञेने सांगतो.”


अभंग क्र.१७२५
पैल घरीं जाली चोरी । देह करीं बोंब ॥१॥
हाबा हाबा करिसी काय । फिराऊनि नेटयां वाय ॥ध्रु.॥
सांडुनियां शुद्धी । निजलासी गेली बुद्धी ॥२॥
चोरीं तुझा काढिला बुर । वेगळा भावा घातलें दूर ॥३॥
भलतियासी देसी वाव । लाहेसि तूं एवढा ठाव ॥४॥
तुका म्हणे अझुनि तरी । उरलें तें जतन करीं ॥५॥

अर्थ

देहाच्या पलीकडे असलेल्या आत्मवस्तूची चोरी झाली व त्यामुळे अज्ञान निर्माण होऊन जीव “मी व माझे” असे बोंब मारीत आहे. अरे तू पुन्हा फिरुन या भवसागरातील गोष्टींसाठी हाव का करतो आहेस ? ज्ञान विसरुन गेलास त्यामुळे तुझी शुध्द हरपली आणि त्या कारणानेच तुझी आत्मभूती नष्ट झाली आहे. तुझी आत्मवस्तू चोरीला त्यामुळे तुझे ऊर दडपून गेले आहे खरे तर तुला आत्मभावापासून वेगळे करुन प्रकृतीभावात दूर नेऊन टाकले आहे. अरे तू भलत्याच गोष्टींना वाव देत बसलास त्यामुळे तुला अशी स्थिती प्राप्त झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “मागे जे झाले ते झाले आता तुझ्याकडे जे आत्मप्राप्तीचे साधने उरले आहेत तेवढे तू जतन कर.”


अभंग क्र.१७२६
किती वेळी खादला दगा । अझून कां जागसी ना ॥१॥
लाज नाहीं हिंडतां गांवें । दुःख नवें नित्य नित्य ॥ध्रु.॥
संवचोरा हातीं फांसे । देखतां कैसे न देखसी ॥२॥
तुका म्हणे सांडिती वाट । तळपट करावया ॥३॥

अर्थ

अरे तू जन्ममरणरुपी दगा किती वेळा खाल्ला आहेस मग तू अजूनही जागा हा होत नाहीस ? चौऱ्याऐंशी लक्ष योनीचे गाव फिरताना आणि अनेक प्रकारचे नित्य नवेनवे दु:ख भोगताना तुला लाज तरी कशी वाटत नाही. अरे तुझ्याबरोबर त्रिगुण काम क्रोध इत्यादी चोर फिरतात तुझ्या हातात नको ती विषयाचे सुखाचे फासे तुला देतात ते तुला प्रत्यक्ष दिसत असतानाही तू न दिसल्यासारखे का करतो आहेस ? तुकाराम महाराज म्हणतात, “अरे तुझे वाटोळे करण्यासाठीच हे त्रिगुणरुपी चोर तुझी परमार्थाची वाट सोडण्यास तुला प्रवृत्त करत आहेत.”


अभंग क्र.१७२७
मुदलामध्यें पडे तोटा । ऐसा खोटा उदीम ॥१॥
आणिकांची कां लाज नाहीं । आळसा जिहीं जिंतिलें ॥ध्रु.॥
एके सांते सरिखीं वित्तें । हानि हिते वेगळालीं ॥२॥
तुका म्हणे हित धरा । नव्हे पुरा गांवढळ ॥३॥

अर्थ

ज्या व्यापारामुळे मुद्दलामधे तोटा होतो तो व्यापार खोटा आहे. अरे ज्यांनी आळसाला जिंकले आहे त्यांना पाहून तरी तुला लाज कशी वाटत नाही ? या जगामध्ये भगवंताने सर्वांना मन, बुध्दी, इंद्रिय आणि मनुष्यदेह हे भांडवल सारखेच दिले आहे असे असून देखील एकाला फायदा व एकाला तोटा का होतो आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, “याकरता आपले हित होण्यासाठी तुम्ही काहीतरी विचार करा एकदमच असे गावंढळ सारखे राहू नका.”


अभंग क्र.१७२८
निरोप सांगतां । न धरीं भय न करीं चिंता ॥१॥
असो ज्याचें त्याचे त्याचे माथां । आपण करावी ते कथा ॥ध्रु.॥
उतरावा भार । किंवा न व्हावें सादर ॥२॥
तुका म्हणे धाक । तया इह ना परलोक ॥३॥

अर्थ

मी देवाचा आणि संतांचा निरोप सांगताना मनामध्ये कोणत्याही प्रकारचे भय किंवा चिंता अजिबात बाळगणार नाही. आता आपण केवळ आनंदाने हरिकथा करण्याचे काम करावे कोणी कथा ऐको किंवा न ऐको ज्याचे त्याचे गुणदोष ज्याच्या त्याच्या माथ्यावर राहतील त्यामुळे आपण ती चिंता करू नये आपण केवळ आनंदाने हरिकथा करावी. आपण आपल्या माथ्यावरील देवाचा निरोप सांगण्याचा भार उतरावा मग तो निरोप म्हणजे हरिकथा ऐकण्यासाठी कुणी तत्पर असो किंवा नसो आपण आपले कर्तव्य करावे. तुकाराम महाराज म्हणतात जो हरीचा निरोप म्हणजे हरिकथा करताना हरिने सांगितलेले कार्य सांगण्यास मनामध्ये कोणाचे भय बाळगत असेल तर त्याला इहलोकातही व परलोकात ही सुख मिळत नाही.


अभंग क्र.१७२९
शूरत्वासी मोल । नये कामा फिके बोल ॥१॥
केला न संडी कैवाड । जीवेंसाठी तों हे होड ॥ध्रु.॥
धीर तो कारण । साह्य होतो नारायण ॥२॥
तुका म्हणे हरी । दासां रिक्षतो निर्धारीं ॥३॥

अर्थ

कोठेही जा शुरत्वाला किंमत आहे केवळ व्यर्थ बडबड फिके बोल का उपयोगी येत नाही. केलेली प्रतिज्ञा जीवावर उदार होऊन पूर्ण करतो तोच खरा धैर्यशाली आहे. कोणतेही कार्य करताना धैर्य अतिशय महत्वाचे आहे आणि ज्याच्या अंगी धैर्य आहे त्यालाच नारायण सहकार्य करतो. तुकाराम महाराज म्हणतात, “तो हरी त्याच्या भक्तांचे त्याच्या दासांचे निर्धाराने रक्षण करत असतो.”


अभंग क्र.१७३०
हरीच्या दासां भये । ऐसें बोलों तें ही नये ॥१॥
राहोनियां आड । उभा देव पुरवी कोड ॥ध्रु.॥
हरीच्या दासां चिंता । अघटित हे वार्ता ॥२॥
खावे ल्यावें द्यावें । तुका म्हणे पुरवावें ॥३॥

अर्थ

हरीच्या दासांना भय असते असे बोलू देखील नये. देव त्यांच्या आड उभा राहून त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करत असतो. हरीच्या दासांना चिंता उत्पन्न होते ही वार्ता कधीही घडणे शक्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात अहो देव हरीच्या दासांना म्हणजे त्याच्या दासांना खाण्यासाठी अन्न, अंगावर पांघरण्यासाठी वस्त्र देऊन सर्व त्यांचे मनोरथ पूर्ण करत असतो.


अभंग क्र.१७३१
दासां सर्वकाळ । तेथें सुखाचे कल्लोळ ॥१॥
जेथें वसती हरीचेदास । पुण्य पिके पापा नास ॥ध्रु.॥
फिरे सुदर्शन । घेऊनियां नारायण ॥२॥
तुका म्हणे घरीं । होय म्हणियारा कामारी ॥३॥

अर्थ

हरीदास जेथे असतात तेथे त्यांना सर्वकाळ सुखाच्या लाटा येत असतात. जेथे हरीचे दास राहातात तेथे पुण्य पिकते आणि पापाचा नाश होत असतो. हा नारायण भक्तांचे रक्षण करण्याकरता सदा सर्वकाळ सुदर्शन हातात घेऊन त्यांच्याभोवती फिरत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, “हा हरी भक्तांचे सेवकत्व पत्करतो.”


अभंग क्र.१७३२
आमचा स्वदेश । भुवनत्रयामध्यें वास ॥१॥
मायबापाचीं लाडकीं । कळों आलें हें लौकिकीं ॥ध्रु.॥
नाहीं निरपराध । कोणां आम्हांमध्यें भेद ॥२॥
तुका म्हणे मान । अवघें आमचें हें धाम ॥३॥

अर्थ

त्रिभूवन म्हणजे आमचा स्वदेश आहे व त्यामध्येच आम्ही वास्तव्य करत आहोत. आम्ही रखुमाईचे आणि‍ विठ्ठलाचे लाडके लेकरे आहोत हे सर्वांनाच कळून आले आहे. आम्ही कोणामध्येही भेद मानत नाही व कोणालाही दुष्ट समजत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “सर्व धाम म्हणजे हे केवळ आमच्यासाठी हरीनामच आहे.”


अभंग क्र.१७३३
काय ढोरापुढें घालूनि मिष्टान्न । खरासी लेपन चंदनाचें ॥१॥
नको नको देवा खळाची संगति । रस ज्या पंगती नाहीं कथे ॥ध्रु.॥
काय सेज बाज माकडा विलास । अळंकारा नास करुनी टाकी ॥२॥
तुका म्हणे काय पाजूनि नवनीत । सर्पा विष थीत अमृताचें ॥३॥

अर्थ

जनावरापुढे मिष्टान्न ठेवून त्यांना त्याची चव कळणार आहे काय त्याचा काही उपयोग होणार आहे का आणि चंदनाची उटी गाढवाला लावली तरी काही उपयोग होणार आहे का ते पुन्हा उकिरडयातच जाऊन लोळणार आहे. त्याप्रमाणे देवा मला दुष्टांची संगती नको अजिबातच नको कारण ज्यांना हरीकथेतील ब्रम्हरसच समजत नाही त्यांच्या पंगतीला बसणे देखील मला नको वाटते. जर वानराला बसण्यास चांगल्या प्रकारचा बाज ज्यावर चांगल्या प्रकारची गादी टाकली त्याला अलंकार घालावयास दिले आणि खाण्यापिण्यासाठी उत्तम पदार्थही दिले तरी त्याच्या स्वभावगुणाप्रमाणे तो त्या सर्व गोष्टींचा नाशच करुन टाकणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “अहो सर्पाला दूध किंवा अमृत पाजले तरी त्याचा काही उपयोग होत नाही कारण ते शेवटी पोटात गेल्यानंतर विषच तयार होते.”


अभंग क्र.१७३४
आनंदें एकांतीं प्रेमें वोसंडत । घेऊं अगणित प्रेमसुख ॥१॥
गोप्य धन नये वारा लागों यास । पाहों नेदूं वास दुर्जनासी ॥ध्रु.॥
झणी दृष्टि लागे आवडीच्या रसा । सेवूं जिरे तैसा आपणासी ॥२॥
तुका म्हणे हें बहु सकुमार । न साहावे भार वचनाचा ॥३॥

अर्थ

आम्ही आनंदाने एकांतात बसू व अगणित हरीचे सुख आवडीने घेवू. हरीचे प्रेमसुख म्हणजे गुप्तधन आहे आणि याला बाह्य अहंकाराचा वारा देखील लागू देवू नये आणि दुर्जनाला तर हे सुख दिसू सुध्दा देवू नये. हरीच्या प्रेमसुखला कोणाची नजर लागू नये याकरता आपण एकांतात जाऊन हे हरीचे प्रेमसुख सेवन करु जेणे करुन याला कोणाचीही दृष्ट लागणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “हे हरीचे प्रेमसुख म्हणजे फार सुकुमार आहे हे असे प्रकारचे आहे किंवा हे तसे प्रकारचे आहे असा वर्णनाचा शाब्दिक भार देखील सहन होत नाही.”


अभंग क्र.१७३५
मोक्षपदें तुच्छ केलीं याकारणें । आम्हां जन्म घेणें युगायुगीं ॥१॥
विटे ऐसें सुख नव्हे भक्तीरस । पुडतीपुडती आस सेवावें हें ॥ध्रु.॥
देवा हातीं रूप धरविला आकार । नेदूं निराकार होऊं त्यासी ॥२॥
तुका म्हणे चित्त निवांत राहिलें । ध्याई तीं पाउलें विटेवरी ॥३॥

अर्थ

हरीचे प्रेमसुख भोगण्याकरता व हरीच्या प्रेमसुखापुढे आम्हाला मोक्षपद देखील तुच्छ आहे आणि ते प्रेमसुख पुन्हा पुन्हा मिळावे याकरता आम्ही पुन्हा पुन्हा युगानुयुगे जन्म घेवू. हरी प्रेमसुख व हरीच्या भक्तीचा रस हा अवीट आहे आणि याचे पुन्हा पुन्हा सेवन करावे अशीच इच्छा मनात असते. याकरताच आम्ही देवाच्या हाताला धरुन त्याला आकार धारण करायला लावला आहे आता त्यास आम्ही निराकार होऊ देणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “विटेवर असलेले हरीचे समचरण हेच माझ्या चित्तामध्ये निश्चिंतपणे आहे व त्याच ठिकाणी माझे चित्त रमले आहे व त्याच विटेवरील पा


अभंग क्र.१७३६
नको बोलों भांडा । खीळ घालून बैस तोंडा ॥१॥
ऐक विठोबाचे गुण । करीं सादर श्रवण ॥ध्रु.॥
प्रेमसुखा आड । काय वाजातें चाभाड ॥२॥
तुका म्हणे हिता । कां रे नागवसी थीता ॥३॥

अर्थ

हे भांडखोर मनुष्या येथे हरिकथा चालू आहे त्यामुळे व्यर्थ बडबड करु नकोस तोंडाला खिळ घालून गप बस. आता विठोबाचे गुणगान ऐकण्यास तू सावध राहा आणि हरी कथा ऐकण्यास तत्पर रहावे. अरे येथे हरिकथा चे सुख चालू आहे आणि असे प्रेमसूख चालू असताना तू बडबड करून त्या प्रेम सुखाच्या आड का येत आहेस? तुकाराम महाराज म्हणतात अरे तू हरी कथा ऐकून स्वतःचे हित करून घ्यावेस व्यर्थ बडबड करून स्वतःचा हिताला का अडवत आहेस.


अभंग क्र.१७३७
अति जालें उत्तम वेश्येचें लावण्य । परि ते सवासीण न म्हणावी ॥१॥
उचित अनुचित केले ठाया ठाव । गुणां मोल वाव थोरपण ॥ध्रु.॥
शूरत्वावांचूनि शूरांमाजी ठाव । नाहीं आयुर्भाव आणिलिया ॥२॥
तुका म्हणे सोंग पोटाचे उपाय । कारण कमाईविण नाहीं ॥३॥

अर्थ

वेश्येने कितीही उत्तम प्रकारे लावण्य केले तरी पण तिला कोणीही सुवासीनी म्हणू नये. त्याप्रमाणे या हरीने प्रत्येकाच्या ठिकाणी उचित अनुचित असा भेद निर्माण केला आहे त्यामुळे नेहमी सद्गुणालाच वाव दयावा. केवळ शूरपणाचा आव आणला तर जमत नाही तर प्रत्यक्षात शूराप्रमाणे वागावे लागते तरच लोकांच्या मनामध्ये त्याच्या शूरपणाचे स्थान निर्माण होते. तुकाराम महाराज म्हणतात, “पोट भरण्याकरता विविध प्रकारचे सोंग करुन अनेक उपायाने पोट भरता येईल परंतू परमार्थ करण्याविषयी दैवी संपत्ती प्राप्त झाल्याशिवाय कार्य पूर्ण होत नाही.”


अभंग क्र.१७३८
शूरां साजती हतियारें । गांढया हांसतील पोरें ॥१॥
काय केली विटंबण । मोतीं नासिकावांचून ॥ध्रु.॥
पतिव्रते रूप साजे। सिंदळ काजळ लेतां लाजे ॥२॥
दासी पत्नी सुता । नव्हे सरी एकची पिता ॥३॥
मान बुद्धिवंतां । थोर न मनिती पिता ॥४॥
तुका म्हणे तरी । आता शुद्ध दंडे वरी ॥५॥

अर्थ

शूराने जर आपल्या हातात शस्त्र धरले तर त्यालाच ते शोभून दिसतात परंतू एखादया भित्र्या व्यक्तीने हातात शस्त्र धरले तर लहान मुले देखील त्याला हसतात. नाक व्यवस्थित नसलेल्या स्त्रीने जर मोत्याची नथ नाकात घातली तर तिने स्वत:चीच फजिती केली असे होत नाही काय ? पतिव्रता स्त्रीने अनेक प्रकारचे अलंकार करुन स्वत:ला सजविले तर ते तिला साजेसे असते परंतू एखादी व्याभिचारीण स्त्री काजळ देखील डोळयात घालताना लाजत असते. दासीचा पुत्र आणि पत्नीचा पुत्र या दोघांचा बाप जरी एकच असला तरी त्या दोघांची योग्यता एकसारखी नसते. बुध्दिमंत लोकांना जनमाणसामध्ये मानसन्मान मिळतो परंतू त्याचाच पिता वयाने मोठा असल्यामुळे त्याला मान देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “जो अंत:करणातून शुध्द आहे त्यालाच त्याने वरती वर वर केलेले वस्त्र शोभतात.”


अभंग क्र.१७३९
काय केलें जळचरीं । ढीवर त्यांच्या घातावरी ॥१॥
हा तों ठायींचा विचार । आहे यातिवैराकार ॥ध्रु.॥
श्वापदातें वधी । निरपराधें पारधी ॥२॥
तुका म्हणे खळ । संतां पीडिती चांडाळ ॥३॥

अर्थ

जलचर प्राण्यांनी कोळयांचे काही अपराध केलेले असतात का तर नाही तरी देखील ते कोळी लोक त्यांचा घात करतात. हा प्रकार म्हणजे पहिल्यापासूनच चालत आलेला असतो काही जातींचा काही जातींशी वैर असते. रानातील श्वापदे निरापराध असतात असे असून देखील पारधी लोक त्यांचा वध करतात. तुकाराम महाराज म्हणतात, “अगदी त्याप्रमाणे दुष्ट नालायक चांडाळ माणसे संतांनाही काही कारण नसताना त्रास देतच असतात.”


अभंग क्र.१७४०
वाइटानें भलें । हीनें दाविलें चांगलें ॥१॥
एकाविण एका । कैचें मोल होतें फुका ॥ध्रु.॥
विषें दाविलें अमृत । कडू गोड घातें हित ॥२॥
काळिमेनें ज्योती । दिवस कळों आला राती ॥३॥
उंच निंच गारा । हिरा परिस मोहरा ॥४॥
तुका म्हणे भले । ऐसे नष्टांनीं कळले ॥५॥

अर्थ

जगात जे काही वाईट म्हणून प्रवृत्ती आहेत त्यांनी जगातील सर्व चांगल्या प्रवृत्ती दाखवल्या त्या म्हणजे अशा प्रकारे कारण वाईट प्रवृत्ती घडल्या की चांगल्या प्रवृत्ती आपोआप दिसून येतात. एकावाचून दुसऱ्याची किंमत होईलच कशी ? विषामुळेच अमृताची किंमत आहे कडूपणामुळेच गोडपणालाही किंमत आहे त्याप्रमाणे घातामुळेच हिताची किंमत आहे. अंधारामुळेच प्रकाशाला किंमत आहे आणि दिवसानेच रात्रीची कल्पना आहे. गारामुळे हिरा परीस तसेच मोहरा यांची उत्कृष्टता दिसते जरी गारा हिऱ्याप्रमाणे मोहऱ्याप्रमाणे दिसत असली तरी देखील. तुकाराम महाराज म्हणतात, “जगात जेवढे काही दुष्ट आणि नष्ट व्यक्ती आहेत त्यांच्यामुळेच सज्जन लोकांना किंमत आहे.”


अभंग क्र.१७४१
असो खळ ऐसे फार । आम्हां त्यांचे उपकार ॥१॥
करिती पातकांची धुनी । मोल न घेतां साबनीं ॥ध्रु.॥
फुकाचे मजुर। ओझें वागविती भार ॥२॥
पार उतरुन म्हणे तुका । आम्हां आपण जाती नरका ॥३॥

अर्थ

जगामध्ये खल दुष्ट व्यक्ती फार आहेत ते असू दयावे असायलाच पाहिजेत कारण त्यांचे तर खरे आमच्यावर उपकार आहेत. कारण या दुष्ट लोकांनी कोणत्याही प्रकारचे मोल न घेता कोणत्याही प्रकारचे साबण न घेता आमची निंदा करुन आमचे सर्व पातक धुवून टाकले आहेत. संत सज्जनांची निंदा करुन संत सज्जनाकडून चुकून झालेल्या पातकांचे ओझे हे दुष्ट आपल्या पाठीवर वाहातात कारण दुष्ट लोक म्हणजे फुकटचे मजूर आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, “हे दुष्ट लोक आमची निंदा करुन आम्हाला भवनदीच्या पार उतरुन देतात परंतू ते मात्र स्वत: नरकाला जातात.”


अभंग क्र.१७४२
संत पंढरीस जाती । निरोप धाडीं तया हातीं ॥१॥
माझा न पडावा विसर । तुका विनवितो किंकर ॥ध्रु.॥
केरसुणी महाद्वारीं । ते मी असें निरंतरीं ॥२॥
तुमचे पायीं पायतान । मोचे माझे तन मन ॥३॥
तांबुलाची पिकधरणी । ते मी असें मुख पसरूनि ॥४॥
तुमची इष्टा पंढरीराया । ते सारसुबी माझी काया ॥५॥
लागती पादुका । ते मी तळील मृत्तिका ॥६॥
तुका म्हणे पंढरिनाथा। दुजें न धरावें सर्वथा ॥७॥

अर्थ

जे संत पंढरीला जात आहेत त्यांच्या हाती मी माझा निरोप पांडूरंगाला पाठवित आहे. ती विनंती म्हणजे अशी की, हे देवा मी तुकाराम तुमचा अनन्यसेवक आहे तरी तुम्हाला माझा विसर पडू देवू नये. देवा तुमच्या महाद्वारामध्ये जी निरंतर केरसुणी आहे ती मीच आहे असे तुम्ही समजावे. देवा तुमच्या पायातील पायताण म्हणजे माझे शरीर आणि माझे मन आहे. देवा तुम्ही जो विडा खाऊन ज्या पीकदाणीत थुंकणार आहात तेथे मी माझे मुख पसरुन बसतो मग तुम्ही त्यालाच पीकदाणी समजा. देवा हे पंढरीराया तुमची विष्ठा म्हणजे माझ्या शरीराला चंदनलेपच आहे व तेच लेप मी माझ्या शरीराला लावीन. देवा तुमचे पाय जेथून जातात तेथे तुमच्या पादुकाच्या तळाखाली जी माती लागते ती माती म्हणजे मीच आहे असे तुम्हाला वाटू दया. तुकाराम महाराज म्हणतात, “हे पंढरीनाथा मला तुमच्यापेक्षा वेगळे कधीही समजू नका.”


अभंग क्र.१७४३
इच्छेचें पाहिलें । डोळीं अंतीं मोकलिलें ॥१॥
यांचा विश्वास तो काई । ऐसें विचारूनि पाहीं ॥ध्रु.॥
सुगंध अभ्यंगें पाळितां । केश फिरले जाणतां ॥२॥
पिंड पाळितां ओसरे । अवघी घेऊनि मागें सरे ॥३॥
करितां उपचार । कोणां नाहीं उपकार ॥४॥
अल्प जीवन करीं । तुका म्हणे साधे हरी ॥५॥

अर्थ

माझ्या डोळयांनी आजपर्यंत इच्छेप्रमाणे पुष्कळ खूप पदार्थ पाहिले परंतू माझ्या डोळयांनी मला आता सोडले. मग याचाच तुम्ही विचार करुन पहा या इंद्रियांवर कसा विश्वास ठेवावा ? आपण आपल्या केसांना आजपर्यंत सुगंधी साबणाने अभ्यंग स्नानाने आंघोळ घालून पाळत आलो परंतू शेवटी शेवटी ते केस पांढरे झाले. या देहाला आतापर्यंत आपण खूप पाळले पोसले त्याचे खूप लाड केले परंतू आता त्याने या मृत्यूलोकातून माघार घेतली आहे. या शरीराला आपण आतापर्यंत खूप प्रकारचे उपचार खूप प्रकारचे भोग भोगायला दिले परंतू तरीही त्या शरीराला त्याचे उपकार नाही व शेवटी ते आपल्याला सोडून देतात. तुकाराम महाराज म्हणतात, “आपल्याला जीवन फार थोडे आहे तरी या जन्मातील जो मुख्य प्राप्ती करण्याचे म्हणजे ज्याची मुख्यत्वाने प्राप्ती करुन घ्यायची आहे तो हरी प्राप्त करुन घ्यावा.”


अभंग क्र.१७४४
यज्ञनिमित्त तें शरिरासी बंधन । कां रे तृष्णा वांयांविण वाढविली ॥१॥
नव्हे ते भक्ती परलोकसाधन । विषयांनीं बंधन केलें तुज ॥ध्रु.॥
आशा धरूनि फळाची । तीर्थी व्रतीं मुक्ती कैंचि ॥२॥
तुका म्हणे सिणसी वांया । शरण न वजतां पंढरिराया ॥३॥

अर्थ

अरे यज्ञादी कर्मे करुन पुन्हा शरीरच प्राप्त होते मग तू विनाकारणच भोग तृष्णा का बरे वाढवतोस ? अरे हे साधन म्हणजे हे यज्ञयादी कर्मे म्हणजे परलोकीचे साधन नाही त्यामुळे तुला हरीभक्ती करता येत नाही खरे तर ते कर्म तुला विषयात बांधून टाकतात. फळाची अपेक्षा धरुन तू जर तीर्थ व्रत केले तर तुला मुक्ती कशी प्राप्त होईल ? तुकाराम महाराज म्हणतात, “अरे तू फक्त पंढरीरायाला शरण जा इतर व्यर्थ कर्म करुन का श्रम करुन घेतोस ?”


अभंग क्र.१७४५
संध्या कर्म ध्यान जप तप अनुष्ठान । अवघें जोडे नाम उच्चारितां ।
न वेचे मोल कांहीं लागती न सायास । तरी कां आळस करिसी झणी ॥१॥
ऐसें हे सार कां नेघेसी फुकाचें । काय तुझें वेचे मोल तया ॥ध्रु.॥
पुत्रस्नेहें शोक करी अजामेळ । तंव तो कृपाळ जवळी उभा ।
अनाथांच्या नाथें घातला विमानीं । नेला उचलूनि परलोका ॥२॥
अंतकाळ गणिका पक्षियाच्या छंदें । राम राम पद उच्चारिलें ।
तंव त्या दिनानाथा कृपा आली कैसी । त्यानें तियेसी वैकुंठासी नेलें ॥३॥
अवचिता नाम आलिया हे गती । चिंतितां चित्तीं जवळी असे ।
तुका म्हणे भावें स्मरा राम राम । कोण जाणे तये देशे ॥४॥

अर्थ

हरीचे नाम श्रध्दायुक्त भक्तीभावाने उच्चार केले तर सर्व प्रकारचे संध्या कर्म, ध्यान, जप, तप, अनुष्ठान केल्यासारखेच होते. अरे असे हरीनाम उच्चारण्याकरता कोणत्याही प्रकारचे मोल लागत नाही किंवा कोणत्याही प्रकारचे कष्ट लागत नाही असे असून देखील तू हरीनाम घेण्यास आळस का करत आहेस. अरे मग हे असे सर्व साराचेही सार फुकटचे हरीनाम तू का घेत नाहीस हे हरीनाम घेण्याकरता तुला काही मोल दयावे लागणार आहे काय ? अजामिळ सारखा पापी अंत:काळी पुत्रमोहाने केवळ नारायण नाम उच्चारण केल्यामुळे तो कृपाळू हरी त्याच्याजवळ त्याच्या मदतीला येऊन उभा राहीला. आणि मग अनाथाचा नाथ जो हरी त्याने त्या अजामिळाला आपल्या विमानात घेतले आणि त्याला परलोकी घेऊन गेला. गणिका नावाची वेश्या तिला पोपट पक्षाचा फार छंद होता व तिने आपल्या पोपटाचे नांव “राघोबा” असे ठेवले व अंत:काळी तिने त्या पोपटाच्या छंदाने केवळ राम राम असे नाम उच्चारले. मग त्या दीनानाथ हरीला तिची कशी कृपा आली ब�


अभंग क्र.१७४६
दुष्टाचें चिंतन भिन्ने अंतरीं । जरी जन्मवरी उपदेशिला ।
पालथे घागरी घातलें जीवन । न धरीच जाण तें ही त्याला ॥१॥
जन्मा येउनि तेणें पतनचि साधिलें । तमोगुणें व्यापिलें जया नरा ।
जळो जळो हें त्याचें ज्यालेपण । कासया हे आलें संवसारा ॥ध्रु.॥
पाषाण जीवनीं असतां कल्पवरी । पाहातां अंतरीं कोरडा तो ।
कुचर मुग नयेचि पाका । पाहातां सारिखा होता तैसा ॥२॥
तुका म्हणे असे उपाय सकळां । न चले या खळा प्रेत्न कांहीं ।
म्हणऊनि संग न करितां भला । धरितां अबोला सर्व हित ॥३॥

अर्थ

दुष्टाला जन्मभर जरी उपदेश केला तरी त्याच्या अंतरंगात वेगळेच चिंतन चालू असते. पालथ्या घागरीवर कितीही पाणी घातले तरी ती घागर कधीच भरणार नाही त्याप्रमाणे या दुष्टाला कितीही उपदेश केला तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. जो मनुष्य जन्माला येऊन केवळ तमोगुणानेच व्यापला आहे त्याने केवळ स्वत:चे पतनच करुन घेतले आहे. अशा मनुष्यांच्या जगण्याला आग लागो हे असे जन्मालाच का बरे आले असतील या संसारातच का बरे आले असतील ? एखादा दगड कल्पांतापर्यंत पाण्यात जरी ठेवला आणि त्याला शेवटी फोडून पाहिले तरीही तो ज्याप्रमाणे कोरडाच असतो. किंवा कुचर मूग स्वयंपाकासाठी घेतला त्याला शिजवले तर तो न शिजता तसाच राहातो. तुकाराम महाराज म्हणतात, “सगळया गोष्टींना उपाय आहेत परंतू दुष्ट लोकांना चांगले करण्याचा प्रयत्न केला तरीही काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे या दुष्टांची संगती न करणे हेच भले आहे आणि यांच्याशी अबोला धरणे यातच आपले सर्व हित आहे


अभंग क्र.१७४७
कासियानें पूजा करूं केशीराजा । हाचि संदेह माझा फेडीं आतां ॥१॥
उदकें न्हाणूं तरी स्वरूप तुझें । तेथें काय माझें वेचे देवा ॥ध्रु.॥
गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ । तेथें मी दुर्बळ काय करूं ॥२॥
फळदाता तूंच तांबूल अक्षता । तेथे काय आतां वाहों तुज ॥३॥
वाहूं दक्षिणा तरी धातु नारायण । ब्रम्ह तें चि अन्न दुजें काई ॥४॥
गातां तूं ॐकार टाळी नादेश्वर । नाचावया थार नाहीं कोठें ॥५॥
तुका म्हणें मज अवघें तुझें नाम । धूप दीप राम कृष्ण हरी ॥६॥

अर्थ

हे केशीराजा मी तुझी पूजा कशाने करु हा माझा संदेह आता तू फेड. तुम्हाला जर पाण्याने स्नान घालावे तर ते तुमचे स्वरुप आहे मग तेथे माझे काय खर्च होणार आहे देवा ? देवा गंधाचा सुगंध पुष्पांचा परिमळ तूच आहेस मग मी दुर्बळाने तुला काय अर्पण करावे ? हे अनंता, फळदाता तूच आहेस तांबूल, अक्षदा तूच निर्माण केलेल्या आहेस मग मी तुला काय वाहू देवा ? देवा तुला दक्षिणा किंवा सुवर्णरुपी धातू वाहावे तर ते तुझेच रुप आहे आणि अन्नरुपी नैवेदय तुला समर्पण करावा तर अन्न म्हणजे ब्रम्ह व ब्रम्ह म्हणजे तेही तूच आहेस. देवा तुला ओंकारस्वरुपाने आळवावा तर ते तूच आहेस आणि टाळी वाजवून तुझे भजन करावे तर सर्व नादाचाही तू नादेश्वर आहेस आणि तुझ्या भजनास नाचावयास कोठे गेले तर सर्व चरचरामध्ये तूच भरुन उरला आहेस त्यामुळे कोठे नाचावा हाही प्रश्नच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आता माझ्याजवळ केवळ एकच भांडवल आहे ते म्हणजे तुझे नाम “रामकृष्ण हरी” आता तेच नाम मीधुप दीप म्हणून तुलाच अर्पण करीत आहे.”


अभंग क्र.१७४८
गातां ऐकतां कांटाळा जो करी । वास त्या अघोरीं कुंभपाकीं ॥१॥
रागें यमधर्म जाचविती तया । तु दिलें कासया मुख कान ॥ध्रु.॥
विषयांच्या सुखें अखंड जगासी । न वजे एकादशी जागरणा ॥२॥
वेचूनियां द्रव्य सेवी मद्यपान । नाहीं दिलें अन्न अतीतासी ॥३॥
तीर्थाटण नाहीं केले उपकार । पाळिलें शरीर पुष्ट लोभें ॥४॥
तुका म्हणे मग केला साहे दंड । नाइकती लंड सांगितलें ॥५॥

अर्थ

हरीचे किर्तन भजन करण्यासाठी गाण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी जो कंटाळा करतो तो अघोरी अशा कुंभपाकी नरकामध्ये वास करतो. मग यम त्याच्यावर रागावतो त्याचा छळ करतो आणि त्याला विचारतो अरे नालायका तुला देवाने मुख आणि कान कशासाठी दिले तर केवळ हरीचे गुणगान गाण्यासाठी व ऐकण्यासाठीच. विषयाच्या सुखाकरता तू अखंडपणे जागतोस परंतू कधी एकादशीच्या दिवशी हरी जागरण करण्यासाठी तू कधीही जागला नाहीस. अरे तू पैसे कमवून केवळ मद्यपान सेवन केलेस परंतू घरी आलेल्या देवरुपी अतिथ्याला कधीही अन्नदान केले नाहीस. तू केव्हाही तीर्थाटन केले नाहीस केव्हाही कोणावरही परोपकार केले नाहीस केवळ शरीराच्या लोभाने तू निषिध्द अन्न खावून त्याला पाळले आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा निर्लज्ज लोकांना संतांनी कितीही चांगले वचने सांगितले तरीही ते ऐकत नाहीत मग पुढे यांना यमाने केलेला दंड सहन करावा लागतो.”


 

अभंग क्र.१७४९
तुझें म्हणवितां काय नास जाला । ऐकें बा विठ्ठला कीर्ती तुझी ॥१॥
परी तुज नाहीं आमचे उपकार । नामरूपा थार केलियाचे ॥ध्रु.॥
समूळीं संसार केला देशधडी । सांडिली आवडी ममतेची ॥२॥
लोभ दंभ काम क्रोध अहंकार । यांसी नाहीं थार ऐसें केलें ॥३॥
मृत्तिका पाषाण तैसें केलें धन । आपले ते कोण पर नेणों ॥४॥
तुका म्हणे जालों देहासी उदार । आणीक विचार काय तेथें ॥५॥

अर्थ

अरे विठ्ठला आम्ही स्वत:ला तुझे म्हणवून घेतले त्यामुळे आमचा काय नाश झाला काय तुझी किर्ती तेवढी ऐक. देवा तू पहिला निर्गुण होतास परंतू आम्ही तुझी भक्ती करुन तुला नामरुपाला आणले परंतू तुला आता आमचे उपकार राहिलेच नाहीत. आम्ही तुझ्यासाठी संसार समूळ देशोधडीला पाठवून दिला आणि त्यामधील आवड ममता सर्व टाकून दिली. अरे आम्ही आमच्या अंत:करणामध्ये लोभ, दंभ, काम, क्रोध, अहंकार याचा भारच राहाणार नाही असे केले. जशी माती पाषाण आहे तसेच आम्ही धन मानले आहे आणि आपले कोण आणि परके कोण हा भेदभावच आम्ही जाणत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आम्ही तुझी प्राप्तीसाठी आमच्या देहावर उदार झालो मग याच्यापेक्षा आणखी दुसरा कोणता विचार केला पाहिजे ?”


अभंग क्र.१७५०
जाऊनियां तीर्था काय तुवां केलें । चर्म प्रक्षाळिलें वरीं वरीं ॥१॥
अंतरींचें शुद्ध कासयानें जालें । भूषण तों केलें आपणया ॥ध्रु.॥
वृंदावन फळ घोळलें साकरा । भीतरील थारा मोडेचि ना ॥२॥
तुका म्हणे नाहीं शांति क्षमा दया । तोंवरी कसाय फुंदा तुम्ही ॥३॥

अर्थ

अरे तू तीर्थयात्रेला जाऊन विशेष कार्य काय केले आहेस केवळ पवित्र नद्यांमध्ये स्नान करून वर वर देहाची कातडी धुतली. अरे पण तुझे अंतकरण अजुन शुद्ध कुठे झाले?केवळ स्वतःकरता तीर्थयात्रा केली व याचे भूषण तू प्राप्त केले आहे. कडू वृंदावन फळ कितीही साखरेत घोळले तरी त्याच्या आतील कडूपणा केव्हाच जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात तीर्थयात्रा केल्याची व्यर्थ बडबड का करता जोपर्यंत तुमच्या अंतकरणात शांति ,क्षमा ,दया येत नाही तोपर्यंत याचा काहीच उपयोग होणार नाही.


अभंग क्र.१७५१
बैसोनि निवांत शुद्ध करीं चित्त । तया सुखा अंतपार नाहीं ॥१॥
येऊनि अंतरीं राहील गोपाळ । सायासाचें फळ बैसलिया ॥ध्रु.॥
राम कृष्ण हरी मुकुंद मुरारि । मंत्र हा उच्चारीं वेळोवेळां ॥२॥
तुका म्हणे ऐसें देईन मी दिव्य । जरी होईल भाव एकविध ॥३॥

अर्थ

अरे तुम्ही एकांतात बसुन प्रथम चित्त शुद्ध करा आणि ज्या वेळेस तुमचे चित्त शुद्ध होईल मग त्या सुखाला अंतपार नाही. एकदा की तुमचे अंतकरण शुद्ध झाले मग तो गोपाळ तुमच्या अंतकरणात येऊन राहिल आणि कष्टाने जे फळ प्राप्त होणार आहे ते फळ तुम्हाला बसल्या जागीच प्राप्त होईल. राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी या मंत्राचा चा उच्चार तु वेळोवेळी करत राहा. तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या मनामध्ये हरी विषयी एकनिष्ठ भक्ती भाव जर होईल तर मग मी तुला दिव्य प्रकारच्या अनुभवाचा साक्षात्कार घडुन देईल.


अभंग क्र.१७५२
धन्य पुंडलिका बहु बरें केलें । निधान आणिलें पंढरिये ॥१॥
न करी आळस आलिया संसारी । पाहे पा पंढरी भूवैकुंठ ॥ध्रु.॥
न पवीजे केल्या तपांचिया रासी । तें जनलोकांसी दाखविलें ॥२॥
सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव । शास्त्रांनी हा भाव निवडिला ॥३॥
विष्णुपद गया रामनाम काशी । अवघीं पायांपाशीं विठोबाच्या ॥४॥
तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस । तात्काळ या नाश अहंकाराचा ॥५॥

अर्थ

हे पुंडलिका तु धन्य आहेस तु एक फार चांगले काम केले आहे ते म्हणजे विठ्ठल रुपी निधान तु पंढरपुला आणले आहेस. अरे मानवा तू या संसारात जन्माला आला आहेस त्यामुळे तु आळस करू नकोस तु भूवैकुंठ अशा पंढरीचे दर्शन नक्की घे. तपाच्या राशी करून देखील जे ब्रम्‍ह प्राप्त होत नाही ते ब्रम्‍ह या पुंडलिकाने सामान्य जन लोकांना दाखवले आहे. जिथे तीर्थक्षेत्र,देव एकत्र असतात ते स्थान प्रवित्र आहे. विष्णुपद,गया,रामनाम आणि काशी ही सर्व विठुरायाच्या पायापाशी आहेत. तुकाराम महाराज म्हणतात एखाद्या श्रद्धावान भक्ताने विठोबाच्या राऊळाचा कळस जरी पाहिला तरी त्याचा तत्काळ अहंकार नाश पावतो व त्याला मोक्ष प्राप्त होते.


अभंग क्र.१७५३
धन्य ते पंढरी धन्य भीमातीर । आणियेलें सार पुंडलिकें ॥१॥
धन्य तो हि लोक अवघा दैवांचा । सुकाळ प्रेमाचा घरोघरीं ॥ध्रु.॥
धन्य ते ही भूमी धन्य तरुवर । धन्य ते सुरवर तीर्थरूप ॥२॥
धन्य त्या नरनारी मुखीं नाम ध्यान । आनंदें भवन गर्जतसे ॥३॥
धन्य पशु पक्षी कीटक पाषाण । अवघा नारायण अवतरला ॥४॥
तुका म्हणे धन्य संसार ती आलीं । हरीरंगीं रंगलीं सर्वभावें सर्वभावें ॥५॥

अर्थ

सर्व वेद, शास्त्रांचे सार असा जो पांडुरंग त्याला पुंडलिकाने पंढरीत आणले आहे म्हणून ती पंढरी धन्य आहे व ते भीमातीर ही धन्य आहे. त्या ठिकाणी राहणारे लोकही धन्य आहेत कारण देवाच्या दारामध्ये राहणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या घरी भक्ती प्रेमाचा सुकाळा आहे. त्या पंढरी मधील भूमि ही धन्य आहे तेथील झाडेझुडपे धन्य आहेत आणि तीर्थरूप सरोवरही धन्य आहे. त्या पंढरीतील नर व नारी हेही धन्य आहेत कारण त्यांच्या मुखामध्ये नेहमी विठ्ठलाचे नाम व चित्तामध्ये त्याचेच ध्यान आहे त्यामुळे हे पंढरी क्षेत्र ,पंढरी भुवन विठ्ठलाच्या आनंदाने व नामा ने गर्जुन गेले आहे. त्या पंढरीतील पशुपक्षी,कीटक,पाषाण देखील धन्य आहेत कारण या सर्वांसाठीच नारायणाने तेथे अवतार घेतला आहे. तुकाराम महाराज म्हणतात या संसारात जन्माला येऊन जे सर्व भाविक हरी रंगात रंगले ते खरोखरच धन्य आहेत.


अभंग क्र.१७५४
मायबाप करिती चिंता । पोर नाइके सांगतां ॥१॥
नको जाऊं देउळासी । नेतो बागुल लोकांसी ॥ध्रु.॥
वैष्णवां संगती । हातीं पडलीं नेणों किती ॥२॥
कर्णद्वारें पुराणिक। भुलवी शब्दें लावी भीक ॥३॥
आम्हां कैंचा मग । करिसी उघडियांचा संग ॥४॥
तुका म्हणे जाणें नरका । त्यांचा उपदेश आइका ॥५॥

अर्थ

एखादा मुलगा परमार्थ करतो आणि ते त्याच्या आई बापाला आवडत नाही मग त्याच्याविषयी त्याच्या आई बापाला फार चिंता लागते ते म्हणतात काय करावे याला कितीही सांगितलं तरी हा ऐकतच नाही. मग ते आईबाप त्या मुलाला म्हणतात अरे तू त्या देवळामध्ये जाऊ नकोस बंर कारण तेथे बागुलबुवा आहे तो लोकांना धरून नेत असतो. अरे त्याची भक्ती करणाऱ्या वैष्णवा च्या संगतीत असे किती लोक आहेत की त्यांचे हात साफडले आहेत. आणि हे पुराणिक लोक कानात असे सांगतात की जग मिथ्या आहे व त्याची कथा पटवून सांगतात आणि त्यांच्या शब्दात भुलुन टाकून भिकेला लावतात. अरे तू जर त्या उघड्या वैष्णवाची संगती करशील तर तु ही त्यांच्यासारखाच होशील मग आमची सेवा करण्यासाठी ईथे कोण राहील? तुकाराम महाराज म्हणतात ज्या मुलाला अशा दुष्ट आई बापाचा उपदेश ऐकून नरकाला जायचं असेल त्यांनी त्यांचा उपदेश ऐकावा.


अभंग क्र.१७५५
मन माझें चपळ न राहे निश्चळ । घडी एकी पळ स्थिर नाहीं ॥१॥
आतां तूं उदास नव्हें नारायणा । धांवें मज दीना गांजियेलें ॥ध्रु.॥
धांव घालीं पुढें इंद्रियांचे ओढी । केलें तडातडी चित्त माझें ॥२॥
तुका म्हणे माझा न चले सायास । राहिलों हे आस धरुनी तुझी ॥३॥

अर्थ

देवा माझे मन फार चपळ आहे ते निश्चिंत एका ठिकाणी राहत नाही ,एक घडी काय एक क्षण स्थिर राहत नाही. त्यामुळे हे नारायणा तू माझ्या विषयी उदास होऊ नकोस मी दिन आहे त्रासलेलो आहे त्यामुळे तु माझ्याकडे लवकर धाव घे. देवा माझे इंद्रिय माझ्या मनाचेच ऐकतात व माझे मन विषयाकडे ओढ घेते त्यामुळे माझ्या चित्ताची त्यांनी तडातोड केली आहे. तुकाराम महाराज म्हणतात तेव्हा आता ह्या मनापुढे माझे काहीही चालत नाही आता तुच ह्या मनाला हरी नामाची ओढ लावुन एका ठिकाणी चित्त स्थिर करशील अशी अपेक्षा मी तुझ्यापाशी धरून राहिलो आहे.


अभंग क्र.१७५६
मागतियाचे दोनचि कर । अमित भांडार दातियाचें ॥१॥
काय करूं आतां कासयांत भरूं । हा मज विचारु पडियेला ॥ध्रु.॥
एकें सांठवणें प्रेमें वोसंडलीं । जिव्हा हे भागली करितां माप ॥२॥
तुका म्हणे आतां आहे तेथें असो । अंकुनियां बैसों पायांपाशीं ॥३॥

अर्थ

दान देणाऱ्याला दोनच हात आहेत परंतु दात्याच्या घरी अमीत प्रेम रुपी भांडार भरलेले आहे. आता मी काय करू तुझे प्रेम रुपी दान कशात भरू हा विचारच मला पडलेला आहे. अंतकरण तुझ्या भक्ती प्रेमाने भरलेले आहे आणि ते ओसंडून वाहत आहे आणि जिव तर तुझ्या नामाचा जप करता करताच थकला आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी जसा आत्ता आहे तसाच राहतो तुझा आज्ञाधारी दास बनवून तुझ्या पायापाशी राहतो.


अभंग क्र.१७५७
जिचें पीडे बाळ । प्राण तियेचा विकळ ॥१॥
ऐसा मातेचा स्वभाव । सूत्र दोरी एक जीव ॥ध्रु.॥
सुखाची विश्रांती । उमटे मातेचिये चित्तीं ॥२॥
तुका म्हणे संत । तुम्ही बहु कृपावंत ॥३॥

अर्थ

मातेच्या बाळाला पीडा होते त्रास होते त्यावेळी त्या मातेचा प्राण विकळ होतो. असा मातेचा स्वभावच असतो जोडलेल्या दोरीप्रमाणे दोन दोरी एकत्र असाव्यात त्याप्रमाणे त्यांचा एकजीव झालेला असतो.बाळाला सुख विश्रांती मिळाली की ते चिन्ह आपोआप मातेच्या चित्तामध्ये उमटतात. तुकाराम महाराज म्हणतात हे संतजन हो तुम्ही ही त्या मातेप्रमाणे कृपावंत आहात.


अभंग क्र.१७५८
यावें माहेरास । हेच सर्वकाळ आस ॥१॥
घ्यावी उच्छिष्टाची धणी । तीर्थ इच्छी पायवणी ॥ध्रु.॥
भोग उभा आड । आहे तोंवरीच नाड ॥२॥
तुका म्हणे देवें । माझें सिद्धी पाववावें ॥३॥

अर्थ

संत हे माझे मायबाप आहेत व त्यांच्याकडे माहेरास यावे हीच आस मला सर्व काळ आहे. मग त्यांच्या माहेराला जाऊन अन्न सेवन करावे व त्यांच्या चरणाचे तीर्थ घ्यावे हीच माझी इच्छा आहे. जोपर्यंत माझ्या पापाचे व प्रारब्धाचे भोग आहेत तोपर्यंत ते पाप संत दर्शनास आड येणारच आहेत. तुकाराम महाराज म्हणतात आता देवानेच माझी इच्छा पूर्ण करावी आणि संतांची भेट मला घडवावी.


अभंग क्र.१७५९
लेंकराचें हित । वाहे माउलीचें चित्त ॥१॥
ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभाविण प्रीती ॥ध्रु.॥
पोटीं भार वाहे । त्याचें सर्वस्व ही साहे ॥२॥
तुका म्हणे माझें । तुम्हां संतां ओझें ॥३॥

अर्थ

आपल्या लेकराचे हित कशात आहे या विषयीची चिंता माऊलीचे चित्त त्या आईचे चित्तच वाहत असते. अशी ही कळवळयाची जात आहे कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता प्रेम करत असते. अशी ही विलक्षण जात असणारी माता नऊ महिने त्या मुलाला पोटात वाढवते व त्याचा सर्व त्रास सहन करते. तुकाराम महाराज म्हणतात की हे संत जन हो माझे सर्व परमार्थिक ओझे तुमच्यावरच आहे.


अभंग क्र.१७६०
आम्हां गांजी जन । तरि कां मेला नारायण ॥१॥
जाली पोरटीं निढळें । नाहीं ठाव बुड आळें ॥ध्रु.॥
आह्मीं जना भ्यावें । तरि कां न लाजिजे देवें ॥२॥
तुका म्हणे देश । जाला देवाविण ओस ॥३॥

अर्थ

आम्हाला हे लोक फार त्रास देतात मग यावरून असे वाटते आमचा नारायण मेला की काय? आता आम्ही पोरके झालो आहोत दरिद्री कुल हिन झालो आहोत आम्हाला कोठेही ठावठिकाणा नाही असे झाले आहे. आम्ही लोकांना भ्यावे मग आमचा रक्षक नारायण याला लाज का वाटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आता असे वाटायला लागले आहे की हा देश देवा वाचुन ओस झाला आहे.


अभंग क्र.१७६१
तुम्ही पाय संतीं । माझे ठेवियेले चित्तीं ॥१॥
आतां बाधूं न सके काळ । जालीं विषम शीतळ ॥ध्रु.॥
भय नाहीं मनीं मनीं । देव वसे घरीं रानीं ॥२॥
तुका म्हणे भय । आम्हां स्वप्नीं तेही नये ॥३॥

अर्थ

हे संत जन हो तुम्ही तुमचे पाय माझ्या चित्तामध्ये ठेवले आहेत. आता त्यामुळे मला काळ भेदू शकणार नाही व माझे सर्व प्रकारचे विषय शांत झाले आहेत. आता घरात व रानात देवच वसलेला आहे त्यामुळे माझ्या मनात कसल्याही प्रकारचे भय राहिलेले नाही. तुकाराम महाराज म्हणतात आता स्वप्नात देखील मला कसल्याही प्रकारचे भय राहिलेले नाही.


अभंग क्र.१७६२
काळाचे ही काळ । आम्ही विठोबाचे लडिवाळ ॥१॥
करूं सत्ता सर्वां ठायी । वसों निकटवासें पायीं ॥ध्रु.॥
ऐसी कोणाची वैखरी । वदे आमुचे समोरी ॥२॥
तुका म्हणे बाण । हातीं हरीनाम तीक्षण ॥३॥

अर्थ

आम्ही विठोबाचे लाडके आहोत त्यामुळे आम्ही काळाचेही काळ आहोत. आता आम्ही सर्वत्र आमचीच सत्ता करू आणि भक्तिभावपूर्वक या विठोबाच्या पायाच्या ठिकाणीच राहू. अशी कोणाची वाणी आहे की आमच्या समोर अमाच्या विरोधात बोलेल? तुकाराम महाराज म्हणतात कारण आमच्या हातात हरीनाम रूपी तीक्ष्ण बाण आहे.


अभंग क्र.१७६३
जन्मा येऊन उदार जाला । उद्धार केला वंशाचा । मेळवूनि धन मेळवी माती । सदा विपत्ती भोगीतसे ॥१॥
नाम घेतां न मिळे अन्न । नव्हे कारण देखिलिया । धर्म करितां ऐके कानीं । बांधे निजोनि डोकियासी ॥ध्रु.॥
घरा व्याही पाहुणा आला । म्हणे त्याला बरें नाहीं । तुमचे गावीं वैद्य आहे । बैसोनि काय प्रयोजन ॥२॥
उजवूं किती होतिल पोरें । मरतां बरें म्हणे यांसी । म्हणऊनि देवा नवस करी । दावी घरींहुनि बोनें ॥३॥
पर्वकाळीं भट घरासी आला । बोंब घाला म्हणे पोरां । तुमचा उणा होईल वांटा । काळ पिठासी आला ॥४॥
दाढी करितां अडका गेला । घरांत आला बाइलेपें । म्हणे आतां उगवीं मोडी । डोई बोडीं आपुली ॥५॥
तीर्थ स्वप्नीं नेणें गंगा । पूजन लिंगा गांविंचिया । आडकुनि दार बैसे दारीं । आल्या घर म्हणे ओस ॥६॥
माझ्या भय वाटे चित्तीं । नरका जाती म्हणोनि । तुका म्हणे ऐसे आहेत गा हरी। या ही तारीं जीवांसी ॥७॥

अर्थ

महाराज या अभंगामध्ये एका श्रीमंत पण नास्तिक आणि कंजूष असलेला व्यक्तीचे वर्णन करतात ते म्हणतात हा मनुष्य जन्माला येऊन फार उदार झाला आणि याने आपल्या वंशाचाही उद्धार केला. ते म्हणजे कसे माहित आहे का? याने पुष्कळ धन संपत्ती मिळवली आणि मातीत पुरून ठेवली आणि सदा सर्व काळ उभे आयुष्य भिकाऱ्या सारखेच भोगीत राहिला. अशा कंजूस व्यक्तीचे नाव जरी घेतले तरी दिवसभर अन्न मिळणार नाही व कसल्याही प्रकारचे काम होणार नाही. दुसऱ्याने कोणीही दानधर्म केले असेल असे याने कानाने ऐकले तरी याचे डोके दुखते मग तो डोक्याला फडके बांधुन झोपतो. याच्या घरी जर त्याचा व्याही पाहुणा म्हणून आला तर तो म्हणतो तुमच्या जावयाला बरे नाही त्यामु�


अभंग क्र.१७६४
जाणे वर्तमान । परि तें न वारे त्याच्याने ॥१॥
तो ही कारणांचा दास । देव म्हणवितां पावे नास ॥ध्रु.॥
वेची अनुष्ठान। सिद्धी कराया प्रसन्न ॥२॥
तुका म्हणे त्याचें । मुद्दल गेलें हाटवेचें ॥३॥

अर्थ

एखाद्या ज्योतिषाला वर्तमान जरी माहीत असले तरी केलेल्या कर्मापासून दुःख त्याला टाळता येत नाहीत. कारण तोही कर्मभोगाचा दास आहे त्याने देवाचे नाव आपल्या मुखवाटे उच्चारले तर त्याच्या कर्म भोगाचा नाश ही होईल. एखादा तपस्वी अष्टमहासिद्धी प्राप्त करण्याकरता तप करतो असे असले तरी त्याला आपल्या कर्मयोगाचे फळ भोगावेच लागते. तुकाराम महाराज म्हणतात असे लोक अनुष्ठान करतात परंतु या भवनदितील विषयांची खरेदी करण्यातच त्यांचे मुद्दलरुपी आयुष्य व्यर्थ जात असते.


अभंग क्र.१७६५
घातला दुकान । पढीये तैसा आहे वान ॥१॥
आम्ही भांडारी देवाचे । द्यावें घ्यावें माप वाचे ॥ध्रु.॥
उगवूं जाणों मोडी । जाली नव्हे त्याची जोडी ॥२॥
तुका म्हणे पुडी । मोल तैसी खरी कुडी ॥३॥

अर्थ

आम्ही परमार्थ रुपी दुकान टाकले आहे. आणि ज्याला जसा माल पाहिजे आहे तसा येथे उपलब्ध आहे. आम्ही देवाचे खजिनदार आहोत व आम्ही आमच्या मुखाने हरी नामाचे माप देतो व घेतो. आम्ही प्रत्येकाचे मन स्पष्टपणे जाणू शकतो आणि ज्याला हरिनाम संपत्तीची प्राप्ती झाली नाही त्याला ती प्राप्त करून देण्याचे कामही आम्ही करत असतो. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या दुकानात जो जसा मोल देईल त्या प्रकारचा खरा, खोटा माल आम्ही त्याला देतो अर्थात ज्याचा जसा अधिकार असेल तसा त्याला उपदेश करतो.


अभंग क्र.१७६६
सादाविलें एका । सरें अवघियां लोकां ॥१॥
आतां आवडीचे हातीं । भेद नाहीं ये पंगती ॥ध्रु.॥
मोकळी च पोतीं । नाहीं पुसायाची गुंती ॥२॥
तुका म्हणे बरा । आहे ढसाळ वेव्हारा ॥३॥

अर्थ

मी सर्व लोकांना आग्रह करून सांगितले आहे, की आमच्या दुकानांमध्ये ज्याला जसा मला आवडतो तसा त्याच्या हातात मिळेल इथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव आम्ही करत नाही. आम्ही आमच्या परमार्थाच्या दुकानांमध्ये परमार्थाने भरलेलले पोते बांधून न ठेवता मोकळे ठेवले आहे मग त्यातील माल कोणीही घ्यावा कोणालाही विचारण्याची काहीच गुंतागुंत येथे नाही. तुकाराम महाराज म्हणतात परमार्थाच्या व्यवहारांमध्ये कोणताही माल कोणास देण्यास आमचा हात अगदी सरळ आहे.


अभंग क्र.१७६७
तडामोडी करा । परि उत्तम तें भरा ॥१॥
जेणें खंडे एके खेपे । जाय तेथें लोभें वोपे ॥ध्रु.॥
दाविल्या सारिखें । मागें नसावें पारिखें ॥२॥
मागें पुढें ॠण । तुका म्हणे फिटे हीण ॥३॥

अर्थ

लोकहो तुमच्याजवळ असलेल्या इंद्रियाचे किडूक-मिडूक जे काही असेल ते सर्व हरीला द्या आणि त्याबदल्यात हरी कडून चांगला उत्तम प्रकारचा परमार्थिक माल भरून घ्या. या हरी ने दिलेला माल असा आहे की ज्याने तुम्ही एकाच जन्मामध्ये अनेक जन्माचे येरझार खंडित कराल तुम्ही जिथे जाल तिथे या मालाला मोठी किंमत राहील. परमार्थामध्ये तुम्ही सुरुवातीला जशी सात्विक वागणूक दाखवली आहे तसीच कायमस्वरूपी असावी नंतर वागणुकीत बदल करू नये. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही जर परमार्थामध्ये चांगल्याप्रकारे राहाल तर तुमचे मागचे संचित कर्म ,पुढे होणारे कर्म याचे सर्वाचे ऋण फिटुन जाईल अर्थात तुम्ही मुक्त व्हाल.


अभंग क्र.१७६८
नसावें ओशाळ । मग मानिती सकळ ॥१॥
जाय तेथें पावे मान । चाले बोलिलें वचन ॥ध्रु.॥
राहों नेदी बाकी । दान ज्याचें त्यासी टाकी ॥२॥
होवा वाटे जना । तुका म्हणे साठीं गुणां ॥३॥

अर्थ

जो कोणाचाही निंदा करत नसतो त्याला सगळे लोक चांगले म्हणतात. तो जेथे जाईल तेथे तेथे त्याला मानसन्मान मिळतो आणि तो जसे बोलेल तसेच लोक वागतात. तो कोणाचीही बाकी ठेवत नाही आणि जर एखाद्याची बाकी राहिली तर त्याचे तो पटकन दान देऊन टाकतो. तुकाराम महाराज म्हणतात त्याच्या याच गुणामुळे लोकांना त्याची आवड लागते.


अभंग क्र.१७६९
चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती । व्याघ्र हे न खाती सर्प तया ॥१॥
विष तें अमृत अघातें हित । अकर्तव्य नीत होय त्यासी ॥ध्रु.॥
दुःख तें देईल सर्व सुख फळ । होतील शीतळ अग्नीज्वाळा ॥२॥
आवडेल जीवां जीवाचे परी । सकळां अंतरीं एक भाव ॥३॥
तुका म्हणे कृपा केली नारायणें । जाणियेते येणें अनुभवें ॥४॥

अर्थ

ज्याचे चित्त शुद्ध आहे त्याचे शत्रू देखील मित्र होतात व त्याला वाघही खात नाही व साप काही करत नाही.त्याला विष जरी दिले तरी त्याचे अमृत होईल त्याच्यावर आघात जरी कोणी करण्याचा प्रयत्न केला तरी त्यामुळे त्याचे हित होईल त्याच्या हातून अकर्तव्य जरी घडले तरी धर्मनीती प्रमाणे कर्तव्य घडल्यासारखे होईल.दुःख देखील त्याच्या साठी सुखाचे फळ घेऊन येईल त्याच्यासाठी अग्निज्वाला देखील शीतळ होतील.अशा मनुष्या विषयी सर्वांना “हा आपल्या प्राणापेक्षाही आपल्याला प्रिय आहे” असे वाटेल आणि सगळ्यांच्या अंतरंगात त्याच्याविषयी एक विध भक्तिभाव निर्माण होईल.तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारचा अनुभव ज्या माणसाला येईल त्याने हे जाणून घ्यावे “नारायणाने आपल्यावर कृपा केलेली आहे” व निश्चिंत व्हावे.


अभंग क्र.१७७०
लाज वाटे मज मानिती हे लोक । हें तों नाहीं एक माझे अंगी ॥१॥
मोजुनि झिजलों मापाचिया परी । जाळावी हे थोरी लाभाविण ॥ध्रु.॥
कोमळ कंटक तीक्षण अगरीं । पोचट ते वरी अंगकांति ॥२॥
चित्रींचे लेप शृंगारिलें निकें । जीवेंविण फिकें रूप त्याचें ॥३॥
तुका म्हणे दिसें वांयां गेलों देवा । अनुभव ठावा नाहीं तेणें ॥४॥

अर्थ

माझ्या अंगी असा एकही गुण नाही की ज्यामुळे लोकांनी मला मान-सन्मान द्यावा त्यामुळे जेव्हा लोक मला मानसन्मान देतात त्यावेळी मला खूप लाज वाटते.मापा मध्ये वस्तूचे मोजमाप केले जाते आणि हळूहळू ते माप देखील झिजत असते त्याप्रमाणे मी परमार्थ करत आहे,खरेतर हे देव कार्य आहे यामध्ये मला विनाकारणच मोठेपणा मिळत आहे परंतु अशा मोठेपणाला आग लागो.कोवळा काटा दिसण्यास अतिशय तीक्ष्ण वाटतो तजेलदार वाटतो परंतु त्या काट्याला तीक्ष्णता नसते तो पोचट असतो त्यामध्ये कडकपणा नसतो.भिंतीवरील चित्रे अतिशय उत्तम प्रकारे काढलेले असते परंतु त्याच्यामध्ये सजीवपणा नसल्यामुळे ते फीके असते.तुकाराम महाराज म्हणतात देवा अगदी त्याप्रमाणे मला तुझा अनुभव नाही त्यामुळे मी देखील वाया गेलो आहे असेच मला दिसते आहे.


अभंग क्र.१७७१
बोलविसी माझें मुखे । परी या जना वाटे दुःख ॥१॥
जया जयाची आवडी । तया लागीं तें चरफडी ॥ध्रु.॥
कठीण देतां काढा । जल्पे रोगी मेळवी दाढा ॥२॥
खाऊं नये तेंचि मागे । निवारितां रडों लागे ॥३॥
वैद्या भीड काय । अतित्याई जीवें जाय ॥४॥
नये भिडा सांगों आन । पथ्य औषधाकारण ॥५॥
धन माया पुत्र दारा । हे तों आवडे नरका थारा ॥६॥
तुका म्हणे यांत । आवडे ते करा मात ॥७॥

अर्थ

देवा तुला जे वाटत आहे, ते माझ्या मुखाने तू मला बोलण्यास भाग पाडत आहे, परंतु या बोलण्याने काही लोकांना दुःख वाटत आहे. देवा ज्याला ज्या गोष्टीची आवड असते तो त्याच्यासाठीच तो धडपड करत असतो त्याप्रमाणे लोकांना या विषयाची आवड आहे त्यासाठीच ते धडपड करत आहेत. वैद्याने रोगी मनुष्याला कडू कढा करून दिला तर तो मूर्ख रोगी आपले तोंड मिटुन बसतो आणि तो कढा घेत नाही. तो रोगी मनुष्य जे खाऊ नको म्हटले नेमके तो तेच मागतो आणि त्याला जर हे खाऊ नको असे सांगितले तर तो रडू लागतो. वैद्याला कसली भिड आली रोगी मनुष्य बरा होण्यासाठी तो कडू काढा करून देणारच आहे आणि तो रोगी मनुष्य काढा नको म्हणतो या कारणामुळे तो जीवाला मुकतो. वैद्याने कोणत्याही भिडात पडून नये आणि वेगळे काही औषध सांगू नये कारण पथ्यच औषधाला साहाय्य करत असतात. धन,माया,पुत्र,घरदार याची आवड करणे म्हणजे नरकाच्या ठिकाणी आपला थारा निश्चित करणे असेच आहे. तुकाराम महाराज म्हणतात लोक हो मी तुम्हाला चांगले व वाईट हे दोन मार्ग सांगितले आहेत मग तुम्हाला जे आवडेल ते करा कारण देवच माझ्या मुखाने बोलत आहे.


अभंग क्र.१७७२
पतिव्रते आनंद मनीं । सिंदळ खोंचे व्यभिचारवचनीं ॥१॥
जळो वर्म लागो आगी । शुद्धपण भलें जगीं ॥ध्रु.॥
सुख पुराणीं आचारशीळा । दुःख वाटे अनर्गळा ॥२॥
शूरा उल्हास अंगीं । गांढया मरण ते प्रसंगीं ॥३॥
शुद्ध सोनें उजळे अगी । हीन काळें धांवे रंगीं ॥४॥
तुका म्हणे तोचि हिरा । घनघायें निवडे पुरा ॥५॥

अर्थ

‘व्यभिचार करणे वाईट आहे’ असे ऐकताच जी पतिव्रता आहे ती मनापासून आनंदते परंतु शिंदळीच्या(व्यभिचारिण स्त्री) मनाला अशी वचने, असे शद्ब खोचक वाटतात आणि तिला ऐकताना देखील त्रास होतो.तसेच पुराणश्रवण करताना आचारशील व्यक्तीला सुख आणि समाधान लाभते परंतु दुराचारी व्यक्तीला ते दुःख देऊन जाते, त्यांचा जीव घुसमटतो.त्याप्रमाणेच शूर व्यक्ती रणांगण नजरेस पडताच उल्हसित होतो, त्याला रोमांच भरून येते परंतु फक्त शूर पणाच्या वार्ता करणाऱ्या पण मूळचा भित्र्या माणसाला मरण जवळ आल्यासारखे वाटते.शुद्ध सोने देखील आगीतून गेले असता उजळते परंतु हींन मिश्रित खोटा धातू काळवंडतो, त्याचे रूपच पालटते.
तुकाराम महाराज म्हणतात नुसते खोटे शब्द आणि देखावा ह्यांना आग लागो, मनाचा शुद्धपणा हा खरा सर्वात भला.कारण जेव्हा प्रसंग येतो तेव्हा त्याची कसोटी घेतलीच जाते आणि मग खरे काय ते जगासमोर येतेच ज्याप्रमाणे खरा हिरा कितीही घाव घातले असता फुटत नाही, तो आहे तसाच अखंड राहतो.


अभंग क्र.१७७३
चालिती आड वाटा । आणिकां दाविती जे नीटा ॥१॥
न मनीं तयांचे उपकार । नाहीं जोडा तो गंव्हार ॥ध्रु.॥
विष सेवूनि वारी मागें । प्राण जातां जेणें संगें ॥२॥
बुडतां हाक मारी । ठाव नाहीं आणिकां वारी ॥३॥
तुका म्हणे न करीं हिंका । गुण घेऊन अवगुण टाका ॥४॥

अर्थ

स्वतः आडवाटेने गेल्यामुळे ज्याला त्रास होतो व आपल्याला झालेला हा त्रास दुसऱ्याला होऊ नये याकरता जो चांगला मार्ग दाखवतो, मग त्याचे(चांगला मार्ग दाखविणारा) जो उपकार मानत नाही या जगामध्ये त्याच्यासारखा दुसरा महामूर्ख नाही असे समजावे. एखाद्या व्यक्तीने विष घेतले आणि ते त्याच्या प्राणावर बेतले, आणि मग त्याने इतराला समजून सांगितले कि ,असले व्यवहार तुम्ही करू नका याने त्रास होतो तर त्याचेही उपकार मानावेत. स्वतः पाण्यात बुडत असताना जो दुसर्‍याला सांगतो की तुम्ही इथे येऊ नका पाणी येथे खूप खोल आहे. तुकाराम महाराज म्हणतात अशावेळी तो मनुष्य कसाही असला तर तुम्ही हेक्कड पणा करू नका त्या व्यक्तीचे चांगले गुण घेऊन अवगुण बाजूला टाका.


अभंग क्र.१७७४
कुळाचे दैवत ज्याचें पंढरीनाथ । होईन दासीसुत त्याचे घरीं ॥१॥
शुद्ध यातिकुळवर्णा चाड नाहीं । करीं भलते ठायीं दास तुझा ॥ध्रु.॥
पंढरीस कोणी जाती वारकरी । होईन त्यांचे घरीं पशुयाति ॥२॥
विठ्ठलचिंतन दिवसरात्रीं ध्यान । होईन पायतन त्याचे पायीं ॥३॥
तुळसीवृंदावन जयाचे अंगणीं । होइन केरसुणी त्याचे घरीं ॥४॥
तुका म्हणे हाचि भाव माझ्या चित्तीं । नाहीं आणिकां गती चाड मज ॥५॥

अर्थ

ज्याचे कुळदैवत पंढरीनाथ आहे मी त्याच्या घरी दासीचा पुत्र देखील होऊन राहील. देवा मला शुद्ध जाती, शुद्ध कुळ किंवा शुद्ध वर्णाची आवड नाही मला तू कोणत्याही जातीत कोणत्याही कुळात व कोणत्याही वर्गात जन्माला घाल परंतु तुझा दास करून घे देवा.जे कोणी वारकरी होऊन पंढरीस जाईल त्यांच्या घरी मी पशु देखील होऊन राहील. जे कोणी विठ्ठलाचे चिंतन रात्रंदिवस करतील विठ्ठलाचे ध्यान करतील त्यांच्या पायातील पायताण होऊन मी राहील. ज्यांच्या अंगणामध्ये तुळशीचे वृंदावन आहे त्यांच्या दारातील केरसुनी देखील मी होईल. तुकाराम महाराज म्हणतात देवा हीच एक इच्छा माझ्या मनात आहे इतर कोणत्याही गोष्टीची आवड माझ्या मनात नाही.


अभंग क्र.१७७५
चंदनाचे गांवीं सर्पांच्या वसति । भोगिते ते होती द्वीपांतरीं ॥१॥
एका ओझें एका लाभ घडे देवा । संचिताचा ठेवा वेगळाला ॥ध्रु.॥
क्षीराची वसति अशुद्ध सेवावें । जवळी तें जावें भोगें दुरी ॥२॥
तुका म्हणे ऐसी बुद्धि ज्याची जड । त्याहुनि दगड बरे देवा ॥३॥

अर्थ

चंदनाच्या वनांमध्ये सर्पाची वस्ती असते परंतु जे खरच चंदनाच्या सुगंधाचा भोग घेणारे इच्छुक असतात ते लांब राहत असले तरी तेथे येऊन त्याचा सुगंध घेतात. देवा एकाने एखाद्या मालाचे ओझे वाहावे व त्याच मालाचा आनंद दुसऱ्याने घ्यावा असे घडणे म्हणजे केवळ संचिताचे भोग आहेत. गाईच्या स्तनामध्ये गोचीड चिटकलेला असतो परंतु गाईचे दूध ते पीत नाही रक्त पिते आणि दूर असलेले लोक त्या गाईचे शुध्द दूध पितात व भोग घेतात. तुकाराम महाराज म्हणतात देवा ज्याच्याजवळ चांगली वस्तू आहे त्याचा वापर त्याला करता येत नाही अशी ज्याची बुद्धी जड आहे त्यापेक्षा मग दगड बरा आहे देवा.


अभंग क्र.१७७६
अवघिया चाडा कुंठीत करूनि । लावीं आपुलीच गोडी । आशा मनसा तृष्णा कल्पना ।
करूनियां देशधडी । मीतूंपणापासाव गुंतलों मिथ्या । संकल्प तो माझा तोडीं ।
तुझिये चरणीं माझे दोन्ही पक्ष । अवघी करुनि दाखवीं पिंडी रे रे ॥१॥
माझें साच काय केलें मृगजळे । वर्णा याती कुळ अभिमान । कुमारी भातुकें खेळती कवतुकें । काय त्यांचें साचपण ॥ध्रु.॥
वेगळाल्या भावें चित्त तडातोडी । केलों देशधडी मायाजाळें । गोत वित्त माय बाप बहिणी सुत ।
बंधुवर्ग माझीं बाळें । एका एक न धरी संबंध पुरलिया । पातलिया जवळी काळें ।
जाणोनियां त्याग सर्वस्वें केला। सांभाळीं आपुलें जाळें ॥२॥
एकां जवळी धरी आणिकां अंतरीं । तीं काय सोयरीं नव्हतीं माझीं । एकांचे पाळण एकांसी भांडण ।
चाड कवणिये काजीं । अधिक असे उणें कवण कवण्या गुणें । हे माव न कळेचि तुझी ।
म्हणोनि चिंतनीं राहिलों श्रीपती । तुका म्हणे भाक माझी ॥३॥

अर्थ

देवा सर्व विषयाबद्दलची माझी आवड आता नाहीशी करून मला तू तुझीच आवड लाव. देवा माझ्या मनातून तू आशा,मनस,तृष्णा,संकल्पना या सर्व काढून देशो धडीला लाव. देवा मी ‘मी तू’ पणाच्या व्यर्थ जाळ्यांमध्ये गुंतलो आहे आता तो भ्रम तु तोडून टाक देवा. अरे देवा माझे मन व बुद्धी तुझ्या चरणी स्थीर होऊ दे तूच माझ्या देहामध्ये वास्तव्य करीत आहे असाच अनुभव मला येऊ द्यावा. माझे खरे स्वरूप काय आहे ते या भवसागरातील मृगजळाने माझ्यापासून लपवून ठेवले आहे आणि मी व्यर्थ वर्ण जाती कुळ याचा अभिमान धरून राहिलो आहे. लहान मुले भातूकलीचा खेळ खेळतात परंतु हा त्यांचा खेळ खरा आहे काय? वेगवेगळ्या भावनेने माझ्या चित्ताची ताडातोड केली असून मा�


अभंग क्र.१७७७
आणिकां छळावया जालासी शाहाणा । स्वहिता घातले खानें । आडिके पैके करूनि सायास ।
कृपणें सांचलें धन । न जिरे क्षीर श्वानासी भिक्षतां । याती तयाचा गुण ।
तारुण्यदशे अधम मातला । दवडी हात पाय कान ॥१॥
काय जालें यांस वांयां कां ठकले । हातीं सांपडलें टाकीतसे ।
घेउनि स्फटिकमणी टाकी चिंतामणी । नागवले आपुले इच्छे ॥ध्रु.॥
सिद्धीं सेविलें सेविती अधम । पात्रासारिखे फळ । सिंपिली मोतीं जन्मलें स्वातीचे ।
वरुषलें सर्वत्र जळ । कापुस पट नयेचि कारणा । तयास पातला काळ ।
तें चि भुजंगें धरिलें कंठीं । मा विष जालें त्याची गरळ ॥२॥
भिक्षूनि मिष्टान्न घृतसाकर । सहित सोलुनि केळें । घालुनियां घसां अंगोळिया ।
हाते वांती करू बळें । कुंथावयाची आवडी ओवा । उन्हवणी रडवी बाळें ।
तुका म्हणे जे जैसें करिती । ते पावती तैसींच फळें ॥३॥

अर्थ

काही मनुष्य दुसऱ्याला त्रास देण्याकरता छळवन्याकरता शहाणे झाले आहेत आणि परंतु ते स्वहिताचा नाश करून घेतात. कंजूस मनुष्याने खूप कष्ट करून पैसा अडका धन साठविले, कुत्र्याला जास्त दूध पाजले तर तो वानटी करून बाहेर टाकतो कारण ते त्याला पचत नाही तो त्याच्या जातीचाच गुण आहे . त्या प्रमाणे तारुण्य अवस्थेत एखांदा अधम मजल्या सारखा वागतो हात पाय कान इत्यादी इंद्रियांचा तो गैरवापर करतो. या लोकांना काय झाले हे लोक का असे वागतात कोणास ठाऊक कारण एवढा अनमोल रत्नासारखा देह आपल्या हातात सापडला आहे त्याचा वापर न करता व्यर्थ टाकून देतात. हे मूर्ख लोक आपल्या इच्छे मुळेच नागवले जातात. सिद्ध मनुष्याने अन्नसेवन केले व त्याचे उष्टे जर एखाद्या अधम मनुष्याने सेवन केले तर त्याच्य�


अभंग क्र.१७७८
तुज दिलें आतां करीं यत्न याचा । जीवाभाव वाचाकायामन ॥१॥
भागलों दातारा सीण जाला भारी । आतां मज तारीं शरणागता ॥ध्रु.॥
नेणतां सोसिली तयाची आटणी । नव्हतां ही कोणी कांहीं माझीं ॥२॥
वर्म नेणें दिशा हिंडती मोकाट । इंद्रियें सुनाट दाही दिशा ॥३॥
वेरझारीफेरा सिणलों सायासीं । आतां हृषीकेशी अंगिकारीं ॥४॥
तुका म्हणे मन इंद्रियांचे सोई । धांवे यासी काई करूं आतां ॥५॥

अर्थ

देवा मी तुला माझा जीव भाव काया-वाचा-मन सर्व काही अर्पण केले आहे तुच प्रयत्न करून यांचे रक्षण कर. हे दाता मी या भव सागरातील कर्म करून करून फार थकलो आहे या गोष्टीचा मला शीन झाला आहे त्यामुळे मी तुला शरण आलो आहे आता तु मला भवसागरातून तार. माझे येथे कोणीही नसताना मी त्यांच्यासाठी आजपर्यंत खूप अटाआटी केली आहे. देवा मला तुझ्या भक्तीचे खरे वर्म समजले नाही त्यामुळे माझे इंद्रिय आता दाही दिशेला मोकाट फिरत सुटले आहेत. मी या जन्म मरण रुपी फेऱ्यांमध्ये मध्ये खूप शिणलो आहे मला खूप त्रास झाला आहे त्यामुळे हे ऋषिकेशा आता तुम्ही माझा अंगिकार करा. तुकाराम महाराज म्हणतात माझे मन देखील इंद्रियाच्या सोबत विषयाकडे धाव घेत आहेत त्यामुळे हे देवा मी आता काय करू ते तुम्हीच मला सांगा.


अभंग क्र.१७७९
स्वयें पाक करी । संशय तोचि धरी । संदेहसागरीं । आणीक परी बुडती ॥१॥
जाणे विरळा एक । जालें तेथींचे हें सुख । देखिले बहुतेक । पुसतां वाट चुकले ॥ध्रु.॥
तोचि जाणे सोंवळें । शोधी विकल्पाचीं मुळें । नाचती पाल्हाळें । जे विटाळें कोंडिले ॥२॥
तोचि साधी संधी । सावध त्रिकाळ जो बुद्धी । संदेहाचा संधी। वेठी आणिक धरियेले ॥३॥
अखंड ते ध्यान । समबुद्धि समाधान । सोंग वांयांविण । ते झांकून बैसती ॥४॥
करणें जयासाठी । जो नातुडे कवणे आटी । तुका म्हणे साठी । चित्तवित्तेंवांचूनि ॥५॥

अर्थ

जो स्वतः स्वयंपाक करतो व तोच नंतर म्हणतो की या स्वयंपाकामध्ये काही विष वगैरे तर पडले नाही? त्याच्या या संशयाच्या सागरांमध्ये जी जेवणासाठी इतर लोक आलेले असतात ते ही बुडतात. हरीचे सुख कशात आहे हे जाणनारा एखादाच असतो. एरवी परमार्था मध्ये तुम्ही हरीचे ज्ञान अनुभवले आहेत काय असे विचारणारे व वाट चुकलेले खूप लोक पाहिले आहेत. सोवळे म्हणजे काय हे केवळ कोण जाणते तर जो आपल्या चित्ता मधून विकल्पाचे मूळ जी अविद्या आहे तिचा शोध करून नाश करतो त्यालाच सोवळे म्हणजे काय माहित असते. आणि जे केवळ वर वर सोवळ्याचे सोंग आणून नाचत असतात तेच खरे, विटाळाने कोंडून गेलेले असतात. जो बाल्य तारुण्य आणि वृद्ध अवस्थेमध्ये आपली बुद्धी जपतो तोच हरित ज्ञानाची संधी साधत असतो. आणि जे संदेहाच्या जाळ्यात अडकतात ते लोक कर्तुत्व आणि वक्तृत्वाचा जाळ्यात अडकतात. सर्वत्र समान बुद्धी ठेवणे व समाधानी राहणे हेच खरे अखंड ध्यान आहे.आणि जे लोक डोळे झाकून ध्यानाला बसण्याचे सोंग करतात त्यांचे असे वागणे व्यर्थं आहे. तुकाराम महाराज म्हणतात जे हर�


अभंग क्र.१७८०
माझिया संचिता । दृढ देखोनि बळिवंता । पळसी पंढरिनाथा । भेणे आतां तयाच्या ॥१॥
तरि मज कळलासी । नव्हतां भेटी जाणीवेसी । एका संपादिसी । मान करिसी येकाचा ॥ध्रु.॥
तरि हें प्रारब्ध जी गाढें । कांहीं न चले तयापुढें । काय तुज म्यां कोंडें । रें सांकडें घालावें ॥२॥
भोगाधीपति क्रियमाण । तें तुज नांगवे अजून । तरि का वांयांविण । तुज म्यां सीण करावा ॥३॥
तुज नव्हतां माझें कांहीं । परि मी न संडीं भक्तीसोई । हो कां भलत्या ठायीं । कुळीं जन्म भलतैसा ॥४॥
तूं भितोसि माझिया दोषा । कांहीं मागणें ते आशा । तुका म्हणे ऐसा । कांहीं न धरीं संकोच ॥५॥

अर्थ

हे देवा माझे संचित अतिशय बलवंत आहे हे पाहूनच तु,हे पंढरीनाथा भिऊन पळून जात आहेस की काय? माझे कोणत्याही प्रकारचे भले न करता.देवा पूर्वी तुझी व माझी भेट नव्हती त्यामुळे तु मला कळत नव्हता परंतु आता तू मला चांगला कळला आहेस.परंतु हे देवा आता मला चांगले समजले आहे की तू स्वतःला पतितपावन म्हणून तुझी ब्रीद सर्वत्र मिरवत आहे व दुसरीकडे माझे संचित कर्म अतिशय बलवंत आहे त्यामुळे माझा उद्धार करता येणार नाहीये असेही सांगत आहेस.ठीक आहे देवा माझे प्रारब्ध बलवंत आहे त्याच्यापुढे तुझे काही ही चालत नाही.असे जर असेल तर मग मी तरी तुला उगाच संकटात का टाकावे कशाला तुला कोड्यात ढकलून द्यावे.हे सर्व भोगाचे भोग घेणाऱ्या देवा माझे क्रियामान अजूनही तुझ्या स्वाधीन होत नाही,तर हे देवा मी तुला व्यर्थच त्रास का द्यावा. देवा तुझ्या चरणी माझे हित होत नसेल तरी काही हरकत नाही पण मी भक्तिमार्ग काही सोडणार नाही.मग माझा जन्म जरी भलत्या कुळात, भलत्या ठिकाणी कोठेही झाला तरी


अभंग क्र.१७८१
लोकमान देहसुख । संपित्तउपभोग अनेक । विटंबना दुःख । तुझिये भेटीवांचूनि ॥१॥
तरी मज ये भेट ये भेट । काय ठाकलासी नीट । थोर पुण्यें वीट । तुज दैवें चि लाधली ॥ध्रु.॥
काय ब्रम्हज्ञान करूं कोरडें । रितें मावेचें मापाडें । भेटीविण कुडें । तुझिये अवघें मज वाटे ॥२॥
आत्मिस्थतीचा विचार । काय करूं हा उद्धार। न देखतां धीर । चतुर्भुज मज नाहीं ॥३॥
रिद्धीसिद्धी काय करूं । अथवा अगम्य विचारू । भेटीविण भारु । तुझिये वाटे मज यांचा ॥४॥
तुजवांचूनि कांहीं व्हावें । ऐसें नको माझिया जीवें। तुका म्हणे द्यावें । दरूषन पायांचें ॥५॥

अर्थ

देवा लोकांपासून मिळालेला मान देहाला विविध प्रकारचे सुखावणारे साधने संपत्ती व अनेक प्रकारचे भोग, ही सर्व साधने तुझ्या भेटी म्हणजे वाचूनच विटंबनाच आहे, तूझी भेट झाली नाही तर मला दुखच होते. त्यामुळे हे हरी तु मला भेटण्यासाठी लवकर ये असा काय एकाच जागेवर विटेवर उभा ठाकलास? अरे देवा तु ज्या विटेवर उभा आहेस ना ती विट केवळ आमचा पुण्यामुळे तुला भेटली आहे. देवा तुझ्या भेटी वाचून नुसतेच कोरडे ब्रम्‍हज्ञान घेऊन तरी काय करू ते म्हणजे एक प्रकारचे मायेचे कोरडे मापच आहे. तुझ्या भेटी वाचुन हे सर्व व्यर्थ आहे असेच मला वाटते. देवा तुझी भेटच झाली नाही तर मग नुसते विचार करून तरी काय करू आणि कदाचित माझा उद्धार झाला तरीही त्याचे मी काय करू? देवा मला आता तुझे चतुर्भुज रुप पाहिल्याशिवाय धीर धरवत नाही. रिद्धी सिद्धी घेऊन मी काय करू आणि वेदशास्त्र चा विचार करून तरी मला काही उपयोग आहे का? कारण देवा मला तुझ्या भेटी वाचून या सर्व गोष्टींचा भार वाटत आहे. तुकाराम महाराज म्हणतात दे


अभंग क्र.१७८२
तुझा म्हणवून तुज नेणें । ऐसें काय माझें जिणें ॥१॥
तरि मज कवणाचा आधार । करोनियां राहों धीर ॥ध्रु.॥
काय शब्दाचि ऐकिला । भेटी नव्हतां गा विठ्ठला ॥२॥
तुका म्हणे आतां । अभय देई पंढरिनाथा ॥३॥

अर्थ

देवा मी स्वतःला तुझा म्हणून घेतो परंतु तुझ्या स्वरूपाचे ज्ञान अजून मला झाले नाही, असे काय माझे जगणे आहे.देवा तुझ्या वाचून मला कोणाचा आधार आहे मी कोणाच्या आधाराने धीर धरून राहू, तूच सांग?हे विठ्ठला तुझ्या भेटी वाचून केवळ “तू सर्वव्यापी आहेस” असे शब्द मी ऐकले आहे त्याचे काय करावे, पुराणात मी ऐकले आहे तू सर्वव्यापी आहेस पण त्या शब्दाला काय करावे.तुकाराम महाराज म्हणतात हे पंढरीनाथा आता तू लवकर यावे आणि मलाअभयदान द्यावे.


अभंग क्र.१७८३
उद्धवअक्रूरासी । आणीक व्यासआंबॠषी । रुक्मांगदाप्रल्हादासी । दाविलें तें दाखवीं ॥१॥
तरि मी पाहेन पाहेन । तुझे श्रीमुखचरण । उताविळ मन । तयाकारणें तेथें ॥ध्रु.॥
जनकश्रुतदेवा करीं । कैसा शोभलासी हरी । विदुराच्या घरीं । कण्या धरी कवतुकें ॥२॥
पांडवा अकांतीं । तेथें पावसी स्मरती । घातलें द्रौपदी । यागीं बिरडें चोळीचें ॥३॥
करी गोपीचें कवतुक । गाईगोपाळांसी सुख । दावीं तें चि मुख । दृष्टी माझ्या आपुलें ॥४॥
तरि तूं अनाथाचा दाता । मागतियां शरणागतां । तुका म्हणें आतां । कोड पुरवीं हें माझें ॥५॥

अर्थ

देवा उद्धव, अक्रुर, व्यास, अंबऋषी, रुक्मांगद, प्रल्हाद यांना जे रूप तुम्ही दाखवले आहे तेच रूप मला दाखवा.मी तुझे श्रीमुख व तुझे चरण पुन्हा पुन्हा पाहीन.देवा त्याकरताच माझे मन उतावीळ झाले आहे. हे देवा तु जनक राजा व श्रुतदेव यांच्या घरी एकाच वेळी वास केला त्यावेळी तू श्रुतदेवांच्या हातात हात दिला त्यावेळस तू कसा शोभला होतास.आणि तू विदुराच्या घरी कौतुकाने कन्या खातोस.पांडव ज्यावेळी संकटांमध्ये होते त्यावेळी त्यांनी केवळ तुझे एकदाच स्मरण केले व तू देखील त्यांच्या मदतीस लगेच धावून गेलास.राजसू यज्ञ चालू असताना पंगतीमध्ये द्रौपदी भोजन वाढत होती त्यावेळी तिच्या चोळीचे बिरडे सुटले व हे पाहून दुर्योधन व त्याचे सर्व सहकारी द्रोपदीला हसू लागले त्यावेळी तू तिचे चोळीचे बिरडे बांधले.तू गोकुळामध्ये गोपींचे कौतुक करतो व सर्व गाई गोपाळांना तुझे रूप दाखवून सुख देतोस.आता तेच रूप तू माझ्या दृष्टीला दाखव.तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही अनाथांचा नाथ आहात तुम्हाला जे शरण येता�


अभंग क्र.१७८४
मागता भिकारी जालों तुझे द्वारीं । देई मज हरी कृपादान ॥१॥
प्रेम प्रीति नाम उचित करावें । भावें संचरावें हृदयामाजी ॥ध्रु.॥
सर्वभावें शरण आलों पांडुरंगा । कृपाळु तूं जगामाजी एक ॥२॥
तापत्रयें माझी तापविली काया । शीतळ व्हावया पाय तुझे ॥३॥
संबंधीं जनवाद पीडलों परोपरी । अंतरलों दुरी तुजसी तेणें ॥४॥
तुका म्हणे आतां तुझा शरणागता । करावें सनाथ मायबापा ॥५॥

अर्थ

हे हरी मी तुझ्या दारा मध्ये भीक मागणारा भिकारी म्हणून आलो आहे तरी तुम्ही मला कृपादान द्यावे द्यावा. प्रेम आणि प्रीतीने मी तुझे नाम उच्चार करीन असेच उचित कार्य तुम्ही करावे आणि तुम्ही प्रीतिने माझ्या हृदयामध्ये येऊन संचार करावा. हे पांडुरंगा सर्व जगामध्ये तूच एक कृपाळू आहेस त्यामुळे मी सर्वभावे तुला शरण आलो आहे देवा. देवा त्रिविध तापाने माझे संपूर्ण शरीर तापविले आहे आता त्याला शितल करण्यासाठी केवळ तुझे पायच एक उपाय म्हणून बाकी आहे. देह संबंधी आणि लौकीकाच्या मुळेच मी पदोपदी त्रासलो गेलो व त्या कारणाने तुझ्यापासून मी आंतरलो. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुम्हाला शरण आलो आहे त्यामुळे हे मायबापा तुम्ही मला सनाथ करा माझा सांभाळ करा.


अभंग क्र.१७८५
न मनी नाम न मनी त्यासी । वाचाळ शब्द पिटी भासी ॥१॥
भाव नाहीं काय मुद्रा वाणी । बैसे बगळा निश्चळ ध्यानीं ॥ध्रु.॥
नाहीं चाड देवाची कांहीं । छळणें टोंके तस्करघाई ॥२॥
तुका म्हणे त्याचा संग । नको शब्द स्पर्शअंग ॥३॥

अर्थ

जो हरिनामाच मानत नाही मी त्याला मानत नाही त्याच्या वाचाळ शब्दाला कोण किंमत देतो? त्याच्या अंतकरणात मध्ये देवाविषयी भक्ती भावच नाही तो मनुष्य केवळ ध्यानाला बसल्याचे सोंग करतो आणि ध्यान मुद्रा लावून शांत बसून असतो अगदी बगळा जसा मासा पकडण्यासाठी शांत बसलेला असतो तसा. अशा माणसाला देवाविषयी कसल्याही प्रकारची चाड म्हणजे आवड नसते जसा एखादा चोर रस्त्यामध्ये सुईचे टोक दाखवून एखाद्या मनुष्याचे गाठोडे चोरतो त्याप्रमाणे असे नास्तिक मनुष्य परमार्थाचे केवळ सोंग दाखवतात ते केवळ विषयांचे सुख भोगण्यासाठी. तुकाराम महाराज म्हणतात अशा मनुष्याचा संग काय परंतु त्याच्या अंगाचा स्पर्श, एवढेच नव्हे तर त्याने बोललेले शब्द देखील माझ्या कानी पडू नये.


अभंग क्र.१७८६
दिनेदिने शंका वाटे । आयुष्य नेणवतां गाढें ॥१॥
कैसीं भुललीं बापुडीं । दंबविषयांचे सांकडीं ॥ध्रु.॥
विसरली मरण । त्याची नाहीं आठवण ॥२॥
देखत देखत पाहीं । तुका म्हणे आठव नाहीं ॥३॥

अर्थ

अर्थ:–संसारातील लोकांचे आयुष्य बघता, त्यांचा दिनक्रम बघता दिवसेंदिवस माझी या लोकांबद्दल आणि त्यांच्या भविष्याबद्दल शंका वाढत चालली आहे. ही बापुडी प्रापंचिक माणसे या दंभगिरीला किती खोलवर भुलतात याचे मला वाईट वाटते, आयुष्य किती गूढ आहे, मायेने किती भरलेले आहे व त्यातून स्वतःहून बाहेर येणे किती कठीण आहे किंबहुना स्वबळावर बाहेर येणे जवळ जवळ अशक्यप्राय आहे हे माहित नसल्याने ही बिचारी माणसे येथील दांभिक आयुष्याला भुलत चालली आहेत आणि विषयाच्या चक्रव्यूहात अडकत चालली आहेत.अशा या लोकांना मरणाचे स्मरण देखील राहिले नाही उलट माणसाला मरण असते हेच ते विसरली आहेत. तुकाराम महाराज म्हणतात परंतु रोज लोक मृत्युमुखी पडत आहेत, ह्या ना त्या कारणाने त्यांचा अंत होत आहे व कमावलेले सर्व तसेच टाकून त्यांना जावे लागत आहे हे सर्व ही माणसे रोज आपल्या डोळ्यांनी पाहत आहेत परंतु तरीही आयुष्याच्या खऱ्या सत्याचे त्यांना स्मरण नाही किंवा अजूनही कसे होत नाही ह्याचे आश्चर्य वाटते.


अभंग क्र.१७८७
माझें मज आतां न देखें निरसतां । म्हणऊन आधार केला । संसाराची आस सांडुनि लौकिक ।
जीव भाव तुज दिला । नव्हतीं माझीं कोणी मी कवणांचा । आर्त मोहो सांडवला ।
तारीं मारीं करीं भलतें दातारा । होऊन तुझा आतां ठेलों रे ॥१॥
असो माझें कोडें तुज हे सांकडें । मी असेन निवाडें सुखरूप ।
बाळकासी चिंता काय पोटवेथा । जया शिरीं मायबाप ॥ध्रु.॥
पापपुण्यें श्रुति आटल्या । शास्त्रांस न लागेचि ठाव ।
विधिनिषिधें गोविलीं पुराणें वेदांसी तो अहंभाव ।
ओंकाराचें मूळ व्यापिलें माया । तेथें न धरे च भाव ।
म्हणऊन काबाड सांडिलें उपसतां । धरिलें तुझें चि नांव ॥२॥
तनमनइंद्रियें ठेवूनि राहिलों । सर्व आशा तुझे पायीं । तप तीर्थ दान करवूं कवणा हातीं ।
आधीन तें मज काई । आहिक्यें परत्रें चाड नाहीं सर्वथा । जन्म सदा मज देहीं ।
मायामोहपाश करीं विष तैसें । तुका म्हणे माझ्याठायीं ॥३॥

अर्थ

देवा माझा भ्रम मला घालवता आला नाही त्यामुळे मी तुझा आधार घेतो आहे. आता मी सर्व संसाराचे आस सोडून लौकीक टाकून देऊन जीव भाव तुला अर्पण केला आहे. मी कोणाचाही नव्हतो आणि कोणी माझे नव्हते आता जो व्यर्थ मोह होता मी तो सोडून दिला आहे. हे दातारा आता तु मला तार किंवा मार किंवा काहीही कर पण मी मात्र आता तुझा झालो आहे रे देवा. देवा आता मी माझे साकडे तुझ्यावर घातले आहे तूच माझी कोडे सोडव आणि मी तुझ्याच आधाराने सुखरूप राहणार आहे. ज्या बालकाच्या शिरावर त्याच्या आई बापाचे हात आहेत मग त्याला त्याचे पोट भरण्याची चिंता करण्याची काय गरज? देवा श्रुती देखील पापपुण्य सांगतच आटल्या व शास्त्राला देखील तुझा ठाव आजुन लागला नाही. विधीने सिद्ध सा�


अभंग क्र.१७८८
नाम गोड नाम गोड । पुरे कोड सकळ ही ॥१॥
रसना येरां रसां विटे । घेतां घोट अधिक हें ॥ध्रु.॥
आणिकां रसें मरण गांठी । येणें तुटी संसारें ॥२॥
तुका म्हणे आहार जाला । हा विठ्ठला आम्हांसी ॥३॥

अर्थ

हरिनाम अतिशय गोड आहे खूप गोड आहे त्यामुळे सर्व इच्छा पूर्ण होतात. रसना याद्वारे कोणत्याही रसाचा कितीही घोट घेतला कितीही सेवन केले तरी रसना कोणत्याही रसाला कधी ना कधी तरी विटते परंतु हरीचे नामामृत घोट कितीही घेतले तरी रसना विटत नाही अधिकच नामामृताचे घोट घ्यावे असेच वाटते. इतर कोणतेही रस रसने द्वारे घेतले तरी मरण तर येणारच आहे परंतु हरी नामामृत रसना द्वारे सेवन केले तर जन्ममरण रुपी संसार संबंध तुटतो. तुकाराम महाराज म्हणतात आता हे विठ्ठला नाम म्हणजे आमच्यासाठी एक प्रकारचा आहारच झालेला आहे.


अभंग क्र.१७८९
धालों सुखें ढेकर देऊं । उमटे जेवूं तोंवरी ॥१॥
क्रीडा करूं निरांजनीं । न पुरे धणी हरीसवें ॥ध्रु.॥
अवघे खेळों अवघ्यामधीं । डाई न पडों ऐसी बुद्धि ॥२॥
तुका म्हणे वांचविता । आम्हां सत्ता समर्थ ॥३॥

अर्थ

ज्ञानामृत सेवनाने आम्ही तृप्त झालो आहोत .आता सुखाने ढेकर देऊ ;आणि देहावर देखील तृप्ततेची लक्षणे उमटतील तोपर्यंत ज्ञानामृताचे जेवण करू .आता एकांतात बसून निर्गुण हरीच्या अधिष्ठानावर सगुण हरीबरोबर खेळ करू .हा खेळ कितीही खेळला ,तरी तृप्तता होत नाही .या सा-या विश्वात विश्वाशी खेळ खेळू ,पण “जन्म-मरणाच्या डावात सापडणार नाही .” अशी आम्ही अलिप्त बुद्धी ठेवू .तुकाराम महाराज म्हणतात ,शिवाय ,काळापासून आमचे रक्षण करणारा सर्वसत्ताधीश सर्वसमर्थ हरी आहे .


अभंग क्र.१७९०
ऐकल्या नव्हे खेळ चांग । धरिला संग म्हणऊनि ॥१॥
उमटे तेव्हां कळे नाद । भेदाभेद निवडेना ॥ध्रु.॥
दुसऱ्या परी एक ऐसा । वजे रिसा निकुरें ही ॥२॥
तुका म्हणे कळत्यां कळे । येर खेळे खेळ म्हणो ॥३॥

अर्थ

एकट्यानेच आध्यात्मिक खेळ खेळणे चांगले वाटत नाही त्यामुळेच आम्ही वैष्णवांची संगती धरली. वेगवेगळ्या वाद्यातून वेगवेगळी नाद उमटतात परंतु वाद्यांचे प्रकार कळत नाहीत. या आध्यात्मिक खेळामध्ये पहिला जसा खेळाडू असेल तसाच दुसरा एक खेळाडू असावा नाहीतर बळेच जर एखाद्याला ओढून या खेळामध्ये आणले तर त्यांची जोडी जमत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हा खेळ ज्याला कळतो त्यालाच कळतो इतर लोकही हा खेळ खेळतात परंतु त्यांच्यावर जन्म मरणाचे डाव लागतात हा खेळ ज्याला खेळता येतो त्यालाच आम्ही खेळाडू म्हणत असतो.


अभंग क्र.१७९१
बोलविले जेणें । तोचि याचें गुह्य जाणे ॥१॥
मी तों काबाडाचा धनी । जेवूं मागावें थिंकोनि ॥ध्रु.॥
मजुराच्या हातें । माप जालें गेलें रितें ॥२॥
जाला पुरविता । पांडुरंग माझा पिता ॥३॥
मायबापासवें । बाळें कौतुकें खेळावें ॥४॥
जैसा करिती धंदा । तैसा पडोनियां छंदा ॥५॥
त्याच्या साच गाई म्‍हैसी । येणें खेळावें मातीसी ॥६॥
तुका म्हणे बोल । माझा बोलतो विठ्ठल ॥७॥

अर्थ

ज्या हरीने माझ्या मुखातून हे शब्द बोलवले आहे तोच त्या शब्दाचा अर्थ जाणतो आहे. मला केवळ देवाने निरोप सांगायचे काम सांगितले आहे मी ओझे वाहण्याचा धनी आहे आणि जसे लहान मूल रडते व रडून पडून आईला जेवण मागते त्याप्रमाणे मी देवाला जेवण मागत आहे. मी तर केवळ देवाचा मजूर आहे एकदा की मालकाने सांगीतले की ही वस्तू तिथे नेऊन ठेव की मी केवळ ती वस्तू तिथे नेऊन ठेवणार एकदा ते काम झाले तर मापही मोकळे होते आणि मजूरही मोकळा होतो. माझे सर्व इच्छा पूर्ण करणारा पिता माझा पांडुरंग आहे. ज्याप्रमाणे लहान मुलं आपल्या आई-वडिलांबरोबर कौतुकाने खेळ खेळते त्याप्रमाणे आम्ही या हरीबरोबर भक्तीचा खेळ कौतुकाने खेळतो. ज्याप्रमाणे आई वडील जसा धंदा करतात तसा छंद मुलांनाही लागतोच. जसे आई-वडिलांच्या प्रपंचातील गाई म्हशी असतात तसे मुले मातीची गाई म्हशी करून खेळतात. तुकाराम महाराज म्हणतात मी जे काही बोलत आहे ते मी बोलत नसून प्रत्यक्ष विठ्ठलच बोलतो आहे.


अभंग क्र.१७९२
का हो तुम्ही माझी वदविली वाणी । नेदा हे निवडूनि पांडुरंगा ॥१॥
आणीक म्यां कोणां पुसावा विचार । मुळीं संवसार दुराविला ॥ध्रु.॥
स्वामिसेवा ह्मुण घेतली पदरीं । सांगितलें करीं कारण तें ॥२॥
तुका म्हणें नाहीं शिकविलें जेणें । तो याच्या वचनें उगा राहे ॥३॥

अर्थ

हे पांडुरंगा तुम्ही माझी वाणी या अभंग रूपाने का वदवली आहे? मग याच्यातील खरी कारणे देखील तुम्ही का सांगत नाहीत. देवा आम्ही तर आमचा सर्व संसार समोर दूर टाकून दिला आहे मग आता तुम्हीच आमचे सर्व काही आहात आमच्या काही शंका असतील तर आम्ही तुमच्या वाचून कोणाला विचारावे? आम्ही तुमची सेवा करतो कारण तुम्ही आमचे स्वामी आहात आणि तुम्ही सांगितलेले कोणतेही कार्य आम्ही पदरात घेतो तुमची आज्ञा आम्ही पदरात घेतो आणि तुम्ही कोणतेही काम सांगितले की आम्ही ते व्यवस्थित पणे करतो आहोत. तुकाराम महाराज म्हणतात जोपर्यंत आम्हाला हा पांडुरंग शिकवत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्या वचनावर विश्वास ठेवून शांत राहू.


अभंग क्र.१७९३
सेवकासी आज्ञा स्वामीची प्रमाण । जोंवरी हा प्राण जाय त्याचा ॥१॥
आणिकांचा धाक न धरावा मनीं । निरोपावचनीं ढळों नये ॥ध्रु.॥
समय सांभाळूनि आगळें उत्तर । द्यावें भेदी वज्र तपायरी ॥२॥
तुका म्हणे तरी म्हणावें सेवक । खादलें तें हाक अन्न होय ॥३॥

अर्थ

सेवकाला स्वामीची आज्ञा प्रमाण आहे .जोपर्यंत त्याच्या कुडीत प्राण आहे ,एवढेच काय पण प्राण जाण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सेवकाने आज्ञेचे पालन केलेच पाहिजे .स्वामीवाचून इतरांचे भय मनात धरू नये ,व स्वामीच्या आज्ञेप्रमाणे वागण्यात अंतर पडू देऊ नये .कदाचित स्वामीकडून धर्म-नीतीविरूध्द आज्ञा करण्याची चूक घडल्यास वेळप्रसंग पाहून एकान्तात त्यांची भेट घ्यावी ;व वज्र ज्याप्रमाणे पर्वताचा भेद करते ,त्याप्रमाणे त्यांना मार्मिक उत्तरे द्यावीत ;व त्यांना सन्मार्गावर आणावे .तुकाराम महाराज म्हणतात ,इतकी लक्षणे ज्याच्या ठिकाणी असतील ,त्याने स्वतःला ‘ सेवक ‘ म्हणवून घ्यावे ;व त्याने जे स्वामीचे अन्न खाल्ले असेल ,ते त्याच्या ख-या हक्काचे होईल .


अभंग क्र.१७९४
नये पुसों आज्ञा केली एकसरें । आम्हांसी दुसरें नाहीं आतां ॥१॥
ज्याचा तो बळिवंत सर्व निवारिता । आम्हां काय चिंता करणें लागें ॥ध्रु.॥
बुद्धीचा जनिता विश्वाचा व्यापक । काय नाहीं एक अंगीं तया ॥२॥
तुका म्हणे मज होईल वारिता । तरी काय सत्ता नाहीं हातीं ॥३॥

अर्थ

आम्हाला या पांडुरंगाने आता जी आज्ञा केली आहे त्या आज्ञेचे आम्ही काटेकोर पणाने पालन करू पांडुरंगा वाचून दुसरे आम्हाला काहीही आता प्रमाण नाहीये. हरीच्या आज्ञेचे पालन करत असताना आमच्या वर काही संकट आले तर त्या संकटाचे निवारण हरी करील त्याबद्दल आम्हाला चिंता करण्याचे काही कारण नाही? बुद्धीचा जनीता विश्वामध्ये सर्वत्र व्यापून उरणारा असा जो हरि आहे मग त्याच्या अंगामध्ये कोणती ही एक शक्ती नाही सर्वगुणसंपन्न तो असा हरी आहे. तुकाराम महाराज म्हणतात जर माझ्यावर काही संकट आले आणि मी त्याचे निवारण करण्याकरता हरी कडे गेलो आणि हरीने जर मला दूर लोटले तर मी असे म्हणेन की हरी च्या हातात काही सत्ता नाही परंतु तसे आज पर्यंत कधी घडले नाही.


अभंग क्र.१७९५
बळिवंत आम्ही समर्थाचे दास । घातली या कास कळिकाळासी ॥१॥
तेथें मानसाचा कोण आला पाड । उल्लंघोनि जड गेलों आधीं ॥ध्रु.॥
संसाराचे बळी साधिलें निधान । मारिले दुर्जन षडवर्ग ॥२॥
तुका म्हणे एक उरला धरिता ठाव । येर केले वाव तृणवत ॥३॥

अर्थ

आम्ही बलवंत समर्थ हरीचे दास आहोत त्यामुळे आम्ही ही बलवंत झालो आहोत व त्याच बळाच्या जोरावर आणि कळीकाळाला देखील कास घातली आहे. मग तेथे सर्वसामान्य माणसाचा तरी काय पाड आहे आम्ही जडाला देखील उल्लंघुन गेलो आहोत. आम्ही संसाराचा बळी देऊन हरी रूप आणि ध्यान साधले आहे, काम क्रोध मदमत्सर अहंकार हे दुर्जन आम्ही मारले आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता आम्ही हरीच्याच ठिकाणी ठाव धरला आहे बाकी सर्व आम्ही गवताप्रमाणे मानले आहे.


अभंग क्र.१७९६
एक गावें आह्मीं विठोबाचे नाम । आणिकांपें काम नाहीं आतां ॥१॥
मोडूनियां वाटा सूक्ष्म दुस्तर । केला राज्यभार चाले ऐसा ॥ध्रु.॥
लावूनि मृदंग श्रुतिटाळ घोष । सेवूं ब्रम्हरस आवडीनें ॥२॥
तुका म्हणे महापातकी पतित । ऐसियांचे हित हेळा मात्रें ॥३॥

अर्थ

आम्ही केवळ एका विठोबाचेच नाम गाणार आहोत आता या ठिकाणी इतर कोणाचेही काहीच काम नाही. कर्माच्या सूक्ष्म वाटा आणि योगाच्या दुस्तर वाटा मोडून राजाचे चतुरंग सैन्य जेवढे बलाढ्य असतेउ तेवढा मोठा मार्ग आम्ही प्रस्तापित केला. आता आम्ही मृदंग ,विना, स्वरात लावू व टाळाचा घोष करून ब्रम्‍ह रस आवडीने सेवन करू. तुकाराम महाराज म्हणतात कोणी किती ही महा घातकी असो त्यांनी हरीचे नाम श्रद्धेने घेतले तर त्याचे हित व तो जिवनमुक्त तात्काळ होतात.


अभंग क्र.१७९७
वाचा चापल्ये बहु जालों कुशळ । नाहीं बीजमूळ हाता आलें ॥१॥
म्हणोनि पंढरिराया दुखी होतें मन । अंतरींचे कोण जाणे माझें ॥ध्रु.॥
पूज्य जालों अंगा आला अभिमान । पुढील कारण खोळंबलें ॥२॥
तुका म्हणे खूण न कळेचि निरुती । सांपडलों हातीं अहंकाराचे ॥३॥

अर्थ

मी परमार्थामध्ये बोलण्यात फार कुशल झालो परंतु परमार्थाचे जे मुळ बीज आहे तेच माझ्या हाती आले नाही. त्यामुळे हे पांढरीराया माझे मन दुःखी होते माझ्या अंतकरणातील तुझ्या वाचून कोणी जाणणारे आहे काय? देवा परमार्थिक विषयांमध्ये बोलण्याकरता मी फार कुशल झालो त्यामुळे जनमाणसांमध्ये मी पूज्य झालो व त्यामुळे माझ्या अंगी अभिमान निर्माण झाला पण त्याच अभिमानामुळे माझे पुढचे तुझ्या प्राप्तीचे कार्य आहे त्यामध्ये खोळंबा निर्माण झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात मला हरी प्राप्ती करून घेण्याचे खरे वर्म अजूनही कळले नाही परंतु मी अहंकाराच्या हाती सापडलो आहे.


अभंग क्र.१७९८
आतां काढाकाढी करो गा पंढरिनाथा । नाहीं तरी वांयां गेलों दास ॥१॥
जाणतां बैसलों दगडाचे नावे । तिचा स्वभावे प्राण घ्यावा ॥ध्रु.॥
मनाचा स्वभाव इंद्रियांचे ओढी । पतनाचे जोडी वरी हांव ॥२॥
तुका म्हणे जाली अंधळ्याची परी । आतां मज हरी वाट दावीं ॥३॥

अर्थ

हे पंढरीराया आता मला या भवसागरातून वरती काढण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा नाहीतर मी तुमचा दास झालो असून देखील वाया जाईल देवा. मी तर सर्व जाणत असून देखील दगडाच्या नावेत बसलो आहे त्या नावेचा स्वभावच आहे, स्वतःही बुडवावे व दुसऱ्याचाही बुडवून प्राण घ्यावा. इंद्रियांच्या ओढीने जेथे विषय आहेत तेथे धाव घेणे व त्या विषयांकडे धाव घेऊन स्वत:चे पतन करून घेणे हा मनाचा स्वभाव आहे व त्याचीच हाव त्याला होते. तुकाराम महाराज म्हणतात हे हरी माझी गती ही आंधळ्या प्रमाणे झाली आहे आता त्यामुळे तू मला वाट दाखव.


अभंग क्र.१७९९
सज्जन तो शब्द सत्य जो मानी । छळी दुर्जन आणिकांसी ॥१॥
एक गुण तो केला दो ठायीं । ज्याचा त्यास पाहीं जैसा तैसा ॥ध्रु.॥
भाविक शब्द बोले वाणीचा । लटिका वाचा वाचाळ तो ॥२॥
परउपकार घडे तोचि भला । नाठ्याळ तयाला दया नाहीं ॥३॥
जातिवंत तो पायरी जाणे । अधम तो नेणे खुंट जैसा ॥४॥
हित तें अनहित केलें कैसें । तुका म्हणे पिसें लागलें यासी ॥५॥

अर्थ

जो वेद-शास्र-पुराणे व संत यांचे शब्द प्रमाण मानतो त्याला ‘ सज्जन ‘ म्हणावे ;आणि जो दुस-याला पीडा देतो त्याला दुर्जन म्हणावे .मुळात एकच सामान्य गुण असतो ;पण तो दोन ठिकाणी विभागला गेला ,म्हणजे ज्याचा जसा स्वभाव असेल त्याप्रमाणे तो विशेषत्वाला प्राप्त होऊन त्याच्या हिताला किंवा अनहिताला कारण होतो .जो सात्त्विक आहे ,तो दुस-याशी परिमित व सत्य बोलतो ,आणि जो वाचाळ आहे ,तो आपल्या वाणीने खोटे बोलतो .ज्याच्याकडून परमार्थ घडतो तो चांगला आणि जो नाठाळ असतो त्याला कोणाची दया येत नाही .जो शुध्द जातीचा व शहाणा असतो ,तो आपला अधिकार ओळखून मर्‍यादेने वागतो ;आणि जो अधम आहे ,तो आपला अधिकार न जाणता खुंटाप्रमाणे ताठ असतो .तुकाराम महाराज म्हणतात ,याप्रमाणे सद्गुणाने आणि दुर्गुणाने मनुष्याचे अनुक्रमे हित व अनहित होत असते .या मनुष्यदेहात सद्गुणाने हित होणे शक्य असूनही काही लोकांनी दुर्गुणाने अनहित का केले ?या उत्तरने त्यांना वेड लागले आहे .


अभंग क्र.१८००
तुझें नाम मुखीं न घेतां आवडी । जिव्हा तोचि घडी झडो माझी ॥१॥
हें मज देई हें मज देई । आणिक दुजें कांहीं न मगें तुज ॥ध्रु.॥
बहिरे कान तुझी कीर्ती नाइकतां । पाय न देखतां जावोत डोळे ॥३॥
मना तुझें ध्यान नाहीं नित्य काळ । धिग तें चांडाळ जळो जळो ॥३॥
हातपाय तेणें पंथे न चलतां । जावोत अनंता गळोनियां ॥४॥
तुजविण जिणें नाहीं मज चाड । तुका म्हणे गोड नाम तुझें ॥५॥

अर्थ

हे हरी ज्यावेळी माझ्या मुखाने तुझे नाम आवडीने घेतले नाही त्याच वेळी माझी जीभ झडून जावो. देवा हेच दान मला दे या पलीकडे दुसरे कोणतेही दान तुला मी मागत नाहीये . देवा मी तुझी कीर्ती माझ्या कानांनी ऐकली नाही तर माझे कान जावो मी बहिरा हवो आणि मी तुझे पाय माझ्या डोळ्याने पाहिले नाही तर माझी दृष्टीच जावो. देवा माझ्या मनाला जर तुझे ध्यान नित्य सर्वकाळ होत नसेल तर त्या मनाचा धिक्कार असो ती चांडाळ आहेत असे समजावे ते जळून जावो. देवा जर माझे हात तुला वंदन करीत नसतील तुझी पूजा करीत नसतील आणि माझे पाय तुझ्या मार्गाने चालत नसतील तर ते दोन्ही ही गळून जावोत. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तुझ्या वाचून जगण्याची मला आवड नाही तुझे नाव नेहमी घ्यावे आणि ते नामच मला नेहमी गोड वाटते.


सार्थ तुकाराम गाथा 1701 – 1800

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *