sankashti chaturthi - संकष्टी चतुर्थी

संकष्टी चतुर्थी/अंगारकी संकष्टी चतुर्थी माहात्म्य

संकष्टी चतुर्थी/अंगारकी संकष्टी चतुर्थी माहात्म्य


हे पण वाचा:- संकष्टी चतुर्थीची संपूर्ण माहिती

हे पण वाचा:- अंगारकी संकष्टी चतुर्थीची संपूर्ण माहिती


श्रीगणेशाय नम: ॥
जयजयाजी पंचवदना ।
दावी तव सुताच्या आनना ।
पाहताच पुरती मनकामना।
भवबंधना तोडीतसे ॥१॥

अंगी चर्चित सिंदुर ।
जो का कृपेचा सागर ।
भक्तजनांचे माहेर।
जो का साचार दीन बंधू ॥२॥

मूषकवाहनी बैसून।
हस्ती त्रिशुळादि धारण ।
करीत विघ्नांचे छेदन ।
चरणी वंदन तयाच्या॥३॥

जो कं सद्‌गुरु चैतन्यघन ।
देउनी ज्ञानाचे दर्पण ।
प्रकाशविले आत्मज्ञान ।
केले समाधान जीवीचें ॥४॥

तयांचे कं न धरावे चरण ।
कैसी न यावी आठवण ।
जगन्नाथ भरला परिपूर्ण ।
हरिले भान जगताचे ॥५॥

तया चरणी माझे मस्तक।
जो कां त्रैलोक्याचा नायक ।
जेथें तो एक मी एक ।
पूज्यपूजक भाव असे॥६॥

जो यादवकुळीं जन्मोनी स्पष्ट।
गोकुळवासी जनांचे कष्ट ।
हरॊनी केलें संतुष्ट।
संहारिले दुष्ट कंसादी ॥७॥

जेणें केले कालियामर्दन।
शुद्ध केले यमुना जीवन।
तया कृष्ण चरणी माझे नमन ।
लागले ध्यान मनोभा ॥८॥

तया कृष्णाचे करितां स्मरण ।
काळ जाय मनी दडपोन ।
क्षमा दया शांती येवोन ।
पावती समाधान ते ठायीं ॥९॥

जैसा उदकावरी तरंग ।
पाहतां पाहतां पावे भंग ।
तैसा विघ्नांचा प्रसंग।
निर्विघ्न सांग करितसे ॥१०॥

जैसी सागराची लहरीयेत जात एक सरी ।
तैसी संकते नाना परी ।
येतां निवारी गजवदन ॥११॥

तया गणपतीचे व्रत देख।
आधी तिथीनिर्णय ऎक।
जो का होय सुखदायक।
चालती सकळिक जयारीती ॥१२॥

श्रावण कृष्णामाझारीं ।
तृतीयायुक्त चतुर्थी अवधारी ।
चंद्रव्यापिनी असेल जरी ।
तरी व्रताते करावे॥१३॥

दोन्ही दिवस चंद्र व्यापिनी तिथी ।
असोनी पूर्व दिनी करिती ।
मातृविध्दा तयास म्हणती ।
आहे शास्त्र मत ऎसेची ॥१४॥

दुसर्‍यादिनी पंचमीयुक्त ।
चंद्र व्यापिनी चतुर्थी होत।
तरी ते न करावी निश्चित ।
ऎसें शास्त्रात सांगितले ॥१५॥

तया दिनी काय करावे ।
पढे सांगती स्कंद भावे ।
ते श्रोतेंजनी ऎकावे ।
व्रत आचरावे तयापरी ॥१६॥

ऋषी अवघे मिळोन ।
प्रश्न करिती स्कंदालागूनी ।
दरिद्र शोक कष्ट नाशन।
वैरीजन छ्ळ्ताती ॥१७॥

विद्या काही नसे जयासी ।
पुत्र न होय स्त्रीयांशी ।
ऎशा दु:खे पीडा जनांसी ।
दुर कैसी होय सांगा॥१८॥

ऎसा ऋषींचा ऎकुन प्रश्न ।
स्कंद पावला समाधान ।
जनकल्याण व्हावया लागून ।
तयासी वचन बोलतसे ॥१९॥

सुख प्राप्ती व्हावी सकळीकां ।
ऎसा उपाय सांगतॊ ऎका ।
संकष्टी व्रते गणनायका ।
भजतां होय निर्विघ्न॥२०॥

यथाविधी तया व्रतासी।
आचरिता भक्ति भावेसीं ।
सकळ मनोरथ निश्चयेंसी ।
पूर्ण होतील तत्कालीक॥२१॥

हें व्रत पूर्वी श्रीकृष्ण सांगत।
संकटापासोनी व्हाया मुक्त।
गांजिले जे कां पंडुसुत।
तया अद्भुत निवेदिलें॥२२॥

पांडवांसी द्यूती जिंकून ।
कौरवें धाडिलें काननीं।
तें दु:ख न साहे म्हणॊनी।
सांगे कानीं धर्माच्या॥२३॥

धर्म, भींम, अर्जुन,नकुळ।
सहदेव, द्रौपदी मिळोनी।
व्रत चालविले अचळ।
जेणें तळमळ दुर होय॥२४॥

द्वादश वर्षे अरण्यवास।
पुढे एक वर्ष अज्ञातवास।
तेथील हरावे संकटास।
पुन्हा विपिनास न यावें॥२५॥

हा हेतु धरोनि मनी।
करिते झाले व्रतालागूनी।
श्रावण वद्य चतुर्थी दिनीं।
आरंभ करुनी चालविलें॥२६॥

तया व्रते करोनी जाण ।
त्रयोदशअब्द पूर्ण नसोन।
पुनरुपी अरण्य सेवन।
गजाननें जाण दूर केलें॥२७॥

ऎसा व्रताचा महिमा जाण।
कृष्णे सांगितला कोठून।
तें करावे निवेदन।
करविणे श्रवण आम्हां आधी॥२८॥

मग ऋषींचा प्रश्न ऎकोन।
स्कंद सांगती तयालागुन।
पार्वतीस हेरंब आपण।
काय कारण सांगतसे॥२९॥

क्रुतयुगी हिमनगबाळा।
टाकोनी निघाला शिवभोला।
वियोगजन्य दु:ख ज्वाला।
जाळील कळीकाळा वाटतसे॥३०॥

पार्वती झाली उदास।
सोडिला सर्व विलास।
द्रुढ धरिले वैराग्यास।
लिहिले प्राक्तन काय हे॥३१॥

पतीने का केला कोप।
काय अन्य जन्मीचे पाप।
उभें राहिले आपोआप।
मज मायबाप कोण तारी॥३२॥

काय मी चुकल्यें पतिव्रताधर्म।
किंवा काय काढले वर्म।
किंवा चुकले स्वधर्म।
अवघा अधर्म चालविला॥३३॥

वचनाचा केला अनादर।
ब्रह्मणा छळिलें निर्धार।
घडला होता अनाचार।
म्हणोनी मजवर कोप केला॥३४॥

काय भक्तांलांगी छळिलें।
काय पूजेतें विध्वंसिले।
काय गंगेतें निंदिलें।
नंदिसी ताडिलें दंडाने॥३५॥

मुखानें नये रामनाम।
अंगी धडाडला काम।
ईश्वरीं नाहीं ठेविलें प्रेम।
म्हणोनी सुखधाम हरपलें॥३६॥

नाहीं केली देव पूजा।
उच्छेदिलें देवद्विजां।
तेणें मनोभंग झाला माझा।
म्हणोनीं दु:ख पावल्यें॥३७॥

काय विधूची केली निंदा ।
पन्नगासीं भोगविली आपदा ।
चिताभस्म लेपन अंगी सदा ।
हंसल्ये कदा तयासीं ॥ ३८ ॥

स्मशानीं असे सदा वास ।
गुंडाळिलें व्याघ्रांबरास ।
जाळुनि टाकिलें मदनास ।
धरिलें वैराग्यास म्हणवुनी ॥ ३९ ॥

श्वशुरगृहासी वास केला ।
तेव्हा मायबाप बोलिला ।
म्हणोनी चित्तीं क्रोध आला ।
जाऊनि लपला कपाटीं ॥ ४० ॥

ऎसे वदोनि वारंवार ।
नेत्रीं वाहे दु:खनीर ।
अंतरामाजी न टिके धीर ।
न सुचे व्यवहार करावया ॥ ४१ ॥

आतां सेवावें अरण्य ।
किंवा करावें देहपतन ।
किंवा तपालागीं जाऊन ।
घालूनि आसन बसावें ॥ ४२ ॥

पवन आणि चंदन ।
झोंबे अंगीं अग्निसमान ।
विधु तापवी देहालागुन ।
चंडकिरण माध्यान्हीचा ॥ ४३ ॥

वाटॆ मजला वैरी वसंत ।
सुमन सुवास उग्र भासत ।
कोकिळास्वर कर्णीं झोंबत ।
कर्कश काकवत दु:ख देती ॥ ४४ ॥

अग्नीमाजी होमावा काय ।
कोठें पाहूं पतिराय ।
काय घडला न कळे अन्याय ।
काय उपाय करावा ॥ ४५ ॥

धरणीवर अंग टाकी ।
कोण युक्ती सांगेल सखी ।
कैशी धुंडूं चतुर्दशलोकीं ।
हंसती न कीं मजलागीं ॥ ४६ ॥

ऎसी वियोगदु:खें करून ।
पोळली अंत:करणी जाण ।
वैराग्यसंपन्न तयालागून ।
गेली कानन सेवावया ॥ ४७ ॥

वल्कलें करूनि धारण ।
माथां जटा गुंडाळून ।
कुंकुम मळवट भरून ।
घालून आसनीं बैसली ॥ ४८ ॥

कांहीं दिवस वायु भक्षण ।
कांहीं दिवस फळें सेवन ।
कांहीं दिवस पर्णे जाण । सेवन दुर्वांचें ॥ ४९ ॥

कांहीं दिवस जलपान ।
कांहीं दिवस कंदमूळ भक्षण ।
कांहीं दिवस निराहार राहून ।
कांहीं सेवन करीना ॥ ५० ॥

कांहीं काळ ऊर्ध्व बाहू करून ।
कांहीं दिवस पंचाग्निसाधन।
कांहीदिवसउभेराहून।
नाहींशयनबहुकाल॥५१॥

ब्रह्मांडीं प्राण नेऊन ।
केलें हटायोगाचें साधन ।
आकर्षण करूनि मन ।
इंद्रिय दमन बहुकाळ ॥५२॥

राजयोग साधनीं ।
निमग्न राहे निशिदिनीं ।
रामनाममंत्रें करोनी ।
काल वनीं काढिला ॥ ५३ ॥

अष्टांगयोगाच्या साधनीं ।
देह झिजविला तपें करूनी ।
परी प्राणेश्वरालागूनीं ।
दया मनीं नयेचि ॥५४॥

जो भक्तीचा भुकेला ।
भावें करोनी बांधला गेला ।
तो हिमनगजेलागीं दुरावला ।
म्हणोनी झाला खेद चित्तीं ॥ ५५ ॥

आतां काय करावा उपाय ।
कैसा भेटेल पतिराय ।
चिंता करोनि झिजली काय ॥
झाली तन्मय वृत्ति ती ॥५६॥

तपें करूनि देह तापला ।
तीन्ही लोकीं कंप सुटला ।
इंद्र मनामाजीं दचकला ।
काय वर्तला अनर्थे ॥५७॥

ऎसें तीव्र तप स्त्रीनें केलें ।
नाहीं कोठें आयकिलें ।
शंकरें दर्शन नाहीं दिलें ।
तरी खचिलें वाटे ब्रह्मांड ॥५८॥

तों पाहिला नारदमुनी ।
पुसती झाली तयालागुनी ।
पूजन केलें स्वस्थमनीं ।
लागली चरणी तयाच्या ॥ ५९ ॥

इतुकियामाजी देवऋषी ।
पुसता झाला पार्वतीसी ।
तुझी दशा कां गे ऎसी ।
आलीस वनीं काय काजें ॥ ६०॥

शरीर झालें जर्जर ।
सेविलें कानन कां कठोर ।
पंचवदनाचा पडिला विचार ।
सांगे उत्तर लवलाहीं ॥ ६१ ॥

मग बोले शैलबाला ।
मी कांहीं अपराध न केला ।
परी पतीचा वियोग झाला ।
उपाय मजला सांगे आतां ॥ ६२॥

दरिद्र्यासी लाभतां चिंतामणि ।
मग हर्ष न माय गगनीं ।
तैसें झालें माझे मनीं ।
तुज नयनी देखतांचि ॥ ६३ ॥

बहूकाल सेविले कानन ।
तप केलें अनुदिन ।
परी मजला स्वामी अजून ।
भेटुनि नयन निवनीना ॥ ६४ ॥

आतां यत्‍न काय करू ।
मज सांगा जी निर्धारूं ॥
कोण्या कर्में परात्परू ।
होईल साचारू प्राप्त मज ॥ ६५ ॥

ऎसें बोलतां जगज्जननी ।
सुचला विचार एक मनीं ।
म्हणे गणपतीच्या व्रते करूनी ।
पावेल सदनीं शंकर ॥ ६६ ॥

म्हणें मातें ऎसे बोलतां देवर्षी ।
जगन्माता म्हणे सांग मजसीं ।
तो बोले मुनीं तियेसीं ।
गजाननासी पूजावें ॥ ६७ ॥

मग करूनी गणपती स्तवन ।
आणिलें मनामाजीं ध्यान ।
चतुर्भुज रक्तवर्ण ।
केलें चिंतन तयाचें ॥ ६८ ॥

विशाल दोंदाची शोभा ।
स्मरतां संकटासरसा उभा ।
मांड्या कर्दळीचा गाभा ।
नयन शोभा पद्मावरी ॥ ६९ ॥

माथां शेंदुर शोभत ।
रत्‍नजडित मुगुट झळकत ।
पायीं घागरिया वाजत ।
येत नाचत झडकरी ॥ ७० ॥

मग देउनीं आलिंगन ।
संतोषविलें तयाचें मन ।
कां माते सेविले कानन ।
संकट कवण पडियेलें ॥७१॥

काय काजा ।
कवणें गांजिला देह तुझा ।
कां केलासी धावा माझा ।
सांगे हितगुजा मजपाशीं ॥ ७२ ॥

ऎसें ऎकोनी वचनातें ।
सांगे पार्वती तयातें ।
पतीनें त्यागिलें मातें ।
सेविलें विपिनातें तयालगीं ॥ ७३ ॥

बहुत केलें तपाचरण ।
न सरे माझें पाप अजुन ।
वियोग दु:खें सरून ।
सुख संपादन न होय ॥ ७४ ॥

भेटी न होय माझी ।
म्हणोनी आस केली तुझी ।
आतां प्राणपती होय राजी ।
ऎसें आजी व्रत सांगे ॥ ७५ ॥

“माझे व्रत संपादन।
करितां संकट जाय निरसुन ।
पूर्वी सांगितलें तिथिप्रमाण ।
मास पक्षजाण सत्य तोचि ॥ ७६ ॥

तया दिनीं व्रतारंभ ।
करितां भेटेल तुज सांब ।
पूजाविधान हेरंब ।
करीं अंबे संतोषें ॥ ७७ ॥

प्रात:काळी दंतधावन ।
मग करुनि माझे स्मरण ।
संकल्पें मातें प्रार्थून ।
व्रतस्थ जाण असावें ॥ ७८ ॥

आजी चंद्रोदयपर्यंत ।
मी राहोनि उपोषित ।
पूजन करीन एकचित्त ।
भोजनीं रत होईन पुढें ॥ ७९ ॥

ऎसी प्रार्थना करून ।
आंगासीं काळे तीळ लावून ।
स्नान नित्यनेमें सारून ।
उपोषित राहे जाण मग ॥८०॥

मोदक करावे एकविंशती ।
पांच अर्पावे देवाप्रती ।
पांचांचे वायन ब्राह्मणाहातीं ।
सेवीं निश्चिती शेष आपण ॥८१॥

धातु, पाषाण, मृत्तिका जाण ।
तयाची प्रतिमा करून ।
गणपती नामें तयाचें स्थापन ।
करील पावन सकळातें ॥ ८२ ॥

मग करावें आवाहन ।
मनीं आणोनि करावें ध्यान ।
षोडशोपचारें पूजन ।
सांग संपादन करावें ॥ ८३ ॥

अथर्वशीर्षाचे पाठ ।
एकविंशति करावे नीट ।
अक्षर वटिक म्हणोनि स्पष्ट ।
करावा संतुष्ट गजानन ॥ ८४॥

वस्त्र उपवस्त्रादि सकळ ।
चंदन, सिंदूर परिमळ ।
रूई-मांदार पुष्पें सकळ ।
दुर्वा कोमळ अर्पाव्या ॥ ८५ ॥

मज दुर्वांची अतिप्रीती ।
सहस्त्रनामें अर्पावे एकचित्तीं ।
जयाची असेल शुद्धमती ।
तोचि भक्ति करि ऎशी ॥ ८६ ॥

धूप-दीप-नैवेद्य जाण ।
मोदकादि करूनि पक्वान्न ।
समर्पूनि, उत्तरापोशन।
करूनि, अर्पावा तांबूल ॥ ८७ ॥

मग ठेवी दक्षिणा फळ ।
प्रदक्षिणा मंत्रपुष्प सकळ ।
चरणीं ठेवीं शिरकमळ ।
भावें केवळ प्रार्थावे ॥ ८८ ॥

चंद्रोदय झालियावरी ।
मग विधूची पूजा करी ।
अर्ध्य देउनी त्रिवारी ।
प्रार्थना करी विधूची ॥ ८९॥

मग पंचमोदक वायन ।
द्यावें ब्राह्मणालागून ।
दक्षिणा तांबूल समर्पून ।
करावें वंदन द्बिजातें ॥ ९० ॥

करूनि ब्राह्मण संतपर्ण ।
पात्री बैसावें आपण” ।
ऎसें सांगोनि विधान ।
गेला गजानन स्वस्थाना ॥ ९१ ॥

विनायकें सांगितलें मातेसी ।
कृष्णें विदित केलें पांडवांसीं ।
स्कंदें सांगितलें ऋषीश्वरांसीं ।
पावती कल्याणासीं सकळिक ॥९२॥

पार्वतीनें केलें व्रतासी ।
मनीं धरोनी निश्चयासी ।
करितां पावली पतीसीं ।
स्कंद ऋषींसीं सांगतसें ॥ ९३ ॥

पाहतां नयनीं पंचवदन ।
चरणीं लागली जाऊन ।
शिवें गिरिजा उचलोन ।
वामांकीं बैसवून तोषविली ॥ ९४ ॥

ऎसें व्रताचें महिमान ।
जाणती पंडुनंदन ।
स्वयें हिमनगजा आपण ।
पावली समाधान पतिसंगें ॥ ९५ ॥

हे व्रत जे कोणी करिती ।
दरिद्र, शोक, तयांचें जाती ।
केलें कष्ट फळ देती ।
वैरी सोडिती वैरभाव ॥ ९६ ॥

विद्या प्राप्त होईल जाणा ।
पूर्ण होईल मनकामना ।
निपुत्रिक पावेल संताना ।
पीडितजना सुख होय ॥ ९७ ॥

धन धान्यवृद्धी अमूप ।
हरपोनी जाईल पापताप ।
करितां नाममंत्राचा जप ।
आपेंआप मोक्ष लाधेल ॥९८॥

जयाचा शास्त्रावरी विश्वास ।
तोचि होईल निर्दोष ।
शांती दयेनें भरेल मानस ।
क्षमा ह्रदयास उपजेल ॥ ९९ ॥

असो आतां हा पाल्हाळ ।
अंगीं असावें भक्तीबळ ।
कृपा करील गिरिजाबाळ ।
श्रोतीं सकळ ऎकावें ॥ १०० ॥

॥ श्रीसकलविघ्नहरणगजानानापर्णमस्तु ॥

संकष्टी चतुर्थी/अंगारकी संकष्टी चतुर्थी माहात्म्य समाप्त


शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषीक्रांतीला भेट द्या

ref:- wikisource

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *