विष्णू अवतार नृसिंह

विष्णू अवतार नृसिंह

विष्णू अवतार नृसिंह

हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो. वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरूनच विष्णूंनी हा अवतार घेतला. अशी आख्यायिका प्रचलित आहे.

विष्णू अवतार नृसिंह आख्यायिका

हिरण्याक्ष व हिरण्यकशिपू (याला हिरण्यकश्यपू असेही म्हणतात.) हे दोघे (दानव) भाऊ होते. त्यांच्या क्रूरतेमुळे सर्व देवता व पृथ्वीवरील सर्व जीव त्रासून गेले होते. पृथ्वीच्या उद्धारासाठी भगवान विष्णूंनी हिरण्याक्षाचा वराह अवतार (दशावतारांपैकी तिसरा अवतार) घेऊन वध केला. आपल्या प्रिय लहान भावाचा वध झालेला पाहून हिरण्यकशिपू अत्यंत संतापला. रागामुळे त्याचे डोळे लाल झाले, त्याच्या शरीराला कंप सुटला, तो आपले ओठ चावू लागला. त्याने सर्व सभेसमोर आपले शूळ वर उचलले व सर्व दानवांना आज्ञा केली की तुम्ही पृथ्वीवर जा आणि जो जो दान, तप, यज्ञ यांद्वारे विष्णूची आराधना करेल त्याचा नाश करा. यज्ञ व अनुष्टान यामुळे देवांना शक्ती प्राप्त होते म्हणून जेथे ब्राह्मण किंवा ऋषी अशी कर्मे करीत असतील तेथे जाऊन तुम्ही ती कामे नष्ट करा. त्याने शपथ घेतली की, मीसुद्धा जेव्हा आपल्या शुळाने त्या विष्णूचा कंठ फोडून त्याच्या रक्ताने माझ्या प्रिय बंधूचे तर्पण करीन, तेव्हाच माझ्या मनाला शांती लाभेल. त्याची आज्ञा मानून सर्व दानवांनी पृथ्वीवर धुमाकूळ घातला. यज्ञयाग बंद झाले. त्याच्या धास्तीने भयभीत झाले. यज्ञे बंद पडल्यामुळे देवांनाही हविर्भाग मिळेनासा झाला. त्यामुळे स्वर्गत्याग करून देव पृथ्वीवर गुप्त रितीने संचार करू लागले.

इकडे हिरण्यकशिपूने प्रतिप्रभू होण्याचा निश्चय केला. अमरत्व मिळविण्यासाठी मंदार पर्वतावर त्याने खडतर तपश्चर्या करण्यास प्रारंभ केला. एका निर्जन दरीमध्ये एकाच पायाच्या अंगठ्यावर उभे राहून हात वर करून व दृष्टी आकाशाकडे लावून त्याची तपश्चर्या सुरू झाली. त्याला मिळणाऱ्या तपोबलामुळे त्याच्या मस्तकातून धूर निघू लागला. नद्या आटल्या, भूमीला थरकाप सुटला, नक्षत्रे गळाली व त्यामुळे सर्व देव संकटात सापडले. सर्व देवांनी ब्रह्मदेवांकडे धाव घेतली व त्यांची विनवणी करू लागले. तेव्हा ब्रह्मदेव हिरण्याकशिपूकडे गेले, हिरण्याकशिपूचे शरीर वारुळे, गवत, वेळूंची बेटे, यांनी आच्छादून गेले होते, त्यातील रक्त, मांस किड्यामुंग्यानी खाऊन टाकले होते. त्या स्थितीत त्याला पाहून देव विस्मित झाले व म्हणाले, “हे हिरण्यकशिपू, तुझ्या तपाने मी प्रसन्न झालो आहे, तुझा देह किड्यामुंग्यानी भक्षण केला आहे, आणि तुझे प्राण अस्थीचाच आश्रय घेऊन राहिले आहेत. मी तुला वर देण्यासाठीच येथे आलो आहे.” ब्रह्मदेवांनी त्यांच्या कमंडलूतले पाणी त्याच्या अंगावर टाकले. त्या जलामुळे हिरण्याकशिपूचे शरीर पूर्ववत झाले. त्याला अतिशय आनंद झाला. त्याने ब्रह्मदेवांना नमस्कार केला, व म्हणाला, ‘ हे भगवन, तुम्ही उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच घरात अथवा बाहेर, दिवसा अथवा रात्री,ना शस्त्राने ना अस्त्राने, भूमीवर अथवा आकाशात, प्राण्यांकडून, मनुष्याकडून, देवांकडून, दानवांकडून, मृग, महानाग, यांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच तुमच्याप्रमाणे मला देखील कीर्ती प्राप्त व्हावी व सर्व जीवांचा अधिपती असे पद प्राप्त व्हावे, युद्धात माझा कोणी प्रतिपक्षी नसावा, व न संपणारे ऐश्वर्य मला प्राप्त व्हावे.” ब्रह्मदेवांनी त्याला हे सर्व प्रदान केले.

या वराच्या सामर्थ्याने हिरण्यकशिपूने तिन्ही लोकांवर विजय प्राप्त केला, राजे, गंधर्व, गरुड, नाग, ऋषी, भुते-प्रेते, या सर्वाना पराजयी करून अधिपती पद प्राप्त केले. स्वर्गावरही त्याने स्वतःचे अधिपत्य स्थापन केले; अप्सरांना त्याची स्तुती करण्यास त्याने भाग पाडले. त्याच्या या हाहाकारामुळे सर्व देव त्रस्त झाले आणि त्यांनी भगवान विष्णूंकडे धाव घेतली, तेव्हा त्यांच्या प्रार्थनेस उत्तर म्हणून विष्णू म्हणाले की, मीच त्याचा वध करणार आहे. ज्या वेळेस हिरण्यकशिपू त्याच्या प्रल्हाद नामक पुत्राचा छळ करेल त्या वेळेस त्याचा विनाश नक्की होईल.
नियतीने ठरविल्याप्रमाणे हिरण्यकशिपूला प्रल्हाद (हिरण्यकशिपू व पत्नी कयाधू यांचा पुत्र) नावाचा अत्यंत तेजस्वी, शांत व शीलसंपन्न असा सर्वगुणसंपन्न पुत्र झाला. आपल्या सर्व भावंडांमध्ये लहान असलेला प्रल्हाद परम विष्णुभक्त होता. आपल्या वडिलांनी विष्णूंशी केलेले शत्रुत्व प्रल्हादाला मान्य नव्हते. आपल्या मुलाला अजून ज्ञान नाही त्यामुळे तो असे आचरण करत आहे असे मानून हिरण्यकशिपूने त्याला विद्यार्जनासाठी गुरूकडे पाठविले. पण ज्ञानदानात शिकविले गेलेले भेदभाव प्रल्हादास मान्य नव्हते. एकदा हिरण्यकशिपू प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसला होता, त्याने प्रल्हादाला प्रेमाने विचारले, तुला या जगात प्रिय काय आहे? हिरण्यकशिपूला वाटले की प्रल्हाद त्याचे नाव घेईल. पण प्रल्हाद त्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणाला, हे तात, मला विष्णूचे नामस्मरण करणे सर्वात प्रिय आहे. विष्णूचे कीर्तन, भजन, पूजन, या सर्व क्रियेत जीवन समर्पित करावे असे मला वाटते. तुम्हीसुद्धा त्या परम कृपाळू नारायणांना शरण जा. त्याचे हे उत्तर ऐकून हिरण्यकशिपू संतापला. त्याने प्रल्हादाला त्याच्या मांडीवरून ढकलून दिले. तुझ्या चुलत्याचा वध करणाऱ्या माझ्या परम शत्रूची तू स्तुती करतोस तुला जगण्याचा अधिकार नाही, मग तू माझा स्वतःचा पुत्र असला तरी तुला मृत्यूदंडच असेल. असे म्हणत त्याने सेवकांना आज्ञा केली की प्रल्हादाला उंच कड्यावरून फेकून द्या. आज्ञेचे पालन करीत सेवकांनी प्रल्हादाला कड्यावरून फेकून दिले. पण विष्णूंनी प्रल्हादाला आपल्या कुशीत झेलले. कडेलोट करून देखील प्रल्हाद अजून जिवंत आहे, आणि आनंदाने भगवान विष्णूंचे नामस्मरण करत आहे हे पाहून हिरण्यकशिपूच्या रागाचा उद्रेक झाला.

क्रोधित होऊन त्याने प्रल्हादाचा वध करण्यासाठी अनेक प्रयत्‍न केले. त्याने प्रल्हादाला हत्तीच्या पायाखाली दिले, मोठमोठ्या सर्पांच्या कोठडीत कोंडले, भोजनामध्ये विषप्रयोग केला, पण या सर्वांचा काही उपयोग झाला नाही. स्वतःच्या भावाला हिरण्यकशिपूला अत्यंत क्रोधात पाहून होलिकाने (हिरण्यकशिपूची बहीण ) एक युक्ती शोधली, होलिकाला ब्रह्मदेवांकडून वर प्राप्त झाला होता की अग्नी तिचे काही नुकसान करू शकणार नाही. पण या वराचा तिने अयोग्य गोष्टीसाठी प्रयोग केला तर तो वर त्यावेळेस निष्फळ ठरेल. सूडाच्या भावनेने पेटून उठलेल्या होलिकेला याचा विसर पडला. तिने प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसविले व सर्व बाजूनी अग्नी लावण्यास सांगितले. तिने स्वतःला प्राप्त झालेल्या वराचा उपयोग प्रल्हादाचे अहित करण्यासाठी केल्यामुळे ब्रह्मदेवांकडून मिळालेला वर निष्क्रिय झाला अग्नीमुळे होलिका जळून तिची राख झाली. जेव्हा अग्नी पूर्ण शांत झाला तेव्हा हिरण्यकशिपू प्रल्हादाच्या मृत्यूची बातमी ऐकण्यासाठी जवळ गेला, तर त्याला दिसले की आपली प्रिय बहीण होलिका आगीत भस्म होऊन गेली आहे, आणि प्रल्हाद सुरक्षितपणे भगवंताचे नामस्मरण करत आहे. (होलिकाने अधर्माचा स्वीकार करून कपटाने छोट्या प्रल्हादाला मारण्याचा कट केल्याने तिचा मृत्यू झाला. अधर्मावर धर्माचा झालेला हा विजय आपण होळी म्हणून साजरा करतो ). हिरण्यकशिपूच्या डोळ्यातील क्रोध अधिक वाढला आणि त्याने सेवकांना आज्ञा केली की, प्रल्हादाला अन्नपाण्याशिवाय कारागृहात डांबण्यात यावे. सेवकांनी या आज्ञेचेही तंतोतंत पालन केले, पण यामुळेसुद्धा प्रल्हादाची भगवान नारायणावरील भक्ती थोडीसुद्धा कमी झाली नाही. सर्व प्रयत्‍न निष्फळ झालेले पाहून हिरण्यकशिपू क्रोधाने पेटून उठला व त्याने प्रल्हादाचा वध करण्यासाठी प्रल्हादाला भर सभेत घेऊन येण्याची आज्ञा सेवकांना दिली. श्रीविष्णूचे नामस्मरण करत आलेला प्रल्हाद पाहून हिरण्यकशिपू संतापून उठला आणि प्रल्हादाला उद्देशून म्हणाला, हे उद्धटा, हे मंदबुद्धी, तुला मी यमसदनी पाठवितो. माझ्याहून वेगळा असा जगाचा नियंता तू सांगतोस, तो विष्णू कोठे आहे ? तेव्हा प्रल्हाद शांतपणे म्हणाला की, हे ताता , हे सर्व जगच माझ्या नारायणाने व्यापले आहे, जळी स्थळी माझे विष्णू वास करत आहे. प्रल्हादाच्या या उत्तरावर क्रोधित होऊन हिरण्यकशिपू गरजला मग ह्या खांबामध्ये आहे का तुझा नारायण? प्रल्हाद म्हणाला, हो तर ह्या खांबातदेखील आहेत माझे नारायण, माझे श्री हरी. हे ऐकताच हिरण्यकशिपूने त्या खांबाजवळ उडी मारली त्याने आपली गदा उचलली आणि त्या खांबावर प्रहार करत म्हणाला, थांब आज तुझा आणि तुझ्या श्री हरीचा मी वध करतो.

जसे त्याने गदेने खांबावर प्रहार केला तोच त्या खांबातून अति भयंकर आवाज उत्पन्न झाला व त्या आवाजाने ब्रह्मांड फुटले की काय असा सर्वाना भास झाला. तो नाद कोठून आला हे हिरण्यकशिपूलासुद्धा समजले नाही. इतक्यात सर्व भूतमात्रामध्ये असलेली आपली व्याप्ती खरी करण्याकरिता व आपल्या भक्ताने केलेले वचन खरे करण्यासाठी, ब्रह्मदेवांच्या वराचा मान राखत मनुष्याकार नव्हे व मृगाकार नव्हे, असे अत्यंत अद्‌भुत रूप धारण करणारे श्री हरी खांबातून प्रकट झाले. खांबातून बाहेर पडणारे मनुष्य व सिंह असे मिश्र रूप हिराण्यकशिपूने पहिले, (त्याला मिळालेल्या वरानुसार ते रूप मनुष्यही नव्हते आणि प्राणीही नव्हते) हा मृगही नाही आणि नरही नव्हे तर हा कोणता विचित्र प्राणी आहे ? असा विचार करत असताना भगवान त्याच्या समोर येऊन उभे राहिले. श्री हरी विष्णूंनी घेतलेले हे रूप फारच भयानक होते, त्यांचे धड मनुष्याचे व तोंड सिहाचे होते, त्यांचे डोळे तापलेल्या सोन्याप्रमाणे लाल होते, त्यांच्या मानेवरील केस विजेप्रमाणे तळपत होते. त्यांच्या दाढा भयंकर होत्या, जिव्हा तलवारीप्रमाणे चंचल व तलवारीच्या धारेप्रमाणे तीक्ष्ण होती. चढविलेल्या भुवयांमुळे त्यांचे मुख उग्र दिसत होते, कान शंकूप्रमाणे ताठ उभारलेले होते, त्यांचे तोंड व नाकपुड्या पर्वताच्या गुहेप्रमाणे विस्तृत असून जबडा पसरल्यामुळे त्या भयंकर दिसत होत्या. त्यांचे मस्तक व वक्षस्थळ विशाल असून उदर कृश होते. चंद्रकिरणांप्रमाणे गौरवर्ण केस त्यांच्या अंगावर विखुरले होते. नखे जणू त्यांची आयुधे होती. त्यांच्याजवळ जाणे अशक्यच होते, तरीसुद्धा हिरण्यकश्यपूने त्या नरसिहाकडे धाव घेतली; परंतु अग्नीमध्ये पडलेला पतंग जसा दिसेनासा होतो तसा तो दैत्य निस्तेज झाला. नरसिहांनी त्याला गदेसह वर उचलले व संध्याकाळच्या वेळी दारामध्ये उंबऱ्यावर बसून त्याला आपल्या मांडीवर उताणा पाडून नखांनी त्याचे हृदय विदीर्ण केले. त्यांचे नेत्र क्रोधाने लाल झाल्यामुळे त्यांच्याकडे पाहणेही कठीण झाले. त्यांचे मानेवरील केस रक्ताने माखले होते.

हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर नृसिंहांनी त्याचे शरीर मांडीवरून फेकून दिले व आयुधे उचलणाऱ्या राक्षसांनाही त्यांनी ठार केले व ते स्वतःच सिंहासनावर जाऊन बसले. त्यांचे स्तवन करण्यास कोणी धजेना, देवांनी मात्र त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली, अप्सरा आनंदाने नृत्य करू लागल्या व गंधर्व गायन करू लागले. नरसिंहांचा राग शांत करणे गरजेचे होते, रागाने तप्त झालेल्या नरसिंहांच्या मुखातून आग बाहेर पडू लागली, तेव्हा सर्वांनी प्रल्हादाला देवांना शांत करण्याची विनंती केली. प्रल्हाद नरसिंहांकडे गेला व त्याने देवाला साष्टांग नमस्कार केला, तेव्हा प्रत्यक्ष प्रभूने शांतपणे प्रल्हादाच्या डोक्यावर हात फिरवला. प्रल्हाद नरसिंहांची विनवणी करीत होता, हे प्रभू आता शांत व्हा. हे नृसिंहा, भयनिवृत्तीकरिता सर्व लोक ह्या विष्णू अवतार नृसिंह स्मरण करतील. भक्त प्रल्हादाच्या प्रेमरूपी भक्तीने भगवान प्रसन्न झाले व देवी लक्ष्मी आणि डोक्यावर शेषनागासह त्यांनी त्यांच्या विष्णू अवतार नृसिंह चे दर्शन दिले. नंतर प्रल्हादाला अनेक आशीर्वाद देऊन देव निघून गेले.

विष्णू अवतार नृसिंह चे वैशिष्ट्य

हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवांकडून वर मागताना म्हणले होते की “तुम्ही उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच घरात अथवा बाहेर, दिवसा अथवा रात्री, ना शस्त्राने ना अस्त्राने, भूमीवर अथवा आकाशात, प्राण्यांकडून, मनुष्याकडून, देवांकडून, दानवांकडून, मृग, महानाग, यांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच तुमच्याप्रमाणे मला देखील कीर्ती प्राप्त व्हावी व सर्व जीवांचा अधिपती असे पद प्राप्त व्हावे, युद्धात माझा कोणी प्रतिपक्षी नसावा, व न संपणारे ऐश्वर्य मला प्राप्त व्हावे.”

या वराचा मान राखत भगवान विष्णूंनी नर-सिंह म्हणजेच शरीर मनुष्याचे व मुख सिंहाचे असे रूप धारण केले. हिरण्यकशिपूला नृसिंहाने न दिवसा, न रात्री तर संध्याकाळी (सूर्यास्ताच्या वेळी);. न घरात न बाहेर, तर घराच्या दरवाज्यात उंबऱ्यावर मृत्यू दिला. ना शस्त्र ना अस्त्र, तर आपल्या नखांनी नरसिंहांनी हिरण्यकशिपूचे पोट फाडले. भूमीवर नाही आणि आकाशातही नाही, तर आपल्या मांडीवर झोपवून हिरण्यकशिपूचा वध केला. असे हे नरसिंहांनी ब्रह्मदेवांचे वचन सत्य केले आणि जनकल्याणासाठी एका क्रूर दैत्याचा अंतही केला.

विष्णू अवतार नृसिंह

https://mr.m.wikipedia.org/wiki

2 thoughts on “विष्णू अवतार नृसिंह”

  1. The story of Shri Nrusinh is really informative. Holika’s role in the story may be new for many of readers. The detailings are good.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *